12/23/24

'Bird By Bird


परदेशी आणि परभाषिक भाषेतील प्रसिद्ध पुस्तकांच्या आढावा घेण्याच्या या मालिकेत दुसरे पुस्तक म्हणजे 'बर्ड बाय बर्ड' ('Bird By Bird ') हे  ऍन लमोट (Ann Lamott ) यांचे पुस्तक आहे. मागल्या लेखात आपण प्रसिद्ध भारतीय लघुकथेचें भाषांतर केलेल्या पुस्तकाचा आढावा घेतला. यंदाचे पुस्तक आणि त्याचा विषय थोडा वेगळा आहे. एक, कि पुस्तक खऱ्या अर्थाने विदेशी आहे, म्हणजे, अमेरिकेत प्रकाशित झालेले आणि अमेरिकन लेखकाचे आहे. आणि दुसरे असे कि, तब्बल तीस वर्षांपूर्वी हे पुस्तक प्रकाशित झाले असले तरी हा विषय आपण चिरायू म्हणू शकतो. पुस्तकाचे नाव वाचून पुस्तकाचा विषय नेमका कुठला असेल हा कयास करणे कठीण आहे. पुस्तक पक्ष्यांबद्दल नाहीं! लेखन कसे करावे हा पुस्तकाचा विषय आहे. 'कदम कदम बढाये जा' या वाक्प्रचाराचे एका अर्थाने इंग्रजीत भाषांतर आपण 'बर्ड बाय बर्ड' असे करू शकतो. लेखन म्हणजे काय, लेखनाकडे कसे बघावे, लेखन का करायला हवे, लेखन का केल्या जाते अश्या विविध अंगांनी विचार करीत ऍन लमोट हा गहन विषय अगदी सोप्या पद्धतीने वाचकांसमोर उलगडतात. येथे त्यांच्या लेखनाचे कौतुक करायला हवे. शाळेतील शिक्षकाने एखादा विषय शिकवावा तश्या पद्धतीने एक एक पाऊल पुढे टाकीत मनातील विचारांना किंव्हा विषयाला लेखनकृती कशी द्यायची हे त्या शिकवितात. जरी विषय थोडा धीर-गंभीर असला तरी विनोदाचा आधार घेत ऍन लमोट वाचकांना लेखन करायला उद्युक्त करण्यात यशस्वी ठरतात. 

मनुष्य प्राण्याच्या कंठातून जेव्हापासून शब्दरुपी ध्वनी बाहेर पडू लागले तेंव्हापासून तो काही तरी लिहिण्याची धडपड करितो आहे. आपले विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायला लिहिलेले शब्द आवश्यक असतात. तसेच शब्दांचे आयुष्य मनुष्यपेक्षा नक्कीच अधिक असते. मनुष्याचे विचार, अनुभव, उपदेश, कल्पना इत्यादी जिवंत रहावे म्हणून अक्षर व शब्दांना प्रमाणबद्ध केल्या गेले आणि त्यातूनच भाषेचा उदय झाला. बोली भाषा आणि लिहण्याचे अक्षर याचे एकीकरण होऊन संस्कृतीचा उदय झाला. मग संस्कृतीचे जतन करायला नव-नवीन शब्द, वाक्यप्रचार, म्हणी इत्यादीचा उदय झाला आणि जगभरात विविध संस्कृती नांदायला लागल्यात. सनातन भारतीय संस्कृती या पायावर तर गेले हजारो वर्षे उभी आहे. बोलण्याचे आणि लिहिण्याचे एवढे महत्व असतांना आणि मनुष्य जातील एवढा अनुभव या क्षेत्रात असतांना समस्त मनुष्य जात लिहिण्यात आणि बोलण्यात निष्णात असणार किंव्हा असायला हरकत नाहीं? 

अर्थात असे नक्कीच नाहीं. बडबड करणे म्हणजे बोलणे नाहीं आणि लिहिल्या गेलेले लेखन नाहीं. बहुतांश बोललेले वायफळ आणि बाष्कळ असते! आणि आजच्या काळात बहुतांश लिहिल्या गेलेले नोकरी-धंद्या साठी असते. (सध्याच्या इराक देश असलेल्या भागात केलेल्या उत्खननात किमान पाच हजार वर्ष जुने दगडाचे 'टॅबलेट' सापडलेत. त्यात लिहिले होते त्याचा उलगडा करायला बरीच कष्ट लागलीत. शेवते कळले कि एका ग्राहकाने दुकानदाराविरुद्ध केलेली तक्रार या टॅबलेट मध्ये कोरली होती!) कारण लेखन - मग ते प्रासंगिक असो कि मनोगत किंव्हा ललित असो- हे फार कठीण काम आहे. शब्दांना नेमका असा आकार द्यायचा कि वाचणाऱ्यांना ते शब्द रोचक, अर्थपूर्ण वाटतील, किंव्हा खटपट करून शब्दांना गर्भित अर्थ प्राप्त करावा कि वाचकांना अभिप्रेत उमजेल. किंव्हा शब्दांमध्ये आपले अनुभव असे गुंफावे कि वाचणाऱ्यांना तो अनुभव आपलासा वाटेल. सूक्ष्म भावनांच्या उत्कटतेला शब्दांनी आकार देणे, प्रतिभेच्या उत्स्फूर्ततेला वाक्यांनी उत्तुंग बनविणे, हे काम सोपे नाहीं.  पण मग काय करायचे? लिहायची इच्छा आहे पण लिहिता येत नाहीं, कुठून 'श्री' करायचे हे कळत नाहीं, कुठे नेमके संपवायचे? कोणाबद्दल, कशाबद्दल, कुठल्या काळाबद्दल, कुठल्या घटनेबद्दल लिहायचे? हे कोडे काही केल्या  उमजत नाहीं. अश्या स्थितीत बर्ड बाय बर्ड पुस्तक हाताशी येते. 

लिहिता येत नाहीं माहिती आहे पण ते का, या प्रश्नाच्या  भानगडीत पडण्यापेक्षा, लिहायला कशी सुरुवात करायची या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हे पुस्तक आहे. पुस्तकाच्या लेखिका ऍन लमोट स्वतःच्या आयुष्यातील काही घटनांना गोवून आणि थोर-मोठ्या इंग्रजी लेखकांशी या विषयी केलेल्या संवादाद्वारे, लेखनाकडे नव्हे तर स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन पुस्तकाद्वारे देतात. लेखन हा गंभीर प्रकार नाहीं. अगदी जरी गंभीर विषयांवर लिहायचे असेल तरी! लेखन हा अनुभव हा स्वतःला आनंद देण्याचा, आनंदी ठेवण्याचा एक मार्ग आहे. हि एक कला आहे. आणि कलेचे पहिले लक्ष्य स्वानंद असते. अमूर्त विचारांना, भावनांना, कल्पनेला, एका स्वतः घडवलेल्या नवीन विश्वाचा आविष्कार करून वाचकांसमोर ठेवणे हि एक उपलब्धी याची जाणीव हे पुस्तक देते. या पुस्तकाचा सूर आणि स्वर एकूण आनंदी आहेत. हे पुस्तक वाचून लिहायला स्फूर्ती मिळते. लेखन हे जगण्यापेक्षा वेगळे नाहीं आणि त्यामुळे त्याच्याकडे घाबरून बघण्याची गरज नाहीं. छोटे छोटे टप्पे गाठून एकादी लघु-कथा आज आपल्या प्रत्येकात आहे. 

पुस्तकाची अनुक्रमणिका बघाल तर लांब आहे पण पुस्तकाचे पृष्ठसंख्या फार नाहीं. पुस्तकाचे चार मुख्य भाग आहे - १) Writing , २) The Writing Frame of Mind , ३) Help Along the way , ४) Publication  - and  Other  Reasons  to  Write .आणि पुढे हे चार मुख्य भाग अजून छोट्या छोट्या धड्यांमध्ये भागले आहे. लेखिका ऍन लमोट या अमेरिकेतील कॉलेजमध्ये सर्जनशील लेखन ( creative writing ) हा अभ्यासक्रम शिकवितात. त्यामुळे एका शिक्षकाच्या दृष्टिकोनातून त्यांनी पुस्तकाची मांडणी केली आहे. पण एका अभ्यासक्रमाप्रमाणे शिकून लिहिण्याचे ठरविले तरी लिहिण्याचा कुठला जादुई मंत्र नाहीं हे त्या लगेच स्पष्ट करतात. 

"I wish i had  a secret  i  could  let  you  in  on , some  formula  my father  passed to  me  in  a  whisper  just  before he  died , some  code  word  that  has  enabled  me  to  sit  at  my  desk  and  land  flights  of  creative  inspiration  like  an  air -traffic controller . But I don 't " 


त्यांच्या मते पुस्तक लिहिण्याची प्रक्रिया हि लिहूनच सुरु होते. कोंबडी पहिले कि अंड पहिले? कल्पना नाहीत तर लिहायचे कसे आणि लिहिले नाहीं तर कल्पना कुठून येणार? या भानगडीत पडण्यात,  याचा ऊहापोह करण्यात वेळ घालविण्यात फारसा अर्थ नाहीं. आधी लिहायला लागा, लिहिता लिहिता लिहिण्याची प्रगती होईल. सोबत सतत वाचा, वाचून वाचून लिहिण्याची संयुक्तता साधेल. खुर्चीवर बसून भिंतीकडे (किंव्हा आकाशाकडे!) बघून शब्द सुचत नाहीं, वाक्य जमून येत नाहीत, आणि कल्पना भराऱ्या घेत नाहीत. कल्पनेचे 'विलास' बांधायचे तर अक्षरशः दगड-धोंडे ढोहुन नेण्यासारखी ढोर मेहेनत करायला हवी. आता कल्पना विलासाचा पाय असो कि गोष्टीची बांधणी, सुरुवात नेहमी लहानच केलेली बारी. एकदम गोष्ट लिहिण्याचे धाडस होत नसेल तर गोष्ट थोडी बाजूला ठेवा आणि अनुभवाचा एकदा परिचछेद लिहा. हा अनुभव कुठलाही असू द्या. वैयक्तिक किंव्हा ऐकलेला. चित्र काढायच्या आधी वहीच्या मागल्या पानावर पेन्सिल ने काहीतरी हलकेच रेखाटल्या सारखे. बरं, काही तरी सखोल, तात्त्विक, किंव्हा शिकवून जाईल असे काही लिहिण्याची आवश्यकता नाहीं. सकाळी भाजी आणायला म्हणून निघालेल्या 'अहो' आणि 'अग' मधील 'सुखद' संवाद? घरून ऑफिस मध्ये जाण्याच्या प्रवास? त्यात नित्यनेमाने दिसणार, भेटणारी पात्रे? या नित्यनेमाच्या अनुभवांमध्ये इतके रंग आहेत. पुस्तकाच्या सुरुवातीचे धडे वाचून लिहायचा 'श्री' केला कि पुढच्या धड्यांमध्ये या साधारण अनुभवांना   गोष्टीत कसे रूपांतरित करता येईल हे शिकता येते. पात्रांना स्वभावगुण कसे द्यावेत, परस्परसंवाद, भाषा कुठली वापरायची? कथानक कसे हवे? एक एक धडा वाचत गेलो कि रेखाचित्राची अजून एक रेघ आणि कथानकाचा अजून एक छटा रंगवीत येऊ शकते. 

पुस्तकातील हा धडा तर होतकरू लेखकाने त्याच्या सान्निध्याचा सूक्ष्म परीक्षण करायला शिकवितो. हे परीक्षण कसे करावे हा सुद्धा एक अभ्यास आहे आणि त्याचा सुद्धा सराव करायला हवा. अनेक थोर लेखक त्यांच्या घराचा, गावाचा, परिसराचा, लहानपणी त्यांच्या शेजाऱ्यांचा, नातेवाइकांचा किंवा मित्रांचा ठसा आपल्या लेखकात ठळकपणे उमटवतात. ग.दि. माडगूळकर त्यांच्या 'मंतरलेल्या दिवस' या आत्मचरित्रपर पुस्तकात या बद्दल म्हणतात " अनुभव आणि अभ्यास यांच्या जोरावर साहित्यकार कितीही प्रगत झाला, तरी बाल्यातील संस्कार व ऋणानुबंध त्याच्या साहित्यकृतीत वारंवार डोकावत रहातात. माझं खेडेगाव, त्या खेड्यातील चालीरीती; तिथलं वातावरण, तिथला झाड-झाडोरा, माती-पाषाण, असेच माझ्या स्मरणात टिकून राहिले आहेत. खेड्यातल्या माणसांच्या आकृती आणि स्वभावरेखाई अशाच मनावर ठासून गेल्या आहेत. नाव वाङ्मय लिहीत असताना त्यातील अनेक दुर्श्य, अनेक प्रसंग आणि अनेक स्वभावच्छटा माझ्या लिखाणात येतात; सदैव येतात." (मोहोरलेला कडुलिंब, मंतरलेले दिवस )

वी.एस. नायपॉल हे इंग्रजी भाषेतील दिग्गज लेखक होऊन गेलेत. सन २००१ चे त्यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. हे मूळ भारतीय रक्ताचे असलेत तरी त्यांचे पूर्वज काही पिढयांपूर्वी सध्या ज्याला वेस्ट-इंडिज म्हणतो या देशात स्थलांतरित झाले होते. तिथल्या छोट्याश्या गावात नायपॉल यांचा जन्म झाला. त्यांनी पुढे त्यांच्या जन्म इंग्लंड मध्ये काढला तरी आयुष्याची पहिली १८-१९ वर्षे, जी वेस्ट-इंडिज मध्ये कंठिलीत, त्याचे पडसाद त्यांच्या लिखाणात नेहमीच दिसतात. त्यांचे मिगुल स्ट्रीट (Miguel Street ) हे पहिले लघु-कथांचा प्रकाशित संच अतिशय प्रसिद्ध झाला. या पुस्तकातील पहिली लघु कथा कशी सुचली याबद्दल ते अनेकदा बोलले आहेत. एका दुपारी ते लंडन मध्ये त्यांच्या टाईप-रायटर वर शून्यात बघत बसले होते. काय लिहायचे, कशावर लिहायचे याचा विचार करीत. अचानक, शून्यात, त्यांना त्यांच्या लहानपणाचे घर दिसले, त्यात त्यांचे वडील बसलेले होते आणि समोरून त्यांचा शेजारी 'बोगार्ट' जात होता. त्यांच्या वडिलांनी त्या बोगार्ट ला हाक मारली: 

"‘Every morning when he got up Hat would sit on the banister of his back verandah and shout across, “What happening there, Bogart?”‘ 

हा संवाद त्यांनी लिहिलेल्या पहिल्या लघु-कथेची सुरुवात ठरली. 

पुस्तक आणि त्यातील धडे फक्त लिहायला मदत करून थांबतात असे नाहीं. कथानकाच्या विविध अंतरंग कसे शोधायचेत, आणि मग रंगवायचेत हे पण ऍन लमोट समजावतात. पुस्तकात "Moral Point Of View " हा धडा मला फार आवडला. 

"To be a good writer, you not only have to write a great deal but you have to care. You do not have to have a complicated moral philosophy. But a writer always tries, I think, to be a part of the solution. " (पृष्ठ १००)

गोष्ट असेल तर विषयाबद्दल, कथानकाबद्दल, घटनेबद्दल, पात्रांबद्दल आणि मनोगत असेल तर स्वतःबद्दल, आपुलकी आणि जिव्हाळा हवा. कोरड्या मनाने शब्दांचा अभिषेक चढविणे कठीण आहे. बहुधा अशक्य आहे. वाचकांना कळत-नकळत ती त्रयस्थता नक्कीच जाणवेल. असे होऊ शकते कि गोष्ट अचानक असे वळण घेईल कि रंगवलेल्या पात्रांची भूमिका पटणार नाहीं. रंग विस्कटलेल्या सारखा वाटेल पण खऱ्यात सुद्धा सीमारेषेच्या चौकटीत आयुष्य बसत नाहीं तर गोष्टींची पात्रे त्याला अपवाद कसा ठरणार? पण जिव्हाळा कायम ठेवला तर गोष्ट वाचकांच्या अंतरंगाचा ठाव घेईल. पु.ल. देशपांडे यांच्या 'व्यक्ती आणि वल्ली' पुस्तकातील व्यक्ती आणि वल्ली हे याचे उत्तम उदाहरण आहे. पुस्तकातील पात्रे खऱ्या लोकांवर आधारित आहेत पण खरी नाहीं. आपण आपल्या पोराला अभिमानाने पाहुण्यांसमोर बोलावितो त्याच प्रेमाने, जिव्हाळ्याने प्रत्येक पात्र पु.ल. वाचकांसमोर उभी करतात. सखाराम गटणे आणि अंतू बर्वे हि पात्रे विरोधाभासी आणि जणू वेगळ्या विश्वात वावरतात. पण पु. ल. दोघांवर तेवढेच प्रेम करतात. आणि हे प्रेम वाचकांच्या हृदयी कळते. सन १९६६ साली प्रकाशित झालेले हे पुस्तक अजूनही वाचकवृंद घरी संग्रही ठेवतो.

"If people cannot write well, they cannot think well, and if they cannot think well, others will do their thinking for them."   - ओरवेल

समाज प्रबोधन, समाजउत्थान करण्याचा लेखनासारखा मार्ग नाहीं. फक्त गेल्या शंभर-दीडशे वर्षांचा इतिहास बघितला तरी सगळ्या मोठं-मोठाल्या बदलांचा किंव्हा क्रांत्यांचे मूळ लिहिलेले पुस्तकच असेल. बर, क्रान्ति वगैरेच्या भानगडीत नाहीं पडला तरी लेखनाचे महत्व कमी होत नाहीं. स्वतःची स्वतःला ओळख होण्याचा लेखन एक उत्तम मार्ग आहे.  

पुस्तकात पुढे प्रकाशनाबद्दल हि धडा आहे. हे पुस्तक तब्बल तीस वर्षांपूर्वी प्रकाशित झाले होते. तेंव्हा पुस्तकांद्वारेच लेखन होत. आणि त्यासाठी प्रकाशनगृह हा एकाच मार्ग होता. पण गेल्या तीन दशकात परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे. प्रकाशनगृहे आहेत आणि लागतील पण आता प्रकाशाची विविध माध्यमे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे लिहिलेले वाचकांपर्यंत पोचवायला अधिक सोपे झाले आहे. पण सोपे असले किंव्हा अगदी स्वतःच्या खर्चाणे प्रकाशन करण्याची इच्छा असेल, कुठल्याही तऱ्हेचे प्रकाशन करणे हे अंतिम ध्येय असायला नको. ते एक एवढेच लक्ष्य नको. लेखाच्या सुरुवातीला म्हणालो तसे, लेखन हि नवीन अविष्काराची अनुभूती देणारा मार्ग आहे. देवत्व प्राप्त ना करीत देव बनून नवीन कल्पना सृष्टी रचण्याचा एक सहज मार्ग आहे.  आणि प्रकाशित नाही झाले तरी हे शक्ती आपल्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाहीं. आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आकाशात ध्रुव ताऱ्याचे  अढळ स्थान आपल्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाहीं. 

लेखन नेहमी गंभीर असावे असे काही आवश्यक नाहीं. लेखन बोधीप्राय हवे असेही नाहीं. लेखन जगाकडे बघण्याचा वैयक्तिक दृष्टीकोण आहे. खूपदा बोलून आपल्याला दिसत असलेले जग दुसऱ्यांना दर्शवू शकत नाहीं. अश्यावेळेस लेखणी (किंव्हा की-बोर्ड!) आपला मित्र ठरतो. लेखनाद्वारे किंव्हा गोष्टींद्वारे आपण आपल्या शेजार-पाजारच्या जगाला वेगळ्या रंगाने रंगवू शकतो. कोण म्हणत कि जसा रंग दिसतो तोच गोष्टीला द्यायला हवा? पाहिजे तो रंगवू शकतो. आकाश निळ्याचे हिरवे करू शकतो, चांगल्याला वाईट, आणि वाईटाला चांगला करू शकतो. किंव्हा चांगल्या वाईटाचा दोन्ही छटा एकाच व्यक्तिमत्वात ओतू शकतो. आकाश ठेंगणे ठरेल आपल्या कल्पनेच्या भरारी पुढे. अतर्क्य असे काहीच नाहीं इथे. खऱ्या आयुष्यात असे स्वातंत्र्य कधीच मिळायचे नाहीं. आणि हे सगळे करण्यात जो निखळ आनंद मिळेल तो फक्त आपलाच! 

पुस्तकाचे माहात्म्य आणि पुस्तकाचे यश असे कि वाचक काही तरी लिहायला उद्युक्त होतो. लिहायला प्रयोजनाची आवश्यकता नाहीं. बाळपणी चालायचे शिकायला प्रयोजन हवे होते का? बोलायला? तसेच लिहिण्याचे आहे. लिहायला लागायचे. सराव करायचा. एकदम उठून कोणी गीत-रामायण लिहू शकत नाहीं (माडगूळकरांनी गीत-रामायण लिहिले तेंव्हा त्यांना तब्बल वीस वर्षांचा विविध-रंगी लेखनाचा अनुभव होता.) पण कुठून तरी सुरुवात करायलाच हवी आणि त्यासाठी हे पुस्तक सगळ्यांच्या संग्रही नक्कीच हवे. 

--

पुस्तक परिचय

'बर्ड बाय बर्ड' ('Bird By Bird ')   

लेखिका  - ऍन लमोट (Ann Lamott)

प्रकाशन दिनांक  - सप्टेंबर १, १९९५, 

पृष्ठ संख्या - २५६ 

ISBN-13 ‏ : ‎ 978-०३८५४८००१७

ऍमेझॉन ची लिंक -  https://www.amazon.in/Bird-Some-Instructions-Writing-Life/dp/०३८५४८००१६


11/24/24

महाराष्ट्र कुणाचा?...जनता जनार्दनाचा!


या मथळ्याचा पहिला लेख मी २०१४ ला लिहिला होता. तेंव्हाचे भाजप आणि मूळ शिवसेनेतील द्वंद्व आणि त्याचा काँग्रेसला आणि श्री पवार यांना होणाऱ्या फायद्याची शक्यता हा त्या लेखाचा सूर होता. जनतेच्या कृपेने तसे झाले नाहीं. आणि भाजप आणि मूळ शिवसेना यांचे सरकार आले. पुढे श्री फडणवीस यांनी मोठ्या शर्थीने राज्य राखले आणि जोपासले. सन २०१९ च्या लोकसभेत भाजप ची ओटी मराठी जनतेने काठोकाठ भरली. त्या वर्षीच्याच विधानसभेत पुन्हा भाजप आणि मूळ सेनेचे सरकार येणार हे नक्की होते. पण नेमके तेंव्हाच श्री फडणवीस यांच्या कानात वारे गेले. आणि भाजप ची अक्कल चरायला गेली. पण स्वतःसाठी त्यांनी कमी जागा ठेऊन भाजप ने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. जणू ठेचकाळयाला धोंडे भाजप आणि श्री फडणवीस शोधत होते. तरी जनतेने त्यांना तब्बल १२२ जागा दिल्यात. मूळ सेनेचे मुख्य श्री ठाकरे यांनी घातलेला गोंधळ बघता, भाजप वेळेत हि गाठ कापून मोकळे होऊन २०० होऊन अधिक जागांवर  लढले असते तर भाजप ला स्वतःच्या बळावरच पूर्ण बहुमत मिळाले असते. श्री ठाकरे आणि 'सेना धुरंधर' श्री संजय राऊत यांनी पायाखालून पाट काढे पर्यंत भाजप ने वाट बघितली.  आता अंगठे ठेचकाळलेत तो पर्यंत ठीक होत पण  भाजप आणि श्री फडणवीस यांनी ठरवले कि धोंडे शोधून त्यावर डोकी आपटायचीत. ३ दिवसांसाठी श्री अजित पवार यांचा पदर धरून त्यांनी घाई-घाईत लग्न लावण्याचा प्रयत्न केला. लग्नातली पोरगी कधीच पळून गेली आणि घोड्यावर बसलेले भाजप मात्र त्या नंतर लग्नाचा हिशोब चुकवीत बसलेत. मग भाजप आणि श्री फडणवीस यांनी शक्कल लढवली आणि मूळ सेनेच्या बुरुजांखाली सुरुंग लावले. आणि श्री एकनाथ शिंदे यांना पुढे करून पुन्हा सत्तारूढ झालेत. शांतपणे राज्य करून, विकासाची दारे उघडणे सोडून, भाजप आणि श्री फडणवीस यांनी श्री अजित पवार यांच्यासाठी दारे उघडावीत,  या शंखपणाला काय म्हणायचे? त्यांच्या या कृतीचा उपयोग नेमका कोणाला झाला हे मला अजूनही उमगले नाहीं. सन २०१९ च्या निवडणुकीत श्री पवार आणि त्यांच्या पक्षाला सगळ्यात कमी जागा आणि मते मिळाली असतांना बुडत्याला हातची वल्ही देऊन हाताने होडी ढकलण्यात भाजप ला नेमके काय मिळाले? 

गेल्या दशकातील आणि मुख्य करून २०१९ च्या या महाराष्ट्रातील राजकारणाचा हा संक्षिप्त आढावा देण्यामागचे कारण असे कि या सगळ्या कोलांट्या उड्यात जनतेचे नुकसान झाले. जनतेने आपला कौल २०१४ पासून एकाच पक्षाला देत असतांना त्यांनी (म्हणजे भाजप आणि श्री फडणवीस) एका पाठोपाठ एक नव-नवीन राजकीय चुका कराव्यात हि खेदाची बाब आहे. आणि म्हणूनच या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि श्री फडणवीस यांच्या डोक्यावर जनतेने सणसणीत टोला हाणला असे म्हणायला हरकत नाहीं.  

राज्यात गेले पाच वर्षे राजकीय अस्थिरता होती त्याचे पडसाद आणि प्रतिसाद राज्यकारभार आणि प्रशासनावर नक्कीच पडले असणार. केवळ राजकीय किंव्हा निव्वळ निवडणुकीसाठी फायदा होईल अशी पावले न उचलता दूरदृष्टीने राज्य विकासासाठी पावले उचलल्या गेल्याची किती शक्यता आहे? आणि असे आवश्यक निर्णय घेतल्या गेले नसतील कारण त्या साठी फुरसत नसेल किंव्हा लक्ष फक्त येत्या निवडणुकांकडेच असेल तर या साठी जवाबदार कोण? याचे उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे.  

अशी प्राप्त परिस्थिती असली तरी भाजप आणि श्री फडणवीस हेच महाराष्ट्रासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे हे पण तेवढेच सत्य आहे. श्री फडणवीस हे एक अनुभवी राजकारणी आहेतच पण उत्तम राज्यकारभारी पण आहेत. त्यांना प्रशासनाचा दोन दशकांचा अनुभव आहे. नागपूरचे ते सगळ्यात तरुण महापौर होते. मग गेले पंचवीस वर्ष ते महाराष्ट्र विधानसभेत आमदार आहेत. त्यांनी विरोधी पक्ष नेते हे पद फार उत्तमरीत्या निभावले होते आणि महाराष्ट्राच्या इतिहासात श्री वसंतराव नाईक यांच्या व्यतिरिक्त संपूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रीपद टिकविणारे दुसरेच मुख्यमंत्री आहेत. 

आता मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. इतका अनुभव असतांना आणि तिसऱ्यांदा जनतेचा कौल मिळाला असतांना भाजप ने श्री फडणवीस यांना पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करून जनतेवर कृपा करावी. अडीच वर्ष एक आणि मग दुसरा इत्यादी दिवाळखोरी विचार पक्षाने करू नये. श्री फडणवीस यांच्या सारखा अनुभवी राज्यकर्त्यांची राज्याला फार आवश्यकता आहे. पाच वर्षे आता फक्त विकास एवढाच मुद्दा समोर ठेऊन भाजप आणि श्री फडणवीस राज्य करतील हि आशा. 

