8/15/13

चुक-भूल देणे घेणे

सध्या लिहित असलेला एक लेख चुकुन प्रकाशित झाला. ते लक्षात येउन आणि लेख ब्लॉगवर अप्रकाशित करण्या आधीच मराठीब्लॉगस. नेट च्या बॉट ने तो लेख त्यांच्या संकेतस्थळावर जाहिर केला. बरीच लोक तो लेख वाचायला रुद्र शक्ति वर येतांना दिसतायत. क्षमा करा पण लेख अजुन पूर्ण झालेला नाही. लौकरच तो प्रकाशित करण्याचा प्रयत्न करेन.

आशा करतो की रुद्र शक्ति वरचे इतर साहित्य वाचण्याजोगे असेल.  

धन्यवाद

8/6/13

पेशवाई आणि शिवशाही - एक संक्षिप्त आढावा (भाग १)

पेशवाईवर वाचतांना एक माझ्या लक्षात आले की पेशवाईबद्दल एकलच बोलण म्हणजे त्या राज्यसत्तेला नीट मान न देण्यासारख आहे. नुसती पेशवाईच नाही तर शिवशाहीला ही त्या काळातल्या भारतातील सत्ता आणि भारतेत्तर सत्तांच्या तुलनेत बघण आवश्यक आहे. तुलनेशिवाय थोरवी ध्यानात येत नाही. ही कल्पना डोक्यात घेउन पेशवाई, छत्रपतींचा राज्यकारभार आणि सांप्रत जागतिक परिस्थिती या तीन सुयांनी वेगळ कापड विणण्याच धाडस करतो आहे. यातील पेशवाई आणि छत्रपतींच्या राजकारभारावर ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत आणि अजुनही या विषयांवर बरच काही लिहिल्या जात. पण या दोन कालखंडांवर तुलनात्मक अभ्यास केल्याच माझ्या वाचनात आलेल नाही. या व्यतिरिक्त १७व्या आणि १८व्या शतकात भारत खंडात या आमुलाग्र बदल होत असतांना भारतेत्तर जगात, प्रामुख्याने युरोपिय, तुर्की साम्राज्य आणि अमेरिका खंडातही महत्त्वाचे बदल झालेत. त्याचे परिणाम आज आपल्य आयुष्यावर प्रकर्षाने जाणवतात. उदाहरणार्थ संयुक्त राज्य अमेरिकेची स्थापना. पण आज भारतात ४ जुलै ला अमेरिकेची स्थापना झाली हे माहिती असेल पण थोरल्या बाजीरावांनी दिल्ली कधी पादाक्रांत केली तर थोरले बाजीराव कोण असा प्रश्न पडेल. जर आपण काल्पनिक दुनियेत स्वतःला सन १७५० मधे उभ केलत वर उधृत केलेले बदल समानात्मक होते. म्हणजे त्या काळातले मराठी साम्राज्य जगातील इतर कुठल्याही सत्तेला काट्याची झुंज देण्याची ऐपत बाळगत होत. पण आपल्या दुर्दैवाने मराठा साम्राज्य झपाट्याने लयाला गेल तर युरोपिय सत्ता तेवढ्याच झपाट्याने बलशाली झाल्यात आणि आज आपला देश मराठी बोलायच्या ऐवजी इंग्रजी बोलतो.

अर्थात, या ऐतिहासिक घटना इतक्या सोप्या तर्‍हेने समजणे चुकीचे ठरेल. यातले बारकावे लक्षात घेतलेत तर खर चित्र स्पष्ट दिसत. सध्य परिस्थितीत तर प्रत्येक घटना - ऐतिहासिक असो की सांप्रत, जातीय दृष्टीकोणातूनच बघण्याची हौसच जणु आपल्या समाजाला लागली आहे. त्या ऐवजी मराठी कालखंडाचा अभ्यास त्या काळातील इतर जागतिक घटनांच्या अनुषंगाने केला, व त्या कालखंडावर तटस्थ दृष्टीक्षेप टाकला तरच मराठा वैभवाची आणि सामर्थ्याची खरी कल्पना येउन त्यातुन काही शिकण्यायोग्य मिळेल. आपल दुर्दैव अस की इतिहासातील घटना विसरणे, त्यातुन काहीही न शिकणे, स्वतःच्या पूर्वजांना नाव ठेउन पायावर धोंडा मारुन घेण्यातच आपला समाज पटाईत आहे. असो.

छत्रपतींचा काळ आणि पेशवाईत जवळ-जवळ ४० वर्षांचा प्रचंड घडमोडींचा काळ होता. मी पेशवाईची खरी सुरुवात थोरले बाजीराव पेशवे झाल्यापासुन मानतो. (यापुढे मी छत्रपतींचा उल्लेख राजे असा करेन. लिहायल सोप जात आणि खरा राजा तोच!) राजांच्या मृत्युसमयी मराठी राज्य पश्चिम महाराष्ट्र, कोंकण कर्नाटक आणि तमिळ भूमीत तंजावर पर्यंत पसरल होत. सन १६८० ला राज्याची घडी व्यवस्थित बसलेली होती. सैनिक-सरदार आपापल्या जागांवर दृढ आणि सजग होते. राज्य चालवायला लागणार्‍या पैश्यांची सोय नीट केल्या गेली होती. किल्ले भक्कमपणे रक्षित होते आणि आरमारावर राजे लक्ष केंद्रित करत होते. राजांना युरोपिय सत्तांची कितपत माहिती होती, अमेरिक इत्यादी खंडांबद्दल कितपत ज्ञान होते हे सांगणे कठिण आहे. पण या सत्तांना टक्कर द्यायची तर आरमार सशस्त्र हवे हे त्यांनी हेरले होते. आणि पुढे-मागे मोघलांना आटोक्यात आणल्यावर युरोपिय सत्तांशी संघर्ष निश्चित होता याची जाणीव त्यांना नक्कीच होती. पण आरमार आणि इंग्रजांशी व्यवहार या दोन्ही बाबतीत पेशव्यांनी फार मोठ्या चुका केल्यात. आपली सत्ता मजबुत करण्यामागे त्यांनी महाराजांनी अत्यंत कष्टाने रुपास आणलेल्या आरमाराचा नाश केला. इंग्रजांशी शेवटी झुंज समुद्रावर न होता जमिनीवर झाली पण आरमार सशक्त असते तर पुढील काळात पेशव्यांनाच त्याचा उपयोग झाला असता. तसच इंग्रजाचा मुघलांसारखाच नाश पेशव्यांनी करायला हवा होता. बहुधा त्यांना (सवाई माधवराव पर्यंतच्या पेशवाईला) इंग्रजांची खरी ओळख झाली नाही किंवा इतर युध्दापायी इंग्रजांच्या हालचालींचा फारसा विचार केल्या गेला नाही. यात एक बाब लक्षात घेण्याजोगी अशी की मूळ इंग्रज मुंबई किनारपट्टीवर १६व्या शतकात लागलेत. त्यांचे सुरतेत आणि मुंबईत वखारी होत्या. पण मराठ्यांचा वचक त्या भागात इतका वाढत गेला की शेवटी इंग्रजांना भारतात शिरायाला जाग कलकत्त्यातूनच मिळाली. नागपूरच्या भोसल्यांना कलकत्ता जिंकायची संधी होती पण मोक्याच्या वेळी शंखपणा केल्यामुळे हा भाग अनायसे इंग्रजांना मिळाला. पुढे नागपूरच्या भोसल्यांनी पेशवाईच्या विरोधात पहिले निजामची साथ देण्याचा प्रयत्न केला आणि मग पुढे इंग्रजांची. पेशवाईच्या उत्तरार्धात होळकरांसोबत नागपूरच्या भोसल्यांनी करारीची झुंज दिली पण तो पर्यंत उशिर झाला होता आणि त्याची परिणिती मराठी साम्राज्याच्या अस्ताने झाला.

आढाव्याची सुरुवात चुकांनी करायचा मानस नव्हता पण इंग्रज आणि आरमार या दोन्ही बाबतीत झालेल्या चुकांच मला फार वाईट वाटत.

मागे म्हटल तस पेशवाई आणि शिवशाहीत ४० वर्षांच अंतर होत. साधारण काळातही ४० वर्षात तफावत जाणवते तर सन १६८० ते सन १७२० मधला काळ तर प्रचंड घडामोडींचा काळ होता. राजांच्या मृत्युनंतर दोन घटनांची या ४० वर्षांवर फार मोठी सावली होती. एक म्हणजे औरंगझेबाची सन १६८२ ची दख्खनी स्वारी आणि दुसर म्हणजे छत्रपती संभाजींचा सन १६८९ चा अवेळी आणि बिभत्स मृत्यु. या दोन्ही घटना एका पाठोपाठ घडल्यात अस म्हणायला हरकत नाही. या दोन्ही अघटीतांनी मराठा राज्यावर प्रचंड तणाव पडला. संभाजी राजांनंतर शूर आणि मुत्सद्दी छत्रपती परत काही राज्याला मिळाला नाही. (शाहु महाराज नक्कीच मुत्सद्दी होते.) त्यामुळे संभाजी राजांच्या मृत्युनंतर नेतृत्वाची कमतरता जाणवायला लागली. या काळात औरंगझेबाच बळ वाढतच गेल. पहाता-पहाता मराठी राज्य केवळ कोकण पट्टी पर्यंतच सिमित राहिल. यात काही कमी असेल तर राजघराण्यातला कलह. मराठी राज्य या परिस्थितीतून तगल हा चमत्कारच मानावा लागेल. मला वाटत की या सगळ्या घटनांनी पेशवाई आणि शिवशाहीतला धागा तुटला. राजांच्या दरबारतला कोणीही मातब्बर सन १६९० नंतर दिसत नाही. त्यामुळे बाळाजी विश्वनाठ जेंव्हा दिल्लीला मुघलांशी करार करायला गेलेत तेंव्हाचे डावपेंच, राजकारण इत्यादी घटनांवर शिवशाही विचारधारांचा कितीसा प्रभाव होता हे सांगणे कठीण आहे. मराठा राज्यविस्तार आणि मुघलांचा नायनाटा करणे ही दोन ध्येय फक्त एक जिवंत धागा होता. हे राज्य श्रींची इच्छा आहे असले विचार पेशवाई पर्यंत काळापर्यंत टिकले होते अस म्हणता येणार नाही.

या सगळ्या उहपोहाचा उद्देश असा की पेशवाईचा जमाना शिवशाहीपेक्षा फार वेगळा होता. सह्यांद्रिच्या आडोश्याची गरज उरली नव्हती आणि किल्ल्यंचे महत्त्व राहिले नव्हते. उत्तर हिंदुस्तानातील सपाट मैदानावर लढण्यासाठी नविन तर्‍हेची युध्दसंस्थेची आणि कौशल्याची आवश्यकता होती.गेली साठ वर्ष डोंगर-कपार्‍यात लढा देण्यात निपुण असलेली मराठी पोरं अचानक दिल्लीपर्यंत कशी पोचलीत हे देवालाच माहिती. खुद्द राजांनाही इतक्या लौकर दिल्ली गाठण्याची स्वप्न बघितली नसणार. मी या लेखात आणि बाकीच्या लेखांमधेही दिल्ली गाठली, दिल्ली गाठली असा सारखा घोष करतो आहे. दिल्ली भारताची राजधानी आहे आणि तेंव्हा मोघलाईचीही राजधानी होती हे खर पण दिल्लीवर स्वारी करण्याच्या मनसुब्या मागे फार मोठा इतिहास दडला आहे. मला त्यावर थोड लिहायला आवडेल. पण सध्या हा लेख हाताबाहेर जातो आहे अशी शंकेची पाल मनात चुकचुकते आहे. म्हणुन इथेच पूर्णविराम द्यायला हवा. शेवटच म्हणुन एक मागे ऐकलेली गाथा सांगतो आणि लेख संपवतो.

थोरल्या बाजीराव नुकतेच पेशवा झाले होते. ते जेंव्ह पेशवा झालेत तेंव्हा ते अवघे वीसचे होते. छत्रपती शाहुंच्या दरबारात सगळी सरदार मंडळी आणि तरुण पेशवा पुढल्या कामगिर्‍या, मनसुबे इत्यादींवर चर्चा करीत होते. सगळ्यांच म्हणण अस होत की पुढली कामगिरी दक्षिणेवर व्हावी. तिथल्या प्रदेशावर परत सत्ता दृढ करावी आणि उत्तरेला जशी परिस्थिती निर्माण होईल तशी कार्यवाही करावी. असले विचार ऐकुन भर दरबारात तेंव्हा बाजीराव कडाडला की दिल्ली गाठायची सोडुन आपण दक्षिणेला का जातो आहे. तो पर्यंत दिल्ली गाठण्याच मानसिक बळ कोणातही निर्माण झाल नव्हत. तरुण बाजीरावाचा असला धाडसी पण बघुन शाहु महाराज खुश झालेत आणि त्यांनी बाजीरावांना उत्तरेला जाण्याची मुभा दिली.

ही गाथा किती आणि सत्य किती हे सांगण कठिण आहे. पण वीस वर्षात थोरले बाजीराव दिल्लीत दाखल झाले होते. महाराजांच स्वप्न शेवटी सन १७३९ ल अंशतः का होईना साकार झाले.

(क्रमशः)


ता.क. - या तुलनात्मक अभ्यासाचा अवाका फार मोठा आहे. महत्त्वाची पुस्तक मला उपलब्ध सध्या तरी उपलब्ध नाहीत. त्यामुळे 'आढावा' या शब्दाचा अर्थ थोडा मोकळेपणाने घ्यायला हवा. ऐतिहासिक घटनांच्या, नोंदींच्या आणि तारखांच्या सांगाड्याला मी मूर्त रुप देण्याचा हा एक प्रयत्न आहे. तारखा आणि घटनांमधे काही चूका असतील तर कृपया कळवाव, मी लगेच बदल करेन. 

7/28/13

पेशवाईच्या सांन्निध्यात

पेशवाईचा अभ्यास मी फार अलिकडेच सुरु केला. मला इतिहास वाचनाची फार लहानपणा पासुन आवड आहे. भारतीय इतिहासाबद्दल वाचन मुख्यतः मुसलमानी आक्रमण, त्यामगची कारण (यावर फारस काही उपलब्ध नाही) आणि शिवशाही एवढेच सिमित होते. अर्थात हे विषय भारताच्या गेल्या हजार वर्षांच्या इतिहासातील फार मोठा कालावधी व्यापतात. पण सन १७०० ते १८०० च्या दरम्यान भारताचा चेहरा-मोहरा बदवुन टाकणारी आणि रणधुरंधर अश्या पेशवाई सत्तेवर मी काहीच फारस वाचल नव्हत. शालेय इतिहासात तर पेशव्यांचा उल्लेख पण नव्हता. आता भारतीय सरकार मुसलमानी मुघलाईला भारताचा सुवर्ण काळ मानत असेल तर हिंदू मराठेशाही आणि पेशवाई बद्दल कस शिकवणार? हा मुद्दा एका स्वतंत्र लेखाचा विषय ठरेल.

पेशवाई नावारुपास जरी थोरल्या बाजीरावांच्या काळात आली तरी या पदाची मूळ खुद्द शिवाजींच्या दरबारात रोवली होती. महाराजांच्या मंत्री मंडळात नेहमीच पंत-प्रतिनिधी असे. मोरोपंत पिंगळे हे नाव साधारणतः सगळ्यांना महिती असते. राज्याभिषेका नंतर त्यांच्या अष्टप्रधानां पैकी मानाची पहिली जाग पंत-प्रतिनिधींना होती. जरी तो काळ तलवारीचा होता तरी राजांनी प्रधानमंत्रीला सेनापतीच्या आधी मान दिला ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. महराजांच्या काळात या पदाला पंत-प्रतिनिधी अस म्हणल्या जात असे त्याच रुपांतर पुढे पेशवा हे कसे झाले याची माहिती मला कुठे वाचायला मिळाली नाही. पण माझ्या मते पेशवा हा शब्द फारसी आहे. इराणी दरबारात पंत-प्रतिनिधीला पेशवा म्हणल्या जात असे. माझ्या मते दख्खनी मुसलमानी दरबारांमधे असली पदवी मूळरुपी आली असणार आणि पुढे मराठी दरबारात ती पोचली असणार. साधारणतः सर्व पेशव्यांना श्रीमंत याच आदरार्थी नावाने संबोधित केल्या जात असे.

मराठी दरबारात महाराजांनी कुठलेही पद वांशिक केले नव्हते. म्हणजे पंत-प्रतिनिधींचा वंशज त्याच पदावर बसेल असे नाही. हि प्रथा सर्वप्रथम छत्रपती शाहु महाराजांनी सन १७१२-१३ ला रूढ केली. बाळाजी विश्वनाथ भट या हुन्नरी, शूर आणि तल्लख डोक्याच्या माणसाला त्यांनी पेशवा बनविले. बाळाजी विश्वनाथ यांच्या पूर्वायुष्याची फारशी माहिती उपलब्ध नाही. पण मराठी राजकारणात आणि मुख्यतः मुघली सत्तेशी चाललेल्या संघर्षात त्यांनी तलवार आणि बुद्धी दोहोंचे पाणी दाखवले. सन १७१२ (१८?) चा दिल्लीचा तह ज्यात मुघल मराठ्यांचे मांडलिक झाले त्यात बाळाजी विश्वनाथांनीच मराठी दरबाराचे नेतॄत्व केल. सन १७२० ला त्यांच्या मृत्यु नंतर शाहु महाराजांनी त्यांच्या मोठ्या मुलाला - बाजीराव विश्वनाथ भट, पेशवेपद बहाल केल. या पेशव्याला आपण थोरले बाजीराव नावाने ओळखतो. पेशवाईची खरी सुरुवात थोरल्या बाजीरावांच्या काळात झाली अस म्हणायल हरकत नाही. मुत्सद्दीपण, अलौकीक शौर्य, माणस जोडण्याचा जन्मजात गुण आणि अविरत कष्ट करुन राज्य जोडण्याची वृत्ती बघता छत्रपती शिवजींचे खरे वंशज थोरले बाजीरावच. मराठा दरबाराची भरभराट, राज्यवर्धन, राज्याचा जरब आणि उत्कृष्ट प्रतीचे पुढल्या पिढीचे सरदार हे सगळ थोरल्या बाजीरावांच्या जमान्यतच घडल.

या लेखात पेशवाईचा इतिहास लिहिण्याचा मानस नाही. त्यासाठी लेखमालिकाच लिहावी लागेल. प्रत्येक पेशवा - थोरल्या बाजीरावांपासुन ते राघोबा दादांपर्यंत सगळेच्या सगळे अव्वल दर्ज्याचे लढवय्ये आणि मुत्सद्दी होते. नुसते पेशवेच नाहीत तर मराठी दरबारातील सरदार - होळकर, शिंदे, गायकवाड, भोसले (नागपूर) तत्सम घराणीही स्वतंत्र लेखमालिकेच्या लायकीचे होते. या काळातील एक-एक पेशवा किंवा सरदार वेगळ्य काळात जन्मला असता तर त्याने तो काळ एकट्यानेच गाजवला असता. विशीच्या पोरांनी पूर्ण हिंदुस्तात पादाक्रांत केला. थोरले बाजीराव विसाव्या वर्षी पेशवे झालेत आणि तडाक्याने त्यांए दिल्ली गाठली. सदाशिवरावभाउ पानिपताच्या युद्धात अवघे तिशीचे होते तर विश्वासराव सोळा! महादजी शिंद्यांची पहिली स्वारी बाराव्या वर्षीची होती अस म्हणतात. सवाई माधवरावांच्या काळात म्हणजे पानिपत पराभवोत्तर काळात मराठी सत्ता दिल्ली ते चेन्नई आणि कोंकण ते बंगाल पर्यंत पसरली होती. हैद्राबादचा निजाम ते दिल्लीचा नाममात्र मुघल पुण्याचे मांडलिक होते. सन १७०० मधे केवळ थोडीशी कोंकणपट्टीत उरलेल मराठी साम्राज्य पेशवाईत चारही दिशांत फोफावल. पण आपल दुर्दैव अस की या एका पेक्षा एका सरदारांपैकी कोणालाही फारशी आयुष्यरेखा लाभली नाही. सगळे पटापट मेलेत. भट घराण्यातल्या सहा पिढ्या शंभर वर्षात आटपल्यात. तिच दशा होळकर, शिंदे इत्यादी घराण्यातली. म्हणजे छत्रपतींच्या काळापासुनचा पन्नाशी न गाठण्याची दुर्दैवी कहाणी पेशवाईतही अखंडीत राहिली. 

अर्थात या काळात चुका झाल्या नाहीत अश्यातला भाग नाही. राज्यकारभार आणि राज्यविस्तार यात चुका होणारच आणि झाल्यात. काही चुका तर बुद्धी चरायला जाण्याची ज्वलंत उदाहरण आहेत. महाराजांनी त्यांच्या आयुष्यात जे निर्णय घेतलेत आणि कामगिर्‍या निभावल्यात तसाच कित्ता गिरवला असता तर यातल्या काही चुका टाळता आल्या असत्या पण मला हे सगळ तीनशे वर्षांनी लिहिण सोप आहे. त्याकाळात प्राप्त परिस्थितीत जे काही पेशवा मराठी दरबारात मिळवल ते बघता हा काळ भारताच्या वैभवशाली इतिहासात गणायला हवा.

१७ व्या शतकातल्या मराठी रक्ताची रग अंशतः या काळात उतरली तर भारत खरच विश्वसत्ता बनेल.

पेशवाईतील काही घटनांवर विस्तृत लेखन करण्याचा मानस आहे. संधी मिळताच या कामाचा श्री करीन. 

8/20/12

निवडक सुबोध ज्ञानेश्वरी - भाग १

कालच श्रावण संपला. यंदा श्रावणात सकाळी उठुन ज्ञानेश्वरी वाचण्याचा संकल्प केला होता. एका महिन्यात अख्खा ग्रंथ वाचणे, वेळ आणि बुद्धी दोहोंना झेपणार नव्हत. सकाळी उठुन कामाला जाण्याआधी अर्धा तास वाचायची अस ठरवल. मागे आमच्या आईने "सुबोध ज्ञानेश्वरी" हा श्रीधर भास्कर वर्णेकरांनी लिहिलेला ग्रंथ दिला होता. माझ्या सारख्या अनभिज्ञ जनांसाठी 'प्रज्ञाभारती'  वर्णेकरांनी ज्ञानेश्वरी आजच्या मराठीत रचली. 

महिन्याभरात मी चौथ्या अध्यायावर पोचलो. अर्थात हि कुठली शर्यत नव्हती पण माझ्या आवडीच्या काही निवडक ओव्या मी इथे प्रस्तुत करु इच्छितो.
---
अर्जुनाची विमनस्क मनस्थिती (२.७)

जैसे होता तिमिरग्रस्त। दृष्टीचे तेज होते लुप्त।
जवळचे ही वस्तुजात। मुळी न दिसे॥

तैसेच देवा मज झाले। हे मन भ्रान्तीने ग्रासले।
आता काय आहे हित आपले। तेही न कळे॥

तरी कृष्णा तू करी विचार। योग्य तेच आम्हा सांग सत्वर।
तूच सर्वस्व आणि इष्ट-मित्र। आम्हास आता॥

तू गुरुबंधु पिता।तूच आमची इष्टदेवता।
तूच संकटी रक्षणकर्ता। सर्वदा आमचा॥

जैसा शिष्याचा गुरुवर। सर्वथा न करी अव्हेर।
सरितांचा त्याग सागर। करील कैसा?॥

किंवा अपत्यास सोडून माता। जरी जाईल अच्युता।
तरी सांग ते सर्वथा। जगेल कैसे॥

तैसा सर्वतोपरी आम्हास। देवा तूच एक आहेस।
पूर्वी बोललो जे तुम्हास। ते न रुचेल जरी॥

तरी आम्हास काय उचित। आणि जे नाही धर्मविपरीत।
तेच आता सांग त्वरित। पुरुषोत्तमा॥
---

आत्म्याचे अमरत्व - (२.२१)

किंवा पूर्ण कुंभ उलंडला। तेथे विंवाकार दिसतो लोपला।
परी तो सूर्य नाही गेला। त्याच्यासह॥

किंवा मठामध्ये आकाश जैसे। मठाकार मात्र असे।
मठ भंगताही अभंग असे मठाकाश॥

तैसे शरीराचा होता लोप। नाश न पावे स्वरूप।
म्हणून हे भ्रांतीचे पाप। सोड बापा॥

(२.२२)
जुने वस्त्र टाकून। नवे करावे धारण।
तैसा एक देह सोडून। आत्मा दुसरा स्वीकारी॥

(२.२३, २.२४)

हा अनादि नित्यसिध्द। निरुपाधि विशुद्ध।
म्हणून श्स्त्रादींनी याचा विच्छेद। होत नाही॥

हा प्रलयजळात नाही बुडत। अग्नीनेही नाही जळत।
वायुसुद्दा नाही शक्त। शोष याचा करण्यास॥

अर्जुना हा नित्य। अचल आणि शाश्वत।
सर्वत्र असे सदोदित। परिपूर्ण हा॥

---


पापातून सुटण्याचा उपाय- (२.३७)

दुधाने तेव्हाच येईल मरण। जेव्हा विषासह होईल सेवन।
तैसे सहेतुकपणे धर्माचरण। करिता दोष लागती॥

म्हणून हे पार्था। हेतु सोडून सर्वथा।
तुज क्षात्रवृत्तीने झुंजता। पाप नाही॥

(२.३८)
सुखात संतोष मानू नये। दु:खात खेद मानू नये।
इच्छा मनी धरू नये। लाभालाभाची॥

येथे आपणास विजय मिळेल। किंवा सर्वथा देह जाईल।
हे आधीच काही पुढील। चिंतू नये॥

आपला स्वधर्म जो उचित। तदनुसार असता वर्तत।
जे लाभेल ते निश्चिंत। सहन करावे॥

ऐस सुदृढ असता मन। न लागे दोषबंधन।
म्हणून आता निभ्रांत होऊन। युध्द तू करावे॥

--
(क्रमशः)

3/18/12

एका म्हातारीची गोष्ट

'एका म्हातारीची गोष्ट' ही माझी लघु-कथा अक्षर वांग्मय या साहित्यिक मासिकाच्या यंदाच्या अंकात प्रकाशित झाली. कुठल्या मासिकात प्रकाशित होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. श्री अरुण प्रभुणे आणि मासिकाचे प्रकाशक श्री नानासाहेब सूर्यवंशी यांचा मी आभारी आहे.

ब्लॉगच्या वाचकांनाही ही कथा आवडेल अशी मी आशा करतो.

कळावे. लोभ असावा.

आपला,

चिन्मय भारद्वाज

http://prabhune.com/ArunP/Arun.htm

=====

बुलढाण्याच्या दरिद्री रेल्वे स्टेशन दुपारच्या वेळी अस्ताव्यस्त लोळत पडल होत. सकाळच्या येणार्‍या गाड्या येउन गेल्या होत्या. दुपरच्या यायल थोडा अवकाश होता. थंडीच्या दिवसातल असुनही ते उन बोचत होत. सावली बघुन रुळांच्या खोबणीत काही कुत्री निवांत पहुडली होती. आलुबोंड्यांच्या ठेल्याला चिकटून एक म्हातारी शुन्यात नजर लाउन बसली होती. तीच्या मळक्या रखरखीत तळव्यांमधे दहा रुपयांची नोट कशीबशी तग धरून मिटलेली होती. ती अगदीच रिकामी होती. हातात एकही बांगडी नाही ना गळ्यात काही. कपाळही अगदी ठणठणीत. मांडीला टेकुन उभा असलेला खांदाभर उंचीचा दांडू सोडला तर तिच्याकडे काहीच नव्हत. तिची नजर जरी शुन्यात मग्न असलेत तरी मनात विचारांची घाई-गडबड उडालेली दिसत होती. अचानक ठेलेवाल्यानी "आलु....बों....डे.......!" अशी आरोळी मारली. ती म्हातारी अक्षरशः जागची हलली.


"का रे ५० मैलात एक गाडी नाही आणि तुझी परवाची बोंडे ती कुत्रीही सुंगणार नाही, हाका कोणाला मारतोस?"


त्या ठेलेवाल्याने दूर्लक्ष केल. धूळ झटकावी तस त्याने बोंड्यांवर फडक मारल आणि अजुन एक आरोळी मारत त्याने घसा खाकरला.


"मुंबई-नागपूर वेळेवर आहे का रे?"


"कुठली?"


"चार ची"


"हाओ" नागपूरी ठेक्यात त्याने हो म्हटल.


तिने प्लॅटफोर्म वरच्या मोठ्ठ्या घडळ्यावर नजर टाकली. चारला जेमतेम दहा मिनिटे होती. ती काठीचा आधार घेत उभी झाली आणि घाई-घाईनी आईस-क्रिमच्या ठेल्याकडे चालायला लागली. तो पर्यंत दूरून गाडीने पोंगा मारला. रुळावरची सगळी कुत्री गायब झाली होती. त्यांनाही टाईम-टेबल पाठ असाव.


"अरे एक आईस-क्रीम देतोस का रे?"


"कुठल?"


"गाडी येतेय रे लौकर दे" अस म्हणत तिने ती अर्धमेली नोट त्याच्या समोर झटकली.


"हो पण कुठल?"


"ते..ते वाल दे"


त्याने झाकण उघडुन तिच्या समोर आईसक्रिम ठेवल.


"अरे सील कशाला उघडलस. बंद वाल दे"


"आधी नाही का सांगायच"


"अरे माझ्या साठी नाही या रे. नातवासाठी आहे. उघडा डब्बा बघुन उष्ट आहे म्हणाला तर म्हणुन सील बंद हव."

तेवढ्यात प्लॅटफॉर्म वर गाडी लागली.


"लौकर दे रे"


"दहा रुपये द्या अजुन"


"अजुन दहा रुपये कसले?"


"दुसर्‍या डब्ब्याचे"


"अरे पण सील काढायला तुझ्या बा नी सांगितल होत का?" म्हातारी तापत बोलली.


"ये लेना है तो लो" तो पोरगा खेकसला.


तेवढ्यात दुकानाचा मालक आला.


"इसको बोलो सील-बंद डब्बा देने को" म्हातारी विनवणीच्या सुरात म्हणाली.


एव्हाना लोक गाडीतून उतरून इकडे-तिकडे फिरायला लागली होती. उत्सवमूर्ती आल्यावर जशी धांदल उडते तशी खाण्याच्या आणि सटर-फटर गोष्टी विकणार्‍यांची धावपळ चालली होती. सगळे ठेलेवाले बेंबीच्या देठापासुन बोंबा-बोंब करत होते.


मालकाने म्हातारीला बघुन मोठ्ठा उसासा टाकला आणि फ्रिज मधुन आईसक्रीम चा सील बंद डब्बा तिला दिला.

म्हातारी लगबगीने ते आईसक्रीम घेउन ट्रेनचे डब्बे पालथे घालायला लागली. तिचा जेमतेम एक डब्बा चालून होई तोवर ट्रेन हळु हळु पुढे सरकायला लागली होती. तिचे डोळे घाबरे झालेत. तिला अपेक्षित ते कोणीच दिसेना.


"सुरेश....अरे सुरेश" अश्या तिने मोठ्याने हाका मारायला सुरुवात केली.


बघता बघता ट्रेन दिसेनाशी झाली. थोडेफार उतरलेले पाहुणेही पांगलेत. स्टेशन घडी पूर्ववत घालावी तस पुन्हा पहिले सारख अस्ताव्यस्त पसरल.


म्हातारी हातात वितळणार्‍या आईसक्रीमचा डब्बा घेउन एकटीच पाठमोर्‍या ट्रेनला बघत उभी होती.

'ट्रेन चुकली असेल पोराची. पुढल्या गुरुवारी येइल नक्की' अस काहीस पुटपुटत ती दाराकडे चालू लागली. हातातल आईसक्रीम तिने कचर्‍याच्या ढिगात भिरकाउन दिल.


भिकार्‍याच्या पोरानी ते बघितल. त्या घाणीत उडी मारुन ते आईसक्रीम त्याने शोधल. त्या बरबटलेल्या जागेत फतकर मारुन त्याने ते तो मटकवायला लागला.

9/21/11

मनोहर




खोलीत वातावरण तंग होत. कोपर्‍यात एक बाई रडत उभी होती. फार घाबरलेली. भिंतीशी एक मध्यम वयीन माणुस थरथरत भिंतीला तोंड करुन  उभा होता. त्याच्या डोक्याला बंदुक लाऊन एक पोलिसच्या वेषातला व्यक्ती उभा होता.
"हजार रुपये प्रत्येक इंचाला" खुर्चीवर बसलेल्या दुसरा व्यक्ती बोलला. तोही पोलिसच्या वेषातच होता.
"याच्या कानशीलाच्या पाच इंचाच्या आत गोळी मारली तर हजार रुपये. चार इंचाच्या आत मारली तर दोन हजार" तो पुढे म्हणाला.
"साल्या कटिंग चहा पाजतोयस का?"
खुर्चीवरचा माणूस भेसूर खिदळायला लागला. "कटिंग चहा!"
"अहो वहिनी चहा करता का थोडा?" बंदुक वाला माणुस बोलला. "पाहुण्यांना चहा-पाणी विचारायची रीत नाही वाटत या घरात"
भिंतींला टेकलेल्या माणसाला घामाची आंघोळ झाली होती.
"तुम्ही पोलिस आहात की हैवान?" त्याच्या तोंडुन शब्द अडखळत बाहेर पडले.
ती दोघे जण अजुनच खिदळायला लागलीत.
"हैवान? कोण वापरत हा शब्द आजकाल?" बंदुक वाला किचकट हसत म्हणाला.
"मराठी मिडमचा दिसतोय" खुर्ची बोलली.
"आणि साल्या तू मोठा कॉन्वेंट ला गेलायस?" बंदुकवाला खेकसला.
"ए इकडे तोंड कर" अस म्हणत बंदुक वाल्यानी त्या भिंतींला टेकलेल्याला टपली मारली.
"शिंग दिसतायत का आमच्या डोक्यावर?"
खुर्चीवाला ते ऐकुन परत खिदळायला लागला. "शिंग" अस म्हणत त्याच हसण वाढतच गेल.
बंदुक वाल्याने फाडकन गोळी मारली.
खोलीत शांततेचा आणि बारुदीचा संमिश्र वास शिगोशिग भरला. कोपर्‍यातल्या बाई डोळे मोठ्ठे करुन  खालती बसल्या.
"काढ दोन हजार रुपये. चार इंचाच्या आत आहे बघ"
भिंतींला टेकलेल्या माणसाची स्थिती बघवत नव्हती. तो तत्-पप् करायला लागला होता.
"हैवान असतो तर तुझा खोपडा उडालेला असता"
मग बंदुक त्या माणसाच्या तोंडात खुपसुन त्या बंदुक वाल्याने विचारल "मनोहर कुठेय?"
"तत्-पप् काय करतोस? बोल, बोल ना... मातीच तोंड दिलय का देवानी?"
"अरे ए दोन हजार काढुन ठेव"
"साहेब आता दुरुन नेम धरा. याच्या दुप्पट लावतो"
"का रे साल्या खुप चरायाला मिळतय सध्या तुला"
"तुमची कृपा साहेब"
तो बंदुकवाला हळु-हळु मागे सरायला लागला. त्याने बंदुक रोखलेलीच होती.
"मनोहर मला माहिती नाही"
"असा कसा माहिती नाही. वकिल साहेबांना मारा-पिट्या करायला बरा सापडतो"
"अरे सांगुन दे साहेबांना. अस उंदरासारख तुला छळायला आम्हालाही आवडत नाही."
"बघ तीन इंचाच्या आत मारतो इतक्या दुरुन. पोलिस अकादमीतुन फुकटात पास नाही झालो."

ठ्यँव!

वातावरण स्तब्ध झाल.

"साहेब काय केलत"

त्या साहेबालाही एव्हाना घाम फुटलेला होता.

रक्ताची सरळ रेख आखत त्या माणसाच धड भिंतीला चिकटुन खाली बसल.
तेवढ्यात दार उघडुन कोणीतरी आत आल.

हवालदाराने मोठ्ठा आवंढा गिळला.

"साहेब, मनोहर!"

(क्रमशः की समाप्त?)


8/28/11

माझा भारत - भ्रष्ट भारत, भाग २

मी मागल्या शुक्रवारी २४ तास उपास ठेवला. श्रावण म्हणुन नाही तर माझ्या भारतातल्या बांधवजनांनी समाज कल्याणार्थ जो 'गोंधळ' घातला त्यांना साथ म्हणुन. देशापासुन हजारो मैल दूर बसुन उपास करण्यात काय निष्पन्न होणार? माहिती नाही. देशात बसुनही उपास करुन काय उपाय होणार? ते बघायच. पण भ्रष्टाचारा विरुध्दही आपण एकत्र येणार नसू तर आपल भविष्य गडद आहे. या सगळ्या खटाटोपातुन काही निष्पन्न होणार नाही अस बरीच लोक अजुनही म्हणतात. बहुतेक ते सत्य असेल पण असंतोष मनात ठेवण्याची वेळ गेली. 'नेते कुत्रे आहेत' अशी वायफळ बडबड करण्याची वेळ गेली. आपल्या मायभूमीचे जात, धर्म आणि आता, आर्थिक परिस्थितीवरुन चिंधडे करुन बाजारात विकणार्‍या मिंध्या, कूपमंडुक, भ्रष्ट आणि एकुण ढेकुण जातीला जास्त शोभणार्‍या नेत्यांना धडा शिकविणे आवश्यक आहे. भारतातून प्रंचड प्रमाणावर पैसा परदेशी लंपास करायला भ्रष्ट लोक एकत्र आली आहेत आणि त्यांना टक्कर द्यायला आपल्या सारख्या प्रामाणिक आणि सामान्य नागरीकांनी एकत्र येण ही केवळ आवश्यकताच नव्हे तर आपल कर्तव्य आहे.

मागल्या भागाला अनुरुपे मी या लेखात लोकपाला बद्दल बरचस काही लिहिल होत पण परिस्थिती गेल्या आठवड्यात झपाट्याने बदलली. कॉंग्रेस सरकारने लोकशाहीचा जो धडधडीत अपमान केल आहे आणि सत्तेच्या माजाचे जे प्रदर्शन मांडले आहे ते बघुन मन विस्मित होते. पण गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय घटनांचा आणि राजकारणाचा आढावा घेतला तर कॉंग्रेस सरकार जुनेच कित्ते गिरवते आहे हे लक्षात येइल.

इंदिरा गांधीच्या जमान्यात या नेत्यांनी भ्रष्टाचार जन्मसिध्द अधिकार केला. या जमान्यात देशापेक्षा गांधी आण्णावाच्या व्यक्तीची पूजा परम ठरली. आणि कॉंग्रेस पक्ष या घराण्याची वैयक्तिक मालमत्ता झाली. सत्ता टिकविणे हे राजकारणाचे ध्येय बनले. राजकारण आणि प्रशासन व्यवस्थेतील लक्ष्मण रेखा नाहीशी झाली. देशाची आणि समाजाची प्रगती केवळ भाषणां मधे बंदिस्त झाल्यात. इंदिरा गांधींना केवळ केंद्रीय सत्तेचीच चटक नव्हती तर राज्य स्तरावरही काँग्रेस व्यतिरिक्त दुसर कुठल सरकार आलेल त्यांना फारस रुचत नसे. केरळ, पंजाब आणि आसाम मधे त्यांनी काँग्रेस सरकार प्रस्थापित करण्यासाठी राजकीय कपटाचा कळस गाठला. १९७५ सालच्या केंद्रिय निवडणुकांना लोकशाही त्यांना निवडुण देणार नाही हे ध्यानात आल्यावर त्यांनी सत्तेत कायम रहाण्याचा . एक सोपा उपाय त्यांनी काढला. त्यांनी लोकशाहीच बरखास्त केली. सत्तांधळे होउन बेदुंध वागण्याचे बाळकडु त्यावेळच्या राजकारणातल्या पिल्लांना याच काळात पाजल्या गेलेत. आज हिच पिल्ल सत्ताकेंद्री आहेत.

ही अधोगतीची सुरुवात होती. इंदिरा गांधींच्या हत्ये नंतर सत्तधारी कॉंग्रेसच्या लोकांनी सिखांच जे हत्यासत्र चालू केल ते असो किंवा राजीव गांधींच्या कारागिर्दीतले शहाबानो प्रकरण असो किंवा बाबरी मशिदीची दार आरती साठी उघडण असो, दूरदृष्टी आणि सामंजस्याचा अभाव प्रत्येक वळणावर आढळुन येतो. सिखांची निर्मम हत्या म्हणजे आपल्या देशाची आणि समाजाची शोकांतिका आहे. या वर गांधी आण्णाव असल्यामुळे अहेरात पंतप्रधान पद मिळालेल्या राजीव गांधींनी काय म्हणाव ? "वटवृक्ष पडल की गवताला इजा होतेच"

सन १९८४ ते १९८७ च्या कालावधीतील सांसदीय कार्यवाही म्हणजे गुंडगिरी झाली होती आणि प्रशासन पोरखेळ. या दरम्यान भारताची अर्थ व्यवस्था भंगारात काढायची वेळ आली होती. १९९१ ला आपल सोनं गहाण ठेवायची वेळ आली होती. पण आपल्या सत्ताधार्‍यांनी अर्थव्यवस्थेला रांगी लावण्याच्या ऐवजी आरक्षणाच्या द्वारे समाजाच जातींवरुन अजुन विभाजन करण्याच ठरवल. पुढे नरसिंहाराव सरकारच्या काळात अर्थ व्यवस्थेची डागडूजी झाली पण भ्रष्टाचाराने त्या काळात अक्राळ-विक्राळ रुप धारण केले. या आधी वरचे सत्ताधारी बराच पैसा खात असत आणि खालच्यांना थोडाच मिळायचा पण १९९१ नंतर सगळेच - नेते आणि बाबु, मिळुन अमाप पैसा ढापायला लागलेत.

गेल्या दोन आठवड्यात काँग्रेस सरकारची वर्तणुक आश्चर्यकारक कशी नव्हती आणि या सत्ताधार्‍यांनी राजकारणाच्या रंगमंचावर देशाचे धिंडवडे कसे काढलेत हे संक्षिप्तात मांडण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे. काँग्रेसची स्थापना ब्रिटिशांनीच केली होती आणि सध्याची मंडळी ब्रिटिशांचीच पिल्लावळ असल्यासारखी वागतायत.

पुढल्या लेखात भ्रष्टाचाराचे सहजा-सहजी न दिसणारे पण कर्करोगासारखे घातक रुप दाखवण्याचा यत्न करीन. मागल्या महिन्यात डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे भ्रष्टाचारावरचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली. त्यात त्यांने पार्टीसिपेटरी नोटस् बद्दल सांगितल. सध्याच्या गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी या बाबतीत धडाडीचे नेतृत्व दाखवत भारतातून बाहेर नेलेला भ्रष्ट पैसा भारतात परत आणण्याचा राजमार्ग बांधला. एवढ नेतृत्व आणि धडाडी बाँब-स्फोटाच्या वेळेस दाखवायच मात्र त्यांना सुचल नाही.

पण गेल्या दोन आठवड्यात घटना इतक्या झपाट्याने बदलतायत की एखाद वेळेस दुसर काही लिहिण्याची वेळ येइल.

आशा करतो की लोकपाल स्थापना झाल्याबद्दलच लिहायला मिळेल!

(क्रमशः)