9/21/11

मनोहर




खोलीत वातावरण तंग होत. कोपर्‍यात एक बाई रडत उभी होती. फार घाबरलेली. भिंतीशी एक मध्यम वयीन माणुस थरथरत भिंतीला तोंड करुन  उभा होता. त्याच्या डोक्याला बंदुक लाऊन एक पोलिसच्या वेषातला व्यक्ती उभा होता.
"हजार रुपये प्रत्येक इंचाला" खुर्चीवर बसलेल्या दुसरा व्यक्ती बोलला. तोही पोलिसच्या वेषातच होता.
"याच्या कानशीलाच्या पाच इंचाच्या आत गोळी मारली तर हजार रुपये. चार इंचाच्या आत मारली तर दोन हजार" तो पुढे म्हणाला.
"साल्या कटिंग चहा पाजतोयस का?"
खुर्चीवरचा माणूस भेसूर खिदळायला लागला. "कटिंग चहा!"
"अहो वहिनी चहा करता का थोडा?" बंदुक वाला माणुस बोलला. "पाहुण्यांना चहा-पाणी विचारायची रीत नाही वाटत या घरात"
भिंतींला टेकलेल्या माणसाला घामाची आंघोळ झाली होती.
"तुम्ही पोलिस आहात की हैवान?" त्याच्या तोंडुन शब्द अडखळत बाहेर पडले.
ती दोघे जण अजुनच खिदळायला लागलीत.
"हैवान? कोण वापरत हा शब्द आजकाल?" बंदुक वाला किचकट हसत म्हणाला.
"मराठी मिडमचा दिसतोय" खुर्ची बोलली.
"आणि साल्या तू मोठा कॉन्वेंट ला गेलायस?" बंदुकवाला खेकसला.
"ए इकडे तोंड कर" अस म्हणत बंदुक वाल्यानी त्या भिंतींला टेकलेल्याला टपली मारली.
"शिंग दिसतायत का आमच्या डोक्यावर?"
खुर्चीवाला ते ऐकुन परत खिदळायला लागला. "शिंग" अस म्हणत त्याच हसण वाढतच गेल.
बंदुक वाल्याने फाडकन गोळी मारली.
खोलीत शांततेचा आणि बारुदीचा संमिश्र वास शिगोशिग भरला. कोपर्‍यातल्या बाई डोळे मोठ्ठे करुन  खालती बसल्या.
"काढ दोन हजार रुपये. चार इंचाच्या आत आहे बघ"
भिंतींला टेकलेल्या माणसाची स्थिती बघवत नव्हती. तो तत्-पप् करायला लागला होता.
"हैवान असतो तर तुझा खोपडा उडालेला असता"
मग बंदुक त्या माणसाच्या तोंडात खुपसुन त्या बंदुक वाल्याने विचारल "मनोहर कुठेय?"
"तत्-पप् काय करतोस? बोल, बोल ना... मातीच तोंड दिलय का देवानी?"
"अरे ए दोन हजार काढुन ठेव"
"साहेब आता दुरुन नेम धरा. याच्या दुप्पट लावतो"
"का रे साल्या खुप चरायाला मिळतय सध्या तुला"
"तुमची कृपा साहेब"
तो बंदुकवाला हळु-हळु मागे सरायला लागला. त्याने बंदुक रोखलेलीच होती.
"मनोहर मला माहिती नाही"
"असा कसा माहिती नाही. वकिल साहेबांना मारा-पिट्या करायला बरा सापडतो"
"अरे सांगुन दे साहेबांना. अस उंदरासारख तुला छळायला आम्हालाही आवडत नाही."
"बघ तीन इंचाच्या आत मारतो इतक्या दुरुन. पोलिस अकादमीतुन फुकटात पास नाही झालो."

ठ्यँव!

वातावरण स्तब्ध झाल.

"साहेब काय केलत"

त्या साहेबालाही एव्हाना घाम फुटलेला होता.

रक्ताची सरळ रेख आखत त्या माणसाच धड भिंतीला चिकटुन खाली बसल.
तेवढ्यात दार उघडुन कोणीतरी आत आल.

हवालदाराने मोठ्ठा आवंढा गिळला.

"साहेब, मनोहर!"

(क्रमशः की समाप्त?)


8/28/11

माझा भारत - भ्रष्ट भारत, भाग २

मी मागल्या शुक्रवारी २४ तास उपास ठेवला. श्रावण म्हणुन नाही तर माझ्या भारतातल्या बांधवजनांनी समाज कल्याणार्थ जो 'गोंधळ' घातला त्यांना साथ म्हणुन. देशापासुन हजारो मैल दूर बसुन उपास करण्यात काय निष्पन्न होणार? माहिती नाही. देशात बसुनही उपास करुन काय उपाय होणार? ते बघायच. पण भ्रष्टाचारा विरुध्दही आपण एकत्र येणार नसू तर आपल भविष्य गडद आहे. या सगळ्या खटाटोपातुन काही निष्पन्न होणार नाही अस बरीच लोक अजुनही म्हणतात. बहुतेक ते सत्य असेल पण असंतोष मनात ठेवण्याची वेळ गेली. 'नेते कुत्रे आहेत' अशी वायफळ बडबड करण्याची वेळ गेली. आपल्या मायभूमीचे जात, धर्म आणि आता, आर्थिक परिस्थितीवरुन चिंधडे करुन बाजारात विकणार्‍या मिंध्या, कूपमंडुक, भ्रष्ट आणि एकुण ढेकुण जातीला जास्त शोभणार्‍या नेत्यांना धडा शिकविणे आवश्यक आहे. भारतातून प्रंचड प्रमाणावर पैसा परदेशी लंपास करायला भ्रष्ट लोक एकत्र आली आहेत आणि त्यांना टक्कर द्यायला आपल्या सारख्या प्रामाणिक आणि सामान्य नागरीकांनी एकत्र येण ही केवळ आवश्यकताच नव्हे तर आपल कर्तव्य आहे.

मागल्या भागाला अनुरुपे मी या लेखात लोकपाला बद्दल बरचस काही लिहिल होत पण परिस्थिती गेल्या आठवड्यात झपाट्याने बदलली. कॉंग्रेस सरकारने लोकशाहीचा जो धडधडीत अपमान केल आहे आणि सत्तेच्या माजाचे जे प्रदर्शन मांडले आहे ते बघुन मन विस्मित होते. पण गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय घटनांचा आणि राजकारणाचा आढावा घेतला तर कॉंग्रेस सरकार जुनेच कित्ते गिरवते आहे हे लक्षात येइल.

इंदिरा गांधीच्या जमान्यात या नेत्यांनी भ्रष्टाचार जन्मसिध्द अधिकार केला. या जमान्यात देशापेक्षा गांधी आण्णावाच्या व्यक्तीची पूजा परम ठरली. आणि कॉंग्रेस पक्ष या घराण्याची वैयक्तिक मालमत्ता झाली. सत्ता टिकविणे हे राजकारणाचे ध्येय बनले. राजकारण आणि प्रशासन व्यवस्थेतील लक्ष्मण रेखा नाहीशी झाली. देशाची आणि समाजाची प्रगती केवळ भाषणां मधे बंदिस्त झाल्यात. इंदिरा गांधींना केवळ केंद्रीय सत्तेचीच चटक नव्हती तर राज्य स्तरावरही काँग्रेस व्यतिरिक्त दुसर कुठल सरकार आलेल त्यांना फारस रुचत नसे. केरळ, पंजाब आणि आसाम मधे त्यांनी काँग्रेस सरकार प्रस्थापित करण्यासाठी राजकीय कपटाचा कळस गाठला. १९७५ सालच्या केंद्रिय निवडणुकांना लोकशाही त्यांना निवडुण देणार नाही हे ध्यानात आल्यावर त्यांनी सत्तेत कायम रहाण्याचा . एक सोपा उपाय त्यांनी काढला. त्यांनी लोकशाहीच बरखास्त केली. सत्तांधळे होउन बेदुंध वागण्याचे बाळकडु त्यावेळच्या राजकारणातल्या पिल्लांना याच काळात पाजल्या गेलेत. आज हिच पिल्ल सत्ताकेंद्री आहेत.

ही अधोगतीची सुरुवात होती. इंदिरा गांधींच्या हत्ये नंतर सत्तधारी कॉंग्रेसच्या लोकांनी सिखांच जे हत्यासत्र चालू केल ते असो किंवा राजीव गांधींच्या कारागिर्दीतले शहाबानो प्रकरण असो किंवा बाबरी मशिदीची दार आरती साठी उघडण असो, दूरदृष्टी आणि सामंजस्याचा अभाव प्रत्येक वळणावर आढळुन येतो. सिखांची निर्मम हत्या म्हणजे आपल्या देशाची आणि समाजाची शोकांतिका आहे. या वर गांधी आण्णाव असल्यामुळे अहेरात पंतप्रधान पद मिळालेल्या राजीव गांधींनी काय म्हणाव ? "वटवृक्ष पडल की गवताला इजा होतेच"

सन १९८४ ते १९८७ च्या कालावधीतील सांसदीय कार्यवाही म्हणजे गुंडगिरी झाली होती आणि प्रशासन पोरखेळ. या दरम्यान भारताची अर्थ व्यवस्था भंगारात काढायची वेळ आली होती. १९९१ ला आपल सोनं गहाण ठेवायची वेळ आली होती. पण आपल्या सत्ताधार्‍यांनी अर्थव्यवस्थेला रांगी लावण्याच्या ऐवजी आरक्षणाच्या द्वारे समाजाच जातींवरुन अजुन विभाजन करण्याच ठरवल. पुढे नरसिंहाराव सरकारच्या काळात अर्थ व्यवस्थेची डागडूजी झाली पण भ्रष्टाचाराने त्या काळात अक्राळ-विक्राळ रुप धारण केले. या आधी वरचे सत्ताधारी बराच पैसा खात असत आणि खालच्यांना थोडाच मिळायचा पण १९९१ नंतर सगळेच - नेते आणि बाबु, मिळुन अमाप पैसा ढापायला लागलेत.

गेल्या दोन आठवड्यात काँग्रेस सरकारची वर्तणुक आश्चर्यकारक कशी नव्हती आणि या सत्ताधार्‍यांनी राजकारणाच्या रंगमंचावर देशाचे धिंडवडे कसे काढलेत हे संक्षिप्तात मांडण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे. काँग्रेसची स्थापना ब्रिटिशांनीच केली होती आणि सध्याची मंडळी ब्रिटिशांचीच पिल्लावळ असल्यासारखी वागतायत.

पुढल्या लेखात भ्रष्टाचाराचे सहजा-सहजी न दिसणारे पण कर्करोगासारखे घातक रुप दाखवण्याचा यत्न करीन. मागल्या महिन्यात डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे भ्रष्टाचारावरचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली. त्यात त्यांने पार्टीसिपेटरी नोटस् बद्दल सांगितल. सध्याच्या गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी या बाबतीत धडाडीचे नेतृत्व दाखवत भारतातून बाहेर नेलेला भ्रष्ट पैसा भारतात परत आणण्याचा राजमार्ग बांधला. एवढ नेतृत्व आणि धडाडी बाँब-स्फोटाच्या वेळेस दाखवायच मात्र त्यांना सुचल नाही.

पण गेल्या दोन आठवड्यात घटना इतक्या झपाट्याने बदलतायत की एखाद वेळेस दुसर काही लिहिण्याची वेळ येइल.

आशा करतो की लोकपाल स्थापना झाल्याबद्दलच लिहायला मिळेल!

(क्रमशः)

7/21/11

माझा भारत - भ्रष्ट भारत

शासन म्हणल की भ्रष्टाचार येणारच. भ्रष्टाचार म्हणजे प्रशासन व्यवस्थेची सावली आहे. कितीही प्रखर प्रकाशात उभ केल तरी निदान प्रशासन व्यवस्थेच्या आकाराची सावली पडणारच. पण भारतात गंगा सध्या उल्टी वहाते आहे. प्रशासनावर प्रकाशच कोणीही टाकत नाही. सगळीकडे नुसता अंधार पसरला आहे. भारतात प्रशासन व्यवस्था तशीही कधीच भक्कम नव्हती पण आता तर प्रशासन म्हणजे पोतभरुन पैसा खायच साधन झाल आहे. सन १९८९ साली राजीव गांधी सरकार बोफोर्स प्रकरणात फसल होत. त्या घोटाळ्याची किंमत त्या काळात ६९ करोड रुपये होती. गेल्या वीस वर्षात पैश्याची किंमत झपाट्याने पडली आहे पण सन २०११ च्या जानेवारीत मध्य प्रदेशच्या कलेक्टर दर्जाच्या अधिकार्यावर धाड घातली तर पोलिस सूत्रांन्वये त्या अधिकार्याकडे जवळपास ३५० करोड च्या वर मालमत्ता असण्याची शक्यता आहे.

३५० करोड? च्याआयची तर! एका उच्च पदावरच्या बाबु कडे एवढा काळा पैसा असेल तर केंद्रिय सरकार मधल्या गुळाच्या गणपतींच काय?

खरं सांगायच तर भ्रष्टाचार काही भारताची खासगी मालमत्ता नाही. जगातल्या सगळ्याच देशात कमी-जास्त प्रमाणात भ्रष्टाचार असतोच. भारताहुन भ्रष्ट देशही बरेच आहेत. सध्या मी ज्या देशाचा रहिवासी आहे ते अति-प्रगत राष्ट्र आहे पण तिथेही भ्रष्टाचार आहेच. फरक एवढाच की भ्रष्टाचाराची झळ सामान्य माणसाला त्याच्या जीवनात पोचत नाही. भारतात मात्र भ्रष्टाचाराची शिटं प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दररोज उडतात.

आज भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचे अंग या घाणीने बरबरटलेल आहे. तुम्ही गाडीचे चालविण्याचा परवाना घ्यायला गेला आहात का? कर भरले आहेत का? घर बांधल किंवा विकत घेतल आहेत का? पाण्याच बिल भरल आहेत का? कुठल्याही तर्‍हेचा धंदा टाकला आहेत का? परेदेशागमन केल आहेत का?या यत्कश्चित गोष्टींपैकी एकही गोष्ट तुम्ही केली असेल तर तुम्ही एकतर लाच दिली असणार किंवा घेतली असणार.भारतात १०० करोड लोकांनी कधीना कधी लाच दिली आणि देतात ही लज्जास्पद बाब आहे. भारतातल्या प्रत्येक व्यक्तीकडे भ्रष्टाचारावर सांगायला वैयक्तीक उदाहरण असेल. सगळ्यांना याची झळ लागली आहे आणि लागते आहे. रेल्वे स्टेशच्या चपराश्यापासुन पंतप्रधाना पर्यंत सगळेच मन लाउन पैसे खातात. इतक्या सचोटीने लोकांनी मतदानाचा वापर केला किंवा स्वच्छता पाळली तर भारत एक यशस्वी प्रजातंत्र होईल आणि फिरण्याजोगा देश होईल. पण शोकांतिका अशी की आपल्या देशात इमानदारीने एकच काम होत - पैसे खाण्याच.

