5/15/24

मराठी स्वातंत्र्य समर १६८२ ते १७०७ - धोरणे, लढे, डाव-पेच आणि तत्सम इतिहास (चंद्रप्रकाशी लेखन)- भाग २ - फितुरीच्या गाथा आणि निझाम परिचय

                                                           

**या लेख मालिकेला मी चंद्रप्रकाशी अश्यासाठी म्हणले आहे कारण हे माझे मूळ संशोधन नाहीं. सेतू माधवराव पगडी लिखित इतिहासाचे पुनर्मुद्रण सध्या वाचतो आहे. त्यातील संशोधनाचा मागोवा आणि काही प्रमुख घटना  संक्षिप्तात मी येथे सादर करण्याचा हा प्रयत्न.  

या लेख-मालिकेचा पहिला लेख इथे उपलब्ध आहे. 

--

शिवाजी महाराजांच्या निधना नंतर मराठी राज्य प्रमुख म्हणून फार पटापट बदल झालेत. महाराज सन १६८० स्वर्गवासी झालेत. त्या नंतर नऊच वर्षात छत्रपती संभाजी यांची अचानक मृत्युमुखी पडलेत आणि त्या नंतर दहा वर्षातच राजाराम महाराजांचा पण मृत्यू झाला. थोडक्यात वीस वर्षाच्या कालखंडात तीन छत्रपती होऊन गेलेत. आणि काही कमी असेल तर भावी छत्रपती शाहू महाराज औरंगझेबाच्या कैदेत होते. अश्या डळमळत्या परिस्थितीतही मराठ्यांनी संघर्ष केवळ चालूच ठेवला असे नाहीं तर त्या संघर्षाच्या ज्वाला अधिक प्रखर केल्यात.

पण तुम्ही एखादे जमीनदार किंव्हा छोटे सरदार त्या काळात असाल तर स्वजीव रक्षण किंव्हा स्व-कुटुंब रक्षणासाठी एखाद वेळेस वेगळे निर्णय घेण्याची शक्यता आहे का? मराठ्यांकडून लढायचे कि मोघलांना जाऊन मिळायचे? आणि मोघलांना जाऊन मिळालो तर शेवट पर्यंत त्यांच्या सोबतच लढायचे कि पुन्हा माघारी घरी यायचे? कि सतत 'तळ्यात कि मळ्यात' खेळायचे, वाट बघत कि मराठे-मोघल संघर्षात शेवटी कोण जगतोय ते? असे अनेक प्रश्न तेंव्हाच्या अनेक साधारण मावळे आणि मातब्बर सरदारांना पडले असणार. बहुतांश मराठे मोघलांविरुद्ध संघर्षमय झालेत पण काही, क्वचितच वेळा, मोगालंनाहि जाऊन मिळालेत. नुसते एवढेच नव्हे तर सन १७०७, म्हणजे औरंगझेब नंतरहि काही मराठे सरदार उरलेले मोघल आणि उभरत्या निझामाला जाऊन मिळालेत. यांना आता फितूर म्हणायचे कि परिस्थितीचे बळी? 

फितूरच म्हणायचे. यात संदेह बाळगू नये. ही लोक फितूर होती. स्वजन, स्वधर्म आणि स्वराज्य विरुद्ध हि लोक परकीय, परधर्मीयांच्या बाजूने लढलीत. 

अर्थात फितुरी असली तरी त्या पैकी काहींच्या कथा/गाथा मनोरंजक नक्कीच आहेत.  

चंद्रसेन जाधव हा शूरवीर सेनापती धनाजी जाधव यांचा मुलगा. पण याने पेशवाईच्या उदयाच्या काळात निझामाची नोकरी पत्करली. हि फार आश्चर्याची आणि दुःखाची घटना मानायला हवी. पण स्वराज्याची सेवा म्हणजे नोकरी आणि जर का हवे ते मिळत नसेल तर जिथे ते मिळेल तिथली नोकरी पत्करावी अशी काहीशी विचारसरणी इथे दिसते. कारण धनाजी जाधव यांच्यासारखा ढाण्या वाघाचे, ज्याच्या नावाने मोघलांची घोडी पाणी पीत नसत अशी वदंता होती, वंशज निझामाची नोकरी का पत्करेल? पण असे घडले आणि एवढेच नव्हे तर छत्रपती शाहू आणि छत्रपती पदाचे दावेदार संभाजी यांच्या गृहकलहांत चंद्रसेन याने निझामाला मदत पण केली. यातून मराठेशाहीला नुकसान काही फारसे झाले नाहीं. पण चंद्रसेन आणि त्याची अपत्ये निझामाच्याच चाकरीत राहिलीत आणि पुढे नामशेष झाली. 

विठ्ठल सुंदर हे अजून एक विशेष व्यक्तिमत्व आहे. पुस्तकात विठ्ठल सुंदर आधी मराठ्यांकडून लढत होता आणि मग निझामाला मिळाला कि तो मूळ  निझामाच्या चरणी रुजू झाला हे नीटस कळत नाहीं. पण विठ्ठल सुंदर याने निझामाच्या पदरी बऱ्याच भानगडी, कारस्थाने आणि कामगिऱ्या केल्यात. जसे सन १७५८ ला फ्रेंच वकिलाला निझामाने ठार केले त्यात विठ्ठल सुंदरनेच तलवारीचा वार केला होता. तसेच इब्राहिमखान गारदी, ज्याने भाऊसाहेब पेशव्यांच्या पदरी पानिपतच्या युद्धात अतुलनीय पराक्रम केला, तो मूळ निझामाच्या पदरी होता पण इर्षेने विठ्ठल सुंदरनेच इब्राहिमखान गारदीला हाकलून लावले. या विठ्ठल सुंदर चा फार राग मराठी आणि पेशव्यांना होता. उदगीर च्या लढाईत निझामाला पेशव्यांनी चांगलेच पाणी पाजले आणि साठ लाखांचा मुलुख निझाम कडून घेतला.  पण भाऊसाहेब पेशव्यांनी निझामाला विठ्ठल सुंदरला बडतर्फ करण्याची मागणी निझामाला केली होती. या उदगीर च्या युद्ध इब्राहिमखान गारदी चांगलीच कामगिरी बजाविली म्हणूनच बहुधा भाऊसाहेबांमार्फत त्याने विठ्ठल सुंदर वर सूड उगवण्याचा प्रयत्न केला असणार. पुढे पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा झालेल्या पराभवाचा फायदा घेत निझामाने प्रचंड मोठा हल्ला मराठ्यांवर केला. सन १७६३ ला निझामाने थेट पुणे गाठले आणि शहर जाळले. सुरुवातीला मराठे गोंधळले असे दिसते. बहुधा निझाम इतकी धिटाई करेल अशी कल्पना मराठ्यांनी केली नसावी. पण लौकरच फळ्या उभारून मराठ्यांनी प्रतिकार सुरु केला आणि राक्षसभुवनीं मराठ्यांनी निझामाला गाठले आणि त्याचा दणदणीत पराभव केला. या युद्धात विठ्ठल सुंदर मारल्या गेला. विठ्ठल सुंदरची बुद्धी आणि तलवार अश्या प्रकारे शेवटपर्यंत निझामाच्या पदरीच जिझली. निझामाने सुद्धा त्याचे बरेच लाड केलेत. त्याला दिवाण बनविले होते आणि राजबहादूर व प्रतापवंत या पदव्या पण बहाल केल्या होत्या. 

वर उद्धृत केलेली दोन व्यक्ती केवळ उदाहरणे आहेत. मराठ्यांनी आक्रमकांची बाजू घेणे हे नवीन नाहीं. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा या घरभेद्यांशी झुंझावें लागले. खुद्द त्यांचे सावत्र भाऊ, व्यंकोजी सुद्धा त्यांना येऊन मिळाले नाहीत. शिवाजी महाराज असोत, संभाजी महाराज असोत कि राजाराम महाराज असोत, त्यांच्यावर आणि स्वराज्यावर झालेल्या सगळ्या आक्रमणांमध्ये काही मराठे नेहमीच भागी असत. छत्रपती संभाजींना पकडले सुद्धा घरभेद्यांमुळेच. कारण स्वराज्य हि कल्पना आकलनी पडणे सोपे नाहीं. स्वराज्याची सेवा म्हणजे नोकरी नाहीं. हे कर्तव्य आहे, हा धर्म आहे आणि हे कार्य आवश्यक आहे. या भावनांनी भारावून जाऊन जीव झोकून देणे कठीण कार्य आहे. यासाठी कार्यावर आणि कार्य-नायकावर अढळ विश्वास हवा. आणि कार्यपुर्तीत जीव गेला तरी हे कार्य पुढे चालू राहील, अगदी शेवटच्या माणसापर्यंत, याची शाश्वती मनात हवी. सध्याची परिस्थितीत जिथे चार लोक एक विचार मनात ठेऊन एक सद्-आचार करू शकत नाहीत तेंव्हा तीनशे वर्षांपूर्वी लाखो लोक एक प्रतीक, एकच ध्यास आणि एकच लक्ष्य ठेऊन वर्षानुवर्षे लढले. हि एक अपूर्व घटना आहे आणि कामगिरी आपण साजरी करायला हवी. 

निझाम कोण होता - एक अति-संक्षिप्त परिचय:

मूळचा उझबेकीअसलेला गाझीउद्दीन खान हा दक्षिणेत औरंगझेबासोबत दाखल झाला होता. या गाझीउद्दीन खान चा मुलगा चिल्कीचखान, जो पुढे पहिला निझाम म्हणून उदयास आला. गाझीउद्दीन आणि चिल्कीचखान लढवय्ये आणि हुशार होते. मैदानात त्यांच्या तलवारीला धार होतीच पण औरंगझेबआणि त्याच्या नंतरच्या दरबारातील डाव-पेच आणि कारस्थानात हे घराणे निपुण होते. गोवळकोंड्याच्या औरंगझेबाच्या वेढ्यात गाझीउद्दीन आणि चिल्कीचखान या दोन पिढ्या सामील होत्या आणि लढल्यात. बहुधा तेंव्हापासूनच त्यांनी दक्षिणेची जहागीर आणि हा किल्ला हेरला असावा. कारण औरंगझेब मेल्या-मेल्याचं त्यांनी गोवळकोंडा आणि हैद्राबादेत बस्तान बसवले. आणि सन १७१० पासून १९४८ पर्यंत त्यांची अनभिषिक्त सत्ता हैदराबाद आणि तेलगू प्रदेशात होती. या घराण्याने, खास करून चिल्कीचखान ने मराठ्यांना हुसकावून लावायला बऱ्याच खटाटोपी केल्यात. अनेक डावपेच आणि कारस्थान रचलित. एक जमाना असा होता कि या घराण्याचाच एक जण दिल्लीला मोघल दरबारी वजीर म्हणून होता आणि स्वतः निझाम दक्षिणेत होता. थोडक्यात पडद्या मागून आणि पडद्या समोर असे दोन्ही बाजूनी मोघली राज्य निझामच चालवत होता. पण थोरल्या बाजीरावांनी या चिलकीचखान च्या चांगल्याच मुसक्या बांधल्या होत्या. आधी पालखेड च्या युद्धात आणि पुढे भोपाळ ला थोरल्या बाजीरावांच्या पुढे चिलकीचखानाचे काही चालले नाहीं. पुढे सवाई माधवरावांच्या कारगीर्दीत राक्षसभुवनाला राघोबादादांच्या पुढे चिलकीचखानाचा नातू मराठी सैन्यासमोर नतमस्तक झाला. 


पण शोकांतिका अशी कि इतक्यांदा पराजयी होऊन निझाम नामशेष झाले नाहीत. पुढे इंग्रजांच्या काळातहि ते नांदले आणि शेवटी सन १९४८ ला श्री वल्लभभाई पटेलांच्या ऑपेरेशन पोलोने हे घराणे नाहीसे झाले. पण पेशवे मात्र १८१८ ला नाहीसे झाले!