3/21/26

इंग्रज - एक नार्को स्टेट, अँग्लो-मराठे युद्ध आणि मराठा साम्राज्याचे शेवटचे उपकार



(अफू चे बिहार मधील गोदाम - ब्रिटिश काळातच काढलेले एक चित्र. Source

(नेहमीप्रमाणे विषय हाताबाहेर गेला आणि लेख खूप लांब झाला. पण कृपया अवश्य वाचावा, टप्प्या-टप्प्यात वाचावा हि विनंती. सध्याच्या जगात जेथे १२८ शब्द वाचायला लोकांना जीवावर येत, तिथे मी १८०० शब्दाचा लेख लिहितो आहे. माझं डोकं तपासायला हवे!) 

पार्श्वभूमी:

मराठी साम्राज्याचा सन १૭५० नंतरचा काळ धामधुमीचा होता. तसे म्हंटले तर थोरल्या बाजीरावांच्या काळापासूनच मराठी साम्राज्याची धामधूम चालू झाली पण सन १૭५० नंतर स्थित्यंतरे खूप झालीत. नानासाहेबांच्या उत्तरेतील राजकारणाला रंग येतच होता तर पानिपतचे युद्ध झाले. मराठी राज्य अस्तास गेले अशी समजून पानिपत नंतर झाली असेल तर माधवरावांनी पूर्ण कसर भरून काढली आणि खऱ्या अर्थाने मराठी साम्राज्याचा सुवर्णकाळ 1760 च्या दशकात आला. पण मग माधवराव तरुण वयात गेलेत मग राघोबादादांच्या भानगडी, मग नाना फडणवीस इत्यादी अनेक घटना एका पाठोपाठ होत गेल्या. या दरम्यान उत्तरेत महादजी शिंदे आणि होळकरांनी घट्ट पाय रोवून मराठी राज्य बळवंत आणि स्थिर केले. पण आता शत्रूचे रूप बदलत होते. मुसलमानी सत्ता नामोहरम झाल्या होत्या. आणि पश्चिमेतून युरोपीय देशांची जहाजे  घिरट्या मारू लागली होती आणि त्यातीलच इंग्रजांनी चांगलेच पाय रोवले होते. नागपूरच्या रघुजीराजे भोसल्यांनी अगदी कलकत्त्याच्या सीमे पर्यंत धडक जरी मारली असली तरी दूरदृष्टीच्या अभावी आणि काही चुकीच्या धोरणांमुळे  एक तर ओडिसा आणि बंगाल मध्ये मराठयांना पाय रोवता नाहीं आलेत आणि मराठ्यांनी घातलेल्या गोंधळामुळे इंग्रजांचा खूप फायदा झाला. तिथले मुघली राज्य मराठ्यांमुळे आपसूकच खिळखिळे झाले आणि बंगाल आणि बिहारचा सुपीक भाग इंग्रजांना गिळता आला. 

या काळाचा जर का इतिहास आपण सध्याच्या पुस्तकांमधून वाचायला गेलो तर दोन गोष्टी मांडल्या जातात : १) मुघली साम्राज्य लयाला जाऊन इंग्रजांनी भारत जिंकला. यात मराठ्यांचा फारसा उल्लेख केल्याचं जात नाहीं. जणू मराठे मधल्या शंभर वर्षात गिल्ली-दांडू खेळात होते! २) इंग्रज इतके बलाढ्य होते कि त्यांनी भारत जिंकणे अगदी  सहाजिकच  होते . भारत अगदी गलितगात्र झाला होता. किंबहुना भारत हि संकल्पनाच कधी नव्हती आणि इंग्रजांनी हा उपखंडीय भाग जिंकून उपकार केले आणि भारत जन्माला घातला. याहून पुढे जाऊन इंग्रज-फ्रांस मधील सेवन इयर्स वॉर (Seven Years War)  म्हणून प्रसिद्ध असलेल्या संघर्षात ( सन १૭५६ ते १૭६३) इंग्रज जिंकल्यावरच त्यांचे संपूर्ण भारतावर राज्य स्थापित झाले. 

