7/21/24

गोंड कोण होते आणि इतर विचार. (चंद्रप्रकाशी लेखन)

**या लेख मालिकेला मी चंद्रप्रकाशी अश्यासाठी म्हणले आहे कारण हे माझे मूळ संशोधन नाहीं. सेतू माधवराव पगडी लिखित इतिहासाचे पुनर्मुद्रण सध्या वाचतो आहे. त्यातील संशोधनाचा मागोवा आणि काही प्रमुख घटना  संक्षिप्तात मी येथे सादर करण्याचा हा प्रयत्न.  

या लेख-मालिकेचा पहिलादुसरा लेख इथे उपलब्ध आहे. 

--

मी मूळ नागपूरचा आहे त्यामुळे गोंड आदिवासी आणि गोंडांचे राज्य सध्याच्या पूर्व विदर्भ भागात होते याबद्दल मला नेहमीच कल्पना होती. पण शाळेत कधी गोंड इतिहास शिकविला नाहीं. भारतात साधारण जो इतिहास शिकवितात तो भारताचा किंव्हा भारतीयांचा इतिहास नसतो. परदेशी आक्रमकांचा इतिहास आपल्यावर थोपवल्या जातो. स्वातंत्र्योत्तर काळात कम्युनिस्ट लोकांनी केंद्र सरकार मधील शैक्षणिक आणि अभ्यासक्रमाची दालने व्यापलीत आणि त्यातून भ्याड मनोवृत्ती आणि बुरसट, बुळबुळीत विचारसरणी आपल्यावर लादल्या गेली. असो. तो एक वेगळा विषय ठरेल. मागच्या दोन लेखात म्हणाल्या प्रमाणे श्री सेतू माधवराव पगडी यांनी लिहिलेला इतिहास संक्षिप्तात प्रकाशित केल्या गेला आहे आणि त्यातील 'इतिहासाचा मागोवा' या पुस्तकातील हि माहिती आहे. मूळ विचार आणि अभ्यास माझे नाहीं. हे पुस्तक आणि त्यातील अनमोल माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचावी हे या लेखाचे उद्देश्य. 

गोंड आदिवासी समाज पूर्व विदर्भ, छत्तीसगढ, उत्तर तेलंगण आणि मध्य प्रदेश या प्रांतात पसरलेला आहे. त्या त्या भागातील गोंड तिथली भाषा मातृभाषा म्हणूनच वापरतात. म्हणजे विदर्भातील गोंड हे मराठी बोलतात किंव्हा उत्तर तेलंगण मधील गोंड तेलगू बोलतात. गोंड समाज, त्यांचा इतिहास, त्यांचे साहित्यात किंव्हा चाली-रीती सनातन धर्माशीच ठाम पणे बांधल्या आहेत. रामायण आणि महाभारताचे दाखले त्यांच्या पुरातन साहित्यातही दिसतात (इथे साहित्य म्हणजे लेखीच नव्हे तर लोककथा किंव्हा सामाजिक स्मृती या दृष्टीने मी वापरला आहे.) महादेव किंव्हा शंकर प्रामुख्याने आढळतो. शंकर-पार्वतीच्या कृपेने पुढे गोंड समाजाची निर्मिती झाली अशी समाज उत्पत्तीची आख्यायिका आहे. इंग्रजीत याला ओरिजिन स्टोरी असे म्हणतात. गोंड समाजात वेग वेगळी मूळ घराणी आहेत आणि त्यांची गोत्रे पण आहे. झिगुबाईची कथा, माणकोची कथा, तूरपालसिंघेची कथा इत्यादी प्रसिद्ध आहेत. या भागात राम-कृष्ण किंव्हा लक्ष्मी इत्यादी देव कमी आढळतात. गोंडांच्या देवळांना पेनगड म्हणतात. पेन म्हणजे देव. आणि श्री पगडी लिहितात कि देवळात मुर्त्या नसून भाल्याचा फाळ आणि चवरी असते. 

पुस्तकात गोंड समाजातील आणावे आडनावे दिली आहेत त्यात मेश्राम, आत्राम, टेकाम, गेडाम हि आडनावे आपल्याला नागपूर भागात नक्कीच दिसतात. आता तुम्हाला कधी श्री मेश्राम किंव्हा श्री आत्राम आडनावाचे भेटलेत तर ते गोंड समाजातीलच असतील असे नाहीं, म्हणजे त्याची खात्री देणे कठीण आहे. आजकाल हा विषय थोडा नाजूक आहे. पण ओळखीची आडनावे बघून आपुलकी वाटली.

विदर्भातील पूर्व भाग (नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा) व मध्य प्रदेश भाग असे गोंड राज्य सोळाव्या व सतराव्या शतकात उदयाला आले. त्यातील जबलपूरजवळ गढमंडली - राणी दुर्गावती हि गढमंडळीची. हिने अकबराविरुद्ध लढा दिला होता. पुढे औरंगझेब दक्खनी उतरला तेंव्हा त्याच्या विरुद्ध नागपूरच्या गोंड राजाने आणि सैन्याने प्रखर लढा दिला. पुढे भाऊबंदकी होऊन त्यातील एका भावाने औरंग्याच्या पदर धरला आणि मुसलमान झाला. मुघली मदतीने हा बख्त बुलंद शाह पुढे गादीवर आला. छत्रपती शाहूंच्या काळात आणि पेशवाईत भोसले परिवारातील श्री रघुजीराजे भोसले नागपुरात स्थिर झालेत आणि गोंडांचे राज्य मावळले.  

श्री पगडी यांनी पुस्तकात गोंड समाजात जातीभेद नाहीं असा उल्लेख केला आहे. साधी विवाहपद्धती आणि अगदी विधवा विवाह सुद्धा निषिब्ध नाहीं असेही ते म्हणतात. या दोन्ही बाबी फार स्पृहणीय आहेत आणि या साठी गोंड समाजाचे कौतुकच करायला हवे. या विषयावर श्री पगडी यांनी अक्षरशः एकाच परिच्छेद लिहिला आहे. या विषयावर अजून वाचन करायला हवे. श्री पगडी यांचे 'अमंग दि गोंड्स ऑफ आदिलाबाद' आणि "गोंडी भाषेचे व्याकरण' हि दोन अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रकाशित आहेत. आणि श्री पगडी स्वतः सन १९४५ ते १९४८ सध्याच्या तेलंगण राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात मामलेदार आणि डेप्युटी कलेक्टर म्हणून होते. या व्यतिरिक्त त्यांना आदिवासी विशेष अधिकारी म्हणूनही दायित्व त्यांच्या कडे होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या अभ्यासाला आणि या विषयावर त्यांच्या लेखनाला अनुभवाचे वजन आहे. 

पुढले चंद्रप्रकाशी लेख 'छत्रपती नि त्यांची प्रभावळ' या पुस्तकातील असतील. आशा करूया कि काही तरी नवीन शिकायला मिळेल. 




No comments: