5/2/25

जावळीचे मोहीम, छत्रपती शिवाजी आणि त्यांचे राजकीय डाव-पेच (चंद्रप्रकाशी लेखन)


**या लेख मालिकेला मी 'चंद्रप्रकाशी' अश्यासाठी म्हणले आहे कारण हे माझे मूळ संशोधन नाहीं. 'जावळीचे चंद्रराव मोरे' हे श्री रमेश साठे यांचे पुस्तक पुन्हा वाचनात आले. त्यातील संशोधनाचा मागोवा आणि काही प्रमुख घटना संक्षिप्तात मी येथे सादर करण्याचा हा प्रयत्न. पुस्तकाचा आढावा आणि त्यान्वये मला अजून उमजलेल्या छत्रपती आणि मराठा इतिहासाचे हे पडसाद आहे. हा लेख चांगलंच लांब झाला आहे. तरी आरामात किंव्हा टप्प्या-टप्प्यात वाचावा. पण अवश्य वाचावा. 

पार्श्वभूमी:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयाच्या काळात, म्हणजे सन १६५६  च्या काळात, जावळीच्या मोहिमेला अनन्यसाधारण महत्व आहे. या मोहिमे बद्दल फारसे बोलले जात नाहीं कारण हे मोहिमेत राजकारण जास्त होते. सिंहगड किंव्हा आग्रा या घटना रोमांचक आहेत त्यामुळे त्याची माहिती जनमानसात अधिक आहे. जेंव्हा जावळीचा उल्लेख होतो तेंव्हाहि, 'चंद्रराव मोरे ला परास्त करून, पिढीजात असलेला 'चंद्रराव' किताब काढून, जावळी महाराजांनी  जिंकली' असा थोडक्यात होतो. पण या मोहिमेत महाराजांनी त्यांच्या उत्तर आयुष्यातील त्यांच्या यशाची, आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने रोवली असे म्हणता येईल. त्याचे कारण असे:

१) महाराजांनी ताडलेले जावळीचे भौगोलिक महत्व. 

२) भविष्यातील मानसुब्यांसाठी जावळीचे आवश्यकता. उदा. जावळीतल रायरीचा किल्ला म्हणजेच रायगड

३) जावळीवर वर्चस्व किंव्हा जावळीचे मोरे स्वराज्यात दाखल होणे यापैकी कुठलीही वस्तुस्थिती इतर देशमुख, पाटील, किंव्हा मानसबदारांना स्वराज्याच्या कामात रुजू व्हायला प्रवृत्त करण्यास किंव्हा स्वराज्याबद्दल आत्मविश्वास निर्माण करण्यास कामी येणार होती.  

४) जावळीच्या राजकारणात महाराजांनी जेंव्हा लक्ष दिले तेंव्हापासून ते जावळी जिंकेपर्यंत महाराजांनी जे डाव-पेच, युक्त्या लढवल्यात त्या पुढल्या सगळ्या महत्वाच्या मोहिमांमध्ये नियमित पणे दिसून येतात. 

जावळीच्या मोहिमेची माहिती श्री बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या 'श्री राजा शिवछत्रपती' पुस्तकात उपलब्ध आहे. पण या विषयावर अचानक एक अमूल्य पुस्तक माझ्या पदरी पडले. 'अचानक धनलाभ' म्हणतात तसे. पुस्तक श्री रमेश साठे यांनी लिहिलेले आहे. श्री साठे हे बाबासाहेब पुरंदऱ्यांचे खास मित्र, महाराजांच्या इतिहासाचे व्यासंगी आणि इतिहास जिथे घडला ती भूमी यांना त्यांच्या मागच्या अंगणासारखी ओळखीची आहे. हे पुस्तक शिवाजी महाराजांच्या एका महत्वाच्या मोहिमेची संक्षिप्तात माहिती देतेच पण घटनेच्या इतिहास व्यतिरिक्त पुस्तकाचे लेखक श्री साठे, महाराजांचा मुत्सद्दीपणा, त्यांची दूरदृष्टी, एवढ्या कमी वयात त्यांनी दर्शविलेला राजकीय प्रौढपणा आणि त्यांचा संयम आणि तसेच जेंव्हा आवश्यकता निर्माण झाली तेंव्हा महाराजांचे संयोजन आणि धाडस या गुणांची सूक्ष्मतेने जाणीव करून देतात. 

--

जावळीचा इतिहास: 

जावळी हा भाग सध्याच्या सातारा जिल्ह्यात येतो. जावळीचे जंगल घनदाट आणि दुर्गम आहे. जावळीच्या पुढे कडा ओलांडून कोकणपट्टी. जावळी मोक्याची यासाठी कि जावळीत सैन्य पाठवून तो भाग किंव्हा जावळी ज्याच्या अधिपत्या खाली आहे त्याला जिंकणे महत्कर्म आहे. आणि जावळीत जम असेल तर जावळीचे अरण्य, किल्ले आणि खालती कोकणपट्टी व समुद्र किनारा, या सगळ्यावर वर्चस्व स्थापन होते. महाराजांचे जावळीकडे कधीपासूनच लक्ष असणार. पण जावळी, पिढीजात, मोरे घराण्याच्या हाती होती. आणि जो मोरे वंशज गादीवर असेल त्याला 'चंद्रराव' खिताब प्राप्त होत असे. जावळीत जरी या मोरे घराण्याची सत्ता अनभिषिक्त असली तरी हे सगळे 'चंद्रराव' मोरे, नाममात्र का होईना, चाकरी बादशहाची करीत असत. जो कोणी निझाम किंवा आदिलशाही बादशाह तेंव्हा आरूढ असेल त्याच्या पदरी हे दाखल होत. पण बादशहाचा पदर धरला तरी जावळीत बादशाही सत्ता नसे. तिथे सत्ता मोरे घराण्याचीच. जावळीच्या अजिंक्यतेची पावती देणारी एक घटना फार रोमांचक आहे. शिवाजी महाराजांच्या दोन शतके आधी मलिक उत्तुजार नावाचा एक मुसलमान बहमनी बादशहाचा सेनापती होता. त्याने शिर्के (शिरकावली गावाचे) नावाच्या स्थानीय सरदाराला युद्धात हरविले. आणि मग मुसलमान होण्यासाठी भाग पाडले. शिर्के त्याला म्हणाला कि मी मुसलमान होईन पण जवळच्या मोरेला पण मुसलमान करायला हवे म्हणजे मी एकटा पडणार नाहीं. मलिक उत्तुजारला ते पटले. शिर्के मग मलिकला घेऊन मोरे वर चढाई करायला जावळीत निघाला. शिर्केने आधीच मोरेला या सगळ्याची बित्तमबातमी दिली होती. जावळीच्या घनदाट जंगलात प्रवास करितांना मलिक उत्तुजार व त्याच्या सैन्याचे अतोनात हाल झालेत आणि शेवटी, मोरे आणि शिर्केच्या सैन्याने गनिमी काव्याने हल्ला करून मलिक उत्तुजार आणि त्याच्या सैन्याला गायब केले. जवळपास दहा हजाराच्या सैन्यातून एकही जीव जावळीतून बाहेर आला नाहीं. बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या 'राजा शिवछत्रपती' पुस्तकातही हि घटना नमूद केली आहे. या घटनेनंतर कोणीही बादशहा जावळीच्या वाटेल गेला नाहीं. जावळी जणू अजिंक्य होती. 

शिवाजी महाराजांचा समकालीन जो दौलतराव 'चंद्रराव' मोरे होता त्याचा सन १६४८ ला मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूपर्यंत मोरे घराण्यात भाऊबंदकी नव्हती. पण दिवंगत चंद्ररावास स्वतःचे अपत्य नव्हते. त्यामुळे आता जावळीचे गादी अचानक मोकळी झाली होती. या चंद्ररावाच्या आईस - माणकोइ बाई,  वाटू लागले कि गादी कोणी तरी मोरे घराण्यातच बळकावणार किंव्हा कोणी शिर्के इत्यादी येणार आणि किंव्हा हा गोंधळ बघून बादशाह जावळी गिळेल. पण माणकोरीबाई हुशार होत्या. तिने मग तिच्या माहेरच्या नात्यातीलच एकाला -  येसाजी मोरे,  दत्तक म्हणून घेतले, आता दत्तक घेतलेला कोणी लहान पोरगा नव्हता तर चांगला तिशीच्या घरातला होता. दत्तक घेण्याच्या कामात उगाच दगा-फटका होईल याची भीती माणकोइ बाईंना होती. भाऊ-बंदकीत घराणी निर्वंश होण्याच्या अनेक घटना तेंव्हा सातत्याने घडत. माणकोइ बाईंनी शिवाजी महाराजांचे वाढते बळ आणि त्यांचा वाढत वचक हेरला होता. त्यामुळे बाईंनी लगेच महाराजांना गाठले आणि अभय मागितला. जावळी स्वतःच्या अधिपत्यात नसली तरी तिथल्या गादीवर हिंदवी स्वराज्याचा पाईक बसला तर उपयोगीच ठरेल असा विचार करून महाराजांनी हवी ती मदत मोरे बाईंना देण्याचे मान्य केले. माणकोइ बाईंनी मग दत्तक घेण्याचा कार्यक्रम उरकला आणि नवीन येसाजी 'चंद्रराव' मोरे जावळीच्या गादीवर स्थानापन्न झाला. 

गादीवर आल्यावर येसाजीने जातीने जावळीच्या व्यवस्थेत लक्ष घातले. आणि या छोट्या राज्याजी घडी नीट लावली. आणि गादीवर आपली पकड मजबूत केली. पुढे त्याने अत्यंत आदर व प्रेमाने श्री समर्थ रामदासांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून उपदेश घेतला. तसेच शिवथर घळीची जागा श्री समर्थांना उपलब्ध करून दिली. शिवाजी महाराजांचे उपकार न विसरता त्याने, निदान सुरुवातीला तरी, महाराजांशी आपुलकीचे संबंध प्रस्थापित केले. पण बहुधा हे सगळे त्याच्या दृष्टीने एक राजकीय खेळी होती. जावळीच्या गादीवर आणि प्रदेशावर सत्ता मजबूत पणे आपल्या हातात केंद्रित होई पर्यंत त्याने सगळ्यांशी गोडी-गुलाबीचे संबंध ठेवले. पण सत्ता हे असे भूत आहे कि एकदा कि मानगुटीवर बसले कि मग त्या भुताला काढणे अशक्य होते. आणि येसाजी मोऱ्याला सर्वनाशाच्या मार्गावर हे सत्तेचे भूत बकोट धरून घेऊन जात होतं. 

युद्धाची रुखरुख:

जावळीच्या मोसे खोरे भागात रंगो बापूजी त्रिमल नावाच्या एका कुळकर्ण्याने एका बाईवर अत्याचार केला. हि तक्रार महाराजांना पोचताच त्यांनी रंगो ला धरून आणण्याचे आदेश दिले. महाराजांचे प्रशासन चोख असे आणि बदकर्माच्या बाबतीत तर त्यांचा कडक अंमल एव्हाना सर्वश्रुत होता. त्यामुळे घाबरून रंगो त्रिमलने थेट येसाजी मोऱ्यांचा पदर धरला आणि असले घृणात्मक कृत्य करूनही येसाजी ने त्याला चक्क अभय दिला. हळू हळू येसाजी ने आपले हात-पाय पसरायला सुरुवात केली आणि त्याच्या क्षेत्रात अन्यायाला वाव मुद्दाम द्यायला सुरु केला. जणू तो महाराजांना अप्रत्यक्षपणे आव्हान देत होता. त्याच्या साठी हा सगळा राजकीय आणि सत्तेचा खेळ होतं पण त्याला कळले नाहीं कि शिवाजी महाराज हे जुना 'खेळ' खेळत नव्हते. त्यांनी नवा डाव मांडला होता आणि या स्वराज्याच्या डावात येसाजी सारख्यांना जागा नव्हती. 

शिवाजी महाराज आता जावळी आणि येसाजी 'चंद्रराव' मोरे कडे जातीने लक्ष घालू लागले. त्यांनी येसाजी ला दिलेली संधी त्याने आपल्या कृत्यांनी गमावली होती. पण महाराज कुठलेही काम तडका-फडकी करीत नसत. सगळ्यात पहिले त्यांनी त्यांचे गुप्तचर जावळीभर पसरवलेत. मग पत्र व्यवहार आणि वकिलांच्या मार्फत त्यांनी येसाजी मोरे ला भेटीची बोलावणी पाठवलीत. पण येसाजी काही जुमानेना. शेवटी शिवाजी महाराजांनी अंतिम चेतावनी-सम एक पत्र पाठवले. हे पत्र शिव-इतिहास प्रेमींना ओळखीचे आहे - "तुम्ही मुस्तफद राजे म्हणविता, राजे आम्ही - आम्हास श्रीशंभूने राज्य दिधले आहे. तर तुम्ही राजे न म्हणावे. आमचे नोकर होऊन, मुलुख खाऊन बरोबर राहून चाकरी करावी. नाहीतर बदफैली करून फंद कराल तर जावळी मारून तुम्हास कैद करून नेऊ" शिवाजी महाराजांच्या या पत्राचे उत्तर येसाजी मोरेने फार गुर्मीत आणि उर्मट पणे दिले " तुम्ही काल राजे जाहला. तुम्हास राज्य कोणी दिधले! मुस्तफद राजा आपले घरी म्हटलियावर कोण मानतो! येता जावळी, जात गोवली. पुढे एक मनुष्य जिवंत जाणार नाहीं" 

तरीही एक शेवटची संधी म्हणून शिवाजी महाराजांनी पुन्हा एक पत्र येसाजी ला लिहिले आणि त्याला पुन्हा समजविण्याचा प्रयत्न केला. पण येसाजीची मती फिरली होती. त्याने जावळीचे सोय उत्तम केली होती म्हणून त्याला भीती वाटत नव्हती. पण त्याने शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या स्वराज्याच्या ध्येयाने भारावलेल्या मावळ्यांना नक्कीच कमी लेखले होते. आणि त्याची किंमत त्याला मोजायला लागणार होती. 

--

जावळीचे फत्ते:

जावळीचे हि भानगड चालू असतांना, मुसलमानी सत्तांमध्ये वेगळे राजकारण घडत होते. आणि हा भाग साधारण आपण लक्षात घेत नाहीं. महाराजांचे पराक्रम हे शून्यात बघणे चुकीचे आहे. त्यांनी उचलली पावले आणि त्यांच्या स्वाऱ्या, तात्कालीन मुघल, आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही यांच्यातील राजकारण लक्षात घेऊनच पारखायला हवे. जावळीवर हल्ला करून उगाच आदिशाहीला डिवचण्यात अर्थ नव्हता. स्वराज्य, स्व-सैन्य आणि खजिना या सगळ्या गोष्टी अजून अल्प आणि अननुभवी होत्या. पण सन १६५० च्या दशकात मुघली सैन्य, आणि खुद्द औरंगझेब दक्षिणेत येणार होता. शहाजहान ने त्याला दक्षिण भारत जिंकून मुघली पंजाखाली आणण्याचे काम दिले होते. त्यामुळे आदिलशहा आणि कुतुबशहा औरंग्याला कसे सामोरे जायचे या तयारीत होते. जावळी-बिवळी आदिलशाहच्या पटलावर नव्हते. अर्थात, हेच महाराजांना हवे होते. 

या दरम्यान महाराजांच्या हेरांनी सगळी जावळी पोखरली होती. सगळ्या भागाची आणि स्थानिक सरदारांची माहिती महाराजांना होती. येसाजी चा एक भाऊ, हणमंतराव मोरे या येसाजीच्या महाराजांविरुद्ध कान भरीत असत. महाराजांनी रघुनाथ बल्लाळ यांना या हणमंतरावाचा बिमोड करायला पाठवले. रघुनाथ बल्लाळ यांनी एक वेगळीच खेळी खेळली. लग्नाची बोलणी करायला म्हणून पन्नास मावळे घेऊन ते थेट हणमंतरावाच्या वाड्यात पोचले. आणि त्याला गफलतीत आणून, रघुनाथ बल्लाळ आणि त्यांच्या मावळ्यांनी हणमंतरावाला ठार केले. आणि त्याची गढी हस्तगत केली. 

कान्होजी जेधे, जे वयाने महाराजांहून बरेच मोठे होते आणि आत्तापर्यंत ते आदिशहाच्या पदरी होते, यांनी महाराजांसोबत स्वराज्याची कास धरली होती. मोहिमेची सुरुवात होईपर्यंत त्यांना खरेतर आदिशहाचा हुकूम आला होता कि महाराजांवर चालून जायचा, पण काहीतरी टाळा-टाळ करून त्यांनी तो हुकूम जुमानाला नाहीं. आणि आता संधी साधून त्यांनी उलट जावळीवरच हल्ला करून महाराजांना जावळीत शिरायचं अजून एक मार्ग मिळवून दिला. 

मग फारशी उसंत न घेता, नेताजी पालकर, येसाजी कंक, तानाजी मालुसुरे आणि महाराजांचे सैन्य वेग-वेगळ्या घाटातून (रडतोंडी, पारघाट, निसणीचा इत्यादी) जावळीत शिरू लागलेत. ठरलेल्या ठिकाणी सगळे सैन्य एकत्र आले आणि जावळीवर हल्ला केला. स्वतः चंद्रराव त्याच्या कुंटुबासोबत कुमठे नावाच्या गावी पळाला पण मागे मुरारबाजी देशपांडे याला लढायला ठेवले. महाराज आणि मुरारबाजी देशपांडे यांच्या सैन्यात कडाक्याचे युद्ध झाले पण मुरारबाजी काही मागे हटेना. महाराज त्याचा पराक्रम बघून अचंबित झाले. या धुमश्चक्रीत चंद्रराव मोरेची दोन मुले पकडल्या गेली होती. त्यांना पुढे करून महाराजांनी युद्ध थांबविले आणि मुरारबाजी पण ते बघून शरण आला. जावळीचे गढी महाराजांच्या सैन्याने जिंकली. मुरारबाजी चा पराक्रम महाराजांच्या नजरेत भरला होता. त्यांनी त्याला स्वराज्यासाठी झटायचे आव्हान केले आणि मुरारबाजींनी ते लगेच स्वीकारले. मुरारबाजी देशपांडे यांनी पुढे सन १६६५ च्या पुरंदरच्या लढ्यात राजा जय सिंह च्या मुघली सैन्यासमोर अतुलनीय पराक्रम गाजविला. आणि या युद्धातच त्यांना वीरगती प्राप्त झाली होती. 

मुख्य जावळीची गढी हाती लागल्यावर उर्वरित जावळीत असलेल्या मोरे घराण्याचे इतर वंशावळीचा मागे महाराज लागले. गोडी-गुलाबीने स्वराज्य कामात आणणे नाहींतर हुसकावून लावणे हे कार्य महाराजांच्या सैन्याने पुढी काही महिने केले. स्वतः येसाजी मोरे रायरीला (आपण याला आज रायगड म्हणून ओळखतो) लपून बसलेला होता. महाराजांनी स्वतः सन १६५६ च्या उत्तरार्धात रायरीला धडक मारली. आता राजे येसाजीला सोडणारे नव्हते आणि त्यांचा हा मनसुबा शेवटी येसाजीने ताडलं. त्याने समझोत्याची बोलणी सुरु केला आणि तो महाराजांना शरण आला. रायरीचा किल्ला हातास लागल्याने महाराज फार आनंदी झाले. भविष्यातली राजधानी म्हणून त्यांनी मनोमनीच रायगडाची योजना केली असणार. 

जावळी हाती लागली असली तरी येसाजीची कहाणी इथे संपत नाहीं. येसाजी आणि त्याच्या मुलांना स्वधर्म, स्वराज्य याचा मार्ग रुचेना. येसाजीच्या मुले बंदिगृहातून पळून गेलीत. त्यातील एक लगेच हाती लागला पण दुसरा - बाजी मोरे पळून विजापूर बादशाही दरबारात पोचला. तेथे बाजी घोरपडे सोबत त्यांनी स्वतःच्या बापाला आणि भावाला सोडविण्याची खटपट सुरु केली. (या बाजी घोरपड्याला पुढे महाराजांनी परास्त करून यमसदनी पाठविले) महाराजांना हे कळताच येसाजी मोरे आणि त्याचा एक पोरगा -कृष्णाजी मोरे ला मृत्युदंडाची शिक्षा दिली. सात पिढ्या जावळीवर राज्य केलेले सरदार घराणे असे नामशेष झाले. 

जावळीनंतरचे स्वराज्य, जावळीनंतरचे महाराज:

मी महाराजांचा जावळी-विजय संक्षिप्तात सादर केला आहे. अजून बारकाव्यांसाठी हे छोटेखानी पुस्तक अवश्य वाचावे. महाराजांचे जीवन अद्भुत पराक्रमांनी भरलेले आहे आणि त्यांचा चाणाक्षपणा, राजकीय मुत्सद्दीपणा आणि धडाडी याचा प्रत्यय पावलो-पावली येतो तरी जावळीचा विजय हि साधारण घटना नव्हती. जावळी जिंकून महाराज आणि मावळे, मुसलमानी बादशाहीच्या पटलावर ठळकपणे उभे झाले. महाराजांचा जीवनकाल जावळी विजया आधीच काळ आणि जावळी विजया नंतरचा काळ, अश्या दोन भागात करू शकतो. जावळी महाराजांच्या हाती आल्यापासून त्यांच्यावर एका-पाठोपाठ मुसलमानी बादशाहिची आक्रमणे सुरु झाली. आधी अफझल, मग सिद्दी जौहर, मग शाईस्ता आणि काही वर्षांच्या कालावधीत जयपूरचा जयसिंह असे क्रूर मुसलमान आणि हिंदू-धार्जिणे आक्रमक स्वराज्यावर आणि महाराजांवर चालून आले. जयसिंह ला सोडून महाराजांनी बाकी मुसलमानांचा नायनाट केला. आणि आग्र्याहून पलायन करून, त्या अन्वये जयसिंहचा बिमोड केला. पण जवळीनंतरची दहा-पंधरा वर्षे महाराज अखंड लढत राहिले. आणि शेवटी सन १६७४ विजयानगरच्या राजा रामरायानंतरचे पहिले हिंदू स्वराज्यकर्ते बनलेत. 

4/24/25

आक्रोश

पहलगाम मध्ये झालेले हत्याकांड काही नवीन नाहीं. हिंदूंना हिंदू असण्याबद्दल ठार मारण्याची प्रथा भारतात शेकडो वर्षांपासून आहे. आणि एक अत्यंत 'मानवतावादी' आणि 'शांतीप्रिय' धर्माचे अनुयायी या कामात 'उस्ताद' आहे. पण या नित्य नेमाने घडणाऱ्या हिंदू हत्ये नंतरची 'क्रोनोलॉजि' आपण समजून घेऊया. पुढे मांडलेल्या कृती या दुधाच्या गाळण्या आहेत असा विचार करा. दूध गाळले कि साय गाळण्यात उरते. इथे मात्र उरते नुसती उकिरड्यावरची घाण. 

प्रत्येक वेळेस अशी घटना घडली कि सगळे लोक, ज्यात हिंदूही असतात, एकत्रित झाल्याची भावना मनात आणतात. खऱ्यात कोणीही एकत्र आलेले नसतात. पण स्वतःची समजून लोक तशी घालतात. झालेले हत्याकांड इतके निर्मम असते कि शांतीप्रिय-धर्म प्रेमी, (शांतीप्रिय धर्माचे अनुयायी नाहीं बर का, त्यांचे प्रेमी) सेकुलर म्हणवणारे षंढ आणि शंख लोकही निदान प्रतिक्रिये करता तरी या हत्याकांडाची कडक शब्दात निषेध दर्शवितात. तरुण जनता प्लकार्ड घेऊन थोडे मोर्चे काढतातआणि सामोसे-भजी किंव्हा खर्रा खाल्ल्या हात झटकावा तसे आता सोशल मीडियावर स्टेटस टाकून मोकळे होतात. (" All Eyes On ") या प्रत्येक गाळण्यातून हिंदू शब्द आता हळू हळू नाहीसा होऊ लागतो. शब्दांचा खेळ बघा 'हिंदूंची मुसलमानी धर्मांधांनी केलेल्या निर्मम हत्येचा निषेध' असे कोणी लिहीत नाहीं. 'धर्मांधांनी केलेल्या हत्येचा निषेध' एवढेच सुरुवातीला म्हंटल्या जाते. मग हळू हळू त्याचे रूपांतर 'या 'हत्याकांडाचा निषेध' वर पाळी येते. मग अजून एक छोटेखानी गाळणे लागते. 'या हिंसेचा विरोध झालाच पाहिजे' किंव्हा 'या दहशतवादाचा निषेध' यावर पाळी येते. आणि मग सगळ्यात शेवटी, उकिरड्यावरची घाण म्हणजे 'शांती, भाईचारा आणि मानवता हीच खरी सत्ये आहेत' ' मेलेले आणि जखमींसाठी आमच्या प्रार्थना' किंव्हा 'आजच्या जगात क्रूरतेला आणि धर्मांधतेला जागा नाहीं' इत्यादी घाणीचाही चोथा काढावा तसे बरळल्या जाते. या सगळ्यात हिंदू शब्द गळतो, इस्लाम शब्द कधी आलाच नसतो. निर्मम शब्दाला टांग दिल्या जाते. दहशतवाद, क्रूरता, धर्मांधता इत्यादींचा नपुंसक बनविल्या जाते आणि पुढे तर या सगळ्या गोष्टी सगळ्याच धर्मात आहेत असेही बोलबाला व्हायला लागतो. 

मग सुरु होत कि सरकार काय करते आहे किंव्हा काय करत नाहीं याची चर्चा. काय करायला हवे याचा उहापोह. मोदीजींना नावे ठेवा, संघाला नाव ठेवा, त्यांना त्यांची कामे करू द्या, तुमची काय कर्तव्य आहेत, याचा विचार करा? मग पुढे मुसलमानांना त्रास दिला, वक्फ बिल पास केले म्हणून मग ते बिचारे उद्विग्न होऊन असे कृत्य करतात इत्यादी गरळ ओकल्या जाते. या सगळ्यात काही दिवस गेले कि लोक हळू हळू विसरून जातात आणि आपापल्या कामाला लागतात. घाण तशीच राहते, किंबहुना वाढते, डुकरांना सोयीचं होतं, त्यांना लोळायला अजून फावतं. दुर्गंध सगळीकडे पसरतो, लोकांची डोकी खराब करतो, लोकांचे मेंदू कुजवतो. उकिरडे बघवत नाहीं म्हणून लोक डोळे बंद करतात. पुढच्या हत्याकांडासाठी मार्ग मोकळे होतात. 

पहलगाम मध्ये मारलेल्या प्रत्येक पुरुषाला आधी त्याचा धर्म विचारला. काहींना इस्लामी कलमा पढायला लावला, काहींचे कपडे काढून गुप्तांग पडताळलीत आणि जे हिंदू आहेत त्यांच्या डोक्यात गोळ्या घातल्यात. त्यांच्या बायका-पोरांसमोर. कोणाची जात विचारली नाहीं, पोटजात विचारली नाहीं, भाषा, राज्य विचारली नाहीत. कपाळाचे गंध उभं कि आडवं, खांद्यावर जानवं बघितले नाहीं. धर्म कुठला एवढेच विचारले. आपल्या धर्माचे तुकडे करून, विखरून, विस्कळीत होऊन उभे राहणारे आंधळे आपण आहोत. शांतीप्रिय डोळे उघडे ठेऊन आहेत कारण त्यांचे लक्ष त्यांच्यासमोर पोपटाच्या डोळ्यासारखे स्वच्छ आहे. काफिरांना मारा, त्यांच्या बायका-पोरांना गुलामीत विका, निर्वंश करा. आणि ते हजार वर्षे सातत्याने करीत आले आहेत. अगदी १९४७ साल च्या फाळणीतही तेच केले. फाळणीनंतर पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये त्यांनी तेच केले. १९८९ ला काश्मीर मधेही तेच केले. 

अगदी हे शब्द लिहितांना बांगलादेश मध्ये हिंदूंना हिंदू म्हणून मारतायत. पश्चिम बंगाल मध्ये मुर्शिदाबाद मध्ये, मालदा मध्ये हिंदूंना हिंदू म्हणून मारतायत. पाकिस्तानी सेनेचा सेनापती 'आम्ही हिंदू भारताला नामशेष करू' या धमक्या देतो आहे. 

हे असाच चालत राहणार. आपण श्रीयुत गोंधळे बनून फिरणार. सगळे लोक सारखे नसतात. मान्य. पण म्हणून सगळ्यांशी सारखा वागायला कोण म्हणतय? विचारसरणीचा विरोध हवा, प्रवृत्तीचा सामना करायला हवा, धर्मांधतेसोबत युद्ध करायला हवे. मानसिक विस्कळता या बाबतीत नको.   

जो पर्यंत सनातन संस्कृतीवर विश्वास ठेवणारे आहेत तो पर्यंत 'बुत-शकीन गळे कापायला येणारच. प्रश्न असा आहे कि, आपण सनातन संस्कृतीचे पालन करण्याचे धाडस दाखवीत राहणार कि नाहीं? त्यासाठी जागृत होणार कि नाहीं? त्या साठी एकत्रित येणार कि नाहीं? 

निदान, त्या साठी डोळे उघडणार कि नाहीं?

नाहीं तर 'कलमा' चे पाठांतर सुरु करा! 

3/10/25

महाकुंभ दर्शन


मला प्रयागराज ला पोचल्यावर हुश्श झाला. इतकी धावपळ आणि धाकधूक पोचायला कि तिथे पोचल्यावर आता गंगा दर्शन होणार आणि स्नान होणार याची खात्री झाली. प्रयागराज जरी पोचलो तरी अजून घाटापासून ८-१० किमी दूर होतो. आम्ही तिथेच गाडी पार्क केली आणि दुचाकी टॅक्सी करून घाटावर पोचलो. घाटावर पोचल्यावर सगळ्यात पहिले मला काही जाणवले असेल तर सगळ्या समारंभाची आणि समारंभाच्या सोयीची भव्यता आणि शिस्त. आम्ही ज्या दिवशी पोचलो त्या दिवशी गर्दी आधीच्या तुलनेत बरीच कमी होती. पण दूर-दूर पर्यंत तंबु पसरले होते, मोठे तात्पुरते रस्ते, इलेक्ट्रिक ऑटो आणि पुन्हा मोट्ठी मोकळी जागा आणि मग त्या पुढे गंगेचे पात्र. एका टप्प्यात डोळ्यात काहीच भरत नव्हते आणि ठरत नव्हते. जिथे एक मुख्य रस्ता होता, तिथं पर्यंत गंगेचे पाणी पावसाळ्यात येत. म्हणजे, महाकुंभाची संपूर्ण सोय, असंख्य तंबू, वाहतुकीचे मार्ग, अगणित लोक, हा सगळं पसारा गंगेने आपल्या पात्रातच सामावलेला होता. स्नान नाहीं झाला तरी गंगेने श्रद्धाळूंना आधीच पावन करण्याची काळजी घेतलेली आहे!

आम्ही दुचाकीने महाकुंभाच्या परिसरात पोचलो. किनाऱ्याची रेती विलक्षण मऊ होती. दुपारची तापली होती म्हणून नाहीं तर रेतीत झोपायला मजा आली असती. रेतीतच स्टीलच्या मोठ्या मोठ्या पाट्या टाकून तात्पुरते रस्ते बनवले होते. त्यावर चालायालाही सोय होती आणि तसेच इलेक्ट्रिक ऑटो पण मिळत. किनार्यावर अनेक घाट होते, आणि वेगवेगळ्या घाटापर्यंत पोचायला  इलेक्ट्रिक ऑटोने जाणे सोयीचे होते. आम्ही अश्याच ऑटोत बसून संगम घाटावर गेलो. आम्ही ज्या बाजूने संगमाच्या दिशेने प्रवेश केला होता,  त्याबाजूने यमुना येते, आणि मध्ये एक रेतीचे छोटे बेट आहे आणि त्या पलीकडून गंगा येते. आणि मधून गुप्त अवस्थेत सरस्वती येते. संगम घाटावर नदीचा प्रवाह फार वेगाने होता. झर-झर पाणी वाहात होते. पलीकडचे गंगेचे पण पाणी असेच वेगाने येतांना दिसत होते. घाटावर छान पायऱ्या बांधलेल्या होत्या आणि सगळी कडे अविरत स्वच्छता केली जात होती. पायऱ्या संपल्यावर पाण्यातील एक मोठा परिसर मोठं-मोठ्या प्लॅस्टीकच्या पिंपांना दोरखंडांनी बांधून वेढलेला होता, जनतेसाठी संगम घाटावर स्नान करायला. सहाजिकच त्रिवेणी संगमावर सगळ्यात अधिक गर्दी होती. तिथून काहीच अंतरावर वी-आय-पी लोकांचा पास असलेल्यांसाठी होड्यांची व्यवस्था होती. तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य जनतेसाठी होड्यांसाठी अजून एक वेगळा धक्का बांधलेला होता. 

मी संगम घाटावरच पाण्यात आत गेलो. पाणी गुढग्याएवढेच होते. लोक जागोजागी पूजा करीत होते. आणि नारळ पाण्यात टाकीत होते. इतक्या गर्दीत, कोलाहालात, लोक इतके मग्न होऊन प्रार्थना, पूजा-अर्चा करीत होते कि मी त्या लोकांना बघण्यातच गुंतलो. किती श्रद्धा आणि केवढा भक्ती-भाव! देवावर श्रद्धा, पुनर्जन्मावर विश्वास आणि पाप-पुण्याच्या फेऱ्यातून सुटका होऊन मोक्षप्राप्तीसाठी केवढी तळमळ. खूपदा आपण बुद्धिजीवी उगाच प्रश्नांच्या जाळ्यात फसतो आणि स्वतःला फसवितो. हुशार होण्याच्या भानगडीत भाबडेपणा हरवून बसतो. भाबडेपणाला अंधश्रद्धा समजून बसतो. या दोन्हीत बरेच अंतर आहे. कुंभमेळा असो कि आपली विठ्ठलाची वारी असो, तेथे जाण्याचे आमंत्रण कोणाला नसते, तेथे येण्यासाठी कोणालाही आवाहन केल्या जात नाहीं, जाण्याचा जोरा कोणावर नाहीं किंव्हा गेलो नाहीं तर मोक्ष मिळणारच नाहीं असेही नाहीं. पण तरी शेकडो-हजारो वर्षे लोक संख्येने प्रयागराज ला पोचतात. विठ्ठलाच्या वारीला जातात. आपला हिंदू धर्म एक नाहीं असे म्हणणाऱ्यांनी या कुंभला भेट द्यायला हवी होती. त्या जागेची ऊर्जाच वेगळी होती. सगळं परिसर जणू तेजपुंज झाला होता. म्हणूनच अपेक्षेपेक्षा कितीतरी आधी कोटी आलेत. सगळं देश या समारंभाचे आकर्षणाने मोहून गेला. 

संगम घाटावर गर्दी बघून, आणि अजून अर्धा किमी दूर जाऊन अजून जास्त गर्दीत, उन्हात, रांगेत उभे राहून संगमाच्या मधोमध जाण्यासाठी होडी घेण्याची इच्छा नसल्यामुळे, आम्ही खालती सोमेश्वर घाटावर जाण्याचे ठरवले. पुन्हा एक दुचाकी वाहन केले, त्याने आम्हाला सोमेश्वर घाटावर सोडले. गेल्या महिन्याभरात गर्दी बद्दल काय काय ऐकले होते. पण आमच नशीब कि सोमेश्ववर घाटावर फारच तुरळक गर्दी होती. मी अजूनही ठरवले नव्हते कि नदीत पूर्ण बुडी मारायची कि नाहीं ते. पाणी फार घाण असणार, पाण्यात कचरा असणार असे विचार मनात घोळत होते. शहरात आयुष्य घालवलेला आणि दररोज शॉवर ने आंघोळ करणारा मी! तरी मी पाण्यात गेलो. माझ्या मुलाने मला गंगेचे पाणी आणायला सांगितले होते. विचार केला बुडी नाहीं मारली तरी आत जाऊन प्लास्टिक च्या बाटलीत त्याच्यासाठी पाणी भरून आणीन. हळू हळू मी आत आत जात होतो. पाणी दिसायला तरी स्वच्छ होते. थोडे प्लास्टिक चे तुकडे वाहत होते. गंगेत स्नान करायची  हि माझी पहिली संधी होती. 


देवि सुरेश्वरि भगवति गंगे त्रिभुवनतारिणि तरल तरंगे।

शंकर मौलिविहारिणि विमले मम मति रास्तां तव पद कमले ॥ १ ॥  (गंगास्तोत्रं, आदी शंकराचार्य विरचित) 

(सारांश: हे देवी गंगे, तू तिन्ही जगताची तारिणी आहेस, तू शंकराच्या जटेमधली विहार करणारी आहेस. आणि माझे मन, बुद्धी नेहमी तुझ्या कमलचरणी स्थिर असावेत.)

माझे गंगेचे धावते दर्शन फार पूर्वी झाले होते. आसाम च्या रस्त्यावर, ट्रेन पटण्याहून जाते. पटण्याला गंगेचे अती-विस्तृत पात्र आहे. ट्रेन पाच-दहा मिनिटे तो रेल्वे पूल ओलांडत होती. मी घाई-घाईने एक रुपया ट्रेन मधूनच खालती टाकला आणि नमस्कार केला होता. पण तीला त्याची फारशी आठवण असेल असे वाटत नाहीं. तीला म्हणजे, गंगेला! 

मी पाय रेटत  पुढे पुढे जात असतांना माझ्या उजव्या बाजूला एक महिला आंघोळ करीत होती. ती कोणाशी तरी बोलत होती. मी आधी फारसे लक्ष दिले नाहीं पण बाजूनी जातांना तिचे बोललेले ऐकू यायला लागले. मला आधी वाटलं फारच भावुक होऊन बडबड करत असावी. पण तसे नव्हते. ती गंगेशी संवाद करीत होती. "आज मेरा पहिली बार आपके यहां आना हुआ है| आपका दर्शन कभी नहीं हुआ था| अच्छा हुआ मुझे आपने बुला लिया " 

मी चकित होऊन ऐकू लागलो. माझी पाण्यात ओढत चाललेली पाऊले संथावली. 

"मुझे बहोत अच्छा लग रहा है आपसे मिल के, आपका दर्शन ले के| मैं बहुत खुश हुं|" असे काहीसे बोलत ती गंगेत बुड्या मारीत होती. तिचा गंगेशी चाललेला संवाद असेल, आजूबाजूला अथांग पसरलेला मानवतेचा सागर असेल, कोणाचीहि वाट न बघता, अविरत, अखंड वहाणारी गंगा असेल, पण मला भरून आले.  

वरमिह नीरे कमठो मीनः किं वा तीरे शरटः क्षीणः ।

अथवाश्वपचो मलिनो दीनस्तव न हि दूरे नृपतिकुलीनः ॥ ११ ॥

(गंगास्तोत्रं, आदी शंकराचार्य विरचित)

(सारांश: हे गंगे, तुझ्या काठचा मी कासव असलेलं मला चालेल, तुझ्या पाण्यातला मासा बनलेलं मला चालेल किंव्हा तुझ्या काठी साधारण आणि क्षीण सरड्याचे अस्तित्व सुद्धा मला चालेल. तुझ्या काठी एखाद्या दीन, हीन  कुळातील व्यक्ती म्हणून माझा जन्म झालेला चालेल पण तुझ्या काठापासून दूर कुठल्या राज्याच्या राजपद सुद्धा मला नको.)  

मी काही अंतर चालत जाऊन 'बुडू, बुडू गंगे' म्हणत तीन बुड्या मारून स्नान केले. पाणी गार, आल्हादायक होते. तिसऱ्या बुडी नंतर मला एकदम शांत आणि प्रसन्न वाटायला लागले. आजूबाजूचा कोलाहल कमी ऐकू येऊ लागला. मनातला कोलाहल हि कमी कमी झाला. स्वतःचे श्वास ऐकू येऊ लागले. मगाशी दिसलेल्या बाई सारख मी पण गंगेशी गप्पा मारू शकत नाहीं या उणिवेची जाणीव झाली. भक्तीत एवढा ठामपणा नाहीं. एवढी शक्ती नाहीं. पण गंगेला त्याचे काही नाहीं. तिने तेवढ्याच प्रेमानें मला कवटाळले होते.  

मनोहरोत्तुङ्गचलत्तरङ्गा गङ्गा ममाङ्गान्यमलीकरोतु || ५२|| 

(गंगा लहरी, जगन्नाथ पंडितराज)

राजा भगीरथाने हजारो वर्षांपूर्वी गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आणली अशी गोष्ट आहे. गंगा स्वर्गातून आली कि नाहीं हा आस्थेचा प्रश्न आहे पण हजारो वर्ष स्वर्गातल्या अमृताचे काम गंगा अविरत करीत आहे. आपली संस्कृतीला जन्म देणारी आणि आपण मृत्यूनंतर मोक्ष प्रदान करण्याची क्षमता असलेली गंगा, आपल्या सनातन धर्माची केंद्रबिंदू आहे.

रोगं शोकं तापं पापं हर मे भगवति कुमतिकलापम् ।

त्रिभुवनसारे वसुधाहारे त्वमसि गतिर्मम खलु संसारे ॥ ९ ॥

(गंगास्तोत्रं, आदी शंकराचार्य विरचित)

मृत्यूसमयी गंगेचे दोन थेंब प्राशनास देतात तर मृत्यूनंतर अस्थी विसर्जनही गंगेतचकरतात. काशीला, मनकर्णिका घाटावर तर मृत्यूसुद्धा गंगेकिनारी व्हावा यासाठी ताटकळत असतात. अश्या या गंगामाईच्या धारेत मी न्हात होतो. अविस्मरमणीय, अलौकिक आणि शब्दात पकडण्यासाठी अशक्य असा हा अनुभव होता. माझ्या सारखे करोडो लोक जीवाची पराकाष्ठा करून प्रयागराज ला येत होते. बाहेरून बघता करोडो लोकांची गर्दी दिसत असेल पण त्या गर्दीत, गंगेत उभे असतांना फक्त तुम्ही आणि गंगेचे खळखळते पाणी. या अत्यंत वैयक्तिक अनुभवासाठी जनसमुदाय लोटत होता. लहान-मोठे, स्त्री-पुरुष, तरणे-ताठे, गरीब-श्रीमंत, हेलिकॉप्टर-विमानाने, ट्रेन, घोडे-गाड्यांनी, आणि शेवटी तर पायी, पण गंगेकिनारी पोचत होते. कारण गंगेसाठी सगळे सारखेच. मला मोक्षासाठी मध्यस्थीची आणि मध्यस्थांची आवश्यकता नाहीं, माझ्या मोक्षाची जवाबदारी माझीच आणि त्यासाठी गंगा मदतीस धावत येणार हि भावना अगदी तळा-गाळापर्यंत रुजली आहे. त्यामुळे कुठल्याही निमंत्रणाशिवाय पन्नास  करोड लोक महाकुंभला आलेत. अश्या भूमीत, धर्मात आणि संस्कृतीत जन्म मिळाला हे अहोभाग्यच. 

स्नान करून आम्ही लगेच प्रयागराज सोडले. आपली संख्या कमी करून, येणाऱ्या लाखों साठी थोडी जागा केली. थोडीशीच. तेवढेच खारीचे योगदान. 

प्रयागराजचा ११०० कि.मी चा कार चा प्रवास करण्यात बरीच दगदग झाली होती आणि परतीचा प्रवास शिल्लक होता पण मन प्रसन्न होते. संगम स्नान, गंगास्नान झालेच पण अखिल भारतीय समाजाचे दर्शन झाले. मी नवव्या इयत्तेत असतांना NCC तर्फे आसाम ला जायची संधी मिळाली होती. ट्रेन मधून चार दिवस प्रवास करतांना भारताचे जे दर्शन झाले त्याचे पडसाद आणि त्याचे प्रतिसाद २८ वर्षे झालीत पण माझ्या मनात आणि माझ्या व्यक्तिमत्वावर अजूनही आहेत. यंदाचे दर्शन फार वेगळे होते. भारत बदलला आहे. आता देश प्रगतीच्या ठाम मार्गावर वेगाने पुढे जातोय. या प्रवासाची, समाज दर्शनाची,  या अनुभवाची अवीट गोडी उरलेला जन्मभर राहील एवढे नक्की.  

2/3/25

थोरले बाजीराव आणि 'मल्हारी'


नवीन वर्षाच्या स्वागताची पार्टी चालू होती. सगळीकडे आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण होते. गाणी जोरजोरात वाजत होती. आम्ही आमच्या मित्रांच्या घरी मजा करीत होतो. आता नाचायचे म्हंटले कि एकूण धांगड-धिंगा वाली गाणीच लागणार. वाद्ये, आवाज, नृत्य सगळे एकदम भन्नाट हवे. तशीच गाणी वाजत होती. तेवढ्यात 'बाजीराव-मस्तानी' या सन २०१५ सालच्या हिंदी चित्रपटातील 'मल्हारी' हे गाणे लागले. समोर टी.व्ही. वर चित्रपटातील थोरल्या बाजीरावांची भूमिका वठवीत रणवीर सिंग जोरजोरात नाचत होता. उत्तम नट आणि उत्तम नृत्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रणवीर सिंग याने या गाण्यात अतिशय उत्तम नाच केला आहे. गाण्याची चाल हि कर्णवेधक आहे. हिंदी चित्रपटात गेल्या काही दशकात विषय काही हि असो पण एक धांगड-धिंगा वाले  गाणे असतेच. निर्मात्यांचा मत असे कि काही नाहीं तर हे गाणे बघायला लोक येतील. यात किती तथ्य आहे खुद्द निर्माता आणि देव जाणो पण साधारण या गाण्यांमध्ये तुरळक वस्त्रात नट्या असतात. आपण मराठी लोकांचे नशीब खरे कि निदान 'मल्हारी' गाण्यात असे चित्त-चक्षु 'चमत्कार' नव्हते. आणि मुख्य भूमिकेतील नटच नृत्य करीत होते. 

मी हा चित्रपट बघितला नाहीं. चित्रपट परीक्षण हा या लेखाचा उद्देश्य नाहीं. चित्रपटाचे विविध आढावे वाचलेत किंव्हा ज्यांनी चित्रपट बघितला आहे त्यांच्याशी बोललो तर चित्रपट चांगला आहे अशीच साधारण प्रतिक्रिया मिळाली आहे. पण तरी 'मल्हारी' गाणे बघून काहीतरी चुकल्यासारखे झाले. थोडे वाईट वाटले. थोरले बाजीराव हे काय व्यक्तिमत्व होते, त्यांचा अतुलनीय पराक्रम, अचाट कर्तृत्व, त्यांचा दरारा, त्यांचा अख्ख्या हिंदुस्तानात दबदबा याचा सगळा विचार केला तर छत्रपती शिवाजींचा जणू वारसा लाभलेला आणि त्यांच्या नंतर मराठा साम्राज्याचा अजिंक्यतारा, अश्या तऱ्हेचे हेंगडे-फेंगडे नृत्य त्याच्या सैनिकांसोबत करीत असेल हि कल्पना करवीत नाहीं. थोरले बाजीराव हे नुसते सेनापती नक्कीच नव्हते. त्यांची पथके त्यांच्या निवडक सैनिकांची होती. त्यांच्या स्वाऱ्या म्हणजे कासवाचे पाठीवरचे घर असे. अगदी निवडक तंबू आणि बाकी सैन्य उघड्यावरच असे, कारण एकदम आवरून निघायचे तर १०-२० हजार सैनी जलद गतीने निघू शकत. थोडक्यात थोरले बाजीराव आणि त्यांच्या सैनिकांची जवळीक असणार पण म्हणून 'मल्हारी मल्हारी' गात ते त्यांच्या सोबत उड्या  मारीत नसणार.

                                     

सन १७३७-३८ च्या त्यांच्या दिल्लीच्या मोहिमेत त्यांनी थेट दिल्लीच्या पालिका बाजारात मुक्काम केला होता. दिल्लीत धावपळ उडाली. दिल्लीच्या कट-पुतळी बादशहाची पूर्णपणे सटारली. त्याच्याकडे न सैन्य होते ना त्याने कधी म्यानातून तलवार बाहेर काढली होती. आणि जरी त्याच्या बाहुत थोडा दम जरी असला तरी समोर बाजीराव! त्याने आपले मंत्री-संत्री पाठवून थोरल्या बाजीरावांचे स्वागत केले. काय हवे त्याची विचारपूस केली. सैन्य सुद्धा जमविण्याचा प्रयत्न केला पण थोरल्या बाजीरावाशी लढण्याची उत्सुकता कोणी दाखविली नाहीं. थोरल्या बाजीरावांनी तिथून सातारच्या छत्रपती शाहूमहाराजांना संदेश पाठवला कि त्यांचा हुकूम असेल तर ते स्वतः दिल्लीचे तख्त मोडतील आणि मग छत्रपती शाहूमहाराज संपूर्ण भारताचे छत्रपती म्हणून आरोहण करू शकतात. आता शोकांतिका वेगळी कि छत्रपती शाहूमहाराजांनी याला संमती दिली नाहीं आणि तख्त तोडायलाही परवानगी दिली नाहीं. पण थोरल्या बाजीरावांच्या जीवनातील हि एक घटना त्यांच्या आत्मविश्वास आणि त्यांची मर्दूमुकी दर्शविते. त्यांच्या जीवनातात अश्या असंख्य घटना आहेत. वीस वर्षात अर्ध्याहून जास्त भारत पादाक्रांत करून जिंकणे काय सोपे आहे का? 
--
हिंदी सिनेमामध्ये काही प्रसंग दाखवावेच लागतात. जुन्या काळात एक मुसलमान पात्र हवेच आणि ते मुसलमान पात्र सगळ्यात प्रामाणिकच दाखवायला हवे. नंतरच्या काळात हेंगडे-फेंगडे नाचणारी एक नटी हवी आणि ती नटी फक्त नाचासाठी असे. सिनेमाची प्रमुख भूमिका करणारी नटी वेगळीच. गेल्या काही वर्षातील नवीन कल म्हणजे प्रमुख भूमिकेतील नटच जोरदार नृत्य सादर करतात. या गाण्याचा कथानकाशी संबंध नसतो पण गाणे दृक-श्राव्य असते आणि त्या गाण्याला घेऊन चित्रपटाची जाहिरात केली जाते. अपेक्षा अशी कि सगळ्या घरांमध्ये, फोने वर, पार्ट्या आणि कल्ब्समध्ये हे गाणे वाजेल आणि चित्रपट चालायला हातभार लागेल. आता हा नियम बहुतांश सगळ्या चित्रपटांना लागू होत असेल तर थोरल्या बाजीरावांच्या चरित्रात्मक चित्रपटावरही लागू होणारच. विषय जिव्हाळ्याचा असला, चित्रपटाच्या नायकाबद्दल अपार आदर असला तरी शेवटी चित्रपट आजच्या जमान्यातील आहे आणि चित्रपट चालणे आवश्यक आहे. मग त्यासाठी 'मल्हारी' आपण सहन करायचा. हिंदी चित्रपटातील पैसे, सेट्स आणि इतर गोष्टी, ज्याने चित्रपट भव्य-दिव्य होतो त्या गोष्टी मराठी चित्रपटात आणणे कठीण आहे. आणि दुसरे म्हणजे हिंदी चित्रपट ६०-७०% भारतात बघितल्या जाऊ शकतो. म्हणजे थोरल्या बाजीरावांची ओळख पुन्हा बहुतांश भारताला होईल. येन-तेन कारणेंन, आजच्या काळात थोरल्या बाजीरावांची गाथा गाणे आवश्यक आहे. 

आता एखादं-दुसरे गाणे सहन करायचे कि अजूनही काही सहन करायचे? श्री गोवारीकर यांने अकबरावर चित्रपट काढला आणि अकबराला ह्रितिक रोशन सारखे सुंदर दाखविले (तेंव्हा काढलेल्या चित्रांवरून तरी अकबर किंव्हा कुठलाही मोघल इतका सुंदर असेल असे वाटत नाहीं) आणि जोधाला, त्याची प्रियकर दाखविले. सत्य परिस्थिती हि होती कि आपले राज्य टिकवायला, एक करार म्हणून जयपूरच्या मानसिंगाने आपली बहीण अकबराला दिली. अकबराच्या हारेम मध्ये शेकडो बायका होत्या, त्यात अजून एक जोधा दाखल झाली. दीडशे वर्षांनी जेंव्हा औरंझेब दख्खनी कफल्लक होऊन मेला तेंव्हा जयपूरच्या तेंव्हाच्या राजाने दिल्ली ला दौड मारली आणि तिथल्या राजपूत बायकांना सोडवून पुन्हा जयपुरी घेऊन आला. आणि त्यानंतर त्या घराण्याची कुठली स्त्री पुन्हा मोघलांकडे गेली नाहीं. तसेच हरियाणाच्या जाट राजाने सन १६८८ ला अकबराला जेथे दफनवले आहे तेथे हल्ला करून त्याची कबर खोदली. अकबराची हाडे काढून जाळलीत. अकबर हा 'the great ' कधीच नव्हता पण श्री गोवारीकरांनी त्या इस्लामी आक्रमकाचे उद्दात्तीकरण केलेला चित्रपटही सहन करायचा का? मला माहिती नाहीं. पण चित्रपटाच्या निमित्ताने झालेला वादामुळे अकबराला किंव्हा मोघलांच्या उद्दात्तीकरणाला आळा बसायला सुरुवात झाली. 
--
हा लेख लिहितांनाच संभाजी महाराजांच्या जीवनावर आधार 'छावा' चित्रपटाचे ट्रेलर प्रकाशित झाले. त्यात स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना लेझीम खेळतांनाचे दृश्य आहे. ते बघून मन विचलित झाले. शंभू राजे, जे पाच-पाच शत्रूंना छातीवर घेऊन ९ वर्षे अखंड लढत होते त्यांना नृत्य करतांना दाखवायची खरंच मुळीच आवश्यकता नाहीं. पण हे दृश्य वगळता, चित्रपटाचे ट्रेलर बघून अंगावर काटा आला. प्रमुख भूमिकेतील विक्की कौशल यांनी छत्रपतींची भूमिका अप्रतिम निभावल्याचे दिसते. 'पार्वती पतये नमः, हर हर महादेव' हि गर्जना संभाजी महाराज करतानांचे दृश्य बघून रोम-रोमात स्फूर्ती येते. आणि आता छत्रपती संभाजी महाराजांची ओळख भारताला होणार आणि मोघली औरंग्याच्या खरा (घाणेरडा) चेहरा पुन्हा दिसणारा याचे समाधान वाटते. 

पण चित्रपटाच्या दिग्दर्शकांना मनापासून विनंती- लेझीम-बिझीम वाला सीन कापा. गरज नाहीं.  

1/13/25

श्रीकृष्ण विराट रूप दर्शन

श्रीकृष्णाचा विराटरुपाचे महाभारताच्या उद्योग पर्वात वर्णन केले आहे. उद्योग पर्वात अनेक उप-पर्व आहेत. त्यात भागवतयान पर्वात श्रीकृष्ण विराटरूप दर्शवितो. श्रीकृष्ण शिष्टचारासाठी कुरुसभेत पांडवांचा प्रतिनिधी म्हणून जातो. हा शिष्टाचार, ज्याला आपण इंग्रजीत 'डिप्लोमसी' असे म्हणतो, म्हटले तर सरळ होता आणि म्हटले तर क्लिष्ट होता. कृष्णाने या विषयावर पांडवांसोबत बरीच चर्चा केली. कृष्णाने प्रत्येक पांडवाचे मत घेतले, द्रौपदीचे मत घेतले, त्यांच्या गटातील थोर-मोठ्यांचे मत घेतले. हे सर्व संवाद उद्योग पर्वात टिपलेले आहेत. युधिष्टिराचे विचार किंव्हा अर्जुनाचे विचार विस्तृत प्रस्तुत केले आहेत. भीमाला भीमसेन असे संबोधिले आहे आणि त्यानेसुद्धा आपले मत प्रदर्शन विस्तृतपणे केले आहे. पुढे नकुल आणि सहदेव पण बोलले आहेत. अर्थात, कृष्णाचा कल शांतिप्रस्तावाकडेच होता. आणि विचार-विनिमयाद्वारे त्याने सगळ्यांना शांतिप्रस्तावाकडेच वळविले. 

कुशस्ठलं वृकस्ठलमासम्दी वारणावतं ।

अवसानं च गोविंद किं चिदेवात्र पंचमं  ॥

शेवटी युधिष्ठिर कृष्णाला म्हणाला कि गोविंदा, कुशस्थलम, वृकस्थलम, मसंडी, वारणव्रतम आणि अजून एखादे मिळून पाच गावे मिळालित तरी आम्ही ती आनंदाने घेऊ. हाच प्रस्ताव पुढे कृष्ण हस्तिनापूर सभेत धृतराष्ट्रा समोर ठेवतो.   

कृष्ण नीती शब्द बऱ्याचदा वापरल्या जातो. कृष्ण फार हुशार होता, दूरदृष्टा  होता हे जेवढे खरे तेवढेच हे पण खरे कि त्याने एकट्याने व एकट्यासाठी कधीच कुठले पाऊल उचलले नाहीं. नेहमी सगळ्यांसाठी आणि सगळ्यांसोबत तो राहिला आणि सगळ्यांना घेऊन पावले उचलली. 

कृते मंत्रप्रयोगें, त्रेतायाम तंत्रसाधने, 

द्वापरे व्यूहरचने शक्ती, संघे कलौ युगे।

वरील श्लोकाचा अर्थ असा कि कृत युगात मंत्रांना शक्ती होती, त्रेता युगात तंत्रांना शक्ती होती, द्वापार युगात (म्हणजे महाभारत युगात) व्यूह रचनेला शक्ती होती तर कली युगात संघटनेला, एकीला, समुदायाला शक्ती असेल. (हा श्लोक महाभारतातील नाहीं) थोडक्यात असे म्हणायला हरकत नाहीं कि जरी कृष्ण व्यूह रचत असला तरी येणाऱ्या कली युगात काय आवश्यक आहे याची गुरुकिल्ली तो आपल्याला देत होता. (युधिष्टिराच्या राज्यारोहणानंतर ३६ वर्षांनी कली युग सुरु झाले) 

पांडवांच्या तंबूत विचारविनिमय आटपून शांतिदूत म्हणून श्रीकृष्ण जेंव्हा हस्तिनापुरात दाखल झाला तेंव्हा हस्तिनापुरातील थोर-मोठ्यांमध्ये बरीच धांदल उडाली. त्याचे येणे अपेक्षितच होते पण तरी त्याची दिव्यता, त्याची गूढता, त्याच्यावरची श्रद्धा याचे मिश्रण सामान्य नागरिकांमध्ये असणार तर कृष्णाबद्दलचा आदर, त्याची भीती,आणि त्याच्या द्वेष या सगळ्याचे मिश्रण कुरुसभेत दिसून येते. विदुर आणि भीष्म कृष्णाच्या दिव्यतेत आणि भक्तीत  नहात होते तर शकुनी बहुधा भीतीत आणि दुर्योधन द्वेषात. 

अग्रतो वासुदेवस्य कर्णदुर्योधनावुभौ  ।

वृष्णयः कृतवर्माच आसन्कृष्णस्य पृष्ठतः ॥

अर्थात - वासुदेवाच्या पुढे कारण आणि दुर्योधन चालत होते तर वासुदेवाच्या मागे कृतवर्मा आणि वृष्णी (सात्यकी) चालत होते. पण एकूण हस्तिनापुर नगरीत फार उत्सुकता होते श्री कृष्णाच्या आगमनाने.  महर्षी व्यास लिहितात:

अद्भुतं महदाश्चर्यं श्रूयते कुरुनंदन 

स्त्रीयो बालाश्च वृद्धाश्च कथयान्ति गृहे गृहे।। (अध्याय ८३, ००३) 

कृष्णाच्या हस्तिनापूर सभेतील शांतिप्रस्ताव हा प्रसंग अद्भुत आहे. बी. आर. चोप्रा यांचे सुप्रसिद्ध महाभारत बघितले (८०च्या दशकातील) तर हि घटना एका तासात होते. कारण मुख्य पात्रे या प्रसंगात बोललेली दाखवली आहेत. मूळ महाभारत वाचलेत तर मुख्य पात्रे या प्रसंगी  नक्कीच बोलतात पण यात अजून भरपूर गोष्टी घडतात. बरेच लोक बोलतात, वाद होतात. सभेच्या सुरुवातीला धृतराष्ट्र सभा संबोधितो मग विदुर बोलतो. आणि मग दुर्योधन सभेस आणि कृष्णाला संबोधितो. सगळे कृष्णाची स्तुतीच करतात. अगदी दुर्योधनही कृष्णासाठी स्तुतीपर शब्द बोलतो.  

स हि पूज्यतमो देव: कृष्ण: कमललोचनं।

त्रयणामपी लोकानां विदितां मम् सर्वथा।। (अध्याय ०८६, ००५)     

मग पुढल्या बऱ्याच उप-पर्वात कुरुसभेत भरपूर लोक या प्रस्तावावर मत-प्रदर्शन करितात. सभेत नारद ऋषी, कण्व ऋषी आणि राम नावाचे अजून एक ऋषी आपल्या दृष्टीने शांतीचा संदेश धृतराष्ट्र आणि दुर्योधनास देतात. राम ऋषी एक गोष्ट दुर्योधनास सांगतात ज्याचा सारांश असा कि दुर्योधनाने दंभ सोडून जे धर्म सांगतो ते करावे अन्यथा त्याची परिणीती सर्वनाशात होईल. पुढे गालव ऋषिंचाही संवाद आहे. गालव ऋषी हे विश्वामित्रांचे शिष्य. हे एकदम कुठुन अवतरले मला नेमके उमजले नाहीं. माझा संस्कृत चा अभ्यास एवढा नाहीं. विदुर, भीष्मपितामह, द्रोण आणि गांधारी आणि कुंती पण शांती प्रस्ताव मान्य करायचा आग्रह धरतात. पण दुर्योधनाने ठरवले होते कि तो सुईच्या टोकावर मावेल एवढीही जागा पांडवांना देणार नाहीं. 

महाभारतातील प्रत्येक प्रसंग विविधरंगी आहे. त्यात शिकण्यासारखे बरेच आहे. संपूर्ण सभेत एकाच व्यक्तीने युद्धाचा निर्णय घेतला होता त्यामुळे युद्ध होणारच होते हि घटना संघटनेतील जवाबदारीच्या पदावरच्या अधिकाऱ्यांनी आपल्या जवाबदाऱ्या सोडल्यात कि काय होते याचे ज्वलंत उदाहरण आहे. भीष्म, द्रोण, विदुर किंव्हा कृपाचार्यांची निष्ठा राजाला होती, राज्याला नाहीं. आणि धृतराष्ट्राची  सुद्धा निष्ठा त्यांच्या पुत्रासाठी होती, राज्यासाठी नाहीं. थोडक्यात राज्यकर्ते राज्यासाठी तत्पर नव्हते त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम राज्याला भोगावे लागणारच होते. श्री कृष्ण हे जाणून असतो आणि केवळ त्यालाच हे दिसत असते असे नाहीं हे सभेत झालेल्या संवादावरून, वाद-विवादांवरून  दिसते पण म्हणूनच हा नर-संहार थांबवायला श्रीकृष्ण अतोनात प्रयत्न करितो. कृष्णाचा पूर्ण जन्म लोकांना अपेक्षित धर्मपथावर चालविण्याच्या खटाटोपात गेला पण दुर्योधन असो कि धृतराष्ट्र, किंव्हा मग तो कर्ण असो, त्याच्या हाती अपयशच आले. कुरुसभेतही तो धर्माबद्दल बोलला, अपेक्षित जवाबदाऱयांबद्दल बोलला पण ते सगळे उलट्या घड्यावर पाणी ठरले. 

शेवटी काही कमी असेल तर दुर्योधनाने स्वतःच्या अपार बुद्धिमत्तेची पावती देत कृष्णास बंदी बनवण्याचा निर्णय घेतला. तो कृष्ण होता ते पुढे पण सर्वप्रथम तो एक शांतिदूत होता, त्यामुळे त्याला बंदी करणे अधर्म होता. एका शांतिदूताला आणि शांतिदूत म्हणून आलेल्या कृष्णाला बंदी बनवण्याचा निर्णय घेऊन दुर्योधनाने आपल्या रक्तरंजित भविष्याकडे पाऊले उचलली होती. दुर्योधनाचा हा क्रोध आणि त्यांनी मांडलेली चेष्टा बघून धृतराष्ट्राने सुद्धा त्याचा अक्षरशः धिक्कार केला आणि त्याला समजविण्याचा अतोनात प्रयत्न केला. विदुर आणि गांधारी सुद्धा दुर्योधनावर रागावले आणि त्याला कृष्णाची महिती दर्शवून घाबरविण्याचा प्रयत्न केला. 

प्रधर्षयन्महाबाहुं क्रुष्णमक्लिष्टकारीणम|

पतंगाग्नीवसाद्या सामात्यो ना भविष्यसि|| अध्याय १२८, ५२||

अर्थात, या उत्तम कार्य करणाऱ्या महाबाहू कृष्णाचा तू अपमान केलास तर पतंग जसे आगीत पडून नाहीसे होतात तसेच तू आणि तुझे मंत्री मंडळ सुद्धा भविष्यातून नाहीसे होतील.  

पण दुर्योधन हा केवळ युवराज होता, राजा नाहीं. हे लक्षात घेता त्याने दिलेल्या आदेशाला काडीमात्र महत्व नको. पण सत्य परिस्थिती अर्थातच वेगळी होती आणि राजा काय आणि युवराज काय, सभा दुर्योधनच चालवीत होता आणि त्याचा प्रत्यय त्याने द्रौपदी वस्त्रहरण करून दिलाच होता. 

अश्या परिस्थितीत कृष्णाने आपले विराटरूप धारण करण्याचा निर्णय घेतला. 

एकोहमिति यन्मोहान्मन्यसे मां सुयोधना|

परिभूय च दुर्बुद्धे ग्रहीतुं मां चिकिर्षसी || (अध्याय १२९, ०२)

अर्थात, अरे मूर्ख सुयोधना (कृष्ण त्यास सुयोधन म्हणतॊ, दुर्योधन नाहीं), तुला वाटते आहे कि मी येथे एकटा आलो आहे म्हणून तू मला बंदी बनविण्याची स्वप्ने बघतो आहेस. 

इहैव पांडवा: सर्वै तथैवान्धकवृष्ण्य:|

इहादित्याश्च रुद्राश्च वसवश्च महर्षीभी:|| (अध्याय १२९, ०३) 

अर्थात, पण तुला माहिती नाहीं या कि सगळे पांडव, अंधक आणि वृष्णी इथेच आहेत. आणि आदित्य, रुद्र, वसावा आणि महर्षी सुद्धा येथेच आहेत. 

आणि असे म्हणून श्रीकृष्णाने हास्याचा गडगडाट केला आणि विराटरूप धारण करू लागला. त्याच्या कांतीतून ब्रह्मादिक देव दिसू लागले, त्याच्या आगीच्या जणू ठिणग्या बाहेर पडू लागल्या. त्याच्या कपाळावर ब्रह्मदेव व वक्षस्थळी रुद्र दिसू लागले.  

कृष्णाचे रूप आता हळू हळू अधिकाधिक भीतीदायक होऊ लागले. हे रूप म्हणजे शक्तिप्रदर्शन होते. पण हि दैवी शक्तीचे नाहीं,  हे भौतिक शक्ती प्रदर्शन होते. आणि श्रीकृष्णाचे वैयक्तिक शक्ती आणि कौरवांना लौकरच रणांगणात दिसणाऱ्या धार्मिक शक्तीचे प्रदर्शन होते. 

प्रदूरास्ताम तथा दोभ्यांर्याम सङ्कर्शण् धनञ्जय। 

दक्षिणेथार्जुनो धन्वी हली रामश्च सव्यत।। ( अध्याय १२९, ००७) 

भीमो युधिष्ठिरश्चैव मद्रिपुत्रौ च पृष्ठ। 

अन्धका वृष्णयश्चैव प्रदुम्नमुखास्तत।।  (अध्याय १२९, ००८) 

श्रीकृष्णाच्या दोन्ही हातातून बलदेव आणि अर्जुन प्रकट झालेत. अर्जुन त्याच्या धंयश्यासोबत श्रीकृष्णाच्या उजव्या हाताला तर बलदेव (बलराम) डाव्या हाताला होता (००७). युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव श्रीकृष्णाच्या पाठीशी तर अंधक, वृष्णी, प्रद्युमन इत्यादी त्याच्या समोर उभे ठाकलेले दिसले. (००८) 

पुढे त्याचे रूप अक्राळ-विक्राळ होऊ लागले. त्याच्या हजार हातात अनेकविधी शस्त्रे उत्पन्न झालीत. त्याच्या नासिक आणि कानातून आगीच्या ज्वाळा येऊ लागल्यात आणि श्रीकृष्णाच्या रोमरोमातून सूर्यकिरणे प्रकट होऊ लागलीत. सभेतील सगळे रथी-महारथी गांगरून गेलेत आणि घाबरून त्यांनी सगळ्यांनी डोळे मिटून घेतलेत. फक्त, द्रोण, भीष्मपितामह, विदुर, संजय आणि उपस्थिती तपस्वी ऋषींना मात्र विराटरूपाचे दर्शन घेता आले. कारण त्यांना श्रीकृष्णाने दिव्य-दृष्टी दिली होती. 

असे महाकाय रूप धारण करून पुढे श्रीकृष्णाने सभा सोडली. त्याचा रथ त्याची वाट बघत होता आणि त्यावर आरोहण करून तो त्याच्या आत्या-कुंती कडे निघून गेला. 

विराटरूपात श्रीकृष्णाला दुर्योधनाला त्याची क्षुल्लुकता तर दाखवायची होतीच पण त्याला घाबरवायचे पण होते.  'तू मला बंदी करणार? आणि करायचे असले तर कसे करणार?' आणि नुसते दुर्योधनच नव्हे तर समस्त कौरव आणि कुरुसभेला त्याला दर्शवायचे होते कि युद्ध निरर्थक आणि आत्मघातकी आहे. पण 'विनाशाय विपरीतबुद्धी' हेच खरे. 

---

या लेखाची सुरुवात श्री रामधारी सिंग 'दिनकर' यांच्या 'रश्मीरथी' महाकाव्याच्या वाचनाने झाली. 'दिनकर' हे हिंदी कविसृष्टीतील आणि साहित्यसृष्टीतील 'महारथी' मानल्या जातात. त्यांनी कर्णावर रश्मीरथी हे काव्य लिहिले. हिंदीतील हे काव्य वाचायला सोपे आहे पण अर्थपूर्ण आहे. कर्णाचा जन्म, त्याची अगातिकता, त्याची निष्ठा, त्याची भ्रमित मनस्थिती, त्याच्या जीवाची घालमेल आणि शेवटी त्याने समजून-उमजून निवडलेला अधर्माचा मार्ग हे सगळे अतिशय सुरेल आणि सुरेखपणे श्री दिनकर यांने मांडिले आहे. त्यातील विराटरूपाचे वर्णन फार रोचक आहे. माझी मूळ कल्पना अशी होती कि संस्कृत मधील मूळ महाभारतातील श्लोक उद्धृत करायचे आणि मग श्री दिनकर यांची कविता प्रस्तुत करायची. पण कुठले पर्व, कुठले उप-पर्व आणि मग नेमके कुठले श्लोक यांच्या संशोधनात श्री दिनकर यांच्या कवितेची पाळी येईतोवर हजारहुन अधिक शब्द लागलेत. असो. वाचकांनी इथपर्यंत वेळ काढली असेल तर मी मनापासून विनंती करतो कि रश्मीरथीतील खाली उद्धृत केलेले विराटरूपाचे वर्णन अवश्य वाचावे. वेळ घेऊन वाचावे, घाई करू नये. लागेल तर टप्प्या-टप्प्यात वाचावे. 

मैत्री की राय बताने को, 

सबको सुमार्ग पर लाने को, 

दुर्योधन को समझाने को, 

भीषण विध्वंस बचने को, 

           भगवान हस्तिनापुर आये,

           पांडव का संदेसा लाये| 

"दो न्याय अगर, तो आधा दो, 

पर, इसमें भी यदि बाधा हो, 

तो दे दो केवल पांच ग्राम, 

रक्खो अपनी धरती तमाम |    

          हम वही ख़ुशी से खाएंगे, 

          परिजन पर ऐसी न उठाएंगे|" 

दुर्योधन वह भी दे न सका, 

आशिष समाज की ले न सका, 

उलटे, हरी को बांधने चला, 

जो था असाध्य, साधने चला | 

           जब नाश मनुज पर छाता है, 

           पहले विवेक मर जाता है| 

हरि  ने भीषण हुंकार किया, 

अपना स्वरूप-विस्तार किया, 

डगमग -डगमग दिग्गज डोले, 

भगवान् कुपित होकर बोले - 

            "जंजीर बढ़ा कर साध मुझे, 

             हाँ -हाँ, दुर्योधन! बाँध मुझे |"

"यह देख, गगन मुझमे लय है, 

यह देख, पवन मुझमे लय है, 

मुझमे विलीन झंकार सकल, 

मुझमे लय  है संसार सकल|   

          अमरत्व फूलता है मुझमे, 

          संहार झूलता है मुझमे| 

"उदयाचल मेरा दीप्त भाल, 

भूमण्डल वक्षस्थल विशाल, 

भुज परिधि-बांध को घेरे है, 

मैनाक-मेरु पग मेरे है| 

           दिपते जो गृह-नक्षत्र-निकर, 

           सब है मेरे मुख के अंदर| 

"दृग हो तो दृश्य अकाण्ड देख, 

मुझमे सारा ब्रह्माण्ड देख, 

चर-अचर जीव, जग क्षर-अक्षर, 

नश्वर मनुष्य, सुरजाति अमर, 

         शत कोटि सूर्य, शत कोटि चंद्र, 

         शत कोटि सरित, सर, सिंधु, मन्द्र;

"शत कोटि विष्णु, ब्रह्मा, महेश, 

शत  कोटि जिष्णु, जलपति धनेश, 

शत कोटि रूद्र, शत कोटि काल, 

शत कोटि दण्डधर लोकपाल| 

        जंजीर बढ़ाकर साध इन्हे, 

        हाँ-हाँ, दुर्योधन! बाँध इन्हे| 

"भूलोक, अटल पाताल देख, 

गत  और अनागत काल देख, 

यह देख, जगत का आदि-सृजन , 

यह देख, महाभारत का रण;

       मृतकों से पति हुई भू है, 

       पहचान, कहाँ इसमें तू है 

"अम्बर में कुंतल-जाल देख, 

पद के नीचे पाताल  देख,

मुट्ठी में तीनो काल देख, 

मेरा स्वरूप विकराल देख| 

        सब जन्म मुझि से पाते है, 

        फिर लौट मुझि में आते है| 

"जिम्वा से कढती ज्वाल सघन, 

साँसों में पाटा जन्म पवन, 

पद जाती मेरी दृष्टी जिधर, 

हँसाने लगाती है सृष्टि उधर| 

          मै जभी मूँदता हूँ लोचन, 

          छा जाता चारो और मरण| 

"बांधने मुझे तो आया है, 

जंजीर बड़ी क्या लाया है?

यदि मुझे बांधना चाहे मन, 

पहले तो बाँध अनंत गगन| 

          सूने को साध न सकता है, 

          वह मुझे बाँध कब सकता है?

"हित - वचन नहीं तूने माना, 

मैत्री का मूल्य न पहचाना, 

तो ले, मै भी अब जाता हूँ, 

अंतिम संकल्प सुनाता हूँ| 

           याचना नहीं, अब रण होगा, 

          जीवन -जय या कि मरण होगा| 

"टकरायेंगे नक्षत्र-निकर, 

बरसेगी भू पर वन्ही प्रखर, 

फण शेषनाग का डोलेगा, 

विकराल काल मुँह खोलेगा| 

              दुर्योधन! रण ऐसा होगा, 

              फिर कभी नहीं जैसा होगा| 

"भाई पर भाई टूटेंगे, 

विष-बाण बून्द-से छूटेंगे, 

वायस-शृगाल सुख लूटेंगे, 

सौभाग्य मनुज के फूटेंगे | 

             आखिर तू भूशायी होगा, 

             हिंसा का पर, दायी होगा|" 

थी सभा सन्न, सब लोग डरे, 

कप ते या थे बेहोश पड़े| 

केवल दो नर न अघाते थे, 

धृतराष्ट्र-विदुर सुख पाते थे|   

            कर जोड़ खड़े प्रमुदित, निर्भय, 

            दोनों पुकारते थे 'जय-जय!'

--

१) मी श्री रामस्वरूप शर्मा, मुरादाबाद, यांचे मूळ संस्कृत महाभारताचे हिंदीत भाषांतर विषयाभ्यासाठी वापरले आहे. हे जवळ-जवळ शंभर वर्षांपूर्वी सनातनधर्म प्रेस, मुरादाबाद यांनी प्रकाशित केले होते. याची लिंक अशी: 

https://dn790007.ca.archive.org/0/items/in.ernet.dli.2015.540928/2015.540928.Mahabharat-Udyog.pdf 

२) कुरुसभेतील प्रसंगाचे चित्र हे मूळ श्री राजा रवी वर्मा यांचे आहे. माझ्यामते हे सध्या नेपिअर संग्रहालय, त्रिवेंद्रम मध्ये स्थित आहे. मी कुणाच्याही अनुमतीविना हे चित्र येथे वापरले आहे. पण सर्व हक्क संग्रहालय किंव्हा श्री राजा रवी वर्मा यांचे आहेत. 

12/23/24

'Bird By Bird


परदेशी आणि परभाषिक भाषेतील प्रसिद्ध पुस्तकांच्या आढावा घेण्याच्या या मालिकेत दुसरे पुस्तक म्हणजे 'बर्ड बाय बर्ड' ('Bird By Bird ') हे  ऍन लमोट (Ann Lamott ) यांचे पुस्तक आहे. मागल्या लेखात आपण प्रसिद्ध भारतीय लघुकथेचें भाषांतर केलेल्या पुस्तकाचा आढावा घेतला. यंदाचे पुस्तक आणि त्याचा विषय थोडा वेगळा आहे. एक, कि पुस्तक खऱ्या अर्थाने विदेशी आहे, म्हणजे, अमेरिकेत प्रकाशित झालेले आणि अमेरिकन लेखकाचे आहे. आणि दुसरे असे कि, तब्बल तीस वर्षांपूर्वी हे पुस्तक प्रकाशित झाले असले तरी हा विषय आपण चिरायू म्हणू शकतो. पुस्तकाचे नाव वाचून पुस्तकाचा विषय नेमका कुठला असेल हा कयास करणे कठीण आहे. पुस्तक पक्ष्यांबद्दल नाहीं! लेखन कसे करावे हा पुस्तकाचा विषय आहे. 'कदम कदम बढाये जा' या वाक्प्रचाराचे एका अर्थाने इंग्रजीत भाषांतर आपण 'बर्ड बाय बर्ड' असे करू शकतो. लेखन म्हणजे काय, लेखनाकडे कसे बघावे, लेखन का करायला हवे, लेखन का केल्या जाते अश्या विविध अंगांनी विचार करीत ऍन लमोट हा गहन विषय अगदी सोप्या पद्धतीने वाचकांसमोर उलगडतात. येथे त्यांच्या लेखनाचे कौतुक करायला हवे. शाळेतील शिक्षकाने एखादा विषय शिकवावा तश्या पद्धतीने एक एक पाऊल पुढे टाकीत मनातील विचारांना किंव्हा विषयाला लेखनकृती कशी द्यायची हे त्या शिकवितात. जरी विषय थोडा धीर-गंभीर असला तरी विनोदाचा आधार घेत ऍन लमोट वाचकांना लेखन करायला उद्युक्त करण्यात यशस्वी ठरतात. 

मनुष्य प्राण्याच्या कंठातून जेव्हापासून शब्दरुपी ध्वनी बाहेर पडू लागले तेंव्हापासून तो काही तरी लिहिण्याची धडपड करितो आहे. आपले विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायला लिहिलेले शब्द आवश्यक असतात. तसेच शब्दांचे आयुष्य मनुष्यपेक्षा नक्कीच अधिक असते. मनुष्याचे विचार, अनुभव, उपदेश, कल्पना इत्यादी जिवंत रहावे म्हणून अक्षर व शब्दांना प्रमाणबद्ध केल्या गेले आणि त्यातूनच भाषेचा उदय झाला. बोली भाषा आणि लिहण्याचे अक्षर याचे एकीकरण होऊन संस्कृतीचा उदय झाला. मग संस्कृतीचे जतन करायला नव-नवीन शब्द, वाक्यप्रचार, म्हणी इत्यादीचा उदय झाला आणि जगभरात विविध संस्कृती नांदायला लागल्यात. सनातन भारतीय संस्कृती या पायावर तर गेले हजारो वर्षे उभी आहे. बोलण्याचे आणि लिहिण्याचे एवढे महत्व असतांना आणि मनुष्य जातील एवढा अनुभव या क्षेत्रात असतांना समस्त मनुष्य जात लिहिण्यात आणि बोलण्यात निष्णात असणार किंव्हा असायला हरकत नाहीं? 

अर्थात असे नक्कीच नाहीं. बडबड करणे म्हणजे बोलणे नाहीं आणि लिहिल्या गेलेले लेखन नाहीं. बहुतांश बोललेले वायफळ आणि बाष्कळ असते! आणि आजच्या काळात बहुतांश लिहिल्या गेलेले नोकरी-धंद्या साठी असते. (सध्याच्या इराक देश असलेल्या भागात केलेल्या उत्खननात किमान पाच हजार वर्ष जुने दगडाचे 'टॅबलेट' सापडलेत. त्यात लिहिले होते त्याचा उलगडा करायला बरीच कष्ट लागलीत. शेवते कळले कि एका ग्राहकाने दुकानदाराविरुद्ध केलेली तक्रार या टॅबलेट मध्ये कोरली होती!) कारण लेखन - मग ते प्रासंगिक असो कि मनोगत किंव्हा ललित असो- हे फार कठीण काम आहे. शब्दांना नेमका असा आकार द्यायचा कि वाचणाऱ्यांना ते शब्द रोचक, अर्थपूर्ण वाटतील, किंव्हा खटपट करून शब्दांना गर्भित अर्थ प्राप्त करावा कि वाचकांना अभिप्रेत उमजेल. किंव्हा शब्दांमध्ये आपले अनुभव असे गुंफावे कि वाचणाऱ्यांना तो अनुभव आपलासा वाटेल. सूक्ष्म भावनांच्या उत्कटतेला शब्दांनी आकार देणे, प्रतिभेच्या उत्स्फूर्ततेला वाक्यांनी उत्तुंग बनविणे, हे काम सोपे नाहीं.  पण मग काय करायचे? लिहायची इच्छा आहे पण लिहिता येत नाहीं, कुठून 'श्री' करायचे हे कळत नाहीं, कुठे नेमके संपवायचे? कोणाबद्दल, कशाबद्दल, कुठल्या काळाबद्दल, कुठल्या घटनेबद्दल लिहायचे? हे कोडे काही केल्या  उमजत नाहीं. अश्या स्थितीत बर्ड बाय बर्ड पुस्तक हाताशी येते. 

लिहिता येत नाहीं माहिती आहे पण ते का, या प्रश्नाच्या  भानगडीत पडण्यापेक्षा, लिहायला कशी सुरुवात करायची या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हे पुस्तक आहे. पुस्तकाच्या लेखिका ऍन लमोट स्वतःच्या आयुष्यातील काही घटनांना गोवून आणि थोर-मोठ्या इंग्रजी लेखकांशी या विषयी केलेल्या संवादाद्वारे, लेखनाकडे नव्हे तर स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन पुस्तकाद्वारे देतात. लेखन हा गंभीर प्रकार नाहीं. अगदी जरी गंभीर विषयांवर लिहायचे असेल तरी! लेखन हा अनुभव हा स्वतःला आनंद देण्याचा, आनंदी ठेवण्याचा एक मार्ग आहे. हि एक कला आहे. आणि कलेचे पहिले लक्ष्य स्वानंद असते. अमूर्त विचारांना, भावनांना, कल्पनेला, एका स्वतः घडवलेल्या नवीन विश्वाचा आविष्कार करून वाचकांसमोर ठेवणे हि एक उपलब्धी याची जाणीव हे पुस्तक देते. या पुस्तकाचा सूर आणि स्वर एकूण आनंदी आहेत. हे पुस्तक वाचून लिहायला स्फूर्ती मिळते. लेखन हे जगण्यापेक्षा वेगळे नाहीं आणि त्यामुळे त्याच्याकडे घाबरून बघण्याची गरज नाहीं. छोटे छोटे टप्पे गाठून एकादी लघु-कथा आज आपल्या प्रत्येकात आहे. 

पुस्तकाची अनुक्रमणिका बघाल तर लांब आहे पण पुस्तकाचे पृष्ठसंख्या फार नाहीं. पुस्तकाचे चार मुख्य भाग आहे - १) Writing , २) The Writing Frame of Mind , ३) Help Along the way , ४) Publication  - and  Other  Reasons  to  Write .आणि पुढे हे चार मुख्य भाग अजून छोट्या छोट्या धड्यांमध्ये भागले आहे. लेखिका ऍन लमोट या अमेरिकेतील कॉलेजमध्ये सर्जनशील लेखन ( creative writing ) हा अभ्यासक्रम शिकवितात. त्यामुळे एका शिक्षकाच्या दृष्टिकोनातून त्यांनी पुस्तकाची मांडणी केली आहे. पण एका अभ्यासक्रमाप्रमाणे शिकून लिहिण्याचे ठरविले तरी लिहिण्याचा कुठला जादुई मंत्र नाहीं हे त्या लगेच स्पष्ट करतात. 

"I wish i had  a secret  i  could  let  you  in  on , some  formula  my father  passed to  me  in  a  whisper  just  before he  died , some  code  word  that  has  enabled  me  to  sit  at  my  desk  and  land  flights  of  creative  inspiration  like  an  air -traffic controller . But I don 't " 


त्यांच्या मते पुस्तक लिहिण्याची प्रक्रिया हि लिहूनच सुरु होते. कोंबडी पहिले कि अंड पहिले? कल्पना नाहीत तर लिहायचे कसे आणि लिहिले नाहीं तर कल्पना कुठून येणार? या भानगडीत पडण्यात,  याचा ऊहापोह करण्यात वेळ घालविण्यात फारसा अर्थ नाहीं. आधी लिहायला लागा, लिहिता लिहिता लिहिण्याची प्रगती होईल. सोबत सतत वाचा, वाचून वाचून लिहिण्याची संयुक्तता साधेल. खुर्चीवर बसून भिंतीकडे (किंव्हा आकाशाकडे!) बघून शब्द सुचत नाहीं, वाक्य जमून येत नाहीत, आणि कल्पना भराऱ्या घेत नाहीत. कल्पनेचे 'विलास' बांधायचे तर अक्षरशः दगड-धोंडे ढोहुन नेण्यासारखी ढोर मेहेनत करायला हवी. आता कल्पना विलासाचा पाय असो कि गोष्टीची बांधणी, सुरुवात नेहमी लहानच केलेली बारी. एकदम गोष्ट लिहिण्याचे धाडस होत नसेल तर गोष्ट थोडी बाजूला ठेवा आणि अनुभवाचा एकदा परिचछेद लिहा. हा अनुभव कुठलाही असू द्या. वैयक्तिक किंव्हा ऐकलेला. चित्र काढायच्या आधी वहीच्या मागल्या पानावर पेन्सिल ने काहीतरी हलकेच रेखाटल्या सारखे. बरं, काही तरी सखोल, तात्त्विक, किंव्हा शिकवून जाईल असे काही लिहिण्याची आवश्यकता नाहीं. सकाळी भाजी आणायला म्हणून निघालेल्या 'अहो' आणि 'अग' मधील 'सुखद' संवाद? घरून ऑफिस मध्ये जाण्याच्या प्रवास? त्यात नित्यनेमाने दिसणार, भेटणारी पात्रे? या नित्यनेमाच्या अनुभवांमध्ये इतके रंग आहेत. पुस्तकाच्या सुरुवातीचे धडे वाचून लिहायचा 'श्री' केला कि पुढच्या धड्यांमध्ये या साधारण अनुभवांना   गोष्टीत कसे रूपांतरित करता येईल हे शिकता येते. पात्रांना स्वभावगुण कसे द्यावेत, परस्परसंवाद, भाषा कुठली वापरायची? कथानक कसे हवे? एक एक धडा वाचत गेलो कि रेखाचित्राची अजून एक रेघ आणि कथानकाचा अजून एक छटा रंगवीत येऊ शकते. 

पुस्तकातील हा धडा तर होतकरू लेखकाने त्याच्या सान्निध्याचा सूक्ष्म परीक्षण करायला शिकवितो. हे परीक्षण कसे करावे हा सुद्धा एक अभ्यास आहे आणि त्याचा सुद्धा सराव करायला हवा. अनेक थोर लेखक त्यांच्या घराचा, गावाचा, परिसराचा, लहानपणी त्यांच्या शेजाऱ्यांचा, नातेवाइकांचा किंवा मित्रांचा ठसा आपल्या लेखकात ठळकपणे उमटवतात. ग.दि. माडगूळकर त्यांच्या 'मंतरलेल्या दिवस' या आत्मचरित्रपर पुस्तकात या बद्दल म्हणतात " अनुभव आणि अभ्यास यांच्या जोरावर साहित्यकार कितीही प्रगत झाला, तरी बाल्यातील संस्कार व ऋणानुबंध त्याच्या साहित्यकृतीत वारंवार डोकावत रहातात. माझं खेडेगाव, त्या खेड्यातील चालीरीती; तिथलं वातावरण, तिथला झाड-झाडोरा, माती-पाषाण, असेच माझ्या स्मरणात टिकून राहिले आहेत. खेड्यातल्या माणसांच्या आकृती आणि स्वभावरेखाई अशाच मनावर ठासून गेल्या आहेत. नाव वाङ्मय लिहीत असताना त्यातील अनेक दुर्श्य, अनेक प्रसंग आणि अनेक स्वभावच्छटा माझ्या लिखाणात येतात; सदैव येतात." (मोहोरलेला कडुलिंब, मंतरलेले दिवस )

वी.एस. नायपॉल हे इंग्रजी भाषेतील दिग्गज लेखक होऊन गेलेत. सन २००१ चे त्यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. हे मूळ भारतीय रक्ताचे असलेत तरी त्यांचे पूर्वज काही पिढयांपूर्वी सध्या ज्याला वेस्ट-इंडिज म्हणतो या देशात स्थलांतरित झाले होते. तिथल्या छोट्याश्या गावात नायपॉल यांचा जन्म झाला. त्यांनी पुढे त्यांच्या जन्म इंग्लंड मध्ये काढला तरी आयुष्याची पहिली १८-१९ वर्षे, जी वेस्ट-इंडिज मध्ये कंठिलीत, त्याचे पडसाद त्यांच्या लिखाणात नेहमीच दिसतात. त्यांचे मिगुल स्ट्रीट (Miguel Street ) हे पहिले लघु-कथांचा प्रकाशित संच अतिशय प्रसिद्ध झाला. या पुस्तकातील पहिली लघु कथा कशी सुचली याबद्दल ते अनेकदा बोलले आहेत. एका दुपारी ते लंडन मध्ये त्यांच्या टाईप-रायटर वर शून्यात बघत बसले होते. काय लिहायचे, कशावर लिहायचे याचा विचार करीत. अचानक, शून्यात, त्यांना त्यांच्या लहानपणाचे घर दिसले, त्यात त्यांचे वडील बसलेले होते आणि समोरून त्यांचा शेजारी 'बोगार्ट' जात होता. त्यांच्या वडिलांनी त्या बोगार्ट ला हाक मारली: 

"‘Every morning when he got up Hat would sit on the banister of his back verandah and shout across, “What happening there, Bogart?”‘ 

हा संवाद त्यांनी लिहिलेल्या पहिल्या लघु-कथेची सुरुवात ठरली. 

पुस्तक आणि त्यातील धडे फक्त लिहायला मदत करून थांबतात असे नाहीं. कथानकाच्या विविध अंतरंग कसे शोधायचेत, आणि मग रंगवायचेत हे पण ऍन लमोट समजावतात. पुस्तकात "Moral Point Of View " हा धडा मला फार आवडला. 

"To be a good writer, you not only have to write a great deal but you have to care. You do not have to have a complicated moral philosophy. But a writer always tries, I think, to be a part of the solution. " (पृष्ठ १००)

गोष्ट असेल तर विषयाबद्दल, कथानकाबद्दल, घटनेबद्दल, पात्रांबद्दल आणि मनोगत असेल तर स्वतःबद्दल, आपुलकी आणि जिव्हाळा हवा. कोरड्या मनाने शब्दांचा अभिषेक चढविणे कठीण आहे. बहुधा अशक्य आहे. वाचकांना कळत-नकळत ती त्रयस्थता नक्कीच जाणवेल. असे होऊ शकते कि गोष्ट अचानक असे वळण घेईल कि रंगवलेल्या पात्रांची भूमिका पटणार नाहीं. रंग विस्कटलेल्या सारखा वाटेल पण खऱ्यात सुद्धा सीमारेषेच्या चौकटीत आयुष्य बसत नाहीं तर गोष्टींची पात्रे त्याला अपवाद कसा ठरणार? पण जिव्हाळा कायम ठेवला तर गोष्ट वाचकांच्या अंतरंगाचा ठाव घेईल. पु.ल. देशपांडे यांच्या 'व्यक्ती आणि वल्ली' पुस्तकातील व्यक्ती आणि वल्ली हे याचे उत्तम उदाहरण आहे. पुस्तकातील पात्रे खऱ्या लोकांवर आधारित आहेत पण खरी नाहीं. आपण आपल्या पोराला अभिमानाने पाहुण्यांसमोर बोलावितो त्याच प्रेमाने, जिव्हाळ्याने प्रत्येक पात्र पु.ल. वाचकांसमोर उभी करतात. सखाराम गटणे आणि अंतू बर्वे हि पात्रे विरोधाभासी आणि जणू वेगळ्या विश्वात वावरतात. पण पु. ल. दोघांवर तेवढेच प्रेम करतात. आणि हे प्रेम वाचकांच्या हृदयी कळते. सन १९६६ साली प्रकाशित झालेले हे पुस्तक अजूनही वाचकवृंद घरी संग्रही ठेवतो.

"If people cannot write well, they cannot think well, and if they cannot think well, others will do their thinking for them."   - ओरवेल

समाज प्रबोधन, समाजउत्थान करण्याचा लेखनासारखा मार्ग नाहीं. फक्त गेल्या शंभर-दीडशे वर्षांचा इतिहास बघितला तरी सगळ्या मोठं-मोठाल्या बदलांचा किंव्हा क्रांत्यांचे मूळ लिहिलेले पुस्तकच असेल. बर, क्रान्ति वगैरेच्या भानगडीत नाहीं पडला तरी लेखनाचे महत्व कमी होत नाहीं. स्वतःची स्वतःला ओळख होण्याचा लेखन एक उत्तम मार्ग आहे.  

पुस्तकात पुढे प्रकाशनाबद्दल हि धडा आहे. हे पुस्तक तब्बल तीस वर्षांपूर्वी प्रकाशित झाले होते. तेंव्हा पुस्तकांद्वारेच लेखन होत. आणि त्यासाठी प्रकाशनगृह हा एकाच मार्ग होता. पण गेल्या तीन दशकात परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे. प्रकाशनगृहे आहेत आणि लागतील पण आता प्रकाशाची विविध माध्यमे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे लिहिलेले वाचकांपर्यंत पोचवायला अधिक सोपे झाले आहे. पण सोपे असले किंव्हा अगदी स्वतःच्या खर्चाणे प्रकाशन करण्याची इच्छा असेल, कुठल्याही तऱ्हेचे प्रकाशन करणे हे अंतिम ध्येय असायला नको. ते एक एवढेच लक्ष्य नको. लेखाच्या सुरुवातीला म्हणालो तसे, लेखन हि नवीन अविष्काराची अनुभूती देणारा मार्ग आहे. देवत्व प्राप्त ना करीत देव बनून नवीन कल्पना सृष्टी रचण्याचा एक सहज मार्ग आहे.  आणि प्रकाशित नाही झाले तरी हे शक्ती आपल्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाहीं. आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आकाशात ध्रुव ताऱ्याचे  अढळ स्थान आपल्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाहीं. 

लेखन नेहमी गंभीर असावे असे काही आवश्यक नाहीं. लेखन बोधीप्राय हवे असेही नाहीं. लेखन जगाकडे बघण्याचा वैयक्तिक दृष्टीकोण आहे. खूपदा बोलून आपल्याला दिसत असलेले जग दुसऱ्यांना दर्शवू शकत नाहीं. अश्यावेळेस लेखणी (किंव्हा की-बोर्ड!) आपला मित्र ठरतो. लेखनाद्वारे किंव्हा गोष्टींद्वारे आपण आपल्या शेजार-पाजारच्या जगाला वेगळ्या रंगाने रंगवू शकतो. कोण म्हणत कि जसा रंग दिसतो तोच गोष्टीला द्यायला हवा? पाहिजे तो रंगवू शकतो. आकाश निळ्याचे हिरवे करू शकतो, चांगल्याला वाईट, आणि वाईटाला चांगला करू शकतो. किंव्हा चांगल्या वाईटाचा दोन्ही छटा एकाच व्यक्तिमत्वात ओतू शकतो. आकाश ठेंगणे ठरेल आपल्या कल्पनेच्या भरारी पुढे. अतर्क्य असे काहीच नाहीं इथे. खऱ्या आयुष्यात असे स्वातंत्र्य कधीच मिळायचे नाहीं. आणि हे सगळे करण्यात जो निखळ आनंद मिळेल तो फक्त आपलाच! 

पुस्तकाचे माहात्म्य आणि पुस्तकाचे यश असे कि वाचक काही तरी लिहायला उद्युक्त होतो. लिहायला प्रयोजनाची आवश्यकता नाहीं. बाळपणी चालायचे शिकायला प्रयोजन हवे होते का? बोलायला? तसेच लिहिण्याचे आहे. लिहायला लागायचे. सराव करायचा. एकदम उठून कोणी गीत-रामायण लिहू शकत नाहीं (माडगूळकरांनी गीत-रामायण लिहिले तेंव्हा त्यांना तब्बल वीस वर्षांचा विविध-रंगी लेखनाचा अनुभव होता.) पण कुठून तरी सुरुवात करायलाच हवी आणि त्यासाठी हे पुस्तक सगळ्यांच्या संग्रही नक्कीच हवे. 

--

पुस्तक परिचय

'बर्ड बाय बर्ड' ('Bird By Bird ')   

लेखिका  - ऍन लमोट (Ann Lamott)

प्रकाशन दिनांक  - सप्टेंबर १, १९९५, 

पृष्ठ संख्या - २५६ 

ISBN-13 ‏ : ‎ 978-०३८५४८००१७

ऍमेझॉन ची लिंक -  https://www.amazon.in/Bird-Some-Instructions-Writing-Life/dp/०३८५४८००१६


11/24/24

महाराष्ट्र कुणाचा?...जनता जनार्दनाचा!


या मथळ्याचा पहिला लेख मी २०१४ ला लिहिला होता. तेंव्हाचे भाजप आणि मूळ शिवसेनेतील द्वंद्व आणि त्याचा काँग्रेसला आणि श्री पवार यांना होणाऱ्या फायद्याची शक्यता हा त्या लेखाचा सूर होता. जनतेच्या कृपेने तसे झाले नाहीं. आणि भाजप आणि मूळ शिवसेना यांचे सरकार आले. पुढे श्री फडणवीस यांनी मोठ्या शर्थीने राज्य राखले आणि जोपासले. सन २०१९ च्या लोकसभेत भाजप ची ओटी मराठी जनतेने काठोकाठ भरली. त्या वर्षीच्याच विधानसभेत पुन्हा भाजप आणि मूळ सेनेचे सरकार येणार हे नक्की होते. पण नेमके तेंव्हाच श्री फडणवीस यांच्या कानात वारे गेले. आणि भाजप ची अक्कल चरायला गेली. पण स्वतःसाठी त्यांनी कमी जागा ठेऊन भाजप ने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. जणू ठेचकाळयाला धोंडे भाजप आणि श्री फडणवीस शोधत होते. तरी जनतेने त्यांना तब्बल १२२ जागा दिल्यात. मूळ सेनेचे मुख्य श्री ठाकरे यांनी घातलेला गोंधळ बघता, भाजप वेळेत हि गाठ कापून मोकळे होऊन २०० होऊन अधिक जागांवर  लढले असते तर भाजप ला स्वतःच्या बळावरच पूर्ण बहुमत मिळाले असते. श्री ठाकरे आणि 'सेना धुरंधर' श्री संजय राऊत यांनी पायाखालून पाट काढे पर्यंत भाजप ने वाट बघितली.  आता अंगठे ठेचकाळलेत तो पर्यंत ठीक होत पण  भाजप आणि श्री फडणवीस यांनी ठरवले कि धोंडे शोधून त्यावर डोकी आपटायचीत. ३ दिवसांसाठी श्री अजित पवार यांचा पदर धरून त्यांनी घाई-घाईत लग्न लावण्याचा प्रयत्न केला. लग्नातली पोरगी कधीच पळून गेली आणि घोड्यावर बसलेले भाजप मात्र त्या नंतर लग्नाचा हिशोब चुकवीत बसलेत. मग भाजप आणि श्री फडणवीस यांनी शक्कल लढवली आणि मूळ सेनेच्या बुरुजांखाली सुरुंग लावले. आणि श्री एकनाथ शिंदे यांना पुढे करून पुन्हा सत्तारूढ झालेत. शांतपणे राज्य करून, विकासाची दारे उघडणे सोडून, भाजप आणि श्री फडणवीस यांनी श्री अजित पवार यांच्यासाठी दारे उघडावीत,  या शंखपणाला काय म्हणायचे? त्यांच्या या कृतीचा उपयोग नेमका कोणाला झाला हे मला अजूनही उमगले नाहीं. सन २०१९ च्या निवडणुकीत श्री पवार आणि त्यांच्या पक्षाला सगळ्यात कमी जागा आणि मते मिळाली असतांना बुडत्याला हातची वल्ही देऊन हाताने होडी ढकलण्यात भाजप ला नेमके काय मिळाले? 

गेल्या दशकातील आणि मुख्य करून २०१९ च्या या महाराष्ट्रातील राजकारणाचा हा संक्षिप्त आढावा देण्यामागचे कारण असे कि या सगळ्या कोलांट्या उड्यात जनतेचे नुकसान झाले. जनतेने आपला कौल २०१४ पासून एकाच पक्षाला देत असतांना त्यांनी (म्हणजे भाजप आणि श्री फडणवीस) एका पाठोपाठ एक नव-नवीन राजकीय चुका कराव्यात हि खेदाची बाब आहे. आणि म्हणूनच या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि श्री फडणवीस यांच्या डोक्यावर जनतेने सणसणीत टोला हाणला असे म्हणायला हरकत नाहीं.  

राज्यात गेले पाच वर्षे राजकीय अस्थिरता होती त्याचे पडसाद आणि प्रतिसाद राज्यकारभार आणि प्रशासनावर नक्कीच पडले असणार. केवळ राजकीय किंव्हा निव्वळ निवडणुकीसाठी फायदा होईल अशी पावले न उचलता दूरदृष्टीने राज्य विकासासाठी पावले उचलल्या गेल्याची किती शक्यता आहे? आणि असे आवश्यक निर्णय घेतल्या गेले नसतील कारण त्या साठी फुरसत नसेल किंव्हा लक्ष फक्त येत्या निवडणुकांकडेच असेल तर या साठी जवाबदार कोण? याचे उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे.  

अशी प्राप्त परिस्थिती असली तरी भाजप आणि श्री फडणवीस हेच महाराष्ट्रासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे हे पण तेवढेच सत्य आहे. श्री फडणवीस हे एक अनुभवी राजकारणी आहेतच पण उत्तम राज्यकारभारी पण आहेत. त्यांना प्रशासनाचा दोन दशकांचा अनुभव आहे. नागपूरचे ते सगळ्यात तरुण महापौर होते. मग गेले पंचवीस वर्ष ते महाराष्ट्र विधानसभेत आमदार आहेत. त्यांनी विरोधी पक्ष नेते हे पद फार उत्तमरीत्या निभावले होते आणि महाराष्ट्राच्या इतिहासात श्री वसंतराव नाईक यांच्या व्यतिरिक्त संपूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रीपद टिकविणारे दुसरेच मुख्यमंत्री आहेत. 

आता मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. इतका अनुभव असतांना आणि तिसऱ्यांदा जनतेचा कौल मिळाला असतांना भाजप ने श्री फडणवीस यांना पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करून जनतेवर कृपा करावी. अडीच वर्ष एक आणि मग दुसरा इत्यादी दिवाळखोरी विचार पक्षाने करू नये. श्री फडणवीस यांच्या सारखा अनुभवी राज्यकर्त्यांची राज्याला फार आवश्यकता आहे. पाच वर्षे आता फक्त विकास एवढाच मुद्दा समोर ठेऊन भाजप आणि श्री फडणवीस राज्य करतील हि आशा.