1/26/21

मराठा साम्राज्याचा ऱ्हास - पार्श्वभूमी

 मराठा साम्राज्याचा इतिहास हा केवळ मराठी माणसाचा गौरव नव्हे तर गेल्या पाचशे वर्षाच्या भारतीय इतिहासाचा एक मानबिंदू मानावा लागेल. दक्षिणेतील विजयानगर साम्राज्याच्या मुसलमानी सुलतानांनी केलेल्या विध्वंसा नंतर भारतात हिंदू साम्राज्य तर सोडाच पण साधे राज्य ही परत उभे राहील असे कोणाला वाटले नसेल. पण अश्या कठीण परिस्थितीत छत्रपती शिवाजींनी स्वराज्याचे स्वप्न बघितले व मुख्य म्हणजे इतरांनाही दाखवले की हे केवळ स्वप्न नव्हे तर त्यास सत्यात उतरवणे शक्य आहे. हिंदू स्वराज्याचा पाय त्यांनी आधी हिंदूच्या ध्यानी-मनी पक्का केला. त्यामुळेच सन १६८९ च्या छत्रपती संभाजींच्या मृत्यू नंतरही राज्य टिकले आणि सन १७०७ नंतर झपाट्याने वाढले. 

पुढली शंभर वर्षे मराठी साम्राज्य फोफावले, कोमेजले, पुन्हा पुनरुज्जीवित झाले, आणि मग अचानक झपाट्याने कोलमडले. या शंभर वर्षात (सन १८१० पर्यंतचा काळ धरूया. यशवंतराव होळकर हे शेवटले मराठी धुरंधर म्हणायला हरकत नाही) पराजय म्हटला तर पानिपत चे तिसरे युद्ध सोडले तर हृदयी खंजीर लागला असा पराभव मराठ्यांच्या पदरी पडला नाही. आणि पानिपत ही हा अपमान अधिक, पराजय कमी होता. थोडक्यात शंभर वर्षे मराठी तलवारींचा खणखणाट भारतभर दुमदुमत होता आणि मराठी घोडी गंगा-यमुना ते कावेरी चे पाणी पीत होती. एवध्या मोठ्या भूभागावर ( २८ लाख चौरस किमी.) तलवारीने यश संपादन करणारी राज्ये, आपण जगाच्या पटलावर बघितलीत तर ती राज्ये बरीच वर्षे टिकलीत. तुर्की साम्राज्य साधारण १८ लाख चौरस किमी होते. आणि ते तब्बल ५०० वर्षे टिकले. त्यातील शेवटली दोनशे वर्ष तुर्की साम्राज्य बर्याच ठिकाणी नाममात्र होते पण अगदी १९२२ ला जेंव्हा इंग्रजांनी ते राज्य नामशेष केले, तेंव्हा त्या विरुद्ध गांधीजींनी सत्याग्रह केला होता. म्हणजे त्या साम्राज्याचे स्थान लोकांच्या मनात कायम होते. मुघल साम्राज्य ४ लाख चौरस किमी होते. सन १६१२ नंतर दिल्ली च्या आस पास चा भाग सोडला तर बाकी ठिकाणी मुघल नामशेष झाले होते पण अजूनही स्वतंत्र्य भारतात या मुसलमानी धर्मान्धाळांचा बर्याच लोकांना पुळका आहे. पण मराठा साम्राज्य केवढे होते याची कल्पना अगदी विदर्भात जाऊन विचारलेत तरी लोकांना नसेल. 

दोन प्रश्नांचा विचार इथे मी करू इच्छितो. एक, एवढे रण -धुरंधर साम्राज्य ज्यांना कारभार ही उत्तम येत असे , ते राज्य १० वर्षाच्या कालावधीत कसे कोलमडले? आणि दुसरे, लोकांच्या स्मृती-पटलातून ही हे राज्य कसे नामशेष झाले? 

दोन्ही प्रश्नांचे उत्तर एकच आहे. 

क्रमश: 

1/18/21

चित्रपट परिक्षण आणि निरीक्षण - सायकल

दोन महिन्याने पूर्वी सायकल मराठी चित्रपट बघण्याची संधी मिळाली. सन २०१८ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपटाचे  दिग्दर्शन श्री प्रकाश कुंटे यांनी केले आहे. अदिती मोघे याची कथा व पटकथा आहे. तर मुख्य भूमिकेत हृषीकेश जोशी, भालचंद्र कदम आणि प्रियदर्शन जाधव आहेत.  चित्रपट सुरेख आहे . जणू मनाला लागलेल आल्हाददायक वारे!   उत्तम दिगदर्शन, उत्तम अभिनय, उत्तम पात्रे, उत्तम कथा, उत्तम चित्रपट निर्मिती, आणि एक खराखुरा कौटुंबिक चित्रपट असलेल 'सायकल' ही जणू जाईच्या फुलांची माळच! 

कथा सरळसोट आहे. चित्रपटाच्या नायकाला - केशव ला  (हृषीकेश जोशी)  एक सुरेख सायकल त्याच्या आजोबांनी दिली असते. आपला नायक भविष्य सांगणारा असतो व्यवसायाने, त्याच्या आजोबां सारखा. म्हणून हा वारसाला हक्क. ती सायकल मूळ एका इंग्रजाची असते आणि त्याने आपल्या कथा नायकाच्या आजोबांना दिली असते.  केशव चे सायकलवर अतिशय प्रेम असते आणि केशव चे हे सायकल प्रेम पंचक्रोशात विख्यात असते. कर्म-धर्म संयोगाने  दोन भुरट्या चोरांच्या (भालचंद्र कदम आणि प्रियदर्शन जाधव) हाती ती सायकल लागते. बस, इथुन गोष्ट  सायकल च्या गतीने पुढे प्रवासाला लागते. गोष्ट नागमोडी वळण घेत नाही, तुम्ही रम्य कोकणात गाणं गुणगणत  सायकलवरून फेर-फटाक्याला निघालया सारखच ही गोष्ट प्रवास करते. गोष्टीच्या शेवटी सायकल परत आपल्या नायका कडे येणार ही प्रेक्षकांना माहिती असते पण  या साध्य चोरीने अनेकांची आयुष्ये बदलतात, अगदी सायकलीचे सुद्धा! 

सुरुवातीला म्हणाल्या प्रमाणे चित्रपटाची सृष्टी-निर्मिती उत्तम आहे. कॅमेरा संचालन, कॅमेराचा दृष्टीकोण, प्रत्येक शॉट ची प्रकाश मांडणी कोकणाच्या सुरेख भूभागाला बोलत करतो. कोकण जणू चित्रपटातील एक पात्र बनत. चित्रपटात पात्र कमी आहेत आणि अगदी  एका   हातावर मोजता येतील एवढ्याच पात्रांना प्रामुख्याने भूमिका आहेत. त्यामुळे मुख्य भूमिकेतील पात्रे छान रंगली आहेत. त्यांची व्यक्तिमत्वे आणि विचार बदलतांना प्रेक्षकांना जाणवतात. पण मुख्य भूमिका छान आहेत म्हणून सहायक पात्रे कमी पडली नाहीत. प्रत्येक कलाकाराने मिळालेल्या वेळात उत्तम भूमिका वठवली आहे. केशवची लहान मुलगी, बायको, त्याचे वडील,  गावातील सावकार या सगळ्यांचे गोष्टी ला पुढे नेणाऱ्या भूमिका एकूण चित्रपटात चपखल बसतात. चित्रपटाचा काळ सन ५० किंव्हा ६० च्या दशकातील दाखवला आहे. त्या काळाची वेशभूषा आणि राहणीमान  व्यवस्थित दाखवले आहे.  चित्रपटावर पैसे खर्च केला आहे हे जाणवते पण पैसे जिथे आवश्यक आहे तिथेच टाकलाय आणि जो टाकलाय तो उपयोगात आलेला आहे. कारण चित्रपटाचा जुना कालमान दाखवण्याच्या मागचे कारण जुन्या काळातील थोडा भाबडेपणा , थोडा मनस्वीपणा आणि तरी मुळात असलेला चांगुलपणा आणि त्या चांगुलपणाला वाव व प्रोत्साहन देणारा समाज हे कथेचे व चित्रपटाचे आधारस्तंभ आहेत. साधारणत:, कौटुंबिक चित्रपट बनवायचा तर त्याच्या मुळाशी कुठला तरी ठाम विचार व दृढ तत्वज्ञान हवे. नीट विचाराअंती बनवलेलया चित्रपटात हे तत्वज्ञान प्रेक्षकां पर्यंत बरोबर पोचते. या चित्रपटाची कथा सरळसोट असली तरी त्यामागे संदेश आहे. आणि हा संदेश अत्यंत कल्पकतेने दाखवण्यातच या चित्रपटाचे यश दडलेले आहे. 

हा चित्रपट म्हणजे बा. भ. बोरकर किंव्हा शांताबाई शेळके यांची कविता वाचल्या सारखी आहे. सुरवंटाचे फुलपाखरू होण्याची ही कथा मनाला हळुवार स्पर्श करून जाते. प्रत्येकाने अवश्य हा चित्रपट बघावा. 


1/10/21

चांदोबा

अचानक माझ्या हाती चांदोबा मासिक चे अंक ऑन लाईन लागलेत. आठवणींच्या गुहेत गेल्या सारखे वाटले. लहानपणी  आमच्या कडे किशोर आणि चांदोबा अशी दोन मासिके माझ्या साठी व माझ्या मोठ्या भावा साठी येत असत. किशोर हे मासिक महाराष्ट्र राज्य सरकार उपक्रम अंतर्गत प्रकाशित होत असे. आणि ते किशोर वयीन मुलांसाठी असे (नावा प्रमाणे!). मी दर महिन्यात चांदोबाची आतुरतेने वाट बघत असे. आणि एकदा का मासिक आले की कधी वाचून संपवेन असे होत असे. त्यातल्या गोष्टी, चित्रे , मालिका मला फार आवडत असे. आमच्या कडे सगळे अंक जमा करून बॅगेत भरून ठेवलेले होते. उन्हाळ्यात काहीच करायला नसायचे तेंव्हा मी जुने, धुळीने माखलेले अंक पुन्हा पुन्हा वाचत असे. खूप साऱ्या गोष्टी मला पाठ झाल्या होत्या. एवढं वाचून एक तर माझा मराठी चांगले झाले होते आणि दुसरा म्हणजे, न कळत माझ्या वर भारतीय नीतिमत्तेचे संस्कार झालेत व भारतीय इतिहासाचा परिचय, जो भारतीयांनी लिहिला आहे,  झाला. 

आता भारतीय नीतिमत्ता म्हणजे नेमके काय? तर चांदोबातील बहुतांश गोष्टी या इसापनीती, हितोपनिषद किंव्हा उपनिषद मधल्या किंव्हा त्या वर आधारित असत. पुराण, रामायण व महाभारतातील गोष्टी, खास करून कृष्णाच्या गोष्टी नियमित प्रकाशित होत असत.  गोष्टींद्वारे लहान मुलं-मुलींना चतुरपणा, हजरजवाबीपणा कसा व कुठे करावा, आणि  कुठे हजरजवाबी पणा करू नये, प्रामाणिकता, इत्यादि संस्कार तर होत असत. भारतीय समाज, नितीमत्ता व धर्माचे वैशिष्ट्य असे हे कधीच एकांगी, एकमार्गी नाही. उदाहरणार्थ, प्रामाणिकता जरी अंतिम सत्य मानिले तर त्यातील बारकावे शिकवायला हवे. परिस्थिती कशी आहे, त्यातून काय सिद्ध होईल, त्याचे काय परिणाम होतील. मी प्रामाणिक राहणार, आजूबाजूचे गेले खड्ड्यात असला एकांगी विचार केला की गांधी तयार होतो! आज काल हा बारकावा शिकविला जात नाही आणि लोकांनाही याचा विसर ही पडला आहे. पाश्चिमात्य विचारप्रणाली जी ख्रिस्ती धर्मावर आधारित आहे, आणि ज्यांची नीतिप्रणाली ही मनुष्य मूळ पापी च आहे आणि त्याला न्याय शेवटी येशू च देणार असल्या भ्रामक अंध विश्वासावर आधारित आहे, तशी विचार सरणी हळू हळू भारतात मानल्या जाते आहे. 

चांदोबाच्या ऐतिहासिक गोष्टी पण खूप असत. गोष्टी रूपात आणि कॉमिक्स  शैलीत ही गोष्टी असत. दक्षिण भारतातील बऱ्याच ऐतिहासिक पात्रांची ओळख मला चांदोबामुळेच झाली. पण त्याहून एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे की आपला इतिहास आपल्या लोकांनी लिहिलेला मला वाचायला मिळाला. पुरातन ते नवीन भारतीय इतिहास आपला नाहीच, त्या केवळ घटना आहेत ज्याच्या संबंध १९४७ साल नंतरच्या भारताशी नाहीच आणि हिंदू इतिहास तर घृणात्मक असल्याच्या  (पण गांधी नेहरूंचा इतिहास १९४७ च्या आधीचा असला तरी वाचायचाच!) काहीश्या विकृत आणि विभित्स मनोवृत्ती तून आपल्या शाळांमध्ये इतिहास शिकविल्या जातो. अश्या परिस्थितीत चांदोबा मुळे मला इतिहास व पुराणांची ओळखच नव्हे तर आवड व आपुलकी निर्माण झाली. आणि ही आवड आजगयत आहे. 

मला वाटत की चांदोबाचे प्रकाशन बंद झाले आहे. स्वभाषेत वाचणारे आणि लिहिणारे, दोन्ही कमी झालेत. मातृभाषेचा व स्व भाषेचा गळा मोठया अभिमानाने हळू हळू घोटून हत्या करणार भारतीय समाज हा जगातला एकमेव च असावा. आणि चांदोबाचे वाचन वर्ग कमी होत गेल्यामुळे बंद पडलेले प्रकाशन हे भारतीय भाषा, इतिहास, विचारधारेचा जणू अंतिम टप्पा आहे. भविष्य आता इंग्रजीत बोलून पाश्चिमात्य देश, संस्कृतीची नक्कला करणारा देश भारत होणार आहे. 

1/2/21

चित्रपट परिक्षण आणि निरीक्षण - बालगंधर्व

नुकताच बालगंधर्व चित्रपट बघायची संधी मिळाली. गेले कित्येक वर्षे या चित्रपटाची, म्हणजे बालगंधर्वांची, गाणी ऐकतोय. अक्षरशः दर एक दिवसा आड 'नमन नटवरा' ऐकतोच. त्यामुळे आणि चित्रपटाचे स्थिर-दृश्य बघून या चित्रपटा बद्दल एक उत्सुकता होती. बघायला वेळ आणि माध्यम (नेटफ्लिक्स) मिळाल्यावर मी आणि सौ. नी मोठ्या आनंदात चित्रपट बघणे सुरु केला. पण निराशा पदरी पडली असे म्हणायला हरकत नाही! 

सुरुवात चित्रपटात काय चांगले होते यांनी करू या. चित्रपटाचे सेट्स, त्याची सृष्टी-निर्मिती, चित्रपटाची काल-निर्मिती, पोशाख, दिवे आणि कॅमेरा हे सगळेच अत्यंत उत्कृष्ट दर्जा चे होते. मराठी चित्रपटांची या सगळ्याच बाबतीत गेलया १५  वर्षात झपाट्याने प्रगती झाली आहे आणि बालगंधर्व चित्रपट या दशकातील या बाबतीतला कळस मानायला हरकत नाही. बालगंधर्वांचे लहानपणीचे घर वा वाडा असो की मोठं झाल्यावर त्यांनी भेट दिलेला कोल्हापूर चा राजवाडा असो, बालगंधर्वांच्या जीवनातील महत्वाच्या क्षणात प्रेक्षक थेट त्या काळात प्रवास करितात. वेगवेगळ्या भूमिकेतील कलाकार हे उत्तम आहेत. छत्रपती शाहू असोत की लोकमान्य टिळक असो, प्रत्येक कलाकाराने काही मिनिटांच्या भूमिकेला नीट न्याय दिला आहे. या चित्रपटाच्या गाण्यानं बद्दल तर लिहिणे म्हणजे लता मंगेशकर यांच्या गळ्याचा गोडवा शब्दात अंकित करण्या सारख आहे. या चित्रपटाची गाणी म्हणजे मराठी चित्रपटाचा एक वारसा आहे. कौशल इनामदार यांनी जुन्या बालगंधर्वांच्या गाण्यांना नवीन शैलीत आणि वाद्यवृंदात मांडले खरे पण तरी मूळ गाण्यांचा आणि चालींचे व्यक्तिमत्व आणि ओळख कायम आहे. 

