3/17/24

भाजप आणि श्री मोदी यांची तिसरी वारी

लोकसभा निवडणुकांचे वारे आता सोसाट्याने वाहायला लागले आहे. तारखा मागल्या आठवड्यात जाहीर झाल्यात पण तयारी मात्र सगळीकडे कधीचीच सुरु झालेली आहे. भाजप ने दोनशेच्या वर उमेदवारांची यादी जाहीर पण केली. काँग्रेसने सुद्धा ४०च्या आसपास उमेदवाऱ्या जाहीर केल्यात. हळू-हळू प्रादेशिक पक्ष आपले उमेदवार याद्या जाहीर करू लागल्या आहेत. गठ-बंधनाच्या बोलण्या सगळीकडे चालू आहेत. यातील काही, जसे भाजप व आंध्र प्रदेशचा प्रमुख विरोधी पक्ष तेलगू देसम पार्टी यांनी एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काँग्रेस आणि तामिळनाडूचा मुख्य पक्ष डीएमके याचे गठबंधंन पक्के झाले आहे. 

पण निवडणुका फक्त जागा-वाटप आणि गठबंधनांवर जिंकल्या जाऊ शकत नाहीं. राजकीय पक्षाला नवीन बाजू किंव्हा नवीन विचार लोकांसमोर मांडावा लागतो, ज्याचा विचार करून मतदार आपले मत देईल. विरोधी पक्ष हे भाजपच्या विचार-सरणीच्या विरोधात दिसत नाहीत. ना कुठला नवीन विचार, ना कुठली नवीन कल्पना. एक तर फुकटात गोष्टी वाटण्याची खोटी आश्वासने किंव्हा मोदी विरोधाचे रडगाणे. या विरोधी पक्षांचे नामकरण 'मोदी-विरोधी' दल असे करायला हवे.

जनता जनार्दन मात्र याकडे नक्कीच लक्ष देणार आणि त्याचे पडसाद जून मध्ये नक्कीच दिसणार. 

विरोधी पक्षांमध्ये किंव्हा त्यांच्या विचारांमध्ये जरी जंजाळ असले तरी भाजप आणि श्री मोदी यांनी एक राजकीय पक्ष म्हणून आणि एक सत्ताधारी पक्ष म्हणून देशा संबंधित प्रत्येक विषयावर, देशाला भेडसावणार्या प्रत्येक प्रश्नावर आणि देशाच्या भविष्याबद्दल  कणखर आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. भाजपच्या वैचारिक रणनीतीच्या काही मुख्य पैलूंचा आपण इथे विचार करू. 

विकास, विकास आणि विकास: भारताचा विकास हि जणू प्रतिज्ञा श्री मोदी यांनी घेतली आहे. आणि त्याचा पहिला टप्पा म्हणजे पायाभूत सुविधा. रस्ते, विमानतळे, रेल लाईन्स, सागरी बंदरे या सर्व क्षेत्रात अभूतपूर्व काम मोदी सरकारने केले. हि प्रगती भारत भर झालेली आहे. मुख्यतः उत्तर-पूर्व भारतात आणि जम्मू-काश्मीर भागात रेल लाईन्स चे काम झपाट्याने होते आहे. या व्यतिरिक्त उच्च शिक्षणाची तंत्रज्ञान, व्यवस्थापनशास्त्र आणि तसेच वैद्यकीय अशी अनेक कॉलेजेस सरकारने स्थापन केलीत. थोडक्यात, एक नवीन भारत बघता-बघता आपल्या डोळ्या समोर उभा राहतो आहे. 

येथे अजून एक लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे सरकारने भारतीय सेनेत अब्जावादी पैसे ओतला. यात परदेशातून अति प्रगत तंत्रज्ञान असलेली शस्त्रास्त्रे आणि विमाने आहेतच पण भारत सेने क्षेत्रात स्वतंत्र व्हावा या साठी मोदी सरकारने मजबूत पाया आणि पायंडा दोन्ही घातले आहे. 

सशक्त, प्रबळ आणि प्रगत हिंदुत्व: भाजप आणि त्या अन्वये श्री मोदी यांच्यावर केल्या गेलेली एक टीका किंव्हा आरोप असा कि पक्ष आणि पंतप्रधान हे हिंदुत्ववादी आहेत. आता यात काही नवल नाहीं आणि यात फारसे तथ्य पण नाहीं कारण पक्ष आणि श्री मोदी यांनी कधीच या गोष्टीचा नकार दिला नाहीं. पक्ष हिंदुत्वनिष्ठ म्हणूनच राजकारणात आला. पण हिंदुत्व म्हणजे मागासलेली विचार प्रणाली, हिंदुत्व म्हणजे नकारात्मक, स्त्री विरोधी, नवीन काळाचा आणि उद्याचा विरोध करणारी धर्मांध विचार प्रणाली अशी कल्पना भाजप विरोधी, हिंदुत्व विरोधी आणि डावे विचार सरणीच्या लोकांनी करून ठेवली आहे. आपण श्री मोदी यांच्या गेल्या दहा वर्षाच्या नीतींचा अभ्यास केला तर लक्षात येईल कि या प्रत्येक भ्रामक समजुतीला त्यांनी तडा दिला आहे. हिंदुत्वास नवीन वलय प्राप्त करणे आवश्यक होते. पण नारेबाजी किंव्हा वादाचे भोवरे तयार करून चालणार होते. हिंदुत्वाला सशक्त करायला हिंदूंना आर्थिक दृष्ट्या आणि विकासाच्या संधी उपलबद्ध करण्याची आवश्यकता होती. मोदी सरकारने याबाबतीत साधारण वाटणारी पण सामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल आणण्याची क्षमता असणारी ठोस पावले उचलावीत. उदाहरणार्थ, प्रत्येक घरात सिलेंडर पोचविणे, नळाद्वारे पाणी, प्रत्येक घरी शौचालायची सोय व्हावी म्हणून सरकारी अनुदान देणे इत्यादी अनेक योजना सरकारने यशस्वीरित्या राबविल्या. प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते उघडणे हि फार लहान बाब वाटते. पण यात दोन गोष्टी निष्पन्न झाल्यात. एक, कि तळा-गाळातील समाज घटक आर्थिक प्रणाली आणि त्यान्वये भारताच्या विकासाचे भागीदार झालेत, पण त्याहून आधीक या घटकांना एक नवीन ओळख प्राप्त झाली. याचा अजून एक मोठा परिणाम म्हणजे सरकार आता या जनतेपर्यंत थेट पोहचू शकते, मधल्या 'मिडल-मॅन' ची आवशक्यता नाहीशी झाली.  

श्री मोदी यांनी श्री बाबासाहेब आंबेडकरांना आत्मसात करून वंचित समाजासाठी त्यांच्या सशक्तीकरणासाठी अनेक योजना राबविल्यात. उदाहरणार्थ, पंतप्रधान मुद्रा योजने अंतर्गत वंचित समाजाच्या होतकरू तरुणांना धंद्यासाठी भांडवल उपलब्ध करण्यात आले. आरक्षण देणे किंव्हा श्री मोदी यांनी म्हंटले तसे फक्त 'रेवड्या' देणे हा विकास नव्हे. समाजाचा विकास म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत विकास आणि यातूनच आत्मविश्वास निर्माण होईल. स्व, स्व-राष्ट्र,स्व-धर्म या सगळ्या सामाजिक व्यक्तिमत्वाच्या अंगांचा पाय प्रत्येक व्यक्तीत रोवल्या जाईल. सरकारी यंत्रणा आणि उभारते तंत्रज्ञान याचा पुरेपूर उपयोग करून मोदी सरकारने सशक्त हिंदू समाज आणि हिंदुत्वाची घट्ट मुहूर्तमेढ केली आहे. 

