Showing posts with label भारत - एक शोध. Show all posts
Showing posts with label भारत - एक शोध. Show all posts

2/3/25

थोरले बाजीराव आणि 'मल्हारी'


नवीन वर्षाच्या स्वागताची पार्टी चालू होती. सगळीकडे आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण होते. गाणी जोरजोरात वाजत होती. आम्ही आमच्या मित्रांच्या घरी मजा करीत होतो. आता नाचायचे म्हंटले कि एकूण धांगड-धिंगा वाली गाणीच लागणार. वाद्ये, आवाज, नृत्य सगळे एकदम भन्नाट हवे. तशीच गाणी वाजत होती. तेवढ्यात 'बाजीराव-मस्तानी' या सन २०१५ सालच्या हिंदी चित्रपटातील 'मल्हारी' हे गाणे लागले. समोर टी.व्ही. वर चित्रपटातील थोरल्या बाजीरावांची भूमिका वठवीत रणवीर सिंग जोरजोरात नाचत होता. उत्तम नट आणि उत्तम नृत्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रणवीर सिंग याने या गाण्यात अतिशय उत्तम नाच केला आहे. गाण्याची चाल हि कर्णवेधक आहे. हिंदी चित्रपटात गेल्या काही दशकात विषय काही हि असो पण एक धांगड-धिंगा वाले  गाणे असतेच. निर्मात्यांचा मत असे कि काही नाहीं तर हे गाणे बघायला लोक येतील. यात किती तथ्य आहे खुद्द निर्माता आणि देव जाणो पण साधारण या गाण्यांमध्ये तुरळक वस्त्रात नट्या असतात. आपण मराठी लोकांचे नशीब खरे कि निदान 'मल्हारी' गाण्यात असे चित्त-चक्षु 'चमत्कार' नव्हते. आणि मुख्य भूमिकेतील नटच नृत्य करीत होते. 

मी हा चित्रपट बघितला नाहीं. चित्रपट परीक्षण हा या लेखाचा उद्देश्य नाहीं. चित्रपटाचे विविध आढावे वाचलेत किंव्हा ज्यांनी चित्रपट बघितला आहे त्यांच्याशी बोललो तर चित्रपट चांगला आहे अशीच साधारण प्रतिक्रिया मिळाली आहे. पण तरी 'मल्हारी' गाणे बघून काहीतरी चुकल्यासारखे झाले. थोडे वाईट वाटले. थोरले बाजीराव हे काय व्यक्तिमत्व होते, त्यांचा अतुलनीय पराक्रम, अचाट कर्तृत्व, त्यांचा दरारा, त्यांचा अख्ख्या हिंदुस्तानात दबदबा याचा सगळा विचार केला तर छत्रपती शिवाजींचा जणू वारसा लाभलेला आणि त्यांच्या नंतर मराठा साम्राज्याचा अजिंक्यतारा, अश्या तऱ्हेचे हेंगडे-फेंगडे नृत्य त्याच्या सैनिकांसोबत करीत असेल हि कल्पना करवीत नाहीं. थोरले बाजीराव हे नुसते सेनापती नक्कीच नव्हते. त्यांची पथके त्यांच्या निवडक सैनिकांची होती. त्यांच्या स्वाऱ्या म्हणजे कासवाचे पाठीवरचे घर असे. अगदी निवडक तंबू आणि बाकी सैन्य उघड्यावरच असे, कारण एकदम आवरून निघायचे तर १०-२० हजार सैनी जलद गतीने निघू शकत. थोडक्यात थोरले बाजीराव आणि त्यांच्या सैनिकांची जवळीक असणार पण म्हणून 'मल्हारी मल्हारी' गात ते त्यांच्या सोबत उड्या  मारीत नसणार.

                                     

सन १७३७-३८ च्या त्यांच्या दिल्लीच्या मोहिमेत त्यांनी थेट दिल्लीच्या पालिका बाजारात मुक्काम केला होता. दिल्लीत धावपळ उडाली. दिल्लीच्या कट-पुतळी बादशहाची पूर्णपणे सटारली. त्याच्याकडे न सैन्य होते ना त्याने कधी म्यानातून तलवार बाहेर काढली होती. आणि जरी त्याच्या बाहुत थोडा दम जरी असला तरी समोर बाजीराव! त्याने आपले मंत्री-संत्री पाठवून थोरल्या बाजीरावांचे स्वागत केले. काय हवे त्याची विचारपूस केली. सैन्य सुद्धा जमविण्याचा प्रयत्न केला पण थोरल्या बाजीरावाशी लढण्याची उत्सुकता कोणी दाखविली नाहीं. थोरल्या बाजीरावांनी तिथून सातारच्या छत्रपती शाहूमहाराजांना संदेश पाठवला कि त्यांचा हुकूम असेल तर ते स्वतः दिल्लीचे तख्त मोडतील आणि मग छत्रपती शाहूमहाराज संपूर्ण भारताचे छत्रपती म्हणून आरोहण करू शकतात. आता शोकांतिका वेगळी कि छत्रपती शाहूमहाराजांनी याला संमती दिली नाहीं आणि तख्त तोडायलाही परवानगी दिली नाहीं. पण थोरल्या बाजीरावांच्या जीवनातील हि एक घटना त्यांच्या आत्मविश्वास आणि त्यांची मर्दूमुकी दर्शविते. त्यांच्या जीवनातात अश्या असंख्य घटना आहेत. वीस वर्षात अर्ध्याहून जास्त भारत पादाक्रांत करून जिंकणे काय सोपे आहे का? 
--
हिंदी सिनेमामध्ये काही प्रसंग दाखवावेच लागतात. जुन्या काळात एक मुसलमान पात्र हवेच आणि ते मुसलमान पात्र सगळ्यात प्रामाणिकच दाखवायला हवे. नंतरच्या काळात हेंगडे-फेंगडे नाचणारी एक नटी हवी आणि ती नटी फक्त नाचासाठी असे. सिनेमाची प्रमुख भूमिका करणारी नटी वेगळीच. गेल्या काही वर्षातील नवीन कल म्हणजे प्रमुख भूमिकेतील नटच जोरदार नृत्य सादर करतात. या गाण्याचा कथानकाशी संबंध नसतो पण गाणे दृक-श्राव्य असते आणि त्या गाण्याला घेऊन चित्रपटाची जाहिरात केली जाते. अपेक्षा अशी कि सगळ्या घरांमध्ये, फोने वर, पार्ट्या आणि कल्ब्समध्ये हे गाणे वाजेल आणि चित्रपट चालायला हातभार लागेल. आता हा नियम बहुतांश सगळ्या चित्रपटांना लागू होत असेल तर थोरल्या बाजीरावांच्या चरित्रात्मक चित्रपटावरही लागू होणारच. विषय जिव्हाळ्याचा असला, चित्रपटाच्या नायकाबद्दल अपार आदर असला तरी शेवटी चित्रपट आजच्या जमान्यातील आहे आणि चित्रपट चालणे आवश्यक आहे. मग त्यासाठी 'मल्हारी' आपण सहन करायचा. हिंदी चित्रपटातील पैसे, सेट्स आणि इतर गोष्टी, ज्याने चित्रपट भव्य-दिव्य होतो त्या गोष्टी मराठी चित्रपटात आणणे कठीण आहे. आणि दुसरे म्हणजे हिंदी चित्रपट ६०-७०% भारतात बघितल्या जाऊ शकतो. म्हणजे थोरल्या बाजीरावांची ओळख पुन्हा बहुतांश भारताला होईल. येन-तेन कारणेंन, आजच्या काळात थोरल्या बाजीरावांची गाथा गाणे आवश्यक आहे. 

आता एखादं-दुसरे गाणे सहन करायचे कि अजूनही काही सहन करायचे? श्री गोवारीकर यांने अकबरावर चित्रपट काढला आणि अकबराला ह्रितिक रोशन सारखे सुंदर दाखविले (तेंव्हा काढलेल्या चित्रांवरून तरी अकबर किंव्हा कुठलाही मोघल इतका सुंदर असेल असे वाटत नाहीं) आणि जोधाला, त्याची प्रियकर दाखविले. सत्य परिस्थिती हि होती कि आपले राज्य टिकवायला, एक करार म्हणून जयपूरच्या मानसिंगाने आपली बहीण अकबराला दिली. अकबराच्या हारेम मध्ये शेकडो बायका होत्या, त्यात अजून एक जोधा दाखल झाली. दीडशे वर्षांनी जेंव्हा औरंझेब दख्खनी कफल्लक होऊन मेला तेंव्हा जयपूरच्या तेंव्हाच्या राजाने दिल्ली ला दौड मारली आणि तिथल्या राजपूत बायकांना सोडवून पुन्हा जयपुरी घेऊन आला. आणि त्यानंतर त्या घराण्याची कुठली स्त्री पुन्हा मोघलांकडे गेली नाहीं. तसेच हरियाणाच्या जाट राजाने सन १६८८ ला अकबराला जेथे दफनवले आहे तेथे हल्ला करून त्याची कबर खोदली. अकबराची हाडे काढून जाळलीत. अकबर हा 'the great ' कधीच नव्हता पण श्री गोवारीकरांनी त्या इस्लामी आक्रमकाचे उद्दात्तीकरण केलेला चित्रपटही सहन करायचा का? मला माहिती नाहीं. पण चित्रपटाच्या निमित्ताने झालेला वादामुळे अकबराला किंव्हा मोघलांच्या उद्दात्तीकरणाला आळा बसायला सुरुवात झाली. 
--
हा लेख लिहितांनाच संभाजी महाराजांच्या जीवनावर आधार 'छावा' चित्रपटाचे ट्रेलर प्रकाशित झाले. त्यात स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना लेझीम खेळतांनाचे दृश्य आहे. ते बघून मन विचलित झाले. शंभू राजे, जे पाच-पाच शत्रूंना छातीवर घेऊन ९ वर्षे अखंड लढत होते त्यांना नृत्य करतांना दाखवायची खरंच मुळीच आवश्यकता नाहीं. पण हे दृश्य वगळता, चित्रपटाचे ट्रेलर बघून अंगावर काटा आला. प्रमुख भूमिकेतील विक्की कौशल यांनी छत्रपतींची भूमिका अप्रतिम निभावल्याचे दिसते. 'पार्वती पतये नमः, हर हर महादेव' हि गर्जना संभाजी महाराज करतानांचे दृश्य बघून रोम-रोमात स्फूर्ती येते. आणि आता छत्रपती संभाजी महाराजांची ओळख भारताला होणार आणि मोघली औरंग्याच्या खरा (घाणेरडा) चेहरा पुन्हा दिसणारा याचे समाधान वाटते. 

पण चित्रपटाच्या दिग्दर्शकांना मनापासून विनंती- लेझीम-बिझीम वाला सीन कापा. गरज नाहीं.  

7/21/24

गोंड कोण होते आणि इतर विचार. (चंद्रप्रकाशी लेखन)

**या लेख मालिकेला मी चंद्रप्रकाशी अश्यासाठी म्हणले आहे कारण हे माझे मूळ संशोधन नाहीं. सेतू माधवराव पगडी लिखित इतिहासाचे पुनर्मुद्रण सध्या वाचतो आहे. त्यातील संशोधनाचा मागोवा आणि काही प्रमुख घटना  संक्षिप्तात मी येथे सादर करण्याचा हा प्रयत्न.  

या लेख-मालिकेचा पहिलादुसरा लेख इथे उपलब्ध आहे. 

--

मी मूळ नागपूरचा आहे त्यामुळे गोंड आदिवासी आणि गोंडांचे राज्य सध्याच्या पूर्व विदर्भ भागात होते याबद्दल मला नेहमीच कल्पना होती. पण शाळेत कधी गोंड इतिहास शिकविला नाहीं. भारतात साधारण जो इतिहास शिकवितात तो भारताचा किंव्हा भारतीयांचा इतिहास नसतो. परदेशी आक्रमकांचा इतिहास आपल्यावर थोपवल्या जातो. स्वातंत्र्योत्तर काळात कम्युनिस्ट लोकांनी केंद्र सरकार मधील शैक्षणिक आणि अभ्यासक्रमाची दालने व्यापलीत आणि त्यातून भ्याड मनोवृत्ती आणि बुरसट, बुळबुळीत विचारसरणी आपल्यावर लादल्या गेली. असो. तो एक वेगळा विषय ठरेल. मागच्या दोन लेखात म्हणाल्या प्रमाणे श्री सेतू माधवराव पगडी यांनी लिहिलेला इतिहास संक्षिप्तात प्रकाशित केल्या गेला आहे आणि त्यातील 'इतिहासाचा मागोवा' या पुस्तकातील हि माहिती आहे. मूळ विचार आणि अभ्यास माझे नाहीं. हे पुस्तक आणि त्यातील अनमोल माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचावी हे या लेखाचे उद्देश्य. 

गोंड आदिवासी समाज पूर्व विदर्भ, छत्तीसगढ, उत्तर तेलंगण आणि मध्य प्रदेश या प्रांतात पसरलेला आहे. त्या त्या भागातील गोंड तिथली भाषा मातृभाषा म्हणूनच वापरतात. म्हणजे विदर्भातील गोंड हे मराठी बोलतात किंव्हा उत्तर तेलंगण मधील गोंड तेलगू बोलतात. गोंड समाज, त्यांचा इतिहास, त्यांचे साहित्यात किंव्हा चाली-रीती सनातन धर्माशीच ठाम पणे बांधल्या आहेत. रामायण आणि महाभारताचे दाखले त्यांच्या पुरातन साहित्यातही दिसतात (इथे साहित्य म्हणजे लेखीच नव्हे तर लोककथा किंव्हा सामाजिक स्मृती या दृष्टीने मी वापरला आहे.) महादेव किंव्हा शंकर प्रामुख्याने आढळतो. शंकर-पार्वतीच्या कृपेने पुढे गोंड समाजाची निर्मिती झाली अशी समाज उत्पत्तीची आख्यायिका आहे. इंग्रजीत याला ओरिजिन स्टोरी असे म्हणतात. गोंड समाजात वेग वेगळी मूळ घराणी आहेत आणि त्यांची गोत्रे पण आहे. झिगुबाईची कथा, माणकोची कथा, तूरपालसिंघेची कथा इत्यादी प्रसिद्ध आहेत. या भागात राम-कृष्ण किंव्हा लक्ष्मी इत्यादी देव कमी आढळतात. गोंडांच्या देवळांना पेनगड म्हणतात. पेन म्हणजे देव. आणि श्री पगडी लिहितात कि देवळात मुर्त्या नसून भाल्याचा फाळ आणि चवरी असते. 

पुस्तकात गोंड समाजातील आणावे आडनावे दिली आहेत त्यात मेश्राम, आत्राम, टेकाम, गेडाम हि आडनावे आपल्याला नागपूर भागात नक्कीच दिसतात. आता तुम्हाला कधी श्री मेश्राम किंव्हा श्री आत्राम आडनावाचे भेटलेत तर ते गोंड समाजातीलच असतील असे नाहीं, म्हणजे त्याची खात्री देणे कठीण आहे. आजकाल हा विषय थोडा नाजूक आहे. पण ओळखीची आडनावे बघून आपुलकी वाटली.

विदर्भातील पूर्व भाग (नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा) व मध्य प्रदेश भाग असे गोंड राज्य सोळाव्या व सतराव्या शतकात उदयाला आले. त्यातील जबलपूरजवळ गढमंडली - राणी दुर्गावती हि गढमंडळीची. हिने अकबराविरुद्ध लढा दिला होता. पुढे औरंगझेब दक्खनी उतरला तेंव्हा त्याच्या विरुद्ध नागपूरच्या गोंड राजाने आणि सैन्याने प्रखर लढा दिला. पुढे भाऊबंदकी होऊन त्यातील एका भावाने औरंग्याच्या पदर धरला आणि मुसलमान झाला. मुघली मदतीने हा बख्त बुलंद शाह पुढे गादीवर आला. छत्रपती शाहूंच्या काळात आणि पेशवाईत भोसले परिवारातील श्री रघुजीराजे भोसले नागपुरात स्थिर झालेत आणि गोंडांचे राज्य मावळले.  

श्री पगडी यांनी पुस्तकात गोंड समाजात जातीभेद नाहीं असा उल्लेख केला आहे. साधी विवाहपद्धती आणि अगदी विधवा विवाह सुद्धा निषिब्ध नाहीं असेही ते म्हणतात. या दोन्ही बाबी फार स्पृहणीय आहेत आणि या साठी गोंड समाजाचे कौतुकच करायला हवे. या विषयावर श्री पगडी यांनी अक्षरशः एकाच परिच्छेद लिहिला आहे. या विषयावर अजून वाचन करायला हवे. श्री पगडी यांचे 'अमंग दि गोंड्स ऑफ आदिलाबाद' आणि "गोंडी भाषेचे व्याकरण' हि दोन अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रकाशित आहेत. आणि श्री पगडी स्वतः सन १९४५ ते १९४८ सध्याच्या तेलंगण राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात मामलेदार आणि डेप्युटी कलेक्टर म्हणून होते. या व्यतिरिक्त त्यांना आदिवासी विशेष अधिकारी म्हणूनही दायित्व त्यांच्या कडे होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या अभ्यासाला आणि या विषयावर त्यांच्या लेखनाला अनुभवाचे वजन आहे. 

पुढले चंद्रप्रकाशी लेख 'छत्रपती नि त्यांची प्रभावळ' या पुस्तकातील असतील. आशा करूया कि काही तरी नवीन शिकायला मिळेल. 




4/1/24

मराठी स्वातंत्र्य समर १६८२ ते १७०७ - धोरणे, लढे, डाव-पेच आणि तत्सम इतिहास (चंद्रप्रकाशी लेखन)

**या लेख मालिकेला मी चंद्रप्रकाशी अश्यासाठी म्हणले आहे कारण हे माझे मूळ संशोधन नाहीं. सेतू माधवराव पगडी लिखित इतिहासाचे पुनर्मुद्रण सध्या वाचतो आहे. त्यातील संशोधनाचा मागोवा आणि काही प्रमुख घटना  संक्षिप्तात मी येथे सादर करण्याचा हा प्रयत्न.  
--
छत्रपती संभाजी महाराजांना दैवाने जणू संकटे आणि विपरीत परिस्थितीचे ताट वाटून दिले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी येणाऱ्या आक्रमणांचा प्रखर संघर्ष केला. जेंव्हा औरंगझेबाने औरंगाबादेत ठाण मांडले तेंव्हापासून मोघली साम्राज्याचा जवळपास शंभर वर्षांचा खजिना, सामर्थ्य, अनुभव आणि सैन्यबळ जणू फक्त आणि फक्त मराठ्यांना नामशेष करायला उतरले होते असे म्हणायला हरकत नाहीं. आपण या विषयावर चर्चा करतांना सहज म्हणतो कि शिवाजी महाराजांनंतरची पंचवीस वर्षे हा मराठी आणि हिंदू स्वांतत्र्याचे समर होते आणि त्यात शेवटी मराठ्यांनी औरंगझेबाला नामशेष केले. तीनशे वर्षांनी आपल्याला असे म्हणायला सोपे आहे. पण औरंगझेब जेंव्हा दक्खनी उतरला तेंव्हा त्याचा शेवट असा होईल असे म्हणता आले असते का? कल्पना करा कि आपण सन १६८५-८६ ल आहोत. लाखो मोघली सैन्य दक्खन मध्ये उतरले आहे. खुद्ध औरंगझेब आला आहे. त्याचा सामना करायचा तरी नेमका कसा? आणि कुठून आणि किती करायचा? मोघलांचा खजिना तेंव्हा म्हणजे कुबेराचा होता. उत्तर भारतातून त्यांना अखंड आणि अमाप पैसे मिळत असे. आणि भांडायला राजपूत अखंड शिपाई पुरवीत असे. गेली जवळ जवळ शंभर वर्षे हिंदू राज्ये बुडविण्याचा त्यांना अनुभव होता आणि त्यात ते नेहमीच यशस्वी ठरले होते. मोघली सैन्य म्हणजे साधारण नव्हते. त्यांचा पोशाख, चिलखते, शस्त्रात्रे, तोफा इत्यादी जणू अतुलनीय होते. काबूल आणि पुढल्या मुसलमानी सत्तांपासून त्यांचे भारतीय राज्य यशस्वीरीत्या टिकविले होते. आणि उत्तर भारतात त्यांची अनभिषिक्त सत्ता दीडशेहुन अधिक वर्षे होती. आणि दक्षिणेतील बहुतांश सत्ता वेळोवेळी मोघलांचे अंकित होते. घराणेशाही बघितली तर बाबर ने सन १५२६ साली स्थापिलेल्या मोघली सत्तेचा औरंगझेब सातवा वंशज होता. आसाम चे आहोम आणि छत्रपती शिवाजीनं व्यतिरिक्त मोघली सत्तेचा यशसवीपणे सामना हिंदुस्तानात कधीच कोणीच केला नव्हता. स्वतः औरंगझेब ला दक्खन हा भाग नवा नव्हता. त्याला सन १६५६ ला तो या भागाचा सुभेदार होता आणि बरीच वर्ष दक्षिण आणि दक्खन भागात तो वावरला होता.  

त्या तुलनेत मराठी राज्य लहान होते, शिपाई पण मराठेच होते आणि खजिना कसा पुरवायचा? सन १६४६ नंतरचा मराठी सत्तेचा अनुभव, म्हणजे फक्त पन्नास वर्षांचा. आणि संभाजी महाराज घराणेशाहीतील दुसरे आणि राजाराम महाराज तिसरे छत्रपती. पण तडफदारपण, डाव-पेच, युद्धकौशल्य, धडाडी आणि चाणाक्षपणा हा केवळ अनुभवांनीच येतो असे नाहीं. संभाजी महाराजांनी हे केवळ युद्धभूमीवर सिंह होते असे नाहीं तर त्यांची संघर्षाची धोरणे हि चाणाक्ष होती. त्यांनी संकटाचा बारकाईने अभ्यास केला होता.  ते अविरत आणि अखंड चढायांवर असत. त्यांनी महत्वाची ठाणी आणि किल्ल्यांवर भक्कम रसद आधीच पुरविली होती. त्यांनी हेरले होते कि औरंगझेबचे मुख्य लक्ष मराठे असले तरी त्याची इस्लामी अभिलाषा त्याहून अधिक विस्तृत आहे. उरलेली आदिशही, कुतुबशाही आणि दक्षिणेतील छोटी छोटी हिंदू राज्ये नष्ट करण्याचे त्याचे स्वप्न होते. कुतुबशाही किंव्हा आदिलशाही हि मूळ धर्मांतरित हिंदूंची होती. त्यामुळे परदेशातून आक्रमक म्हणून आलेल्या मोगलांना आणि औरंगझेब ला हि भारतीय मुसलमान निम्न वाटत असे. या काळापर्यंत औरंगझेब धर्मान्ध आणि वयाने अजून क्रूर झालेला होता. इस्लामी सत्तेचा हिरवा झेंडा त्याला काबूल ते रामेश्वरम पर्यंत फडकवायचा होता. 

संभाजी महाराजांनी झपाट्याने बदलत्या परिस्थितीत खरे शत्रू कोण याचा आढावा होता. त्यांना ठाऊक होते कि मोगल हात-पाय पसरवायला लागलेत कि गोव्यातून पोर्तुगीज बाहेर पडून स्वराज्याचे लचके तोडायला लागतील. त्यांनी गोव्यावर आणि पोर्तुगीजांवर दोन चढाया केल्यात. महाराजांना पोर्तुगीजांना पूर्णपणे नामोहरम करता आले नाहीं तर त्यांना गोव्यात चांगलेच कोंडले. आदिलशाही आणि कुतुबशाही यासुद्धा मुसलमानी सत्ता होत्या पण मागे म्हंटल्या प्रमाणे शेवटी भारतीय रक्त होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील करार लक्षात ठेऊन संभाजी महाराजांनी कुतुबशाहीला मदत करण्याचा प्रयत्न केला. याच्या व्यतिरिक्त मोगलांचे लक्ष वेधायला त्यांनी बुऱ्हाणपूर पर्यंत मजल मारून ते ठाणे लुटले. त्यामागचे धोरण असे कि मराठे नर्मदे पर्यंत किंव्हा नर्मदा पार करण्याची भीती उत्पन्न झाली तर मोगलांना एकतर थोडी माघार घ्यावी लागेल किंव्हा निदान कुमक पुन्हा उत्तरेला पाठवावी लागेल. पण या कुठल्याच डाव- पेचात संभाजी महाराजांना हवे तसे यश मिळाले नाही. शेवटी नशीब हि पाठीशी लागत. गोव्यात समुद्र भरती आली आणि मराठी सैन्य गोव्यात जाऊ शकले नाहीं आणि पोर्तुगीज वाचलेत. आदिलशाही लौकरच मोडकळीत निघाली आणि कुतुबशहाने सुद्धा नीट लढा दिला नाहीं. सन १६८७ ला कुतुबशाहीत फितुरी माजवून, औरंगझेब ने गोळकोंडा किल्ला घेऊन कुतुबशाही संपविली. औरंगझेब आता निर्धास्तपणे थेट दक्षिणेत जाऊ शकत होता आणि तिथून अजून खजिना आणि रसद लुटू शकत होता. समुद्राला पाठीशी ठेऊन आता मोगल सगळ्या बाजूंनी स्वराज्याच्या सीमा मागे ढकलीत होते.

थोडक्यात, सन १६८२ नंतरच्या पाच-सात वर्षात मोगलांचे आणि औरंगझेबाच्या बळ अधिक वाढले होते. 

स्वराज्यातील बरीच मराठी मंडळी घाबरून औरंगझेबाच्या मिळायला लागलीत. शिवाजी महाराजांनी वतने काढून स्वराज्याची स्थापना केली होती. आणि वतन संस्थेच्या ते विरोधी होते. येथे मोगलांचे वाढते बळ बघून जुनी सरदार आपली वतने मोगल समंतीत करून घेऊ लागलीत. संभाजी महाराजांनी अनेकांना खरमरीत पत्रे लिहिलीत आणि देव-धर्माची आण दिली. पण या आघाडीवरहि परिस्थिती बिकट होत होती. दोन वर्षाच्या कालावधीतच संभाजी महाराजांचे खंदे समर्थक आणि अत्यंत शूरवीर असे सरसेनापती हंबिबराव मोहिते यांचा पण एका युद्धात मृत्यू झाला. हा संभाजी महाराजांना आणि स्वराज्याला हादरा बसला.

अश्या परिस्थितीत दगाफ़टक्याने छत्रपती संभाजी यांचे पकडल्या जाणे आणि मग मोगलांनी केलेल्या अनन्वित अत्याचारांना सामोरे जाऊन त्यांचा मृत्यू होणे हि फार धक्कादायक घटना होती. संभाजी महाराजांची शेवटी जीवाची किती घालमेल झाली असेल याची कल्पना करणे कठीण आहे. शारीरिक यातना आणि आपल्या नंतर पुढे स्वराज्याचे काय होणार या विचाराने मानसिक यातना. पण येथेही त्यांच्या सामर्थ्याची प्रचिती येते. मुसलमान होण्यास नकार देऊन आणि औरंगझेब समोर मस्तक न झुकावून त्यांनी हौतात्म्य पत्कारले कारण स्वराज्याला, मावळ्यांना, मराठी सैन्याला जणू ते शेवटले उत्स्फूर्त करू इच्छित होते. आणि नेमके तसेच झाले. 

औरंझेबाला वाटले कि संभाजी महाराजांनंतर मराठी राज्य संपलेच. आणि काही कमी असेल तर शाहू महाराज हि त्याच्या कब्ज्यात होते. पण या क्षणी औरंगझेबाने काही महत्वाच्या चुका केल्यात आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूने पेटलेल्या मराठ्यांनी याचा पुरेपूर उपयोग केला. 

छत्रपती संभाजी महाराजांच्या अचानक झालेल्या मृत्यू मुळे मराठे दिडमूढ झाले होते. पण त्यांनी हार मानली नव्हती, कच खाल्ली नव्हती. छत्रपती राजाराम आणि मंत्रिमंडळाने ठरवले कि छत्रपतींनी महाराष्ट्रात रहाता काम नये. हि चाल राजाराम महाराज व मराठी लष्करी रणनीतीचा एक हिरा म्हणता येईल. महाराष्ट्रापासून खूप दूर, थेट दक्षिणेला जिंजी च्या किल्ल्यात राजाराम महाराज गेलेत. यात तीन गोष्टी साध्य झाल्यात. एक म्हणजे मोगलांचे वाढते बळ आणि वाढती फितुरी बघता, महाराष्ट्रात राहून पकडल्या जाण्याची शक्यता कमी झाली. राजाराम महाराजांना दगाफटका झाला असता तर स्वराज्याने दहा वर्षात आपला तिसरा छत्रपती गमावणे फार कठीण गेले असते. दुसरे म्हणजे राजाराम महाराजांना औरंगझेबाने आपलं एकुलते एक लक्ष्य बनविले असते. आणि त्यासाठी त्याने आणि मोगलांनी स्वराज्याची प्रचंड जाळपोळ केली असती. तिसरे म्हणजे,दूर दक्षिणेला राजाराम महाराज असणे म्हणजे  आता स्वराज्याचे सगळे किल्ले आणि जमिनी घ्याव्यात कि स्वराज्य नायकास पकडावे हे कोडे औरंगझेबाच्या सोडविणे आवश्यक झाले.  

या सोबत राजराम महाराज आणि रामचंद्रपंत अमात्य यांनी मराठी सरदारांना त्यांची वतने देणे पुन्हा चालू केले. अनेक दशके मराठ्यांना लागलेले वतनदारीचे 'व्यसन' शेवटी छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांना काही सोडवता आले नाहीं. पण हातघाईची वेळ होती. स्वराज्य तगायला सरदार हवेत, सैन्य हवे आणि महाराष्ट्राचा भूभाग माहिती असलेले हवेत. वतनदारीच्या पुन्हा सुरुवातीच्या अनेक फितलेले सरदार परत आलेत आणि त्यांनी मोघली अंतापर्यंत स्वराज्याला साथ दिली. एवढेच नव्हे तर मोगलांनी जिंकलेल्या भूभागाची वतने पण छत्रपतींने सरदारांना बहाल केलीत. त्यामुळे संभाजी महाराजांच्या मृत्यूने पेटलेले मराठी सैन्य आणि थोड्याबहुत प्रमाणात स्वार्थाने पुन्हा उभे राहिलेले मराठी सरदार एकत्र येऊन मोघलांनवर तुटून पडलेत. गेलेले किल्ले पुन्हा घेणे, गेलेली गावे पुन्हा जिंकणे, मोघलांची ठाणी लुटणे, गनिमी काव्याने ठिकठिकाणी मोघलांना धोपटणे, रसद तोडणे, उत्तरेहून येणारी रसद, खजिना लुटणे इत्यादी अनेक मार्गांनी मराठ्यांनी लढा अखंड चालू ठेवला. 

औरंगझेबाने त्याच्या अनेक चुकांपैकी एक महत्वाची चूक केली म्हणजे त्याने दोन आघाड्यांवर मराठ्यांना विरुद्ध लढायचे ठरवले. एक आघाडी म्हणजे जिंजीला वेढा देणे (जो सात वर्षे चालू होता), छत्रपती राजाराम महाराजांना पकडण्यासाठी  आणि दुसरी आघाडी म्हणजे स्वराज्यातला एक एक किल्ला लढवून जिंकणे. आता दुसरी आघाडी खऱ्यात अनेक आघाड्या होत्या. प्रत्येक किल्ला जिंकायला मोघलांना प्रचंड कष्ट पडलेत आणि त्यांनी या भानगडीत अगणित खजिना ओतला. आणि मोघलांनी जिंकलेला अक्षरशः प्रत्येक किल्ला मराठ्यांनी काही वर्षात पुन्हा जिंकला. अनेक किल्ले मराठे मोघलांकडून लाच घेऊन सोडून देत आणि वर्ष-दोन वर्षात पुन्हा जिंकीत. माझ्या माहिती प्रमाणे फक्त तोरणा किल्ला मोघलांनी लढून जिंकला होता. औरंगझेबाने किल्ल्याचे नाव बदलून फुतबुलपूर कि असे काही तरी ठेवले होते.

(क्रमशः) 
 


6/16/23

मराठी स्वातंत्र्य संग्राम - सन १६८२ ते १७०७

सध्या श्री सेतू माधवराव पगडीकृत इतिहास वाचन चालू आहे. त्यांनी असंख्य पुस्तके लिहिलीत. त्याचे संक्षिप्तात किंव्हा ज्याला इंग्रजीत overview असे म्हणता येईल असे, शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर ते औरंग्याच्या मरणापर्यंतचा काळ असे हे पुस्तक आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळ सन १६८९ पर्यंत. मग छत्रपती राजाराम महाराजांचा कार्यकाळ सन १६९९ पर्यंत मग सन १७०७ पर्यंतचा काळ जो ताराबाई राणी यांनी गाजवला. सन १७०७ ला जेंव्हा औरंग्या मेला तेंव्हा मराठ्यांचे २५ वर्षाचे स्वातंत्र्य युद्ध संपले. या पुस्तकातून काही माहिती, विचार आणि द्रुष्टीकोन मला नाविन्यानी कळलेत किंव्हा उमगल्यात. 

१) छत्रपती संभाजी महाराज ढाण्या वाघ होते - शिवाजी महाराजांच्या अचानक झालेल्या मृत्यू नंतर संभाजी महाराजांवर जणू फक्त संकटच कोसळत होती. आधी घरातील भाऊबंदकी आणि आजूबाजूला असलेली घरभेदी मंडळी पासून स्वतःला वाचविणे आणि दोन वर्षात औरंग्या दिल्ली हुन समुद्रमय सैन्य घेऊन स्वराज्यात उतरणे, हे बघता कोणीही सामान्य माणूस गांगरून गेला असता. यात त्यांच्यावर दोन जीवघेणे हल्ले हि झालेत. औरंग्याचे दक्खनी उतरणे हि साधारण गोष्ट नव्हती. त्याच्या सोबत दीडशे वर्ष उत्तर भारतात अनभिषिक्त सत्ता गाजवणारी मुघल सत्तेची सर्व संपत्ती, सामुग्री आणि सैन्य होते. औरंगझेबाच्या ध्येय मोघली सत्तेचा प्रसार एवढेच नसून, हंपी हिंदू साम्रज्याच्या सन १५४५ च्या विध्वंसा नंतर जवळ जवळ सव्वाशे वर्षांनी पुन्हा गर्वाने उभे राहिलेल्या हिंदू साम्राज्याचा मुळापासून विनाश करणे हा होता. औरंगझेबाने त्याच्या सरदारांना लिहिलेल्या अनेक पत्रातून 'मी या मराठ्यां विरुद्ध जिहाद करायला आलो आहे' याचा उल्लेख होतो. अश्या अत्यंत बिकट परिस्थितीत संभाजी महाराजांनी ९ वर्षे अखंड आणि अविरत लढा दिला. मोघालाविरुद्ध, उरलेल्या आदिलशाही विरुद्ध, पोर्तुगीसविरुद्ध ते छाती ठोकून लढले. पगडी यांच्या पुस्तकातील संभाजी महाराजांच्या पहिल्या तीन वर्षातील ठळक हालचालींची रूपरेषा बघावी:

सन १६८०-८१ संभाजी महाराजांचे रायगडी आगमन, मंचकारोहण व सन १६८१ ला राज्याभिषेक 

सन १६८२ ला शाहजादा अकबर याची पाली ला भेट

सन १६८२ ला दंडापुरीच्या वेढ्यात महाराज उपस्थित

सन १६८३ ला कल्याण-भिवंडी भागात महाराज कार्यरत 

सन १६८३ ला रेव-दंड्याच्या वेढ्यात 

सन १६८३ ला महाराजांची गोव्याची मोहीम

परिस्थितीला घाबरून काही मातब्बर मराठी सरदार घराणी मोघलांना जाऊन मिळत होती पण संभाजी महाराज डगमगले नाहीत. त्यांना खरमरीत पत्रे लिहून धर्माची आणि स्वराज्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सगळ्यात मोठे पाठिंबेदार सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा एका चढाईत सन १६८७ मृत्यू झाला पण तरी संभाजी महाराज लढत राहिले. औरंगझेब सन १६८२ ला दख्खनी आला. महाराजांनी ताबडतोब सगळ्या किल्ल्यांवर जोरदार रसद आणि सैन्याची तयारी केली. औरंगझेबाच्या मुलाला पाठीशी घेऊन मुघलांच्या सगळ्यात मोठ्या पाठिराख्यांचा - राजपुतांमध्ये फूट पडून, औरंग्याला द्विधा मनस्थिती पाडण्याची खेळी खेळली. गोळकोंड्याचा कुतुबशाह आणि उरलेला आदिलशहाशी गठबंधंन करून एक सामूहिक फळी उभारण्याचा प्रयत्न केला. आणि या दरम्यान ते पोर्तुगीसशी लढलेत. पण त्यांच्या कुठल्याही राजकारणाच्या सोंगट्यांना यश आले नाहीं. किंव्हा यश येण्यास जो अवधी लागतो त्या आधीच ते वीरगतीस प्राप्त झालेत.  

"मृत्यो मा अमृतंगमय" सारखेच त्यांच्या धर्मसाठी जीव देण्याच्या वीरतेने सकळ मराठी समाज जागृत झाला. आणि त्यांच्या जीवनाच्या मिटत्या समयीने धर्मांध आणि क्रूर मुसलमानां विरुद्ध लढण्याचा वन्ही पेटला. श्री पगडी यांच्या मते संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर औरंग्याला वाटले कि आता हिंदवी स्वराज्य संपले पण त्याच्या अगदी विरुद्ध झाले. मराठे जागृत झाले, चेतावले आणि जागा मिळेल तिथे, जसे जमेल, जेवढे जमेल तिथे मोघलांना धोपटणे चालू झाले. कोकणापासून ते बिदर, गुलबर्गा, जिंजी पासून ते खानदेशापर्यंत लढणाऱ्यांच्या अनेक फळ्या उभ्या झाल्यात आणि मोगलांशी झुंजू लागल्यात. आणि याच मूळ श्रेय छत्रपती संभाजी यांच्या जीवन संघर्षाला आणि धर्मा साठी मरणाला मिठी मारण्याच्या महान कृत्याला द्यावं लागेल.  

गनिमी कावा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून मराठे गनिमी काव्या साठी प्रसिद्ध होते. सह्यांद्रीला जणू सेनापती बनवून स्वराज्याचे सैन्या खूप लढले. पण गनिमी कावा म्हणजे केवळ कडे-कपाऱ्यांचा आधार घेत लढणे नव्हे. शत्रूला गाफील ठेवणे, विजेच्या गतीने हालचाली करणे, आणि झडपीचे किंव्हा लढाईचे अंतिम लक्ष्य हे प्रत्यक्षात उभरत असलेल्या परिस्थितीला बघून बदलविणे आणि बिकट परिस्थिती वाटल्यास ताबडतोब काढता पाय घेणे. याला पळणे म्हणणे चुकीचे आहे कारण मराठ्यांची धाड पुन्हा पडणार हे नक्की. झटापटीतून निसटून परत वार होणारच.  युद्धात जय-विजय याची परिभाषा मराठी सैन्यानें बदलविली. खूपदा गनिमी काव्याचा हल्ला मोगलांची तयारी बघणे एवढेच असे. घाई गडबडीत मोगल त्यांचे जणू सगळे पत्ते समोर ठेवत. त्यांच्या सैन्याची परिस्थिती कशी आहे आणि त्यांना चोपायला हवे कि कोंडून खंडणी वसूल करणे बरे ठरेल? तसेच, एका मोघली तुकडीवर हल्ला करून, दूरच्या तुकडीला मदतीस यायला भाग पाडणे आणि ती तुकडी आली की पळ काढणे. स्वराज्याला, लोकांना, मराठी सैन्याला उसंत मिळावी याचा प्रयत्न करणे, मोघलांना नेहमी एका पायावर उभा ठेवणे असे अनेक ध्येय या गनिमी काव्याच्या मागे होती. 

शत्रू नेहमी याच विचारात असेल कि पुढला हल्ला कधी होईल. मोगलांकडे पैसे आणि माणसे असंख्य होती त्यामुळे त्यांच्याशी खुल्या मैदानात युद्ध करणे जोहार ठरला असता. मराठ्यांनी ठरवले कि मोगलांना सतत असंख्य जखमा करून, सतत रक्तबंबाळ करून, थकवून मारायचे. या युद्धशैलीत संताजी आणि धनाजी वस्ताद होते. त्यांची घोडी जणू भिंगरी होती आणि त्यांचे सैन्य म्हणजे झंझावात. मोगली घोड्यांना संताजी आणि धनाजी पाण्यात दिसायची म्हणे. अर्थात हे शक्य नसले तरी पाणी प्यायची उसंत मोगली घोड्यांना नव्हती हे या मागची खरी परिस्थिती होती.  

३) औरंगझेब तेवढा मुत्सद्दी नव्हता आणि हुशार नव्हता: औरंगझेबाच्या सगळ्यात मोठा गुण म्हणजे तो दीर्घायुषी होता. ज्या काळात लोक चाळीशीहि गाठत नसत तिथे त्याने नव्वदी गाठली. त्यामुळे त्याने असंख्य कारभार आयुष्यभर केलेत. त्यात काहींत यश मिळणे साहजिकच आहे. पण त्याच्या जीवनाचा एकूण आढावा घेतला तर औरंग्या, जो बाबर ने स्थापन केलेल्या राज्याचा सहावा वंशज होता आणि प्रत्येक बाबतीत शेवटला ठरला. त्याच्या नंतरचे मोघल 'सम्राट' भुसा भरलेले पेंढे होते. त्याने राजकीय आणि युद्धक्षेत्रात जितक्या चुका मराठ्यांविरुद्ध केल्यात त्या अजून कोणी केल्या असत्या तर एकतर युद्ध कधीच संपलेअसते किंव्हा त्या राज्याचा दिवाळं निघालं असतं. पण औरंग्या पर्यंत मोघलांनी भारताला इतका लुटलं होत कि त्या घराण्याचा दिवाळं काढायलाही औरंग्याला पंचवीस वर्षे लागलीत. त्याने संभाजी महाराजांची अत्यंत निर्घृण रीतीने हत्या केली ज्यामुळे अगदी जन-सामान्यही चेकाळले. त्याने छत्रपती राजाराम महाराजांना निसटू दिले. मग जिंजीच्या वेढ्यात असंख्य सैन्य आणि पैसे गुंतवला. त्या दरम्यान मराठे प्रत्येक बाजूने त्याच्या सैन्याला घायाळ करू लागले. तो डोक्यात राख घालून मराठ्यांचे किल्ले घेण्याच्या मागे लागला. त्यात त्याच्या लक्षात नाही आले कि मराठ्यांनी त्यांची युद्ध-नीती बदलवली आहे. औरंगझेबाच्या सैन्याला एका एका किल्ल्या मागे महिना-महिना गुंतावून ठेवून, मराठे भारतात इतरत्र पसरू लागले. त्याच्या हयातीतच मराठे नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात पोचले आणि दक्षिणेत मछलीपट्टणम पर्यंत निर्धास्त हिंडू लागलेत. एवढेच नाहीत तर मराठ्यांनी सगळीकडे आपले सरदार बसवून कर घेणे हि चालू केले. किल्ले घेऊन मराठ्यांना कोंडण्याचा बावळटपणात औरंगझेब स्वतःच जणू किल्ल्यांमध्ये कैद झाला. त्याच्या सोबतीची सरदार एक-एक करून 'अल्ला' ला प्यारे झालेत आणि हा मागे एकटाच खुडत राहिला. मोघलांचे तत्कालीन इतिहासकार लिहितात कि मराठे औरंग्याच्या दिर्घआयुषाचे नवस करीत कारण जो पर्यन्त हा दख्खनी असेल तो पर्यंत उत्तरेतून खजिना दक्षिणेत येत रहाणार आणि मराठ्यांना अनासायास मिळत रहणार. स्वतःच्या बापाला, भावंडांना व पुढे मुलांना मारून हा धर्मान्ध, क्रूर आणि गर्विष्ठ 'बादशाह' शेवटी बापजाद्या पासून जमवलेली संपत्ती आणि राज्य मराठ्यांना देऊन एकाकीच आणि अक्षरशः चिखल साचलेल्या तंबूत मेला. 

--

मराठी इतिहास वैभवशाली आहे यात वाद नाही पण यात असंख्य बारकावे आणि घडामोडी आहेत. या साम्राज्यात असंख्य पात्रे पण आहेत. गेल्या हजार वर्षात हंपी च्या विजयानगरच्या साम्राज्य नंतर हिंदुस्थानवर लखलखणारा तारा म्हणजे मराठी हिंदवी स्वराज्य. पण हिंदवी स्वराज्य विजयानगरच्याहि एक पाऊल पुढे होते कारण स्वराज्यकर्त्यांनी शत्रू मुसलमान आहे हे ओळखले होते आणि या परदेशी धर्मान्ध मुसलमानांना भारत भूमीतून हाकलले शिवाय उसंत नाही यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अहिल्याबाई आणि महादजी पर्यंत सगळ्यांनी अखंड कष्ट उपसलेत. भारतीय इतिहासावरची इंग्रजीतील पुस्तके वाचलीत तर मराठे हे जणू मोघल आणि इंग्रजी राज्या मधला स्वल्पविराम म्हणून दर्शविल्या जात. इंग्रजी साम्राज्याची सुरुवात तर पानिपत युद्धाच्या आधीपासून म्हणजे सन १७५९ पासूनच सांगितल्या जात! यात काही तथ्य नाही आणि सत्य तर मुळीच नाहीं. 

मग सत्य काय? खरा इतिहास काय? नुसतं 'जय शिवाजी, जय भवानी' म्हणून भागायचं नाहीं? इतिहासाचा रीतसर अभ्यास हवा, त्या अभ्यासाला जागतिक घडामोडींशी पडताळून बघायला हवे. पण याचा उपयोग काय? याच्या उत्तराच्या शोधाचा नवीन लेख लिहावा लागेल. पण गेल्या तीनशे वर्षात फक्त मराठी लोकच आक्रमकांशी प्रखरतेने लढलेत. आणि ते अख्या भारतखंडाच्या स्वधर्म, स्वराज्य आणि स्वाभिमानासाठी लढलेत. स्वजाती, स्वभाषा किंव्हा आप-आपल्या राज्यापुरती त्यांचा लढा सीमित नव्हता. छत्रपती शिवाजीनं पासून ते अहिल्याबाईंच्या पत्रातून देश व धर्मासाठीचा कळवळा प्रकर्षाने जाणवतो. आणि असेच नेतृत्व व अश्याच विचारसरणीची आवश्यकता पुन्हा देशाला आहे. आपण आपला इतिहास जाणला तरच आपल्या उद्याचा भारत साकारायला प्रवृत्त होऊ, नाही का? 

4/4/23

नायपॉल - एक प्रवास

श्री विदयाधर सीप्रसाद नायपॉल यांचा मृत्यु ऑगस्ट ११, २०१८ ला लंडन येथे झाला. त्रिनिनाद आणि टोबागो येथील मूळ निवासी श्री नायपॉल हे १८व्या वर्षी इंग्लंड ला दाखल झालेत. तेंव्हा पासून ते ब्रिटिश नागरिक होते. इंग्रजी भाषेतील गेल्या शंभर वर्षातील सर्वश्रेष्ठ लेखक मानलेल्या श्री नायपॉल यांना सन २००१ ला साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक दिल्या गेले होते. त्यांनी त्यांच्या हयातीत ३० हुन अधिक पुस्तके लिहिलीत. यात कादंबऱ्या, प्रवासवर्णने आणि बरेच निबंध लेखन ही होते. मिस्टिक मसूर ही त्यांची पहिली कांदबरी सॅन १९५६ ला प्रकाशित झाली तर मॅजिक सीड्स ही त्यांची शेवटली कादंबरी सन २००७ ला प्रसिद्ध झाली. तब्बल  पन्नास वर्षाच्या कालावधीत त्यांनी विविध विषय हाताळलेत. त्यांच्या लेखनाचा सूर अत्यंत वैयक्तिक होता पण त्याची पात्रे मात्र जगाच्या विविध टोकाला वावरत. वेस्ट इंडीज, आफ्रिका, भारत आणि इंग्लड येथे बेतलेली त्यांची पात्रे, त्यांनी त्याच्या प्रवास वर्णनात रेखाटलेल्या विविध प्रांत, देश, समाज आणि संस्कृतीचे प्रतिनिधी होते.

नायपॉल हे वादग्रस्त व्यक्तिमत्व होते ही अतिशयोक्ती ठरणार नाही. मुख्यतः त्यांनी लिहिलेली प्रवासवर्णने प्रकाशित झाल्याच्या क्षणापासून वादाच्या भोवऱ्यात फसली होती. पण त्यांची प्रवास वर्णने ही केवळ वर्णने नसून त्यांच्या विचारांचा प्रवास म्हणून वाचायला हवीत. त्यांची लेखन शैली, वाक्यप्रचार करण्याची एक विशिष्ट पद्धती (त्यांची एक-एक वाक्य एका परिच्छेदा एवढी लांब असत), आणि शुष्क दृष्टीकोनातून जगाकडे बघण्याचा कल खासकरून दुसऱ्या जागतिक युद्धानंतर उभे राहू बघण्याऱ्या जगाला पारखण्याचा दृष्टिकोन वाचकास विचार करण्यास प्रवृत्त करतो. मला वाटतं सगळी लोक स्वतः चा विचार करायला तयार नसतात. स्वतंत्र्यपणे  विचार करणे हे कठीण कार्य आहेच पण स्वविचार ही मुळत:च अस्वस्थ करणारी प्रक्रिया आहे. नायपॉल नेमके समाजाच्या याच मर्मावर बोट ठेवतात.

माझी नायपॉल याची ओळख प्रामुख्याने त्यांनी लिहिलेल्या प्रवास वर्णने वाचून झाली. त्यांच्या लेखनाची सवय करावी लागते. ओघवती भाषा किव्हा मोठे शब्द हीच भाषेची कसोटी नसते हे त्यांच्या लेखनाची सवय झाल्यावर लक्षात येत. त्यांची विचार करण्याची एक विशिष्ट असममित, अ - कालक्रमीत पद्धती होती,  आणि त्याच पद्धतीने त्याचे शब्द लिहिल्या गेलेत. ते एका वाक्यात १८९८ च्या गांधींबद्दल बोलायाला सुरुवात करून, मध्ये १९४८ च्या गांधी बद्दल बोलून, शेवट १९१५ ला गांधी परत दक्षिण अफ्रीकेला का परतलेत हे सांगतात. येथे गांधींच चरित्र सांगायचं हेतू नसतो तर गांधी या व्यक्तीमत्वाचे पैलू हे कसे विविध काळी जाणवतात (चमकतात?) आणि त्यामुळे गांधी ही व्यक्ती कशी समजू शकते हे नायपॉल दर्शवितात.  वाचकाला वाचायला, कळायला सोपं जाईल असे लिहावे वगैरेच्या भानगडीत ते कधीच पडले नाहीत. वाचकाला त्याच्या विचारांची झेप आणि प्रगल्भता जणू एक आव्हान होते. पण एकदा का वाचाकास त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन कळला की इतिहास आणि भविष्य जणू नावीन्याने अवतरते. त्यांची प्रवास वर्णने जगाच्या विविध भागात, विविध विषयांना धरून लिहिलेली असून, दुसऱ्या महायुद्धाच्या उत्तरार्धातील चाळीस वर्षांचा कालखंडावर दृष्टीक्षेप टाकतात. या सगळ्या प्रवासात आणि विचारातील धागा शोधायचा तर दुसऱ्या महायुद्धानंतर साम्राज्यवादाचा, प्रामुख्याने इंग्रजी साम्राज्याचा झपाट्याने झालेल्या ऱ्हासा नंतर उदयास आलेल्या देशांचे, समाजांचे परिक्षण होय. इंग्रजी साम्राज्य सन १९२० च्या दशकात यशाच्या शिखरावर होते. (इंगलंडच्या राणीच्या साम्रज्यावर कधी सूर्यास्त होत नसे!) पण केवळ तीस वर्षातच हे साम्राज्य उन्मळुन पडले. भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, मलेशिया इत्यादी जी राष्ट्रे या मंथनातून उदयास आलीत, ते समाज जणू या बदलाला सामोरं जाण्यास सज्ज नव्हती. पण गंमत म्हणजे, हा अचानक घडलेला बदल आकलनाच्या बाहेर आहे आणि झपाट्याने बदललेल्या जगात स्वातंत्र्य मिळणे म्हणजे नेमके काय याची कल्पना आपल्याला नाही हे सुद्धा मानायला हे देश, आणि देशांचे राज्यकर्ते तयार नव्हते. यातुन निष्पन्न काय झाले? तर इंग्रजी सत्तेची व राज्यकर्त्यांची केविलवाणी नक्कल. आपल्या प्रवासवर्णनांमध्ये नायपॉल या कुंठित समाजाची परिस्थिती दर्शवितात. त्यांची वाक्ये चाबकाच्या फटक्यां सारखी भासतात. कुठल्याही राष्ट्राबद्दल टीकेचे आसूड ओढणे म्हणजे विवादांना आमंत्रण देणे हे सांगायला नकोच. पण त्यांचे विचार बोचणारे असलेत तरी नाकारण्या साऱखे नव्हते. स्वतः च्या घरात बसून त्यांनी मतांच्या पिंका टाकल्या नव्हत्या.  उदाहरणार्थ, भारतावर  त्यांनी तीन पुस्तके लिहिलीत. आणि त्यासाठी ते अख्खा भारत हिंडलेत. सामाजिक, राजकीय आणि या सीमारेषेवर वावरणाऱ्या त्या त्या दशकातील दिग्गज लोकांना ते भेटलेत, मुलाखती घेतल्यात. ते नामदेव ढसाळ यांना भेटलेत, शिवसेनेच्या उदया बद्दल लिहिले, दक्षिणेत द्राविडी चळवळी बद्दल लिहिले, ६० च्या दशकात चारू मुजुमदारांना भेटलेला, नक्षलवादी चळवळीचा आढावा घेतला, सन १९७५ ला विनोबा भावे यांच्या आश्रमात राहिलेत. दिल्लीत नामांकित राजदूतां सोबत गप्पा मारल्यात तर ७० आणि ८० च्या दशकातील प्रख्यात मानसशास्त्रज्ञांशी  वाद-विवाद केलेत. त्यांनी लिहिलेलं पटो वा न पटो पण वायफळ म्हणून वाचक त्यांच्या विचारांना बाजूला सारू शकत नाही.