पण तरी हा चित्रपट एक अत्यंत महत्वाच्या मुक्कामात कमी पडतो. आणि ती म्हणजे कथा. आता बालगंधर्वां चे आयुष्य आणि त्यातील महत्वाच्या घटना बहुतेक करून सर्वश्रुत आहेत. त्यामुळे या चित्रपटाचे काम त्या घटनांची फुले नीट गुंफुन साजेसा हार बनविणे होते पण तसे झालेले दिसत नाहीत. घटनाक्रम तुटक वाटतो. बालगंधर्वांसारखे व्यक्तिमत्व दोन-तीन तासांच्या सीमेत  बांधणे फार कठीण कार्य, हे मान्य पण  मला वाटते की निर्माते आणि लेखकांनी एक फार महत्वाच्या प्रश्नाचा विचार केला असता तर जे काही उत्तर त्यांने ठरवले असते ते चित्रपटाच्या क्रमात दृष्टीस आले असते. हा चित्रपट बालगंधरावांच्या जीवनावर बेतलेला आहे के हा चित्रपट बालगंधर्वांच्या जीवनाचा आहे? कारण तुटक पण जो आढळतो तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दोष आणि आणि त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांवर चादर टाकण्याच्या केलेल्या  प्रयत्नानंमुळे प्रकर्षाने जाणवतॊ. आणि त्या भानगडीत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू झाकोळल्या गेलेत. त्यांना गाणं म्हणजे देवाचे वरदान होते. पण त्याहून अधिक महत्वाचे म्हणजे  अगदी लहानपणा पासून त्याच्या वरदानाची कदर करणारे लोक त्यांना मिळत गेलेत. त्यामुळे त्यांना जीवनात झालेल्या हाल अपेष्टा बहुतेक करून स्वतः ओढावून घेतलेल्या होत्या. प्रत्येक घडीला त्यांना हात देऊन वर खेचायला तयार होते (उदा. प्रभात सिनेमा)  पण आता याला हेकड पण म्हणा की अस समजा की कलेचे वरदान प्राप्त असलेल्यांचा झक्कीपणा,  त्यांनी ते हात दूर ढकललेत. त्या सगळ्यात आपल्या बायकोचे हाल केलेत आणि शेवटी तिला सोडून देऊन एका मुसलमान बाई सोबत घर बसविले. आणि हो, त्या भानगडीत स्वतःला आणि स्वतःच्या कलेला त्यांच्या वयाच्या चाळीशीत च कालबाह्य ही केले. 

लोकमान्य टिळक आणि छत्रपती शाहू महाराजांची कृपादृष्टी असलेल्या हा थोर गायक सन १९६७ पर्यंत होता यावर विश्वास बसत नाही. 

नेमका हा चिकित्सकपणा , हा अभ्यास आणि वस्तुनिष्ठ दृष्टी चित्रपटात दिसत नाही आणि माझ्या मते या महत्वाच्या पल्ल्यावर चित्रपट अडखळतो. वर मी अभिनयाचे कौतुक जरी केले तरी अनपेक्षित पणे सुबोध भावे यांचा अभिनय थोडा विचित्र वाटतो. त्यांच्या अभिनय कौशल्यं बद्दल शंका नाही. थोर कलाकार आणि चित्रपट निर्माते आहेत सुबोध पण या चित्रपटात मात्र मला त्यांचा अभिनय अर्धवट वाटतो. खूपदा परिस्थिती आणि घटनेचा ताल जुळत नसल्यामुळे, नेमक्या कुठल्या भावना समोर मांडाव्यात हा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो.  शारीरिक हावभाव पण पुढे पुढे स्थगित झाल्यासारखे वाटतात. वयाने माणसाच्या हालचाली हळू होतात पण १९३० च्या दशकात त्यांचे वय चाळीशीत होते त्यामुळे ते वय सुबोध भावे दर्शविताना हालचाली हळू करून काय दर्शवित आहेत ते नेमके कळत नाही. 

टीका करणे सोपे आहे. चित्रपट बनविणे महत कठीण. या चित्रपटा मागे प्रचंड मेहनत तर दिसतेच  तसेच मराठी रंगभूमीचे व  नाट्य-संगीताचे उत्कट प्रेम आणि बालगंधर्वांचे मराठी संस्कृतीतील अढळ स्थान दाखविण्याची प्रबळ इच्छा पण दिसते. त्यांची गाण्यांना पुन्हा नवीन जन्म मिळाला. त्यामुळे या चित्रपटाचे कौतुक व्हायलाच हवे. पण इंग्रजी मिडीयम मध्ये शिकलेल्या मराठी पिढीला मात्र हा चित्रपट बघून बालगंधर्वांचा परिचय नीटसा होत नाहीं. या प्रेकशकामध्ये प्रश्नचिन्ह अधिक दिसतील. 

पण शतक बनवितांना ९५ धावा काढणे जरी स्पृहणीय असले तरी विक्रम म्हणून त्याची नोंद होत नाही. तसा काहीसा प्रकार इथे झाला याचे वाईट वाटते.