Showing posts with label भारताच्या शोधात. Show all posts
Showing posts with label भारताच्या शोधात. Show all posts

2/3/25

थोरले बाजीराव आणि 'मल्हारी'


नवीन वर्षाच्या स्वागताची पार्टी चालू होती. सगळीकडे आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण होते. गाणी जोरजोरात वाजत होती. आम्ही आमच्या मित्रांच्या घरी मजा करीत होतो. आता नाचायचे म्हंटले कि एकूण धांगड-धिंगा वाली गाणीच लागणार. वाद्ये, आवाज, नृत्य सगळे एकदम भन्नाट हवे. तशीच गाणी वाजत होती. तेवढ्यात 'बाजीराव-मस्तानी' या सन २०१५ सालच्या हिंदी चित्रपटातील 'मल्हारी' हे गाणे लागले. समोर टी.व्ही. वर चित्रपटातील थोरल्या बाजीरावांची भूमिका वठवीत रणवीर सिंग जोरजोरात नाचत होता. उत्तम नट आणि उत्तम नृत्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रणवीर सिंग याने या गाण्यात अतिशय उत्तम नाच केला आहे. गाण्याची चाल हि कर्णवेधक आहे. हिंदी चित्रपटात गेल्या काही दशकात विषय काही हि असो पण एक धांगड-धिंगा वाले  गाणे असतेच. निर्मात्यांचा मत असे कि काही नाहीं तर हे गाणे बघायला लोक येतील. यात किती तथ्य आहे खुद्द निर्माता आणि देव जाणो पण साधारण या गाण्यांमध्ये तुरळक वस्त्रात नट्या असतात. आपण मराठी लोकांचे नशीब खरे कि निदान 'मल्हारी' गाण्यात असे चित्त-चक्षु 'चमत्कार' नव्हते. आणि मुख्य भूमिकेतील नटच नृत्य करीत होते. 

मी हा चित्रपट बघितला नाहीं. चित्रपट परीक्षण हा या लेखाचा उद्देश्य नाहीं. चित्रपटाचे विविध आढावे वाचलेत किंव्हा ज्यांनी चित्रपट बघितला आहे त्यांच्याशी बोललो तर चित्रपट चांगला आहे अशीच साधारण प्रतिक्रिया मिळाली आहे. पण तरी 'मल्हारी' गाणे बघून काहीतरी चुकल्यासारखे झाले. थोडे वाईट वाटले. थोरले बाजीराव हे काय व्यक्तिमत्व होते, त्यांचा अतुलनीय पराक्रम, अचाट कर्तृत्व, त्यांचा दरारा, त्यांचा अख्ख्या हिंदुस्तानात दबदबा याचा सगळा विचार केला तर छत्रपती शिवाजींचा जणू वारसा लाभलेला आणि त्यांच्या नंतर मराठा साम्राज्याचा अजिंक्यतारा, अश्या तऱ्हेचे हेंगडे-फेंगडे नृत्य त्याच्या सैनिकांसोबत करीत असेल हि कल्पना करवीत नाहीं. थोरले बाजीराव हे नुसते सेनापती नक्कीच नव्हते. त्यांची पथके त्यांच्या निवडक सैनिकांची होती. त्यांच्या स्वाऱ्या म्हणजे कासवाचे पाठीवरचे घर असे. अगदी निवडक तंबू आणि बाकी सैन्य उघड्यावरच असे, कारण एकदम आवरून निघायचे तर १०-२० हजार सैनी जलद गतीने निघू शकत. थोडक्यात थोरले बाजीराव आणि त्यांच्या सैनिकांची जवळीक असणार पण म्हणून 'मल्हारी मल्हारी' गात ते त्यांच्या सोबत उड्या  मारीत नसणार.

                                     

सन १७३७-३८ च्या त्यांच्या दिल्लीच्या मोहिमेत त्यांनी थेट दिल्लीच्या पालिका बाजारात मुक्काम केला होता. दिल्लीत धावपळ उडाली. दिल्लीच्या कट-पुतळी बादशहाची पूर्णपणे सटारली. त्याच्याकडे न सैन्य होते ना त्याने कधी म्यानातून तलवार बाहेर काढली होती. आणि जरी त्याच्या बाहुत थोडा दम जरी असला तरी समोर बाजीराव! त्याने आपले मंत्री-संत्री पाठवून थोरल्या बाजीरावांचे स्वागत केले. काय हवे त्याची विचारपूस केली. सैन्य सुद्धा जमविण्याचा प्रयत्न केला पण थोरल्या बाजीरावाशी लढण्याची उत्सुकता कोणी दाखविली नाहीं. थोरल्या बाजीरावांनी तिथून सातारच्या छत्रपती शाहूमहाराजांना संदेश पाठवला कि त्यांचा हुकूम असेल तर ते स्वतः दिल्लीचे तख्त मोडतील आणि मग छत्रपती शाहूमहाराज संपूर्ण भारताचे छत्रपती म्हणून आरोहण करू शकतात. आता शोकांतिका वेगळी कि छत्रपती शाहूमहाराजांनी याला संमती दिली नाहीं आणि तख्त तोडायलाही परवानगी दिली नाहीं. पण थोरल्या बाजीरावांच्या जीवनातील हि एक घटना त्यांच्या आत्मविश्वास आणि त्यांची मर्दूमुकी दर्शविते. त्यांच्या जीवनातात अश्या असंख्य घटना आहेत. वीस वर्षात अर्ध्याहून जास्त भारत पादाक्रांत करून जिंकणे काय सोपे आहे का? 
--
हिंदी सिनेमामध्ये काही प्रसंग दाखवावेच लागतात. जुन्या काळात एक मुसलमान पात्र हवेच आणि ते मुसलमान पात्र सगळ्यात प्रामाणिकच दाखवायला हवे. नंतरच्या काळात हेंगडे-फेंगडे नाचणारी एक नटी हवी आणि ती नटी फक्त नाचासाठी असे. सिनेमाची प्रमुख भूमिका करणारी नटी वेगळीच. गेल्या काही वर्षातील नवीन कल म्हणजे प्रमुख भूमिकेतील नटच जोरदार नृत्य सादर करतात. या गाण्याचा कथानकाशी संबंध नसतो पण गाणे दृक-श्राव्य असते आणि त्या गाण्याला घेऊन चित्रपटाची जाहिरात केली जाते. अपेक्षा अशी कि सगळ्या घरांमध्ये, फोने वर, पार्ट्या आणि कल्ब्समध्ये हे गाणे वाजेल आणि चित्रपट चालायला हातभार लागेल. आता हा नियम बहुतांश सगळ्या चित्रपटांना लागू होत असेल तर थोरल्या बाजीरावांच्या चरित्रात्मक चित्रपटावरही लागू होणारच. विषय जिव्हाळ्याचा असला, चित्रपटाच्या नायकाबद्दल अपार आदर असला तरी शेवटी चित्रपट आजच्या जमान्यातील आहे आणि चित्रपट चालणे आवश्यक आहे. मग त्यासाठी 'मल्हारी' आपण सहन करायचा. हिंदी चित्रपटातील पैसे, सेट्स आणि इतर गोष्टी, ज्याने चित्रपट भव्य-दिव्य होतो त्या गोष्टी मराठी चित्रपटात आणणे कठीण आहे. आणि दुसरे म्हणजे हिंदी चित्रपट ६०-७०% भारतात बघितल्या जाऊ शकतो. म्हणजे थोरल्या बाजीरावांची ओळख पुन्हा बहुतांश भारताला होईल. येन-तेन कारणेंन, आजच्या काळात थोरल्या बाजीरावांची गाथा गाणे आवश्यक आहे. 

आता एखादं-दुसरे गाणे सहन करायचे कि अजूनही काही सहन करायचे? श्री गोवारीकर यांने अकबरावर चित्रपट काढला आणि अकबराला ह्रितिक रोशन सारखे सुंदर दाखविले (तेंव्हा काढलेल्या चित्रांवरून तरी अकबर किंव्हा कुठलाही मोघल इतका सुंदर असेल असे वाटत नाहीं) आणि जोधाला, त्याची प्रियकर दाखविले. सत्य परिस्थिती हि होती कि आपले राज्य टिकवायला, एक करार म्हणून जयपूरच्या मानसिंगाने आपली बहीण अकबराला दिली. अकबराच्या हारेम मध्ये शेकडो बायका होत्या, त्यात अजून एक जोधा दाखल झाली. दीडशे वर्षांनी जेंव्हा औरंझेब दख्खनी कफल्लक होऊन मेला तेंव्हा जयपूरच्या तेंव्हाच्या राजाने दिल्ली ला दौड मारली आणि तिथल्या राजपूत बायकांना सोडवून पुन्हा जयपुरी घेऊन आला. आणि त्यानंतर त्या घराण्याची कुठली स्त्री पुन्हा मोघलांकडे गेली नाहीं. तसेच हरियाणाच्या जाट राजाने सन १६८८ ला अकबराला जेथे दफनवले आहे तेथे हल्ला करून त्याची कबर खोदली. अकबराची हाडे काढून जाळलीत. अकबर हा 'the great ' कधीच नव्हता पण श्री गोवारीकरांनी त्या इस्लामी आक्रमकाचे उद्दात्तीकरण केलेला चित्रपटही सहन करायचा का? मला माहिती नाहीं. पण चित्रपटाच्या निमित्ताने झालेला वादामुळे अकबराला किंव्हा मोघलांच्या उद्दात्तीकरणाला आळा बसायला सुरुवात झाली. 
--
हा लेख लिहितांनाच संभाजी महाराजांच्या जीवनावर आधार 'छावा' चित्रपटाचे ट्रेलर प्रकाशित झाले. त्यात स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना लेझीम खेळतांनाचे दृश्य आहे. ते बघून मन विचलित झाले. शंभू राजे, जे पाच-पाच शत्रूंना छातीवर घेऊन ९ वर्षे अखंड लढत होते त्यांना नृत्य करतांना दाखवायची खरंच मुळीच आवश्यकता नाहीं. पण हे दृश्य वगळता, चित्रपटाचे ट्रेलर बघून अंगावर काटा आला. प्रमुख भूमिकेतील विक्की कौशल यांनी छत्रपतींची भूमिका अप्रतिम निभावल्याचे दिसते. 'पार्वती पतये नमः, हर हर महादेव' हि गर्जना संभाजी महाराज करतानांचे दृश्य बघून रोम-रोमात स्फूर्ती येते. आणि आता छत्रपती संभाजी महाराजांची ओळख भारताला होणार आणि मोघली औरंग्याच्या खरा (घाणेरडा) चेहरा पुन्हा दिसणारा याचे समाधान वाटते. 

पण चित्रपटाच्या दिग्दर्शकांना मनापासून विनंती- लेझीम-बिझीम वाला सीन कापा. गरज नाहीं.  

5/22/24

मराठी साम्राज्याचा ऱ्हास - मराठा सैन्यातील मराठेतर सैनिक

मराठी इतिहास वाचायला लागलो कि मनात विचारांची झुंबड उडते. हा लेख खरं मला पुढल्या महिन्यासाठी लिहायचा होता. पण डोक्यात आलेला विचार पानांवर उतरविणे आवश्यक आहे. मागचे काही लेख वाचले असतील तर वाचकांना माहिती असेल कि सध्या श्रेष्ठ आणि जेष्ठ इतिहासकार श्री सेतू माधवराव पगडी यांची पुस्तके वाचणे चालू आहे. आणि त्या निमित्ताने 'चंद्रप्रकाशी' लेख मालिका पण चालू केली आहे. पण कुठलाही इतिहास वाचतांना नवीन प्रश्न मनात निर्माण होतात. त्याचा हा मागोवा. (हा लेख 'चंद्रप्रकाशी' नव्हे.) 

मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ तोरणा किल्ल्यावर भगवा फडकवल्यापासून झाली. राज्याची सुरुवात केवळ जमीन किंव्हा किल्ले जिंकून होत नाहीं. पण राज्यस्थापनेची आवश्यकता काय? आणि आत्ताच का? आणि तसेच हा राजाच का आणि त्याच्यासाठीच का लढायचे या प्रश्नांची सुद्धा उत्तरे स्पष्ट हवीत. छत्रपती शिवाजींची किमया इथेसुद्धा प्रकर्षाने जाणविते. त्यांनी जोडलेली माणसे, त्यांनी प्रेरणा दिलेले सैन्य त्यांच्या निधना नंतरही शंभरहून अधिक वर्षे लढत राहिला. प्रत्येक साम्राज्य उदयास येते तसेच अस्तास पण जाते. साधारण कुठल्याही साम्राज्याचे शिखर ९० ते १०० वर्षे मानायला हरकत नाहीं. काही साम्राज्ये या कालावधीत इतकी शक्तिशाली होतात कि त्यांचा अस्त झाला तरी त्यांचा पगडा अजून अनेक दशके टिकून रहतो. मराठी साम्राज्याचा सुवर्ण काळ आपण साधारण सन १७१२ (जेंव्हा बाळाजी विश्वनाथ यांनी मोगालंना चौथाई देण्यास भाग पाडले) ते सन १८१० ( जेंव्हा यशवंतराव होळकर यांचा मृत्यू झाला) मानू शकतो. त्याच्या आधीच काळ चढतीचा आणि त्याच्या पुढला उतरणीचा. पण जेंव्हा राज्य उतरणीला लागले तेंव्हा एकदम कोलमडलेच. काही सरदार घराणी शाबूत राहिलीत पण भारतावरचा मराठी राज्याचा पगडा एकदम उठला असे वाटते. ते का? 

याची अनेक कारणे आहेत. उदाहरणार्थ सन १७९५ ते सन १७९८ च्या कालावधीत अहिल्याबाई होळकर, नाना फडणवीस आणि महादजी शिंदे या सगळ्यांचे मृत्यू होऊन मराठी राज्यात पुढाऱ्यांची एक मोठी फळी अचानक नाहीशी झाली. माधवराव पेशव्यानंतरचे राघोबादाद यांना पेशवा करायला हवे होते. पण त्यांना न करून पुढे झालेल्या भानगडींमुळे पेशवाई कोलमडली. भट घराण्याचा पेशवाई चा हक्क काढून दुसऱ्या सरदार घराण्यांमधून कोणाला तरी पेशवा केले असते तर?  या व्यतिरिक्त एक अजून कारण माझ्या अल्प-बुद्धीला जाणवते ते म्हणजे मराठ्यांनी भारतावर राज्य केले पण भारतीय कधी फारसे मराठी सैनिक झाले नाहीत. या मुद्दयाचा आपण थोडा विचार करूया. 

(मराठी घोडेस्वार)

मागल्या लेखात निझामाबाद्दल लिहितांना, निझामाचा थोडा अभ्यास झाला. पगडीकृत निझामावरचे पुस्तक उपलब्ध आहे आणि पुढे त्या अनुषंगाने अजून लिहिणे होईलच. पण एक मुद्दा मला प्रकर्षाने जाणवला तो म्हणजे निझामाने मोठ्या कुशलतेने वापरलेली हिंदू प्यादी. निझाम मूळ औरंगझेबासारखा धर्मांध नव्हता. त्याचा प्रमुख अधिकारी वर्ग जरी मुसलमान असला तरी त्याला सत्ता प्रस्थापित करणे आणि सत्ता उपभोगणे अधिक महत्वाचे होते. आणि सत्ता क्षेत्र आणि सत्तांकीत बहुतांश हिंदू असल्यामुळे त्याने अनेक हिंदू आपल्या सैन्यात आणि प्रशासनात आणिले. त्याने मराठ्यांचे अनेक सरदार आपल्याकडे वळविले आणि तसेच प्रशासनात महसूल खात्यात किंव्हा जमीन संबंधित क्षेत्रात मराठी अधिकार वर्ग आणला. या अधिकारी आणि सरदारांना मानाच्या पदव्या दिल्यात आणि जमीनी-जहागिरी पण दिल्यात. त्यामुळे दोन गोष्टी झाल्यात, एक म्हणजे बहुसंख्य असलेला हिंदू वर्ग निझाम विरोधी राहिला नाहीं आणि दुसरा म्हणजे सैन्यात त्याला मध्य आशिया किंव्हा तत्सम प्रदेशातून मुसलमानी सैनिक आणायची आवश्यकता पडली नाहीं. अर्थात, असे धोरण करणारा निझाम पहिला नाहीं. या आधी आदिलशाही आणि निझामशाहीनेही हेच धोरण पत्करले होते. पण आदिलशाही किंव्हा निझामशाही हे परदेशी मुसलमान नव्हते. धर्मान्तरित भारतीय मुसलमान होते. या तुलनेत चिलकीच खान किंव्हा त्याचा बाप हे थेट परदेशी मुसलमान होते. 

निझामाचे हे धोरण त्याने बहुधा अकबराचे उचलले असणार. अकबर हा मोघली सत्तेचा तिसरा बादशाह. आणि सगळ्यात प्रसिद्ध पण. त्याने आपली पाळ-मूळ पक्की करायला एक नवीन धोरण आखले. जे त्याच्या आधीच्या कोणी मुसलमानी क्रूरकर्म्या हिंदू-द्वेष्ट्यांनी अंगिकारले नव्हते. अकबराने राजपुतांमध्ये फूट पाडली आणि जयपूरच्या अंबर घराण्याशी एकांगी रोटी-बेटी चे संबंध प्रस्थापित केले. (अंबर घराण्यातील पोरीबाळी मोघल बादशहाच्या हारेम मध्ये दाखल होऊ लागल्यात. जेंव्हा औरंगझेब मेला तेंव्हा १७०७ च्या अंबर घराण्याच्या राजाने ताबडतोब घोडे दिल्ली ला दौडविलेत आणि राजपूत स्त्रियांना मोघली घरातून सोडवून परत जयपूर ला घेऊन आला. त्यानंतर जयपूर घराण्याची कोणीही स्त्री पुन्हा कधी मोघलांकडे गेली नाहीं.) आणि हिंदूंना त्याच्या दरबारात मानाची स्थाने दिलीत. त्यामुळे त्याला राजपुतांचे आयते सैन्य लढाया करायला मिळाले आणि उत्तरेतील त्याच्या विरोधातील उठाव नाहीसे झाले. हेच धोरण औरंगझेबापर्यंत कायम राहिले. अर्थात, औरंगझेबाने मोगलाई बुडवण्यामागे बरीच कारणे होती. धर्मांधता, मूर्ख राजकीय चाली, आत्यंतिक द्वेष,आत्यंतिक अहंकार पण सगळ्यात मुख्य म्हणजे त्याच्या हिंदुविरोधी धोरणांनी त्याने स्वतःच्या पायावरच धोंडा पाडून घेतला. 

(जयपूरच्या कछवा घराण्याचे राजचिन्ह)

वरील उदाहरणात एक गोष्टी स्पष्ट होतात. अल्पसंख्याक जर का सत्ताधारी झालेत तर बहुसंख्यांना सैन्यात आणि प्रशासनात घेणे हे आवश्यक धोरण आहे. म्हणजे मोगलाई फक्त मोघली रक्ताच्या सैन्यावर उभी नव्हती तर त्यात असंख्य राजपूत सामील होते. त्या व्यतिरिक्त शिपाई-गडी स्तरावरही अनेक उत्तर भारतीय हिंदू होते. पण हिंदू सरदारांना मान असला तरी त्यांच्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे, कुठल्याही मोघलांच्या स्वारीत हिंदू सरदारासोबत एक त्याच्या पदाचा किंव्हा त्याच्याहून उंच पदावर असलेला एक मुसलमान, आणि बहुधा परदेशी मुसलमान, सरदार नेहमी असे. उदाहरणार्थ, मिरझा राजे जयसिंग सोबत दिलेरखान आला होता. मोगलांसारखेच इंग्रजांनीहि भारतावर राज्य करायला भारतीयांचाच पुरेपूर फायदा घेतला. बाकी जगात इंग्रजांनी जिथे जिथे राज्य केले तिथल्या स्थानिक लोकांना त्यांनी कधीच सैन्यात घेतले नाहीं कि त्यांना कधीच प्रशासनात घेतले नाहीं. उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात तर त्यांनी स्थानिक लोकांना नामशेष केले. पण भारतात मात्र अगदी सन १७५८ च्या इंग्रजी-फ्रान्स च्या युद्धातही इंग्रजांकडून भारतीयच लढत होते.  

मराठ्यांकडून कुठले मराठेतर समाज लढत होते? संपूर्ण भारतावर जेंव्हा राज्य पसरले तेंव्हा मराठे हे अल्पसंख्यांकच होते. मराठेतर हे भारतीय आणि हिंदूच होते पण छत्रपतींपासून मराठी समाजाने दाखवलेले धाडस, पराक्रम आणि जागृती हि मराठेतर समाजात नव्हती. त्यामुळे मराठ्यांना अल्पसंख्यांक मानायला हवे.  दोन उदाहरणे माझ्या पटकन ध्यानात आलीत, ती म्हणजे इब्राहिम गारदी जो पानिपतच्या युद्धात मराठ्यांकडून, भाऊसाहेबांच्या हुकुमानुसार लढला आणि जीव हि दिला. दुसरे म्हणजे, महादजी शिंदे यांनी फ्रेंच युद्धसैनिक विशेषज्ञ 'डी बोईन' याच्या प्रशिक्षण खाली अत्याधुनिक अशी एक तुकडी तयार केली होती. पण या तुकडीत शिपाई मराठीच होते. पण दिल्ली ते तंजावर आणि मुंबई ते कलकत्ता पर्यंत मराठी साम्राज्य जे पसरले होते त्यात सैन्याधिपती आणि सैन्य मराठीच होते. ओरिसा ला जाऊन नागपूरच्या रघुजीराजे भोसल्यांनी ओडिया समाजातून सैन्य उभे नाहीं केले. किंव्हा हैदर अली ला नामोहरम करून सवाई माधवरावांनी पुढे तामिळ किंव्हा कन्नड समाजातून सैन्य उभे नाहीं केले. थोरल्या बाजीरावांनी अख्खे  उत्तर हिंदुस्थान पादाक्रांत केले आणि दिल्ली सुद्धा लुटले पण तेथील पंजाबी किंव्हा जाट समाजाचे सैन्य किंव्हा सरदार मराठी दरबारात सामील झाले नाहीत.  

