रुद्र शक्ति
वीणा-वादिनी वाग्देवीच्या चरणी। घालितो शब्दांचे लोटांगण॥ घेऊन पदरी शारदेने। करावे त्यांसी पावन॥
2/3/25
थोरले बाजीराव आणि 'मल्हारी'
1/13/25
श्रीकृष्ण विराट रूप दर्शन
श्रीकृष्णाचा विराटरुपाचे महाभारताच्या उद्योग पर्वात वर्णन केले आहे. उद्योग पर्वात अनेक उप-पर्व आहेत. त्यात भागवतयान पर्वात श्रीकृष्ण विराटरूप दर्शवितो. श्रीकृष्ण शिष्टचारासाठी कुरुसभेत पांडवांचा प्रतिनिधी म्हणून जातो. हा शिष्टाचार, ज्याला आपण इंग्रजीत 'डिप्लोमसी' असे म्हणतो, म्हटले तर सरळ होता आणि म्हटले तर क्लिष्ट होता. कृष्णाने या विषयावर पांडवांसोबत बरीच चर्चा केली. कृष्णाने प्रत्येक पांडवाचे मत घेतले, द्रौपदीचे मत घेतले, त्यांच्या गटातील थोर-मोठ्यांचे मत घेतले. हे सर्व संवाद उद्योग पर्वात टिपलेले आहेत. युधिष्टिराचे विचार किंव्हा अर्जुनाचे विचार विस्तृत प्रस्तुत केले आहेत. भीमाला भीमसेन असे संबोधिले आहे आणि त्यानेसुद्धा आपले मत प्रदर्शन विस्तृतपणे केले आहे. पुढे नकुल आणि सहदेव पण बोलले आहेत. अर्थात, कृष्णाचा कल शांतिप्रस्तावाकडेच होता. आणि विचार-विनिमयाद्वारे त्याने सगळ्यांना शांतिप्रस्तावाकडेच वळविले.
कुशस्ठलं वृकस्ठलमासम्दी वारणावतं ।
अवसानं च गोविंद किं चिदेवात्र पंचमं ॥
शेवटी युधिष्ठिर कृष्णाला म्हणाला कि गोविंदा, कुशस्थलम, वृकस्थलम, मसंडी, वारणव्रतम आणि अजून एखादे मिळून पाच गावे मिळालित तरी आम्ही ती आनंदाने घेऊ. हाच प्रस्ताव पुढे कृष्ण हस्तिनापूर सभेत धृतराष्ट्रा समोर ठेवतो.
कृष्ण नीती शब्द बऱ्याचदा वापरल्या जातो. कृष्ण फार हुशार होता, दूरदृष्टा होता हे जेवढे खरे तेवढेच हे पण खरे कि त्याने एकट्याने व एकट्यासाठी कधीच कुठले पाऊल उचलले नाहीं. नेहमी सगळ्यांसाठी आणि सगळ्यांसोबत तो राहिला आणि सगळ्यांना घेऊन पावले उचलली.
कृते मंत्रप्रयोगें, त्रेतायाम तंत्रसाधने,
द्वापरे व्यूहरचने शक्ती, संघे कलौ युगे।
वरील श्लोकाचा अर्थ असा कि कृत युगात मंत्रांना शक्ती होती, त्रेता युगात तंत्रांना शक्ती होती, द्वापार युगात (म्हणजे महाभारत युगात) व्यूह रचनेला शक्ती होती तर कली युगात संघटनेला, एकीला, समुदायाला शक्ती असेल. (हा श्लोक महाभारतातील नाहीं) थोडक्यात असे म्हणायला हरकत नाहीं कि जरी कृष्ण व्यूह रचत असला तरी येणाऱ्या कली युगात काय आवश्यक आहे याची गुरुकिल्ली तो आपल्याला देत होता. (युधिष्टिराच्या राज्यारोहणानंतर ३६ वर्षांनी कली युग सुरु झाले)
पांडवांच्या तंबूत विचारविनिमय आटपून शांतिदूत म्हणून श्रीकृष्ण जेंव्हा हस्तिनापुरात दाखल झाला तेंव्हा हस्तिनापुरातील थोर-मोठ्यांमध्ये बरीच धांदल उडाली. त्याचे येणे अपेक्षितच होते पण तरी त्याची दिव्यता, त्याची गूढता, त्याच्यावरची श्रद्धा याचे मिश्रण सामान्य नागरिकांमध्ये असणार तर कृष्णाबद्दलचा आदर, त्याची भीती,आणि त्याच्या द्वेष या सगळ्याचे मिश्रण कुरुसभेत दिसून येते. विदुर आणि भीष्म कृष्णाच्या दिव्यतेत आणि भक्तीत नहात होते तर शकुनी बहुधा भीतीत आणि दुर्योधन द्वेषात.
अग्रतो वासुदेवस्य कर्णदुर्योधनावुभौ ।
वृष्णयः कृतवर्माच आसन्कृष्णस्य पृष्ठतः ॥
अर्थात - वासुदेवाच्या पुढे कारण आणि दुर्योधन चालत होते तर वासुदेवाच्या मागे कृतवर्मा आणि वृष्णी (सात्यकी) चालत होते. पण एकूण हस्तिनापुर नगरीत फार उत्सुकता होते श्री कृष्णाच्या आगमनाने. महर्षी व्यास लिहितात:
अद्भुतं महदाश्चर्यं श्रूयते कुरुनंदन
स्त्रीयो बालाश्च वृद्धाश्च कथयान्ति गृहे गृहे।। (अध्याय ८३, ००३)
कृष्णाच्या हस्तिनापूर सभेतील शांतिप्रस्ताव हा प्रसंग अद्भुत आहे. बी. आर. चोप्रा यांचे सुप्रसिद्ध महाभारत बघितले (८०च्या दशकातील) तर हि घटना एका तासात होते. कारण मुख्य पात्रे या प्रसंगात बोललेली दाखवली आहेत. मूळ महाभारत वाचलेत तर मुख्य पात्रे या प्रसंगी नक्कीच बोलतात पण यात अजून भरपूर गोष्टी घडतात. बरेच लोक बोलतात, वाद होतात. सभेच्या सुरुवातीला धृतराष्ट्र सभा संबोधितो मग विदुर बोलतो. आणि मग दुर्योधन सभेस आणि कृष्णाला संबोधितो. सगळे कृष्णाची स्तुतीच करतात. अगदी दुर्योधनही कृष्णासाठी स्तुतीपर शब्द बोलतो.
स हि पूज्यतमो देव: कृष्ण: कमललोचनं।
त्रयणामपी लोकानां विदितां मम् सर्वथा।। (अध्याय ०८६, ००५)
मग पुढल्या बऱ्याच उप-पर्वात कुरुसभेत भरपूर लोक या प्रस्तावावर मत-प्रदर्शन करितात. सभेत नारद ऋषी, कण्व ऋषी आणि राम नावाचे अजून एक ऋषी आपल्या दृष्टीने शांतीचा संदेश धृतराष्ट्र आणि दुर्योधनास देतात. राम ऋषी एक गोष्ट दुर्योधनास सांगतात ज्याचा सारांश असा कि दुर्योधनाने दंभ सोडून जे धर्म सांगतो ते करावे अन्यथा त्याची परिणीती सर्वनाशात होईल. पुढे गालव ऋषिंचाही संवाद आहे. गालव ऋषी हे विश्वामित्रांचे शिष्य. हे एकदम कुठुन अवतरले मला नेमके उमजले नाहीं. माझा संस्कृत चा अभ्यास एवढा नाहीं. विदुर, भीष्मपितामह, द्रोण आणि गांधारी आणि कुंती पण शांती प्रस्ताव मान्य करायचा आग्रह धरतात. पण दुर्योधनाने ठरवले होते कि तो सुईच्या टोकावर मावेल एवढीही जागा पांडवांना देणार नाहीं.
महाभारतातील प्रत्येक प्रसंग विविधरंगी आहे. त्यात शिकण्यासारखे बरेच आहे. संपूर्ण सभेत एकाच व्यक्तीने युद्धाचा निर्णय घेतला होता त्यामुळे युद्ध होणारच होते हि घटना संघटनेतील जवाबदारीच्या पदावरच्या अधिकाऱ्यांनी आपल्या जवाबदाऱ्या सोडल्यात कि काय होते याचे ज्वलंत उदाहरण आहे. भीष्म, द्रोण, विदुर किंव्हा कृपाचार्यांची निष्ठा राजाला होती, राज्याला नाहीं. आणि धृतराष्ट्राची सुद्धा निष्ठा त्यांच्या पुत्रासाठी होती, राज्यासाठी नाहीं. थोडक्यात राज्यकर्ते राज्यासाठी तत्पर नव्हते त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम राज्याला भोगावे लागणारच होते. श्री कृष्ण हे जाणून असतो आणि केवळ त्यालाच हे दिसत असते असे नाहीं हे सभेत झालेल्या संवादावरून, वाद-विवादांवरून दिसते पण म्हणूनच हा नर-संहार थांबवायला श्रीकृष्ण अतोनात प्रयत्न करितो. कृष्णाचा पूर्ण जन्म लोकांना अपेक्षित धर्मपथावर चालविण्याच्या खटाटोपात गेला पण दुर्योधन असो कि धृतराष्ट्र, किंव्हा मग तो कर्ण असो, त्याच्या हाती अपयशच आले. कुरुसभेतही तो धर्माबद्दल बोलला, अपेक्षित जवाबदाऱयांबद्दल बोलला पण ते सगळे उलट्या घड्यावर पाणी ठरले.
शेवटी काही कमी असेल तर दुर्योधनाने स्वतःच्या अपार बुद्धिमत्तेची पावती देत कृष्णास बंदी बनवण्याचा निर्णय घेतला. तो कृष्ण होता ते पुढे पण सर्वप्रथम तो एक शांतिदूत होता, त्यामुळे त्याला बंदी करणे अधर्म होता. एका शांतिदूताला आणि शांतिदूत म्हणून आलेल्या कृष्णाला बंदी बनवण्याचा निर्णय घेऊन दुर्योधनाने आपल्या रक्तरंजित भविष्याकडे पाऊले उचलली होती. दुर्योधनाचा हा क्रोध आणि त्यांनी मांडलेली चेष्टा बघून धृतराष्ट्राने सुद्धा त्याचा अक्षरशः धिक्कार केला आणि त्याला समजविण्याचा अतोनात प्रयत्न केला. विदुर आणि गांधारी सुद्धा दुर्योधनावर रागावले आणि त्याला कृष्णाची महिती दर्शवून घाबरविण्याचा प्रयत्न केला.
प्रधर्षयन्महाबाहुं क्रुष्णमक्लिष्टकारीणम|
पतंगाग्नीवसाद्या सामात्यो ना भविष्यसि|| अध्याय १२८, ५२||
अर्थात, या उत्तम कार्य करणाऱ्या महाबाहू कृष्णाचा तू अपमान केलास तर पतंग जसे आगीत पडून नाहीसे होतात तसेच तू आणि तुझे मंत्री मंडळ सुद्धा भविष्यातून नाहीसे होतील.
पण दुर्योधन हा केवळ युवराज होता, राजा नाहीं. हे लक्षात घेता त्याने दिलेल्या आदेशाला काडीमात्र महत्व नको. पण सत्य परिस्थिती अर्थातच वेगळी होती आणि राजा काय आणि युवराज काय, सभा दुर्योधनच चालवीत होता आणि त्याचा प्रत्यय त्याने द्रौपदी वस्त्रहरण करून दिलाच होता.
अश्या परिस्थितीत कृष्णाने आपले विराटरूप धारण करण्याचा निर्णय घेतला.
एकोहमिति यन्मोहान्मन्यसे मां सुयोधना|
परिभूय च दुर्बुद्धे ग्रहीतुं मां चिकिर्षसी || (अध्याय १२९, ०२)
अर्थात, अरे मूर्ख सुयोधना (कृष्ण त्यास सुयोधन म्हणतॊ, दुर्योधन नाहीं), तुला वाटते आहे कि मी येथे एकटा आलो आहे म्हणून तू मला बंदी बनविण्याची स्वप्ने बघतो आहेस.
इहैव पांडवा: सर्वै तथैवान्धकवृष्ण्य:|
इहादित्याश्च रुद्राश्च वसवश्च महर्षीभी:|| (अध्याय १२९, ०३)
अर्थात, पण तुला माहिती नाहीं या कि सगळे पांडव, अंधक आणि वृष्णी इथेच आहेत. आणि आदित्य, रुद्र, वसावा आणि महर्षी सुद्धा येथेच आहेत.
आणि असे म्हणून श्रीकृष्णाने हास्याचा गडगडाट केला आणि विराटरूप धारण करू लागला. त्याच्या कांतीतून ब्रह्मादिक देव दिसू लागले, त्याच्या आगीच्या जणू ठिणग्या बाहेर पडू लागल्या. त्याच्या कपाळावर ब्रह्मदेव व वक्षस्थळी रुद्र दिसू लागले.
कृष्णाचे रूप आता हळू हळू अधिकाधिक भीतीदायक होऊ लागले. हे रूप म्हणजे शक्तिप्रदर्शन होते. पण हि दैवी शक्तीचे नाहीं, हे भौतिक शक्ती प्रदर्शन होते. आणि श्रीकृष्णाचे वैयक्तिक शक्ती आणि कौरवांना लौकरच रणांगणात दिसणाऱ्या धार्मिक शक्तीचे प्रदर्शन होते.
प्रदूरास्ताम तथा दोभ्यांर्याम सङ्कर्शण् धनञ्जय।
दक्षिणेथार्जुनो धन्वी हली रामश्च सव्यत।। ( अध्याय १२९, ००७)
भीमो युधिष्ठिरश्चैव मद्रिपुत्रौ च पृष्ठ।
अन्धका वृष्णयश्चैव प्रदुम्नमुखास्तत।। (अध्याय १२९, ००८)
श्रीकृष्णाच्या दोन्ही हातातून बलदेव आणि अर्जुन प्रकट झालेत. अर्जुन त्याच्या धंयश्यासोबत श्रीकृष्णाच्या उजव्या हाताला तर बलदेव (बलराम) डाव्या हाताला होता (००७). युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव श्रीकृष्णाच्या पाठीशी तर अंधक, वृष्णी, प्रद्युमन इत्यादी त्याच्या समोर उभे ठाकलेले दिसले. (००८)
पुढे त्याचे रूप अक्राळ-विक्राळ होऊ लागले. त्याच्या हजार हातात अनेकविधी शस्त्रे उत्पन्न झालीत. त्याच्या नासिक आणि कानातून आगीच्या ज्वाळा येऊ लागल्यात आणि श्रीकृष्णाच्या रोमरोमातून सूर्यकिरणे प्रकट होऊ लागलीत. सभेतील सगळे रथी-महारथी गांगरून गेलेत आणि घाबरून त्यांनी सगळ्यांनी डोळे मिटून घेतलेत. फक्त, द्रोण, भीष्मपितामह, विदुर, संजय आणि उपस्थिती तपस्वी ऋषींना मात्र विराटरूपाचे दर्शन घेता आले. कारण त्यांना श्रीकृष्णाने दिव्य-दृष्टी दिली होती.
असे महाकाय रूप धारण करून पुढे श्रीकृष्णाने सभा सोडली. त्याचा रथ त्याची वाट बघत होता आणि त्यावर आरोहण करून तो त्याच्या आत्या-कुंती कडे निघून गेला.
विराटरूपात श्रीकृष्णाला दुर्योधनाला त्याची क्षुल्लुकता तर दाखवायची होतीच पण त्याला घाबरवायचे पण होते. 'तू मला बंदी करणार? आणि करायचे असले तर कसे करणार?' आणि नुसते दुर्योधनच नव्हे तर समस्त कौरव आणि कुरुसभेला त्याला दर्शवायचे होते कि युद्ध निरर्थक आणि आत्मघातकी आहे. पण 'विनाशाय विपरीतबुद्धी' हेच खरे.
या लेखाची सुरुवात श्री रामधारी सिंग 'दिनकर' यांच्या 'रश्मीरथी' महाकाव्याच्या वाचनाने झाली. 'दिनकर' हे हिंदी कविसृष्टीतील आणि साहित्यसृष्टीतील 'महारथी' मानल्या जातात. त्यांनी कर्णावर रश्मीरथी हे काव्य लिहिले. हिंदीतील हे काव्य वाचायला सोपे आहे पण अर्थपूर्ण आहे. कर्णाचा जन्म, त्याची अगातिकता, त्याची निष्ठा, त्याची भ्रमित मनस्थिती, त्याच्या जीवाची घालमेल आणि शेवटी त्याने समजून-उमजून निवडलेला अधर्माचा मार्ग हे सगळे अतिशय सुरेल आणि सुरेखपणे श्री दिनकर यांने मांडिले आहे. त्यातील विराटरूपाचे वर्णन फार रोचक आहे. माझी मूळ कल्पना अशी होती कि संस्कृत मधील मूळ महाभारतातील श्लोक उद्धृत करायचे आणि मग श्री दिनकर यांची कविता प्रस्तुत करायची. पण कुठले पर्व, कुठले उप-पर्व आणि मग नेमके कुठले श्लोक यांच्या संशोधनात श्री दिनकर यांच्या कवितेची पाळी येईतोवर हजारहुन अधिक शब्द लागलेत. असो. वाचकांनी इथपर्यंत वेळ काढली असेल तर मी मनापासून विनंती करतो कि रश्मीरथीतील खाली उद्धृत केलेले विराटरूपाचे वर्णन अवश्य वाचावे. वेळ घेऊन वाचावे, घाई करू नये. लागेल तर टप्प्या-टप्प्यात वाचावे.
मैत्री की राय बताने को,
सबको सुमार्ग पर लाने को,
दुर्योधन को समझाने को,
भीषण विध्वंस बचने को,
भगवान हस्तिनापुर आये,
पांडव का संदेसा लाये|
"दो न्याय अगर, तो आधा दो,
पर, इसमें भी यदि बाधा हो,
तो दे दो केवल पांच ग्राम,
रक्खो अपनी धरती तमाम |
हम वही ख़ुशी से खाएंगे,
परिजन पर ऐसी न उठाएंगे|"
दुर्योधन वह भी दे न सका,
आशिष समाज की ले न सका,
उलटे, हरी को बांधने चला,
जो था असाध्य, साधने चला |
जब नाश मनुज पर छाता है,
पहले विवेक मर जाता है|
हरि ने भीषण हुंकार किया,
अपना स्वरूप-विस्तार किया,
डगमग -डगमग दिग्गज डोले,
भगवान् कुपित होकर बोले -
"जंजीर बढ़ा कर साध मुझे,
हाँ -हाँ, दुर्योधन! बाँध मुझे |"
"यह देख, गगन मुझमे लय है,
यह देख, पवन मुझमे लय है,
मुझमे विलीन झंकार सकल,
मुझमे लय है संसार सकल|
अमरत्व फूलता है मुझमे,
संहार झूलता है मुझमे|
"उदयाचल मेरा दीप्त भाल,
भूमण्डल वक्षस्थल विशाल,
भुज परिधि-बांध को घेरे है,
मैनाक-मेरु पग मेरे है|
दिपते जो गृह-नक्षत्र-निकर,
सब है मेरे मुख के अंदर|
"दृग हो तो दृश्य अकाण्ड देख,
मुझमे सारा ब्रह्माण्ड देख,
चर-अचर जीव, जग क्षर-अक्षर,
नश्वर मनुष्य, सुरजाति अमर,
शत कोटि सूर्य, शत कोटि चंद्र,
शत कोटि सरित, सर, सिंधु, मन्द्र;
"शत कोटि विष्णु, ब्रह्मा, महेश,
शत कोटि जिष्णु, जलपति धनेश,
शत कोटि रूद्र, शत कोटि काल,
शत कोटि दण्डधर लोकपाल|
जंजीर बढ़ाकर साध इन्हे,
हाँ-हाँ, दुर्योधन! बाँध इन्हे|
"भूलोक, अटल पाताल देख,
गत और अनागत काल देख,
यह देख, जगत का आदि-सृजन ,
यह देख, महाभारत का रण;
मृतकों से पति हुई भू है,
पहचान, कहाँ इसमें तू है
"अम्बर में कुंतल-जाल देख,
पद के नीचे पाताल देख,
मुट्ठी में तीनो काल देख,
मेरा स्वरूप विकराल देख|
सब जन्म मुझि से पाते है,
फिर लौट मुझि में आते है|
"जिम्वा से कढती ज्वाल सघन,
साँसों में पाटा जन्म पवन,
पद जाती मेरी दृष्टी जिधर,
हँसाने लगाती है सृष्टि उधर|
मै जभी मूँदता हूँ लोचन,
छा जाता चारो और मरण|
"बांधने मुझे तो आया है,
जंजीर बड़ी क्या लाया है?
यदि मुझे बांधना चाहे मन,
पहले तो बाँध अनंत गगन|
सूने को साध न सकता है,
वह मुझे बाँध कब सकता है?
"हित - वचन नहीं तूने माना,
मैत्री का मूल्य न पहचाना,
तो ले, मै भी अब जाता हूँ,
अंतिम संकल्प सुनाता हूँ|
याचना नहीं, अब रण होगा,
जीवन -जय या कि मरण होगा|
"टकरायेंगे नक्षत्र-निकर,
बरसेगी भू पर वन्ही प्रखर,
फण शेषनाग का डोलेगा,
विकराल काल मुँह खोलेगा|
दुर्योधन! रण ऐसा होगा,
फिर कभी नहीं जैसा होगा|
"भाई पर भाई टूटेंगे,
विष-बाण बून्द-से छूटेंगे,
वायस-शृगाल सुख लूटेंगे,
सौभाग्य मनुज के फूटेंगे |
आखिर तू भूशायी होगा,
हिंसा का पर, दायी होगा|"
थी सभा सन्न, सब लोग डरे,
कप ते या थे बेहोश पड़े|
केवल दो नर न अघाते थे,
धृतराष्ट्र-विदुर सुख पाते थे|
कर जोड़ खड़े प्रमुदित, निर्भय,
दोनों पुकारते थे 'जय-जय!'
--
१) मी श्री रामस्वरूप शर्मा, मुरादाबाद, यांचे मूळ संस्कृत महाभारताचे हिंदीत भाषांतर विषयाभ्यासाठी वापरले आहे. हे जवळ-जवळ शंभर वर्षांपूर्वी सनातनधर्म प्रेस, मुरादाबाद यांनी प्रकाशित केले होते. याची लिंक अशी:
https://dn790007.ca.archive.org/0/items/in.ernet.dli.2015.540928/2015.540928.Mahabharat-Udyog.pdf
२) कुरुसभेतील प्रसंगाचे चित्र हे मूळ श्री राजा रवी वर्मा यांचे आहे. माझ्यामते हे सध्या नेपिअर संग्रहालय, त्रिवेंद्रम मध्ये स्थित आहे. मी कुणाच्याही अनुमतीविना हे चित्र येथे वापरले आहे. पण सर्व हक्क संग्रहालय किंव्हा श्री राजा रवी वर्मा यांचे आहेत.
12/23/24
'Bird By Bird
परदेशी आणि परभाषिक भाषेतील प्रसिद्ध पुस्तकांच्या आढावा घेण्याच्या या मालिकेत दुसरे पुस्तक म्हणजे 'बर्ड बाय बर्ड' ('Bird By Bird ') हे ऍन लमोट (Ann Lamott ) यांचे पुस्तक आहे. मागल्या लेखात आपण प्रसिद्ध भारतीय लघुकथेचें भाषांतर केलेल्या पुस्तकाचा आढावा घेतला. यंदाचे पुस्तक आणि त्याचा विषय थोडा वेगळा आहे. एक, कि पुस्तक खऱ्या अर्थाने विदेशी आहे, म्हणजे, अमेरिकेत प्रकाशित झालेले आणि अमेरिकन लेखकाचे आहे. आणि दुसरे असे कि, तब्बल तीस वर्षांपूर्वी हे पुस्तक प्रकाशित झाले असले तरी हा विषय आपण चिरायू म्हणू शकतो. पुस्तकाचे नाव वाचून पुस्तकाचा विषय नेमका कुठला असेल हा कयास करणे कठीण आहे. पुस्तक पक्ष्यांबद्दल नाहीं! लेखन कसे करावे हा पुस्तकाचा विषय आहे. 'कदम कदम बढाये जा' या वाक्प्रचाराचे एका अर्थाने इंग्रजीत भाषांतर आपण 'बर्ड बाय बर्ड' असे करू शकतो. लेखन म्हणजे काय, लेखनाकडे कसे बघावे, लेखन का करायला हवे, लेखन का केल्या जाते अश्या विविध अंगांनी विचार करीत ऍन लमोट हा गहन विषय अगदी सोप्या पद्धतीने वाचकांसमोर उलगडतात. येथे त्यांच्या लेखनाचे कौतुक करायला हवे. शाळेतील शिक्षकाने एखादा विषय शिकवावा तश्या पद्धतीने एक एक पाऊल पुढे टाकीत मनातील विचारांना किंव्हा विषयाला लेखनकृती कशी द्यायची हे त्या शिकवितात. जरी विषय थोडा धीर-गंभीर असला तरी विनोदाचा आधार घेत ऍन लमोट वाचकांना लेखन करायला उद्युक्त करण्यात यशस्वी ठरतात.
मनुष्य प्राण्याच्या कंठातून जेव्हापासून शब्दरुपी ध्वनी बाहेर पडू लागले तेंव्हापासून तो काही तरी लिहिण्याची धडपड करितो आहे. आपले विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायला लिहिलेले शब्द आवश्यक असतात. तसेच शब्दांचे आयुष्य मनुष्यपेक्षा नक्कीच अधिक असते. मनुष्याचे विचार, अनुभव, उपदेश, कल्पना इत्यादी जिवंत रहावे म्हणून अक्षर व शब्दांना प्रमाणबद्ध केल्या गेले आणि त्यातूनच भाषेचा उदय झाला. बोली भाषा आणि लिहण्याचे अक्षर याचे एकीकरण होऊन संस्कृतीचा उदय झाला. मग संस्कृतीचे जतन करायला नव-नवीन शब्द, वाक्यप्रचार, म्हणी इत्यादीचा उदय झाला आणि जगभरात विविध संस्कृती नांदायला लागल्यात. सनातन भारतीय संस्कृती या पायावर तर गेले हजारो वर्षे उभी आहे. बोलण्याचे आणि लिहिण्याचे एवढे महत्व असतांना आणि मनुष्य जातील एवढा अनुभव या क्षेत्रात असतांना समस्त मनुष्य जात लिहिण्यात आणि बोलण्यात निष्णात असणार किंव्हा असायला हरकत नाहीं?
अर्थात असे नक्कीच नाहीं. बडबड करणे म्हणजे बोलणे नाहीं आणि लिहिल्या गेलेले लेखन नाहीं. बहुतांश बोललेले वायफळ आणि बाष्कळ असते! आणि आजच्या काळात बहुतांश लिहिल्या गेलेले नोकरी-धंद्या साठी असते. (सध्याच्या इराक देश असलेल्या भागात केलेल्या उत्खननात किमान पाच हजार वर्ष जुने दगडाचे 'टॅबलेट' सापडलेत. त्यात लिहिले होते त्याचा उलगडा करायला बरीच कष्ट लागलीत. शेवते कळले कि एका ग्राहकाने दुकानदाराविरुद्ध केलेली तक्रार या टॅबलेट मध्ये कोरली होती!) कारण लेखन - मग ते प्रासंगिक असो कि मनोगत किंव्हा ललित असो- हे फार कठीण काम आहे. शब्दांना नेमका असा आकार द्यायचा कि वाचणाऱ्यांना ते शब्द रोचक, अर्थपूर्ण वाटतील, किंव्हा खटपट करून शब्दांना गर्भित अर्थ प्राप्त करावा कि वाचकांना अभिप्रेत उमजेल. किंव्हा शब्दांमध्ये आपले अनुभव असे गुंफावे कि वाचणाऱ्यांना तो अनुभव आपलासा वाटेल. सूक्ष्म भावनांच्या उत्कटतेला शब्दांनी आकार देणे, प्रतिभेच्या उत्स्फूर्ततेला वाक्यांनी उत्तुंग बनविणे, हे काम सोपे नाहीं. पण मग काय करायचे? लिहायची इच्छा आहे पण लिहिता येत नाहीं, कुठून 'श्री' करायचे हे कळत नाहीं, कुठे नेमके संपवायचे? कोणाबद्दल, कशाबद्दल, कुठल्या काळाबद्दल, कुठल्या घटनेबद्दल लिहायचे? हे कोडे काही केल्या उमजत नाहीं. अश्या स्थितीत बर्ड बाय बर्ड पुस्तक हाताशी येते.
लिहिता येत नाहीं माहिती आहे पण ते का, या प्रश्नाच्या भानगडीत पडण्यापेक्षा, लिहायला कशी सुरुवात करायची या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हे पुस्तक आहे. पुस्तकाच्या लेखिका ऍन लमोट स्वतःच्या आयुष्यातील काही घटनांना गोवून आणि थोर-मोठ्या इंग्रजी लेखकांशी या विषयी केलेल्या संवादाद्वारे, लेखनाकडे नव्हे तर स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन पुस्तकाद्वारे देतात. लेखन हा गंभीर प्रकार नाहीं. अगदी जरी गंभीर विषयांवर लिहायचे असेल तरी! लेखन हा अनुभव हा स्वतःला आनंद देण्याचा, आनंदी ठेवण्याचा एक मार्ग आहे. हि एक कला आहे. आणि कलेचे पहिले लक्ष्य स्वानंद असते. अमूर्त विचारांना, भावनांना, कल्पनेला, एका स्वतः घडवलेल्या नवीन विश्वाचा आविष्कार करून वाचकांसमोर ठेवणे हि एक उपलब्धी याची जाणीव हे पुस्तक देते. या पुस्तकाचा सूर आणि स्वर एकूण आनंदी आहेत. हे पुस्तक वाचून लिहायला स्फूर्ती मिळते. लेखन हे जगण्यापेक्षा वेगळे नाहीं आणि त्यामुळे त्याच्याकडे घाबरून बघण्याची गरज नाहीं. छोटे छोटे टप्पे गाठून एकादी लघु-कथा आज आपल्या प्रत्येकात आहे.
पुस्तकाची अनुक्रमणिका बघाल तर लांब आहे पण पुस्तकाचे पृष्ठसंख्या फार नाहीं. पुस्तकाचे चार मुख्य भाग आहे - १) Writing , २) The Writing Frame of Mind , ३) Help Along the way , ४) Publication - and Other Reasons to Write .आणि पुढे हे चार मुख्य भाग अजून छोट्या छोट्या धड्यांमध्ये भागले आहे. लेखिका ऍन लमोट या अमेरिकेतील कॉलेजमध्ये सर्जनशील लेखन ( creative writing ) हा अभ्यासक्रम शिकवितात. त्यामुळे एका शिक्षकाच्या दृष्टिकोनातून त्यांनी पुस्तकाची मांडणी केली आहे. पण एका अभ्यासक्रमाप्रमाणे शिकून लिहिण्याचे ठरविले तरी लिहिण्याचा कुठला जादुई मंत्र नाहीं हे त्या लगेच स्पष्ट करतात.
"I wish i had a secret i could let you in on , some formula my father passed to me in a whisper just before he died , some code word that has enabled me to sit at my desk and land flights of creative inspiration like an air -traffic controller . But I don 't "
त्यांच्या मते पुस्तक लिहिण्याची प्रक्रिया हि लिहूनच सुरु होते. कोंबडी पहिले कि अंड पहिले? कल्पना नाहीत तर लिहायचे कसे आणि लिहिले नाहीं तर कल्पना कुठून येणार? या भानगडीत पडण्यात, याचा ऊहापोह करण्यात वेळ घालविण्यात फारसा अर्थ नाहीं. आधी लिहायला लागा, लिहिता लिहिता लिहिण्याची प्रगती होईल. सोबत सतत वाचा, वाचून वाचून लिहिण्याची संयुक्तता साधेल. खुर्चीवर बसून भिंतीकडे (किंव्हा आकाशाकडे!) बघून शब्द सुचत नाहीं, वाक्य जमून येत नाहीत, आणि कल्पना भराऱ्या घेत नाहीत. कल्पनेचे 'विलास' बांधायचे तर अक्षरशः दगड-धोंडे ढोहुन नेण्यासारखी ढोर मेहेनत करायला हवी. आता कल्पना विलासाचा पाय असो कि गोष्टीची बांधणी, सुरुवात नेहमी लहानच केलेली बारी. एकदम गोष्ट लिहिण्याचे धाडस होत नसेल तर गोष्ट थोडी बाजूला ठेवा आणि अनुभवाचा एकदा परिचछेद लिहा. हा अनुभव कुठलाही असू द्या. वैयक्तिक किंव्हा ऐकलेला. चित्र काढायच्या आधी वहीच्या मागल्या पानावर पेन्सिल ने काहीतरी हलकेच रेखाटल्या सारखे. बरं, काही तरी सखोल, तात्त्विक, किंव्हा शिकवून जाईल असे काही लिहिण्याची आवश्यकता नाहीं. सकाळी भाजी आणायला म्हणून निघालेल्या 'अहो' आणि 'अग' मधील 'सुखद' संवाद? घरून ऑफिस मध्ये जाण्याच्या प्रवास? त्यात नित्यनेमाने दिसणार, भेटणारी पात्रे? या नित्यनेमाच्या अनुभवांमध्ये इतके रंग आहेत. पुस्तकाच्या सुरुवातीचे धडे वाचून लिहायचा 'श्री' केला कि पुढच्या धड्यांमध्ये या साधारण अनुभवांना गोष्टीत कसे रूपांतरित करता येईल हे शिकता येते. पात्रांना स्वभावगुण कसे द्यावेत, परस्परसंवाद, भाषा कुठली वापरायची? कथानक कसे हवे? एक एक धडा वाचत गेलो कि रेखाचित्राची अजून एक रेघ आणि कथानकाचा अजून एक छटा रंगवीत येऊ शकते.
पुस्तकातील हा धडा तर होतकरू लेखकाने त्याच्या सान्निध्याचा सूक्ष्म परीक्षण करायला शिकवितो. हे परीक्षण कसे करावे हा सुद्धा एक अभ्यास आहे आणि त्याचा सुद्धा सराव करायला हवा. अनेक थोर लेखक त्यांच्या घराचा, गावाचा, परिसराचा, लहानपणी त्यांच्या शेजाऱ्यांचा, नातेवाइकांचा किंवा मित्रांचा ठसा आपल्या लेखकात ठळकपणे उमटवतात. ग.दि. माडगूळकर त्यांच्या 'मंतरलेल्या दिवस' या आत्मचरित्रपर पुस्तकात या बद्दल म्हणतात " अनुभव आणि अभ्यास यांच्या जोरावर साहित्यकार कितीही प्रगत झाला, तरी बाल्यातील संस्कार व ऋणानुबंध त्याच्या साहित्यकृतीत वारंवार डोकावत रहातात. माझं खेडेगाव, त्या खेड्यातील चालीरीती; तिथलं वातावरण, तिथला झाड-झाडोरा, माती-पाषाण, असेच माझ्या स्मरणात टिकून राहिले आहेत. खेड्यातल्या माणसांच्या आकृती आणि स्वभावरेखाई अशाच मनावर ठासून गेल्या आहेत. नाव वाङ्मय लिहीत असताना त्यातील अनेक दुर्श्य, अनेक प्रसंग आणि अनेक स्वभावच्छटा माझ्या लिखाणात येतात; सदैव येतात." (मोहोरलेला कडुलिंब, मंतरलेले दिवस )
वी.एस. नायपॉल हे इंग्रजी भाषेतील दिग्गज लेखक होऊन गेलेत. सन २००१ चे त्यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. हे मूळ भारतीय रक्ताचे असलेत तरी त्यांचे पूर्वज काही पिढयांपूर्वी सध्या ज्याला वेस्ट-इंडिज म्हणतो या देशात स्थलांतरित झाले होते. तिथल्या छोट्याश्या गावात नायपॉल यांचा जन्म झाला. त्यांनी पुढे त्यांच्या जन्म इंग्लंड मध्ये काढला तरी आयुष्याची पहिली १८-१९ वर्षे, जी वेस्ट-इंडिज मध्ये कंठिलीत, त्याचे पडसाद त्यांच्या लिखाणात नेहमीच दिसतात. त्यांचे मिगुल स्ट्रीट (Miguel Street ) हे पहिले लघु-कथांचा प्रकाशित संच अतिशय प्रसिद्ध झाला. या पुस्तकातील पहिली लघु कथा कशी सुचली याबद्दल ते अनेकदा बोलले आहेत. एका दुपारी ते लंडन मध्ये त्यांच्या टाईप-रायटर वर शून्यात बघत बसले होते. काय लिहायचे, कशावर लिहायचे याचा विचार करीत. अचानक, शून्यात, त्यांना त्यांच्या लहानपणाचे घर दिसले, त्यात त्यांचे वडील बसलेले होते आणि समोरून त्यांचा शेजारी 'बोगार्ट' जात होता. त्यांच्या वडिलांनी त्या बोगार्ट ला हाक मारली:
"‘Every morning when he got up Hat would sit on the banister of his back verandah and shout across, “What happening there, Bogart?”‘
हा संवाद त्यांनी लिहिलेल्या पहिल्या लघु-कथेची सुरुवात ठरली.
पुस्तक आणि त्यातील धडे फक्त लिहायला मदत करून थांबतात असे नाहीं. कथानकाच्या विविध अंतरंग कसे शोधायचेत, आणि मग रंगवायचेत हे पण ऍन लमोट समजावतात. पुस्तकात "Moral Point Of View " हा धडा मला फार आवडला.
"To be a good writer, you not only have to write a great deal but you have to care. You do not have to have a complicated moral philosophy. But a writer always tries, I think, to be a part of the solution. " (पृष्ठ १००)
गोष्ट असेल तर विषयाबद्दल, कथानकाबद्दल, घटनेबद्दल, पात्रांबद्दल आणि मनोगत असेल तर स्वतःबद्दल, आपुलकी आणि जिव्हाळा हवा. कोरड्या मनाने शब्दांचा अभिषेक चढविणे कठीण आहे. बहुधा अशक्य आहे. वाचकांना कळत-नकळत ती त्रयस्थता नक्कीच जाणवेल. असे होऊ शकते कि गोष्ट अचानक असे वळण घेईल कि रंगवलेल्या पात्रांची भूमिका पटणार नाहीं. रंग विस्कटलेल्या सारखा वाटेल पण खऱ्यात सुद्धा सीमारेषेच्या चौकटीत आयुष्य बसत नाहीं तर गोष्टींची पात्रे त्याला अपवाद कसा ठरणार? पण जिव्हाळा कायम ठेवला तर गोष्ट वाचकांच्या अंतरंगाचा ठाव घेईल. पु.ल. देशपांडे यांच्या 'व्यक्ती आणि वल्ली' पुस्तकातील व्यक्ती आणि वल्ली हे याचे उत्तम उदाहरण आहे. पुस्तकातील पात्रे खऱ्या लोकांवर आधारित आहेत पण खरी नाहीं. आपण आपल्या पोराला अभिमानाने पाहुण्यांसमोर बोलावितो त्याच प्रेमाने, जिव्हाळ्याने प्रत्येक पात्र पु.ल. वाचकांसमोर उभी करतात. सखाराम गटणे आणि अंतू बर्वे हि पात्रे विरोधाभासी आणि जणू वेगळ्या विश्वात वावरतात. पण पु. ल. दोघांवर तेवढेच प्रेम करतात. आणि हे प्रेम वाचकांच्या हृदयी कळते. सन १९६६ साली प्रकाशित झालेले हे पुस्तक अजूनही वाचकवृंद घरी संग्रही ठेवतो.
"If people cannot write well, they cannot think well, and if they cannot think well, others will do their thinking for them." - ओरवेल
समाज प्रबोधन, समाजउत्थान करण्याचा लेखनासारखा मार्ग नाहीं. फक्त गेल्या शंभर-दीडशे वर्षांचा इतिहास बघितला तरी सगळ्या मोठं-मोठाल्या बदलांचा किंव्हा क्रांत्यांचे मूळ लिहिलेले पुस्तकच असेल. बर, क्रान्ति वगैरेच्या भानगडीत नाहीं पडला तरी लेखनाचे महत्व कमी होत नाहीं. स्वतःची स्वतःला ओळख होण्याचा लेखन एक उत्तम मार्ग आहे.
पुस्तकात पुढे प्रकाशनाबद्दल हि धडा आहे. हे पुस्तक तब्बल तीस वर्षांपूर्वी प्रकाशित झाले होते. तेंव्हा पुस्तकांद्वारेच लेखन होत. आणि त्यासाठी प्रकाशनगृह हा एकाच मार्ग होता. पण गेल्या तीन दशकात परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे. प्रकाशनगृहे आहेत आणि लागतील पण आता प्रकाशाची विविध माध्यमे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे लिहिलेले वाचकांपर्यंत पोचवायला अधिक सोपे झाले आहे. पण सोपे असले किंव्हा अगदी स्वतःच्या खर्चाणे प्रकाशन करण्याची इच्छा असेल, कुठल्याही तऱ्हेचे प्रकाशन करणे हे अंतिम ध्येय असायला नको. ते एक एवढेच लक्ष्य नको. लेखाच्या सुरुवातीला म्हणालो तसे, लेखन हि नवीन अविष्काराची अनुभूती देणारा मार्ग आहे. देवत्व प्राप्त ना करीत देव बनून नवीन कल्पना सृष्टी रचण्याचा एक सहज मार्ग आहे. आणि प्रकाशित नाही झाले तरी हे शक्ती आपल्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाहीं. आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आकाशात ध्रुव ताऱ्याचे अढळ स्थान आपल्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाहीं.
लेखन नेहमी गंभीर असावे असे काही आवश्यक नाहीं. लेखन बोधीप्राय हवे असेही नाहीं. लेखन जगाकडे बघण्याचा वैयक्तिक दृष्टीकोण आहे. खूपदा बोलून आपल्याला दिसत असलेले जग दुसऱ्यांना दर्शवू शकत नाहीं. अश्यावेळेस लेखणी (किंव्हा की-बोर्ड!) आपला मित्र ठरतो. लेखनाद्वारे किंव्हा गोष्टींद्वारे आपण आपल्या शेजार-पाजारच्या जगाला वेगळ्या रंगाने रंगवू शकतो. कोण म्हणत कि जसा रंग दिसतो तोच गोष्टीला द्यायला हवा? पाहिजे तो रंगवू शकतो. आकाश निळ्याचे हिरवे करू शकतो, चांगल्याला वाईट, आणि वाईटाला चांगला करू शकतो. किंव्हा चांगल्या वाईटाचा दोन्ही छटा एकाच व्यक्तिमत्वात ओतू शकतो. आकाश ठेंगणे ठरेल आपल्या कल्पनेच्या भरारी पुढे. अतर्क्य असे काहीच नाहीं इथे. खऱ्या आयुष्यात असे स्वातंत्र्य कधीच मिळायचे नाहीं. आणि हे सगळे करण्यात जो निखळ आनंद मिळेल तो फक्त आपलाच!
पुस्तकाचे माहात्म्य आणि पुस्तकाचे यश असे कि वाचक काही तरी लिहायला उद्युक्त होतो. लिहायला प्रयोजनाची आवश्यकता नाहीं. बाळपणी चालायचे शिकायला प्रयोजन हवे होते का? बोलायला? तसेच लिहिण्याचे आहे. लिहायला लागायचे. सराव करायचा. एकदम उठून कोणी गीत-रामायण लिहू शकत नाहीं (माडगूळकरांनी गीत-रामायण लिहिले तेंव्हा त्यांना तब्बल वीस वर्षांचा विविध-रंगी लेखनाचा अनुभव होता.) पण कुठून तरी सुरुवात करायलाच हवी आणि त्यासाठी हे पुस्तक सगळ्यांच्या संग्रही नक्कीच हवे.
--
पुस्तक परिचय
'बर्ड बाय बर्ड' ('Bird By Bird ')
लेखिका - ऍन लमोट (Ann Lamott)
प्रकाशन दिनांक - सप्टेंबर १, १९९५,
पृष्ठ संख्या - २५६
ISBN-13 : 978-०३८५४८००१७
ऍमेझॉन ची लिंक - https://www.amazon.in/Bird-Some-Instructions-Writing-Life/dp/०३८५४८००१६
11/24/24
महाराष्ट्र कुणाचा?...जनता जनार्दनाचा!
या मथळ्याचा पहिला लेख मी २०१४ ला लिहिला होता. तेंव्हाचे भाजप आणि मूळ शिवसेनेतील द्वंद्व आणि त्याचा काँग्रेसला आणि श्री पवार यांना होणाऱ्या फायद्याची शक्यता हा त्या लेखाचा सूर होता. जनतेच्या कृपेने तसे झाले नाहीं. आणि भाजप आणि मूळ शिवसेना यांचे सरकार आले. पुढे श्री फडणवीस यांनी मोठ्या शर्थीने राज्य राखले आणि जोपासले. सन २०१९ च्या लोकसभेत भाजप ची ओटी मराठी जनतेने काठोकाठ भरली. त्या वर्षीच्याच विधानसभेत पुन्हा भाजप आणि मूळ सेनेचे सरकार येणार हे नक्की होते. पण नेमके तेंव्हाच श्री फडणवीस यांच्या कानात वारे गेले. आणि भाजप ची अक्कल चरायला गेली. पण स्वतःसाठी त्यांनी कमी जागा ठेऊन भाजप ने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. जणू ठेचकाळयाला धोंडे भाजप आणि श्री फडणवीस शोधत होते. तरी जनतेने त्यांना तब्बल १२२ जागा दिल्यात. मूळ सेनेचे मुख्य श्री ठाकरे यांनी घातलेला गोंधळ बघता, भाजप वेळेत हि गाठ कापून मोकळे होऊन २०० होऊन अधिक जागांवर लढले असते तर भाजप ला स्वतःच्या बळावरच पूर्ण बहुमत मिळाले असते. श्री ठाकरे आणि 'सेना धुरंधर' श्री संजय राऊत यांनी पायाखालून पाट काढे पर्यंत भाजप ने वाट बघितली. आता अंगठे ठेचकाळलेत तो पर्यंत ठीक होत पण भाजप आणि श्री फडणवीस यांनी ठरवले कि धोंडे शोधून त्यावर डोकी आपटायचीत. ३ दिवसांसाठी श्री अजित पवार यांचा पदर धरून त्यांनी घाई-घाईत लग्न लावण्याचा प्रयत्न केला. लग्नातली पोरगी कधीच पळून गेली आणि घोड्यावर बसलेले भाजप मात्र त्या नंतर लग्नाचा हिशोब चुकवीत बसलेत. मग भाजप आणि श्री फडणवीस यांनी शक्कल लढवली आणि मूळ सेनेच्या बुरुजांखाली सुरुंग लावले. आणि श्री एकनाथ शिंदे यांना पुढे करून पुन्हा सत्तारूढ झालेत. शांतपणे राज्य करून, विकासाची दारे उघडणे सोडून, भाजप आणि श्री फडणवीस यांनी श्री अजित पवार यांच्यासाठी दारे उघडावीत, या शंखपणाला काय म्हणायचे? त्यांच्या या कृतीचा उपयोग नेमका कोणाला झाला हे मला अजूनही उमगले नाहीं. सन २०१९ च्या निवडणुकीत श्री पवार आणि त्यांच्या पक्षाला सगळ्यात कमी जागा आणि मते मिळाली असतांना बुडत्याला हातची वल्ही देऊन हाताने होडी ढकलण्यात भाजप ला नेमके काय मिळाले?
गेल्या दशकातील आणि मुख्य करून २०१९ च्या या महाराष्ट्रातील राजकारणाचा हा संक्षिप्त आढावा देण्यामागचे कारण असे कि या सगळ्या कोलांट्या उड्यात जनतेचे नुकसान झाले. जनतेने आपला कौल २०१४ पासून एकाच पक्षाला देत असतांना त्यांनी (म्हणजे भाजप आणि श्री फडणवीस) एका पाठोपाठ एक नव-नवीन राजकीय चुका कराव्यात हि खेदाची बाब आहे. आणि म्हणूनच या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि श्री फडणवीस यांच्या डोक्यावर जनतेने सणसणीत टोला हाणला असे म्हणायला हरकत नाहीं.
राज्यात गेले पाच वर्षे राजकीय अस्थिरता होती त्याचे पडसाद आणि प्रतिसाद राज्यकारभार आणि प्रशासनावर नक्कीच पडले असणार. केवळ राजकीय किंव्हा निव्वळ निवडणुकीसाठी फायदा होईल अशी पावले न उचलता दूरदृष्टीने राज्य विकासासाठी पावले उचलल्या गेल्याची किती शक्यता आहे? आणि असे आवश्यक निर्णय घेतल्या गेले नसतील कारण त्या साठी फुरसत नसेल किंव्हा लक्ष फक्त येत्या निवडणुकांकडेच असेल तर या साठी जवाबदार कोण? याचे उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
अशी प्राप्त परिस्थिती असली तरी भाजप आणि श्री फडणवीस हेच महाराष्ट्रासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे हे पण तेवढेच सत्य आहे. श्री फडणवीस हे एक अनुभवी राजकारणी आहेतच पण उत्तम राज्यकारभारी पण आहेत. त्यांना प्रशासनाचा दोन दशकांचा अनुभव आहे. नागपूरचे ते सगळ्यात तरुण महापौर होते. मग गेले पंचवीस वर्ष ते महाराष्ट्र विधानसभेत आमदार आहेत. त्यांनी विरोधी पक्ष नेते हे पद फार उत्तमरीत्या निभावले होते आणि महाराष्ट्राच्या इतिहासात श्री वसंतराव नाईक यांच्या व्यतिरिक्त संपूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रीपद टिकविणारे दुसरेच मुख्यमंत्री आहेत.
आता मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. इतका अनुभव असतांना आणि तिसऱ्यांदा जनतेचा कौल मिळाला असतांना भाजप ने श्री फडणवीस यांना पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करून जनतेवर कृपा करावी. अडीच वर्ष एक आणि मग दुसरा इत्यादी दिवाळखोरी विचार पक्षाने करू नये. श्री फडणवीस यांच्या सारखा अनुभवी राज्यकर्त्यांची राज्याला फार आवश्यकता आहे. पाच वर्षे आता फक्त विकास एवढाच मुद्दा समोर ठेऊन भाजप आणि श्री फडणवीस राज्य करतील हि आशा.
11/2/24
पु. ल. - एक साठा (भाग २)
(या लेखाचे दोन भाग होतील असे मला अपेक्षित नव्हते. पण अजून पुस्तकातील पु.ल. च्या निदान अजून दोन लेखांवर लिहणे आवश्यक आहे असे वाटते. एकाच रुंदीत लांब लांब लिहीत गेले तर वाचायला या माध्यमात कठीण जाते म्हणून मी पुढील लेख दुसऱ्या भागात प्रकाशित करीत आहे. पहिला भाग आपल्याला इथे वाचता येईल.)
पु.ल. च्या या लेखनात दोन प्रकारचे आढळतात. पहिला प्रकार ज्यात त्यांनी विचार हे सांप्रत परिस्थितीवर भाष्य, विनोद आणि स्वतःचे त्या विषयावरील विचार आणि समाजासाठी लिहिलेले लेखन. आणि दुसरा प्रकार हा आत्मा-प्रवास आणि मनोगत याचे मिश्रण. "राहून गेलेल्या गोष्टी' हा लेख त्यांचा वैयक्तिक लेख म्हणता येईल.
"माणसाचा वय जसजसं वाढत जात तसतसं त्याला आपल्या हातून कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या, यापेक्षा कुठल्या राहून गेल्या याचीच अधिक चुटपुट लागून राहते. सर्वांच्याच बाबतीत असं असेल अस नाहीं मी म्हणत. पण आयुष्याची गाडी उताराला लागते, नवं वळण काय घ्यावं ते सर्वस्वी आपल्या हातात राहत नाहीं. आता कासर आपल्या एकट्याच्याच हाती नाहीं हे ध्यानी येतं, आणि गोष्ट राहून गेली असं फार वेळा वाटायला लागत"
त्यांना लहान मुलांना - पोरं-टोरांना, संगीत शिकवायचा राहून गेला हे मला अनपेक्षित होते. पु. ल हे साहित्यिक नंतर संगीतवेडे आधी होते त्यामुळे त्यांना असे वाटणे याचे आश्चर्य वाटायला नको. पण या गोष्टीचा त्यांना खेद वाटणे यात त्यांच्या मूळ स्वभावगुणांची नव्याने ओळख होते. खेद हा प्रकार हा नेहमी उपलब्धी, काय मिळवायचे राहिले, अधिक पैसे, चांगली नोकरी, आणि अजून घरे (आजच्या भाषेत रिअल इस्टेट) इत्यादी दृष्टिकोनातूनच बहुतांश प्रकट होतो. येथे पु.ल. यांनी वैयक्तिक दृष्ट्या त्यांच्याकडून काय द्यायचे राहिले याचा खेद व्यक्त केला आहे. गाणी शिकवून, मुलांकडून गाववून, संगीताचा आनंद पसरवून त्यांना लहान मुलांना आनंदित करता आले असते. ते राहिले.
कॉलेज मध्ये असल्यापासून मला चित्रपट बघण्याचा नाद जडला. बहुतेक मी इंग्रजी चित्रपट तेंव्हा बघत असे पण एकूण चांगला चित्रपट बघायला मला फार आवडते. पु.ल. च्या भाषेत मी एक फुकटाचा रसिक आहे असे म्हणता येईल. पु.ल. नी या विषावर "निर्माता, प्रेक्षक आणि टीकाकार" हा फार मार्मिक निबंध लिहिला आहे.
"चित्रपट हे एक भावना आणि त्यामुळं आचारविचार, जीवनाविषयक दृष्टिकोन ह्यावर जबरदस्त आघात करू शकणार विलक्षण प्रभावी असं साधन आहे. ती एक शक्ती आहे. आणि या शक्तीचा वापर केवळ स्वार्थी हेतूनं केला तर एक सामाजिक घटक म्हणून आपण केवढं पाप करत आहोत याची जाणीव जर नसेल तर काय भयानक परिणाम होतात याची उदाहरण नव्यानं सांगायला हवीत असं नाहीं."
हा निबंध कुठल्या साली छापल्या गेला आहे याची माहिती पुस्तकात दिलेली नाही पण तो आजच्या काळातही तंतोतंत लागू होतो. या निबंधावर एक स्वतंत्र लेख लिहायला हवा. किंव्हा हा निबंध जश्याच्या-तसा लिहून सगळीकडे पुन्हा प्रकाशित करायला हवा. पु. ल. परखड आहेत पण ते तळमळीने लिहीत आहे. पु. ल. स्वतः कलाकार आणि अभिनेता होतेच पण ते मराठी चित्रपट सृष्टीचे सभासद हि होते. पण कधी त्या क्षेत्रातून रोजी-रोटी कमावली असली तरी त्यांचा प्रामाणिकपणा नेहमी सत्यासाठी होतं. आणि चित्रपट क्षेत्राचे समाजावरील परिणामाची परिस्थिती तेंव्हा, आणि आजहि दारुण आहे. अंग दाखविले कि लोक येणार याच भ्रमात हिंदी चित्रपट सृष्टी आज काल वावरते. काहीही करून लोकांनी तिकिटे विकत घेतली म्हणजे झाले मग त्यासाठी कलेचीच आहुती दिली तरी चालेल.
"जीवनाकडे सदैव गंभीर दृष्टीनं पाहायला हवं, असं मुळीच नाहीं. अत्यंत आनंदाने पाहावं, हसावं, खेळावं, नाचावं, गाव. परंतु हे करण्यात जीवन अधिक समृद्ध करण हा हेतू असावा. रस्त्यात केळीची साल फेकून कुणाचा तरी पाय घसरून तो आदळला तरीही आनंदानं खिदळणारी मंडळी असतात. त्या आनंदात सुबुद्ध माणूस सहभागी होऊ शकत नाहीं. आपल्याला त्या मंडळींचा राग येतो. तीच गत चित्रपटाची आहे. प्रेमाला विरोध नाहीं; त्यातून वखवख दिसू नये. नृत्यात आनंद आहे; परंतु त्यातून गतीच्या विविधतेचा साक्षात्कार व्हावा, देहाचं प्राणिभाव जागवणारी दर्शन नसावं एवढच"
चित्रपट निर्मिती हे काही सामाज-सुधारणेचे काम नाहीं हे पण पु. ल. मान्य करितात. पैसे कमवावा लागणारच आणि कमवायलाही हवाच पण याचा अर्थ चित्रपट किंव्हा निर्माता, दिग्दर्शकाने समाजातील स्वतःचे स्थान, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्यांची समाजासाठीची कर्तव्ये विसरून चालणार नाहीं. कारण याचे दुष्परिणाम त्यांच्या स्वतःच्या घरी पण जाणवतील. पु. ल. लेखात पुढे टीकाकारांना हि धारेवर घेतात. मला वाटत कि त्यांच्या टीकाकारांकडून काही अपेक्षा होत्या. आजच्या काळात ते असते तर त्यांनी बहुधा लेखातील हा भाग खोडून काढला असता. कारण आता टीकाकार फार कमी उरले आहेत. जे आहेत त्यांना प्रसिद्धी नाहीं आणि ज्यांना प्रसिद्धी आहे ते टीकाकार नाहीं, ते राजाच्या दरबारातील भाट आहेत.
"चोखंदळपण कलावंतांची निवड करणाऱ्या निर्मात्यांनी, कलेचं दैवी देणं लाभलेल्या कलाकारांनी, लेखकांनी, गायकांनी, नटांनी आणि नटींनी आणि व्यासंगी टीकारानी हा आत्म्याचा सौदा करून समाजाला सैतानाच्या राज्यात नेऊन सोडायचा कि काय याचा विचार करायचा आहे"
पुस्तकातील अजून एक लेख मला आवडला म्हणजे "श्रीयुत दैववादी"
"देवावर विश्वास आहे असं म्हणताना कुठं तरी आपला जितका विश्वास असायला हवा तितका आहे कि नाहीं, याची खात्री नसल्यामुळं कि काय कोण जाणे, पण माणसं देवाच्या जोडीला हक्काचा दैवही घेतात"
आपला समाज शतकांपासून देव आणि दैवत तळ्यात-मळ्यात खेळतो आहे. पु.ल. यांनी देवावर विश्वास ठेवायला नकार दिला नाहीं पण दैवाचे वाभाडे काढले आहेत. दैवावर विश्वास ठेऊन हातावर हात ठेऊन समाज बसला असता तर गेल्या शंभर दोनशे वर्षातील इतकी प्रगती झालीच नसती असे पु.ल. म्हणतात. पण असे सांगतांना पु. ल. पुढे म्हणतात "माणसाच्या हातात सार काही नाहीं हे तर खरंच आहे; पण माणसाच्या हातात काहीच नाहीं हे काही खरं नाहीं" थोडक्यात दैव वगैरे फालतू विचार करण्यापेक्षा समोर आलेल्या परिस्थितीस सामना करून पुढे पुढे मार्ग काढीत जाणे हेच उचित आहे. "ह्या लोकांनी देवासमोर कायमच भिक्षापात्र धरलेलं आहे. दोन्ही हात भिक्षापात्र धरण्यात गुंतलेल्या माणसं कर्तृत्वासाठी तिसरा हात कुठला आणायचा? हा केवळ दुबळेपणा झाला." यावर प्रतिवाद नाहीं.
मनाला आधार म्हणून बहुतांश जन देवावर विश्वास ठेवतात. आणि जीवनातील अगम्य प्रकार बघून स्तंभित होऊन माणूस अखेर दैवाचे पाय धरतो असे मला वाटते. पण कधी कधी असेही वाटते कि असुदे बापुड्यांना दैववादी. सगळेच हुशार, इंजिनीअर, वैज्ञानिक नसतात. सामान्य आणि अती-सामान्य या कक्षेत बहुतांश जन जीवन कंठितात. या लोकांनी दैववादी होऊन समाजाचे तेवढे नुकसान होत नाहीं. आणि त्यांचा आयुष्य सुसह्य होतो. पण हा असला विचार थोडा निराशावादी आहे यात वाद नाहीं.
हे पुस्तक म्हणजे पु. ल यांच्या लेख आणि भाषण संकलनाचा हा पहिला भाग आहे. दुसरा भाग मला बहुधा लौकरच वाचायला मिळेल. पहिल्या भागाच्या सुरुवातीला म्हंटले तसे कि त्यांचे काही विषयांवरचे विचार आणि लेखन आजच्या परिस्थितीला चपखल बसते. त्यांचे भाषेवरचे प्रभुत्व, वाचकांशी संवाद सांधण्याची कला हि सर्वज्ञात आहेच. त्यांचा प्रज्ञावाद, विचारांची निर्भीडता, कुठल्याही युक्तिवादाशी असलेला अ-पक्षपात, समाजाचा बद्दलची तळमळ आणि जिव्हाळा पण तरीही सत्याच्या सतत शोध प्रकर्षाने जाणवतो.
या लेखांमधून पु ल. यांचे जेवढे महात्म्य आहे तेवढेच आपल्या सद्य समाजाची कमतरता आहे. शिक्षण वाढले कि अंधश्रद्धा कमी होतील, जात-जातींवरून कलह, वैषम्य दूर होईल, नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण देणे आणि घेणे सोपे होईल, समाजाचे सामंजस्य वाढेल इत्यादी कल्पना भ्रामक आहे हे प्रकर्षाने जाणवते. दंभ आणि दांभिकता दोन्ही झपाट्याने वाढते आहे, जणू ते भाऊ-भाऊच! श्रद्धेत अगतिकता आणि पूजेत अनिर्बंधता वाढते आहे. समृद्धी वाढते आहे पण त्यासोबत मानसिक अबलताहि वाढते आहे. अबलतेची नेमकी कारणे कळत नाहीत म्हणून दोषींच्या शोधात सगळे जणू असतात. सगळ्यांना हक्क हवेत पण जवाबदाऱ्या मुळीच नकोत. स्वातंत्र्योत्तर समाजाचे वय वाढते आहे पण हवी तितकी परिपक्वता दिसून येतं नाहीं या. समाज शिक्षित होतोय पण सुशिक्षित होत नाहींया. यात काही कमी असेल तर भविष्यात येणाऱ्या आर्टीफिशियल इंटेलिजन्स (A . I .) च्या जमान्यात तर खऱ्या-खोट्यातील सीमारेषा इतक्या अस्पष्ट आणि संदिग्ध होणार आहेत कि अगदी भले भले हि भाम्बावातील. सुशिक्षित होण्यासाठी शाळा-कॉलेजेस लागत नाहीं. त्यासाठी अक्षर ओळख लागत नाहीं. त्यासाठी मनाचे चक्षु उघडावे लागतात आणि तेंव्हाच सत-असत, चांगले-वाईट, श्रद्धा-अंधश्रद्धा, उचित-अनुचित, खरेपणा-बेरकेपणा यातील भेद कळेल. नाहीं तर पु. ल यांचे हे लेख अजून शंभर वर्षांनीही लागू होतच असतील.
असो.
पु.ल. हा लेख वाचून म्हणतील कि माझ्या लेखनाचे परीक्षण करतांना आपलेच शब्द वाचकांवर लादणे छान चाललंय!
या पुस्तकाची प्रत मिळाली तर अवश्य वाचा हे विनंती.
10/22/24
पु. ल. - एक ठेवा ( भाग १ )
पु. ल. देशपांडे हे एक थोर विनोदी लेखक होतेच पण त्याहून अधिक ते एक थोर विचारवंत होते. त्यांच्या विनोदी लेखनातून पण त्यांच्या विचारवंत व्यक्तिमत्वाची सावली सतत भासतेच पण तो विनासायस विनोद वाचण्यात त्यामागील त्यांचे संवेदनशील मन, जगण्यावर उत्कट प्रेम, मानवतेवरचा अढळ विश्वास, मनुष्याकडे सदैव सकारात्मक दृष्टीने बघण्याचा अट्टाहास आणि समाजाच्या दृष्टीने असलेली कर्तव्य दक्षतेकडे कानाडोळा होतो. थोर मोठ्यांच्या बाबतीत नेहमीच असे होते. त्यांच्या असामान्यत्वात आणि आपल्या अती-सामान्यत्वात इतकी तफावत असते कि त्या थोर माणसाच्या सगळ्या पैलूंकडे बघणे किंव्हा त्यांच्या सगळी पैलूंची कल्पना येणे अशक्य असते. पु. ल. यांचे लेखन, चित्रपटातील कामगिरी, अभिनय, त्यांची संगीताची ओढ, अश्या अनेक अंगांकडे बघण्यात धांदल उडते.
कुठल्याही लेखकाची किंव्हा लेखनाची महती कशी ठरवायची? जे लेखन जेंव्हा प्रकाशित झाले तेंव्हा प्रसिद्ध झालेले असतेच पण कालानुरूप त्यातील ताजेपणा तसूभरही कमी होत नाहीं. काही दशके असो कि काही शतके असो पण नव-नवीन वाचकवृंद जणू काही नुकतेच प्रकाशित झाले आहे असल्या रसिकतेने किंव्हा प्रसन्नतेने त्या लेखनाचे स्वागत करतो तेंव्हा त्या लेखकाची किंव्हा लेखाचे महात्म्य निश्चित होते. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हजार वर्षांनी पण तेवढ्याच भक्तिभावाने वाचल्या जाते आहे आणि वाचणाऱ्यांचे जीवन मधुर करिते आहे. अर्थात अशी उदाहरणे कमी आढळतात. काळ आणि वेळ बदलला तरी वाचकाला लिहिलेल्या शब्दांशी आपुलकी वाटणे, त्यातील कल्पनेचा गोडवा किंव्हा विचारांची उत्तुंगता जाणवणे किंव्हा मांडलेल्या विचारांना काळाचे बंधन न जाणवता सध्या परिस्थितीतही ते लागू होण्याची प्रचिती येणे हे लेखकाचे खरे यश. जणू लेखकाला चिरंतन सत्य गवसले आहे आणि निव्वळ आपल्या साठी त्याने सोप्या भाषेत शब्दांकित केले आहे.
पु. लं. चे लेखन या सगळ्या कसोटींवर यशस्वी ठरते. नुकतेच त्यांचे लेख, स्फुट लेखन, भाषणे इत्यादींचे संकलित पुस्तक वाचनात आले. नवीन काळात या तऱ्हेच्या लेखनाला ब्लॉग्स म्हटल्या गेले असते. त्यांनी अनेक विषयांना हाताळले आहे. यात काही विनोदी लेख पण आहेत पण त्यातील विनोद आत्ताच्या काळाच्या चवींना रुचणारा नाहीं असे मला वाटते. पण त्यांचे वैचारिक लेख मात्र अजूनहि पटतात आणि वाचणाऱ्यास विचान्मुख करितात.
पुस्तकातील पहिला लेख गांधीजींवर आहे - "जेंव्हा माझं नातं एका सूर्याशी जडलं होतं...". आता गांधी हे व्यक्तिमत्व किंव्हा विचारधारा मराठी माणसाला पटल्याजोगी नाहीं. सन १६४६ चा तोरण्याची मुहूर्तमेढ असो कि सन १८५७ चा स्वातंत्र्यलढा असो, मराठी माणूस गेले तीनशे वर्षे आधी मुसलमान मग इंग्रजांशी अखंड झुंजत आला आहे. अश्या परिस्थिती मुस्लिम धार्जिणे धोरणे किंव्हा इंग्रजांशी प्रेमाचे संबंध, दोन्ही पचायला जड आहे. पण गांधींजींमध्ये काही तरी होते कि सन १९३० नंतर भारत त्यांच्या मागे उभा राहिला. पु. ल. या लेखात गांधी-माहात्म्य गात नाहीत, पण एका त्रयस्थ दृष्टिकोनातून गांधी आणि गांधी विचारांची मीमांसा करितात.
"आपल्याला न पटलेल्या गोष्टींविषयी विरोध नोंदविणे हे वास्तविक गांधींच्याच विचारसरणीला धरून आहे. फक्त विरोधात विनयची कास सोडू नये हा गांधींच्या विचाराचा धागा असल्या विरोधकांना रुचला नसावा" या पुढे पु.ल म्हणतात:
"मतभेद नोंदवणं आणि असहिष्णुता बाळगणं यातला मुख्य फरक कुठला असावा याचा मी विचार करायला लागलो. मतभेद व्यक्त करणारा माणूस एका विचाराच्या जागी दुसरा विचार आणू इच्छितो, आणि असहिष्णू माणूस विचार नष्ट करता येत नाहीं हे दिसल्यावर विचार मांडणाऱ्या व्यक्तीला नष्ट करू इच्छितो"
तुम्हाला गांधी पटो वा न पटो पण लेख वाचून त्यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात नक्कीच बदल होईल. गांधींच्या विचारधारेला विरोध करणारे त्यांच्या काळातही कमी नव्हते पण तरी १९३० च्या दशका नंतर त्यांचे वलय वाढत गेले, ते का?
"गांधींना ज्या काळात खादीच सूत्र सापडलं त्या काळात, त्या सूट काढण्याच्या क्रियेला अगदी तपाचरणाचं सामर्थ्य आलं होत' कारण या क्रियेमाग व्रताची भावना होती. व्रती माणसाला अनेक पथ्य पाळावी लागतात. धैर्यानं अनेक गोष्टींना नकार द्यावा लागतो. किंबहुना, सामर्थ्याची उपासना स्वीकारण्यापेक्षा मन:पूत नकारातून होत असते. अशा जीवासाधनेला काही तंत्राचरणही करावं लागत. तास पहिला तर पंचपात्रीभर पाणी काय गतकं पिऊन टाकता येत नाहीं? मग "केशवाय नमः, नारायणाय नमः" असं म्हणत आचमन कशाला घ्यायला हवीत? गिरणीत धडाधड कापड विणलं जात असतांना हि सावकाश सावकाश विणली जाणारी खादी कशाला? पण आचमन म्हणजे तहान भागवण्यासाठी पाणी पिणं नव्हे; आपण व्रतबद्ध आहोत याची नित्य जाणीव करून देणार हे एक तंत्र असतं. पण ह्या मंत्र-तंत्रमागची ध्येयनिष्ठा, सात्विक व्रताची प्रेरणा नष्ट झाली, कि ढोंगाचा जन्म होतो, टिळेमाळे उरतात, अंतरीचा उमाळा नाहीसा होतो"
एकाच परिच्छेदात पु. ल. यांनी गांधींच्या यशामागचे कारण आणि त्यांच्या जीवनकाळातच सुरु झालेल्या त्यांच्या गांधीवादाचा सपशेल पराभावाचे कारण, हे दोन्ही सुरेख मांडले आहे. पु. ल. गांधीवाद पटवून द्यायला निघाले नाहीत. तो उद्देश्य तरी मला या निबंधात जाणवला नाहीं पण नावडलेल्या किंव्हा न पटलेलेल्या धुत्कारणे सोपे आहे म्हणून कवटाळायाला हवे असे नाहीं. अपेक्षित आहे तो तत्वशुद्ध विचार करण्याचे धाडस.
विचार करण्याची एक प्रक्रिया असते, विषय कुठलाही असो. धसक-फरक करीत, बेताल शब्दांना हाताशी घेऊन उद्दाम आणि प्रक्षोभक वाक्यांच्या क्षेपणास्त्र चालवीत कुठल्या विषयावर लिहिणे सोपे आहे. पण स्वतःला त्रयस्थ आसनावर बसून समोर घडत असलेल्या किंव्हा घडलेल्या घटनांचा स्पष्ट विचार करणे सोपे नाहीं. पु. ल. यांना नेमके हे जमले आहे.
या पुस्तकातील सगळेच लेख किंव्हा विनोदी कथा-निबंध कालानुरूप पक्व झालेत असे नाहीं. पण त्यातला खुसखुशीत पण अजून ताजा आहे. तसेच विनोदी लिहीत, वातावरण हलके करीत असतांना पु. ल अचानक एखादा धीर-गंभीर मुद्दा साळसूदपणे भिरकावतात. हसता-हसता एकदम वाचक स्तब्ध होतो. त्यांच्या "विनोदी लेखकाची दुःखं" या निबंधाचा शेवट अचानक गंभीर होतो.
"तरीही "लोकांना मला हसवावस का वाटतं?" ह्या प्रश्नच उत्तर, "रडवावंसं वाटत नाहीं म्हणून" एवढच आहे. रडण्यासारखं खूप असलेल्या जगात ते रड थोडा कमी करता आला तर पाहावं एवढाच उद्देश. मात्र हे सार करतांना हसवणारा लेखक अनेकदा आतून उमटणारं कसलस ते रडू आवरत हसवत असतो, हे मात्र लोक विसरतात. विनोदी लेखकाचं सर्वात मोठं दुःखं आहे ते हे"
"रसिक मंडळी - एक उच्छाद" हा लेख मला फार आवडला. खरं सांगायचं तर हा लेख आपल्या सारख्यांना लागू होत नाहीं. आपल्या १०० पैकी ९९ लोकांना रसिक नाहीं. पु. ल. केवळ साहित्यिक नव्हते ते आपण ज्यांना आता सेलिब्रिटी म्हणतो तसे ५०, ६० च्या दशकातील ते सेइब्रिटी होते. त्यांचा लेख हा कलेचा आस्वाद घेण्याचे आव्हान होते. पण त्यांचा लेख आजच्या काळात वेगळ्या कारणासाठी साठी लागू होतो कारण 'उचलली जीभ लावली टाळ्याला' याचा ऊत आत्ताच्या काळात आलेला आहे. सोशल मीडिया मुळे प्रत्येक गणू- गंपू आपल्या मतांच्या पिंक टाकीत हिंडत असतो. पात्रता काय तर फोन विकत घेऊ शकतो. मत प्रत्येकाला हवे पण मत प्रदर्शन करणे हा हक्क नाहीं तो मिळविलेला मान आहे. चर्चा चालेल पण ठाम पणे मत मांडायला अधिकार प्राप्त करावा लागतो. आणि सतत प्रत्येक घटनेवर, वस्तूवर, कलेवर, माणसावर मत प्रदर्शन करणे धोकादायक आहे. कारण त्यामुळे मनात नेहमी विचारांऐवजी शब्दांची धांदल असते कि यावर मी काय मत देऊ. मनाची तृप्ती कमी होते, मिळणारे सुख अंगाला लागत नाहीं.
"साहित्य-संगीत-कलाविहीन माणूस हा शेपूट किंव्हा वशिंड नसलेला साक्षात पशू आहे असा कोण्या सुभाषितकारांनी म्हणून घोसाळी करून ठेवला आहे. समाज, असा पशू तर काय बिघडलं? पशू दुःखी असतात म्हणून कोणी सांगितलं? चिखलात पडलेलं डुक्कर उलट माणसाकडे "लेको, तुम्हाला नाही कळणार ह्या चिखलात लोळण्याचा मजा!" अश्या ऐटीत पाहत असतं.आपण उगीच त्यांना बिचार्याला चिखलात लोळावं लागत म्हणून हळहळतो. डुकरांची भाषा आपल्याला कुठं कळते? त्यांच्यातसुद्धा वयोवृद्ध डुक्कर तरुण डुकरांना "अरे, आमच्या वेळचा चिखल आता ह्या तुमच्या सिमेंट-काँक्रीटच्या दिवसात पाहायला मिळणार नाहीं. एकदा त्या चिखलात शिरलं कि आठ-आठ दिवस बाहेर यावंसं वाटायचं नाहीं." वगैरे बोलत असतील."
हे वाचून हसून हसून माझ्या डोळ्यात पाणी आलं. डुकर समोर आलीत.
(क्रमश:)
(या लेखाचे दोन भाग होतील असे मला अपेक्षित नव्हते. पण अजून पुस्तकातील पु.ल. च्या निदान अजून दोन लेखांवर लिहणे आवश्यक आहे असे वाटते. एकाच रुंदीत लांब लांब लिहीत गेले तर वाचायला या माध्यमात कठीण जाते म्हणून मी पुढील लेख दुसऱ्या भागात प्रकाशित करेन.)
9/18/24
स्वरगंधर्व सुधीर फडके - चित्रपट परीक्षण आणि निरीक्षण
"श्रीराम.....श्रीराम....श्रीराम"
या गीत-रामायणाच्या पहिल्या काव्याच्या सुरुवातीला असलेल्या राम-आव्हान ऐकलं कि अजूनही अंगावर काटा येतो. धन्य ते ग.दि.मा. ज्यांच्या लेखणीतून बहुधा स्वतः सरस्वतीने हि काव्ये लिहिलीत. आणि धन्य ते सुधीर फडके ज्यांनी हि काव्ये गेय स्वरूपात लोकांसमोर ठेवून अजरामर केलीत. जेंव्हा गीत रामायण ऑल इंडिया रेडिओ वर प्रक्षेपित झाले तेंव्हा सुधीर फडके आणि ग.दि.मा. फक्त ३७ वर्षाचे होते. त्याआधीही सुधीर फडके प्रसिद्धीस आले होते पण इतक्या लहान वयात गीत रामायणाला सुरबद्ध करण्याची प्रतिभा असलेले श्री फडके मराठी आणि हिंदी संगीत दुनियेतील झळकता तारा होता. अर्थात गीत रामायण हा सुधीर फडके यांच्या कारगीर्दीतील एक टप्पा होता. पुढे त्यांनी त्या काळातील बहुतांश प्रसिद्ध मराठी चित्रपटांना संगीत दिले. आणि हिंदी चित्रपटांनाही संगीत दिले. मला माहिती नव्हते कि 'खुश है जमाना आज पहिली तारीख है' या किशोर कुमारच्या प्रसिद्ध गाण्याची चाल श्री फडक्यांनी दिली आहे. याव्यतिरिक्त त्यांची अनेक भावगीते ("स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला") आणि भक्तिगीते ("विठ्ठला तू वेडा कुंभार") अजरामर आणि अविस्मरणीय आहेत. श्री फडके यांची कारागिर्द, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांच्या स्वरांच्या पाऊलखुणा प्रत्येक मराठी मनावर उमटलेल्या आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची सगळेच वाट बघत होते.
मागल्या आठवड्यात 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपट बघितला. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बघण्याचे मनात होतेच. पण मला हा चित्रपट बघून मनात संमिश्र भावना निर्माण झाल्यात. या थोर माणसाचे आयुष्य नवीन पिढी समोर ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे हा चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचे कौतुक करायला हवे आणि त्यांचे आभार मानायला हवेत. पण चित्रपट बघून प्रेक्षक जर का गोंधळणार असतील किंव्हा चित्रपट बघूनही त्या थोर व्यक्तीच्या कलेचे, कष्टांचे मोल नेमके कळणार नसेल तर चित्रपट न बनवलेला बरा! दिग्दर्शक किंव्हा लेखकाने नेमके ठरवले नाहीं कि त्यांना चित्रपट करायचंय कि माहितीपट. चित्रपटातून लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्याचे श्री. फडके त्यांच्यावरची श्रद्धा स्पष्ट होते. वातावरण निर्मिती, सेट्स, मुख्यतः जुन्या काळाचे चित्रण, वेशभूषा हे सगळे उत्तम दर्जाचे आहे. पण भानगड कथा आणि पटकथेत आहे.
आपण काही मुख्य मुद्द्यांचा सविस्तर विचार करू.
चित्रपटाची कथा-पटकथा - चित्रपटाची पटकथा फार तुटक वाटली. सुरुवात श्री फडक्यांच्या बालपणी होते. पण सुरुवातीच्या पाच-दहा मिनिटानंतर आपण फारसे बालपणात डोकावतच नाहीं. त्यांचे बालपण फार आनंदात आणि सुखवस्तू गेले. त्यांच्यावर संगीत संस्कार तेंव्हाच झाले. त्यामुळे या काळात चित्रपट अजून रेंगाळला असता तर चालले असते. पुढे त्यांनी तरुणपणात फार हाल-अपेष्टा भोगल्यात. अक्षरशः कफल्लक अवस्था झाली होती. पण त्यांनी संगीताचा पदर सोडला नाहीं. पेटी घेऊन वण-वण भटकलेत. त्यांच्यातील प्रतिभा त्यांनी जपली. त्यामुळे जशी संधी मिळाली तशी त्यांची कला फोफावली. हा प्रवास फार तुटक दाखविला आहे. त्यांच्या वडिलांकडे पैसे असतांना, त्यांनी त्यांच्या मामांकडून पैसे का घेतला. पुढे मामांसोबत पैश्यांवरून गैरसमज झाला तर ते अचानक असे रस्त्यावर कसे आलेत. संघातील काही लोकांनी लुबाडले पण डॉ. हेडगेवारांनी स्वतः जातीने लक्ष घालून त्या लबाड लोकांना बाहेर केले आणि श्री फडक्यांचे पैसे परत केले. मग तरी पैश्यांची एवढी चणचण का? असे अनेक प्रश्न मला पडलेत आणि त्याची उत्तरे मिळाली नाहीत. (त्यांचा जीवश्च-कंठश्च मित्र बगिच्यात त्यांच्यासोबत बेंच वर झोपलेला, तो अचानक गायब काय होतो आणि मग थेट आर्मीत कसा दाखल होतो? थोडा अजब प्रकार वाटला.)
पटकथेला अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे चित्रपट श्री सुधीर फडक्यांच्या जीवनप्रवासावर आहे कि त्यांच्या संगीत जीवन प्रवासावर? दोन्ही गोष्टीत फार महत्वाचा फरक आहे. कारण वाढत्या वयात झालेले संगीत संस्कारांनी त्यांचे संगीत जीवनकाल सुरु झाला आणि पुढे आलेल्या असंख्य आव्हानांनी पण त्यांचे संगीत तावून-सुलाखून निघाले. पण हा संगीताचा प्रवास चित्रपटात दिसत नाहीं. गीत रामायणाच्या चाली त्यांनी काय ठरवून दिल्यात? त्यातील वाद्ये, सोबतचे गायक कसे निवडलेत? त्या सीन्स मध्ये अचानक माणिक वर्मा अवतरतात. आता एवढ्या प्रसिद्ध गायिका त्या एकदम गीत रामायणाच्या पहिल्या रेकॉर्डिंग ला कश्या उगवल्यात? श्री फडके व ग.दि.मा. यांची घनिष्ट मैत्री दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण या जोडीने दिलेल्या असंख्य सुरेख गाण्यांचा एक श्रोता म्हणून या दोघांनी बसून गाणी कशी बसवलीत हे बघायला आवडले असते.
श्री फडके यांच्या पत्नी त्यांच्या तारुण्यात प्रथितयश नटी आणि गायिका होत्या. लग्नानंतर त्या श्री फडके यांच्या आयुष्यातील जणू कणा होत्या. पण त्यांची भेट कशी झाली? त्यांनी का लग्न केले? चित्रपटात याबद्दल फक्त एकाच ओळ आहे. चित्रपटाच्या शेवटी सुद्धा श्री फडके यांनी संगीत देण्यातून संन्यास का घेतला? काही तरी विचार केला असणार. अश्या कितीतरी गोष्टी उलगडल्या नाहीत आणि कितीतरी पैलूंवर प्रकाश पडला नाहीं.
अभिनय - प्रमुख भूमिकेत सुनील बर्वे यांनी श्री फडके यांची भूमिका केली आहे तर मृण्मयी देशपांडे यांनी ललिताबाई फडके यांची भूमिका केली आहे. मृण्मयी देशपांडे या वयानी भूमिका करायला लहान आहेत. कारण प्रामुख्याने ललिताबाईंना ६०च्या घरात दाखविले आहे. पण मृण्मयी देशपांडे यांनी अभिनय उत्तम केला आहे. सुनील बर्वे हे उत्तम नट आहेत. आणि त्यांनी भूमिका वठवण्याचा प्रयत्न केला आहे. पण छोटीशी गोष्ट- श्री फडके यांच्या तरुणवयाची भूमिका करणाऱ्या नटाच्या हालचाली आणि लकबी आणि वयाच्या श्री फडके यांची भूमिका करणारे सुनील बर्वे यांच्या हालचाली आणि लकबी यात काही हि साम्य नाहीं. जणू आपण दोन संपूर्ण वेगळ्याच व्यक्तींना बघतो आहोत. यात सुनील बर्वे यांची चूक नाहीं. दिग्दर्शकाची आहे.
तरुण फडके यांची भूमिका आदिश वैद्य यांनी केली आहे. त्यांचा अभिनय आणि हालचाली स्लो-मोशन का होत्या मला कळले नाहीं. यात पुन्हा दिग्दर्शकाची चूक आहे म्हणू शकतो. अभिनय करायला पटकथा आणि संवाद पुरेसे नसतील तर हवेत हात-वारे करून नट त्या सीन मध्ये जीव ओतण्याचा प्रयत्न करतो.
श्री फडके हे स्वतः एक अतिप्रसिद्ध व्यक्तिमत्व होतेच पण त्यांच्या आयुष्यात त्यांनी त्यांच्या एवढ्याच किंव्हा त्यांच्याहून मोठ्या आणि प्रसिद्ध व्यक्तींसोबत कामे केलीत किंव्हा त्या थोर मोठ्यांच्या सानिध्यात वेळ घालविला होता. या चित्रपटात आपल्याला अशी अनेक पत्रे दिसतात. किशोर कुमार असो कि मोहम्मद रफी. डॉ हेडगेवार ते गुरुजी. आणि पंडित नेहरू ते अटल बिहारी वाजपाई. पण यातील कुठलेही पात्र नीट फुलले नाहीं असे मला जाणवले. मोहम्मद रफी ला एक मंगलाष्टकांची ओळ गातांना दाखविले आहे तर किशोर कुमारला अक्खा सीन आहे. प्रेक्षकांना आणि तसेच कलाकारांना कळत नव्हते कि नक्कल करायची कि नुसत्या पोशाखात कॅमेरा समोर उभे राहायचे. जसे आदरणीय श्री हेडगेवार यांचे व्यक्तिमत्व श्री पोंक्षे यांनाही उत्तम वठवलीय. पण त्याला भूमिका म्हणता येणार नाहीं. पुढे तर आदरणीय श्री गुरुजी गोळवलकरांच्या भूमिका करणाऱ्या कलाकाराला तर एकही संवाद नाहीं. श्री वाजपाई यांचे भाषण दाखविले आहे तर पु. ल. देशपांडे यांचा परिचय हि दिला गेलेला नाहीं. आशाताई भोसले यांना संवाद नाहीत पण स्क्रीन वर बऱ्याचवेळा आहेत तर लताबाईंना पाठमोरेंचं दाखविले आहे. माझ्या मते स्वातंत्रवीर सावरकरांना थोडी अधिक भूमिका द्यायला हवी होती. श्री फडके हे सावरकर भक्त होते आणि सावरकरांचा श्री फडके यांच्या व्यक्तिमत्वावर विलक्षण प्रभाव होता. ग.दि.मा यांची भूमिका छान वठवल्या गेली आहे. त्यांची आणि श्री फडके यांची मैत्री चांगली दाखविली आहे. पण पुन्हा काही तरी कमी वाटते. मला वाटतं श्री फडके यांची कारगिर्द बघता, "भाई' चित्रपटासारखाच, हा चित्रपट हि दोन भागात केला असता तर श्री फडके यांच्या आयुष्यातील महत्वाचे क्षण आणि त्यांच्या सोबत गाजलेली इतर व्यक्तिमत्वे अजून रंगवता आली असती.
चित्रपटाची वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे चित्रपटाचे सेट्स आणि वातावरण निर्मिती. यावर निर्मात्यांनी बराच खर्च केलेला आहे. मुख्यतः ३० किंव्हा ४० च्या दशकातील देश, समाज फार छान उभा केला आहे. घरे, पोशाख, लोकांच्या पगड्या, गाड्या, ट्रेन स्टेशन अशी विविध अंगे दिग्दर्शकाने कौशल्याने दाखविली आहेत. चित्रपटात जुनी गाणी कोणाकडून नवीन गाऊन घेण्यापेक्षा, मूळ गाणी तशीच ठेवली आहे. गाणी आणि गाण्यांची कथानकातील जागा चपखल बसली आहे. तशीच जुनी गाणी नवीन चित्रपटात ऐकतांना प्रेक्षक श्रोता होतो.
कुठल्याही थोर मनुष्याचे जीवनचित्रं पुस्तकात किंव्हा चित्रपटात रेखाटने फार कठीण काम आहे. त्या थोर माणसाचे किती आणि कुठले पैलू दर्शवायचे, कुठल्या घटना आणि व्यक्ती दाखवयाच्यात आणि कुठल्या घटना गाळायच्या? तो व्यक्ती होता तसा दाखवायचा कि भासला तसा दाखवायचा? त्या व्यक्तीचे अंतरंगावर चित्रपट केंद्रित करायचा कि त्याच्या कामगिरी आणि कारगीर्दीवर? बरं, या व्यक्तीबद्दल सगळी माहिती उपलब्ध असतेच असे नाहीं. आणि जी माहिती उपलब्ध असते ती विश्वसनीय असते असेहि नाहीं. एक उदाहरण घ्या - आचार्य अत्र्यांवर चित्रपट बनवायचा तर काय काय त्यात दाखवाल? त्यांचे स्वतःचे लेखन, कि त्यांचे राजकारणातील उठाठेवी? कि त्यांचे चित्रपट जगतातील पराक्रम? कि त्यांचे वृत्तपत्र आणि त्यातील लेखन? थोडक्यात हे प्रश्न सोपे नाहीं आणि साहजिकच आहे इंग्रजीत ज्याला 'बायोपिक (' Biopic ) असे म्हणतात तसा चित्रपट काढणे फार कठीण काम आहे.
मागल्या शतकात महाराष्ट्रात आणि मराठी समाजात एका पेक्षा एक दिग्गज व्यक्तिमत्वे होऊन गेलीत. लेखन, गायन, चित्रपट, अभिनय, राजनीती, तुम्ही म्हणाल त्या क्षेत्रात मराठी माणसाच्या ठसठशीत पाऊलखुणा आहेत. त्यातील एक म्हणजे श्री सुधीर फडके. त्यांच्यावर चित्रपट काढून त्यांची नव्याने ओळख नवीन पिढीला करण्याचे काम हा चित्रपट नक्कीच करतो. आणि त्यासाठी आपण चित्रपटाचे आभार मानायला हवेत.