Showing posts with label लघु-कथा. Show all posts
Showing posts with label लघु-कथा. Show all posts

6/30/26

रानटी फूल


कॉलेज सुटले आणि सगळे विद्यार्थी हळूहळू बाहेर पडू लागले. कॉलेज एवढ्यासाठीच म्हणायचे कारण इयत्ता वरच्या होत्या, पण शिस्तीत बघितले तर शाळाच होती. आणि तिथे ॲडमिशन मिळणेसुद्धा कठीण होते; त्यामुळे एकूण वातावरण अभ्यासू, होतकरू आणि महत्त्वाकांक्षी होते. पण सगळ्या राजहंसांमध्ये एखादे बदक असावे किंवा पांढऱ्या कबुतरांमध्ये एखादे कथ्या रंगाचे असावे, तसा रवी या कॉलेजमध्ये होता. मार्क चांगले होते म्हणूनच त्याला प्रवेश मिळाला होता; पण ना तो अभ्यासू होता, ना होतकरू, ना महत्त्वाकांक्षी. त्याला मार्क कसे मिळायचे, हे त्याचे त्याला माहिती नसे; कारण बहुतांश वेळा त्याचे लक्ष मुलींमध्ये आणि मुलींकडे असे. मुलींच्या बाबतीत तो नक्कीच महत्त्वाकांक्षी आणि होतकरू होता. सदैव, तत्पर, अविरत आणि अखंड.

लवकरच १४ फेब्रुवारी येणार म्हणून रवी थोडा बेचैन होता. अगदी लहानपणापासून त्याला या दिवसाचे भयंकर आकर्षण होते. त्याचे स्वप्न होते की, या दिवशी कुठल्यातरी मुलीला गुलाबाचे फूल द्यायचे. मुलगी कुठलीही चालेल, पण गुलाब देणे महत्त्वाचे. शाळेत होता तेव्हा असे करण्याची त्याची हिंमत दोन कारणांमुळे झाली नाही. एक, गुलाब आणण्याचे पैसे नव्हते. म्हणजे तो गरीब होता असे वगैरे मुळीच नव्हते; सुखवस्तू, सुशिक्षित घरातून तो होता. पण पैसे हवे असतील तर 'का हवेत?' असे विचारले जाई. मग ज्या घरात झेंडूशिवाय कुठलेही फूल कधी आले नव्हते, तिथे 'मला गुलाब घ्यायला पैसे हवे आहेत' सांगितल्यावर रागावण्यापेक्षा थट्टेने उडवून लावले असते. रवीला त्याची थट्टा केलेली चालत नसे. रागावलेले, मारलेले चालेल; पण त्याला हलक्यात घेतले की खूप राग येई. या भीतीनेच त्याने कधी कुठल्या मुलीशी बोलण्याचा किंवा अभ्यासाव्यतिरिक्त मैत्री साधण्याचा प्रयत्न केला नव्हता.

दुसरे कारण म्हणजे—नेमके कोणाला गुलाब द्यायचे? नाही म्हणायला मनातल्या मनात तो बऱ्याच मुलींशी गप्पा मारीत असे आणि मनातल्या मनात त्याचे कित्येक मुलींशी सूत जमले होते. खऱ्यात गुलाब द्यायची पाळी आली तर कोणाला द्यायचे?

रवीचे घर आणि कॉलेज फारसे दूर नव्हते. सायकलने वीस-पंचवीस मिनिटे आणि कधी कधी वडिलांची स्कूटर पळवायला मिळाली तर दहा मिनिटे. पण घर आणि कॉलेज हा प्रवास त्याचा अनेक मार्गांनी होत असे. ते कसे? तर सोमवारी त्याला हमखास स्कूटर मिळे; कारण वडील त्या दिवशी त्यांच्या मित्राच्या कारमधून ऑफिसला जात असत. खरे तर त्यांच्याकडे पण जुनी मारुती होती, पण ज्या मित्रासोबत रवीचे वडील ऑफिसला जात, त्याने सरकारी ऑफिसमध्ये बराच 'रवंथ' केला होता आणि अजूनही करीत होता. त्यामुळे त्याची कार नवीन तर होतीच, पण त्याच्या 'रवंथ' केलेल्या पैशांतून त्याने पेट्रोल खरेदी करावे आणि आपण ते अप्रत्यक्षरीत्या वापरावे, तरी कुठले पाप माथी लागू नये, अशी काहीतरी विचित्र मनोधारणा रवीच्या वडिलांची होती. त्यांच्या मित्राला काही फरक पडत नसे; त्याने जनाच्या आणि मनाच्या, दोन्ही लज्जेची स्टेशने त्याने कधीच मागे सोडली होती.

रवीचे घर शिवाजीनगरला होते आणि कॉलेज सदाशिवनगरला. सोमवारी सकाळी कॉलेजला घाई होत असे, पण स्कूटर असल्यामुळे घरून निघून तो सदाशिवनगरच्या आधी थोड्या उजव्या बाजूला दोन किमीवर असलेल्या शंकरनगरला जाई. तिथे मंजिरी राहत असे. फ्लॅट नव्हता, घर होते. मग तो तिच्या घरावरून चक्कर मारीत असे. तिची स्कुटी बघे; असली तर वेगाने निघून जाई—तिने बघितले तर? (तिने कधी रवीला बघितले नव्हते. म्हणजे त्याच्या घरावरून जाताना तर नाहीच, पण तिच्या दृष्टीच्या टप्प्यातही तो कधीच आला नव्हता. तिचे आई-वडील डॉक्टर होते आणि तिचा कलही त्याच दिशेने होता. रवी हुशार होता, पण डॉक्टर होण्याइतका वरच्या दर्जाचा हुशार नक्कीच नव्हता; त्यामुळे तिच्या दृष्टीने त्याचे अस्तित्वच नव्हते. अर्थात, याचा कसलाही फरक रवीला पडत नसे. भक्ती महत्त्वाची, देव बदलत असतात!). पण स्कुटी नसली तर मग तो पुन्हा एकदा घरावरून चक्कर मारी. का माहिती नाही? त्याला बहुधा तिचे टुमदार घर बघायलाही आवडे. समोर छान बाग होती आणि त्यावर लॉन होते. मग ते काम आटोपले की तो कॉलेजकडे कूच करीत असे.

पण रस्त्यात अगदी कॉलेजच्या आधी डावीकडे सदाशिवनगरचाच एक छोटेखानी भाग होता—खरे टाऊन. तिथे रवी स्कूटर घाले. तिथे फ्लॅटमध्ये राहत होती भक्ती—म्हणजे भक्ती नावाची मुलगी! ती खूपच कॉलेजची तयारी करून मग गॅलरीत उभी राहून न्याहारी करीत असे. बहुधा ती कुठलेतरी सँडविच खात असे. रवी आपला फोडणीची पोळी, फोडणीचा भात इत्यादी गोष्टी चरून येई. भक्ती फॅन्सी खात असे, असे रवीला वाटे. ती दिसली की तो हळूच हॉर्न मारून पुढे जाई, मग पुढल्या गल्लीतून मागे वळून पुन्हा परते. जर का भक्ती उभी असलेली पहिल्यांदाच दिसली, तर मग पुन्हा वर बघण्याची त्याला हिंमत होत नसे. भक्ती ही रवी कॅटेगरीची होती; त्यामुळे तिला रवी माहिती होता आणि तो आठवड्यातून असा इथे घरावरून भटकतो, हे तिला माहिती होते. पण तो असे का करतो, हे तिला कळत नसे. आता गंमत म्हणजे, ती गॅलरीत रवीसाठी उभी नसे, तर प्रकाशसाठी उभी असे. हे रवीला माहिती होते. प्रकाश हा वयाने, पैशाने, body ने (शरीरयष्टीने), हुशारीने आणि दिसण्याने त्याच्या फार पुढे होता! पण कोर्टात दावेदार बलाढ्य असला तरी केस लढवायची, हे रवीने ठरवले होते. बाय द्यायचा नाही!

मंगळवारी आणि बुधवारी तो बिझी असे. कॉलेजमध्ये लॅब्स असत आणि सायकलवर स्वारी असे; त्यामुळे कॉलेजच्या आवारातच तो 'फेरफटका' मारीत. शारदा, श्रद्धा वर्गातच होत्या, त्यामुळे त्यांच्या आसपास भटकणे. खरे तर त्यांची ओळख होती आणि अभ्यासासाठी वगैरे बोलणेही होई, पण रवीला साधे टाईमपास बोलणे जमतच नसे. रवीचे गणित एकदम पक्के होते; त्यामुळे शारदा आणि श्रद्धा नेहमी त्याला गणिताचे प्रश्न विचारत किंवा होमवर्कबद्दल विचारत. त्याची सुप्त इच्छा असे की, या मुली आपोआपच इम्प्रेस व्हाव्यात आणि स्वतःहून त्याच्याशी गप्पा मारायला याव्यात. पण गणिताने कोणी इम्प्रेस झालेले कधी ऐकले आहे का? रोमँटिक कथा-कादंबऱ्या लिहिणारा लेखकसुद्धा पाल अंगावर पडल्यासारखी हा सिनॅरिओ झटकून टाकेल. मुलींना काय अक्कल वगैरे नाही का? गणिताच्या थिअरेम्सने इम्प्रेस व्हायला?

गुरुवार ते शुक्रवार त्याच्याकडे कधी सायकल किंवा कधी स्कूटर असे; त्यामुळे त्याच्या वाऱ्यांचा (आणि वाऱ्याचा) रस्ता बदलत असे. कधी त्याची चक्कर माधवनगर असे, तिथे संजीवनी राहत असे. 'आजच्या काळात संजीवनी नाव कोण ठेवते?' याचा तो विचार करत तिच्या फ्लॅट स्कीमसमोरून फिरे. हा नवीन 'मु.पो.' होता, कारण ती नेमक्या कुठल्या मजल्यावर राहते, याची त्याला अजून कल्पना नव्हती. मग कधी मराठी मध्यमवर्गीय भागातून दूर असलेल्या कराची कॉलनीला तो फिरून येई. तिथे दीक्षा होती; ती अग्रवाल होती. रवीचा जात-पात आणि भाषा वर्गीकरणावर मुळीच विश्वास नव्हता. पण दीक्षा अतिशय म्हणजे अतिशय श्रीमंत होती. तिचा बाप तिला कधी कधी मर्सिडीझमधून पाठवीत. बाप रे...! आश्चर्य म्हणजे दीक्षाला रवी माहिती होता. तिने एक-दोनदा त्याला परीक्षेसाठी नोट्स मागितल्या होत्या. रवीचे अक्षर वळणदार होते आणि तो नेमका महत्त्वाचा भागच टिपत असे; त्यामुळे जणू त्याच्या नोट्समधूनच परीक्षेत प्रश्न येत. पण दीक्षा त्याच्याशी बोलली, एवढेच रवीला पुरे होते. त्यामुळे आता त्याला कराची कॉलनीचा भार खांद्यावर उचलावाच लागला.

शनिवार व रविवारी कॉलेज नसे आणि रवी बिझी असे. आठवडाभर लफूटगिरी केल्यामुळे तो अभ्यास या दोन दिवसांत उरके आणि उरलेला वेळ बॅडमिंटन.

आहा.... बॅडमिंटन!

कॉलेजच्या दुसऱ्या वर्गात होती सारिका. या उंबरठ्यावर मात्र रवी हमखास धडपडे, कोलमडे, अडखळे. सारिका म्हणजे जणू रवीची ड्रीम गर्ल! ती कॉलेजमध्ये होतीच, पण आधी शाळेतही होती आणि त्यासोबत ती त्याच्या क्लबमध्ये बॅडमिंटनही खेळत असे. थोडक्यात, रवीच्या जगात ती अत्र-यत्र-सर्वत्र होती. तिचे हास्य रवीला माधुरी दीक्षितसारखे वाटे—१०० वॅट्स! आणि ती बॅडमिंटन खेळताना त्याला एखाद्या हरिणीसारखी वाटे. रवी बरीच वर्षे स्वतः बॅडमिंटन खेळत होता आणि त्याला चांगले खेळता येत असे. थोडा जोर लावला असता तर राज्यस्तरीय पातळीवर गेला असता; पण सारिका राष्ट्रीय पातळीवरसुद्धा खेळली होती. पण यात सगळ्यात मणी-कांचनयोग म्हणा की अंबाडीला केळी मिळणे म्हणा, सारिका आणि रवीची मैत्री होती. म्हणजे सारिकाला तो मित्र वाटत असे. ती त्याच्याशी नेहमी गप्पा मारीत असे आणि तिथेच रवीची 'त-त-प-प' होत असे. तिला ते कळत असे आणि ती त्याची मजा घेत असे. "Love in the Time of Cholera" या प्रसिद्ध पुस्तकात एक वाक्य आहे: "In reality, they were distracted letters, intended to keep the coals alive without putting her hand in the fire." तसेच काहीसे इथे लागू होत होते.

रवीला त्याची मजा घेतलेली आवडत नसली, तरी सारिका बोलायला लागल्यावर रवी जणू दुधात टाकलेला साखरेचा खडा. त्यातून ती कधी काजळ  लावून आली असेल तर त्याला भीती वाटत असे की, त्याच्या हृदयाची धाड-धाड (धड-धड नाही) चुकून बाहेर कोणाला ऐकू यायची! त्याच्या नुकत्याच फुटत असलेल्या कंठाने तो सारखा आवंढा गिळे. ती काय बोलते आहे, याच्यावर तो लक्ष देण्याचा खूप प्रयत्न करीत असे; पण बोलायला नेमके शब्द त्याला मिळत नसत. कारण हृदयाच्या त्या धाड-धाडीत त्याला ती काय बोलते आहे, ते नीट ऐकूच येत नसे. तो उगाच काहीतरी विनोद करण्याचा प्रयत्न करी किंवा हो ला हो लावण्याचा प्रयत्न करी. ती इतकी नित्यनेमाची आणि जवळची वाटे, पण रवीसाठी सारिका म्हणजे जणू एक कोडे होती. कधी कधी रवी आणि सारिका प्रॅक्टिस गेम खेळत. गेममध्ये रवीला सारिका चांगलीच धोपटायची; पण तिचा खेळ बघून रवी स्वतःचा खेळ सोडून टाळ्या वाजवायचा. मग ती कंबरेवर हात ठेवून, "काय आयटम आहे!" अशा आविर्भावात रवीकडे बघायची. तिथे पुन्हा रवी क्लीन बोल्ड!

आता वार्षिक परीक्षा जवळ येत होती—पुढल्या ३-४ दिवसांत त्याला ठरवायचे होते की कोणाला गुलाब द्यायचे ते. हातघाईची वेळ येत होती. मंजिरी तर चान्सच नव्हता. भक्तीपुढे प्रकाश उभा आणि त्याचे आडनाव पण ठोसर होते! शारदा आणि श्रद्धा म्हणजे देवाची आरती केल्यासारखे वाटते; मुख्य म्हणजे त्यांना प्रश्न पडायचा की, दिलेल्या गुलाबाचे करायचे तरी काय? आणि रवीला वाटायचे की गुलाबापेक्षा झेंडू दिलेला बरा. त्याच्या सगळ्या हिरोइनींपैकी सारिका एकच होती जिच्याशी त्याची मैत्री होती, पण तिला गुलाब द्यायचे? तिने गुलाब फेकून दिले तर? किंवा थट्टा केली तर? मग मैत्रीपण राहणार नाही. पण ती रिस्क घ्यावीच लागेल. हुकमाचा एक्का होती सारिका! तिला रवीने दिलेले गुलाब मिळणार. कारण त्याने डोक्यात जो प्लॅन बनविला होता, त्यावरून त्याला माहिती होते की, यावेळेस सारिका क्लीन बोल्ड होणार! १४ फेब्रुवारी हा 'डी-डे'!

सकाळी उठून त्याने आंघोळ वगैरे केली. थोडा व्यायाम केला, दंड-बैठका काढल्या—छाती आणि हात थोडे कडक दिसायला. त्याचा आवडता शर्ट घातला. थोडे धाडस करून त्याने बाबांना स्कूटर मागितली आणि त्यांनी पण आपसूकच होकार दिला. त्याच्या आयडियाचा पहिला टप्पा म्हणजे गुलाबाची फुले! पण गुलाबासाठी त्याला कोणाकडे पैसे मागायची गरज नव्हती. त्याची एक मोठी आत्येबहीण जवळच राहत असे, तिच्याकडे गुलाबाचा बगीचा होता. तिथे जाऊन त्याने तीन रंगांची गुलाबे एकत्र केली. बाहेरचा वेढा लालचुणूक रंगाच्या गुलाबांचा, मग पिवळ्या रंगाच्या गुलाबांचा घेरा, मध्ये गुलाबी रंगाच्या तीन गुलाबांचा गुच्छ आणि या सगळ्याच्या मध्यभागी गवतातले एक पिवळेशार रंगाचे रानटी फूल. त्याच्या आत्येबहिणीने 'हे काय करतोयस?' असे मुळीच विचारले नाही. रवी स्वतः तयार केलेला फुलगुच्छ बघून खुश झाला. त्याने बाजारातून झेंडूची फुले कागदात आणली होती, त्यात त्याने तो गुच्छ लपवला. सुरुवातीला त्याचा प्लॅन कॉलेजमध्ये गुच्छ द्यायचा होता; पण त्यात बरीच रिस्क होती आणि असे अचानक तिला सरप्राईझ दिले तर तिला आवडणार नाही, असे त्याला वाटले. रवीच्या आयडियाचा दुसरा टप्पा अजूनच रोमँटिक होता. त्याने आपले बॅडमिंटनचे कपडे धुवायला टाकले आणि शूज ओल्या कापडाने स्वच्छ केले. आता तो आतुरतेने संध्याकाळच्या बॅडमिंटन क्लबला जाण्याची वाट बघू लागला.

संध्याकाळी तो सगळ्यांच्या आधी क्लबला पोहोचला. त्याने तो फुलगुच्छ अगदी सांभाळून, एका कोपऱ्यात स्वतःच्या बॅगेच्या मागे लपवून ठेवला. थोड्या वेळाने सारिका आली. तिने नेहमीप्रमाणे वॉर्म-अप सुरू केला. रवीला पाहताच तिने रॅकेट उंचावून दुरूनच 'हाय' केले. रवीने दुरूनच 'हाय' केले आणि तिला 'इकडे ये' असा हाताने इशारा केला; पण तिला त्याचा तो चोरटा इशारा कळलाच नाही. ती पुन्हा हसून म्हणाली, "अरे, कितीदा हाय करतोयस?" पहिला चान्स फेल! रवी पुरता फ्रस्ट्रेट झाला, पण खरा गेम आता सुरू होणार होता. रवीने एकदम जय्यत तयारी केली होती.

रवीने मनातली घालमेल लपवत वॉर्म-अप सुरू केला. रोजचे सेट्स झाले. सराव संपल्यावर मुलं-मुली एकत्र येऊन मॅच खेळू शकत, असा तिथला नियम होता. सराव संपताच रवी थेट सारिकाजवळ धावला. तो इतक्या घाईत जवळ आलेला पाहून तिने नेहमीच्या कुत्सित पण गोड अंदाजात म्हटले, "मला वाटलं आज फक्त 'हाय-हाय'च ऐकायला मिळणार की काय!"

"गेम खेळणार का?"

"तुला हरायला फार आवडतं ना?"

"तुझ्याकडून? हो!" स्वतःचे हे उत्तर ऐकून रवी स्वतःच खुश झाला आणि सारिकाला आश्चर्य वाटले. असे कडक उत्तर देणाऱ्यांपैकी रवी नव्हता.

दोघांनी गेम सुरू केला. रवी खूप आत्मविश्वासाने खेळत होता. सारिकाला नेहमीसारखा गेम खेळता येईना. पहिला सेट ती कशीबशी जिंकली. दोघांना घाम आला होता. ती नेहमी इतक्या सहजतेने जिंकत असे की, तिला कळेना कि काय चालले आहे आणि आज रवीला नेमके कशाने झपाटले आहे. दुसरा गेम अटीतटीचा होत होता. सारिकाने आपला गेम वरच्या पातळीवर नेला—आता नो टाईमपास! पण तिच्याने रवी काही मागे हटेना. ९-९ वरून त्याने पुढले सगळे पॉईंट्स जिंकत गेम जिंकला आणि जणू काही झालेच नाही अशा आविर्भावाने तो शांतपणे कोपऱ्यातल्या बागेकडे गेला, पाणी पिऊ लागला.

"चल, अजून एक गेम खेळू."

"अजून नको, मला घरी जायचं आहे."

"अरे, १-१ आहे, शेवटचा डिसायडिंग गेम खेळावाच लागेल."

"तूच जिंकशील, तू नॅशनल प्लेयर आहेस."

सारिकाला तो टोमणा थोडा झोंबला. तिला कळेना की, रवीशी गेम हारली म्हणून तिला राग येतोय, की त्याचा अचानक समोर आलेला आत्मविश्वास तिला फ्रस्ट्रेट करतोय.

"अरे ये रे... १० मिनिटांनी तुला उशीर नाही होणार," असे म्हणत ती त्याच्या जवळ आली.

"बरं, एका अटीवर," असे म्हणत त्याने बॅगेमागचा गुच्छ काढला. "हॅपी व्हॅलेंटाईन्स डे," म्हणत तिला तो गुच्छ दिला. तिला हे अगदीच अनपेक्षित होते. "माझा गुच्छ वेगळा आहे, दुकानातला नाही. बागेत जाऊन मीच फुले निवडली आणि मीच गुच्छ बनविला. चांगला दिसतोय ना?" त्याने विचारले. तिने मान डोलावली. अजूनही ती पहिल्या शॉक धक्क्यातून बाहेर आली नव्हती, पण तिला फुले मिळालेली फार आवडली होती.

"कारण दुकानातली सगळी फुले सारखी असतात; ना वेगळे रंग, ना काही वेगळ्या छटा. हा गुच्छ तुझ्यासारखा आहे. अभ्यास, खेळणे आणि काही कमी असेल तर दिसणे... या सगळ्यात तुझे एवढे रंग दिसतात आणि तरीही मधल्या पिवळ्या फुलासारखी तुझी निरागसता पण आहे." हे ऐकताना तिचा चेहऱ्यावरचा रंग कधीचाच लाल-गुलाबी झाला होता. कॉलेजमध्ये आणि क्लबमध्ये तिच्या मागे फिरणाऱ्या 'गुलाबरावांची' कमतरता नव्हती, पण तिच्या खेळापलीकडचे तिचे रंग इतक्या बारकाईने टिपणारा हा पहिलाच माणूस होता. तिचे हृदय धाड-धाड कोकलू लागलं आणि तिला भीती वाटू लागली की, बाहेर कोणाला ती धाड-धाड ऐकू यायची. आवंढा गिळत ती काहीतरी बोलणार होती, तेवढ्यात रवी उड्या मारीत कोर्टवर गेला. आपला प्लॅन एकदम तंतोतंत आणि अचूक पार पडला म्हणून तो भलताच आनंदात होता. बहुधा गुलाब देण्यातून जास्त आनंद त्याला प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून होत असावा. त्याने सारिकाला कधी लाजताना बघितले नव्हते आणि आत्ताही त्याने ती संधी हुकवली—अस्सल बावळूराम!

"चल, तिसरा गेम खेळायचाय ना."

सारिकाला भरून आले होते. ती तशीच बॅगेजवळ उभी होती, रवीकडे बघत.

10/8/25

झाकली मूठ सव्वा लाखाची

 


खाडकन केतनच्या थोबाडीत पडली. त्याचे कान सुन्न झालेत. खरंतर केतनने कोचने शिकविल्या प्रमाणे बॉक्सिंग ची नीट पोज घेतली होती. डावा पाय थोडा पुढे आणि उजवा पाय थोडा मागे. आणि डावी मूठ वळून पुढे आणि उजव्या हाताने मूठ वळून कान-गाल-डोळा झाकला होता. निदान त्याला वाटले कि त्याने चेहेऱ्याचा उजवा भाग नीट झाकला होता. उजवा खांदा थोडा वर करून त्याने चेहरा खालती केला होता. पूर्ण लक्ष देऊन तो समोरच्या कडे बघत होता. 

केतन बॉक्सिंग चे क्लासेस नुकतेच घ्यायला लागला होता पण त्याने प्रगती झपाटयाने केली होती. मुळात त्याची उंची चांगली होती आणि नियमित व्यायाम केल्या मुळे त्याच्यात ताकद चांगली होती. 

निदान त्याला असे वाटत होते. 

"सर, आप को मारना कैसे है, ये मैं सिखा सकता हुं. पर, मार खाना एक अलग बात है. ये तो सिखाया नहीं जा सकता." कलीम सर, केतन चे बॉक्सिंग कोच जणू त्याच्या कानात बोलत होते. 

"आय-टी कंपनी मी काम करने वाला आदमी हुं, लडाई-झगडे का मौका कभी नही मिलेगा" 

"तय्यारी होना सहाब" 

केतनला वाटलं तेवढा त्याचा उजवा चेहरा झाकल्या गेला नव्हता. त्याला कानाजवळ गरम काही तरी ओघळतंय असे वाटले.

" हा बघ, चॊमु, बॉक्सिंग करणार आहे माझ्याशी. बांडगुळा सारखा काही तरी पोज घेऊन उभा आहे." समोरचा खिदळत त्याच्या मित्राला म्हणाला. 

'मी बांडगुळासारखा उभा आहे?' केतनला प्रश्न पडला. बांडगुळ म्हणजे परजीवी वनस्पती. बांडगुळासारखा कसा कोणी उभं राहू शकत?" केतन विचार करू लागला. पण विचार करणें जरी चांगली सवय असली तरी नको त्या ठिकाणी विचार करणे तोट्याचे ठरू शकते. 

या भानगडीतच तो समोरचा अचानक पुढे आला आणि त्याच्या डाव्या हाताच्या सणसणीत झापडेने केतनच्या गालाची हिंसक पापी घेतली. केतन जागचा हलला. पण त्याच्यात तेवढीही कमी ताकद नव्हती. त्याने तोल सांभाळला आणि तो दोन-तीन पावला मागे गेला. 

"अगर मारने का मौका ना भी मिले तो भी चलेगा पर. पर आपने  मार खाना नहीं है. डिफेन्स फर्स्ट!" केतनच्या डोक्यात कलीम सर पुन्हा बोलू लागले. जणू ते तिथे त्याच्या बाजूलाच उभे आहेत. त्याने विचार केला डोक्यात असण्यापेक्षा कलीम सर प्रत्येक्षात तिथे उभे असते तर जास्त फायद्याचा असत. 

" मैं आप को बॉक्सिंग रिंग का बॉक्सिंग सिखा रहा हूँ. पर रास्ते पे झगडा होता है तो डिफेन्स फर्स्ट के भी पाहिले आप भागने का सोचो. रास्तो पे झगडा करने में किसी का भला नहीं होता. और झगड के क्या हि मिलेगा?" 

"सर, आप भी मजाक करते हो. मुसीबत बता के थोडी ना आती है. और गलत जगह फस गया फिर हात-पैर तो घुमाने हि होंगे." कलीम सर पुढे काही बोलले नाहीं. 

चुकीच्या जागी केतन नक्कीच फसला होता. डोंगर चढायला म्हणून तो बायको पोरा सोबत निघाला. त्या साठी मुद्दाम प्रवास करून त्या गावात आदल्या रात्री पोचला. सकाळचे अवरोहण छान झाले. उतरतांना निमुळत्या वाटेबाजूला दोन लोक दारू पीत बसले होते. त्यांनी काही ओंगळवाण्या टिप्पण्या केल्यात. केतन त्यावर त्यांना काहीतरी म्हणाला आणि आता तो बॉक्सिंग ची डिफेन्सिव्ह पोज घेऊन उभा ठाकला होता. त्याच्या उजव्या कानातून रक्त येत होते. 

समोरचा पुन्हा सरसावला आणि त्याने या वेळेस त्याचा उजवा हात सपाट्याने फिरवला. पण केतन ने त्याचा पंच बरोबर ओळखला आणि घुडघे थोडे वाकून, डोकं बरोबरअसे मागे केले कि त्या माणसाचा हात वेगाने त्याच्या धरधरीत नाकापासून काही इंचावरून निघून गेला. 




पण या संधीचा फायदा घेत केतन ने डिफेन्सिव्ह पोसिशन, ऑफेन्सिव्ह मधे बदलली. आणि डाव्या हाताने वळलेली मूठ समोरच्याच्या हनुवटीवर खाडकन बसवली. 

'अप्पर-कट!' कलीम सरांचा आवाज पुन्हा कानात फिरला. 

समोरचा पुन्हा केतन च्या अंगावर आला. केतन ने त्याला हुलकावणी दिली आणि विरुद्ध बाजूने पुन्हा त्याच्यासमोर उभा झाला. 

केतन ने मगाशी मारलेला उप्पर-कट आता त्याला बोटांना आणि बोटांच्या सांध्यांना जाणवायला लागला होता. आत्ता पर्यंत बॉक्सिंगच्या क्लासला त्याने बँडेज आणि ग्लोव्हस घालूनच पंचिंग केले होते. इथे आयुष्यात पहिल्यांदा त्याने कोणाला पंच मारला आणि ते पण उघड्या मुठीने! त्याने पंच अगदी पुस्तकी मारला होता. कारण समोरच्याच्या तोंडातून रक्त यायला लागले होते आणि केतनची मूठ दुखत असली तरी तो अजून मूठ वळू शकत होता. केतनचा आत्मविश्वास थोडा वाढला. 
या मारा-पिटीत एक चांगली गोष्ट म्हणजे, दुसरा दारुडा फारच हलका-फुलका होता. बहुधा तो एका पायाने अधू होता. खिदळण्या पलीकडे तो फारसा काही लायक नव्हता. केतनच्या समोरच्याच्या तोंडातून रक्त येतांना बघून दुसऱ्याचे खिदळणे मात्र आता बंद झाले होते. 
"तू पोराला घेऊन पळ इथून. मी बघतो काय करायचं ते." केतन बायकोला म्हणाला.
"तुला एकटं सोडून मी इथून निघत नाहीं या. जे काही आहे मिळूनच करू या" केतनची बायको त्याला म्हणाली. ती घाबरली होती पण तिने हिम्मत हारली नव्हती. तिनी जवळचा एक गरगरीत गोटा उचलून त्या अधू-दुसऱ्याला फेकून मारला. त्याच्या मांडीला का कमरेला तो सपाटून बसला. 
"आई ग...लागलं रे" असा काहीस म्हणत तो मागे सरकला. 
" बायकोला समोर कर तू. कारण तू मारलेला पंच मला पापी दिल्या सारखा वाटला" तोंडातून येणारे रक्त थुंकून केतनच्या समोरचा बरळला. 
" साब, सामने वाला कुछ भी बोले आपने ऊसपे ध्यान नही देना है. बोलने दो सामने वाले को. बॉक्सिंग में ताकद  बचा के रखना है. और जब जरुरत पडे तभी इस्तेमाल करना है.   
केतनच्या कानात पुन्हा कोचिंग सुरु झाले. 
तेवढ्यात केतनच्या बायकोने अजून एक गरगरीत गोटा केतनच्या समोरच्यावर पूर्ण ताकदीने फेकला. त्याला तो खांदा आणि मानेच्या सांध्यावर सपाटून बसला. 
"आई ग....." तो केकाटाला. आता त्याला कळेना नेमके काय करायचे. तो खांदा दाबून मागे झाला आणि त्याने केतनच्या बायकोवर नजर रोखली. 
" आता तरी पळतेस का?" पण केतनच्या बायकोच लक्ष नव्हते. ती आणि आणि केतनच्या १० वर्षाचा पोरगा दगड शोधत होते.
"अरे टोण्या, काही कर! काही नाहीं तर त्या बाई ला आवर" केतनच्या समोरचा अधू-दुसऱ्यावर खेकसला. 
"दगड मारते कि हि बया! सगळी उतरून गेली. पैसे वाया!" असे म्हणत लंगडत तो दुसरा तिथून खसकला.
केतनच्या समोरच्याचा खांदा-मान चांगलीच ठणकत असणार. त्याने केतनच्या बायकोच्या दिशेने मुसंडी मारली. केतन त्याच्या समोर आला आणि त्याच्या छातीला मिठी मारली आणि त्याची कंबर पकडून त्याला मागे रेटू लागला. समोरचा केतन ला पुढे रेटत होता. 

"बॉक्सिंग में साब, सामने वाले का ताकद जलना है. आदमी को मार के कमजोर कर सकते है या थकवा के. जैसे हि आदमी थका, उसका बॅलन्स गया"

केतन पाय रेटून पूर्ण ताकद लावून त्याला ढकलले आणि मग त्याला मारलेली मिठी सोडून एकदम बाजूला झाला. केतनच्या समोरचा तोल जाऊन भेलकांडत दाणकन जमिनीवर आदळला. 
केतन त्याच्या अंगावर बसला आणि दनादन त्याच्या डोक्यावर कानावर, जिथे मिळेल तिथे पंचेस मारू लागला. केतनची बायको जवळ आली आणि ती तिच्या ट्रेकिंगच्या बूटाने केतनच्या समोरच्याची बोटे चेंदु लागली. आता समोरच्याची पूर्ण वाट होती. पण तरी त्याने उजव्या हाताने अंगावर बसलेल्या केतनच्या उजव्या कानशिलावर सपाटून झापड मारली. 

केतन पुन्हा सुन्न झाला. आता त्याच्या उजव्या कानातून रक्त येऊ लागले. तेवढ्यात केतनच्या बायको केतनच्या समोरच्याच्या उजव्या हाताची बोटे चेंदु लागली. केतनच्या समोरचा आता वेदनेने जोरात ओरडू लागला.          
केतन त्याच्या अंगावरून उठला आणि काही पावले मागे गेला. समोरचा लगेच उठला. केतनला ते अपेक्षित नव्हते. केतनची बायको काही फूट त्याच्या मागे उभी होती. 

"तू तुझ्या मार्गाने जा आणि आम्हाला आमच्याने जाऊ दे" केतन त्याला म्हणाला. 

हळूच केतनच्या बायकोने एक चपटा दगड केतनला दिला आणि ती अजून थोडा अंतर मागे गेली. केतन आणि ती दोघे बघत होते कि समोरचा आता काय करतो. त्याच्या शर्टावर रक्त सांडत होते. तो कातावला होता. अश्या मनस्थिती एकतर दारू उतरून माणूस ताळ्यावर येतो किंव्हा डोक्यात राख घालून टोकाला जातो. समोरच्याने टोकाला जायचे ठरवले होते. काही कमी असेल तर त्याने आज बाई कडून मार खाल्ला होता. 

"साब, बॉक्सिंग रिंग मी ठीक है. रूल्स है, रेफ़री है.   बाहर मारा-पिटी करनी है तो बचाव और फिर बचना सबसे मेन है. अगर खुदा-ना-खास्ता ऐसी नौबत आती है तो जो हात लगे वो सोना. पीटो और फिर भागो" 

समोरच्याने तोंडाचे रक्त पुसले आणि हेलकावे घेत पुन्हा केतन वर धाव घेतली. केतन ने चपटा दगड घट्ट मुठीत दाबला. समोरचा जवळ येताच, केतन पुन्हा गुढघ्यात वाकला आणि पूर्ण ताकदीने हुक पंच मारला. पंचच्या शेवटच्या क्षणाला त्याने मूठ उघडली आणि त्या दगडाने अक्षरश: गालाचे हाड फोडले. समोरचा पुन्हा कोलमडून पडला. दुःखाने त्याला नीटसं रडता पण येईना. पण रडू येऊन त्याचा जबडा अजून दुखत होता. स्वतःला रेटत तो केतन पासून अजून दूर गेला. केतनच्या बायकोच्या हातातला दगड त्याला दिसला असावा. 


"चल, चल, निघ." केतन बायकोला म्हणाला. तिने पोराची बकोट धरली आणि सगळे तिथून पळाले. 
"चांगले पंचेस मारलेस आणि ते पण दोनदा मार खाऊन. ट्रैनिंग कामात येतंय." केतनची बायको धावता धावता केतन ला म्हणाली. 
"तुला तर ट्रैनिंग ची पण गरज नाहीं. वाघीण आहेस तू आतून" केतन म्हणाला. 
ते ऐकून बायकोच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित-हास्य होते. 
--

3/7/24

स्वानंद ची चक्कर

गल्लीच्या टोकाशी 8-9 वर्षाचा स्वानंद उभा होता. दुपारची दोन ची वेळ होती.आजुबाजूला शुकशुकाट होता. दुरून स्टेडियम जवळच्या रहदारीचा आवाज येत होता. पण गल्लीच्या टोकाशी फारस कोणी नव्हत. स्वानंद रिकामटेकडा  उभा होता. जवळच्या ग्राउंड वर कुंभार टोळीतली मुले फुलपाखरे पकडत होती. काट्याच्या काटक्यांनी फुलपाखरांना फटकारून खाली पाडत आणि मग प्लास्टिक च्या पिशव्यात ठेवत. ती अर्धमेली फुलपाखरे स्वानंद ला बघावायची नाहीत. त्याचे नेहमीचे मित्र दुपारी खेळायला येत नसत. त्यामुळे एकदा शाळेचे होमी-वर्क झाले कि बहुतांश दुपारी तो एकटाच हुंदडत असे. त्या काळात टी.-वी. वर पण  काहीच नसे.  'तो करे भी तो क्या करे?' स्वानंद ची आई त्यावेळेस घरी उगाच कट-कट नको म्हणून स्वानंदला बाहेर पाठवून देत असे. मग स्वानंद गल्लीच्या टोकाशी असलेल्या कट्ट्यावर बसे, कधी टायर छोट्या काठीने फिरवत, कधी गल्लीच्या दुसऱ्या टोकाशी असलेल्या गोठ्यातल्या बछड्याशी खेळत किंव्हा गायीच्या पोळ्याला खाजवीत वेळ काढीत असे. पण आता गायीचे बछडे हि मोठे झाले होते. खोंड झाला होता तो बछडा. मागल्या वेळेस चांगलीच जोरात ढुशी मारली त्या खोंडाने. त्याचे टायर हि कोणी तरी घेऊन गेलं होत. त्यामुळे नवीन काही तरी करायच्या शोधात स्वानंद होता. 

तेवढ्यात त्याच्याजवळ एक स्कूटर वाला आला. 

"इथे जोशी कुठे राहतात माहिती आहे का?"

"कुठले जोशी? तिसरी गल्ली कि सातवी गल्ली वाले?" स्वानंद ने विचारले. 

"माहिती नाहीं बा" 

स्वानंदच्या हातात छोटी काडी होती. न कळत स्कूटर च्या समोर च्या टायर वर तो काठीने हळूच टक-टक आवाज करीत होता. 

"एक काम करू या, तू माझ्या मागे बस. आधी तिसऱ्या गल्लीत जाऊ आणि ते जोशी नसतील तर सातव्या गल्लीतील जोश्यान कडे जाऊ या. माझ्या ओळखीतले जोशी मिळालेत कि मी तुला पुन्हा इथेच आणून सोडतो. तू याच गल्लीत राहतोस का?" स्कूटरवाल्याने विचारले. 

"हो, मी पहिल्या गल्लीत राहतो" स्वानंदने एकदम थाटात सांगितले. जणू पहिल्या गल्लीत राहणे म्हणजे काही मानाची गोष्ट होती. 

"चलतोस का मग?" 

स्वानंद विचार करू लागला. स्कूटरवाले काका तर सभ्य वाटत होते. तिसरी गल्ली आणि सातवी गल्ली अगदी जवळच होती. आणि स्कूटर वरून फिरायला हि मिळेल. 

"चला" असे म्हणत स्वानंद ने काडी फेकली आणि मागच्या सीट वर बसला. स्कूटर वाल्याने लगेच गियर टाकला आणि तिसऱ्या गल्लीच्या दिशेने निघाला. 

"आमच्या इथे दोन जोशी आहेत तसेच दोन देशपांडे पण आहेत. तिसऱ्या गल्लीत आणि सातव्या गल्लीत. त्यामुळे लोक त्यांना तिसरे जोशी किंव्हा सातवे देशपांडे म्हणूनच ओळखतात"

"हो का" स्कूटर वाल्याला पोराची बडबड ऐकून हसू येत होत. 

"मी पत्ता विचारतांना माहिती काढायला हवी होती कि तिसरे जोशी कि सातवे जोशी ते" तो म्हणाला. 

एवढा बोलतोवर दुसरी गल्ली कडे स्वानंद हात दाखवू लागला. पण तिसरे जोशी स्कूटर वाल्याच्या ओळखीचे नव्हते. मग स्कूटर वाल्याने पुन्हा स्कूटर ला किक मारली. 

"सातव्या गल्लीत कसे जायचे?" 

स्वानंद ने विचार केला कि पुढल्या मुख्य रस्त्याने गेलो तर दोन मिनिटात पोचू. त्याने मागच्या रस्त्याने जायचे ठरवले. कारण तिसऱ्या आणि सहाव्या गल्लीच्या मध्ये छोटे ग्राउंड होते. त्याला चक्कर मारून जावं लागत असे. म्हणजे अजून स्कूटर वरून फिरणं होईल. 

"असेच पुढे जाऊन डावीकडे वळू या"

स्कूटरवाल्याने तशी दिशा पकडली. 

"हे जे ग्राउंड आहे याला संघाचे ग्राउंड म्हणतो"

"हो का. पण असे का?"

"कारण इथे संध्याकाळी शाखा लागते संघाची"

"तू जातोस का दररोज?"

"हो, मी शिशु गणात आहे. काल तर मी अग्रेसर पण होतो"

स्कूटरवाल्याला अग्रेसर म्हणजे भानगड कळली नाहीं. 

"या ग्राउंड ला चक्कर मारा आणि मग सहावी गल्ली आणि मग सातवी" स्वानंद ने पुढली सूचना दिली. 

सातव्या गल्लीतले जोशी स्कूटर वाल्याचे जोशी निघालेत. स्वानंद उडी मारून स्कूटर वरून उतरला.

"थँक यु. काय नाव तुझं?" स्कूटर वाल्याने विचारले. 

"स्वानंद" 

"तुला पुन्हा सोडू का पहिल्या गल्लीशी ?" 

"नको नको, मी जाईन धावत. जवळच आहे" असा म्हणत उडया मारीत स्वानंदची स्वारी निघाली पण. 

पहिल्या गल्लीच्या टोकाशी पोचेतोवर त्याच्या डोक्यातली चक्र भिंगरी सारखी फिरायला लागली. मस्त आयडिया आहे हि. लोकांना पत्ते सांगायला मदत करायची, सोबत हिंडणं पण होईल. कोणाला कळणार पण नाहीं. काही दिवसांपूर्वीच त्याने रॉकेलवाल्या बैलगाडीवर हिंडण्याचा प्रताप केला होता. घरी पोचला तर घर भर रॉकेल चा वास. घरा मागे कडुलिंबाचे मोट्ठे झाड होते, एकदा लिंबोण्या पडायला छोटे छोटे दगड तो मारत उभा होता. गल्लीतून येणाऱ्या उपाध्याय आजींना नेमका लागला एक छोटासा गोटा. मग उगाच बोंबा-बोंब! नंतर एकदा घरासमोरून नित्यनेमाने जाणाऱ्या म्हशींवर बसला. त्या दिवशी त्याला दोन गोष्टी कळल्यात, एक कि म्हैस खूपच बेस्ट प्राणी आहे. गायी ढुश्या मारतात पण म्हैस एकदम लोड-लेस असते. दुसरं असे कि म्हैस चिखलात लोळते. म्हशीवरून 'चक्कर' मारून आल्यावर आई ने त्याला बाहेरच्या अंगणातच सगळ्यांसमोर आंघोळ घातली होती. 

इथे डबल-सीट वर हिंडण्यात असली कुठलीच भानगड नाहीं. 

एक नवीन उपक्रम स्वानंद ने सुरु केला. त्याच्या घरी याचा मुळीच पत्ता नव्हता आणि घरी यातील काही सांगायची गरज सुद्धा स्वानंद ला भासली नाहीं. फुल-प्रूफ प्लॅन!  

ज्या दुपारी वेळ मिळेल तेंव्हा स्वानंदची 'गाडी' गल्लीच्या टोकावर 'पार्क' असे, हिंडायला मिळेल या आशेने. 

मग एक दिवशी गम्मत झाली. चक्क एक कार येऊन थांबली त्याच्या जवळ. त्या काळात कार हा प्रकार तसा दुर्मिळ असे. स्वानंद जवळ एक फियाट येऊन थांबली. आधी स्वानंद ला कळले नाहीं कि फियाट का थांबली. त्याला वाटले कि तो कार च्या रस्त्यात येतोय. तो थोडा मागे सरकला. कार मध्ये एक काका-काकू समोर होते आणि एक आजी मागे बसल्या होत्या. काकूंची काच हळू हळू खालती सरकली. 

"हा समोर चा धंतोली पार्क आहे का?" तेंव्हा स्वानंद ला लक्षात आले कि हि  'हरवलेली' कार आहे. आता कार मधून चक्कर मारायला मिळते कि काय? या विचाराने तो हुरळला. 

"नाहीं, तुम्हाला कुठे जायचंय?" इतक्या दिवसात स्वानंद ने विचारायचे प्रश्न पक्के केले होते.

"धंतोली पार्क जवळ जावडेकर म्हणून रहातात. त्यांच्या कडे जायचे आहे" कार बोलली. 

"जावडेकर माहिती नाहीं पण धंतोली पार्क माहिती आहे. त्याचा पत्ता सांगू शकतो" 

"हा कुठला पार्क आहे समोर मग?"

"हे नुसताच क्रिकेट च ग्राउंड आहे. पार्क नाहीं. याला नाव नाहीं. आम्ही याला क्रिकेटच ग्राउंड असच म्हणतो" 

उत्तर ऐकून कार मधल्यांना गंमत वाटली. 

"बरं, मग धंतोली पार्क चा पत्ता सांगू शकतोस का?" 

"मी तुम्हाला तिथं पर्यंत घेऊन जाऊ शकतो." 

"अरे पण मग तू परत कसा येशील?"

"मी येईन पायी-पायी. जवळच आहे. मी जातो खूपदा खेळायला" आता खऱ्यात तो पार्कला एकटा कधीच गेला नव्हता. त्याच्या मोठ्या भावासोबत किंव्हा आजी-आजोबां सोबतच तो गेला होता. पण त्याच्या डोक्यात नकाशा पक्का होता - दुधाच्या दुकान समोरून चौकात, पुढे जाऊन उजवी कडे दयाल चे दुकान, मग थोड्या पुढे डावीकडे पोस्ट ऑफिस आणि त्याच्या पुढच्या छोट्या चौरस्त्याला उजवीकडे पार्क दिसेलच. 

पण भानगड इथेच सुरु झाली. आत्मविश्वास आणि त्याचे वय वर्ष ८ याची भेट या क्षणी झाली. 

स्वानंद मोठ्या ऐटीत कार मध्ये बसला. मागच्या सीट वरच्या आजींनी त्याला कौतुकाने जवळ घेतले. आता गाडी रिव्हर्स घेऊन मुख्य रस्त्याच्या दुधाच्या दुकान वरून घेण्या ऐवजी कारवाल्या काकांनी गल्लीतच गाडी घातली. 

"इथूनही सरळ पार्क लागेल असा वाटतंय?" त्यांनी विचारला आणि त्या विचारण्यात गाडीने वेगाने दोन गल्ल्या ओलांडल्या पण होत्या. इथे स्वानंदला जाम टेन्शन आलं कारण त्याच्या डोक्यातले होकायंत्र या भानगडीत पूर्णपणे गोंधळले होते. आता गाडी थांबवून माहिती असलेल्या रस्त्यावर कसे यायचे  याची मुळीच कल्पना त्याला नव्हती. एकच उपाय म्हणजे जिथे तो टाइम-पास करीत उभा होता तिथे परत जाणे. पण तसे सांगायला त्याला लाज वाटली. लहान वयात फारस काही कळत नसले तरी फजिती होण्याची भीती फार असते. मनुष्याला उपजतच असावी ती भीती. 

"कुठे वळायचं सांगशील बाळा?" कारवाले काका म्हणाले.  

"हो" स्वानंद कसा-बसा म्हणाला. 

"कितवीत आहेस स्वानंद तू?" आजींनी प्रेमाने विचारले

"तू असा कर मधून इतक्या दूर येतोस हे तुझ्या आई-बाबांना माहिती का रे?" समोरच्या सीट वर बसलेल्या काकू म्हणाल्या. 

इथे स्वानंद च टेन्शन वाढत होत. कोणी काही विचारलं नसत तर चाललं असत. मारुतीचे देऊळ पण मागे पडले. मारुती देवळासमोरून जातांना काकांनी कार हळू केली. रीतसर खिडकूतून त्याने नमस्कार केला. 

नेमका स्वानंद ला तिथे चिन्मय दिसला. चिन्मय चकित होऊन बघत होता कि स्वानंद एक तर कार मध्ये बसलाय आणि ते पण अनोळखी कार मध्ये बसलाय. 

"डब्या" त्याने हाक मारली. स्वानंद बडबड करण्यात वस्ताद होता म्हणून त्याचे मित्र त्याला प्रेमाने डब्बा म्हणत असत. 

स्वानंद ने कार च्या खिडकीतून बाहेर बघितलं. 

"कुठे चालला रे?" चिन्मय ने विचारलं. 

"धंतोली पार्क" 

"मग तिकडे कुठे?" पुढे काही तरी चिन्मय म्हणत होता आणि उजवीकडे हात दाखवत होता. स्वानंद ला वाटले कि ओरडून नेमकं कुठे ते विचारावा पण तो पर्यंत काकांनी  पुढचा गियर टाकून गाडीचा वेग धरला आणि दोन गल्ल्या अजून ओलांडल्यात. 

अजून एक छोटा चौरस्ता ओलांडून काकांनी गाडी हळू केली. "डावी कडे वाळू कि उजवीकडे बाळ?" काकांनी विचारला. त्यांना शंका यायला लागली होती कि या बावळूरामला रस्ता माहिती नाहीं.

"इथून अजून एक गल्ली सरळ जाऊ या. मग माझ्या लक्षात येईल. दिशा बरोबर आहे आपली"

"अहो, याला रस्ता माहिती आहे असं दिसत नाहीं या" काकू हळूच काकांना म्हणाल्यात. "याला पुन्हा सोडून यायचा का त्याच्या घरी? कोणाचा पोरग आहे माहिती नाहीं आणि आपण त्याला कार मध्ये घेऊन धंतोली पार्क शोधतोय!"

स्वानंदच इतका स्वच्छ बोलणं ऐकून आजी मात्र जाम खुश होत होत्या. त्यांनी त्याला अजून जवळ घट्ट घेतले. "फारच गोड आहेस रे तू? नाव सांगितलं नाहींस अजून तुझं?"

"स्वानंद" 

दोन गल्ल्यापूर्वी चिन्मय उजवीकडे हात दाखवत होता. स्वानंद च्या डोकयात कुठे तरी होतच  कि आपण पार्क च्या डाव्या बाजूला आहोत. म्हणजे उजवीकडे वळलं तर पार्कच्या दिशेने जाऊ. 

"काका उजवी कडे वळा"

"नक्की का रे स्वानंद? नाहीं तर एक काम करूया, मी तुला तुझ्या घरी सोडून देतो किंव्हा तू ज्या गल्ली च्या टोकाशी उभा होता तिथे सोडतो. आम्ही पार्क नंतर आरामात शोधू."

"नाहीं नाहीं, उजवी कडे वळा येईलच पार्क" स्वानंद ने मनात देवाचे नाव घेतले. आता उजवी कडे पार्क नसेल तर त्याने ठरवलं होता कि गाडी हळू झाली कि दार उघडून उडी मारायची आणि घरी पळायचे. पण त्याला घर ते पार्क आणि पार्क ते घर रस्ता माहिती होता. किंव्हा त्याला असे वाटत होते! पण पार्क मिळालाच नाहीं तर घरी तरी कसा जाणार?

गाडी थांबवून मगाशी चिन्मय ला हि कार मध्ये बसवायला हवे होते. त्याच्यासोबत घरापर्यंत कसेतरी पोचलोच असतो. 

"अहो, तुम्ही पण ना, त्याला नाहीं माहिती रस्ता. विचारा बरं पानस्टॉल वर" काकू म्हणाल्यात. 

"हो ग, विचारतो. तू उगाच मागे लागते. काही तरी सांगतोय ना पोरगा" असं म्हणे पर्यंत ते पुन्हा एका छोट्या चौरस्त्यावर आलेत आणि अक्षरश चमत्कार झाला. समोर उजवीकडे धंतोली पार्क! 

स्वानंद पण चकित झाला. काय जादू आहे असा तो विचार करीत होता. खरंच उजवीकडे वळलो तर पार्क दिसतोय. त्याला हुश्श झालं.  

काकांनी चौरस्ता ओलांडला. गाडी हळू हळू पुढे नेली. आता पार्क तर मिळाला पण पार्कच्या समोर घर आहे असा पत्ता होता. त्यामुळे आता चौ बाजूंनी फेऱ्या माराव्या लागणार असा ते काहीतरी विचार करीत होते. 

"काका, मी उतरतो." काकांना एकदम जाग आली कि स्वानंद गाडीतच आहे. 

"सोडतो मी तुला" ते म्हणाले. 

"नको, नको, मी जातो इथून. जवळच आहे घर" अस म्हणत स्वानंद कार मधून उतरला पण. 

"हुशार आहेस हां तू स्वानंद. आमची सोय झाली तुझ्यामुळे" आजींनी निरोप दिला. 

"आणि अस कोणाच्याही गाडीत बसून जाऊ नकोस हां" काकूंनी पण निरोप दिला. 

बाहेर छान वार सुटलं होत. स्वानंद उड्या मारीत निघाला. त्या वयाची मजाच वेगळी असते. वार जास्त गार लागत, ऊन-धूळ लागत नाहीं. पार्क मधल्या उंच-उंच झाडांच्या पानांचा सळसळ आवाज येत होता. त्याला आज नवीन रस्ता कळला होता आणि फजिती पण झाली नव्हती. मुख्य म्हणजे कार मध्ये बसायला मिळाले. फियाट मध्ये.  आणि त्याने रस्त्याकडे नजर टाकली -  इथून सरळ गेला कि डावीकडे दयाळ च दुकान, मग पान डब्ब्यांचा चौक आणि मग उजवीकडे प्रधान डॉक्टरांचा दवाखाना आणि मग त्याच्या घराची गल्ली. 

3/22/23

नोटबंदी

चौकातला हिरवा दिवा लागला. गाड्यांचे रणकंदन माजले. ऑटो, स्कुटरी, बसेस, कार, मालवाहतुकीचे ट्रक्स, सगळ्यांनी एकत्रच भसाड्या आवाजात भोकाड पसरले. दोन मिनिटांची तुंबळ मग उजव्या बाजूच्या रस्त्याची पाळी. संसाराचा अखंड आणि अविरत फेऱ्यांची जणू प्रतिकृतीच. भीषण आणि प्रदूषित. रेटलेला पण तेवढाच आवश्यक. प्रत्येक बाजूचा हिरवा दिवा लागताच पाखर उडावी तशी भिखाऱ्याची पोरं उड्या मारीत रस्त्याचे कठडे गाठीत. आता यांना आई ना बाप मग ती भिखारी झालीत की भिकाऱ्यांची पोरं? मळलेली अंग, धुळीने व गाड्यांच्या धुराने माखलेली तोंड, अर्धवट कपडे. घरातील स्वछता झाल्यावरही कोपऱ्यात एका ठिकाणी धूळ जशी 'अविजयी' असते तशीच ती पोरे चौकात भासत होती. स्वच्छ मोठा रस्ता, त्यात मध्ये झाडे लावलेला दुभाजक, उंच ट्रॅफिकचे दिवे, कॅमेरे सगळ्या दिव्यांवर, रस्त्यांवरच्या महागड्या गाड्या, घाईतली महाग कपड्यातली लोक पण कोपऱ्यात कृश, काळवंडलेली, अर्ध-नागडी पोरं. सगळ्या समाजाने लक्ष देऊन दुर्लक्षित केलेली. 

आज सकाळपासून गर्दी थोडी कमी होती. सदा नेहमी प्रमाणे लाल दिव्यामध्ये फुदकत होता. हातात फडकं घेऊन गाड्या उगाच पुसल्यासारखं करायचा आणि मग पैसे मागायचे. पण भीक मागणं तेवढ सोप नाही. त्याच एक विशिष्ट गणित असत. कोणाला मागायची, कुठे रेंगाळायचा, कुठल्या गाडी जवळ भटकायचं नाहीं. गाडीत एखादाच असेल तर कधी-कधी कारमधली उरलेली नाणी मिळत. साधारण तिशीतले दाम्पत्य असेल तर हमखास दहा ची नोट मिळणार आणि वरून गाडीतले उरलेले अन्न मिळणार. एकदा तर गाडीत अश्या दाम्पत्या सोबत लहान पोरग होत. तर सदाला चक्क गाडीतले एक खेळणे पण मिळाले होते. पण आज सकाळपासून सदाच्या चोचीला फारसा लागलं नव्हतं. ऊन वाढत होता आणि त्याला भूक लागली होती. पण त्यापेक्षा त्याला बोऱ्याची धास्ती जास्त होती. बोऱ्या म्हणजे चौकातला भिकाऱ्याच्या पोरांचा दादा. मिळणारे पैसे आणि तुकड्यात त्याचा वाटा. आणि नाही मिळाले किंव्हा कमी मिळाले तरी त्याचा वाटा नक्कीच. वरून चवीला थोडा मार. 

गाड्या भरधाव पळत होत्या आणि सदाचे डोळे 'लक्ष्य' शोधत होते.  

एक मोट्ठी टोयोटा येऊन थांबली. साधारण या गाड्यांजवळ जाण्यात फारसा अर्थ नसे. एकतर काच पुसायला सदाला त्या गाड्या उंच पडत आणि या गाड्या चालविणारे फार मग्रूर असत. पण खोडी काढायला म्हणून सदा फडके गाडीला घासत पुढे जाई. मग खिडकी खाली होऊन हमखास शिव्या बाहेर येत. त्या दिवशी पण तसे झाले नाही. पण गाडीतल्या एकाने सदाला हाक मारली. 

"पैसे चाहिये?"

सदाने मागे वळून बघितले. 

"पैसा चाहिये? इधर आ जरा"

सदा विचार करायला लागला कि जायचे कि नाही ते. एकदा त्याने कानफडात खाल्ली होती. त्याने दोन पावले घेतलीत आणि मग त्या आठवणीने पुन्हा थांबला. 

कारमधल्या एका जाड्याने त्याच्या पांढऱ्या बुश शर्टाच्या खिशातून दोन करकरीत नोटा काढून नाचवल्यात.

सदाचे डोळे चमकलेत. 

अजून कोणाला त्या नोटा दिसायच्या आत दोन गाड्या ओलांडून त्या मोठ्या गाडीच्या खिडकीशी सदा पोचला. 

"क्या नाम है तेरा?" खिडकीतला गुरकावला आणि नोटांचा हात उंच केला. 

पाचशे च्या दोन नोटा होत्या त्या. 

सदाने एवढी मोठी नोट कधी बघितली नव्हती. त्यांनी मोठ्ठा आवंढा गिळला. या नोटा आपल्याला मिळू शकतात या विचाराने त्याचे थकलेले डोळे लुकलुकलेत. 

"चाहिए?"

"हां" 

"तो नाम बता तेरा" 

"सदा" 

"सदा, आज तेरी लॉटरी लगी है|" ते ऐकून कारमधली त्या जाड्याच्या बाजूला बसलेले दोन लोक उधळल्या सारखी हसलीत. 

तेवढ्यात दिवा हिरवा झाला. 

सदा विचार करू लागला कि नोटा हिसकावुन पळायचे का ते. पण त्या माणसाचा हात आणि मनगट भक्कम दिसत होतं. नोट सुटायची नाहीं त्याच्या हातून आणि चुकूनही पकडल्या गेलो तर भक्कम बत्ती. गाडी हळूहळू पुढे जायला लागली. 

"दे दे भाई" आतला दुसर्याला म्हणाला. 

"सदा भाई, तू भी क्या याद रखेगा" असं म्हणत त्याने नोटा सदाला दिल्यात. 

"याद रखना, नोट-नोट पे लिखा है कमाने वाले का नाम" आणि गाडी झपाटयाने रहदारीत अदृश्य झाली. 

सदा काही क्षण स्तब्ध उभा होतं. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या बुडाशी जोरात हॉर्न वाजवला. दचकून सदाने  घाई-घाईने रस्त्याचा मध्यवर्ती कठडा गाठला. नोटा कुठे ठेवाव्यात त्याला कळेना. हातातल्या पुसायचा फडक्यात त्याने त्या तात्पुरत्या गुंडाळल्यात आणि पुढे काय करायचा याचा तो विचार करू लागला. बोऱ्याला कळले तर तो सगळेच पैसे ढापणार. अख्ख्या ब्रह्माण्डात स्वतःची अशी लपवायला फुटक्या कवडी एवढी जागा सदा कडे नव्हती. खिसे नाहीत, कपाट नाही, बॅग नाही, झोळी नाही,  संपूर्ण गणंग अस्तित्व. मागे एकदा त्यांनी युक्ती लढवून रस्त्याचे काम चालू होते त्यातल्या एका धोंड्याखाली काही नोटा लपविल्या होत्या. सकाळी उठला तर तो धोंडाच नाहीसा झालेला होता, रात्रीतून काम पूर्ण करून सगळे धोंडे मुनिसिपालिटी घेऊन गेली. नोटांच काय झालं कोणास ठाऊक? 

बरं पळून गेलो तर? पण जाणार कुठे? आणि ते पण अनवाणी पायांनी कुठपर्यंत जाणार? बोऱ्याकडे सायकल होती. तो नक्कीच शोधणार आणि मग यथेच्छ बडवणार. हातातल्या पाचशे च्या नोटा सदाला जणू आकाश दाखवीत होत्या पण त्याच वेळी भिंतीही बांधत होत्या. सदाचा मन पतंगा सारखा भराऱ्या घेत होतं पण त्याचा पेच सारखा बोऱ्याशी होत होता. सदाने विचार केला कि तासाभरात नास्ता करायला मिळेल तेंव्हा दुकानात जाऊन पोटभर दही-समोसा खायचा आणि मग उरलेले पैसे बोऱ्याला द्यायचेत. पण चहा राहिला? बरं, मग दही-समोसा आणि चहा आणि मग उरलेले पैसे बोऱ्याला. मार मिळाला तरी दही-सामोसा आणि चहाने भरलेल्या पोटी मिळेल.   

पण बोऱ्या होता कुठे? नेहमी चौकातल्या फ्लाय-ओव्हर च्या खांबाशी बसून तो सगळ्या पोरांकडे लक्ष देत असे. आज मात्र त्याची सावली पण दिसली नव्हती. सदाने नोटा त्याच्या चड्डीत जांघेच्या तिथे खुपसल्यात. तेवढ्यात पाठीवर थाप पडली. 

"का रे? आज आराम आहे वाटतं?" बोऱ्याने सदाला विचारले. 

"सकाळपासून शंभर गाड्या पुसल्यात पण एवढेच मिळालेत" असा म्हणत सदाने दहा-वीस च्या दोन-तीन मळक्या नोटा दाखविल्यात. 

"त्या मोठ्या गाडीच्या खिडकीशी उभा राहून काय गप्पा मारीत होतास?"

"उगाच ढील देत होते मला"

"पण त्यानें नोटा नाचवलेल्या बघितल मी"

"त्याच या वीस च्या आहेत"   

"त्या तर आधीच्या स्कूटरवाल्या बाईने दिल्यात ना?" बोऱ्याकडे कॅमेरा होता कि काय अशी शंका सदाला आली. 

"अजून काही नाही माझ्याकडे" सदा केविलवाणा आव आणून म्हणाला. पण मगाशी सदाने  पाठीवर मारलेल्या थापटीने सदाची हाडे दुखावली होती. 

"तुला काय मी येडा वाटतो का?"

सदाने आजू-बाजूला बघितलं. पोटात भुकेचा शूळ उठला होता. दही समोसे डोळ्यासमोर नाचत होते. उन्हाच दही नको खरं. ते दही कधीच ठेवलेलं असत कोण जाणे. मग समोस्याची चव आंबट होते. दही समोसा नकोच मग. समोसा चाट आणि चहा. आणि चहा पण दोन कप. 

" ऐ, उभ्या-उभ्या झोपला का रे?" 

सदाने झटक्यात रोरावत येणाऱ्या ट्रॅफिक मधे उडी मारली. दोन -चार हॉर्न कर्कश्य वाजलेत पण सदा ट्रॅफिक ची नस-नस ओळखत होता. मोठ्या सफाईने त्यांनी पलीकडचा फुटपाथ गाठला. 

"कुठे जाणार रे तू भाड्या?"

 सदाला फक्त्त 'कुठे' एवढेच ऐकू आले. पुढे कुठे जायचे याचा तो विचार करू लागला. त्यांनी डावा रस्ता ओलांडून फ्लाय-ओव्हरचा खांब गाठला. बोऱ्या त्याच्या मागे नव्हता. पण त्याने पण विरुद्ध दिशेचा फ्लाय-ओव्हर चा खांब गाठला होता. "ओय" अशी त्यांनी आरोळी ठोकली. त्या गाड्यांच्या गदारोळातही सदा ती हाक ऐकून गारठला. आता मार किती मिळणार याची मोजणी तो मनात करीत होता. समोर बसेस ची रांग लागली होती. त्यामागे बोऱ्या दिसेनासा झाला. सदा उभा असलेल्या खांबाच्या मागे विजेचा एक ट्रान्सफॉर्मर सारखा डब्बा होता. सदा त्या डब्याच्या खालती जाऊन लपला. त्याचे हृदयाचे ठोके बाहेर ऐकू येतील इतक्या जोरात धडधडत होते. बोऱ्याच्या रागाची धास्ती चौकातल्या प्रत्येक पोराला होती. कुठल्या थराला जाईल, किती मारेल, कशाने मारेल, कुठे मारेल याचा काही भरोसा नाही. 

त्याला तेवढ्यात डब्याजवळ कोणाचे तरी मळके पाय दिसले. गुण्याचे होते. 

"बोऱ्या दिसतोय का रे?" सदाने गुण्याला विचारले. 

"तुला कल्टी मारायला लागेल इथून" 

"बोऱ्याला माहितीय हि जागा?"

"त्याला सगळं माहिती असत बाबा. कॅमेरा असतो बहुतेक त्याच्या कडे. काय झोल केला तू एवढा? इतक्या दुरूनहि बोऱ्याचे डोळे आग ओकतांना दिसतायत" 

सदा टणकन उडी मारून बाहेर आला. त्याच्या नकळत त्याने सेकंद मोजले होते. पिवळा सिग्नल लागल्याचे त्याला न बघतां दिसल होत. तो वेगाने नाल्याच्या दिशेने धावू लागला. मधे त्याने ओझरती नजर मागे टाकली. डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याला बोऱ्या पण धावतांना दिसला. पण तो सदाच्या मागे धावत नव्हता. सदा नाल्याच्या काठावर पोचला तर बोऱ्या जणू त्याची वाट बघत उभा होता. 

सदाने धावता-धावताच दिशा बदलली आणि तो उजव्या बाजूला गेला. तिथे रस्त्याच्या काठावर बांधलेल्या कंबरे पर्यंतच्या उंचीच्या भिंतीच्या कठड्यावर तो चढला. बोऱ्या पण तिथे क्षणार्धात पोचला. 

"आत्तापर्यंत चुपचाप पैसे दिले असतेस तर मार कमी खाल्ला असतास. पण उगाच मला मेहेनत करायला लावलीस. धाववलस. आता काही मी तुला सोडत नाही. तुझ्या सगळ्या नाड्या माझ्या हातात आहेत." असा म्हणत बोऱ्या खिडखिडत हसला. त्याचे खर्रा आणि पान मसाला खाऊन रंगलेले दात विचकलेत. 

सदाकडे आता फारसे पर्याय उरले नव्हते. समोर रस्ता भरगच्च धावत होता. मागे नाला आणि मधे बोऱ्या. सदाने चड्डी सावरली आणि नाल्यात उडी मारली. पच्चकन नाल्याची घाण उडाली. नाल्यातून सदा पलीकडचा काठ गाठायला निघाला. त्याला खात्री होती कि बोऱ्या त्याच्या मागे नाल्यात नक्कीच उडी मारणार नाही. पण आता नाल्याच्या घाणीतून माखलेल्या त्याला नास्ता आणि चहा पण कोणी देणार नव्हते. पण सदाने ठरवले कि काहीही झाले तरी पैसे बोऱ्याच्या हाती लागू द्यायचे नाहीत. शक्यतोवर गतीने तो नाला ओलांडण्याचा प्रयत्न करीत होता पण ते तेवढे सोपे नव्हते. घाण, पाणी, चिखल, प्लास्टिक, काचा, झाडाच्या फांद्या आणि इतर अनेक अज्ञात घाणीच्या गोष्टीतुन चालणे सोपे नव्हते. काही वेळ चालल्यावर सदाच्या लक्षात आले कि नाल्यात मात्र घाण वास नव्हता. सगळं वास वरच उडून जात होता. आणि नाल्यात एक विचित्र शांतता होती. ट्रॅफिक चा आवाज दुरून घोंगावत होता. 

सदा प्रवाह बरोबर उजवी कडे वळला. त्याला धास्ती होती कि दुसऱ्या काठाला बोऱ्या उभा असायचा. थोड्या अंतरावर त्याला हनुमानाचे मंदिर दिसले. सदाला युक्ती सुचली.  त्याने ठरवले कि पैसे मंदिराच्या हुंडीत टाकायचेत. कोणालाच ना मिळो. मला नास्ता नको, बोऱ्याला पैसे नको. बोऱ्या दर शनिवारी मंदिरातला प्रसाद वाटत असे. हुंडीत पैसे टाकलेले बघून एखाद वेळेस तो कमी मारेल. 

जुन्या काळात जेंव्हा नदीचा नाला होता तेंव्हा प्रवाह च्या काठाचे हे मंदिर सुबक आणि सुंदर दिसत असणार. आता मात्र मंदिरात पोचणेही कठीण झाले होते. 

त्या घाणीतून सदाचा कंबरेखालचा काळ भाग हळू हळू वर येऊ लागला. त्यानें जांघ चाचपडली. नोटा शाबूत होत्या. काठावरच्या पायऱ्या सराईत पणे चढत सदा मंदिरात पोचला. देवाला नमस्कार करून घाई-घाईने त्याने त्या घाण नोटा हुंडीत कोंबल्या. त्याला हुश्श झाले. तेवढ्यात त्याला कानशिलावर मागून सणसणीत झापड पडली. तो भेलकांडून खालती पडला. त्याचा उजवा कान सुन्न झाला. त्याच्या डोळ्यातून क्षणार्धात अश्रूंची रहदारी सुरु झाली. 

"खूप पळवलंस रे तू मला भाड्या" बोऱ्या म्हणाला. "तुला काय वाटले कि तुला पळायला जागा आहे. तुझ्या सारखी शंभर पोट्टी उगाच नाही सांभाळत. आणि हुंडीत काय टाकलास रे?" हुंडीच्या पैसे टाकण्याच्या छिद्राशी नाल्याच्या घाणीचा पुरावा होता. 

"तुला काय वाटलं हनुमान रक्षण करतो हुंडीचं?"

शांतपणे खिशातून काही तरी काढीत बोऱ्याने खट्ट आवाज करीत हुंडी उघडली. ते बघून सदाचा चेहरा पार पडला. कानशिलं दुखत होती पण बोऱ्याने हुंडी उघडलेली बघून जणू सदाच्या हृदयालाच झापड पडली होती. त्याचा जगावरचा उरला सुराला विश्वासही उडाला. 

बोऱ्याने त्या घाण नोटा उंदीर मानगुटीने उचलावा तश्या उचलल्यात आणि जोर-जोरात खिदळायला लागला. "यासाठी एवढी धाव-पळ करवलीस? या नोटां साठी? कचरा आहेत या नोटा, रद्दी! नोटबंदीत या नोटा निकम्म्या झाल्यात. त्या मोठ्या गाडीवाल्यांना बदलत्या आल्या नाहीत म्हणून तुझा गेम घ्यायला तुला चारल्यात."  प्रत्येक शब्दामागे बोऱ्याचे हसणे वाढत होते. त्यानें त्या नोटा सदाच्या तोंडावर फेकल्यात. नाल्याची घाण सदाच्या नाकावर चिपकली. सदाला नोटबंदी म्हणजे काय झेपलं नाही. पण नोटा निकम्म्या कश्या होऊ शकतील त्याचा तो विचार करीत होता. 

"आता आज दिवसभर भूकाच रहा. बघू कसा खातो ते" असा म्हणत बोऱ्या नाहीसा झाला. 

नाल्याचा वास दरवळत होता आणि सदा तिथेच बसलेला होता. एकटाच.  

3/18/12

एका म्हातारीची गोष्ट

'एका म्हातारीची गोष्ट' ही माझी लघु-कथा अक्षर वांग्मय या साहित्यिक मासिकाच्या यंदाच्या अंकात प्रकाशित झाली. कुठल्या मासिकात प्रकाशित होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. श्री अरुण प्रभुणे आणि मासिकाचे प्रकाशक श्री नानासाहेब सूर्यवंशी यांचा मी आभारी आहे.

ब्लॉगच्या वाचकांनाही ही कथा आवडेल अशी मी आशा करतो.

कळावे. लोभ असावा.

आपला,

चिन्मय भारद्वाज

http://prabhune.com/ArunP/Arun.htm

=====

बुलढाण्याच्या दरिद्री रेल्वे स्टेशन दुपारच्या वेळी अस्ताव्यस्त लोळत पडल होत. सकाळच्या येणार्‍या गाड्या येउन गेल्या होत्या. दुपरच्या यायल थोडा अवकाश होता. थंडीच्या दिवसातल असुनही ते उन बोचत होत. सावली बघुन रुळांच्या खोबणीत काही कुत्री निवांत पहुडली होती. आलुबोंड्यांच्या ठेल्याला चिकटून एक म्हातारी शुन्यात नजर लाउन बसली होती. तीच्या मळक्या रखरखीत तळव्यांमधे दहा रुपयांची नोट कशीबशी तग धरून मिटलेली होती. ती अगदीच रिकामी होती. हातात एकही बांगडी नाही ना गळ्यात काही. कपाळही अगदी ठणठणीत. मांडीला टेकुन उभा असलेला खांदाभर उंचीचा दांडू सोडला तर तिच्याकडे काहीच नव्हत. तिची नजर जरी शुन्यात मग्न असलेत तरी मनात विचारांची घाई-गडबड उडालेली दिसत होती. अचानक ठेलेवाल्यानी "आलु....बों....डे.......!" अशी आरोळी मारली. ती म्हातारी अक्षरशः जागची हलली.


"का रे ५० मैलात एक गाडी नाही आणि तुझी परवाची बोंडे ती कुत्रीही सुंगणार नाही, हाका कोणाला मारतोस?"


त्या ठेलेवाल्याने दूर्लक्ष केल. धूळ झटकावी तस त्याने बोंड्यांवर फडक मारल आणि अजुन एक आरोळी मारत त्याने घसा खाकरला.


"मुंबई-नागपूर वेळेवर आहे का रे?"


"कुठली?"


"चार ची"


"हाओ" नागपूरी ठेक्यात त्याने हो म्हटल.


तिने प्लॅटफोर्म वरच्या मोठ्ठ्या घडळ्यावर नजर टाकली. चारला जेमतेम दहा मिनिटे होती. ती काठीचा आधार घेत उभी झाली आणि घाई-घाईनी आईस-क्रिमच्या ठेल्याकडे चालायला लागली. तो पर्यंत दूरून गाडीने पोंगा मारला. रुळावरची सगळी कुत्री गायब झाली होती. त्यांनाही टाईम-टेबल पाठ असाव.


"अरे एक आईस-क्रीम देतोस का रे?"


"कुठल?"


"गाडी येतेय रे लौकर दे" अस म्हणत तिने ती अर्धमेली नोट त्याच्या समोर झटकली.


"हो पण कुठल?"


"ते..ते वाल दे"


त्याने झाकण उघडुन तिच्या समोर आईसक्रिम ठेवल.


"अरे सील कशाला उघडलस. बंद वाल दे"


"आधी नाही का सांगायच"


"अरे माझ्या साठी नाही या रे. नातवासाठी आहे. उघडा डब्बा बघुन उष्ट आहे म्हणाला तर म्हणुन सील बंद हव."

तेवढ्यात प्लॅटफॉर्म वर गाडी लागली.


"लौकर दे रे"


"दहा रुपये द्या अजुन"


"अजुन दहा रुपये कसले?"


"दुसर्‍या डब्ब्याचे"


"अरे पण सील काढायला तुझ्या बा नी सांगितल होत का?" म्हातारी तापत बोलली.


"ये लेना है तो लो" तो पोरगा खेकसला.


तेवढ्यात दुकानाचा मालक आला.


"इसको बोलो सील-बंद डब्बा देने को" म्हातारी विनवणीच्या सुरात म्हणाली.


एव्हाना लोक गाडीतून उतरून इकडे-तिकडे फिरायला लागली होती. उत्सवमूर्ती आल्यावर जशी धांदल उडते तशी खाण्याच्या आणि सटर-फटर गोष्टी विकणार्‍यांची धावपळ चालली होती. सगळे ठेलेवाले बेंबीच्या देठापासुन बोंबा-बोंब करत होते.


मालकाने म्हातारीला बघुन मोठ्ठा उसासा टाकला आणि फ्रिज मधुन आईसक्रीम चा सील बंद डब्बा तिला दिला.

म्हातारी लगबगीने ते आईसक्रीम घेउन ट्रेनचे डब्बे पालथे घालायला लागली. तिचा जेमतेम एक डब्बा चालून होई तोवर ट्रेन हळु हळु पुढे सरकायला लागली होती. तिचे डोळे घाबरे झालेत. तिला अपेक्षित ते कोणीच दिसेना.


"सुरेश....अरे सुरेश" अश्या तिने मोठ्याने हाका मारायला सुरुवात केली.


बघता बघता ट्रेन दिसेनाशी झाली. थोडेफार उतरलेले पाहुणेही पांगलेत. स्टेशन घडी पूर्ववत घालावी तस पुन्हा पहिले सारख अस्ताव्यस्त पसरल.


म्हातारी हातात वितळणार्‍या आईसक्रीमचा डब्बा घेउन एकटीच पाठमोर्‍या ट्रेनला बघत उभी होती.

'ट्रेन चुकली असेल पोराची. पुढल्या गुरुवारी येइल नक्की' अस काहीस पुटपुटत ती दाराकडे चालू लागली. हातातल आईसक्रीम तिने कचर्‍याच्या ढिगात भिरकाउन दिल.


भिकार्‍याच्या पोरानी ते बघितल. त्या घाणीत उडी मारुन ते आईसक्रीम त्याने शोधल. त्या बरबटलेल्या जागेत फतकर मारुन त्याने ते तो मटकवायला लागला.

9/21/11

मनोहर




खोलीत वातावरण तंग होत. कोपर्‍यात एक बाई रडत उभी होती. फार घाबरलेली. भिंतीशी एक मध्यम वयीन माणुस थरथरत भिंतीला तोंड करुन  उभा होता. त्याच्या डोक्याला बंदुक लाऊन एक पोलिसच्या वेषातला व्यक्ती उभा होता.
"हजार रुपये प्रत्येक इंचाला" खुर्चीवर बसलेल्या दुसरा व्यक्ती बोलला. तोही पोलिसच्या वेषातच होता.
"याच्या कानशीलाच्या पाच इंचाच्या आत गोळी मारली तर हजार रुपये. चार इंचाच्या आत मारली तर दोन हजार" तो पुढे म्हणाला.
"साल्या कटिंग चहा पाजतोयस का?"
खुर्चीवरचा माणूस भेसूर खिदळायला लागला. "कटिंग चहा!"
"अहो वहिनी चहा करता का थोडा?" बंदुक वाला माणुस बोलला. "पाहुण्यांना चहा-पाणी विचारायची रीत नाही वाटत या घरात"
भिंतींला टेकलेल्या माणसाला घामाची आंघोळ झाली होती.
"तुम्ही पोलिस आहात की हैवान?" त्याच्या तोंडुन शब्द अडखळत बाहेर पडले.
ती दोघे जण अजुनच खिदळायला लागलीत.
"हैवान? कोण वापरत हा शब्द आजकाल?" बंदुक वाला किचकट हसत म्हणाला.
"मराठी मिडमचा दिसतोय" खुर्ची बोलली.
"आणि साल्या तू मोठा कॉन्वेंट ला गेलायस?" बंदुकवाला खेकसला.
"ए इकडे तोंड कर" अस म्हणत बंदुक वाल्यानी त्या भिंतींला टेकलेल्याला टपली मारली.
"शिंग दिसतायत का आमच्या डोक्यावर?"
खुर्चीवाला ते ऐकुन परत खिदळायला लागला. "शिंग" अस म्हणत त्याच हसण वाढतच गेल.
बंदुक वाल्याने फाडकन गोळी मारली.
खोलीत शांततेचा आणि बारुदीचा संमिश्र वास शिगोशिग भरला. कोपर्‍यातल्या बाई डोळे मोठ्ठे करुन  खालती बसल्या.
"काढ दोन हजार रुपये. चार इंचाच्या आत आहे बघ"
भिंतींला टेकलेल्या माणसाची स्थिती बघवत नव्हती. तो तत्-पप् करायला लागला होता.
"हैवान असतो तर तुझा खोपडा उडालेला असता"
मग बंदुक त्या माणसाच्या तोंडात खुपसुन त्या बंदुक वाल्याने विचारल "मनोहर कुठेय?"
"तत्-पप् काय करतोस? बोल, बोल ना... मातीच तोंड दिलय का देवानी?"
"अरे ए दोन हजार काढुन ठेव"
"साहेब आता दुरुन नेम धरा. याच्या दुप्पट लावतो"
"का रे साल्या खुप चरायाला मिळतय सध्या तुला"
"तुमची कृपा साहेब"
तो बंदुकवाला हळु-हळु मागे सरायला लागला. त्याने बंदुक रोखलेलीच होती.
"मनोहर मला माहिती नाही"
"असा कसा माहिती नाही. वकिल साहेबांना मारा-पिट्या करायला बरा सापडतो"
"अरे सांगुन दे साहेबांना. अस उंदरासारख तुला छळायला आम्हालाही आवडत नाही."
"बघ तीन इंचाच्या आत मारतो इतक्या दुरुन. पोलिस अकादमीतुन फुकटात पास नाही झालो."

ठ्यँव!

वातावरण स्तब्ध झाल.

"साहेब काय केलत"

त्या साहेबालाही एव्हाना घाम फुटलेला होता.

रक्ताची सरळ रेख आखत त्या माणसाच धड भिंतीला चिकटुन खाली बसल.
तेवढ्यात दार उघडुन कोणीतरी आत आल.

हवालदाराने मोठ्ठा आवंढा गिळला.

"साहेब, मनोहर!"

(क्रमशः की समाप्त?)


2/15/10

गाथा दाढी-मिश्यांची (माझ्या)

मला दाढी-मिशी खुप वर्षांपासुन वाढवायची होती. म्हणजे बघा, मला चेहर्‍यावर एकही केस नव्हता तेंव्हापासुन. आमचे आजोबा जुन्या पद्धतीने अंगणात सकाळी उन्हात आरसा समोर ठेउन दाढी करत असत. त्यांच्या दाढी करण्याला एक वेगळीच नजाकत होती. आधी सगळी तयारी करायची मग चहा प्यायचा. जणु काही दाढीच सामान भिजत ठेवलय आणि मग सतरंजीवर बसुन दाढी करायची. माझ्या वडिलांना भरघोस मिश्या आहेत. मुच्छाकडा मिश्या नाहीत पण अनिल कपूर सारख्या. त्यांना छान दिसते मिशी. मला ही तसलीच मिशी हवी होती. बाबा दाढी वाढवत नसत. पण मला माहिती होत कि मला दाढी कोणासारखी हवी होती ती - शेखर कपूर. बास, मॅटर सेटल्ड! पण आयुष्यात नेहमीच हव्या असलेल्या गोष्टी होत नाही. नाहीतर माझ्यावर हा लेख लिहायची वेळ आली नसती. तुम्ही मला दिगजाम च्या जाहिरातीत बघितल असत. बर, एखाद वेळेस तेवढ नाही पण तरी माझ्याकडे बघुन, दाढी हो तो ऐसी अस नक्कीच मनातल्या मनात म्हटल असत. लहानपणी दूरदर्शन वर रात्री ओल्ड स्पाईस ची चाहिरात येत असे. त्यात सुदृढ (!) शरीरयष्टीचे पुरुष समुद्राच्या लाटांवर सर्फिंग करतांना दाखवत असत. 'the best man can get' . माझ्या मामाने त्याच्या ओल्ड स्पाईस ची रिकामी बाटली दिली होती. त्यात पाणी घालुन मी गालाला लावत असे. ते बघुन त्याने सल्ला दिला की मी मिश्यांच्या ठिकाणी तेल लावल तर लौकर मिशी येईल. मी आपला तेल लाऊ लागलो. घरातल्यांच्या फिदीफिदी हसण्याकडे मी मुळीच लक्ष दिलं नाही. कधी एकदा शेविंग करुन ओल्ड स्पाईस चेहर्‍यावर थोबकाळीन अस मला होत असे. पण शेविंग केली आणि ओल्ड स्पाईस लावल तरी दिगजाम च मॉडेलिंग करता येण कठीण होत. पण ती भानगड नंतरची नंतर बघु. आधी मिसुरड फुटण आवश्यक होत.

माझा मोठ्या भावाला, सहाजिकच आता मोठा असल्यामुळे, माझ्या आधी मिसुरड फुटल. मला त्रास द्यायला त्याला अजुन एक साधन मिळाल.
'चिन्मय इकडे ये लौकर'
"काय आहे?"
"ये तर, गंमत आहे"
मी आपला घोड्यावर स्वार होऊन मागल्या अंगणात पोचत असे. खरतर 'गंमतीच्या' कुतुहलापुढे माझ्या वयाचे घोडे गेले होते.
मग तो बाबांच शेविंग क्रिम लाउन त्याचे गालावरचे केस शोधत शेविंग करण्याच्या उद्योगात असे.
"बघ"
"मलाहि आहेत तेवढे केस" मी तोंड वेंगाडत म्हणायचो.
"फक्त पुरुषांना येते दाढी आणि मिशी. मर्दा-ने-जंग"
मग मी पाण्याचा तांब्या घेउन त्याच्या मागे धावत असे. त्याची चांगली करमणुक होत असे.

मला हा प्रकार असह्य झाला आणि शेवटी मी म्यानातुन तलवार काढली. एक दिवशी तोंडाला शेविंग क्रिम लाउन वस्तरा फिरवला. मग बाबांची नक्कल करत आरश्याच्या जवळ जाउन दाढी नीट झाली का ते बघितल. फारसा फरक जाणवला नाही आणि दादाने मल हे धंदे करतांना मात्र पकडल. संध्याकाळी आता बाबा बत्ती देणार याची खात्री होती पण झाल उलटच. ते मला म्हणालेत की आता तुला खुप दाढी येणार. आणि अशी नको असतांना दाढी केली म्हणुन केस राठ येतील. हत्तीच्या केसांसारखे टोचतील तुलाच.
मार पडला असता तरी परवडला असता कारण पुढला आठवडाभर मी फार टेंशन मधे होतो. मला रात्री स्वप्नात मला स्वतःचे केस टोचायला लागलेत. सुदैवाने तस काही झाल नाही.

११वी नंतर माझ्या ओठांवर केस लाजत-गाजत entry मारु लागलेत. माझ्या बर्‍याच मित्र मंडळीला दिवसातुन दोनदा दाढी करायची वेळ आली होती. मी मात्र दररोज सकाळी आज कुठे आणि किती उपटालेयत याच्या नोंदी घ्यायला लागलो. वर्षभराने बर्‍यापैकी मंडळी जमली होती. दुरुन बघितल तर याला मिशी आहे की नाही असा प्रश्न लोकांना नक्कीच पडत असणार. याला मिशी मूळीच नाही या ऐवजी निदान आता शंकेस वाव आहे हि प्रगतीची चिन्ह होती. दाढीची दशा मात्र केविलवाणी होती. दाढा जिथे असतात त्या गालाच्या भागावर थोडे बहुत केस डोकवायला लागले होते पण तेवढेच. बाकी मैदान साफ चका-चक था। पण आता तर कुठे सुरुवात होती. काहीच वर्षात पूर्ण शिवाजी. यावरुन एकविचार डोक्यात आला , शिवाजी महाराजांच्या जमान्यात विशिची पोरं लढत असत. त्यात जर का कोणची गत माझ्या सारखी असेल तर त्याची काय दशा होत असेल. विचार न केलेला बरा! दुरुन मी तलवार घेउन घोड्यावरून येतांना बघुन कोणाला प्रश्न पडायचा की हा पोरगा लढायला येतोय की माझी spare तलवार पोचवायला येतोय. इज्जतचा टोटल भाजी-पाला!

कॉलेज मधे असतांना मला बर्‍यापैकी दाढी आणि मिशी येउ लागली होती. पण वस्तुस्थिती केविलवाणीच होती. भरघोस या शब्दप्रयोगाच्या फार म्हणजे फारच दूर अंतरावर माझ्या दाढी-मिशीने पडाव टाकला होता. इतकी वर्ष वस्तरा फिरवुन केस राठ झाले होते एवढीच प्रगती होती. आणि आठवडाभर दाढी करण्यापासुन संन्यास घेतला तर झोपतांना केस टोचत असत. पण मी हार न मानता विविध प्रयोग करू लागलो. एकदा मी अनुवठीवरचे केस वाढु दिलेत. काही महिन्यांनी चिनी लोकांसारखे खुंटा एवढे केस लोंबकळायला लागलेत. (आई च्या मते मी बोकड दिसत होतो पण मी न ऐकल्या सारख केलं.) पण सगळ्या विमानतळांवर माझ्याकडे विशेष लक्ष द्यायला लागल्यावर माझ्या लक्षात आल की मी चिनी सोडुन 'भलत्याच' लोकांसारखा दिसतोय. मी लगेच कापणी केली.

पण जोरदार, मर्दानी दाढी मिशी येण हा सुध्दा नशिबाचा भाग असतो हे मला हळु हळु उमगायला लागल. माझ्या एका मित्राच म्हणण की मनुष्याच्या मेंदुचा विकास २२ व्या वर्षानंतर थांबतो तस माझ्या दाढी-मिश्यांची गत झाली आहे. मला अशी सुक्ष्म शंका आहे की तो मला दाढी-मिश्यांच्या व्यतिरिक्त टोमणा मारत होता. त्या विषयावर नंतर बोलुया. मला मनाजोग्या दाढी मिश्या कधीच येणार नाही हे मी मान्य करायला लागलो होतो एवढ खर. पण शेवटचा प्रयत्न म्हणुन ठरवल की फ्रेंच कट ठेवायचा. आता नाचता येइना आंगण वा़कड याच ज्वलंत उदाहरण अजुन दुसर शोधुन सापडायच नाही. केसांचा पत्ता नाही, चाललो मी भांग काढायला.

तब्बल दोन महिन्यांनंतर बोकडाची दाढी आणि अमोल पालेकरची मिशी अस काहीसा विचित्र प्रकार उगवला. दाढीचे ते काळ्या रंगाचे कापसाच्या गाठींसारखे पुंजके हास्यास्पद दिसत होते की केविलवाणे हा अभ्यासाचा विषय ठरेल. लोक मला मी आजारी आहे का विचारायला लागलेत. पण हे सगळे तत्सम वार मी आधीही झेलले होते पण मला एका पोरीनी माझ्या वयाचा कयास तिशीच्या बराच पुढे लावल्यावर मात्र मी शेवटली हार मानली. म्हणजे एवढा अट्टहास करुन मी आजारीच नाही तर वयाचाही दिसतो?

शेखर कपूरची तर ऐसी का तैसी!

आताशा मी दररोज सकाळी उठुन दाढी करुन चिकना-चिट्टा बनुन कामाला जातो. जास्त विचार करत नाही. पण आरश्यात बघुन अजुनही मनाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात वाटत की...

12/13/08

घर

मी आणि बाबा अमरावतीहुन येत होतो. अमरावतीला माझी आत्या रहात असे. बाबांची सगळ्यात मोठी बहिण. अमरावतीचा रस्ता फारच दळिद्री होता. बर्‍याच वर्षात रस्त्याची डागडुजी झाली नव्हती. त्यामुळे साधारण चार तासाच्या प्रवासाला सहा तास आरामात लागत असत. आम्ही सकाळची बस पकडली होती. पण सकाळची बस पकडली की माझ पोट नेहमी खराब होत असे. माझ पोट बस सुरु झाल्यापासुन ढवळायला लागल. पेट्रोल चा तो जळका वास आणि रस्त्यातील खड्डे म्हणजे मला कधी घरी पोचू अस झाल होत. प्रत्येक खड्डा जणु आमची प्रेमाने विचारपूस करत होता. मी झोपण्याचा प्रयत्न करत होतो. पण माझा डावा डोळा फडफडत होता.. अस कधी होत नसे. मी आपला परत खड्डे मोजु लागलो. शेवटी रडत-खडत आमची बस शहरात पोचली. अंगावर थोड सामान होत म्हणुन आम्ही रिक्षा केली. माझी सारखी चुळबुळ चालू होती. कधी घरी पोचीन अस झाल होत. आम्ही गल्लीत आलो तर गल्लीत सामसूम होती. आमच्या घराच फाटक सताड उघड होत. आमच्या घराच्या बाहेरच्या अंगणात सीताफळाच झाड होत. पोर कधी कधी फळांमागे सरळ फाटक उघडुन आत येत असत. तसलीच काही तरी भानगड असावी. मी उतरुन दारापाशी गेलो, बाबा रिक्षेवाल्याला पैसे देत होते. मी दाराजवळ पोचलोच तोच माझा हृदयाचा ठोका चुकला. दाराला कुलुप नव्हत आणि घराचे दार किलकिल उघड होत. मी हळुच सामान खाली ठेवल. बाबा माझ्या मागे येऊन उभे होते. माझ पोटं ढवळण स्विच बंद कराव तस थांबल होत. मी दार ढकलायला हात पुढे नेला तेवढ्यात घरातुन वीट पडण्याचा आवाज आला. माझा हात दारापर्यंत गेलाच नाही. काही क्षण असेच गेलेत. मी वळुन बाबांकडे बघितल. बाबा बारकाईने घराच्या खिडक्यांच निरिक्षण करत होते. त्यांच्या कपाळावर आठ्यांच जाळ पसरल होत. खिडक्या सगळ्या घट्ट बंद होत्या. त्यांनी माझ्याकडे बघितल. आम्हा दोघांच्या लक्षात आल कि घरातून कोणी तरी आमची चाहूल घेतय. बाबा माझ्या जवळ येऊन कानात कुजबुजले. " चिन्मय, एक काम कर. मागच्या गल्लीत जा आणि तिथुन भिंतीवरून चढुन गच्चीत ये. मी तो पर्यंत शेजारच्या आणि आपल्या घरामधल्या भिंतिवरुन चढुन पुढल्या बाजुनी गच्चीत येतो. आजुबाजुला इतकी शांतता होती की त्यांच कुजबुजण गल्लीच्या टोकाशी ऐकु गेल असेल. मी हळु-हळू एक पाऊल मागे टाकत अंगणाबाहेर आलो आणि मागच्या गल्लीकडे मी धूम ठोकली. बाबा तो पर्यंत समोरून भिंतीवरून चढण्याचा प्रयत्न करत होते.

आमचं घर फारस मोठ नाही. प्रशस्त होत पण मोठ नव्हत. शेजारच्या आजोबांनी आणि माझ्या आजोबांनी मिळुन ते घर घेतल होत. शेजारच्या आजोबांचा वाटा मोठा होता. आमच्या घरात मध्यभागी अंगण होत आणि तिन्ही बाजुंनी घराच्या खोल्या अंगणात उघडत असत. चौथ्या बाजुला न्हाणीघर होत. डाव्या अंगानी गच्चीवर जायला जिना होता. वरच्या मजल्यावर अजुन दोन खोल्या आणि गच्ची होती. घराच्या मागल्या बाजुला एक लहानशी बोळ होती. तीत बरीच झाडी आणि गवत वाढल होत. माझा बेत त्या गल्लीतून घराच्या मागल्या बाजूनी वर चढण्याचा होता. एक मजलीच घर होत त्यामूळे चढता येण शक्य झाल असत. मी मागल्या बोळात उभ राहून नेमक कुठुन आणि कस चढायच याचा विचार करत होतो. काहीतरी धाडसी कृत्य करणार या विचारानी माझ्या अंगावर रोमांच आला होता. चढायच्या आधी मी भिंतीला कान लाऊन आडोसा घेतला तर घरातून अगम्य असा थड-थड असा आवाज येत होता. मी पाईपला धरून वर चढु लागलो तर तो आवाज वाढत गेला. मी गच्चीवर पोचलो तर घरभर विचित्र वातावरण होत. थड-थड आवाज तर येतच होता आणि कसला तरी जळण्याचा वास येत होता. सगळी कडे जळमट लागली होती. भिंतींवरून काहीतरी ठिकठिकाणी लोंबकळत होत. मी निरखुन बघितल तर कोणीतरी पोपडे खरचचवून काढले होते.आम्हाला जाऊन एक आठवडाही झाला नव्हता त्यात घराची एवढी अवदशा ? वरच्या दोन खोल्याच्या दारांवर व खिडक्यांवर गडद पोपटी रंगाचे फुलाफुलांचे पडदे घट्ट लावले होते. त्यामागे गाद्या असाव्यात. बहुतेक आवाज बाहेर जाऊ नये म्हणुन असाव. म्हणजे फक्त खालच्या घरात नव्हे तर वरच्या खोल्यांमधेही कोणीतरी आहे या विचारानी मी सावध झालो. पण घरात अस कोंडून घेऊन ही लोक नेमक काय करतायत ते कळत नव्हत. बाबा समोरून चढून येणार होते ते अजुन पोचलेच नव्हते. खरतर घराच्या समोरच्या बाजुनी चढण सोप होत. त्यांना समोरून धरल तर नाही या विचारानी मला घाम फुटला. तसेही ते गच्चीत भेटणार होते की मधल्या चौकात ते त्यांनी सांगितलच नव्हत. वाट तरी किती बघायची? गंमत-जंमत थोडीच चालली होती.

मी मांजरीच्या पावलांनी जिना उतरत मधल्या चौकात आलो. थड-थड आवाज घड्याळाच्या काट्याप्रमाणे येत होता. मधल्या चौकातला पाळणा काढून ठेवला होता. कुंडीतली झाड जळून गेली होती. रॉकेल टाकुन जाळली होती. बहुधा तोच वास असावा. रॉकेल टाकुन झाड जाळावी या कल्पनेनी माझ्या अंगावर काटा आला. च्यायला चालल काय आहे? मला घरातून पावलांची आवाज ऐकु येऊ लागले. सिमेंटच्या पोपड्यावर कसलीतरी खरखरीत पाऊल पडत होती. न्हाणीघराच्या दरवाज्यांना मोठ्ठ कुलुप लावल होत. स्वयंपाकघरात जाणारा दरवाजा बाहेरच्या दरवाज्यासारखा किलकिला उघडा होता. संरक्षणासाठी हातात काहीतरी हव म्हणुन मी शोधाशोध करू लागलो. पण काहीच मिळेना. माझ्या अचानक लक्षात आल कि घरातून येणारे आवाज थांबले आहेत. थड-थड आवाजही थांबलाय. माझ्या शोधा-शोधीत माझी चाहूल आतल्यांना लागली असावी. आता मात्र जास्त वेळ घालविण्यात अर्थ नव्हता. मी तडक स्वयंपाकाघराच्या दरवाज्याकडे सरसावलो. क्षणभर मी दरवाज्यापुढे रेंगाळलो. आत काय असेल? कोण असेल? हे सगळ गुढ काय आहे? बाबा कुठेयत? उगाच शिवाजी बनुन इथे आलो. आधी दोन-चार लोकांना एकत्र करूनच यायला हव होत. पण आता मागे फिरण नव्हत एवढ नक्की. आता आर-या-पार!
डोंबल आर-या-पार. हातात शंख आणि चाललो मी चोरांना पकडायला. पण घरात चोर आहेत कशावरून? विक्षिप्त विचारांनी डोक्यात पिंगा घातला होता.
शेवटी मी किलकिला दरवाजा हळुच ढकलला. घरात अंधार होता. पण अर्धवट उघड्या दरवाज्याच्या प्रकाशात भिंतींच्या वीटा दिसत होत्या. मी डोकावून उजवीकडे नजर टाकली तर देवघराच्या दारातून कोणीतरी माझ्याकडे डोकावून बघत होत. ती नजर स्थिर होती आणि इतक्या दूरून मला त्या खुनशी नजरेनी थंड केल. माझ्या डाव्या डोळ्याची पापणी भीतीनी फडफडु लागली पण ती नजर स्थिरच होती. मी खालती बघितल तर मला त्या आकृतीच्या हातातली कुर्‍हाड पुसटशी दिसली. माझा मेंदू गुंग झाला होता आणिहृदय छातीतून उडी मारून पळून जायची तयारी करत होत. माझ्या पायाला काहीतरी ओल लागल. रक्त होत ते! मी ओरडण्याचा प्रयत्न करू लागलो. पण भीतीनी घशातून आवाजच फुटेना. तोंडाला कोरड पडली होती. तेवढ्यात कुठुनतरी चिन्मय चिन्मय हाक ऐकु येऊ लागली. म्हणजे बाबा आलेत की काय?

"काय झाल बाळा?" बाबा मला हलवुन उठवत होते.

मी खडबडुन जागा झालो. अजुन बस नागपूरला पोचायचीच होती. हे सगळ स्वप्न होत या विचारानी मला हायस वाटल.
पाणी हवय का बाळा?" बाबांनी विचारल. आजुबाजुची बरीच मंडळी माझ्याकडे बघत होती. सगळ्यांसमोर बाबा मल 'बाळ' म्हणत होते त्याची मला थोडी लाज वाटत होती.
"काही तरी विचित्र स्वप्न पडल होत" मी म्हटल.
"नशिबवान आहेस. खड्ड्यातून इतक अंग घुसळत असतांना तुला बरी स्वप्न पडतात!" बाबा हसत म्हणाले.
परत थड-थड आवाज येऊ लागला. समोरच्या सीटवर बसलेल्या कोणाचा तरी स्टील चा डब्ब्याचा तो आवाज होता. त्या डब्ब्यातून तेल गळुन माझा पाय माखला होता.

6/14/08

फिनिक्स

तुमच्या सारखं अजुन बरेच लोक विचारतात की गुजराती असुन मी कंम्प्युटर मधे काय काम करतोय? धंदा-पाणी कसा नाही माझा. आमचा होता मोठा दुकानं. कपड्याचा. आम्ही एकुण तीन भाई आहोत आणि बाबा असे सगळे धंदा बघायचो. भेंडी बाजार मधी मोठ्ठा दुकान होता. हाताला नोकर-चाकर होते. बाबांनी टाकलं होत दुकान त्यांच्या जवानीत आणि रक्ताचं पाणी करुन वाढवलं होत. आता ते फक्त गल्ल्यावर बसतात आम्ही पोरच सगळी काम करतो. कपडा कुठला आणायचा, किती माल हवा, किंमत केवढी हवी इथ पासुन तर कपड्याची मांडणी कशी करायची आणि नोकरांचे पगार असा सगळा बराच कामं असायचा. त्यातुन नोकर सोडुन जाणार तो डोक्याला वेगळा ताप असायचा. पण तीन नोकर खास होते. बर्‍याच वर्षांपासुन आमच्याच कडे होते. आम्ही सगळं कुटुंब एकत्रच रहातो. दोन फ्लॅट जोडुन आहेत. बाबा म्हणत होते की धंदा वाढावायला हवा. तीन भाई किती दिवस एकच दुकान सांभाळणार. आमच्या पत्नी गर्भवती होत्या. माझ्या डोक्यात अजुन एक दुकानं उघडण्याचं होत. मुंबईला कुठे काही स्वस्त असत. आणि नवा धंदा टाकायचा म्हणजे भांडवलाचा मुख्य प्रश्न असतो. तेंव्हाच्या जमान्यात बँका साल्या माजलेल्या होत्या. प्रायवेट बँका येण्याच्या आधीचा जमाना होता. मी अजुन काही शेठ मंडळींशी भेटी-गाठी करत होतो. एक चालतं दुकान असलं म्हणजे पैसा देणार्‍याला धास्ती कमी वाटते. पैसा एका दुकानात खेळता आहे त्यामुळे दुसर्‍या दुकानासाठी पैसा दिला तर बुडीत खात जाणार नाही. पण असली कामं हळु-हळु होतात।

गोष्टी कधी कश्या बदलतील हे सांगण नेहमीच कठीण असत. खुपदा असही होत की आपली काही चूक नसते तरी बराच त्रास अंगावर पडतो. खुप तमाशे केले तरी काही फरक पडत नाही. आगीत पडल की नाचुन थोडीच अंगाला चटके लागण थांबत. आमचं दुकान भेंडी बाजारात होत तरी आम्हाला कधी कशाची भीती वाटली नाही. आजु-बाजुला मुसलमानच होते पण आमच्या दुकानांच्या लाईनीत सगळ्या हिंदुंचीच दुकान होती. आमच्या कडचे बरेचशे पोरे मुसलमानच असत. भेंडी बाजा़र तसा भाई लोगचाच इलाका आहे. आम्ही छोटा शकील, दाउद इब्राहिमला आमच्या डोळ्यांनी बघीतल आहे. तेंव्हा पण तेंव्हा त्यांच्या सारखे बरेच भाई लोक तिथे हिंडत असत. एका जमान्यात हाजी मस्तानचा खुप वचका होता. पण तो बाबांच्या जमान्यात. दाऊद इब्राहिम सारख्या घाणेरड्या लोकांपुढे हाजी मस्तान काय किंवा वरदराजच काय, देव माणुस होता. स्मगलिंग करा किंवा हातभट्टीची दारु विका पण खाल्ल्या थाळीत छेद तर नका करु. ज्या देशात रहाता त्याच्याशी तर गद्दारी करायला नको. अयोध्याच्या राम मंदिराचा मुद्दा जेंव्हा पेटायला लागला तेंव्हा आमच्या दुकानाच्या इलाक्यात माहोल तंग होऊ लागला. डिसेंबर मधे ती इमारत पडली त्याच्या भूकंप आमच्या बुडाखाली आला. मुंबई सोबत आमची जिंदगीपण पेटली. आजु-बाजुला मुसलमानच असल्यामुळे आमच दुकान सहाजिकच लॉक-डाउन झाल. हळु-हळु दंगली वाढत गेल्या. आमच्या मुलुंडमधे शांतता होती पण दुकानच्या चिंतेनी मन रमत नव्हत. जानेवारीच्या शेवटाला दुकाना पर्यंत पोचता आल. दुकानात काहीच वाचल नव्हत. व्यवस्थितरित्या दुकान उघडुन सगळा माल चोरुन घेउन गेले होते. कुर्‍हाडीने लॉक तोडल. मग दिवसा-ढवळ्या माल हलवत होते. नंतर सगळीकडे रॉकेल टाकुन आग लावली. आमच्या कडे काम करणार्‍या पोर्‍यानी हे सगळं सांगितल. वीस-तीस वर्ष जुनं फर्निचर, बुकं, सगळ-सगळं जळुन गेल. भिंतीवर धमक्या लिहिलेल्या होत्या. हे सगळं बघुन बाबांच्या छातीत दुखायला लागल म्हणुन त्यांना आधी हॉस्पीटल मधे घेउन गेलो पण नशिबानी हार्ट-अटॅक वगैरे काही नव्हता. आजु-बाजुची सगळीच दुकानं जाळुन टाकली होती. तेंव्हा आगीचे इंन्शुरंस होत पण ते लोक म्हणाले की दंगलीमधे झालेल्या नुकसानाची भरपाई ते करत नाहीत.

दुकानात अक्षरशः काहीच शिल्लक राहिल नव्हत. काय कराव सुचतच नव्हत. धंदा म्हणला म्हणजे पैसा सतत खेळता असतो. आमचं सगळ्यांच जे काही बचत होती त्यावर किती दिवस काढायचे. आमच्या नुकसानी बद्दल सरकार कडुन पंचवीस हजार मिळालेत. लाखो रुपयांच्या मालाची होळी झाली आणि शिमग्याला पंचवीस हजार मिळाले. परत डागडुजी करुन करुन माल भरायच म्हटल तरी गिर्‍हाईक कधी परत येणार माहिती नव्हत .घरचा धंदा असल्यामुळे सहाजिकच शिक्षणाकडे आम्ही भावांनी फारस लक्ष दिलं नव्हत. आम्ही आम्ही दोघे मोठे भाई बी. कॉम होतो पण त्याल कोणी भीक घालत नाही. मी आमच्याच अकांउटंट कडे नोकरी धरली. महिन्याला अडीच हजार पगार होता. काही दिवसांपूर्वीच मी नवा दुकान टाकायच्या खटपटीत होतो आणि आता दाण्याला मोताद झालो होतो. पण परिस्थिती नुसार बदललो नाही तर मोडुन जातो. त्या घडीला घरी दोन्ही वेळेसच जेवण सगळ्यांना मिळायला हव हे महत्त्वाच होत. माझ्या भावानी सेल्समनची नोकरी मिळविली. कपडा मार्केट शी संबंधीतच होती.

पण आम्हा सगळ्यांच्या डोक्यात दुकानच घोळत होत. हाताशी काहीच पैसा नाही. बरं मागची थक-बाकी राहिली होती ती वेगळीच. ज्यांची देणी होती ते पाठीशी लागली होती व ज्यांच्याकडुन घेणी होती ती ओळख दाखवीत नव्हती. हळु-हळु लक्षात येत होत की पुन्हा दुकान चालु करायच तर भेंडी बाजारात ते करण अशक्य होत. जळलेल्या दुकानात आता पहिले सारख सुरक्षितही वाटेनास झाल. एक नविनच गेम सुरु झाला. कोणी तरी येउन दुकान विकता का विचारणार. नाही म्हटल तर धमक्यांचे फोन येणार. काहे दिवसांनी साले पोट्टे लोक येउन दम द्यायला लागले. चाकु-सुरे तर खिशात कंगव्या सारखे ते लोक बाळगत होते. शेवटी एकानी येउन पोटाशी नवी रिव्लॉवर लावली. विषाची परीक्षा कशाला करावी? सर बचा तो पगडी पचास म्हणुन एका बाटग्यालाच दुकान विकुन टाकलं. मातीला जास्त किंमत मिळाली असती. महिन्याच्या आत सगळा ठणठणाट झाला.

कपड्याचा सोडुन अजुन कुठल दुकान टाकयची हिंमत होत नव्हती. दुसर्‍या तर्‍हेची दुकान चालविण्याचा मुळीच अनुभव नव्हता. आणि इलेक्ट्रोनिक्स सारख दुकान टाकायला भांडवल कुठुन आणणार? मुंबईत नवी जागा विकत घेउन नवा धंदा टाकायचा म्हणजे लाखो रुपये लागणार. माझ्या सासुरवाड गुजरात मधे होत. ते लोकं मला म्हणत होते गुजारत मधे येउन त्यांच्या धंद्यात हात-भार लावायला. पण इथे आई-बाब आणि भावंडांना एकदम टाकुन जाणं अशक्य होत. त्यातुन एका भावाच अजुन शिक्षण व्हायच होत.

बुकं सांभाळण्याची काम करण्यात फारसा काही अर्थ नव्हता. पण अजुन काय कराव सुचत नव्हत. डोळ्यासमोर नुसताच अंधार होता. जुन्या ओळखींनी नोकर्‍या मिळत होत्या पण त्या अकांउटंट सारख्याच होत्या. अशीच काही वर्ष गेलीत. पोरग बालवाडीत जायची वेळ आली. खर्च वाढत होते, महागाई वाढत होती आणि उत्पन्न मात्र तेवढच होत. तेंव्हा कंप्युटर क्षेत्राचं वारं थोड-थोड वाहु लागली होती. मी घरा जवळच्या एका इंस्टीट्युट मधे छोटे कोर्सेस करायला सुरुवात केली. ते साले लोक लुबाडत होते. मायक्रोस्फॉट वर्ड शिकविण्याचे हजार रुपये घेत होते. अर्थात हे कळायलाही काही दिवस लागले. मी आपला कोर्सच सर्टिफिकीट घेउन मारे नोकर्‍या शोधायला जायचो आणि जास्तीत जास्त सेक्रेटरीच्या नोकर्‍या उघडायच्यात. कंप्युटर क्षेत्रातील कंपन्या फक्त इंजिनिअर लोकांनाच नोकर्‍या देत असत. खर सांगायच तर इंजिनिअर झालेल्या पोरा मधे आणि माझ्यात काहीच फरक नव्हता. या मोठ्या कंपन्यात नोकर्‍या मिळाल्यात कि तिथेच सगळं शिकविल्या जात. पण मी आत इंजिनिअर नाही त्याला कोण काय करणार? शेवटी मी ठरवलं कि कितीही कठीण गेलं तरी कोडिंग शिकायच. मी परत क्लासेस सुरु केले. पण कोडिंग गम्मत थोडीच असते. मला चांद-तारे दिसायला लागले. लॉजिक काय ते कळेना, लँग्वेज कशी लिहायची ते जमेना. लुप काय हे साध कळायला महिना लागला. क्लास मधे शिकविणारा साला ढ माणुस होता. थोड पुस्तकाबाहेरच प्रश्न विचारले कि त्याची त्-त्-प्-प् व्हायची. दिवसभर काम करुन मी संध्याकाळभर इंस्टीट्युट मधे कंप्युटर समोर बसुन असे. तासोघंटी स्क्रीनकडे बघत बसायचो. पण जागवरुन हलायचो नाही. इथे बुडाखाली आग लागलेली असली आणि डोळ्यासमोर शुन्य अंधार असला म्हणजे काय स्थिती होते हे सांगण अशक्य आहे. हळु-हळु गोष्टी कळु लागल्या. न-कळुन होणार कस! बिल्डिंग मधल्या इंजिनिअर होत असलेल्या काही मुलांचीही मी मदत घेतली. जमिन-आस्मान एक केल आणि कोडिंग मागुन-पुढुन शिकलो.

इंस्टीट्युटची परीक्षा झाल्यावर मला अचानक खुप छान वाटु लागल इतका अभ्यास केल्यावर ती परीक्षा म्हणजे टाईम-पास होता. पण मला कॉन्फीडंट वाटु लागल. पुढे जायला माझ्यात बळ आल. अजुन हवी तशी नोकरी मिळाली नव्हती पण ती न मिळण्याच्या कारणांवर मी मात केली होती. कंप्युटर मला येत नाही किंवा येऊ शकत नाही असं कोणी म्हणु शकत नव्हत. मी सगळ्या मोठ्या कंपन्यांमधे अर्ज करायला सुरुवात केली. अर्थात, कोणीच भीक घातली नाही. बाबांनी सल्ला दिला कि कुठल्यातरी लहान कंपनीत आधी अनुभव घे. मी मग लहान कंपन्यांमधे अर्ज करु लागलो. पण नशिब अजुन साथ देत नव्हत. नशिबाला बोल देउन काय फायदा? एवढ भरलेलं घर,साथ देणारी बायको आणि मेहनत करण्यासाठी धड-धाकट शरीर. अजुन काय हव माणसाला?

मी डोक शांत ठेवल। जे करायला हव ते सगळं मी केल होत आणि करत होत. आता पुढे काय होणार ते होणार. आमच्या दुकानाचा असा सत्यानाश होइल अस कुणी स्वप्नातही बघितलं नव्हत. पण तस घडल. काहीही घडल तरी पुढे जाण्या शिवाय काही मार्ग नसतो. बाटग्यांचा राग करत आणि झालेल्यावर रडत बसलो असतो तर पोरं-बाळ उपाशी पडली असती. कोणी मदतीला येइल याची वाट बघण्यातही फारसा अर्थ नसतो. स्वतःच किंवा स्वतःच्या कुटुंबाच आपल्यालाच बघाव लागत. मी आणि माझ्या मधल्या भावानी घर चालत ठेवण्यासाठी धड-पडाट चालविला होता. तो महत्त्वाचा.

शेवटी दुबईतल्या एका लहान भारतीय कंपनीत ओळखीनी मला नोकरी लागली कोडिंगच काम होत. पगार फार नव्हता पण तीथे टॅक्स नसतो आणि रहाण्या-खाण्यासाठी पगारा व्यतिरिक्त भत्ता मिळणार होता. थोडक्यात, मिळालेला पगार घरी पाठवता येणार होता. ओळखीनी नोकरी मिळाल्याचं मनात खटकत होत. माझ्या कडे स्कीलस् होते. ओळखीची गरज नव्हती. पण आता या बद्दल विचार करण्याची मुभा मला नव्हती. मुंबईतच नोकरी शोधा अस पत्नी म्हणत होत्या पण अजुन वाट बघण शक्य नव्हत. संधी, मग ती कुठल्या का रित्या असो, सारखी मिळत नाही. काही वर्ष जरी अनुभव मिळाला तरी मग मोठ्या देशी कंपनीत नोकरी मिळण्याचे चान्सेस वाढणार होते.

आज घर स्थिर आहे. पोरगा कॉलेज मधे जाइल पुढल्या वर्षाला तर त्याच्या फी चे पैसे मी देउ शकतो. धाकट्या भावाचही शिक्षण नीट झाल. मधल्या भावालाही दुबईत चांगली नोकरी मिळवुन दिली. सेल्स च्या संबंधीतच होती. कमिशन बेसिस मधे टक्केवारी जास्त होती त्यामुळे पैसा जास्त मिळणार होता. त्याचाही संसार नीट मार्गाला लागला.

या सगळ्या घटना थोड्या पिक्चर मधल्या सारख्याच झाल्यात. थोडी नाच-गाणी असती तर मजा आली असती! शेवटही गोड झाला. नेहमीच होतो अस नाही. माझ नशिब अजुन काही नाही. अजुनही आठवण येते आणि परत धंदा करावासा वाटतो. पण ते कधी जमणार माहिती नाही. फारसा विचार करण्यातही अर्थ नाही पण झालेल्या गोष्टींचे चटके मधेच जाणवतात. आमच्या कुटुंबा पैकी कोणाचच काही चुकल नव्हत की त्या साथी एवढी शिक्षा का मिळावी? आयुष्यात आपल्या हातात किती कमी गोष्टी असतात हे मात्र लक्षात आल. शेवटी जेवढं जमेल तेवढ करायच.

मी सगळी शक्ती पणाला लावली होती आणि अजुनही लावतो आहे. बाकी सगळ वरच्याच्या हवाली.

12/23/07

भातुकलीचा खेळ

आज इतक्या वर्षांनी त्याची चाहुल लागली. इतके दिवस मी हाका मारत होते. सतत प्रश्न विचारीत होते पण उत्तर तर सोडाच पण साधी हुं का चुं नाही. शेवटी मी वाट बघण सोडल. आज इतक्या कालांतराने अपराध्यासारख माझच मनं माझ्यासमोर उभ आहे. निर्जन पडलेल्या वाड्याच्या पडक्या भींती कश्या घडलेल्या घटनांची भीषणता दर्शवितात तस माझ्या मनाच्या परतणार्‍या पाउलखुणा माझ्या माझ्या भूतकाळाची दयनीयता प्रदर्शित करत होत्या. जखमांवरच्या खपल्या काढत होत्या.

मला आज लिहावसं का वाटल, कोण जाणे. डॉक्टर काका नेहमी म्हणत की जे मनात आहे ते कागदावर उतरविण्याचा प्रयत्न कर. पण ते कधी जमल नाही. हृदयात खुपलेल पात डोळ्यांना कस दिसणार? आणि ते दु:ख शब्दांमधे कस मावणार? पण मी आज प्रयत्न करणार. माझं शुष्क दु:ख शब्दांच्या तोकड्या आकृत्यांमधे माववण्याचा प्रयत्न करणार. आता खरं सांगायच तर प्रेमभंग कोणाचा कधी झाला नाही का? पण माझ प्रेम भंगल नाही. ते मेलं. अचानकपणे. घृणास्पद रित्या.

तो मला सोडुन गेल्यापासुन मी अनेकदा माझ्या आयुष्याची घडी परत घालण्याचा प्रयत्न केला. पण पैठणीची घडी एकदा उलगडली की पहिले सारखी थोडीच बसते. सुरुवातीला खुप रडले. काही काळाने सवय झाली रडण्याची. मग माझ्यावर इतक रडण्याची पाळी का आली म्हणुन अजुन रडले. शेवटी अश्रु संपुन गेलेत. पण दु:ख कायम राहिलं. कारण रडण म्हणजे दु:ख नव्हे. ती तर शरीराची एक प्रक्रिया आहे. खर दु:ख तर रडल्या नंतर सुरु होत. डोळ्यातुन खार पाणी वाहण थांबल्यावर अघटीताचं पात काळजात रुतु लागत. मग मनाचे कढत अश्रु झिरपु लागतात. त्यांना वाहुन जायला मुळी जागाच नसते. जखमेवर साचलेल्या पु सारखे ते काळजात साचु लागतात. ना धरवत, ना सोडवत. हे असलं ओझ घेउन जगासमोर जगण्याच ढोंग करावच लागत. या कठ-पुतलीच्या खेळातुन काही सुट मिळत नाही. काय चुकल आणि कोणाचं चुकल याचे कधीही न जुळणारे हिशोब करत मेलेल्या मनावर शरीराच ओझ लादुन आयुष्य ढकलावच लागत. विदुषकासारखे पाउडर लाउन जगासमोर हसायचे आणि आतल्या आत कुढायचे.

प्रेम म्हणजे नक्की काय असत याचा मी बरेचदा विचार करते. शारीरिक आकर्षणा पलिकडे प्रेमाची बहुधा सुरुवात होत असावी. त्याच्या अंतरीचे रंग मला जेंव्हा मला भावले तेंव्हा मी खरी त्याच्या प्रेमात पडले. त्याच्या गुणांवर व दुर्गुणांना मी सारखच आपलंस केल, म्हणुनच मी त्याच्यावर खर प्रेम केल. त्यानीही बहुधा माझ्यावर असच प्रेम केल असावं. पण प्रेमाला संयोगाचा पूर्ण-विराम लागला नाही तर ते प्रेम का? मला वाटायच कि खर प्रेम असल तर कितीही वाईट परिस्थिती असली तरी ते तुटत नाही. मनाची समजुत घालुन कोणी मना विरुध्द जात नाही. जे तुटत ते प्रेम नसतच मुळी. आता वाटत की हे असं सगळ चित्रपटातच होत.

आम्ही दोघांनी एक-मेकांवर निरिताशय प्रेम केल। मग आमचं का जुळल नाही? आमच्या घरीसुध्दा पसंती होती. साखरपुडा झालेला होता आणि लग्नाची खरेदीसुध्दा सुरु झाली होती. मग त्याने मला दगा का दिला? मला असा वार्‍यावर टाकुन कसा गेला?

माझ्या आयुष्याच्या पाउलवाटा आता मी बघते तर मन भ्रमित होत। हातावरच्या 'भविष्य' रेखांसारख अगम्य आणि दारुण दिसतात त्या पाउलवाटा. गम्मतच असते, जन्मापासुन भविष्याचा नकाशा माणुस आपल्या तळहातावर घेउन, भविष्याच्याच शोधातच आयुष्यभर वणवण भटकतो. मी मात्र त्याच्या हातावरच्या रेखांवर चालायला तयार होते. पण माझ्या भविष्य रेखांनी मला बरोब्बर पकडले. विळखा घालुन गिळंकृत केले.

मला अजुनही आमचं शेवटच बोलण आठवत. रात्री अडीच वाजता त्याने फोन केला होता. जेमतेम पाच मिनिटं बोलला असेल. मी नुसतच ऐकत होती. माझं हृदय धड-धड करत होत. " ऐक मी काय बोलतोय ते. दोन तासांनी आम्ही एक मिशनला जाणार आहोत. मिशन कठीण आहे. परतण्याची खात्री नाही. मी पुर्ण प्रयत्न करीन. पण नाही आलो तर तु माझ्यात अडकुन राहु नकोस. प्लीज, लग्न कर. मला माहितीय की तु माझ्या शिवाय जगु नाही शकत. प्लीज, माझी राणी, तु पुन्हा संसार मांड. दुसर्‍या कोणाला सुखी कर. नाहीतर मी सुटणार नाही गं. काही वाईट घडल तर तू प्लीज, आपला नविन संसार मांड."

हें काय असलं अभद्र बोलण झाल? माझे लाड केले नाहीत, ना मला लाड करु दिलेत. लोक म्हणतात की बेपत्ता झाला. असा कसा बेपत्ता होईल? कुठे ना कुठे तरी सापडेलच ना. त्याला माझी आठवण येत नाही का? मग परत का येत नाहीया तो? असा, संसार सुरु व्हायच्या आधीच का तो उठुन चालला गेला?.....

10/19/07

गोड-लिंब

"या ताई. बसा आरामात. झालाच माझा स्वयंपाक" जोशी बाईंनी सुधा ताईंच स्वागत केलं.

"होऊ दे तुझ आरामात. मला कसली घाई नाहीया"

"यंदाच्या १०वीच्या वर्गातील विद्यार्थी कसे आहेत? किती मेरीट येणार?" जोशी बाईंनी विचारलं. सुधा ताईंनी लगेच उत्तर दिल नाही. काय उत्तर द्यावे याचा जणु त्या विचार करत होत्या.

"किती मेरीट येणार?" जोशी बाईंनी परत विचारले.

" अगं, शिकवण्या सुरु झाल्या नाहीयात. मुलांना उन्हाळ्याची सुट्टी दिली. आजकाल तर ९वी च्या परीक्षे आधीच १०वीचे वर्ग सुरु होतात. मुर्खांचा बाजार भरत चाललाय. मी मुलांना सांगितले की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधे मजा करा, जुन महिन्यात १०वीचा नारळ फोडुया."

थोडं खिन्न हसुन पुढे म्हणाल्यात "तशीही यंदा फारशी मुलं नाही आलीत." सुधा ताईंच चित्त काही थार्‍यावर दिसत नव्हत.

"तुला काही मदत हवी आहे का? मी पण अगदी वेळेवर आले. लौकर येणार होते पण शेजारच्या मारवाड्याने उच्छाद घातलाय."

"मारवाडी?" जोशी बाईंनी प्रश्नार्थक मुद्रेने विचारले.

"शेजारच्या केळकरांचा प्लॉट विकला गेल्याच कळल नाही का तुला? प्लॉट रिकामा होता तर मी तिथेही बरीच झाड लावली होती. पण नवीन मालकाने एकाच दिवसात सगळ साफ केलं." मग खिडकी बाहेर शुन्यात नज़र टाकुन त्या पुढे म्हणाल्यात " एवढच नाही तर त्याच्या प्लॉटवर डोकवणार्‍या माझ्या पेरुच्या आणि आंब्याच्या फांद्याही छाटल्या त्याने"

जोशी बाईंना काय बोलाव सुचेना. उगाचच काहीतरी बोलायच म्हणुन जोशी बाई सुधा ताईंना झाडांबद्दल माहिती विचारु लागल्यात.

तेवढ्यात अनिरुध्द जोरात दार आपटुन घरात आला. "आई....भुकेनी मरतोय मी, जेवायचं झाल का?" असं ओरडत तो दाण-दाण उड्या मारत न्हाणीघरात रवाना झाला.

" अरे, हळु. तु घरात आल्याच सगळ्या गावाला कळायला नकोय" जोशी बाई ओरडल्या.

सुधा ताई आज सवाष्ण म्हणुन जेवायला आल्या होत्या. म्हणुन जोशी बाईंची स्वयंपाकाची थोडी घाई होत होती. अनिरुध्दला आज आईला मदत करायची होती पण आज सकाळी बाहेर गेलेला तो आत्ता उगवला होता.

"अनिरुध्द, तुला येतांना गोड-लिंबाची पानं घेउन यायला सांगितली होती ना"

"मला वाटल की सुधा काकुच घेउन येणार आहे तिच्या बगिच्यातुन" अनिरुध्द उत्तरला.

आधीच घाई होत होती त्यातुन अनिरुध्द गोड-लिंब आणायचा विसरला बघुन जोशी बाईंचा पारा चढला. "एक काम सांगितल तर ते सुध्दा ढंगानी करता येत नाही. दिवसभर नुसत्या चकाट्या पिटायला हव्यात गावभर"

"अरे, एवढीशी पानं आणायची विसरलो तर एवढ रागवायला काय झाल? अनिरुध्द उगाच काहीतरी बोलायच म्हणुन बोलला.

"हे बघ, उलट उत्तर देउ नकोस. एक साध काम करता येत नाही तुला. कुठे होतास सकाळ पासुन, काय करत होतास? "

"राहु दे गं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालु आहेत ना त्याच्या"

" अहो, रागवु नाही तर काय करु. सकाळ-संध्याकाळ नुस्ता हुंडारत असतो. सकाळी उशीर उठायच मग नास्ता करुन मागल्या गल्लीतल्या मुलांसोबत चकाट्या पिटायच्या. दुपारचं जेवण झाल्यावर मस्त कुलर मधे ३ तास झोप कि संध्याकाळी परत वायफळ बडबड करायला मागल्या गल्लीत आमचे महाराज हजर" जोशी बाई फणकारल्या.

"बाप रे आई, इतकही काही चुकल नाहीया माझ" अनिरुध्द ने उलट उत्तर दिले.

" अरे, अनी अस आईला उलट उत्तर देउ नये. बरं तुझ्या मुंबई च्या शिबिराच काय झाल?" सुधा ताईंनी विषय बदलवायला म्हणुन विचारलं

" माहीती नाही. बाबांना विचारा." अनिरुद्धने गाल फुगवुन उत्तर दिले. मग हळु आवाजात स्वतःशीच पुटपुटला "एक तर इथे आई डोकं खाते सकाळ-संध्याकाळ" अनिरुध्दचे वाक्य पुर्ण केल नसेलच तेवढ्यातच जोशी बाईंनी त्याला फाडकन झापड मारली.

" लाज नाही वाटत तुला अस बोलायला. कुठुन शिकला असं बोलायला? बाबांची चूक आहे हां, का रे? त्यांना शंभर काम असतात. तुला एवढं जायच होता शिबिरात तर स्वत: नव्हता का अर्ज करता येतं. लिहिता येतं ना तुला, फॉर्म भरायला. आणि मी तुझं डोकं खाते ? अस बोलायची एवढी हिम्मत झाली तुझी?" सुधा ताई कडाडल्या. रागात त्यानी जोरात टप्पल मारली.

" लागतय ना मला" अनिरुध्द कळवळुन म्हणाला.

" अहो, जाउ द्या. लहान आहे अजुन. सुधा ताईंनी अनिरुध्द ची बाजु सांभाळायचा प्रयत्न करायला लागल्या.

"अनि, आईला सॉरी म्हण"

" काहीही सांगितल कि एकच उत्तर येतं. १०वीची परिक्षा आत्ताच संपली आहे. मला मजा करु दे. बघते आता कि काय दिवे लावतो १०वीत." जोशी बाईंचा राग काही आवरत नव्हता. त्यांनी अनिरुध्दचा कान ओढला.

"अहो, काय करताय. इतक रागवायला काय झाल" असं म्हणत सुधा ताईंनी जोशी बाईंचा हात धरला.

जोशी बाईंनी सुधा ताईंचा हात झटकला. "हे बघा सुधा ताई, तुम्ही याच्या मधे पडु नका. तुम्हाला काही माहिती नाही."

" का, मला स्वतःच मुल-बाळं नाही, म्हणुन अस म्हणताय का?" सुधा ताई फटकन उत्तरल्या.

जोशी बाईंना काय उत्तर द्यावे कळेना. त्या नुसत्या अचंबित नजरेनी बघत राहिल्या.

"कळत मला. तुमचा संसार भरलेल आणि मला मेलं एक सुध्दा पोरं नाही. म्हणुन तुम्हाला वाटत कि मला पोरं कशी मोठी करायची हे माहिती नाही. पण पोरांकडे लक्ष द्यायच सोडुन तुम्हे दिवसभर नोकरी करता आणि मग अपेक्षा करता कि मुलं शिस्तित रहावी म्हणुन. कस शक्य आहे ते?" खोलीत विचित्र शांतता पसरली. अनिरुध्दला कळेना मधुनच हे काय सुरु झालं म्हणुन.

जोशी बाईंना जणु अजुन शब्दांचा संदर्भ लागत नव्हता.

" आई, सॉरी. मी कधी परत अस बोलणार नाही" अनिरुध्द म्हणाला.

पण सुधा ताई काही थांबण्याच्या नादात नव्हत्या. खुर्चीत बसत त्या म्हणाल्या " इतकी वर्ष बघतेय मी, सोन्यासारखी मुलं आहेत. पण तुम्ही सतत त्यांची काळजी करता आणि त्यांना रागवत असता. तुम्ही त्यांच संगोपन करण्यात कमी पडत असाल तर त्याचा राग मुलांवर कशाला काढायचा" " अहो, काय बोलताय तुम्ही" जोशी बाई सुधा ताईंचा हा नवीन अवतार बघुन चकित झाल्या. सवाष्ण म्हणुन सुधा ताई जेवायला आल्य होत्या. पण आज अनिरुध्दला रागवण्याच निमित्तमात्र झालं व इतकी वर्ष साचत असलेल्या व्यथा खपली निघुन जखमेतुन रक्त वहाव्यात तश्या वाहु लागल्या.

" मी किती तरी वेळा आडुन-आडुन सांगण्याचा प्रयत्न केला की थोड मुलांच्या कलेनी घ्या म्हणुन पण मी काय बोलतेय याकडे तुमच लक्ष असेल तर शप्पत. माझ्याशी नेहमी सहानभूती वागण्याच नाटक करता. जणु काही मला पोरं नाही हे सतत दर्शवायच असत तुम्हाला. दोन पोरं आहेत हे मिरवता माझ्या समोर. तुम्हाला बागे बद्दल मुळीच आकर्षण नसत पण तरी तुम्ही मला खोटे प्रश्न विचारत असता." सुधा ताई स्वगत बोलत असल्या सारख्या बरळत होत्या.

"माझ पण नशीब किती फुटक असाव. केळकरांचा प्लॉट ज्यांनी विकत घेतला त्यांनी मी लावलेली सगळी बाग उध्वस्त केली. एवढच नव्हे तर माझ्या अंगणातल्या आंब्याच्या झाडाच्या, त्यांच्या प्लॉट मधे येणार्‍या फांद्या ही तोडुन टाकल्या. तुम्ही मुलां मधे जितका जीव लावत नसाल तितका जीव मी झाडांमधे लावते त्याच मला हे फळ मिळत. आणि तुम्ही एवढी सोन्या सारखी मुलं आहेत तर त्यांना एवढ रागवता." एवढ बोलुन सुधा ताई रडायला लागल्यात. मग एकदम आवेशात येउन त्या म्हणाल्या की 'देव पण ज्यांची लायकी नसते त्यांना भर-भरुन देतो" व तरा-तरा चालत निघुन गेल्या.

जोशी बाई आघात झाल्या सारख्या मट्कन जमिनी वर बसल्यात. त्यांचा विश्वासच होईना कि इतकी वर्ष हि बाई आपली शेजारीण आहे. मी त्यांना नेहमी मोठ्या बहिणीचा मान दिला आणि ती आपल्या बद्दल हा विचार करते. हे सगळ प्रकरण रागाच्या पलिकडे गेल होत. त्यांना धड रडु ही येइना. अनिरुध्द आईचा हात हातात घेउन तीच सांत्वन करण्याचा प्रयत्न करु लागला.

10/4/07

वामकुक्षी

आजच्या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती बघता व टाळ्यांचा गजर ऐकुन या आंदोलनास एकुण बरेच महत्त्व प्राप्त झाल्याचे स्पष्ट होते. सुरुवातीस आळशी आंदोलन (आ.आ.) ईत्यादी विशेषणं जरी 'उद्योगी' लोकांनी दिली असली तरी दुपारच्या झोपेचे आवश्यकता हळु-हळु लोकांस कळु लागली आहे असे म्हणण्यास हरकत नाही. शहरातील प्रतिष्ठित वर्तमानाचे पत्रकार चक्क आज उपस्थित आहेत. असो.
आज मी माझ्या वैयक्तिक उदाहरणाद्वारे या आंदोलनाचा आरंभ कसा झाला हे आपल्या पुढे मांडु इच्छीतो.

मला लहानपणापासुनच वामकुक्षीची फार आवड होती. वामकुक्षी म्हणजे डावा हात डोक्याखाली ठेउन उपभोगलेली दुपारची झोप. डावा हात दुखु लागला की उठायच. साधारतः २० ते २५ मिनिटांनी हात भरुन येतो. मजबुत हात असतील तर जास्त वेळ झोपता येत. बरेच लोक याच कारणासाठी व्यायाम करतात. मी मात्र व्यायामाच्या भानगडीत फारसा पडलो नाही. मला तशीच बिना-उशीची झोपायची सवय आहे. अगदी रात्रीसुध्दा मी उ(र्व)शी घेत नाही. त्यामुळे झालं काय की माझी दुपारची झोप अर्धा-पाउण तासाहुन अधिक होऊ लागली. थोडक्यात, दुपारी झोपण्याचा सराव मी बालपणापासुन करतोय.

लहानपणी कोणी काही म्हणायचे नाही. शाळेत जाउ लागल्यावर मात्र पंचाईत होऊ लागली. अहो, रात्रीची झोप परवडली पण दुपारचं जागरण नको. मागल्या बाकावर बसुन झोपणे किंवा पुस्तक वाचण्याचे नाटक करत कपाळवर हात ठेउन झोपणे इत्यादी युक्त्या मीच शाळेत रुढ केल्यात. तसाही मी फारसा हुशार नव्हतोच त्यामुले माझ्या वामकुक्षीचा प्रगतीपुस्तकावर परिणाम जाणवला नाही. शेवटी, एक तर सकाळी साडे सातला उठायचे मग आई सांगेल ती कामे करायची, थोडा अभ्यास करायचा, मग शाळेत सायकल मारत जा, संध्याकाळी परत तोच प्रकार, इतकी कष्ट करुन दिवस रेटायचा तरी कसा? दुपारी थोडी झोप मिळाली की दहा वाजे पर्यंत दिवस कसा छान जातो. पुढे माझा झोपेचा अभ्यास वाढत गेला. रात्री ११ वाजता झोपायचे असल्यास किती वामकुक्षी लागते, १२ वाजता तर किती, १ पर्यंत जागयचे तर किती वेळ, असे माझे आराखडे मी पक्के केलेत. अर्थात, एक वाजे पर्यंत जागाण्याची कोणावर नौबत येउ नये. शेवटी, दुपारची झोप परवडली, रात्रीचे जागरण नको हे सुध्दा तितकेच खरे.

माझ्या शाळेत डुलक्या काढण्याच्या युक्त्या नेहमीच यशस्वी होत नसतं त्यामुळे शिक्षकांनी बरंच छळले. पण घरचेही काही कमी नव्हते. शिस्त लावण्याच्या नावाखाली त्यांनी माझ्या वामकुक्षीवरच बंदी आणली. मला झोपण्याचा रोग झालाय असले नाना आरोप सुध्दा लावलेत. शेवटी मी तिथे जाउन निवांतपणे बसायचो. पण उकिडवे-कुक्षी फारशी कधी अंगी लागली नाही. कॉलेज मधे प्रवेश घेतल्यावर मात्र हुश्श झाल. घरच्यांचा त्रास नव्हता व कॉलेजला त्रास द्यायचा नव्हता म्हणुन कॉलेज मागच्या वनराईचे मी बरेच 'परीक्षण' केले. कॉलेज मधला मुक्काम थोडा वाढला कारण माझ्या वामकुक्षीच्या वेळेसच नेमका गणिताचा पिरेड असे. असो.

मला माहिती आहे की येन-तेन प्रकाराने आपण सर्वांनी हा त्रास भोगलाच असेल पण झाल-गेलं गंगेला मिळाल. आता मात्र अजुन त्रास सहन करायचा नाही. अहो, नाही म्हटलं तरी सकाळी दहा ते दुपारी चार पर्यंत बरच काम असत. थोडी झपकी घेतली त्या दरम्यान तर त्या साहेबाचं काय जातय? व्यक्ती-स्वातंत्र्य म्हणुन काही असतं की नाही? थोडी पुढे-मागे का होईना पण कामं तर होतायत ना. आपणास माहिती नसेल पण इटली व फ्रांस सारख्या प्रगत राष्ट्रांमधे सुद्धा दुपारच्या झोपेची खास सुट्टी असते. त्यांस 'सिएस्टा टाईम' असे म्हणतात. आता, आपण जर का इतर बाबतीत पश्चिमी राष्ट्रांची नक्कल करु पहातो तर वामकुक्षीबद्दल इतकी उदासिनता का?


अंतरीच्या या दु:खाला वाट मात्र कुठे मिळत नव्हती. बालपणी घरच्यांचा त्रास आणि आता साहेबाचा. या दरम्यान आई-वडिलांनी अलगदपणे मला बायकोच्या हवाली केल. रविवारच्या झोपेचाही बर्‍याचदा काथ्याकुट होतो. आताशा एक तर कुटुंब काम सांगत किंवा पोट्टी उच्छाद मांडतात. ऑफिसमधे माझ्या सारखी अजुन बरीच समदु:खी भेटलीत. मनं मोकळ करायला अजुन जोडीदार मिळालेत. मग आम्ही आळी-पाळीने झोपु लागलोत. पण साहेबांचा चांगलाच दरारा होता. जागरणांनी व साहेबाच्या भीतीने माझी फार तारांबळ उडु लागली. मला झोपेत जागरणाची आणि जागेपणी झोपेची स्वप्ने पडु लागलीत. एकदा तर गाडी चालवतांना मागच्याने हॉर्न वाजविला तर मी हिला विचारले की घड्याळाचा गजर असा का वाजतोय ते!

शेवटी अघटित घडलंच. आमचा हाकाट्याच नेमका झोपी गेला आणि जोशी, साहेबाच्या तावडीत सापडलेत. ऑफिसमधे दहशतीचे वातावरण पसरले. साहेबांनी, जोशींना चक्क काढुन टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणा नंतर आम्ही संघटित होण्यास सुरुवात केली व या आंदोलनाचा जन्म झाला. बिन-सरकारी कार्यालयांमधील मंडळीसुद्दा हळु-हळु या आंदोलनात सामिल होऊ लागलित. त्यांची परिस्थिती आमच्याहुन केविलवाणी आहे.

आमचं म्हणणे सरळ सोट आहे. सगळ्यांनी वामकुक्षी घ्यावी असा आमचा आग्रह नाही. पण आम्ही घेतो तर आम्हांस विरोध करणेही बरोबर नाही. आमच्या मागण्या फार कमी आहेत. निदान ३३ मिनिटांची वामकुक्षीसाठी सुट्टी व वामकुक्षी घेण्यास आरामखुर्च्या एवढेच आम्ही मागतो आहोत.

आपण सगळ्यांनी मिळुन आवाज लावला तर आपल्या मागण्या मान्य कराव्याच लागतील असा माझा विश्वास आहे. एवढे बोलुन मी माझी गाथा संपवितो. धन्यवाद.
वामकुक्षी आंदोलनाचा विजय असो.......विजय असो......


ऑ...ऑ......
"अहो, उठा. मनाची नाहीच तरी जनाची लाज बाळगा. ऑफिसात बरी झोप लागते तुम्हाला. कोण दिसतय स्वप्नात? रंभा उर्वशी का?"

"माफ करा साहेब. काल थोडं जागरण झाल म्हणुन......"