5/22/24

मराठी साम्राज्याचा ऱ्हास - मराठा सैन्यातील मराठेतर सैनिक

मराठी इतिहास वाचायला लागलो कि मनात विचारांची झुंबड उडते. हा लेख खरं मला पुढल्या महिन्यासाठी लिहायचा होता. पण डोक्यात आलेला विचार पानांवर उतरविणे आवश्यक आहे. मागचे काही लेख वाचले असतील तर वाचकांना माहिती असेल कि सध्या श्रेष्ठ आणि जेष्ठ इतिहासकार श्री सेतू माधवराव पगडी यांची पुस्तके वाचणे चालू आहे. आणि त्या निमित्ताने 'चंद्रप्रकाशी' लेख मालिका पण चालू केली आहे. पण कुठलाही इतिहास वाचतांना नवीन प्रश्न मनात निर्माण होतात. त्याचा हा मागोवा. (हा लेख 'चंद्रप्रकाशी' नव्हे.) 

मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ तोरणा किल्ल्यावर भगवा फडकवल्यापासून झाली. राज्याची सुरुवात केवळ जमीन किंव्हा किल्ले जिंकून होत नाहीं. पण राज्यस्थापनेची आवश्यकता काय? आणि आत्ताच का? आणि तसेच हा राजाच का आणि त्याच्यासाठीच का लढायचे या प्रश्नांची सुद्धा उत्तरे स्पष्ट हवीत. छत्रपती शिवाजींची किमया इथेसुद्धा प्रकर्षाने जाणविते. त्यांनी जोडलेली माणसे, त्यांनी प्रेरणा दिलेले सैन्य त्यांच्या निधना नंतरही शंभरहून अधिक वर्षे लढत राहिला. प्रत्येक साम्राज्य उदयास येते तसेच अस्तास पण जाते. साधारण कुठल्याही साम्राज्याचे शिखर ९० ते १०० वर्षे मानायला हरकत नाहीं. काही साम्राज्ये या कालावधीत इतकी शक्तिशाली होतात कि त्यांचा अस्त झाला तरी त्यांचा पगडा अजून अनेक दशके टिकून रहतो. मराठी साम्राज्याचा सुवर्ण काळ आपण साधारण सन १७१२ (जेंव्हा बाळाजी विश्वनाथ यांनी मोगालंना चौथाई देण्यास भाग पाडले) ते सन १८१० ( जेंव्हा यशवंतराव होळकर यांचा मृत्यू झाला) मानू शकतो. त्याच्या आधीच काळ चढतीचा आणि त्याच्या पुढला उतरणीचा. पण जेंव्हा राज्य उतरणीला लागले तेंव्हा एकदम कोलमडलेच. काही सरदार घराणी शाबूत राहिलीत पण भारतावरचा मराठी राज्याचा पगडा एकदम उठला असे वाटते. ते का? 

याची अनेक कारणे आहेत. उदाहरणार्थ सन १७९५ ते सन १७९८ च्या कालावधीत अहिल्याबाई होळकर, नाना फडणवीस आणि महादजी शिंदे या सगळ्यांचे मृत्यू होऊन मराठी राज्यात पुढाऱ्यांची एक मोठी फळी अचानक नाहीशी झाली. माधवराव पेशव्यानंतरचे राघोबादाद यांना पेशवा करायला हवे होते. पण त्यांना न करून पुढे झालेल्या भानगडींमुळे पेशवाई कोलमडली. भट घराण्याचा पेशवाई चा हक्क काढून दुसऱ्या सरदार घराण्यांमधून कोणाला तरी पेशवा केले असते तर?  या व्यतिरिक्त एक अजून कारण माझ्या अल्प-बुद्धीला जाणवते ते म्हणजे मराठ्यांनी भारतावर राज्य केले पण भारतीय कधी फारसे मराठी सैनिक झाले नाहीत. या मुद्दयाचा आपण थोडा विचार करूया. 

(मराठी घोडेस्वार)

मागल्या लेखात निझामाबाद्दल लिहितांना, निझामाचा थोडा अभ्यास झाला. पगडीकृत निझामावरचे पुस्तक उपलब्ध आहे आणि पुढे त्या अनुषंगाने अजून लिहिणे होईलच. पण एक मुद्दा मला प्रकर्षाने जाणवला तो म्हणजे निझामाने मोठ्या कुशलतेने वापरलेली हिंदू प्यादी. निझाम मूळ औरंगझेबासारखा धर्मांध नव्हता. त्याचा प्रमुख अधिकारी वर्ग जरी मुसलमान असला तरी त्याला सत्ता प्रस्थापित करणे आणि सत्ता उपभोगणे अधिक महत्वाचे होते. आणि सत्ता क्षेत्र आणि सत्तांकीत बहुतांश हिंदू असल्यामुळे त्याने अनेक हिंदू आपल्या सैन्यात आणि प्रशासनात आणिले. त्याने मराठ्यांचे अनेक सरदार आपल्याकडे वळविले आणि तसेच प्रशासनात महसूल खात्यात किंव्हा जमीन संबंधित क्षेत्रात मराठी अधिकार वर्ग आणला. या अधिकारी आणि सरदारांना मानाच्या पदव्या दिल्यात आणि जमीनी-जहागिरी पण दिल्यात. त्यामुळे दोन गोष्टी झाल्यात, एक म्हणजे बहुसंख्य असलेला हिंदू वर्ग निझाम विरोधी राहिला नाहीं आणि दुसरा म्हणजे सैन्यात त्याला मध्य आशिया किंव्हा तत्सम प्रदेशातून मुसलमानी सैनिक आणायची आवश्यकता पडली नाहीं. अर्थात, असे धोरण करणारा निझाम पहिला नाहीं. या आधी आदिलशाही आणि निझामशाहीनेही हेच धोरण पत्करले होते. पण आदिलशाही किंव्हा निझामशाही हे परदेशी मुसलमान नव्हते. धर्मान्तरित भारतीय मुसलमान होते. या तुलनेत चिलकीच खान किंव्हा त्याचा बाप हे थेट परदेशी मुसलमान होते. 

निझामाचे हे धोरण त्याने बहुधा अकबराचे उचलले असणार. अकबर हा मोघली सत्तेचा तिसरा बादशाह. आणि सगळ्यात प्रसिद्ध पण. त्याने आपली पाळ-मूळ पक्की करायला एक नवीन धोरण आखले. जे त्याच्या आधीच्या कोणी मुसलमानी क्रूरकर्म्या हिंदू-द्वेष्ट्यांनी अंगिकारले नव्हते. अकबराने राजपुतांमध्ये फूट पाडली आणि जयपूरच्या अंबर घराण्याशी एकांगी रोटी-बेटी चे संबंध प्रस्थापित केले. (अंबर घराण्यातील पोरीबाळी मोघल बादशहाच्या हारेम मध्ये दाखल होऊ लागल्यात. जेंव्हा औरंगझेब मेला तेंव्हा १७०७ च्या अंबर घराण्याच्या राजाने ताबडतोब घोडे दिल्ली ला दौडविलेत आणि राजपूत स्त्रियांना मोघली घरातून सोडवून परत जयपूर ला घेऊन आला. त्यानंतर जयपूर घराण्याची कोणीही स्त्री पुन्हा कधी मोघलांकडे गेली नाहीं.) आणि हिंदूंना त्याच्या दरबारात मानाची स्थाने दिलीत. त्यामुळे त्याला राजपुतांचे आयते सैन्य लढाया करायला मिळाले आणि उत्तरेतील त्याच्या विरोधातील उठाव नाहीसे झाले. हेच धोरण औरंगझेबापर्यंत कायम राहिले. अर्थात, औरंगझेबाने मोगलाई बुडवण्यामागे बरीच कारणे होती. धर्मांधता, मूर्ख राजकीय चाली, आत्यंतिक द्वेष,आत्यंतिक अहंकार पण सगळ्यात मुख्य म्हणजे त्याच्या हिंदुविरोधी धोरणांनी त्याने स्वतःच्या पायावरच धोंडा पाडून घेतला. 

(जयपूरच्या कछवा घराण्याचे राजचिन्ह)

वरील उदाहरणात एक गोष्टी स्पष्ट होतात. अल्पसंख्याक जर का सत्ताधारी झालेत तर बहुसंख्यांना सैन्यात आणि प्रशासनात घेणे हे आवश्यक धोरण आहे. म्हणजे मोगलाई फक्त मोघली रक्ताच्या सैन्यावर उभी नव्हती तर त्यात असंख्य राजपूत सामील होते. त्या व्यतिरिक्त शिपाई-गडी स्तरावरही अनेक उत्तर भारतीय हिंदू होते. पण हिंदू सरदारांना मान असला तरी त्यांच्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे, कुठल्याही मोघलांच्या स्वारीत हिंदू सरदारासोबत एक त्याच्या पदाचा किंव्हा त्याच्याहून उंच पदावर असलेला एक मुसलमान, आणि बहुधा परदेशी मुसलमान, सरदार नेहमी असे. उदाहरणार्थ, मिरझा राजे जयसिंग सोबत दिलेरखान आला होता. मोगलांसारखेच इंग्रजांनीहि भारतावर राज्य करायला भारतीयांचाच पुरेपूर फायदा घेतला. बाकी जगात इंग्रजांनी जिथे जिथे राज्य केले तिथल्या स्थानिक लोकांना त्यांनी कधीच सैन्यात घेतले नाहीं कि त्यांना कधीच प्रशासनात घेतले नाहीं. उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात तर त्यांनी स्थानिक लोकांना नामशेष केले. पण भारतात मात्र अगदी सन १७५८ च्या इंग्रजी-फ्रान्स च्या युद्धातही इंग्रजांकडून भारतीयच लढत होते.  

मराठ्यांकडून कुठले मराठेतर समाज लढत होते? संपूर्ण भारतावर जेंव्हा राज्य पसरले तेंव्हा मराठे हे अल्पसंख्यांकच होते. मराठेतर हे भारतीय आणि हिंदूच होते पण छत्रपतींपासून मराठी समाजाने दाखवलेले धाडस, पराक्रम आणि जागृती हि मराठेतर समाजात नव्हती. त्यामुळे मराठ्यांना अल्पसंख्यांक मानायला हवे.  दोन उदाहरणे माझ्या पटकन ध्यानात आलीत, ती म्हणजे इब्राहिम गारदी जो पानिपतच्या युद्धात मराठ्यांकडून, भाऊसाहेबांच्या हुकुमानुसार लढला आणि जीव हि दिला. दुसरे म्हणजे, महादजी शिंदे यांनी फ्रेंच युद्धसैनिक विशेषज्ञ 'डी बोईन' याच्या प्रशिक्षण खाली अत्याधुनिक अशी एक तुकडी तयार केली होती. पण या तुकडीत शिपाई मराठीच होते. पण दिल्ली ते तंजावर आणि मुंबई ते कलकत्ता पर्यंत मराठी साम्राज्य जे पसरले होते त्यात सैन्याधिपती आणि सैन्य मराठीच होते. ओरिसा ला जाऊन नागपूरच्या रघुजीराजे भोसल्यांनी ओडिया समाजातून सैन्य उभे नाहीं केले. किंव्हा हैदर अली ला नामोहरम करून सवाई माधवरावांनी पुढे तामिळ किंव्हा कन्नड समाजातून सैन्य उभे नाहीं केले. थोरल्या बाजीरावांनी अख्खे  उत्तर हिंदुस्थान पादाक्रांत केले आणि दिल्ली सुद्धा लुटले पण तेथील पंजाबी किंव्हा जाट समाजाचे सैन्य किंव्हा सरदार मराठी दरबारात सामील झाले नाहीत.  

(विषयांतर होते आहे पण एक छोटी गोष्ट इथे सांगावीशी वाटते. थोरले बाजीरावांनी दिल्ली पर्यंत मजल मारली होती. मोघली सैन्य त्यांच्यापुढे तग धरू शकत नव्हते. त्यांनी दिल्लीच्या पालिका बाजार ला मुक्काम केला होता आणि बादशहा ला आपण आल्याचा निरोप पाठवला होता. या दरम्यान त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना त्यांनी निरोप पाठवला कि त्यांनी हुकूम केला तर बादशहाला सिंहासनावरून खाली आणू आणि छत्रपतींना दिल्ली चा बादशहा म्हणून स्थापन करू. पण कोण जाणे पण छत्रपतींनी याला नकार दिला. पण जर तसे घडले असते तर मराठे दिल्लीपती झाले असते. दिल्ली तेंव्हा वाचले. आणि मोघली सिंहासन हि वाचले. त्या नंतर ३०-४० वर्षांनी महादजी शिंद्यांनी दिल्ली लुटले, आणि मोगली दरबार जाळला. असो.) 

(तुर्की जानिसारी सैनिक)

अजून एक उदाहरण येथे तुर्की साम्राज्याचे द्यायवेसे वाटते. या साम्राज्यात 'जानिसारी' म्हणून एक खास लष्करी तुकडी होती. हि तुकडी फक्त आणि फक्त सुलतानाला मानायची आणि त्याच्या थेट हुकूमाखाली येत असत. त्यावेळेस तुर्की साम्राज्य सध्याच्या पूर्व युरोप भागात पसरत होते. त्या भागातील ख्रिश्चन जनतेमधील हट्टीकट्टी, उमदी मुले सुलतान निवडीत असे आणि त्यांचे जानिसारी चे विशिष्ट प्रशिक्षण दिले जात असत. हि लष्करी तुकडी तुर्की रक्ताची नसत आणि मुसलमान पण नसत पण त्यांना तुर्की सैन्यात अत्यंत उच्च दर्जा होता. मराठी साम्राज्यात अशी राजपूत किंव्हा तंजोरची तामिळ तुकडी असल्याची नोंद नाहीं. (थोरल्या बाजीरावांचा हुजुरी पागा हे खास लष्करी तुकडी होती) 

मराठी सैन्यात पिंडारी आणि बारगी लोक काही काही लढयात असत. खासकरून इंग्रजां विरुद्धच्या लढयात पिंडारी लोक खूप होते. पण इतर समाज सैन्यात सामील झालेल्याची नोंद कुठे नाहीं. 

दुसऱ्या हिंदू समाजातून सैन्य उभे केले असते तर मराठ्यांना भारतीय हिंदूंचा विरोध कमी झाला असता. नवीन प्रदेश आणि नवीन समाजातून आलेले सैन्य नवीन कल्पना घेऊन येतात त्याचा उपयोग एकूण राज्याला होतो. आणि मुख्य म्हणजे हिंदू धर्मियांची एकी झाली असती आणि मुसलमानी सत्ता खिळखिळ्या झाल्या असत्या आणि पुढे इंग्रजांना पाय रोवायला जागा मिळाली नसती. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे सगळ्या भारतभर महाराष्ट्र धर्म पसरला असता. 

No comments: