3/17/24

भाजप आणि श्री मोदी यांची तिसरी वारी

लोकसभा निवडणुकांचे वारे आता सोसाट्याने वाहायला लागले आहे. तारखा मागल्या आठवड्यात जाहीर झाल्यात पण तयारी मात्र सगळीकडे कधीचीच सुरु झालेली आहे. भाजप ने दोनशेच्या वर उमेदवारांची यादी जाहीर पण केली. काँग्रेसने सुद्धा ४०च्या आसपास उमेदवाऱ्या जाहीर केल्यात. हळू-हळू प्रादेशिक पक्ष आपले उमेदवार याद्या जाहीर करू लागल्या आहेत. गठ-बंधनाच्या बोलण्या सगळीकडे चालू आहेत. यातील काही, जसे भाजप व आंध्र प्रदेशचा प्रमुख विरोधी पक्ष तेलगू देसम पार्टी यांनी एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काँग्रेस आणि तामिळनाडूचा मुख्य पक्ष डीएमके याचे गठबंधंन पक्के झाले आहे. 

पण निवडणुका फक्त जागा-वाटप आणि गठबंधनांवर जिंकल्या जाऊ शकत नाहीं. राजकीय पक्षाला नवीन बाजू किंव्हा नवीन विचार लोकांसमोर मांडावा लागतो, ज्याचा विचार करून मतदार आपले मत देईल. विरोधी पक्ष हे भाजपच्या विचार-सरणीच्या विरोधात दिसत नाहीत. ना कुठला नवीन विचार, ना कुठली नवीन कल्पना. एक तर फुकटात गोष्टी वाटण्याची खोटी आश्वासने किंव्हा मोदी विरोधाचे रडगाणे. या विरोधी पक्षांचे नामकरण 'मोदी-विरोधी' दल असे करायला हवे.

जनता जनार्दन मात्र याकडे नक्कीच लक्ष देणार आणि त्याचे पडसाद जून मध्ये नक्कीच दिसणार. 

विरोधी पक्षांमध्ये किंव्हा त्यांच्या विचारांमध्ये जरी जंजाळ असले तरी भाजप आणि श्री मोदी यांनी एक राजकीय पक्ष म्हणून आणि एक सत्ताधारी पक्ष म्हणून देशा संबंधित प्रत्येक विषयावर, देशाला भेडसावणार्या प्रत्येक प्रश्नावर आणि देशाच्या भविष्याबद्दल  कणखर आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. भाजपच्या वैचारिक रणनीतीच्या काही मुख्य पैलूंचा आपण इथे विचार करू. 

विकास, विकास आणि विकास: भारताचा विकास हि जणू प्रतिज्ञा श्री मोदी यांनी घेतली आहे. आणि त्याचा पहिला टप्पा म्हणजे पायाभूत सुविधा. रस्ते, विमानतळे, रेल लाईन्स, सागरी बंदरे या सर्व क्षेत्रात अभूतपूर्व काम मोदी सरकारने केले. हि प्रगती भारत भर झालेली आहे. मुख्यतः उत्तर-पूर्व भारतात आणि जम्मू-काश्मीर भागात रेल लाईन्स चे काम झपाट्याने होते आहे. या व्यतिरिक्त उच्च शिक्षणाची तंत्रज्ञान, व्यवस्थापनशास्त्र आणि तसेच वैद्यकीय अशी अनेक कॉलेजेस सरकारने स्थापन केलीत. थोडक्यात, एक नवीन भारत बघता-बघता आपल्या डोळ्या समोर उभा राहतो आहे. 

येथे अजून एक लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे सरकारने भारतीय सेनेत अब्जावादी पैसे ओतला. यात परदेशातून अति प्रगत तंत्रज्ञान असलेली शस्त्रास्त्रे आणि विमाने आहेतच पण भारत सेने क्षेत्रात स्वतंत्र व्हावा या साठी मोदी सरकारने मजबूत पाया आणि पायंडा दोन्ही घातले आहे. 

सशक्त, प्रबळ आणि प्रगत हिंदुत्व: भाजप आणि त्या अन्वये श्री मोदी यांच्यावर केल्या गेलेली एक टीका किंव्हा आरोप असा कि पक्ष आणि पंतप्रधान हे हिंदुत्ववादी आहेत. आता यात काही नवल नाहीं आणि यात फारसे तथ्य पण नाहीं कारण पक्ष आणि श्री मोदी यांनी कधीच या गोष्टीचा नकार दिला नाहीं. पक्ष हिंदुत्वनिष्ठ म्हणूनच राजकारणात आला. पण हिंदुत्व म्हणजे मागासलेली विचार प्रणाली, हिंदुत्व म्हणजे नकारात्मक, स्त्री विरोधी, नवीन काळाचा आणि उद्याचा विरोध करणारी धर्मांध विचार प्रणाली अशी कल्पना भाजप विरोधी, हिंदुत्व विरोधी आणि डावे विचार सरणीच्या लोकांनी करून ठेवली आहे. आपण श्री मोदी यांच्या गेल्या दहा वर्षाच्या नीतींचा अभ्यास केला तर लक्षात येईल कि या प्रत्येक भ्रामक समजुतीला त्यांनी तडा दिला आहे. हिंदुत्वास नवीन वलय प्राप्त करणे आवश्यक होते. पण नारेबाजी किंव्हा वादाचे भोवरे तयार करून चालणार होते. हिंदुत्वाला सशक्त करायला हिंदूंना आर्थिक दृष्ट्या आणि विकासाच्या संधी उपलबद्ध करण्याची आवश्यकता होती. मोदी सरकारने याबाबतीत साधारण वाटणारी पण सामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल आणण्याची क्षमता असणारी ठोस पावले उचलावीत. उदाहरणार्थ, प्रत्येक घरात सिलेंडर पोचविणे, नळाद्वारे पाणी, प्रत्येक घरी शौचालायची सोय व्हावी म्हणून सरकारी अनुदान देणे इत्यादी अनेक योजना सरकारने यशस्वीरित्या राबविल्या. प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते उघडणे हि फार लहान बाब वाटते. पण यात दोन गोष्टी निष्पन्न झाल्यात. एक, कि तळा-गाळातील समाज घटक आर्थिक प्रणाली आणि त्यान्वये भारताच्या विकासाचे भागीदार झालेत, पण त्याहून आधीक या घटकांना एक नवीन ओळख प्राप्त झाली. याचा अजून एक मोठा परिणाम म्हणजे सरकार आता या जनतेपर्यंत थेट पोहचू शकते, मधल्या 'मिडल-मॅन' ची आवशक्यता नाहीशी झाली.  

श्री मोदी यांनी श्री बाबासाहेब आंबेडकरांना आत्मसात करून वंचित समाजासाठी त्यांच्या सशक्तीकरणासाठी अनेक योजना राबविल्यात. उदाहरणार्थ, पंतप्रधान मुद्रा योजने अंतर्गत वंचित समाजाच्या होतकरू तरुणांना धंद्यासाठी भांडवल उपलब्ध करण्यात आले. आरक्षण देणे किंव्हा श्री मोदी यांनी म्हंटले तसे फक्त 'रेवड्या' देणे हा विकास नव्हे. समाजाचा विकास म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत विकास आणि यातूनच आत्मविश्वास निर्माण होईल. स्व, स्व-राष्ट्र,स्व-धर्म या सगळ्या सामाजिक व्यक्तिमत्वाच्या अंगांचा पाय प्रत्येक व्यक्तीत रोवल्या जाईल. सरकारी यंत्रणा आणि उभारते तंत्रज्ञान याचा पुरेपूर उपयोग करून मोदी सरकारने सशक्त हिंदू समाज आणि हिंदुत्वाची घट्ट मुहूर्तमेढ केली आहे. 

राजकारण आणि चाणक्य नीती: भाजप आणि श्री मोदी सतत राजकीय खेळ्या खेळात असतात असा आरोप केला जातो.  राजकीय पक्ष किंव्हा राजकीय नेता राजकारण करणार यात काय नवल? सत्तेवर आल्यावर शांत बसून राज्य करणे आणि राजकारण हे पक्षावर सोडणे असल्या काहीतरी समजुतीत काँग्रेसेतर पक्ष असत. जी काँग्रेसेतर पक्ष केंद्रावर सत्तेवर आलीत ती दुसऱ्या वेळेस पुन्हा निवडून आली नाहीत. कारण काँग्रेस पक्ष कधीच राजकारण करणे सोडत नसत त्यामुळे सत्तेवर नसतील तरी काँग्रेस पक्ष सतत राजकीय खटपटी करीत. राजकीय पक्ष राजकारण करणारच आणि करायला हि हवं. पण राजकारण सत्तेसाठी आणि राजकारण देशासाठी यात बरेच अंतर आहे. सत्तापिपासू काँग्रेस सत्तेसाठी कुठल्याही थराला जायला धजत नसे. मग त्यात समाजाचे किंव्हा देशाचे नुकसान झाले तरी चालेल. कारण सत्ता हेच ध्येय होते देश नाहीं. श्री मोदी आणि भाजप या मुद्द्यावर इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळे उभे दिसतात. गेल्या दशकातील राजकारणाचे डाव बघता श्री मोदी आणि भाजप काही तरी ध्येय समोर ठेऊनच पावले उचलतांना दिसतात. काश्मीर मध्ये श्रीमती मुफ्ती यांच्या पक्षासोबत राज्यस्थापना केली तेंव्हा अनेक लोक चकितआणि नाराज झालेत. पण सन २०१९ जेंव्हा धारा ३७० नेहमीसाठी बरखास्त झाले तेंव्हा श्रीमती मुफ्ती यांच्या सोबतचे गठबंधं हि केवळ एक राजकीय खेळी होती हे लक्षात आली. या पाश्र्वभूमीवर श्री मोदी आणि भाजप सतत राजकारणाचे डाव-पेच लढत असतात. तिसऱ्यांदा सरकार निवडून येणे हि एक अभूतपुर्व घटना आहे आणि त्यासाठी भाजप आणि श्री मोदी प्रत्येक काळजी घेतांना दिसत आहेत. गेल्या महिन्याभरात त्यांनी आपली सगळी गठबंधना चाणाक्षपणे पक्की केलीत. 

खूप दशकांनंतर भारताला असा नेता आणि राजकीय पक्ष लाभला आहे जो ध्येयवादी आणि दूरदर्शी आहे. भारतात सध्या भाजप सोडले तर सगळे पक्ष हे प्रादेशिक कुप-मंडूक वृत्तीचे 'फ्यामिली बिझनेस' आहेत आणि हे उज्वल भविष्याचे द्योतक नाहीं. पण हे बदलायला या राजकीय डाव-पेच आवश्यक आहे. भाजप ला टक्कर द्यायची तरी आजच्या राजकीय पक्षांना त्यांचे स्वरूप बदलावे लागेल. नाहीं तर ते नामशेष होतील. येथे फक्त समाज आणि देशाचा विकास अपेक्षित नाही तर भारतीय राजकारणाचा विकास हे पण एक ध्येय आहे. 

श्री मोदी हे भारतीय राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय पटलावर आलेलं झंजावात आहे. या तिन्ही अंगांचा चेहरा-मोहरा बदलण्याची शक्ती श्री मोदींमध्ये आहे. आशा करू या भारतीय मतदार हे समजेल आणि हे बारकावे समजून आपले मत देईल. 

3/7/24

स्वानंद ची चक्कर

गल्लीच्या टोकाशी 8-9 वर्षाचा स्वानंद उभा होता. दुपारची दोन ची वेळ होती.आजुबाजूला शुकशुकाट होता. दुरून स्टेडियम जवळच्या रहदारीचा आवाज येत होता. पण गल्लीच्या टोकाशी फारस कोणी नव्हत. स्वानंद रिकामटेकडा  उभा होता. जवळच्या ग्राउंड वर कुंभार टोळीतली मुले फुलपाखरे पकडत होती. काट्याच्या काटक्यांनी फुलपाखरांना फटकारून खाली पाडत आणि मग प्लास्टिक च्या पिशव्यात ठेवत. ती अर्धमेली फुलपाखरे स्वानंद ला बघावायची नाहीत. त्याचे नेहमीचे मित्र दुपारी खेळायला येत नसत. त्यामुळे एकदा शाळेचे होमी-वर्क झाले कि बहुतांश दुपारी तो एकटाच हुंदडत असे. त्या काळात टी.-वी. वर पण  काहीच नसे.  'तो करे भी तो क्या करे?' स्वानंद ची आई त्यावेळेस घरी उगाच कट-कट नको म्हणून स्वानंदला बाहेर पाठवून देत असे. मग स्वानंद गल्लीच्या टोकाशी असलेल्या कट्ट्यावर बसे, कधी टायर छोट्या काठीने फिरवत, कधी गल्लीच्या दुसऱ्या टोकाशी असलेल्या गोठ्यातल्या बछड्याशी खेळत किंव्हा गायीच्या पोळ्याला खाजवीत वेळ काढीत असे. पण आता गायीचे बछडे हि मोठे झाले होते. खोंड झाला होता तो बछडा. मागल्या वेळेस चांगलीच जोरात ढुशी मारली त्या खोंडाने. त्याचे टायर हि कोणी तरी घेऊन गेलं होत. त्यामुळे नवीन काही तरी करायच्या शोधात स्वानंद होता. 

तेवढ्यात त्याच्याजवळ एक स्कूटर वाला आला. 

"इथे जोशी कुठे राहतात माहिती आहे का?"

"कुठले जोशी? तिसरी गल्ली कि सातवी गल्ली वाले?" स्वानंद ने विचारले. 

"माहिती नाहीं बा" 

स्वानंदच्या हातात छोटी काडी होती. न कळत स्कूटर च्या समोर च्या टायर वर तो काठीने हळूच टक-टक आवाज करीत होता. 

"एक काम करू या, तू माझ्या मागे बस. आधी तिसऱ्या गल्लीत जाऊ आणि ते जोशी नसतील तर सातव्या गल्लीतील जोश्यान कडे जाऊ या. माझ्या ओळखीतले जोशी मिळालेत कि मी तुला पुन्हा इथेच आणून सोडतो. तू याच गल्लीत राहतोस का?" स्कूटरवाल्याने विचारले. 

"हो, मी पहिल्या गल्लीत राहतो" स्वानंदने एकदम थाटात सांगितले. जणू पहिल्या गल्लीत राहणे म्हणजे काही मानाची गोष्ट होती. 

"चलतोस का मग?" 

स्वानंद विचार करू लागला. स्कूटरवाले काका तर सभ्य वाटत होते. तिसरी गल्ली आणि सातवी गल्ली अगदी जवळच होती. आणि स्कूटर वरून फिरायला हि मिळेल. 

"चला" असे म्हणत स्वानंद ने काडी फेकली आणि मागच्या सीट वर बसला. स्कूटर वाल्याने लगेच गियर टाकला आणि तिसऱ्या गल्लीच्या दिशेने निघाला. 

"आमच्या इथे दोन जोशी आहेत तसेच दोन देशपांडे पण आहेत. तिसऱ्या गल्लीत आणि सातव्या गल्लीत. त्यामुळे लोक त्यांना तिसरे जोशी किंव्हा सातवे देशपांडे म्हणूनच ओळखतात"

"हो का" स्कूटर वाल्याला पोराची बडबड ऐकून हसू येत होत. 

"मी पत्ता विचारतांना माहिती काढायला हवी होती कि तिसरे जोशी कि सातवे जोशी ते" तो म्हणाला. 

एवढा बोलतोवर दुसरी गल्ली कडे स्वानंद हात दाखवू लागला. पण तिसरे जोशी स्कूटर वाल्याच्या ओळखीचे नव्हते. मग स्कूटर वाल्याने पुन्हा स्कूटर ला किक मारली. 

"सातव्या गल्लीत कसे जायचे?" 

स्वानंद ने विचार केला कि पुढल्या मुख्य रस्त्याने गेलो तर दोन मिनिटात पोचू. त्याने मागच्या रस्त्याने जायचे ठरवले. कारण तिसऱ्या आणि सहाव्या गल्लीच्या मध्ये छोटे ग्राउंड होते. त्याला चक्कर मारून जावं लागत असे. म्हणजे अजून स्कूटर वरून फिरणं होईल. 

"असेच पुढे जाऊन डावीकडे वळू या"

स्कूटरवाल्याने तशी दिशा पकडली. 

"हे जे ग्राउंड आहे याला संघाचे ग्राउंड म्हणतो"

"हो का. पण असे का?"

"कारण इथे संध्याकाळी शाखा लागते संघाची"

"तू जातोस का दररोज?"

"हो, मी शिशु गणात आहे. काल तर मी अग्रेसर पण होतो"

स्कूटरवाल्याला अग्रेसर म्हणजे भानगड कळली नाहीं. 

"या ग्राउंड ला चक्कर मारा आणि मग सहावी गल्ली आणि मग सातवी" स्वानंद ने पुढली सूचना दिली. 

सातव्या गल्लीतले जोशी स्कूटर वाल्याचे जोशी निघालेत. स्वानंद उडी मारून स्कूटर वरून उतरला.

"थँक यु. काय नाव तुझं?" स्कूटर वाल्याने विचारले. 

"स्वानंद" 

"तुला पुन्हा सोडू का पहिल्या गल्लीशी ?" 

"नको नको, मी जाईन धावत. जवळच आहे" असा म्हणत उडया मारीत स्वानंदची स्वारी निघाली पण. 

पहिल्या गल्लीच्या टोकाशी पोचेतोवर त्याच्या डोक्यातली चक्र भिंगरी सारखी फिरायला लागली. मस्त आयडिया आहे हि. लोकांना पत्ते सांगायला मदत करायची, सोबत हिंडणं पण होईल. कोणाला कळणार पण नाहीं. काही दिवसांपूर्वीच त्याने रॉकेलवाल्या बैलगाडीवर हिंडण्याचा प्रताप केला होता. घरी पोचला तर घर भर रॉकेल चा वास. घरा मागे कडुलिंबाचे मोट्ठे झाड होते, एकदा लिंबोण्या पडायला छोटे छोटे दगड तो मारत उभा होता. गल्लीतून येणाऱ्या उपाध्याय आजींना नेमका लागला एक छोटासा गोटा. मग उगाच बोंबा-बोंब! नंतर एकदा घरासमोरून नित्यनेमाने जाणाऱ्या म्हशींवर बसला. त्या दिवशी त्याला दोन गोष्टी कळल्यात, एक कि म्हैस खूपच बेस्ट प्राणी आहे. गायी ढुश्या मारतात पण म्हैस एकदम लोड-लेस असते. दुसरं असे कि म्हैस चिखलात लोळते. म्हशीवरून 'चक्कर' मारून आल्यावर आई ने त्याला बाहेरच्या अंगणातच सगळ्यांसमोर आंघोळ घातली होती. 

इथे डबल-सीट वर हिंडण्यात असली कुठलीच भानगड नाहीं. 

एक नवीन उपक्रम स्वानंद ने सुरु केला. त्याच्या घरी याचा मुळीच पत्ता नव्हता आणि घरी यातील काही सांगायची गरज सुद्धा स्वानंद ला भासली नाहीं. फुल-प्रूफ प्लॅन!  

ज्या दुपारी वेळ मिळेल तेंव्हा स्वानंदची 'गाडी' गल्लीच्या टोकावर 'पार्क' असे, हिंडायला मिळेल या आशेने. 

मग एक दिवशी गम्मत झाली. चक्क एक कार येऊन थांबली त्याच्या जवळ. त्या काळात कार हा प्रकार तसा दुर्मिळ असे. स्वानंद जवळ एक फियाट येऊन थांबली. आधी स्वानंद ला कळले नाहीं कि फियाट का थांबली. त्याला वाटले कि तो कार च्या रस्त्यात येतोय. तो थोडा मागे सरकला. कार मध्ये एक काका-काकू समोर होते आणि एक आजी मागे बसल्या होत्या. काकूंची काच हळू हळू खालती सरकली. 

"हा समोर चा धंतोली पार्क आहे का?" तेंव्हा स्वानंद ला लक्षात आले कि हि  'हरवलेली' कार आहे. आता कार मधून चक्कर मारायला मिळते कि काय? या विचाराने तो हुरळला. 

"नाहीं, तुम्हाला कुठे जायचंय?" इतक्या दिवसात स्वानंद ने विचारायचे प्रश्न पक्के केले होते.

"धंतोली पार्क जवळ जावडेकर म्हणून रहातात. त्यांच्या कडे जायचे आहे" कार बोलली. 

"जावडेकर माहिती नाहीं पण धंतोली पार्क माहिती आहे. त्याचा पत्ता सांगू शकतो" 

"हा कुठला पार्क आहे समोर मग?"

"हे नुसताच क्रिकेट च ग्राउंड आहे. पार्क नाहीं. याला नाव नाहीं. आम्ही याला क्रिकेटच ग्राउंड असच म्हणतो" 

उत्तर ऐकून कार मधल्यांना गंमत वाटली. 

"बरं, मग धंतोली पार्क चा पत्ता सांगू शकतोस का?" 

"मी तुम्हाला तिथं पर्यंत घेऊन जाऊ शकतो." 

"अरे पण मग तू परत कसा येशील?"

"मी येईन पायी-पायी. जवळच आहे. मी जातो खूपदा खेळायला" आता खऱ्यात तो पार्कला एकटा कधीच गेला नव्हता. त्याच्या मोठ्या भावासोबत किंव्हा आजी-आजोबां सोबतच तो गेला होता. पण त्याच्या डोक्यात नकाशा पक्का होता - दुधाच्या दुकान समोरून चौकात, पुढे जाऊन उजवी कडे दयाल चे दुकान, मग थोड्या पुढे डावीकडे पोस्ट ऑफिस आणि त्याच्या पुढच्या छोट्या चौरस्त्याला उजवीकडे पार्क दिसेलच. 

पण भानगड इथेच सुरु झाली. आत्मविश्वास आणि त्याचे वय वर्ष ८ याची भेट या क्षणी झाली. 

स्वानंद मोठ्या ऐटीत कार मध्ये बसला. मागच्या सीट वरच्या आजींनी त्याला कौतुकाने जवळ घेतले. आता गाडी रिव्हर्स घेऊन मुख्य रस्त्याच्या दुधाच्या दुकान वरून घेण्या ऐवजी कारवाल्या काकांनी गल्लीतच गाडी घातली. 

"इथूनही सरळ पार्क लागेल असा वाटतंय?" त्यांनी विचारला आणि त्या विचारण्यात गाडीने वेगाने दोन गल्ल्या ओलांडल्या पण होत्या. इथे स्वानंदला जाम टेन्शन आलं कारण त्याच्या डोक्यातले होकायंत्र या भानगडीत पूर्णपणे गोंधळले होते. आता गाडी थांबवून माहिती असलेल्या रस्त्यावर कसे यायचे  याची मुळीच कल्पना त्याला नव्हती. एकच उपाय म्हणजे जिथे तो टाइम-पास करीत उभा होता तिथे परत जाणे. पण तसे सांगायला त्याला लाज वाटली. लहान वयात फारस काही कळत नसले तरी फजिती होण्याची भीती फार असते. मनुष्याला उपजतच असावी ती भीती. 

"कुठे वळायचं सांगशील बाळा?" कारवाले काका म्हणाले.  

"हो" स्वानंद कसा-बसा म्हणाला. 

"कितवीत आहेस स्वानंद तू?" आजींनी प्रेमाने विचारले

"तू असा कर मधून इतक्या दूर येतोस हे तुझ्या आई-बाबांना माहिती का रे?" समोरच्या सीट वर बसलेल्या काकू म्हणाल्या. 

इथे स्वानंद च टेन्शन वाढत होत. कोणी काही विचारलं नसत तर चाललं असत. मारुतीचे देऊळ पण मागे पडले. मारुती देवळासमोरून जातांना काकांनी कार हळू केली. रीतसर खिडकूतून त्याने नमस्कार केला. 

नेमका स्वानंद ला तिथे चिन्मय दिसला. चिन्मय चकित होऊन बघत होता कि स्वानंद एक तर कार मध्ये बसलाय आणि ते पण अनोळखी कार मध्ये बसलाय. 

"डब्या" त्याने हाक मारली. स्वानंद बडबड करण्यात वस्ताद होता म्हणून त्याचे मित्र त्याला प्रेमाने डब्बा म्हणत असत. 

स्वानंद ने कार च्या खिडकीतून बाहेर बघितलं. 

"कुठे चालला रे?" चिन्मय ने विचारलं. 

"धंतोली पार्क" 

"मग तिकडे कुठे?" पुढे काही तरी चिन्मय म्हणत होता आणि उजवीकडे हात दाखवत होता. स्वानंद ला वाटले कि ओरडून नेमकं कुठे ते विचारावा पण तो पर्यंत काकांनी  पुढचा गियर टाकून गाडीचा वेग धरला आणि दोन गल्ल्या अजून ओलांडल्यात. 

अजून एक छोटा चौरस्ता ओलांडून काकांनी गाडी हळू केली. "डावी कडे वाळू कि उजवीकडे बाळ?" काकांनी विचारला. त्यांना शंका यायला लागली होती कि या बावळूरामला रस्ता माहिती नाहीं.

"इथून अजून एक गल्ली सरळ जाऊ या. मग माझ्या लक्षात येईल. दिशा बरोबर आहे आपली"

"अहो, याला रस्ता माहिती आहे असं दिसत नाहीं या" काकू हळूच काकांना म्हणाल्यात. "याला पुन्हा सोडून यायचा का त्याच्या घरी? कोणाचा पोरग आहे माहिती नाहीं आणि आपण त्याला कार मध्ये घेऊन धंतोली पार्क शोधतोय!"

स्वानंदच इतका स्वच्छ बोलणं ऐकून आजी मात्र जाम खुश होत होत्या. त्यांनी त्याला अजून जवळ घट्ट घेतले. "फारच गोड आहेस रे तू? नाव सांगितलं नाहींस अजून तुझं?"

"स्वानंद" 

दोन गल्ल्यापूर्वी चिन्मय उजवीकडे हात दाखवत होता. स्वानंद च्या डोकयात कुठे तरी होतच  कि आपण पार्क च्या डाव्या बाजूला आहोत. म्हणजे उजवीकडे वळलं तर पार्कच्या दिशेने जाऊ. 

"काका उजवी कडे वळा"

"नक्की का रे स्वानंद? नाहीं तर एक काम करूया, मी तुला तुझ्या घरी सोडून देतो किंव्हा तू ज्या गल्ली च्या टोकाशी उभा होता तिथे सोडतो. आम्ही पार्क नंतर आरामात शोधू."

"नाहीं नाहीं, उजवी कडे वळा येईलच पार्क" स्वानंद ने मनात देवाचे नाव घेतले. आता उजवी कडे पार्क नसेल तर त्याने ठरवलं होता कि गाडी हळू झाली कि दार उघडून उडी मारायची आणि घरी पळायचे. पण त्याला घर ते पार्क आणि पार्क ते घर रस्ता माहिती होता. किंव्हा त्याला असे वाटत होते! पण पार्क मिळालाच नाहीं तर घरी तरी कसा जाणार?

गाडी थांबवून मगाशी चिन्मय ला हि कार मध्ये बसवायला हवे होते. त्याच्यासोबत घरापर्यंत कसेतरी पोचलोच असतो. 

"अहो, तुम्ही पण ना, त्याला नाहीं माहिती रस्ता. विचारा बरं पानस्टॉल वर" काकू म्हणाल्यात. 

"हो ग, विचारतो. तू उगाच मागे लागते. काही तरी सांगतोय ना पोरगा" असं म्हणे पर्यंत ते पुन्हा एका छोट्या चौरस्त्यावर आलेत आणि अक्षरश चमत्कार झाला. समोर उजवीकडे धंतोली पार्क! 

स्वानंद पण चकित झाला. काय जादू आहे असा तो विचार करीत होता. खरंच उजवीकडे वळलो तर पार्क दिसतोय. त्याला हुश्श झालं.  

काकांनी चौरस्ता ओलांडला. गाडी हळू हळू पुढे नेली. आता पार्क तर मिळाला पण पार्कच्या समोर घर आहे असा पत्ता होता. त्यामुळे आता चौ बाजूंनी फेऱ्या माराव्या लागणार असा ते काहीतरी विचार करीत होते. 

"काका, मी उतरतो." काकांना एकदम जाग आली कि स्वानंद गाडीतच आहे. 

"सोडतो मी तुला" ते म्हणाले. 

"नको, नको, मी जातो इथून. जवळच आहे घर" अस म्हणत स्वानंद कार मधून उतरला पण. 

"हुशार आहेस हां तू स्वानंद. आमची सोय झाली तुझ्यामुळे" आजींनी निरोप दिला. 

"आणि अस कोणाच्याही गाडीत बसून जाऊ नकोस हां" काकूंनी पण निरोप दिला. 

बाहेर छान वार सुटलं होत. स्वानंद उड्या मारीत निघाला. त्या वयाची मजाच वेगळी असते. वार जास्त गार लागत, ऊन-धूळ लागत नाहीं. पार्क मधल्या उंच-उंच झाडांच्या पानांचा सळसळ आवाज येत होता. त्याला आज नवीन रस्ता कळला होता आणि फजिती पण झाली नव्हती. मुख्य म्हणजे कार मध्ये बसायला मिळाले. फियाट मध्ये.  आणि त्याने रस्त्याकडे नजर टाकली -  इथून सरळ गेला कि डावीकडे दयाळ च दुकान, मग पान डब्ब्यांचा चौक आणि मग उजवीकडे प्रधान डॉक्टरांचा दवाखाना आणि मग त्याच्या घराची गल्ली. 

2/28/24

स्वातंत्रोय्त्तर भारताची रत्ने

मोदी सरकारने नुकतेच पाच विशेष व्यक्तींना भारत रत्न प्रदान केलेत. या पैकी श्री अडवाणी यांना भारत रत्न दिल्याबद्दल मोदी सरकारचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. सन १९४७ नंतरच्या फाळणी नंतर आणि भीषण हिंदू संहार नंतर श्री अडवाणी आणि त्यांचे परिवार भारतात आले. आणि तेथून रथ यात्रे पर्यंत आणि नंतर भारताचे गृह मंत्री आणि मग पुढे भारताचे उप-पंतप्रधान पर्यंतचा श्री अडवाणी यांचा प्रवास स्फूर्तिप्रद आहेच. तसेच त्यांचा प्रवास हा भारताचा पण प्रवास म्हणू शकतो. श्री नेहरू यांच्या कारगीर्दीपासून स्वतःच्या ओळखी पासून दूर गेलेला भारत जणू श्री मोदी यांच्या कारगीर्दीत परतला आहे. आणि या परतीच्या प्रवासाचे एक मोठे श्रेय श्री अडवाणी यांना जाते. 

श्री अडवाणी व्यतिरिक्त दोन अजून व्यक्तींना भारत-रत्न दिल्या गेले. त्यात भारताचे माझी पंतप्रधान श्री पी.वी. नरसिम्हाराव आणि भारतीय ग्रीन-रिव्होल्यूशन चे पिता ज्यांना म्हणू शकतो ते श्री स्वामिनाथन आहेत. श्री नरसिम्हाराव तर प्रसिद्ध आहेत. गांधी परिवारातून नसलेले पण पाच वर्षांची कारगिर्द पूर्ण करणारे ते पहिले पंतप्रधान होते. गणित आणि संस्कृत या व्यतिरिक्त त्यांना अनेक भारतीय भाषा येत असत. काही दिवसांपूर्वी यु ट्यूब वर मी श्री पु.ल. देशपांडे यांचे एक छोटे भाषण ऐकत होतो तर त्यात मागे व्यासपीठावर श्री नरसिम्हाराव पु.ल यांच्या शब्द-कोटयांवर हसत होते. 

श्री स्वामिनाथन हे एक उच्चशिक्षित शेती विषयातील वैज्ञानिक होते आणि त्यांच्यामुळे भारताचे धान्य उत्पादन वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतक्या गतीने वृद्धिंगत झाले. त्यांना अनेक पुरस्कार आधीच मिळाले आहेत आणि ते खरोखरच भारत रत्न आहेत. खेदाची बाब एवढीच कि त्यांच्या हयातीत (त्यांचा मृत्यू सप्टेंबर, २०२३ ला झाला) त्यांना हा मान मिळाला असता तर अजून छान झाले असते. असो. 

श्री मोदी यांनी आणि त्यांच्या सरकारने कोणाला आणि का भारत-रत्न दिले, आणि त्याच्या मागील राजकारण काय याचा बराच उहापोह टीव्ही आणि वृत्तपत्रातून दिसेल पण वाचकांसमोर श्री नरसिम्हाराव आणि श्री स्वामिनाथन कसे एकाच धाग्याने गुंफले आहेत. 

भारताचे स्वातंत्र्य हे खऱ्या अर्थाने युरोपिअन वसाहतवादाचा अस्त होता. पण स्वातंत्र्योत्तर भारत हा सशक्त आणि सुदृढ भारत नव्हता. ब्रिटिश सत्तेने भारताचे जे शोषण केले होते त्याची तुलना बहुतेक जागतिक इतिहासात अजून कुठल्या घटनेशी होऊ शकत नाहीं. अश्या परिस्थितीत निर्वासितांना वासवण्यापासून ते पुरेसे अन्न जनतेला मिळावे ते पाकिस्तानच्या इस्लामी आक्रमणांपासून रक्षण करण्यापासून तर भारतात औद्योगिकीकरणाचा पाय रोवण्यापासून तर उच्च शिक्षणाच्या संस्थेची स्थापना करण्यापर्यंत अनेक प्रश्न, निर्णय आणि धोरणांचे पेच भारताचे पहिले पंतप्रधान श्री जवाहरलाल नेहरुं समोर होते. यातील काही धोरणे श्री नेहरू यांनी काही प्रमाणात तरी यशस्वीरित्या राबविली. पण त्यांचे एक तोट्याचे धोरण, जे पुढे त्यांच्या पुत्रीने म्हणजे सौ. इंदिरा गांधींनीहि राबविले, ते म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेचे धोरण. आता आपण समाजवादावर चर्चा करायचे ठरवले तर तो एक स्वतंत्र लेख ठरेल पण या धोरणांचा एक दुष्परिणाम म्हणजे भारताच्या धान्य उत्पादनावर लगेच झाला. ज्या क्षेत्रात औद्योगिकरणाच्या आवश्यकता होती, वैज्ञानिक शोधाची आवश्यकता होती आणि सगळ्यात मुख्य म्हणजे सरकारने धान्य उत्पादन हा विषय अधिक गंभीरतेने बघायला हवा होता. पण तसे झाले नाहीं त्यामुळे भारतात पुरेश्या धान्याचा दुष्काळाची  परिस्थिती उपस्थित झाली. ६०च्या दशकात आणि मुख्यत्वे श्री लाल बहादूर शास्त्री यांच्या काळात अमेरिका भारतास प्रचंड गहू पुरवीत असे. आणि येथे प्रचंड हा शब्द सत्य परिस्थितीची भीषणता दर्शवित नाहीं. जगाच्या इतिहासात इतक्या मोठया प्रमाणात कुठल्या राष्ट्राने दुसऱ्या कुठल्या राष्ट्रास इतके धान्य पुरविले नव्हते. अर्थात हा गहू निम्न गुणवत्तेचा होता आणि अमेरिकेत कोणी या प्रतीचा गहू कोणी खात नाहीं. पण भारताला दुसरा पर्याय नव्हता. विशेषतः सन १९६५ च्या वाईट मान्सून नंतर पंधरा लाख टनाच्या वर गहू भारतात आयात झाला. भारतात गहूच खातात असे नाहीं. तांदूळ हा जेवणाचा अविभाज्य अंग आहे पण तांदुळाचेहि उत्पादन हवे तेवढे वाढले नाहीं. उत्पादन आणि लोकसंख्या नेहमीच हातात-हात घेऊन चाळीत नाहीं, त्याचा संबंध किमतीशी पण असतो हे जरी मान्य केले तरी सत्यस्थिती अशी कि स्वातंत्रोत्तर सरकारने शेतीचे उत्पादन वाढविण्याकडे लक्ष दिले नाहीं. त्यामुळे सन १९४५ च्या अतिभीषण बंगालच्या दुष्काळाच्या आठवणी ताज्या असतांनाच अजून एका दुष्काळाचा हुंकार जणू ऐकू येऊ लागला होता. अश्या बिकट परिस्थितीत श्री स्वामिनाथन कामाला लागलेत. देशाच्या नशिबाने दुष्काळाचे फारसे पडसाद उमटले नाहींत पण भारत सरकार जागे झाले. श्री स्वामिनाथन हे परदेशातून शिकलेले कृषी अर्थशास्त्रज्ञ होते, कृषी शास्त्रज्ञ, प्लांट जेनेसिस्ट (वन अनुवंशशास्त्रज्ञ) होते. त्यांनी पुढे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्राचे नेतृत्व केले. त्यांच्या संशोधनामुळे आणि तसेच त्यांच्या प्रशासनामुळे भारताचे तांदूळ व गहूचे उद्पादन झपाट्याने वाढलेय. ७० च्या दशकानंतर भारतात अन्न-धान्याची भरभराट झाली आणि आता भूक हि उत्पादनाशी निगडित नाहीं, भूक धान्य वितरणाशी संबंधित आहे. राजनैतिक दृष्ट्या भारताला सार्वभौमत्व १९४७ साली मिळाले असले तरी मूलभूत कृषी उत्पादनात स्वातंत्र्य काही दशकांनी मिळाले आणि त्याचे श्रेय श्री स्वामिनाथन यांनाच द्यावे लागेल. 

आता राहिला मुद्दा आर्थिक स्वातंत्र्याचा. तर याची गोष्ट अशी कि श्री नेहरू यांचे आर्थिक धोरण घेऊन, त्यांच्या कन्या, आणि श्री शास्त्री नंतर सत्तेवर आलेल्या श्रीमती इंदिरा गांधी यांनीं टोकाची भूमिका घेतली. बँकांना राष्ट्रीयकरण करणे, वैयक्तिक करात भरमसाठ वाढ करणे, व्याजदर वाढवून ठेवणे, उद्योग-धंद्यांना सारखा त्रास देणे इत्यादी देशाच्या अर्थव्यवस्थेला घातक ठरणाऱ्या चाळ्यांचा पायंडा श्रीमती गांधी यांनी घातला. तसेच वेग-वेगळ्या योजनां द्वारे फुकटात गोष्टी वाटणे पण फार वाढले.  या सगळ्याचा परिणाम असा झाला कि केंद्र सरकारचे पैसे अक्षरशः संपले. थोडक्यात सांगायचे तर खर्च जास्त होते आणि खिशात पैसे कमी होते. याला इंग्रजीत 'फिसकल डेफिसिट' असे म्हणतात. १९९१ हा डेफिसिट १२% च्या वर गेला होता. त्यात काही कमी असेल तर ८० च्या दशकात विविध मजदूर संघटनांनी 'संप' नावाचे आयुधाने कारखान्यांना हाणायला सुरुवात केली. भारतातील कारखान्यांचे उत्पादन कमी होत गेले (याचे अजून कारण म्हणजे कारखाने तंत्रज्ञानात मागे पडले होते) आणि भारताची आयात वाढत गेली. त्यामुळे भारतचे परकीय चलन अजून कमी होत होते. त्यातच १९९१ ला अमेरिकेच्या कुवैत च्या युद्धामुळे पेट्रोल च्या किमती वाढल्यात त्यामुळे सरकारचे पेट्रोलचे खर्च वाढले. भारताला आपले ५० टनाहून अधिक सोने गहाण  ठेवावे लागले. थोडक्यात भारतीय अर्थव्यवस्थेचे 'दिवाळे' निघत होते.अश्या परिस्थितीत १९८९ ते १९९१ पर्यंतच्या थातुर-मातुर सरकारांनंतर श्री नरसिमहाराव सरकार प्रस्थापित झाले. त्यांनी श्री मनमोहन सिंग यांना वृत्तमंत्री नेमले. श्री नरसिम्हाराव हे स्वतः अर्थशास्त्रात निपुण होते. नेमकी काय पावले उचलायची याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे त्यांनी श्री मनमोहन सिंग यांना संपुर्ण पाठिंबा दिला. आयतांवरची निर्बंधे झपाट्याने काढल्या गेलीत. देशातील कारखान्यांवरची पण निर्बंधे काढलीत ('लायसेन्स राज'). भारतीय रुपयाचे अवमूल्यन (डीव्हॅल्यूइशान) करण्यात आले. अशी अनेक पावले श्री राव यांच्या सरकाराने वेगाने उचलावीत. वर्षाच्या अखेरीपर्यंत भारताने आपले सोने सोडवले आणि अर्थव्यवस्था स्थिर केली. श्री राव व श्री मनमोहन सिंग यांच्या या कार्याला आणि या काळाला 'लिबेरालायसेशन' असे म्हणल्या जाते. अजून अनेक अशी पावले गेल्या तीस वर्षात घेतल्या गेलीत. मुख्यत्वे श्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था झपाट्याने पुढे गेली. पण याची बीजे आणि यांच्या सुरुवातीचे श्रेय श्री राव यांनाच द्यायला हवे. 

श्री राव हे राजकारणी होते आणि पुढे ते भ्रष्टाचाराच्या वादळात फसले. श्री स्वामिनाथन हे एक वैज्ञानीक होते आणि त्यांचा कार्यकाळ व कारागिर्द पांढऱ्या चादरीसारखी स्वच्छ होती. पण भारताला धान्याची आणि अर्थार्जनाची आवश्यकता होती, जेंव्हा देश कड्यावर उभा होता आणि जेंव्हा १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य पुरेसे होत नव्हते तेंव्हा या दोन व्यक्ती समाज रक्षणास धावलेत. कठीण परिस्थीचा दंड ठोकून सामना केला. आणि मुख्य म्हणजे जे आवश्यक होते ते केले. या कारणांमुळे हे दोघेही खऱ्या अर्थाने भारत रत्न आहेत. 

1/17/24

महाराष्ट्र कुणाचा?

जवळपास दहा वर्षांपूर्वी मी 'महाराष्ट्र कुणाचा?" या मथळ्याचा लेख या ब्लॉग वर लिहिला होता. तेव्हा हि राष्ट्रीय निवडणूक झाल्या होत्या आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजप ला भरगोस यश प्राप्त झाले होते. पण शिव-सेनेने घेतलेल्या डळमळत्या पावित्र्याने भाजप सरकार डळमळीत पायावर उभे होते. मी तो लेख, राजकीय दृष्टिकोनातून महाराष्ट्र कोणाचा अश्या आशयाचा लेख लिहिला होता. आज एका दशकाने मी पुन्हा याच मथळ्याचा लेख लिहितोय पण आशय वेगळा आहे. महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय पक्षांनी राजकारणाचा इतका उच्छाद मांडला  आहे कि महाराष्ट्रातील जनतेचा जणू कोणीच तारणहार उरलेला नाहीं असे मला वाटू लागले आहे. 

गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडल्यात. आणि नेहमीचे डावपेच मान्य केलेत तरी राजकारण जेंव्हा केवळ सत्तेसाठी उरते किंव्हा सत्तांधळे बनते तेंव्हा समजायचे कि कुछ तो घोटाला है| सततची राजकीय अस्थितरता ना प्रजातंत्राच्या तब्येतीस बरी ना हि प्रजे साठी. बर, महाराष्ट्राच्या राजकारणाला अस्थिरता माहिती नाहीं असा भाग नाहीं. राज्य स्थापनेपासून केवळ दोनच मुख्यमंत्र्यांनी त्यांचा कार्यकाळ एकसंध पूर्ण केला आहे. पहिले होते श्री वसंतराव नाईक आणि दुसरे म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस. यांच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्र्याचे पद म्हणजे घंटा-खुर्ची चा खेळ आहे. पण राजकारण्यांचे 'आय राम - गया राम' आणि राजकीय पक्षांची लपा-छुपी यात खूप अंतर आहे. आधी निवडणूक आल्यात कि कुठला राजकारणी कुठे उड्या मारणार याची चर्चा होत असे पण आता तर कुठला राजकीय पक्ष कुठे उडी मारणार याची चर्चा होते. सध्याच्या जनगणनेत एक भाजप, दोन सेना, दोन राष्ट्रवादी आणि अजून तरी एकच काँग्रेस आहेत. राष्ट्रवादी आणि सेनेने हम दो-हमारे दो थोडा जास्तच गंभीरतेने घेतले आहे असे दिसते. 

पण लोकतंत्र म्हणले कि अश्या घडामोडी व्ह्यायच्यातच पण राजकीय पक्ष इतके सतत बदलायला नकोत. प्रत्येक पक्ष एक भूमिका घेतो आणि त्या प्रकारे काम करतात किंव्हा निदान तसे दाखवतात तरी. मतदाता त्या हिशोबाने आपले मत देतो. उदाहरणार्थ, कम्युनिस्ट पक्ष हा मूळ प्रजातंत्र विरोधी पक्ष असून त्यांच्या प्रमाणे कार्ल मार्क्स चे सिद्धांत लागू केलीत तरच भारताचा (किंबहुना मनुष्य जातीचा) विकास होईल. आता या थोतांडावर कोणी विश्वास ठेवायचा तो वैयक्तिक मुद्दा झाला पण त्यांच्या या भूमिकेवर ते मत मागणी करतात. पण अचानक उद्या कम्युनिस्ट पक्ष म्हणाला कि आम्हीच राम मंदिर बांधू किंव्हा मथुरेला श्री कृष्ण मंदिराची मागणी ते करू लागले तर अक्खा समाज संभ्रमित होईल. तसलीच काहीशी परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली आहे. 

छत्रपती शिवाजींच्या नावाने चालवणार पक्ष अत्यंत हिंदू विरोधी अश्या काँग्रेस सोबत उभा आहे. जातीवादाचा परकोटी करणाऱ्या पक्षाचा एक मोठा भाग आज हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या भाजप सोबत उभे ठाकला आहे. सेनेचा एक भाग, ज्या भागास आता कायदेमान्य खरी सेना म्हणावे लागेल, या जातीवादी पक्षासोबत सत्ता चालवतो आहे. जनतेने २०१९ च्या विधान सभा निवडणुकीत ज्या राजकीय पटलावर कौल दिला ते पटल आज अस्तित्वात नाहीं. मग आज महाराष्ट्रातील प्रत्येक मतदात्याला फसवल्याची भावना येत असेल तर ते योग्यच आहे. 

पण मला सगळ्यात जास्त वाईट भाजप चे वाटते. किती चुका करायचा कोणी? अखंड आणि अविरत कष्ट करून भाजप जणू जनतेचा कौल नाकारतो आहे. बाकी सगळे राजकीय पक्ष हे 'फॅमिली बिसिनेस' आहेत. पण भाजप तर खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पक्ष आहे. मग त्यांनी गेले दहा वर्षे महाराष्ट्राच्या जनतेने सतत दिलेल्या कौलाचा जो विनोद केला आहे त्या साठी त्यांना यंदाच्या निवडणुकीत जनता शिक्षा तर नाहीं करणार? सेने बिना-बुडाच्या लोट्या सारखं अखंड वागत असतांनाहि भाजप ने त्यांची साथ घ्यायची ठरवलं. स्वतःसाठी कमी जागा ठेवल्यात आणि अस्थिरतेचे शिडे उभारलीत. तरी जनतेने त्यांना भरघोस प्रतिसाद दिला. पण मुळातच 'दानवीर कर्ण' बनून जास्त जागा शिवसेनेला दिल्या मूळे भाजप ला स्वतःला असे बहुमत मिळाले नाहीं. शिवसेना आणि श्री संजय राऊत यांनी त्यानंतर जे वर्तन केले ते पुन्हा सांगण्यात अर्थ नाहीं, ते सगळ्यांना ठाऊकच आहे पण तरीही भाजपला वाटले कि थोडा शंखपणा कमी केला आहे. त्यांनी सरकार श्री अजित पवार यांच्या सोबत बनवले. ते सरकार दीड दिवसाचा गणपती ठरले. श्री अजित पवार साळसूद पणे पुन्हा राष्ट्रवादीत दाखल झाले आणि त्यानंतर आले सेना-राष्ट्रवादी-काँग्रेस चे 'माविआ' सरकार. श्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आणि भाजप व श्री फडणवीस 'ठण-ठण' गोपाळ करीत बसले. आता हे माविआ सरकार जनतामान्य नाहीं असा जरी ठणाणा भाजप करीत बसले तरी सामान्य मतदाता हेच म्हणेल कि भाजप मतदारांना ' गण्या -गंपू' समजतो आहे. आणि मला सांगा आपल्याला दुसरा कोणी तरी 'गंपू' समजतो आहे हि भावना आपल्याला आवडेल का?

'माविआ' सरकार अडीच वर्षे रखडले आणि मग सेनेत बंड झाला आणि श्री एकनाथ शिंदे सेनेतील बहुसंख्य विधान सभा सदस्यांना घेऊन बाहेर पडले. श्री शिंदे यांनी बंड केला म्हणणे चुकीचे आहे कारण आता कायदेमान्य आहे कि खरी शिवसेना (सध्या तरी) श्री शिंदे यांची आहे आणि यांच्यासोबत आहे. एवढी खटाटोप करून आतातरी भाजपचे श्री फडणवीस मुख्यमंत्री होणार असे वाटले तर काहीतरी अगम्य राजकीय डाव-पेच खेळत भाजप ने ठरवले कि श्री शिंदे मुख्यमंत्री होतील. श्री शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्यास विरोध नाहीं. किंबहुना त्यांच्यासारखे शिवसैनिकच पुढे कधीच यायला हवे होते. पण सत्य परिस्थिती अशी आहे कि लोकांनी कौल भाजपला दिला होता आणि जनतेची अपॆक्षा अशी होती कि भाजपचे सदस्य (श्री फडणवीस) पुढे मुख्यमंत्री होतील पण पायावर धोंडे पाडून घ्यायला जो धोंडे शोधत फिरतो त्याला कोण काय म्हणणार?

बरं पायावर धोंडे पडून घेतलेत तो पर्यंत ठीक आहे. भाजप ने ठरवले कि डोक्यावर पण धोंडे पाडायचेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडून श्री अजित पवार बाहेर पडलेत. त्यांचे अभिनंदन करून गुपचूप बसायचे सोडून, भाजपने ठरवले कि त्यांनाहि आपल्यात सामील करायचे. राजकीय बाण बोथट असतात हे मान्य पण काहीच वर्षांपूर्वी भाजप आणि श्री फडणवीसांनी विधानसभेत आणि बाहेर धारधार शब्दात श्री अजित पवार यांच्या भ्रष्टाचारी वर्तनावर टीका करीत होते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनच्या सगळ्यात मोठ्या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार श्री अजित पवार असण्याची संभावना नाकारता येणार नाहीं आणि त्यान्वये त्यांच्यावर खटले पण दाखल झाले होते. भाजप नेहमीच स्वतःला राष्ट्रवादी, प्रगतिशील आणि स्वच्छ प्रतिमेची पार्टी मानीत आली आहे मग त्यांना हे वर्तन शोभा देत का?

या प्रश्नाचे उत्तर लोक असं देतील कि राजकारणात कोणी मित्र नसतो ना कोणी मित्र असतो. पण भाजपचे एक राजकीय पक्ष म्हणून काय विचार आहेत? काय लक्ष्य आहेत? भारत विकास सध्या करायला जेवढे राजकारण करणे आवश्यक आहे तेवढे करणे मी समजू शकतो पण या भानगडीत निव्वळ राजकारणासाठी म्हणून आणि सत्तेसाठी म्हणून तर भाजप राजकारण करीत नाहीं या? आणि जर का जनता तुम्हास पुन्हा पुन्हा त्यांचे मत देते आहे तर मग हे राजकारण करण्याची काय आवश्यकता? उद्या निवडूणुकीत भाजप कुठला चेहरा घेऊन लोकांसमोर जाणार? तुमचे मत घेतले कि आम्ही वाट्टेल ते करणार हे सांगणार जनतेला? जनतेने दिलेल्या मताचा वाट्टेल तसा अपमान करणार, हे सांगणार लोकांना?  

या सगळ्याचा शेवट काय होणार मला माहिती नाहीं. मला माझे मत हिंदुत्ववादी, विकासशील, राष्ट्रधर्मवादी, मुसलमानांचे समर्थन न करणाऱ्या पक्षाला द्यायचे आहे. मला असा पक्ष सत्तेत हवा आहे जो फॅमिली बिझनेस नाहीं. मला आत्ता तरी महाराष्ट्रातील राजकारणात असा पर्याय दिसत नाहीं. 

12/27/23

'दिठी' - एक प्रवास

"मरतांना पण आम्ही विठ्ठल, विठ्ठल करतच मरणार, पण माझ्या लेकाला हे पण बोलायचं अवसर मिळाला नाहीं" 

तरुण पोराचा अचानक झालेल्या मृत्यूने कावलेल्या, जीव कासावीस झालेल्या, दुःखाने जर्जर बापाचे हे बोल हृदय कातरत जातात. दुःख माणसाला अनेक असतात पण आपल्या अपत्याचा अंतिम संस्कार करणे हि दुःखाची परिसीमा मानल्या जाते. 'दिठी' सिनेमात या त्रासाची भीषणता बोचते. पण हा चित्रपट एकांगी  नाहीं. केवळ पुत्रवियोगाच्या घटनेचे चित्रण नाहीं. हा एक प्रवास आहे. आणि या प्रवासाचा एकच रस्ता पण नाहीं. विठ्ठल भक्तीचा, त्याच्यावरच्या भाबड्या प्रेमाचा, त्याच्यावरच्या रागाचा, रागापोटी विठ्ठलास  विचारलेल्या प्रश्नांचा, अद्वैत सिद्धांताचा, जीवनाविषयीच्या तत्वज्ञानाचा, अश्या अनेक मार्गांनी प्रवास करीत रामजी शेवटी पुन्हा विठ्ठल चरणी लीन होतो. त्या प्रवासात त्याचे सखे सोयरे त्याची साथ सोडीत नाहीं. त्याला उगाच शिकवायला, सांत्वना करायला जात नाहीत. गावातली साधी माणसं हि, या दुःखी बापाला सांगायला यांच्याकडे कुठले तत्वज्ञान नाहीं, ना त्यांच्या कडे मोठे शब्द भांडार आहे. पोथी सुरु केली आहे तर ती संपवायला हवी आणि ज्यांनी सोबत सुरु केली तीच लोक  संपवायलासुद्धा हवीत या ठाम विश्वासाने हि सगळी लोक तटस्थपणे रामजीची वाट बघत बसतात. त्याच्या प्रवासाचे सहप्रवासी बनतात. कारण साथ देणे सोडून अजून काहीच करणे शक्य नाहीं. विठ्ठल भक्तीत लीन झालेली हि लोक रामजी जेंव्हा विठ्ठलाला प्रश्न विचारतो, त्याच्यावर प्रक्षोभित होतो तेंव्हा चिडत नाहींत. रामजीला थांबवीत नाहीत, टोकत नाहीत. निव्वळ प्रेमापोटी नाहीं पण हि लोक खऱ्या अर्थाने भक्तियोगी झालेली आहेत. 

त्या दरम्यान गावातली पारुबाई आणि गोविंदाच्या गर्भवती गायीचा - सगुणेचा, गर्भ अडकलेला असतो. रामजी हा स्वतः लोहार पण गायीची बाळंतपणे करणे हे कौशल्य पण त्याच्याकडे असते. रामजीवर दुःखाचा पहाड कोसळलेला आणि इथे गाय अडकलेली, गायीचा त्रास गायीच्या गरीब 'आई-बापाला' सहन होत नसतो पण रामजी ला कसे बोलवायचे? ते आपले वाट बघत बसतात, एकतर रामजी येण्याची किंव्हा वासरू होण्याची. 

जगातील जे मुख्य धर्म आहेत त्यात कोणी एक व्यक्ती तारणहार किंव्हा प्रेषक असतो आणि तो सगळ्यांना मुक्ती देतो. आणि त्याच्यावर श्रद्धा न ठेवणे पाप मानल्या जाते. पण आपल्या सनातन तत्वज्ञान याच्या विरुद्ध आहे कारण आपल्या धर्मात मोक्ष किंव्हा मुक्ती आपल्याच हाती असते. हा एकाकी प्रवास आहे. त्यात गुरु मिळाला, त्याने मार्ग दाखविला तर अहोभाग्य पण नाहीं तर आपण अंधारात चाचपडत पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. पण जरी हा प्रवास एकाकी असला तरी मदत सगळीकडे मिळते. आदी शंकराचार्यांच्या ज्ञान योगाच्या मशाली मार्ग दाखवितात. या मशालींच्या दाह जर का सहन होत नसेल तर संत ज्ञानेश्वरांच्या भक्तियोगाच्या आल्हाददायक पणत्या मार्ग दाखवितात. पण या मार्गावर आपणच आपले चालायचे असते. कोणी पाठीवर घेऊन जाणार नाहीं, कोणी काठी बनणार नाहीं, पालखी नाहीं कि घोडे नाहीं. रामजी हा प्रवास जन्मभर करीत होता पण नशिबाने असा काही फटका दिला कि त्याचा भक्तीचा मार्ग डळमळला. मार्गावरच्या पणत्या त्याला दिसेनाश्या झाल्यात. आणि रामजी स्वतःला हरवून बसला. विठ्ठलावरच्या संतापाने त्याला इतके व्यापले कि घरातल्या विधवा सुनेला तो बाहेर काढायला निघतो. दुःखाच्या भ्रमात रामजी जणू चुकांच्या गर्तात फसत जातो. अद्वैत कळणे कठीण पण त्याहून अधिक कठीण म्हणे अद्वैत जगणे होय. 'शीतोष्ण सुखदुःखेषु, समसंग विवर्जित' असे श्रीकृष्ण गीतेत म्हणतो. पण प्रत्यक्षात हे कसे उतरवायचे? शीत, उष्ण, सुख आणि दुःख याला शांत चित्ताने सारखेच सामोरं जायचे. पण तरुण मुलाचा मृत्यू हे काय साधे दुःख आहे पचवायला?

आपल्या धर्मातील मोक्षमार्ग कठीण असला तरी त्या मार्गी लागल्यावर हरविणे पण कठीण आहे. जागोजागी मदत मिळते आणि रामजीच्या रक्षणास जणू ज्ञानेश्वर माऊलीच धावून येतात.   

आता आमोद सुनासि आले। श्रुतिशी श्रवण निघाले।

आरसे उठले। लोचनेशी॥

आपलेनी समीरपणे।वेल्हावती विंजणे।

किं माथेंचि चाफेपणें। बहकताती॥

अमृतानुभव या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथातील हा अभंग. जसा आरशातील प्रतिबिंब आणि प्रतिबिंबित हा एकच तसेच दुःख आणि दुःख भोगणारा एकच, ऐकणारा आणि ऐकलेले एकच हा स्वानुभवे उमजले कि अद्वैताचे कोड सुटले. रामजी आलेल्या दुःखास स्वतःपासून वेगळे बघत होता. तीस वर्षे वारी करून हे नशिबी आले याचा त्याला राग येत असतो आणि या अवास्तव भ्रमात रामजीचा जीव कासावीस होत होता. या दरम्यान सगुणा गायीचा जीव धोक्यात आलेला असतो. रामजी शेवटी तिथे धावत जातो. गायीचा वासरू गर्भात वाकडं झालेलं असतं त्यामुळे वासरू न बाहेर येऊ शकत आणि आत राहण्याची मुभा संपलेली असते. अनुभवाची शर्त करून मोठ्या कष्टाने रामजी वासराला बाहेर काढतो. गाईचा पण जीव वाचतो, पारुबाई आणि गोविंदाला हुश्श होते आणि रामजीला एकदम या मायेच्या खेळाची उत्पत्ती होते. एकीकडे मृत्यूची पीडा तर दुसरीकडे जन्म आणि जीव वाचविण्याचा आनंद. आपले अस्तित्वच मुळी बुडबुड्याचे. पण त्यापायी आपण केवढी उठाठेव करतो. सुखी होतो आणि दुखी होतो. दुखी झालो कि दोष देतो आणि सुखी झालो तर स्वतःचे कौतुक करतो. पण सत्यात यातले काहीच टिकणारे नाहीं मग का म्हणून एवढे जिव्हारी लावून घ्यावे? रामजीला हि दृष्टी (दिठी) अनुभवांती येते. डोळ्यातून अश्रूंची धार लागते आणि हृदयातील पाषाणाव्रत घट्ट होत चाललेलं दुःख मोकळं होत आणि रामजीची सुटका होते. हे तत्वज्ञान कळायला सोपे नाहीच पण वळायला तर महत कठीण आहे. पण हा प्रवास महत्वाचा आणि तो एकट्यानेच करणे प्रत्येकाच्या भाळी असते.  

लेख लिहायला घेतला तर चित्रपटाचे परीक्षण हा हेतू होता पण लिहिण्याच्या भरात चित्रपटात मांडलेल्या तत्वज्ञावरच लिहिल्या गेलं. मूळ विषयच असा आहे कि विचार करायला भाग पाडतो. या लेखाच्या निमित्ताने ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतानुभाची थोडी ओळख झाली आणि त्यान्वये थोडे वाचन झाले. ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग कळायला अजून बरीच वर्षे असावीत तरी ते वाचणे हा स्वतःच एक 'अमृतानुभव' आहे. याचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. अमृताची चव घ्यायला हवी, सांगून कसे कळणार? असो. 

या चित्रपटाची मूळ कथा - 'आता आमोद सुनासि झाले' दि.बा. मोकाशींची आहे. आणि त्याचे चित्रपटात रूपांतर आणि दिगर्दशन सुमित्रा भावे यांचे आहे. भावे बाईंची हि अंतिम  निर्मिती होती. चित्रपटातील कलाकार म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील एक से एक म्हणावे लागतील. दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, अमृता सुभाष, उत्तर बावकर यांनी आपल्या छोट्या छोट्या भूमिका फार प्रभावीपणे वठवल्या आहेत. रामजी लोहार, आपल्या चित्रपटाचा मध्यबिंदू,  भूमिकेत श्री किशोर कदम यांनी अभिनयाचा एक नवीन उच्चांक  गाठला आहे. त्यांच्या अभिनय कौशल्याचे कौतुक करावे तितके कमी. 

चित्रपटाचे दिग्दर्शन, सादरीकरण, प्रस्तुती, लायटिंग आणि कॅमेरा अँगल अप्रतिम आहे. प्रेक्षका पर्यंत दुःख पोचविणे सोपे नाहीं. आणि चित्रपटाच्या कथानका सोबत  संत ज्ञानेश्वरांनी मांडीलेले अद्वैत तत्वज्ञान हा विषय चित्रपटाद्वारे लोकांपर्यंत पोचविणे हि महत कठीण कार्य आहे पण सुमित्रा भावे यांनी फुलांचा सुरेख हार बनवावा तसा चित्रपट गुंफला आहे. आपल्या मराठी चित्रपट जगात असे सिनेमे अजूनही निर्मित होतात हे आपले अहोभाग्यच. 

---

हा लेख वाचल्याबद्दल आभारी आहे. या विषयावर आणि चित्रपटावर खालील लेख अवश्य वाचावेत हि विनंती. 

१) दिठी - चिनुक्स : https://www.maayboli.com/node/78907

२)  आतां आमोद सुनांस जाले - आनंद मोरे :  https://aisiakshare.com/node/५४०४

३) आतां आमोद सुनांस जाले - नंदन : http://marathisahitya.blogspot.in/2006/06/blog-post_28.html

11/24/23

नेते हवेत, राजकारणी नको. देव हवेत, देवळं नकोत!

आमच्या घरामागे एक नवीन देऊळ बांधले गेले आहे. तशी आस पास बरीच देवळं आहेत. पण हे झगमगीत आणि भव्य आहे. त्यामुळे सहाजिकच त्यावरचे भोंगेहि मोठे आहेत आणि सकाळ संध्याकाळ नुसता गोंधळ चालतो भोंग्यांवर. त्यांना आवाज कमी करण्यासाठी बऱ्याचदा विनंती केली. पण इथल्या कोण्या 'दादा' च आहे.ते देऊळ हे आराधना करायला शांती स्थळ असावे असल्या 'चुकीच्या' कल्पना त्या दादाला नाहीत. दिवे, रोषणाई, मंडप आणि भोंग्यांवर आवाजाचे प्रदूषण यातच त्याला महात्म्य वाटते. पण विचार केला तर असल्या धांगड-धिंग्याच्या कल्पना या 'दादा' च्या आहेत असे नाहीं. बहुतांश समाजाच्या असल्या कल्पना होऊन बसल्या आहेत. देवाची आराधना हि एक अति-वैयक्तिक गोष्ट असावी यापॆक्षा या आराधनेचा भपका कसा करायचा यात लोक व्यस्त आहेत. देवळांचा जीर्णोद्धार होतो आहेच आणि त्याहून गतीने नवीन बांधली जात आहेत. आता तसे म्हणाल तर हि एक स्पृहणीय घटना मानायला हवी. पण नवीन देवळं हि वास्तुशिल्पाचा नमुने आहेत असही नाहीं आणि हे देवळं सामाजिक समारंभाचे व कार्यक्रमांचे, लहान मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी, रंजल्या-गांजल्यांच्या साठी, लेखन, अभिनय, व्याख्यान, नृत्य इत्यादी कलेसाठी, मुसलमानी आणि ख्रिश्चन धर्मांचा प्रदुर्भाव थांबवण्यासाठीची केंद्रे सुद्धा नाहीं. हि सत्ताकेंद्रे, राजकारणाची केंद्रे, भारत सरकार किंव्हा राज्य सरकारने पैसे ढापायची केंद्रे होऊन बसली आहते. धर्म वृद्धिंगत व्हावा, स्थापन व्हावा, विकसित व्हावा, धार्मिकता वाढावी, श्रद्धा वाढावी व अंधश्रद्धा कमी व्हावी अश्या कुठल्याही हिंदू धर्माला आवश्यक घटना देवळांमध्ये जितक्या प्रमाणात व्हाव्यात तेवढ्या होतांना दिसत नाहीत.   

पण या बेभान श्रद्धेला किंव्हा श्रद्धेच्या देखाव्याला अंधश्रद्धा म्हणून हिणवता येईल का? समाज अधिक शिक्षित होतो आहे, स्त्री-मुक्ती, दलित - हरिजन विकास या आघाड्यांवर समाज प्रगती मार्गावर आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक क्षेत्रात हि समाज प्रगती करतो आहे आणि सजग आहे. विज्ञानावर जनतेची संपुर्ण विश्वास आहे. मग 

नेमकं कारण कुठले? साधने आणि कृती अति वाटल्यात तरी हि श्रद्धा खोटी नाहीं. हि चिकित्सा हिंदू धर्मात आणि समाजातील देवळांच्या स्थानाची सुद्धा नाहीं. देवळे हवीत, डोके टेकवायला स्थान हवे आणि देव हवेत. अगदी जुनी आणि उध्वस्त केलेली देवळे पण पुन्हा बांधायला हवीत. समस्या ही वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याच्या सीमा-रेषेवर आहे. 

माझ्या मते दोन मुद्द्यांचा इथे विचार करायला हवा. १) वैयक्तिक जीवनातील अस्थिरता आणि त्यान्वये बिना शिडाच्या होडीसारखी भावना आणि दुसरं म्हणजे सामाजिक जीवनात मार्गदर्शन आणि मार्गदर्शनकर्त्यांचा अभाव.  

गेल्या काही दशकां मध्ये जीवन फार घडामोडींचे झाले आले. दबाव, तणाव, हे शब्द जणू प्रत्येकाची प्रतिनामे झाली आहेत. अगदी लहान वयापासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळे दबावात असतात, कुठल्या ना कुठल्या तणावात असतात. प्रत्येक काळ कुठल्या ना कुठल्या गतिविधीने, व्यक्ती किंव्हा घटनेने नावाजतो. सध्याचा काळ हा  विरोधाभासाचा काळ म्हणू शकतो. एकीकडे  आयुष्य सुखाचे, आरामाचे झाले आहे. पण या ऐहिक सुखाची किंमत आपण सतत वाढणाऱ्या अस्थिरतेने देतो आहोत. ही अस्थिरता नुसती नोकरी, पैसे इत्यादी साठी नसून मानसिक अस्थिरता फार झपाट्याने वाढते आहे. दृष्टीक्षेपात कुठे किनारा नाहीं की जिथे शांतपणा मिळेल, विचार करायला मुभा असेल. सगळीकडे जाहिरातींचा गदारोळ, जिथे प्रत्यक्ष जाहिराती नसतील तिथे पैसे घेऊन बडबड करणारे लोक. धुराळा, धुकं, कर्णकर्कश धुमाकूळ, अस्थिर वाटा, सतत बदलती लक्ष्य, अश्या भ्रमित परिस्थितीत कुठे तरी डोकं टेकवावे वाटणे सहाजिक आहे. बाहेर काहीही असो देव्हाऱ्यात देव तर स्थिर आहे! 

या बिंदूवर दुसरा मुद्दा पदार्पण करतो. अस्थितरते सोबत मला वाटते कि वाट दाखविणारे कमी होत आहेत. प्रत्येक मनुष्य  घर आणि समाज अश्या दोन रूपातून वावरत असतो.  घरातून मोठ्यांनी लहानांना वाट दाखवावी तसेच समाज स्तरावर नेत्यांनी पण वाट दाखविणे आवश्यक आहे. समाजाचा घटक म्हणून अनेक प्रश्न पडतात. काहींची उत्तरे मिळतात, काही प्रश्न जटिल असतात आणि आकलनी पडत नाहीं. काहीं प्रश्नांची उत्तर नको असतात फक्त वाट कळावी एवढीच अपेक्षा असते. हे नेते फक्त राजकारणातच नसतात. (सध्या राजकारणात नेते नाहीत आणि पुढारी पण नाहीत. बहुतांश पणे कौटुंबिक धंदे चालवणारी 'घराणी' आहेत)  कला, लेखन, औद्योगिक, समाजसेवेतून, अध्यापन क्षेत्रातून असल्या विविध क्षेत्रातून नेते हवेत. आता नेता म्हणजे नेमके काय यावर स्वतंत्र लेख हवा. पण थोडक्यात चांगल्या-बरोबरची सीमारेषा जो दर्शवू शकतो तो. आणि हे मार्गदर्शन करतांना वैयक्तिक स्वार्थ नसतो. आणि इथे स्वार्थ म्हणजे केवळ आर्थिक नव्हे तर अगदी कुठल्याही प्रकारचा नको. असा नेता (स्त्री किंवा पुरुष) त्या क्षेत्रातील नामवंत हवी, त्या क्षेत्रातील कर्तृत्ववान हवी आणि उपस्थित विषयावर केलेलं भाष्य किंव्हा कृती जरी समाजाला रुचणारी नसेल तरी स्थिरतेने सत्याची बाजू न सोडण्याचे धैर्य त्यांच्यात हवे. आणि जरी भाष्य किंव्हा वक्तव्य करणारे व्यक्तिमत्व नसेल तरी कृतीतून नेहमी चांगला मार्ग दाखवू शकण्याची कुवत असलेला नेता हवा. श्री प्रकाश आमटे हे कृतीतून मार्गदर्शन करण्याचे एक उत्तम उदाहरण आहे. औद्योगिक क्षेत्रात जे. आर. डी. टाटा, किंव्हा शंतनुराव किर्लोस्कर , वालचंद हिराचंद किंव्हा जुन्या काळातील नाना शंकरशेठ. वैज्ञानिक क्षेत्रात होमी भाभा, सी.वि. रामन किंव्हा शांतीस्वरूप भटनागर. 

असा नेता किंव्हा नेतृत्व आणि ते पण समाजाच्या कुठल्याही क्षेत्रात आज दिसत नाहीं. येथे 'दिसतात' या शब्दाकडे लक्ष द्यावे. कारण नाहींत असे नाहीं, पण जणू अदृश्य, सुप्त आहेत. लोकप्रिय आणि पुढारी याच्या व्याख्या धूसर झाल्या आहेत. थीमक्का या १०७ वर्षाच्या व्यक्ती बद्दल ऐकलंय का कधी? 

'दिसतात' ते फक्त राजकारणी. कुठल्याही सामाजिक किंव्हा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उदघाटनाला (बहुतांशत:) एखादा राजकारणी असतोच. नगरसेवक किंव्हा खासदार किंव्हा आमदार किंव्हा कोणीतरी, कुठलातरी मंत्री. यांच्या हातात पैश्याच्या नाड्या असतात, सत्तेचे चाबूक असतात, या दोन बळावर यांना काहीही घडवता येते. साहित्य संमेलन? संगीत सभा? आणि जरी कुठल्या सेवाभावी संस्थेने हे कार्यक्रम आखले तरी यांना बोलावतात कारण पुढे मागे काही लागले, झाले तर यांचे पाय धरावेच लागतात. त्या राजकारण्याचा त्या कार्यक्रमाशी, किंव्हा त्या विषयाशी तिळमात्र संबंध नसतो पण समोर माइक असला आणि बसायला खुर्ची असली म्हणजे त्यांना पावत, तेवढंच लागत. रिबीन कापायला नाहीं मिळालं तरी व्यासपीठावर नक्कीच असतात. तेही नाहीं जमलं तरी सगळी कडे अगडबंब पोस्टर्स वर 'अभिनंदन' करीत आदळतात. डोळ्यांना, डोक्याला, बुद्धीला, कानांना नुसती गजबज करतात. आणि तेही नाहीं मिळालं तर स्वतःच्या (?) पैश्यांनी कार्यक्रम घडवतात आणि स्वतःच उभे रहातात. सोबत पाच-दहा गाड्या घोडे आणि पाच-पन्नास 'गाढव' सतत बाळगून नुसती हुल्लडबाजी करतात. समाजाचा जणू कुठला कोनाडा यांनी मोकळा ठेवला नाहीं  मार्गदर्शनास व्यासपीठ नाहीं, मार्गदर्शनकर्त्यास खुर्ची नाहीं आणि शांतपणे चर्चा करायला  सतरंजी पण नाहीं. उरतो तो गदारोळ, गोंधळ, नारेबाजी आणि भ्रमित समाज. 

अश्या परिस्थिती काय करायचे सामान्यांनी? देवाकडे वळणे साहजिक आहे. कुठेतरी श्रद्धा हवी. कुठेतरी आश्वासन हवे. कुठेतरी ठामपणा हवा. शाश्वती हवी. तेराव्या शतकानंतर संपूर्ण भारतभरात झालेल्या मुसलमानी आक्रमणांनी सगळी मंदिर उध्वस्त केलीत तेंव्हा देवळं नसली तरी भक्ती मार्गे लोकांनी देव शोधालाच. त्या शतकांमधील भारतभरातील विविध संत साहित्य अजूनही लोकांना मार्ग दाखवीत आहेत. कर्मकांडे करणे दुरापास्त झाले होते तरीही लोकांनी सर्व जातींनी आपल्या परीने चालीरीती आणि धर्म जपला. कारण येथे अंतिम लक्ष्य धर्म रक्षण, संस्थापन विकास होते. अर्थात सगळ्या भारत भर असे झालेच असे नाहीं. खूप साऱ्या जातिविशेष प्रथा टिकून राहिल्यात आणि त्याचे दुष्परिणाम हि आपला समाज अजूनही भोगतो आहे. थोडक्यात, संभ्रमित समाज हे काही पहिल्यांदा होतोय असे नाही. पण ह्यावरचे उपाय मात्र इतिहास थोडा समजून घेतला तर लगेच कळतील. समाजाने उचललेली चांगली पावले आणि कधी कधी घेतलेल्या चुकीच्या दिशा, याचा अभ्यास केला तरी पुरेल.

सद्य परिस्थितीत बहुतांश देवळांचे हि बाजारीकरण झाले आहे. साध्या दर्शनास जायचे तर लांब रांग असेल तर पैसे देऊन लवकर दर्शन घेता येते. जिथे दर्शनास दहा सेकंद मिळत नाही, तिथे 'VIP’ आणि नेते लोकांना वैयक्तिक पूजा-अर्चा करायला आणि मग वरून फोटो हि काढायला वेळ मिळतो. ज्या देवळात गैर-हिंदूना परवानगी नसते तिथे हिंदू द्वेष्टे राजकारणी आणि चित्रपट सृष्टीतील नायक सहज जातात. बहुतांश प्रसिद्ध देवळे पैसे कमविण्याचे माध्यम झाले आहे. जिथे लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतल्या जातो. आणि तरी लोक लांब लांब रांगा लावून उभे असतात. ह्याला दुर्दशाच म्हणावे लागेल.

ह्याला कारण असे की ह्या भक्तीला शक्तीचे सामर्थ्य नाहीं. अशी श्रद्धा आत्मविश्वास धैर्याचे द्योतक नाहीं. हि श्रद्धा संभ्रमित आणि भयाकुळ मनाच्या कुबड्या आहेत. तिथे मनाला दिलासा एक वेळेस मिळेल पण मार्गदर्शन मिळेलच असे नाहीं. सशक्त समाजाची ही लक्षणे नाहीत. स्वामी विवेकानंदांच्या प्रबुद्ध भारताची ही पहाट नाहीं.

यावर उपाय म्हणाल तर सोपा आहे. पुन्हा इतिहासात बघा. समाज भक्तीपर झाला पण लढणे सोडले नाही. मुसलमानांनी जमीन पादाक्रांत केली पण समाज धार्मिकच राहिला. अन्यायाच्या विरुद्ध लोक जमेल तसे लढत राहिलेत. व्यक्तीचा आणि समाजाचा आत्मविश्वास अतूट राहिला.

शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्रा ये धामानि दिव्यानि तस्थुः॥ (श्वेताश्वतरोपनिषद्, अध्याय , श्लोक )

आपण अमृत पुत्र आहोत. घाबरायची आवश्यकता नाहीं. शहामृगासारखी घाबरून डोकी जमिनीत खुपसायची आवश्यकता नाहीं तर सिंहासारखी गर्जना करणे गरजेचे आहे. श्रद्धा आहेच, विश्वास आहेच, याचे शक्तीत रूपांतर होणे आवश्यक आहे. पुढारी नाहीत, नेते नाहींत पण आपण एक उपयोगी, सशक्त अनुयायी तर बनू शकतो? भाषणे द्यायला नव्हे तर समर्थपणे, आत्मविश्वासाने जीवन आक्रमायला. शेवटी समाज हा प्रत्येक मनुष्यानेच घडतो, उभारतो, प्रगती करतो. पुढारी हा समाजातूनच पुढे येतो. मानसिक शारीरिक दृष्ट्या सशक्त होऊनच अंधश्रद्धा, बुवाबाजी, आणि तसेच सध्याच्या पुढाऱ्यांच्या दुष्काळ पडलेल्या संकटाचा समर्थपणे सामना करता येईल. श्रीकृष्णाची गीता हवी तर अर्जुन बनायाला हवे आणि शिवाजी महाराज हवेत तर आधी मावळा बनण्याचे सामर्थ्य हवे, नाही का?

10/14/23

मनोहर - भाग २

**या कथेचा पहिला भाग मी २०११ ला लिहिला होता. तेंव्हापासून या गोष्टीचा शेवट डोक्यात आहे पण लिहिण्याचा योग जुळला नाहीं. आता बारा वर्षांनी पुढला भाग पूर्ण केला आहे. आशा करतो वाचकांना भाग २ आवडेल. हा भाग वाचायच्या आधी कृपया पहिला भाग - https://marathimauli.blogspot.com/2011/09/blog-post.html  आधी अवश्य वाचावा हि विनंती.  

----

मनोहरच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले. त्याने डोळे बारीक केलेत. अंगावर त्याच्या साधा पट्ट्या-पट्ट्या ची जर्सी होती पण पोलीसाची खाकी पँट आणि पट्टा होता. पायात जोडे पण पोलीस चे होते. आधी त्याने त्याच्या वाहिनीकडे बघितले. ती ठोकळ्या सारखी जागेवरच थिजली होती. इंस्पेक्टर च्या बंदुकीतून अजूनही बारीक धूर येत होता. सगळं अगदी क्षणार्धात झालं. तेवढ्यात अंगणाच्या पलीकडे पोलीसची एक जीप ढर-ढर आवाज करीत थांबली. एव्हाना भिंतीला टेकलेला माणूस जमिनीवर कलंडला होता आणि रक्ताचं थारोळं साचायला लागला होत.जीप मधून एखाद-दोघे उतरल्याची चाहूल लागली. 

मनोहरने मागे वळून जीप कडे बघितले. तेवढ्यात तो पोलीस अधिकारी घश्यातुन आवाज काढण्याचा प्रयत्न करीत म्हणाला "अरे पकड रे मनोहर ला"

ठयाक-ठयाक आवाज करीत मनोहरची रिव्हॉल्वर कडाडली. तो अधिकारी आणि हवालदार दोघेहि गव्हाच्या पोत्यासारखे जमिनीवर ढासळले. गोळीच्या आवाजाने जीप मधून उतरणारे लोकही दचकलेत. त्यांना तो आवाज ओळखीचा होता. त्यातल्या दोघांनीं तातडीने पिस्तूरिव्हॉल्वर काढली आणि उरलेल्या दोन हवालदारांनी त्यांच्या ब्रिटिश कालीन थ्री-नॉट-थ्री खांद्यांच्या 'म्यानातून' बाहेर काढल्यात. पण त्यांना कळेना कि आवाज नेमका कुठून आला आहे ते. त्यांना रेडिओ वरून या स्थळावर बोलावले होते पण या घरात जायचा हुकूम नव्हता. आणि कुठलं घर हे पण नीटस माहिती नव्हतं. एक अधिकारी आणि एक हवालदार या गल्लीत आहेत आणि त्यांना गाडीत घालून कोणाच्यातरी शोधावर निघायचे एवढेच ठरले होते. जीप मधल्या अधिकाऱ्याने इशाऱ्याने मनोहरच्या घराकडे बाकीच्यांचे लक्ष वेधले. ते एकच दार अर्धवट उघडे होते आणि आत कोणी तरी उभं असाव अशी चाहूल वाटत होती. जीप मधले चौघे एक हि अक्षर न बोलता पांगलीत. दोघे अगदी दबक्या पावलांनी दाराच्या दिशांनी जाऊ लागलीत. दुसरे दोघे घराच्या बाजूला अंगणाच्या कुंपणाच्या आणि घराच्या भिंतीत एक बोळ होती आणि तिथे खिडकी होती त्या दिशेने सरसावले. घराची पूर्ण कल्पना नसल्याने दिसणारा एक दरवाजा आणि एक खिडकी असे त्यांनी 'नाकाबंदी' केली.

'वाहिनी, वाहिनी....इथे बघ. यांना मारणं जरुरी होत. यांनी मला सोडलं नसता आणि तुला हि"

ती बाई फारशी हलली नाहीं. 

मनोहर हळूच चालत त्या अधिकाऱ्याच्या प्रेताजवळ गेला. त्याने त्याच्या पोटाखाली हात घालून रेडिओ काढला. गोल बटणांना मागे पुढे फिरवत अगम्य खुसपूस त्याने लक्ष देऊन ऐकली. 

मग उठून मनोहर त्या बाईचं बकोट धरून आतल्या छोट्या स्वयंपाक घरात नेले. 

"वाहिनी.....वाहिनी.....ऐकू येतंय का मी काय बोलतोय ते?" मनोहर खुसपुसला 

"अजून पोलीस येतच असतील. मी रेडिओ वर ऐकलंय. मी पळतो आता. याचा बदला मी घेणार. कोणाला सोडणार नाहीं. फुकटातच अकॅडेमित पहिला आलो नाही मी."

"आता तरी जाऊ दे मनोहर." 

"माझी चूकच नाहीं या. मी का जाऊ देऊ? त्या हरामखोरांनी जाऊ द्यायला हवं! मला मारायचा ना हिम्मत असेल तर?"

"तुलाच मारायला आले होते. तू नव्हतास. यायचं होतस मग? कुठे होतास? दोन तास छळत होते आम्हाला. कुठे होतास तू? आणि तुझी पिस्तूल? आणि तुझी नेमबाजी?"

मनोहरला ते आवडल नाहीं. 

"आता बघ यांना दाखवतो मी काय आहे ते" मनोहर पुटपुटला

"आणि मग पुढे काय? कोणी उरणार आहे मागे?"    

दरवाज्याच्या अगदी जवळ आले असतांना एका अधिकाऱ्याच्या पायाखालची अर्धवट तुटलेली फरशी कडकडली. त्या शांत वातावरणात तो आवाज दूरपर्यंत गेला. 

मनोहर ने स्वयंपाक घरातून वळून बघितले. त्याला डावी कडच्या खिडकीतहि  हालचाल जाणवली. नाकेबंदी करण्याचा प्रयत्न होतो आहे हे त्याला कळले. त्याने हे पण हेरलं कि या नवीन लोकांना घराची माहिती नाहीं आणि घरात तीन प्रेत आहेत याची जाणीव नाहीं.

मनोहरला कल्पना नव्हती कि एकूण किती लोक आहेत. रेडिओ वर फक्त अजून एक जीप येते आहे एवढच बोलणं झालेलं होतं.

मनोहरच्या श्वास जोरात चालू होतं. त्याने ओट्या खालचा गॅस सिलेंडर हळूच उचलून बाहेर काढला आणि वहिनीला त्या खोबणीत बसायला सांगितलं. कितीही हळू केला तर गॅस सिलेंडर चा टण आवाज आलाच.  बाहेरच्या हालचाली एकदम स्तब्ध झाल्यात. आत काय चाललंय याची चाहूल बाहेरचे घेत होते आणि बाहेर काय होतंय याची चाहूल आत मनोहर घेत होता. सेकंदाचा काटा अडखळत पुढे जात होता. मनोहर ने हातातील रिव्हॉल्व्हर घट्ट धरले. त्याच्या भुवयांवर घाम आलेला होता. त्याने अकॅडेमीत शिकवल्या प्रमाणे मोठ्ठा श्वास घेऊन धडधडत हृदय शांत करण्याचा प्रयत्न केला. हात पाय शिथिल केले. त्याचे डोळे बारीक झालेत. मनोहर ने पुढचा प्लॅन पक्का केला होता. 

समोरच्या दाराजवळ अधिकारी पोचले होते. एकाने कडी धरून हळूच दार इंच भर सरकावले. त्याला रक्ताची थारोळी दिसलीत. त्याने मोठ्ठा आवंढा गिळला. भिंतीमागे दाबून उभ्या असलेल्या अधिकार्याला दोन किंव्हा तीन अशी बोट दाखवलीत. तो अधिकारी पण विचार करू लागला कि आत जायचा कि नाहीं. त्याने खुणा करून विचारले कि उजवीकडून खिडकी कडे गेलेल्यांना परत बोलवायचा का ते. 

तेवढ्यात गोळीचा एक नेहमी आवाज येतो तसा आवाज आला आणि दुसऱ्या गोळीचा आवाज त्याहून कितीतरी पटीने मोठ्याने दुमदुमला. दोघे अधिकारी फटकन जमिनीवर आडवे झालेत. दोघांनीं एका-मेकांकडे बघितले. दोघे हि शाबूत होते. त्यातल्या एक रेडिओ काढून 'बॅक-अप' मागवायला लागला. पुन्हा तिसऱ्या गोळीचा आवाज दुमदुमला. दोघे हि अंगणात गवतावरून सरपटत जीप च्या दिशेने घाईघाईने जाऊ लागले. डावीकडे बघितला तर दोन हवालदार कुंपणावरून उड्या मारून पलीकडच्या घरच्या अंगणातून धावतांना दिसलीत. अधिकाऱ्यांना हुश्श झाला कि सगळे जिवंत आहेत.  

मनोहर ने तांदुळाची जाड लोखंडी कोठी उलटी करून रिकाम्या कोठीत गोळ्या चालवल्या होत्या. त्यामुळे आवाज असा दुमदुमला. खरंतर अधिकाऱ्यांना कळायला हवे होते कि हा रिव्हॉल्व्हर सारखाच आवाज आहे. शेवटी ते पण मनोहरच्या अकॅडेमीचे होते पण घरातील प्रेत आणि रक्ताची थारोळी बघून ते भांबावले असावेत. पण जीप जवळ येऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. ते जीप च्या मागे लपले होते. 

"या हवालदारांना जाऊ दे" एक अधिकारी म्हणाला. 

दुसरा अधिकारी तो पर्यंत आपल्या दोन्ही रिव्हॉल्वर लोड करीत होता. 

"आपल्यालाच निपटवावं  लागेल हे प्रकरण. मनोहर मला सिनिअर होता अकॅडमीत. आणि पहिला आला होता" पहिला म्हणाला. "आणि मी तेरावा" तो पुढे म्हणाला. 

"तेरा पर्यंत रँकिंग असत?" दुसर्याने थोडा खौटपणे विचारला. दोघेही याच्यावर फिदीफिदी हसलेत. 

परत एक गोळीचा आवाज आला. 

"हा हवेत मारतोय गोळ्या. आपल्याला घाबरावायला किंव्हा आपण गोळी चालवली तर त्याला आपली जागा कळेल. मुळीच हालचाल करू नको"

दुसऱ्याचा लक्ष नव्हता. तो गल्लीच्या टोकाशी सरकत्या गर्दीकडे बघत होता.

"इथे जवळपास मेळा लागलाय का? खूप गर्दी एकाच दिशेने जातेय." दुसऱ्याने विचारले. 

"हो, दसऱ्याचा मेळा आहे. बंगाली शाळेच्या मैदानात. का?"

"मनोहर बहुतेक त्या दिशेने पळेल. कारण तिथे मिसळून गायब होणे सोपे आहे." दुसरा अधिकारी असे म्हणून जीप च्या आडून डोकावून बघू लागला. 

पाहिल्याने रेडिओ घेतला आणि फ्रीकवेंसी शी खेळू लागला. तेवढ्यात त्याला लक्षात आला कि रेडिओ ची खरखर घरातून हि ऐकू येते आहे. तो एकदम सावध झाला. त्याने पहिल्या अधिकाऱ्याकडे बघितले. 

"मनोहर च्या हातात रेडिओ लागलेला दिसतोय." दुसरा म्हणाला. 

दुसर्याने खालच्या मातीवर चौकोन काढला. पटापट दिशा आखल्यात. एका बाजूला मेळा, मध्ये घर, दोन्ही बाजूच्या जोडणाऱ्या गल्ल्या आखल्यात. 

"आत जायचा एकाच बाजूंनी?" पाहिल्याने विचारले. 

"मी इकडून गोळ्या मारत जातो. म्हणजे त्याला इकडून हुसकावून लावता येईल. याला घरातून काढणं जरूरी आहे." पहिला म्हणाला. 

"आणि तो मेळ्याकडे पळाला तर?"

"घरात जाऊन त्याला पकडणे अशक्य आहे. आतल्या तीन लोकात आपणहि सामील होऊ. त्याच्या मागावर लागता येणं बेस्ट आहे. एकाद वेळेस मेळ्यात इतक्या गर्दीत तो गोळ्या चालवणार नाहीं." 

पहिला अधिकारी पुढे आणि पुढला मागे असे चिचुंद्री सारखे जीप च्या पुढल्या बाजूने एका पाठोपाठ खालती वाकून निघालेत. झाडाच्या बुंध्यावर त्यांनी एका पाठोपाठ अश्या तीन चार गोळ्या मारल्यात. आणि मग ते थांबलेत. दुसऱ्या अधिकाऱ्याने खिडकीच्या गजावर अजून एक गोळी मारली. त्याचा आवाज टणकन आला. 

त्यांना घराच्या मागल्या दारातून बुटांच्या पळण्याचा आवाज आला. तो आवाज मेळ्याच्या दिशेने जात होता. 

(क्रमशः)