पण भ्रष्टाचाराची ही एक बाजु झाली. म्हणजे पैसे खाण्याचा हा खेळ बाबु लोकांचा आहे. आता नेते नावाच्या ढेकणांचा कारभार बघुया. तुमच्या घरासमोरचे रस्ते अत्यंत निम्न दर्ज्याचे आहेत का? आजुबाजुच्या परिसरात घाण आहे का? तुमच्या घरी वीज आणि पाणी पाहुण्यांसारखे येतात का? घरामागची नाली उघडीच वहाते आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर हो असतील तर तुम्ही निवडुन दिलेल्या प्रतिनिधी ने (थोडक्यात नेत्याने) पैसे खाल्ले आहेत. तुमचा नगरसेवकाला स्वच्छतेसाठी आणि प्रगतीसाठी सरकार कडुन जो पैसा वार्षिक मिळतो तो जणु मंदीरातल्या प्रसादा सारखा ही लोक मटकावुन टाकतात. तुमच्या परिसराच्या आमदार हेच करतो आणि खासदारही हेच करतो. काम कोणीच करत नाही. नुसतेच पैसे खातात. आणि जे काही थोड बहुत काम होत ते अत्यंत निम्न दर्जाचा असत. प्रत्येक नगरसेवकाला दरवर्षी वीस लाख रुपये त्याचा वार्ड स्वच्छ ठेवायला मिळतात. आमदाराला किती मिळतात मला माहिती नाही पण तो राज्यस्तरीय असल्यामुळे त्याला त्याच्या विभागासाठी वीस लाखाहुन अधिकच मिळत असणार. खासदाराला लोकसभेच्या राष्ट्रीय पातळीवर असल्यामुळे जवळपास एक कोटी मिळतात.(चढत्या क्रमानुसार आमदाराचा विभाग नगरसेवका पेक्षा मोठाअसतो) थोडक्यात दरवर्षी तुमच्या वार्डात आणि आजुबाजुच्या वार्डात दरवर्षी जवळपास दोन कोटींची काम व्हायला हवीत. कितीही महागाई झाली तरी दोन कोटी आकडा फार मोठा आहे. सगळी आवश्यक काम एका वर्षात होण शक्य नसली तरी पाच वर्षाच्या (निवडणुका दर पाच वर्षांनी होतात हे मी गृहीत धरतो आहे) बरीचशी काम व्हायला हरकत नाही. पण फार कमी काम होतात.

वर मांडलेला प्रकार अत्यंत सामान्य पातळीवरचा आहे. राज्य स्तरावर आणि केंद्र स्तरावर देशाच्या प्रगतीच्या नावा अंतर्गत निवडुन आलेल्या सरकारने जो मोघली कारभार मांडला आहे त्याचा विचार करुन मन भ्रमित होत. त्या बद्दल इथे बोलण्यात मी वेळ घालविणार नाही. तुम्ही वृत्तपत्र वाचतच असणार.

मी या नेत्यांना ढेकुण म्हटल खर पण आजच्या नेत्यांसमोर तर ढेकणही लाजतील कारण पोट भरल की ढेकण रक्त चुसण थांबवतात.

भ्रष्टाचारात लाच देणारा भ्रष्ट की घेणारा? भ्रष्टाचार दोन हातानी होतो. देणारा आणि घेणारा. मग यात चूक नेमकी कोणाची? हा प्रश्न तत्त्वज्ञान्यां समोर ठेवला तर त्या प्रश्नाचा उहपोह करण्यात केस पांढरे होतील. आणि त्या दरम्यान तुम्ही लाच देउन मोकळे व्हाल. एखाद काम सरळ मार्गे करायला एक महिना लागत असेल आणि लाच दिली नाही म्हणुन तेच काम पूर्ण व्हायला तीन महिने लागत असतील तर कोण लाच देणार नाही?

भ्रष्टाचारा बद्दल बोलायला लागल्यावर संभाषण नेमक या ठिकाणी भरकटत. लाच देणार भ्रष्ट असतो हे अगदी मान्य पण या विवादाची भारताच्या सध्य परिस्थितीशी सांगड जुळत नाही. भ्रष्टाचाराच्या निदान तात्त्विक चर्चा करुन मिळणार नाही. भ्रष्टाचार जरी आज कर्करोगा सारखा पसरला असला तरी तो असाध्य नाही. सर्व सामान्य जनतेने इमानदारीने रहाव आणि मुलांवर चांगले संस्कार व्हावेत इत्यादी बडबड मान्य पण भ्रष्टाचारावरच निदान फारस सोप आहे.

भारतात लाच देण्याच प्रमाण गेल्या ३० वर्षात प्रचंड वाढल. इंदिरा गांधी सरकारच्या काळात भ्रष्टाचार आवश्यक आचार झाला. या रोगाची लागण नेते नावाच्या उंदरांना आधी झाली. त्यांनी ती लागण बाबु नावाच्या डुकरांना केली आणि त्यामुळे सामान्य जनतेच्या जांघांमधे गुठळ्या आल्यात.

१९८० च्या आधी भ्रष्टाचार नव्हता अश्यातला भाग नाही. पण सध्या ज्या पातळीवर भ्रष्टाचार चालतो त्याची तुलना मुघली किंवा तत्सम सुलतानी काराभाराशीच होउ शकते. राज्यकर्ते आणि प्रशासक भ्रष्टच असतात हा जणु नियम आहे. कोणी मंत्री म्हणत असेल की तो भ्रष्ट नाही तर त्याला लोक वेड्यात काढतील. मंत्री आणि त्यांचे संत्री व्हायला भ्रष्ट असणे ही किमान अट असते. तेवढीच अट असते. तुम्ही पैसे खात नसाल किंवा खाउ देत नसाल तर तुमच जीण हराम होत.

मग काय भ्रष्टाचार अचानक वाढला कारण भ्रष्ट लोकांची संख्या अचानक वाढली? तीस वर्षात जन्मलेली मुल भ्रष्ट जन्मलीत? की तीस वर्षापूर्वी तरूण असलेली मंडळी भ्रष्ट म्हातारी झाली? अस काही मी बोललो तर माझा मेंदु भ्रष्ट झाल्याची शंका वाचकांना यायची. मला अस वाटत की समाजात चांगल्या आणि वाईट लोकांची टक्केवारी साधारण तेवढीच असते. थोडक्यात तीस वर्षापूर्वी जेवढी नेक लोक होती तेवढीच आजही आहे. मग भ्रष्टाचार एवढा कसा वाढला?

त्यामागच कारण फार सोप आहे.

चोर्‍या वाढल्यात तर त्याच कारण चोरांना पकडायला कोणी नाही हे आहे. चोरांची संख्या वाढली, चोर्‍या करण्याला पर्याय नाही इत्यादी गोष्टी पुढल्या. आजच्या घटकेला भ्रष्ट नेते मंडळी आणि बाबुंपासुन ते चौकातला दिवा न जुमानता वेगाने जाण्यार्‍या बाईक वाल्या पर्यंत कोणालाही पकडल्या जाण्याची भीती नाही. त्यांना शिक्षा करणार कोणी नाही.

मांजर नसल्यावरच उंदर माजतात.

आज पोलिस आणि न्याय-संस्था नावाचा वेश्या व्यवसाय भारतात चालतो. जनतेच्या अब्रुची रक्षा करायला नेमलेल्या या संस्थाच जनतेच्या अब्रुची लक्तर वेशीवर टांगतात. अर्थात पोलिसांना आणि न्यायाधिशांना शिव्या मारुन मोकळ होण सोप आहे. पण गोष्ट तेवढी सरळ साधी नाही.

भारतीय प्रशासन व्यवस्था ज्या तर्‍हेनी मांडलेली आहे त्यात अस समजा की ब्रिटिश जाउन त्या ऐवजी नेते मंडळी आली आहे. आणि बाबु मंडळीचा वापर ब्रिटिश राज्यकर्ते ज्या तर्‍हेनी भाराततुन पैसे लंपास करायला करत तसच आजची नेते मंडळी पैसे भारतातुन स्विस बँकेत पैसे न्यायला बाबु मंडळीचा वापर करते. प्रशासन व्यवस्था तर नेत्यांच्या अंतर्गत तर आहेच पण सध्याच्या यंत्रणेनुसार पोलिसांच खातही पूर्णपणे नेत्यांच्या पंज्याखाली येत. जर का मंत्री चोर असेल, आणि तो नेहमीच चोर असतो, तर त्याच्यावर कार्यवाही करायला पोलिसांना त्या किंव्या तत्सम मंत्र्याचीच परवानगी घ्यावी लागते. मी या परिस्थितीला उपमा द्यायचा बराच प्रयत्न केला. पण हि सरकारी यंत्रणा इतकी शंख, मूर्ख आणि भ्रष्ट आहे की त्यापुढे सगळ्या उपमा फिक्क्या ठरल्यात. कुंपणाने शेत खाल्याच याहुन ज्वलंत उदाहरण मिळणार नाही. जर का खुपच पैसे खाल्ले असतील आणि पुराव्यांचे मुडदे रस्त्यावरच लटकत असतील तर लाजे-गाजेस्तोवर त्या नेत्याला अटक करतात. ती केस पोलिसांच्याच हातात राहिली तर दोन महिने वाट बघुन नेत्याला जामिनीवर सोडुन देतात. ती केस न्यायालयात मग शिजत पडते पुढले २० वर्ष. जर का ती केस सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन ला दिली तर, तर काय होत महिती आहे?

काहीच होत नाही.

कारण त्या अधिकार्‍यांना नेमणारे नेतेच असतात. त्यांच्या बदल्या, त्यांचे पगार, त्यांची प्रमोशनं, सगळ सगळ नेतेच करतात. अश्या परिस्थितीत कोण बाबु नेत्यां विरुध्द काम करेल?

अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारीही नेते मंडळीच नेमते.

सेंट्रल विजिलन्स कमिशन चे अधिकारीही नेते मंडळीच नेमते.

थोडक्यात आज पोलिस यंत्रणा नेते मंडळीच चालवते. म्हणुनच ही डुकर बेताल होउन लांडगे बनुन हिंडतायत.


सध्या लोकपाल बिलाचा जो मुद्दा पेटलाय त्यात वर मांडलेल्या मुद्द्यांवर निदान आहे. आणि त्या लेखाच्या पुढील भागात आपण लोकपाल बिलाचा विचार करुया.

--

क्रमशः

5/16/11

शुन्यातून शुन्याकडे

भ्रष्टाचारावर लेख लिहायला घेतला पण कानात वारं गेलेल्या खोंडा सारख मन विचित्र उधळतय. संथ गतीनी चालणार गाड जणु उतारावर भरधाव गडगडायला लागलय. किंवा मला आता ते आत्ता जाणवायला लागलय. लहानपणी आजुबाजुच काहीच बदलणार नाही ही भावना कळत-नकळत रूढ होते. पण मोठ झाल्यावर जवाबदार्‍यांच ओझ घेऊन चालायला लागल्यावर काहीतरी बदलत. कोण सुखी किंवा कोण दु:खी याबद्दल मी बोलत नाही. पण नोकरी, नोकरीतील ताप, पोर-बाळ, त्यांना मोठ करण, त्यांच्या काळज्या, रुढी-परंपराचे दोर, पैसा कमविणे, साठविणे, घर बांधणे इत्यादी कार्यात किंवा त्यांच्या ध्यासात अर्थशुन्यता कुठे तरी डोकावते. हा खेळ एकतर, मांडुन निघुन जायच किंवा विस्कटुन निघुन जायच. थोडक्यात निघुनच जायच तर खेळ मांडायचाच कशाला?

वल्कल बांधुन हिमालयात गेलेल बर.

कर्मयोगानुसार
सांसारीक कर्तव्ये करणे धर्म आहे तर त्याच्या फलप्राप्तीत मला फारसा अर्थ वाटत नाही. अलेक्झांडरला एक बैरागी भेटला. एक ज्ञात जग जिंकण्या साठी तहानलेला तर दुसर्याला संध्याकाळच जेवण कुठे मिळणार याचा पत्ता नाही. अलेक्झांडरने भारतातल्या बैराग्यां बद्दल खुप ऐकल होत म्हणुन त्या अर्ध-नग्न बैराग्याला थांबवुन त्याच्या निकम्म्या जीवनाचा अर्थ विचारला.
"लोक म्हणतात की तू जगज्जेता आहेस?" बैराग्याने त्याला उलट प्रश्न विचारला
"हो" अलेक्झांडर आश्चर्य वाटल की बैराग्याने उलट प्रश्न विचारण्याची हिम्मत केली बघुन.
"म्हणजे तू शूरवीर आहेस, महत्त्वाकांक्षी आहेस, मुत्सद्दी आहेस पण तू भ्रमात आहेस हे तुला माहिती आहे का?"
अलेक्झांडरने कपाळावर आठ्यांच जाळ विणल.
बैरागी जंगलात गेला आणि झाडाच साल घेउन आला. ओल्या सालपटीचा वास तंबूत पसरला.
"एवढाल्या ढाला-तलवारी तुझे बाहु पेलतात. ही सालपटी हाताने सरळ करुन दाखव"
अलेक्झांडरला हसु आल. त्याने विचार केला की काय वेळ घालवण चाललय. पुढल्या चढाईची तयारी करायची आहे.
मग पुढला अर्धा तास त्याने सालपटी सरळ करण्याची खटपट लावली. शेवटी थकुन अलेक्झांडर घामेघुम झाला पण सालपट तशीच्या तशीच होती.
जगज्जेत्या अलेक्झांडरची ती दूर्दशा बघुन तो बैरागी खुप हसायला लागला.
"तुला वाटल की सालपट सरळ करण पोरखेळ आहे?"
"पोरखेळ नाहीया हेच सिध्द करायच होत?" अलेक्झांडरने रागात विचारले.
"चूक, पोरखेळच आहे. तेवढच महत्त्व आणि तेवढाच अर्थ आहे" अस म्हणुन तो बैरागी निघुन गेला.

अलेक्झांडर ने त्या घटनेचा काय अर्थ लावल कोण जाणे कारण त्याच्या चढाया पुढे चालूच होत्या पण अस म्हणतात की त्याची अंतिम इच्छा अशी होती की त्याचे हात त्याच्या कफनीतून बाहेर काढलेले असावेत. त्याला जगाला हे दाखवायच होत की त्याच्या सारखा जगज्जेताही रिकाम्या हातीच मेला.

ग्रीस पासून ते सिंधु पर्यंतचा भूमीराजाला शेवटी सहा फूटाचीच कफन हक्काची मिळाली.

आपण आपल विश्व आधी आखतो, सजवतो आणि सुखी असण्याचा भास निर्माण करतो. विहिरीतल्या बेडकासारख. म्हणुनच शंकराचार्यांनी याला मिथ्या म्हणत असावेत. कारण हे सगळ निरर्थक आहे. झोपल्यावर बंद डोळ्यांच्या कप्प्यांमधे जस वेगळच विश्व निर्माण करतो, रडतो-हसतो, ओरडतो, भांडतो, प्रेम करतो, अगदी तसलच जग डोळे उघडे ठेउनही निर्माण करण्याची तडफड करतो. असाध्य साध्य करणासाठी, अचिंत्य चिंतण्याची, निरर्थ सार्थ करण्याचा तडफडाट करतो.

तत्त्वज्ञानाची गंमत अशी असते की ती बडबड मनात आशा निर्माण करते. या जीवनाला अर्थ नाही पण मेल्यानंतरच्या अवस्थेच्या जाळ्यात आपण फसतो. मेल्यावर मला प्राप्त परिस्थितीत ज्ञात असलेले मीत्व उरत नाही तर तेंव्हाच्या वस्तुस्थितीची कल्पना या 'मी' ला कशी येणार? जे नाही त्याची असतांना अनुभूती कशी होणार? आणि जेंव्हा केंव्हा हे मीत्व नाहीस होईल तेंव्हा 'असण्याचा' विचार कसा करता येणार? किंव्हा त्याहुनही महत्त्वाच की तो विचार का करणार?

वीर्यवत अस्तित्वाचा आपण जन्म घेतल्यावर कधी तरी करतो का? किंव्हा करु शकतो का? लाखो-करोडो वीर्यातून एकाला जीवनाची प्राप्ती होते. एका दृष्टीने हा चमत्कारच मानावा लागेल. तुम्ही आस्तिक असा किंव्हा नास्तिक, जन्माची प्रक्रिया थक्क करते. पण यातुन काय निष्पन्न होत याचा विचार केला तर हातात फारस काही लागत नाही. जन्म घेतल्या क्षणापासुन आपण काही तरी निर्माण करण्याचा आटापिटा करतो पण खर्‍यात समुद्र किनार्‍यावरचे रेतीचे किल्ले बांधण्याहुन अधिक काहीच साध्य करत नाही. नागडे येतो आणि नागडेच जातो.

प्रवास शुन्याच्या या बाजुनी त्या बाजुला. बेरीच नेहमीच शुन्यच.

3/21/11

मन वढाया वढाया

बर्‍याच दिवसांनी लिहिण्याची संधी मिळते आहे म्हणुन मी आनंदात आहे. पण सर्वप्रथम माझ्या गैरहजेरीत संकेतस्थळावर नियमित पणे येणार्‍या वाचकांना आभार मानणे आवश्यक आहे. मी शेवटला लेख २२ सप्टेंबर २०१० ला लिहिला तरीही तुम्ही नियमीत पणे संकेतस्थळावर डोकावत होतात, हे बघुन लिहिण्याला हुरुप येतो. प्रोत्साहन साठी या कच्च्या लेखकाचे आभार कृपया स्विकारावेत ही विनंती. या दरम्यान वैयक्तिक आयुष्यात बर्‍याच गोष्टी घडल्यात. काही चांगल्या, काही वाईट. जे वाईट घडल त्यातुन चांगलच उमलल हा नशिबाचा भाग. आयुष्या सारखा शब्द वापरल्यावर पुढल्या वाक्यात संगणकाने त्रास दिला अस म्हणण थोडं विनोदी वाटेल. पण खरच सांगतो काही नवीन प्रकाशित न करण्या मागे माझ्या संगणकाचा फार मोठा हात (किंवा की-बोर्ड!) आहे. माझ्या संगणकावर मराठीत लिहिणे शक्य नव्हते म्हणुन वहित लिहिलेल बरचस काही वहिच्या पांघरुणात पहुडल आहे.

असो. अजुन महिना - दिड महिनाभर संगणकाचा त्रास कायम असणार आहे. त्यानंतर मात्र लिहिण्यात किंवा लिहिलेले प्रसिध्द करण्यात इतके अंतर पडणार नाही ही आशा.

डिसेंबरच्या महिन्यात माझे भारतात जाणे झाले. मातृभू चे दर्शन करण्याचा अवसर दोन वर्षानी मिळत होता. प्रत्येक वेळेस भारतात गेल की देश वेगळाच दिसतो. पाणी मुळी ठरतच नाही. त्या जलतरंगाचे विचार जे मनात उमटतायत त्याचे चित्र पुढल्या काही लेखात रेखाटु इच्छितो. त्यातले काही विषय अभ्यास केलेल असतील तर काही केवळ माझी वैयक्तिक मत असतील. भारताचा विचार केला तर भ्रष्टाचाराचा वाढता आवाका बघुन मन निर्बल होत. तसच पूर्णतः वेगळ्या विषयावर, पुण्यातल्या कॉफीच्या दुकानातल्या कॉफी बनविणारा इंग्लिश बोलतांना बघुन आधी मानसिक संताप येतो मग इंग्लिशचे दिवसागणित वाढणारे बळ बघुन जीव घाबरा होतो. केरळात गेलं असतांना तिथली प्रचंड आणि अत्यंत रेखीव मंदिर बघुन मन पूर्वजांच्या कर्तुत्वाने उत्स्फुर्त होत तर जागोजागी उभी रहाण्यार्‍या चर्च च्या इमारती बघुन हिंदु धर्माच्या भविष्या बद्दल चिंता वाटु लागते.

विषय विभिन्न आहेत पण विचार साधारण सारखे आहेत. चिंता आणि हतबलतेची गिधाड सतत घिरट्या मारत असतात. कित्येक शतकांच्या कालांतरानी भारताची खर्‍या अर्थानी प्रगती होते आहे. जन-सामान्यास प्रगतीचे नवीन मार्ग उपलब्ध होता आहेत. पैश्याच मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. शिक्षणाच प्रमाण वाढतय. हि सगळी प्रगतीची चिन्हे आहेत पण प्रगती हा शब्द जडभारी आहे. त्याचा उपयोग वायफळ करणे चुकीचे ठरते. शिक्षणाच प्रमाण वाढत असल तरी पण समाजाची सुशिक्षितता कमी होते आहे. गरीबी वाढत नसली तरी महागाई इतक्या झपाट्याने वाढतेय की गरीबीची व्याख्या बदलविणे आवश्यक आहे. तसेच गरीब आणि श्रीमंता वर्गातली तफावत अधिक तीव्रतेने जाणवते आहे. महागाई तर तोबा-तोबा! गरीबाने जगु नये आणि वैद्यकीय क्षेत्रातले खर्च बघुन तर त्याने मरण्याचा विचारही मनात आणु नये. मरणारा मरेलच पण मागे रहाणार्‍यांच जीवंत मुडदे उरतील. नुसत भरडलेल आयुष्य जगाव. या सगळ्या रोगांवर एक कुठला तरी रामबाण उपाय असता तर सोप झाल असत पण तस काही नाही या. आज काल नेते मंडळींना दोषी ठरवुन आपण मोकळे होतो पण उद्या जादुने सगळे नेते नाहीसे झालेत तरी या रोगांच निदान होणार नाही याची मी शाश्वती देतो. कारण हे रोग नाहीयात, ती तर केवळ लक्षण आहेत. रोगाच्या लक्षणांच निदान करुन काही सुध्दा व्हायच नाही.

अर्थात आपण तेवढ सुध्दा करत नाहीया ती गोष्ट वेगळी.

हा रोग मानसिक आहे. समाज आर्थिक दृष्ट्या प्रगत होत असला तरी मानसिक दृष्ट्या तो अधिकाअधिक क्षुद्र होतो आहे. समाज विन्मुखता किड लागल्या कर्करोगासारखी आतुन पोखरते आहे. आपण यंत्रां प्रमाणे कामाला जातात आणि पैसा कमवुन घरी येतात. आजुबाजुची घाण, भ्रष्टाचार, अनैतिकता, अराजकता, नेत्यांची मग्रुरी, सामाजिक निर्लज्जता, न्याय व्यवस्थेचे धिंडवडे या सगळ्याकडे बिनधास्त दुर्लक्ष करतो. आपल्याला काय करायचय हे आपल घोषवाक्य. 'साली सिस्टमच बेकार आहे' ही आपली ब्रीदवाक्य. ही सगळी लक्षण, हि मानसिक शंढता, अस्त होणार्‍या समाजाची लक्षणे आहेत उदयास येणार्‍या विश्वसत्तेची नव्हेत. केवळ आर्थिक प्रगती आजवर कुठलाही समाज सत्तधीश झाल्याच उदाहरण विश्व इतिहासात सापडणार नाही. आणि भारत त्याला अपवाद ठरणार नाही.

यावर उपाय काय याची मला मुळीच कल्पना नाही. खुप सार्‍या लोकांना खुप सार्‍या आघाड्यांवर एकत्र होउन खुप वर्ष मेहनत करावी लागणार आहे. जॅरेड डायमंड नावाच्या लेखकाच गन्स, जर्मस अँड स्टील नावाच पुस्तक प्रसिध्द आहे. मनुष्याच्या इतिहासात काही समाज तगुन रहातात तर काही का कोसळतात या विषयावर त्यांचा अभ्यास आहे. त्यांनी दिलेल्या कारणांपैकी मला एका कारणाचा प्रत्यय सध्या आपल्याला देशात येतो. नजिकच्या काळातल्या फायद्यासाठी आपल्या भविष्याच नुकसान आजची नेते मंडळी करते आहे आणि शोकांतिका अशी की आपल्याल हे कळत आहे तरी आपण डोळ्यांना ढापण लाऊन दरीच्या दिशेनी भरधाव जातोय.

आपली संस्कृती पाच हजार वर्ष टिकली कारण आपल्या पूर्वजांनी ती टिकवायला कष्ट घेतलेत. आपल्या पुढच्या पिढ्यांना अस आपल्या बद्दल म्हणता येइल का?

9/22/10

घराच्या सान्निध्यात

अमेरिकेच्या उत्तर-पूर्वेला मेन (Maine) नावाचे राज्य आहे. उन्हाळ्यात हा प्रदेश फार सुंदर होतो. सगळीकडे हिरवीकंच चादर पसरली असते आणि त्यातुन रस्ते असे जातात की वाटत झाडांसोबत रस्ते ही जमिनीतुन उगवले आहेत. मागल्या आठवड्यात माझा कॉलेजचा मित्र भेटायला आला होता. इथे उन्हाळा संपत आलाय त्यामुळे शेवटले काही दिवस मुठीतून सुटायच्या आधी म्हणुन आम्ही दोघांनी ठरवल की मेन ला चक्कर मारायची. माझ्या एका मैत्रिणिच लेक-हाउस मेनच्या उत्तरेस आहे. नशिबानी ती तेंव्हा तिथेच होती त्यामुळे आम्ही तिच्याकडेच जायच ठरवल. इथे, अमेरिकेत, उच्चाभ्रु लोकांची उन्हाळ्यासाठी खास अशी वेगळी घर असतात. त्या घरांना समर हाउसेस म्हणतात. बहुधा करुन ही घर समुद्र पट्टीवर असतात किंवा, माझ्या मैत्रिणीच, लॉरा च जस होत तस एखाद्या तलावाच्या काठावरही असतात. उन्हाळ्यात मुला-बाळां सोबत ही कुटुंबे एखाद-दोन आठवडे या घरात घालवितात.

लॉराच घर मेनच्या उत्तरेला चायना लेक नावाच्या तलावाच्या काठावर होत. या तलावाल चायना लेक का म्हणतात हे नका विचारु कारण तिथल्याही कोणाला या नावाच्या उगमा बद्दल माहिती नव्हत. घराची बांधणी संपूर्णपणे लाकडाची होती. घराच्या आजुबाजुल अंगण आणि समोर थोड उतरून तलाव. होड्या लावायला आणि पाण्यात उड्या मारायला तलावात २० फुटाच लाकडाचा धक्का बांधलेला होत. लॉरा घरची फारशी श्रीमंत नाहीया. हे घर तिच्या पणजोबांनी सन १९०० ला बांधलेल आहे. तिचे पणजोबा फोर्ड मोटारींना कार्बोरेटर पुरवित असत. अर्थातच, पणजोबांनी बराच पैसा कमविला असणार. कार उद्योगाने जगभरात क्रांती घडवली आणि त्या क्षेत्रात फोर्ड उद्योग समुदाय अग्रगण्य मानल्या जातो. झपाट्याने प्रगती होत असलेल्या उद्योगात तिचे पणजोबा आघाडीवर असणार आणि ते बरेचदा हेन्री फोर्डला भेटले असणार. शंभर वर्षांपूर्वी जग केवढ वेगळ होत. शंभर वर्ष जुन्या बर्‍याच वास्तु अजुन उपयोगात आहेत पण एकाच कुटुंबात असलेल्या आणि अजुनही रहात्या घरात रहाण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. आजही अमेरिकेच्या या भागात लोकसंख्या इतकी कमी आहे कि सगळ्या रस्त्यांवर दिवे लावले नाहीयात. त्यामुळे सूर्य मावळला कि सगळीकडे गुडुप अंधार होतो. रात्री आठ ला बहुतांश व्यापार बंद होतो. दळण-वळणाची साधने आणि घरात वीज हे बदल वगळता, घर बांधल्याच्या काळापासुन या भागात फारसा फरक पडलेला दिसत नाही.

पण शंभर वर्षात बाहेरच्या दुनियेचा चेहरा मोहरा न ओळखता येण्या जोगा बदलला आहे. शंभर वर्षांपूर्वी न्यू-यॉर्क शहरात वेग प्रतिबंध ८ मैल प्रति तास होता. पहिल महायुध्द व्हायच होत. तुर्की साम्राज्य शाबुत होत. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच नेतृत्व लोकमान्य टिळकच करत होते. गांधीजी दक्षिण अफ्रिकेतच होते. जग अजुनही प्रामुख्याने घोड्यांवरुनच फिरत होत. या सगळ्या घटनांचा एकामेकांशी फारसा संबंध नाही. माझ्या आजोबांचा जन्म ही १९०५ चा आहे आणि त्यांच्या संदर्भातही या घटनांचा उल्लेख केल्या जाउ शकतो पण माझ्या आजोबांचा किंवा माझ्या ओळखीतल्या कुठल्याही आजोबांचा हेन्री फोर्ड सारख्या तत्सम काळ बदलविणार्‍या व्यक्तीशी नव्हता. काही बिघडल अस नाही पण त्या घरात रहातांना उगाच गंमत वाटत होती.

फोर्ड कंपनीला कार्बोरेटर पुरविणार्‍या कुटुंबाची प्रगती पुढे मोठ्या उद्योग समुदायात होणे सहाजिक होते पण तस काही झाल नाही. लॉराच्या आजोबांनी जमिनीचा धंदा केला पण पणजोबांनी बांधलेल घर मात्र पुढल्या पिढ्यांनी जतन करुन ठेवल. त्या घरात वर्षानुवर्ष ही लोक एकत्र येतात. लॉराच मूळ गाव या घरा पासुन २४ तासाच्या अंतरावर आहे तरीही ती आणि तिच कुटुंब दरवर्षी उन्हाळ्यात एक आठवडा या घरात घालवित असत. घर मोठ असल तरी बांधणी साधी आहे. कारण तिथे थंडी इतकी भयंकर असते की थंडीत त्या घरात रहाणे अशक्य आहे. पण घरात जुजबी सगळ्या गोष्टी आहेत. तलावात होडी (कनु) आहेत आणि काठापासुन काही अंतरावर दहा फुट उंचीची लाकडाची बुर्जणासारख मुलांना पाण्यात उड्या मारायला बांधलेल आहे. इतकाल्या उन्हाळ्यांमधे येणार्‍या जाणार्‍यांची छायाचित्र सगळीकडे लाउन ठेवली आहेत. त्यात लॉराच्या पणजी आणि पणजोबांच छायाचित्र आहे. त्यांच्या साखरपुड्यापासुन ते लग्नापर्यंतच्या ९० दिवसात पणजोबांनी पणजीला ९० पत्र लिहिलीत. लॉरानी ती पत्र अजुनही जपुन ठेवली आहेत. इतक्या वर्षात येणार्‍या-जाणार्‍यांनी, हसण्यांनी, गप्पांनी आणि जेवणांनी त्या घराला आलेल्या विशिष्ट व्यक्तीमत्वाची जाणीव होते. आणि त्या व्यक्तीमत्त्वाने पणजोबां पासुनची चौथी पिढीचे त्या घराशी तितकेच जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ती वास्तु दगड-विटांची, लाकडाची न रहाता जिवंत होते. आणि त्या वास्तुचे ठसे रहाणार्‍यांवर नेहमी साठी उमटतात.

त्या घराचा परिणाम म्हणा कि खुप दिवसांनी फुरसत मिळाली म्हणा पण घरा बद्दल माझ्या डोक्यात बरेच विचार एका-मेकांशी गप्पा मारतायत. आमच सध्याच घरही शंभर वर्ष जुन असेल. पण माझ्या आजोबांनी ते सन १९७२ ला विकत घेतल. या वर्षी ते घर आम्ही विकतोय. बरीच कारण आहेत. आम्हा सगळ्यांना वाईट वाटतय. काही लोक म्हणतात कि आठवणी महत्त्वाच्या. ते मला मान्य आहे. पण ते झाल घरातल्या आठवणींच, घराच्या आठवणींच काय?


माझ्या आजीच्या अस्थि विसर्जनाला आम्ही जबलपूरला, नर्मदेच्या काठी, गेलो होतो. माझी आई आणि तिची भावंड सगळी जबलपूरला वाढली. ती तिच्या लहानपणीच्या खुप गोष्टी सांगते. त्यांच जुन घर अजुनही उभ आहे. त्यात आता दुसर कुटुंब नांदतय. आईला अजुनही आठवणी काढायच्या तर घर आहे. मला तस चालल असत.

आमच्या घराची बांधणी जुन्या पध्दतीची आहे. माझ्या लघुकथांपैकी "घर" कथेत मी माझ्या घराच वर्णन केलय. ती कथा म्हणजे मला पडलेल खर स्वप्न होत. (आता मला असली स्वप्न का पडतात देवच जाणे) पण त्या स्वप्नातील विचित्रपण व्यतिरिक्त मला घामेघुम करणार दृश्य म्हणजे आमच्या घराची झालेली तोडफोड होती. घराची ती दूर्दशा मला स्वप्त्नातही सहन झाली नाही. उद्या ते घर खर्‍यात अस अवशेष होत नाहीस होणार या कल्पनेनी शहारे येतात.

लॉराच्या कुटुंबानी घराच्या हिस्स्यांवरुन भांडण व्हायच्या आधीच घराच्या नावाचा ट्र्स्ट स्थापन केला आणि ते घर जतन केल. आम्हाला तसल काही करण शक्य नाही. त्यातुन नविन फ्लॅट इतकाले महाग झाले आहेत की जुन घर विकल्या शिवाय गत्यंतर नाही. आणि तसही मी आणि दादा परत कधी घरी येणार सांगण कठीण आहे. दादा त्याच्या सुखी संसारात रुळला आहे आणि मी गृहस्थाश्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. एका दृष्टीने विचार केला तर त्या घरात आम्हा सगळ्यांची भरभराट झाली. त्या घरानी आमची भरभराट केली. पंख पसरवुन बर्‍याच वर्षांपूर्वी आम्ही बाहेर पडलो, जग हिंडलो पण संध्याकाळी घरी परतायची आस अजुनही जात नाही.

7/19/10

मला काय आठवत

* खुप लहान असतांना आमच्या आईंनी साड्या विकण्याचा धंदा काही वर्ष केला. मी बालक मंदिरातुन दुपारी परत आल्यावर झोपत असे (मी तीन-चार वर्षांचा होतो) आणि भर दुपारी नेमक्या काही बायका साड्या घ्यायला आल्यात तर मल खुप राग येत असे. मी झोपेत कुरकुर करायचो. लहानपणी किती मुर्ख होतो हे आठवुन आता हसु येत आहे.

* पाच-सहा वर्षाचा असतांना मी सायकल नुकताच शिकलो होतो. आणि लगेच स्वतःवरच खुश होउन मी एक हात सोडुन सायकल चालवत फिरायला लागलो. पण स्टाईल मारायला (कोणावर स्टाईल मारत होतो कोण जाणे!) मी दोन हात सोडुन चालवायचा प्रयत्न करायला लागलो पण सायकलीच हँडल काही सरळ राहिना. मग विचार केला कि हात सोडुन द्यायचेत आणि बघायच की सायकल कुठे जाते. लहानपणी सगळेच हुशार असतात, मी त्याला अपवाद नव्हतो. घराबाजुच्या मोठ्या रस्त्यावर मी सायकल जोरात हाणली आणि हात सोडलेत. कानात सुर् वार वहात होत. काही वेळ सायकल सरळ गेली. मग ती वाकडी वाकडी जायला लागली. सायकलच्या सीट ला जोर लावुन मी सायकलीला सरळ ठेवण्याचा प्रयत्न करु लागलो पण ढिम्म् काही होईना. त्या भानगडी रस्त्याच्या बाजुला कचर्‍याचा जो ढीग होता त्या दिशेनी भरधाव जातो आहे या कडे लक्षच गेल नाही आणि जेंव्हा लक्षात आल तेंव्हा तीर निशाने की और बढ चुका था। कचर्‍याच्या ढिगात आमच्या मोहोल्ल्यातला कचरा साफ करणारा बावाजी उभा होता. "बावाजी बाजु हटो।" अशी मी जोरात आरोळी ठोकली. आता म्हातारा असल्यामुळे त्याला ऐकु आल नाही की तो कचर्‍याच मग्न होता माहिती नाही पण त्याने वर बघितल तेंव्हा मी त्याच्या फुटक्या चष्म्याच्या काचांपासुन दोन इंचांवर होतो. नशिबानी मी तेवढाच त्याच्यावर आपटलो आणि सायकल सरळ कचर्‍याच्या ढिगात घुसली.
"दिखता नही क्या?" एवढच तो म्हणाला आणि रागानी हातातला खराटा माझ्या पायावर मारला.
मी घाई-घाईनी सायकल कचर्‍यातुन काढली आणि घराकडे पळालो. पुढली बरीच वर्ष मी एक हात सोडुनच स्टाईल मारत होतो.

* मला बालक मंदिरात सोडायला कधी-कधी लिलाबाई येत असे. बिचारीचे हात भांडी घासुन खरखरीत झाले होते. मी फुदकत फुदकत चालायचो म्हणुन ती माझ मनगट घट्ट धरुन तरा-तरा नेत असे. तिचे ते खरखरीत हात मनगटाला टोचायचेत. "लिलाबाई हात नको पकडुस, तुझे हात टोचतात" तिला काय बोलाव सुचत नसे. नुसतच ती माझ्याकडे बघायची. तिचं ते बघण मला अजुनही आठवत.

* दादाला तेंव्हा एक नविन शर्ट मिळा होता. सायकलनी जातांना तो शर्ट वार्‍यानी मागुन फुगायचा. पण माझ्या जर्सीच काही तस होत नसे. मग मला राग यायचा आणि मी त्याच्याशी भांडायचो. सायकलीने त्याच्या मागे बसुन जातांना मी त्याच्या पाठीवर गुद्दे मारायचो, तो फुगलेला शर्टाचा भाग दाबायला.
तरी तो बिचारा मला डबल-सीट बसवुन सगळीकडे फिरवायचा.

*आमच्या घरा जवळ मोठ्ठ मैदान होत आणि त्यापलिकडे नदी. आता त्या नदीचा नाला झाला होता. पण पावसाळ्यात नदीला उत येउन मैदानाचा काही भाग चिखलमय होत असे. मी त्या चिखलात पहुडलेल्या म्हशींवर बसुन फिरत असे. असच एकदा म्हशीवर बसलो असतांना वरचे ढग उघडलेत तर सुर्याची किरण डोकावत होती. मला दादानी सांगितल होत की सुर्य प्रकाश कोणाला दिसु शकत नाही पण सुर्याच्या प्रकाशात सगळ दिसत. मला ते फारस झेपल नव्हत. पण डोकावणार्‍या किरणांचा झोत बघुन मला वाटल की सुर्य प्रकाश बघणारा मी पहिला माणुस आहे. मी आनंदाने म्हशीकडे बघितल. पण तिच्या डोळ्यात "हे पोट्ट घरी जाउन मार खाणार आहे" एवढेच भाव होते.

*आमच्या बालक मंदिराच्या (मी अहिल्या मंदिर - बालक मंदिरात जात असे) प्रमुख रजनी ताई होत्या आणि पोरांना शिकविणार्‍यां पैकी कुसुम ताई होत्या. कुसुम ताई कधीच रागवत नसत. खेळण्याच्या सुट्टीत (आता खर तर दिवसभर खेळच चालायचेत. पण 'खेळण्याच्या' सुट्टीत आमच्यावर कोणाच लक्ष नसे.) आम्ही कुसुम ताईंना आळी-पाळीने मिठ्या मारायचो. आणि त्या प्रत्येकाला गोंजारायच्या.
पण दुसर्‍या वर्षी त्या परत आल्या नाहीत. लग्न झाल असाव.

* पहिलीत मला घरा जवळच्या टिळक विद्यालयात घातल होत. तिथे कुबडे आणि कुथे हे माझे जिगरी दोस्त होते. पण पुढल्या वर्षी मला दुसर्‍या शाळेत गेल्या वर मला ते कधीच भेटले नाहीत. नविन शाळेत सुरुवातीला मला त्यांची खुप आठवण येत असे. कुबडे हाडकुळा होता. तो हातात सतत एक रुमाल बाळगत असे आणि बोलतांना तो तोंडावर सतत रुमाल लावायचा. कुथे थोडा जाडा होता आणि ठेंगणा होता पण तो हातात रुमाल वगैरे घेउन हिंडत नसे.
मल त्या दोघांना एकदा तरी भेटायच आहे.

* लहान असतांना चंद्रपूरला मामाकडे दिवाळीला गेलो होतो. एकदा जेवणा नंतर सिताफळ खातांना मी काही बिया गिळल्या. झाल, मला सगळे चिडवायला लागलेत की आता माझ्या पोटातुन झाड उगवणार आणि तोंडातुन ते बाहेर येणार. सुरुवातीला मी धीर धरला. फक्त मामी मला समजावत होती की अस काही होणार नाही म्हणुन. पण मग मामा म्हणाला कि ते झाड माझ्या तोंडातुन उगवणार म्हणजे मलाच त्या झाडाला लागलेली सिताफळ खाता नाही येणार. मग मात्र माझा धीर सुटला.
सगळ्यांची बरीच करमणुक झाली.

* एकदा मी आणि आजोबा श्रीराम मामांकडे जात होतो. सायकल रिक्षातुन. मला नीट रस्ता माहीती होता. घरापासुन सुरुवातीच रस्ता रिक्षेवाल्याला सांगितल्यावर मला रिक्षात गाढ झोप लागलेली. एवढ्या रणरणत्या उन्हात झोपणारा मी एकलाच नग असणार पण दुपारची वेळ होती त्याला मी तरी काय करणार? सहाजिकच मला जाग आली तेंव्हा आम्ही भलत्याच ठिकाणी पोचलो होतो.
पुढे काय झाल सांगायची गरज नाही. आजोबांनाच विचारा!

* आम्ही लहानपणी जवळच्या मैदानावर सायकलच्या शर्यती लावायचो. मागच्या गल्लीतल्या एक मुलासोबत, ज्याच नाव आता आठवत नाही पण चेहरा अजुनही आठवतो, मी शर्यत लावली . त्याने मला हरवल. मी त्याला म्हटल की त्याची सायकल नवीन आहे म्हणुन तो जिंकला. त्यानी परत शर्यत लावली. पण यंदा मी त्याची नवीन सायकल चालविणार होतो. आणि तो माझी जुनी.
मी परत हारलो. त्या नंतर बरीच वर्ष मी माझ्या मनात त्याला धोपटायची इच्छा सुकत ठेवली होती.

* आमच्या वडिलांनी खुप वर्ष शहरातल्या कापडाच्या गिरणीत नोकरी केली. गिरणीच्या मालकीच एक गेस्ट हाउस होत आणि गिरणीतल्या लोकांची तिथे वर्षातुन एक-दोनदा तरी गेट-टुगेदर होत असत. मला एकदा आई-बाबा घेउन गेले. बुफे होता आणि जेवण उशीरा होत असे म्हणुन आईने माझ ताट वाढुन दिलं. आता इतक्या सगळ्या लोकांसमोर, गर्दीत मी 'वदनी कवळ घेता' कस म्हणु ते कळेना. लाज वाटत होती. मी बराच वेळ तसाच बसलो होतो. थोड्या वेळानी खुप भूक लागली पण ' वदनी कवळ' म्हटल्या शिवाय जेवणार कस?
शेवटी मी टेबला खालती, कोणाला दिसणार नाहीत असे, हात जोडलेत. डोळे किलकिले मिटलेत. फटीतुन मी बघत होतो कि कोण आपल्या कडे बघतय ते. (कोणी म्हणजे कोणी सुद्दा बघत नव्हत!) आणि सुपर-फास्ट गतीने -
'वदनी......श्री हरीचे.....सहज.....जीवन .....ब्रह्म.....उदर.....कर्म....ओम....राम....ओम्...सहना......वही....तेज.....वही.....शांति: शांति: शाति:.... म्हटल आणि जेवायला लागलो.

*मी तीन-चार वर्षांचा असतांना खामगावला एका लग्नाला गेलो होतो. लग्न रविवारी असाव कारण त्याच दिवशी रामायण प्रक्षेपित होणार होत. आणि नेमका तो भाग कुंभकर्ण वधाचा होता. मी सकाळ पासुन आईच्या मागे लागलो होतो की मला कुंभकर्ण वध बघायच आहे. आता खामगाव सारख्या गावात (त्या गावाच्या नावतच गाव आहे!) आणि लग्नाच्या मांडवात टि.वी. कुठुन मिळणार. आणि अगदी टि.वी. असता तरी नवरा-नवरीने हार हातात घेउन काय कुंभकर्ण वध बघायचा का? पण माझ्या बालबुध्द्दीला असले प्रश्न झेपणारे नव्हते. कोणी ऐकत नाहीय बघुन मी शेवटी मांडावा बाहेर पडलो आणि हिंडत एका घरासमोर टि.वी. बघत उभा राहिलो. चांगले कपडे घातलेला गोरा-गोमट पोर बाहेर उभ आहे बघुन त्या लोकांनी मला आत घेतल. मी मनात म्हटल की ' उत्तम, आता कुंभकर्ण वध नक्कीच बघायला मिळणार'. इथे मांडवात माझ्या नावाचा गजर झाला. मला शोधण्याच्या धावपळीत कोणाला तरी मी त्या घरात टिवी बघतांना दिसलो. सगळ्यांनी रागवल. चार-चौघांसमोरे चांगल दिसत नाही म्हणुन आई-बाबांनी बत्ती दिली नाही. रामाची कृपा!
नवरा-नवरी विचार करत असतील की आमच लग्न लागत होत आणि मांडव चिन्मयला शोधत होता.