3/17/24

भाजप आणि श्री मोदी यांची तिसरी वारी

लोकसभा निवडणुकांचे वारे आता सोसाट्याने वाहायला लागले आहे. तारखा मागल्या आठवड्यात जाहीर झाल्यात पण तयारी मात्र सगळीकडे कधीचीच सुरु झालेली आहे. भाजप ने दोनशेच्या वर उमेदवारांची यादी जाहीर पण केली. काँग्रेसने सुद्धा ४०च्या आसपास उमेदवाऱ्या जाहीर केल्यात. हळू-हळू प्रादेशिक पक्ष आपले उमेदवार याद्या जाहीर करू लागल्या आहेत. गठ-बंधनाच्या बोलण्या सगळीकडे चालू आहेत. यातील काही, जसे भाजप व आंध्र प्रदेशचा प्रमुख विरोधी पक्ष तेलगू देसम पार्टी यांनी एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काँग्रेस आणि तामिळनाडूचा मुख्य पक्ष डीएमके याचे गठबंधंन पक्के झाले आहे. 

पण निवडणुका फक्त जागा-वाटप आणि गठबंधनांवर जिंकल्या जाऊ शकत नाहीं. राजकीय पक्षाला नवीन बाजू किंव्हा नवीन विचार लोकांसमोर मांडावा लागतो, ज्याचा विचार करून मतदार आपले मत देईल. विरोधी पक्ष हे भाजपच्या विचार-सरणीच्या विरोधात दिसत नाहीत. ना कुठला नवीन विचार, ना कुठली नवीन कल्पना. एक तर फुकटात गोष्टी वाटण्याची खोटी आश्वासने किंव्हा मोदी विरोधाचे रडगाणे. या विरोधी पक्षांचे नामकरण 'मोदी-विरोधी' दल असे करायला हवे.

जनता जनार्दन मात्र याकडे नक्कीच लक्ष देणार आणि त्याचे पडसाद जून मध्ये नक्कीच दिसणार. 

विरोधी पक्षांमध्ये किंव्हा त्यांच्या विचारांमध्ये जरी जंजाळ असले तरी भाजप आणि श्री मोदी यांनी एक राजकीय पक्ष म्हणून आणि एक सत्ताधारी पक्ष म्हणून देशा संबंधित प्रत्येक विषयावर, देशाला भेडसावणार्या प्रत्येक प्रश्नावर आणि देशाच्या भविष्याबद्दल  कणखर आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. भाजपच्या वैचारिक रणनीतीच्या काही मुख्य पैलूंचा आपण इथे विचार करू. 

विकास, विकास आणि विकास: भारताचा विकास हि जणू प्रतिज्ञा श्री मोदी यांनी घेतली आहे. आणि त्याचा पहिला टप्पा म्हणजे पायाभूत सुविधा. रस्ते, विमानतळे, रेल लाईन्स, सागरी बंदरे या सर्व क्षेत्रात अभूतपूर्व काम मोदी सरकारने केले. हि प्रगती भारत भर झालेली आहे. मुख्यतः उत्तर-पूर्व भारतात आणि जम्मू-काश्मीर भागात रेल लाईन्स चे काम झपाट्याने होते आहे. या व्यतिरिक्त उच्च शिक्षणाची तंत्रज्ञान, व्यवस्थापनशास्त्र आणि तसेच वैद्यकीय अशी अनेक कॉलेजेस सरकारने स्थापन केलीत. थोडक्यात, एक नवीन भारत बघता-बघता आपल्या डोळ्या समोर उभा राहतो आहे. 

येथे अजून एक लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे सरकारने भारतीय सेनेत अब्जावादी पैसे ओतला. यात परदेशातून अति प्रगत तंत्रज्ञान असलेली शस्त्रास्त्रे आणि विमाने आहेतच पण भारत सेने क्षेत्रात स्वतंत्र व्हावा या साठी मोदी सरकारने मजबूत पाया आणि पायंडा दोन्ही घातले आहे. 

सशक्त, प्रबळ आणि प्रगत हिंदुत्व: भाजप आणि त्या अन्वये श्री मोदी यांच्यावर केल्या गेलेली एक टीका किंव्हा आरोप असा कि पक्ष आणि पंतप्रधान हे हिंदुत्ववादी आहेत. आता यात काही नवल नाहीं आणि यात फारसे तथ्य पण नाहीं कारण पक्ष आणि श्री मोदी यांनी कधीच या गोष्टीचा नकार दिला नाहीं. पक्ष हिंदुत्वनिष्ठ म्हणूनच राजकारणात आला. पण हिंदुत्व म्हणजे मागासलेली विचार प्रणाली, हिंदुत्व म्हणजे नकारात्मक, स्त्री विरोधी, नवीन काळाचा आणि उद्याचा विरोध करणारी धर्मांध विचार प्रणाली अशी कल्पना भाजप विरोधी, हिंदुत्व विरोधी आणि डावे विचार सरणीच्या लोकांनी करून ठेवली आहे. आपण श्री मोदी यांच्या गेल्या दहा वर्षाच्या नीतींचा अभ्यास केला तर लक्षात येईल कि या प्रत्येक भ्रामक समजुतीला त्यांनी तडा दिला आहे. हिंदुत्वास नवीन वलय प्राप्त करणे आवश्यक होते. पण नारेबाजी किंव्हा वादाचे भोवरे तयार करून चालणार होते. हिंदुत्वाला सशक्त करायला हिंदूंना आर्थिक दृष्ट्या आणि विकासाच्या संधी उपलबद्ध करण्याची आवश्यकता होती. मोदी सरकारने याबाबतीत साधारण वाटणारी पण सामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल आणण्याची क्षमता असणारी ठोस पावले उचलावीत. उदाहरणार्थ, प्रत्येक घरात सिलेंडर पोचविणे, नळाद्वारे पाणी, प्रत्येक घरी शौचालायची सोय व्हावी म्हणून सरकारी अनुदान देणे इत्यादी अनेक योजना सरकारने यशस्वीरित्या राबविल्या. प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते उघडणे हि फार लहान बाब वाटते. पण यात दोन गोष्टी निष्पन्न झाल्यात. एक, कि तळा-गाळातील समाज घटक आर्थिक प्रणाली आणि त्यान्वये भारताच्या विकासाचे भागीदार झालेत, पण त्याहून आधीक या घटकांना एक नवीन ओळख प्राप्त झाली. याचा अजून एक मोठा परिणाम म्हणजे सरकार आता या जनतेपर्यंत थेट पोहचू शकते, मधल्या 'मिडल-मॅन' ची आवशक्यता नाहीशी झाली.  

श्री मोदी यांनी श्री बाबासाहेब आंबेडकरांना आत्मसात करून वंचित समाजासाठी त्यांच्या सशक्तीकरणासाठी अनेक योजना राबविल्यात. उदाहरणार्थ, पंतप्रधान मुद्रा योजने अंतर्गत वंचित समाजाच्या होतकरू तरुणांना धंद्यासाठी भांडवल उपलब्ध करण्यात आले. आरक्षण देणे किंव्हा श्री मोदी यांनी म्हंटले तसे फक्त 'रेवड्या' देणे हा विकास नव्हे. समाजाचा विकास म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत विकास आणि यातूनच आत्मविश्वास निर्माण होईल. स्व, स्व-राष्ट्र,स्व-धर्म या सगळ्या सामाजिक व्यक्तिमत्वाच्या अंगांचा पाय प्रत्येक व्यक्तीत रोवल्या जाईल. सरकारी यंत्रणा आणि उभारते तंत्रज्ञान याचा पुरेपूर उपयोग करून मोदी सरकारने सशक्त हिंदू समाज आणि हिंदुत्वाची घट्ट मुहूर्तमेढ केली आहे. 

राजकारण आणि चाणक्य नीती: भाजप आणि श्री मोदी सतत राजकीय खेळ्या खेळात असतात असा आरोप केला जातो.  राजकीय पक्ष किंव्हा राजकीय नेता राजकारण करणार यात काय नवल? सत्तेवर आल्यावर शांत बसून राज्य करणे आणि राजकारण हे पक्षावर सोडणे असल्या काहीतरी समजुतीत काँग्रेसेतर पक्ष असत. जी काँग्रेसेतर पक्ष केंद्रावर सत्तेवर आलीत ती दुसऱ्या वेळेस पुन्हा निवडून आली नाहीत. कारण काँग्रेस पक्ष कधीच राजकारण करणे सोडत नसत त्यामुळे सत्तेवर नसतील तरी काँग्रेस पक्ष सतत राजकीय खटपटी करीत. राजकीय पक्ष राजकारण करणारच आणि करायला हि हवं. पण राजकारण सत्तेसाठी आणि राजकारण देशासाठी यात बरेच अंतर आहे. सत्तापिपासू काँग्रेस सत्तेसाठी कुठल्याही थराला जायला धजत नसे. मग त्यात समाजाचे किंव्हा देशाचे नुकसान झाले तरी चालेल. कारण सत्ता हेच ध्येय होते देश नाहीं. श्री मोदी आणि भाजप या मुद्द्यावर इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळे उभे दिसतात. गेल्या दशकातील राजकारणाचे डाव बघता श्री मोदी आणि भाजप काही तरी ध्येय समोर ठेऊनच पावले उचलतांना दिसतात. काश्मीर मध्ये श्रीमती मुफ्ती यांच्या पक्षासोबत राज्यस्थापना केली तेंव्हा अनेक लोक चकितआणि नाराज झालेत. पण सन २०१९ जेंव्हा धारा ३७० नेहमीसाठी बरखास्त झाले तेंव्हा श्रीमती मुफ्ती यांच्या सोबतचे गठबंधं हि केवळ एक राजकीय खेळी होती हे लक्षात आली. या पाश्र्वभूमीवर श्री मोदी आणि भाजप सतत राजकारणाचे डाव-पेच लढत असतात. तिसऱ्यांदा सरकार निवडून येणे हि एक अभूतपुर्व घटना आहे आणि त्यासाठी भाजप आणि श्री मोदी प्रत्येक काळजी घेतांना दिसत आहेत. गेल्या महिन्याभरात त्यांनी आपली सगळी गठबंधना चाणाक्षपणे पक्की केलीत. 

खूप दशकांनंतर भारताला असा नेता आणि राजकीय पक्ष लाभला आहे जो ध्येयवादी आणि दूरदर्शी आहे. भारतात सध्या भाजप सोडले तर सगळे पक्ष हे प्रादेशिक कुप-मंडूक वृत्तीचे 'फ्यामिली बिझनेस' आहेत आणि हे उज्वल भविष्याचे द्योतक नाहीं. पण हे बदलायला या राजकीय डाव-पेच आवश्यक आहे. भाजप ला टक्कर द्यायची तरी आजच्या राजकीय पक्षांना त्यांचे स्वरूप बदलावे लागेल. नाहीं तर ते नामशेष होतील. येथे फक्त समाज आणि देशाचा विकास अपेक्षित नाही तर भारतीय राजकारणाचा विकास हे पण एक ध्येय आहे. 

श्री मोदी हे भारतीय राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय पटलावर आलेलं झंजावात आहे. या तिन्ही अंगांचा चेहरा-मोहरा बदलण्याची शक्ती श्री मोदींमध्ये आहे. आशा करू या भारतीय मतदार हे समजेल आणि हे बारकावे समजून आपले मत देईल. 

No comments: