वीणा-वादिनी वाग्देवीच्या चरणी। घालितो शब्दांचे लोटांगण॥ घेऊन पदरी शारदेने। करावे त्यांसी पावन॥
8/15/13
चुक-भूल देणे घेणे
8/6/13
पेशवाई आणि शिवशाही - एक संक्षिप्त आढावा (भाग १)
7/28/13
पेशवाईच्या सांन्निध्यात
मराठी दरबारात महाराजांनी कुठलेही पद वांशिक केले नव्हते. म्हणजे पंत-प्रतिनिधींचा वंशज त्याच पदावर बसेल असे नाही. हि प्रथा सर्वप्रथम छत्रपती शाहु महाराजांनी सन १७१२-१३ ला रूढ केली. बाळाजी विश्वनाथ भट या हुन्नरी, शूर आणि तल्लख डोक्याच्या माणसाला त्यांनी पेशवा बनविले. बाळाजी विश्वनाथ यांच्या पूर्वायुष्याची फारशी माहिती उपलब्ध नाही. पण मराठी राजकारणात आणि मुख्यतः मुघली सत्तेशी चाललेल्या संघर्षात त्यांनी तलवार आणि बुद्धी दोहोंचे पाणी दाखवले. सन १७१२ (१८?) चा दिल्लीचा तह ज्यात मुघल मराठ्यांचे मांडलिक झाले त्यात बाळाजी विश्वनाथांनीच मराठी दरबाराचे नेतॄत्व केल. सन १७२० ला त्यांच्या मृत्यु नंतर शाहु महाराजांनी त्यांच्या मोठ्या मुलाला - बाजीराव विश्वनाथ भट, पेशवेपद बहाल केल. या पेशव्याला आपण थोरले बाजीराव नावाने ओळखतो. पेशवाईची खरी सुरुवात थोरल्या बाजीरावांच्या काळात झाली अस म्हणायल हरकत नाही. मुत्सद्दीपण, अलौकीक शौर्य, माणस जोडण्याचा जन्मजात गुण आणि अविरत कष्ट करुन राज्य जोडण्याची वृत्ती बघता छत्रपती शिवजींचे खरे वंशज थोरले बाजीरावच. मराठा दरबाराची भरभराट, राज्यवर्धन, राज्याचा जरब आणि उत्कृष्ट प्रतीचे पुढल्या पिढीचे सरदार हे सगळ थोरल्या बाजीरावांच्या जमान्यतच घडल.
१७ व्या शतकातल्या मराठी रक्ताची रग अंशतः या काळात उतरली तर भारत खरच विश्वसत्ता बनेल.
पेशवाईतील काही घटनांवर विस्तृत लेखन करण्याचा मानस आहे. संधी मिळताच या कामाचा श्री करीन.
8/20/12
निवडक सुबोध ज्ञानेश्वरी - भाग १
महिन्याभरात मी चौथ्या अध्यायावर पोचलो. अर्थात हि कुठली शर्यत नव्हती पण माझ्या आवडीच्या काही निवडक ओव्या मी इथे प्रस्तुत करु इच्छितो.
तैसेच देवा मज झाले। हे मन भ्रान्तीने ग्रासले।
तरी कृष्णा तू करी विचार। योग्य तेच आम्हा सांग सत्वर।
तू गुरुबंधु पिता।तूच आमची इष्टदेवता।
जैसा शिष्याचा गुरुवर। सर्वथा न करी अव्हेर।
किंवा अपत्यास सोडून माता। जरी जाईल अच्युता।
तैसा सर्वतोपरी आम्हास। देवा तूच एक आहेस।
तरी आम्हास काय उचित। आणि जे नाही धर्मविपरीत।
---
--
(क्रमशः)
3/18/12
एका म्हातारीची गोष्ट
'एका म्हातारीची गोष्ट' ही माझी लघु-कथा अक्षर वांग्मय या साहित्यिक मासिकाच्या यंदाच्या अंकात प्रकाशित झाली. कुठल्या मासिकात प्रकाशित होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. श्री अरुण प्रभुणे आणि मासिकाचे प्रकाशक श्री नानासाहेब सूर्यवंशी यांचा मी आभारी आहे.
ब्लॉगच्या वाचकांनाही ही कथा आवडेल अशी मी आशा करतो.
कळावे. लोभ असावा.
आपला,
चिन्मय भारद्वाज
http://prabhune.com/ArunP/Arun.htm
=====
बुलढाण्याच्या दरिद्री रेल्वे स्टेशन दुपारच्या वेळी अस्ताव्यस्त लोळत पडल होत. सकाळच्या येणार्या गाड्या येउन गेल्या होत्या. दुपरच्या यायल थोडा अवकाश होता. थंडीच्या दिवसातल असुनही ते उन बोचत होत. सावली बघुन रुळांच्या खोबणीत काही कुत्री निवांत पहुडली होती. आलुबोंड्यांच्या ठेल्याला चिकटून एक म्हातारी शुन्यात नजर लाउन बसली होती. तीच्या मळक्या रखरखीत तळव्यांमधे दहा रुपयांची नोट कशीबशी तग धरून मिटलेली होती. ती अगदीच रिकामी होती. हातात एकही बांगडी नाही ना गळ्यात काही. कपाळही अगदी ठणठणीत. मांडीला टेकुन उभा असलेला खांदाभर उंचीचा दांडू सोडला तर तिच्याकडे काहीच नव्हत. तिची नजर जरी शुन्यात मग्न असलेत तरी मनात विचारांची घाई-गडबड उडालेली दिसत होती. अचानक ठेलेवाल्यानी "आलु....बों....डे.......!" अशी आरोळी मारली. ती म्हातारी अक्षरशः जागची हलली.
"का रे ५० मैलात एक गाडी नाही आणि तुझी परवाची बोंडे ती कुत्रीही सुंगणार नाही, हाका कोणाला मारतोस?"
त्या ठेलेवाल्याने दूर्लक्ष केल. धूळ झटकावी तस त्याने बोंड्यांवर फडक मारल आणि अजुन एक आरोळी मारत त्याने घसा खाकरला.
"मुंबई-नागपूर वेळेवर आहे का रे?"
"कुठली?"
"चार ची"
"हाओ" नागपूरी ठेक्यात त्याने हो म्हटल.
तिने प्लॅटफोर्म वरच्या मोठ्ठ्या घडळ्यावर नजर टाकली. चारला जेमतेम दहा मिनिटे होती. ती काठीचा आधार घेत उभी झाली आणि घाई-घाईनी आईस-क्रिमच्या ठेल्याकडे चालायला लागली. तो पर्यंत दूरून गाडीने पोंगा मारला. रुळावरची सगळी कुत्री गायब झाली होती. त्यांनाही टाईम-टेबल पाठ असाव.
"अरे एक आईस-क्रीम देतोस का रे?"
"कुठल?"
"गाडी येतेय रे लौकर दे" अस म्हणत तिने ती अर्धमेली नोट त्याच्या समोर झटकली.
"हो पण कुठल?"
"ते..ते वाल दे"
त्याने झाकण उघडुन तिच्या समोर आईसक्रिम ठेवल.
"अरे सील कशाला उघडलस. बंद वाल दे"
"आधी नाही का सांगायच"
"अरे माझ्या साठी नाही या रे. नातवासाठी आहे. उघडा डब्बा बघुन उष्ट आहे म्हणाला तर म्हणुन सील बंद हव."
तेवढ्यात प्लॅटफॉर्म वर गाडी लागली.
"लौकर दे रे"
"दहा रुपये द्या अजुन"
"अजुन दहा रुपये कसले?"
"दुसर्या डब्ब्याचे"
"अरे पण सील काढायला तुझ्या बा नी सांगितल होत का?" म्हातारी तापत बोलली.
"ये लेना है तो लो" तो पोरगा खेकसला.
तेवढ्यात दुकानाचा मालक आला.
"इसको बोलो सील-बंद डब्बा देने को" म्हातारी विनवणीच्या सुरात म्हणाली.
एव्हाना लोक गाडीतून उतरून इकडे-तिकडे फिरायला लागली होती. उत्सवमूर्ती आल्यावर जशी धांदल उडते तशी खाण्याच्या आणि सटर-फटर गोष्टी विकणार्यांची धावपळ चालली होती. सगळे ठेलेवाले बेंबीच्या देठापासुन बोंबा-बोंब करत होते.
मालकाने म्हातारीला बघुन मोठ्ठा उसासा टाकला आणि फ्रिज मधुन आईसक्रीम चा सील बंद डब्बा तिला दिला.
म्हातारी लगबगीने ते आईसक्रीम घेउन ट्रेनचे डब्बे पालथे घालायला लागली. तिचा जेमतेम एक डब्बा चालून होई तोवर ट्रेन हळु हळु पुढे सरकायला लागली होती. तिचे डोळे घाबरे झालेत. तिला अपेक्षित ते कोणीच दिसेना.
"सुरेश....अरे सुरेश" अश्या तिने मोठ्याने हाका मारायला सुरुवात केली.
बघता बघता ट्रेन दिसेनाशी झाली. थोडेफार उतरलेले पाहुणेही पांगलेत. स्टेशन घडी पूर्ववत घालावी तस पुन्हा पहिले सारख अस्ताव्यस्त पसरल.
म्हातारी हातात वितळणार्या आईसक्रीमचा डब्बा घेउन एकटीच पाठमोर्या ट्रेनला बघत उभी होती.
'ट्रेन चुकली असेल पोराची. पुढल्या गुरुवारी येइल नक्की' अस काहीस पुटपुटत ती दाराकडे चालू लागली. हातातल आईसक्रीम तिने कचर्याच्या ढिगात भिरकाउन दिल.
भिकार्याच्या पोरानी ते बघितल. त्या घाणीत उडी मारुन ते आईसक्रीम त्याने शोधल. त्या बरबटलेल्या जागेत फतकर मारुन त्याने ते तो मटकवायला लागला.
9/21/11
मनोहर
खोलीत वातावरण तंग होत. कोपर्यात एक बाई रडत उभी होती. फार घाबरलेली. भिंतीशी एक मध्यम वयीन माणुस थरथरत भिंतीला तोंड करुन उभा होता. त्याच्या डोक्याला बंदुक लाऊन एक पोलिसच्या वेषातला व्यक्ती उभा होता.
"हजार रुपये प्रत्येक इंचाला" खुर्चीवर बसलेल्या दुसरा व्यक्ती बोलला. तोही पोलिसच्या वेषातच होता.
"याच्या कानशीलाच्या पाच इंचाच्या आत गोळी मारली तर हजार रुपये. चार इंचाच्या आत मारली तर दोन हजार" तो पुढे म्हणाला.
"साल्या कटिंग चहा पाजतोयस का?"
खुर्चीवरचा माणूस भेसूर खिदळायला लागला. "कटिंग चहा!"
"अहो वहिनी चहा करता का थोडा?" बंदुक वाला माणुस बोलला. "पाहुण्यांना चहा-पाणी विचारायची रीत नाही वाटत या घरात"
भिंतींला टेकलेल्या माणसाला घामाची आंघोळ झाली होती.
"तुम्ही पोलिस आहात की हैवान?" त्याच्या तोंडुन शब्द अडखळत बाहेर पडले.
ती दोघे जण अजुनच खिदळायला लागलीत.
"हैवान? कोण वापरत हा शब्द आजकाल?" बंदुक वाला किचकट हसत म्हणाला.
"मराठी मिडमचा दिसतोय" खुर्ची बोलली.
"आणि साल्या तू मोठा कॉन्वेंट ला गेलायस?" बंदुकवाला खेकसला.
"ए इकडे तोंड कर" अस म्हणत बंदुक वाल्यानी त्या भिंतींला टेकलेल्याला टपली मारली.
"शिंग दिसतायत का आमच्या डोक्यावर?"
खुर्चीवाला ते ऐकुन परत खिदळायला लागला. "शिंग" अस म्हणत त्याच हसण वाढतच गेल.
बंदुक वाल्याने फाडकन गोळी मारली.
खोलीत शांततेचा आणि बारुदीचा संमिश्र वास शिगोशिग भरला. कोपर्यातल्या बाई डोळे मोठ्ठे करुन खालती बसल्या.
"काढ दोन हजार रुपये. चार इंचाच्या आत आहे बघ"
भिंतींला टेकलेल्या माणसाची स्थिती बघवत नव्हती. तो तत्-पप् करायला लागला होता.
"हैवान असतो तर तुझा खोपडा उडालेला असता"
मग बंदुक त्या माणसाच्या तोंडात खुपसुन त्या बंदुक वाल्याने विचारल "मनोहर कुठेय?"
"तत्-पप् काय करतोस? बोल, बोल ना... मातीच तोंड दिलय का देवानी?"
"अरे ए दोन हजार काढुन ठेव"
"साहेब आता दुरुन नेम धरा. याच्या दुप्पट लावतो"
"का रे साल्या खुप चरायाला मिळतय सध्या तुला"
"तुमची कृपा साहेब"
तो बंदुकवाला हळु-हळु मागे सरायला लागला. त्याने बंदुक रोखलेलीच होती.
"मनोहर मला माहिती नाही"
"असा कसा माहिती नाही. वकिल साहेबांना मारा-पिट्या करायला बरा सापडतो"
"अरे सांगुन दे साहेबांना. अस उंदरासारख तुला छळायला आम्हालाही आवडत नाही."
"बघ तीन इंचाच्या आत मारतो इतक्या दुरुन. पोलिस अकादमीतुन फुकटात पास नाही झालो."
ठ्यँव!
वातावरण स्तब्ध झाल.
"साहेब काय केलत"
त्या साहेबालाही एव्हाना घाम फुटलेला होता.
रक्ताची सरळ रेख आखत त्या माणसाच धड भिंतीला चिकटुन खाली बसल.
तेवढ्यात दार उघडुन कोणीतरी आत आल.
हवालदाराने मोठ्ठा आवंढा गिळला.
"साहेब, मनोहर!"
(क्रमशः की समाप्त?)
8/28/11
माझा भारत - भ्रष्ट भारत, भाग २
मी मागल्या शुक्रवारी २४ तास उपास ठेवला. श्रावण म्हणुन नाही तर माझ्या भारतातल्या बांधवजनांनी समाज कल्याणार्थ जो 'गोंधळ' घातला त्यांना साथ म्हणुन. देशापासुन हजारो मैल दूर बसुन उपास करण्यात काय निष्पन्न होणार? माहिती नाही. देशात बसुनही उपास करुन काय उपाय होणार? ते बघायच. पण भ्रष्टाचारा विरुध्दही आपण एकत्र येणार नसू तर आपल भविष्य गडद आहे. या सगळ्या खटाटोपातुन काही निष्पन्न होणार नाही अस बरीच लोक अजुनही म्हणतात. बहुतेक ते सत्य असेल पण असंतोष मनात ठेवण्याची वेळ गेली. 'नेते कुत्रे आहेत' अशी वायफळ बडबड करण्याची वेळ गेली. आपल्या मायभूमीचे जात, धर्म आणि आता, आर्थिक परिस्थितीवरुन चिंधडे करुन बाजारात विकणार्या मिंध्या, कूपमंडुक, भ्रष्ट आणि एकुण ढेकुण जातीला जास्त शोभणार्या नेत्यांना धडा शिकविणे आवश्यक आहे. भारतातून प्रंचड प्रमाणावर पैसा परदेशी लंपास करायला भ्रष्ट लोक एकत्र आली आहेत आणि त्यांना टक्कर द्यायला आपल्या सारख्या प्रामाणिक आणि सामान्य नागरीकांनी एकत्र येण ही केवळ आवश्यकताच नव्हे तर आपल कर्तव्य आहे.
मागल्या भागाला अनुरुपे मी या लेखात लोकपाला बद्दल बरचस काही लिहिल होत पण परिस्थिती गेल्या आठवड्यात झपाट्याने बदलली. कॉंग्रेस सरकारने लोकशाहीचा जो धडधडीत अपमान केल आहे आणि सत्तेच्या माजाचे जे प्रदर्शन मांडले आहे ते बघुन मन विस्मित होते. पण गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय घटनांचा आणि राजकारणाचा आढावा घेतला तर कॉंग्रेस सरकार जुनेच कित्ते गिरवते आहे हे लक्षात येइल.
इंदिरा गांधीच्या जमान्यात या नेत्यांनी भ्रष्टाचार जन्मसिध्द अधिकार केला. या जमान्यात देशापेक्षा गांधी आण्णावाच्या व्यक्तीची पूजा परम ठरली. आणि कॉंग्रेस पक्ष या घराण्याची वैयक्तिक मालमत्ता झाली. सत्ता टिकविणे हे राजकारणाचे ध्येय बनले. राजकारण आणि प्रशासन व्यवस्थेतील लक्ष्मण रेखा नाहीशी झाली. देशाची आणि समाजाची प्रगती केवळ भाषणां मधे बंदिस्त झाल्यात. इंदिरा गांधींना केवळ केंद्रीय सत्तेचीच चटक नव्हती तर राज्य स्तरावरही काँग्रेस व्यतिरिक्त दुसर कुठल सरकार आलेल त्यांना फारस रुचत नसे. केरळ, पंजाब आणि आसाम मधे त्यांनी काँग्रेस सरकार प्रस्थापित करण्यासाठी राजकीय कपटाचा कळस गाठला. १९७५ सालच्या केंद्रिय निवडणुकांना लोकशाही त्यांना निवडुण देणार नाही हे ध्यानात आल्यावर त्यांनी सत्तेत कायम रहाण्याचा . एक सोपा उपाय त्यांनी काढला. त्यांनी लोकशाहीच बरखास्त केली. सत्तांधळे होउन बेदुंध वागण्याचे बाळकडु त्यावेळच्या राजकारणातल्या पिल्लांना याच काळात पाजल्या गेलेत. आज हिच पिल्ल सत्ताकेंद्री आहेत.
ही अधोगतीची सुरुवात होती. इंदिरा गांधींच्या हत्ये नंतर सत्तधारी कॉंग्रेसच्या लोकांनी सिखांच जे हत्यासत्र चालू केल ते असो किंवा राजीव गांधींच्या कारागिर्दीतले शहाबानो प्रकरण असो किंवा बाबरी मशिदीची दार आरती साठी उघडण असो, दूरदृष्टी आणि सामंजस्याचा अभाव प्रत्येक वळणावर आढळुन येतो. सिखांची निर्मम हत्या म्हणजे आपल्या देशाची आणि समाजाची शोकांतिका आहे. या वर गांधी आण्णाव असल्यामुळे अहेरात पंतप्रधान पद मिळालेल्या राजीव गांधींनी काय म्हणाव ? "वटवृक्ष पडल की गवताला इजा होतेच"
सन १९८४ ते १९८७ च्या कालावधीतील सांसदीय कार्यवाही म्हणजे गुंडगिरी झाली होती आणि प्रशासन पोरखेळ. या दरम्यान भारताची अर्थ व्यवस्था भंगारात काढायची वेळ आली होती. १९९१ ला आपल सोनं गहाण ठेवायची वेळ आली होती. पण आपल्या सत्ताधार्यांनी अर्थव्यवस्थेला रांगी लावण्याच्या ऐवजी आरक्षणाच्या द्वारे समाजाच जातींवरुन अजुन विभाजन करण्याच ठरवल. पुढे नरसिंहाराव सरकारच्या काळात अर्थ व्यवस्थेची डागडूजी झाली पण भ्रष्टाचाराने त्या काळात अक्राळ-विक्राळ रुप धारण केले. या आधी वरचे सत्ताधारी बराच पैसा खात असत आणि खालच्यांना थोडाच मिळायचा पण १९९१ नंतर सगळेच - नेते आणि बाबु, मिळुन अमाप पैसा ढापायला लागलेत.
गेल्या दोन आठवड्यात काँग्रेस सरकारची वर्तणुक आश्चर्यकारक कशी नव्हती आणि या सत्ताधार्यांनी राजकारणाच्या रंगमंचावर देशाचे धिंडवडे कसे काढलेत हे संक्षिप्तात मांडण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे. काँग्रेसची स्थापना ब्रिटिशांनीच केली होती आणि सध्याची मंडळी ब्रिटिशांचीच पिल्लावळ असल्यासारखी वागतायत.
पुढल्या लेखात भ्रष्टाचाराचे सहजा-सहजी न दिसणारे पण कर्करोगासारखे घातक रुप दाखवण्याचा यत्न करीन. मागल्या महिन्यात डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे भ्रष्टाचारावरचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली. त्यात त्यांने पार्टीसिपेटरी नोटस् बद्दल सांगितल. सध्याच्या गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी या बाबतीत धडाडीचे नेतृत्व दाखवत भारतातून बाहेर नेलेला भ्रष्ट पैसा भारतात परत आणण्याचा राजमार्ग बांधला. एवढ नेतृत्व आणि धडाडी बाँब-स्फोटाच्या वेळेस दाखवायच मात्र त्यांना सुचल नाही.
पण गेल्या दोन आठवड्यात घटना इतक्या झपाट्याने बदलतायत की एखाद वेळेस दुसर काही लिहिण्याची वेळ येइल.
आशा करतो की लोकपाल स्थापना झाल्याबद्दलच लिहायला मिळेल!
(क्रमशः)