10/24/13

ता.क. - पेशवाईचा र्‍हास - दुष्काळ, इंग्रज-फ्रेंच युध्द आणि अजुन बरेच

या लेख-मालेतील पुढला लेख प्रकाशित करायला थोडा अवकाश आहे. थोडे वाचन अजुन बाकी आहे आणि तसेच सध्या बाड-बिस्तर बांधणे चालू आहे. पुढल्या महिन्यात सहकुटुंब स्वदेशात परतण्याचा मानस आहे त्यामुळे बरीच धावपळ होतेय. पण माझ्या मागच्या लेखातील एका मुद्द्यावर अधिक स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे असे लक्षात आले.

मागल्या लेखातील तीन मुद्द्यांपैकी एक मुख्य मुद्दा असा की भारतावर अरबी-तुर्क-मध्य आशियातुन होणारी आक्रमणे पेशवाईच्या उदया पर्यंत संपूर्णपणे थांबली होती. पण पेशवाईची धाव, ध्येय आणि उठाठेव ही दिल्ली जिंकुन भारतावर राज्य करण्याची होती. दिल्ली ही भारताची राजधानी आणि मानबिंदु हे जरी खरे असले तरी परकीय आक्रमक आणि आक्रमणांच्या पध्दती यात प्रचंड बदल या काळात झाला. मध्य आशियातील मुसलमानी टोळ्यांऐवजी आता आक्रमक गोर्‍या कातडीचे आणि युरोपिय होते आणि घोडदळ आणि प्रचंड मोठाल्या तोफांच्या आधारा ऐवजी गलबते आणि समुद्री तोफांच्या आधारावर नविन आक्रमणे होणार होती. तसेच तंत्रज्ञान युरोपातील औद्योगिकीकरणामुळे एक नविनच पातळी गाठणार होत. भारत आणि पेशवाई या नविन आक्रमक आणि आक्रमणांसाठी मुळीच तयार नव्हता.

मागील लेखात मी मोघलांना सगळ्यात जास्त भिती आणि वचक तुर्की आणि साफाविद साम्राज्यांचा होत असे म्हणले आणि पुढे मी तुर्की साम्राज्याच्या बलाढ्य असल्याचेही बोललो. पण मला या विचारात/वक्तव्यात थोडा बदल करणे आवश्यक वाटते. मोघलाईच्या अंतापर्यंत तुर्की साम्राज्य बलाढ्य राहिले नव्हते. त्यांच्या 'सुर्वणकाळ' सुलेमान दि मॅग्निफिसंट च्या राजवटी नंतर म्हणजे सन १५९० च्या दरम्यान होता. (सुलेमान दि मॅग्निफिसंटचा मृत्यु सन १५६६ ला झाला) त्या नंतरचा काळात तुर्की साम्राज्य प्रसरण पावणे बंद झाले होते. त्यांच्या फौजा, युध्दशैली आणि आरमार बलाढ्य असले तरी त्यांचे राजे (सुल्तान) अत्यंत साधारण होते. त्यामुळे त्यांच्यावर आक्रमण करुन कोणाल जिंकणे अशक्य असले तरी त्यांनी इतरांवर आक्रमण करुन जिंकणेही कठिण होत गेले. तसेच तुर्की साम्राज्याचे लक्ष सदैव पूर्व युरोपावर होते. लपांटोच्या समुद्री युध्दातल्या (सन १५६६) पराभवा नंतर तुर्कीच्या वजीराचा मानस पुढली स्वारी भारतावर करण्याचा होता तसेच पुढे (१६व्या शतकात) अरबी समुद्रातील पोर्तुगिज चाचेगिरीला आळा घालायला तुर्की आरमार अरबी समुद्रात उतरवण्याची तयारीही तुर्कांनी केली होती पण य दोन्ही मनसुब्यांची परिणिती भारत आणि पर्शियात काही काळासाठी भीतीचे वातावरण पसरविण्या पलिकडे काही झाली नाही.

लपांटो हे मेडिटेरिनियन समुद्रातील एक बेट आणि तिथल्या समुद्रात झालेल्या तुर्की आणि युरोपिय साम्राज्यातील युद्धाचे स्थान. त्या काळात तुर्की साम्राज्याची सत्ता अजिंक्य होती आणि लौकरच संपूर्ण युरोप ते जिंकणार अशी चिन्ह स्पष्ट होती. त्यांचे आरमारही बलाढ्य होते. युरोपिय सत्ता (प्रामुख्याने स्पेन), पोप आणि इतर जमिनदारांनी पैसा, सैन्य आणि नाव्हा एकत्र करुन लपांटो जवळ तुर्की आरमाराला कडाक्याची टक्कर दिली. आणि आश्चर्य म्हणजे युरोपिय आरमार विजयी ठरल. हा विजय म्हणजे युरोपिय सत्तांना तुर्की साम्राज्याचा काही भूभाग जिंकला अस नव्हे पण एक, तुर्की साम्राज्याच्या मानाला हा पराजय म्हणजे काळिमा ठरला आणि दुसर, समुद्राद्वारे इटली, स्पेन इत्यादी युरोपिया राष्ट्रांना जिंकण्याच्या तुर्की अभिलाषेला आळा बसला. या युध्दानंतर मेडिटेरेनियन समुद्राचा वापर करणे युरोपियन राष्ट्रांना सोपे झाले आणि तुर्की साम्राज्याचे भय कमी झाल्यामुळे स्पेन आणि पोर्तुगल ने त्यांचे लक्ष नविन शोध लागलेल्या दक्षिण अमेरिकेकडे वळवले.

लपांटोच्या युध्दाचा वरवर बघता भारताशी काही संबंध नाही. त्या काळात अकबरी राजवट दृढ होत होती आणि शिवाजी राजांच्या जन्माला अजुन पन्नास वर्ष बाकी होती. पण सागरी युध्दातील या विजयामुळे युरोपिय राष्ट्रांमधे एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला. युरोपिय गलबते हळु हळु जगभर पसरु लागल्यात आणि अवघ्या दोनशे वर्षात तीन खंडांमधे एकाच वेळेस तीन वेगवेगळी युध्द करण्याची क्षमता त्या राष्ट्रांमधे निर्माण झाली.

लपांटोच्या युद्धावर मी आधी एक ब्लॉग लिहिला होता. त्याचा दुवा हा आहे:  http://marathimauli.blogspot.com/2010/04/blog-post.html
---
Sources:
1) Empires of the Sea: The Siege of Malta, the Battle of Lepanto, and the Contest for the Center of the World by Roger Crowley

2) After Tamerlane by John Darwin

3) Empires of the Monsoon: A History of the Indian Ocean and Its Invaders by Richard Hall