2/10/14

पेशवाईचा र्‍हास - दुष्काळ, इंग्रज-फ्रेंच युध्द आणि आरमार (भाग २)

सेवन इयर्स वॉर
मागच्या दोन लेखांमधे आपण दुष्काळाचे परिणाम, मराठ्यांच्या एका कर्तबगार पिढीचा अचानक अंत आणि भारतावर होणार्‍या परकीय आक्रमणांच्या बदलत्या स्वरुपाचा आढावा घेतला. याच दरम्यान युरोपात एक नविन वादळ निर्माण होत होते. आणि त्याचे प्रतिकुल परिणाम भारतावर झालेत. मी मागच्या दोन लेखात सेवन इयर्स वॉर बद्दल बर्‍याचदा उल्लेख केला. पण आता मागील लेख परत वाचल्यावर अस लक्षात येतय की या लेख मालिकेच्या सुरुवातीलाच सेवन इयर्स वॉर बद्दल चर्चा करायला हवी होती. पेशवाईचा र्‍हास या युध्दामुळे झाला नाही. पेशवाईचा र्‍हास वरच्या पिढीचा मृत्यु आणि एका पाठोपाठ घडलेल्या दुष्काळांमुळे झाला पण त्याचा फायदा इंग्रजांना सगळ्यात जास्त घेता आला ते त्यांच्या सेवन इयर्स वॉर मधील विजयामुळे.

सेवन इयर्स वॉर सन १७५६ ते सन १७६३ या कालावधीतले युध्द होय. हे एक युध्द नव्हत आणि एका ठिकाणीही घडले नाही तसेच हे केवळ दोन राजवटी किंवा राष्ट्रां पर्यंत सिमीतही नव्हते. याला पहिले जागतिक युध्द म्हणायला हरकत नाही कारण हे ज्ञात जगाच्या तीन खंडांमधे लढल्या गेल. इंग्रज आणि फ्रेंच या राजवटींना ज्ञात जगावर सत्ता प्रस्थापित करायची होती आणि मुख्य म्हणजे जागतिक व्यापारवर कब्जा करायचा होता. हे युध्द म्हणजे या दोन राजवटींच्या महत्त्वाकांक्षेची परिणीती होय. या युध्दात अनेक राजवटी सामिल होत्या. युरोपमधे ऑस्ट्रीयन, हॅनोवर, प्रुशियन, रशियन आणि स्पॅनिश सत्ता तर भारतात बंगालचा नवाब आणि उत्तर अमेरिकेत इंग्रजांची १३ संस्थाने (कॉलनी) तसेच अमेरिका खंडातले मूळ-निवासी (रेड इंडियन) राज्ये, या सगळ्यांनी या युध्दात भाग घेतला आणि त्याचे परिणाम भोगलेत. युध्दा अंती मात्र, नशिबाचाच भाग म्हणावा लागेल, फक्त इंग्रजच विजयी ठरलेत. या युध्दाचे परिणाम आणि त्याची सावली कुठपर्यंत पडली याचा विचार आपण पुढल्या लेखात करु. या लेखात नेमके काय घडले याचा आढावा घेउया.
हे युध्द अचानक उद्भवले नव्हते. त्याची बीज किमान दोनशे वर्ष आधी पेरलेली होती. तसेच या युद्धाचा आढावा घेण्यास कालमान थोडा मागेपुढे करुन बघावा लागेल. जिग्-सॉ च कोड कस विभिन्न रंगाची आणि आकाराचे ठोकळे एकत्र केल्यावरच स्पष्ट होत तसेच या युध्दाची पार्श्वभूमी, कारणे, त्यात गुंतलेली राष्ट्रे आणि राजवटी, बदलता काळ आणि तसेच सत्तेची बदलती व्याख्या, व्यापाराच्या आधारावर उभरणार साम्राज्यवादाचा नविन राक्षस आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मानवी जीवनात आमूलाग्र बदल आणणारे यांत्रिकीकरण आणि औद्योगिकीकरण इत्यादी घटना एकत्र केल्यात तरच या घटनेचे महत्त्व स्पष्ट होते. १७व्या शतक हे इंग्रज आणि फ्रेंच या सत्तांच्या चुरशीने गाजले. हा कलह या दोन देशांसाठी नविन नव्हता. त्याआधी निदान चारशे वर्ष हे दोन राज्य एका-मेकांशी सतत भांडत आली होती. त्यांच्यातील एक युध्द तर तब्बल शंभर वर्ष लढल्या गेल. (त्याल हंड्रेड इयर्स वॉर म्हणतात) पण सतराव्या शतकातल्या त्यांच्या कलहाला विशेष महत्व कारण त्याचे पडसाद अठराव्या शतकात इंग्रजांनी भारताला गुलामगिरीच्या पिंजर्‍यात यशस्वीपणे अडकविण्यात झाली.

युरोपातील रंगमंचः

सेवन इयर्स वॉरची सुरुवात, सहाजिकच, युरोप खंडात झाली.त्या काळातील युरोपिय राजकीय नकाशा आज पेक्षा वेगळा होता. इंग्लंड आणि फ्रांस, स्पेन आणि रशिया ही आजच्या काळातली राष्ट्रे तेंव्हा राजवटी होत्या तसेच हॅनोवर, प्रुशिया, ऑस्ट्रिया या इतर प्रमुख राजवटी होत्या. सन १७५६ ला प्रुशियाच्या फ्रेडरिक द ग्रेट ने ऑस्ट्रीया आणि सॅक्सोनी राज्यावर हल्ला केला. खर सांगायच तर जगातील इतर महाराज्यांच्या तुलनेत हे युध्द म्हणजे लुटपुटीचे युद्ध मानायला हवे पण लौकरच या युध्दाचे रुपांतर युरोपिय युध्दात झाले आणि पुढे जागतिक युध्दात. इंग्लंडने प्रुशियाची बाजु घेतली तर फ्रांस, रशियाने ऑस्ट्रिया आणि सॅक्सोनीची बाजु घेतली. युरोपात इंग्रजांनी आपले भूदल कधीच उतरविले नाही. युरोपीय भूमीवरची युध्दे फ्रेडरीक दि ग्रेटच्या सैन्याने जिंकलीत. इंग्रजांनी सगळे लक्ष उत्तर अमेरिकेतील धुमश्चक्रीवर केंद्रित केले.

उत्तर अमेरिकेचा रंगमंच:
कोलंबसाने दक्षिण अमेरिकेचा शोध लावल्यापासुन युरोपिय राष्ट्रांमधे तो भूखंड गिळंकृत करण्याची स्पर्धा सुरु झाली. सुरुवातीला स्पेन आणि पोर्तुगल या शर्यतीत पुढे होते. या दोन राष्ट्रांनी दक्षिण अमेरिक आणि मध्य अमेरिका वाटुन घेतले. स्पेन या जमिनी हडपण्याच्या आणि तिथल्या मूळ निवास्यांना अत्यंत भीषण रितीने मारण्यात अग्रेसर होत. त्यामुळे दक्षिण अमेरिकेतील ब्राझिल प्रांत सोडला तर इतर सर्व प्रदेश तसेच मध्य अमेरिका आणि उत्तर अमेरिकेतील फ्लॉरिडा, कॅलिफोर्निया प्रदेशावर स्पेनचे अधिपत्य होते. पण पुढे, म्हणजे १६व्या शतकात स्पेन कडे लोक कमी आणि जमिन जास्त असे झाले त्यामुळे त्यांना इतक्या मोठ्या भूभागा कडे लक्ष देणे अशक्य होते. या पार्श्वभूमीवर इंग्रज, फ्रेंच आणि डच (सध्याचे नेदरलँड) या राजवटी उत्तर अमेरिका खंडांमधे लुडबुड करु लागल्यात. लौकरच आज ज्याला आपण संयुक्त राष्ट्र अमेरिका (यु. एस.) म्हणतो त्याचा उत्तर-पूर्व भाग इंग्रजांनी घेतला तर त्याच्या उत्तरेला म्हणजे सध्याच्या कॅनडा भाग फ्रेंचांनी घेतला. अर्थात, फ्रेंच आणि इंग्रज दोघांनाही संपूर्ण उत्तर अमेरिका स्वत: साठी हव होत त्यामुळे त्यांच्या संघर्ष उत्पन्न होणे स्वाभाविक होते.

या दरम्यान उत्तर अमेरिकेत फ्रांसने कॅनडा परिसरातुन इंग्रजांच्या परिसरात हात-पाय पसरायला सुरुवात केली. सन १७५० चे दशक उजाडे तोवर इंग्रजांच्या १३ संस्थाने (कॉलनी) उत्तर अमेरिकत दृढ झाल्या होत्या. (जग प्रसिध्द हार्वड युनिवर्सिटीची स्थापना सन १६३६ ची आहे) या संस्थानांच्या द्वारे इंग्रज फ्रेंचांशी भांडू लागलेत. (अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टन यांनी युध्दाचे बाळकडू हे इंग्रजांचे सैनिक बनुन फ्रेंचांशी केलेल्या युध्दात घेतलेत) सन १७५६ ला फ्रेडरिक दि ग्रेटने युरोपात युध्द चालू केल्यावर अमेरिकेच्या सागरी किनारपट्टीवर इंग्रजी आरमार फ्रेंच आरमार आणि व्यापारी गलबतांच्या मागे लागू लागलेत. अश्या प्रकारे युरोपातील युध्दाचा दुसरा रंगमंच उत्तर अमेरिकेत उघडला. सन १७४६ (म्हणजे सेवन इयर्स वॉरच्या आधी) ला फ्रेंचांनी भारतीय उपखंडातील मद्रासचे पोर्ट इंग्रजांकडुन जिंकले त्यामुळे इंग्रज आणि फ्रेंच भारतीय उपखंडातही भांडू लागलेत. पुढे प्लासी (पळशी) च्या युध्दात इंग्रज जरी बंगालच्या नवाबाशी लढलेत तरी या नवाबाल फ्रेंचांचा पाठिंबा होता. थोडक्यात प्लासीची लढाई फ्रेंच आणि इंग्रजांमधल 'प्रॉक्सी' युध्द म्हणायला हरकत नाही. युरोप आणि उत्तर अमेरिकेतल हे युध्दाचा वन्ही आता भारतीय उपखंडात पसरु लागला.

त्या काळात इंग्रजांचे आरमार फ्रेंचांच्या तुलनेत बलाढ्य होते तर फ्रेंचांचे भूदल इंग्रजांपेक्षा अधिक शक्तिशाली होते. पण या दोन राजवटींचे खजिने फार सिमित होते. इतक्या मोठ्या समुद्री आणि भू प्रदेशात एकाच वेळेस युध्द करण्याचा ताण या दोन्ही राष्ट्रांना जड जाउ लागला. ही युध्द अजुन किती वर्ष चालाणार याची कल्पना कोणाला नव्हती पण जादूची कांडी फिरवल्या सारख तिन्ही खंडातील युध्द इंग्रजांनी जिंकलीत तसेच समुद्रावर आपली अनभिषिक्त सत्ता प्रस्थापित केली.

 तेथे त्यांच्या कडे संस्थानांच्या द्वारे भूदलही होते आणि किनारपट्ट्यांवर त्याचे आरमारही सुसज्ज होते. सेवन इयर्सच्या काळात या भागात बर्‍याच चकमकी झाल्यात आणि त्यावर फारस लिहिण्याचा मानस नाही पण या सगळ्या युध्दात इंग्रजांनी फ्रेंचांचा कडक पराभव केला. कॅनडा फ्रेंचांन सोडावे लागले. (कॅनडा जरी आज स्वंतत्र राष्ट्र असले तरी इंग्लंडची राणी त्यांची राष्ट्रप्रमुख मानल्या जाते) तसेच वेस्ट इंडिज ची बेटे आणि तिथला उभरता गुलामांचा व्यापार आणि उसाच्या साखरेचा व्यापार इंग्रजांचा झाला.

भारतात प्लासीच्या युध्दाचा अंत आणि त्याचे परिणाम सर्वश्रुतच आहेत.

सन १७६३ ला चारही मुंड्या चित झालेले फ्रेंच नरम होउन इंग्रजांसोबत करार करायला राजी झाले. त्याला करार म्हणणे विनोद ठरेल कारण उत्तर अमेरिकेचा भूभाग, वेस्ट इंडिज मधला व्यापार आणि भारतात हात-पाय पसरविण्याची शक्यता असे सगळेच्या सगळे फ्रेंचांनी गमवले. भारतात आता फक्त इंग्रज हीच एक युरोपिय सत्ता उरली होती.

युरोपिय राजवटींनी अमेरिकेत दोनशे वर्ष प्रचंड विध्वंस केला. तेथिल मूळ निवास्यांना कापून काढले किंवा जबरदस्तीने लग्न करुन त्यांची ओळख बदलवुन टाकली. पण आशिया, अफ्रिका किंवा मध्य आशिया भागात असे करणे युरोपियन सत्तांना अशक्य होते. या भागातील लोक, त्यांचा इतिहास घट्ट बसलेला होता आणि या भागातील लोकसंख्या इतकी होती की इतक्या लोकांना कापून काढणेही शक्य नव्हते. अश्या परिस्थिती व्यापाराद्वारे युरोपिय लोक आधी रुजले आणि हळु-हळु त्यांनी आशिया आणि अफ्रिका खंडांना गुलाम बनविले.

सेवन इयर्स वॉरचा अंत म्हणजे युरोपिय साम्राज्यवादाच्या वर्जन २.० ची सुरुवात मानायला हरकत नाही.
या कालमानाचा भारताचा इतिहास पश्चिमी ऐतिहासिक पुस्तकांमधे वाचायला गेलात तर पेशवाईचा उल्लेखही नसतो हे खेदजनक सत्य आहे. साधारण सन १७६३ च्या अखेरीस म्हणजे 'सेवन इयर्स वॉर' (सात वर्षाचे युद्ध) च्या अखेरीस बंगालच्या सिराजुद्दौल चा पराभव करुन इंग्रज जणु भारताचे सार्वभौम सत्ता झाल्याचा भास निर्माण केला जातो. प्लासीच्या युद्धात फ्रेंचांच्या कुबड्यांनी उभा असलेल्ल्या सिराजुद्दौला इंग्राजांनी हरवले हे खरे पण त्यातुन निष्पन्न भारत आणि पेशव्यांच्या दृष्टीने फारस काही झाले नाही. पण हे युद्ध इंग्रज आणि फ्रेंचांच्या दृष्टीने महत्त्वाचे या साठी की त्या नंतर भारतात फक्त इंग्रज हीच एक युरोपिय सत्ता उरली. इथे एक मुद्दा ध्यानात घेण्यायोग्य असा की जरी फ्रेंच आणि इंग्रजी सत्ता भारतात मामुली होत्या तरी जगात इतरत्र त्या बलाढ्य होण्याच्या मार्गावर होत्या.



(क्रमशः)
X

X


सेवन इयर्स वॉर च्या युध्दाचे क्षेत्र आणि प्रमुख स्थाने



युरोप (सन १७७०)




भारत (सन १७६०)




या युध्दाबद्दल अजुन माहितीसाठी खालील संकेतस्थळांना अवश्य भेट द्यावी:

1)http://faculty.marianopolis.edu/c.belanger/quebechistory/encyclopedia/SevenYearsWar-FrenchandIndianWar-AGreatImperialWar.htm

2) http://www.ushistory.org/declaration/related/frin.htm

3) http://stutzfamily.com/mrstutz/independence/seven.html

4) http://www.kronoskaf.com/syw/index.php?title=Political_Consequences_of_the_Seven_Years_War

5) http://history.state.gov/milestones/1750-1775/french-indian-war