7/21/24

गोंड कोण होते आणि इतर विचार. (चंद्रप्रकाशी लेखन)

**या लेख मालिकेला मी चंद्रप्रकाशी अश्यासाठी म्हणले आहे कारण हे माझे मूळ संशोधन नाहीं. सेतू माधवराव पगडी लिखित इतिहासाचे पुनर्मुद्रण सध्या वाचतो आहे. त्यातील संशोधनाचा मागोवा आणि काही प्रमुख घटना  संक्षिप्तात मी येथे सादर करण्याचा हा प्रयत्न.  

या लेख-मालिकेचा पहिलादुसरा लेख इथे उपलब्ध आहे. 

--

मी मूळ नागपूरचा आहे त्यामुळे गोंड आदिवासी आणि गोंडांचे राज्य सध्याच्या पूर्व विदर्भ भागात होते याबद्दल मला नेहमीच कल्पना होती. पण शाळेत कधी गोंड इतिहास शिकविला नाहीं. भारतात साधारण जो इतिहास शिकवितात तो भारताचा किंव्हा भारतीयांचा इतिहास नसतो. परदेशी आक्रमकांचा इतिहास आपल्यावर थोपवल्या जातो. स्वातंत्र्योत्तर काळात कम्युनिस्ट लोकांनी केंद्र सरकार मधील शैक्षणिक आणि अभ्यासक्रमाची दालने व्यापलीत आणि त्यातून भ्याड मनोवृत्ती आणि बुरसट, बुळबुळीत विचारसरणी आपल्यावर लादल्या गेली. असो. तो एक वेगळा विषय ठरेल. मागच्या दोन लेखात म्हणाल्या प्रमाणे श्री सेतू माधवराव पगडी यांनी लिहिलेला इतिहास संक्षिप्तात प्रकाशित केल्या गेला आहे आणि त्यातील 'इतिहासाचा मागोवा' या पुस्तकातील हि माहिती आहे. मूळ विचार आणि अभ्यास माझे नाहीं. हे पुस्तक आणि त्यातील अनमोल माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचावी हे या लेखाचे उद्देश्य. 

गोंड आदिवासी समाज पूर्व विदर्भ, छत्तीसगढ, उत्तर तेलंगण आणि मध्य प्रदेश या प्रांतात पसरलेला आहे. त्या त्या भागातील गोंड तिथली भाषा मातृभाषा म्हणूनच वापरतात. म्हणजे विदर्भातील गोंड हे मराठी बोलतात किंव्हा उत्तर तेलंगण मधील गोंड तेलगू बोलतात. गोंड समाज, त्यांचा इतिहास, त्यांचे साहित्यात किंव्हा चाली-रीती सनातन धर्माशीच ठाम पणे बांधल्या आहेत. रामायण आणि महाभारताचे दाखले त्यांच्या पुरातन साहित्यातही दिसतात (इथे साहित्य म्हणजे लेखीच नव्हे तर लोककथा किंव्हा सामाजिक स्मृती या दृष्टीने मी वापरला आहे.) महादेव किंव्हा शंकर प्रामुख्याने आढळतो. शंकर-पार्वतीच्या कृपेने पुढे गोंड समाजाची निर्मिती झाली अशी समाज उत्पत्तीची आख्यायिका आहे. इंग्रजीत याला ओरिजिन स्टोरी असे म्हणतात. गोंड समाजात वेग वेगळी मूळ घराणी आहेत आणि त्यांची गोत्रे पण आहे. झिगुबाईची कथा, माणकोची कथा, तूरपालसिंघेची कथा इत्यादी प्रसिद्ध आहेत. या भागात राम-कृष्ण किंव्हा लक्ष्मी इत्यादी देव कमी आढळतात. गोंडांच्या देवळांना पेनगड म्हणतात. पेन म्हणजे देव. आणि श्री पगडी लिहितात कि देवळात मुर्त्या नसून भाल्याचा फाळ आणि चवरी असते. 

पुस्तकात गोंड समाजातील आणावे आडनावे दिली आहेत त्यात मेश्राम, आत्राम, टेकाम, गेडाम हि आडनावे आपल्याला नागपूर भागात नक्कीच दिसतात. आता तुम्हाला कधी श्री मेश्राम किंव्हा श्री आत्राम आडनावाचे भेटलेत तर ते गोंड समाजातीलच असतील असे नाहीं, म्हणजे त्याची खात्री देणे कठीण आहे. आजकाल हा विषय थोडा नाजूक आहे. पण ओळखीची आडनावे बघून आपुलकी वाटली.

विदर्भातील पूर्व भाग (नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा) व मध्य प्रदेश भाग असे गोंड राज्य सोळाव्या व सतराव्या शतकात उदयाला आले. त्यातील जबलपूरजवळ गढमंडली - राणी दुर्गावती हि गढमंडळीची. हिने अकबराविरुद्ध लढा दिला होता. पुढे औरंगझेब दक्खनी उतरला तेंव्हा त्याच्या विरुद्ध नागपूरच्या गोंड राजाने आणि सैन्याने प्रखर लढा दिला. पुढे भाऊबंदकी होऊन त्यातील एका भावाने औरंग्याच्या पदर धरला आणि मुसलमान झाला. मुघली मदतीने हा बख्त बुलंद शाह पुढे गादीवर आला. छत्रपती शाहूंच्या काळात आणि पेशवाईत भोसले परिवारातील श्री रघुजीराजे भोसले नागपुरात स्थिर झालेत आणि गोंडांचे राज्य मावळले.  

श्री पगडी यांनी पुस्तकात गोंड समाजात जातीभेद नाहीं असा उल्लेख केला आहे. साधी विवाहपद्धती आणि अगदी विधवा विवाह सुद्धा निषिब्ध नाहीं असेही ते म्हणतात. या दोन्ही बाबी फार स्पृहणीय आहेत आणि या साठी गोंड समाजाचे कौतुकच करायला हवे. या विषयावर श्री पगडी यांनी अक्षरशः एकाच परिच्छेद लिहिला आहे. या विषयावर अजून वाचन करायला हवे. श्री पगडी यांचे 'अमंग दि गोंड्स ऑफ आदिलाबाद' आणि "गोंडी भाषेचे व्याकरण' हि दोन अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रकाशित आहेत. आणि श्री पगडी स्वतः सन १९४५ ते १९४८ सध्याच्या तेलंगण राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात मामलेदार आणि डेप्युटी कलेक्टर म्हणून होते. या व्यतिरिक्त त्यांना आदिवासी विशेष अधिकारी म्हणूनही दायित्व त्यांच्या कडे होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या अभ्यासाला आणि या विषयावर त्यांच्या लेखनाला अनुभवाचे वजन आहे. 

पुढले चंद्रप्रकाशी लेख 'छत्रपती नि त्यांची प्रभावळ' या पुस्तकातील असतील. आशा करूया कि काही तरी नवीन शिकायला मिळेल. 




7/15/24

'The Greatest Indian Stories Ever Told' - एक परीक्षण

हा पुस्तक परिचय 'पंचधारा' या त्रैमासिकाच्या जून महिन्याच्या अंकात प्रकाशित झालेला आहे. हे साहित्यिक मासिक मराठी साहित्य परिषद, हैद्राबाद द्वारे प्रकाशित होते. या मासिकाचे फेसबुक वरील पत्ता येथे आहे 


पार्श्वभूमी:

भारतीय भाषा प्रगल्भ आहेतच पण त्या सोबत प्रत्येक भाषेचे साहित्य हे त्या भौगोलिक प्रदेशाची, त्या प्रदेशाच्या इतिहासाची आणि बोलणाऱ्यांची ओळख आहे. कुठल्याही भाषेचा प्रवास हा सामाजिक व वैयक्तिक अनुभव ते बोली शब्द ते साहित्य असतो. आणि पुढे हीच भाषा साहित्य संस्कृतीला जन्म देण्याचे महत्वाचे काम करिते. नुसतेच जन्म नव्हे तर साहित्य संस्कृतीचे पालन-पोषण सुद्धा करते. म्हणूनच साहित्याला अनन्यसाधारण महत्व असते. भाषेच्या साहित्यात कथा आणि गोष्टी हा एक महत्वाचा अंग असतो. कारण  जीवनातील कधी सामान्य किंव्हा कधी मार्मिक अनुभव हे गोष्टींद्वारे पटकन टिपल्या जातात. ग्रंथ-कादंबऱ्या लिहायला आणि वाचायला वेळ लागतो. पण कथा म्हटले कि योग्य तो संदेश किंव्हा झालेले घटना पटकन पोचवता येते. हे काम सोपे आहे असे मुळीच नाहीं. प्रभावी गोष्ट लिहिणे फार कठीण आहे. काही पानांच्या कक्षेत प्रभावी कथानक आणि योग्य पात्रे फुलवावी लागतात. बहुधा म्हणूनच बहुतेक प्रसिद्ध साहित्यिक हे उत्तम कथाकार सुद्धा आहेत. 

आपण ज्या पुस्तकाचा आढावा घेणार आहोत त्यात भारतभराच्या भाषांमधील लिहिलेल्या गोष्टींचे भाषांतर इंग्रजीत केलेले आहे. हा कथा संग्रह म्हणजे एक काळ, वेळ, विविध सामाजिक स्तर, विविध भौगोलिक प्रदेश या सगळ्यांचा प्रवास आहे.

'केल्याने देशाटन,पंडित मैत्री,सभेत संचार|

शास्त्र ग्रंथ विलोकन,मनुजा येतसे चातुर्य फार||

या पुस्तकातील गोष्टी वाचतांना असा काहीसा अनुभव मला आला. या गोष्टी भारतातील भिन्न भाषा आणि प्रदेशांमध्ये जरी लिहिल्या असल्यात तरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तरी गेल्या शंभर वर्षातील भारतीयांचे अनुभव साधारणत: एकाच पटलावरचे आहेत. आणि हे ऐक्य या गोष्टींमधून जाणवते. आता एकच पटल म्हणजे काय? तर खऱ्या अर्थाने गेल्या शंभर वर्षात भारत एक राष्ट्र आणि एकसंध राष्ट्र म्हणून उदयास आले. त्यामुळे गेल्या शतकातील घडलेल्या ऐतिहासिक, सामाजिक आणि आर्थिक घटनांची चादर सगळ्यांसाठी एकच आच्छादली आहे. पण चादर एकाच आच्छादली असली तरी सुरकुत्या सारख्या नाहीत. आणि घटनांचे उमटलेले विविध पडसाद गोष्टीद्वारे आपल्या समोर येतात.  उदाहरणार्थ, बंगाल, बिहार मधले दारिद्र्याचे अनुभव मुंबई किंव्हा तामिळनाडूतील अनुभवांपेक्षा वेगळे बोलतात पण त्यामागचे मुख्य कारण म्हणजे, भारत सरकारचे स्वातंत्र्योत्तर आखलेल्या तोकडे आर्थिक धोरण. याच्या उलट, भारताच्या काना-कोपऱ्यात पसरलेली जातीय विषमता. आणि त्याच्या विरोधात भारत सरकारने स्वातंत्र्योत्तर आखलेले आक्रमक धोरण. अजून एक उदाहरण म्हणजे भारतावरचे इंग्रजांचे राज्य. जवळपास ९० वर्षे भारतावर इंग्रजांची अनभिषिक्त सत्ता होती आणि त्याचे दुष्परिणाम समाजाच्या प्रत्येक घटकावर झालेत. पण बंगालच्या उच्चवर्णीयांची अनुभव, बिहार मधील शेतकऱ्याच्या तुलनेत फार वेगळे आहेत. 

हे अनुभव देशाच्या आणि समाजाच्या साहित्य द्वारे प्रतिबिंबित झाली आहेत. प्रत्येक भाषा आपापल्या परीने वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यातील शब्द, वाक्यप्रचार, म्हणी जणू त्या मातीतल्या असतात. पण वर म्हंटल्या प्रमाणे भाषा अनेक असल्यात तरी सूर एकच आहे. 

अजून एक लक्षात घेण्याजोगा महत्वाचा मुद्दा म्हणजे साहित्य आणि इतिहासाची गाठ-भेट. इतिहास म्हणाल तर घटना आणि तारखा. पण याला साहित्याची बहार जेंव्हा येते तेंव्हा त्या तारखा आणि घटनांना एक व्यक्तिमत्व प्राप्त होते. रुक्ष इतिहास साहित्याच्या संगतीत जणू जिवंत होतो.असा जिवंत साक्षी कथा आणि गोष्टींद्वारे मिळतो. शिवाजी महाराजांचा इतिहास अनेकांनी लिहिला आहे. तो काळ खंड बखरीं मध्ये हि नोंदला गेला आहे. आणि महाराजांचा इतिहास साधारण सगळ्यांना माहिती सुद्धा होता पण श्री बाबासाहेब पुरंदऱ्यांनी जेंव्हा गोष्टीरूपी इतिहास जनमानसा समोर ठेवला तेंव्हा महाराज आणि मराठ्यांचा इतिहास जणू पुन्हा जागृत झाला, उल्हसित झाला. जर का श्री पुरंदऱ्यांचा हा ऐतिहासिक गोष्टी रुपी ग्रंथ तामिळ किंव्हा असामी भाषेत उपलब्ध झाला तर मराठ्यांचा हा थोर इतिहास त्या भागांमध्ये हि नक्कीच रुजेल.   

पण चेष्टा अशी हा भारताचा हा साहित्यिक ठेवा डोळ्यासमोर असूनही त्याचा उपभोग आपल्याला घेता येत नाहीं. तामिळ साहित्य वाचायला तामिळ शिकायला किती आणि कसा वेळ द्यायचा? बरं तामिळ काही नवीन भाषा नाहीं, ती हजारो वर्ष जुनी संस्कृती आहे. पण 'नवीन' भाषा म्हणून बंगाली भाषे कडे बघितले तरी परिस्थिती तशीच आहे, बंगाली साहित्याचा आनंद बंगाली वाचणाऱ्याव्यतिरिक्त कोणाला उपलब्ध नाहीं. असे वाटते कि एका घरात राहून, भावंडे असूनही एका-मेकांशी परिचय नाहीं, जवळीक नाहीं, स्नेह नाहीं. 

पुस्तकाचा परिचय:

अश्या विचित्र परिस्थितीत इंग्रजी भाषा उपयोगास येते. इंग्रजी सत्तेच्या अस्तानंतर भारतात इंग्रजीचे प्राबल्य वाढले. स्वातंत्र्योत्तर भारत सरकारने इंग्रजीला सरकारी भाषा म्हणून प्राधान्य दिले. तसेच दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या वाढत्या बळामुळे इंग्रजी भाषेला जागतिक भाषेचा दर्जा प्राप्त झाला. हळूहळू भारतीयांनी हि इंग्रजीला 'आपलेसे' केले आणि आज भारतीय एका-मेकांशी बोलायला इंग्रजीचा आधार घेऊ लागली आहेत. पण या परिस्थितीचा, म्हणजे इंग्रजीच्या वाढत्या प्राबल्याचा, एक चांगला परिणाम म्हणजे भारतातील विविध भाषिक  साहित्य इंग्रजीत भाषांतरे करून आज सर्व साहित्यप्रेमींना उपलब्ध होते आहे. या उपक्रमा अंतर्गत काही होतकरू भाषाप्रेमी, साहित्यिक आणि भाषेच्या प्राध्यापकांनी एकत्र येऊन भारतातील विविध भाषेंमंधील पन्नास लघु कथांचे भाषांतर करून एक पुस्तक छापले आहे. पुस्तकाचे नाव आहे "थे ग्रेटेस्ट इंडियन स्टोरीएस एव्हर टोल्ड" (The Greatest Indian Stories Ever Told  ). याचे मुख्य संपादक श्री अरूणव सिन्हा आहेत. अश्या अनुवादित साहित्य संबंधी पुस्तके प्रकाशन करण्याची खासियत या प्रकाशनगृहाची आहे. या संबंधित अनेक पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहे. उदाहरणार्थ 'The Greatest Marathi Stories Ever Told "  

अश्या प्रकारच्या पुस्तकाचे संपादन कार्य सोपे नाहीं. कुठल्या गोष्टी निवडायच्या आधी महत्वाचा प्रश्न म्हणजे कुठले लेखक निवडायचेत? इथे संपादक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करायला हवे. निवडलेल्या भाषेंमधील प्रसिद्ध लेखक त्यांनी चांगले निवडले आहेत. लेखक यादीतील काही लेखक भारतभर प्रसिद्ध आहेत. जसे महेश्वर देवी (बंगाली) , सरतचंद्र चट्टोपाध्याय (बंगाली), इस्मत चुगताई (उर्दू) , के. एस. दुग्गल (पंजाबी), के. आर. नारायण (मूळ कथाच इंग्रजी आहे) तसेच मुन्शी प्रेमचंद (हिंदी) आणि अमृता प्रीतम (पंजाबी). पण या व्यतिरिक्त लेखक किंव्हा कथा ज्या फक्त मूळ भाषेतच प्रसिद्ध आहेत, त्यांची हि निवड छान केली आहे. उदाहरणार्थ, व्हायकों मुहम्मद बशीर हे मल्याळम भाषेतील सुप्रसिद्ध कथाकार आणि साहित्यिक आहेत. त्यांचे साहित्य शाळेच्या मल्याळम पाठ्यपुस्तकांमधे असतात. प्रसिद्ध मराठी दलित साहित्यिकअण्णाभाऊ साठे हे असेच अजून एक उदाहरण आहे. त्यांची प्रसिद्ध आणि हृदयद्रावक कथा 'स्मशानातील सोने' आम्हाला इयत्ता १०वीच्या वर्गात होती. 

विषय प्रवेश:

या कथांचा कालखंड स्वातंत्र्योत्तर काळापासून १९९० च्या दशकापर्यंत आहे असे जाणवते. त्यांच्या पृष्ठ यादीत कथा प्रकाशनाच्या दिनांक दिलेली नाहीत पण कथांमधून दिसणारे समाज दर्शन म्हणजे स्वातंत्र्योत्तर तीन-चार दशकातील ढासळती अर्थव्यवस्था, सर्व क्षेत्रात कमी होत गेलेले संधी मार्ग, लोकांच्या खिशातील पैशांचे कमी होत चाललेले दाम आणि खिशात पडायला कमी होत गेलेला पैसे आणि सगळ्यात मुख्य, या सगळ्याचा समाज प्रणाली आणि सामाजिक संस्कृतीवर होणार विपरीत परिणामांचा लेखा-जोखा. मुन्शी प्रेमचंद यांच्या कथा उत्तरेतील आणि मुख्यतः बिहार-उत्तर प्रदेशातील दारिद्र्य आणि कारुण्य दर्शवितात. त्यांची एक 'कफन' कथा याच प्राश्वभूमीवर असली तरी गोष्टीतील परिस्थितीला दोषी स्वतः कथानायकच आहेत. कथेतील दारिद्र्य जरी अंगावर येत असले तरी मनुष्याचे कुठल्या थराला पतन होऊ शकते हे बघून मन विषण्ण होते. पण मला त्या कथेतील प्रासंगिक विनोद जाणवून हसू पण आले.  

इस्मत चुगताई यांची कथा ७० किंव्हा ८० च्या मुंबईचे दर्शन घडविते. हि कथा स्वानुभवावर आधारित आहे असे वाटते. पण यातील दारिद्र्य टोचत नाहीं कारण यातील पात्रे जरी गरीब असलीत तरी लाचार नाहीत. हि पात्रे त्यांना हवे तसे जीवन हे पत्रे जगतांना दाखविली आहेत. दारिद्रय आणि लाचारीतील मुख्य अंतर म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य. मुंबईतील हि कामसू पण गरीब पात्रे कोणालाही दोष देतांना दिसत नाहीत. 'आलीय भोगासी असावे सादर' या म्हणीप्रमाणे ते मिळतील ते क्षण भोगत जीवन कंठीत आहेत. 

महेश्वता देवी यांची कथा फार भन्नाट आहे. त्यांचे साहित्य वाचण्याचे भाग्य मला आधी लाभले नव्हते. गोष्ट चित्रपटासारखी समोर घडते आहे असा भास होतो. कोलकाता येथे बेतलेली हि कथा जेंव्हा शेवटल्या परिच्छेदात उलगडते तेंव्हा एखादे वेलबुट्टी केलेले कापड एकदम उलगडल्या वर जसे पिसारा फुलल्यासारखे झगमगावे तास भास होतो. कथेतील आधी विस्मित करणाऱ्या घटनांचे आकलन होते. मला स्वतःला हि कथा फार आवडली. 

अजून एक कथा म्हणजे शहनाझ बशीर यांची काश्मिरी कथा. हे कथा मूळ इंग्रजीतच लिहिली आहे.  शहनाझ बशीर हे पुस्तकातील इतर कथाकारांच्या तुलनेत तरुण आहेत. त्यांचा जन्म सन १९८० चा आहे. त्यांच्या जन्माचे वर्ष मी यासाठी सांगितले कारण त्यांच्या वाढत्या वयात त्यांनी काश्मीर मध्ये इस्लामी दहशतवाद जवळून बघितला असणार आणि अनुभवाला असणार. कारण त्या अमानुष आणि हिंसक दशकाचे प्रतिसाद त्यांच्या लघुकथेत प्रकर्षाने जाणवतात. गोष्टीतील पात्रे दारिद्र्याच्याच पाळण्यातच  जीवन कंठीत आहेत पण येथे जीवाची भीती आणि लाचारीचा संघर्ष चालू आहे. एका बाजूला धर्मांध हिंसेचे घरातच सांडलेले रक्त तर दुसरीकडे त्याचा धर्मांधतेमुळे खालावलेली पोटे. एका बाजूला भीतीपोटी त्याच धर्माशी दाखवावी लागणारी निष्ठा तर दुसरीकडे निष्ठुर वास्तवात. गोष्टीतील 'नायक' त्याच्या  सामान्य बुद्धिमत्तेस जे कळेल आणि वळेल तसे पुढे उभ्या ठाकलेल्या अक्राळ-विक्राळ परिस्थितीशी सामना करण्याचा प्रयत्न करीत असतो. पण सत्तांतरे असो, युद्ध असोत, धर्मांधता असो कि लहान-मोठ्या क्रान्ति असोत, त्यात काष्ठा सामान्य बापुड्याच्याच पडतात. जगाची हीच रीत आहे. आपला कथानायक याला अपवाद नाहीं. आमच्या शाळेच्या बालभारतीच्या 'लाल चिखल' म्हणून एक धडा होता. त्याची आठवण मला बशीर यांची हि कथा वाचतांना झाली. 

सगळ्या कथा दारिद्र्याशी किंव्हा संघर्षाच्या नाहींत. 'नादर सर' हि कथा जरी काही दशकांपूर्वीच्या चेन्नई शहराजवळ रेखाटली असली तरी हा सकारात्मक प्रसंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घडलेला आहे. गोष्टीचे लेखक सुंदर रामास्वामी यांनी शालेय जीवन आणि खासकरून भारतीय शाळेतील खेळाचे महत्व अचूक टिपले आहे. तामिळ भाषेतीलच या पुस्तकातील अजून एक गंमतीदार गोष्ट म्हणजे 'कल्की' उर्फ आर. कृष्णमूर्ती यांची इंग्रजांच्या काळात बेतलेली कथा - 'गव्हर्नर'स व्हिसिट'. एक उच्च इंग्रज अधिकारी गावात येणार आहे हे कळल्यावर, त्या गावातील दोन धनाढ्य शेठांची धावपळ होते याचे वर्णन आहे. आर. कृष्णमूर्ती स्वतः एक स्वांतत्र्य सेनानी होते त्यामुळे स्वातंत्र्य लढ्याच्या काळात श्रीमंत आणि सुशिक्षित शेठ लोक इंग्रजांची बाजू घेत असत किंव्हा इंग्रज अधिकाऱ्या समोर वर-वर करायला चढाओढी कसे करीत याचे जवळून निरीक्षण केले असणार. त्याच धाग्याला घेऊन त्यांनी हि गंमतीदार कथा विणली आहे.

काही कथा, सुंदर कल्पना रम्य आहेत. त्या सूचक किंव्हा समाज किंव्हा परिस्थिती दर्शनपर नाहीं. सुब्रमणिया भारती यांची तामिळ भाषेतील कथा या श्रेणीत मोडेल. कल्पना विलासित हि कथा दोन कावळ्यांवर आहे. हे दोन कावळे नवरा-बायको दाखविले आहेत. जरी मानवी विश्वातून झेप घेतली असली तरी आपले पाय, म्हणजे कल्पनाशक्ती, मानवी अनुभवांच्या साखळ्यांमध्ये जखडले असतात. कावळ्यांचा अनुभव आपल्याला कधीच कळायचे नाहीं. पण मानवी अनुभवांच्या ब्रशने भारती यांनी या कावळ्या दाम्पत्यावर फार सुरेख कथा रेखाटली आहे. अजून एक अशी कथा म्हणजे लक्ष्मणराव सरदेसाई यांची कोकणी कथा गोव्यातील हिरवळीसारखी सुंदर आहे. यात नकारात्मकता मुळीच नाहीं. गोव्यातील ओढे, ओहोळ जसे समुद्राकडे वाट काढीत जातात तशी हि कथा वळणे घेत जाते.  एम. टी. वासुदेवन नायर यांची मल्याळम कथा सरकारी नोकरी करणाऱ्या पण घटस्फोटित स्त्री जीवनावर आहे. लग्न, पोरंबाळं हि ओझी घेऊन स्त्रीने आपले जीवन लग्न आणि पोराबाळांपुरतीच सीमित ठेवावे हि आपल्या समाजाची अपेक्षा आहे आणि ते एक बंधन सुद्धा आहे. पण लग्न जर अपेक्षित असेल अनपेक्षित असले तरी घटस्फोट हि समाजाने स्वीकारायला हवा. अर्थात तसे होत नसते. आणि खासकरून सुशिक्षित, पांढरपेशा शहरातील समाजाला हे पचवायला नक्कीच कठीण जाते. अश्या परिस्थिती कथानायिकेला अनपेक्षित व्यक्तीकडून सहानभूती मिळते. आणि तेवढेच नव्हे तर ती व्यक्ती नवीन मार्ग दाखवीत प्रोत्साहन पण देते. 

परिचित-अपरिचित कथांव्यतिरिक्त पुस्तकात काही अति-प्रसिद्ध कथा पण आहे. जसे रस्किन बॉण्ड यांची 'ब्लू अम्ब्रेला' (मूळ इंग्रजी),  श्री रबिन्द्रनाथ टागोर यांची 'काबुलीवाला' (मूळ बंगाली) , श्री मुन्शी प्रेमचंद यांची 'कफन' (मूळ हिंदी) किंव्हा अमृता प्रीतम यांची स्टेंच ऑफ केरोसिन  या कथा पण वाचायला मिळतात. अमृता प्रीतम यांची हि गाजलेली कथा मूळ पंजाबी भाषेत आहे आणि याचे भाषांतर प्रसिद्ध लेखक खुशवंत सिंग यांनी केले आहे. 


या पुस्तकाच्या लेख मालिकेत थोड्या त्रुटी आहेत. मराठी भाषेतील कथा बघितल्यात तर वि.स. खांडेकर, किंव्हा ग.दि.माडगूळकर यांच्या कथांची कमतरता जाणविते. खांडेकरांच्या रूपक कथा येथे उचित झाल्या असत्या. तसेच ग.दि.मा यांच्या लघु कथा इथे चांगल्या गुंफल्या गेल्या असत्या. हिंदी भाषिक महादेवी वर्मा, जयशंकर प्रसाद, सूर्यकांत त्रिपाठी 'निराला' किंव्हा मैथिली शरण गुप्त या दिग्गज लेखकांपैकी एकाची तरी कथा घेतली असती तर हा कथा संच अजून झळकला असता. 

पुस्तकाची परिशिष्ट विस्तृत आहे. त्यात लेखांचा परिचय आणि ज्या पुस्तकातून हि कथा घेतली त्याची माहिती दिली आहे. पण इंग्रजीतच का होईना पण कथेचे मूळ भाषेतील नावाची नोंद परिशिष्टेत करायला हवी होती. अण्णाभाऊ साठे यांच्या कथेचे नाव स्मशानातील सोने असे आहे. पण पुस्तकात कथेच्या नावाचे भाषांतर 'Gold  from  the Graves ' असे आहे. आता स्मशानाचे भाषांतर Grave थोडे त्रोटक जरी वाटत असले तरी वाचकाला परिशिष्टेत नोंदलेला पण इंग्रजीत लिहिलेला 'smashaan हा शब्द कळला असता. 

शेवट:

हे पुस्तक आणि लेख मालिका एका दमात वाचून संपवायला नाहीं. काही गोष्टी, त्यातील पत्रे आणि कथानक  प्रभावी आहेत आणि त्याचे पडसाद मनात बरेच दिवस रेंगाळतात. अमृता प्रीतम यांची कथा हृदयात घर करून बसते. आणि पुढली गोष्ट वाचण्याच्या ऐवजी आपण अंतर्मुख होतो. जरी या कथेतील काळ आणि जागा वेगळी असली तर प्रसंग चटका लावून जातो कारण आपल्या देशातला हा अनुभव, देशातील स्त्रियांची झालेली अवहेलना आपण सगळ्यांना ठाऊक आहे. पण गोष्ट वाचल्यावर हि दैन्यावस्था बदलायला हवी, त्याला समर्थन कुठल्याही मार्गाने व्हायला नको हा सूर प्रत्येक वाचकाच्या मनात नक्कीच उमटत असणार आणि हेच या कथेचे  यश. 

इतर ४९ कथा सुद्धा म्हणूनच ४९ रूपाने प्रभावी ठरतात. प्रत्येक कथेचे एक वैशिष्ट्य आहे. कथा जन्मायला यायचे एक कारण आहे. आणि कथेने जन्म घेण्याची आवश्यकता आहे. लेखकाने टिपलेले समाजाचे, त्याच्या सांप्रत काळाचे हे स्पंदन आहे. आणि इंग्रजी माध्यम का होईना पण या कथा वाचल्यावर आपल्या देशाची, समाजाची, संस्कृतीची आणि मानवी अस्तित्वाची ओळख नव्याने होते. जुन्या पैलूंची नव्याने ओळख होते आणि काही नवीन पैलूंची पहिल्यांदा ओळख होते. 

आणि निखळ आनंद तर नक्कीच मिळतो. 

आमच्या आजोबांना रबिन्द्रनाथ टागोरांचे साहित्य वाचायचे होते. त्यांनी अनुवादित इंग्रजी वाचायला सुरुवात केली पण त्यात त्यांना तेवढा आनंद मिळेना. म्हणून त्यांनी बंगाली शिकायला घेतले. आणि बंगाली वाचण्यात नैपुण्य मिळाल्यावर त्यांनी रबिन्द्रनाथ वाचले. कारण नाहीं म्हंटले तरी भाषांतर किंवा अनुवादनात मूळ भाषेत लिहिल्याचा मूळ आत्मा थोडा क्षीण नक्कीच होतो. पण जर का बंगाली किंव्हा मल्याळम हिंदी किंव्हा मराठीत भाषांतरित केले तर भाषेचा पाया भक्कम राहतो कारण बहुतांश भारतीय भाषा संस्कृतोद्भव आहेत. सरकारी उपक्रमाद्वारे किंव्हा प्रकाशन गृहांद्वारे पण आशा करू या कि भारतीय भाषा ते भारतीय भाषा असे भाषांतरित साहित्य आपल्याला उपलब्ध होईल. सध्या तरी सत्य परिस्थिती अशी आहे कि आज भारतीयांना एका धाग्यात बांधणारी भाषा इंग्रजी होत चालली आहे. अश्या परिस्थिती पुस्तकाच्या भाषांतरकरांचे आणि संपादकाचे हे पुस्तक लोकांसमोर ठेवल्या बद्दल त्यांचे कौतुक करायला हवे. 

पुस्तकाबद्दलची माहिती:

'The Greatest Indian Stories Ever Told'

संपादक - श्री अरुणव सिन्हा

प्रकाशक -  अलेप बुक कंपनी ( Aleph Book  Company ) 

पृष्ठ संख्या - ५१२

प्रकाशन वर्ष - सन २०२३ 

मूल्य - रुपये ७७० (अमेझोन वरची किंमत)