6/2/07

कविता, ऑक्टोपस व माझे वायफळ तत्वज्ञान

मला कविता वाचण्याची फारशी आवड नव्हती. आवड म्हणण्यापेक्षा कुठल्या कविता वाचाव्यात व कवितांचा रस कसा घ्यावा हे सांगायला कोणी नव्हत. थोडक्यात बाल-भारतीच्या पाठ्य-पुस्तका पलिकडे फारस कविता वाचन नव्हत. परिस्थितीत थोडा फरक १०वी च्या इयत्तेत पडला. मराठीच्या नामजोशी बाईंनी कविता कश्या वाचाव्यात हे शिकविले. त्यांनी कुसुमाग्रजांची कविता 'कोलंबसाचे गर्वगीत' इतकी सुंदर शिकवली की मराठी कवितांच खजिनाच जणु माझ्यासाठी खुला झाला. १२वी च्या परीक्षे नंतर मात्र कविताच काय, माझ्या मराठी वाचनालाच पूर्ण-विराम लागला. दोन वर्षांपूर्वी सुरेश भटांची ओळख झाली व मला मराठी वाचता येतं या बद्दल मी देवाचे आभार मानलेत. कुसुमाग्रजांचे 'विशाखा' वाचुन झाले. ग.दिं.च्या कवितात नाहुन झाले. सध्या भाऊसाहेब पाटणकर व विंदांशी गुफ्तगु चालु आहे. या सगळ्या काव्य-प्रवाहात पोहतांना मला कवित मुळीच म्हणजे मुळीच करता येत नाही याचे मात्र फार वाईट वाटते. अहो, साध्या दोन पंक्तीसुद्धा लिहिता येत नाही. 'प्राची' ला 'गच्ची' चे यमक जुळवण्याहुनही वाईट परिस्थिती आहे.

आयुष्यात नवीन अनुभव जरी येत असलेत तरी भावना व शब्दांचे खेळ काही सोपे नाहीत. खर तर तुमच्या-आमच्या सारखच आयुष्य कवि मंडळी कंठत असतात पण सामन्य घटनांकडे असामान्य दृष्टीक्षेपाने ते बघतात. व याच घटनांन सुंदर शब्दांमधे गुंफण्याची अदभुत शक्ति त्यांच्यात असते. लेखकही काही कमी नसतात. खांडेकर त्यांच्या तत्वज्ञानाने मनुष्याला मुळापासुन हलवुन सोडतात. मुन्शी प्रेमचंद यांच्या 'गोदान' मधील गरिबीच्या वर्णनाने अंगावर शहारे येतात. अर्थात कवि हे सर्व रस अगदी मोजक्या शब्दांत व्यक्त करतात. चित्रकार याहुन पलीकडची पायरी गाठतात. शब्दांचा मुळीच आधार न घेता ते केवळ रंगांद्वारे भावना प्रगट करतात. २०व्या शतकात छायाचित्रकारांनाही विशेष महत्व प्राप्त झाले आहे. माणसाचा चेहरा अक्षरश: भावनांचा आरसा असतो. कॅमेरा निष्काम भावनेने (आता खर भावना निष्काम कश्या असतील !) माणसाच्या मनातील भावनांचे प्रतिबिंब आपल्या समोर ठेवतो.

या कवितांच्या संदर्भात एक गोष्ट आठवली. कॉलेज मधे असतांना कॅलिफोर्निया विद्यापिठातील संगणक शास्त्राच्या प्राध्यापकाच्या व्याखानाला गेलो होतो. कमीत्-कमी सुचनांद्वारे संगणकाला कश्या गोष्टी समजतील व कसे कमीत्-कमी शब्दांद्वारे तो (संगणक) आपल्या गोष्टी समजावुन देऊ शकेल यावर प्राध्यापक महोदय बोलत होते. त्यांनी एक सुरेख उदाहरण दिले. ऑस्ट्रेलिया जवळच्या समुद्रात एका विशिष्ट जातीचे ऑक्टोपस निवास करतात. खोल समुद्रात जिथे सुर्य प्रकाशाचा अभाव असतो तेथे हे ऑक्टोपस अत्यंत प्रगत पद्धतीने संवाद करतात. आवाज किंवा स्पर्श-ज्ञाना ऐवजी त्यांचे संपूर्ण शरीर स्वयं-प्रकाशाने लखलखते. केवळ सेकंदात ते संवाद पूर्ण करतात. शब्द नाहीत, कविता नाहीत, चेहरे नाहीत की अंग-विक्षेप नाहीत व प्रत्येक वेळेस भावना मात्र शंभर टक्के समोरच्या पर्यंत पोचतातच. प्राध्यापकाच्या मते माणसांना असे जमले तर अनेक गोष्टी सोप्या होतील.

प्राध्यापकाचे म्हणणे बरोबर असेल. भावना प्रगट करण्याची एवढी साधने उपलब्ध असतांनाही गैर-समजुतीच्या रोगाने सर्व समाज ग्रस्त आहेत. ऑक्टोपसच्या पध्दतीने संवाद साधुन जीवन बरेच सुरळीत होइल. पण त्याचा दुष्परिणाम म्हणजे 'माझ तुझ्यावर प्रेम आहे' हे म्हणण्यात व अळणी जेवण्यात काहीच अंतर रहाणार नाही. कवि व लेखक जे आपल्या आयुष्याल अर्थ देतात किंवा चित्रकार जो रंग देतात त्याची सर ऑक्टोपसच्या यांत्रिक पण संपूर्ण संवादाला कधीच यायची नाही.

No comments: