9/23/23

'कट्यार काळजात घुसली' - चित्रपट परिक्षण आणि निरीक्षण

'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट बघण्याचा योग्य फार उशिरा आला. त्या चित्रपटाची  गाणी मी गेले कित्येक वर्षे नित्य नेमाने ऐकतोय. 'सूर निरागस हो' या स्तवनाने माझे अनेक दिवस अजूनही सुरु होतात. आणि कितीतरी संध्याकाळी मी 'मन मंदिरा' नित्य नेमाने ऐकतो. पण हा चित्रपट बघण्याची संधी मात्र कधी प्राप्त झाली नाही. माझा ठाम मत आहे कि इच्छा झाली म्हणून चित्रपट बघितल्या जात नाहीत. प्रत्येक चित्रपटाचे एक वेगळे व्यक्तिमत्व असते आणि त्या 'चित्रपट-पुरुषाची' इच्छा असेल तेंव्हा तो कलेचा आविष्कार बघण्याचा योग येतो. 

आणि हा चित्रपट बघण्याचा योग पण काय योग असावा! जणू वर्षानुवर्षे मेहनत करून कलाकाराने, त्याच्या मनात असणार, देवाच्या गळ्यात गुंफता  येईल असा एक सोन्याचा दागिना बनावावा! अप्रतिम! अलौकीक! 

हा चित्रपट याच नावाच्या नाटकाचे पुनर्निर्माण आहे. मूळ नाटक श्री पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित असून, त्यात मराठी  हिंदुस्थानी संगीताचे दिग्गज, श्री वसंतराव देशपांडे  यांनी प्रमुख भूमिका केली होती. नाटकास संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी दिले होते.  हे नाटक सन १९६७ ला रंगमंचावर आले आणि त्या काळात फार प्रसिद्ध पण झाले. त्यातील कैक गाणी मराठी जनमानसाच्या मनात बिंबली आहेत, रुजली आहेत. माझ्या सारख्या तरुण पिढीला (मराठी मिडीयम)  हे नाटक जरी माहिती नसेल तरी त्यातील गाण्यांचा परिचय नक्कीच आहे. नागपूर ला दररोज सकाळी ८ ते ८:१५ रेडिओ च्या विविध भारतीवर मराठी नाट्य संगीत लागत असे. त्यात मी मूळ नाटकातली  'तेजोनिधी लोहगोल', 'घेई छंद मकरंद' इत्यादी गाणी मी अगदी लहान पणापासून ऐकत आलो आहे. खास करून, 'घेई छंद मकरंद' हे माझे फार आवडीचे गाणे होते. पण मला हे कुठल्या नाटकातील आहे याची कल्पना नव्हती. तेंव्हा आशालता वाबगावकर यांनी गायलेले 'राजस राजकुमारा' हे गाणे सुद्धा मला फार आवडत असे. 

या चित्रपटाचे सगळ्यात मोठे वैशिष्ठ्य म्हणजे यातील नट-नट्या. अत्यंत उत्कृष्ट प्रतीचे,  कसलेले आणि मराठी रंगभूमी व चित्रपट सृष्टीतील दिग्गज या चित्रपटात आहेत. अगदी नवीन कलाकारांनी पण छान अभिनय केला आहे. शंकर महादेवन यांना शास्त्रीजी ची भूमिका देणे एक प्रेरणादायी जुगार म्हणावा लागेल. जरी शास्त्रीजी या पात्राला चित्रपटात तेवढा वाव नव्हता तरी एका पट्टीच्या गायकाला आणि अति-उत्तम संगीतकाराला हि भूमिका देणे म्हणजे चित्रपटाला साजेसे होते. या पात्राचे व्यक्तिमत्व म्हणजे संगीताबद्दल आत्यंतिक जिव्हाळा असलेले आणि संगीतात श्रेष्ठत्व प्राप्त केल्याने नेहमी आदर उत्पन्न करणारे आहे. शंकर महादेवन हे बरोबर हेरले असावे कारण त्यांचा अभिनय चपखलपणे बसतो. 

सुबोध भावे आणि सचिन यांच्या अभिनयाने हा चित्रपट कौशल्याच्या नवीन उंचीवर नेऊन ठेवला आहे. सुबोध भावे यांच्या सदाशिवाची आर्तता, मनाची घालमेल प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. सचिन यांचा खानसाहेब याचे बरेच अंतरंग आहेत. एका बाजूला ईर्षा आणि पराभवची आत्यंतिक ठेच पण तरीही चांगल्या-वाईटाची चाड खानसाहेब असते कारण आपण जे केले ते चूक होते याची त्याला पूर्ण कल्पना असते आणि मनात कुठे तरी खंत असते. पण खोटेपणाने का होईना समोर मिळणारे यश आणि स्वागतास उभा असलेला मान याचा मोह खानसाहेबाला नाकारणे कठीण जाते. खानसाहेबाच्या या सगळ्या कोलांट्या-उड्या सचिन यांनी नेमक्या टिपल्या आहेत. कुठल्याही कलाकाराचा उच्चांक म्हणजे त्याने उद्धृत केलेल्या पात्राचे नाव घेतले कि तो कलाकारच डोळ्यासमोर येतो. श्रीकृष्ण म्हटलं कि नितीश भारद्वाज आणि श्रीराम म्हटलं कि अरुण गोविल. तसेच 'दिल कि तपीश' गाणारा खानसाहेब म्हणलं कि डोळ्यासमोर फक्त सचिन च येणार. 

अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे आणि छोट्या भूमिकेत साक्षी तनवर यांच्या भूमिका ठळक, बांधेसूद आणि गोष्टीत चपखल बसतात. या सगळ्यांना कथेत महत्वाचे भाग आहेत. मुख्यतः साक्षी तनवर यांचा अभिनय व्रण उमटवून जातो. 

आता आपण जेंव्हा कथानकाचे कौतुक करतो तर मूळ नाटकाच्या कथेचे कि चित्रपटाच्या कथेचे? मूळ गोष्ट श्री रंजन दारव्हेकरांनी लिहिली आहे. मी मूळ नाटक बघितले नाही पण नाटकाचे रूपांतर चित्रपटात करणे सोपे नाही आणि त्याचे दिग्दर्शन करणे पण मुळीच सोपे नाहीं. नाटकाला रंगभूमीचे  बंधन असते पण चित्रपटाला तसले कुठलेच बंधन नसते म्हणूनच खूपदा नाटक किंव्हा पुस्तकाचे चित्रपट रूपांतर वहावत जात. या दोन्ही फळ्यांवर श्री प्रकाश कपाडिया - पटकथाकार व सुबोध भावे यांनी शतक मारली आहेत. सुबोध भावे यांचे कॅमेरा इतका सुंदर चालतो कि बघणार्याला प्रत्येक्षात तिथे असण्याचा भास होतो. नाटकाची कथा हि संगीताच्या दर्दी लोकांसाठी लिहिली आहे. शास्त्रीय संगीताची आत्यंतिक ओढ आणि प्रेम, त्यात यश मिळवण्याची तळमळ आणि त्यामुळे उत्पन्न होणारी मानवी आसूया या सगळ्या घालमेलीतून माणुसकीचा र्हास होतो. पण त्यावर उपाय पण संगीताचे सूर च आहेत. हे सगळे प्रेक्षांसमोर मांडायला सुबोध भावे यांनी प्रेक्षकांनाच जणू चित्रपटातील 'जनता' म्हणून रूप दिले. म्हणूनच चित्रपट लोकांच्या जिव्हारी लागला आणि जिव्हाळ्याचा झाला. चित्रपटाची वातावरण निर्मिती उच्च प्रतीची आहे. सेट्स, पोशाख श्रीमंत आहेत. राजवाडे आणि वाडे दोन्ही बरोबर घेतले आहेत. राजवाडा संस्थानाच्या राजाचा आहे त्यामुळे तो भव्य असू शकत नाहीं पण श्रीमंत नक्कीच असणार. चित्रपटाचे लायटिंग फार सुरेख आहे. मधल्या काही काळात मराठी चित्रपट अंधारातच असत.  

चित्रपटाच्या गीत, संगीत आणि गाणाऱ्यांवर स्वतंत्र लेख लिहावा लागेल. सुरेल आणि सुंदर शब्द याची जणू मेजवानीच! नवीन आविष्कारात राहुल काळे आणि राहुल देशपांडे अप्रतिम गायले आहेत. शंकर महादेवन यांच्या मराठीत गाण्याच्या ताकदीची कल्पना मराठी जनतेला आहेच पण त्यांचे 'मन मंदिरा' हे नवीन गाणे म्हणजे प्रत्येकाने दररोज सकाळी ऐकावे, मन प्रफुल्लित करायला. पण इथे खरे कौतुक मूळ धुरंधरांचेच. पंडित वसंतराव देशपांडे आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे. आणि त्यांच्याबद्दल काही हि लिहायची ऐपत अजून पुढच्या सात जन्मात येणार नाहीं. 

सध्याच्या मराठी चित्रपटांच्या गीतांवर एक टिप्पणी करावीशी वाटते. सध्याची गीते हिंदीमय आहेत असा मला वाटतं. आणि शब्द फार मिळमिळीत वाटतात. शब्दांना जडत्व हवे, त्याला धार हवी, त्यात अर्थ आणि संदर्भ हवा. त्यामागचा अनुभव जाणवायला हवा. तो आता प्रतीत होत नाहीं. शब्द संस्कृतप्रचुर असतील, जे नाट्यसंगीतात असे आणि चाली शास्त्रीय संगीताच्या जवळ असतील तर अजूनही सुंदर गाणी निर्माण होतील. बरं तस नसेल तरी शब्दांच्या मागचा अनुभव लोकांना जाणवायला हवा. 'झिंगाट' गाणे ऐका, एका इच्छुक प्रेमाने गायलेले गाणे आणि शब्दहि अगदी साधे आहेत पण ते 'खरे' आहेत कारण एका सामान्य तरुण काय डोक्यात ठेवतो आणि त्याला काय वाटते ते नेमके टिपले आहे. 

या चित्रपटातील अभिनय, वातावरण निर्मिती, कलाकार, वेशभूषा, संचालन इत्यादी बाबतींबद्दल आपण बोललो  पण या चित्रपटाचा प्रभाव काय या बद्दल बोलणे आवश्यक आहे. मराठी चित्रपट सृष्टीला ८० व ९० च्या दशाकातील अवकळे बद्दल मी आधी ही बोललो आहे पण मराठी नाट्य संगीताची पण पार रया गेली होती. नामशेष होण्याच्या मार्गावर म्हणायला हरकत नाही. तसेच काही मराठी नाटकांबद्दल म्हणायला हरकत नाही. मला आठवत की टाइम्स ऑफ इंडियात ९० च्या दशकात एक आख्खे पानभर नाटकाच्या जाहिराती असत पण प्रदर्शने व खेळ केवळ मुंबई पुरतीच असत. आता तेंव्हा टाइम्स ऑफ इंडिया मुंबईत च प्रकाशित होत असे, मान्य.  पण त्यातली हातावर मोजण्याजोगी नाटके नागपूर पर्यंत येत असत.... वर्षभरात! आता नागपुर चे माहात्म्य काय? पण महाराष्ट्र्याच्या एका टोकाला होत असणारी नाटके जर महाराष्ट्रयच्या दुसऱ्या टोकापर्यंत पण पोचत नसतील तर मराठी नाट्यभूमी आणि नाट्यभूमीशी संबधीत धंदा, या दोन्ही बाबी काळजीच्या सान्निध्यात होत्या म्हणायला हरकत नाही. अश्या परिस्थितीत चित्रपटाद्वारे नाट्य संगीताचा इतिहास सांगणे, प्रसिद्ध नाट्यसंगीतांचे थोडक्यात चित्रण लोकांसमोर ठेवणे, चित्रपटाद्वारे नाट्य संगीताच्या दिग्गजांची जीवन दाखवणे ही काम केवळ स्पृहणीयच नव्हे तर आवश्यक आहे. गेल्या दोन दशकात मराठी चित्रपट पुन्हा दर्जेदार या मार्गास लागल्या आहेत. श्वास असो कि हरिश्चंद्राची फॅक्टरी, किल्ला असो कि मी वसंतराव, विविध विषय मराठी चित्रपटसृष्टी ने कौशल्याने हाताळले आहेत. या रांगेत 'कट्यार काळजात घुसली' चित्रपटाला मानाचे स्थान नक्कीच प्राप्त आहे. 

8/29/23

माझे लेखन - (माझाच) एक आढावा.

मराठीत ब्लॉग्स लिहायला सुरुवात करून बरीच वर्षे झालीत. माझे मराठी शाळे पासून चांगले होते आणि मी उच्च मराठी माध्यमातून दहावी पर्यंत शिकलो. त्यामुळे निबंध लिहिण्याची सवय फार आधी पासून होती. पण पुढे जाऊन गोष्टी, लेख इत्यादी मी लिहीन याची कल्पना मला नव्हती. पुढे शिक्षण इंग्रजीत आणि परदेशातून झाले त्यामुळे साहजिकच इंग्रजीशी संबंध फार वाढला पण माझे मराठी वाचन चालूच होते. कॉलेज मध्ये असतांना इंग्रजीत ब्लॉग सुरु केला. तेंव्हा ब्लॉग हा प्रकार नव्याने उदयास येत होता. माझे इंग्रजीतील ब्लॉग्स फक्त सामाजिक, राजकीय आणि राजकारणावर असतात. गोष्टी मी कधी मराठीत सुद्धा लिहिल्या नव्हत्या त्यामुळे इंग्रजीत लिहिण्याचा प्रश्नच नव्हता. आणि तसेच इंग्रजीतील ललित-कादंबऱ्या मी फारसे कधी वाचले नव्हते.मी लहान असल्यापासून राजकारण आणि इतिहासच वाचीत असे. त्यामुळे कॉलेज मध्ये असतांना या विषयांवर इंग्रजीत लिहिणे नैसर्गिक होते. ब्लॉग्सचे विश्व जेंव्हा उदयास आले तेंव्हा ते फक्त इंग्रजी आणि इंग्लिश भाषेपुर्ती सीमित होते. गुगल ने इंग्रजीतर भाषा कधी उपलब्ब्ध केली याची मला कल्पना नाही पण मला २००७ ला अचानक दिसले कि आता मराठीत पण ब्लॉग्स प्रकाशित केल्या जाऊ शकतात. मी लगेच मराठीत ब्लॉग सुरु केला. आणि त्यावेळेस मराठी लिहिणे गैरसोयींचे होते म्हणा पण त्यात झपाट्याने बदल झाला. माझे टायपिंग उत्तम असल्यामुळे इंग्रजी कि-बोर्ड वर मराठी टाईप करणे मला फार सोपे जाई. इंग्रजी ब्लॉग प्रमाणे मी मराठीत सुद्धा राजकारण आणि सामाजिक प्रश्नांवर लिहिण्यास आरंभ केला. कोण वाचेल किंव्हा कोणी वाचेल पण का या प्रश्नांमध्ये मी सुदैवाने गुंतलो नाही. जे सुचेल ते लिहिण्यास सुरु केले आणि सन २००७ च्या मे महिन्यातच पाच लेख लिहिलेत. मला तेंव्हा बराच वेळ हि होता हे सांगायला नकोच! सुरुवातीच्या लेखांमध्ये मी शाळेतल्या आठवणी, एक-दोन राजकारणावर आणि दोन तत्वज्ञानावर तडाख्याने लेख लिहिलेत. पण लिहिण्याचा खरा आनंद अजून मिळायचा होता. मला त्या आनंदाची ना चाहूल होती ना मी वाट बघत होतो. 

आता माझ्या लघु-कथा किती वाचण्याजोग्या आहेत हे मला सांगणं कठीण आहे. पण कोण वाचतय आणि त्या वाचकांना किती आवडत आहे या पेक्षा मला त्या कथा लिहिण्यात फार मजा येते. नुसते लिहिणेच नव्हे, पण त्या गोष्टीचा विचार करणे, त्या पात्रांचा आविष्कार करणे, त्यांना नावे देणे, त्यांची व्यक्तिमत्वे रेखाटणे, त्यांना भाषा देणे, त्यांना संवाद देणे आणि मुख्य म्हणजे गोष्टीला रूप-रेषा देणे हा सगळं प्रकार, हा अनुभव, हा प्रवास, मला वैयक्तिक पातळीवर फार फार आवडतो. दैनंदिन धुमश्चक्रीत अचानक मला एखाद पात्र समोर दिसत. त्याचे व्यक्तिमत्व झळकते. आणि एक नवीन विश्वच डोळ्यासमोर भरभर उभं होत. आधी अनुभवलेली, खऱ्या जीवनातील व्यक्तित्व आणि वैयक्तिक अनुभव आपला छाप घालतात आणि संपूर्ण गोष्ट एखाद्या चित्रपटासारखा मला क्षणार्ध साठी दिसते. आणि मग सगळी पात्रे पांगतात. एकदा का रूपरेषा पक्की झाली कि प्रवासाचा दुसरा टप्पा म्हणजे शब्द शोधणे. त्या कल्पनेला शब्दांकित करण्यास खूप मेहनत करावी लागते. मला रचनेचा हा भाग हि फार सुखावतो.  शब्द शोध, शब्द-रचना, वाक्य रचना, शब्दांचे अलंकार, कोट्या हि जणू खेळणीच मला उपलब्ध होतात, खेळायला. अशीच मला माझी पहिली लघुकथा सुचली. मी तेंव्हा कामाला ट्रेन नी जात असे. मी सकाळी कामाला निघालो होतो, घाई नव्हती त्यामुळे माझा सगळा कारभार संथपणे चालू होता. आणि 'अग्निवस्त्र' ची घटना खूप वर्षांपूर्वी खरी घडलेली होती. पण त्या घटनेला खूप वर्षे झाली होती आणि माझ्या ध्यानीमनी तो विषय कधी रेंगाळला नव्हता पण अचानक माझ्यासमोर क्षणार्धासाठी अंगण, कोपर्यात एक झाड आणि त्या खाली अग्नीने वेढलेली एक स्त्री समोर आलं. आता आत्महत्या करणे फार कठीण आहे. त्या परिस्थितीला ती व्यक्ती का आली असेल याचा विचार मी करून त्या अग्नीने वेढलेल्या व्यक्तीला मी बोलते केले. घटना सत्य होती त्यामुळे त्या व्यक्तीची परिस्थिती आणि मनोस्थिती मी गुंफली. लग्नाचा शालू नेसून नवीन आयुष्याची वाट आनंदाने धरणारी हि व्यक्ती शेवटी अग्नीचा शालू नेसून ते आयुष्य मागे सोडायला तयार झाली. जरी हि कथा शोकांतिका वाटली तरी तो माझा विचार किंव्हा हेतू नव्हता. जन्मभर त्या बाईचे आयुष्य तिच्या हातातुन निसटत राहिले पण शेवटच्या क्षणी ते घट्ट धरण्यात तिला यश आले. ती एक गोष्ट तिच्या मनाजोगी झाली.   

सारख्या सारख्या मला गोष्टी सुचतात असे मुळीच नाही. गोष्टी सुचायला डोकं मुख्य ताळ्यावर हवं. विचार करायला फुरसत हवी. डोळे पण उघडे हवेत. दैनंदिन जीवन आपल्या सगळ्यांचेच धामधुमीचे असते. पुढली कामे आणि मग त्यापुढली कामे मग पुन्हा उरलेली काम आणि मग वेळ मिळाल्यावर, वेळ मिळाल्यावर करण्याची, कामेच. असंख्य, अविरत आणि अखंड. पण हि खेळणी जणू जिवंत असतात. कधी कधी रुसून बसतात. लिहायला एक शब्द सापडत नाहीत. जे लिहिल्या जात ते सगळं मिळमिळीत आणि बुळबुळीत लिहिल्या जात. मग अक्षरश: ती गोष्ट भिजत ठेवावी लागते. कधी कधी वर्षानुवर्षे. नुकतीच लिहिलेली 'सदा' लघु कथा मला २०१८ ला सुचली होती आणि त्याची रूपरेषा तेंव्हा लिहिली होती. अजून अशीच एक कथा 'बुशकू' २०२० पासून पानां मध्ये पहुडली आहे.'हर हर' म्हणून एक दीर्घ कथा तर २०१० पासून लिहितोच आहे!  प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कथा विधिलिखित वेळीच जन्म घेणार हेच खरे. 

या संकेतस्थळास मी वेग-वेगळ्या आभूषणांनी सजविण्याचा प्रयत्न करतो. नुसत्या लघु कथा नाही तर सामाजिक आणि तात्त्विक विचार सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न करतो. दीर्घ कथा किंव्हा वाढत्या वयाचे अनुभव लिहितो. शाळेतील आठवणी किंव्हा लहानपणाच्या आठवणी. आमचे जुने घर, रहता भाग, शाळा, शाळेतील मित्र, मैत्री. कधी जसे आठवेल तसे तर कधी आठवून आठवून काही तरी. अनुभव किंव्हा अनुभवानंवर आधारित असं  मला माझा दाढीवरचा लेख चांगला जुळून आला होता. तसेच, 'धुक्यातील मृगजळ' हा लेख सुद्धा मला स्वतःला आवडला. एखादा लेख किंव्हा कथा किंव्हा विचार चांगला जुळून आले आहे याची जाणीव हि सुखाची संवेदना आहे. अजून कोणाला आवडो ना आवडो पण स्वतःला आधी आवडायला हवे. अर्थात नेहमीच असे होत नाहीं. पण कधी कधी शब्द आपोआपच लिहिल्या जातात. उत्कट भावनांना वाट सहजतेने शब्द देतात. मागल्या वर्षी डिसेंबर मध्ये पावनखिंडीला डोकं टेकून यायची संधी मिळाली. तिथे जीप च्या टपावर बसून आम्ही सगळे खिंड जिथे मोकळी होती ते निरीक्षण करीत होतो. हॉटेल चा गाईड आम्हाला घटनेचा वर्णन करीत होता. तिथे शिवा काशीद बद्दल सांगितले. आता इतकी वर्ष मी शिवाजींच्या इतिहासावर इतकं वाचलंय पण मला कधी प्रश्न पडला नाही कि शिवा काशीद यांचे पुढे काय झाले? मी गाईड ला विचारला कि शिवा काशीद कसे सुटलेत? तो म्हणाला, सुटेल कसा, त्यांना तिथेच ठार केले सिद्दी ने. चाळीस वर्षांचा मी, माझ्या डोळ्यातून पाण्याची धार लागली. रडूच थांबेना. सोबतीच्यांना कळेना याला अचानक काय झाले ते. माझी फार वाईट अवस्था झाली. समोर खिंड मोकळी होतेय ती जागा आज हि चालणे कठीण आहे आणि ३०० वर्षांपूर्वी हि लोक तिथे लढतीत आणि धारातीर्थी पडलीत या कल्पनेने मला भरून आले. ती भावना मनात घरी येईपर्यंत कायम राहिली आणि 'आम्ही सगळे बाजीप्रभू' हा लेख भर्रकन लिहिला गेला. 

मधल्या काही वर्षात माझे मुळीच लेखन झाले नाहीं. कागदावर काही काही लिहिले होते पण ते टाईप करायला वेळ मिळाला नाहीं किंव्हा मनापासून प्रयत्न पण केला नाहीं. अगदी वायफळ असेही काही लिहिले नाहीं. म्हणून या वर्षी ठरवले कि प्रत्येक महिन्यात काही तरी लिहायचे. सुचेल ते लिहायचे, आधी सुरु केलेलं पण नंतर रखडलेले पूर्ण करायचं. नवीन विषय शोधायचे, नवीन गोष्टी लिहायच्यात. प्रवास वर्णनं, ऐतिहासिक, इतिहासावर, मराठा साम्राज्यावर, छत्रपतींवर, मराठा इतिहासाच्या बारकाव्यांवर, राजकारणावर, राजकारण्यांवर, भारताच्या इतिहासावर, महाराष्ट्राच्या इतिहासावर, जमेल तर थोडा विनोदी लिहिण्याचा पण प्रयत्न करायचा. एक प्रक्रिया म्हणून लिहायचे. या वर्षीचे ८ महिने हा पण टिकला आहे. पण अजून ४ महिने उरले आहेत! 

मला खूपदा भीती वाटते कि जसे अचानक लिहायला सुचले, गोष्टी, पात्रे समोर आलीत, तसेच अचानक सगळं नाहीस झालं तर? पात्रे दिसणार नाहीत, गोष्टी सुचणार नाहीत आणि शब्द लिहिल्या जाणार नाहीत? विचार करून खरंच भीती वाटते. माझा देवावर ठाम विश्वास आहे आणि गेली बरीच वर्षे मी सरस्वतीची आराधना करतो. घरा जवळ सरस्वतीची सुंदर देऊळ आहे. तिथे मी नित्य नेमाने डोकं टेकून येतो. तिची कृपा असेल तर असे होणार नाहीं या आशेने. 

कोणाला हे वाचून असे वाटायचे कि मी कोणीतरी मोठा लेखक आहे. किंव्हा मला असे वाटायला लागले आहे कि मी मोठा लेखक आहे. दोन्ही गोष्टीत तथ्य नाही. अर्ध-एक पानापूर्ती का होईना, एक नवीन विश्व निर्माण करण्यात जे सुख आहे, मराठीत लिहिण्याचे जे सुख आहे, हे सध्याच्या धुमश्चक्रीतला (जी सगळ्यांचीच असते) एक कोनाडा आहे जो आल्हाददायक वाटतो, स्वतःचा वाटतो. स्वतःचा आनंद निर्माण करण्याचा हा अनुभव हवा-हवासा वाटतो. तो टिकाव हि आशा आणि सरस्वतीस प्रार्थना.   

7/17/23

चाळीशीचा चष्मा

मला अजून तरी चाळीशीचा चष्मा लागलेला नाही. चाळीशी नक्कीच ओलांडली आहे कारण आता तीन-चार महिन्यात ४१ चा पूर्ण होणार. पण चष्मा लागलेला नसला तरी त्यातून मागे वळून बघण्याचा प्रयत्न मी बरेच महिने करतो आहे. भारतीय पुरुषाचे वय साधारणत: ७६ असते म्हणजे माझे अर्धे आयुष्य उरकले. तसा मी धड-धाकट आहे, धष्ट-पुष्टतेच्या मापावर काटा उजवीकडेच जातो. चाळीशी नंतर सुद्धा लोक आजकाल काय काय प्रताप करतात त्यामुळे चाळीशीला आता लोक प्रौढ मानीत नाही. डोक्यावरचे (उरलेले) केस पांढरे झालेले जणू नव-तारुण्याचं! वाढते वय केवळ एक आकडा मानून पुढे पुढे जात रहाणे हे जीवनाचे उत्तम तत्वज्ञान आहे. पु.ल. एखादवेळेस 'जीवन' शब्द वाचून थट्टेने हसले असते. पण गत आयुष्याच्या आठवणी झपाट्याने धूसर व्हायला लागल्यात कि प्रौढ झालो एवढे नक्की. 'पंचवीस वर्षांपूर्वी' किंव्हा 'पेट्रोल मी ३७ रुपयांनी भरले' इत्यादी वाक्यप्रचार तोंडी आलेत म्हणजे माणूस प्रौढ झाला असे समजावे. त्या प्रत्येक्ष व्यक्तीला ते मान्य नसले तरी! 

पण प्रौढ होणे म्हणजे काय? असंख्य व्याख्या मिळतील. जगात चाळीशी गाठलेले आणि चाळीशी ओलांडलेले जितके लोक असतील तितक्या व्याख्या मिळतील. आणि या असंख्य व्याख्यांमध्ये अनेक सूक्ष्म रंग आणि छटा पण दिसतील. पण या व्याख्या बहुतांश समाज व कुटुंबाने थोपलेल्या किंवा जवाबदारीने निर्माण केलेल्या असतात. आणि यातील छटा, ज्या वैयक्तिक आहेत, अगदी हातावरच्या (भाग्य) रेषांसारख्या विशेष, त्या व्यक्तीला आलेल्या अनुभवांच्या छिन्नीच्या घावांनी उत्पन्न झालेल्या असतात. या सामाजिक भाराच्या व्याख्या आणि वैयक्तिक अनुभवांचे घाव, याच्या तफावतीत आपण तळ्यात-मळ्यात करीत असतो. यालाच बहुधा मिड-लाईफ क्रायसिस म्हणत असावेत. 

थोडक्यात चाळीशी पर्यंत आपण सगळे अर्जुन झालेलो असतो. 

मोठ्यांचा ऐकायचा कि नाही? आणि किती ऐकायचे? आणि कधी ऐकायचे? लहानाचे किती ऐकायचे आणि किती सांगायचे? आणि त्यातून ते किती ऐकणार? कि काही ऐकणारच नाही? तब्येत कि पैसे? आत्ता पैसे खूप जीव तोडून कमवायचे आणि मग आराम कि संथ गतीने कमावत सत्तरी पर्यंत काम करायचे? तस आराम म्हणजे नेमके काय? स्वतःचा धंदा उघडण्याची वेळ गेलेली असते पण मनात कुठे तरी टाटा-अंबानी ची स्वप्ने खदखदत असतात. घर आधी फेडायचे कि भविष्यासाठी कुठे तरी जमिनीचा तुकडा घेऊन ठेवायचा? जमिनीचा तुकडा किमतीने वाढेल या आशेत. कुरुक्षेत्रामधले अर्जुन, कृष्णाच्या शोधात किंव्हा चक्रव्यूहातले अभिमन्यू 'निकास मार्गा' च्या शोधात. 

आशा हा एक शब्द न रहाता एक मनस्थिती झालेली असते. मोठ्यांना आपले, या काळाचे, संघर्ष कळतील हि आशा, लहांनाना आपले संघर्ष कळू नयेत हि आशा पण त्यासोबत आपल्या संघर्षातून लहानांनी काही शिकावे हि पण आशा. आपले संघर्ष आपल्यालाच काही शिकवतील हि आशा. लहाने मोठे होऊन नीट शिकतील-सवरतील आणि चांगलं करतील हि आशा. मोठ्यांच्या आपल्यावर असलेल्या आशांना आपण पुरे पडतोय हि पण आशा. प्रमोशन होईल, पगारवाढ होईल किंव्हा वाढत्या पगारावर नवीन नोकरी मिळेल हि आशा. 

इतक्यांदा आशा शब्द वापरला कि आमच्या वर्गात एक आशा होती. तिला ठसका लागला असेल.

'तसे हे गाव आणि मी एकमेकांचे काहीच लागत नव्हतो देणे. 

टिपायचे होते तेवढे टिपून घेतले झाले चोचीत दोनचार दाणे 

मग गावासाठी मी उरलो नाही आणि संपले माझ्यापुरती हे गाव 

पुन्हा शोधणे, नवे रस्ते, नवी माणसे पुन्हा एकदा नवे गाव 

(ऋणानुबंध, प्रभा गणोरकर) 

जाहिरातींच्या जग झपाट्याने उपकरणांचे जग एका दशकात झाले. आपल्या (चाळीशी वाल्यांच्या) युवा वयात असतांना एखाद्या कडेच कॅमेरा असायचा आणि आता फोन च्या जाहिरातीत कॅमेराचा दाखवतात. फोन लागत नाही किंव्हा लागला नाही तरी चालेल पण फोन च्या कॅमेरा ने चंद्राच्या खड्ड्यांचा फोटो काढता आला पाहिजे. या भानगडीत होता काय कि अनुभव वयाच्या मैलांचे दगड ओलांडायला लावीत ते होत नाही. सगळे वर्तमानात जगण्याचा तडफडाट करतात आणि या भानगडीत फोटोंच्या माध्यमाने भूतकाळ वर्तमान च बनून राहतो. कोणी मोठा होऊ बघतच नाही. आमच्या चाळीशीवाल्यांची मुलं काहीच वर्षात 'पार्ट्या' करायला लागतील पण आमच्याच पार्ट्या थांबत नाही. पार्ट्या थांबाव्यात असे नाही पण त्याचे रूप बदलू शकते. किंव्हा बदलायला हवे. दारू झेपत नाही, अरबट-चरबट खाल्लेलं पचत नाहीत, झोप नीट येत नाही, पँट कंबरेला फिट होत नाही पण विशीत केलेल्या पार्ट्यांसारखी मस्ती करण्याची खाज जात नाही. तारुण्याच्या आठवणींचं हि उब अर्थात खोटी आहे. ते एक मृगजळ आहे. पुन्हा, पार्ट्या करू नये असा नाही पण आता आपण चौथीतून पाचवीत गेलो आहोत. चौथीत खूप मस्ती-मजा केली म्हणून आपण सारखं सारखं चौथीच्या वर्गात जाऊन बसू शकत नाही. उंची वाढली आहे, चौथीच्या डेस्क-बेंचला गुढघे लागतात! 

पण उंची वाढली म्हणजे नेमके काय? आत्ता पर्यंत वाचणाऱ्यांना असा वाटत असेल कि या लेखात काही गुरुकिल्ली मिळणार आहे तर असा काही होणार नाही. वरील विचार आणि निरीक्षण माझी परिस्थिती, मनस्थिती, वयोमान, कालमान याचे सूर आहेत. दुसऱ्या कोणावर नव्हे तर माझ्या प्रतिबिंबावर केलेले समीक्षण आहे. माझ्या कडे उत्तर थोडी फार आहेत पण प्रश्न मात्र भरपूर आहेत. 

प्रत्येकाचा स्वभावधर्म वेगळा असतो. प्रत्येकजण शर्यत जिंकू शकत नाही. खूप साऱ्यांना तर शर्यतीत भाग हि घ्यायचा नसतो. पण आपली सध्याची समाजस्थिती आणि आर्थिक आवश्यकता अशी आहे कि सगळ्यांना भाग घेणे अनिवार्य करण्यात येत. भानगड तिथेच सुरु होते. पहिल्या पाचांसाठी शेवटले ऐंशी फरफटल्या जातात. महत्वाकांक्षा आवश्यक आहे पण प्रत्येकाची आणि प्रत्येकामधली महत्वाकांक्षा वेगळी आणि वेगळ्या प्रमाणात असते. आणि हा नेमका फरक ज्यांना लक्षात येतो ती लोक निदान चाळिशीनंतर शांत मनस्थितीत पोचू शकतात. स्वरूप पहा, विश्वरूप बघू नका असे विनोबा भावे म्हणतात, यात तथ्य आहे. (भाव्यांच्या बहुधा या एकाच विचारात तथ्य आहे!) ज्यांना लक्षात येत नाही त्यांचा ठण-ठण गोपाळा होतो. 

कारण आता अजून पहिला नंबर येणे कठीण आहे. कुठल्या कंपनीचा मालक किंव्हा सी-इ-ओ बनणे कठीण आहे. अचानक अर्जुन बनून मासळीचा डोळा छेदणे कठीण आहे. कारण अर्जुना सारखे फक्त पोपटाचा डोळा दिसणारे आपण बहुतांश नव्हतो. पोपट ज्यांना दिसला तेच भाग्यवान कारण आपल्या पैकी बहुतांश झाडावरची पाने मोजणारे लोक्स होतो. थोडक्यात आपण सामान्य आहोत आणि जरी आपल्या स्वतःच्या आयुष्यातील आपण अर्जुन असलो तर जगाच्या महाभारतात, ढाल-तलवारी घेऊन उगाच इकडून तिकडे धावपळ करणारे शिपाई गडी आहोत. ते पण ज्यांना तलवार जेमतेम पेलता येते. 

थोडक्यात मला माझ्या सामान्यत्वाची जाणीव चाळीशीत होते आहे. आपण आता जगाच्या रहाटगाड्यात फारसा प्रभाव पाडू शकत नाही. आपण दुनिया बदलवू शकत नाही. दुनिया आपल्या मुठ्ठीत नाही. आपल्या मतांना आपल्याला जेवढा वाटतं तेवढा महत्व नाही. आपण जे काम करतो, आणि खूपदा अभिमानाने व सचोटीने करतो, ते एखाद वेळेस क्षुल्लूक नसेल पण महत्वाचेही नाही. खूप साऱ्या लोकांना याची कल्पना येत असते पण वळणी पडत नाही. ओंजळीने समुद्र रिकामा करण्यासारखं ते आरश्यात प्रतिबिंबाला महत्व प्राप्त करून देण्या साठी अट्टाहास करीत बसतात, मनस्ताप करून घेतात. 

आत्तापर्यंतचे शब्द आणि सूर निराशात्मक वाटणे शक्य आहे पण तसा प्रयत्न नाही, तसा विचार नाही. बहुतांश मंडळी चाळीशी गाठे पर्यंत आर्थिक दृष्ट्या सुदृढ असते आणि करियर मध्ये पुढला रस्ता बहुतांशांना स्वछ दिसत असतो. सामान्यत्वाची जाणीव होते या जाणीव होणे हा भाग महत्वाचा. (आणि समाज जाणीव झाली नाही तर सामान्यत्व थोडीच बदलणार आहे!) मग हि वस्तुस्थिती आत्मसात करून त्याचा ढाल आणि तलवार असा दोन्ही वापर करून घेतला तर? स्वतःवर जास्त भार न घालणे म्हणजे ढाली सारखा वापर आणि जे चालू आहे त्यात जास्तीत जास्त यश किंव्हा आनंद, किंव्हा दोन्ही, प्राप्त करणे म्हणजे तलवारी सारखा वापर करणे झाले. स्वतःच्या पोराबाळांमध्ये जास्त लक्ष घातले तर त्यांच्या यशात आपल्यालाच आनंद मिळणार. आपल्या तब्येतीत जास्त लक्ष घातले तर सुदृढ शरीर आपल्यालाच आनंद देणार, आपल्या बायको सोबत जास्त वेळ घालविला तर स्वभावाचे आणि नात्याचे नवीन पैलू कळू शकतात, त्यातही आनंद मिळणारच. मित्रांसोबत जास्त वेळ घालविला, जुन्या मित्रांना पुन्हा नव्याने भेटलो, नवीन मित्रांना जुन्या मित्रांसारखा जिव्हाळा दिला तरी आनंद आपल्यालाच मिळणार. नवीन छंद जोपासला, जुन्याला छंदाची उजळणी केली तर स्वतःबद्दलचे नवीन आयाम समजतील. समाजसेवा केली तर? पुन्हा, जग बदलायला नाही. एक तास द्यायचा आठवड्यात. शाळेत शिकवायचा, तरुण मुलासोबत वेळ घालवून अनुभव ऐकायचेत, सांगायचेत. प्रायमरी शाळेत गोड वाटायचं सरस्वती पूजन करून दर शुक्रवारी? किती म्हणजे किती तरी कल्पना आहेत या क्षेत्रात. 

'पण आपण चालावे, दरवेशी नसलो तरी 

सोबत घेऊन आपली सावली 

शोधावा नवा रस्ता. पायांना जर फुटल्याचा आहेत दिशा आणि जर आहेतच 

गाव प्रत्येक रस्त्यावर तर सापडेलही एखादे आपल्यासाठी थांबलेले. 

नाहीतर हा आहेच रस्ता रस्त्यांना मिळणार आणि ते रस्ते दुसऱ्या रस्त्यांना मिळत जाणारे' 

(ऋणानुबंध, प्रभा गणोरकर) 

थोडक्यात, स्वस्थ बसून 'इति' ची वाट बघत टवाळक्या करीत बसायचे नाही. परिस्थिती स्विकारणे म्हणजे खंत करणे नव्हे. जाणीव होणे म्हणजे हार मानणे नव्हे. अर्जुन आणि पोपटाच्या डोळ्याची गोष्ट नवीन अंगाने समजायला हवी. जीवनात (पुन्हा!) आपल्या अनेक संध्या मिळतील, अर्जुन बनून पोपटाचा डोळाच फक्त बघण्याच्या. एकदा नाही, दुसऱ्यांदा. दुसऱ्यांदा नाहीत तिसऱ्यांदा. नवीन झाड, नवीन पोपट अहो, पोपटाचा डोळा दिसला म्हणून तो अर्जुन नाही झाला. अर्जुन होता म्हणून त्याला डोळा दिसला. आपण अर्जुन बनून प्रयत्न करीत राहायचे. 

Do not go gentle into that good night,

Old age should burn and rave at close of day;

Rage, rage against the dying of the light 

(The Poems of Dylan Thomas, Dylan Thomas) 

नवीन मार्ग, नव्या दिशा, नवीन आनंद आणि,  प्रौढ पण आपण हि नवीनच! 

---

ता.क.  - एवढं लिहिलं, पण वाचणाऱ्यांपैकी कोणाला सुचला नाही कि चाळीशीचा चष्मा जवळच बघायला असतो. आणि हा शंख तो लावून दूरच बघण्याचा प्रयत्न करतो आहे. डोंबल दिसणार आहे काही! 

6/16/23

मराठी स्वातंत्र्य संग्राम - सन १६८२ ते १७०७

सध्या श्री सेतू माधवराव पगडीकृत इतिहास वाचन चालू आहे. त्यांनी असंख्य पुस्तके लिहिलीत. त्याचे संक्षिप्तात किंव्हा ज्याला इंग्रजीत overview असे म्हणता येईल असे, शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर ते औरंग्याच्या मरणापर्यंतचा काळ असे हे पुस्तक आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळ सन १६८९ पर्यंत. मग छत्रपती राजाराम महाराजांचा कार्यकाळ सन १६९९ पर्यंत मग सन १७०७ पर्यंतचा काळ जो ताराबाई राणी यांनी गाजवला. सन १७०७ ला जेंव्हा औरंग्या मेला तेंव्हा मराठ्यांचे २५ वर्षाचे स्वातंत्र्य युद्ध संपले. या पुस्तकातून काही माहिती, विचार आणि द्रुष्टीकोन मला नाविन्यानी कळलेत किंव्हा उमगल्यात. 

१) छत्रपती संभाजी महाराज ढाण्या वाघ होते - शिवाजी महाराजांच्या अचानक झालेल्या मृत्यू नंतर संभाजी महाराजांवर जणू फक्त संकटच कोसळत होती. आधी घरातील भाऊबंदकी आणि आजूबाजूला असलेली घरभेदी मंडळी पासून स्वतःला वाचविणे आणि दोन वर्षात औरंग्या दिल्ली हुन समुद्रमय सैन्य घेऊन स्वराज्यात उतरणे, हे बघता कोणीही सामान्य माणूस गांगरून गेला असता. यात त्यांच्यावर दोन जीवघेणे हल्ले हि झालेत. औरंग्याचे दक्खनी उतरणे हि साधारण गोष्ट नव्हती. त्याच्या सोबत दीडशे वर्ष उत्तर भारतात अनभिषिक्त सत्ता गाजवणारी मुघल सत्तेची सर्व संपत्ती, सामुग्री आणि सैन्य होते. औरंगझेबाच्या ध्येय मोघली सत्तेचा प्रसार एवढेच नसून, हंपी हिंदू साम्रज्याच्या सन १५४५ च्या विध्वंसा नंतर जवळ जवळ सव्वाशे वर्षांनी पुन्हा गर्वाने उभे राहिलेल्या हिंदू साम्राज्याचा मुळापासून विनाश करणे हा होता. औरंगझेबाने त्याच्या सरदारांना लिहिलेल्या अनेक पत्रातून 'मी या मराठ्यां विरुद्ध जिहाद करायला आलो आहे' याचा उल्लेख होतो. अश्या अत्यंत बिकट परिस्थितीत संभाजी महाराजांनी ९ वर्षे अखंड आणि अविरत लढा दिला. मोघालाविरुद्ध, उरलेल्या आदिलशाही विरुद्ध, पोर्तुगीसविरुद्ध ते छाती ठोकून लढले. पगडी यांच्या पुस्तकातील संभाजी महाराजांच्या पहिल्या तीन वर्षातील ठळक हालचालींची रूपरेषा बघावी:

सन १६८०-८१ संभाजी महाराजांचे रायगडी आगमन, मंचकारोहण व सन १६८१ ला राज्याभिषेक 

सन १६८२ ला शाहजादा अकबर याची पाली ला भेट

सन १६८२ ला दंडापुरीच्या वेढ्यात महाराज उपस्थित

सन १६८३ ला कल्याण-भिवंडी भागात महाराज कार्यरत 

सन १६८३ ला रेव-दंड्याच्या वेढ्यात 

सन १६८३ ला महाराजांची गोव्याची मोहीम

परिस्थितीला घाबरून काही मातब्बर मराठी सरदार घराणी मोघलांना जाऊन मिळत होती पण संभाजी महाराज डगमगले नाहीत. त्यांना खरमरीत पत्रे लिहून धर्माची आणि स्वराज्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सगळ्यात मोठे पाठिंबेदार सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा एका चढाईत सन १६८७ मृत्यू झाला पण तरी संभाजी महाराज लढत राहिले. औरंगझेब सन १६८२ ला दख्खनी आला. महाराजांनी ताबडतोब सगळ्या किल्ल्यांवर जोरदार रसद आणि सैन्याची तयारी केली. औरंगझेबाच्या मुलाला पाठीशी घेऊन मुघलांच्या सगळ्यात मोठ्या पाठिराख्यांचा - राजपुतांमध्ये फूट पडून, औरंग्याला द्विधा मनस्थिती पाडण्याची खेळी खेळली. गोळकोंड्याचा कुतुबशाह आणि उरलेला आदिलशहाशी गठबंधंन करून एक सामूहिक फळी उभारण्याचा प्रयत्न केला. आणि या दरम्यान ते पोर्तुगीसशी लढलेत. पण त्यांच्या कुठल्याही राजकारणाच्या सोंगट्यांना यश आले नाहीं. किंव्हा यश येण्यास जो अवधी लागतो त्या आधीच ते वीरगतीस प्राप्त झालेत.  

"मृत्यो मा अमृतंगमय" सारखेच त्यांच्या धर्मसाठी जीव देण्याच्या वीरतेने सकळ मराठी समाज जागृत झाला. आणि त्यांच्या जीवनाच्या मिटत्या समयीने धर्मांध आणि क्रूर मुसलमानां विरुद्ध लढण्याचा वन्ही पेटला. श्री पगडी यांच्या मते संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर औरंग्याला वाटले कि आता हिंदवी स्वराज्य संपले पण त्याच्या अगदी विरुद्ध झाले. मराठे जागृत झाले, चेतावले आणि जागा मिळेल तिथे, जसे जमेल, जेवढे जमेल तिथे मोघलांना धोपटणे चालू झाले. कोकणापासून ते बिदर, गुलबर्गा, जिंजी पासून ते खानदेशापर्यंत लढणाऱ्यांच्या अनेक फळ्या उभ्या झाल्यात आणि मोगलांशी झुंजू लागल्यात. आणि याच मूळ श्रेय छत्रपती संभाजी यांच्या जीवन संघर्षाला आणि धर्मा साठी मरणाला मिठी मारण्याच्या महान कृत्याला द्यावं लागेल.  

गनिमी कावा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून मराठे गनिमी काव्या साठी प्रसिद्ध होते. सह्यांद्रीला जणू सेनापती बनवून स्वराज्याचे सैन्या खूप लढले. पण गनिमी कावा म्हणजे केवळ कडे-कपाऱ्यांचा आधार घेत लढणे नव्हे. शत्रूला गाफील ठेवणे, विजेच्या गतीने हालचाली करणे, आणि झडपीचे किंव्हा लढाईचे अंतिम लक्ष्य हे प्रत्यक्षात उभरत असलेल्या परिस्थितीला बघून बदलविणे आणि बिकट परिस्थिती वाटल्यास ताबडतोब काढता पाय घेणे. याला पळणे म्हणणे चुकीचे आहे कारण मराठ्यांची धाड पुन्हा पडणार हे नक्की. झटापटीतून निसटून परत वार होणारच.  युद्धात जय-विजय याची परिभाषा मराठी सैन्यानें बदलविली. खूपदा गनिमी काव्याचा हल्ला मोगलांची तयारी बघणे एवढेच असे. घाई गडबडीत मोगल त्यांचे जणू सगळे पत्ते समोर ठेवत. त्यांच्या सैन्याची परिस्थिती कशी आहे आणि त्यांना चोपायला हवे कि कोंडून खंडणी वसूल करणे बरे ठरेल? तसेच, एका मोघली तुकडीवर हल्ला करून, दूरच्या तुकडीला मदतीस यायला भाग पाडणे आणि ती तुकडी आली की पळ काढणे. स्वराज्याला, लोकांना, मराठी सैन्याला उसंत मिळावी याचा प्रयत्न करणे, मोघलांना नेहमी एका पायावर उभा ठेवणे असे अनेक ध्येय या गनिमी काव्याच्या मागे होती. 

शत्रू नेहमी याच विचारात असेल कि पुढला हल्ला कधी होईल. मोगलांकडे पैसे आणि माणसे असंख्य होती त्यामुळे त्यांच्याशी खुल्या मैदानात युद्ध करणे जोहार ठरला असता. मराठ्यांनी ठरवले कि मोगलांना सतत असंख्य जखमा करून, सतत रक्तबंबाळ करून, थकवून मारायचे. या युद्धशैलीत संताजी आणि धनाजी वस्ताद होते. त्यांची घोडी जणू भिंगरी होती आणि त्यांचे सैन्य म्हणजे झंझावात. मोगली घोड्यांना संताजी आणि धनाजी पाण्यात दिसायची म्हणे. अर्थात हे शक्य नसले तरी पाणी प्यायची उसंत मोगली घोड्यांना नव्हती हे या मागची खरी परिस्थिती होती.  

३) औरंगझेब तेवढा मुत्सद्दी नव्हता आणि हुशार नव्हता: औरंगझेबाच्या सगळ्यात मोठा गुण म्हणजे तो दीर्घायुषी होता. ज्या काळात लोक चाळीशीहि गाठत नसत तिथे त्याने नव्वदी गाठली. त्यामुळे त्याने असंख्य कारभार आयुष्यभर केलेत. त्यात काहींत यश मिळणे साहजिकच आहे. पण त्याच्या जीवनाचा एकूण आढावा घेतला तर औरंग्या, जो बाबर ने स्थापन केलेल्या राज्याचा सहावा वंशज होता आणि प्रत्येक बाबतीत शेवटला ठरला. त्याच्या नंतरचे मोघल 'सम्राट' भुसा भरलेले पेंढे होते. त्याने राजकीय आणि युद्धक्षेत्रात जितक्या चुका मराठ्यांविरुद्ध केल्यात त्या अजून कोणी केल्या असत्या तर एकतर युद्ध कधीच संपलेअसते किंव्हा त्या राज्याचा दिवाळं निघालं असतं. पण औरंग्या पर्यंत मोघलांनी भारताला इतका लुटलं होत कि त्या घराण्याचा दिवाळं काढायलाही औरंग्याला पंचवीस वर्षे लागलीत. त्याने संभाजी महाराजांची अत्यंत निर्घृण रीतीने हत्या केली ज्यामुळे अगदी जन-सामान्यही चेकाळले. त्याने छत्रपती राजाराम महाराजांना निसटू दिले. मग जिंजीच्या वेढ्यात असंख्य सैन्य आणि पैसे गुंतवला. त्या दरम्यान मराठे प्रत्येक बाजूने त्याच्या सैन्याला घायाळ करू लागले. तो डोक्यात राख घालून मराठ्यांचे किल्ले घेण्याच्या मागे लागला. त्यात त्याच्या लक्षात नाही आले कि मराठ्यांनी त्यांची युद्ध-नीती बदलवली आहे. औरंगझेबाच्या सैन्याला एका एका किल्ल्या मागे महिना-महिना गुंतावून ठेवून, मराठे भारतात इतरत्र पसरू लागले. त्याच्या हयातीतच मराठे नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात पोचले आणि दक्षिणेत मछलीपट्टणम पर्यंत निर्धास्त हिंडू लागलेत. एवढेच नाहीत तर मराठ्यांनी सगळीकडे आपले सरदार बसवून कर घेणे हि चालू केले. किल्ले घेऊन मराठ्यांना कोंडण्याचा बावळटपणात औरंगझेब स्वतःच जणू किल्ल्यांमध्ये कैद झाला. त्याच्या सोबतीची सरदार एक-एक करून 'अल्ला' ला प्यारे झालेत आणि हा मागे एकटाच खुडत राहिला. मोघलांचे तत्कालीन इतिहासकार लिहितात कि मराठे औरंग्याच्या दिर्घआयुषाचे नवस करीत कारण जो पर्यन्त हा दख्खनी असेल तो पर्यंत उत्तरेतून खजिना दक्षिणेत येत रहाणार आणि मराठ्यांना अनासायास मिळत रहणार. स्वतःच्या बापाला, भावंडांना व पुढे मुलांना मारून हा धर्मान्ध, क्रूर आणि गर्विष्ठ 'बादशाह' शेवटी बापजाद्या पासून जमवलेली संपत्ती आणि राज्य मराठ्यांना देऊन एकाकीच आणि अक्षरशः चिखल साचलेल्या तंबूत मेला. 

--

मराठी इतिहास वैभवशाली आहे यात वाद नाही पण यात असंख्य बारकावे आणि घडामोडी आहेत. या साम्राज्यात असंख्य पात्रे पण आहेत. गेल्या हजार वर्षात हंपी च्या विजयानगरच्या साम्राज्य नंतर हिंदुस्थानवर लखलखणारा तारा म्हणजे मराठी हिंदवी स्वराज्य. पण हिंदवी स्वराज्य विजयानगरच्याहि एक पाऊल पुढे होते कारण स्वराज्यकर्त्यांनी शत्रू मुसलमान आहे हे ओळखले होते आणि या परदेशी धर्मान्ध मुसलमानांना भारत भूमीतून हाकलले शिवाय उसंत नाही यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अहिल्याबाई आणि महादजी पर्यंत सगळ्यांनी अखंड कष्ट उपसलेत. भारतीय इतिहासावरची इंग्रजीतील पुस्तके वाचलीत तर मराठे हे जणू मोघल आणि इंग्रजी राज्या मधला स्वल्पविराम म्हणून दर्शविल्या जात. इंग्रजी साम्राज्याची सुरुवात तर पानिपत युद्धाच्या आधीपासून म्हणजे सन १७५९ पासूनच सांगितल्या जात! यात काही तथ्य नाही आणि सत्य तर मुळीच नाहीं. 

मग सत्य काय? खरा इतिहास काय? नुसतं 'जय शिवाजी, जय भवानी' म्हणून भागायचं नाहीं? इतिहासाचा रीतसर अभ्यास हवा, त्या अभ्यासाला जागतिक घडामोडींशी पडताळून बघायला हवे. पण याचा उपयोग काय? याच्या उत्तराच्या शोधाचा नवीन लेख लिहावा लागेल. पण गेल्या तीनशे वर्षात फक्त मराठी लोकच आक्रमकांशी प्रखरतेने लढलेत. आणि ते अख्या भारतखंडाच्या स्वधर्म, स्वराज्य आणि स्वाभिमानासाठी लढलेत. स्वजाती, स्वभाषा किंव्हा आप-आपल्या राज्यापुरती त्यांचा लढा सीमित नव्हता. छत्रपती शिवाजीनं पासून ते अहिल्याबाईंच्या पत्रातून देश व धर्मासाठीचा कळवळा प्रकर्षाने जाणवतो. आणि असेच नेतृत्व व अश्याच विचारसरणीची आवश्यकता पुन्हा देशाला आहे. आपण आपला इतिहास जाणला तरच आपल्या उद्याचा भारत साकारायला प्रवृत्त होऊ, नाही का? 

5/23/23

जन धन योजना आणि नवा भारत

भारताने स्वातंत्र्योत्तर काळात अनेक क्षेत्रात भरघोस प्रगती केली आहे. तसेच अनेक क्षेत्र अशी आहेत ज्याकडे नीट लक्ष दिल्या गेले नाही. जसे सरकारी आणि खासगी आरोग्य सेवा, जी अपुरी तर आहेच तसेच खर्चिक पण आहे. अजून एक क्षेत्र म्हणजे आर्थिक समावेशन, ज्याला इंग्रजीत फायनान्शियल इंकलूजन असे म्हणतात. आर्थिक समावेशन म्हणजे समाजाच्या प्रत्येक घटकातील प्रत्येक व्यक्तीस बँक खाती, कर्ज आणि तत्सम सुविधा स्वस्त व किमान दरात उपलब्ध व्हाव्यात आणि या क्षेत्रात जमवलेला पैसे सुरक्षित असावा. जुन्या काळात हि गरज कमी प्रमाणात उपलब्ध होती आणि साधारण सावकार किंव्हा सराफ या द्वारे यातील अंशतः सुविधा लोकांना मिळत. सावकारी किंव्हा सराफ पद्धतीत व्याजदर महाग असे, पैसे सुरक्षित असेल अशी खात्री नसे.  आता या सुविधा बँकेद्वारे किंव्हा तत्सव वित्त संस्थानद्वारे पुरविल्या जातात. आणि या संस्थाचे कार्य राष्ट्रीय आणि राज्य सरकारी नियंत्रण व नियमान अंतर्गत असते. 

पण भारतात बँक कमी आहेत, बँकेच्या शाखा कमी आहेत व या शाखा सर्व भौगोलिक क्षेत्रात पण नाहीत. त्यामुळे अर्थातच बँक आणि बँक प्रणित वित्तीय व आर्थिक सुविधांचा उपयोग फार कमी लोकसंख्येस घेता आला आहे. भारतात सन 2014 पर्यंत फक्त 35% जनसंख्येची बँकेत खाती होती. या तुलनेत अमेरिकेत हि टक्केवारी 96% आहे. 

भांडवलाचा खेळ: 

गेल्या दोनशे वर्षात मानव जातीच्या प्रगतीच्या अनेक कारणांपैकी एक महत्वाचे कारण म्हणजे आर्थिक दळण-वळणाची जगभरात उपलब्धता. विशेषतः भांडवलशाहीच्या आजच्या जगात ज्यांना आर्थिक सुविधांचे मार्ग उपलब्ध आहेत त्यांची आर्थिक प्रगती अधिक झालेली दिसते. उदाहरणार्थ, पश्चिमी देश आज प्रगत आहेत तसेच युरोप मधील सामान्य जनता आपल्या देशातील सामान्य लोकांपेक्षा अधिक समृद्ध व सधन आहे. आपल्या देशातील व्यापारी समाजाचा आढावा घेतला तर देशाच्या काना-कोपऱ्यात पसरून सगळ्या तऱ्हेची दुकाने आणि माल विकणे यांना शक्य होते कारण पैसे उभारणे, पैसे कर्ज देता येणे, व्याज मिळवणे आणि पैसे परत करणे या उलाढाली या समाजाला इतरांपेक्षा अधिक सोप्या पद्धतीने जमतात. आणि गंमत म्हणजे, येथे बँकेचा लाभ पण घेतल्या जात नाही. पण जो व्यापारी नाही किंव्हा व्यापारी समाजाचा नाहीं, त्याने काय करायचे? कारण या सुविधा फक्त व्यापाऱ्यांनाच फायद्याच्या असतात असे नाही. आवश्यक गोष्टी (घर) कर्जावर घेता येणे किंव्हा निकडीच्या वेळी कर्ज मिळणे. कर्ज किमान व वाजवी दरात मिळणे तसेच स्वतःकडे जमलेल्या पैश्यावर व्याज मिळण्याची सुविधा असणे या सारखा अगदी साधारण वाटणाऱ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. देश व समाजाची आर्थिक प्रगती यामुळे होतेच पण वैयक्तीक पातळीवर आर्थिक स्वातंत्र्य एक सकारात्मक भूमिका निभावते. 

जन धन योजनेची पार्श्वभूमी:

आर्थिक समावेशनाचा विचार भारत सरकार सन1969 साला पासून करीत आहे. त्या वर्षी बँक क्षेत्राचे राष्ट्रीयकरण केल्या गेले. या भूमीवर भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांच्या सरकारने सन 2011 ला 'स्वाभिमान' नावाची योजना राबवायला घेतली. लक्ष्य तेच कि गरीबांचे आर्थिक समावेशन करायचे. पण श्री सिंग यांच्या सरकारचा तो काळ वेगळ्या धाम-धूमीत गेला आणि स्वाभिमान योजनेस फारसे यश प्राप्त झाले नाही. मोदी सरकारने हि योजना एक राजकीय मत मिळविण्याची योजना न बघता, अंत्योदय विचाराअंतर्गत एक ध्येय आणि आवश्यकता म्हणून स्वीकारले आणि या योजनेचे बारसे जन-धन योजना करण्यात आले. पण फक्त बारसेच केले असे नाही तर याची अंमलबजावणी करण्याचे नियोजन नावीन्यानी केले. 

मोठ्या तडफदार पणे मोदी सरकारने सरकारी यंत्रणा हाती घेतली. संपुर्ण देश छोट्या-छोट्या प्रशासन क्षेत्रात विभागला. बँकांना हे काम व्यापारी दृष्टिकोनातून न बघता, एक सामाजिक कार्य म्हणून बघण्याचा इशारा सरकार ने दिला. खरं तर आधीच्या सरकारांनी बँकांकडून 'सामाजिक' कार्य बरेचदा करून घेण्याचा यत्न केला आहे. त्यात ना सामाजिक प्रगती झाली ना काही कार्य झाले. पण मोदी सरकारचे खरे यश हि योजनेची अंमलबजावणी होय. मोदी सरकारने बँकांच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन अख्खा देश चाळला. गावा-गावातून खाती उघडायला बँक अधिकारी उपलब्ध केलेत. केवळ आधार ओळख पत्रावर खातं उघडण्याची सोय केली. पण केवळ प्रशासन प्रक्रिया सोपी करून चालणार नव्हते. प्रसिद्ध फ्रेंच सेनानी नेपोलियन म्हणायचं कि मनुष्याला काम करण्यास उद्युक्त करायला एक तर भीती लागते किंव्हा आमिष. आता भीती पोटी बँकेची खाती उघडायला लावायला आपला देश काही चीन नाही. मग आमिष काय हवे? तर बँकेची खाती उघडावीत तर विविध सरकारी योजने अंतर्गत मिळणारी मदत (पैसे) हे सरळ बँकेच्या खात्यात जातील. उदाहरणार्थ, उज्ज्वल योजने अंतर्गत मिळणाऱ्या LPG सिलेंडर वर मिळणारी मदत. थोडक्यात, उघडलेल्या खात्याशी सरकारने अजून योजना गुंफल्यात. 

आर्थिक समावेशाचे रोपटे:

या योजनेची सुरुवात श्री नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 15, 2014 ला धूम-धडाक्यात केली. पहिल्याच दिवशी दीड कोटीच्या वर नवीन खाती उघडल्या गेलीत. आणि तेंव्हा पासून सन 2022 पर्यंत जवळ जवळ 47 कोटी नवीन खाती उघडल्या गेली आहेत. सुरुवातीला सरकार व या योजनेवर टीकेचा भडिमार झाला कि खात्यात लोक पैसे ठेवतच नाहीयेत आणि सरकार बळजोरी करतय खाती उघडायला. सुरुवातीला खूप साऱ्या खात्यांमध्ये शून्य धन निवेश झाला, हे खरं. पण हि खाती उघडल्या जाणे हे जितके जनतेच्या फायद्याचे होते तेवढेच सरकारी प्रशासनाच्या फायद्याचे पण होते. खातेदारांनी जरी सुरुवातीला खात्यात पैसे ठेवले नसतील (खात्यात ठेवण्या पुरते पैसे नसतील किंव्हा अजून या नवीन प्रकारावर खातेदारांचा विश्वास नसेल) पण आता सरकार ला प्रशासनासाठी एक ठोस मार्ग तर उपलब्ध झाला. अजून एक म्हणजे, अश्या योजना रोपट्या सारख्या असतात. वृक्ष व्हायला, फुलायला, फळायला अनेक वर्षे लागतात. आजच्या घडीला फक्त 8.2% खात्यात शून्य धन निवेश आहे तसेच प्रत्येक जन धन खात्यात सरासरी तीन हजार रुपये आहेत. आणि या नवीन उघडलेल्या खात्यात एकूण एक लाख ऐंशी हजार करोड वर पैसे जमा झाले आहेत. 47 करोड खात्यानं पैकी जवळ जवळ 24 करोड खाती महिलांची आहेत. आणि एवढेच नव्हे तर जवळ जवळ 32 करोड खाती हि लहान शहरे आणि गावे यातील जनतेची आहेत. थोडक्यात, आज हि योजना समाजाच्या प्रत्येक थरात पोचलेली आहे.

निव्वळ बँक खाते नव्हे तर एक ओळख:

राजकारण किंव्हा कोणाचे सरकार हा भागाकडे तात्पुरते दुर्लक्ष करून, या योजने कडे त्रयस्थ दृष्टीने बघितले तर भारतीय अर्थ व्यवस्था आणि भारतीयांची आर्थिक परिस्थितीस पोषक ठरणार हा एक महत्वाचा टप्पा आहे. या भक्कम पायावर भविष्यातील कितीतरी योजना सुलभतेने बांधता येतील आणि झपाट्याने प्रगत होणाऱ्या तंत्रज्ञामुळे, आर्थिक समावेशतेचे फायदे प्रत्येक नागरिका पर्यंत पोचविता येतील. डिजिटल बँकिंग आणि रूपे कार्ड योजना हे या क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याचे द्योतक आहेत. 

बँक खाते हि केवळ एक सुविधाच नव्हे तर गरीब, प्रामाणिक आणि मेहनती भारतीयांची ती एक ओळख आहे. आत्मविश्वास वाढविणारे हे खाते म्हणजे खातेदार हा समाजाचा आणि अर्थ व्यवस्थेचा एक आवश्यक भाग असल्याची पावती आहे. सन २०१४ साली नव्याने आणलेल्या जन धन योजनेला यशस्वी पणे राबविल्या बद्दल सरकारी व बँक अधिकारी, सरकार आणि मुख्य म्हणजे, नवीन खातेदारांचे आपण अभिनंदन केले पाहिजे. 

5/1/23

निवडणुकीच्या वाऱ्यावरची पाने

देशात परत निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्रात राज्य सरकार, या दोन्ही साठी निवडणुका पुढल्या वर्ष भरात होतील. देशात दोन तऱ्हेची राज्य आहेत, निवडणुकांच्या राजकारणाच्या दृष्टीकोनातून. एक, जिथे मोदींचा प्रभाव आणि भाजप चे पायबळ मजबूत आहे. जसे महाराष्ट्र, कर्नाटक आणि बहुतांश उत्तर भारत. तर दुसरीकडे तमिळनाडू आणि केरळ सारखी काही राज्य आहेत जिथे मोदींचा प्रभाव आहे पण तो प्रभाव भाजप साठी मतांमध्ये परिवर्तित होत नाहीं. मोदींचा भारतीय प्रशासन व्यवस्थेवरचा प्रभाव सर्वांना स्पष्ट दिसतोच पण त्यांचा भारतीय राजकारण, राजकारणातील खेळाडू, आणि भाजप व्यतिरिक्त राजकीय पक्षांवरचा प्रभाव अजून जनतेचा आकलनी  पडलेला नाहीं. हा प्रभाव अजून राजकारण्यांना पण फारसा झेपलेला दिसत नाहीया. याचे कारण मोदींनी खेळाचे नियमच बदलवले आहेत. त्यातल्या काही बदललेल्या नियमांचा आणि परिस्थितीचा आढावा आपण थोडक्यात घेऊया. 

१) जात, जाती आणि जातीवाद : भारतीय समाजावर अजूनही जातींचा पगडा घट्ट आहे. आणि जातींचा हा पगडा फक्त हिंदू धर्माशी संबंधित नाही तर मुसलमान आणि ख्रिश्चन या धर्मातहि जातींचा सुळसुळाट आहे. जातीवादी निर्मूलनाच्या चादरीआड प्रत्येक संघटनेने, राजकीय पक्षाने आणि खुद्ध राज्य व केंद्र सरकारने गेल्या ७५ वर्षात जातीवाद आणि जातिसंस्था अजून बळकट केली आहे. सहाजिकच आहे कि जातींवरून राजकारण आणि जातीवाद करून निवडणूक जिंकणे हेच जणू यशाचे केंद्रबिंदू झालेत. भाजप भारतातील एकच हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदू जनमानसा प्रति कटिबद्ध राजकीय पक्ष आहे. आणि हिंदुत्व म्हटले म्हणजे जातीवाद निशिब्ध! अश्या विचित्र परिस्थितीत भाजप चा राजकीय विकास कुंठित झाला. मोदी आणि २०१३ नंतरच्या भाजपने जातिप्रणीत राजकारणात नवीन अध्याय उघडला. जातीवादी राजकारण, त्याला हिंदुत्वाचा अभिमान आणि सोबत विकासाची साथ. पण जातीवादी राजकारण म्हणजे काय? ज्या ज्या भौगोलीक क्षेत्रात एका विशिष्ठ जातीचा प्रभाव जास्ती आहे तिथे भाजप ने इतर जातीच्या घटकांना एकत्रित करून एक फळी उभारली. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातील निवडणुकांचे निर्णय. स्वतःला यादव समाजाचे कैवारी म्हणवणारी समाजवादी पार्टी, खऱ्यात गेली तीन दशके मुसलमानांचे लांगूल लाचन करीत आली आहे. उत्तर प्रदेशात यादव समाज मोठ्या संख्येने आहे. अश्या परिस्थितीत भाजप ने विकास आणि हिंदुत्वावर यादव मतदार आपल्या कडे वळवलाच पण जातव सारख्या जाती समाजाला एकत्रित आणून नवीन फळी उभी केली. भारतात राज्य केंद्रित आणि राज्य सीमित राजकीय पक्षांच्या जमलेल्या मतदार संघाला अश्या प्रकारे भाजप ने तडा दिला आणि स्वतःचा स्वतंत्र मतदार संघ बनविला. भारतात अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखलेल्या एकूण १३१ जागांपैकी सन २०१९ च्या निवडणुकीत भाजप ने ७७ जागा जिंकल्यात. 

२) विकास, विकास आणि विकास: भारतात नेहरूंच्या काळापासून विकास बद्दल बाता होत आहेत पण विकास फारसा भारतात भटकला नाही. नाही म्हटलं तरी नेहरूंनी थोडे-बहुत मोठे कारखाने सरकारी खर्चाने टाकलेत आणि उच्च शिक्षणाची महाविद्यालय उघडलित. पण हे कारखाने उत्पादन ऐवजी खर्चांचे खंदक बनलेत आणि महाविद्यालय अमेरिकेत जाण्याची कारखाने झालेत. पुढल्या काळात तर विकास म्हणजे तरी नेमके काय याच्या चर्चेत दशके जाऊन केंद्र सरकार म्हणजे फुकटात गोष्टी वाटणारे निव्वळ एक साधन बनले. रस्ते, वीज, पाणी, दळण-वळणाच्या आधुनिक सुविधा, तरुणांच्या विकासासाठी संधी, आणि मुख्य म्हणजे जनतेच्या आकांशां साठी धडपड करणारे पहिले सरकार म्हणजे वाजपाई सरकार होते. पण तो काळ युती सरकारचा होता त्यामुळे सरकारचे पाय ओल्या मातीचे होते. प्रत्येक राजकीय कंपनांना सरकार डळमळत होते. वाजपेयी सरकार ला त्यामुळे काही आवश्यक निर्णय घेता नाहीं आले आणि काही घेतलेले निर्णय वापस घ्यावे लागलेत. त्या नंतर आले बिना पायाचे आणि बिना कण्याचे मनमोहन सिंह सरकार. डांबराच्या ऐवजी, या सरकार ने पैसे खाण्याचे मार्ग बनविण्यात माहिरकी मिळवली. या दहा वर्षात प्रगती झाली नाही अशी नाही पण भारतीय अर्थ संस्था आणि भारतीय नागरिकांच्या मूलभूत विकासा साठी आवश्यक काहीच पाऊले उचलल्या गेली नाहीत. आता मूलभूत विकास म्हणजे काय? कॉम्युनिस्ट 'विचारवंतांना', जे गेले कित्येक दशके प्लांनिंग कमिशन मध्ये बसून टाइम पास करीत आले आहेत, त्यांना विचारले तर सरकारने सगळ्यांना रोजगार द्यावा, खायला द्यावे, फुकटात वीज, पाणी आणि इत्यादी गोष्टी द्याव्यात इत्यादी विचारांचा खणखणाट सुरु करतील.  अर्थात, रोजगार हवाच, खायला सगळ्यांना मिळायला हवेच पण यासाठी पैसे कोणी द्यायचेत? आणि मग पैसे नाहीत म्हणून अर्धवट काही तरी योजना हाकायच्यात ज्यामुळे देशाचा आर्थिक विकास नीटसा होत नाहीं ज्यामुळे पुन्हा सरकार कडे कमी पैसे येतात आणि उरतात. या दुष्टचक्रात भारताची पहिली सहा दशके वाया गेलीत.

पण जर का रोजगार ना देता, रोजगार उपलब्ध करण्याच्या साधनांकडे सरकारने लक्ष दिले तर? पैसे देणं-घेणं सोयीचे केले तर? दळण -वळण सोपे केले तर? घरी गॅस आला तर? घरोघरी पाणी आले तर? आणि सरकारने घर बांधण्या ऐवजी, सरकारने नुसते पैसे दिले आणि लोकांना जे हवं ते करू दिल तर? इथे मोदी सरकार खऱ्या अर्थानी क्रांतिकारी निघाले. जन-धन योजने अंतर्गत सरकारने करोडो गरिबांची बँकेत खाती उघडवलीत. या गरिबांना जणू एक नवीन ओळख प्राप्त झाली. घरोघरी गॅस सिलेंडर पोचवली, वीज पोचवली आणि आत्ता प्रत्येक घरात नळ आणि नळाचे पाणी पोचवण्याची धडपड चालू आहे. थोडक्यात, लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यास मदत केली, कुबड्या देण्यात नाही. इतक्या वर्षांनी केंद्र सरकार खऱ्या अर्थाने जनतेचे सरकार झाले. आज भारताच्या आर्थिक प्रगतीचा दर ६ टक्क्याच्या वर आहे पण अजून वर लिहिलेल्या कामाचा मोबदला मिळायचा आहे. अजून दोन-तीन वर्षात भारताची वैयक्तिक उत्पादकता वाढेल आणि त्याच्यामुळे  होणारी आर्थिक प्रगती हि स्थायी आणि शाश्वत असेल. 

३) ठाम हिंदुत्व: मागे म्हणल्या प्रमाणे भाजप हिंदू जनतेचा हित बघणारा आणि हिंदुत्वावर विश्वास ठेवणारा एकाच राजकीय पक्ष आहे.  पण सन १९९६ नंतर भाजप या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका घेऊ शकली  नाही. वाजपेयी सरकार ला विरोधक आणि बातम्यांची माध्यमे हिंदुत्वावर नेहमीच कात्रीत धरीत. आणि वाजपेयी जरी हिंदुत्वनिष्ठ असले तर ते या प्रश्नाला घेऊन नेहमी जणू बॅक-फूट वर खेळतायत असे वाटे. २००९ च्या निवडणुकीं नंतर भाजप ची ओळख अजून धूसर झाली होती. मोदींनी आणि मोदीं सरकारने नवीन धोरण पत्करले. आम्ही कोणाला सांगायला जाणार नाही आणि कोणाची पावती पण घ्यायला जाणार नाही. पण आम्ही हिंदू आहोत आणि हिंदुत्ववादी आहोत याची पदोपदी दर्शविल्या जाते. मंदिर न्यायालयीन हुकूम प्रमाणे बांधणे हि हिंदुत्वाची गर्जना होती. मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांच्या उद्धार हे सरकारी यंत्रणेच्या अंतर्गत नीट करणे इत्यादी कार्ये मोदी सरकार छाती ठोकून करीत आहेत. पण हिंदुत्व म्हणजे केवळ मंदिर बांधणे नव्हे. हि विचारप्रणाली आहे ज्याचे पडसाद देश चालविण्याच्या प्रत्येक अंगावर दिसून येतात. चीन शी छाती ठोकून वागणे. पाकिस्तान ला वेळोवेळी चोपणे. जागतिक स्तरावर भारताचा सतत उदोउदो करणे आणि आपल्या फायद्याच्या गोष्टी करणे.  काही लोकांना असे वाटत असेल कि याचा परिणाम मतांवर कसा पडेल. लगेच दिसणार नाही हे मान्य पण देशातील प्रत्येक नागरिक आप-आपल्या मतीनुरूप या विषयावर विचार करतो, विचार-विनिमय करतो. त्याचा मतदाराच्या जीवनाचा केंद्रबिंदू चीन शी कसे वागावे हा मुद्दा नसेल. पण या मतदाराला एवढे नक्की कळते कि चीन ला त्याच्या भाषेतच ऐकवायला हवे. थोडक्यात विदेश नीती असो कि राजनीती कि राज्यनीती, मोदी सरकार हे पहिले हिंदुत्ववादि सरकार आहे.

भाजप ने हिंदुत्व पूर्णपणे अंगिकारल्यामुळे पक्षाची ची एक स्वतंत्र ओळख आणि व्यक्तिमत्व लोकांना कळले. याच्या तुलनेत बघता आज राजकीय पटलावर एकही पक्ष किंव्हा नेता नाही ज्यांची स्वतःची ठाम ओळख आहे. सगळे बिना-बुडाचे लोटे आहेत. भाजप आणि मोदी पण राजकारणीच आहे पण राजकारण हे विकासासाठी व्हावे, देश आणि समाज प्रबोधनासाठी व्हावे, समाजातील सर्व घटकांना एकत्रित करून पुढे नेण्यासाठी हवे. सध्याच्या परिस्थतीत मात्र कुटुंब केंद्रित राजकीय पक्ष नुसते सत्तापिपासू आणि सत्तान्धळे आहेत. अश्या परिस्थितीत मोदी प्रणित राजकारण आशेचे किरण आहेत. 

या वरच्या सगळ्या मुद्द्यांमध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा जो मी मांडला नाही तो म्हणजे निवडणूक लढवण्याची कला, तत्परता आणि तडफ. कुठलीही निवडणूक लहान नाही किंव्हा मोठी नाहीं, राजकीय पक्षाचे काम प्रत्येक निवडणूक लढवण्याची नेहमी तयारी ठेवणे आहे, आणि प्रत्येक निवडणूक गंभीरतेने लढविणे आहे. राहुल गांधी ची जागा म्हणून 'बाय' देत त्याला सहजतेने जिंकू देणे आता परत होणार नाहीं. प्रत्येक दावेदाराने पूर्ण शक्तीनिशी लढावे आणि प्रत्येक आमदार किंव्हा खासदाराने काम करून लोकांसमोर पुन्हा मत मागायला जावे हि जी अगदी साधारण अपेक्षा लोकतंत्रात असावी, ती आता पूर्ण होते. पण या मुद्द्यावर एक वेगळा लेख लिहिणे आवश्यक आहे. याचा विचार करायला स्वतंत्र जागा हवी. 

इतक्यात कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणूक आहेत. पुन्हा त्रिशंकू सरकार येण्याची शक्यता अधिक आहे. त्या राज्य तिन्ही पक्ष भ्रष्ट आहेत असे म्हणू शकतो. मोदींच्या नावाने थोडा फायदा अवश्य होईल पण भाजप ने सध्या घर साफ-सफाई अभियान जे चालवलं आहे, ते स्पृहणीय आहे. त्याचा फायदा एखादवेळेस लगेच होणार नाही पण हि पाऊल दूरदृष्टीने उचलली आहेत. त्यामुळे शक्य आहे कि भाजप पुढल्या दशकात कर्नाटकात प्रबलतेने उभारू शकतो. 

4/4/23

नायपॉल - एक प्रवास

श्री विदयाधर सीप्रसाद नायपॉल यांचा मृत्यु ऑगस्ट ११, २०१८ ला लंडन येथे झाला. त्रिनिनाद आणि टोबागो येथील मूळ निवासी श्री नायपॉल हे १८व्या वर्षी इंग्लंड ला दाखल झालेत. तेंव्हा पासून ते ब्रिटिश नागरिक होते. इंग्रजी भाषेतील गेल्या शंभर वर्षातील सर्वश्रेष्ठ लेखक मानलेल्या श्री नायपॉल यांना सन २००१ ला साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक दिल्या गेले होते. त्यांनी त्यांच्या हयातीत ३० हुन अधिक पुस्तके लिहिलीत. यात कादंबऱ्या, प्रवासवर्णने आणि बरेच निबंध लेखन ही होते. मिस्टिक मसूर ही त्यांची पहिली कांदबरी सॅन १९५६ ला प्रकाशित झाली तर मॅजिक सीड्स ही त्यांची शेवटली कादंबरी सन २००७ ला प्रसिद्ध झाली. तब्बल  पन्नास वर्षाच्या कालावधीत त्यांनी विविध विषय हाताळलेत. त्यांच्या लेखनाचा सूर अत्यंत वैयक्तिक होता पण त्याची पात्रे मात्र जगाच्या विविध टोकाला वावरत. वेस्ट इंडीज, आफ्रिका, भारत आणि इंग्लड येथे बेतलेली त्यांची पात्रे, त्यांनी त्याच्या प्रवास वर्णनात रेखाटलेल्या विविध प्रांत, देश, समाज आणि संस्कृतीचे प्रतिनिधी होते.

नायपॉल हे वादग्रस्त व्यक्तिमत्व होते ही अतिशयोक्ती ठरणार नाही. मुख्यतः त्यांनी लिहिलेली प्रवासवर्णने प्रकाशित झाल्याच्या क्षणापासून वादाच्या भोवऱ्यात फसली होती. पण त्यांची प्रवास वर्णने ही केवळ वर्णने नसून त्यांच्या विचारांचा प्रवास म्हणून वाचायला हवीत. त्यांची लेखन शैली, वाक्यप्रचार करण्याची एक विशिष्ट पद्धती (त्यांची एक-एक वाक्य एका परिच्छेदा एवढी लांब असत), आणि शुष्क दृष्टीकोनातून जगाकडे बघण्याचा कल खासकरून दुसऱ्या जागतिक युद्धानंतर उभे राहू बघण्याऱ्या जगाला पारखण्याचा दृष्टिकोन वाचकास विचार करण्यास प्रवृत्त करतो. मला वाटतं सगळी लोक स्वतः चा विचार करायला तयार नसतात. स्वतंत्र्यपणे  विचार करणे हे कठीण कार्य आहेच पण स्वविचार ही मुळत:च अस्वस्थ करणारी प्रक्रिया आहे. नायपॉल नेमके समाजाच्या याच मर्मावर बोट ठेवतात.

माझी नायपॉल याची ओळख प्रामुख्याने त्यांनी लिहिलेल्या प्रवास वर्णने वाचून झाली. त्यांच्या लेखनाची सवय करावी लागते. ओघवती भाषा किव्हा मोठे शब्द हीच भाषेची कसोटी नसते हे त्यांच्या लेखनाची सवय झाल्यावर लक्षात येत. त्यांची विचार करण्याची एक विशिष्ट असममित, अ - कालक्रमीत पद्धती होती,  आणि त्याच पद्धतीने त्याचे शब्द लिहिल्या गेलेत. ते एका वाक्यात १८९८ च्या गांधींबद्दल बोलायाला सुरुवात करून, मध्ये १९४८ च्या गांधी बद्दल बोलून, शेवट १९१५ ला गांधी परत दक्षिण अफ्रीकेला का परतलेत हे सांगतात. येथे गांधींच चरित्र सांगायचं हेतू नसतो तर गांधी या व्यक्तीमत्वाचे पैलू हे कसे विविध काळी जाणवतात (चमकतात?) आणि त्यामुळे गांधी ही व्यक्ती कशी समजू शकते हे नायपॉल दर्शवितात.  वाचकाला वाचायला, कळायला सोपं जाईल असे लिहावे वगैरेच्या भानगडीत ते कधीच पडले नाहीत. वाचकाला त्याच्या विचारांची झेप आणि प्रगल्भता जणू एक आव्हान होते. पण एकदा का वाचाकास त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन कळला की इतिहास आणि भविष्य जणू नावीन्याने अवतरते. त्यांची प्रवास वर्णने जगाच्या विविध भागात, विविध विषयांना धरून लिहिलेली असून, दुसऱ्या महायुद्धाच्या उत्तरार्धातील चाळीस वर्षांचा कालखंडावर दृष्टीक्षेप टाकतात. या सगळ्या प्रवासात आणि विचारातील धागा शोधायचा तर दुसऱ्या महायुद्धानंतर साम्राज्यवादाचा, प्रामुख्याने इंग्रजी साम्राज्याचा झपाट्याने झालेल्या ऱ्हासा नंतर उदयास आलेल्या देशांचे, समाजांचे परिक्षण होय. इंग्रजी साम्राज्य सन १९२० च्या दशकात यशाच्या शिखरावर होते. (इंगलंडच्या राणीच्या साम्रज्यावर कधी सूर्यास्त होत नसे!) पण केवळ तीस वर्षातच हे साम्राज्य उन्मळुन पडले. भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, मलेशिया इत्यादी जी राष्ट्रे या मंथनातून उदयास आलीत, ते समाज जणू या बदलाला सामोरं जाण्यास सज्ज नव्हती. पण गंमत म्हणजे, हा अचानक घडलेला बदल आकलनाच्या बाहेर आहे आणि झपाट्याने बदललेल्या जगात स्वातंत्र्य मिळणे म्हणजे नेमके काय याची कल्पना आपल्याला नाही हे सुद्धा मानायला हे देश, आणि देशांचे राज्यकर्ते तयार नव्हते. यातुन निष्पन्न काय झाले? तर इंग्रजी सत्तेची व राज्यकर्त्यांची केविलवाणी नक्कल. आपल्या प्रवासवर्णनांमध्ये नायपॉल या कुंठित समाजाची परिस्थिती दर्शवितात. त्यांची वाक्ये चाबकाच्या फटक्यां सारखी भासतात. कुठल्याही राष्ट्राबद्दल टीकेचे आसूड ओढणे म्हणजे विवादांना आमंत्रण देणे हे सांगायला नकोच. पण त्यांचे विचार बोचणारे असलेत तरी नाकारण्या साऱखे नव्हते. स्वतः च्या घरात बसून त्यांनी मतांच्या पिंका टाकल्या नव्हत्या.  उदाहरणार्थ, भारतावर  त्यांनी तीन पुस्तके लिहिलीत. आणि त्यासाठी ते अख्खा भारत हिंडलेत. सामाजिक, राजकीय आणि या सीमारेषेवर वावरणाऱ्या त्या त्या दशकातील दिग्गज लोकांना ते भेटलेत, मुलाखती घेतल्यात. ते नामदेव ढसाळ यांना भेटलेत, शिवसेनेच्या उदया बद्दल लिहिले, दक्षिणेत द्राविडी चळवळी बद्दल लिहिले, ६० च्या दशकात चारू मुजुमदारांना भेटलेला, नक्षलवादी चळवळीचा आढावा घेतला, सन १९७५ ला विनोबा भावे यांच्या आश्रमात राहिलेत. दिल्लीत नामांकित राजदूतां सोबत गप्पा मारल्यात तर ७० आणि ८० च्या दशकातील प्रख्यात मानसशास्त्रज्ञांशी  वाद-विवाद केलेत. त्यांनी लिहिलेलं पटो वा न पटो पण वायफळ म्हणून वाचक त्यांच्या विचारांना बाजूला सारू शकत नाही.

भारत आणि हिंदू धर्म हा त्यांच्या व्यक्तित्वाचा, व्यक्तिमत्वाचा, विचारांचा आणि लेखनाचा अभिन्न भाग होता. नायपॉल यांचे आजोबा हे भारतातून (बिहार राज्य), १९व्या शतकाच्या उत्तरार्धात त्रिनिनाद या वेस्ट इंडिज मध्ये दाखल झालेत. त्या काळात इंग्रजी सत्ता साखरेचा फार मोठ्या प्रमाणावर व्यापार करीत. इंग्रजांनी फार पूर्वीच सांप्रत वेस्ट इंडीज ही बेटे बळकावली होती. तिथे इंग्रजांनी उसाची लागवड  सुरु केली. पण त्यांना शेतांवर कामगार मिळेना. आणि इंग्रजी संसद ने सन १८३२ ला गुलामगिरीची पध्द्तही अवैध केली होती. यावर उपाय म्हणून इंग्रजी व्यापारांनी इंग्रजी अधिपत्या खाली असलेला देशामधून कामगार वेस्ट इंडीज मध्ये आणायला सुरु केले. कामगारांसोबत करार सोपा होता. पाच वर्षे शेतांवर मजुरी करायची, त्याचा भत्ता मिळेल. आणि पाच वर्षा अंती मायदेशी जायचे तिकीट मिळेल किंव्हा जमिनीचा एक तुकडा इंडीज मध्ये मिळेल, स्थायिक व्हायला. बिहार आणि उत्तर प्रदेशातील मोठ्या प्रमाणावर लोक अश्या तऱ्हेनी वेस्ट इंडीज मध्ये दाखल झालीत, आणि स्थायिक झालीत. नायपॉल त्यांच्या या स्थलांतराला ऐतिहासिक महत्व देतात. कारण या स्थलांतरीत लोकांची जणू एक अजब संस्कृती उभी राहिली.  समुद्राच्या लाटांवर भरकटत शहाळ्या सारखी ही लोक, आपली ओळख आणि अस्मिता टिकवायला सतत धडपड करीत. पण हे प्रयत्न म्हणजे वैफल्य आणि हास्यास्पद या सीमेवरचा तळ्यात-मळ्यातला खेळ होऊन बसला. अश्या पार्श्वभूमीवर नायपॉल यांचा जन्म सन १९३२ ला झाला. लहानपणा पासून हिंदू धर्मात वाढविलेल्या नायपॉलांवर भारतापासून हजारो मैल दूर असूनही भारताची सदैव सावली होती. त्यांच्या कुटुबांची भारताची नाळ तब्बल शंभर वर्षांपूर्वी तुटली असली तरी ते वेस्ट इंडीज मध्ये आणि पुढे इंग्लंड मध्ये नेहमी भारतीय म्हणूनच ओळखल्या जात. ना जन्मस्थळाचा, ना कर्मस्थळाचा आणि ना ही पितरांच्या भूमीचा, असल्या त्रिशंकू परिस्थितीच त्यांनी आपल्या लेखन प्रवासाचा आरंभ केला. 'हाऊस ऑफ मिस्टर बिस्वास' ही त्यांची पहिली कादंबरी अतिशय प्रसिद्ध झाली. त्यांच्या वडिलांच्या आयुष्यावर थोडी बहुत बेतलेलया या कादंबरीचा नायक - मोहन बिस्वास हा त्रीनिनाद येथील एक भारतीय मुळाचा हिंदू. कादंबरी मोहनच्या स्वतःचे घर बांधण्याच्या ध्यासाची गोष्ट. भारतापासून दूर असूनही रूढी -परंपरेच्या जाळ्यात गुरफटलेल्या समाजाचे चित्रण आणि स्वत्वाची ओळख म्हणून घराचा ध्यास घेतलेल्या मोहनची गाथा हि एक सुरेख कथा आहे. कथा सुरेख आहे, सुरस नव्हे. नायपॉल यांची पात्रे कधी सुरस आयुष्य जगात नाहीत. कथेचा अंत सुखी किंव्हा दुखी असावा असा नायपॉल यांचा आग्रह नसतो. त्यांचे लेखन कल्पित पात्रांच्या प्रवासाचा लेखा-जोखा असतो. मग तो मोहन बिस्वास असो कि 'काँगो' या अजून एक प्रसिद्ध कादंबरीचा नायक असो. प्रवास म्हणलं की गोष्ट केवळ पात्रां पुरतीच असू शकत नाही. पात्रांच्या आशा- अभिलाषा व्यतिरिक्त पात्रांची काळ-वेळ, समाजस्थिती, समाज बंधने, इतिहासाची ओझी हे सगळंच महत्वाचे ठरतात. नायपॉल जणू चित्र रेखाटतात. त्यांच्या या निरीक्षण शक्ती आणि लेखनाच्या खुबीमुळे त्यांच्या कादंबऱ्या आणि ललीत अतिशय प्रसिद्ध झाले. त्यांचे मिगुल स्ट्रीट, मिस्टिक मसूर, द एनिग्मा ऑफ आरएव्हल , गुरिल्ला या कादंबऱ्या इंग्रजी भाषेतील श्रेष्ठ लेखना मध्ये गणल्या जातात. त्यांच्या इन फ्री स्टेट या कादंबरीला इंग्लंडच्या इंग्रजी सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या मॅन -बुकर पारितोषिकाने सन्मानित केल्या गेले.

मागे आपण त्यांच्या प्रवासवर्णनांचा थोडक्यात आढावा घेतला. नायपॉल यांनी त्रिनिनाद-टोबॅगो, अर्जेटिना, संयुक्त राज्य अमेरिका, व्हेनेज्युएला, काँगो, इराण, पाकिस्तान, भारत, मलेशिया, इंडोनेशिया या देशांच्या वर्तमान आणि इतिहासाचा आढावा घेत, भविष्याचा वेध घेतला. ही प्रवासवर्णने या देशांच्या समाजाचे निरीक्षण आणि अवलोकन होते. ही सगळी राष्ट्रे  साम्राज्यवादाची फळे आहेत. या सगळ्या राष्ट्रांच्या सीमा आणि इतिहास विस्कळीत आहेत. देशाचे व्यक्तिमत्व, स्व-ओळख याची संपूर्ण कल्पना या देशामध्ये अजूनही रुजलेली नाही. आणि ही सगळी राष्ट्र अजूनही इतिहासाच्या ओझ्या खाली दबलेली आहेत. दक्षिण अमेरिकेत मूळ निवासी यांचा सर्वनाश करून उभे राहिलेला समाज (स्पॅनिश व पोर्तुगाली) आणि राष्ट्रांनी आपल्या रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती करणे जणू सोडलेच नाही. अमेरिका (U.S.A) हा गुलामांच्या पाठी तोडून आणि घोंगडं शिवाव तस  जमिनी विकत घेऊन उभा केलेला हा देश, अजूनही  गुलामीगिरीच्या साखळ्यांच्या खणखणात सैरभैर होतो. इराण, पाकिस्तान, मलेशिया आणि इंडोनेशिया हे देश मूळ मुसलमान नाहीत. धर्मान्तरीत हे राष्ट्रे आज जगातील सगळ्यात मोठी मुसलमान राष्ट्रे आहेत. मूळ अरबी मुसलमानां पेक्षा गैर-अरब मुसलमानांची संख्या अधिक आहेत आणि नायपॉल यांच्या मते स्वतःला सर्वाधिक  शुद्ध (पाक) मुसलमान म्हणून सिद्ध करण्याच्या सतत धडपडीत असतात. हा प्रयत्न स्फोटक आणि गैर-मुसलमान जगाला घातक ठरेल हे त्यांचा १९९० च्या दशकातील भाष्य अत्यंत विवादास्पद ठरले.

नायपॉल पहिल्यांदा सन १९६० च्या दशकात भारतात आलेत. त्यांच्या अनुभवांवर आणि प्रवासावर त्यांनी An Area of Darkness हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक त्यांच्या भारतावर लिहिलेलया त्रयी पुस्तकां मधील पहिले पुस्तक. पुस्तकाचे नाव च बहुधा लोकांना पचण्यासारखे नव्हते कारण भारत सरकार ने या पुस्तकावर लगबगीने बंदी आणली. अर्थात बंदीमुळे हे पुस्तक वाचल्या गेले नाही अस नाही.  नायपॉल या पुस्तकात पुर्वग्रहदूषित म्हणून समोर येतात.

“It is well that Indians are unable to look at their country directly, for the distress they would see would drive them mad. And it is well that they have no sense of history, for how then would they be able to continue to squat amid their ruins, and which Indian would be able to read the history of his country for the last thousand years without anger and pain? It is better to retreat into fantasy and fatalism, to trust to the stars in which the fortunes of all are written”

बऱ्याचश्या वाचकांच्या मते केवळ मूळ भारतीय आहे म्हणून भारताबद्दल असा काही लिहिण्याचा अधिकार  नायपॉलांना कसा? पण मुद्दा अधिकाराचा नाही. त्यांच्या दृष्टीत अतिशयोक्ती आहे हे खर पण हे विचार भारताबद्दलच्या असलेल्या आत्यांतिक प्रेमातून लिहिल्या गेले आहेत. जीव कासावीस होऊन लिहिल्या गेले आहेत. जवळपास शंभर-दीडशे वर्षांपूर्वी जे भारताईचे वेस्ट इंडीज मध्ये स्थलांतरीत झालेत, त्या लोकांनी तिथे एक नवीन समाज निर्माण करण्या ऐवजी जुना भारतच जगाच्या दुसर्या टोकाला बसविण्याच्या प्रयत्न केला. अगदी जाती-व्यवस्था सुद्धा जणू जहाजातून जतन करून, वेस्ट इंडिज मध्ये पुनः जणू रुजवली. भारताशी नाळ तुटू नये म्हणून लहानपणा पासून पोरांना भारतीय संस्कार केल्या जात. यात वावगं काहीच नाही. (जाती व्यवस्था सोडून!) पण जो व्यक्ती परदेशी स्थलांतर करतो तो स्व देशाचे एक चित्र मनात कोरून बाहेर बडतो. ते चित्र जुनं होत जाते, अधिक रम्य होत जाते पण सहाजिकच मुळीच बदलत नाही. शेवटी स्वदेश स्मृती पटला तून नाहीसा होतो आणि रहाते फक्त एक कल्पना.  नायपॉल भारताबद्दलच्या आणि हिंदू धर्मा बद्दलच्या रम्य कल्पनेत वाढलेत. हा भारत त्यांची जणू वडिलोपार्जित संपत्ती होती, त्यांचा वारसा-हक्क होता. पण जेंव्हा भारत - एक कल्पना आणि सत्य परिस्थितीतील भारत, खास करून १९६० च्या दशकातला भारत, याचा सामना झाला तेंव्हा नायपॉल यांच्या मनात जे भीषण वादळ आले असणार त्याचे पडसाद An Area of Darkness मध्ये उमटतात. त्यांचे भारताबद्दलचे विचार असह्य वाटतात पण ते विचार लागु होतात की नाही हे पडताळण्या पेक्षा, त्यांच्या भारताबद्दलच्या विचारांचा प्रवास म्हणून वाचायला हवेत. कारण त्यांनी हा प्रवास एक पुस्तक लिहून संपविला नाही. त्यांनी सन १९७६ ला India: A Wounded Civilization हे पुस्तक लिहिले.

"“India is old, and India continues. But all the disciplines and skills that India now seeks to exercise are borrowed. Even the ideas Indians have of the achievements of their civilization are essentially the ideas given them by European scholars in the nineteenth century. India by itself could not have rediscovered or assessed its past. Its past was too much with it, was still being lived out in the ritual, the laws, the magic – the complex instinctive life that muffles response and buries even the idea of inquiry.” - India: A Wounded Civilization

आपादकाल लागु झालेल्या भारत बद्दल त्यांचे विचार पहिल्या पुस्तका एवढे तीक्ष्ण नव्हते. त्यांची द्र्ष्टी थोडी मवाळली होती. भारतीय  समाज गर्तातून बाहेर पडायला जी धडपड करीत होता त्याची जाणीव त्यांना झाली होती. पण भारता बद्दल, भारताच्या इतिहासा बद्द्दलची त्यांची तळमळ कायम होती. त्यांचे भारत बद्दलच्या त्रयी मधी शेवटले India: A Million Mutinies Now हे पुस्तक. पुस्तकाचे शीर्षक मला फार आवडले. १९८० च्या दशकात लिहिलेलं हे पुस्तकात नवीन, तरुण भारताचा, जुन्या भारता विरुद्धचा 'ऊठाव' नायपॉल टिपतात.

“Independence was worked for by people more or less at the top; the freedom it brought has worked its way down. People everywhere have ideas now of who they are and what they owe themselves. The process quickened with the economic development that came after independence; what was hidden in 1962, or not easy to see, what perhaps was only in a state of becoming, has become clearer. The liberation of spirit that has come to India could not come as release alone. In India, with its layer below layer of distress and cruelty, it had to come as disturbance. It had to come as rage and revolt. India was now a country of a million little mutinies. - India: A Million Mutinies Now

खर सांगायचं तर १९८० च दशक हे भारता साठी फार वाईट होत. समाजवादाच्या विषवृक्षाची मुळे जणू अख्ख्या देश पादाक्रांत करीत होती. सरकार कडे  पैसा नाही, जनते कडे नोकऱ्या नाहीत, बंद पडणारे उद्योग आणि कारखाने आणि काँग्रेसी राज्यकर्त्यांना सत्तेचा आलेला किळसवाणा हुरूप यात देश फार विचित्र फसला होता. जागतिक स्तरावर चीनचा प्रभाव जाणायवाला लागला असतांना, भारत मात्र पुनः इतिहासात गुरफटतो की काय अशी शंका येऊ लागली होती. पण या सगळ्या धुमश्चक्रीत नवीन भारताची तृणें उभरत होती. भारत सरकार भारत चालवीत नाही, भारतीय भारत चालवतात आणि या भारतीयांच्या मेहनतीला, औद्योगिकतेला तोड नाही हे नायपॉल यांनी बरोब्बर ताडले. १९९० नंतरची भारताची प्रगती स्पृहणीय आहे आणि हे पुस्तक त्याचे द्योतक होते. त्यांच्या कल्पनेतील भारत त्यांना जणू क्षितिजावर पुनः दिसू लागला.

कल्पित आणि कल्पिताचा प्रवास नायपॉलांनी  विनासायस पणे जन्मभर केला. उत्तर भारतात जन्म झालेल्या अर्भकाची नाळ मूळ गावात पुरतात. ते अर्भक पुढे कुठेही जातो पण त्याच मूळ कधीच बदलणार नाही ही  त्या मागची कल्पना आणि ते अर्भक पुन्हा मूळ गावी परतेल हे इच्छा. नायपॉल  कादंबऱयांमध्ये निःशब्द, स्थलांतरीत, नाळ तुटल्या पात्रांना बोलक केल तर प्रवासवर्णनात जणू स्वतः ची नाळ पुरायाला जन्मभर जागा शोधत फिरलेत. अनुभवांनी त्यांच्या शब्दांना धार आली तर स्वतः ला शोधण्याच्या कष्टप्रद प्रयत्नांनी त्यांच्या शब्दांना जडत्व प्राप्त झाले. वडिलांनी ठेवलेल्या विद्याप्रसाद नावाचे सार्थक करीत या सरस्वतीपुत्राने इहलोकाचा प्रवास ११ ऑगस्ट, २०१८ ला संपविला.

नायपॉल यांना इंग्रजी भाषेत उपलब्ध सगळी पारितोषिके मिळालीत, इंग्लंड च्या राणी कडून 'सर' ही पदवी प्राप्त झाली पण हे सगळे मान-सन्मान केवळ नोंदी पुरते. त्यांनी शब्दांकित केलेले जग त्यांनी आपल्याला दिलेला खरा वारसा आणि त्यांचे शब्द पुढे नवीन वाचकांच्या द्वारे त्यांच्या विचारांचा प्रवास अखंड चालू ठेवतील हे त्यांचे खरे यश.