या दोन्ही गोष्टी ऐतिहासिक दृष्ट्या आणि पुरावे बघता खऱ्या नाहीत. इतिहास कधीच सरळ रेघत जात नाहीं आणि इतिहास नेहमीच रंगेबिरंगी असतो -  एकदम इस्टमन कलर! 

विषय प्रवेश:

मागे मी भारतात अगदी सन १८०३ पर्यंत मराठे कसे बलाढ्य होते आणि अगदी बंगाल, बिहार आणि पूर्वी उत्तर प्रदेश (सध्याचे) इंग्रजांकडे असले तर ते भारतावर राज्य करतील असे कुठलेही संकेत सन १८०० पर्यंत नव्हते या विषयावर दोन-तीन लेख लिहिले होते. त्या श्रुंखलेतील हा पुढला लेख समजावा. या लेखात आपण इंग्रज आणि त्यांनी मांडलेल्या अफूच्या व्यापाराबद्दल थोडी माहिती घेऊ. त्यान्वये इंग्रज-मराठा युद्धात मराठे कसे बलाढ्य होते याची दखल घेऊ. आणि शेवटी, जरी मराठा साम्राज्याचा १८१० पर्यंत अस्त झाला तरी अफूच्या व्यापाराने जशी बिहार, बंगाल आणि पूर्वांचल भागाची दयनीय अवस्था केली तशी अवस्था मराठा साम्राज्याच्या भूमीची का झाली नाहीं हे जाणून घेऊ.  

इंग्रज - एक नार्को-स्टेट (Narco State): 

सन १૭६० नंतर दोन गोष्टी इंग्रजांच्या बाजूने होत्या १) त्यांची वेस्ट इंडिज मधील कॉलनी फार लाभकारक ठरत होती. मुख्यत्वे त्यांचा आफ्रिकेतून लोकांना पकडून गुलामगिरीत विकण्याचा धंदा चांगलाच जोरात चालू होता. २) गुलामगिरीच्या व्यतिरिक्त त्यांनी अफू चा धंदा चालू केला होता आणि त्यात बंगाल-बिहार मध्ये त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. तिथून अफू उगवून ते पुढे चीन मध्ये प्रचंड नफ्यात विकत होते.  थोडक्यात इंग्रजांकडे प्रचंड प्रमाणावर पैसे येत होते. आणि असे असूनही मराठे त्यांना भारी पडत होते. 

(Indian Express: Opium: The drug that gave colonialism a real high)

सध्या श्री अमितव घोष यांचे स्मोक अँड आशेस (Smoke and Ashes) हे पुस्तक वाचनात आले. पुस्तक म्हणजे इंग्रजांनी सन १૭૭० ते सन १८५० च्या काळात    मांडिलेल्या अफूच्या व्यापाराबद्दलचा लेखाजोखा आहे. इंग्रजांनी हा व्यापार का सुरु केला, आणि मग तो कसा वाढविला आणि तो जपायला काय काय अत्याचार त्यांनी भारत, दक्षिण-पूर्व आशिया आणि चीन वर केलेत हे या पुस्तकात सोप्या भाषेत दर्शविले आहे. इथे व्यापार हा शब्द जरी वापरीत असलो तरी हा केवळ व्यापार नव्हता. सध्याच्या दक्षिण अमेरिकेतील काही देशांना, जिथे कोकेन नावाच्या अवैध उत्तेजक ड्रग चे उत्पादन होते, 'नार्को-स्टेट ' असे म्हंटल्या जाते. म्हणजे या देशात या अवैध ड्रग (Narcotics)  चे उत्पादन आणि तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे (Gangs) इतके वर्चस्व आहे कि या देशांचे अस्तित्व धोक्यात आहे. इंग्लड हे जगातील पहिले नार्को स्टेट म्हणायला हवे. कारण स्लेव ट्रेडिंग आणि अफूवर इंग्लंड साम्राज्य झाले. तेंव्हाचे इंग्लंड आणि आत्ताच्या नार्को स्टेट मधील फरक असा कि सध्याच्या नार्को स्टेट मध्ये फक्त गँग्स श्रीमंत होतात पण देशाचा सत्यानाश होतो. इंग्रजांनी 'सत्यानाश' हा भाग आऊट-सोर्स केला होता - भारताला आणि चीन ला!  आपल्या देशाचे वाटोळे झाले  पण इंग्लंड गर्भश्रीमंत झाले. थोडक्यात इंग्रजाकडे १७व्या शतकाच्या शेवटी-शेवटी अफाट पैसे होते. त्यामुळे त्यांनी बंगाल-बिहार जिंकल्यावर उर्वरित भारताकडे नजर रोखली. आणि आता त्यांच्या भारत पादाक्रांत करण्याच्या मार्गात फक्त मराठे उरले होते. 

अँग्लो-मराठे युद्धे:

सन १८०३ मराठा आणि इंग्रजांमध्ये आसइ (सध्याचा जालना जिल्हा) येथे  घनघोर युद्ध झाले. यात इंग्रजांचे जगप्रसिद्ध सेनानी आर्थर वेल्सली इंग्रजांचे सेनापती होते तर विरोधात मराठा शिंदे, नागपूरचे भोसले आणि होळकर होते.  या युद्धाबद्दल वेल्सली चे सैनिक काय म्हणतात बघा: 

"The military historianRandolf Cooper writes:

The memoirs of the British officers who witnessed the Maratha Artillery in action leave no doubt about its level of sophistication. At the time of the Second Maratha War (1803), France was considered to have the finest artillery in the world. When British officers saw the volume of fire produced by the Maratha gruns, some asserted incorrectly that they were manned by Frenchmen but all agreed the effect was devastating. Another false assumption was that Frenchmen were responsible for the production of artillery and its accoutrements in India, when in fact the French mere provided the most modern example to be copied" (P 102) 

पुढे जायच्या आधी महत्वाची ऐतिहासिक गोष्ट म्हणजे - आर्थर वेल्सली ने १૭९९ ला टिपू ला मैसूर च्या युद्धात मारले. मग त्याची बदली पुन्हा इंग्लंड मध्ये झाली. तिथून पुढे त्यांनी सन  १८१५ ला नेपोलियन चा पराभव वॉटरलू च्या युद्धात केला. दोन खंडामध्ये तेथील साम्राज्ये एकाच माणसाने युद्धात पराभवीत करण्याचे हे दुसऱ्या महायुद्धापर्यंत तरी एकच उदाहरण असेल. असो. 

(Wikipedia

या अँग्लो-मराठा युद्धांमध्ये पुढले युद्ध दिल्ली जवळ जनरल लेक याने दौलतराव शिंदे यांच्या विरुद्ध केले. यातही मराठ्यांचा पराभव झाला. पण जनरल लेक ने या युद्धाबद्दल काय म्हंटले आहे ते वाचा: 

"In a letter to the Governor General, Lake, who lost his son on the battlefield, wrote:

These (Maratha) battalions are the most uncommonly well appointed, have a most numerous artillery, as well served as they possibly can be, the gunners standing to their guns until killed by the bayonet. All the sepoys of the enemy behaved exceedingly well...i never was in so severe a business in my life and pray God I never may be in such a situation again. Their army is better appointed than ours; no expense is spared whatever, and they have three times the number of men to a gun we have...These fellows fought like devils, or rather heroes...I verily believe, from the position they had taken, we migh have failed.

हा जनरल लेक सुद्धा वेल्सली सारखाच शूर होता. त्याने आयर्लंड मध्ये इंग्रजांकडून फार मोठा पराक्रम गाजविला होता आणि म्हणून त्याला पुढे भारतात पाठविले होते. थोडक्यात इंग्रजांच्या अतिप्रसिद्ध आणि शूर सेनापतींना मराठ्यांनी पाणी पाजलेच होते.


  (Wikipedia)

लेख पुढे नेण्याआधी एक नमूद करावेसे वाटते. एक म्हणजे इंग्रज अफूच्या आणि स्लेव्ह ट्रेडिंग मध्ये पैसे कमावून बलाढ्य होत होते. त्यामुळे या युद्धांमध्ये जरी मराठे जिंकले असते तरी इंग्रजांनी माघार घेतली नसती आणि ते येन-तेन-कारणेन हल्ले करीतच राहिले असते. दुसरे म्हणजे मराठ्यांमध्ये फूट पडत होती. पेशवाई नाममात्र उरली  होती. मूळ पेशवाऱ्यांशी रक्ताने  किंव्हा शौर्याने १८०३ च्या पैश्यांचा काहीच संबंध उरला नव्हता. त्यामुळे हिंदवी साम्राज्याची भारताला व्याप्त करणारी दृष्टी नामशेष होत होती. शिंदे -होळकर कधी एकत्र लढले तर कधी मूग गिळून गप्प बसून दुसऱ्याचा नाश बघितला. नागपूर भोसले कधी एकत्र आले आणि नाहीं तर इंग्रजांशी करार करून गप्प बसले. वेल्सली तर पेशव्यांकडून लढत होता! आता काय म्हणचे? जो घडला तो इतिहास पण त्यांचे पडसाद आणि प्रतिसाद दूर पर्यंत ऐकू येत गेलेत. मराठा साम्राज्य नाहीसे झाले तरी दिल्ली, माळवा - मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राचे त्यांनी जाता - जाता भलेच केले. ते कसे पुढे बघूया. 


(The Opium Wars in China)

ईस्ट Vs. वेस्ट: 

भारतात अफूचे उत्पादन इंग्रजांनी का सुरु केले हा एक स्वतंत्र विषय आणि लेख आहे. पण थोडक्यात, इंग्रज भारतातील अफू चीन ला विकून तेथील गोष्टी इंग्लंड किंव्हा इतर जगात विकत. हळू हळू, भारतातील अफूचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढवून इंग्रजांनी अफूचा जणू पूर  चीन मध्ये आणला आणि चीन च्या अनेक पिढ्यांचे भविष्य उध्वस्त केले. बर, भारतात जी लागवड झाली त्याचा फायदा भारतीय शेतकऱ्यांना झाला का? अर्थातच नाहीं. इंग्रजांनी भारतीय शेतकऱ्यांना - मुख्यत्वे सध्याच्या बंगाल, बिहार आणि पूर्वांचल (पूर्वी उत्तर-प्रदेश) भागातील शेतकऱ्यांना त्यांनी घाणीला लावून जणू पिळून घेतले. अफुचीच लागवड करायची, ती अफ़ू इंग्रजांना ठरलेल्या भावातच विकायची, नुकसान झालं तरी इंग्रजांना नुकसान भरपाई करून द्यायची. 

"The farmers' contracts stipulated that they were to transport their harvest, in its entirety and at their own cost, to an official collection center, where, after weighing and quality control, they were, in principal, meant to be paid the price set by the Opium Department. This rate remained stagnant at Rs. 3.50 for a seer (a little more than a kilogram) of raw opium through much of the earlynineteenth centruy and rose only slightly thereafter. So low was the rate that it did not even cover the farmers' expenses." (P 57, Smoke and Ashes) 

प्रत्येक गावात एक अधिकारी, एक गोदाम आणि अत्यंत क्रूर पोलीस वर्ग उभा करून इंग्रजांनी या भागातील लोकांना जर्जर करून ठेवले. १૭९० ला बंगाल मध्ये दुष्काळ आला आणि त्यात दश - लाखात लोक अन्नावाचून हाल-हाल होऊन मेलीत पण इंग्रजांनी उलटा कर वाढवला. जमिनीचा कस निघून गेला, इतर कुठलीही पिके, हवी असली तरी उगवेनाशी झालीत. पण इंग्रज अधिकाऱ्यांच्या  अफूच्या उत्पादनाची मागणी वाढतच गेली. 

अफूचा व्यापार फक्त इंग्रजांपुरतीच सीमित होता. फार म्हणजे फार कमी भारतीयांना (बंगाल, बिहार मधील) या व्यापारात भाग घेता आला. एक मोठे उदाहरण म्हणजे श्री रबिन्द्रनाथ टागोर (ठाकूर) यांच्या पूर्वजांनी यात प्रचंड पैसे कमविला. पण असल्या दुर्मिळ उदाहरणाव्यतिरिक्त अफू ने फक्त इंग्रज व्यापारी धनाढ्य झाले. कलकत्त्याच्या बंदरातून चीन ला जाणारी जहाजे सुद्धा इंग्रजांचीच होती. थोडक्यात शेतकरी होरपळले आणि व्यापारी बुडाले, राहिले मागे काहीच नाहीं. आजही बघाल तर भारतातील सगळ्यात मागासलेला आणि गरीब भूभाग पूर्वांचल, बिहार आणि बंगाल आहे. गंगेच्या काठी वसलेली हि राज्य अजूनही इंग्रजी लुटीचे व्रण अजूनही घेऊन हिंडतायत. 

या अफूच्या उत्पादनाचे दोन भौगोलिक विभाग झाले.  १૭૭० साली इंग्रजांच्या हातात गेलेले बंगाल आणि बिहार आणि अगदी १८१८ पर्यंत हातात ना आलेला माळवा, गुजरात, महाराष्ट्र - जो प्रामुख्याने मराठ्यांकडे होता. अगदी १८१८ च्या पेशवाईच्या अस्तानंतरही हा भाग पूर्ण इंग्रजी बुटाखाली नव्हता. आणि मराठी राज्यकर्त्यांनी या भागावर उत्तम राज्यकारभार असल्यामुळे या भागातील व्यापार, व्यापारीमार्ग, सावकारी दळण-वळण इत्यादी सुरळीत आणि लागलेले होते. या भागातील व्यापारांना पूर्वेला चाललेल्या अफू व्यापाराचा गंध लागला होता. पण इंग्रजांनी या भागातून अफूचा व्यापार करायला बंदी आणली होती. अर्थात, हि बंदी कशी अंमलात आणणार? माळव्यातील शेतकऱ्यांनी ताबडतोब अफू ची लागवड सुरु केली. पण हि लागवड स्वनिर्णयाने  केली. त्यामुळे पीक बदलणे किंव्हा लागवडीत कमी-जास्त करणे, जो किंमत जास्त देईल त्यालाच विकणे आणि नाहीं विकल्या गेला तर स्वतःच्या गोदामात साठवून ठेवणे इत्यादी स्वातंत्र्य माळवा, गुजरात मध्य प्रदेश भागातील शेतकऱ्यांना आणि व्यापारांना होते. 


या भागातील राजे, इंग्रजी सत्तेचे अंकित असले तरी, स्वतंत्रपणे ते व्यापार करू शकत होते, त्यांनी अफू व्यापारात पैसे घातला. मुंबईहून हि अफू चीन मध्ये जायला लागली. आणि मुंबईत निर्यातीच्या व्यापारात पारशी आणि गुजराती/मारवाडी व्यापाऱ्यांनी अगदी घट्ट जम बसविला. सुरुवातीला इंग्रजांनी याला आळा घालायलाच प्रयत्न केला पण काही वर्षांनी इंग्रज स्वतःच मुंबईहून होणाऱ्या व्यापारात शामिल झाले. पूर्व भारतातील अफू व्यापार आणि पश्चिम भारतातील अफू व्यापारातील महत्वाचा आणि निर्णायक फरक असा कि पश्चिमेतील उतपादन आणि व्यापारातील पैसे समाजातील विविध गटात आणि स्तरापर्यंत पोचत होता. आणि आजही  महाराष्ट्र, गुजरात, माळवा भाग इतर उत्तर भारताच्या तुलनेत संपन्नच आहे. मराठे, मराठा साम्राज्य आणि मराठा घराणी कधीच अफूच्या व्यापारात नव्हती. अफूचा व्यापार इंग्रजांनी सुरु केला आणि ते पाप त्यांच्या माथीच  पण मराठ्यांचा प्रतिकार, त्यामुळे इंग्रजांनी पश्चिम भारतात जनतेला आणि व्यापारांना दिलेली सूट आणि त्यामुळे पुढे व्यापारात तरी मिळालेले स्वातंत्र्य या शृखंलेमुळे पश्चिम भारत इंग्रज निदान सुरुवातीला तरी पूर्व भारतासारखा ओरबाडून लुटू शकले नाहीं आणि  मराठा साम्राज्याची शेवटची भेट मानायला हवी. 

