9/22/10

घराच्या सान्निध्यात

अमेरिकेच्या उत्तर-पूर्वेला मेन (Maine) नावाचे राज्य आहे. उन्हाळ्यात हा प्रदेश फार सुंदर होतो. सगळीकडे हिरवीकंच चादर पसरली असते आणि त्यातुन रस्ते असे जातात की वाटत झाडांसोबत रस्ते ही जमिनीतुन उगवले आहेत. मागल्या आठवड्यात माझा कॉलेजचा मित्र भेटायला आला होता. इथे उन्हाळा संपत आलाय त्यामुळे शेवटले काही दिवस मुठीतून सुटायच्या आधी म्हणुन आम्ही दोघांनी ठरवल की मेन ला चक्कर मारायची. माझ्या एका मैत्रिणिच लेक-हाउस मेनच्या उत्तरेस आहे. नशिबानी ती तेंव्हा तिथेच होती त्यामुळे आम्ही तिच्याकडेच जायच ठरवल. इथे, अमेरिकेत, उच्चाभ्रु लोकांची उन्हाळ्यासाठी खास अशी वेगळी घर असतात. त्या घरांना समर हाउसेस म्हणतात. बहुधा करुन ही घर समुद्र पट्टीवर असतात किंवा, माझ्या मैत्रिणीच, लॉरा च जस होत तस एखाद्या तलावाच्या काठावरही असतात. उन्हाळ्यात मुला-बाळां सोबत ही कुटुंबे एखाद-दोन आठवडे या घरात घालवितात.

लॉराच घर मेनच्या उत्तरेला चायना लेक नावाच्या तलावाच्या काठावर होत. या तलावाल चायना लेक का म्हणतात हे नका विचारु कारण तिथल्याही कोणाला या नावाच्या उगमा बद्दल माहिती नव्हत. घराची बांधणी संपूर्णपणे लाकडाची होती. घराच्या आजुबाजुल अंगण आणि समोर थोड उतरून तलाव. होड्या लावायला आणि पाण्यात उड्या मारायला तलावात २० फुटाच लाकडाचा धक्का बांधलेला होत. लॉरा घरची फारशी श्रीमंत नाहीया. हे घर तिच्या पणजोबांनी सन १९०० ला बांधलेल आहे. तिचे पणजोबा फोर्ड मोटारींना कार्बोरेटर पुरवित असत. अर्थातच, पणजोबांनी बराच पैसा कमविला असणार. कार उद्योगाने जगभरात क्रांती घडवली आणि त्या क्षेत्रात फोर्ड उद्योग समुदाय अग्रगण्य मानल्या जातो. झपाट्याने प्रगती होत असलेल्या उद्योगात तिचे पणजोबा आघाडीवर असणार आणि ते बरेचदा हेन्री फोर्डला भेटले असणार. शंभर वर्षांपूर्वी जग केवढ वेगळ होत. शंभर वर्ष जुन्या बर्‍याच वास्तु अजुन उपयोगात आहेत पण एकाच कुटुंबात असलेल्या आणि अजुनही रहात्या घरात रहाण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. आजही अमेरिकेच्या या भागात लोकसंख्या इतकी कमी आहे कि सगळ्या रस्त्यांवर दिवे लावले नाहीयात. त्यामुळे सूर्य मावळला कि सगळीकडे गुडुप अंधार होतो. रात्री आठ ला बहुतांश व्यापार बंद होतो. दळण-वळणाची साधने आणि घरात वीज हे बदल वगळता, घर बांधल्याच्या काळापासुन या भागात फारसा फरक पडलेला दिसत नाही.

पण शंभर वर्षात बाहेरच्या दुनियेचा चेहरा मोहरा न ओळखता येण्या जोगा बदलला आहे. शंभर वर्षांपूर्वी न्यू-यॉर्क शहरात वेग प्रतिबंध ८ मैल प्रति तास होता. पहिल महायुध्द व्हायच होत. तुर्की साम्राज्य शाबुत होत. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच नेतृत्व लोकमान्य टिळकच करत होते. गांधीजी दक्षिण अफ्रिकेतच होते. जग अजुनही प्रामुख्याने घोड्यांवरुनच फिरत होत. या सगळ्या घटनांचा एकामेकांशी फारसा संबंध नाही. माझ्या आजोबांचा जन्म ही १९०५ चा आहे आणि त्यांच्या संदर्भातही या घटनांचा उल्लेख केल्या जाउ शकतो पण माझ्या आजोबांचा किंवा माझ्या ओळखीतल्या कुठल्याही आजोबांचा हेन्री फोर्ड सारख्या तत्सम काळ बदलविणार्‍या व्यक्तीशी नव्हता. काही बिघडल अस नाही पण त्या घरात रहातांना उगाच गंमत वाटत होती.

फोर्ड कंपनीला कार्बोरेटर पुरविणार्‍या कुटुंबाची प्रगती पुढे मोठ्या उद्योग समुदायात होणे सहाजिक होते पण तस काही झाल नाही. लॉराच्या आजोबांनी जमिनीचा धंदा केला पण पणजोबांनी बांधलेल घर मात्र पुढल्या पिढ्यांनी जतन करुन ठेवल. त्या घरात वर्षानुवर्ष ही लोक एकत्र येतात. लॉराच मूळ गाव या घरा पासुन २४ तासाच्या अंतरावर आहे तरीही ती आणि तिच कुटुंब दरवर्षी उन्हाळ्यात एक आठवडा या घरात घालवित असत. घर मोठ असल तरी बांधणी साधी आहे. कारण तिथे थंडी इतकी भयंकर असते की थंडीत त्या घरात रहाणे अशक्य आहे. पण घरात जुजबी सगळ्या गोष्टी आहेत. तलावात होडी (कनु) आहेत आणि काठापासुन काही अंतरावर दहा फुट उंचीची लाकडाची बुर्जणासारख मुलांना पाण्यात उड्या मारायला बांधलेल आहे. इतकाल्या उन्हाळ्यांमधे येणार्‍या जाणार्‍यांची छायाचित्र सगळीकडे लाउन ठेवली आहेत. त्यात लॉराच्या पणजी आणि पणजोबांच छायाचित्र आहे. त्यांच्या साखरपुड्यापासुन ते लग्नापर्यंतच्या ९० दिवसात पणजोबांनी पणजीला ९० पत्र लिहिलीत. लॉरानी ती पत्र अजुनही जपुन ठेवली आहेत. इतक्या वर्षात येणार्‍या-जाणार्‍यांनी, हसण्यांनी, गप्पांनी आणि जेवणांनी त्या घराला आलेल्या विशिष्ट व्यक्तीमत्वाची जाणीव होते. आणि त्या व्यक्तीमत्त्वाने पणजोबां पासुनची चौथी पिढीचे त्या घराशी तितकेच जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ती वास्तु दगड-विटांची, लाकडाची न रहाता जिवंत होते. आणि त्या वास्तुचे ठसे रहाणार्‍यांवर नेहमी साठी उमटतात.

त्या घराचा परिणाम म्हणा कि खुप दिवसांनी फुरसत मिळाली म्हणा पण घरा बद्दल माझ्या डोक्यात बरेच विचार एका-मेकांशी गप्पा मारतायत. आमच सध्याच घरही शंभर वर्ष जुन असेल. पण माझ्या आजोबांनी ते सन १९७२ ला विकत घेतल. या वर्षी ते घर आम्ही विकतोय. बरीच कारण आहेत. आम्हा सगळ्यांना वाईट वाटतय. काही लोक म्हणतात कि आठवणी महत्त्वाच्या. ते मला मान्य आहे. पण ते झाल घरातल्या आठवणींच, घराच्या आठवणींच काय?


माझ्या आजीच्या अस्थि विसर्जनाला आम्ही जबलपूरला, नर्मदेच्या काठी, गेलो होतो. माझी आई आणि तिची भावंड सगळी जबलपूरला वाढली. ती तिच्या लहानपणीच्या खुप गोष्टी सांगते. त्यांच जुन घर अजुनही उभ आहे. त्यात आता दुसर कुटुंब नांदतय. आईला अजुनही आठवणी काढायच्या तर घर आहे. मला तस चालल असत.

आमच्या घराची बांधणी जुन्या पध्दतीची आहे. माझ्या लघुकथांपैकी "घर" कथेत मी माझ्या घराच वर्णन केलय. ती कथा म्हणजे मला पडलेल खर स्वप्न होत. (आता मला असली स्वप्न का पडतात देवच जाणे) पण त्या स्वप्नातील विचित्रपण व्यतिरिक्त मला घामेघुम करणार दृश्य म्हणजे आमच्या घराची झालेली तोडफोड होती. घराची ती दूर्दशा मला स्वप्त्नातही सहन झाली नाही. उद्या ते घर खर्‍यात अस अवशेष होत नाहीस होणार या कल्पनेनी शहारे येतात.

लॉराच्या कुटुंबानी घराच्या हिस्स्यांवरुन भांडण व्हायच्या आधीच घराच्या नावाचा ट्र्स्ट स्थापन केला आणि ते घर जतन केल. आम्हाला तसल काही करण शक्य नाही. त्यातुन नविन फ्लॅट इतकाले महाग झाले आहेत की जुन घर विकल्या शिवाय गत्यंतर नाही. आणि तसही मी आणि दादा परत कधी घरी येणार सांगण कठीण आहे. दादा त्याच्या सुखी संसारात रुळला आहे आणि मी गृहस्थाश्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. एका दृष्टीने विचार केला तर त्या घरात आम्हा सगळ्यांची भरभराट झाली. त्या घरानी आमची भरभराट केली. पंख पसरवुन बर्‍याच वर्षांपूर्वी आम्ही बाहेर पडलो, जग हिंडलो पण संध्याकाळी घरी परतायची आस अजुनही जात नाही.

7/19/10

मला काय आठवत

* खुप लहान असतांना आमच्या आईंनी साड्या विकण्याचा धंदा काही वर्ष केला. मी बालक मंदिरातुन दुपारी परत आल्यावर झोपत असे (मी तीन-चार वर्षांचा होतो) आणि भर दुपारी नेमक्या काही बायका साड्या घ्यायला आल्यात तर मल खुप राग येत असे. मी झोपेत कुरकुर करायचो. लहानपणी किती मुर्ख होतो हे आठवुन आता हसु येत आहे.

* पाच-सहा वर्षाचा असतांना मी सायकल नुकताच शिकलो होतो. आणि लगेच स्वतःवरच खुश होउन मी एक हात सोडुन सायकल चालवत फिरायला लागलो. पण स्टाईल मारायला (कोणावर स्टाईल मारत होतो कोण जाणे!) मी दोन हात सोडुन चालवायचा प्रयत्न करायला लागलो पण सायकलीच हँडल काही सरळ राहिना. मग विचार केला कि हात सोडुन द्यायचेत आणि बघायच की सायकल कुठे जाते. लहानपणी सगळेच हुशार असतात, मी त्याला अपवाद नव्हतो. घराबाजुच्या मोठ्या रस्त्यावर मी सायकल जोरात हाणली आणि हात सोडलेत. कानात सुर् वार वहात होत. काही वेळ सायकल सरळ गेली. मग ती वाकडी वाकडी जायला लागली. सायकलच्या सीट ला जोर लावुन मी सायकलीला सरळ ठेवण्याचा प्रयत्न करु लागलो पण ढिम्म् काही होईना. त्या भानगडी रस्त्याच्या बाजुला कचर्‍याचा जो ढीग होता त्या दिशेनी भरधाव जातो आहे या कडे लक्षच गेल नाही आणि जेंव्हा लक्षात आल तेंव्हा तीर निशाने की और बढ चुका था। कचर्‍याच्या ढिगात आमच्या मोहोल्ल्यातला कचरा साफ करणारा बावाजी उभा होता. "बावाजी बाजु हटो।" अशी मी जोरात आरोळी ठोकली. आता म्हातारा असल्यामुळे त्याला ऐकु आल नाही की तो कचर्‍याच मग्न होता माहिती नाही पण त्याने वर बघितल तेंव्हा मी त्याच्या फुटक्या चष्म्याच्या काचांपासुन दोन इंचांवर होतो. नशिबानी मी तेवढाच त्याच्यावर आपटलो आणि सायकल सरळ कचर्‍याच्या ढिगात घुसली.
"दिखता नही क्या?" एवढच तो म्हणाला आणि रागानी हातातला खराटा माझ्या पायावर मारला.
मी घाई-घाईनी सायकल कचर्‍यातुन काढली आणि घराकडे पळालो. पुढली बरीच वर्ष मी एक हात सोडुनच स्टाईल मारत होतो.

* मला बालक मंदिरात सोडायला कधी-कधी लिलाबाई येत असे. बिचारीचे हात भांडी घासुन खरखरीत झाले होते. मी फुदकत फुदकत चालायचो म्हणुन ती माझ मनगट घट्ट धरुन तरा-तरा नेत असे. तिचे ते खरखरीत हात मनगटाला टोचायचेत. "लिलाबाई हात नको पकडुस, तुझे हात टोचतात" तिला काय बोलाव सुचत नसे. नुसतच ती माझ्याकडे बघायची. तिचं ते बघण मला अजुनही आठवत.

* दादाला तेंव्हा एक नविन शर्ट मिळा होता. सायकलनी जातांना तो शर्ट वार्‍यानी मागुन फुगायचा. पण माझ्या जर्सीच काही तस होत नसे. मग मला राग यायचा आणि मी त्याच्याशी भांडायचो. सायकलीने त्याच्या मागे बसुन जातांना मी त्याच्या पाठीवर गुद्दे मारायचो, तो फुगलेला शर्टाचा भाग दाबायला.
तरी तो बिचारा मला डबल-सीट बसवुन सगळीकडे फिरवायचा.

*आमच्या घरा जवळ मोठ्ठ मैदान होत आणि त्यापलिकडे नदी. आता त्या नदीचा नाला झाला होता. पण पावसाळ्यात नदीला उत येउन मैदानाचा काही भाग चिखलमय होत असे. मी त्या चिखलात पहुडलेल्या म्हशींवर बसुन फिरत असे. असच एकदा म्हशीवर बसलो असतांना वरचे ढग उघडलेत तर सुर्याची किरण डोकावत होती. मला दादानी सांगितल होत की सुर्य प्रकाश कोणाला दिसु शकत नाही पण सुर्याच्या प्रकाशात सगळ दिसत. मला ते फारस झेपल नव्हत. पण डोकावणार्‍या किरणांचा झोत बघुन मला वाटल की सुर्य प्रकाश बघणारा मी पहिला माणुस आहे. मी आनंदाने म्हशीकडे बघितल. पण तिच्या डोळ्यात "हे पोट्ट घरी जाउन मार खाणार आहे" एवढेच भाव होते.

*आमच्या बालक मंदिराच्या (मी अहिल्या मंदिर - बालक मंदिरात जात असे) प्रमुख रजनी ताई होत्या आणि पोरांना शिकविणार्‍यां पैकी कुसुम ताई होत्या. कुसुम ताई कधीच रागवत नसत. खेळण्याच्या सुट्टीत (आता खर तर दिवसभर खेळच चालायचेत. पण 'खेळण्याच्या' सुट्टीत आमच्यावर कोणाच लक्ष नसे.) आम्ही कुसुम ताईंना आळी-पाळीने मिठ्या मारायचो. आणि त्या प्रत्येकाला गोंजारायच्या.
पण दुसर्‍या वर्षी त्या परत आल्या नाहीत. लग्न झाल असाव.

* पहिलीत मला घरा जवळच्या टिळक विद्यालयात घातल होत. तिथे कुबडे आणि कुथे हे माझे जिगरी दोस्त होते. पण पुढल्या वर्षी मला दुसर्‍या शाळेत गेल्या वर मला ते कधीच भेटले नाहीत. नविन शाळेत सुरुवातीला मला त्यांची खुप आठवण येत असे. कुबडे हाडकुळा होता. तो हातात सतत एक रुमाल बाळगत असे आणि बोलतांना तो तोंडावर सतत रुमाल लावायचा. कुथे थोडा जाडा होता आणि ठेंगणा होता पण तो हातात रुमाल वगैरे घेउन हिंडत नसे.
मल त्या दोघांना एकदा तरी भेटायच आहे.

* लहान असतांना चंद्रपूरला मामाकडे दिवाळीला गेलो होतो. एकदा जेवणा नंतर सिताफळ खातांना मी काही बिया गिळल्या. झाल, मला सगळे चिडवायला लागलेत की आता माझ्या पोटातुन झाड उगवणार आणि तोंडातुन ते बाहेर येणार. सुरुवातीला मी धीर धरला. फक्त मामी मला समजावत होती की अस काही होणार नाही म्हणुन. पण मग मामा म्हणाला कि ते झाड माझ्या तोंडातुन उगवणार म्हणजे मलाच त्या झाडाला लागलेली सिताफळ खाता नाही येणार. मग मात्र माझा धीर सुटला.
सगळ्यांची बरीच करमणुक झाली.

* एकदा मी आणि आजोबा श्रीराम मामांकडे जात होतो. सायकल रिक्षातुन. मला नीट रस्ता माहीती होता. घरापासुन सुरुवातीच रस्ता रिक्षेवाल्याला सांगितल्यावर मला रिक्षात गाढ झोप लागलेली. एवढ्या रणरणत्या उन्हात झोपणारा मी एकलाच नग असणार पण दुपारची वेळ होती त्याला मी तरी काय करणार? सहाजिकच मला जाग आली तेंव्हा आम्ही भलत्याच ठिकाणी पोचलो होतो.
पुढे काय झाल सांगायची गरज नाही. आजोबांनाच विचारा!

* आम्ही लहानपणी जवळच्या मैदानावर सायकलच्या शर्यती लावायचो. मागच्या गल्लीतल्या एक मुलासोबत, ज्याच नाव आता आठवत नाही पण चेहरा अजुनही आठवतो, मी शर्यत लावली . त्याने मला हरवल. मी त्याला म्हटल की त्याची सायकल नवीन आहे म्हणुन तो जिंकला. त्यानी परत शर्यत लावली. पण यंदा मी त्याची नवीन सायकल चालविणार होतो. आणि तो माझी जुनी.
मी परत हारलो. त्या नंतर बरीच वर्ष मी माझ्या मनात त्याला धोपटायची इच्छा सुकत ठेवली होती.

* आमच्या वडिलांनी खुप वर्ष शहरातल्या कापडाच्या गिरणीत नोकरी केली. गिरणीच्या मालकीच एक गेस्ट हाउस होत आणि गिरणीतल्या लोकांची तिथे वर्षातुन एक-दोनदा तरी गेट-टुगेदर होत असत. मला एकदा आई-बाबा घेउन गेले. बुफे होता आणि जेवण उशीरा होत असे म्हणुन आईने माझ ताट वाढुन दिलं. आता इतक्या सगळ्या लोकांसमोर, गर्दीत मी 'वदनी कवळ घेता' कस म्हणु ते कळेना. लाज वाटत होती. मी बराच वेळ तसाच बसलो होतो. थोड्या वेळानी खुप भूक लागली पण ' वदनी कवळ' म्हटल्या शिवाय जेवणार कस?
शेवटी मी टेबला खालती, कोणाला दिसणार नाहीत असे, हात जोडलेत. डोळे किलकिले मिटलेत. फटीतुन मी बघत होतो कि कोण आपल्या कडे बघतय ते. (कोणी म्हणजे कोणी सुद्दा बघत नव्हत!) आणि सुपर-फास्ट गतीने -
'वदनी......श्री हरीचे.....सहज.....जीवन .....ब्रह्म.....उदर.....कर्म....ओम....राम....ओम्...सहना......वही....तेज.....वही.....शांति: शांति: शाति:.... म्हटल आणि जेवायला लागलो.

*मी तीन-चार वर्षांचा असतांना खामगावला एका लग्नाला गेलो होतो. लग्न रविवारी असाव कारण त्याच दिवशी रामायण प्रक्षेपित होणार होत. आणि नेमका तो भाग कुंभकर्ण वधाचा होता. मी सकाळ पासुन आईच्या मागे लागलो होतो की मला कुंभकर्ण वध बघायच आहे. आता खामगाव सारख्या गावात (त्या गावाच्या नावतच गाव आहे!) आणि लग्नाच्या मांडवात टि.वी. कुठुन मिळणार. आणि अगदी टि.वी. असता तरी नवरा-नवरीने हार हातात घेउन काय कुंभकर्ण वध बघायचा का? पण माझ्या बालबुध्द्दीला असले प्रश्न झेपणारे नव्हते. कोणी ऐकत नाहीय बघुन मी शेवटी मांडावा बाहेर पडलो आणि हिंडत एका घरासमोर टि.वी. बघत उभा राहिलो. चांगले कपडे घातलेला गोरा-गोमट पोर बाहेर उभ आहे बघुन त्या लोकांनी मला आत घेतल. मी मनात म्हटल की ' उत्तम, आता कुंभकर्ण वध नक्कीच बघायला मिळणार'. इथे मांडवात माझ्या नावाचा गजर झाला. मला शोधण्याच्या धावपळीत कोणाला तरी मी त्या घरात टिवी बघतांना दिसलो. सगळ्यांनी रागवल. चार-चौघांसमोरे चांगल दिसत नाही म्हणुन आई-बाबांनी बत्ती दिली नाही. रामाची कृपा!
नवरा-नवरी विचार करत असतील की आमच लग्न लागत होत आणि मांडव चिन्मयला शोधत होता.

4/26/10

तुर्की साम्राज्या बद्दल अजुन थोडं

लपांटोच्या युध्दाबद्दल लिहिण्याच्या प्रकल्पात तुर्की साम्राज्याबद्दल बरच वाचन झाल. त्यामुळे लपांटोच्या युध्दाचा दुसरा भाग लिहिण्याच्या आधी हा लहानसा लेख लिहिल्या शिवाय मला रहावत नाही. तसदीबद्दल क्षमस्व. लपांटोच्या युध्दाबद्दलच्या लेख मालिकेतला हा व्यत्यय असला तरी त्या लेखांची लय तुटणार नाही याची मी काळजी घेण्याचा प्रयत्न करीन.

तुर्की साम्राज्या महान आणि वैभवशाली होत यात वाद नाही. जगाच्या ज्ञात इतिहासात होउन गेलेल्या राजघराण्यांच्या आणि साम्राज्यांच्या स्पर्धेत तुर्की साम्राज्याचा क्रमांक बराच वरचा लागेल. गंमतीची बाब अशी की हि तुर्की लोक मुळात मध्य आशियातील होती आणि त्यांनी राज्य मात्र अनातोलिया आणि अंकारा भागात प्रस्थापित केल. एकाच कुटुंबाने ६ शतके राज्य करणे हि सुध्दा काही छोटी गोष्ट नव्हे. सतराव्या शतकाते सुल्तान बर्‍याचश्या प्रमाणात शंख असले तरी पहिले तीनशे वर्ष या कुटुंबाने एकाहुन एक सरस असे सेनानी आणि राज्यकर्ते निर्माण केलेत. याच काळात या साम्राज्याची प्रचंड भरभराटा झाली आणि साधारण मानल्या जाणार्‍या आमिर या पदवी पासुन त्यांनी स्वतःला इस्लामी जगताचा खलिफा घोषित केल. अर्थात इतर मुसलमानी सत्ताधिशां साठी एक उदाहरण मांडीत प्रचंड प्रमाणावर विध्वंस केला. या लेखात मी दोन मुद्दे वाचकांसमोर मांडणार आहे. पहिला म्हणजे तुर्की राज्यकर्त्यांची रक्तपिपासु वृत्ती आणि दुसरा, तुर्की इतिहासाच्या झोतात मराठी साम्राज्याचा संक्षिप्तात आढावा.

उत्तर भारतात जसा मुसलमानी आक्रमकांनी नाश केला तसला विध्वंस तुर्कांनी पूर्व युरोपातही मांडला. प्रचंड सैन्य उभे करुन यांनी युरोपावर सतत चढाया केल्यात. अतोनात प्राणहानी केली आणि प्रचंड प्रमाणावर गुलामांचा व्यापार केला. पूर्व युरोपातील सुंदर बायकांना आपल्या हारेम मधे दाखल करण आणि सुदृढ पोरांना गुलाम म्हणुन विकल. भारतात मुसलमानी आक्रमकांनी अत्याचार केलेत की नाही यावर वाद घालणार्‍या इतिहासाचार्यांनी तुर्की इतिहास वाचावा. पहिल्या तीनशे वर्षात एक ते दिड लाख सैन्य घेउन त्यांनी इतकाल्या चढाया केल्यात की एवढी लोक त्यांना मिळत कुठुन होती हा प्रश्न मनात येतो. त्यांच्या युध्द पध्दतीचा एक महत्त्वाचा अंग म्हणजे दरोडेखोर आणि भाडोत्री सैनिक होय. ही लोक सगळ्यात पहिले हल्ला करित असत आणि मग त्यांच्या नंतर खर्‍या सैन्याचा पुर फुटत असे. तसेच तुर्कांकडे त्या काळातील प्रगत तोफा होत्या. आणि कुठलाही किल्ला किंवा शहर काबिज केल्यावर ते लुटायला सैनिकांना मुभा होती. ही लुट इतकी महत्त्वाची होती कि सन १५१० च्या दशकात इजिप्तच्या स्वारीत तुर्की सैन्य नाखुश होत कारण इजिप्त मुसलमानी प्रांत असल्यामुळे तो लुटायची संमती सैनिकांना नव्हती. तसच सोळाव्या दशका नंतर ही लुट मिळण कमी होत गेल आणि त्यामुळे बरेच उठाव झालेत.

तुर्की सुल्तान हे खास करुन खुनशी होते हे तर सहाजिकच झाल. सन १४१२ ते १४२० ची कारागिर्द असलेला सलिम पहिला हा त्यांच्यातला हिरा होता. त्याने इतक्या वजिरांना मारल की तुर्कीत की कोणाला शिवी द्यायची तर त्याला सलिम चा वजिर हो अस म्हणत असत. कत्तली करण्याचा त्याला जणु छंद होता. पण स्वतःच्याच लोकांना तो स्वतःच्या डोळ्यासमोर मारायचा. त्याचे अंगरक्षक यासाठी प्रसिध्द होते. सलिम ने हुकुम दिला की त्या वजिराला किंवा अधिकार्‍याचा तिथल्या तिथेच शिरच्छेद केल्या जात असे. सुलेमान ज्याला द मॅग्निफिसंट ही पदवी लोकांनी दिली तो त्यातल्या त्यात बरा होता. त्याने फार कमी कत्तली केल्यात. तरी त्याच्या नेसलेल्या कपड्यांना त्याच्याचा नोकराचा स्पर्श झाला म्हणुन त्याने त्या नोकराला फासावर चढवल. पण या घराण्याचा शिसारी येणारा प्रकार म्हणजे गादी मिळवायला भावंडांची कत्तल करणे होता.

औरंगझेबाने आपल्या भावंडाना मारुन गादी मिळवली यासाठी तो कुप्रसिध्द आहे. (अजुन बर्‍याच कारणांसाठी तो कुप्रसिध्द आहे. पण त्यातल हे एक!) पण तुर्की राजघराण्यात तर ती मानलेली प्रथा होती. पहिले दोन-तीन सुल्तान वगळाता पुढल्या सगळ्यांनी भावंडांच्या रक्ताने माखलेल्या पायांनी राज्यारोहण केले. नुसती भावंड नाही तर त्यांची मुल, त्यांचे जावई सगळ्यांना ओळीनी मारल्या जात असे. एका सुल्तानाच्या भावाला आणि त्याच्या मुलाला मारतांना हा सुल्तान त्यांच्या किंचाळ्या ऐकायला बाजुच्या खोलीत मुद्दाम येउन बसला. आणि त्यांना मारायला उशीर होउ लागला तर त्याला फार राग आला.

सतराव्या शतकानंतर भावंडांना मारण्या ऐवजी त्यांना जन्मभर एखाद्या दुरच्या गावातल्या महालात बंदिस्त करुन ठेवत असत. नुसत भावंडांनाच नाही तर आपल्या मुलांनी उठाव करु नये म्हणुनन त्यांनाही असच महालात बंदिस्त करुन ठेवल्या जात असे. साम्राज्याच्या आरंभीचे सुल्तान त्यांच्या मुलांना वेग-वेगळ्या प्रांतांचे सुभेदार म्हणुन नेमत असत. त्यामुळे त्यांना राज्यकारभाराचा अनुभव मिळत असे. तसच त्यांना नविन प्रांत पादाक्रांत करण्यास प्रोत्साहन दिल्या जात असे. त्या अन्वये त्यांचे युध्द कौशल्य दिसे तसेच सैन्याला त्यांची ओळख होई. पण हे सगळ सतराव्या शतका नंतर बंद झाल्यामुळे पुढी सगळे सुल्तान नालायक निघालेत. आणि जरी साम्राज्य पुढे अजुन तीन शतके तगल तरी राज्याची वाढ खुंटलेली होती आणि बहुतांश युध्दे स्थित भाग टिकवण्यासाठीच घडली.


एकाच कुटुंबातील वंशजांनी सहा शतके राज्य केलं असल अजुन कुठलही उदाहरण माझ्या ध्यानात नाही. राज्य विखरुन जातात, परकीय आक्रमणांच्या झंझावात उडुन जातात किंवा अंतर्गत उठाव होउन नाश पावतात. तुर्की राजघराण मात्र लवाच्या पात्यासारख तगुन राहिल. बायझाच दुसर्‍याला तैमुरलंग ने कैद केल्यानंतर या राज घराण्यात पहिला वितुष्ट निर्माण झाल. पण त्याचा शेवट म्हणजे त्याच घराण्यातील वंशजाला सुल्तान म्हणुन नेमण्यात आले. पुढे सतराव्य शतकात नंतर ठराविक अंतरांवर उठाव होत गेलेत. या उठावांपैकी बरेचशे उठाव तुर्की सैन्याच्या जानिसारी नावाने ओळखल्या जाणार्‍या अति-विशिष्ट विभागाने केलेत. यात बर्‍याचश्या सुल्तांनाना मारुन टाकल पण ये-रे माझ्या मागल्या सारख त्याच घराण्यातील अजुन कोणाला तरी सुल्तान नेमण्यात आल. गंमतच वाटते हे सगळ वाचायला.

यांच्या इतिहासातील पहिली तीनशे वर्षांचा उल्लेख मी अनेकदा केला आहे. एका मागोमाग असे धुरंधर गादीवर आलेत आणि तिथेच मला मराठी राजघराणी मला कम नशिबी वाटतात. छत्रपतींच्या कुटुंबातील म्हणा किंवा पुढे पेशव्यांच्या घरातील म्हणा पण कुठल्याच थोराने वयाची पन्नाशी ओलांडाली नाही. छत्रपती पन्नासचे होते किंव्हा सत्तेचाळ, तुम्ही कुठल्या जन्मवर्षावर विश्वास ठेवाल त्यावर ते अवलंबुन आहे. संभाजीराजे बत्तीस. राजाराम राजे तीस. या घराण्यातला अपवाद म्हणजे छत्रपती शाहु महाराज. त्यांनी खर्‍या दृष्टीने राज्य भोगल. ते मुत्सद्दी होते पण लढवय्ये नव्हते आणि त्यांनी साठी ओलांडली. पेशव्यांच्या घराण्यात तर अजुन दुर्दशा होती. थोरले बाजीराव चाळीस, नानासाहेब चाळीस, चिमाजी अप्पा चाळीस, सदाशिवराव भाउ तीस, विश्वास राव सतरा किंवा अठरा आणि माधवराव सत्तावीस. या घराण्यातला अपवाद म्हणजे राघोबा दादा पण त्यांच्या तलवारीत कुठलीच कसर नसली तरी बाकी भानगडींनी मराठा घराण्याच फार नुकसान झाल. महत्वाच्या सरदार घराण्यांमधे ही बघितल तर चित्र थोडं बर आहे. महादजी शिंदे आणि मल्हार राव होळकरांची कारागिर्द बराच काळ होती. पण या सगळ्यांची तुलना तुर्की साम्राज्याच्या पहिल्या तीनशे वर्षात प्रत्येक सुल्तानाचा अंमल अठ्ठावीस वर्ष होता. इथे आपल्या थोरा-मोठ्यांची आयुष्य प्रत्येकी पस्तीस असेल आणि तिथे त्यांच्या कारागिर्दी अठ्ठाविस वर्ष होता. सुलेमान दुसरा तर सन १५२० ते १५६६ गादीवर होता.

इतकाली वर्ष आयुष्य आणि राज्य मराठी घराण्याला लाभली असती तर आज भारताचा नक्षाच वेगळा असता. छत्रपतींचाच विचार केला तर अजुन दहा वर्ष आयुष्य म्हणजे कितीतरी कामगिर्‍या यशस्वी झाल्या असत्या. मराठी इतिहासात छत्रपतींचा खरा वारस म्हणजे थोरले बाजीराव मानायला हवेत पण त्यांनी विसाव्या वर्षी राज्य छातीवर घेतले आणि चाळीशीला श्वास सोडला. ही दोन व्यक्तीमत्व जन्मभर नुसती धावत होती. सतत, अविरत. आणि काही कमी असेल तर गृहकलह. म्हणुनच बहुधा त्यांची हृदय थकुन गेलीत. गेल्या हजार वर्षातील भीषण आणि रक्तरंजित भारतावर पसरलेल्या रात्रीत मराठी साम्राज्य म्हणजे प्रखर स्वप्न होत. आणि छत्रपतींपासुन ते सदाशिवराव भाऊ पर्यंतचे सेनानी जणु विजेसारखे लखलख करुन गेलेत. सुर्यासारख तळपायला वेळ मात्र विधिलिखित नव्हता हे दुर्दैव.

मागल्या लेखात छत्रपतींच्या बोलण्यात यवन-तुर्क असा उल्लेख आल्याच मी लिहिले होते. मला प्रश्न असा पडायचा की तुर्की सुल्तानांनी भारतावर कधीच आक्रमण केले नाही तर त्यांच्या बद्दल राजे कस काय बोलत होते. त्याच्या मागे दोन कारण असावीत. एक अस की तुर्की साम्राज्याची ख्याती भारतापर्यंत पोचणे सहाजिकच होते. आणि ही सुल्तान स्वतःला मुसलमानी लोकांचे खलिफा मानित असल्यामुळे सगळ्या मुसलमानी आक्रमणांना राजांनी तुर्की शब्दाने संबोधिले असावे. किंवा दुसर म्हणजे मध्य आशियातुन भारतावर मोठ्या प्रमाणावर आक्रमण झालीत. तैमुर लंग पासुन ते बाबर पर्यंतचे सगळी रक्तपिपासु लोक मध्य आशियातुनच भारतावर कोसळलीत आणि मागल्या लेखा म्हटल्या प्रमाणे तुर्की लोकांची मूळ भुमी मध्य आशियाच मानल्या जातो. त्यामुळे राजे त्या आक्रमकांना तुर्क म्हणत असावेत. आता यवन कुठुन आलेत हे मात्र मला माहिती नाही. कारण अलेक्स्झंडर नंतर भारतावर (किंवा त्याच्या आधी कधीही) कुठल्याही यवनाने (ग्रीक) आक्रमण केल नाही. हे यवन म्हणजे राजांना पर्शियन तर अभिप्रेत नव्हेत?

4/1/10

लपांटोचे युध्द

तुर्कीसाम्राज्याचे नौदल आणि एकत्रित युरोपच्या नौदलात भीषण युध्द मेडिटेरियनच्या समुद्रात सन १५७१ ला लपांटो च्या जवळ झाले. लंपाटो म्हणजे मेडिटेरिनियन (युरोप आणि तुर्की यांच्या मधे स्थित) समुद्रातील खाडी आहे.

या युद्ध्दातील मुख्य पात्रे म्हणजे त्या वेळेसचा तुर्की सम्राट सलीम॥ (या राजघराण्यात बरीच सलीम झालेत. या सलीम ॥ चा आजोबा म्हणजे सलीम ।), त्याचा प्रमुख वजीर सोक्कुल्लु, नौदलाचा सेनापती, कारा मुस्तफा, पियाल मुस्तफा आणि युरोपिय लोकांमधे पोप पायस, स्पेन चा राजा चार्लस आणि डॉन जॉन ऑफ ऑस्ट्रीया हे आहेत.

लपांटोच्या युध्दाचा वर-वर बघता भारताशी काही सुध्दा संबंध नाही. पण भारताच्या शोधात ख्रिस्ती आणि मुसलमानी सत्तांमधील वैमनस्याचे महत्त्व कमी होत गेले आणि या युद्धातील विजयाने युरोपिय सत्तांचा व्यक्तीमत्वात आमुलाग्र बदल झाला. आपण तुर्की साम्राज्याला इतका जबरदस्त तडाखा देउ शकतो तर जगातील इतर कोणालाही पराजित करु शकतो या आत्मविश्वासाने या युरोपियलोकांनी जगावर बेधडकjavascript:void(0) आक्रमण केले. भारतावर पकड जमवायला त्यांना जरी अजुन ३०० वर्ष लागणार होती तरी त्या दरम्यान त्यांनी उत्तर आणि दक्षिण अमेरिकन खंड, दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया नेहमीसाठी गिळंकृत केल.

लेखाच्या पहिल्या भागात आपण तुर्की साम्राज्याबद्दल माहिती करणे आवश्यक आहे. मुसलमानी सत्ताकेंद्रां पैकी, हारुन अल रशिद च्या बगदाद (तो बगदाद चा खलिफा होता) केंद्रा व्यतिरिक्त, तुर्की साम्राज्याच्या इस्तंबुल केंद्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. अरब नसलेले पण स्वतःला सर्व मुसलमानी लोकांचे राज्यकर्ते मानणारे हे पहिले राज्यकर्ते होते. पण इतर मुसलमानी राज्याधिशांच्या तुलनेत हे सर्वाधिक यशस्वी ठरले. यांच्या आक्रमणाचा मुख्य लक्ष्य युरोप होते. कर्डोबा, स्पेन मधुन मूर लोकांना १३ शतकात हाकलुन दिल्या पासुन (मूर हे स्पेन चे मुसलमानी सत्ताधिश होते. जवळ जवळ ५ शतके आयबेरियन प्रांत यांच्या अधीपत्त्याखाली होता. या काळात संपूर्ण स्पेन आणि पोर्तुगाल मुसलमान होत.) युरोपच्या भूमीवर राज्य प्रस्थापित करण्याची खटाटोप या तूर्की लोकांनी जवळ जवळ दोन शतके केलीत. यात ते बर्‍याचश्या प्रमाणात यशस्वी ठरले. तुर्की साम्राज्या शिखरावर असतांना युरोप खंडातील ग्रीस, बल्गेरिया, बरचस हंगेरी, बोस्निया भागावर तुर्की अंमल होता. आणि तुर्की साम्राज्याची राजधानी इस्तंबुल या शहराचे मूळ नाव कॉन्स्टंटीनोपोल होते. व स्वतःला ख्रिश्चन धर्माचे पालनकर्ते म्हणवणार्‍या बायझेंटाईन साम्राज्याची ही राजधानी होती. तुर्कांनी सन १४५३ ला ही राजधानी जिंकुन, साम्राज्याला नेस्तनाभूत केल. तेंव्हापासुन रोम जिंकण्याची स्वप्न ही तुर्की लोक बघायला लागलेत. या मुसलमानी लोकांना जसा हिंदु लोकांचा द्वेष होता तसाच ख्रिश्चन लोकांचाही यांनी प्रचंड द्वेष होता. त्यामुळे रोम जिंकुन ख्रिश्चन धर्माच्या सर्वात पवित्र स्थळाला जमिनदोस्त केल म्हणजे मग इस्लामी हिरवा झेंडा सगळीकडे रोवला जाईल ही त्यांची मनिषा होती.

---

तुर्की साम्राज्या जवळपास ७ शतके टिकुन होत. इतकी शतके ब्रिटिशही टिकले नाहीत. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला उस्मान ने स्थापन केलेल्या लहानस राज्य पुढल्या दोन शतकात पश्चिमेस इजिप्त पासुन ते पूर्वेस इराण पर्यंत तर उत्तरेस बल्गेरिया, सर्बिया ते दक्षिणेस सिरिया आणि अरब वाळवंटापर्यंत पसरत गेले. छत्रपतींच्या बोलण्यात यवन-तूर्क अस उल्लेख आल्याच आढळत पण माझ्या माहिती नुसार कोणी तूर्की भारतात कधी आले नाहीत. (त्यांच नेमक तेच चुकल. पण ते पुढे)
तुर्की सम्राट स्वतःला खलिफा म्हणवुन घेत असत. मध्यंतरी ते स्वतःला रोमन साम्राज्याचे वंशज मानु लागलेत आणि स्वतःला कैसार (सिझर) म्हणवुन घेऊ लागलेत. १९२२ ला ब्रिटिशांनी हे साम्राज्य मोडले पण १६ व्य शतकाच्या उत्तरार्धा पासुन साम्राज्याचे पसरणे थांबले होते आणि एकाहुन एक शूर लढवैय्ये आणि मुत्सद्दी पैदा करणारे या राजघराण्यातील वंशज शंख निघायला लागलेत.

तुर्की लोक इतिहासाच्या पटलावर १३ व्या शतकात उदयास आलेत. ते नेमके कुठले या बद्दल बराच वाद आहे. मध्य आशियातील एक टोळीने अनाटोलिया आणि आशिया मायनर म्हणजे सध्य स्थितीतील तुर्की भागात स्थलांतर केले. मंगोल लोकांनी घातलेल्या १२ व्या शतकातल्या विध्वंसा नंतर हा प्रदेश नमोहराम झालेला होता. अश्या परिस्थितीत या लोकांनी आपला जम बसविला. हळु हळु तुर्की टोळीचे बरे आमिर लोकांनी (जमिनदार) या भागात गर्दी करु लागले. ही लोक मुळात मुसलमान नसावित. पण अरब भागात वसल्यावर यांनी इस्लाम स्विकारला असावा. पण धर्म कुठलाही असला तरी ही लोक शूर होती यात काही वाद नाही. त्या काळात तलवारीला पाणी असल्याशिवाय गत्यंतर नव्हते. या टोळ्यां पैकी ओस्मान पहिला याने जमिनदारी मिळवुन तुर्की साम्राज्याचा नारळ फोडला. अर्थात, त्यावेळेस त्याला आपण एका महान राजघराण्याचा पाया बांधतो आहोत अस काही वाटल नसणार. पण तो फार मुत्सद्दी होता यात वाद नाही. त्याने आजु-बाजुच्या भांडणांचा फायदा उठवित आपली जमिनदारी वाढवायला सुरुवात केली. त्या कालावधीत बरीच तूर्की टोळ्या लहान लहान जमिनदार्‍या चालवित होत्या. त्यांच्याशी भांडण घेण्या ऐवजी ओस्मान (त्याला इंग्रजी भाषेत ओथ्मान अस म्हणतात) त्याने आशिया मायनर मधल्या ख्रिस्ती लोकांशी भांडण घेतलीत आणि त्यांची जमिन घ्यायला लागला. पण तो स्वतःला सुल्तान म्हणवुन घेत नसे. तो फक्त "आमिर" होता. याला कारण दोन होती. एक म्हणजे, पहिले सांगितल्या प्रमाणे, आजुबाजुल बरीच तूर्की जमिनदार्‍या होत्या आणि स्वतःला सुल्तान म्हणवुन घेणं म्हणजे त्यांच्या शेपटीवर पाय देणे होते. आणि दुसर म्हणजे अविश्रांतपणे जरी ओस्मान पहिला, याने राज्य वाढविले असले तरी साम्राज्य म्हणवुन घेण्याजोगी त्याच्याकडे जमिन मुळीच नव्हती. पण अखंड राज्यविस्ताराचा पायंडा त्याने घातला आणि त्यामुळे तूर्की लोकांची पुढली तीनशे वर्ष प्रचंड भरभराट झाली.

या राजघराण्यातील सुल्तानांची अर्धी यादी मी पुढे देतो आहे. सुरुवातीपासुन ते लपांटोच्या युध्दा पर्यंतच्या सुल्तांनांचीच नावे यात आहेत.

१)ओस्मान पहिला ( १२९९-१३२४)

२) ऑर्खन (ऑराहन) पहिला (१३२४-१३६०)

३)मुराद पहिला ( १३६० - १३८९) याने स्वतःला सुल्तान घोषित केले.

४) बायझाद पहिला (१३८९-१४०२) हा तैमुरलंग च्या कैदेत मेला.

५) मेहमद पहिला (१४१३-१४२१)

६) मुराद दुसरा (१४२१-१४४४)

७) मेहमद दुसरा (१४४४-१४४६)

८) मुराद दुसरा (१४४६-१४५१) - मेहमद दुसरा हा याचाच मुलगा. दोघ जण जणु आट्या-पाट्या खेळत होते!

९) मेहमद दुसरा (१४४६-१४८१) - याने कॉन्स्टंटिनोपोल (सध्याचे इंस्तबुल) जिंकले आणि तेंव्हापासुन ते शहर तूर्कीची राजधानी आहे.

१०) बायझाद दुसरा (१४८१ - १५१२)

११) सलिम पहिला ( १५१२ - १५२०)

१२) सुलेमान पहिला (१५२०- १५६६) हा तूर्की साम्राज्याचा सगळ्यात नावाजलेला सुल्तान मानावा लागेल.

१३) सलिम दुसरा (१५६६-१५७६) याच्या कारागिर्दित लपांटोचे युध्द झाले.

या घराण्याचा पहिले पासुन उद्देश युरोप जिंकुन इस्लामी धर्माचा प्रसार करण्याचा होता. या मागे दोन कारणे असावीत.

1) स्पॅनिश भागातुन म्हणजे आयबेरिया प्रांतातुन मूर या मुसलमानी सत्तेने आठव्या शतकापासुन जवळ-जवळ पाचशे वर्ष राज्य केले. त्या काळात संपूर्ण स्पेन आणि पोर्तुगाल मुसलमान होता. पण १३ व्या शतकात ख्रिश्चनांनी मूर लोकांचा पराभव करुन तिथे परत ख्रिस्ती धर्माची स्थापना केली. तेंव्हापासुन युरोप खंडात मुसलमान धर्म नामशेष झाला. पण तेंव्हा युरोपची म्हणजे ख्रिस्ती धर्माची सीमा बायझेंटाईन साम्राज्य होती. आणि त्याची राजधानी कॉन्स्टंटीनोपोल होती. पोप चा त्या राज्याला पाठिंबा असल्यामुळे त्याला 'पवित्र' साम्राज्य मानल्या जात असे. तूर्की लोकांच्या प्रांत विस्ताराच्या वेळेस या बायझेंटाईन साम्राज्य खिळखिळ झालेल होत पण १४५३ ला त्या राज्या शेवटची घटका मोजली आणि कॉन्स्टंटीनोपोल चे इस्तंबुल झाले. त्या नंतर मात्र आपला पुढला मुक्काम रोम याची खुणगाठ तुर्की लोकांनी मनाशी बांधली आणि त्या साठी सतत युध्द केलीत. त्यांना पूर्व युरोपातुन पुढे जाता येईना म्हणुन त्यांनी समुद्री मार्गाने इटलीवर स्वारीचीही खटपट केली. याच भानगडीत लपांटोचे युध्द झाले.

2)आणि दुसर म्हणजे त्यांना टक्कर देणार युरोपिय भागात कोणी फारस मिळाल नाही. त्या मानाने पूर्वेला भारताकडे जाण्याच्या मार्गावर बरीच सुल्तान पडली होती . अजुन अस की भारत ११ व्या शतका नंतर मुसलमानी अंमलाखाली असल्यामुळे तो भाग लौकरच मुसलमान होणारच होता अस वाटण सहाजिक होत. त्या तुलनेत युरोप अजुनही धिम्मी होता. त्यामुळे त्यांनी संपूर्ण लक्ष युरोपाकडे केंद्रित केले आणि भारताकडे दुर्लक्ष केले.

हे झालं तुर्की साम्राज्याचा संक्षिप्तात आढावा. पुढल्या भागात युरोपिय सत्तांचा आणि पोपचा आढावा घेऊया.

(क्रमशः)

--------------------
खालील पुस्तकांतुन मी ही सगळी माहिती गोळा केली आहे.

Empire of the Sea - The siege of Malta, the battle of Lepanto and the contest for the center of the World by Roger Crowley

Empires of the Monsoon by Richard S. Hall

Turkish Empire - Its Growth and Decay by Lord Eversley

3/16/10

आगामी लेखांच्या निमित्ताने

सध्या दोन आघाड्यांवर लेखन चालू आहे. एका नविन दीर्घ कथेच्या बांधणीत बरीच कष्ट लागता आहेत. अर्थात, हे अपेक्षितच होत. पण मी आत्ता पर्यंत ज्या पध्दतीने लिहित असे त्या ऐवजी नविन मार्गाने लिहिण्याची खटपट चालली आहे. आत्तापर्यंत साधारणा गोष्टीची रुपरेखा मनात असली म्हणजे मी कथाभाग प्रकाशित करायला लागत असे. त्याचा फायदा असा की वाचकां समोर काहीतरी ठेवता येत असे आणि भागांमधे प्रकाशित करण्यात कथा उत्कंठा वर्धक करण्याची संधी मिळे. पण तोटा असा की कथा पूर्ण झाल्यावर मला मनात वाटे की हे अजुन लिहायला हवे होते किंवा या पात्राला असा रंग देता आला असता. खर सांगायच तर अस नेहमीच वाटणार. यावर उपाय नाही. त्यातुन कथा कशी लिहावी हे मला शिकायची संधी कधी मिळाली नाहीया. त्यामुळे अंधारात चाचपडाव तस मी नविन प्रयोग करत असतो. त्यातच अजुन एक म्हणुन यंदा ठरवल की पूर्ण कथा लिहिल्या शिवाय एकही भाग प्रकाशित करायचा नाही. बघु या काय होत ते. ही कथा आत्तपर्यंत लिहिलेल्या पैकी सगळ्यात कठीण आहे हे खर. पूर्ण होईलच असही नाही.

शिवराज्याभिषेक लिहितांना "भारताच्या शोधात" ही लेख-मालिका लिहिण्याचा विचार डोक्यात आला. शिवाजी महाराजांचा इथे राष्ट्रबांधणीचा खटाटोप चालू असतांना ज्ञात जगात काय काय घडत होत, त्याचे परिणाम आणि पडसाद भारतावर कसे उमटले या बद्दल ही लेख मालिका असणार आहे. अर्ध्या जगाचा शोध भारताच्या शोधात लागला आहे अस म्हणायला हरकत नाही. आणि सन ९०० ते १८०० पर्यंतच्या काळात जगात घडलेल्या युध्दांमागील कारणांमधे भारतावर सत्ता हे अग्रगण्य कारण होत अस म्हणायलाही हरकत नाही. शोकांतिका अशी की या उलाढालींमधे आपण आपले जवळपास अर्धे बांधवजन परधर्माला आणि अर्धी भुमी परधर्मी झालेल्या बांधवजनांनाच हरवुन बसलो. आणि या काळात भारतात घडलेल्या नरसंहाराची तुलना जगात इतरत्र घडलेल्या फार कमी घटनांशी होईल.

पण झालेल्या आक्रमणांचा मुद्दा थोडा वेगळा. या लेखमालिकेचा प्रमुख उद्देश म्हणजे भारताचा शोध घेणे आहे. (भारत एक शोध नाही, भारताचा शोध!) त्या काळात जगाचा व्यापारात भारताचा हिस्सा २० ट्क्क्याहुन अधिक होता. धर्मप्रचारा व्यतिरिक्त सोन (आणि बायका) लुटायच्या उद्देशाने मुसलमानी आक्रमक भारतात ९ व्या शतका नंतर येउ लागलेत. १५ व्या शतकानंतर युरोपिय सत्ता भारतावर घिरट्या घालु लागल्यात. या उठाठेवीत जगाचा नकाशा नेहमीसाठी बदलुन गेला. दोन नविन खंडाचे शोध लागलेत. आणि अफ्रिके सारख्या महाकाय खंडाचे अंतरंग पहिल्यांदाच कळले. ज्या सत्तांनी भारताकडे लक्ष दिले नाही त्या लौकरच नाममात्र सत्ता राहिल्यात किंवा नाहीश्याच झाल्यात. त्यापैकी तूर्की साम्राज्य आणि लपांटोच्या युध्दाचे परीक्षण मी या लेख मालिकेच्या पहिल्या सदरात करण्याचा प्रयत्न करणार आहे. येथे शैक्षणिक पेपर प्रसिध्द करण्याचा मानस नाही पण या ऐतिहासिक घटनांचे चित्र रंगविण्याचा प्रयास आहे.

लपांटो हे मेडिटेरिनियन समुद्रातील एक लहानसे बेट आहे. या बेटाला जिंकण्यासाठी तुर्कीच्या सुल्ताना ने प्रचंड मोठे नौदल पाठवले. त्याला टक्कर द्यायला युरोपातील प्रस्थापित सत्ता एक झाल्यात. यांच्यातील घनघोर युध्दात प्रचंड प्रमाणावर मनुष्यहानी झाली पण शेवटी युरोपिय सत्ता वरचढ ठरल्यात.

हे थोडक्यात झाल.

प्रसंग बांधणी व भारताच या युध्दाशी नात पुढल्या भागात.

॥जय शिवाजी॥

2/15/10

गाथा दाढी-मिश्यांची (माझ्या)

मला दाढी-मिशी खुप वर्षांपासुन वाढवायची होती. म्हणजे बघा, मला चेहर्‍यावर एकही केस नव्हता तेंव्हापासुन. आमचे आजोबा जुन्या पद्धतीने अंगणात सकाळी उन्हात आरसा समोर ठेउन दाढी करत असत. त्यांच्या दाढी करण्याला एक वेगळीच नजाकत होती. आधी सगळी तयारी करायची मग चहा प्यायचा. जणु काही दाढीच सामान भिजत ठेवलय आणि मग सतरंजीवर बसुन दाढी करायची. माझ्या वडिलांना भरघोस मिश्या आहेत. मुच्छाकडा मिश्या नाहीत पण अनिल कपूर सारख्या. त्यांना छान दिसते मिशी. मला ही तसलीच मिशी हवी होती. बाबा दाढी वाढवत नसत. पण मला माहिती होत कि मला दाढी कोणासारखी हवी होती ती - शेखर कपूर. बास, मॅटर सेटल्ड! पण आयुष्यात नेहमीच हव्या असलेल्या गोष्टी होत नाही. नाहीतर माझ्यावर हा लेख लिहायची वेळ आली नसती. तुम्ही मला दिगजाम च्या जाहिरातीत बघितल असत. बर, एखाद वेळेस तेवढ नाही पण तरी माझ्याकडे बघुन, दाढी हो तो ऐसी अस नक्कीच मनातल्या मनात म्हटल असत. लहानपणी दूरदर्शन वर रात्री ओल्ड स्पाईस ची चाहिरात येत असे. त्यात सुदृढ (!) शरीरयष्टीचे पुरुष समुद्राच्या लाटांवर सर्फिंग करतांना दाखवत असत. 'the best man can get' . माझ्या मामाने त्याच्या ओल्ड स्पाईस ची रिकामी बाटली दिली होती. त्यात पाणी घालुन मी गालाला लावत असे. ते बघुन त्याने सल्ला दिला की मी मिश्यांच्या ठिकाणी तेल लावल तर लौकर मिशी येईल. मी आपला तेल लाऊ लागलो. घरातल्यांच्या फिदीफिदी हसण्याकडे मी मुळीच लक्ष दिलं नाही. कधी एकदा शेविंग करुन ओल्ड स्पाईस चेहर्‍यावर थोबकाळीन अस मला होत असे. पण शेविंग केली आणि ओल्ड स्पाईस लावल तरी दिगजाम च मॉडेलिंग करता येण कठीण होत. पण ती भानगड नंतरची नंतर बघु. आधी मिसुरड फुटण आवश्यक होत.

माझा मोठ्या भावाला, सहाजिकच आता मोठा असल्यामुळे, माझ्या आधी मिसुरड फुटल. मला त्रास द्यायला त्याला अजुन एक साधन मिळाल.
'चिन्मय इकडे ये लौकर'
"काय आहे?"
"ये तर, गंमत आहे"
मी आपला घोड्यावर स्वार होऊन मागल्या अंगणात पोचत असे. खरतर 'गंमतीच्या' कुतुहलापुढे माझ्या वयाचे घोडे गेले होते.
मग तो बाबांच शेविंग क्रिम लाउन त्याचे गालावरचे केस शोधत शेविंग करण्याच्या उद्योगात असे.
"बघ"
"मलाहि आहेत तेवढे केस" मी तोंड वेंगाडत म्हणायचो.
"फक्त पुरुषांना येते दाढी आणि मिशी. मर्दा-ने-जंग"
मग मी पाण्याचा तांब्या घेउन त्याच्या मागे धावत असे. त्याची चांगली करमणुक होत असे.

मला हा प्रकार असह्य झाला आणि शेवटी मी म्यानातुन तलवार काढली. एक दिवशी तोंडाला शेविंग क्रिम लाउन वस्तरा फिरवला. मग बाबांची नक्कल करत आरश्याच्या जवळ जाउन दाढी नीट झाली का ते बघितल. फारसा फरक जाणवला नाही आणि दादाने मल हे धंदे करतांना मात्र पकडल. संध्याकाळी आता बाबा बत्ती देणार याची खात्री होती पण झाल उलटच. ते मला म्हणालेत की आता तुला खुप दाढी येणार. आणि अशी नको असतांना दाढी केली म्हणुन केस राठ येतील. हत्तीच्या केसांसारखे टोचतील तुलाच.
मार पडला असता तरी परवडला असता कारण पुढला आठवडाभर मी फार टेंशन मधे होतो. मला रात्री स्वप्नात मला स्वतःचे केस टोचायला लागलेत. सुदैवाने तस काही झाल नाही.

११वी नंतर माझ्या ओठांवर केस लाजत-गाजत entry मारु लागलेत. माझ्या बर्‍याच मित्र मंडळीला दिवसातुन दोनदा दाढी करायची वेळ आली होती. मी मात्र दररोज सकाळी आज कुठे आणि किती उपटालेयत याच्या नोंदी घ्यायला लागलो. वर्षभराने बर्‍यापैकी मंडळी जमली होती. दुरुन बघितल तर याला मिशी आहे की नाही असा प्रश्न लोकांना नक्कीच पडत असणार. याला मिशी मूळीच नाही या ऐवजी निदान आता शंकेस वाव आहे हि प्रगतीची चिन्ह होती. दाढीची दशा मात्र केविलवाणी होती. दाढा जिथे असतात त्या गालाच्या भागावर थोडे बहुत केस डोकवायला लागले होते पण तेवढेच. बाकी मैदान साफ चका-चक था। पण आता तर कुठे सुरुवात होती. काहीच वर्षात पूर्ण शिवाजी. यावरुन एकविचार डोक्यात आला , शिवाजी महाराजांच्या जमान्यात विशिची पोरं लढत असत. त्यात जर का कोणची गत माझ्या सारखी असेल तर त्याची काय दशा होत असेल. विचार न केलेला बरा! दुरुन मी तलवार घेउन घोड्यावरून येतांना बघुन कोणाला प्रश्न पडायचा की हा पोरगा लढायला येतोय की माझी spare तलवार पोचवायला येतोय. इज्जतचा टोटल भाजी-पाला!

कॉलेज मधे असतांना मला बर्‍यापैकी दाढी आणि मिशी येउ लागली होती. पण वस्तुस्थिती केविलवाणीच होती. भरघोस या शब्दप्रयोगाच्या फार म्हणजे फारच दूर अंतरावर माझ्या दाढी-मिशीने पडाव टाकला होता. इतकी वर्ष वस्तरा फिरवुन केस राठ झाले होते एवढीच प्रगती होती. आणि आठवडाभर दाढी करण्यापासुन संन्यास घेतला तर झोपतांना केस टोचत असत. पण मी हार न मानता विविध प्रयोग करू लागलो. एकदा मी अनुवठीवरचे केस वाढु दिलेत. काही महिन्यांनी चिनी लोकांसारखे खुंटा एवढे केस लोंबकळायला लागलेत. (आई च्या मते मी बोकड दिसत होतो पण मी न ऐकल्या सारख केलं.) पण सगळ्या विमानतळांवर माझ्याकडे विशेष लक्ष द्यायला लागल्यावर माझ्या लक्षात आल की मी चिनी सोडुन 'भलत्याच' लोकांसारखा दिसतोय. मी लगेच कापणी केली.

पण जोरदार, मर्दानी दाढी मिशी येण हा सुध्दा नशिबाचा भाग असतो हे मला हळु हळु उमगायला लागल. माझ्या एका मित्राच म्हणण की मनुष्याच्या मेंदुचा विकास २२ व्या वर्षानंतर थांबतो तस माझ्या दाढी-मिश्यांची गत झाली आहे. मला अशी सुक्ष्म शंका आहे की तो मला दाढी-मिश्यांच्या व्यतिरिक्त टोमणा मारत होता. त्या विषयावर नंतर बोलुया. मला मनाजोग्या दाढी मिश्या कधीच येणार नाही हे मी मान्य करायला लागलो होतो एवढ खर. पण शेवटचा प्रयत्न म्हणुन ठरवल की फ्रेंच कट ठेवायचा. आता नाचता येइना आंगण वा़कड याच ज्वलंत उदाहरण अजुन दुसर शोधुन सापडायच नाही. केसांचा पत्ता नाही, चाललो मी भांग काढायला.

तब्बल दोन महिन्यांनंतर बोकडाची दाढी आणि अमोल पालेकरची मिशी अस काहीसा विचित्र प्रकार उगवला. दाढीचे ते काळ्या रंगाचे कापसाच्या गाठींसारखे पुंजके हास्यास्पद दिसत होते की केविलवाणे हा अभ्यासाचा विषय ठरेल. लोक मला मी आजारी आहे का विचारायला लागलेत. पण हे सगळे तत्सम वार मी आधीही झेलले होते पण मला एका पोरीनी माझ्या वयाचा कयास तिशीच्या बराच पुढे लावल्यावर मात्र मी शेवटली हार मानली. म्हणजे एवढा अट्टहास करुन मी आजारीच नाही तर वयाचाही दिसतो?

शेखर कपूरची तर ऐसी का तैसी!

आताशा मी दररोज सकाळी उठुन दाढी करुन चिकना-चिट्टा बनुन कामाला जातो. जास्त विचार करत नाही. पण आरश्यात बघुन अजुनही मनाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात वाटत की...

2/7/10

सरस्वती वंदना

वीणा वादिनी वर दे, वर दे॥
प्रिय स्वतंत्र-रव अमृत मंत्र नव
भारत मे भर दे, वरदे।
वीणा वादिनी वर दे, वर दे॥

काट अंध उर के बंधन स्तर
बहा जननी ज्योतीर्मय निर्झर
कलुष भेद तम हर प्रकाश भर
जगमग जग कर दे वर दे।
वीणा वादिनी वर दे, वर दे॥

नवगति, नव लय, ताल छंद नव,
नवलकंठ, नव जलद मंद-रव;
नव नभ के नव विहग वृंद को
नव पर नव स्वर दे वर दे।
वीणा वादिनी वर दे, वर दे॥

टीप -: या रचनेचे रचनाकार कोण आहेत हे मला माहिती नाही.

1/16/10

भ्रमाच्या शोधात

नुकतेच न्यु-यॉर्क टाईम्स मध्ये तीन लेख प्रकाशित झालेत. विज्ञाना विषयीच्या हे लेख विभिन्न घटानांची आणि शोधांची माहिती देत असले तरी त्यांच्यात विलक्षण साम्य आहे. ऑस्ट्रेलियातील खगोलशास्त्रात रस असलेल्या एका व्यक्तीला अवकाशात डोळे रोखले असतांना त्याला गुरु ग्रहावर एक नविन डाग दिसला. बाराकाईने निरिक्षण केल्यावर त्याच्या लक्षात आले की तो डाग म्हणजे गुरु ग्रहावर पडलेला खड्डा आहे. त्या खड्ड्याचा आकार पृथ्वी एवढा आहे. कश्यानी तो खड्डा पडला याची कल्पना अजुन खगोलशास्त्रज्ञ्यांना नाही. पण पृथ्वी एवढा खड्डा पडण्यासाठी आणि पाडण्यासाठी शक्ति या जगात उपस्थित आहे हे बघुन मन विस्मित होत. दुसरा लेख, सुर्यावरच्या काळ्या डागांबद्दल होता. या डागांची निर्मिती कशी होते आणि एका विशिष्ट कालामाना नंतर त्यांची संख्या कशी वाढते किंवा कमी होते याबद्दलची चर्चा त्या लेखात केलेली होती. हे डाग पृथ्वीच्या आकारमानाचे असतात. आणि या डागांमुळे सूर्याची उर्जा केवळ ०.१ टक्क्याने कमी होते. पण तरी पृथ्वीच्या वातावरणात त्यामुळे प्रचंड बदल घडतात. काही भागात दुष्काळ तर काही भागात वादळ अचानक पणे उत्पन्न होतात. हे सगळे शोध गेल्या तीस-चाळीस वर्षात लागले आहेत. त्या आधी देवीचा प्रकोप म्हणुन बकरा बळी देण्या पलिकडे आपल्य हातात काहीच नव्हत. अवकाशातल्या अवाढव्य वस्तुंबद्दल तर सोडाच पण डोळ्यांना न दिसणार्‍या सुक्ष्म जंतुबद्दल सुध्दाही आपण काही करु शकत नाही.

तिसरा लेखात आपल्या आतड्यात असलेल्या जंतु जगतावर होता. पोटातील सगळेच जंतु हानिकारक नसतात. खरतर फारच कमी जंतु हानि पोचवतात. बहुतांश मंडळी पोटात नेमक काय करतात याचा संशोधकांना आताशा कुठे कळु लागल आहे. पचना व्यतिरिक्त हे जंतु आपल्या तब्येतीच्या आणि स्वभावाच्या विशिष्ट प्रणालीस कारणीभूत असतात असा वैज्ञानिकांचा कयास आहे. पुढल्या काही वर्षात या विषयावर अजुन प्रकाश पडेल.

थोडक्यात, आपल्या हातात किती गोष्टी आहेत आणि अवकाशातल्या अवाढव्य वस्तुंपासुन ते पोटातल्या सुक्ष्म जंतु पर्यंत अनाकलनिय घटना आपल आयुष्य, आपल्या व्यक्तिमत्वास कसा आकार देतात या बद्दलही आपल्याला पूर्ण कल्पना नाही बघुन आपल्या अज्ञानाची आणि क्षुद्रतेची जाणीव प्रखरतेने होते.

पण गंमत अशी की हे माहिती कळुन सुध्दा आपण ढीग काय करू शकतो? सुर्यावरचे डाग काढु शकतो? कि गुरुवर ज्या अवकाशातल्या उल्केने गुरु ग्रहावर महाकाय गर्त निर्माण केला ती उल्का उद्या पृथ्वीवर येत असेल तर थांबवु शकतो? आपल्या आयुष्याची, जगण्याची क्षुल्लुकता बघुन मन भ्रमित होत. पृथ्वीला जग मानुन आपण त्यावर राज्य करू पहातो. विध्वंस घालतो, जगाचा वाली म्हणवुन घेतो पण आपल्यात आणि मुंगीत काहीच अंतर नाही. दोघांचेही अस्तित्व सारखेच, क्षणभंगुर.

यालाच शंकराचार्य मिथ्या म्हणत असावेत. स्वत्वाची कल्पना आपल्याला असते, कर्त्याची जी भावना आपण उराशी घेउन वावरतो ती कल्पनाच मूळ भ्रम आहे.

जवळपास १ कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर डायानोसोरस वावरत होते. त्यांचा आता नामशेषही उरला नाहीया. विविध आकारमानाचे, विविध जातींचे हे जीव झटक्यात नाहीसे झालेत. उरली फक्त धुळ आणि त्याचे दगडात उमटलेले अवशेष. सुमारे दोन लाख वर्षांपूर्वी मानव सदृश्य प्राणी पृथ्वीतलावर वावरु लागलेत. वैज्ञानिकांच्या मते विश्व निर्मिती जवळपास १३ बिलियन म्हणजे १३ अब्ज वर्षापूर्वी झाली.म्हणजे पुढची १२ अब्ज, ९९ करोड, ९८ लाख वर्ष विश्वाचा कारभार आपल्या उत्पत्तीची वाट बघत ताटकळला नव्हता. सगळ जस व्हायच तसच झाल. आणि या चित्रातुन मनुष्याला काढुन टाकल तरी जे व्हायच तेच होईल. तरी आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाबद्दल किती माज असतो बघा.

कुसुमाग्रजांची मातीची दर्पोक्ती या कवितेतील कडवी आठवतात,

अभिमानी मानव ! आम्हाला अवमानी !
बेहोष पाउले पडती अमुच्यावरुनी
त्या मत्त पदांना नच जाणीव अजूनी
की मार्ग शेवटी सर्व मातिला मिळती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !

पण खर बघता याला दर्पोक्ती म्हणणे चूक आहे. काय खोट बोलतेय माती इथे? पण आपल्या अहंकाराला ठेच पोचते म्हणुन या विचारांना दर्पोक्ती ठरवणार. जर का अब्जो वर्ष आपल्याविना अडल नाही आणि पुढली अब्जोवादी वर्ष अडणार नाही तर आपल्या अस्तित्वाला अर्थ काय आहे? याच उत्तर सोप आहे. काहीच नाही. पण मग अस म्हटल तर गोंधळ होईल म्हणुन आपण तत्त्वज्ञानाचा पदर धरतो. पाण्याच्या आरश्यात आपल्या क्षणभंगुर प्रतिमेला खर ठरवण्याचा विफल प्रयत्न करतो.पाणी वाहुन गेल्यावर प्रतिबिंब नाहीस होत. काळाच्या ओघात, तसच, आपणही नाहीसे होईल. जगातील अव्यक्त, निराकार, निर्गुण शक्ति माझ माहेर आहे आणि त्यात विलिन होण माझ लक्ष्य आहे हे सगळं थोतांड वाटत. असली अव्यक्त शक्ति वास करत नसेल अस नाही. पण विश्वाच्या पसार्‍यात तिला आपली काळजी आहे अस वाटण खुळेपणा आहे. आणि का असावी? काय बाजी मारली आहे आपण, कुठले चांद-तारे लावले आहेत आपण?

गुरु त्याच्या कक्षेतून थोडा जरी हलला तरी आपण नाहीसे होऊ. किंवा गुरु त्याच्या कक्षे ऐवजी दुसर्‍या कक्षेत असता तर पृथ्वीवर जीवच उपस्थित झाले नसते. दर वर्षी एकदा तरी बातम्या येतात की पृथ्वीवर लौकरच उल्का लौकरच आपटणार आहे. आता खरच अस होणार आहे की नाही देवच जाणे. पण अस व्हायच असेल तर ती उल्का फार मोठी असण्याचीही गरज नाही. दहा-पंधरा मैल लांबी-रुंदीची उल्का जरी पृथ्वीवर आपटली तरी आपण क्षणार्धात नाहीसे होऊ.

पावसात घरी दिव्यापाशी घोळका करणार्‍या किड्यांची आपण कीव करतो. कारण एका रात्रीपुरतेच त्यांना पंख फुटतात आणि उजाडेस्तोवर ती सगळी मरुन जातात. आपल्या जीवनात एका रात्रीला महत्त्व आहे त्याहुन कमी महत्त्व विश्वाच्या कालमानात आपल्या अस्तित्वाला आहे. सध्या पंख फुटले आहेत म्हणुन आपण गुटुर-गुटुर करतोय. उद्या पंख झडलेल्या अस्तित्वाला काळाची केरसुणी झाडुन टाकणार एवढ नक्की.

ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण ?
बेताल नाचवी, सूत्रधार हा कोण ?
मातीतच अंती त्याचेही निर्वाण ?
स्वामित्व जगाचे अखेर अमच्या हाती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !