4/1/24

मराठी स्वातंत्र्य समर १६८२ ते १७०७ - धोरणे, लढे, डाव-पेच आणि तत्सम इतिहास (चंद्रप्रकाशी लेखन)

**या लेख मालिकेला मी चंद्रप्रकाशी अश्यासाठी म्हणले आहे कारण हे माझे मूळ संशोधन नाहीं. सेतू माधवराव पगडी लिखित इतिहासाचे पुनर्मुद्रण सध्या वाचतो आहे. त्यातील संशोधनाचा मागोवा आणि काही प्रमुख घटना  संक्षिप्तात मी येथे सादर करण्याचा हा प्रयत्न.  
--
छत्रपती संभाजी महाराजांना दैवाने जणू संकटे आणि विपरीत परिस्थितीचे ताट वाटून दिले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी येणाऱ्या आक्रमणांचा प्रखर संघर्ष केला. जेंव्हा औरंगझेबाने औरंगाबादेत ठाण मांडले तेंव्हापासून मोघली साम्राज्याचा जवळपास शंभर वर्षांचा खजिना, सामर्थ्य, अनुभव आणि सैन्यबळ जणू फक्त आणि फक्त मराठ्यांना नामशेष करायला उतरले होते असे म्हणायला हरकत नाहीं. आपण या विषयावर चर्चा करतांना सहज म्हणतो कि शिवाजी महाराजांनंतरची पंचवीस वर्षे हा मराठी आणि हिंदू स्वांतत्र्याचे समर होते आणि त्यात शेवटी मराठ्यांनी औरंगझेबाला नामशेष केले. तीनशे वर्षांनी आपल्याला असे म्हणायला सोपे आहे. पण औरंगझेब जेंव्हा दक्खनी उतरला तेंव्हा त्याचा शेवट असा होईल असे म्हणता आले असते का? कल्पना करा कि आपण सन १६८५-८६ ल आहोत. लाखो मोघली सैन्य दक्खन मध्ये उतरले आहे. खुद्ध औरंगझेब आला आहे. त्याचा सामना करायचा तरी नेमका कसा? आणि कुठून आणि किती करायचा? मोघलांचा खजिना तेंव्हा म्हणजे कुबेराचा होता. उत्तर भारतातून त्यांना अखंड आणि अमाप पैसे मिळत असे. आणि भांडायला राजपूत अखंड शिपाई पुरवीत असे. गेली जवळ जवळ शंभर वर्षे हिंदू राज्ये बुडविण्याचा त्यांना अनुभव होता आणि त्यात ते नेहमीच यशस्वी ठरले होते. मोघली सैन्य म्हणजे साधारण नव्हते. त्यांचा पोशाख, चिलखते, शस्त्रात्रे, तोफा इत्यादी जणू अतुलनीय होते. काबूल आणि पुढल्या मुसलमानी सत्तांपासून त्यांचे भारतीय राज्य यशस्वीरीत्या टिकविले होते. आणि उत्तर भारतात त्यांची अनभिषिक्त सत्ता दीडशेहुन अधिक वर्षे होती. आणि दक्षिणेतील बहुतांश सत्ता वेळोवेळी मोघलांचे अंकित होते. घराणेशाही बघितली तर बाबर ने सन १५२६ साली स्थापिलेल्या मोघली सत्तेचा औरंगझेब सातवा वंशज होता. आसाम चे आहोम आणि छत्रपती शिवाजीनं व्यतिरिक्त मोघली सत्तेचा यशसवीपणे सामना हिंदुस्तानात कधीच कोणीच केला नव्हता. स्वतः औरंगझेब ला दक्खन हा भाग नवा नव्हता. त्याला सन १६५६ ला तो या भागाचा सुभेदार होता आणि बरीच वर्ष दक्षिण आणि दक्खन भागात तो वावरला होता.  

त्या तुलनेत मराठी राज्य लहान होते, शिपाई पण मराठेच होते आणि खजिना कसा पुरवायचा? सन १६४६ नंतरचा मराठी सत्तेचा अनुभव, म्हणजे फक्त पन्नास वर्षांचा. आणि संभाजी महाराज घराणेशाहीतील दुसरे आणि राजाराम महाराज तिसरे छत्रपती. पण तडफदारपण, डाव-पेच, युद्धकौशल्य, धडाडी आणि चाणाक्षपणा हा केवळ अनुभवांनीच येतो असे नाहीं. संभाजी महाराजांनी हे केवळ युद्धभूमीवर सिंह होते असे नाहीं तर त्यांची संघर्षाची धोरणे हि चाणाक्ष होती. त्यांनी संकटाचा बारकाईने अभ्यास केला होता.  ते अविरत आणि अखंड चढायांवर असत. त्यांनी महत्वाची ठाणी आणि किल्ल्यांवर भक्कम रसद आधीच पुरविली होती. त्यांनी हेरले होते कि औरंगझेबचे मुख्य लक्ष मराठे असले तरी त्याची इस्लामी अभिलाषा त्याहून अधिक विस्तृत आहे. उरलेली आदिशही, कुतुबशाही आणि दक्षिणेतील छोटी छोटी हिंदू राज्ये नष्ट करण्याचे त्याचे स्वप्न होते. कुतुबशाही किंव्हा आदिलशाही हि मूळ धर्मांतरित हिंदूंची होती. त्यामुळे परदेशातून आक्रमक म्हणून आलेल्या मोगलांना आणि औरंगझेब ला हि भारतीय मुसलमान निम्न वाटत असे. या काळापर्यंत औरंगझेब धर्मान्ध आणि वयाने अजून क्रूर झालेला होता. इस्लामी सत्तेचा हिरवा झेंडा त्याला काबूल ते रामेश्वरम पर्यंत फडकवायचा होता. 

संभाजी महाराजांनी झपाट्याने बदलत्या परिस्थितीत खरे शत्रू कोण याचा आढावा होता. त्यांना ठाऊक होते कि मोगल हात-पाय पसरवायला लागलेत कि गोव्यातून पोर्तुगीज बाहेर पडून स्वराज्याचे लचके तोडायला लागतील. त्यांनी गोव्यावर आणि पोर्तुगीजांवर दोन चढाया केल्यात. महाराजांना पोर्तुगीजांना पूर्णपणे नामोहरम करता आले नाहीं तर त्यांना गोव्यात चांगलेच कोंडले. आदिलशाही आणि कुतुबशाही यासुद्धा मुसलमानी सत्ता होत्या पण मागे म्हंटल्या प्रमाणे शेवटी भारतीय रक्त होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील करार लक्षात ठेऊन संभाजी महाराजांनी कुतुबशाहीला मदत करण्याचा प्रयत्न केला. याच्या व्यतिरिक्त मोगलांचे लक्ष वेधायला त्यांनी बुऱ्हाणपूर पर्यंत मजल मारून ते ठाणे लुटले. त्यामागचे धोरण असे कि मराठे नर्मदे पर्यंत किंव्हा नर्मदा पार करण्याची भीती उत्पन्न झाली तर मोगलांना एकतर थोडी माघार घ्यावी लागेल किंव्हा निदान कुमक पुन्हा उत्तरेला पाठवावी लागेल. पण या कुठल्याच डाव- पेचात संभाजी महाराजांना हवे तसे यश मिळाले नाही. शेवटी नशीब हि पाठीशी लागत. गोव्यात समुद्र भरती आली आणि मराठी सैन्य गोव्यात जाऊ शकले नाहीं आणि पोर्तुगीज वाचलेत. आदिलशाही लौकरच मोडकळीत निघाली आणि कुतुबशहाने सुद्धा नीट लढा दिला नाहीं. सन १६८७ ला कुतुबशाहीत फितुरी माजवून, औरंगझेब ने गोळकोंडा किल्ला घेऊन कुतुबशाही संपविली. औरंगझेब आता निर्धास्तपणे थेट दक्षिणेत जाऊ शकत होता आणि तिथून अजून खजिना आणि रसद लुटू शकत होता. समुद्राला पाठीशी ठेऊन आता मोगल सगळ्या बाजूंनी स्वराज्याच्या सीमा मागे ढकलीत होते.

थोडक्यात, सन १६८२ नंतरच्या पाच-सात वर्षात मोगलांचे आणि औरंगझेबाच्या बळ अधिक वाढले होते. 

स्वराज्यातील बरीच मराठी मंडळी घाबरून औरंगझेबाच्या मिळायला लागलीत. शिवाजी महाराजांनी वतने काढून स्वराज्याची स्थापना केली होती. आणि वतन संस्थेच्या ते विरोधी होते. येथे मोगलांचे वाढते बळ बघून जुनी सरदार आपली वतने मोगल समंतीत करून घेऊ लागलीत. संभाजी महाराजांनी अनेकांना खरमरीत पत्रे लिहिलीत आणि देव-धर्माची आण दिली. पण या आघाडीवरहि परिस्थिती बिकट होत होती. दोन वर्षाच्या कालावधीतच संभाजी महाराजांचे खंदे समर्थक आणि अत्यंत शूरवीर असे सरसेनापती हंबिबराव मोहिते यांचा पण एका युद्धात मृत्यू झाला. हा संभाजी महाराजांना आणि स्वराज्याला हादरा बसला.

अश्या परिस्थितीत दगाफ़टक्याने छत्रपती संभाजी यांचे पकडल्या जाणे आणि मग मोगलांनी केलेल्या अनन्वित अत्याचारांना सामोरे जाऊन त्यांचा मृत्यू होणे हि फार धक्कादायक घटना होती. संभाजी महाराजांची शेवटी जीवाची किती घालमेल झाली असेल याची कल्पना करणे कठीण आहे. शारीरिक यातना आणि आपल्या नंतर पुढे स्वराज्याचे काय होणार या विचाराने मानसिक यातना. पण येथेही त्यांच्या सामर्थ्याची प्रचिती येते. मुसलमान होण्यास नकार देऊन आणि औरंगझेब समोर मस्तक न झुकावून त्यांनी हौतात्म्य पत्कारले कारण स्वराज्याला, मावळ्यांना, मराठी सैन्याला जणू ते शेवटले उत्स्फूर्त करू इच्छित होते. आणि नेमके तसेच झाले. 

औरंझेबाला वाटले कि संभाजी महाराजांनंतर मराठी राज्य संपलेच. आणि काही कमी असेल तर शाहू महाराज हि त्याच्या कब्ज्यात होते. पण या क्षणी औरंगझेबाने काही महत्वाच्या चुका केल्यात आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूने पेटलेल्या मराठ्यांनी याचा पुरेपूर उपयोग केला. 

छत्रपती संभाजी महाराजांच्या अचानक झालेल्या मृत्यू मुळे मराठे दिडमूढ झाले होते. पण त्यांनी हार मानली नव्हती, कच खाल्ली नव्हती. छत्रपती राजाराम आणि मंत्रिमंडळाने ठरवले कि छत्रपतींनी महाराष्ट्रात रहाता काम नये. हि चाल राजाराम महाराज व मराठी लष्करी रणनीतीचा एक हिरा म्हणता येईल. महाराष्ट्रापासून खूप दूर, थेट दक्षिणेला जिंजी च्या किल्ल्यात राजाराम महाराज गेलेत. यात तीन गोष्टी साध्य झाल्यात. एक म्हणजे मोगलांचे वाढते बळ आणि वाढती फितुरी बघता, महाराष्ट्रात राहून पकडल्या जाण्याची शक्यता कमी झाली. राजाराम महाराजांना दगाफटका झाला असता तर स्वराज्याने दहा वर्षात आपला तिसरा छत्रपती गमावणे फार कठीण गेले असते. दुसरे म्हणजे राजाराम महाराजांना औरंगझेबाने आपलं एकुलते एक लक्ष्य बनविले असते. आणि त्यासाठी त्याने आणि मोगलांनी स्वराज्याची प्रचंड जाळपोळ केली असती. तिसरे म्हणजे,दूर दक्षिणेला राजाराम महाराज असणे म्हणजे  आता स्वराज्याचे सगळे किल्ले आणि जमिनी घ्याव्यात कि स्वराज्य नायकास पकडावे हे कोडे औरंगझेबाच्या सोडविणे आवश्यक झाले.  

या सोबत राजराम महाराज आणि रामचंद्रपंत अमात्य यांनी मराठी सरदारांना त्यांची वतने देणे पुन्हा चालू केले. अनेक दशके मराठ्यांना लागलेले वतनदारीचे 'व्यसन' शेवटी छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांना काही सोडवता आले नाहीं. पण हातघाईची वेळ होती. स्वराज्य तगायला सरदार हवेत, सैन्य हवे आणि महाराष्ट्राचा भूभाग माहिती असलेले हवेत. वतनदारीच्या पुन्हा सुरुवातीच्या अनेक फितलेले सरदार परत आलेत आणि त्यांनी मोघली अंतापर्यंत स्वराज्याला साथ दिली. एवढेच नव्हे तर मोगलांनी जिंकलेल्या भूभागाची वतने पण छत्रपतींने सरदारांना बहाल केलीत. त्यामुळे संभाजी महाराजांच्या मृत्यूने पेटलेले मराठी सैन्य आणि थोड्याबहुत प्रमाणात स्वार्थाने पुन्हा उभे राहिलेले मराठी सरदार एकत्र येऊन मोघलांनवर तुटून पडलेत. गेलेले किल्ले पुन्हा घेणे, गेलेली गावे पुन्हा जिंकणे, मोघलांची ठाणी लुटणे, गनिमी काव्याने ठिकठिकाणी मोघलांना धोपटणे, रसद तोडणे, उत्तरेहून येणारी रसद, खजिना लुटणे इत्यादी अनेक मार्गांनी मराठ्यांनी लढा अखंड चालू ठेवला. 

औरंगझेबाने त्याच्या अनेक चुकांपैकी एक महत्वाची चूक केली म्हणजे त्याने दोन आघाड्यांवर मराठ्यांना विरुद्ध लढायचे ठरवले. एक आघाडी म्हणजे जिंजीला वेढा देणे (जो सात वर्षे चालू होता), छत्रपती राजाराम महाराजांना पकडण्यासाठी  आणि दुसरी आघाडी म्हणजे स्वराज्यातला एक एक किल्ला लढवून जिंकणे. आता दुसरी आघाडी खऱ्यात अनेक आघाड्या होत्या. प्रत्येक किल्ला जिंकायला मोघलांना प्रचंड कष्ट पडलेत आणि त्यांनी या भानगडीत अगणित खजिना ओतला. आणि मोघलांनी जिंकलेला अक्षरशः प्रत्येक किल्ला मराठ्यांनी काही वर्षात पुन्हा जिंकला. अनेक किल्ले मराठे मोघलांकडून लाच घेऊन सोडून देत आणि वर्ष-दोन वर्षात पुन्हा जिंकीत. माझ्या माहिती प्रमाणे फक्त तोरणा किल्ला मोघलांनी लढून जिंकला होता. औरंगझेबाने किल्ल्याचे नाव बदलून फुतबुलपूर कि असे काही तरी ठेवले होते.

(क्रमशः)