2/3/25

थोरले बाजीराव आणि 'मल्हारी'


नवीन वर्षाच्या स्वागताची पार्टी चालू होती. सगळीकडे आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण होते. गाणी जोरजोरात वाजत होती. आम्ही आमच्या मित्रांच्या घरी मजा करीत होतो. आता नाचायचे म्हंटले कि एकूण धांगड-धिंगा वाली गाणीच लागणार. वाद्ये, आवाज, नृत्य सगळे एकदम भन्नाट हवे. तशीच गाणी वाजत होती. तेवढ्यात 'बाजीराव-मस्तानी' या सन २०१५ सालच्या हिंदी चित्रपटातील 'मल्हारी' हे गाणे लागले. समोर टी.व्ही. वर चित्रपटातील थोरल्या बाजीरावांची भूमिका वठवीत रणवीर सिंग जोरजोरात नाचत होता. उत्तम नट आणि उत्तम नृत्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रणवीर सिंग याने या गाण्यात अतिशय उत्तम नाच केला आहे. गाण्याची चाल हि कर्णवेधक आहे. हिंदी चित्रपटात गेल्या काही दशकात विषय काही हि असो पण एक धांगड-धिंगा वाले  गाणे असतेच. निर्मात्यांचा मत असे कि काही नाहीं तर हे गाणे बघायला लोक येतील. यात किती तथ्य आहे खुद्द निर्माता आणि देव जाणो पण साधारण या गाण्यांमध्ये तुरळक वस्त्रात नट्या असतात. आपण मराठी लोकांचे नशीब खरे कि निदान 'मल्हारी' गाण्यात असे चित्त-चक्षु 'चमत्कार' नव्हते. आणि मुख्य भूमिकेतील नटच नृत्य करीत होते. 

मी हा चित्रपट बघितला नाहीं. चित्रपट परीक्षण हा या लेखाचा उद्देश्य नाहीं. चित्रपटाचे विविध आढावे वाचलेत किंव्हा ज्यांनी चित्रपट बघितला आहे त्यांच्याशी बोललो तर चित्रपट चांगला आहे अशीच साधारण प्रतिक्रिया मिळाली आहे. पण तरी 'मल्हारी' गाणे बघून काहीतरी चुकल्यासारखे झाले. थोडे वाईट वाटले. थोरले बाजीराव हे काय व्यक्तिमत्व होते, त्यांचा अतुलनीय पराक्रम, अचाट कर्तृत्व, त्यांचा दरारा, त्यांचा अख्ख्या हिंदुस्तानात दबदबा याचा सगळा विचार केला तर छत्रपती शिवाजींचा जणू वारसा लाभलेला आणि त्यांच्या नंतर मराठा साम्राज्याचा अजिंक्यतारा, अश्या तऱ्हेचे हेंगडे-फेंगडे नृत्य त्याच्या सैनिकांसोबत करीत असेल हि कल्पना करवीत नाहीं. थोरले बाजीराव हे नुसते सेनापती नक्कीच नव्हते. त्यांची पथके त्यांच्या निवडक सैनिकांची होती. त्यांच्या स्वाऱ्या म्हणजे कासवाचे पाठीवरचे घर असे. अगदी निवडक तंबू आणि बाकी सैन्य उघड्यावरच असे, कारण एकदम आवरून निघायचे तर १०-२० हजार सैनी जलद गतीने निघू शकत. थोडक्यात थोरले बाजीराव आणि त्यांच्या सैनिकांची जवळीक असणार पण म्हणून 'मल्हारी मल्हारी' गात ते त्यांच्या सोबत उड्या  मारीत नसणार.

                                     

सन १७३७-३८ च्या त्यांच्या दिल्लीच्या मोहिमेत त्यांनी थेट दिल्लीच्या पालिका बाजारात मुक्काम केला होता. दिल्लीत धावपळ उडाली. दिल्लीच्या कट-पुतळी बादशहाची पूर्णपणे सटारली. त्याच्याकडे न सैन्य होते ना त्याने कधी म्यानातून तलवार बाहेर काढली होती. आणि जरी त्याच्या बाहुत थोडा दम जरी असला तरी समोर बाजीराव! त्याने आपले मंत्री-संत्री पाठवून थोरल्या बाजीरावांचे स्वागत केले. काय हवे त्याची विचारपूस केली. सैन्य सुद्धा जमविण्याचा प्रयत्न केला पण थोरल्या बाजीरावाशी लढण्याची उत्सुकता कोणी दाखविली नाहीं. थोरल्या बाजीरावांनी तिथून सातारच्या छत्रपती शाहूमहाराजांना संदेश पाठवला कि त्यांचा हुकूम असेल तर ते स्वतः दिल्लीचे तख्त मोडतील आणि मग छत्रपती शाहूमहाराज संपूर्ण भारताचे छत्रपती म्हणून आरोहण करू शकतात. आता शोकांतिका वेगळी कि छत्रपती शाहूमहाराजांनी याला संमती दिली नाहीं आणि तख्त तोडायलाही परवानगी दिली नाहीं. पण थोरल्या बाजीरावांच्या जीवनातील हि एक घटना त्यांच्या आत्मविश्वास आणि त्यांची मर्दूमुकी दर्शविते. त्यांच्या जीवनातात अश्या असंख्य घटना आहेत. वीस वर्षात अर्ध्याहून जास्त भारत पादाक्रांत करून जिंकणे काय सोपे आहे का? 
--
हिंदी सिनेमामध्ये काही प्रसंग दाखवावेच लागतात. जुन्या काळात एक मुसलमान पात्र हवेच आणि ते मुसलमान पात्र सगळ्यात प्रामाणिकच दाखवायला हवे. नंतरच्या काळात हेंगडे-फेंगडे नाचणारी एक नटी हवी आणि ती नटी फक्त नाचासाठी असे. सिनेमाची प्रमुख भूमिका करणारी नटी वेगळीच. गेल्या काही वर्षातील नवीन कल म्हणजे प्रमुख भूमिकेतील नटच जोरदार नृत्य सादर करतात. या गाण्याचा कथानकाशी संबंध नसतो पण गाणे दृक-श्राव्य असते आणि त्या गाण्याला घेऊन चित्रपटाची जाहिरात केली जाते. अपेक्षा अशी कि सगळ्या घरांमध्ये, फोने वर, पार्ट्या आणि कल्ब्समध्ये हे गाणे वाजेल आणि चित्रपट चालायला हातभार लागेल. आता हा नियम बहुतांश सगळ्या चित्रपटांना लागू होत असेल तर थोरल्या बाजीरावांच्या चरित्रात्मक चित्रपटावरही लागू होणारच. विषय जिव्हाळ्याचा असला, चित्रपटाच्या नायकाबद्दल अपार आदर असला तरी शेवटी चित्रपट आजच्या जमान्यातील आहे आणि चित्रपट चालणे आवश्यक आहे. मग त्यासाठी 'मल्हारी' आपण सहन करायचा. हिंदी चित्रपटातील पैसे, सेट्स आणि इतर गोष्टी, ज्याने चित्रपट भव्य-दिव्य होतो त्या गोष्टी मराठी चित्रपटात आणणे कठीण आहे. आणि दुसरे म्हणजे हिंदी चित्रपट ६०-७०% भारतात बघितल्या जाऊ शकतो. म्हणजे थोरल्या बाजीरावांची ओळख पुन्हा बहुतांश भारताला होईल. येन-तेन कारणेंन, आजच्या काळात थोरल्या बाजीरावांची गाथा गाणे आवश्यक आहे. 

आता एखादं-दुसरे गाणे सहन करायचे कि अजूनही काही सहन करायचे? श्री गोवारीकर यांने अकबरावर चित्रपट काढला आणि अकबराला ह्रितिक रोशन सारखे सुंदर दाखविले (तेंव्हा काढलेल्या चित्रांवरून तरी अकबर किंव्हा कुठलाही मोघल इतका सुंदर असेल असे वाटत नाहीं) आणि जोधाला, त्याची प्रियकर दाखविले. सत्य परिस्थिती हि होती कि आपले राज्य टिकवायला, एक करार म्हणून जयपूरच्या मानसिंगाने आपली बहीण अकबराला दिली. अकबराच्या हारेम मध्ये शेकडो बायका होत्या, त्यात अजून एक जोधा दाखल झाली. दीडशे वर्षांनी जेंव्हा औरंझेब दख्खनी कफल्लक होऊन मेला तेंव्हा जयपूरच्या तेंव्हाच्या राजाने दिल्ली ला दौड मारली आणि तिथल्या राजपूत बायकांना सोडवून पुन्हा जयपुरी घेऊन आला. आणि त्यानंतर त्या घराण्याची कुठली स्त्री पुन्हा मोघलांकडे गेली नाहीं. तसेच हरियाणाच्या जाट राजाने सन १६८८ ला अकबराला जेथे दफनवले आहे तेथे हल्ला करून त्याची कबर खोदली. अकबराची हाडे काढून जाळलीत. अकबर हा 'the great ' कधीच नव्हता पण श्री गोवारीकरांनी त्या इस्लामी आक्रमकाचे उद्दात्तीकरण केलेला चित्रपटही सहन करायचा का? मला माहिती नाहीं. पण चित्रपटाच्या निमित्ताने झालेला वादामुळे अकबराला किंव्हा मोघलांच्या उद्दात्तीकरणाला आळा बसायला सुरुवात झाली. 
--
हा लेख लिहितांनाच संभाजी महाराजांच्या जीवनावर आधार 'छावा' चित्रपटाचे ट्रेलर प्रकाशित झाले. त्यात स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना लेझीम खेळतांनाचे दृश्य आहे. ते बघून मन विचलित झाले. शंभू राजे, जे पाच-पाच शत्रूंना छातीवर घेऊन ९ वर्षे अखंड लढत होते त्यांना नृत्य करतांना दाखवायची खरंच मुळीच आवश्यकता नाहीं. पण हे दृश्य वगळता, चित्रपटाचे ट्रेलर बघून अंगावर काटा आला. प्रमुख भूमिकेतील विक्की कौशल यांनी छत्रपतींची भूमिका अप्रतिम निभावल्याचे दिसते. 'पार्वती पतये नमः, हर हर महादेव' हि गर्जना संभाजी महाराज करतानांचे दृश्य बघून रोम-रोमात स्फूर्ती येते. आणि आता छत्रपती संभाजी महाराजांची ओळख भारताला होणार आणि मोघली औरंग्याच्या खरा (घाणेरडा) चेहरा पुन्हा दिसणारा याचे समाधान वाटते. 

पण चित्रपटाच्या दिग्दर्शकांना मनापासून विनंती- लेझीम-बिझीम वाला सीन कापा. गरज नाहीं.  

1 comment:

Anonymous said...

बड़ा कुछ पाने के लिए थोड़ा sacrifice चलता है