"But the real reason to be learnt from the commercial world of western India is that political and military support have always been crucial to the flourishing of business and enterprise in the modern era. If private enterprise was able to thrive in wester India, but not in the east, it was ultimately because the Maratha kingdoms were able to fight off the predatory colonial power for much longer than the states of theGangetic plain. The credit for western India's entrepreneurial prowess is ultimately due not only to the financial acumen of its businessmen but also to the foresight and acuity of the political and military leadership of the Maratha states." (P 115, Smoke and Ashes) 

शेवटचा धडा: 

इतिहास वाचन माझी आवड आहे. कारण इतिहासात वर्तमानातील व्रण समजतात आणि भविष्याचे खुळखुळे ऐकू येतात. इंग्रजांची एक 'भेट' म्हणजे त्यांनी आपल्याला मिंधे केलं. आपल्याला आपलीच लाज वाटू लागली, आपल्या इतिहासालाच आपण धुडकारून दिलेआणि आपल्या ऐतिहासिक पराक्रमांना आपण विसरलो. हे सगळे इंग्रजांच्या आणि सध्याच्या पश्चिमी देशांच्या पथ्यावर पडणारे आहे. स्वत्व विसरलो, स्वाभिमान हरवलो आणि आरश्यात ओळखूनासे झालो कि आपण सशक्त आणि एकात्म कधीच होणार नाहीं. आणि असे झाले कि संघर्ष कधी करणार नाहीं. मराठे शेवटी शेवटी एकजूट राहिले नाहीत, त्यांची जाणकार पिढी अचानक, थोड्या कालावधीतच वर गेली. (अहिल्याबाई, महादजी शिंदे आणि नानासाहेब फडणवीस). शेवटच्या दशकांमध्ये मराठ्यांनी असंख्य चुका केल्यात, पेशव्यांनी इंग्रजांची कास धरली, यशवंतराव होळकरांना पाठिंबा दिला असता, आणि त्यांच्या मागे सगळे उभे राहिले असते तर भारत कधीच इंग्रजांना मिळाला नसता. पण असे असूनही, मराठे शेवटपर्यंत लढलेत. संघर्ष अविरत चालू ठेवला. आणि जरी शेवटी मराठे हरले तरी त्यांच्या संघर्षाची फळे आणि फुले भावी पिढ्यांपर्यंत पोचलीत. त्यांनी कमावलेली पुण्याई आपण पुढली शंभर वर्षे उपभोगलीत.    

इतिहासाचा अभिमान हवा पण त्या अभिमानाने अंतरंग घडत नसेल, त्या छिन्नी ने आत्मरंगास रूप येत नसेल तर तो अभिमान व्यर्थ आहे. आज आपल्यासमोर वेगळी आव्हाने आहेत. त्यामुळे मराठ्यांकडून काही शिकायचे तर आपण या आव्हानांना समजून आणि प्रयत्नपूर्वक सामोरे जायला हवे. समाजविन्मुख होणे बरोबर नाहीं. कारण मराठ्यांनी संघर्ष केला म्हणून आपल्याला मागे बघायला काही आहे. आपण आपल्या पिढीचा, आपल्याला जमेल तसा, संघर्ष नाहीं केला तर येणाऱ्या पिढ्यांना मागे वळून बघायची मुभाच नसेल! 

--

No comments: