4/30/24

माझिया मना

'माझिया मना' हे ऋतू हिरवा या अल्बम चे गाणे मी बऱ्याचदा ऐकत असतो. हा अल्बम बहुधा सन १९९९ ला आला असेल. तेंव्हा कॅसेट्स चा जमाना होता. श्री श्रीधर फडके, श्री सुधीर फडके यांचे सुपुत्र याचे संगीत आणि आशाताईंची स्वरात काही प्रसिद्ध कविता प्रस्तुत केल्या होत्या. हा अल्बम मराठी श्रोत्यांमध्ये अतिशय गाजला होता आणि आताच्या डिजिटल च्या काळातही माझ्या साऱखे असंख्य हि गाणी नित्य ऐकत असणार. यातील हि विशिष्ट कविता सुप्रसिद्ध कवी श्री सुरेश भट यांची आहे. आता सुरेश भटांच्या कविता आणि भावगीते म्हणजे भावना, विचार आणि शब्दांचे मोहक आणि नाजूक मिश्रण असते. त्यांच्या कवितांमध्ये दुःखाचे सूर जरी जाणवले तरी रडल्यानंतर जे दुःख उरते, लोक उठून आपापल्या कामाला लागल्यावर जे मागे थांबलेले असते, त्या दुःखाशी केलेला जणू हा संवाद. त्यांच्या कविता गेय असल्यातरी त्यांच्या शब्दांचा विचार करावा लागतो. आणि जसे वय वाढत जाते आणि जसे अनुभवांचे चटके व्रण सोडून जातात तसे त्यांच्या भावगीतातील भाव खऱ्या अर्थाने जाणवतात, त्या शब्दांना नवीन अर्थ प्राप्त होतो. माझिया मना कवितेत मन स्वतःशीच बोलू बघत आहे. धावत्या मनाचा वेध घेत थकायला झालेले मन  स्वतःचाच वेध घेण्याचा जणू निष्फळ प्रयत्न. 

या मनाच्या भानगडीत सारी दुनिया फसली आहे. मनाचा शोध, मनातील विचारांचा शोध, मनाला दिलेल्या अनेकविध उपमा, त्यावर लिहिलेली गाणी, कविता, भावगीते, श्लोक यांचा विचार केला तर मनुष्य जमातीच्या ७०-८०% साहित्य मनावरच असतील. 

भारतीय तत्वज्ञान आणि मुख्यतः अद्वैत सिद्धांत मन आणि त्याच्या खेळांबद्दल विस्तृत चर्चा करते. मन म्हणजे पाण्याचा तलाव आणि पंचेंद्रियांद्वारे आकलनि पडलेल्या घटनांचे तरंग म्हणजे आपण, आपले अनुभव आणि आपली जडण-घडण. आणि हे तरंग आपण शांत करू शकलो, या तरंगांना आपण आपल्या अधीन करू शकलो तरच आपले चित्त स्थिर होणार. आणि स्थिर चित्ती चक्षूच मोक्षाचा मार्ग बघण्याची क्षमता बाळगतात.

निर्वाण षटकं हे आद्य शंकराचार्यांची फार सुरेख रचना आहे. त्यात आचार्य म्हणतात "मनोबुध्य अहंकार चित्तानि नाहं| अर्थात, मी मन नाहीं, बुद्धी नाहीं, अहंकार नाहीं आणि चित्त हि नाहीं. पण मन नाहीं म्हणजे काय? 

अर्थात इथेच भानगडी सुरु होतात. कारण आपण मूळ पंचेंद्रियांच्या अधीन असतो आणि त्याद्वारे मिळालेल्या अनुभवांवर आपले विश्व मांडितो आणि मुख्य म्हणजे, स्वतःची ओळख आणि रूपरेषा आखतो. ते सगळे बाजूला कसे सारायचे? 

समर्थ रामदास स्वामींनी या मनाला जाणून वेसण बांधायला मनाचे श्लोक लिहिलेत. 

जनीं सर्वसूखी असा कोण आहे।

विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥

एकूण २०५ श्लोकात त्यांनी मनाला लागलेले वेध, मोह, सवयींचे वर्णन करून त्याच्यावरच जणू उपाय सांगितलं आहे. 

बहिणाबाईंनी मनाला त्यांच्या "मन वढाय वढाय"  कवितेत इतक्या सोप्या आणि समर्पक उपमा दिल्या आहेत कि मनाचे रोग सहज उलगडतात. त्या शेवटी साक्षात देवालाच प्रश्न विचारतात कि :

देवा, आसं कसं मन ?

आसं कसं रे घडलं

कुठे जागेपनीं तुले

आसं सपन पडलं !

अर्थात, मन म्हणजे फक्त दुःखाचे कारंजे नव्हे. आपल्या समोरचे जग हे मनाचेच प्रतिबिंब आहे. मग त्यात दुःखासोबत सुख आणि मुख्य म्हणजे प्रेम हे मनाचेच कवडसे आहेत. ("बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलाला")

या प्रेमाची चिन्हे संगीत, कला, नृत्य आणि शिल्पानमधून जन्म घेतात. आणि हि चिन्हे मनुष्य जीवन जगण्यासारखे करितात. किंबहुना आपल्या मनुष्यत्व यामुळेच प्राप्त होते! 

No comments: