Showing posts with label चंद्रप्रकाशी लेखन. Show all posts
Showing posts with label चंद्रप्रकाशी लेखन. Show all posts

5/2/25

जावळीचे मोहीम, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे राजकीय डाव-पेच (चंद्रप्रकाशी लेखन)


**या लेख मालिकेला मी 'चंद्रप्रकाशी' अश्यासाठी म्हणले आहे कारण हे माझे मूळ संशोधन नाहीं. 'जावळीचे चंद्रराव मोरे' हे श्री रमेश साठे यांचे पुस्तक पुन्हा वाचनात आले. त्यातील संशोधनाचा मागोवा आणि काही प्रमुख घटना संक्षिप्तात मी येथे सादर करण्याचा हा प्रयत्न. पुस्तकाचा आढावा आणि त्यान्वये मला अजून उमजलेल्या छत्रपती आणि मराठा इतिहासाचे हे पडसाद आहे. हा लेख चांगलंच लांब झाला आहे. तरी आरामात किंव्हा टप्प्या-टप्प्यात वाचावा. पण अवश्य वाचावा. 

पार्श्वभूमी:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयाच्या काळात, म्हणजे सन १६५६  च्या काळात, जावळीच्या मोहिमेला अनन्यसाधारण महत्व आहे. या मोहिमे बद्दल फारसे बोलले जात नाहीं कारण हे मोहिमेत राजकारण जास्त होते. सिंहगड किंव्हा आग्रा या घटना रोमांचक आहेत त्यामुळे त्याची माहिती जनमानसात अधिक आहे. जेंव्हा जावळीचा उल्लेख होतो तेंव्हाहि, 'चंद्रराव मोरे ला परास्त करून, पिढीजात असलेला 'चंद्रराव' किताब काढून, जावळी महाराजांनी  जिंकली' असा थोडक्यात होतो. पण या मोहिमेत महाराजांनी त्यांच्या उत्तर आयुष्यातील त्यांच्या यशाची, आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने रोवली असे म्हणता येईल. त्याचे कारण असे:

१) महाराजांनी ताडलेले जावळीचे भौगोलिक महत्व. 

२) भविष्यातील मानसुब्यांसाठी जावळीचे आवश्यकता. उदा. जावळीतल रायरीचा किल्ला म्हणजेच रायगड

३) जावळीवर वर्चस्व किंव्हा जावळीचे मोरे स्वराज्यात दाखल होणे यापैकी कुठलीही वस्तुस्थिती इतर देशमुख, पाटील, किंव्हा मानसबदारांना स्वराज्याच्या कामात रुजू व्हायला प्रवृत्त करण्यास किंव्हा स्वराज्याबद्दल आत्मविश्वास निर्माण करण्यास कामी येणार होती.  

४) जावळीच्या राजकारणात महाराजांनी जेंव्हा लक्ष दिले तेंव्हापासून ते जावळी जिंकेपर्यंत महाराजांनी जे डाव-पेच, युक्त्या लढवल्यात त्या पुढल्या सगळ्या महत्वाच्या मोहिमांमध्ये नियमित पणे दिसून येतात. 

जावळीच्या मोहिमेची माहिती श्री बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या 'श्री राजा शिवछत्रपती' पुस्तकात उपलब्ध आहे. पण या विषयावर अचानक एक अमूल्य पुस्तक माझ्या पदरी पडले. 'अचानक धनलाभ' म्हणतात तसे. पुस्तक श्री रमेश साठे यांनी लिहिलेले आहे. श्री साठे हे बाबासाहेब पुरंदऱ्यांचे खास मित्र, महाराजांच्या इतिहासाचे व्यासंगी आणि इतिहास जिथे घडला ती भूमी यांना त्यांच्या मागच्या अंगणासारखी ओळखीची आहे. हे पुस्तक शिवाजी महाराजांच्या एका महत्वाच्या मोहिमेची संक्षिप्तात माहिती देतेच पण घटनेच्या इतिहास व्यतिरिक्त पुस्तकाचे लेखक श्री साठे, महाराजांचा मुत्सद्दीपणा, त्यांची दूरदृष्टी, एवढ्या कमी वयात त्यांनी दर्शविलेला राजकीय प्रौढपणा आणि त्यांचा संयम आणि तसेच जेंव्हा आवश्यकता निर्माण झाली तेंव्हा महाराजांचे संयोजन आणि धाडस या गुणांची सूक्ष्मतेने जाणीव करून देतात. 

--

जावळीचा इतिहास: 

जावळी हा भाग सध्याच्या सातारा जिल्ह्यात येतो. जावळीचे जंगल घनदाट आणि दुर्गम आहे. जावळीच्या पुढे कडा ओलांडून कोकणपट्टी. जावळी मोक्याची यासाठी कि जावळीत सैन्य पाठवून तो भाग किंव्हा जावळी ज्याच्या अधिपत्या खाली आहे त्याला जिंकणे महत्कर्म आहे. आणि जावळीत जम असेल तर जावळीचे अरण्य, किल्ले आणि खालती कोकणपट्टी व समुद्र किनारा, या सगळ्यावर वर्चस्व स्थापन होते. महाराजांचे जावळीकडे कधीपासूनच लक्ष असणार. पण जावळी, पिढीजात, मोरे घराण्याच्या हाती होती. आणि जो मोरे वंशज गादीवर असेल त्याला 'चंद्रराव' खिताब प्राप्त होत असे. जावळीत जरी या मोरे घराण्याची सत्ता अनभिषिक्त असली तरी हे सगळे 'चंद्रराव' मोरे, नाममात्र का होईना, चाकरी बादशहाची करीत असत. जो कोणी निझाम किंवा आदिलशाही बादशाह तेंव्हा आरूढ असेल त्याच्या पदरी हे दाखल होत. पण बादशहाचा पदर धरला तरी जावळीत बादशाही सत्ता नसे. तिथे सत्ता मोरे घराण्याचीच. जावळीच्या अजिंक्यतेची पावती देणारी एक घटना फार रोमांचक आहे. शिवाजी महाराजांच्या दोन शतके आधी मलिक उत्तुजार नावाचा एक मुसलमान बहमनी बादशहाचा सेनापती होता. त्याने शिर्के (शिरकावली गावाचे) नावाच्या स्थानीय सरदाराला युद्धात हरविले. आणि मग मुसलमान होण्यासाठी भाग पाडले. शिर्के त्याला म्हणाला कि मी मुसलमान होईन पण जवळच्या मोरेला पण मुसलमान करायला हवे म्हणजे मी एकटा पडणार नाहीं. मलिक उत्तुजारला ते पटले. शिर्के मग मलिकला घेऊन मोरे वर चढाई करायला जावळीत निघाला. शिर्केने आधीच मोरेला या सगळ्याची बित्तमबातमी दिली होती. जावळीच्या घनदाट जंगलात प्रवास करितांना मलिक उत्तुजार व त्याच्या सैन्याचे अतोनात हाल झालेत आणि शेवटी, मोरे आणि शिर्केच्या सैन्याने गनिमी काव्याने हल्ला करून मलिक उत्तुजार आणि त्याच्या सैन्याला गायब केले. जवळपास दहा हजाराच्या सैन्यातून एकही जीव जावळीतून बाहेर आला नाहीं. बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या 'राजा शिवछत्रपती' पुस्तकातही हि घटना नमूद केली आहे. या घटनेनंतर कोणीही बादशहा जावळीच्या वाटेल गेला नाहीं. जावळी जणू अजिंक्य होती. 

शिवाजी महाराजांचा समकालीन जो दौलतराव 'चंद्रराव' मोरे होता त्याचा सन १६४८ ला मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूपर्यंत मोरे घराण्यात भाऊबंदकी नव्हती. पण दिवंगत चंद्ररावास स्वतःचे अपत्य नव्हते. त्यामुळे आता जावळीचे गादी अचानक मोकळी झाली होती. या चंद्ररावाच्या आईस - माणकोइ बाई,  वाटू लागले कि गादी कोणी तरी मोरे घराण्यातच बळकावणार किंव्हा कोणी शिर्के इत्यादी येणार आणि किंव्हा हा गोंधळ बघून बादशाह जावळी गिळेल. पण माणकोरीबाई हुशार होत्या. तिने मग तिच्या माहेरच्या नात्यातीलच एकाला -  येसाजी मोरे,  दत्तक म्हणून घेतले, आता दत्तक घेतलेला कोणी लहान पोरगा नव्हता तर चांगला तिशीच्या घरातला होता. दत्तक घेण्याच्या कामात उगाच दगा-फटका होईल याची भीती माणकोइ बाईंना होती. भाऊ-बंदकीत घराणी निर्वंश होण्याच्या अनेक घटना तेंव्हा सातत्याने घडत. माणकोइ बाईंनी शिवाजी महाराजांचे वाढते बळ आणि त्यांचा वाढत वचक हेरला होता. त्यामुळे बाईंनी लगेच महाराजांना गाठले आणि अभय मागितला. जावळी स्वतःच्या अधिपत्यात नसली तरी तिथल्या गादीवर हिंदवी स्वराज्याचा पाईक बसला तर उपयोगीच ठरेल असा विचार करून महाराजांनी हवी ती मदत मोरे बाईंना देण्याचे मान्य केले. माणकोइ बाईंनी मग दत्तक घेण्याचा कार्यक्रम उरकला आणि नवीन येसाजी 'चंद्रराव' मोरे जावळीच्या गादीवर स्थानापन्न झाला. 

गादीवर आल्यावर येसाजीने जातीने जावळीच्या व्यवस्थेत लक्ष घातले. आणि या छोट्या राज्याजी घडी नीट लावली. आणि गादीवर आपली पकड मजबूत केली. पुढे त्याने अत्यंत आदर व प्रेमाने श्री समर्थ रामदासांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून उपदेश घेतला. तसेच शिवथर घळीची जागा श्री समर्थांना उपलब्ध करून दिली. शिवाजी महाराजांचे उपकार न विसरता त्याने, निदान सुरुवातीला तरी, महाराजांशी आपुलकीचे संबंध प्रस्थापित केले. पण बहुधा हे सगळे त्याच्या दृष्टीने एक राजकीय खेळी होती. जावळीच्या गादीवर आणि प्रदेशावर सत्ता मजबूत पणे आपल्या हातात केंद्रित होई पर्यंत त्याने सगळ्यांशी गोडी-गुलाबीचे संबंध ठेवले. पण सत्ता हे असे भूत आहे कि एकदा कि मानगुटीवर बसले कि मग त्या भुताला काढणे अशक्य होते. आणि येसाजी मोऱ्याला सर्वनाशाच्या मार्गावर हे सत्तेचे भूत बकोट धरून घेऊन जात होतं. 

युद्धाची रुखरुख:

जावळीच्या मोसे खोरे भागात रंगो बापूजी त्रिमल नावाच्या एका कुळकर्ण्याने एका बाईवर अत्याचार केला. हि तक्रार महाराजांना पोचताच त्यांनी रंगो ला धरून आणण्याचे आदेश दिले. महाराजांचे प्रशासन चोख असे आणि बदकर्माच्या बाबतीत तर त्यांचा कडक अंमल एव्हाना सर्वश्रुत होता. त्यामुळे घाबरून रंगो त्रिमलने थेट येसाजी मोऱ्यांचा पदर धरला आणि असले घृणात्मक कृत्य करूनही येसाजी ने त्याला चक्क अभय दिला. हळू हळू येसाजी ने आपले हात-पाय पसरायला सुरुवात केली आणि त्याच्या क्षेत्रात अन्यायाला वाव मुद्दाम द्यायला सुरु केला. जणू तो महाराजांना अप्रत्यक्षपणे आव्हान देत होता. त्याच्या साठी हा सगळा राजकीय आणि सत्तेचा खेळ होतं पण त्याला कळले नाहीं कि शिवाजी महाराज हे जुना 'खेळ' खेळत नव्हते. त्यांनी नवा डाव मांडला होता आणि या स्वराज्याच्या डावात येसाजी सारख्यांना जागा नव्हती. 

शिवाजी महाराज आता जावळी आणि येसाजी 'चंद्रराव' मोरे कडे जातीने लक्ष घालू लागले. त्यांनी येसाजी ला दिलेली संधी त्याने आपल्या कृत्यांनी गमावली होती. पण महाराज कुठलेही काम तडका-फडकी करीत नसत. सगळ्यात पहिले त्यांनी त्यांचे गुप्तचर जावळीभर पसरवलेत. मग पत्र व्यवहार आणि वकिलांच्या मार्फत त्यांनी येसाजी मोरे ला भेटीची बोलावणी पाठवलीत. पण येसाजी काही जुमानेना. शेवटी शिवाजी महाराजांनी अंतिम चेतावनी-सम एक पत्र पाठवले. हे पत्र शिव-इतिहास प्रेमींना ओळखीचे आहे - "तुम्ही मुस्तफद राजे म्हणविता, राजे आम्ही - आम्हास श्रीशंभूने राज्य दिधले आहे. तर तुम्ही राजे न म्हणावे. आमचे नोकर होऊन, मुलुख खाऊन बरोबर राहून चाकरी करावी. नाहीतर बदफैली करून फंद कराल तर जावळी मारून तुम्हास कैद करून नेऊ" शिवाजी महाराजांच्या या पत्राचे उत्तर येसाजी मोरेने फार गुर्मीत आणि उर्मट पणे दिले " तुम्ही काल राजे जाहला. तुम्हास राज्य कोणी दिधले! मुस्तफद राजा आपले घरी म्हटलियावर कोण मानतो! येता जावळी, जात गोवली. पुढे एक मनुष्य जिवंत जाणार नाहीं" 

तरीही एक शेवटची संधी म्हणून शिवाजी महाराजांनी पुन्हा एक पत्र येसाजी ला लिहिले आणि त्याला पुन्हा समजविण्याचा प्रयत्न केला. पण येसाजीची मती फिरली होती. त्याने जावळीचे सोय उत्तम केली होती म्हणून त्याला भीती वाटत नव्हती. पण त्याने शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या स्वराज्याच्या ध्येयाने भारावलेल्या मावळ्यांना नक्कीच कमी लेखले होते. आणि त्याची किंमत त्याला मोजायला लागणार होती. 

--

जावळीचे फत्ते:

जावळीचे हि भानगड चालू असतांना, मुसलमानी सत्तांमध्ये वेगळे राजकारण घडत होते. आणि हा भाग साधारण आपण लक्षात घेत नाहीं. महाराजांचे पराक्रम हे शून्यात बघणे चुकीचे आहे. त्यांनी उचलली पावले आणि त्यांच्या स्वाऱ्या, तात्कालीन मुघल, आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही यांच्यातील राजकारण लक्षात घेऊनच पारखायला हवे. जावळीवर हल्ला करून उगाच आदिशाहीला डिवचण्यात अर्थ नव्हता. स्वराज्य, स्व-सैन्य आणि खजिना या सगळ्या गोष्टी अजून अल्प आणि अननुभवी होत्या. पण सन १६५० च्या दशकात मुघली सैन्य, आणि खुद्द औरंगझेब दक्षिणेत येणार होता. शहाजहान ने त्याला दक्षिण भारत जिंकून मुघली पंजाखाली आणण्याचे काम दिले होते. त्यामुळे आदिलशहा आणि कुतुबशहा औरंग्याला कसे सामोरे जायचे या तयारीत होते. जावळी-बिवळी आदिलशाहच्या पटलावर नव्हते. अर्थात, हेच महाराजांना हवे होते. 

या दरम्यान महाराजांच्या हेरांनी सगळी जावळी पोखरली होती. सगळ्या भागाची आणि स्थानिक सरदारांची माहिती महाराजांना होती. येसाजी चा एक भाऊ, हणमंतराव मोरे या येसाजीच्या महाराजांविरुद्ध कान भरीत असत. महाराजांनी रघुनाथ बल्लाळ यांना या हणमंतरावाचा बिमोड करायला पाठवले. रघुनाथ बल्लाळ यांनी एक वेगळीच खेळी खेळली. लग्नाची बोलणी करायला म्हणून पन्नास मावळे घेऊन ते थेट हणमंतरावाच्या वाड्यात पोचले. आणि त्याला गफलतीत आणून, रघुनाथ बल्लाळ आणि त्यांच्या मावळ्यांनी हणमंतरावाला ठार केले. आणि त्याची गढी हस्तगत केली. 

कान्होजी जेधे, जे वयाने महाराजांहून बरेच मोठे होते आणि आत्तापर्यंत ते आदिशहाच्या पदरी होते, यांनी महाराजांसोबत स्वराज्याची कास धरली होती. मोहिमेची सुरुवात होईपर्यंत त्यांना खरेतर आदिशहाचा हुकूम आला होता कि महाराजांवर चालून जायचा, पण काहीतरी टाळा-टाळ करून त्यांनी तो हुकूम जुमानाला नाहीं. आणि आता संधी साधून त्यांनी उलट जावळीवरच हल्ला करून महाराजांना जावळीत शिरायचं अजून एक मार्ग मिळवून दिला. 

मग फारशी उसंत न घेता, नेताजी पालकर, येसाजी कंक, तानाजी मालुसुरे आणि महाराजांचे सैन्य वेग-वेगळ्या घाटातून (रडतोंडी, पारघाट, निसणीचा इत्यादी) जावळीत शिरू लागलेत. ठरलेल्या ठिकाणी सगळे सैन्य एकत्र आले आणि जावळीवर हल्ला केला. स्वतः चंद्रराव त्याच्या कुंटुबासोबत कुमठे नावाच्या गावी पळाला पण मागे मुरारबाजी देशपांडे याला लढायला ठेवले. महाराज आणि मुरारबाजी देशपांडे यांच्या सैन्यात कडाक्याचे युद्ध झाले पण मुरारबाजी काही मागे हटेना. महाराज त्याचा पराक्रम बघून अचंबित झाले. या धुमश्चक्रीत चंद्रराव मोरेची दोन मुले पकडल्या गेली होती. त्यांना पुढे करून महाराजांनी युद्ध थांबविले आणि मुरारबाजी पण ते बघून शरण आला. जावळीचे गढी महाराजांच्या सैन्याने जिंकली. मुरारबाजी चा पराक्रम महाराजांच्या नजरेत भरला होता. त्यांनी त्याला स्वराज्यासाठी झटायचे आव्हान केले आणि मुरारबाजींनी ते लगेच स्वीकारले. मुरारबाजी देशपांडे यांनी पुढे सन १६६५ च्या पुरंदरच्या लढ्यात राजा जय सिंह च्या मुघली सैन्यासमोर अतुलनीय पराक्रम गाजविला. आणि या युद्धातच त्यांना वीरगती प्राप्त झाली होती. 

मुख्य जावळीची गढी हाती लागल्यावर उर्वरित जावळीत असलेल्या मोरे घराण्याचे इतर वंशावळीचा मागे महाराज लागले. गोडी-गुलाबीने स्वराज्य कामात आणणे नाहींतर हुसकावून लावणे हे कार्य महाराजांच्या सैन्याने पुढी काही महिने केले. स्वतः येसाजी मोरे रायरीला (आपण याला आज रायगड म्हणून ओळखतो) लपून बसलेला होता. महाराजांनी स्वतः सन १६५६ च्या उत्तरार्धात रायरीला धडक मारली. आता राजे येसाजीला सोडणारे नव्हते आणि त्यांचा हा मनसुबा शेवटी येसाजीने ताडलं. त्याने समझोत्याची बोलणी सुरु केला आणि तो महाराजांना शरण आला. रायरीचा किल्ला हातास लागल्याने महाराज फार आनंदी झाले. भविष्यातली राजधानी म्हणून त्यांनी मनोमनीच रायगडाची योजना केली असणार. 

जावळी हाती लागली असली तरी येसाजीची कहाणी इथे संपत नाहीं. येसाजी आणि त्याच्या मुलांना स्वधर्म, स्वराज्य याचा मार्ग रुचेना. येसाजीच्या मुले बंदिगृहातून पळून गेलीत. त्यातील एक लगेच हाती लागला पण दुसरा - बाजी मोरे पळून विजापूर बादशाही दरबारात पोचला. तेथे बाजी घोरपडे सोबत त्यांनी स्वतःच्या बापाला आणि भावाला सोडविण्याची खटपट सुरु केली. (या बाजी घोरपड्याला पुढे महाराजांनी परास्त करून यमसदनी पाठविले) महाराजांना हे कळताच येसाजी मोरे आणि त्याचा एक पोरगा -कृष्णाजी मोरे ला मृत्युदंडाची शिक्षा दिली. सात पिढ्या जावळीवर राज्य केलेले सरदार घराणे असे नामशेष झाले. 

जावळीनंतरचे स्वराज्य, जावळीनंतरचे महाराज:

मी महाराजांचा जावळी-विजय संक्षिप्तात सादर केला आहे. अजून बारकाव्यांसाठी हे छोटेखानी पुस्तक अवश्य वाचावे. महाराजांचे जीवन अद्भुत पराक्रमांनी भरलेले आहे आणि त्यांचा चाणाक्षपणा, राजकीय मुत्सद्दीपणा आणि धडाडी याचा प्रत्यय पावलो-पावली येतो तरी जावळीचा विजय हि साधारण घटना नव्हती. जावळी जिंकून महाराज आणि मावळे, मुसलमानी बादशाहीच्या पटलावर ठळकपणे उभे झाले. महाराजांचा जीवनकाल जावळी विजया आधीच काळ आणि जावळी विजया नंतरचा काळ, अश्या दोन भागात करू शकतो. जावळी महाराजांच्या हाती आल्यापासून त्यांच्यावर एका-पाठोपाठ मुसलमानी बादशाहिची आक्रमणे सुरु झाली. आधी अफझल, मग सिद्दी जौहर, मग शाईस्ता आणि काही वर्षांच्या कालावधीत जयपूरचा जयसिंह असे क्रूर मुसलमान आणि हिंदू-धार्जिणे आक्रमक स्वराज्यावर आणि महाराजांवर चालून आले. जयसिंह ला सोडून महाराजांनी बाकी मुसलमानांचा नायनाट केला. आणि आग्र्याहून पलायन करून, त्या अन्वये जयसिंहचा बिमोड केला. पण जवळीनंतरची दहा-पंधरा वर्षे महाराज अखंड लढत राहिले. आणि विजयानगरच्या हिंदू साम्राज्याच्या तालिकोट च्या पराभवानंतर, भारतात हिंदुशाही स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज पहिले हिंदू स्वराज्यकर्ते बनलेत. 

--

ता. क. - जावळीच्या जंगलातील बरेच किल्ले महाराजांना लाभलेत. रायरी अभेद्य होती त्यामुळे महाराजांनी तिथे रायगड बांधून, त्या गडाला राजधानी केली. प्रतापगड महाराजांनी सन १६५६ ला बांधला. आन प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांनी पुढे सन १६५९ ला अफझलखानाचा पराभव केला. या जंगलात मकरंदगड, लोहगड इत्यादी गडहि पुढे महाराजांनी बांधलेत. 

7/21/24

गोंड कोण होते आणि इतर विचार. (चंद्रप्रकाशी लेखन)

**या लेख मालिकेला मी चंद्रप्रकाशी अश्यासाठी म्हणले आहे कारण हे माझे मूळ संशोधन नाहीं. सेतू माधवराव पगडी लिखित इतिहासाचे पुनर्मुद्रण सध्या वाचतो आहे. त्यातील संशोधनाचा मागोवा आणि काही प्रमुख घटना  संक्षिप्तात मी येथे सादर करण्याचा हा प्रयत्न.  

या लेख-मालिकेचा पहिलादुसरा लेख इथे उपलब्ध आहे. 

--

मी मूळ नागपूरचा आहे त्यामुळे गोंड आदिवासी आणि गोंडांचे राज्य सध्याच्या पूर्व विदर्भ भागात होते याबद्दल मला नेहमीच कल्पना होती. पण शाळेत कधी गोंड इतिहास शिकविला नाहीं. भारतात साधारण जो इतिहास शिकवितात तो भारताचा किंव्हा भारतीयांचा इतिहास नसतो. परदेशी आक्रमकांचा इतिहास आपल्यावर थोपवल्या जातो. स्वातंत्र्योत्तर काळात कम्युनिस्ट लोकांनी केंद्र सरकार मधील शैक्षणिक आणि अभ्यासक्रमाची दालने व्यापलीत आणि त्यातून भ्याड मनोवृत्ती आणि बुरसट, बुळबुळीत विचारसरणी आपल्यावर लादल्या गेली. असो. तो एक वेगळा विषय ठरेल. मागच्या दोन लेखात म्हणाल्या प्रमाणे श्री सेतू माधवराव पगडी यांनी लिहिलेला इतिहास संक्षिप्तात प्रकाशित केल्या गेला आहे आणि त्यातील 'इतिहासाचा मागोवा' या पुस्तकातील हि माहिती आहे. मूळ विचार आणि अभ्यास माझे नाहीं. हे पुस्तक आणि त्यातील अनमोल माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचावी हे या लेखाचे उद्देश्य. 

गोंड आदिवासी समाज पूर्व विदर्भ, छत्तीसगढ, उत्तर तेलंगण आणि मध्य प्रदेश या प्रांतात पसरलेला आहे. त्या त्या भागातील गोंड तिथली भाषा मातृभाषा म्हणूनच वापरतात. म्हणजे विदर्भातील गोंड हे मराठी बोलतात किंव्हा उत्तर तेलंगण मधील गोंड तेलगू बोलतात. गोंड समाज, त्यांचा इतिहास, त्यांचे साहित्यात किंव्हा चाली-रीती सनातन धर्माशीच ठाम पणे बांधल्या आहेत. रामायण आणि महाभारताचे दाखले त्यांच्या पुरातन साहित्यातही दिसतात (इथे साहित्य म्हणजे लेखीच नव्हे तर लोककथा किंव्हा सामाजिक स्मृती या दृष्टीने मी वापरला आहे.) महादेव किंव्हा शंकर प्रामुख्याने आढळतो. शंकर-पार्वतीच्या कृपेने पुढे गोंड समाजाची निर्मिती झाली अशी समाज उत्पत्तीची आख्यायिका आहे. इंग्रजीत याला ओरिजिन स्टोरी असे म्हणतात. गोंड समाजात वेग वेगळी मूळ घराणी आहेत आणि त्यांची गोत्रे पण आहे. झिगुबाईची कथा, माणकोची कथा, तूरपालसिंघेची कथा इत्यादी प्रसिद्ध आहेत. या भागात राम-कृष्ण किंव्हा लक्ष्मी इत्यादी देव कमी आढळतात. गोंडांच्या देवळांना पेनगड म्हणतात. पेन म्हणजे देव. आणि श्री पगडी लिहितात कि देवळात मुर्त्या नसून भाल्याचा फाळ आणि चवरी असते. 

पुस्तकात गोंड समाजातील आणावे आडनावे दिली आहेत त्यात मेश्राम, आत्राम, टेकाम, गेडाम हि आडनावे आपल्याला नागपूर भागात नक्कीच दिसतात. आता तुम्हाला कधी श्री मेश्राम किंव्हा श्री आत्राम आडनावाचे भेटलेत तर ते गोंड समाजातीलच असतील असे नाहीं, म्हणजे त्याची खात्री देणे कठीण आहे. आजकाल हा विषय थोडा नाजूक आहे. पण ओळखीची आडनावे बघून आपुलकी वाटली.

विदर्भातील पूर्व भाग (नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा) व मध्य प्रदेश भाग असे गोंड राज्य सोळाव्या व सतराव्या शतकात उदयाला आले. त्यातील जबलपूरजवळ गढमंडली - राणी दुर्गावती हि गढमंडळीची. हिने अकबराविरुद्ध लढा दिला होता. पुढे औरंगझेब दक्खनी उतरला तेंव्हा त्याच्या विरुद्ध नागपूरच्या गोंड राजाने आणि सैन्याने प्रखर लढा दिला. पुढे भाऊबंदकी होऊन त्यातील एका भावाने औरंग्याच्या पदर धरला आणि मुसलमान झाला. मुघली मदतीने हा बख्त बुलंद शाह पुढे गादीवर आला. छत्रपती शाहूंच्या काळात आणि पेशवाईत भोसले परिवारातील श्री रघुजीराजे भोसले नागपुरात स्थिर झालेत आणि गोंडांचे राज्य मावळले.  

श्री पगडी यांनी पुस्तकात गोंड समाजात जातीभेद नाहीं असा उल्लेख केला आहे. साधी विवाहपद्धती आणि अगदी विधवा विवाह सुद्धा निषिब्ध नाहीं असेही ते म्हणतात. या दोन्ही बाबी फार स्पृहणीय आहेत आणि या साठी गोंड समाजाचे कौतुकच करायला हवे. या विषयावर श्री पगडी यांनी अक्षरशः एकाच परिच्छेद लिहिला आहे. या विषयावर अजून वाचन करायला हवे. श्री पगडी यांचे 'अमंग दि गोंड्स ऑफ आदिलाबाद' आणि "गोंडी भाषेचे व्याकरण' हि दोन अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रकाशित आहेत. आणि श्री पगडी स्वतः सन १९४५ ते १९४८ सध्याच्या तेलंगण राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात मामलेदार आणि डेप्युटी कलेक्टर म्हणून होते. या व्यतिरिक्त त्यांना आदिवासी विशेष अधिकारी म्हणूनही दायित्व त्यांच्या कडे होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या अभ्यासाला आणि या विषयावर त्यांच्या लेखनाला अनुभवाचे वजन आहे. 

पुढले चंद्रप्रकाशी लेख 'छत्रपती नि त्यांची प्रभावळ' या पुस्तकातील असतील. आशा करूया कि काही तरी नवीन शिकायला मिळेल. 




5/15/24

मराठी स्वातंत्र्य समर १६८२ ते १७०७ - धोरणे, लढे, डाव-पेच आणि तत्सम इतिहास (चंद्रप्रकाशी लेखन)- भाग २ - फितुरीच्या गाथा आणि निझाम परिचय

                                                           

**या लेख मालिकेला मी चंद्रप्रकाशी अश्यासाठी म्हणले आहे कारण हे माझे मूळ संशोधन नाहीं. सेतू माधवराव पगडी लिखित इतिहासाचे पुनर्मुद्रण सध्या वाचतो आहे. त्यातील संशोधनाचा मागोवा आणि काही प्रमुख घटना  संक्षिप्तात मी येथे सादर करण्याचा हा प्रयत्न.  

या लेख-मालिकेचा पहिला लेख इथे उपलब्ध आहे. 

--

शिवाजी महाराजांच्या निधना नंतर मराठी राज्य प्रमुख म्हणून फार पटापट बदल झालेत. महाराज सन १६८० स्वर्गवासी झालेत. त्या नंतर नऊच वर्षात छत्रपती संभाजी यांची अचानक मृत्युमुखी पडलेत आणि त्या नंतर दहा वर्षातच राजाराम महाराजांचा पण मृत्यू झाला. थोडक्यात वीस वर्षाच्या कालखंडात तीन छत्रपती होऊन गेलेत. आणि काही कमी असेल तर भावी छत्रपती शाहू महाराज औरंगझेबाच्या कैदेत होते. अश्या डळमळत्या परिस्थितीतही मराठ्यांनी संघर्ष केवळ चालूच ठेवला असे नाहीं तर त्या संघर्षाच्या ज्वाला अधिक प्रखर केल्यात.

पण तुम्ही एखादे जमीनदार किंव्हा छोटे सरदार त्या काळात असाल तर स्वजीव रक्षण किंव्हा स्व-कुटुंब रक्षणासाठी एखाद वेळेस वेगळे निर्णय घेण्याची शक्यता आहे का? मराठ्यांकडून लढायचे कि मोघलांना जाऊन मिळायचे? आणि मोघलांना जाऊन मिळालो तर शेवट पर्यंत त्यांच्या सोबतच लढायचे कि पुन्हा माघारी घरी यायचे? कि सतत 'तळ्यात कि मळ्यात' खेळायचे, वाट बघत कि मराठे-मोघल संघर्षात शेवटी कोण जगतोय ते? असे अनेक प्रश्न तेंव्हाच्या अनेक साधारण मावळे आणि मातब्बर सरदारांना पडले असणार. बहुतांश मराठे मोघलांविरुद्ध संघर्षमय झालेत पण काही, क्वचितच वेळा, मोगालंनाहि जाऊन मिळालेत. नुसते एवढेच नव्हे तर सन १७०७, म्हणजे औरंगझेब नंतरहि काही मराठे सरदार उरलेले मोघल आणि उभरत्या निझामाला जाऊन मिळालेत. यांना आता फितूर म्हणायचे कि परिस्थितीचे बळी? 

फितूरच म्हणायचे. यात संदेह बाळगू नये. ही लोक फितूर होती. स्वजन, स्वधर्म आणि स्वराज्य विरुद्ध हि लोक परकीय, परधर्मीयांच्या बाजूने लढलीत. 

अर्थात फितुरी असली तरी त्या पैकी काहींच्या कथा/गाथा मनोरंजक नक्कीच आहेत.  

चंद्रसेन जाधव हा शूरवीर सेनापती धनाजी जाधव यांचा मुलगा. पण याने पेशवाईच्या उदयाच्या काळात निझामाची नोकरी पत्करली. हि फार आश्चर्याची आणि दुःखाची घटना मानायला हवी. पण स्वराज्याची सेवा म्हणजे नोकरी आणि जर का हवे ते मिळत नसेल तर जिथे ते मिळेल तिथली नोकरी पत्करावी अशी काहीशी विचारसरणी इथे दिसते. कारण धनाजी जाधव यांच्यासारखा ढाण्या वाघाचे, ज्याच्या नावाने मोघलांची घोडी पाणी पीत नसत अशी वदंता होती, वंशज निझामाची नोकरी का पत्करेल? पण असे घडले आणि एवढेच नव्हे तर छत्रपती शाहू आणि छत्रपती पदाचे दावेदार संभाजी यांच्या गृहकलहांत चंद्रसेन याने निझामाला मदत पण केली. यातून मराठेशाहीला नुकसान काही फारसे झाले नाहीं. पण चंद्रसेन आणि त्याची अपत्ये निझामाच्याच चाकरीत राहिलीत आणि पुढे नामशेष झाली. 

विठ्ठल सुंदर हे अजून एक विशेष व्यक्तिमत्व आहे. पुस्तकात विठ्ठल सुंदर आधी मराठ्यांकडून लढत होता आणि मग निझामाला मिळाला कि तो मूळ  निझामाच्या चरणी रुजू झाला हे नीटस कळत नाहीं. पण विठ्ठल सुंदर याने निझामाच्या पदरी बऱ्याच भानगडी, कारस्थाने आणि कामगिऱ्या केल्यात. जसे सन १७५८ ला फ्रेंच वकिलाला निझामाने ठार केले त्यात विठ्ठल सुंदरनेच तलवारीचा वार केला होता. तसेच इब्राहिमखान गारदी, ज्याने भाऊसाहेब पेशव्यांच्या पदरी पानिपतच्या युद्धात अतुलनीय पराक्रम केला, तो मूळ निझामाच्या पदरी होता पण इर्षेने विठ्ठल सुंदरनेच इब्राहिमखान गारदीला हाकलून लावले. या विठ्ठल सुंदर चा फार राग मराठी आणि पेशव्यांना होता. उदगीर च्या लढाईत निझामाला पेशव्यांनी चांगलेच पाणी पाजले आणि साठ लाखांचा मुलुख निझाम कडून घेतला.  पण भाऊसाहेब पेशव्यांनी निझामाला विठ्ठल सुंदरला बडतर्फ करण्याची मागणी निझामाला केली होती. या उदगीर च्या युद्ध इब्राहिमखान गारदी चांगलीच कामगिरी बजाविली म्हणूनच बहुधा भाऊसाहेबांमार्फत त्याने विठ्ठल सुंदर वर सूड उगवण्याचा प्रयत्न केला असणार. पुढे पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा झालेल्या पराभवाचा फायदा घेत निझामाने प्रचंड मोठा हल्ला मराठ्यांवर केला. सन १७६३ ला निझामाने थेट पुणे गाठले आणि शहर जाळले. सुरुवातीला मराठे गोंधळले असे दिसते. बहुधा निझाम इतकी धिटाई करेल अशी कल्पना मराठ्यांनी केली नसावी. पण लौकरच फळ्या उभारून मराठ्यांनी प्रतिकार सुरु केला आणि राक्षसभुवनीं मराठ्यांनी निझामाला गाठले आणि त्याचा दणदणीत पराभव केला. या युद्धात विठ्ठल सुंदर मारल्या गेला. विठ्ठल सुंदरची बुद्धी आणि तलवार अश्या प्रकारे शेवटपर्यंत निझामाच्या पदरीच जिझली. निझामाने सुद्धा त्याचे बरेच लाड केलेत. त्याला दिवाण बनविले होते आणि राजबहादूर व प्रतापवंत या पदव्या पण बहाल केल्या होत्या. 

वर उद्धृत केलेली दोन व्यक्ती केवळ उदाहरणे आहेत. मराठ्यांनी आक्रमकांची बाजू घेणे हे नवीन नाहीं. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा या घरभेद्यांशी झुंझावें लागले. खुद्द त्यांचे सावत्र भाऊ, व्यंकोजी सुद्धा त्यांना येऊन मिळाले नाहीत. शिवाजी महाराज असोत, संभाजी महाराज असोत कि राजाराम महाराज असोत, त्यांच्यावर आणि स्वराज्यावर झालेल्या सगळ्या आक्रमणांमध्ये काही मराठे नेहमीच भागी असत. छत्रपती संभाजींना पकडले सुद्धा घरभेद्यांमुळेच. कारण स्वराज्य हि कल्पना आकलनी पडणे सोपे नाहीं. स्वराज्याची सेवा म्हणजे नोकरी नाहीं. हे कर्तव्य आहे, हा धर्म आहे आणि हे कार्य आवश्यक आहे. या भावनांनी भारावून जाऊन जीव झोकून देणे कठीण कार्य आहे. यासाठी कार्यावर आणि कार्य-नायकावर अढळ विश्वास हवा. आणि कार्यपुर्तीत जीव गेला तरी हे कार्य पुढे चालू राहील, अगदी शेवटच्या माणसापर्यंत, याची शाश्वती मनात हवी. सध्याची परिस्थितीत जिथे चार लोक एक विचार मनात ठेऊन एक सद्-आचार करू शकत नाहीत तेंव्हा तीनशे वर्षांपूर्वी लाखो लोक एक प्रतीक, एकच ध्यास आणि एकच लक्ष्य ठेऊन वर्षानुवर्षे लढले. हि एक अपूर्व घटना आहे आणि कामगिरी आपण साजरी करायला हवी. 

निझाम कोण होता - एक अति-संक्षिप्त परिचय:

मूळचा उझबेकीअसलेला गाझीउद्दीन खान हा दक्षिणेत औरंगझेबासोबत दाखल झाला होता. या गाझीउद्दीन खान चा मुलगा चिल्कीचखान, जो पुढे पहिला निझाम म्हणून उदयास आला. गाझीउद्दीन आणि चिल्कीचखान लढवय्ये आणि हुशार होते. मैदानात त्यांच्या तलवारीला धार होतीच पण औरंगझेबआणि त्याच्या नंतरच्या दरबारातील डाव-पेच आणि कारस्थानात हे घराणे निपुण होते. गोवळकोंड्याच्या औरंगझेबाच्या वेढ्यात गाझीउद्दीन आणि चिल्कीचखान या दोन पिढ्या सामील होत्या आणि लढल्यात. बहुधा तेंव्हापासूनच त्यांनी दक्षिणेची जहागीर आणि हा किल्ला हेरला असावा. कारण औरंगझेब मेल्या-मेल्याचं त्यांनी गोवळकोंडा आणि हैद्राबादेत बस्तान बसवले. आणि सन १७१० पासून १९४८ पर्यंत त्यांची अनभिषिक्त सत्ता हैदराबाद आणि तेलगू प्रदेशात होती. या घराण्याने, खास करून चिल्कीचखान ने मराठ्यांना हुसकावून लावायला बऱ्याच खटाटोपी केल्यात. अनेक डावपेच आणि कारस्थान रचलित. एक जमाना असा होता कि या घराण्याचाच एक जण दिल्लीला मोघल दरबारी वजीर म्हणून होता आणि स्वतः निझाम दक्षिणेत होता. थोडक्यात पडद्या मागून आणि पडद्या समोर असे दोन्ही बाजूनी मोघली राज्य निझामच चालवत होता. पण थोरल्या बाजीरावांनी या चिलकीचखान च्या चांगल्याच मुसक्या बांधल्या होत्या. आधी पालखेड च्या युद्धात आणि पुढे भोपाळ ला थोरल्या बाजीरावांच्या पुढे चिलकीचखानाचे काही चालले नाहीं. पुढे सवाई माधवरावांच्या कारगीर्दीत राक्षसभुवनाला राघोबादादांच्या पुढे चिलकीचखानाचा नातू मराठी सैन्यासमोर नतमस्तक झाला. 


पण शोकांतिका अशी कि इतक्यांदा पराजयी होऊन निझाम नामशेष झाले नाहीत. पुढे इंग्रजांच्या काळातहि ते नांदले आणि शेवटी सन १९४८ ला श्री वल्लभभाई पटेलांच्या ऑपेरेशन पोलोने हे घराणे नाहीसे झाले. पण पेशवे मात्र १८१८ ला नाहीसे झाले! 


4/1/24

मराठी स्वातंत्र्य समर १६८२ ते १७०७ - धोरणे, लढे, डाव-पेच आणि तत्सम इतिहास (चंद्रप्रकाशी लेखन)

**या लेख मालिकेला मी चंद्रप्रकाशी अश्यासाठी म्हणले आहे कारण हे माझे मूळ संशोधन नाहीं. सेतू माधवराव पगडी लिखित इतिहासाचे पुनर्मुद्रण सध्या वाचतो आहे. त्यातील संशोधनाचा मागोवा आणि काही प्रमुख घटना  संक्षिप्तात मी येथे सादर करण्याचा हा प्रयत्न.  
--
छत्रपती संभाजी महाराजांना दैवाने जणू संकटे आणि विपरीत परिस्थितीचे ताट वाटून दिले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी येणाऱ्या आक्रमणांचा प्रखर संघर्ष केला. जेंव्हा औरंगझेबाने औरंगाबादेत ठाण मांडले तेंव्हापासून मोघली साम्राज्याचा जवळपास शंभर वर्षांचा खजिना, सामर्थ्य, अनुभव आणि सैन्यबळ जणू फक्त आणि फक्त मराठ्यांना नामशेष करायला उतरले होते असे म्हणायला हरकत नाहीं. आपण या विषयावर चर्चा करतांना सहज म्हणतो कि शिवाजी महाराजांनंतरची पंचवीस वर्षे हा मराठी आणि हिंदू स्वांतत्र्याचे समर होते आणि त्यात शेवटी मराठ्यांनी औरंगझेबाला नामशेष केले. तीनशे वर्षांनी आपल्याला असे म्हणायला सोपे आहे. पण औरंगझेब जेंव्हा दक्खनी उतरला तेंव्हा त्याचा शेवट असा होईल असे म्हणता आले असते का? कल्पना करा कि आपण सन १६८५-८६ ल आहोत. लाखो मोघली सैन्य दक्खन मध्ये उतरले आहे. खुद्ध औरंगझेब आला आहे. त्याचा सामना करायचा तरी नेमका कसा? आणि कुठून आणि किती करायचा? मोघलांचा खजिना तेंव्हा म्हणजे कुबेराचा होता. उत्तर भारतातून त्यांना अखंड आणि अमाप पैसे मिळत असे. आणि भांडायला राजपूत अखंड शिपाई पुरवीत असे. गेली जवळ जवळ शंभर वर्षे हिंदू राज्ये बुडविण्याचा त्यांना अनुभव होता आणि त्यात ते नेहमीच यशस्वी ठरले होते. मोघली सैन्य म्हणजे साधारण नव्हते. त्यांचा पोशाख, चिलखते, शस्त्रात्रे, तोफा इत्यादी जणू अतुलनीय होते. काबूल आणि पुढल्या मुसलमानी सत्तांपासून त्यांचे भारतीय राज्य यशस्वीरीत्या टिकविले होते. आणि उत्तर भारतात त्यांची अनभिषिक्त सत्ता दीडशेहुन अधिक वर्षे होती. आणि दक्षिणेतील बहुतांश सत्ता वेळोवेळी मोघलांचे अंकित होते. घराणेशाही बघितली तर बाबर ने सन १५२६ साली स्थापिलेल्या मोघली सत्तेचा औरंगझेब सातवा वंशज होता. आसाम चे आहोम आणि छत्रपती शिवाजीनं व्यतिरिक्त मोघली सत्तेचा यशसवीपणे सामना हिंदुस्तानात कधीच कोणीच केला नव्हता. स्वतः औरंगझेब ला दक्खन हा भाग नवा नव्हता. त्याला सन १६५६ ला तो या भागाचा सुभेदार होता आणि बरीच वर्ष दक्षिण आणि दक्खन भागात तो वावरला होता.  

त्या तुलनेत मराठी राज्य लहान होते, शिपाई पण मराठेच होते आणि खजिना कसा पुरवायचा? सन १६४६ नंतरचा मराठी सत्तेचा अनुभव, म्हणजे फक्त पन्नास वर्षांचा. आणि संभाजी महाराज घराणेशाहीतील दुसरे आणि राजाराम महाराज तिसरे छत्रपती. पण तडफदारपण, डाव-पेच, युद्धकौशल्य, धडाडी आणि चाणाक्षपणा हा केवळ अनुभवांनीच येतो असे नाहीं. संभाजी महाराजांनी हे केवळ युद्धभूमीवर सिंह होते असे नाहीं तर त्यांची संघर्षाची धोरणे हि चाणाक्ष होती. त्यांनी संकटाचा बारकाईने अभ्यास केला होता.  ते अविरत आणि अखंड चढायांवर असत. त्यांनी महत्वाची ठाणी आणि किल्ल्यांवर भक्कम रसद आधीच पुरविली होती. त्यांनी हेरले होते कि औरंगझेबचे मुख्य लक्ष मराठे असले तरी त्याची इस्लामी अभिलाषा त्याहून अधिक विस्तृत आहे. उरलेली आदिशही, कुतुबशाही आणि दक्षिणेतील छोटी छोटी हिंदू राज्ये नष्ट करण्याचे त्याचे स्वप्न होते. कुतुबशाही किंव्हा आदिलशाही हि मूळ धर्मांतरित हिंदूंची होती. त्यामुळे परदेशातून आक्रमक म्हणून आलेल्या मोगलांना आणि औरंगझेब ला हि भारतीय मुसलमान निम्न वाटत असे. या काळापर्यंत औरंगझेब धर्मान्ध आणि वयाने अजून क्रूर झालेला होता. इस्लामी सत्तेचा हिरवा झेंडा त्याला काबूल ते रामेश्वरम पर्यंत फडकवायचा होता. 

संभाजी महाराजांनी झपाट्याने बदलत्या परिस्थितीत खरे शत्रू कोण याचा आढावा होता. त्यांना ठाऊक होते कि मोगल हात-पाय पसरवायला लागलेत कि गोव्यातून पोर्तुगीज बाहेर पडून स्वराज्याचे लचके तोडायला लागतील. त्यांनी गोव्यावर आणि पोर्तुगीजांवर दोन चढाया केल्यात. महाराजांना पोर्तुगीजांना पूर्णपणे नामोहरम करता आले नाहीं तर त्यांना गोव्यात चांगलेच कोंडले. आदिलशाही आणि कुतुबशाही यासुद्धा मुसलमानी सत्ता होत्या पण मागे म्हंटल्या प्रमाणे शेवटी भारतीय रक्त होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील करार लक्षात ठेऊन संभाजी महाराजांनी कुतुबशाहीला मदत करण्याचा प्रयत्न केला. याच्या व्यतिरिक्त मोगलांचे लक्ष वेधायला त्यांनी बुऱ्हाणपूर पर्यंत मजल मारून ते ठाणे लुटले. त्यामागचे धोरण असे कि मराठे नर्मदे पर्यंत किंव्हा नर्मदा पार करण्याची भीती उत्पन्न झाली तर मोगलांना एकतर थोडी माघार घ्यावी लागेल किंव्हा निदान कुमक पुन्हा उत्तरेला पाठवावी लागेल. पण या कुठल्याच डाव- पेचात संभाजी महाराजांना हवे तसे यश मिळाले नाही. शेवटी नशीब हि पाठीशी लागत. गोव्यात समुद्र भरती आली आणि मराठी सैन्य गोव्यात जाऊ शकले नाहीं आणि पोर्तुगीज वाचलेत. आदिलशाही लौकरच मोडकळीत निघाली आणि कुतुबशहाने सुद्धा नीट लढा दिला नाहीं. सन १६८७ ला कुतुबशाहीत फितुरी माजवून, औरंगझेब ने गोळकोंडा किल्ला घेऊन कुतुबशाही संपविली. औरंगझेब आता निर्धास्तपणे थेट दक्षिणेत जाऊ शकत होता आणि तिथून अजून खजिना आणि रसद लुटू शकत होता. समुद्राला पाठीशी ठेऊन आता मोगल सगळ्या बाजूंनी स्वराज्याच्या सीमा मागे ढकलीत होते.

थोडक्यात, सन १६८२ नंतरच्या पाच-सात वर्षात मोगलांचे आणि औरंगझेबाच्या बळ अधिक वाढले होते. 

स्वराज्यातील बरीच मराठी मंडळी घाबरून औरंगझेबाच्या मिळायला लागलीत. शिवाजी महाराजांनी वतने काढून स्वराज्याची स्थापना केली होती. आणि वतन संस्थेच्या ते विरोधी होते. येथे मोगलांचे वाढते बळ बघून जुनी सरदार आपली वतने मोगल समंतीत करून घेऊ लागलीत. संभाजी महाराजांनी अनेकांना खरमरीत पत्रे लिहिलीत आणि देव-धर्माची आण दिली. पण या आघाडीवरहि परिस्थिती बिकट होत होती. दोन वर्षाच्या कालावधीतच संभाजी महाराजांचे खंदे समर्थक आणि अत्यंत शूरवीर असे सरसेनापती हंबिबराव मोहिते यांचा पण एका युद्धात मृत्यू झाला. हा संभाजी महाराजांना आणि स्वराज्याला हादरा बसला.

अश्या परिस्थितीत दगाफ़टक्याने छत्रपती संभाजी यांचे पकडल्या जाणे आणि मग मोगलांनी केलेल्या अनन्वित अत्याचारांना सामोरे जाऊन त्यांचा मृत्यू होणे हि फार धक्कादायक घटना होती. संभाजी महाराजांची शेवटी जीवाची किती घालमेल झाली असेल याची कल्पना करणे कठीण आहे. शारीरिक यातना आणि आपल्या नंतर पुढे स्वराज्याचे काय होणार या विचाराने मानसिक यातना. पण येथेही त्यांच्या सामर्थ्याची प्रचिती येते. मुसलमान होण्यास नकार देऊन आणि औरंगझेब समोर मस्तक न झुकावून त्यांनी हौतात्म्य पत्कारले कारण स्वराज्याला, मावळ्यांना, मराठी सैन्याला जणू ते शेवटले उत्स्फूर्त करू इच्छित होते. आणि नेमके तसेच झाले. 

औरंझेबाला वाटले कि संभाजी महाराजांनंतर मराठी राज्य संपलेच. आणि काही कमी असेल तर शाहू महाराज हि त्याच्या कब्ज्यात होते. पण या क्षणी औरंगझेबाने काही महत्वाच्या चुका केल्यात आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूने पेटलेल्या मराठ्यांनी याचा पुरेपूर उपयोग केला. 

छत्रपती संभाजी महाराजांच्या अचानक झालेल्या मृत्यू मुळे मराठे दिडमूढ झाले होते. पण त्यांनी हार मानली नव्हती, कच खाल्ली नव्हती. छत्रपती राजाराम आणि मंत्रिमंडळाने ठरवले कि छत्रपतींनी महाराष्ट्रात रहाता काम नये. हि चाल राजाराम महाराज व मराठी लष्करी रणनीतीचा एक हिरा म्हणता येईल. महाराष्ट्रापासून खूप दूर, थेट दक्षिणेला जिंजी च्या किल्ल्यात राजाराम महाराज गेलेत. यात तीन गोष्टी साध्य झाल्यात. एक म्हणजे मोगलांचे वाढते बळ आणि वाढती फितुरी बघता, महाराष्ट्रात राहून पकडल्या जाण्याची शक्यता कमी झाली. राजाराम महाराजांना दगाफटका झाला असता तर स्वराज्याने दहा वर्षात आपला तिसरा छत्रपती गमावणे फार कठीण गेले असते. दुसरे म्हणजे राजाराम महाराजांना औरंगझेबाने आपलं एकुलते एक लक्ष्य बनविले असते. आणि त्यासाठी त्याने आणि मोगलांनी स्वराज्याची प्रचंड जाळपोळ केली असती. तिसरे म्हणजे,दूर दक्षिणेला राजाराम महाराज असणे म्हणजे  आता स्वराज्याचे सगळे किल्ले आणि जमिनी घ्याव्यात कि स्वराज्य नायकास पकडावे हे कोडे औरंगझेबाच्या सोडविणे आवश्यक झाले.  

या सोबत राजराम महाराज आणि रामचंद्रपंत अमात्य यांनी मराठी सरदारांना त्यांची वतने देणे पुन्हा चालू केले. अनेक दशके मराठ्यांना लागलेले वतनदारीचे 'व्यसन' शेवटी छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांना काही सोडवता आले नाहीं. पण हातघाईची वेळ होती. स्वराज्य तगायला सरदार हवेत, सैन्य हवे आणि महाराष्ट्राचा भूभाग माहिती असलेले हवेत. वतनदारीच्या पुन्हा सुरुवातीच्या अनेक फितलेले सरदार परत आलेत आणि त्यांनी मोघली अंतापर्यंत स्वराज्याला साथ दिली. एवढेच नव्हे तर मोगलांनी जिंकलेल्या भूभागाची वतने पण छत्रपतींने सरदारांना बहाल केलीत. त्यामुळे संभाजी महाराजांच्या मृत्यूने पेटलेले मराठी सैन्य आणि थोड्याबहुत प्रमाणात स्वार्थाने पुन्हा उभे राहिलेले मराठी सरदार एकत्र येऊन मोघलांनवर तुटून पडलेत. गेलेले किल्ले पुन्हा घेणे, गेलेली गावे पुन्हा जिंकणे, मोघलांची ठाणी लुटणे, गनिमी काव्याने ठिकठिकाणी मोघलांना धोपटणे, रसद तोडणे, उत्तरेहून येणारी रसद, खजिना लुटणे इत्यादी अनेक मार्गांनी मराठ्यांनी लढा अखंड चालू ठेवला. 

औरंगझेबाने त्याच्या अनेक चुकांपैकी एक महत्वाची चूक केली म्हणजे त्याने दोन आघाड्यांवर मराठ्यांना विरुद्ध लढायचे ठरवले. एक आघाडी म्हणजे जिंजीला वेढा देणे (जो सात वर्षे चालू होता), छत्रपती राजाराम महाराजांना पकडण्यासाठी  आणि दुसरी आघाडी म्हणजे स्वराज्यातला एक एक किल्ला लढवून जिंकणे. आता दुसरी आघाडी खऱ्यात अनेक आघाड्या होत्या. प्रत्येक किल्ला जिंकायला मोघलांना प्रचंड कष्ट पडलेत आणि त्यांनी या भानगडीत अगणित खजिना ओतला. आणि मोघलांनी जिंकलेला अक्षरशः प्रत्येक किल्ला मराठ्यांनी काही वर्षात पुन्हा जिंकला. अनेक किल्ले मराठे मोघलांकडून लाच घेऊन सोडून देत आणि वर्ष-दोन वर्षात पुन्हा जिंकीत. माझ्या माहिती प्रमाणे फक्त तोरणा किल्ला मोघलांनी लढून जिंकला होता. औरंगझेबाने किल्ल्याचे नाव बदलून फुतबुलपूर कि असे काही तरी ठेवले होते.

(क्रमशः)