6/20/07

अग्निवस्त्र

चर्रर्र !! कातड जळण्याचा आवाज येतोय. कातड जळण्याचा असा वास येतो हे माहिती नव्हत. बहुधा माझ दु:खपुर्ण व निराशाजन जीवन जळण्याचा हा वास असेल. पण मी इतकी पेटलीय तरी मला मुळीच चटके बसत नाहीया. जणु मी कातडीपासुन वेगळी झालीय. पण कातड जळत असल तरी मनातल्या पीडा तश्याच्या तश्याच आहेत. यांच्या पासुन दूर पळण्यासाठीच एक लीटर किटकनाशक प्यायले मी सात वाजता पण दहा वाजलेत तरी ढिम्म काही झाल नाही. शेवटी ओतल रॉकेल स्वतःवर आणि नेसलं हे अग्निवस्त्र.

मनाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात आशेचे किरण डोकवतायत. मेल्यानंतरचे नवीन जग कस असेल? लग्नाचा शालु नेसल्यानंतर असल्याच काहीतरी भावना मनात दाटल्याच अंधुकसं आठवत. पण मेलं औषधापुर्ती सुध्दा सुख लाभल नाही. लग्नानंतर माझी सारखी तब्येत खराब आणि जेंव्हा थोडी बरी असायची तेंव्हा हे दौर्‍यावर असायचे. मला माहिती आहे कि लोक यांच्या पाठीमागे यांनाच नाव ठेवतात पण शेवटी पुरुष माणसाची तरी काय चूक? दोन पोर झालीत आणि मी परत स्वप्न बघायला लागली की निदान ही तरी सुख देतील.

आत्ता दोघांपैकी कोणी पाणी टाकायला आलं नाही म्हणजे पावल.

हा देह जळायला इतका वेळ लागतोय तर माझ मन जळायला किती वेळ लागेल? पण मी यंदा ठरवलय कि आशेचे किरण मनाच्या कोठडीत शिरुच द्यायचे नाहीत म्हणुन. थोडी उब तरी मिळेल. थोडी जरी आशा वाटली तरी चटके बसतील आणि कोणी तरी पाणी टाकायला येइल.

इतकी वर्ष झाली हे अंगण बघतेय पण आज मोठ लख्ख दिसतय. मोठ्याच्या लग्नाच्या वेळी आठवत मला की मी स्वतः सारवल होत. तांदुळ ओलांडुन आत सुन तर इतकी गोड दिसत होती कि मलाच गलबलुन आल. मला मुलीची हौस पूर्ण नाही झाली तर सुन ती भरुन काढेल अशी आशा मनात पालवली. पण खोलीतुन वास येतोय अशी तक्रार करत तीने जेंव्हा खोलीत दोन बादल्या पाणी आमच्या खोलीत फेकले तेंव्हा मनात पालवलेला आशेचा अंकुर विष वृक्षाचे आहेत हे कळले. हे झाड फोफावायला एक महिनाही नाही लागणार अस नाही वाटल. वर्षभरात घर मुलाच्या नावे करुन झाले व वृध्दाश्रमाचा मार्ग धरायच ठरवल पण तेही नशिबात नव्हते. 'हविषा कृष्ण वर्तमेव भूय एवभिवर्धते' हेच खर कारण यांच पेंशन मिळत रहाव म्हणुन आम्ही आमच्याच घरात कैद झालो. यांना शेवटल्या दोन वर्षात साधा गरम वरण-भात खायला मिळाला नाही. हे गेल्यावर मी ठरवलं कि माझ्या लाकडांचा खर्च हि मुलावर पडु द्यायचा नाही.

आत्महत्या करणे पाप असते अस आपला धर्म म्हणतो. सत्य असेल ते एखाद वेळेस. पण पाप आहे तर मला चटके कसे बसत नाहीयात ? या जन्माने मला इतके होरपळले आहे कि हा अग्नी अजुन काय बिघडवणारय माझ. पाप असेल तर असो पण मी मात्र माझ्य जन्मभराच्या तपश्र्चर्येचे फळ मानिते.

अरे, कोणीतरी दार उघडतय. नका दार उघडु. जळु द्या मला निवांतपणी. सुनेचे डोळे तर पांढरे पडले आहेत. पोलीस केस होउ शकते तसेच मला मिळत असलेल अर्ध पेंशन आत मिळण बंद होणार असले असंख्य विचार मी तीच्या डोळ्यात वाचु शकतेय. अरे, पाणी नको टाकुस माझ्यावर. मातृऋण फेडण्याची तुला सुवर्ण संधी मिळतेय तुला. ओतलच त्याने पाणी. आता मात्र आंग भाजतय. कोण बघतय खिडकितुन ? फार गोड आहे लहाना नातू. त्यालाच शेवटच बघायला बहुतेक अडकला होता जीव.

आता छान वाटतय अचानक. हलकं हलकं वाटतय. जणु मी हवा भरलेल्या फुग्या सारखी आकाशात भरकटते आहे. माझाच देह दिसतोय मला. मी मलाच मुळीच ओळखु येत नाहीया. बर आहे एक दृष्टीने. कोणीच ओळखायला नको ओळखायला नको मला. जशी आली तशीच गेलेली बरी.

3 comments:

कोहम said...

namaskar chinmay.....agnivastra hi kalpana khup avadali....pan atmahatya karanyacha karan apura vatala....

TEJAS THATTE said...
This comment has been removed by the author.
Anonymous said...

Hey, I am checking this blog using the phone and this appears to be kind of odd. Thought you'd wish to know. This is a great write-up nevertheless, did not mess that up.

- David