3/21/26

इंग्रज - एक नार्को स्टेट, अँग्लो-मराठे युद्ध आणि मराठा साम्राज्याचे शेवटचे उपकार



(अफू चे बिहार मधील गोदाम - ब्रिटिश काळातच काढलेले एक चित्र. Source

(नेहमीप्रमाणे विषय हाताबाहेर गेला आणि लेख खूप लांब झाला. पण कृपया अवश्य वाचावा, टप्प्या-टप्प्यात वाचावा हि विनंती. सध्याच्या जगात जेथे १२८ शब्द वाचायला लोकांना जीवावर येत, तिथे मी १८०० शब्दाचा लेख लिहितो आहे. माझं डोकं तपासायला हवे!) 

पार्श्वभूमी:

मराठी साम्राज्याचा सन १૭५० नंतरचा काळ धामधुमीचा होता. तसे म्हंटले तर थोरल्या बाजीरावांच्या काळापासूनच मराठी साम्राज्याची धामधूम चालू झाली पण सन १૭५० नंतर स्थित्यंतरे खूप झालीत. नानासाहेबांच्या उत्तरेतील राजकारणाला रंग येतच होता तर पानिपतचे युद्ध झाले. मराठी राज्य अस्तास गेले अशी समजून पानिपत नंतर झाली असेल तर माधवरावांनी पूर्ण कसर भरून काढली आणि खऱ्या अर्थाने मराठी साम्राज्याचा सुवर्णकाळ 1760 च्या दशकात आला. पण मग माधवराव तरुण वयात गेलेत मग राघोबादादांच्या भानगडी, मग नाना फडणवीस इत्यादी अनेक घटना एका पाठोपाठ होत गेल्या. या दरम्यान उत्तरेत महादजी शिंदे आणि होळकरांनी घट्ट पाय रोवून मराठी राज्य बळवंत आणि स्थिर केले. पण आता शत्रूचे रूप बदलत होते. मुसलमानी सत्ता नामोहरम झाल्या होत्या. आणि पश्चिमेतून युरोपीय देशांची जहाजे  घिरट्या मारू लागली होती आणि त्यातीलच इंग्रजांनी चांगलेच पाय रोवले होते. नागपूरच्या रघुजीराजे भोसल्यांनी अगदी कलकत्त्याच्या सीमे पर्यंत धडक जरी मारली असली तरी दूरदृष्टीच्या अभावी आणि काही चुकीच्या धोरणांमुळे  एक तर ओडिसा आणि बंगाल मध्ये मराठयांना पाय रोवता नाहीं आलेत आणि मराठ्यांनी घातलेल्या गोंधळामुळे इंग्रजांचा खूप फायदा झाला. तिथले मुघली राज्य मराठ्यांमुळे आपसूकच खिळखिळे झाले आणि बंगाल आणि बिहारचा सुपीक भाग इंग्रजांना गिळता आला. 

या काळाचा जर का इतिहास आपण सध्याच्या पुस्तकांमधून वाचायला गेलो तर दोन गोष्टी मांडल्या जातात : १) मुघली साम्राज्य लयाला जाऊन इंग्रजांनी भारत जिंकला. यात मराठ्यांचा फारसा उल्लेख केल्याचं जात नाहीं. जणू मराठे मधल्या शंभर वर्षात गिल्ली-दांडू खेळात होते! २) इंग्रज इतके बलाढ्य होते कि त्यांनी भारत जिंकणे अगदी  सहाजिकच  होते . भारत अगदी गलितगात्र झाला होता. किंबहुना भारत हि संकल्पनाच कधी नव्हती आणि इंग्रजांनी हा उपखंडीय भाग जिंकून उपकार केले आणि भारत जन्माला घातला. याहून पुढे जाऊन इंग्रज-फ्रांस मधील सेवन इयर्स वॉर (Seven Years War)  म्हणून प्रसिद्ध असलेल्या संघर्षात ( सन १૭५६ ते १૭६३) इंग्रज जिंकल्यावरच त्यांचे संपूर्ण भारतावर राज्य स्थापित झाले. 

या दोन्ही गोष्टी ऐतिहासिक दृष्ट्या आणि पुरावे बघता खऱ्या नाहीत. इतिहास कधीच सरळ रेघत जात नाहीं आणि इतिहास नेहमीच रंगेबिरंगी असतो -  एकदम इस्टमन कलर! 

विषय प्रवेश:

मागे मी भारतात अगदी सन १८०३ पर्यंत मराठे कसे बलाढ्य होते आणि अगदी बंगाल, बिहार आणि पूर्वी उत्तर प्रदेश (सध्याचे) इंग्रजांकडे असले तर ते भारतावर राज्य करतील असे कुठलेही संकेत सन १८०० पर्यंत नव्हते या विषयावर दोन-तीन लेख लिहिले होते. त्या श्रुंखलेतील हा पुढला लेख समजावा. या लेखात आपण इंग्रज आणि त्यांनी मांडलेल्या अफूच्या व्यापाराबद्दल थोडी माहिती घेऊ. त्यान्वये इंग्रज-मराठा युद्धात मराठे कसे बलाढ्य होते याची दखल घेऊ. आणि शेवटी, जरी मराठा साम्राज्याचा १८१० पर्यंत अस्त झाला तरी अफूच्या व्यापाराने जशी बिहार, बंगाल आणि पूर्वांचल भागाची दयनीय अवस्था केली तशी अवस्था मराठा साम्राज्याच्या भूमीची का झाली नाहीं हे जाणून घेऊ.  

इंग्रज - एक नार्को-स्टेट (Narco State): 

सन १૭६० नंतर दोन गोष्टी इंग्रजांच्या बाजूने होत्या १) त्यांची वेस्ट इंडिज मधील कॉलनी फार लाभकारक ठरत होती. मुख्यत्वे त्यांचा आफ्रिकेतून लोकांना पकडून गुलामगिरीत विकण्याचा धंदा चांगलाच जोरात चालू होता. २) गुलामगिरीच्या व्यतिरिक्त त्यांनी अफू चा धंदा चालू केला होता आणि त्यात बंगाल-बिहार मध्ये त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. तिथून अफू उगवून ते पुढे चीन मध्ये प्रचंड नफ्यात विकत होते.  थोडक्यात इंग्रजांकडे प्रचंड प्रमाणावर पैसे येत होते. आणि असे असूनही मराठे त्यांना भारी पडत होते. 

(Indian Express: Opium: The drug that gave colonialism a real high)

सध्या श्री अमितव घोष यांचे स्मोक अँड आशेस (Smoke and Ashes) हे पुस्तक वाचनात आले. पुस्तक म्हणजे इंग्रजांनी सन १૭૭० ते सन १८५० च्या काळात    मांडिलेल्या अफूच्या व्यापाराबद्दलचा लेखाजोखा आहे. इंग्रजांनी हा व्यापार का सुरु केला, आणि मग तो कसा वाढविला आणि तो जपायला काय काय अत्याचार त्यांनी भारत, दक्षिण-पूर्व आशिया आणि चीन वर केलेत हे या पुस्तकात सोप्या भाषेत दर्शविले आहे. इथे व्यापार हा शब्द जरी वापरीत असलो तरी हा केवळ व्यापार नव्हता. सध्याच्या दक्षिण अमेरिकेतील काही देशांना, जिथे कोकेन नावाच्या अवैध उत्तेजक ड्रग चे उत्पादन होते, 'नार्को-स्टेट ' असे म्हंटल्या जाते. म्हणजे या देशात या अवैध ड्रग (Narcotics)  चे उत्पादन आणि तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे (Gangs) इतके वर्चस्व आहे कि या देशांचे अस्तित्व धोक्यात आहे. इंग्लड हे जगातील पहिले नार्को स्टेट म्हणायला हवे. कारण स्लेव ट्रेडिंग आणि अफूवर इंग्लंड साम्राज्य झाले. तेंव्हाचे इंग्लंड आणि आत्ताच्या नार्को स्टेट मधील फरक असा कि सध्याच्या नार्को स्टेट मध्ये फक्त गँग्स श्रीमंत होतात पण देशाचा सत्यानाश होतो. इंग्रजांनी 'सत्यानाश' हा भाग आऊट-सोर्स केला होता - भारताला आणि चीन ला!  आपल्या देशाचे वाटोळे झाले  पण इंग्लंड गर्भश्रीमंत झाले. थोडक्यात इंग्रजाकडे १७व्या शतकाच्या शेवटी-शेवटी अफाट पैसे होते. त्यामुळे त्यांनी बंगाल-बिहार जिंकल्यावर उर्वरित भारताकडे नजर रोखली. आणि आता त्यांच्या भारत पादाक्रांत करण्याच्या मार्गात फक्त मराठे उरले होते. 

अँग्लो-मराठे युद्धे:

सन १८०३ मराठा आणि इंग्रजांमध्ये आसइ (सध्याचा जालना जिल्हा) येथे  घनघोर युद्ध झाले. यात इंग्रजांचे जगप्रसिद्ध सेनानी आर्थर वेल्सली इंग्रजांचे सेनापती होते तर विरोधात मराठा शिंदे, नागपूरचे भोसले आणि होळकर होते.  या युद्धाबद्दल वेल्सली चे सैनिक काय म्हणतात बघा: 

"The military historianRandolf Cooper writes:

The memoirs of the British officers who witnessed the Maratha Artillery in action leave no doubt about its level of sophistication. At the time of the Second Maratha War (1803), France was considered to have the finest artillery in the world. When British officers saw the volume of fire produced by the Maratha gruns, some asserted incorrectly that they were manned by Frenchmen but all agreed the effect was devastating. Another false assumption was that Frenchmen were responsible for the production of artillery and its accoutrements in India, when in fact the French mere provided the most modern example to be copied" (P 102) 

पुढे जायच्या आधी महत्वाची ऐतिहासिक गोष्ट म्हणजे - आर्थर वेल्सली ने १૭९९ ला टिपू ला मैसूर च्या युद्धात मारले. मग त्याची बदली पुन्हा इंग्लंड मध्ये झाली. तिथून पुढे त्यांनी सन  १८१५ ला नेपोलियन चा पराभव वॉटरलू च्या युद्धात केला. दोन खंडामध्ये तेथील साम्राज्ये एकाच माणसाने युद्धात पराभवीत करण्याचे हे दुसऱ्या महायुद्धापर्यंत तरी एकच उदाहरण असेल. असो. 

(Wikipedia

या अँग्लो-मराठा युद्धांमध्ये पुढले युद्ध दिल्ली जवळ जनरल लेक याने दौलतराव शिंदे यांच्या विरुद्ध केले. यातही मराठ्यांचा पराभव झाला. पण जनरल लेक ने या युद्धाबद्दल काय म्हंटले आहे ते वाचा: 

"In a letter to the Governor General, Lake, who lost his son on the battlefield, wrote:

These (Maratha) battalions are the most uncommonly well appointed, have a most numerous artillery, as well served as they possibly can be, the gunners standing to their guns until killed by the bayonet. All the sepoys of the enemy behaved exceedingly well...i never was in so severe a business in my life and pray God I never may be in such a situation again. Their army is better appointed than ours; no expense is spared whatever, and they have three times the number of men to a gun we have...These fellows fought like devils, or rather heroes...I verily believe, from the position they had taken, we migh have failed.

हा जनरल लेक सुद्धा वेल्सली सारखाच शूर होता. त्याने आयर्लंड मध्ये इंग्रजांकडून फार मोठा पराक्रम गाजविला होता आणि म्हणून त्याला पुढे भारतात पाठविले होते. थोडक्यात इंग्रजांच्या अतिप्रसिद्ध आणि शूर सेनापतींना मराठ्यांनी पाणी पाजलेच होते.


  (Wikipedia)

लेख पुढे नेण्याआधी एक नमूद करावेसे वाटते. एक म्हणजे इंग्रज अफूच्या आणि स्लेव्ह ट्रेडिंग मध्ये पैसे कमावून बलाढ्य होत होते. त्यामुळे या युद्धांमध्ये जरी मराठे जिंकले असते तरी इंग्रजांनी माघार घेतली नसती आणि ते येन-तेन-कारणेन हल्ले करीतच राहिले असते. दुसरे म्हणजे मराठ्यांमध्ये फूट पडत होती. पेशवाई नाममात्र उरली  होती. मूळ पेशवाऱ्यांशी रक्ताने  किंव्हा शौर्याने १८०३ च्या पैश्यांचा काहीच संबंध उरला नव्हता. त्यामुळे हिंदवी साम्राज्याची भारताला व्याप्त करणारी दृष्टी नामशेष होत होती. शिंदे -होळकर कधी एकत्र लढले तर कधी मूग गिळून गप्प बसून दुसऱ्याचा नाश बघितला. नागपूर भोसले कधी एकत्र आले आणि नाहीं तर इंग्रजांशी करार करून गप्प बसले. वेल्सली तर पेशव्यांकडून लढत होता! आता काय म्हणचे? जो घडला तो इतिहास पण त्यांचे पडसाद आणि प्रतिसाद दूर पर्यंत ऐकू येत गेलेत. मराठा साम्राज्य नाहीसे झाले तरी दिल्ली, माळवा - मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राचे त्यांनी जाता - जाता भलेच केले. ते कसे पुढे बघूया. 


(The Opium Wars in China)

ईस्ट Vs. वेस्ट: 

भारतात अफूचे उत्पादन इंग्रजांनी का सुरु केले हा एक स्वतंत्र विषय आणि लेख आहे. पण थोडक्यात, इंग्रज भारतातील अफू चीन ला विकून तेथील गोष्टी इंग्लंड किंव्हा इतर जगात विकत. हळू हळू, भारतातील अफूचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढवून इंग्रजांनी अफूचा जणू पूर  चीन मध्ये आणला आणि चीन च्या अनेक पिढ्यांचे भविष्य उध्वस्त केले. बर, भारतात जी लागवड झाली त्याचा फायदा भारतीय शेतकऱ्यांना झाला का? अर्थातच नाहीं. इंग्रजांनी भारतीय शेतकऱ्यांना - मुख्यत्वे सध्याच्या बंगाल, बिहार आणि पूर्वांचल (पूर्वी उत्तर-प्रदेश) भागातील शेतकऱ्यांना त्यांनी घाणीला लावून जणू पिळून घेतले. अफुचीच लागवड करायची, ती अफ़ू इंग्रजांना ठरलेल्या भावातच विकायची, नुकसान झालं तरी इंग्रजांना नुकसान भरपाई करून द्यायची. 

"The farmers' contracts stipulated that they were to transport their harvest, in its entirety and at their own cost, to an official collection center, where, after weighing and quality control, they were, in principal, meant to be paid the price set by the Opium Department. This rate remained stagnant at Rs. 3.50 for a seer (a little more than a kilogram) of raw opium through much of the earlynineteenth centruy and rose only slightly thereafter. So low was the rate that it did not even cover the farmers' expenses." (P 57, Smoke and Ashes) 

प्रत्येक गावात एक अधिकारी, एक गोदाम आणि अत्यंत क्रूर पोलीस वर्ग उभा करून इंग्रजांनी या भागातील लोकांना जर्जर करून ठेवले. १૭९० ला बंगाल मध्ये दुष्काळ आला आणि त्यात दश - लाखात लोक अन्नावाचून हाल-हाल होऊन मेलीत पण इंग्रजांनी उलटा कर वाढवला. जमिनीचा कस निघून गेला, इतर कुठलीही पिके, हवी असली तरी उगवेनाशी झालीत. पण इंग्रज अधिकाऱ्यांच्या  अफूच्या उत्पादनाची मागणी वाढतच गेली. 

अफूचा व्यापार फक्त इंग्रजांपुरतीच सीमित होता. फार म्हणजे फार कमी भारतीयांना (बंगाल, बिहार मधील) या व्यापारात भाग घेता आला. एक मोठे उदाहरण म्हणजे श्री रबिन्द्रनाथ टागोर (ठाकूर) यांच्या पूर्वजांनी यात प्रचंड पैसे कमविला. पण असल्या दुर्मिळ उदाहरणाव्यतिरिक्त अफू ने फक्त इंग्रज व्यापारी धनाढ्य झाले. कलकत्त्याच्या बंदरातून चीन ला जाणारी जहाजे सुद्धा इंग्रजांचीच होती. थोडक्यात शेतकरी होरपळले आणि व्यापारी बुडाले, राहिले मागे काहीच नाहीं. आजही बघाल तर भारतातील सगळ्यात मागासलेला आणि गरीब भूभाग पूर्वांचल, बिहार आणि बंगाल आहे. गंगेच्या काठी वसलेली हि राज्य अजूनही इंग्रजी लुटीचे व्रण अजूनही घेऊन हिंडतायत. 

या अफूच्या उत्पादनाचे दोन भौगोलिक विभाग झाले.  १૭૭० साली इंग्रजांच्या हातात गेलेले बंगाल आणि बिहार आणि अगदी १८१८ पर्यंत हातात ना आलेला माळवा, गुजरात, महाराष्ट्र - जो प्रामुख्याने मराठ्यांकडे होता. अगदी १८१८ च्या पेशवाईच्या अस्तानंतरही हा भाग पूर्ण इंग्रजी बुटाखाली नव्हता. आणि मराठी राज्यकर्त्यांनी या भागावर उत्तम राज्यकारभार असल्यामुळे या भागातील व्यापार, व्यापारीमार्ग, सावकारी दळण-वळण इत्यादी सुरळीत आणि लागलेले होते. या भागातील व्यापारांना पूर्वेला चाललेल्या अफू व्यापाराचा गंध लागला होता. पण इंग्रजांनी या भागातून अफूचा व्यापार करायला बंदी आणली होती. अर्थात, हि बंदी कशी अंमलात आणणार? माळव्यातील शेतकऱ्यांनी ताबडतोब अफू ची लागवड सुरु केली. पण हि लागवड स्वनिर्णयाने  केली. त्यामुळे पीक बदलणे किंव्हा लागवडीत कमी-जास्त करणे, जो किंमत जास्त देईल त्यालाच विकणे आणि नाहीं विकल्या गेला तर स्वतःच्या गोदामात साठवून ठेवणे इत्यादी स्वातंत्र्य माळवा, गुजरात मध्य प्रदेश भागातील शेतकऱ्यांना आणि व्यापारांना होते. 


या भागातील राजे, इंग्रजी सत्तेचे अंकित असले तरी, स्वतंत्रपणे ते व्यापार करू शकत होते, त्यांनी अफू व्यापारात पैसे घातला. मुंबईहून हि अफू चीन मध्ये जायला लागली. आणि मुंबईत निर्यातीच्या व्यापारात पारशी आणि गुजराती/मारवाडी व्यापाऱ्यांनी अगदी घट्ट जम बसविला. सुरुवातीला इंग्रजांनी याला आळा घालायलाच प्रयत्न केला पण काही वर्षांनी इंग्रज स्वतःच मुंबईहून होणाऱ्या व्यापारात शामिल झाले. पूर्व भारतातील अफू व्यापार आणि पश्चिम भारतातील अफू व्यापारातील महत्वाचा आणि निर्णायक फरक असा कि पश्चिमेतील उतपादन आणि व्यापारातील पैसे समाजातील विविध गटात आणि स्तरापर्यंत पोचत होता. आणि आजही  महाराष्ट्र, गुजरात, माळवा भाग इतर उत्तर भारताच्या तुलनेत संपन्नच आहे. मराठे, मराठा साम्राज्य आणि मराठा घराणी कधीच अफूच्या व्यापारात नव्हती. अफूचा व्यापार इंग्रजांनी सुरु केला आणि ते पाप त्यांच्या माथीच  पण मराठ्यांचा प्रतिकार, त्यामुळे इंग्रजांनी पश्चिम भारतात जनतेला आणि व्यापारांना दिलेली सूट आणि त्यामुळे पुढे व्यापारात तरी मिळालेले स्वातंत्र्य या शृखंलेमुळे पश्चिम भारत इंग्रज निदान सुरुवातीला तरी पूर्व भारतासारखा ओरबाडून लुटू शकले नाहीं आणि  मराठा साम्राज्याची शेवटची भेट मानायला हवी. 

"But the real reason to be learnt from the commercial world of western India is that political and military support have always been crucial to the flourishing of business and enterprise in the modern era. If private enterprise was able to thrive in wester India, but not in the east, it was ultimately because the Maratha kingdoms were able to fight off the predatory colonial power for much longer than the states of theGangetic plain. The credit for western India's entrepreneurial prowess is ultimately due not only to the financial acumen of its businessmen but also to the foresight and acuity of the political and military leadership of the Maratha states." (P 115, Smoke and Ashes) 

शेवटचा धडा: 

इतिहास वाचन माझी आवड आहे. कारण इतिहासात वर्तमानातील व्रण समजतात आणि भविष्याचे खुळखुळे ऐकू येतात. इंग्रजांची एक 'भेट' म्हणजे त्यांनी आपल्याला मिंधे केलं. आपल्याला आपलीच लाज वाटू लागली, आपल्या इतिहासालाच आपण धुडकारून दिलेआणि आपल्या ऐतिहासिक पराक्रमांना आपण विसरलो. हे सगळे इंग्रजांच्या आणि सध्याच्या पश्चिमी देशांच्या पथ्यावर पडणारे आहे. स्वत्व विसरलो, स्वाभिमान हरवलो आणि आरश्यात ओळखूनासे झालो कि आपण सशक्त आणि एकात्म कधीच होणार नाहीं. आणि असे झाले कि संघर्ष कधी करणार नाहीं. मराठे शेवटी शेवटी एकजूट राहिले नाहीत, त्यांची जाणकार पिढी अचानक, थोड्या कालावधीतच वर गेली. (अहिल्याबाई, महादजी शिंदे आणि नानासाहेब फडणवीस). शेवटच्या दशकांमध्ये मराठ्यांनी असंख्य चुका केल्यात, पेशव्यांनी इंग्रजांची कास धरली, यशवंतराव होळकरांना पाठिंबा दिला असता, आणि त्यांच्या मागे सगळे उभे राहिले असते तर भारत कधीच इंग्रजांना मिळाला नसता. पण असे असूनही, मराठे शेवटपर्यंत लढलेत. संघर्ष अविरत चालू ठेवला. आणि जरी शेवटी मराठे हरले तरी त्यांच्या संघर्षाची फळे आणि फुले भावी पिढ्यांपर्यंत पोचलीत. त्यांनी कमावलेली पुण्याई आपण पुढली शंभर वर्षे उपभोगलीत.    

इतिहासाचा अभिमान हवा पण त्या अभिमानाने अंतरंग घडत नसेल, त्या छिन्नी ने आत्मरंगास रूप येत नसेल तर तो अभिमान व्यर्थ आहे. आज आपल्यासमोर वेगळी आव्हाने आहेत. त्यामुळे मराठ्यांकडून काही शिकायचे तर आपण या आव्हानांना समजून आणि प्रयत्नपूर्वक सामोरे जायला हवे. समाजविन्मुख होणे बरोबर नाहीं. कारण मराठ्यांनी संघर्ष केला म्हणून आपल्याला मागे बघायला काही आहे. आपण आपल्या पिढीचा, आपल्याला जमेल तसा, संघर्ष नाहीं केला तर येणाऱ्या पिढ्यांना मागे वळून बघायची मुभाच नसेल! 

--

2/24/26

श्रोते व्हा!

(हा लेख बऱ्यापैकी लांब आहे. पण आरामात का होईना पूर्ण वाचावा हि विनंती.)

गेल्या काही महिन्यात भुवनेश कोमकली - जयतीर्थ मेवुंदी, संदीप नारायण, तौफिक कुरेशी अशा कलाकारांचे कार्यक्रम ऐकता आले- आणि नवीन पिढी शास्त्रीय संगीताची परंपरा किती समर्थपणे पुढे नेते आहे हे स्पष्ट होते.  एकूणच गेल्या वर्ष भरातच एकूण बरीच सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिती देता आली. 

या संगीत बैठकीत बसल्यावर मला माझ्यातील एक उणीव जाणवली ते म्हणजे मी श्रोता म्हणून कमी पडतो. मला गायकीचे आणि सुरांचे, रागांचे ज्ञान नाहीं. या गायकांच्या गाण्याचे माहात्म्य म्हणजे कि माझ्यासारख्याला (आणि माझ्या सारख्याच अजून असंख्य लोकांना) ते सुरांद्वारे वर नेतात पण त्यांना दाद देण्यासाठी मी तोकडा पडतो. आता पंडित भीमसेन जोशी यांची हि प्रस्तुती -  पावसाळी ढग मनात आणतात. भाव आणि शब्द कमी पडतात. माझ्या संगीत प्रवासाबद्दल मी स्वतंत्र लेख लिहिला आहे. पुन्हा पुनरावृत्ती नको. पण थोडक्यात खूपदा शब्द अनावश्यक असतात. किंव्हा अनावश्यक हवेत. पण स्वतःला, उदाहरणार्थ, पंडीत भीमसेन जोशींनी आळवलेला राग मिया कि मल्हार समजायला कुठली तरी भाषा हवी, स्वतःच्या मनातले शब्द हवेत

कवितांच्या कुशीत:

गाण्यांचा प्रभाव तर लगेच मनावर बिंबवतो पण कविता वाचल्यावर लगेच कळतातच असे नाहीं. कुठे तरी कवितेचे बीज मनात रुजते मग कधी कधी पुन्हा पुन्हा वाचल्यावर त्याला अंकुर फुटतात किंव्हा जुन्या आठवणींच्या सिंचनाने त्याचा गर्भार्थ उमलतो किंव्हा कवितेच्या शब्दांनी जुन्या आठवणींचे कपाट नकळत उघडते.  

कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून 

मऊ-रेशमी स्पर्शामधे आजी भेटते मला जवळून 

मधली वर्षे गळुन पडतात, कालपटाचा जुळतो धागा

पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा…  

('पैठणी', कवियत्री शांत शेळके)  

खूपदा कविता समजायला वयाचे टप्पे गाठावे लागतात. अनुभवांचे चटक्यांनी मन अंतर्मुख होते. मग कवितेचे शब्द साधारण असले तरी मनाला भिडतात कारण त्यात साध्य शब्दातच स्वतःचे साधारणपण 

भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना

कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना

मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा

तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही

('मी मोर्चा नेला नाही', श्री संदीप खरे) 

लहानपणीची आठवण म्हणून मी खालील कवितेच्या ओळी दिल्यात तर वाचकाच्या मनात आल्हादायक झुळूकेला भास होईल. 

दसऱ्याच्या आदल्या दिनी, जाई पाचांसह घेऊनी

फिरू आम्ही आरास बघत, साऱ्या खात्यांतून हुंदडत

किती मजा म्हणून सांगू, शब्दासाठे झालेत पंगू

भिंगऱ्या पेपेटे घेऊन, फुग्यांचे पतंग झोकून

जात असू पक्षी होऊन.

पण श्री नारायण सुर्वे यांच्या कविता ज्यांनी आधी वाचल्या आहेत त्यांना पोटात पुढे खड्डा पडणार याची जाणीव असते. आणि मग एकदम पोटात कोणी गुद्दा मारावा तसे पुढले कडवे येते. 

एक दिवस काय झाले, तिला गाडीतून आणले

होते तिचे उघडे डोळे, तोंडातून रक्त भळभळे

जोडीवालीण तिची साळू, जवळ घेत म्हणाली बाळू

मिटीमिटी पाहात होतो, माझे छत्र शोधीत होतो

आम्ही आई शोधीत होतो.


त्याच रात्री आम्ही पांचानी, एकमेकास बिलगूनी

आईची मायाच समजून, घेतली चादर ओढून

आधीचे नव्हतेच काही, आता आई देखील नाही

अश्रूंना घालीत अडसर, जागत होतो रात्रभर

झालो पुरते कलंदर.

('माझी आई', श्री नारायण सुर्वे) 

किंव्हा विल्यम ब्लॅक नावाच्या इंग्लिश कवीची कविता दारिद्र्य आणि १९ व्या शतकातील इंग्लंड मधील औद्योगिकीकरणाची भीषणता थोडक्यात दर्शविते. तापलेले  भांड माहिती नसतांना आपण उचलायला गेलो कि कसा चटका बसतो तसे या कवितेतील शब्द चटका देतात 

When my mother died I was very young,

And my father sold me while yet my tongue

Could scarcely cry " 'weep! 'weep! 'weep! 'weep!"

So your chimneys I sweep & in soot I sleep. (1) 

And by came an Angel who had a bright key,

And he opened the coffins & set them all free;

Then down a green plain, leaping, laughing they run,

And wash in a river and shine in the Sun. (3) 

(The Chimney Sweeper , William  Blake )


किंव्हा हिंदी चे सुप्रसिद्ध कवी श्री दृश्यांत कुमार यांच्या एका कवितेतील हि पंक्ती गरिबीने त्रस्त जीवनाच्या धामण्यात स्फूर्तीचे रक्त रगरगवते:

आपके कालीन देखेंगे किसी दिन

इस समय तो पाँव कीचड़ में सने हैं!

('बाढ़ की संभावनाएँ सामने हैं', दुष्यन्त कुमार)  

पण कविता कळायला, त्याचा आनंद घ्यायला, शिकाव्या लागतात. शिकवणारे लागतात. माझे मराठी शाळेपासून चांगले होते. पण मी फारसा अभ्यास न करता मराठी पेपर चांगला सोडवीत असे म्हणून मला मराठी येत होते का? १०वी च्या वर्गात मी मराठी ची ट्युशन लावली. या मॅडम आमच्या शाळेच्या अत्यंत प्रसिद्ध मुख्याध्यापिका होत्या पण माझ्या वेळेपर्यंत त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या कडे मला मराठी समजले. अर्थ, भावार्थ, गर्भार्थ उमजला. सगळ्यात छोटा धडा का सर्वात कठीण आहे हे कळले. त्या एका वर्षाच्या ट्युशन चे पडसाद अजूनही माझ्या वाचनात आणि लेखनात (मला) ऐकू येतात आणि त्यांनी शिकविलेल्या पाऊलखुणांवर मी अजूनही शब्द गिरविण्याचा प्रयत्न करतो. हे माझे नशीब पण असेच भाग्य संगीतात किंव्हा कलेत लाभले नाहीं. 



हनुमंताशी हितगुज:

कवितेसारखेच, कलेतील बारकावे समजायला अभ्यास हवा. पण मला मात्र तसा अनुभव MET मधला हनुमंत बघून आला नाहीं. अमेरिकेत न्यू यॉर्क शहरात मेट्रोपॉलिटिन म्युसीअम  ऑफ आर्टस् ('MET ) नावाचे संग्रहालय आहे. जगभराच्या गोष्टी, चित्रे, मुर्त्या तिथे आहेत. (या बहुतांश चोरलेल्या आहेत. अर्थात असा आरोप सिद्ध होऊ शकत नाहीं कारण चोरांकडून त्यांनी विकत घेतल्यामुळे मुर्त्या फक्त ट्रान्सफर होतात, चोरीचा आरोप ट्रान्सफर होत नाहीं!)  त्यात 'Conversing Hanuman ' नावाची सुरेख कास्याची मूर्ती आहे. त्या मूर्तीबद्दल फारच अल्प माहिती आहे. हनुमान रामाशी बोलताना, एक हात नमस्कारात, दुसरा हात संवादाच्या मुद्रेत. ती पाहताना मनात भक्तीचा, निष्ठेचा, संवादाचा आनंद उमटतो. पण त्याचा इतिहास, चोल काळातील कलेची सूक्ष्मता, रामायणातील संदर्भ हे सगळं समजण्यासाठी वाचन, ऐकणे, अभ्यास लागतो. तो कुठून मिळणार? आणि कसा मिळणार? पण या अभ्यासाशिवाय समोर फक्त एक विलोभनीय मूर्ती उरते. हनुमान मिळत नाहीं. 

कधीकधी अचानक नशीब फुलते. मूर्तीतील देव म्हणतो, 'चल तुला गम्मत दाखवितो' आणि मग इतिहास, कला व संस्कृतीच्या अलौकिक त्रिवेणी संगमात न्हायला मिळते. कुटुंबासोबत संभाजीनगराला जायची संधी मिळाली. अर्थात, कैलास देऊळ बघणे आलेच. आधी आम्ही चक्कर मारल्यासारखे फिरण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात सरकारी अधिकृत गाईड समोर आलेत. मागे लागलेत कि मी तुम्हाला दाखवतो जे तुम्हाला दिसत नाहीं या ते. त्यांची फी होती. मी उगाच नको नको म्हणत होतो. ते म्हणाले (त्यांचे नाव आठवत नाहीं) कि 'साहेब, पैसे शेवटी द्या. नाहीं आवडला तर एक हि पैसे घेणार नाहीं. पण तुम्हाला नक्की आवडणार माझा टूर आणि तुम्ही स्वतःहून जास्त पैसे द्याल'. आणि अगदी तसेच झाले. सगळं परिसर जणू जिवंत झाला. सगळे शिल्प जागृत झालीत. शंकर-पार्वतीचे लग्नाचे शिल्प म्हणजे भास होतो आपणच तिथे उभे आहोत. कारण ते शिल्प 'फोटो' नव्हते. ते जिवंत होते. त्यात पार्वतीच्या पायातील एक दागिना कुठे तरी पडलेला असतो. आणि एक हात शंकराच्या हातात आणि दुसरा हात पार्वती तिच्या पायाकडे दाखवीत असते, तिचे एक पाऊल उचललेले आहे आणि तिच्या सखीला ती हाताने इशारा करतेय कि 'हा दागिना हरवलाय'. अजून एक शिल्प आहे कि शंकर-पार्वती द्यूत खेळतायत आणि शंकर त्यात हारतोय. तर शिल्पाच्या कोपऱ्यात पार्वतीची पोर नंदीची शेपटी ओढतायत, त्याला चिडवत कि बघ 'तुझा शंकर हारतोय'. अजून एक बारकावा म्हणजे, शंकर बसलेली गाडी जास्त दबलेली आहे तर पार्वतीची कमी दबलेली आहे. हे सगळं दगडात कोरलय! आम्हाला हे बारकावे कळले नसते, शिल्प उमजले नसते. वास्तुशिल्पाचा कौशल्याचा अंदाज आला नसता. शंकर-पार्वती भेटले नसते ना नंदीला चिडवणारी त्यांची पोर!



शेवटी नटराजाच्या चरणी:

फार वहावत गेलो. पुन्हा मूळ मुद्द्यावर येतो. आनंद घेता येणे म्हणजे कळणे नव्हे. कळल्या शिवाय आनंद घेताच येत नाहीं असे नाहीं पण जाणीव झाल्यावरचा जो आनंद आहे त्याला शब्द नाहीत. कारण स्वरांचा, शब्दांचा, रेखाटलेली किंव्हा शिल्पिलेली कला हृदयाचा ठाव घेणार अनुभव असतो. कलाकार किंव्हा शिल्पकार होणे जसे सोपे नसते, त्यामागे तपांची तपस्या असते तसे रसिक किंव्हा श्रोता होणे सोपे नाहीं. उपस्थिती देऊन वाह-वाह करणे श्रोता होणे नाहीं. सादर केलेली प्रस्तुती समजायला मेहेनत करायला हवी. 

श्रद्धाभक्तिसमायुक्ता नान्यकार्येषु लालसा: ।

वाग्यता: शुचयश्चैव श्रोतार: पुण्यशालिन: ॥

(योग्य श्रोता तोच आहे, ज्याच्या जवळ श्रद्धा आणि भक्ती आहे. या श्रोत्यांचा हेतू फक्त ज्ञान प्राप्ती आहे. ज्यांचे आपल्या वाणीवर ताळा आहे. (उगाच वाह वाह नाहीं!) आणि ज्याचे मन शुद्ध आहे) 

हे शिकणे कंटाळवाणं नाही — उलट, ते आनंदाचं नवं द्वार उघडतं. कारण कला — संगीत असो, कविता असो, मूर्ती असो — फक्त कलावंतांची नाही. ती आपल्या सर्वांची आहे. आणि तिचा खरा आनंद मिळवायचा असेल, तर आपण चांगले श्रोते, चांगले वाचक, चांगले दर्शक व्हायला शिकलं पाहिजे.

वानर आणि नरांमध्ये मूळ भेद फक्त अंगठ्याचा नाहीं तर नरांमध्ये कला निर्माण करण्याची आणि ती कला उपभोगण्याची दैवी देणगी हा आहे. बहुतांश आपण या क्षेत्रात उपभोगी आहोत मग त्यातच उच्चतम पातळी गाठणे आपले कर्तव्य नाहीं का? 

1/28/26

Orbital - समान्था हार्वे - पुस्तक आढावा


गेल्या शंभर -दीडशे वर्षात साहित्यिक क्षेत्रात "sci - fi " (साय-फाय) किंव्हा वैज्ञानिक लेखनाचा एक नवीन प्रवाह उदयास आला. त्या कालावधीत वैज्ञानिक प्रगतीचा तीव्र वेग बघता, या क्षेत्राशी निगडित लिहिल्या जाणे साहजिकच आहे. चित्त-चक्षु चमत्कार किंव्हा जादुई जगाची कल्पना करणे आणि  वैज्ञानिक लिहिणे यातील महत्वाचे अंतर म्हणजे वैज्ञानिक लेखन हे साधारणतः विज्ञाननिष्ठ असते. आणि प्रतिभेच्या भराऱ्या भविष्यात प्रगत होणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या चौकडीत बांधल्या असतात. मुख्यत्वे भौतिकशास्त्राच्या रिंगणात बहुतांश कथा कल्पिल्या जातात. म्हणूनच आंतररिक्षीय प्रवास, टाइम ट्रॅव्हल इत्यादी फार प्रसिद्ध कथानक आहेत.  

समान्था हार्वे ( Samantha Harvey ) यांनी लिहिलेले 'ऑर्बिटल' ( Orbital ) या पुस्तकाला एक विशिष्ट श्रेणी द्यावी लागेल. पुस्तकाची कथा वैज्ञानिक नक्कीच आहे पण हे कथानक काल्पनिक आणि वैज्ञानिक आहे. कथा भविष्यातली नाहीं आणि भविष्यातील तंत्रज्ञान किंव्हा भौतिकशास्त्राच्या परिसीमेवरची सुद्धा नाहीं. सहा अंतरिक्षवीर पृथ्वीच्या घिरट्या घालीत आहेत. एका वैज्ञानिक प्रकल्पासाठी आणि पुढे चंद्रावरोहणासाठी  विविध देशातील हे अंतरिक्षवीर अंतराळात पृथ्वीला घिरट्या मारणाऱ्या मानव निर्मित अंतरिक्ष स्थानकावर  वास्तव्य करीत असतात. यात जपान, अमेरिका, रशिया, इंग्लंड, इटली चे अंतराळवीर असतात आणि चार पुरुष आणि दोन स्त्रिया असतात. हे पुस्तक एका चोवीस तासाच्या कालक्रमातील आहे. या चोवीस तासात हे अंतरिक्षस्थानक, जे खरे तर स्थानक नाहीं कारण हे एकाच स्थानावर स्थित नाहीं, पृथ्वीच्या एका विशिष्ट कक्षेत १६ वेळा चकरा मारते. म्हणजे दार ९० मिनिटात पृथ्वीची एक चक्कर पूर्ण होते  हि कक्षा म्हणजे दक्षिणेकडून-उत्तरेकडे आणि मग पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला उत्तरेकडून-दक्षिणेकडे अशी दिशा आहे. पुस्तकात एकूण १६ भाग आहेत. थोडक्यात, एका अंतराळयानाचा दिवस आणि त्यात पृथ्वीवरचे घडत असलेले 'अनेक' दिवस आणि त्या 'अनेक' दिवसात दिसणाऱ्या पृथ्वीच्या विविध छटा. आणि त्या छटांचे या सहा अंतराळवीरांच्या मनात पडणारे प्रतिबिंब हे पुस्तकाची मूळ कल्पना आहे.  

" They feel space trying to rid them of the notion of the days. It says: what's a day? They insist it's twenty -four hours and ground crews keep telling them so, but it takes their twenty-four hours and throws sixteen days and nights at them in return." (पृष्ठ १३) 

पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे अंतराळातून दिसणाऱ्या पृथ्वीचे सूक्ष्मपणे केलेले वर्णन. हे लिहिण्यासाठी लेखिकेने अमेरिकेची अंतरिक्ष संघटना NASA (नासा) यांची मदत घेतली होती. तिने कॅमेरातून स्वतः हे दर्शन घेतले आणि निरीक्षण केले आणि मग अत्यंत बारकाईने ते पुस्तकात टिपले. वाचणाऱ्याला आपणच जणू अंतरिक्ष यानात आहे अशी भावना येते. खाली एक परिच्छेद थोडा लांब असला तरी मुद्दाम प्रस्तुत करतोय कारण त्यानेच लेखिकेच्या कष्टाची कल्पना येते.

The hundred-cymbal clang of sudden daylight. A few minutes later they come in off the ocean where the Maldives, Sri Lanka, the tip of India are ripe with morning. The shallow shoals and sandbanks of the Gulf of Mannar. Off to starboard are the shores of Malaysia and Indonesia where the sand algae, coral and phytoplankton make the water luminous with a spectrum of greens - except now there's tumbled broken-up storm cloud and the usually tranquil view is weary and troubled. As they ascend India's east coast the clouds are thinning; morning strengthens, is briefly stark, and then a haze moves in at the Bay of Bengal, the clouds wispy and numerous add the Ganges silt estuary opens into Bangladesh. The umber plains and ochre rivers, burgundy valley of a thousand-mile ridge. The Himalayas are creeping hoar frost; Everest as indiscernible blip. Everything beyond them, which caps the earth, is the rich fresh brown of the Tibetan Plateau, glacial river-run and studded with sapphire frozen lakes." (पृष्ठ १२३) 

येथे लेखिकेच्या भाषेवरचे प्रभुत्व झगमगते. पृथ्वीचा प्रत्येक भूभाग विशिष्ट शब्दाने तिने रंगविला आहे. "Ochre" हा शब्द जास्त लोहयुक्त मातीचा रंग दर्शवितो. बांगलादेश मधील गंगा किंव्हा बिहारच्या छोटा नागपूर भागातील गंगेची माती लोहयुक्त असते त्यामुळे त्या मातीचा रंग अवकाशातून गंजलेल्या लोखंडासारखा दिसत असणार. हिमालयाची विशालता दर्शविताना लेखिका "Indiscernible " हा शब्द वापरते. मराठीत या शब्दाचा अर्थ अस्पष्ट असा होतो. अर्थात, हिमालय अस्पष्ट कसे? तर त्याची विशालता एवढी आहे कि कुठे सुरु होतायत आणि कुठे संपतायत आणि लांबी-रुंदी नेमकी केवढी याचा आराखडा बंधानेच अशक्य असल्यामुळे इतके अनंत कि जणू अस्पष्ट असा विचार लेखिकेला मांडायचा असावा. पुढे हिमालय ओलांडून तिब्बत चे पठार आहे. लेखिका याला " which caps the earth " असे म्हणते. लेखिका पठाराला " Cap  of  the  earth " असे म्हणत नाहीं. तिब्बत चे पठार इतक्या उंचीवर इतका सपाट भूभाग म्हणजे पृथ्वीची जणू टोपी आणि या कल्पनेला वेगळ्या दृष्टीने मांडतांना तिब्बत ' Caps the earth " असा करून एक वेगळा सूक्ष्म भाव समोर ठेविते. तब्बल ३००-४०० किमी अवकाशातून पृथ्वीवर मनुष्य अदृश्य होतो पण भूभाग जिवंत होतो. हा जिवंतपणा लेखिकेने नाविन्यपूर्ण शब्द संचालनाने अचूक टिपले आहे. 

आता वैज्ञानिक दृष्ट्या विचार केला तर अंतराळात ना उत्तर ना दक्षिण आणि ना पूर्व ना पश्चिम. या दिशा आणि दिशांवरून बांधलेला दिवस-रात्र, आणि त्यानुसार आखलेली वेळ आणि कालगणना आणि त्या अनुषंगाने आखलेला आपला जीवनक्रम. पृथ्वीवरच आपण नसू तर हे धागे-दोरेच नाहीसे होतील. पण मग उरेल काय? अचानक मानवी आयुष्याची नगण्यता, क्षुल्लूकता प्रकर्षाने जाणविते. नाती-गोती, देव-धर्म, देश सगळे मातीचे मनोरे सगळे. पण आपल्या भारतीय तत्वज्ञानाचा आधार घेतला तर वेळ किंव्हा काळ हीच कल्पना मुळात मानवी मनाची संकल्पना आहे. आणि त्यानुसार आखलेले जग सुद्धा आपण मनाच्या संकल्पनेचेच प्रतिबिंब आहे. आणि तेच आपण सगळीकडे घेऊन हिंडतो. त्यामुळे पुस्तकातील आपले अंतराळवीर  सूर्य-पृथ्वीच्या लपंडावामुळे निर्माण झालेल्या दिवस-रात्रीच्या खेळापासून दूर गेले असले तरी त्यांच्या मनातील त्यांचे जग तसेच कायम आहे. 

जपानची अंतराळवीर 'ची' (" Chie ") ची आई ती अवकाशात असतांना वापरते. मातृवियोगाचे दुःख, आईसोबतच्या आठवणी, तिला कधीही पुन्हा न भेटू शकण्याची खंत आणि तिच्या अंतिम संस्कारास नसण्याचा खेद या भावनांशी झगडतांनाही ती आपली कर्तव्ये निगुतीने पार पाडीत असते. रशियाचा रोमन ("Roman ")  त्या अंतराळस्थानावर तब्बल ४३४ दिवस असतो. अमेरिकेचा शॉन (" Shaun ") याचा देवावर विश्वास असतो. विज्ञानाच्या परिसीमेवर आणि विज्ञानाच्या सर्वोच्च उपलब्धीचे स्वरूप असलेले हे अंतरिक्षस्थान आणि अंतराळयान सामोरे असतांना एका अज्ञात आणि अनकालनीय 'देव' या संकल्पनेवर शॉन कसा विश्वास ठेऊ शकतो हे इंग्लंड च्या नेल (" Nell ") ला मुळीच कळत नसते. रशियाचा अँटोन (" Anton  ") चा पृथ्वीवरचा संसार तेवढा सुखाचा नसतो. आणि त्याची बायको आजारी पण असते.  

अवकाशात फिरत असलीत तरी त्यांची नाळ अजूनही पृथ्वीलाच बांधलेली आहे. त्यांच्या अडचणी, त्यांच्या आशा आणि आकांशा, त्यांच्या मनातील भीती या सगळ्या आपल्या सामान्यांसारख्याच आहेत. कुटुंबियांचे विचार, आठवणी, आई-वडिलांच्या आठवणी, लहानपणीच्या आठवणी, भविष्याची भीती किंव्हा बघितलेली स्वप्ने या सगळ्यांची घोंगडी करून, त्यात आपले अंतराळवीर स्वतःला गुरफटून घेत असतात. जणू फुलपाखरू होण्याची स्वप्ने बघत असलेला सुरवंट.  

इंग्रजी भाषेत वैज्ञानिक काल्पनिक (किंव्हा काल्पनिक-वैज्ञानिक) पुस्तके आणि लेखक अनेक आहे. भाषा या क्षेत्रात समृद्ध आहे. साहजिकच आहे कारण गेल्या दोनशे वर्षात वैज्ञानिक प्रगती सगळ्यात जास्त याच भाषेत झाली. मेरी शेली (Mary Shelley ) यांचे फ्रँकीस्टाईन ( "  Frankenstein ") हे इंग्रजीतील पहिली काल्पनिक वैज्ञानिक कादंबरी मानल्या जाते. या पुस्तकाचा मराठीतही अनुवाद झालाय आणि वाचल्या गेला आहे. पुढे जुल्स वन (" Jules Verne ") हे फ्रेंच कादंबरीकार फार प्रसिद्ध झालेत. इंग्रजीत हर्बर्ट वेल्स (H G Wells ) किंव्हा आर्थर सी. क्लार्क (" Arthur C Clark ") यांनी अनेक अति-प्रसिद्ध पुस्तके लिहिलीत. अमेरिकेचे आयसक असिमोव ( Issac Asimov ) यांनी शेकडो पुस्तके आणि गोष्टी लिहिल्यात. त्यांची रोबोट आणि फौंडेशन सिरीज अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्यावर सिनेमे सुद्धा बनले आहेत. मी असिमोव खूप वाचला आहे. विज्ञान, मानवी जीवनाच्या संकल्पना आणि कल्पनाशक्तीची परिसीमा याच्या संगमावर असिमोव यांनी लिहिले आहे. रोमांचक आणि कल्पक अश्या त्यांच्या कथा मानवी वस्तुस्थितीपासून दूर नसतात. हाच एक गमतीदार भाग आहे. कितीही वैज्ञानिक प्रगती झाली किंव्हा भविष्यातील वैज्ञानिक प्रगतीबद्दल आज कितीही कल्पना रेखाटल्यात तरी मानवी जीवनाला केंद्रबिंदू ठेवल्याशिवाय गत्यंतर नाहीं. आधी म्हंटले तसे, कल्पनेच्या भराऱ्या असो कि भौतिक दृष्ट्या पडताळून बघू शकतो असे विज्ञान असो हा सगळा मनाचा किंव्हा कर्त्याचा खेळ आहे. आणि या पुस्तकाचे आणि लेखिकेच्या यशाचे गुपित नेमके हेच आहे. 

मागल्या वर्षी अंतराळयान आणि अंतराळवीर या क्षेत्रात भारताच्या दृष्टीने दोन महत्वपूर्ण घटना घडल्यात. एक तर भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स अंतराळयानात तब्बल ९ महिन्या अडकल्या होत्या. तांत्रिक बिगाडामुळे त्यांचा परतीचा प्रवास विस्कळीत झाला आणि मग त्यांना परत घेऊन यायला नवीन अंतराळयानसुद्धा नीट मिळेना. दुसरा म्हणजे, श्री राकेश शर्मा नंतर भारताचे श्री शुभांषु शुक्ला यांना अमेरिकेन अंतराळयानातून अवकाशात जायला मिळाले. हे पुस्तक वाचल्यावर सुनीता विलियम्स आणि श्री शुक्ला यांना काय दिसले असेल आणि त्यांचे अनुभव कसे असतील याची प्रचिती येते. रसग्रहण या शब्दाचा वापर आपण साधारण कलेचा आस्वाद घेण्याबद्दल वापरतो. पण या पुस्तकाद्वारे विज्ञानाचे आणि अंतराळाचे रसग्रहण करता येते असे म्हणायला हरकत नाहीं.  

या पुस्तकाला सन २०२४ चा इंग्रजी भाषेतील सर्वोच्च असा बुकर (" Booker " ) पारितोषिक मिळाले आहे. पुस्तक पारितोषिकास पात्र नक्कीच आहे. ज्या वाचकांना या विषयात आस्वाद असेल त्यांनी नक्कीच हे पुस्तक वाचावे. 

12/10/25

स्वप्नातली पातळ भाजी, उडणारा सोफा आणि मी

मला बसल्या बसल्या झोप लागू शकते. खुर्चीवर, बाकावर, कुठेही. आणि बरं खूप वेळ झोपतो असेहि नाहीं. १० मिनिटे पुरतात. पण मी अगदी गाढ 'घोडे बेच के' झोपतो. या डुलक्या पॉवर नॅप्स वगैरे भानगडी पण नाहीत. पण गंमत अशी कि मला तेवढ्यातल्या तेवढ्यात स्वप्न हि पडतात. काही स्वप्न विचित्र असतात, काही गमतीदार. काही आठवतात, काही नाहीं. दोन-तीन दिवसापूर्वी एका लग्नात दुपारी जेवल्यानंतर मी खुर्चीवरून स्वप्न नगरीत आरोहण केले. स्वप्ने (स्वप्ना नाहीं!) जणू वाटच बघत असावीत. मी स्वप्नात पालकाची पातळ भाजी-भात खात होतो. मला पातळ भाजी खूप आवडते. खास करून नागपूर भागात कोरड्या खोबऱ्याचे तुकडे आणि लाल मिरच्यांची फोडणी घातलेली. पण मला भाजीत सारखी कचकच लागत होती. मी अस्वस्थ होत होतो. पातळ भाजी भात, किंव्हा वांग्याचे भरीत आणि फुलके अशी काही कॉम्बिनेशन्स आहेत ज्याची मी वाट बघतो. (अशी अजून बरीच कॉम्बिनेनशन आहेत. त्याचा एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. आदल्या दिवशीची मुगाची खिचडी आणि त्यावर दूध, अगदी सायी सकट, कधी न्याहारीस खाल्ले आहे का? नसेल तर जरूर खा. हे वाचून नाक मुरडणाऱ्यांना गा. गु. च. का.!) पण अगदी स्वप्नात का होईना, ती कचकच मला त्रास देत होती. मी विचारले कि "कोणी केलीय पातळ भाजी? मेथी नीट धुतली नाहीं का?" "मेथी नाहीं, पालक आहे ( मलाच गा. गु. च. का.!). पण कोणी उत्तर दिले ते समजेना. स्वप्ने आपली असतात पण हवी ती लोक त्यात येत नाहीं. आणि जी येतात ती आपण बोलावलेली हि नसतात. उगाच एक वात्रट विचार - आपल्याला हव्या त्या व्यक्तीला स्वप्नात बोलावता आले असते तर मी ऐश्वर्या राय ला पातळ भाजी वाढायला नसते का बोलावले? असो  मी स्वप्नात करीत होतो कि स्वयंपाकघरातून हे कोण बोलतय. तेवढ्यात पुन्हा दाढेखालती कच झालं. मी अगदी फ्रस्ट (" frustrated ') झालो. "अरे यार पातळ भाजीत कचकच म्हणजे लाईफ ला अर्थच नाहीं". पण पातळ भाजीचा माझ्या लाईफ वरचा प्रभाव नेमका काय इत्यादी विचार यायच्या आधीच जाग आली. बाजूला सौ. (आमच्या)  बसल्या होत्या. त्यांना माझी अशी डुलक्या मारण्याची सवय आहे. "अरे, केवढे दात कचकच करत होतास" म्हणजे मी झोपेत दात घासत होतो म्हणून माझ्या मेंदूने एवढ्या धक्कादायक घटनेचे चित्र रंगविले? 

मग मी विचार करू लागलो कि नेमकी कुठल्या प्रकारची स्वप्ने मला पडतात. स्वप्ने सगळ्यांनाच पडतात. आणि माझी स्वप्ने सर्वसाधारणच असणार पण माझ्या साठी ती वैशिष्ट्यपूर्ण नक्कीच आहेत. यातून मला जीवनाचे कोडे (किंव्हा कोडी!) उमगते इत्यादी ठोंबेपणा माझ्यात नाही. उठल्यावर जर कधी कुठली स्वप्ने आठवलीत तर मला बहुतांश वेळा हसू येते कि काय वेडगळ आहे माझा मेंदू असे वाटते. (माझ्या काही मित्रांची मीच वेडगळ असल्याची ठाम समजूत आहे. त्यांनी तसे निसंकोच पणे मला बोलून दाखविले आहे.) 

अगदी लहानपणाची आठवण आहे. मला स्वप्नात दुधाचे धबधबे दिसायचे. मी दुधात पोहोतोय आणि धबधब्यात खेळतो आहे असे दिसायचं. तान्हा असतांना मला दुधाची ऍलर्जी होती. अर्थात ते मला आठवत नाहीं. पण चांगलं ५-७ वर्षांचा असतांना पर्यंत मला हे स्वप्न पडत असे. मी सकाळी एकदम आनंदात उठायचो आणि मग उठल्या-उठल्या ताबडतोब, अगदी अंथरुणातच,  दूध न मिळाल्याने ठणाणा करायचो. माझे आई-वडील नक्कीच confuse होत असतील कि या पोट्ट्याचा नेमका प्रॉब्लेम काय आहे ते! त्या दरम्यान मला झोपेत वाघ हि दिसत असे. (दुधाचे धबदबे आणि वाघ, वाह ..कमाल आहे!) आमचे घर खरं नागपूरला नाग नदीच्या काही अंतरावरच होत. स्वप्नात नाग दिसायला हवे. बरं, लहानपणी वाघ पण कधी बघितला नव्हता. लहानपणीच काय, आजगयत ताडोबा, नागझिरा, कान्हा, पेंच....कुठे म्हणजे कुठे मला वाघोबा दिसला नाहीं. (प्रत्येक वेळेस 'कांदे-पोहे' खायला जाणाऱ्या होतकरू तरुणासारखा मी सफारी ला जातो आणि ग़ज़ब बेइज्जती होऊन परत येतो. एकदा गाईड ने आम्हाला एका भल्यामोठ्या झाडाच्या बुंध्यावर वाघाच्या नखांचे ओरखडे दाखविले. मी उत्साहात विचारलं कि आज सकाळचे ओरखडे आहेत का, थोडक्यात 'ताजे' ओरखडे आहेत का? तो म्हणाला नाहीं...खूप वर्ष जुने आहेत. चायला...ओरखडे पण शिळे-पाळे बघायला मिळालेत.) पण स्वप्नात मात्र वाघोबा दिसायचा. पूर्व जन्मी मी वाघ असेंन  किंव्हा शेळी, वाघाने खाल्लेली! म्हणूनच असा वाघ दिसायचा मला स्वप्नांत. 

अजून एक स्वप्न जे मला सातत्याने पडते, ते म्हणजे माझे आकाशात उडणे. विमानात नाहीं. पक्षासारखा आकाशात भराऱ्या मारतो. मला पंख पण नसतात. एकदा तर मी सोफ्यावर बसून उडत होतो. सोफ्याला गिअर्स पण होते. आता हवेत उडायला गिअर्स का हवेत पण मी आपला खटखट करून गिअर्स बदलवित होतो आणि वर-खाली, मागे-पुढे होत होतो. हे सोफ़्याचे स्वप्न मला खूप म्हणजे खूप वर्षांपूर्वी पडले होते. पण स्वप्नात मी जेवढा हुरूळलो होतो तशीच भावना मला त्या बद्दल इतक्या वर्षांनी लिहितांना येते आहे. माझ्या घराजवळ एक मोट्ठे मैदान होते. त्यावर घारी घिरट्या मारीत असत. आकाशात गोल-गोल त्या फिरत असत. निळ्याशार आकाशात त्यांच्या कथ्या प्रतिकृती बघायला मला फार आवडायचे. जमिनीवरच्या रस्त्यांच्या, पाऊलवाटांच्या जाळ्यात ते फसलेले नसतात. स्वच्छंदपणे ते भूमीला आपल्या पंखात बांधतात. 

स्वप्नांत माझ्या उषा तेवते अन 

निशा गात हाकारिते तेथुनि, 

क्षणाधी सुटे पाय निडांतूनि अन, 

वीज खेळती मत्त पंखातुनि ||२|| 

अशी झेप घ्यावी, असे सूर गावे, 

घुसावे ढगामाजी बाणापरी, 

ढगांचे अबोली भुरे केशरी रंग, 

माखून घ्यावेत पंखापरी ||३||

- आकाशवेडी, पद्मा गोळे

"पक्षांना काय माहिती जमिनीवर धावण्याची मजा?" असा प्रश्न जमिनीवर वजनाचा भार टाकीत जाणाऱ्या मनुष्याला कधी पडणार नाहीं. उडण्यात काही वेगळीच मजा असणार. पंख पसरविले कि उडण्याची स्वप्ने मला नेहमी लक्षात रहातात. मी एकदा काही तरी जेट-पॅक सारखे पाठीला बांधून उडत होतो. त्या स्वप्नात खूप वेगाने मला उडता येत होते. मी आकाशात, ढगात, जमिनीलगत अश्या भराऱ्या मारीत होतो. काय मजा येत होती! अवर्णनीय! 

सगळीच स्वप्ने दुधाचे धबदबे आणि सोफ्यावरून उड्डाणाची नसतात. काही गडद आणि खोल असतात. मी ज्या घरात वाढलो ते घर सोडून दोन तप उलटून गेलीत पण स्वप्नात मी बहुतांश वेळा त्याच घरात असतो. मी मागे माझ्या एका गडद स्वप्नावर आधारित "घर"  गोष्ट लिहिली होती. हि गोष्ट स्वप्नातील सत्य-घटनेवर आधारित होती. आता स्वप्नावर आधारित गोष्ट सत्य घटना कशी काय? कारण स्वप्नात असतांना मला माहिती नव्हते कि हे स्वप्न आहे. आणि घाबरून घामघूम होऊन मी उठलो. देवाच्या दयेने असली स्वप्ने मला कमी पडतात. किंव्हा पडली तरी दुसऱ्या दिवशी आठवत नाहीत. 

सुप्रसिद्ध गणितकार श्री रामानुजन यांना स्वप्नात त्यांची कुलदेवी गणित सोडवायला मदत करायची असे ते म्हणत. इथे मला गणिताचा पेपर बघून घेरी येऊन स्वप्न पडायची. मला स्वप्नात कधी मी IIT पास झालो आहे किंव्हा मोठा निष्णात डॉक्टर झालोय असे कधीच दिसले नाहीं. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार! सगळीच स्वप्ने यशाची किंव्हा प्रेरणादायी असावी असे मुळीच नाही. प्रेरणा उघड्या डोळ्यांनीच आत्मसात करावी आणि उघड्या डोळ्यांनीच यशाच्या पायऱ्या चढाव्यात. स्वप्ने, स्वप्नेच राहू द्यावीत. ठरवून स्वप्ने पडत नाहीं  हे एकादृष्टीने वरदानच आहे. नाही तर मला कुठून दुधाच्या धबदब्यात न्हायला मिळणार? पक्ष्यासारखे उडायला मिळणार आणि कुठे खऱ्यात वाघाची साथ मिळणार? 

देवाची कृपा. आणि अशीच मला झोप लागत राहो हीच प्रार्थना. 

---

**वाघाचे चित्र - Image rights : Rose Corcoran - https://sladmore.com/artworks/tiger-in-my-dreams/ ) 

11/23/25

छत्रपती शिवाजी महाराज आणि आजची परराष्ट्रनीती - संक्षिप्त आढावा

छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती आणि परराष्ट्रनीती यावर आपण थोडेसेच बोललो आहोत. इतक्यातच माझ्या वाचनात गोवा पोर्तुगीज आणि महाराजांचे संबंध आणि संघर्षावर श्री महेश तेंडुलकर यांनी लिहिलेले एक पुस्तक आले. पुस्तकातील काही घटना आणि त्या अनुषंगाने महाराजांच्या परराष्ट्रनीती आणि स्वातंत्र्योत्तर भारताची परराष्ट्रनीती याचा थोडक्यात आढावा आपल्यासमोर मांडीन.

महाराजांची राजनीती आणि परराष्ट्रनीती:

१) स्वराज्य हेच एक परम कर्तव्य आणि त्याच्या उत्कर्षासाठी, त्याच्या सुरक्षिततेसाठी जे आवश्यक आहे ते सगळे करणे हि विचारधारा. - सन १६६० पर्यंत जागतिक पटलावर पोर्तुगीज सत्तेला मागे सारून स्पॅनिश सत्ता झपाट्याने उदयाला येत होती. पण जरी पोर्तुगीज साम्राज्याचा सूर्य कलता असेल तरी एक सागरी सत्ता म्हणून ते बलाढ्य होते. आणि भारतीय समुद्री सत्तेच्या तुलनेत तर पोर्तुगीज अतिशय प्रबळ होते. त्यांच्याकडील सागरी युद्धशैली आणि जहाजे बांधण्याचे तंत्रज्ञान त्या काळाच्या तुलनेत प्रगत होते. छत्रपतींना याची जाणीव होती म्हणून त्यांनी स्वराज्याचे आरमार बांधण्याचे ठरवले तेंव्हा त्यांनी पोर्तुगीजांना कारागीर मागविले. पोर्तुगीजांनी (मुंबई) ते सुरुवातीला पुरविले सुद्धा. पण नंतर गोव्याच्या गव्हर्नर ने मुंबई च्या कॅप्टन ला पत्र लिहून सांगितले कि शिवाजीचे आरमार उभे राहिले तर आपल्यालाच धोका उत्पन्न होईल. हे कारागीर बहुतांश ख्रिश्चन किंव्हा बाटलेले ख्रिश्चन होते. मुंबई च्या कॅप्टन च्या सल्ल्यावरून हे कारागीर रातो-रात पळून गेले. एवढेच नाहीं तर खाडीच्या तोंडाशी पोर्तुगीजांनी युद्धाची गलबते उभी केलीत जेणेकरून स्वराज्याची जहाजे बाहेर पडू शकणार नाहीं. अर्थात, आरमार तर नक्कीच तयार झाले आणि कोकणपट्टीवर झपाट्याने पसरले. त्यामुळे पोर्तुगीजांच्या या प्रति-हालचाली मुळीच यशस्वी ठरल्या नाहीत. पण हे सगळे माहिती असूनही महाराजांनी शक्यतोवर सलोख्याचे संबंध ठेवण्याचा वरवर तरी प्रयत्न चालू ठेवला. कारण महाराजांना जे हवे होते ते पोर्तुगीजांकडे उपलब्ध होते. थोडक्यात, परराष्ट्रनीती हि व्यावहारिक होती आणि त्यासाठी जे पडेल ते करायचे. भावनिक जाळ्यात न फसता.



(Indian Naval Museum, Kochin.  ब्लॉग लेखकाचा स्वतः काढलेला फोटो.) 

२) शत्रू हा कुठल्यातरी कारणासाठी शत्रू असतो. आणि ती कारणे जो पर्यंत बदलत नाहींत किंव्हा ती कारणंच नाहीशी होत नाहीं तो पर्यंत शत्रूस शत्रूच समजावे - पोर्तुगीज हि एक आक्रमक परराष्ट्रीय सत्ता होती. तिचा नायनाट करणे ध्येय होते पण तेवढे बळ नसल्यामुळे एक, पोर्तुगीजांना हात-पाय पसरविण्यापासून थांबवणे आणि दुसरा, थोडं- थोडं करून पोर्तुगीज प्रदेश घेत रहाणे हे महाराजांचे धोरण होते. छत्रपतींनी शत्रुत्व मोठ्या मानाने पत्कारले. त्यांची राजनीती आणि परराष्ट्रनीती हि जाणती होती. आत्तापर्यंत आपण पोर्तुगिजांबद्दल बोललो पण पोर्तुगीजांच्या तुलनेत इंग्रज त्या काळात तरी किरकोळ होते. पण त्यांच्याकडे तोफा प्रगत होत्या. शिवाजी महाराजांच्या काळात तोफांचे तंत्रज्ञान मोघलांकडे होते. किंबहुना मोघली तोफा आणि बंदूक पथकामुळे बाबर सन १५२६ च पानिपत चे पहिले युद्ध जिंकला होता. महाराजांना प्रगत तोफा हव्या होत्या. त्यांनी इंग्रजांकडे तशी मागणी केली. अर्थात इंग्रज ते द्यायला तयार नव्हते. पन्हाळ्याच्या वेढ्यात इंग्रजांनी सिद्दी जौहर ला तोफा दिल्या, पन्हाळ्यावर डागायला. काही काळाने महाराजांनी याची शिक्षा म्हणून चार इंग्रज कैद केले. मुंबईच्या इंग्रजांनी कैदी सोडायची मागणी केली तर महाराजांनी प्रगत तोफा द्या हि मागणी केली. इंग्रज ते देईनात, महाराज काही कैद्यांना सोडेना. त्यातले दोन कैदी पुढे कैदेतच मरण पावलेत. परकीय सत्ता धूर्त होत्या आणि त्यांच्याशी धूर्तपणे वागणेच महाराजांनी समंजस ठरविले. महाराजांच्या या नीतीचा, या वागण्याचा वारंवार उल्लेख इंग्रजी आणि पोर्तुगीज पत्र-व्यवहारात होतो.   इंग्रज असो कि पोर्तुगीज. मोघल असो कि आदिलशाह, यातील कोणीही त्यांची वागण्याची पद्धती बदलवली नाहीं. त्यांनी हिंदू राजा म्हणून महाराजांचा द्वेषच केला. थोडक्यात, शत्रू किंव्हा शत्रुत्वाची कारणे, या दोन्ही गोष्टी कधीच न बदलल्यामुळे महाराजांनी सगळ्याशी शत्रुत्वाचं निभावले. पण पुढे जाऊन त्यांनी कुतुबशाहीशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. 

३) शत्रुत्व करणे सोपे नाहीं. शत्रुत्व निभवायला बळ आणि शक्ती शिवाय दुसरा मार्ग नाहीं. आणि नुसतीच शक्ती नाहीं तर शक्ती प्रदर्शन आणि समोरच्यावर शक्तीचे परिणाम हे दोन्ही साध्य करणे आवश्यक आहे - महाराजांनी टप्प्या-टप्प्याने शक्ती संपादित केली. आधी सैनिक जमविले, मग किल्ले बांधले, मग आरमार बांधले मग समुद्री किल्ले बांधले. गोव्यावर सरळ जाणे शक्य नव्हते. गोव्याच्या सरहद्दीला आदिलशाही राज्य होते. महाराजांनी आरमार, समुद्री किल्ले वगैरे तयारी करतांना आदिलशाही कोकण आणि तळ-कोकण घेण्याचे सतत प्रयत्न केले. पण एकदा घेतलेले पुन्हा हातचे गेले (महाराज मुघल आणि आग्र्याशी झुंझत होते) मग महाराजांनी पुन्हा घेतले आणि शेवटी सन १६७५ ला त्यांनी फोंडा जिंकला. त्या दरम्यान त्यांनी कोकणपट्टीवर समुद्री व्यापारावर जम बसविला. जंजिरा सिद्दीशी झुंजले आणि त्याच्या आस पास किल्ले बांधले. या काळात स्वराज्य आणि गोवा पोर्तुगीजांचे 'मैत्रीपूर्ण' संबंध होते. पण पोर्तुगीज नाठाळ होते. त्यांनी आदिलशहाला महाराजांच्या युद्धांमध्ये मदत केली. जंजिऱ्याच्या सिद्द्यांना ते मुंबई भागातून रसद पुरवीत. आणि तळ-कोकणातील अनेक देसाई, जे आदिलशहा किंव्हा पोर्तुगीजांचे मांडलिक होते त्यांनाहि महाराजांविरुद्ध बंड करण्यास उद्युक्त करीत आणि वेळ पडेल तर गोव्यात आश्रय देत. पोर्तुगीजांनी ओळखले होते कि आदिलशाही मोडकळीत येते आहे आणि मुघल फार दूर आहे. शिवाजी महाराजांचा शेजार त्यांना नको होता. शेवटी महाराज जेंव्हा फोंड्याला पोचले तेंव्हा पोर्तुगीजांचे धाबे दणाणले. महाराज पुढे गोव्यावर आक्रमण करू शकले नाहीं पण त्यांच्या आक्रमणाच्या भीतीने उत्तर कर्नाटकात पोर्तुगीजांनी हात-पाय आखडते घेतले. फोंडा घेतल्यावर तिथल्या नदीवर महाराजांनी बांधकाम सुरु केले तर पोर्तुगीज गव्हर्नर ने महाराजांना पत्र लिहून तहाची आठवण दिली. त्या तहातील एक कलम असे होते कि महाराज गोवा सीमेपाशी स्वराज्याच्या भूमीत काही बांधकाम करणार नाहीं. थोडक्यात महाराजांनी सैनीकि तयारी कशी करावी किंव्हा करू नये हे पोर्तुगीजांना वाटले की तहाद्वारे ते ठरवतील. अर्थात महाराजांनी या पत्राची दखलही घेतली नाहीं. स्वराज्याच्या शक्ती संपादनाचे, शक्ती प्रदर्शनाचा अचूक आणि अपेक्षित परिणाम पोर्तुगीजांवर झाला होता. आणि इतक्या वर्षांच्या मेहेनतीनंतर जमवलेली आणि जिंकलेली बाजू महाराज उगाच कुठल्या तहाच्या कलामासाठी सोडणार नव्हते. 

                                                  
(Indian Naval Museum, Kochin.  ब्लॉग लेखकाचा स्वतः काढलेला फोटो.) 

आता आपण जर का स्वातंत्र्योत्तर भारताची परराष्ट्रनीती बघितली तर आपल्याला वरील बहुतांश बाबींचा अभाव प्रकर्षाने आढळतो. आपल्या देशाच्या परराष्ट्रनीतीचा पायाच विचित्र विचारसरणीवर आधारित आहे. पुढचा विचार मांडायच्या आधी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, माझी टीका सकारात्मक आहे. आपला देश ज्या आकाराचा आहे आणि आपल्याला आपल्या दुर्भाग्याने जे शेजारी मिळाले आहेत त्याला बघता परराष्ट्रनीतीचा कुठलाही निर्णय घेणे सोपे नाहीं. आणि जे निर्णय घेतले, जे मागे बघता चुकीचे वाटतात ते चुकीचे निर्णय म्हणून घेतले नसणार. काही विचारांती घेतलेले निर्णय चुकीचे निघालेत. यातील काही निर्णयांचा आपण संक्षिप्तात आढावा घेऊया. 

१) भारताचं धोरण हे भारतासाठी असावं. भारतीयांसाठी असावे आणि भारताच्या भविष्यासाठी असावे. थोडक्यात आपल्या देशाला जे सोयीचे, आपल्या देशवासियांना जे फायद्याचे ते निर्णय घेणे हि उत्तम नीती. १९५० च्या दशकात आपल्याला युनाइटेड नेशन च्या सेक्युरिटी कौन्सिल मध्ये समाविष्ट करण्याची शक्यता होती. आपण ती ठामपणे नाकारली. आपण नॉन-अलाइन हि नीती ठरवली. म्हणजे ना आपण अमेरिकेच्या कह्यात येणार ना रशियाच्या. पण सत्य परिस्थितीत आपण रशियाचेच मित्र झालो आणि आहोत. पण या नॉन- अलाइन च्या भानगडीत सेक्युरिटी कौन्सिल ची जागा सोडणे म्हणजे चूक नव्हे का? काश्मीर चा प्रश्न उगाच युनाटेड नेशन मध्ये घेऊन जाऊन जिंकत असलेले युद्ध थांबवणे? आर्थिक बाबीत कोणीही सांगितले नव्हते तरी उगाच सोशालीसम अवलंबिणे. आपला गाझा शी काहीही संबंध नसतांना उगाच त्यांना पाठिंबा देणे जेंव्हा कि ते सदैव काश्मीर मध्ये पाकिस्तान ला पाठिंबा देतात. आधी आपण तामिळ वाघांना (लिट्टे आणि प्रभाकरन) भारतात प्रशिक्षण दिले आणि मग त्यांच्या विरुद्ध श्री लंका सरकारला मदतीला म्हणून आपलेच सैनिक लंकेला पाठविले. त्यात आपले १५०० सैनिक हकनाक बळी पडले. असल्या असंख्य फालतू गोष्टी करून आणि निर्णय घेऊन आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. मूळ नेहरूंची चूक आहे पण पुढल्या पंतप्रधानांनी पण त्या चूक चालू ठेवल्यात. शिवाजी महाराजांनी सगळ्याशी जमेल तेंव्हा युत्या केल्या, आणि आवश्यक असेल तेंव्हा युद्ध सुरु करायला मागेपुढे बघितले नाहीं. अंतिम लक्ष सार्वभौम हिंदू स्वराज्य हे होते.  नव-भारताचे अंतिम लक्ष काय आहे? तेच ठाम नसल्यामुळे 'ऐरा-गैरा नत्थू खैरा' वाटेल ते बरळून त्याला किंव्हा त्याच्या पक्षाला सोयीचे ते करतो. आणि देश त्याची किंमत चुकवतो. 



२) शत्रू कोण आणि का? - सन १९४७-४८ चा काळ धामधुमीचा होता. भारताचे विभाजन आणि मग उरलेल्या भारताची संधी सगळे एक साथच होत होते. अश्या परिस्थितीत काश्मीर संपूर्ण न घेणे म्हणजे स्वतःच्याच सार्वभौमत्वाला प्रश्नांकित करणे झाले. पाकिस्तान आपला मित्र देश कधीच होणार नव्हता. अशी आशा करणे आणि अपॆक्षा ठेवणे निव्वळ मूर्खपणा होता. पाकिस्तान आपला शत्रुदेशच बनणार होता. त्यासाठीच तो देश एवढे रक्त सांडून बनवला होता. असे असतांना संपूर्ण काश्मीर घेणे टाळणे म्हणजे अविचार, भ्रांत मनस्थिती आणि भारतीय इतिहासाच्या अज्ञानाचे फळरूप होते. काश्मीर देण्याचा प्रश्नच येत नाहीं हे जरी खरे तरी आम्हाला बलुचिस्तान हवे किंव्हा अफगाणिस्तान ला जोडणारी भूमी हवी असा कांगावा आणि मग तसा प्रयत्न करायला हरकत नाहीं? आपली सार्वभौमत्व पाकिस्तान ला मान्य नसेल तर आपल्यालाही त्यांचे मानायला किंव्हा त्याचा आदर करायची आवश्यकता नाहीं. किंबहुना, आपल्या परराष्ट्रनीतीचा तो भाग असायला हवा. पण ते सोडून आपण इतकी वर्षे पाकिस्तान ला 'मोस्ट फेवरड नेशन' चा दर्जा दिलेला होता. कलियुगात आपण हरिश्चंद्र बनतोय. संत तुकाराम महाराज म्हणाले ते "भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।।" हीच योग्य नीती आहे.  चीन सोबत सुद्धा हेच वर्तन सोयीचे आहे. दादागिरी करण्याची त्यांची परराष्ट्रनीती आहे. ती एकदा का जुमानली कि मग काही खरे नाहीं. सन १९६२ ला ते हल्ला करणार याची संपूर्ण कल्पना नेहरूंना होती तरी 'हिंदी चिनी भाई भाई' चा जप करीत नेहरूंनी स्वातंत्र्याच्या अवघ्या १५ वर्षात देश गमावला होता. चीन आणि पाकिस्तान ने आपले वर्तन आणि परराष्ट्रनीती कधीच बदलवली नाहीं. आक्रमक आणि भारत विरोधी. मग आपण कधी आक्रमक आणि चीन आणि पाकिस्तान विरोधी नीती अवलंबिणार?

३) स्वातंत्र्योत्तर भारत शत्रुत्व निभवायला किती सक्षम आहे? पाकिस्तान असो कि चीन, आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा फार कमी अंश सैन्याला देतो. का? नवीन जगात दोन गोष्टींनी सामर्थ्य दर्शविता येते. एक म्हणजे आर्थिक बळ आणि दुसरे म्हणजे सैनिकी बळ, ते पण तंत्रज्ञांचे बळ. सन १९९१ ला आपली अर्थव्यवस्था तर दिवाळीची तयारी करीत होती. सगळ्याच बाबतीत मागेच पाय टाकायची सवय झाली होती. देश बलाढ्य जणू नकोच.  गेल्या वीस वर्षात पहिल्यांदा जागतिक पटलावर भारत एक आर्थिक बळ म्हणून उदयास आली आहे. आणि आपले सैनिकी बळ बलाढ्य म्हणून मानल्या जाते. पण पुन्हा येरे माझ्या मागल्या सारखे आपण युद्ध करून, जिंकून, टोचणारी सुई तशीच ठेवतो. १९७१ असो कि २००१ किंव्हा अगदी आत्ताचे ऑपेरेशन सिंदूर असो, आपण पाकिस्तानचा भूभाग कधीच घेतला नाहीं. १९७१ ला पाकिस्तान फोडले खरे पण पाकिस्तानात जे पंजाबी मुसलमान सैन्याद्वारे आपल्याला त्रास देतात त्यांना आपण काय धडा शिकविला? सन २०२० च्या गलवान भांडणात आपण चीन ला धडा शिकविला खरा, त्यांचे शेकडो सैनिक मारले पण पुन्हा त्यांना टोचायला काहीच ठेवले नाहीं म्हणून आता त्याच भागात पुन्हा ते युद्धाची सामग्री जोडतायत. शक्ती प्रदर्शन उत्तम पण त्याचा परिणाम दिसायला हवा. आणि चांगला चटका बसेल किंव्हा होरपळून निघेल असे व्हायला हवे. पाकिस्तान सातत्याने आपल्या नागरिकांना मारतोय पण ऑपेरेशन सिंदूर मध्ये आपण फुशारक्या मारतोय कि त्यांच्या नागरिकांना आम्ही धक्का लावला नाहीं. का? उद्या परिस्थिती उलटी झाली तर ते आपल्या नागरिकांना लाखोंनी मारायला मागे पुढे बघणार नाहीं.  नैतिकता वगैरे धोरण मान्य पण मग आपण त्यांच्या सैनिकांना पण सुरक्षित ठेवले? १९७१ ला आपण ९०,००० पाकिस्तान सैनिकांना बंदी करून, मजेत पुन्हा सोडून दिले. काय गंमत आहे? म्हणूनच पाकिस्तान असो कि चीन, आपल्याशी शत्रुत्व निभवायला त्यांना मजा येते. 

आपण इतिहास वाचत नाहीं, आणि त्यामुळे त्यातून काही शिकत नाहीं. शेवटी सरकार म्हणजे समाजाचेच प्रतिबिंब असते. समाजातीलच घटक पुढे जाऊन मंत्री-संत्री आणि IAS /IPS  बनतात. इंग्रज का जिंकले आणि का टिकले याचा अभ्यास केला तर सध्याच्या किळसवाण्या राजकारणाचे आकलन लगेच होईल. शिवाजी महाराज किंव्हा पुढल्या मराठ्यांची धोरणे बघितलीत तर आपल्या सध्याच्या चुकांची कल्पना येईल. चुका होणार नाहीत असे नाहीं पण निदान नवीन चुका करणे होईल. 


लेख संपवायच्या आधी एक महत्वाचा विचार - २०१४ नंतर म्हणजे मोदी सरकार च्या काळात भारतीय परराष्ट्रनीती झपाट्याने बदलली आहे. "इंडिया फर्स्ट' हे धोरण प्रामुख्याने जाणवते. आणि पाकिस्तान आणि चीन यांच्याशी अनेक खटके उडूनही आपण आज जगातील सगळ्या सत्तांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध आहे. चीनशी उघडपणे भांडण घेणारा सध्याच्या जागत आपण एकमेव देश आहोत. तसेच बालाकोट, ऑपेरेशन सिंदूर इत्यादी द्वारे आपण पाकिस्तानला वेळोवेळी ठिकाण्यावर आणले आहे. आणि माझ्या मते मोदीजींच्या अनेक धोरणांमध्ये महाराजांच्या राजनीतीच्या छटा प्रकर्षाने जाणवतात. 

महेश तेंडुलकर यांचे "शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज' या पुस्तक प्रकाशनाची माहिती खालील प्रमाणे. 



10/24/25

छत्रपतींच्या उदयाच्या वेळेसच्या जागतिक सत्तांचा संक्षिप्तात आढावा

छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनकाल आणि त्यांच्या पराक्रमाचे स्मरण हे नित्य कार्य आहे. इतिहास या गत-काळातील घटना असल्यात तरी त्याच्या सावलीतच वर्तमान जगतो.  स्वराज्य स्थापना, परकीय इस्लामी धर्म व सत्तांचा नाश करणे, हिंदू छत्रपती बनणे, नवीन युद्धशैलीची स्थापना, परराज्य नीती, त्यातील मुत्सद्दीपणा आणि शैली आणि तसेच त्यांची दूरदृष्टी इत्यादी कामगिरी अतुलनीय तर आहेच पण त्या काळातील त्यांच्या शत्रू शाह्यांचा बलाढ्यापणा लक्षात घेतला तर त्यांची कारगिर्दी अदभूत ठरते. आपण त्यांच्या काळातील जागतिक पातळीवरील सत्तांचा थोडक्यात आढावा घेऊ. जागतिक सत्ता म्हटले कि आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही इत्यादी छोट्या मुसलमानी शाह्यांना आपण या लेखापुरते तरी वगळूया. याचा अर्थ या शाह्या शक्तिशाली नव्हत्या असे नाहीं. पण मुघल, पोर्तुगीज किंव्हा तुर्की आटोमान पुढे या दक्षिण भारतातल्या शाह्या फारच लहान होत्या.   

छत्रपतींचा जन्म सन १६३० ला झाला. त्या काळात उत्तर भारत - म्हणजे अफगाणिस्तान पासून ते बंगाल पर्यंत आणि कश्मीर पासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत मुघली सत्ता घट्ट झाली होती. शहाजहान मुघली बादशाह होता आणि तो मुघली सत्ताधाऱ्यांच्या वंशावळीत पाचवा बादशाह होता. मुघली राज्य तो पर्यंत जवळपास ९० वर्ष जुने होते. मोघली सैन्य महाकाय होते. शहाजहानच्या काळात मोघली पायदळ व घोडदळ एकूण २० ते ४० लाखाच्या घरात होते. "आई-ने-अकबर" हे अकबराच्या कारगीर्दीचा लेखाजोखा, जो अकबराच्या जीवनकाळात त्याच्या दरबारात लिहिल्या गेला होता. त्याप्रमाणे मुघली सैन्य सन १५९९ ला ४४ लाख होते. यात घोडदळ, पायदळ बंदूक-तोफा दळ आणि अनियमित किंव्हा भाडोत्री सैनिक होते. दरबारात लिहिल्या जात असल्यामुळे या आकड्यामध्ये अतिशयोक्ती नक्कीच असणार. तरी मुघली सैन्य २० लाखावर नक्कीच होते. 

औरंग्या जेंव्हा सन १६८२ ला दक्खनी उतरला तेंव्हा तो लाख-दोन लाख सैन्य घेऊन आला होता. औरंगाबाद शहर, जेथे त्याने मुक्काम केला त्यात चार लाखाची भर त्याच्या येण्याने झाली असे नमूद केल्या गेले आहे. सैन्य व्यतिरिक्त जगाच्या अर्थव्यवस्थेचा २०% भाग मुघली अंकुशाखाली होता. तरीही १०० वर्षात मुघलांनी एकही शाळा-विद्यालय किंव्हा कुठल्याही तऱ्हेची उपलब्धी केली नाहीं. नुसते शोषण आणि उपभोग घेतला आणि शेवटी सत्यानाश करून नाहीसे झालेत. असो. थोडक्यात, मुघली सत्ता अनन्यसाधारण बलाढ्य आणि शक्तिशाली होती. मुघलांच्या आधी जवळपास ४०० वर्षे वेग-वेगळे मुसलमान सत्ताधारी दिल्लीत होते. त्यातील कोणाचे हि सैन्य किंवा कोणाचाही खजिना मुघलांएवढा नव्हता. शिवाजी महाराजांच्या उदयाच्या काळात मुघलांचा दबदबा प्रचंड होता. महाराजांच्या तीर्थरुपांना, श्री शहाजी महाराजांना, जेंव्हा आदिशहाने बंदी केले तेंव्हा आदिलशहाला घाबरावयाला शिवाजी महाराजांनी मुघलांशी तह केल्याचा आव आणला. त्याचा परिणाम आदिलशहावर लगेच झाला. त्याने शिवाजी महाराजांनी देऊ केलेले किल्ले आणि जमीन घेऊन, शहाजी महाराजांना लगेच मोकळे केले. 

पोर्तुगीज सत्ता भारतात वास्को-द -गामा सोबत स्थापित झाली असली तरी अल्फान्सो-डी-अल्बुकर्की याने गोवा आदिलशाही कडून सन १५१० ला जिंकले. ते जिंकण्यात त्याला तीमण्णा नावाच्या भारतीय सरदाराने मदत केली. म्हणजे छत्रपतींच्या जन्माच्या वेळी, भारतात पोर्तुगीज सत्ता शंभर वर्षांहून अधिक घट्ट झाली होती. गोवा जिंकल्याच्या काही वर्ष आधी पोर्तुगीजांना (पेद्रो काब्राल) सध्या ज्याला आपण ब्राझील म्हणतो तो प्रदेश सापडला होता आणि त्यांनी तो प्रदेश लगेच गिळायला सुरु केले. पण या कामात त्यांना बरीच वर्षे लागली. या दरम्यान पोर्तुगीजांनी, म्हणजे सन १५२० च्या दशकात इंडोनेशिया चा भाग पादाक्रांत केला. एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी - मुघली साम्राज्यासारखे लाखोंच्या संख्येने पोर्तुगीज कधीच नव्हते पण त्यांच्याकडे परकीय प्रदेश पादाक्रांत करून राज्य करण्याचे ज्ञान आणि अनुभव भरपूर होता. इबेरिया द्वीपकल्पातील हा छोटासा देश पण एकाच वेळेस पूर्वेला गोवा आणि मग इंडोनेशिया तर पश्चिमेला ब्राझील आणि इतर प्रदेश यांनी ढापले. केवढी दुर्दम्य इच्छाशक्ती, बळ, सागरी वाहतुकीचे ज्ञान आणि जिथे पोचू तिथे लोकांना मारून तिथली जमीन गिळायची क्रूर वृत्ती! त्यांनी भारताचा पूर्वी किनारा चांगलाच ताब्यात घेतला होता आणि कोकणातून आणि पूर्वी कर्नाटकातून बळजबरीने लोकांना ते घेऊन अरब देशात गुलामगिरीत विकत असत. तसेच सध्याचा ज्याला आपण अरेबियन समुद्र म्हणतो त्यातील भारतीय मसाल्यांचा व्यापारावर त्यांनी वर्चस्व स्थापन केले होते. छत्रपतींच्या काळात पोर्तुगीज राज्याला उतरती कळा होती. स्पॅनिश साम्राज्याने त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित केले होते. पण छत्रपतींच्या उदयाच्या वेळी पोर्तुगीज उभरत्या मराठा शक्तीपुढे तरी नक्कीच बलाढ्य होते. 

जागतिक सत्ताधाऱ्यांचे सन १६३० चे चित्र बघितले तर स्पॅनिश, डच आणि फ्रेंच साम्राज्य भारतात फारसे पाय रोवू शकले नाहीं. स्पेन आणि पोर्तुगीजांमधे सन १४९४ ला तेंव्हाच्या पोप ने एक करार घडवून आणला. त्या कराराला "तोरदेसीलास चा करार" म्हणतात. त्यानुसार अटलांटिक समुद्राचा पश्चिम भाग स्पेनचा (जिंकलेला आणि न जिंकलेला) तर पूर्वेचा भाग पोर्तुगिजांचा. विचार करा, या दोन देशांनीआपापसात जग वाटून घेतले होते! पण या करारामुळे स्पेन कधी भारताकडे भटकले नाहीं. डच लोकांनी प्रयत्न केला होता पण केरळ मधील त्रावणकोर राज्याचे श्री मार्तंड वर्मा या राजाने त्यांचा इतका मोठा पराभव केला आणि डचांनी पाय काढता घेतला. पुढे मराठा साम्राज्याचे श्री कान्होजी आंग्रे यांनी सुद्धा डचांना हरवले. फ्रेंच साम्राज्याची चुरशीची लढाई इंग्रजांशी जगाच्या काना-कोपऱ्यात होती. ते सध्याच्या उत्तर अमेरिकेत लढले, युरोप मध्ये काढलेत आणि मग प्लासीच्या लढाईत, भारतात लढले. युरोप सोडून, सगळी कडे फ्रेंच इंग्रजांशी हारलेत. प्लासीच्या लढाई जिंकून इंग्रजांनी भारत जिंकले असे दर्शविल्या जाते. माझ्या मते ते बरोबर नाहीं. १७५९ साली कोणीहि वर्तवू शकले नसते कि इंग्रज भारतावर राज्य करतील. कारण मराठ्यांना हरवून बहुतांश भारत पादाक्रांत करायला त्यांना सन १८१८ उजाडला आणि त्यानंतर पंजाब जिंकायला १८३९ उजाडला. असो, तो विषय वेगळा. पण इंग्रजांशी भारतात हारल्यावर पॉण्डेचेरी सोडून फ्रेंच पुन्हा भारताकडे आले नाहीत. 

त्या काळातील अजून एक साम्राज्य म्हणजे ऑटोमन तुर्की मुसलमानी साम्राज्य पण त्यांना युरोप जिंकण्याची इतकी तहान होती कि त्यांना भारताकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. तुर्की आरमार बलाढ्य होते पण सन १५७१ च्या लपांटोच्या लढाईत त्यांचा युरोपिअन सामूहिक सत्तांकडून सपाटून पराभव झाला आणि त्यानंतर तुर्की आरमाराने फारशी कधी मान वरती काढली नाहीं. 

आता राहिले इंग्रज. हेन्री ओक्सेंडेन हा सन १६७४ ला मुंबईच्या इंग्रजी वखारीत अधिकारी होतं. तो पुढे १६७७ ते १६८१ मुंबई वखारीचा मुख्याधिकारी पण झाला. (इंग्रजांनी नेहमीप्रमाणे त्या पदाला गव्हर्नर ऑफ बॉम्बे अशी पोकळ गर्जनास्पद नाव दिले होते!) हा ओक्सेंडेन शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला रायगडी उपस्थित होता आणि त्याने ईस्ट इंडिया कंपनी तरफे महाराजांना नजराणा दिला होतं. श्री बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'राजा शिवछत्रपती' शिवाजी महाराजांच्या चरित्रात राज्याभिषेकात या क्षणाचे फार सुंदर चित्र रेखाटले आहे. पण महाराजांच्या दृष्टीने इंग्रज किंव्हा ईस्ट इंडिया कंपनी किती महत्वाची होती? राज्याभिषेकाला नंतर  तब्बल दीडशे वर्षांनी इंग्रज भारतावर राज्य करू लागले. म्हणून आजच्या काळात या ओक्सेंडेनच्या राज्याभिषेक भेटीला आपण महत्व देतो. महाराज स्वतः इंग्रजांना नेमके जाणून होते पण त्यांच्या दृष्टीने इंग्रजांना फारसे महत्व नसणार. व्यापारी आणि धूर्त असे इंग्रज हि कल्पना महाराजांची असणार म्हणूनच त्यांनी त्यांच्याकडून फायदा आणि व्यापार करून घेण्याचा सदैव प्रयत्न केला. इंग्रजांची महत्वाकांक्षा जरी फार मोठी असली तरी त्यांची परिस्थिती १७ व्या शतकाच्या भारतात फारशी ताकदीची नव्हती. येथे इंग्रज म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. इंग्रज म्हणजे इंग्रजी राजसत्ता नव्हे. सन १६१३ ला मुघली जहांगीर ने ईस्ट इंडिया कंपनी ला सुरत बंदरावर 'फॅक्ट्री' टाकण्याची अनुमती दिली. पण व्यापारी धंद्याव्यतिरिक्त इंग्रजांच्या काही पाऊलखुणा भारतात पुढली दीडशे वर्ष नव्हत्या. पोर्तुगीज आणि स्पॅनिश सत्तांपुढे ब्रिटिश फारच चिल्लर होते. सन १७व्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांनी सध्याच्या उत्तर अमेरिकेत - मॅसॅचूसेट्स राज्यात आपली 'कॉलोनी' स्थापन केली होती. आणि सध्याच्या वेस्ट इंडिज बेटांवर पण कॉलोनी स्थापन केली होती. पण तेवढेच. छत्रपतींच्या काळात किंव्हा शंभर वर्षे पुढे, अगदी सन १७७० ला सुद्धा कोणी वर्तविले असते कि इंग्रज भारतावर राज्य करतील तर त्याला वेड्यात काढले असते. इंग्रजांचे भारतावर राज्य जिंकले हे खरे पण तेवढेच आपण राज्य त्यांना दिले, हे पण तेवढेच खरे आहे. त्यांची महत्वाकांक्षा, त्यांची हुशारी आणि एका-मेकात लढायला लावून देण्याचा मुत्सद्दीपणा कौतुकास्पद आहे. आणि त्यांचे राज्य स्थापन होण्याची हि महत्वाची कारणे आहेत. पण तो विषय वेगळा आणि त्यावर नंतर नक्की लिहीन. 

या लेखा मागचा उद्देश म्हणजे छत्रपतींच्या काळातील इतर बलाढ्य साम्राज्यांचा थोडक्यात आढावा देणे होतं. मोघल काय किंव्हा पोर्तुगीज काय किंव्हा आदिलशाही काय, सगळ्यांकडे छत्रपती आणि मराठी स्वराज्याच्या तुलनेत अमाप पैसे, सैनिक आणि शस्त्रात्रं होती. तरी एक एक करून शिवाजी महाराजांनी धैर्याने, शौर्याने, मुत्सद्दीपणाने, दूरदृष्टीने, चपळाईने आणि लागेल तिथे संयमाने, या सगळ्यांवर मात केली. त्यांचा इतक्या बलाढ्य आणि क्रूर साम्राज्यांना लढा लक्षात घेतला तर त्यांचे कर्तृत्व अजूनच झळाळते, लखलखते. 

हा लेख लिहितांना छत्रपती आणि इतर परराज्य सत्तां मधील एक महत्वाची भिन्नता लक्षात आली. आजकाल पुरोगामी किंव्हा सेकुलर जमातीत एक नवीन विचारप्रणाली दिसते. छत्रपतींचे हि लोक आता कौतुक करतात पण या जमातीचे म्हणणे असे कि मराठी स्वराज्य किंव्हा छत्रपती किंव्हा पुढे पेशवे हे भारतातील इतर राज्यकर्त्यासारखेच होते. थोडक्यात मुघल किंवा आदिलशाही आणि मराठ्यांमध्ये फारसे अंतर नाहीं. यासारखे थोतांड ऐकले कि कानशिले तापतात. 


महाराजांनी 'हे राज्य श्रींचे' म्हणून स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या राज्यस्थापनेमागे परराष्ट्रांची, परकीय किंव्हा परधर्मीयांची कत्तल करणे, लूट करणे, विध्वंस करणे हे कधीच नव्हते. भारतात हिंदूंवरचे अत्याचार थांबावे, त्यासाठी रक्तपिपासू परकीय मुसलमानी सत्तांना हरविणे आणि हिंदूंचे राज्य स्थापन करावे हि त्यांची मनीषा होती. हे वैयक्तिक भरभराटीची स्वप्न नव्हते तर देश, समाज आणि धर्म यांचे संरक्षण, संगोपन आणि उत्कर्षाचा लढा होता.

"In art books and history books, people write of the Muslims "arriving"in India, as though the Muslims came on a tourist bus and went away again. The Muslim view of their conquest of India is a truer one. They speak of the triumph of the faith, the destruction of idols and temples, the loot, the carting away of the local people as slaves, so cheap and numerous that they were being sold for a few rupees. The architectural evidence-the absence of Hindu monuments in the north-is convincing enough. This conquest was unlike any other that had gone before. There are no Hindu records of this period. Defeated people never write their history. The victors write the history. The victors were Muslims. For people on the other side it is a period of darkness. "  - V.S. Naipual


 

छत्रपती जर का दिल्लीधीश झाले असते तर त्यांनी मशिदी किंव्हा चर्चेस तोडल्या नसत्या. मुसलमानांवर इस्लाम अनुयायी म्हणून कर लादला नसता, मुसलमानी बायका किंव्हा ख्रिश्चन ब्याक  पळविल्या नसत्या आणि त्यांची पोरे गुलामगिरीत विकली नसती. मुसलमानांची किंव्हा ख्रिश्चनांची लाखोंनी हत्या केली नसती. किंबहुना, दिल्लीधीश नसूनही त्यांनी किंव्हा मराठ्यांनी हि असली कामे केले नाहीत. मुघल असो, ब्रिटिश असो, पोर्तुगीज असो, डच असो किंव्हा फ्रेंच असो, हि सगळी राज्य आणि राज्यकर्ते  रक्तपिपासू, स्वार्थांधळी, आत्यंतिक उपभोगी, क्रूर आणि विध्वंसक होती. भारत देश त्यांच्यासाठी परका होता, भारत देश जिंकून लुटायला होता. भारतीय, आणि हिंदू, त्यांच्यासाठी लुटायला, मारायला आणि गुलाम करायला होते. आपली धर्मस्थळे विध्वंस करायला होती. आणि याचे व्रण अजूनही आपल्याला सगळीकडे दिसतात. 

अलीकडेच मुघल आपलेच आहेत अशी वदंता उठविली जाते आहे. कारण म्हणे ते भारत सोडून निघून नाहीं गेलेत. इथेच राहिलेत. आणि राहून काय केले? एक उदाहरण देतो. सेतू माधवराव पगडी यांच्या मराठा इतिहास पुस्तकातील आहे. बहुधा सन १६९० चे दशक असेल. औरंग्याच्या कुटुंबातील काही कुटुंबीय महाराष्ट्रात प्रवास करतांना मराठ्यांनी हल्ला केला. निकाराचे युद्ध सुरु झाले. मराठे वरचढ ठरत होते. मुघली तुकडीला पळायला हि वाट मिळेना. तेंव्हा त्या कुटुंबियांमधली एक बेगम प्रोत्साहनार्थ ओरडू लागली कि "आपण चंगेझ चे वंशज आहोत आणि काफ़िरांशी हारु शकत नाहीं" त्याचा काय परिणाम झाला त्यांचा चंगेझच जाणे पण त्यांना पळायला वाट मिळाली. सगळी सामुग्री मराठयांच्या हाती लागली. यातला चंगेझ म्हणजे चेंगीझ खान. पहिला मुघल हुमायून स्वतःला चंगेझ खानचा वंशज म्हणवीत. या मुघलांना स्वतः कधी आपण भारतीय आहोत वाटले नाहीं पण आत्ताच्या पुरोगामी थोतांडवाडी मात्र त्यांना आपले बनवायला तयार आहेत. 

आपले राजे असे नव्हते, आपले मराठे असे नव्हते, आपले पेशवे असे नव्हते, आपले होळकर, शिंदे, भोसले असे नव्हते. याचा आपण सार्थ अभिमान बाळगायलाच हवा. 

10/8/25

झाकली मूठ सव्वा लाखाची

 


खाडकन केतनच्या थोबाडीत पडली. त्याचे कान सुन्न झालेत. खरंतर केतनने कोचने शिकविल्या प्रमाणे बॉक्सिंग ची नीट पोज घेतली होती. डावा पाय थोडा पुढे आणि उजवा पाय थोडा मागे. आणि डावी मूठ वळून पुढे आणि उजव्या हाताने मूठ वळून कान-गाल-डोळा झाकला होता. निदान त्याला वाटले कि त्याने चेहेऱ्याचा उजवा भाग नीट झाकला होता. उजवा खांदा थोडा वर करून त्याने चेहरा खालती केला होता. पूर्ण लक्ष देऊन तो समोरच्या कडे बघत होता. 

केतन बॉक्सिंग चे क्लासेस नुकतेच घ्यायला लागला होता पण त्याने प्रगती झपाटयाने केली होती. मुळात त्याची उंची चांगली होती आणि नियमित व्यायाम केल्या मुळे त्याच्यात ताकद चांगली होती. 

निदान त्याला असे वाटत होते. 

"सर, आप को मारना कैसे है, ये मैं सिखा सकता हुं. पर, मार खाना एक अलग बात है. ये तो सिखाया नहीं जा सकता." कलीम सर, केतन चे बॉक्सिंग कोच जणू त्याच्या कानात बोलत होते. 

"आय-टी कंपनी मी काम करने वाला आदमी हुं, लडाई-झगडे का मौका कभी नही मिलेगा" 

"तय्यारी होना सहाब" 

केतनला वाटलं तेवढा त्याचा उजवा चेहरा झाकल्या गेला नव्हता. त्याला कानाजवळ गरम काही तरी ओघळतंय असे वाटले.

" हा बघ, चॊमु, बॉक्सिंग करणार आहे माझ्याशी. बांडगुळा सारखा काही तरी पोज घेऊन उभा आहे." समोरचा खिदळत त्याच्या मित्राला म्हणाला. 

'मी बांडगुळासारखा उभा आहे?' केतनला प्रश्न पडला. बांडगुळ म्हणजे परजीवी वनस्पती. बांडगुळासारखा कसा कोणी उभं राहू शकत?" केतन विचार करू लागला. पण विचार करणें जरी चांगली सवय असली तरी नको त्या ठिकाणी विचार करणे तोट्याचे ठरू शकते. 

या भानगडीतच तो समोरचा अचानक पुढे आला आणि त्याच्या डाव्या हाताच्या सणसणीत झापडेने केतनच्या गालाची हिंसक पापी घेतली. केतन जागचा हलला. पण त्याच्यात तेवढीही कमी ताकद नव्हती. त्याने तोल सांभाळला आणि तो दोन-तीन पावला मागे गेला. 

"अगर मारने का मौका ना भी मिले तो भी चलेगा पर. पर आपने  मार खाना नहीं है. डिफेन्स फर्स्ट!" केतनच्या डोक्यात कलीम सर पुन्हा बोलू लागले. जणू ते तिथे त्याच्या बाजूलाच उभे आहेत. त्याने विचार केला डोक्यात असण्यापेक्षा कलीम सर प्रत्येक्षात तिथे उभे असते तर जास्त फायद्याचा असत. 

" मैं आप को बॉक्सिंग रिंग का बॉक्सिंग सिखा रहा हूँ. पर रास्ते पे झगडा होता है तो डिफेन्स फर्स्ट के भी पाहिले आप भागने का सोचो. रास्तो पे झगडा करने में किसी का भला नहीं होता. और झगड के क्या हि मिलेगा?" 

"सर, आप भी मजाक करते हो. मुसीबत बता के थोडी ना आती है. और गलत जगह फस गया फिर हात-पैर तो घुमाने हि होंगे." कलीम सर पुढे काही बोलले नाहीं. 

चुकीच्या जागी केतन नक्कीच फसला होता. डोंगर चढायला म्हणून तो बायको पोरा सोबत निघाला. त्या साठी मुद्दाम प्रवास करून त्या गावात आदल्या रात्री पोचला. सकाळचे अवरोहण छान झाले. उतरतांना निमुळत्या वाटेबाजूला दोन लोक दारू पीत बसले होते. त्यांनी काही ओंगळवाण्या टिप्पण्या केल्यात. केतन त्यावर त्यांना काहीतरी म्हणाला आणि आता तो बॉक्सिंग ची डिफेन्सिव्ह पोज घेऊन उभा ठाकला होता. त्याच्या उजव्या कानातून रक्त येत होते. 

समोरचा पुन्हा सरसावला आणि त्याने या वेळेस त्याचा उजवा हात सपाट्याने फिरवला. पण केतन ने त्याचा पंच बरोबर ओळखला आणि घुडघे थोडे वाकून, डोकं बरोबरअसे मागे केले कि त्या माणसाचा हात वेगाने त्याच्या धरधरीत नाकापासून काही इंचावरून निघून गेला. 




पण या संधीचा फायदा घेत केतन ने डिफेन्सिव्ह पोसिशन, ऑफेन्सिव्ह मधे बदलली. आणि डाव्या हाताने वळलेली मूठ समोरच्याच्या हनुवटीवर खाडकन बसवली. 

'अप्पर-कट!' कलीम सरांचा आवाज पुन्हा कानात फिरला. 

समोरचा पुन्हा केतन च्या अंगावर आला. केतन ने त्याला हुलकावणी दिली आणि विरुद्ध बाजूने पुन्हा त्याच्यासमोर उभा झाला. 

केतन ने मगाशी मारलेला उप्पर-कट आता त्याला बोटांना आणि बोटांच्या सांध्यांना जाणवायला लागला होता. आत्ता पर्यंत बॉक्सिंगच्या क्लासला त्याने बँडेज आणि ग्लोव्हस घालूनच पंचिंग केले होते. इथे आयुष्यात पहिल्यांदा त्याने कोणाला पंच मारला आणि ते पण उघड्या मुठीने! त्याने पंच अगदी पुस्तकी मारला होता. कारण समोरच्याच्या तोंडातून रक्त यायला लागले होते आणि केतनची मूठ दुखत असली तरी तो अजून मूठ वळू शकत होता. केतनचा आत्मविश्वास थोडा वाढला. 
या मारा-पिटीत एक चांगली गोष्ट म्हणजे, दुसरा दारुडा फारच हलका-फुलका होता. बहुधा तो एका पायाने अधू होता. खिदळण्या पलीकडे तो फारसा काही लायक नव्हता. केतनच्या समोरच्याच्या तोंडातून रक्त येतांना बघून दुसऱ्याचे खिदळणे मात्र आता बंद झाले होते. 
"तू पोराला घेऊन पळ इथून. मी बघतो काय करायचं ते." केतन बायकोला म्हणाला.
"तुला एकटं सोडून मी इथून निघत नाहीं या. जे काही आहे मिळूनच करू या" केतनची बायको त्याला म्हणाली. ती घाबरली होती पण तिने हिम्मत हारली नव्हती. तिनी जवळचा एक गरगरीत गोटा उचलून त्या अधू-दुसऱ्याला फेकून मारला. त्याच्या मांडीला का कमरेला तो सपाटून बसला. 
"आई ग...लागलं रे" असा काहीस म्हणत तो मागे सरकला. 
" बायकोला समोर कर तू. कारण तू मारलेला पंच मला पापी दिल्या सारखा वाटला" तोंडातून येणारे रक्त थुंकून केतनच्या समोरचा बरळला. 
" साब, सामने वाला कुछ भी बोले आपने ऊसपे ध्यान नही देना है. बोलने दो सामने वाले को. बॉक्सिंग में ताकद  बचा के रखना है. और जब जरुरत पडे तभी इस्तेमाल करना है.   
केतनच्या कानात पुन्हा कोचिंग सुरु झाले. 
तेवढ्यात केतनच्या बायकोने अजून एक गरगरीत गोटा केतनच्या समोरच्यावर पूर्ण ताकदीने फेकला. त्याला तो खांदा आणि मानेच्या सांध्यावर सपाटून बसला. 
"आई ग....." तो केकाटाला. आता त्याला कळेना नेमके काय करायचे. तो खांदा दाबून मागे झाला आणि त्याने केतनच्या बायकोवर नजर रोखली. 
" आता तरी पळतेस का?" पण केतनच्या बायकोच लक्ष नव्हते. ती आणि आणि केतनच्या १० वर्षाचा पोरगा दगड शोधत होते.
"अरे टोण्या, काही कर! काही नाहीं तर त्या बाई ला आवर" केतनच्या समोरचा अधू-दुसऱ्यावर खेकसला. 
"दगड मारते कि हि बया! सगळी उतरून गेली. पैसे वाया!" असे म्हणत लंगडत तो दुसरा तिथून खसकला.
केतनच्या समोरच्याचा खांदा-मान चांगलीच ठणकत असणार. त्याने केतनच्या बायकोच्या दिशेने मुसंडी मारली. केतन त्याच्या समोर आला आणि त्याच्या छातीला मिठी मारली आणि त्याची कंबर पकडून त्याला मागे रेटू लागला. समोरचा केतन ला पुढे रेटत होता. 

"बॉक्सिंग में साब, सामने वाले का ताकद जलना है. आदमी को मार के कमजोर कर सकते है या थकवा के. जैसे हि आदमी थका, उसका बॅलन्स गया"

केतन पाय रेटून पूर्ण ताकद लावून त्याला ढकलले आणि मग त्याला मारलेली मिठी सोडून एकदम बाजूला झाला. केतनच्या समोरचा तोल जाऊन भेलकांडत दाणकन जमिनीवर आदळला. 
केतन त्याच्या अंगावर बसला आणि दनादन त्याच्या डोक्यावर कानावर, जिथे मिळेल तिथे पंचेस मारू लागला. केतनची बायको जवळ आली आणि ती तिच्या ट्रेकिंगच्या बूटाने केतनच्या समोरच्याची बोटे चेंदु लागली. आता समोरच्याची पूर्ण वाट होती. पण तरी त्याने उजव्या हाताने अंगावर बसलेल्या केतनच्या उजव्या कानशिलावर सपाटून झापड मारली. 

केतन पुन्हा सुन्न झाला. आता त्याच्या उजव्या कानातून रक्त येऊ लागले. तेवढ्यात केतनच्या बायको केतनच्या समोरच्याच्या उजव्या हाताची बोटे चेंदु लागली. केतनच्या समोरचा आता वेदनेने जोरात ओरडू लागला.          
केतन त्याच्या अंगावरून उठला आणि काही पावले मागे गेला. समोरचा लगेच उठला. केतनला ते अपेक्षित नव्हते. केतनची बायको काही फूट त्याच्या मागे उभी होती. 

"तू तुझ्या मार्गाने जा आणि आम्हाला आमच्याने जाऊ दे" केतन त्याला म्हणाला. 

हळूच केतनच्या बायकोने एक चपटा दगड केतनला दिला आणि ती अजून थोडा अंतर मागे गेली. केतन आणि ती दोघे बघत होते कि समोरचा आता काय करतो. त्याच्या शर्टावर रक्त सांडत होते. तो कातावला होता. अश्या मनस्थिती एकतर दारू उतरून माणूस ताळ्यावर येतो किंव्हा डोक्यात राख घालून टोकाला जातो. समोरच्याने टोकाला जायचे ठरवले होते. काही कमी असेल तर त्याने आज बाई कडून मार खाल्ला होता. 

"साब, बॉक्सिंग रिंग मी ठीक है. रूल्स है, रेफ़री है.   बाहर मारा-पिटी करनी है तो बचाव और फिर बचना सबसे मेन है. अगर खुदा-ना-खास्ता ऐसी नौबत आती है तो जो हात लगे वो सोना. पीटो और फिर भागो" 

समोरच्याने तोंडाचे रक्त पुसले आणि हेलकावे घेत पुन्हा केतन वर धाव घेतली. केतन ने चपटा दगड घट्ट मुठीत दाबला. समोरचा जवळ येताच, केतन पुन्हा गुढघ्यात वाकला आणि पूर्ण ताकदीने हुक पंच मारला. पंचच्या शेवटच्या क्षणाला त्याने मूठ उघडली आणि त्या दगडाने अक्षरश: गालाचे हाड फोडले. समोरचा पुन्हा कोलमडून पडला. दुःखाने त्याला नीटसं रडता पण येईना. पण रडू येऊन त्याचा जबडा अजून दुखत होता. स्वतःला रेटत तो केतन पासून अजून दूर गेला. केतनच्या बायकोच्या हातातला दगड त्याला दिसला असावा. 


"चल, चल, निघ." केतन बायकोला म्हणाला. तिने पोराची बकोट धरली आणि सगळे तिथून पळाले. 
"चांगले पंचेस मारलेस आणि ते पण दोनदा मार खाऊन. ट्रैनिंग कामात येतंय." केतनची बायको धावता धावता केतन ला म्हणाली. 
"तुला तर ट्रैनिंग ची पण गरज नाहीं. वाघीण आहेस तू आतून" केतन म्हणाला. 
ते ऐकून बायकोच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित-हास्य होते. 
--