राजकारण आणि चाणक्य नीती: भाजप आणि श्री मोदी सतत राजकीय खेळ्या खेळात असतात असा आरोप केला जातो.  राजकीय पक्ष किंव्हा राजकीय नेता राजकारण करणार यात काय नवल? सत्तेवर आल्यावर शांत बसून राज्य करणे आणि राजकारण हे पक्षावर सोडणे असल्या काहीतरी समजुतीत काँग्रेसेतर पक्ष असत. जी काँग्रेसेतर पक्ष केंद्रावर सत्तेवर आलीत ती दुसऱ्या वेळेस पुन्हा निवडून आली नाहीत. कारण काँग्रेस पक्ष कधीच राजकारण करणे सोडत नसत त्यामुळे सत्तेवर नसतील तरी काँग्रेस पक्ष सतत राजकीय खटपटी करीत. राजकीय पक्ष राजकारण करणारच आणि करायला हि हवं. पण राजकारण सत्तेसाठी आणि राजकारण देशासाठी यात बरेच अंतर आहे. सत्तापिपासू काँग्रेस सत्तेसाठी कुठल्याही थराला जायला धजत नसे. मग त्यात समाजाचे किंव्हा देशाचे नुकसान झाले तरी चालेल. कारण सत्ता हेच ध्येय होते देश नाहीं. श्री मोदी आणि भाजप या मुद्द्यावर इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळे उभे दिसतात. गेल्या दशकातील राजकारणाचे डाव बघता श्री मोदी आणि भाजप काही तरी ध्येय समोर ठेऊनच पावले उचलतांना दिसतात. काश्मीर मध्ये श्रीमती मुफ्ती यांच्या पक्षासोबत राज्यस्थापना केली तेंव्हा अनेक लोक चकितआणि नाराज झालेत. पण सन २०१९ जेंव्हा धारा ३७० नेहमीसाठी बरखास्त झाले तेंव्हा श्रीमती मुफ्ती यांच्या सोबतचे गठबंधं हि केवळ एक राजकीय खेळी होती हे लक्षात आली. या पाश्र्वभूमीवर श्री मोदी आणि भाजप सतत राजकारणाचे डाव-पेच लढत असतात. तिसऱ्यांदा सरकार निवडून येणे हि एक अभूतपुर्व घटना आहे आणि त्यासाठी भाजप आणि श्री मोदी प्रत्येक काळजी घेतांना दिसत आहेत. गेल्या महिन्याभरात त्यांनी आपली सगळी गठबंधना चाणाक्षपणे पक्की केलीत. 

खूप दशकांनंतर भारताला असा नेता आणि राजकीय पक्ष लाभला आहे जो ध्येयवादी आणि दूरदर्शी आहे. भारतात सध्या भाजप सोडले तर सगळे पक्ष हे प्रादेशिक कुप-मंडूक वृत्तीचे 'फ्यामिली बिझनेस' आहेत आणि हे उज्वल भविष्याचे द्योतक नाहीं. पण हे बदलायला या राजकीय डाव-पेच आवश्यक आहे. भाजप ला टक्कर द्यायची तरी आजच्या राजकीय पक्षांना त्यांचे स्वरूप बदलावे लागेल. नाहीं तर ते नामशेष होतील. येथे फक्त समाज आणि देशाचा विकास अपेक्षित नाही तर भारतीय राजकारणाचा विकास हे पण एक ध्येय आहे. 

श्री मोदी हे भारतीय राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय पटलावर आलेलं झंजावात आहे. या तिन्ही अंगांचा चेहरा-मोहरा बदलण्याची शक्ती श्री मोदींमध्ये आहे. आशा करू या भारतीय मतदार हे समजेल आणि हे बारकावे समजून आपले मत देईल. 

3/7/24

स्वानंद ची चक्कर

गल्लीच्या टोकाशी 8-9 वर्षाचा स्वानंद उभा होता. दुपारची दोन ची वेळ होती.आजुबाजूला शुकशुकाट होता. दुरून स्टेडियम जवळच्या रहदारीचा आवाज येत होता. पण गल्लीच्या टोकाशी फारस कोणी नव्हत. स्वानंद रिकामटेकडा  उभा होता. जवळच्या ग्राउंड वर कुंभार टोळीतली मुले फुलपाखरे पकडत होती. काट्याच्या काटक्यांनी फुलपाखरांना फटकारून खाली पाडत आणि मग प्लास्टिक च्या पिशव्यात ठेवत. ती अर्धमेली फुलपाखरे स्वानंद ला बघावायची नाहीत. त्याचे नेहमीचे मित्र दुपारी खेळायला येत नसत. त्यामुळे एकदा शाळेचे होमी-वर्क झाले कि बहुतांश दुपारी तो एकटाच हुंदडत असे. त्या काळात टी.-वी. वर पण  काहीच नसे.  'तो करे भी तो क्या करे?' स्वानंद ची आई त्यावेळेस घरी उगाच कट-कट नको म्हणून स्वानंदला बाहेर पाठवून देत असे. मग स्वानंद गल्लीच्या टोकाशी असलेल्या कट्ट्यावर बसे, कधी टायर छोट्या काठीने फिरवत, कधी गल्लीच्या दुसऱ्या टोकाशी असलेल्या गोठ्यातल्या बछड्याशी खेळत किंव्हा गायीच्या पोळ्याला खाजवीत वेळ काढीत असे. पण आता गायीचे बछडे हि मोठे झाले होते. खोंड झाला होता तो बछडा. मागल्या वेळेस चांगलीच जोरात ढुशी मारली त्या खोंडाने. त्याचे टायर हि कोणी तरी घेऊन गेलं होत. त्यामुळे नवीन काही तरी करायच्या शोधात स्वानंद होता. 

तेवढ्यात त्याच्याजवळ एक स्कूटर वाला आला. 

"इथे जोशी कुठे राहतात माहिती आहे का?"

"कुठले जोशी? तिसरी गल्ली कि सातवी गल्ली वाले?" स्वानंद ने विचारले. 

"माहिती नाहीं बा" 

स्वानंदच्या हातात छोटी काडी होती. न कळत स्कूटर च्या समोर च्या टायर वर तो काठीने हळूच टक-टक आवाज करीत होता. 

"एक काम करू या, तू माझ्या मागे बस. आधी तिसऱ्या गल्लीत जाऊ आणि ते जोशी नसतील तर सातव्या गल्लीतील जोश्यान कडे जाऊ या. माझ्या ओळखीतले जोशी मिळालेत कि मी तुला पुन्हा इथेच आणून सोडतो. तू याच गल्लीत राहतोस का?" स्कूटरवाल्याने विचारले. 

"हो, मी पहिल्या गल्लीत राहतो" स्वानंदने एकदम थाटात सांगितले. जणू पहिल्या गल्लीत राहणे म्हणजे काही मानाची गोष्ट होती. 

"चलतोस का मग?" 

स्वानंद विचार करू लागला. स्कूटरवाले काका तर सभ्य वाटत होते. तिसरी गल्ली आणि सातवी गल्ली अगदी जवळच होती. आणि स्कूटर वरून फिरायला हि मिळेल. 

"चला" असे म्हणत स्वानंद ने काडी फेकली आणि मागच्या सीट वर बसला. स्कूटर वाल्याने लगेच गियर टाकला आणि तिसऱ्या गल्लीच्या दिशेने निघाला. 

"आमच्या इथे दोन जोशी आहेत तसेच दोन देशपांडे पण आहेत. तिसऱ्या गल्लीत आणि सातव्या गल्लीत. त्यामुळे लोक त्यांना तिसरे जोशी किंव्हा सातवे देशपांडे म्हणूनच ओळखतात"

"हो का" स्कूटर वाल्याला पोराची बडबड ऐकून हसू येत होत. 

"मी पत्ता विचारतांना माहिती काढायला हवी होती कि तिसरे जोशी कि सातवे जोशी ते" तो म्हणाला. 

एवढा बोलतोवर दुसरी गल्ली कडे स्वानंद हात दाखवू लागला. पण तिसरे जोशी स्कूटर वाल्याच्या ओळखीचे नव्हते. मग स्कूटर वाल्याने पुन्हा स्कूटर ला किक मारली. 

"सातव्या गल्लीत कसे जायचे?" 

स्वानंद ने विचार केला कि पुढल्या मुख्य रस्त्याने गेलो तर दोन मिनिटात पोचू. त्याने मागच्या रस्त्याने जायचे ठरवले. कारण तिसऱ्या आणि सहाव्या गल्लीच्या मध्ये छोटे ग्राउंड होते. त्याला चक्कर मारून जावं लागत असे. म्हणजे अजून स्कूटर वरून फिरणं होईल. 

"असेच पुढे जाऊन डावीकडे वळू या"

स्कूटरवाल्याने तशी दिशा पकडली. 

"हे जे ग्राउंड आहे याला संघाचे ग्राउंड म्हणतो"

"हो का. पण असे का?"

"कारण इथे संध्याकाळी शाखा लागते संघाची"

"तू जातोस का दररोज?"

"हो, मी शिशु गणात आहे. काल तर मी अग्रेसर पण होतो"

स्कूटरवाल्याला अग्रेसर म्हणजे भानगड कळली नाहीं. 

"या ग्राउंड ला चक्कर मारा आणि मग सहावी गल्ली आणि मग सातवी" स्वानंद ने पुढली सूचना दिली. 

सातव्या गल्लीतले जोशी स्कूटर वाल्याचे जोशी निघालेत. स्वानंद उडी मारून स्कूटर वरून उतरला.

"थँक यु. काय नाव तुझं?" स्कूटर वाल्याने विचारले. 

"स्वानंद" 

"तुला पुन्हा सोडू का पहिल्या गल्लीशी ?" 

"नको नको, मी जाईन धावत. जवळच आहे" असा म्हणत उडया मारीत स्वानंदची स्वारी निघाली पण. 

पहिल्या गल्लीच्या टोकाशी पोचेतोवर त्याच्या डोक्यातली चक्र भिंगरी सारखी फिरायला लागली. मस्त आयडिया आहे हि. लोकांना पत्ते सांगायला मदत करायची, सोबत हिंडणं पण होईल. कोणाला कळणार पण नाहीं. काही दिवसांपूर्वीच त्याने रॉकेलवाल्या बैलगाडीवर हिंडण्याचा प्रताप केला होता. घरी पोचला तर घर भर रॉकेल चा वास. घरा मागे कडुलिंबाचे मोट्ठे झाड होते, एकदा लिंबोण्या पडायला छोटे छोटे दगड तो मारत उभा होता. गल्लीतून येणाऱ्या उपाध्याय आजींना नेमका लागला एक छोटासा गोटा. मग उगाच बोंबा-बोंब! नंतर एकदा घरासमोरून नित्यनेमाने जाणाऱ्या म्हशींवर बसला. त्या दिवशी त्याला दोन गोष्टी कळल्यात, एक कि म्हैस खूपच बेस्ट प्राणी आहे. गायी ढुश्या मारतात पण म्हैस एकदम लोड-लेस असते. दुसरं असे कि म्हैस चिखलात लोळते. म्हशीवरून 'चक्कर' मारून आल्यावर आई ने त्याला बाहेरच्या अंगणातच सगळ्यांसमोर आंघोळ घातली होती. 

इथे डबल-सीट वर हिंडण्यात असली कुठलीच भानगड नाहीं. 

एक नवीन उपक्रम स्वानंद ने सुरु केला. त्याच्या घरी याचा मुळीच पत्ता नव्हता आणि घरी यातील काही सांगायची गरज सुद्धा स्वानंद ला भासली नाहीं. फुल-प्रूफ प्लॅन!  

ज्या दुपारी वेळ मिळेल तेंव्हा स्वानंदची 'गाडी' गल्लीच्या टोकावर 'पार्क' असे, हिंडायला मिळेल या आशेने. 

मग एक दिवशी गम्मत झाली. चक्क एक कार येऊन थांबली त्याच्या जवळ. त्या काळात कार हा प्रकार तसा दुर्मिळ असे. स्वानंद जवळ एक फियाट येऊन थांबली. आधी स्वानंद ला कळले नाहीं कि फियाट का थांबली. त्याला वाटले कि तो कार च्या रस्त्यात येतोय. तो थोडा मागे सरकला. कार मध्ये एक काका-काकू समोर होते आणि एक आजी मागे बसल्या होत्या. काकूंची काच हळू हळू खालती सरकली. 

"हा समोर चा धंतोली पार्क आहे का?" तेंव्हा स्वानंद ला लक्षात आले कि हि  'हरवलेली' कार आहे. आता कार मधून चक्कर मारायला मिळते कि काय? या विचाराने तो हुरळला. 

"नाहीं, तुम्हाला कुठे जायचंय?" इतक्या दिवसात स्वानंद ने विचारायचे प्रश्न पक्के केले होते.

"धंतोली पार्क जवळ जावडेकर म्हणून रहातात. त्यांच्या कडे जायचे आहे" कार बोलली. 

"जावडेकर माहिती नाहीं पण धंतोली पार्क माहिती आहे. त्याचा पत्ता सांगू शकतो" 

"हा कुठला पार्क आहे समोर मग?"

"हे नुसताच क्रिकेट च ग्राउंड आहे. पार्क नाहीं. याला नाव नाहीं. आम्ही याला क्रिकेटच ग्राउंड असच म्हणतो" 

उत्तर ऐकून कार मधल्यांना गंमत वाटली. 

"बरं, मग धंतोली पार्क चा पत्ता सांगू शकतोस का?" 

"मी तुम्हाला तिथं पर्यंत घेऊन जाऊ शकतो." 

"अरे पण मग तू परत कसा येशील?"

"मी येईन पायी-पायी. जवळच आहे. मी जातो खूपदा खेळायला" आता खऱ्यात तो पार्कला एकटा कधीच गेला नव्हता. त्याच्या मोठ्या भावासोबत किंव्हा आजी-आजोबां सोबतच तो गेला होता. पण त्याच्या डोक्यात नकाशा पक्का होता - दुधाच्या दुकान समोरून चौकात, पुढे जाऊन उजवी कडे दयाल चे दुकान, मग थोड्या पुढे डावीकडे पोस्ट ऑफिस आणि त्याच्या पुढच्या छोट्या चौरस्त्याला उजवीकडे पार्क दिसेलच. 

पण भानगड इथेच सुरु झाली. आत्मविश्वास आणि त्याचे वय वर्ष ८ याची भेट या क्षणी झाली. 

स्वानंद मोठ्या ऐटीत कार मध्ये बसला. मागच्या सीट वरच्या आजींनी त्याला कौतुकाने जवळ घेतले. आता गाडी रिव्हर्स घेऊन मुख्य रस्त्याच्या दुधाच्या दुकान वरून घेण्या ऐवजी कारवाल्या काकांनी गल्लीतच गाडी घातली. 

"इथूनही सरळ पार्क लागेल असा वाटतंय?" त्यांनी विचारला आणि त्या विचारण्यात गाडीने वेगाने दोन गल्ल्या ओलांडल्या पण होत्या. इथे स्वानंदला जाम टेन्शन आलं कारण त्याच्या डोक्यातले होकायंत्र या भानगडीत पूर्णपणे गोंधळले होते. आता गाडी थांबवून माहिती असलेल्या रस्त्यावर कसे यायचे  याची मुळीच कल्पना त्याला नव्हती. एकच उपाय म्हणजे जिथे तो टाइम-पास करीत उभा होता तिथे परत जाणे. पण तसे सांगायला त्याला लाज वाटली. लहान वयात फारस काही कळत नसले तरी फजिती होण्याची भीती फार असते. मनुष्याला उपजतच असावी ती भीती. 

"कुठे वळायचं सांगशील बाळा?" कारवाले काका म्हणाले.  

"हो" स्वानंद कसा-बसा म्हणाला. 

"कितवीत आहेस स्वानंद तू?" आजींनी प्रेमाने विचारले

"तू असा कर मधून इतक्या दूर येतोस हे तुझ्या आई-बाबांना माहिती का रे?" समोरच्या सीट वर बसलेल्या काकू म्हणाल्या. 

इथे स्वानंद च टेन्शन वाढत होत. कोणी काही विचारलं नसत तर चाललं असत. मारुतीचे देऊळ पण मागे पडले. मारुती देवळासमोरून जातांना काकांनी कार हळू केली. रीतसर खिडकूतून त्याने नमस्कार केला. 

नेमका स्वानंद ला तिथे चिन्मय दिसला. चिन्मय चकित होऊन बघत होता कि स्वानंद एक तर कार मध्ये बसलाय आणि ते पण अनोळखी कार मध्ये बसलाय. 

"डब्या" त्याने हाक मारली. स्वानंद बडबड करण्यात वस्ताद होता म्हणून त्याचे मित्र त्याला प्रेमाने डब्बा म्हणत असत. 

स्वानंद ने कार च्या खिडकीतून बाहेर बघितलं. 

"कुठे चालला रे?" चिन्मय ने विचारलं. 

"धंतोली पार्क" 

"मग तिकडे कुठे?" पुढे काही तरी चिन्मय म्हणत होता आणि उजवीकडे हात दाखवत होता. स्वानंद ला वाटले कि ओरडून नेमकं कुठे ते विचारावा पण तो पर्यंत काकांनी  पुढचा गियर टाकून गाडीचा वेग धरला आणि दोन गल्ल्या अजून ओलांडल्यात. 

अजून एक छोटा चौरस्ता ओलांडून काकांनी गाडी हळू केली. "डावी कडे वाळू कि उजवीकडे बाळ?" काकांनी विचारला. त्यांना शंका यायला लागली होती कि या बावळूरामला रस्ता माहिती नाहीं.

"इथून अजून एक गल्ली सरळ जाऊ या. मग माझ्या लक्षात येईल. दिशा बरोबर आहे आपली"

"अहो, याला रस्ता माहिती आहे असं दिसत नाहीं या" काकू हळूच काकांना म्हणाल्यात. "याला पुन्हा सोडून यायचा का त्याच्या घरी? कोणाचा पोरग आहे माहिती नाहीं आणि आपण त्याला कार मध्ये घेऊन धंतोली पार्क शोधतोय!"

स्वानंदच इतका स्वच्छ बोलणं ऐकून आजी मात्र जाम खुश होत होत्या. त्यांनी त्याला अजून जवळ घट्ट घेतले. "फारच गोड आहेस रे तू? नाव सांगितलं नाहींस अजून तुझं?"

"स्वानंद" 

दोन गल्ल्यापूर्वी चिन्मय उजवीकडे हात दाखवत होता. स्वानंद च्या डोकयात कुठे तरी होतच  कि आपण पार्क च्या डाव्या बाजूला आहोत. म्हणजे उजवीकडे वळलं तर पार्कच्या दिशेने जाऊ. 

"काका उजवी कडे वळा"

"नक्की का रे स्वानंद? नाहीं तर एक काम करूया, मी तुला तुझ्या घरी सोडून देतो किंव्हा तू ज्या गल्ली च्या टोकाशी उभा होता तिथे सोडतो. आम्ही पार्क नंतर आरामात शोधू."

"नाहीं नाहीं, उजवी कडे वळा येईलच पार्क" स्वानंद ने मनात देवाचे नाव घेतले. आता उजवी कडे पार्क नसेल तर त्याने ठरवलं होता कि गाडी हळू झाली कि दार उघडून उडी मारायची आणि घरी पळायचे. पण त्याला घर ते पार्क आणि पार्क ते घर रस्ता माहिती होता. किंव्हा त्याला असे वाटत होते! पण पार्क मिळालाच नाहीं तर घरी तरी कसा जाणार?

गाडी थांबवून मगाशी चिन्मय ला हि कार मध्ये बसवायला हवे होते. त्याच्यासोबत घरापर्यंत कसेतरी पोचलोच असतो. 

"अहो, तुम्ही पण ना, त्याला नाहीं माहिती रस्ता. विचारा बरं पानस्टॉल वर" काकू म्हणाल्यात. 

"हो ग, विचारतो. तू उगाच मागे लागते. काही तरी सांगतोय ना पोरगा" असं म्हणे पर्यंत ते पुन्हा एका छोट्या चौरस्त्यावर आलेत आणि अक्षरश चमत्कार झाला. समोर उजवीकडे धंतोली पार्क! 

स्वानंद पण चकित झाला. काय जादू आहे असा तो विचार करीत होता. खरंच उजवीकडे वळलो तर पार्क दिसतोय. त्याला हुश्श झालं.  

काकांनी चौरस्ता ओलांडला. गाडी हळू हळू पुढे नेली. आता पार्क तर मिळाला पण पार्कच्या समोर घर आहे असा पत्ता होता. त्यामुळे आता चौ बाजूंनी फेऱ्या माराव्या लागणार असा ते काहीतरी विचार करीत होते. 

"काका, मी उतरतो." काकांना एकदम जाग आली कि स्वानंद गाडीतच आहे. 

"सोडतो मी तुला" ते म्हणाले. 

"नको, नको, मी जातो इथून. जवळच आहे घर" अस म्हणत स्वानंद कार मधून उतरला पण. 

"हुशार आहेस हां तू स्वानंद. आमची सोय झाली तुझ्यामुळे" आजींनी निरोप दिला. 

"आणि अस कोणाच्याही गाडीत बसून जाऊ नकोस हां" काकूंनी पण निरोप दिला. 

बाहेर छान वार सुटलं होत. स्वानंद उड्या मारीत निघाला. त्या वयाची मजाच वेगळी असते. वार जास्त गार लागत, ऊन-धूळ लागत नाहीं. पार्क मधल्या उंच-उंच झाडांच्या पानांचा सळसळ आवाज येत होता. त्याला आज नवीन रस्ता कळला होता आणि फजिती पण झाली नव्हती. मुख्य म्हणजे कार मध्ये बसायला मिळाले. फियाट मध्ये.  आणि त्याने रस्त्याकडे नजर टाकली -  इथून सरळ गेला कि डावीकडे दयाळ च दुकान, मग पान डब्ब्यांचा चौक आणि मग उजवीकडे प्रधान डॉक्टरांचा दवाखाना आणि मग त्याच्या घराची गल्ली.