(विषयांतर होते आहे पण एक छोटी गोष्ट इथे सांगावीशी वाटते. थोरले बाजीरावांनी दिल्ली पर्यंत मजल मारली होती. मोघली सैन्य त्यांच्यापुढे तग धरू शकत नव्हते. त्यांनी दिल्लीच्या पालिका बाजार ला मुक्काम केला होता आणि बादशहा ला आपण आल्याचा निरोप पाठवला होता. या दरम्यान त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना त्यांनी निरोप पाठवला कि त्यांनी हुकूम केला तर बादशहाला सिंहासनावरून खाली आणू आणि छत्रपतींना दिल्ली चा बादशहा म्हणून स्थापन करू. पण कोण जाणे पण छत्रपतींनी याला नकार दिला. पण जर तसे घडले असते तर मराठे दिल्लीपती झाले असते. दिल्ली तेंव्हा वाचले. आणि मोघली सिंहासन हि वाचले. त्या नंतर ३०-४० वर्षांनी महादजी शिंद्यांनी दिल्ली लुटले, आणि मोगली दरबार जाळला. असो.) 

(तुर्की जानिसारी सैनिक)

अजून एक उदाहरण येथे तुर्की साम्राज्याचे द्यायवेसे वाटते. या साम्राज्यात 'जानिसारी' म्हणून एक खास लष्करी तुकडी होती. हि तुकडी फक्त आणि फक्त सुलतानाला मानायची आणि त्याच्या थेट हुकूमाखाली येत असत. त्यावेळेस तुर्की साम्राज्य सध्याच्या पूर्व युरोप भागात पसरत होते. त्या भागातील ख्रिश्चन जनतेमधील हट्टीकट्टी, उमदी मुले सुलतान निवडीत असे आणि त्यांचे जानिसारी चे विशिष्ट प्रशिक्षण दिले जात असत. हि लष्करी तुकडी तुर्की रक्ताची नसत आणि मुसलमान पण नसत पण त्यांना तुर्की सैन्यात अत्यंत उच्च दर्जा होता. मराठी साम्राज्यात अशी राजपूत किंव्हा तंजोरची तामिळ तुकडी असल्याची नोंद नाहीं. (थोरल्या बाजीरावांचा हुजुरी पागा हे खास लष्करी तुकडी होती) 

मराठी सैन्यात पिंडारी आणि बारगी लोक काही काही लढयात असत. खासकरून इंग्रजां विरुद्धच्या लढयात पिंडारी लोक खूप होते. पण इतर समाज सैन्यात सामील झालेल्याची नोंद कुठे नाहीं. 

दुसऱ्या हिंदू समाजातून सैन्य उभे केले असते तर मराठ्यांना भारतीय हिंदूंचा विरोध कमी झाला असता. नवीन प्रदेश आणि नवीन समाजातून आलेले सैन्य नवीन कल्पना घेऊन येतात त्याचा उपयोग एकूण राज्याला होतो. आणि मुख्य म्हणजे हिंदू धर्मियांची एकी झाली असती आणि मुसलमानी सत्ता खिळखिळ्या झाल्या असत्या आणि पुढे इंग्रजांना पाय रोवायला जागा मिळाली नसती. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे सगळ्या भारतभर महाराष्ट्र धर्म पसरला असता. 

4/4/23

नायपॉल - एक प्रवास

श्री विदयाधर सीप्रसाद नायपॉल यांचा मृत्यु ऑगस्ट ११, २०१८ ला लंडन येथे झाला. त्रिनिनाद आणि टोबागो येथील मूळ निवासी श्री नायपॉल हे १८व्या वर्षी इंग्लंड ला दाखल झालेत. तेंव्हा पासून ते ब्रिटिश नागरिक होते. इंग्रजी भाषेतील गेल्या शंभर वर्षातील सर्वश्रेष्ठ लेखक मानलेल्या श्री नायपॉल यांना सन २००१ ला साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक दिल्या गेले होते. त्यांनी त्यांच्या हयातीत ३० हुन अधिक पुस्तके लिहिलीत. यात कादंबऱ्या, प्रवासवर्णने आणि बरेच निबंध लेखन ही होते. मिस्टिक मसूर ही त्यांची पहिली कांदबरी सॅन १९५६ ला प्रकाशित झाली तर मॅजिक सीड्स ही त्यांची शेवटली कादंबरी सन २००७ ला प्रसिद्ध झाली. तब्बल  पन्नास वर्षाच्या कालावधीत त्यांनी विविध विषय हाताळलेत. त्यांच्या लेखनाचा सूर अत्यंत वैयक्तिक होता पण त्याची पात्रे मात्र जगाच्या विविध टोकाला वावरत. वेस्ट इंडीज, आफ्रिका, भारत आणि इंग्लड येथे बेतलेली त्यांची पात्रे, त्यांनी त्याच्या प्रवास वर्णनात रेखाटलेल्या विविध प्रांत, देश, समाज आणि संस्कृतीचे प्रतिनिधी होते.

नायपॉल हे वादग्रस्त व्यक्तिमत्व होते ही अतिशयोक्ती ठरणार नाही. मुख्यतः त्यांनी लिहिलेली प्रवासवर्णने प्रकाशित झाल्याच्या क्षणापासून वादाच्या भोवऱ्यात फसली होती. पण त्यांची प्रवास वर्णने ही केवळ वर्णने नसून त्यांच्या विचारांचा प्रवास म्हणून वाचायला हवीत. त्यांची लेखन शैली, वाक्यप्रचार करण्याची एक विशिष्ट पद्धती (त्यांची एक-एक वाक्य एका परिच्छेदा एवढी लांब असत), आणि शुष्क दृष्टीकोनातून जगाकडे बघण्याचा कल खासकरून दुसऱ्या जागतिक युद्धानंतर उभे राहू बघण्याऱ्या जगाला पारखण्याचा दृष्टिकोन वाचकास विचार करण्यास प्रवृत्त करतो. मला वाटतं सगळी लोक स्वतः चा विचार करायला तयार नसतात. स्वतंत्र्यपणे  विचार करणे हे कठीण कार्य आहेच पण स्वविचार ही मुळत:च अस्वस्थ करणारी प्रक्रिया आहे. नायपॉल नेमके समाजाच्या याच मर्मावर बोट ठेवतात.

माझी नायपॉल याची ओळख प्रामुख्याने त्यांनी लिहिलेल्या प्रवास वर्णने वाचून झाली. त्यांच्या लेखनाची सवय करावी लागते. ओघवती भाषा किव्हा मोठे शब्द हीच भाषेची कसोटी नसते हे त्यांच्या लेखनाची सवय झाल्यावर लक्षात येत. त्यांची विचार करण्याची एक विशिष्ट असममित, अ - कालक्रमीत पद्धती होती,  आणि त्याच पद्धतीने त्याचे शब्द लिहिल्या गेलेत. ते एका वाक्यात १८९८ च्या गांधींबद्दल बोलायाला सुरुवात करून, मध्ये १९४८ च्या गांधी बद्दल बोलून, शेवट १९१५ ला गांधी परत दक्षिण अफ्रीकेला का परतलेत हे सांगतात. येथे गांधींच चरित्र सांगायचं हेतू नसतो तर गांधी या व्यक्तीमत्वाचे पैलू हे कसे विविध काळी जाणवतात (चमकतात?) आणि त्यामुळे गांधी ही व्यक्ती कशी समजू शकते हे नायपॉल दर्शवितात.  वाचकाला वाचायला, कळायला सोपं जाईल असे लिहावे वगैरेच्या भानगडीत ते कधीच पडले नाहीत. वाचकाला त्याच्या विचारांची झेप आणि प्रगल्भता जणू एक आव्हान होते. पण एकदा का वाचाकास त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन कळला की इतिहास आणि भविष्य जणू नावीन्याने अवतरते. त्यांची प्रवास वर्णने जगाच्या विविध भागात, विविध विषयांना धरून लिहिलेली असून, दुसऱ्या महायुद्धाच्या उत्तरार्धातील चाळीस वर्षांचा कालखंडावर दृष्टीक्षेप टाकतात. या सगळ्या प्रवासात आणि विचारातील धागा शोधायचा तर दुसऱ्या महायुद्धानंतर साम्राज्यवादाचा, प्रामुख्याने इंग्रजी साम्राज्याचा झपाट्याने झालेल्या ऱ्हासा नंतर उदयास आलेल्या देशांचे, समाजांचे परिक्षण होय. इंग्रजी साम्राज्य सन १९२० च्या दशकात यशाच्या शिखरावर होते. (इंगलंडच्या राणीच्या साम्रज्यावर कधी सूर्यास्त होत नसे!) पण केवळ तीस वर्षातच हे साम्राज्य उन्मळुन पडले. भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, मलेशिया इत्यादी जी राष्ट्रे या मंथनातून उदयास आलीत, ते समाज जणू या बदलाला सामोरं जाण्यास सज्ज नव्हती. पण गंमत म्हणजे, हा अचानक घडलेला बदल आकलनाच्या बाहेर आहे आणि झपाट्याने बदललेल्या जगात स्वातंत्र्य मिळणे म्हणजे नेमके काय याची कल्पना आपल्याला नाही हे सुद्धा मानायला हे देश, आणि देशांचे राज्यकर्ते तयार नव्हते. यातुन निष्पन्न काय झाले? तर इंग्रजी सत्तेची व राज्यकर्त्यांची केविलवाणी नक्कल. आपल्या प्रवासवर्णनांमध्ये नायपॉल या कुंठित समाजाची परिस्थिती दर्शवितात. त्यांची वाक्ये चाबकाच्या फटक्यां सारखी भासतात. कुठल्याही राष्ट्राबद्दल टीकेचे आसूड ओढणे म्हणजे विवादांना आमंत्रण देणे हे सांगायला नकोच. पण त्यांचे विचार बोचणारे असलेत तरी नाकारण्या साऱखे नव्हते. स्वतः च्या घरात बसून त्यांनी मतांच्या पिंका टाकल्या नव्हत्या.  उदाहरणार्थ, भारतावर  त्यांनी तीन पुस्तके लिहिलीत. आणि त्यासाठी ते अख्खा भारत हिंडलेत. सामाजिक, राजकीय आणि या सीमारेषेवर वावरणाऱ्या त्या त्या दशकातील दिग्गज लोकांना ते भेटलेत, मुलाखती घेतल्यात. ते नामदेव ढसाळ यांना भेटलेत, शिवसेनेच्या उदया बद्दल लिहिले, दक्षिणेत द्राविडी चळवळी बद्दल लिहिले, ६० च्या दशकात चारू मुजुमदारांना भेटलेला, नक्षलवादी चळवळीचा आढावा घेतला, सन १९७५ ला विनोबा भावे यांच्या आश्रमात राहिलेत. दिल्लीत नामांकित राजदूतां सोबत गप्पा मारल्यात तर ७० आणि ८० च्या दशकातील प्रख्यात मानसशास्त्रज्ञांशी  वाद-विवाद केलेत. त्यांनी लिहिलेलं पटो वा न पटो पण वायफळ म्हणून वाचक त्यांच्या विचारांना बाजूला सारू शकत नाही.

भारत आणि हिंदू धर्म हा त्यांच्या व्यक्तित्वाचा, व्यक्तिमत्वाचा, विचारांचा आणि लेखनाचा अभिन्न भाग होता. नायपॉल यांचे आजोबा हे भारतातून (बिहार राज्य), १९व्या शतकाच्या उत्तरार्धात त्रिनिनाद या वेस्ट इंडिज मध्ये दाखल झालेत. त्या काळात इंग्रजी सत्ता साखरेचा फार मोठ्या प्रमाणावर व्यापार करीत. इंग्रजांनी फार पूर्वीच सांप्रत वेस्ट इंडीज ही बेटे बळकावली होती. तिथे इंग्रजांनी उसाची लागवड  सुरु केली. पण त्यांना शेतांवर कामगार मिळेना. आणि इंग्रजी संसद ने सन १८३२ ला गुलामगिरीची पध्द्तही अवैध केली होती. यावर उपाय म्हणून इंग्रजी व्यापारांनी इंग्रजी अधिपत्या खाली असलेला देशामधून कामगार वेस्ट इंडीज मध्ये आणायला सुरु केले. कामगारांसोबत करार सोपा होता. पाच वर्षे शेतांवर मजुरी करायची, त्याचा भत्ता मिळेल. आणि पाच वर्षा अंती मायदेशी जायचे तिकीट मिळेल किंव्हा जमिनीचा एक तुकडा इंडीज मध्ये मिळेल, स्थायिक व्हायला. बिहार आणि उत्तर प्रदेशातील मोठ्या प्रमाणावर लोक अश्या तऱ्हेनी वेस्ट इंडीज मध्ये दाखल झालीत, आणि स्थायिक झालीत. नायपॉल त्यांच्या या स्थलांतराला ऐतिहासिक महत्व देतात. कारण या स्थलांतरीत लोकांची जणू एक अजब संस्कृती उभी राहिली.  समुद्राच्या लाटांवर भरकटत शहाळ्या सारखी ही लोक, आपली ओळख आणि अस्मिता टिकवायला सतत धडपड करीत. पण हे प्रयत्न म्हणजे वैफल्य आणि हास्यास्पद या सीमेवरचा तळ्यात-मळ्यातला खेळ होऊन बसला. अश्या पार्श्वभूमीवर नायपॉल यांचा जन्म सन १९३२ ला झाला. लहानपणा पासून हिंदू धर्मात वाढविलेल्या नायपॉलांवर भारतापासून हजारो मैल दूर असूनही भारताची सदैव सावली होती. त्यांच्या कुटुबांची भारताची नाळ तब्बल शंभर वर्षांपूर्वी तुटली असली तरी ते वेस्ट इंडीज मध्ये आणि पुढे इंग्लंड मध्ये नेहमी भारतीय म्हणूनच ओळखल्या जात. ना जन्मस्थळाचा, ना कर्मस्थळाचा आणि ना ही पितरांच्या भूमीचा, असल्या त्रिशंकू परिस्थितीच त्यांनी आपल्या लेखन प्रवासाचा आरंभ केला. 'हाऊस ऑफ मिस्टर बिस्वास' ही त्यांची पहिली कादंबरी अतिशय प्रसिद्ध झाली. त्यांच्या वडिलांच्या आयुष्यावर थोडी बहुत बेतलेलया या कादंबरीचा नायक - मोहन बिस्वास हा त्रीनिनाद येथील एक भारतीय मुळाचा हिंदू. कादंबरी मोहनच्या स्वतःचे घर बांधण्याच्या ध्यासाची गोष्ट. भारतापासून दूर असूनही रूढी -परंपरेच्या जाळ्यात गुरफटलेल्या समाजाचे चित्रण आणि स्वत्वाची ओळख म्हणून घराचा ध्यास घेतलेल्या मोहनची गाथा हि एक सुरेख कथा आहे. कथा सुरेख आहे, सुरस नव्हे. नायपॉल यांची पात्रे कधी सुरस आयुष्य जगात नाहीत. कथेचा अंत सुखी किंव्हा दुखी असावा असा नायपॉल यांचा आग्रह नसतो. त्यांचे लेखन कल्पित पात्रांच्या प्रवासाचा लेखा-जोखा असतो. मग तो मोहन बिस्वास असो कि 'काँगो' या अजून एक प्रसिद्ध कादंबरीचा नायक असो. प्रवास म्हणलं की गोष्ट केवळ पात्रां पुरतीच असू शकत नाही. पात्रांच्या आशा- अभिलाषा व्यतिरिक्त पात्रांची काळ-वेळ, समाजस्थिती, समाज बंधने, इतिहासाची ओझी हे सगळंच महत्वाचे ठरतात. नायपॉल जणू चित्र रेखाटतात. त्यांच्या या निरीक्षण शक्ती आणि लेखनाच्या खुबीमुळे त्यांच्या कादंबऱ्या आणि ललीत अतिशय प्रसिद्ध झाले. त्यांचे मिगुल स्ट्रीट, मिस्टिक मसूर, द एनिग्मा ऑफ आरएव्हल , गुरिल्ला या कादंबऱ्या इंग्रजी भाषेतील श्रेष्ठ लेखना मध्ये गणल्या जातात. त्यांच्या इन फ्री स्टेट या कादंबरीला इंग्लंडच्या इंग्रजी सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या मॅन -बुकर पारितोषिकाने सन्मानित केल्या गेले.

मागे आपण त्यांच्या प्रवासवर्णनांचा थोडक्यात आढावा घेतला. नायपॉल यांनी त्रिनिनाद-टोबॅगो, अर्जेटिना, संयुक्त राज्य अमेरिका, व्हेनेज्युएला, काँगो, इराण, पाकिस्तान, भारत, मलेशिया, इंडोनेशिया या देशांच्या वर्तमान आणि इतिहासाचा आढावा घेत, भविष्याचा वेध घेतला. ही प्रवासवर्णने या देशांच्या समाजाचे निरीक्षण आणि अवलोकन होते. ही सगळी राष्ट्रे  साम्राज्यवादाची फळे आहेत. या सगळ्या राष्ट्रांच्या सीमा आणि इतिहास विस्कळीत आहेत. देशाचे व्यक्तिमत्व, स्व-ओळख याची संपूर्ण कल्पना या देशामध्ये अजूनही रुजलेली नाही. आणि ही सगळी राष्ट्र अजूनही इतिहासाच्या ओझ्या खाली दबलेली आहेत. दक्षिण अमेरिकेत मूळ निवासी यांचा सर्वनाश करून उभे राहिलेला समाज (स्पॅनिश व पोर्तुगाली) आणि राष्ट्रांनी आपल्या रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती करणे जणू सोडलेच नाही. अमेरिका (U.S.A) हा गुलामांच्या पाठी तोडून आणि घोंगडं शिवाव तस  जमिनी विकत घेऊन उभा केलेला हा देश, अजूनही  गुलामीगिरीच्या साखळ्यांच्या खणखणात सैरभैर होतो. इराण, पाकिस्तान, मलेशिया आणि इंडोनेशिया हे देश मूळ मुसलमान नाहीत. धर्मान्तरीत हे राष्ट्रे आज जगातील सगळ्यात मोठी मुसलमान राष्ट्रे आहेत. मूळ अरबी मुसलमानां पेक्षा गैर-अरब मुसलमानांची संख्या अधिक आहेत आणि नायपॉल यांच्या मते स्वतःला सर्वाधिक  शुद्ध (पाक) मुसलमान म्हणून सिद्ध करण्याच्या सतत धडपडीत असतात. हा प्रयत्न स्फोटक आणि गैर-मुसलमान जगाला घातक ठरेल हे त्यांचा १९९० च्या दशकातील भाष्य अत्यंत विवादास्पद ठरले.

नायपॉल पहिल्यांदा सन १९६० च्या दशकात भारतात आलेत. त्यांच्या अनुभवांवर आणि प्रवासावर त्यांनी An Area of Darkness हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक त्यांच्या भारतावर लिहिलेलया त्रयी पुस्तकां मधील पहिले पुस्तक. पुस्तकाचे नाव च बहुधा लोकांना पचण्यासारखे नव्हते कारण भारत सरकार ने या पुस्तकावर लगबगीने बंदी आणली. अर्थात बंदीमुळे हे पुस्तक वाचल्या गेले नाही अस नाही.  नायपॉल या पुस्तकात पुर्वग्रहदूषित म्हणून समोर येतात.

“It is well that Indians are unable to look at their country directly, for the distress they would see would drive them mad. And it is well that they have no sense of history, for how then would they be able to continue to squat amid their ruins, and which Indian would be able to read the history of his country for the last thousand years without anger and pain? It is better to retreat into fantasy and fatalism, to trust to the stars in which the fortunes of all are written”

बऱ्याचश्या वाचकांच्या मते केवळ मूळ भारतीय आहे म्हणून भारताबद्दल असा काही लिहिण्याचा अधिकार  नायपॉलांना कसा? पण मुद्दा अधिकाराचा नाही. त्यांच्या दृष्टीत अतिशयोक्ती आहे हे खर पण हे विचार भारताबद्दलच्या असलेल्या आत्यांतिक प्रेमातून लिहिल्या गेले आहेत. जीव कासावीस होऊन लिहिल्या गेले आहेत. जवळपास शंभर-दीडशे वर्षांपूर्वी जे भारताईचे वेस्ट इंडीज मध्ये स्थलांतरीत झालेत, त्या लोकांनी तिथे एक नवीन समाज निर्माण करण्या ऐवजी जुना भारतच जगाच्या दुसर्या टोकाला बसविण्याच्या प्रयत्न केला. अगदी जाती-व्यवस्था सुद्धा जणू जहाजातून जतन करून, वेस्ट इंडिज मध्ये पुनः जणू रुजवली. भारताशी नाळ तुटू नये म्हणून लहानपणा पासून पोरांना भारतीय संस्कार केल्या जात. यात वावगं काहीच नाही. (जाती व्यवस्था सोडून!) पण जो व्यक्ती परदेशी स्थलांतर करतो तो स्व देशाचे एक चित्र मनात कोरून बाहेर बडतो. ते चित्र जुनं होत जाते, अधिक रम्य होत जाते पण सहाजिकच मुळीच बदलत नाही. शेवटी स्वदेश स्मृती पटला तून नाहीसा होतो आणि रहाते फक्त एक कल्पना.  नायपॉल भारताबद्दलच्या आणि हिंदू धर्मा बद्दलच्या रम्य कल्पनेत वाढलेत. हा भारत त्यांची जणू वडिलोपार्जित संपत्ती होती, त्यांचा वारसा-हक्क होता. पण जेंव्हा भारत - एक कल्पना आणि सत्य परिस्थितीतील भारत, खास करून १९६० च्या दशकातला भारत, याचा सामना झाला तेंव्हा नायपॉल यांच्या मनात जे भीषण वादळ आले असणार त्याचे पडसाद An Area of Darkness मध्ये उमटतात. त्यांचे भारताबद्दलचे विचार असह्य वाटतात पण ते विचार लागु होतात की नाही हे पडताळण्या पेक्षा, त्यांच्या भारताबद्दलच्या विचारांचा प्रवास म्हणून वाचायला हवेत. कारण त्यांनी हा प्रवास एक पुस्तक लिहून संपविला नाही. त्यांनी सन १९७६ ला India: A Wounded Civilization हे पुस्तक लिहिले.

"“India is old, and India continues. But all the disciplines and skills that India now seeks to exercise are borrowed. Even the ideas Indians have of the achievements of their civilization are essentially the ideas given them by European scholars in the nineteenth century. India by itself could not have rediscovered or assessed its past. Its past was too much with it, was still being lived out in the ritual, the laws, the magic – the complex instinctive life that muffles response and buries even the idea of inquiry.” - India: A Wounded Civilization

आपादकाल लागु झालेल्या भारत बद्दल त्यांचे विचार पहिल्या पुस्तका एवढे तीक्ष्ण नव्हते. त्यांची द्र्ष्टी थोडी मवाळली होती. भारतीय  समाज गर्तातून बाहेर पडायला जी धडपड करीत होता त्याची जाणीव त्यांना झाली होती. पण भारता बद्दल, भारताच्या इतिहासा बद्द्दलची त्यांची तळमळ कायम होती. त्यांचे भारत बद्दलच्या त्रयी मधी शेवटले India: A Million Mutinies Now हे पुस्तक. पुस्तकाचे शीर्षक मला फार आवडले. १९८० च्या दशकात लिहिलेलं हे पुस्तकात नवीन, तरुण भारताचा, जुन्या भारता विरुद्धचा 'ऊठाव' नायपॉल टिपतात.

“Independence was worked for by people more or less at the top; the freedom it brought has worked its way down. People everywhere have ideas now of who they are and what they owe themselves. The process quickened with the economic development that came after independence; what was hidden in 1962, or not easy to see, what perhaps was only in a state of becoming, has become clearer. The liberation of spirit that has come to India could not come as release alone. In India, with its layer below layer of distress and cruelty, it had to come as disturbance. It had to come as rage and revolt. India was now a country of a million little mutinies. - India: A Million Mutinies Now

खर सांगायचं तर १९८० च दशक हे भारता साठी फार वाईट होत. समाजवादाच्या विषवृक्षाची मुळे जणू अख्ख्या देश पादाक्रांत करीत होती. सरकार कडे  पैसा नाही, जनते कडे नोकऱ्या नाहीत, बंद पडणारे उद्योग आणि कारखाने आणि काँग्रेसी राज्यकर्त्यांना सत्तेचा आलेला किळसवाणा हुरूप यात देश फार विचित्र फसला होता. जागतिक स्तरावर चीनचा प्रभाव जाणायवाला लागला असतांना, भारत मात्र पुनः इतिहासात गुरफटतो की काय अशी शंका येऊ लागली होती. पण या सगळ्या धुमश्चक्रीत नवीन भारताची तृणें उभरत होती. भारत सरकार भारत चालवीत नाही, भारतीय भारत चालवतात आणि या भारतीयांच्या मेहनतीला, औद्योगिकतेला तोड नाही हे नायपॉल यांनी बरोब्बर ताडले. १९९० नंतरची भारताची प्रगती स्पृहणीय आहे आणि हे पुस्तक त्याचे द्योतक होते. त्यांच्या कल्पनेतील भारत त्यांना जणू क्षितिजावर पुनः दिसू लागला.

कल्पित आणि कल्पिताचा प्रवास नायपॉलांनी  विनासायस पणे जन्मभर केला. उत्तर भारतात जन्म झालेल्या अर्भकाची नाळ मूळ गावात पुरतात. ते अर्भक पुढे कुठेही जातो पण त्याच मूळ कधीच बदलणार नाही ही  त्या मागची कल्पना आणि ते अर्भक पुन्हा मूळ गावी परतेल हे इच्छा. नायपॉल  कादंबऱयांमध्ये निःशब्द, स्थलांतरीत, नाळ तुटल्या पात्रांना बोलक केल तर प्रवासवर्णनात जणू स्वतः ची नाळ पुरायाला जन्मभर जागा शोधत फिरलेत. अनुभवांनी त्यांच्या शब्दांना धार आली तर स्वतः ला शोधण्याच्या कष्टप्रद प्रयत्नांनी त्यांच्या शब्दांना जडत्व प्राप्त झाले. वडिलांनी ठेवलेल्या विद्याप्रसाद नावाचे सार्थक करीत या सरस्वतीपुत्राने इहलोकाचा प्रवास ११ ऑगस्ट, २०१८ ला संपविला.

नायपॉल यांना इंग्रजी भाषेत उपलब्ध सगळी पारितोषिके मिळालीत, इंग्लंड च्या राणी कडून 'सर' ही पदवी प्राप्त झाली पण हे सगळे मान-सन्मान केवळ नोंदी पुरते. त्यांनी शब्दांकित केलेले जग त्यांनी आपल्याला दिलेला खरा वारसा आणि त्यांचे शब्द पुढे नवीन वाचकांच्या द्वारे त्यांच्या विचारांचा प्रवास अखंड चालू ठेवतील हे त्यांचे खरे यश.

7/21/11

माझा भारत - भ्रष्ट भारत

शासन म्हणल की भ्रष्टाचार येणारच. भ्रष्टाचार म्हणजे प्रशासन व्यवस्थेची सावली आहे. कितीही प्रखर प्रकाशात उभ केल तरी निदान प्रशासन व्यवस्थेच्या आकाराची सावली पडणारच. पण भारतात गंगा सध्या उल्टी वहाते आहे. प्रशासनावर प्रकाशच कोणीही टाकत नाही. सगळीकडे नुसता अंधार पसरला आहे. भारतात प्रशासन व्यवस्था तशीही कधीच भक्कम नव्हती पण आता तर प्रशासन म्हणजे पोतभरुन पैसा खायच साधन झाल आहे. सन १९८९ साली राजीव गांधी सरकार बोफोर्स प्रकरणात फसल होत. त्या घोटाळ्याची किंमत त्या काळात ६९ करोड रुपये होती. गेल्या वीस वर्षात पैश्याची किंमत झपाट्याने पडली आहे पण सन २०११ च्या जानेवारीत मध्य प्रदेशच्या कलेक्टर दर्जाच्या अधिकार्यावर धाड घातली तर पोलिस सूत्रांन्वये त्या अधिकार्याकडे जवळपास ३५० करोड च्या वर मालमत्ता असण्याची शक्यता आहे.

३५० करोड? च्याआयची तर! एका उच्च पदावरच्या बाबु कडे एवढा काळा पैसा असेल तर केंद्रिय सरकार मधल्या गुळाच्या गणपतींच काय?

खरं सांगायच तर भ्रष्टाचार काही भारताची खासगी मालमत्ता नाही. जगातल्या सगळ्याच देशात कमी-जास्त प्रमाणात भ्रष्टाचार असतोच. भारताहुन भ्रष्ट देशही बरेच आहेत. सध्या मी ज्या देशाचा रहिवासी आहे ते अति-प्रगत राष्ट्र आहे पण तिथेही भ्रष्टाचार आहेच. फरक एवढाच की भ्रष्टाचाराची झळ सामान्य माणसाला त्याच्या जीवनात पोचत नाही. भारतात मात्र भ्रष्टाचाराची शिटं प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दररोज उडतात.

आज भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचे अंग या घाणीने बरबरटलेल आहे. तुम्ही गाडीचे चालविण्याचा परवाना घ्यायला गेला आहात का? कर भरले आहेत का? घर बांधल किंवा विकत घेतल आहेत का? पाण्याच बिल भरल आहेत का? कुठल्याही तर्‍हेचा धंदा टाकला आहेत का? परेदेशागमन केल आहेत का?या यत्कश्चित गोष्टींपैकी एकही गोष्ट तुम्ही केली असेल तर तुम्ही एकतर लाच दिली असणार किंवा घेतली असणार.भारतात १०० करोड लोकांनी कधीना कधी लाच दिली आणि देतात ही लज्जास्पद बाब आहे. भारतातल्या प्रत्येक व्यक्तीकडे भ्रष्टाचारावर सांगायला वैयक्तीक उदाहरण असेल. सगळ्यांना याची झळ लागली आहे आणि लागते आहे. रेल्वे स्टेशच्या चपराश्यापासुन पंतप्रधाना पर्यंत सगळेच मन लाउन पैसे खातात. इतक्या सचोटीने लोकांनी मतदानाचा वापर केला किंवा स्वच्छता पाळली तर भारत एक यशस्वी प्रजातंत्र होईल आणि फिरण्याजोगा देश होईल. पण शोकांतिका अशी की आपल्या देशात इमानदारीने एकच काम होत - पैसे खाण्याच.

पण भ्रष्टाचाराची ही एक बाजु झाली. म्हणजे पैसे खाण्याचा हा खेळ बाबु लोकांचा आहे. आता नेते नावाच्या ढेकणांचा कारभार बघुया. तुमच्या घरासमोरचे रस्ते अत्यंत निम्न दर्ज्याचे आहेत का? आजुबाजुच्या परिसरात घाण आहे का? तुमच्या घरी वीज आणि पाणी पाहुण्यांसारखे येतात का? घरामागची नाली उघडीच वहाते आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर हो असतील तर तुम्ही निवडुन दिलेल्या प्रतिनिधी ने (थोडक्यात नेत्याने) पैसे खाल्ले आहेत. तुमचा नगरसेवकाला स्वच्छतेसाठी आणि प्रगतीसाठी सरकार कडुन जो पैसा वार्षिक मिळतो तो जणु मंदीरातल्या प्रसादा सारखा ही लोक मटकावुन टाकतात. तुमच्या परिसराच्या आमदार हेच करतो आणि खासदारही हेच करतो. काम कोणीच करत नाही. नुसतेच पैसे खातात. आणि जे काही थोड बहुत काम होत ते अत्यंत निम्न दर्जाचा असत. प्रत्येक नगरसेवकाला दरवर्षी वीस लाख रुपये त्याचा वार्ड स्वच्छ ठेवायला मिळतात. आमदाराला किती मिळतात मला माहिती नाही पण तो राज्यस्तरीय असल्यामुळे त्याला त्याच्या विभागासाठी वीस लाखाहुन अधिकच मिळत असणार. खासदाराला लोकसभेच्या राष्ट्रीय पातळीवर असल्यामुळे जवळपास एक कोटी मिळतात.(चढत्या क्रमानुसार आमदाराचा विभाग नगरसेवका पेक्षा मोठाअसतो) थोडक्यात दरवर्षी तुमच्या वार्डात आणि आजुबाजुच्या वार्डात दरवर्षी जवळपास दोन कोटींची काम व्हायला हवीत. कितीही महागाई झाली तरी दोन कोटी आकडा फार मोठा आहे. सगळी आवश्यक काम एका वर्षात होण शक्य नसली तरी पाच वर्षाच्या (निवडणुका दर पाच वर्षांनी होतात हे मी गृहीत धरतो आहे) बरीचशी काम व्हायला हरकत नाही. पण फार कमी काम होतात.

वर मांडलेला प्रकार अत्यंत सामान्य पातळीवरचा आहे. राज्य स्तरावर आणि केंद्र स्तरावर देशाच्या प्रगतीच्या नावा अंतर्गत निवडुन आलेल्या सरकारने जो मोघली कारभार मांडला आहे त्याचा विचार करुन मन भ्रमित होत. त्या बद्दल इथे बोलण्यात मी वेळ घालविणार नाही. तुम्ही वृत्तपत्र वाचतच असणार.

मी या नेत्यांना ढेकुण म्हटल खर पण आजच्या नेत्यांसमोर तर ढेकणही लाजतील कारण पोट भरल की ढेकण रक्त चुसण थांबवतात.

भ्रष्टाचारात लाच देणारा भ्रष्ट की घेणारा? भ्रष्टाचार दोन हातानी होतो. देणारा आणि घेणारा. मग यात चूक नेमकी कोणाची? हा प्रश्न तत्त्वज्ञान्यां समोर ठेवला तर त्या प्रश्नाचा उहपोह करण्यात केस पांढरे होतील. आणि त्या दरम्यान तुम्ही लाच देउन मोकळे व्हाल. एखाद काम सरळ मार्गे करायला एक महिना लागत असेल आणि लाच दिली नाही म्हणुन तेच काम पूर्ण व्हायला तीन महिने लागत असतील तर कोण लाच देणार नाही?

भ्रष्टाचारा बद्दल बोलायला लागल्यावर संभाषण नेमक या ठिकाणी भरकटत. लाच देणार भ्रष्ट असतो हे अगदी मान्य पण या विवादाची भारताच्या सध्य परिस्थितीशी सांगड जुळत नाही. भ्रष्टाचाराच्या निदान तात्त्विक चर्चा करुन मिळणार नाही. भ्रष्टाचार जरी आज कर्करोगा सारखा पसरला असला तरी तो असाध्य नाही. सर्व सामान्य जनतेने इमानदारीने रहाव आणि मुलांवर चांगले संस्कार व्हावेत इत्यादी बडबड मान्य पण भ्रष्टाचारावरच निदान फारस सोप आहे.

भारतात लाच देण्याच प्रमाण गेल्या ३० वर्षात प्रचंड वाढल. इंदिरा गांधी सरकारच्या काळात भ्रष्टाचार आवश्यक आचार झाला. या रोगाची लागण नेते नावाच्या उंदरांना आधी झाली. त्यांनी ती लागण बाबु नावाच्या डुकरांना केली आणि त्यामुळे सामान्य जनतेच्या जांघांमधे गुठळ्या आल्यात.

१९८० च्या आधी भ्रष्टाचार नव्हता अश्यातला भाग नाही. पण सध्या ज्या पातळीवर भ्रष्टाचार चालतो त्याची तुलना मुघली किंवा तत्सम सुलतानी काराभाराशीच होउ शकते. राज्यकर्ते आणि प्रशासक भ्रष्टच असतात हा जणु नियम आहे. कोणी मंत्री म्हणत असेल की तो भ्रष्ट नाही तर त्याला लोक वेड्यात काढतील. मंत्री आणि त्यांचे संत्री व्हायला भ्रष्ट असणे ही किमान अट असते. तेवढीच अट असते. तुम्ही पैसे खात नसाल किंवा खाउ देत नसाल तर तुमच जीण हराम होत.

मग काय भ्रष्टाचार अचानक वाढला कारण भ्रष्ट लोकांची संख्या अचानक वाढली? तीस वर्षात जन्मलेली मुल भ्रष्ट जन्मलीत? की तीस वर्षापूर्वी तरूण असलेली मंडळी भ्रष्ट म्हातारी झाली? अस काही मी बोललो तर माझा मेंदु भ्रष्ट झाल्याची शंका वाचकांना यायची. मला अस वाटत की समाजात चांगल्या आणि वाईट लोकांची टक्केवारी साधारण तेवढीच असते. थोडक्यात तीस वर्षापूर्वी जेवढी नेक लोक होती तेवढीच आजही आहे. मग भ्रष्टाचार एवढा कसा वाढला?

त्यामागच कारण फार सोप आहे.

चोर्‍या वाढल्यात तर त्याच कारण चोरांना पकडायला कोणी नाही हे आहे. चोरांची संख्या वाढली, चोर्‍या करण्याला पर्याय नाही इत्यादी गोष्टी पुढल्या. आजच्या घटकेला भ्रष्ट नेते मंडळी आणि बाबुंपासुन ते चौकातला दिवा न जुमानता वेगाने जाण्यार्‍या बाईक वाल्या पर्यंत कोणालाही पकडल्या जाण्याची भीती नाही. त्यांना शिक्षा करणार कोणी नाही.

मांजर नसल्यावरच उंदर माजतात.

आज पोलिस आणि न्याय-संस्था नावाचा वेश्या व्यवसाय भारतात चालतो. जनतेच्या अब्रुची रक्षा करायला नेमलेल्या या संस्थाच जनतेच्या अब्रुची लक्तर वेशीवर टांगतात. अर्थात पोलिसांना आणि न्यायाधिशांना शिव्या मारुन मोकळ होण सोप आहे. पण गोष्ट तेवढी सरळ साधी नाही.

भारतीय प्रशासन व्यवस्था ज्या तर्‍हेनी मांडलेली आहे त्यात अस समजा की ब्रिटिश जाउन त्या ऐवजी नेते मंडळी आली आहे. आणि बाबु मंडळीचा वापर ब्रिटिश राज्यकर्ते ज्या तर्‍हेनी भाराततुन पैसे लंपास करायला करत तसच आजची नेते मंडळी पैसे भारतातुन स्विस बँकेत पैसे न्यायला बाबु मंडळीचा वापर करते. प्रशासन व्यवस्था तर नेत्यांच्या अंतर्गत तर आहेच पण सध्याच्या यंत्रणेनुसार पोलिसांच खातही पूर्णपणे नेत्यांच्या पंज्याखाली येत. जर का मंत्री चोर असेल, आणि तो नेहमीच चोर असतो, तर त्याच्यावर कार्यवाही करायला पोलिसांना त्या किंव्या तत्सम मंत्र्याचीच परवानगी घ्यावी लागते. मी या परिस्थितीला उपमा द्यायचा बराच प्रयत्न केला. पण हि सरकारी यंत्रणा इतकी शंख, मूर्ख आणि भ्रष्ट आहे की त्यापुढे सगळ्या उपमा फिक्क्या ठरल्यात. कुंपणाने शेत खाल्याच याहुन ज्वलंत उदाहरण मिळणार नाही. जर का खुपच पैसे खाल्ले असतील आणि पुराव्यांचे मुडदे रस्त्यावरच लटकत असतील तर लाजे-गाजेस्तोवर त्या नेत्याला अटक करतात. ती केस पोलिसांच्याच हातात राहिली तर दोन महिने वाट बघुन नेत्याला जामिनीवर सोडुन देतात. ती केस न्यायालयात मग शिजत पडते पुढले २० वर्ष. जर का ती केस सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन ला दिली तर, तर काय होत महिती आहे?

काहीच होत नाही.

कारण त्या अधिकार्‍यांना नेमणारे नेतेच असतात. त्यांच्या बदल्या, त्यांचे पगार, त्यांची प्रमोशनं, सगळ सगळ नेतेच करतात. अश्या परिस्थितीत कोण बाबु नेत्यां विरुध्द काम करेल?

अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारीही नेते मंडळीच नेमते.

सेंट्रल विजिलन्स कमिशन चे अधिकारीही नेते मंडळीच नेमते.

थोडक्यात आज पोलिस यंत्रणा नेते मंडळीच चालवते. म्हणुनच ही डुकर बेताल होउन लांडगे बनुन हिंडतायत.


सध्या लोकपाल बिलाचा जो मुद्दा पेटलाय त्यात वर मांडलेल्या मुद्द्यांवर निदान आहे. आणि त्या लेखाच्या पुढील भागात आपण लोकपाल बिलाचा विचार करुया.

--

क्रमशः

4/26/10

तुर्की साम्राज्या बद्दल अजुन थोडं

लपांटोच्या युध्दाबद्दल लिहिण्याच्या प्रकल्पात तुर्की साम्राज्याबद्दल बरच वाचन झाल. त्यामुळे लपांटोच्या युध्दाचा दुसरा भाग लिहिण्याच्या आधी हा लहानसा लेख लिहिल्या शिवाय मला रहावत नाही. तसदीबद्दल क्षमस्व. लपांटोच्या युध्दाबद्दलच्या लेख मालिकेतला हा व्यत्यय असला तरी त्या लेखांची लय तुटणार नाही याची मी काळजी घेण्याचा प्रयत्न करीन.

तुर्की साम्राज्या महान आणि वैभवशाली होत यात वाद नाही. जगाच्या ज्ञात इतिहासात होउन गेलेल्या राजघराण्यांच्या आणि साम्राज्यांच्या स्पर्धेत तुर्की साम्राज्याचा क्रमांक बराच वरचा लागेल. गंमतीची बाब अशी की हि तुर्की लोक मुळात मध्य आशियातील होती आणि त्यांनी राज्य मात्र अनातोलिया आणि अंकारा भागात प्रस्थापित केल. एकाच कुटुंबाने ६ शतके राज्य करणे हि सुध्दा काही छोटी गोष्ट नव्हे. सतराव्या शतकाते सुल्तान बर्‍याचश्या प्रमाणात शंख असले तरी पहिले तीनशे वर्ष या कुटुंबाने एकाहुन एक सरस असे सेनानी आणि राज्यकर्ते निर्माण केलेत. याच काळात या साम्राज्याची प्रचंड भरभराटा झाली आणि साधारण मानल्या जाणार्‍या आमिर या पदवी पासुन त्यांनी स्वतःला इस्लामी जगताचा खलिफा घोषित केल. अर्थात इतर मुसलमानी सत्ताधिशां साठी एक उदाहरण मांडीत प्रचंड प्रमाणावर विध्वंस केला. या लेखात मी दोन मुद्दे वाचकांसमोर मांडणार आहे. पहिला म्हणजे तुर्की राज्यकर्त्यांची रक्तपिपासु वृत्ती आणि दुसरा, तुर्की इतिहासाच्या झोतात मराठी साम्राज्याचा संक्षिप्तात आढावा.

उत्तर भारतात जसा मुसलमानी आक्रमकांनी नाश केला तसला विध्वंस तुर्कांनी पूर्व युरोपातही मांडला. प्रचंड सैन्य उभे करुन यांनी युरोपावर सतत चढाया केल्यात. अतोनात प्राणहानी केली आणि प्रचंड प्रमाणावर गुलामांचा व्यापार केला. पूर्व युरोपातील सुंदर बायकांना आपल्या हारेम मधे दाखल करण आणि सुदृढ पोरांना गुलाम म्हणुन विकल. भारतात मुसलमानी आक्रमकांनी अत्याचार केलेत की नाही यावर वाद घालणार्‍या इतिहासाचार्यांनी तुर्की इतिहास वाचावा. पहिल्या तीनशे वर्षात एक ते दिड लाख सैन्य घेउन त्यांनी इतकाल्या चढाया केल्यात की एवढी लोक त्यांना मिळत कुठुन होती हा प्रश्न मनात येतो. त्यांच्या युध्द पध्दतीचा एक महत्त्वाचा अंग म्हणजे दरोडेखोर आणि भाडोत्री सैनिक होय. ही लोक सगळ्यात पहिले हल्ला करित असत आणि मग त्यांच्या नंतर खर्‍या सैन्याचा पुर फुटत असे. तसेच तुर्कांकडे त्या काळातील प्रगत तोफा होत्या. आणि कुठलाही किल्ला किंवा शहर काबिज केल्यावर ते लुटायला सैनिकांना मुभा होती. ही लुट इतकी महत्त्वाची होती कि सन १५१० च्या दशकात इजिप्तच्या स्वारीत तुर्की सैन्य नाखुश होत कारण इजिप्त मुसलमानी प्रांत असल्यामुळे तो लुटायची संमती सैनिकांना नव्हती. तसच सोळाव्या दशका नंतर ही लुट मिळण कमी होत गेल आणि त्यामुळे बरेच उठाव झालेत.

तुर्की सुल्तान हे खास करुन खुनशी होते हे तर सहाजिकच झाल. सन १४१२ ते १४२० ची कारागिर्द असलेला सलिम पहिला हा त्यांच्यातला हिरा होता. त्याने इतक्या वजिरांना मारल की तुर्कीत की कोणाला शिवी द्यायची तर त्याला सलिम चा वजिर हो अस म्हणत असत. कत्तली करण्याचा त्याला जणु छंद होता. पण स्वतःच्याच लोकांना तो स्वतःच्या डोळ्यासमोर मारायचा. त्याचे अंगरक्षक यासाठी प्रसिध्द होते. सलिम ने हुकुम दिला की त्या वजिराला किंवा अधिकार्‍याचा तिथल्या तिथेच शिरच्छेद केल्या जात असे. सुलेमान ज्याला द मॅग्निफिसंट ही पदवी लोकांनी दिली तो त्यातल्या त्यात बरा होता. त्याने फार कमी कत्तली केल्यात. तरी त्याच्या नेसलेल्या कपड्यांना त्याच्याचा नोकराचा स्पर्श झाला म्हणुन त्याने त्या नोकराला फासावर चढवल. पण या घराण्याचा शिसारी येणारा प्रकार म्हणजे गादी मिळवायला भावंडांची कत्तल करणे होता.

औरंगझेबाने आपल्या भावंडाना मारुन गादी मिळवली यासाठी तो कुप्रसिध्द आहे. (अजुन बर्‍याच कारणांसाठी तो कुप्रसिध्द आहे. पण त्यातल हे एक!) पण तुर्की राजघराण्यात तर ती मानलेली प्रथा होती. पहिले दोन-तीन सुल्तान वगळाता पुढल्या सगळ्यांनी भावंडांच्या रक्ताने माखलेल्या पायांनी राज्यारोहण केले. नुसती भावंड नाही तर त्यांची मुल, त्यांचे जावई सगळ्यांना ओळीनी मारल्या जात असे. एका सुल्तानाच्या भावाला आणि त्याच्या मुलाला मारतांना हा सुल्तान त्यांच्या किंचाळ्या ऐकायला बाजुच्या खोलीत मुद्दाम येउन बसला. आणि त्यांना मारायला उशीर होउ लागला तर त्याला फार राग आला.

सतराव्या शतकानंतर भावंडांना मारण्या ऐवजी त्यांना जन्मभर एखाद्या दुरच्या गावातल्या महालात बंदिस्त करुन ठेवत असत. नुसत भावंडांनाच नाही तर आपल्या मुलांनी उठाव करु नये म्हणुनन त्यांनाही असच महालात बंदिस्त करुन ठेवल्या जात असे. साम्राज्याच्या आरंभीचे सुल्तान त्यांच्या मुलांना वेग-वेगळ्या प्रांतांचे सुभेदार म्हणुन नेमत असत. त्यामुळे त्यांना राज्यकारभाराचा अनुभव मिळत असे. तसच त्यांना नविन प्रांत पादाक्रांत करण्यास प्रोत्साहन दिल्या जात असे. त्या अन्वये त्यांचे युध्द कौशल्य दिसे तसेच सैन्याला त्यांची ओळख होई. पण हे सगळ सतराव्या शतका नंतर बंद झाल्यामुळे पुढी सगळे सुल्तान नालायक निघालेत. आणि जरी साम्राज्य पुढे अजुन तीन शतके तगल तरी राज्याची वाढ खुंटलेली होती आणि बहुतांश युध्दे स्थित भाग टिकवण्यासाठीच घडली.


एकाच कुटुंबातील वंशजांनी सहा शतके राज्य केलं असल अजुन कुठलही उदाहरण माझ्या ध्यानात नाही. राज्य विखरुन जातात, परकीय आक्रमणांच्या झंझावात उडुन जातात किंवा अंतर्गत उठाव होउन नाश पावतात. तुर्की राजघराण मात्र लवाच्या पात्यासारख तगुन राहिल. बायझाच दुसर्‍याला तैमुरलंग ने कैद केल्यानंतर या राज घराण्यात पहिला वितुष्ट निर्माण झाल. पण त्याचा शेवट म्हणजे त्याच घराण्यातील वंशजाला सुल्तान म्हणुन नेमण्यात आले. पुढे सतराव्य शतकात नंतर ठराविक अंतरांवर उठाव होत गेलेत. या उठावांपैकी बरेचशे उठाव तुर्की सैन्याच्या जानिसारी नावाने ओळखल्या जाणार्‍या अति-विशिष्ट विभागाने केलेत. यात बर्‍याचश्या सुल्तांनाना मारुन टाकल पण ये-रे माझ्या मागल्या सारख त्याच घराण्यातील अजुन कोणाला तरी सुल्तान नेमण्यात आल. गंमतच वाटते हे सगळ वाचायला.

यांच्या इतिहासातील पहिली तीनशे वर्षांचा उल्लेख मी अनेकदा केला आहे. एका मागोमाग असे धुरंधर गादीवर आलेत आणि तिथेच मला मराठी राजघराणी मला कम नशिबी वाटतात. छत्रपतींच्या कुटुंबातील म्हणा किंवा पुढे पेशव्यांच्या घरातील म्हणा पण कुठल्याच थोराने वयाची पन्नाशी ओलांडाली नाही. छत्रपती पन्नासचे होते किंव्हा सत्तेचाळ, तुम्ही कुठल्या जन्मवर्षावर विश्वास ठेवाल त्यावर ते अवलंबुन आहे. संभाजीराजे बत्तीस. राजाराम राजे तीस. या घराण्यातला अपवाद म्हणजे छत्रपती शाहु महाराज. त्यांनी खर्‍या दृष्टीने राज्य भोगल. ते मुत्सद्दी होते पण लढवय्ये नव्हते आणि त्यांनी साठी ओलांडली. पेशव्यांच्या घराण्यात तर अजुन दुर्दशा होती. थोरले बाजीराव चाळीस, नानासाहेब चाळीस, चिमाजी अप्पा चाळीस, सदाशिवराव भाउ तीस, विश्वास राव सतरा किंवा अठरा आणि माधवराव सत्तावीस. या घराण्यातला अपवाद म्हणजे राघोबा दादा पण त्यांच्या तलवारीत कुठलीच कसर नसली तरी बाकी भानगडींनी मराठा घराण्याच फार नुकसान झाल. महत्वाच्या सरदार घराण्यांमधे ही बघितल तर चित्र थोडं बर आहे. महादजी शिंदे आणि मल्हार राव होळकरांची कारागिर्द बराच काळ होती. पण या सगळ्यांची तुलना तुर्की साम्राज्याच्या पहिल्या तीनशे वर्षात प्रत्येक सुल्तानाचा अंमल अठ्ठावीस वर्ष होता. इथे आपल्या थोरा-मोठ्यांची आयुष्य प्रत्येकी पस्तीस असेल आणि तिथे त्यांच्या कारागिर्दी अठ्ठाविस वर्ष होता. सुलेमान दुसरा तर सन १५२० ते १५६६ गादीवर होता.

इतकाली वर्ष आयुष्य आणि राज्य मराठी घराण्याला लाभली असती तर आज भारताचा नक्षाच वेगळा असता. छत्रपतींचाच विचार केला तर अजुन दहा वर्ष आयुष्य म्हणजे कितीतरी कामगिर्‍या यशस्वी झाल्या असत्या. मराठी इतिहासात छत्रपतींचा खरा वारस म्हणजे थोरले बाजीराव मानायला हवेत पण त्यांनी विसाव्या वर्षी राज्य छातीवर घेतले आणि चाळीशीला श्वास सोडला. ही दोन व्यक्तीमत्व जन्मभर नुसती धावत होती. सतत, अविरत. आणि काही कमी असेल तर गृहकलह. म्हणुनच बहुधा त्यांची हृदय थकुन गेलीत. गेल्या हजार वर्षातील भीषण आणि रक्तरंजित भारतावर पसरलेल्या रात्रीत मराठी साम्राज्य म्हणजे प्रखर स्वप्न होत. आणि छत्रपतींपासुन ते सदाशिवराव भाऊ पर्यंतचे सेनानी जणु विजेसारखे लखलख करुन गेलेत. सुर्यासारख तळपायला वेळ मात्र विधिलिखित नव्हता हे दुर्दैव.

मागल्या लेखात छत्रपतींच्या बोलण्यात यवन-तुर्क असा उल्लेख आल्याच मी लिहिले होते. मला प्रश्न असा पडायचा की तुर्की सुल्तानांनी भारतावर कधीच आक्रमण केले नाही तर त्यांच्या बद्दल राजे कस काय बोलत होते. त्याच्या मागे दोन कारण असावीत. एक अस की तुर्की साम्राज्याची ख्याती भारतापर्यंत पोचणे सहाजिकच होते. आणि ही सुल्तान स्वतःला मुसलमानी लोकांचे खलिफा मानित असल्यामुळे सगळ्या मुसलमानी आक्रमणांना राजांनी तुर्की शब्दाने संबोधिले असावे. किंवा दुसर म्हणजे मध्य आशियातुन भारतावर मोठ्या प्रमाणावर आक्रमण झालीत. तैमुर लंग पासुन ते बाबर पर्यंतचे सगळी रक्तपिपासु लोक मध्य आशियातुनच भारतावर कोसळलीत आणि मागल्या लेखा म्हटल्या प्रमाणे तुर्की लोकांची मूळ भुमी मध्य आशियाच मानल्या जातो. त्यामुळे राजे त्या आक्रमकांना तुर्क म्हणत असावेत. आता यवन कुठुन आलेत हे मात्र मला माहिती नाही. कारण अलेक्स्झंडर नंतर भारतावर (किंवा त्याच्या आधी कधीही) कुठल्याही यवनाने (ग्रीक) आक्रमण केल नाही. हे यवन म्हणजे राजांना पर्शियन तर अभिप्रेत नव्हेत?

4/1/10

लपांटोचे युध्द

तुर्कीसाम्राज्याचे नौदल आणि एकत्रित युरोपच्या नौदलात भीषण युध्द मेडिटेरियनच्या समुद्रात सन १५७१ ला लपांटो च्या जवळ झाले. लंपाटो म्हणजे मेडिटेरिनियन (युरोप आणि तुर्की यांच्या मधे स्थित) समुद्रातील खाडी आहे.

या युद्ध्दातील मुख्य पात्रे म्हणजे त्या वेळेसचा तुर्की सम्राट सलीम॥ (या राजघराण्यात बरीच सलीम झालेत. या सलीम ॥ चा आजोबा म्हणजे सलीम ।), त्याचा प्रमुख वजीर सोक्कुल्लु, नौदलाचा सेनापती, कारा मुस्तफा, पियाल मुस्तफा आणि युरोपिय लोकांमधे पोप पायस, स्पेन चा राजा चार्लस आणि डॉन जॉन ऑफ ऑस्ट्रीया हे आहेत.

लपांटोच्या युध्दाचा वर-वर बघता भारताशी काही सुध्दा संबंध नाही. पण भारताच्या शोधात ख्रिस्ती आणि मुसलमानी सत्तांमधील वैमनस्याचे महत्त्व कमी होत गेले आणि या युद्धातील विजयाने युरोपिय सत्तांचा व्यक्तीमत्वात आमुलाग्र बदल झाला. आपण तुर्की साम्राज्याला इतका जबरदस्त तडाखा देउ शकतो तर जगातील इतर कोणालाही पराजित करु शकतो या आत्मविश्वासाने या युरोपियलोकांनी जगावर बेधडकjavascript:void(0) आक्रमण केले. भारतावर पकड जमवायला त्यांना जरी अजुन ३०० वर्ष लागणार होती तरी त्या दरम्यान त्यांनी उत्तर आणि दक्षिण अमेरिकन खंड, दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया नेहमीसाठी गिळंकृत केल.

लेखाच्या पहिल्या भागात आपण तुर्की साम्राज्याबद्दल माहिती करणे आवश्यक आहे. मुसलमानी सत्ताकेंद्रां पैकी, हारुन अल रशिद च्या बगदाद (तो बगदाद चा खलिफा होता) केंद्रा व्यतिरिक्त, तुर्की साम्राज्याच्या इस्तंबुल केंद्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. अरब नसलेले पण स्वतःला सर्व मुसलमानी लोकांचे राज्यकर्ते मानणारे हे पहिले राज्यकर्ते होते. पण इतर मुसलमानी राज्याधिशांच्या तुलनेत हे सर्वाधिक यशस्वी ठरले. यांच्या आक्रमणाचा मुख्य लक्ष्य युरोप होते. कर्डोबा, स्पेन मधुन मूर लोकांना १३ शतकात हाकलुन दिल्या पासुन (मूर हे स्पेन चे मुसलमानी सत्ताधिश होते. जवळ जवळ ५ शतके आयबेरियन प्रांत यांच्या अधीपत्त्याखाली होता. या काळात संपूर्ण स्पेन आणि पोर्तुगाल मुसलमान होत.) युरोपच्या भूमीवर राज्य प्रस्थापित करण्याची खटाटोप या तूर्की लोकांनी जवळ जवळ दोन शतके केलीत. यात ते बर्‍याचश्या प्रमाणात यशस्वी ठरले. तुर्की साम्राज्या शिखरावर असतांना युरोप खंडातील ग्रीस, बल्गेरिया, बरचस हंगेरी, बोस्निया भागावर तुर्की अंमल होता. आणि तुर्की साम्राज्याची राजधानी इस्तंबुल या शहराचे मूळ नाव कॉन्स्टंटीनोपोल होते. व स्वतःला ख्रिश्चन धर्माचे पालनकर्ते म्हणवणार्‍या बायझेंटाईन साम्राज्याची ही राजधानी होती. तुर्कांनी सन १४५३ ला ही राजधानी जिंकुन, साम्राज्याला नेस्तनाभूत केल. तेंव्हापासुन रोम जिंकण्याची स्वप्न ही तुर्की लोक बघायला लागलेत. या मुसलमानी लोकांना जसा हिंदु लोकांचा द्वेष होता तसाच ख्रिश्चन लोकांचाही यांनी प्रचंड द्वेष होता. त्यामुळे रोम जिंकुन ख्रिश्चन धर्माच्या सर्वात पवित्र स्थळाला जमिनदोस्त केल म्हणजे मग इस्लामी हिरवा झेंडा सगळीकडे रोवला जाईल ही त्यांची मनिषा होती.

---

तुर्की साम्राज्या जवळपास ७ शतके टिकुन होत. इतकी शतके ब्रिटिशही टिकले नाहीत. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला उस्मान ने स्थापन केलेल्या लहानस राज्य पुढल्या दोन शतकात पश्चिमेस इजिप्त पासुन ते पूर्वेस इराण पर्यंत तर उत्तरेस बल्गेरिया, सर्बिया ते दक्षिणेस सिरिया आणि अरब वाळवंटापर्यंत पसरत गेले. छत्रपतींच्या बोलण्यात यवन-तूर्क अस उल्लेख आल्याच आढळत पण माझ्या माहिती नुसार कोणी तूर्की भारतात कधी आले नाहीत. (त्यांच नेमक तेच चुकल. पण ते पुढे)
तुर्की सम्राट स्वतःला खलिफा म्हणवुन घेत असत. मध्यंतरी ते स्वतःला रोमन साम्राज्याचे वंशज मानु लागलेत आणि स्वतःला कैसार (सिझर) म्हणवुन घेऊ लागलेत. १९२२ ला ब्रिटिशांनी हे साम्राज्य मोडले पण १६ व्य शतकाच्या उत्तरार्धा पासुन साम्राज्याचे पसरणे थांबले होते आणि एकाहुन एक शूर लढवैय्ये आणि मुत्सद्दी पैदा करणारे या राजघराण्यातील वंशज शंख निघायला लागलेत.

तुर्की लोक इतिहासाच्या पटलावर १३ व्या शतकात उदयास आलेत. ते नेमके कुठले या बद्दल बराच वाद आहे. मध्य आशियातील एक टोळीने अनाटोलिया आणि आशिया मायनर म्हणजे सध्य स्थितीतील तुर्की भागात स्थलांतर केले. मंगोल लोकांनी घातलेल्या १२ व्या शतकातल्या विध्वंसा नंतर हा प्रदेश नमोहराम झालेला होता. अश्या परिस्थितीत या लोकांनी आपला जम बसविला. हळु हळु तुर्की टोळीचे बरे आमिर लोकांनी (जमिनदार) या भागात गर्दी करु लागले. ही लोक मुळात मुसलमान नसावित. पण अरब भागात वसल्यावर यांनी इस्लाम स्विकारला असावा. पण धर्म कुठलाही असला तरी ही लोक शूर होती यात काही वाद नाही. त्या काळात तलवारीला पाणी असल्याशिवाय गत्यंतर नव्हते. या टोळ्यां पैकी ओस्मान पहिला याने जमिनदारी मिळवुन तुर्की साम्राज्याचा नारळ फोडला. अर्थात, त्यावेळेस त्याला आपण एका महान राजघराण्याचा पाया बांधतो आहोत अस काही वाटल नसणार. पण तो फार मुत्सद्दी होता यात वाद नाही. त्याने आजु-बाजुच्या भांडणांचा फायदा उठवित आपली जमिनदारी वाढवायला सुरुवात केली. त्या कालावधीत बरीच तूर्की टोळ्या लहान लहान जमिनदार्‍या चालवित होत्या. त्यांच्याशी भांडण घेण्या ऐवजी ओस्मान (त्याला इंग्रजी भाषेत ओथ्मान अस म्हणतात) त्याने आशिया मायनर मधल्या ख्रिस्ती लोकांशी भांडण घेतलीत आणि त्यांची जमिन घ्यायला लागला. पण तो स्वतःला सुल्तान म्हणवुन घेत नसे. तो फक्त "आमिर" होता. याला कारण दोन होती. एक म्हणजे, पहिले सांगितल्या प्रमाणे, आजुबाजुल बरीच तूर्की जमिनदार्‍या होत्या आणि स्वतःला सुल्तान म्हणवुन घेणं म्हणजे त्यांच्या शेपटीवर पाय देणे होते. आणि दुसर म्हणजे अविश्रांतपणे जरी ओस्मान पहिला, याने राज्य वाढविले असले तरी साम्राज्य म्हणवुन घेण्याजोगी त्याच्याकडे जमिन मुळीच नव्हती. पण अखंड राज्यविस्ताराचा पायंडा त्याने घातला आणि त्यामुळे तूर्की लोकांची पुढली तीनशे वर्ष प्रचंड भरभराट झाली.

या राजघराण्यातील सुल्तानांची अर्धी यादी मी पुढे देतो आहे. सुरुवातीपासुन ते लपांटोच्या युध्दा पर्यंतच्या सुल्तांनांचीच नावे यात आहेत.

१)ओस्मान पहिला ( १२९९-१३२४)

२) ऑर्खन (ऑराहन) पहिला (१३२४-१३६०)

३)मुराद पहिला ( १३६० - १३८९) याने स्वतःला सुल्तान घोषित केले.

४) बायझाद पहिला (१३८९-१४०२) हा तैमुरलंग च्या कैदेत मेला.

५) मेहमद पहिला (१४१३-१४२१)

६) मुराद दुसरा (१४२१-१४४४)

७) मेहमद दुसरा (१४४४-१४४६)

८) मुराद दुसरा (१४४६-१४५१) - मेहमद दुसरा हा याचाच मुलगा. दोघ जण जणु आट्या-पाट्या खेळत होते!

९) मेहमद दुसरा (१४४६-१४८१) - याने कॉन्स्टंटिनोपोल (सध्याचे इंस्तबुल) जिंकले आणि तेंव्हापासुन ते शहर तूर्कीची राजधानी आहे.

१०) बायझाद दुसरा (१४८१ - १५१२)

११) सलिम पहिला ( १५१२ - १५२०)

१२) सुलेमान पहिला (१५२०- १५६६) हा तूर्की साम्राज्याचा सगळ्यात नावाजलेला सुल्तान मानावा लागेल.

१३) सलिम दुसरा (१५६६-१५७६) याच्या कारागिर्दित लपांटोचे युध्द झाले.

या घराण्याचा पहिले पासुन उद्देश युरोप जिंकुन इस्लामी धर्माचा प्रसार करण्याचा होता. या मागे दोन कारणे असावीत.

1) स्पॅनिश भागातुन म्हणजे आयबेरिया प्रांतातुन मूर या मुसलमानी सत्तेने आठव्या शतकापासुन जवळ-जवळ पाचशे वर्ष राज्य केले. त्या काळात संपूर्ण स्पेन आणि पोर्तुगाल मुसलमान होता. पण १३ व्या शतकात ख्रिश्चनांनी मूर लोकांचा पराभव करुन तिथे परत ख्रिस्ती धर्माची स्थापना केली. तेंव्हापासुन युरोप खंडात मुसलमान धर्म नामशेष झाला. पण तेंव्हा युरोपची म्हणजे ख्रिस्ती धर्माची सीमा बायझेंटाईन साम्राज्य होती. आणि त्याची राजधानी कॉन्स्टंटीनोपोल होती. पोप चा त्या राज्याला पाठिंबा असल्यामुळे त्याला 'पवित्र' साम्राज्य मानल्या जात असे. तूर्की लोकांच्या प्रांत विस्ताराच्या वेळेस या बायझेंटाईन साम्राज्य खिळखिळ झालेल होत पण १४५३ ला त्या राज्या शेवटची घटका मोजली आणि कॉन्स्टंटीनोपोल चे इस्तंबुल झाले. त्या नंतर मात्र आपला पुढला मुक्काम रोम याची खुणगाठ तुर्की लोकांनी मनाशी बांधली आणि त्या साठी सतत युध्द केलीत. त्यांना पूर्व युरोपातुन पुढे जाता येईना म्हणुन त्यांनी समुद्री मार्गाने इटलीवर स्वारीचीही खटपट केली. याच भानगडीत लपांटोचे युध्द झाले.

2)आणि दुसर म्हणजे त्यांना टक्कर देणार युरोपिय भागात कोणी फारस मिळाल नाही. त्या मानाने पूर्वेला भारताकडे जाण्याच्या मार्गावर बरीच सुल्तान पडली होती . अजुन अस की भारत ११ व्या शतका नंतर मुसलमानी अंमलाखाली असल्यामुळे तो भाग लौकरच मुसलमान होणारच होता अस वाटण सहाजिक होत. त्या तुलनेत युरोप अजुनही धिम्मी होता. त्यामुळे त्यांनी संपूर्ण लक्ष युरोपाकडे केंद्रित केले आणि भारताकडे दुर्लक्ष केले.

हे झालं तुर्की साम्राज्याचा संक्षिप्तात आढावा. पुढल्या भागात युरोपिय सत्तांचा आणि पोपचा आढावा घेऊया.

(क्रमशः)

--------------------
खालील पुस्तकांतुन मी ही सगळी माहिती गोळा केली आहे.

Empire of the Sea - The siege of Malta, the battle of Lepanto and the contest for the center of the World by Roger Crowley

Empires of the Monsoon by Richard S. Hall

Turkish Empire - Its Growth and Decay by Lord Eversley