भारत आणि हिंदू धर्म हा त्यांच्या व्यक्तित्वाचा, व्यक्तिमत्वाचा, विचारांचा आणि लेखनाचा अभिन्न भाग होता. नायपॉल यांचे आजोबा हे भारतातून (बिहार राज्य), १९व्या शतकाच्या उत्तरार्धात त्रिनिनाद या वेस्ट इंडिज मध्ये दाखल झालेत. त्या काळात इंग्रजी सत्ता साखरेचा फार मोठ्या प्रमाणावर व्यापार करीत. इंग्रजांनी फार पूर्वीच सांप्रत वेस्ट इंडीज ही बेटे बळकावली होती. तिथे इंग्रजांनी उसाची लागवड  सुरु केली. पण त्यांना शेतांवर कामगार मिळेना. आणि इंग्रजी संसद ने सन १८३२ ला गुलामगिरीची पध्द्तही अवैध केली होती. यावर उपाय म्हणून इंग्रजी व्यापारांनी इंग्रजी अधिपत्या खाली असलेला देशामधून कामगार वेस्ट इंडीज मध्ये आणायला सुरु केले. कामगारांसोबत करार सोपा होता. पाच वर्षे शेतांवर मजुरी करायची, त्याचा भत्ता मिळेल. आणि पाच वर्षा अंती मायदेशी जायचे तिकीट मिळेल किंव्हा जमिनीचा एक तुकडा इंडीज मध्ये मिळेल, स्थायिक व्हायला. बिहार आणि उत्तर प्रदेशातील मोठ्या प्रमाणावर लोक अश्या तऱ्हेनी वेस्ट इंडीज मध्ये दाखल झालीत, आणि स्थायिक झालीत. नायपॉल त्यांच्या या स्थलांतराला ऐतिहासिक महत्व देतात. कारण या स्थलांतरीत लोकांची जणू एक अजब संस्कृती उभी राहिली.  समुद्राच्या लाटांवर भरकटत शहाळ्या सारखी ही लोक, आपली ओळख आणि अस्मिता टिकवायला सतत धडपड करीत. पण हे प्रयत्न म्हणजे वैफल्य आणि हास्यास्पद या सीमेवरचा तळ्यात-मळ्यातला खेळ होऊन बसला. अश्या पार्श्वभूमीवर नायपॉल यांचा जन्म सन १९३२ ला झाला. लहानपणा पासून हिंदू धर्मात वाढविलेल्या नायपॉलांवर भारतापासून हजारो मैल दूर असूनही भारताची सदैव सावली होती. त्यांच्या कुटुबांची भारताची नाळ तब्बल शंभर वर्षांपूर्वी तुटली असली तरी ते वेस्ट इंडीज मध्ये आणि पुढे इंग्लंड मध्ये नेहमी भारतीय म्हणूनच ओळखल्या जात. ना जन्मस्थळाचा, ना कर्मस्थळाचा आणि ना ही पितरांच्या भूमीचा, असल्या त्रिशंकू परिस्थितीच त्यांनी आपल्या लेखन प्रवासाचा आरंभ केला. 'हाऊस ऑफ मिस्टर बिस्वास' ही त्यांची पहिली कादंबरी अतिशय प्रसिद्ध झाली. त्यांच्या वडिलांच्या आयुष्यावर थोडी बहुत बेतलेलया या कादंबरीचा नायक - मोहन बिस्वास हा त्रीनिनाद येथील एक भारतीय मुळाचा हिंदू. कादंबरी मोहनच्या स्वतःचे घर बांधण्याच्या ध्यासाची गोष्ट. भारतापासून दूर असूनही रूढी -परंपरेच्या जाळ्यात गुरफटलेल्या समाजाचे चित्रण आणि स्वत्वाची ओळख म्हणून घराचा ध्यास घेतलेल्या मोहनची गाथा हि एक सुरेख कथा आहे. कथा सुरेख आहे, सुरस नव्हे. नायपॉल यांची पात्रे कधी सुरस आयुष्य जगात नाहीत. कथेचा अंत सुखी किंव्हा दुखी असावा असा नायपॉल यांचा आग्रह नसतो. त्यांचे लेखन कल्पित पात्रांच्या प्रवासाचा लेखा-जोखा असतो. मग तो मोहन बिस्वास असो कि 'काँगो' या अजून एक प्रसिद्ध कादंबरीचा नायक असो. प्रवास म्हणलं की गोष्ट केवळ पात्रां पुरतीच असू शकत नाही. पात्रांच्या आशा- अभिलाषा व्यतिरिक्त पात्रांची काळ-वेळ, समाजस्थिती, समाज बंधने, इतिहासाची ओझी हे सगळंच महत्वाचे ठरतात. नायपॉल जणू चित्र रेखाटतात. त्यांच्या या निरीक्षण शक्ती आणि लेखनाच्या खुबीमुळे त्यांच्या कादंबऱ्या आणि ललीत अतिशय प्रसिद्ध झाले. त्यांचे मिगुल स्ट्रीट, मिस्टिक मसूर, द एनिग्मा ऑफ आरएव्हल , गुरिल्ला या कादंबऱ्या इंग्रजी भाषेतील श्रेष्ठ लेखना मध्ये गणल्या जातात. त्यांच्या इन फ्री स्टेट या कादंबरीला इंग्लंडच्या इंग्रजी सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या मॅन -बुकर पारितोषिकाने सन्मानित केल्या गेले.

मागे आपण त्यांच्या प्रवासवर्णनांचा थोडक्यात आढावा घेतला. नायपॉल यांनी त्रिनिनाद-टोबॅगो, अर्जेटिना, संयुक्त राज्य अमेरिका, व्हेनेज्युएला, काँगो, इराण, पाकिस्तान, भारत, मलेशिया, इंडोनेशिया या देशांच्या वर्तमान आणि इतिहासाचा आढावा घेत, भविष्याचा वेध घेतला. ही प्रवासवर्णने या देशांच्या समाजाचे निरीक्षण आणि अवलोकन होते. ही सगळी राष्ट्रे  साम्राज्यवादाची फळे आहेत. या सगळ्या राष्ट्रांच्या सीमा आणि इतिहास विस्कळीत आहेत. देशाचे व्यक्तिमत्व, स्व-ओळख याची संपूर्ण कल्पना या देशामध्ये अजूनही रुजलेली नाही. आणि ही सगळी राष्ट्र अजूनही इतिहासाच्या ओझ्या खाली दबलेली आहेत. दक्षिण अमेरिकेत मूळ निवासी यांचा सर्वनाश करून उभे राहिलेला समाज (स्पॅनिश व पोर्तुगाली) आणि राष्ट्रांनी आपल्या रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती करणे जणू सोडलेच नाही. अमेरिका (U.S.A) हा गुलामांच्या पाठी तोडून आणि घोंगडं शिवाव तस  जमिनी विकत घेऊन उभा केलेला हा देश, अजूनही  गुलामीगिरीच्या साखळ्यांच्या खणखणात सैरभैर होतो. इराण, पाकिस्तान, मलेशिया आणि इंडोनेशिया हे देश मूळ मुसलमान नाहीत. धर्मान्तरीत हे राष्ट्रे आज जगातील सगळ्यात मोठी मुसलमान राष्ट्रे आहेत. मूळ अरबी मुसलमानां पेक्षा गैर-अरब मुसलमानांची संख्या अधिक आहेत आणि नायपॉल यांच्या मते स्वतःला सर्वाधिक  शुद्ध (पाक) मुसलमान म्हणून सिद्ध करण्याच्या सतत धडपडीत असतात. हा प्रयत्न स्फोटक आणि गैर-मुसलमान जगाला घातक ठरेल हे त्यांचा १९९० च्या दशकातील भाष्य अत्यंत विवादास्पद ठरले.

नायपॉल पहिल्यांदा सन १९६० च्या दशकात भारतात आलेत. त्यांच्या अनुभवांवर आणि प्रवासावर त्यांनी An Area of Darkness हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक त्यांच्या भारतावर लिहिलेलया त्रयी पुस्तकां मधील पहिले पुस्तक. पुस्तकाचे नाव च बहुधा लोकांना पचण्यासारखे नव्हते कारण भारत सरकार ने या पुस्तकावर लगबगीने बंदी आणली. अर्थात बंदीमुळे हे पुस्तक वाचल्या गेले नाही अस नाही.  नायपॉल या पुस्तकात पुर्वग्रहदूषित म्हणून समोर येतात.

“It is well that Indians are unable to look at their country directly, for the distress they would see would drive them mad. And it is well that they have no sense of history, for how then would they be able to continue to squat amid their ruins, and which Indian would be able to read the history of his country for the last thousand years without anger and pain? It is better to retreat into fantasy and fatalism, to trust to the stars in which the fortunes of all are written”

बऱ्याचश्या वाचकांच्या मते केवळ मूळ भारतीय आहे म्हणून भारताबद्दल असा काही लिहिण्याचा अधिकार  नायपॉलांना कसा? पण मुद्दा अधिकाराचा नाही. त्यांच्या दृष्टीत अतिशयोक्ती आहे हे खर पण हे विचार भारताबद्दलच्या असलेल्या आत्यांतिक प्रेमातून लिहिल्या गेले आहेत. जीव कासावीस होऊन लिहिल्या गेले आहेत. जवळपास शंभर-दीडशे वर्षांपूर्वी जे भारताईचे वेस्ट इंडीज मध्ये स्थलांतरीत झालेत, त्या लोकांनी तिथे एक नवीन समाज निर्माण करण्या ऐवजी जुना भारतच जगाच्या दुसर्या टोकाला बसविण्याच्या प्रयत्न केला. अगदी जाती-व्यवस्था सुद्धा जणू जहाजातून जतन करून, वेस्ट इंडिज मध्ये पुनः जणू रुजवली. भारताशी नाळ तुटू नये म्हणून लहानपणा पासून पोरांना भारतीय संस्कार केल्या जात. यात वावगं काहीच नाही. (जाती व्यवस्था सोडून!) पण जो व्यक्ती परदेशी स्थलांतर करतो तो स्व देशाचे एक चित्र मनात कोरून बाहेर बडतो. ते चित्र जुनं होत जाते, अधिक रम्य होत जाते पण सहाजिकच मुळीच बदलत नाही. शेवटी स्वदेश स्मृती पटला तून नाहीसा होतो आणि रहाते फक्त एक कल्पना.  नायपॉल भारताबद्दलच्या आणि हिंदू धर्मा बद्दलच्या रम्य कल्पनेत वाढलेत. हा भारत त्यांची जणू वडिलोपार्जित संपत्ती होती, त्यांचा वारसा-हक्क होता. पण जेंव्हा भारत - एक कल्पना आणि सत्य परिस्थितीतील भारत, खास करून १९६० च्या दशकातला भारत, याचा सामना झाला तेंव्हा नायपॉल यांच्या मनात जे भीषण वादळ आले असणार त्याचे पडसाद An Area of Darkness मध्ये उमटतात. त्यांचे भारताबद्दलचे विचार असह्य वाटतात पण ते विचार लागु होतात की नाही हे पडताळण्या पेक्षा, त्यांच्या भारताबद्दलच्या विचारांचा प्रवास म्हणून वाचायला हवेत. कारण त्यांनी हा प्रवास एक पुस्तक लिहून संपविला नाही. त्यांनी सन १९७६ ला India: A Wounded Civilization हे पुस्तक लिहिले.

"“India is old, and India continues. But all the disciplines and skills that India now seeks to exercise are borrowed. Even the ideas Indians have of the achievements of their civilization are essentially the ideas given them by European scholars in the nineteenth century. India by itself could not have rediscovered or assessed its past. Its past was too much with it, was still being lived out in the ritual, the laws, the magic – the complex instinctive life that muffles response and buries even the idea of inquiry.” - India: A Wounded Civilization

आपादकाल लागु झालेल्या भारत बद्दल त्यांचे विचार पहिल्या पुस्तका एवढे तीक्ष्ण नव्हते. त्यांची द्र्ष्टी थोडी मवाळली होती. भारतीय  समाज गर्तातून बाहेर पडायला जी धडपड करीत होता त्याची जाणीव त्यांना झाली होती. पण भारता बद्दल, भारताच्या इतिहासा बद्द्दलची त्यांची तळमळ कायम होती. त्यांचे भारत बद्दलच्या त्रयी मधी शेवटले India: A Million Mutinies Now हे पुस्तक. पुस्तकाचे शीर्षक मला फार आवडले. १९८० च्या दशकात लिहिलेलं हे पुस्तकात नवीन, तरुण भारताचा, जुन्या भारता विरुद्धचा 'ऊठाव' नायपॉल टिपतात.

“Independence was worked for by people more or less at the top; the freedom it brought has worked its way down. People everywhere have ideas now of who they are and what they owe themselves. The process quickened with the economic development that came after independence; what was hidden in 1962, or not easy to see, what perhaps was only in a state of becoming, has become clearer. The liberation of spirit that has come to India could not come as release alone. In India, with its layer below layer of distress and cruelty, it had to come as disturbance. It had to come as rage and revolt. India was now a country of a million little mutinies. - India: A Million Mutinies Now

खर सांगायचं तर १९८० च दशक हे भारता साठी फार वाईट होत. समाजवादाच्या विषवृक्षाची मुळे जणू अख्ख्या देश पादाक्रांत करीत होती. सरकार कडे  पैसा नाही, जनते कडे नोकऱ्या नाहीत, बंद पडणारे उद्योग आणि कारखाने आणि काँग्रेसी राज्यकर्त्यांना सत्तेचा आलेला किळसवाणा हुरूप यात देश फार विचित्र फसला होता. जागतिक स्तरावर चीनचा प्रभाव जाणायवाला लागला असतांना, भारत मात्र पुनः इतिहासात गुरफटतो की काय अशी शंका येऊ लागली होती. पण या सगळ्या धुमश्चक्रीत नवीन भारताची तृणें उभरत होती. भारत सरकार भारत चालवीत नाही, भारतीय भारत चालवतात आणि या भारतीयांच्या मेहनतीला, औद्योगिकतेला तोड नाही हे नायपॉल यांनी बरोब्बर ताडले. १९९० नंतरची भारताची प्रगती स्पृहणीय आहे आणि हे पुस्तक त्याचे द्योतक होते. त्यांच्या कल्पनेतील भारत त्यांना जणू क्षितिजावर पुनः दिसू लागला.

कल्पित आणि कल्पिताचा प्रवास नायपॉलांनी  विनासायस पणे जन्मभर केला. उत्तर भारतात जन्म झालेल्या अर्भकाची नाळ मूळ गावात पुरतात. ते अर्भक पुढे कुठेही जातो पण त्याच मूळ कधीच बदलणार नाही ही  त्या मागची कल्पना आणि ते अर्भक पुन्हा मूळ गावी परतेल हे इच्छा. नायपॉल  कादंबऱयांमध्ये निःशब्द, स्थलांतरीत, नाळ तुटल्या पात्रांना बोलक केल तर प्रवासवर्णनात जणू स्वतः ची नाळ पुरायाला जन्मभर जागा शोधत फिरलेत. अनुभवांनी त्यांच्या शब्दांना धार आली तर स्वतः ला शोधण्याच्या कष्टप्रद प्रयत्नांनी त्यांच्या शब्दांना जडत्व प्राप्त झाले. वडिलांनी ठेवलेल्या विद्याप्रसाद नावाचे सार्थक करीत या सरस्वतीपुत्राने इहलोकाचा प्रवास ११ ऑगस्ट, २०१८ ला संपविला.

नायपॉल यांना इंग्रजी भाषेत उपलब्ध सगळी पारितोषिके मिळालीत, इंग्लंड च्या राणी कडून 'सर' ही पदवी प्राप्त झाली पण हे सगळे मान-सन्मान केवळ नोंदी पुरते. त्यांनी शब्दांकित केलेले जग त्यांनी आपल्याला दिलेला खरा वारसा आणि त्यांचे शब्द पुढे नवीन वाचकांच्या द्वारे त्यांच्या विचारांचा प्रवास अखंड चालू ठेवतील हे त्यांचे खरे यश.

1/10/21

चांदोबा

अचानक माझ्या हाती चांदोबा मासिक चे अंक ऑन लाईन लागलेत. आठवणींच्या गुहेत गेल्या सारखे वाटले. लहानपणी  आमच्या कडे किशोर आणि चांदोबा अशी दोन मासिके माझ्या साठी व माझ्या मोठ्या भावा साठी येत असत. किशोर हे मासिक महाराष्ट्र राज्य सरकार उपक्रम अंतर्गत प्रकाशित होत असे. आणि ते किशोर वयीन मुलांसाठी असे (नावा प्रमाणे!). मी दर महिन्यात चांदोबाची आतुरतेने वाट बघत असे. आणि एकदा का मासिक आले की कधी वाचून संपवेन असे होत असे. त्यातल्या गोष्टी, चित्रे , मालिका मला फार आवडत असे. आमच्या कडे सगळे अंक जमा करून बॅगेत भरून ठेवलेले होते. उन्हाळ्यात काहीच करायला नसायचे तेंव्हा मी जुने, धुळीने माखलेले अंक पुन्हा पुन्हा वाचत असे. खूप साऱ्या गोष्टी मला पाठ झाल्या होत्या. एवढं वाचून एक तर माझा मराठी चांगले झाले होते आणि दुसरा म्हणजे, न कळत माझ्या वर भारतीय नीतिमत्तेचे संस्कार झालेत व भारतीय इतिहासाचा परिचय, जो भारतीयांनी लिहिला आहे,  झाला. 

आता भारतीय नीतिमत्ता म्हणजे नेमके काय? तर चांदोबातील बहुतांश गोष्टी या इसापनीती, हितोपनिषद किंव्हा उपनिषद मधल्या किंव्हा त्या वर आधारित असत. पुराण, रामायण व महाभारतातील गोष्टी, खास करून कृष्णाच्या गोष्टी नियमित प्रकाशित होत असत.  गोष्टींद्वारे लहान मुलं-मुलींना चतुरपणा, हजरजवाबीपणा कसा व कुठे करावा, आणि  कुठे हजरजवाबी पणा करू नये, प्रामाणिकता, इत्यादि संस्कार तर होत असत. भारतीय समाज, नितीमत्ता व धर्माचे वैशिष्ट्य असे हे कधीच एकांगी, एकमार्गी नाही. उदाहरणार्थ, प्रामाणिकता जरी अंतिम सत्य मानिले तर त्यातील बारकावे शिकवायला हवे. परिस्थिती कशी आहे, त्यातून काय सिद्ध होईल, त्याचे काय परिणाम होतील. मी प्रामाणिक राहणार, आजूबाजूचे गेले खड्ड्यात असला एकांगी विचार केला की गांधी तयार होतो! आज काल हा बारकावा शिकविला जात नाही आणि लोकांनाही याचा विसर ही पडला आहे. पाश्चिमात्य विचारप्रणाली जी ख्रिस्ती धर्मावर आधारित आहे, आणि ज्यांची नीतिप्रणाली ही मनुष्य मूळ पापी च आहे आणि त्याला न्याय शेवटी येशू च देणार असल्या भ्रामक अंध विश्वासावर आधारित आहे, तशी विचार सरणी हळू हळू भारतात मानल्या जाते आहे. 

चांदोबाच्या ऐतिहासिक गोष्टी पण खूप असत. गोष्टी रूपात आणि कॉमिक्स  शैलीत ही गोष्टी असत. दक्षिण भारतातील बऱ्याच ऐतिहासिक पात्रांची ओळख मला चांदोबामुळेच झाली. पण त्याहून एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे की आपला इतिहास आपल्या लोकांनी लिहिलेला मला वाचायला मिळाला. पुरातन ते नवीन भारतीय इतिहास आपला नाहीच, त्या केवळ घटना आहेत ज्याच्या संबंध १९४७ साल नंतरच्या भारताशी नाहीच आणि हिंदू इतिहास तर घृणात्मक असल्याच्या  (पण गांधी नेहरूंचा इतिहास १९४७ च्या आधीचा असला तरी वाचायचाच!) काहीश्या विकृत आणि विभित्स मनोवृत्ती तून आपल्या शाळांमध्ये इतिहास शिकविल्या जातो. अश्या परिस्थितीत चांदोबा मुळे मला इतिहास व पुराणांची ओळखच नव्हे तर आवड व आपुलकी निर्माण झाली. आणि ही आवड आजगयत आहे. 

मला वाटत की चांदोबाचे प्रकाशन बंद झाले आहे. स्वभाषेत वाचणारे आणि लिहिणारे, दोन्ही कमी झालेत. मातृभाषेचा व स्व भाषेचा गळा मोठया अभिमानाने हळू हळू घोटून हत्या करणार भारतीय समाज हा जगातला एकमेव च असावा. आणि चांदोबाचे वाचन वर्ग कमी होत गेल्यामुळे बंद पडलेले प्रकाशन हे भारतीय भाषा, इतिहास, विचारधारेचा जणू अंतिम टप्पा आहे. भविष्य आता इंग्रजीत बोलून पाश्चिमात्य देश, संस्कृतीची नक्कला करणारा देश भारत होणार आहे. 

9/7/13

ता.क. - परदेशातील स्वातंत्र्यदिनी झालेले अंतर्मुख मन

मागच्या लेखाच्या निमित्ताने एक अनुभव सांगावासा वाट. मी कॉलेज मधे असतांना कॉलेजच्या ग्रंथालयात काम करीत असे. तिथे माझ्या सोबत एक 'डेव' म्हणुन माझ्या सारखाच विद्यार्थी काम करत असे. तो दिसायला भारतीय दिसत असे पण बाकी रहाणीमाना वरुन तो कुठल्याच दृष्टीने भारतीय नव्हता. एक दिवस त्याच्या गळ्यात मला हनुमानाचे ताईत दिसले. मला आश्चर्य वाटले. आता अमेरिकेत हिंदु धर्म स्विकारलेले बरेचसे लोक आहेत. त्यापैकी तर हा एक नाही असा मला प्रश्न पडला. दुसर्‍या दिवशी मी त्याला विचारले तर मला आश्चर्याचे अजुन धक्के बसले. त्याचे नाव डेव होते पण खरे नाव देवेंद्र साव्हने होते. त्याचे कुटुंब मूळ वेस्ट इंडिज चे आणि त्या आधि मूळ भारतीयच. डेव ला भारताच मूळीच गंध नाही तसेच सणावारांचाही त्याला फारसा गंध नव्हता. त्याच्यावर वेस्ट-इंडिज आणि अमेरिकेचे संमिश्र संस्कार झालेले होते. थोडक्यात संस्कार आणि इतिहासाच्या बाबतीत तो गोंधळलेला होता. पण त्याच्या वडिलांची हनुमानावर भक्ती होती आणि त्यांनीच त्याला हनुमानाचे ताईत घालायला दिले. तो मला म्हणाला की ते ताईत तो कधीच काढत नाही आणि त्याच्या मुला-बाळांनाही तसलच ताईत पुढे देणार.  

9/4/13

परदेशातील स्वातंत्र्यदिनी झालेले अंतर्मुख मन

आदल्या दिवशी फोन आला की चिन्मय, उद्या स्वातंत्र्यदिवस उत्सवात मदत हवी आहे, येतोस का? मी विचार केला की जाउया. काही तरी बदल आणि गंमत. मिरवणुकीत एका कार वर गणपतीची मूर्ती चढवली होती आणि मिरवणुकीच्या आघाडीवर मला ती कार चालवण्याची कामगिरी होती. थोडक्यात परदेशात होण्यार्‍या या उत्सवाच्या गणपतीचा मी उंदीर! भारता पासून हजारो मैल दूर भारत स्वांतत्र्य दिवस दिमाखाने साजरी होत होता. गणपतीच्या मूर्तीला समोर ठेउन लोक ढोल-ताशे वाजवत, नाचत, मिठाई खात आनंदाने वंदे मातरम् चा जल्लोष करीत होते. सगळ दृश्य थोड विस्मयकारक होते. मिरवणुकीत सामील झालेल्यांपैकी बहुतांश जन अमेरिकन नागरीक होती आणि जी लोक नव्हती ती नागरीकत्व प्राप्त करण्यासाठी रांगेत उभी होती. थोडक्यात, या पैकी कोणीचीहे कधीही भारतात परतण्याची इच्छा ठेउन नव्हत. मिरवणुक मुंगीच्या गतीने सरकत होती आणि माझ्या डोक्यात विचारांची चक्र भरधाव फिरू लागलीत. भारतातून तडफडत निघुन परदेशी आल्यावरही ही लोक उत्साहाने स्वातंत्र्य दिवस का साजरी करतात? भारताचा दु:स्वास म्हणुन हि लोक पळालेली नाहीत हे मान्य. पण स्वातंत्र्य दिवस साजरी करण्या मागचा हेतु तरी काय?

सन १९४७ ला इंग्रजांच्या मगरमिठीतून भारत कसाबसा सुटला तेंव्हा जगात भारत आणि भारतीयांना स्थान दुय्यम होते. पुढील साठ वर्षात हे चित्र झपाट्याने बदलले. मनमोहन सिंग सारख्या तत्सम घृणास्पद नेत्यांच्या अथक मूर्खपणा, शंढपणा आणि भ्रष्टपणाचा गेले साठ वर्ष सामना करत देशाने भरपूर प्रगती केली. परदेशस्थ भारतीयांनी मात्र प्रगतीचे आणि भरभराटीचे नविन विश्व निर्माण केले. केवळ तंत्रज्ञानच नव्हे तर वैद्यकीय आणि व्यापार क्षेत्रातही भारतीयांनी यशाच्या उत्तुंग शिखरे गाठलीत आणि रग्गड पैसा कमविला. पाच-सात वर्षांपूर्वी एका विख्यात कंपनीच्या अनुमते परदेशी भारतीयांकडे तीनशी बिलियन डॉलर्स हुन अधिक संपत्ती आहे. आज अमेरिकेत भारतीय सगळ्यात श्रीमंत समुदाय आहे. आणि हे यश स्वातंत्र्योत्सव थाटात साजरी करुण्यात ठळक पणे दिसुन येत.
गेल्या दोन दशकात अमेरिकेत जाण्याचे प्रमाण अधिक असले तरी इंग्रजांची सत्ता सुरु झाल्यापासुन भारतीय बर्‍याच देशांमधे पसरले आहेत. वेगवेगळ्या देशात वसलेल्या भारतीयांचा इतिहास आणि अनुभवांवर एका लेखात लिहिणे अशक्य आणि अनुचित ठरेल. पण अमेरिकेतल्या असो कि इंग्लंडमधल्या, ऑस्ट्रेलिया असो की वेस्ट-इंडिज, एक साधारण गोष्ट अशी की भारत सोडूनच ही लोक यशस्वी ठरलीत किंवा यशाच्या आणि पैश्याच्या शोधातच या भारतीयांनी मेहनत करुन भारत सोडला. पण भारताबाहेर राहुनही ही लोक देशभक्त आणि देशप्रेमी राहिलीत ही आश्चर्याची गोष्ट आहे. विशेषतः अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयां बद्दल असे म्हणायला हरकत नाही.

या देशभक्तीचे बाराकाईने निरिक्षण केले तर त्यातील घड्या हळु हळु उलगडायला लागतात. असे ध्यानात येत की भारतातून नुकतीच आलेली लोक सुरुवातीला देशभक्त असतात आणि कालांतराने त्याचे रुपांतर भारत समाज भक्तीत होते. कारण भारतीय समाज आणि भारत देश या नाण्याच्या दोन बाजू नसुन दोन वेगळी नाणी आहेत हे लक्षात घ्यायला हवे. पण भारत देश हा भारतीय समाजापेक्षा वेगळा कसा? आपण इथे दोन उदाहरणांचा विचारात घेऊ. वेस्ट इंडिज मधे दिडशे वर्षांपूर्वी स्थलांतर केलेला भारतीय आणि गेल्या पंचवीस वर्षात मोठ्या संख्येने अमेरिकेत (संयुक्त राज्य अमेरिका) स्थायिक झालेला भारतीय यांना आपण उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या पायर्‍यांवर बघु शकतो. एक भारतीया भारतापासुन दिडशे वर्षांहुन अधिक तुटलेला आण तरीही भारतीय समाजाल घट्ट धरुन ठेवण्यात धडपड करणारा तर दुसरा भारतीय केवळ पंचवीस वर्ष परदेशस्थ असल्यामुळे अजुन भारताशी नाळ टिकवुन ठेवलेला. माझ म्हणण हे की हा अमेरिकेतला भारतीयाची आज-उद्यात ही नाळ तुटणारच आणि तो नविन स्वरूप धारण करणार.

भारतीय समाज अत्यंत पुरातन आणि सनातन आहे. (अस म्हणल्या बरोब्बर 'सर्व-धर्म-समभावी झोलेवाले' हिंदुत्ववादी, हिंदुत्ववादी चा आरोप लावतील. पण त्या शंख लोकांना सध्या अडगळीत रवाना करुया.) भारतीय उपखंडात जन्मलेल्या या संस्कृतीचा विस्तार पाकिस्तान पासुन ते म्यानमार पर्यंत मानायला हरकत नाही. हा समाज परकीय आक्रमणे आणि आंतरिक बदलाच्या छिन्नी हतोडीने घडलेला आहे. हजारो वर्षांच्या इतिहास मंथनाचे पडसाद आणि प्रतिसाद प्रत्येक भारतीयाच्या घडण-मोडणीतून ठळकपणे दिसतात. आपल्या चाली-रीती, रुढी परंपरांमधुन या संस्कृतीच्या पाउलखुणा उमटतात. आणि याचा रंग इतका गाढा आहे कि भारतीय व्यक्ती जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात गेला तरी तो या संस्कृतीची चौकडी उभारतो आणि वैयक्तिक आयुष्य त्यात कंठण्याचा प्रयत्न करतो. प्रसिध्द इंग्रजी भाषेतील लेखक विद्याधर नायपॉल त्यांच्या लहानपणीच्या आठवणींमधुन हे प्रकर्षाने जाणवत. त्यांचे पणजोबा (नायपॉल स्वतः ऐंशी च्या घरात आहेत) बिहार सोडुन ब्रिटिश नावेतून वेस्ट इंडिज मधे दाखल झालेत. म्हणजे साधारण सन १८५० च्या कालावधीत. ब्रिटिश साम्राज्याला तेंव्हा ऊसाच्या लागवडीत मजदूर लागत म्हणुन ते भारतीयांना तिथे घेउन जाउ लागलेत. सौदा असा की पाच वर्ष ऊसाच्या लागवडीवर पगारी मजदूरी करायची. पाच वर्षांनंतर एकतर परतीचे तिकिट मोफत मिळेल किंवा वेस्ट इंडिज मधेच जमिनीचा तुकडा मिळेल. बहुतांश गेलेले लोक तिथेच स्थायिक झालेत. भारतात तेंव्हा आर्थिक परिस्थिती नामुष्कीच होती त्यापेक्षा भारत सदृश्य हवामान असलेल्या पृथ्वीच्या दुसर्‍या टोकाला स्थायिक होणे सुसह्य होते. नायपॉलांनुसार या नव स्थायिकांनी भारतीय समाजाची पुनारावृत्ती वेस्ट इंडिज मधे केली. तिथल्या नद्यांना गंगा नाव देण्या पासुन ते भारतातले सणवार उपलब्ध सामुग्रीने साजरी करण्या पर्यंत सगळ आठवणींमधुन अगदी जातीभेदही या लोकांनी कायम ठेवलेत. हे उदाहरण देण्यामागचा उद्देश असा की परदेशात स्थायिक होण्यार्‍या सगळ्या भारतीयांनी भारतीय समाजाशी निष्ठा बाळगली आणि त्याच्या मागे एक महत्वाचे कारण आहे. सन १८५० च्या जमान्यात वेस्ट इंडिज ला जाणार्‍या भारतीयांचा भारत देश आपल्या भारत देशापेक्षा वेगळा होता (पाकिस्तान, बांग्लादेश भारतातच गणल्या जात होते) आणि भारत देशाची व्याख्या जरी पुढल्या शंभर वर्षात झपाट्याने बदलत गेली तरी वेस्ट इंडिज मधील भारतीय समाजाशी नात जोडल्यामुळे या लोकांना स्वतःची ओळख कायम ठेवता आली. भारत स्वातंत्र्याचा लढा, भारत या भौगोलिक प्रदेशाचा सन १९४७ साली झालेला उदय इत्यादी घटनांशी परदेशस्थ भारतीयांचा तिळमात्र संबंध नाही आणि संबंध ठेवायचा म्हटला तरी कसा ठेवणार?


माझा क्रिकेटशी संबंध फक्त क्रीक-इंन्फो वरील लेख वाचण्यापूर्तीच आहे. मी शेवटली पूर्ण मॅच सन २००३ च्य वल्ड कप ची बघितली असणार. भारत २०१२ विश्व चषक जिंकल्याच मला माहिती होत (मी फक्त तेंडुलकरची बॅटिंग बघितली आणि तो बाद झाल्यावर रागाने रिमोट फेकुन झोपायला गेलो!) पण त्या दिवशी बायको सोबत जेवायला गेलो होतो तर दुकानाच्या मालकाने जिलब्या आणुन दिल्यात, भारत विजयी ठरला म्हणुन. जणु काही त्याच्या घरच लग्न आहे या थाटात तो येणार्‍यांना जिलब्या वाटत होता. अमेरिकतल्या मोठ्या शहरांमधे तर जल्लोषाने हा क्षण मनविल्या गेला. हा वि़जय मनविणार्‍यामधली बहुतांश जन नुकतेच भारतातून अमेरिकेत दाखल झालेली आहेत. या लोकांच अजुनही भारतात जाण-येण होत असत, बहुतांशांची लग्नहि भारतातलीच. पण जी लोक साधारण २५-३० वर्षांपूर्वी अमेरिकेत आलीत त्यांचा आता भारताशी संबंध कमी होत गेल्याच दिसत. हि लोक दिवाळी जोरात साजरी करतात पण आता भारतातील घडामोडींशी त्यांचा फारसा संबंध नसतो. क्रिकेट, राजकारण इत्यादी विषयांवर खुप वर्ष अमेरिकेत राहिलेल्या भारतीयांना फारसा जिव्हाळा नसतो. आणि का असावा? आपण आता कायमचे अमेरिकेतच रहाणार आणि आपल्या पुढल्या पिढ्या सुध्दा अमेरिकेन असणार हि सत्याची जाणीव झाल्यावर भारत देशाशी संबंध तुटतो. मग मंदिर बांधुन, धार्मिक संस्था टाकुन परंपरा जपण्याचा आणि पुढल्या पिढीवर संस्कार बिंबविण्याचा प्रयत्न सतत केल्या जातो.


स्वातंत्र्य उत्सवाची मिरवणुक निघाली तर त्यात भारताचा झेंडा अग्रगण्य होता पण त्या सोबत गणपतीची आवश्यकता होती. जन-गण-मन सगळ्यांनी ताठ उभ राहुन गायल पण गणपती बाप्पा मोरया चा गजर त्याच्या मागोमाग झाला. स्वातंत्र्य उत्सव साजरी करणे म्हणजे भारत देश आणि भारतीय समाज याचा संगम होय. कालनीय उत्क्रांतीच्या पायर्‍या चढतांना परदेशी भारतीय हा सोनेरी दोराचा आधार घेतो एवढच.


भारत ही एक सतत बदलणारी व्याख्या आहे. कालचा भारत वेगळा होता आणि उद्याचा भारत फार वेगळा असणार पण भारताची एक प्रतिमा मनात बंद करुन नविन किनारे गाठणार भारतीय माणुस या समाजनिष्ठे मुळे सदैव भारतीयच रहाणार ही आनंदाची गोष्ट नाही का?