2/6/23

बाजीप्रभूंच्या निमित्ताने अजून थोडे

महिना झाला पण पावनखिंडीच्या भेटीचा प्रभाव कमी झाला नाही. एक लेख हि लिहिला पण मनात अजून विचारांची गर्दी कायम आहे. मागल्या लेखाचा शेवट बाजीप्रभू आणि मावळे प्राण अर्पण करायला इतक्या सहज पणे पुढे कसे आलेत या प्रश्नाचे  उत्तर शोधण्यात झाला. पावनखिंड असो कि प्रतापगड, शाइस्तेखान मोहीम असो की आग्र्यातून पलायन असो, महाराजांना पदो-पदी हे नरवीर मिळालेत. आग्र्याला मदारी मेहेतरे महाराजांचे कडे घालून त्यांच्या जागी झोपला होता! केवढी हि जोखीम. 

महाराजांच्या उदया आधी हि लोक कुठे होती? कान्होजी जेधे किंव्हा बाजीप्रभू देशपांडे हे महाराजांहुन वयाने मोठे होते. त्यांनी महाराजांच्या आधी मराठ्यांची बादशहाची चाकरी बघितली होती. मराठ्यां मधील भाऊबंदकी बघितली होती. मुसलमानी सत्तांच्या दृष्टिकोनातून मराठी भाषिक व प्रदेशाला असलेले नगण्य स्थानाची कल्पना होती. मराठी समाजच नव्हे तर एकूणच हिंदू समाजाची झालेली दयनीय अवस्थेचे हे लढवय्ये भाग होते. विजयानगर हिंदू साम्राज्याच्या विध्वंसा नंतर धर्मान्ध मुसलमानांची अनभिषिक्त सत्ता होती. जयपूरचे राजपूत म्हणवणारे घराणे तर त्यांच्या घरातील बायका मोघलांना पुरवीत होते. मग अचानक सोळा वर्षाच्या मुलाने स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा चेतने वन्ही कसा पेटविला?  

हा प्रश्न औरंग्याला हि नेहमी पडत असे. शिवाजी महाराजांचा लढा, त्यांचे यश आणि त्यांना लाभलेली लोक बघून औरंग्या नेहमी चकित होत असे. त्याला नेहमी एक गहन प्रश्न पडे कि या हिंदू लोकात अचानक लढण्याची स्फूर्ती कुठून आली? हि लोक फितूर कशी होत नाहीत? त्याच्या मते हिंदू लोक फक्त मुसलमानाची चाकरी करायला आहेत आणि भारतात राज्य करण्याचा हक्क फक्त मुसलमानांना आहे. हि मानसिकता आपण आत्ताच्या पाकिस्तान मध्ये पण बघतो.  

रायगड लाच देऊन औरंग्या ने जिंकल्यावर असा म्हणतात कि त्याने रायगड जाळला. त्यात शिवाजी महाराजांच्या राजवटीची सगळी कागदपत्रे हि नष्ट झालीत. त्यांनी लिहिलेली पत्रे, त्यांना आलेली पत्रे तसेच इतर महत्वाची कागदपत्रे सगळे गेले. त्यामुळे महाराजांनी मावळ्यांना एकत्रित कसे केले याचा आपण फक्त अनुमान लाऊ शकतो. ते एक प्रभावी पुढारी होते यात काही शंका नाही. पण नुसते पुढारी होऊन भागात नाही. लोकांना आपल्या पाठी पुढे न्यायला पुढाऱ्याला त्याची दृष्टी सगळ्यांपर्यंत पोचवायला लागते. नवा विचार, त्या विचाराचा उद्देश्य, त्याची आवश्यकता, त्या विचारांची अनुयायांकडून अपेक्षा, त्याची ऐतिहासिकता, त्यातले बारकावे, त्यातल्या युक्त्या, अपेक्षित वर्तन, त्या संबंधित उद्योग, त्या विचाराचे भविष्य आणि मुख्य म्हणजे त्या विचारांची भविष्यात होणारी उत्क्रांती हे सगळे जनतेत हळू हळू रुजवायला लागते. महाराजांच्या स्वराज्याचे विचार, आचार व बांधणीत वरील सर्व घटक दिसून येतात. व मावळ्यांकडून त्याची कल्पना व स्वीकृती पण दिसते. अर्थात शिपाई गडी पासून ते सरनौबता पर्यंत किंव्हा शेतावरच्या गडी माणसापासून ते पंत-प्रतिनिधी पर्यंत सगळेच हिंदवी स्वराज्य किंव्हा हिंदुधर्म संरक्षण इत्यादी विषयांवर प्रगाढ विचार करीत होते असे नाही पण या विचाराचा नाद सगळ्यांनाच लागला होता. प्रत्येक घटक त्याला पुरेसा विचार करून स्वराज्य बांधणीत आपला वाटा अर्पण करीत होता. इथे भक्ती संप्रदायाचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. संत ज्ञानेश्वरां पासून ते संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास स्वामीं पर्यंत सगळ्यांनी वेग-वेगळ्या मार्गांनी, वेग-वेगळ्या प्रकारे संत समाजाने समाजात निष्काम कर्म सेवा, देवभक्ती, आणि राष्ट्र व धर्मा साठी प्राण अर्पण करण्याचे मनोबल बांधून ठेवले. मुसलमानी सत्तेचे ऐन मध्यरात्रीसुद्धा संतांनी समाजाच्या ऐक्य, जाती निर्मूलन, धर्म जागृती आणि गीतेचा मूळ संदेशाचा नंदादीप तेवत ठेवला. गावा-गावात होणारी प्रवचने, कीर्तने आणि पंढरीची वारी या ठोस स्तंभावंर मराठी समाज उभा राहिला आणि महारांच्या हाकेला धावून गेला. 

पण राज्याचा सकारात्मक अंग बनणे आणि मरणाच्या द्वारात सिद्दी ला ठणकावणे, यात बरेच अंतर आहे? 

शिवा काशीद सरदार घराण्याचे नव्हते, सुभेदार किंव्हा मोठे जमीनदार नव्हते. या प्रखर ज्वालेचा ना आगा-ना पीछा. स्वयंभू अग्निच जणू. वयाने फारसे मोठे हि नसणार कारण महाराज स्वतःच जेमतेम तिशीच्या होते. पण तरीही या साधारण घरातल्या, सामान्य शिवा काशीद ला एवढे धाडस झेपले कारण त्यांना हा लढा स्वतःचा वाटला. 

आधीच्या परिच्छेदातील विचार बांधणीचा पाय इत्यादी बाष्कळ बडबड बाजूला ठेवा. महाराजांच्या हाकेला साथ देत हजारो शिवा काशीद आलेत कारण त्यांचा ठाम विश्वास होता कि हे राज्य श्रींचे आहे. हे राज्य त्यांचे - शिवा काशीद चे आहे. मुसलमानी आक्रमक देशाच्या काना-कोपऱ्यात धर्मांध थयथयाट करीत आहेत. हिंदू असण्याचा जिझिया कर द्यावा लागतो आहे. आपल्या देशात आपलीच भाषा दुय्यम ठरतेय. आपल्याच चाली-रीतींची हेटाळणी होते आहे. हा लढा घरातल्या अंगणापासून ते देशाच्या सीमे पर्यंतचा आहे, घरातल्या देव्हाऱ्यापासून ते देवळातल्या गर्भगृहापर्यंत आहे. आणि हा लढा आपल्यालाच लढायला हवा. हा कानमंत्र महाराज हजारोपर्यंत पोचवू शकलेत. आपल्या कुटुंबासाठी प्रत्येक माणूस झगडणारच मग स्वराज्यालाच कुटुंब म्हणून बघण्याची विशाल दृष्टी महाराजांनी मावळ्यांना दिली. पण नुसत्या उंटावरून शेळ्या हाकल्यासारखे नव्हे. महाराज स्वतः लढ्यात दाणपट्टा घेऊन उभे होते. गरज पडली तर घर-दाराची आणि स्वतःच्या जीवाची तमा बाळगणार नाही याची प्रचिती महाराजांनी मावळ्यांना दिली. असे निमित्त आणि असा राजा हेच स्वराज्य स्थापनेचे गुपीत आहे. 

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा मोक्ष्यसे महीम्‌ । 

तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ (गीता, २.३७)

समाजाच्या सर्व स्तरातून व घटकातून आलेली हि साधी माणसे, परिस्थितीला स्थितप्रज्ञतेने सामोरी गेलीत. सूर्यजाळ झालीत. भक्ती आणि शक्तीचे सार कोळून प्यायलेली हे लोक जीवाची तमा ना बाळगता यज्ञकुंड रुपी झालीत. म्हणूनच महाराजांच्या अचानक निधना नंतर लढा चालूच राहिला. छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठी उभे राहून जमेल तितकी स्वराज्याची वात तेवत ठेवली. त्यांच्या औरंग्याने केलेल्या घृणास्पद हत्येनंतर मराठे अजून चेकाळले आणि छत्रपतींच्या या अवहेलना करणाऱ्या औरंग्याला शेवटी दक्खन मधेच दफनावले.

इंग्रजीत जशी म्हण आहे - अँड रेस्ट इस हिस्टरी..

पावनखिंड म्हणजे एक साधी भौगोलिक जागा पण या दगड-धोंड्यानी भरलेल्या तीन-चार की.मी. बोळीला अजरामरच नव्हे तर तब्बल साडे-तीनशे वर्षांनीही स्फूर्तिस्थान ठरेल असा पराक्रम महाराज आणि मावळ्यांनी केला. त्या संस्कृतीचा, इतिहासाचा, भाषेचा व धर्माचा वारसा मला प्राप्त झाले हे माझे अहोभाग्य.  

1/9/23

आम्ही सगळे बाजीप्रभू

नुकताच पावनखिंडीला जाण्याची संधी मिळाली. संधी मिळाली म्हणण्यापेक्षा पावनखिंडीला जाण्याचे भाग्य प्राप्त झाले. लहानपणा पासून गोष्ट तोंडपाठ आहे. पण नागपूरला हे घटना गोष्ट रुपी वाचणे आणि प्रत्यक्षात खिंडीत उभे रहाणे यात जमीन-आसमान चा फरक आहे. गोष्ट वाचतांना जे चित्र मनात उभे केले होते त्यापेक्षा खरी खिंड आणि आजू-बाजूचा प्रदेश फार वेगळा आहे. दुर्दम्य आहे, आणि चालायला आक्राळ-विक्राळ आहे. महाराज काय, बाजीप्रभू काय आणि मावळे काय, यांच्या बद्दल मनात नेहमीच जिव्हाळा आणि आदर होता पण खिंडीत उभे राहून त्या युद्धाचा विचार केला तर मन अवाक झाले. संग्रामाची भीषणता जाणवून स्तब्ध होतो. त्यांच्या पराक्रमाची उत्तुंगता जाणवते. 

आणि जर का महाराज पकडल्या गेले असते तर काय झाले असते? बहुधा आपण सगळे आज नमाज पढत असतो! 

बाजीप्रभू, फुलाजीप्रभू आणि त्यांचे ३०० बांदल मावळे इतक्या बिकट परिस्थितीला कशी मात करू शकलेत? कुठून एवढे बळ आले? काय डोक्यात वेड घेऊन त्यांनी हा पराक्रम गाजवला? कुठून एवढी कर्तव्य निष्ठता आली? खिंडीत उभे राहून या ऐतिहासिक घटनेचा विचार करता छाती अभिमानाने फुलली आणि तेवढीच स्वतःच्या सामान्यत्वाची जाणीव झाली. 

महाराजांनी निवडक सहाशे मावळे आणि बाजीप्रभु सोबत भर रात्री आणि धो धो पावसात पन्हाळा सोडला. गडाला सिद्दी जौहर ची अजगर मिठी होती. पण कोणालाही थांगपत्ता लागणार नाही याची सगळ्यांनी फार काळजी घेतली. ढाल-तलवारी बाळगत, महाराजांना पालखीत घेऊन हि वारी शक्यतोवर अलगद पणे वेढ्यातून निसटलीत. महाराजांच्या धाडसाची आणि नियोजनाची पराकोटी इथेच मानली पाहिजे. पुढे पावनखिंडीचे युद्ध झाले नसते आणि महाराज आणि मावळे सुखरूप विशाळगडाला पोचले असते तर वेढ्यातून सुटण्याच्या या धाडसाचे सुद्धा पोवाडे गायले गेले असते. पण तसे होणे नव्हते. हि फक्त पहिलीच पायरी होती. विशाळगड पन्हाळ्यापासून साधारण पन्नास किलोमीटर वर आहे. आजच्या भाषेत एक मॅरेथॉन आणि त्यावर ८-९ किमी. सध्याचा जो सरकारी रस्ता पन्हाळ्याहून विशाळगडा कडे आहे, तो नागमोडी रस्ता अजूनही ६० किमी चा आहे. थोडक्यात हे अंतर काही सोप नाही. अर्थातच महाराज आणि मावळ्यांना हे अंतर काही तासातच, लौकरात लौकर, आणि एका दमात जाणे आवश्यक होते. ते पण घनदाट जंगलातून, भर पावसात. इथे मी पावसाचा उल्लेख सारखा करतोय कारण हा प्रदेश कोकणाच्या सीमेवर आहे. अजुनहि इथे २०० इंचाच्या वर पाऊस पडतो. आणि अजुनही इथले अरण्य घनदाट आहे आणि सारख्या टेकड्या आणि कडे-कपार्या आहेत. साडे तीनशे वर्षां पूर्वी पाऊस नक्कीच जास्त असणार आणि अरण्य आत्ताहून किमान दुप्पट मोठे आणि घन असणार. पण तरीही चिकाटीची पराकाष्टा करीत महाराज व मावळे साधारण पस्तीस कि.मी. असलेल्या खिंडीत सकाळी बहुधा ८-९ वाजे पर्यंत पोचले असणार असणार. 

पण पन्हाळ्याहून निघतांनाच महाराजांनी एक युक्ती लढवली होती. महाराज ज्या दिशेने किंव्हा वाटेने गेलेत, त्याच्या विरुद्ध दिशेने अजून एक पालखी आणि काही मावळे गेलेत.  पालखीत महाराजां सारखा दिसणारा शिव काशीद बसला होता. जेंव्हा सिद्दीच्या सैनिकांना महाराज पळून गेल्याचे कळले तेंव्हा सिद्दीने त्याच्या सैनिकांच्या तुकड्या वेग -वेगळ्या दिशेंनी पाठवल्यात. त्यातल्या एका तुकडीला काही अंतरावरच शिवा काशीद रुपी महाराज सापडलेत. लगेच या 'महाराजांना' आणि त्या मावळ्यांना धरून सिद्दी समोर उभे केले. महाराज नेमके कसे दिसत असत याची कल्पना फारशी कोणाला नव्हती. पण सिद्दीच्या गोटात काही घरभेदी मराठे खूप आधीच सामील झाले होते. त्यातल्या काहींनी महाराजांना जवळून बघितले होते. त्यांनी शिव काशीद महाराज नव्हेत हे लगेच ओळखले. आता आख्यायिका अशी आहे कि सिद्दी चा संताप या भानगडीने अजून वाढला. त्याने शिव काशीद ला विचारले कि तुला मरणाची भीती वाटत नाही का? त्यावर शिवा काशीद यांनी छाती ठोकून सांगितले कि शिवाजी महाराजां साठी शंभर वेळा मरणे पत्करीन. हे ऐकून शिवा काशीद यांचा तिथल्या तिथेच शिरच्छेद केला गेला. हे शेवटले क्षण खरे असतील किंव्हा नसतील पण शिवा काशीद यांच्या मनस्थिती चा विचार करा. पकडल्या जाणार हे माहिती होते, किंबहुना पकडल्या जाणे आवश्यक होते. आणि पकडल्या गेल्यावर मृत्यू पण अटळ होता पण महाराजांना पळायला जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून आधी पाठलाग करण्यात आणि मग ओळख-पाळख होईपर्यंत महाराजांची भूमिका निभावत सिद्दीचा जास्तीत जास्त वेळ घालवावा हेच शिवा काशीद यांचे लक्ष्य होते. वाया घालवलेला प्रत्येक क्षण मोलाचा होता, महत्वाचा होता, आवश्यक होता. मृत्यूक्षणी शिवा काशीद यांना मुळीच कल्पना नव्हती कि हा घातलेला 'गोंधळ' पावणार का? महाराज विशाळगडी सुखरूप पोचणार का? आपले बलिदान फळास येणार का? 

तेजस्वी सम्मान खोजते नही गोत्र बतलाके|

पाते है जग से प्रशस्ती  अपना  कर्तब दिखलाके || 

                                           ० हिंदी कविश्रेष्ठ दिनकर  

कितीतरी प्रश्न मनातच ठेवून शिवा काशीद काळाच्या पडद्याआड झाले असले तर भारतीय इतिहास पटलावर एक घव -घवित आणि अजिंक्य ठसा उमटवून गेलेत. 

या दरम्यान सहाशे मावळे, बाजीप्रभू, फुलाजीप्रभू आणि खुद्द महाराज विशाळगडाचा रस्ता आक्रमत होते. डोंगर कपार्यातून, चिखलातून, गर्द जंगलातून, गच्च रानवेलींमधून शक्य त्या वेगाने वारी पुढे पुढे जात होती. ज्या कड्यांनी आज पर्यंत मावळ्यांचे रक्षण केले, ज्या सह्यांद्रीच्या कुशीत मावळे लहानाचे मोठे झालेत, ते कडे जणू आज सगळा हिशोब मागित होते. पण महत्वाची गोष्ट अशी कि सिद्दीच्या सापळ्यातून सुटण्याचा हा बेत फार विचारांती आखलेला होता. महाराज आणि मावळे 'वेडात दौडले वीर' नव्हते. काळ, वेळ, हवामान, परिसराचा भूगोल आणि स्थलाकृती याची पुरेपूर जाणीव ठेऊन हा बेत आखला होता. प्रत्येक क्षण मोजलेला होता आणि प्रत्येक पाऊल मापून टाकले होते. शेवट काय असेल याची कल्पना करणे कठीण असले तरी हा जोहार नव्हता. धैर्य आणि धाडसाचा भक्कम पायावर बांधलेली आणि उत्तम प्रतीची रिस्क मॅनेजमेण्ट केलेली एक योजना होती. 

शिवा कशीद यांनी भूमिका चोख बजावत सिद्दीचा बराच वेळ वाया घालविला होता. पण त्या नंतर मात्र सिद्दी पुन्हा चेकाळून महाराजांच्या मागे लागला. हजार घोडेस्वारांची काळी सावली विशाळगडाच्या दिशेनी सरसावू लागली. पावनखिंडी पासून साधारण ४-५ कि.मी वर पांढरपाणी खेड्या जवळ सिद्दी च्या एका तुकडीने महाराजांना गाठले. पहिली झडप या गावाजवळ उडाली अशी नोंद आहे. पण त्या झडपित महारांना आणि बाजीप्रभूंनी लक्षात आले असणार कि इथे झुंजण्यात अर्थ नाही. मावळे रात्रभर पायी ३० कि.मी. चालून आलेले असतांना ताज्या दमाच्या घोडेस्वारां समोर तग लागणे कठीण आहे. मावळ्यांनी तिथून पळता पाय घेतला. पण आता सिद्दी ला मावळ्यांचा पत्ता लागला होता. उजाडू पण लागले होते. त्यामुळे प्रश्न एवढाच होता कि अजून कुमक येऊन सिद्दीचे सैन्य किती वेळात मावळ्यांना गाठणार. नवीन धोरणाचा विचार करणे आले. पळता-पळताच ठरवले असणार कि खिंडीचा (तेंव्हा त्या खिंडीस घोडखिंड म्हणत असत) उपयोग ढालीसारखा करायचा. खिंडीत सैन्याची मोठी कुमक एकत्र येऊ शकत नाही, घोडे पण उतरू शकत नाहीं. म्हणजे काही वेळ तर सिद्दी च्या सैन्याला टक्कर देणे शक्य होईल. बेत असा कि बाजीप्रभू, फुलाजी प्रभू आणि ३०० बांदल मावळ्यांनी खिंड शक्य तितक्या वेळ रोखायची, सिद्धीच्या सैन्याला जणू डांबायचे. त्या वेळात उरलेल्या ३०० मावळ्यांना घेऊन महाराजांनी विशालगढ गाठायचा. तिथे पोचून महाराजांनी तोफा डागायच्या. तोफांचा आवाज ऐकताच बाजीप्रभू आणि मावळ्यांनी खिंडीतून बाहेर येऊन बाजूच्या जंगलात उड्या मारून पळून जायचे. 

मी जेंव्हा खिंडीत उतरलो तेंव्हा लोखंडाच्या शिडीने किमान तीस-चाळीस फूट उतराव लागले. महिना डिसेम्बर चा होता तरीहि  खिंडीत पाणी वाहते होते पण घोट्या पर्यंतच. खिंडीत मोठं मोठाले दगड आणि धोंडे आहेत. काही धोंडे तर चढून पुढे जावे लागत होते. काही दगडांना तर चक्क धार आहे. एवढ्या पावसात आणि वाहत्या पाण्यात अजूनही कशी धार आहे देव जाणे. थोडक्यात खिंडीत उड्या मारीतच आणि वर खाली करतच पुढे जाता येते. मी दोन-तीन वळणे घेत बराच पुढे गेलो. तर पुढे मोठं-मोठाली मुळे असलेली वृक्ष पण होती. एक सारखी नागमोडी वळणे घेत खिंड तीन चार कि.मी नंतर डोंगर माथ्यावर मोकळी होते. खिंड उतरून पुन्हा दहा-पंधरा कि.मी  घनदाट जंगल आणि माथा उतरून कोकणाच्या सीमेवर तुम्ही पोचता. थोडक्यात खिंड लढविणे तर दूरच राहिले, साधे पायी ओलांडून पुढे जाणे सुद्धा एक महत् कर्म आहे. सिद्दी च्या सैनिकांची 'स्वागता' च्या तयारीत च बरेचशे मावळे जखमी झाले असणार असे वाटते. बहुधा बाजीप्रभूंनी आणि महाराजांनी विचार केला असेल कि आपल्याला जरी कठीण जाणार असेल तरी मुसलमानी सिद्दीच्या सैनिकांना हि खिंड ओलांडणे आपल्याहून कठीण जाईल. लक्ष्य खिंड लढवून सिद्दी ला थोपवणे होते, त्यांना हरविणे नव्हते. महाराजांना विशाळगडी पोचायला वेळ मिळावा हा उद्देश होता मग पुढे सिद्दी चे काही का होईना. 

इथे सिद्दी बद्दल थोडे बोलणे आवश्यक आहे. हा मुसलमानी सरदार फार शूर आणि मुत्सद्दी होता. त्याने महाराजांचा आणि त्यांच्या युक्त्यांचा नीट अभ्यास केलेला होता. महाराजांना वाटले कि पाऊस सुरु होताच सिद्दी गाशा गुंडाळून आपल्या मार्गी लागले पण वेढा जसा लांबत गेला तशी सिद्दी ने पावसाची तयारी पण चोख केली. महाराज बोलणी करण्याच्या नावाखाली निसटतील याचीपण त्यांनी काळजी घेतली होती. कारण आम्ही उद्या किल्ला मोकळा करून शरण येणार असे सांगून महाराज आदल्या रात्री पळाले पण महाराज निसटले आहेत याचा गंध सिद्दी ला फार लौकरच लागला. त्याने लगेच सैन्य मागावर पाठवले. आणि शिवा काशीद च्या हुलकावणी नंतर सिद्दीने हेरले कि महाराज विशाळगडाकडे  जाणारा म्हणून त्याने त्वरित हजार घोडेस्वार त्या दिशेने पाठवलेत. आणि त्याही आधी, असे होण्याची शक्यता आहे हे समजून सिद्दी ने विशाळगडावर वेढा घालूनच ठेवला होता. पन्हाळा ते विशाळगडाच्या बुद्धिबळाच्या पटलावर सिद्दी ने महाराजांना चेकमेट केले होते. अर्थात बुद्धिबळाच्या पाटावर बाजीप्रभू नसतो, फुलाजीप्रभू नसतो, बांदल मावळे नसतात आणि पाटावर शिवाजी महाराजां सारखा राजा पण नसतो!  

थोडक्यात सिद्दी असो, अफझल असो, किंव्हा पुढे औरंग्या असो, महाराजांनी एक से एक धर्मांध पण शूर मुसलमानी योध्यांवर मात केली होती. 

महाराजांची रणनीतीतला मुत्सद्दीपणा त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक बिकट प्रसंगी लखलखतो. महाराज कधीही डोक्यात राख घालून लढले नाहीत. 'सर बचे तो पगडी पचास' हे जणू त्यांचे ब्रीदवाक्य होत. कमीत कमी जीवाची हानी होणे हे महत्वाचे. कमीत कमी जोखीम घेणे आणि तरीही रणनीती आणि राजकीय दोन्ही उद्देश्य साधणे हि त्यांच्या राजवटीचे जणू वैशिष्ट्य. महाराज नेहमी ठरवत कि कुठे, कधी आणि कसे लढायचे ते. शत्रू ला नेहमी विचारताच ठेवणे कि महाराजांची पुढली चाली कुठली. अफझल एवढे मोठे सैन्य घेऊन आला पण महाराजांच्या जमेच्या ठिकाणीच शेवटी महाराजांनी त्याला ठेचले. पन्हाळ्याच्या बिकट परिस्थितीत असूनही महाराजांनी बिथरलेल्या सैन्याला खिंडीमार्गेच आणले. अर्थात खिंड लढवणे सोपे नव्हे पण ती लढवली म्हणूनच आपण आज आपण बाजीप्रभू व बांदल मावळ्यांचे पोवाडे गातो. खिंड नेमकी कशी लढवली याचे फारसे ज्ञान नाही. धोंडे सोडलेत? दोरखंडांना लटकुन गनिमी काव्याने वार करीत राहिलेत? नेमके काय काय केले? पण जे का असेना, खिंड इंच-न-इंच लढवली. महाराजांना शेवटच्या पंधरा कि.मी ला सहा-सात तास लागलेत. विशाळगडाचा वेढा तुरळक होता. महाराज स्वतः दाणपट्टा घेऊन लढलेत. खालती धुमश्चक्री बघून गडावरचे मावळे दार उघडून मदतीला धावलेत. वेढा फोडून दार ओलांडून आत महाराज 'भांडी वाजवा, भांडी वाजवा' असे ओरडतच गडात गेलेत. 'भांडी' म्हणजे तोफा. भर पावसाळ्यात तोफा मेण घालून बंद करून आत झाकून ठेवलेल्या असत. त्या पुन्हा चालत्या करायला तास भर तरी लागला असेलच. बर, एक बार उडवून चालायचे नाहीत. एवढ्या पावसात पंधरा कि.मी दूर आवाज पोचायला हवा. म्हणजे आठ-दहा तोफा डागल्या गेल्या असणार. तोफांचा तो क्षीण आवाज कानी पडताच, उरलेल्या मावळ्यांनी जमेल तसा पळ काढला. तो पर्यंत बाजीप्रभू, फुलाजीप्रभू आणि जाणे किती मावळे वीरगतीस प्राप्त झाले होते. महाराज सुखरूप होते. बाजीप्रभू आणि बांदल मावळ्यांनी आपल्या जीवाच्या काष्ठा अर्पण करून स्वराजाच्या होमकुंड धगधगत ठेवला. 

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी| जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी|

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा| मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा |

- कविवर्य कुसुमाग्रज 

ते कसे काढलेत, काय युक्त्या केल्यात, किती जगलेत आणि किती मेलेत हा तपशील काळाच्या पडद्या आड झाला असला तरी ते का काढलेत याचा विचार केला तर आजही हे लोक स्फूर्तिस्थाने का आहेत हे कळते. स्वराज्य, स्वधर्म, स्वदेश, स्वाभिमान, स्वामीनिष्ठता, या शब्दांना अर्थ देणारी हे लोक आहेत. कर्तव्यनिष्ठ व कर्मनिष्ठतेचे हे प्रतीक आहे. आपला धर्म व देश लढण्याजोगा आहे आणि गरज पडेल तर मरण्याजोगा पण आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता.  

धर्मांध व क्रूर मुसलमानी शेकडो वर्ष होत असतांना आपल्या छातीचे गड -कोट करून आपल्या देव, देश वर धर्माचे रक्षणार्थ असंख्य व अनाम बाजीप्रभूंमुळे आणि महाराजांसारख्या युगपुरुषानंमुळे आज आपण सनातन धर्म आचरु शकतो. आशा करू या कि असे वीर भविष्यात निपजण्याचे सामर्थ्य आपल्या समाजात सदैव राहील. 

3/17/21

माझ्या बालपणीचे वन्यजीवन (शहर आवृत्ती!) - भाग २

आमच्या घराच्या फारश्या जुन्या होत्या त्यामुळे दोन फरश्यांच्या मध्ये कुठे-कुठे भेगा होत्या. त्यामुळे त्यातून मुंग्या आणि मुंगळ्यांची अखंड वर्दळ असे. सकाळी नीट झाडलं तरी संध्याकाळ पर्यंत जनता परत जैसे थे ! आमच्या घराच्या मधल्या अंगणात आम्ही क्रिकेट खेळत असू. अंगणाच्या एका बाजूला जिना आणि दुसर्या बाजूला धुण्याचा दगड, एका बाजूला दोन नळ व पायरी चढून न्हाणीघर तर दुसर्या बाजूला खोल्यांचे दरवाजे व जास्वंदीचे झाड. त्यात आम्हे अंडर-हॅन्ड स्पिन क्रिकेट खेळायचो. खूप मजा येत असे कारण चेंडू कुठे लागल्यावर आऊट याची गिनती, कुठल्या भिंतीवर चेंडू लागल्यावर धावा बनणार याहून अधिक होती. मी एकदा कोपऱ्यातला चौका अडवायला म्हणून फिल्डिंग करीत होतो. समोरून, जमिनीवर मुंग्याची ओळ जात होती. एक मोट्ठा मुंगळा पण त्या गर्दीत होता. मला तेंव्हा वाटत असे की मुंगळे कमी दिसतात त्यामुळे त्यांना मारायला नको. म्हणून विचार केला त्याला बोटावर चढू देऊन, त्याला अंगणाच्या कोपर्यात सोडावे. प्लॅन चा पहिला भाग सोपा होता आणि मुंगळा पटकन बोटावर चढला. मी त्याला कोपर्यात नेई तोवर त्या मुंगळ्याने नांगी सपाटून बोटाच्या टोकावर खुपसली. आई ग! काय चावतो मुंगळा, काय सांगु! पण त्या क्षणभरात मी धर्म संकटांत पडलो. झटकला हात तर तो मुंगळा मारणार, चिरडला तर नक्कीच मरणार आणि तसे झाले तर एवढा खटाटोप करायचाच कशाला? या दरम्यान इथे बोटाला झिणझीण्या यायला लागल्या होत्या. मी निष्ठेने त्या मुंगळ्याला कोपर्यात जमिनी लगत झटकून सोडले. मारले नाही. तो मुंगळा पण विचार करीत असेल की "मी आपल्या रस्त्याने जात होतो तर या ढकण्याने मध्ये चावायला त्याचे बोट का दिले?" असो.   होतकरू बावळट मुलांसाठी एवढाच उपदेश की मुंगळ्यांच्या वाटेला जाऊ नये! 

आमच्या घरी चिमण्यांचा खूप कलकलाट असे. घराच्या वेग-वेगळ्या भागात बऱ्याच पिढ्या मोठ्या झाल्यात. कौलारू घर होत आणि मध्ये अंगण होते त्यामुळे खूप खोबण्या मिळायच्यात घरटी बांधायला.  या सगळ्या चिमण्या कपडे वाळत घालायच्या दोरीवर दुपारी बसून खूप गोंधळ घालीत असत. मी खूप पकडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे चाप किव्हा जाळी वगैरे लावून नाही, लपून बसून त्यांच्या मागे अचानक धावून. खूप टाइम पास व्हायचा! अर्थात कधीच एकही चिमणी हाती लागली नाही पण उडायला शिकण्याच्या वेळी पिल्ल मात्र खूप उचलून परत घरट्यात ठेवलीत. एक वेगळा आनंद मिळत असे पिल्लू परत घरट्यात ठेवण्यात. एकदा हात लागलेलया पिल्लाला चिमणी परत घरट्यात घेत नाही वगैरे निव्वळ आख्यायिका आहेत. कवी कल्पना आहेत.  माझ्या सारख्या शंखाचा हात लागला म्हणून कुठली चिमणी आपल्या पिल्लाला टाकून देईल का? जशी चिवचिवाटाची सवय आपल्याला होते तशीच आपली पण सवय त्यांना होते. कपड्यांच्या दोरीवर दररोज मिटिंग भरत होती तर आमच्या घराच्या सगळ्यांचा वास त्यांना परिचित असणारच. असो. आपल्या सेल फोन च्या वेव्ह्स मुळे चिमण्यांची फार वाताहात झाली असे कुठेतरी वाचले. वैज्ञानिक सत्य यात किती माहिती नाही पण संख्या नक्कीच झपाट्याने कमी झाली.  आता ज्या बिल्डिंग मध्ये राहातो तिचे चिमण्या थोड्या बघून दिसतात. माझे लहानपणाचे घर सोडूनही खूप वर्ष झालीत पण ही त्या चिवचिवाटाची आठवण कानात कायम आहे. 

आता घर ही राहिले नाही. आई-बाबा शहराच्या वेगळ्या भागात राहायला गेलेत. ज्याने घर घेतले त्याने ते तसेच खूप वर्ष ठेवले होते पण नुकतेच ते घर ही पाडले. आजूबाजूचा परिसर फार बदलला. मागची गल्ली पण आधी सिमेंट ची झाली आणि मग लोकांनी घर वाढवून घ्यायची म्हणून गल्ली खाऊन टाकली.  तिथल्या मुंगुसाचं काय झाल असेल? कुठे गेली असतील? बोके आणि मांजरी? घराच्या सावलीत उभ्या राहण्याऱ्या गायी?  समोरचे मोठे मैदानात मेट्रोचे अगडबंब  खांब आलेत. वर्दळ ही फार वाढली. नाग नदी अजून छोटीशी होऊन गेली आणि म्हशी पण नाहीश्या झाल्यात आणि रॉकेलचा बैल पण. गल्लीच काय पण शहर सोडून दोन दशक व्हायला आलीत. लहानपणीचा परिसर आता फार लहान वाटतो. गल्ल्या अरुंद वाटतात. घर छोटी वाटतात.  काळाचा पडदा ओळखीच्या वास्तू व खुणावर झपाट्याने ओढल्या जातोय. त्या पडद्याखाली आठवणी सुद्धा आता हळू हळू अंधुक, धूसर होतील या विचाराने मन भ्रमित होते. पण त्याला काही इलाज नाही. काळाच्या काखोटीची आपण खेळणी, पुढे पुढे जात राहण्याशिवाय गत्यंतर नाही. 

माझे लहानपण या शहरातल्या प्राणीमात्रांने मात्र समृद्ध केले. हे मुके जीव त्यांच्या अजाणतेपणे आणि माझ्या नकळत माझे सवंगडी झालेत. या निखळ आनंदाचा धनी झालो हे काय कमी आहे? 

(समाप्त)

3/1/21

माझ्या बालपणीचे वन्यजीवन (शहर आवृत्ती!)

माझे लहानपण शहराच्या मध्यवर्ती भागात गेले. आमचे शहर म्हटंले तर शहर (किंव्हा  प्रमोद महाजनांच्या म्हणण्या प्रमाणे खुप मोठे खेडे!) पण गर्दी फार कमी होती. मी ज्या भागात रहात असे तो नीट आखलेला भाग होता. गल्ल्या आणि प्रत्येक घरा मागे एक 'मागची' गल्ली. त्याला आता 'सर्विस लेन' असे म्हणतात. आमच्या घरा मागची गल्ली कधीही पक्की केली नव्हती. गवत आणि झाडी वाढलेली ही गल्ली म्हणजे एक स्वतंत्र नैसर्गिक परिसंस्था होती. आमच्या गल्लीच्या टोकाशी एक भले थोरले (लहानपणी तरी खूप मोठे वाटत असे) मैदान होते. आणि त्या मैदानाला वळसा घालून नाग नदी (त्याचा नाला झाला होता). गल्लीच्या दुसऱ्या टोकाशी गोठा. आमचे घरही जुन्या पद्धतीचे होते. घरात मध्यवर्ती अंगण होते. त्यामुळे धाव-पळ करायाला खूप जागा होती.

तर अश्या या परिसरात माझे बालपणीचे वन्यजीवन सामावलेले होते. त्यात मांजरी , मुंगस , पोपट (आमचा पाळलेला) , मुंग्या (काळ्या आणि लाल), मुंगळे (काळेच), उंदीर, घुशी (घुशींचा अनुभव थोडा कमीच आहे), चिचुंद्र्या, चिमण-चिमण्या, कधी कधी भारद्वाज पक्षी, दुरूनच पण कोकिळा, म्हशी, गायी, बैल, सांड आणि रस्त्यावरची कुत्री (व त्यांची पिल्ले!) असली मंडळी होती. आणि मुख्य म्हणजे मलाही या सगळ्यांशी संवाद साधायला, खेळायला, चावून घ्यायाला (काळा मुंगळा जीवघेणा चावतो!) खूप रिकामा वेळ होता. 

आमच्या कडे एक पाळलेला पोपट होता. माझ्या जन्मा आधी, माझ्या थोरल्या भावाच्या ही आधी हे महाशय आमच्या कडे कुठून तरी उडून आले होते. त्याचे पंख नीट कापले नव्हते म्हणून तो उडू शकला पण घायाळ होता बिचारा. आमच्या आजोबांनी त्याला बादली खाली ठेवले आणि खायला दिले. आता बादली खाली तो कसा सुरक्षित होता देव जाणे कारण आमच्या घरी सामाजिक मांजरींची बरीच वर्दळ असे. पण देवच जाणत होता. कारण हा तोताराम आमच्या घरचा पुढली २१ वर्षे झाला. शुद्ध मराठी घरात हिंदी बोलणारा हा एकटाच होता. मधल्या अंगणात एका कोपर्यात त्याचा पिंजरा असे. तिथुन त्याला स्वयंपाक घर दिसत असे. आईच्या भाजीला फोडणी पडली कि 'माँ रोटी दो ' चालू व्हायचे. आधी ज्या घरात होता तिथून शिकून आला असावा. त्या व्यतिरिक्त त्याची बोलगाडी फारशी धाव घेत नसे. दादाला तो 'मीत' म्हणून हाक मारीत असे. मांजरींचा आवाज तंतोतंत काढीत आणि बाबा जोरात शिंकलेत की तसाच आवाज काढुन शिंकत असे. आणि मोजून तेवढ्याच शिंका देत असे.  आणि हो, सकाळी दूध-साखर पोळी, दुपारी वारण -पोळी, ४ वाजता कधी कधी चहा, रात्री परत वरण-पोळी असा तो जन्मभर जेवला. त्याच्यावर एक स्वतंत्र लेख लिहायला लागेल एवढ्या आठवणी आहेत. 

आमच्या घरा मागच्या गल्लीत खूप मुंगूस होती. पिढ्या ना पिढ्या त्यांच वास्तव्य होत. साप ही असावेत पण कधी दिसले नाहीत. मी गच्चीतून त्यांच्यावर मग्गा भर पाणी टाकीत असे. का? कारण मी एक वैज्ञानिक प्रयोग करीत होतो. खरंच! आई शप्पत! कुठला प्राणी किती पटकन पाण्याला प्रतिक्रिया देतो? खालती बसलेल्या  चिमण्यां वर पाणी टाकणे अशक्य आहे. क्षणार्धात त्या फुर्र. मुंगूस - एकावर पडलं की बाकीचे झपाट्याने बिळात गायब. मांजरीवर मी फक्त एकदाच यशस्वी झालोय. पक्षांसारखंच मांजरीला लगेच कळत. कुत्री सगळ्यात बावळट. पाणी अंगावर पडल की वर बघायची कोणी टाकल ते. आता वाटतं की बहुधा कुत्री भाषेत ती मला शिव्या गाळत असणार. गायी-म्हशी सगळ्यात लोड-लेस - पाणी अंगावर पडल की त्यांचा कातडं थर थरत पण बाकी ढिम्म त्यांना फरक पडत नाही.  जैसे थे, रवंथ चालू. उन्हाळ्यात मी हे उद्योग करीत असे. दुपारी ४ नंतर थोडा ऊन कमी झाल्यावर प्राणी मंडळी बाहेर येत आणि मी पण. 

घराजवळून नाग नदी वहात असे. त्यात डुंबायला म्हशी जात असत. एका म्हशींच्या टीम चा रस्ता आमच्या गल्लीतून जात असे. पावसाळ्यात नदीचे लहानसे पात्र ओलांडून पाणी  बाजूच्या  मैदानात पसरत असे. मग म्हशी तिथेच डुंबत बसत. मी ८-९ वर्षांचा असेंन. दररोज म्हशी घरा समोरून जात तर मी 'ह्या-च्याक-च्याक' करीत  धावित असे. बहुधा त्यांना  माझा बावळट पणा ओळखीचा झाला असेल. लहानपणी मी थोडा अधिकच धीट होतो. एकदा थोड्या ठेंगण्या म्हशीच्या पाठीवर बसायला मी उडी मारली.  पहिल्या खेपेत सहाजिकच मला जमलं नाही. म्हशींचा प्रवास मंद गतीने मैदानाच्या दिशेने चालूच होता. मग मी धावत-धावत त्यांच्या मागे लागलो. पाण्याच्या जवळ येईस तोवर मला नेमकं त्या म्हशीच्या पाठीवर बसता आल. पण नेमकी तेंव्हाच त्या म्हशीने पाण्यात डुबकी मारली. आता विचार करूनही मला घशात 'ब्याक' होत. ते नाल्याच घाण पाणी, शेणाने माखलेल्या म्हशी आणि त्यावर हाल्फ पॅन्ट मधला काडक्या मी! कसातरी मी त्या पाण्यातून बाहेर आलो आणि घरी पळालो. खरी गम्मत अर्थात, घरी आल्यावर झाली. दारात पाऊल ठेवल्या बरोब्बर, घरभर  'सुगंध' दरवळला! आईला मला मारायला  हात ही लाववेना. मी आंघोळ करून आल्यावर, आणि कपडे पाण्यात बुडवल्यावर मात्र आईने चांगलेच चोपले.  

पण हा पराक्रम पहिला नव्हता. रॉकेल ची बैलगाडी येत असे. मी त्या बैलगाडीवर बसून हिंडायचो. रॉकेलच्या डब्ब्यावर बसल्यावर रॉकेल ने आंघोळ केल्या सारख आहे. आणि मुख्य म्हणजे कितीही धुआ, कपड्यातून रॉकेल चा वास (आणि हळदीचा डाग) जात नाही. त्या बैलगाडीचा बैल प्रचंड होता. मला तो हात लावू देत असे. त्याच्या पोळ्याला हात लावायला मजा येत असे. 

(क्रमश:) 

1/26/21

मराठा साम्राज्याचा ऱ्हास - पार्श्वभूमी

 मराठा साम्राज्याचा इतिहास हा केवळ मराठी माणसाचा गौरव नव्हे तर गेल्या पाचशे वर्षाच्या भारतीय इतिहासाचा एक मानबिंदू मानावा लागेल. दक्षिणेतील विजयानगर साम्राज्याच्या मुसलमानी सुलतानांनी केलेल्या विध्वंसा नंतर भारतात हिंदू साम्राज्य तर सोडाच पण साधे राज्य ही परत उभे राहील असे कोणाला वाटले नसेल. पण अश्या कठीण परिस्थितीत छत्रपती शिवाजींनी स्वराज्याचे स्वप्न बघितले व मुख्य म्हणजे इतरांनाही दाखवले की हे केवळ स्वप्न नव्हे तर त्यास सत्यात उतरवणे शक्य आहे. हिंदू स्वराज्याचा पाय त्यांनी आधी हिंदूच्या ध्यानी-मनी पक्का केला. त्यामुळेच सन १६८९ च्या छत्रपती संभाजींच्या मृत्यू नंतरही राज्य टिकले आणि सन १७०७ नंतर झपाट्याने वाढले. 

पुढली शंभर वर्षे मराठी साम्राज्य फोफावले, कोमेजले, पुन्हा पुनरुज्जीवित झाले, आणि मग अचानक झपाट्याने कोलमडले. या शंभर वर्षात (सन १८१० पर्यंतचा काळ धरूया. यशवंतराव होळकर हे शेवटले मराठी धुरंधर म्हणायला हरकत नाही) पराजय म्हटला तर पानिपत चे तिसरे युद्ध सोडले तर हृदयी खंजीर लागला असा पराभव मराठ्यांच्या पदरी पडला नाही. आणि पानिपत ही हा अपमान अधिक, पराजय कमी होता. थोडक्यात शंभर वर्षे मराठी तलवारींचा खणखणाट भारतभर दुमदुमत होता आणि मराठी घोडी गंगा-यमुना ते कावेरी चे पाणी पीत होती. एवध्या मोठ्या भूभागावर ( २८ लाख चौरस किमी.) तलवारीने यश संपादन करणारी राज्ये, आपण जगाच्या पटलावर बघितलीत तर ती राज्ये बरीच वर्षे टिकलीत. तुर्की साम्राज्य साधारण १८ लाख चौरस किमी होते. आणि ते तब्बल ५०० वर्षे टिकले. त्यातील शेवटली दोनशे वर्ष तुर्की साम्राज्य बर्याच ठिकाणी नाममात्र होते पण अगदी १९२२ ला जेंव्हा इंग्रजांनी ते राज्य नामशेष केले, तेंव्हा त्या विरुद्ध गांधीजींनी सत्याग्रह केला होता. म्हणजे त्या साम्राज्याचे स्थान लोकांच्या मनात कायम होते. मुघल साम्राज्य ४ लाख चौरस किमी होते. सन १६१२ नंतर दिल्ली च्या आस पास चा भाग सोडला तर बाकी ठिकाणी मुघल नामशेष झाले होते पण अजूनही स्वतंत्र्य भारतात या मुसलमानी धर्मान्धाळांचा बर्याच लोकांना पुळका आहे. पण मराठा साम्राज्य केवढे होते याची कल्पना अगदी विदर्भात जाऊन विचारलेत तरी लोकांना नसेल. 

दोन प्रश्नांचा विचार इथे मी करू इच्छितो. एक, एवढे रण -धुरंधर साम्राज्य ज्यांना कारभार ही उत्तम येत असे , ते राज्य १० वर्षाच्या कालावधीत कसे कोलमडले? आणि दुसरे, लोकांच्या स्मृती-पटलातून ही हे राज्य कसे नामशेष झाले? 

दोन्ही प्रश्नांचे उत्तर एकच आहे. 

क्रमश: 

1/18/21

चित्रपट परिक्षण आणि निरीक्षण - सायकल

दोन महिन्याने पूर्वी सायकल मराठी चित्रपट बघण्याची संधी मिळाली. सन २०१८ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपटाचे  दिग्दर्शन श्री प्रकाश कुंटे यांनी केले आहे. अदिती मोघे याची कथा व पटकथा आहे. तर मुख्य भूमिकेत हृषीकेश जोशी, भालचंद्र कदम आणि प्रियदर्शन जाधव आहेत.  चित्रपट सुरेख आहे . जणू मनाला लागलेल आल्हाददायक वारे!   उत्तम दिगदर्शन, उत्तम अभिनय, उत्तम पात्रे, उत्तम कथा, उत्तम चित्रपट निर्मिती, आणि एक खराखुरा कौटुंबिक चित्रपट असलेल 'सायकल' ही जणू जाईच्या फुलांची माळच! 

कथा सरळसोट आहे. चित्रपटाच्या नायकाला - केशव ला  (हृषीकेश जोशी)  एक सुरेख सायकल त्याच्या आजोबांनी दिली असते. आपला नायक भविष्य सांगणारा असतो व्यवसायाने, त्याच्या आजोबां सारखा. म्हणून हा वारसाला हक्क. ती सायकल मूळ एका इंग्रजाची असते आणि त्याने आपल्या कथा नायकाच्या आजोबांना दिली असते.  केशव चे सायकलवर अतिशय प्रेम असते आणि केशव चे हे सायकल प्रेम पंचक्रोशात विख्यात असते. कर्म-धर्म संयोगाने  दोन भुरट्या चोरांच्या (भालचंद्र कदम आणि प्रियदर्शन जाधव) हाती ती सायकल लागते. बस, इथुन गोष्ट  सायकल च्या गतीने पुढे प्रवासाला लागते. गोष्ट नागमोडी वळण घेत नाही, तुम्ही रम्य कोकणात गाणं गुणगणत  सायकलवरून फेर-फटाक्याला निघालया सारखच ही गोष्ट प्रवास करते. गोष्टीच्या शेवटी सायकल परत आपल्या नायका कडे येणार ही प्रेक्षकांना माहिती असते पण  या साध्य चोरीने अनेकांची आयुष्ये बदलतात, अगदी सायकलीचे सुद्धा! 

सुरुवातीला म्हणाल्या प्रमाणे चित्रपटाची सृष्टी-निर्मिती उत्तम आहे. कॅमेरा संचालन, कॅमेराचा दृष्टीकोण, प्रत्येक शॉट ची प्रकाश मांडणी कोकणाच्या सुरेख भूभागाला बोलत करतो. कोकण जणू चित्रपटातील एक पात्र बनत. चित्रपटात पात्र कमी आहेत आणि अगदी  एका   हातावर मोजता येतील एवढ्याच पात्रांना प्रामुख्याने भूमिका आहेत. त्यामुळे मुख्य भूमिकेतील पात्रे छान रंगली आहेत. त्यांची व्यक्तिमत्वे आणि विचार बदलतांना प्रेक्षकांना जाणवतात. पण मुख्य भूमिका छान आहेत म्हणून सहायक पात्रे कमी पडली नाहीत. प्रत्येक कलाकाराने मिळालेल्या वेळात उत्तम भूमिका वठवली आहे. केशवची लहान मुलगी, बायको, त्याचे वडील,  गावातील सावकार या सगळ्यांचे गोष्टी ला पुढे नेणाऱ्या भूमिका एकूण चित्रपटात चपखल बसतात. चित्रपटाचा काळ सन ५० किंव्हा ६० च्या दशकातील दाखवला आहे. त्या काळाची वेशभूषा आणि राहणीमान  व्यवस्थित दाखवले आहे.  चित्रपटावर पैसे खर्च केला आहे हे जाणवते पण पैसे जिथे आवश्यक आहे तिथेच टाकलाय आणि जो टाकलाय तो उपयोगात आलेला आहे. कारण चित्रपटाचा जुना कालमान दाखवण्याच्या मागचे कारण जुन्या काळातील थोडा भाबडेपणा , थोडा मनस्वीपणा आणि तरी मुळात असलेला चांगुलपणा आणि त्या चांगुलपणाला वाव व प्रोत्साहन देणारा समाज हे कथेचे व चित्रपटाचे आधारस्तंभ आहेत. साधारणत:, कौटुंबिक चित्रपट बनवायचा तर त्याच्या मुळाशी कुठला तरी ठाम विचार व दृढ तत्वज्ञान हवे. नीट विचाराअंती बनवलेलया चित्रपटात हे तत्वज्ञान प्रेक्षकां पर्यंत बरोबर पोचते. या चित्रपटाची कथा सरळसोट असली तरी त्यामागे संदेश आहे. आणि हा संदेश अत्यंत कल्पकतेने दाखवण्यातच या चित्रपटाचे यश दडलेले आहे. 

हा चित्रपट म्हणजे बा. भ. बोरकर किंव्हा शांताबाई शेळके यांची कविता वाचल्या सारखी आहे. सुरवंटाचे फुलपाखरू होण्याची ही कथा मनाला हळुवार स्पर्श करून जाते. प्रत्येकाने अवश्य हा चित्रपट बघावा. 


1/10/21

चांदोबा

अचानक माझ्या हाती चांदोबा मासिक चे अंक ऑन लाईन लागलेत. आठवणींच्या गुहेत गेल्या सारखे वाटले. लहानपणी  आमच्या कडे किशोर आणि चांदोबा अशी दोन मासिके माझ्या साठी व माझ्या मोठ्या भावा साठी येत असत. किशोर हे मासिक महाराष्ट्र राज्य सरकार उपक्रम अंतर्गत प्रकाशित होत असे. आणि ते किशोर वयीन मुलांसाठी असे (नावा प्रमाणे!). मी दर महिन्यात चांदोबाची आतुरतेने वाट बघत असे. आणि एकदा का मासिक आले की कधी वाचून संपवेन असे होत असे. त्यातल्या गोष्टी, चित्रे , मालिका मला फार आवडत असे. आमच्या कडे सगळे अंक जमा करून बॅगेत भरून ठेवलेले होते. उन्हाळ्यात काहीच करायला नसायचे तेंव्हा मी जुने, धुळीने माखलेले अंक पुन्हा पुन्हा वाचत असे. खूप साऱ्या गोष्टी मला पाठ झाल्या होत्या. एवढं वाचून एक तर माझा मराठी चांगले झाले होते आणि दुसरा म्हणजे, न कळत माझ्या वर भारतीय नीतिमत्तेचे संस्कार झालेत व भारतीय इतिहासाचा परिचय, जो भारतीयांनी लिहिला आहे,  झाला. 

आता भारतीय नीतिमत्ता म्हणजे नेमके काय? तर चांदोबातील बहुतांश गोष्टी या इसापनीती, हितोपनिषद किंव्हा उपनिषद मधल्या किंव्हा त्या वर आधारित असत. पुराण, रामायण व महाभारतातील गोष्टी, खास करून कृष्णाच्या गोष्टी नियमित प्रकाशित होत असत.  गोष्टींद्वारे लहान मुलं-मुलींना चतुरपणा, हजरजवाबीपणा कसा व कुठे करावा, आणि  कुठे हजरजवाबी पणा करू नये, प्रामाणिकता, इत्यादि संस्कार तर होत असत. भारतीय समाज, नितीमत्ता व धर्माचे वैशिष्ट्य असे हे कधीच एकांगी, एकमार्गी नाही. उदाहरणार्थ, प्रामाणिकता जरी अंतिम सत्य मानिले तर त्यातील बारकावे शिकवायला हवे. परिस्थिती कशी आहे, त्यातून काय सिद्ध होईल, त्याचे काय परिणाम होतील. मी प्रामाणिक राहणार, आजूबाजूचे गेले खड्ड्यात असला एकांगी विचार केला की गांधी तयार होतो! आज काल हा बारकावा शिकविला जात नाही आणि लोकांनाही याचा विसर ही पडला आहे. पाश्चिमात्य विचारप्रणाली जी ख्रिस्ती धर्मावर आधारित आहे, आणि ज्यांची नीतिप्रणाली ही मनुष्य मूळ पापी च आहे आणि त्याला न्याय शेवटी येशू च देणार असल्या भ्रामक अंध विश्वासावर आधारित आहे, तशी विचार सरणी हळू हळू भारतात मानल्या जाते आहे. 

चांदोबाच्या ऐतिहासिक गोष्टी पण खूप असत. गोष्टी रूपात आणि कॉमिक्स  शैलीत ही गोष्टी असत. दक्षिण भारतातील बऱ्याच ऐतिहासिक पात्रांची ओळख मला चांदोबामुळेच झाली. पण त्याहून एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे की आपला इतिहास आपल्या लोकांनी लिहिलेला मला वाचायला मिळाला. पुरातन ते नवीन भारतीय इतिहास आपला नाहीच, त्या केवळ घटना आहेत ज्याच्या संबंध १९४७ साल नंतरच्या भारताशी नाहीच आणि हिंदू इतिहास तर घृणात्मक असल्याच्या  (पण गांधी नेहरूंचा इतिहास १९४७ च्या आधीचा असला तरी वाचायचाच!) काहीश्या विकृत आणि विभित्स मनोवृत्ती तून आपल्या शाळांमध्ये इतिहास शिकविल्या जातो. अश्या परिस्थितीत चांदोबा मुळे मला इतिहास व पुराणांची ओळखच नव्हे तर आवड व आपुलकी निर्माण झाली. आणि ही आवड आजगयत आहे. 

मला वाटत की चांदोबाचे प्रकाशन बंद झाले आहे. स्वभाषेत वाचणारे आणि लिहिणारे, दोन्ही कमी झालेत. मातृभाषेचा व स्व भाषेचा गळा मोठया अभिमानाने हळू हळू घोटून हत्या करणार भारतीय समाज हा जगातला एकमेव च असावा. आणि चांदोबाचे वाचन वर्ग कमी होत गेल्यामुळे बंद पडलेले प्रकाशन हे भारतीय भाषा, इतिहास, विचारधारेचा जणू अंतिम टप्पा आहे. भविष्य आता इंग्रजीत बोलून पाश्चिमात्य देश, संस्कृतीची नक्कला करणारा देश भारत होणार आहे.