11/2/24

पु. ल. - एक साठा (भाग २)

(या लेखाचे दोन भाग होतील असे मला अपेक्षित नव्हते. पण अजून पुस्तकातील पु.ल. च्या निदान अजून दोन लेखांवर लिहणे आवश्यक आहे असे वाटते. एकाच रुंदीत लांब लांब लिहीत गेले तर वाचायला या माध्यमात कठीण जाते म्हणून मी पुढील लेख दुसऱ्या भागात प्रकाशित करीत आहे. पहिला भाग आपल्याला इथे वाचता येईल.) 

पु.ल. च्या या लेखनात दोन प्रकारचे आढळतात. पहिला प्रकार ज्यात त्यांनी विचार हे सांप्रत परिस्थितीवर भाष्य, विनोद आणि स्वतःचे त्या विषयावरील विचार आणि समाजासाठी लिहिलेले लेखन. आणि दुसरा प्रकार हा आत्मा-प्रवास आणि मनोगत याचे मिश्रण. "राहून गेलेल्या गोष्टी' हा लेख त्यांचा वैयक्तिक लेख म्हणता येईल. 

"माणसाचा वय जसजसं वाढत जात तसतसं त्याला आपल्या हातून कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या, यापेक्षा कुठल्या राहून गेल्या याचीच अधिक चुटपुट लागून राहते. सर्वांच्याच बाबतीत असं असेल अस नाहीं मी म्हणत. पण आयुष्याची गाडी उताराला लागते, नवं वळण काय घ्यावं ते सर्वस्वी आपल्या हातात राहत नाहीं. आता कासर आपल्या एकट्याच्याच हाती नाहीं हे ध्यानी येतं, आणि गोष्ट राहून गेली असं फार वेळा वाटायला लागत" 

त्यांना लहान मुलांना - पोरं-टोरांना, संगीत शिकवायचा राहून गेला हे मला अनपेक्षित होते. पु. ल हे साहित्यिक नंतर संगीतवेडे आधी होते त्यामुळे त्यांना असे वाटणे याचे आश्चर्य वाटायला नको. पण या गोष्टीचा त्यांना खेद वाटणे यात त्यांच्या मूळ स्वभावगुणांची नव्याने ओळख होते. खेद हा प्रकार हा नेहमी उपलब्धी, काय मिळवायचे राहिले, अधिक पैसे, चांगली नोकरी, आणि अजून घरे (आजच्या भाषेत रिअल इस्टेट) इत्यादी दृष्टिकोनातूनच बहुतांश प्रकट होतो. येथे पु.ल. यांनी वैयक्तिक दृष्ट्या त्यांच्याकडून काय द्यायचे राहिले याचा खेद व्यक्त केला आहे. गाणी शिकवून, मुलांकडून गाववून, संगीताचा आनंद पसरवून त्यांना लहान मुलांना आनंदित करता आले असते. ते राहिले. 

कॉलेज मध्ये असल्यापासून मला चित्रपट बघण्याचा नाद जडला. बहुतेक मी इंग्रजी चित्रपट तेंव्हा बघत असे पण एकूण चांगला चित्रपट बघायला मला फार आवडते. पु.ल. च्या भाषेत मी एक फुकटाचा रसिक आहे असे म्हणता येईल. पु.ल. नी या विषावर "निर्माता, प्रेक्षक आणि टीकाकार" हा फार मार्मिक निबंध लिहिला आहे. 

"चित्रपट हे एक भावना आणि त्यामुळं आचारविचार, जीवनाविषयक दृष्टिकोन ह्यावर जबरदस्त आघात करू शकणार विलक्षण प्रभावी असं साधन आहे. ती एक शक्ती आहे. आणि या शक्तीचा वापर केवळ स्वार्थी हेतूनं केला तर एक सामाजिक घटक म्हणून आपण केवढं पाप करत आहोत याची जाणीव जर नसेल तर काय भयानक परिणाम होतात याची उदाहरण नव्यानं सांगायला हवीत असं नाहीं."   

हा निबंध कुठल्या साली छापल्या गेला आहे याची माहिती पुस्तकात दिलेली नाही पण तो आजच्या काळातही तंतोतंत लागू होतो. या निबंधावर एक स्वतंत्र लेख लिहायला हवा. किंव्हा हा निबंध जश्याच्या-तसा लिहून सगळीकडे पुन्हा प्रकाशित करायला हवा. पु. ल. परखड आहेत पण ते तळमळीने लिहीत आहे. पु. ल. स्वतः कलाकार आणि अभिनेता होतेच पण ते मराठी चित्रपट सृष्टीचे सभासद हि होते. पण कधी त्या क्षेत्रातून रोजी-रोटी कमावली असली तरी त्यांचा प्रामाणिकपणा नेहमी सत्यासाठी होतं. आणि चित्रपट क्षेत्राचे समाजावरील परिणामाची परिस्थिती तेंव्हा, आणि आजहि दारुण आहे. अंग दाखविले कि लोक येणार याच भ्रमात हिंदी चित्रपट सृष्टी आज काल वावरते. काहीही करून लोकांनी तिकिटे विकत घेतली म्हणजे झाले मग त्यासाठी कलेचीच आहुती दिली तरी चालेल. 

"जीवनाकडे सदैव गंभीर दृष्टीनं पाहायला हवं, असं मुळीच नाहीं. अत्यंत आनंदाने पाहावं, हसावं, खेळावं, नाचावं, गाव. परंतु हे करण्यात जीवन अधिक समृद्ध करण हा हेतू असावा. रस्त्यात केळीची साल फेकून कुणाचा तरी पाय घसरून तो आदळला तरीही आनंदानं खिदळणारी मंडळी असतात. त्या आनंदात सुबुद्ध माणूस सहभागी होऊ शकत नाहीं. आपल्याला त्या मंडळींचा राग येतो. तीच गत चित्रपटाची आहे. प्रेमाला विरोध नाहीं; त्यातून वखवख दिसू नये. नृत्यात आनंद आहे; परंतु त्यातून गतीच्या विविधतेचा साक्षात्कार व्हावा, देहाचं प्राणिभाव जागवणारी दर्शन नसावं एवढच"   

चित्रपट निर्मिती हे काही सामाज-सुधारणेचे काम नाहीं हे पण पु. ल. मान्य करितात. पैसे कमवावा लागणारच आणि कमवायलाही हवाच पण याचा अर्थ चित्रपट किंव्हा निर्माता, दिग्दर्शकाने समाजातील स्वतःचे स्थान, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्यांची समाजासाठीची कर्तव्ये विसरून चालणार नाहीं. कारण याचे दुष्परिणाम त्यांच्या स्वतःच्या घरी पण जाणवतील. पु. ल. लेखात पुढे टीकाकारांना हि धारेवर घेतात. मला वाटत कि त्यांच्या टीकाकारांकडून काही अपेक्षा होत्या. आजच्या काळात ते असते तर त्यांनी बहुधा लेखातील हा भाग खोडून काढला असता. कारण आता टीकाकार फार कमी उरले आहेत. जे आहेत त्यांना प्रसिद्धी नाहीं आणि ज्यांना प्रसिद्धी आहे ते टीकाकार नाहीं, ते राजाच्या दरबारातील भाट आहेत. 

"चोखंदळपण कलावंतांची निवड करणाऱ्या निर्मात्यांनी, कलेचं दैवी देणं लाभलेल्या कलाकारांनी, लेखकांनी, गायकांनी, नटांनी आणि नटींनी आणि व्यासंगी टीकारानी हा आत्म्याचा सौदा करून समाजाला सैतानाच्या राज्यात नेऊन सोडायचा कि काय याचा विचार करायचा आहे" 

पुस्तकातील अजून एक लेख मला आवडला म्हणजे  "श्रीयुत दैववादी"

"देवावर विश्वास आहे असं म्हणताना कुठं तरी आपला जितका विश्वास असायला हवा तितका आहे कि नाहीं, याची खात्री नसल्यामुळं कि काय कोण जाणे, पण माणसं देवाच्या जोडीला हक्काचा दैवही घेतात"

आपला समाज शतकांपासून देव आणि दैवत तळ्यात-मळ्यात खेळतो आहे. पु.ल. यांनी देवावर विश्वास ठेवायला नकार दिला नाहीं पण दैवाचे वाभाडे काढले आहेत. दैवावर विश्वास ठेऊन हातावर हात ठेऊन समाज बसला असता तर गेल्या शंभर दोनशे वर्षातील इतकी प्रगती झालीच नसती असे पु.ल. म्हणतात. पण असे सांगतांना पु. ल. पुढे म्हणतात  "माणसाच्या हातात सार काही नाहीं हे तर खरंच आहे; पण माणसाच्या हातात काहीच नाहीं हे काही खरं नाहीं"  थोडक्यात दैव वगैरे फालतू विचार करण्यापेक्षा समोर आलेल्या परिस्थितीस सामना करून पुढे पुढे मार्ग काढीत जाणे हेच उचित आहे. "ह्या लोकांनी देवासमोर कायमच भिक्षापात्र धरलेलं आहे. दोन्ही हात भिक्षापात्र धरण्यात गुंतलेल्या माणसं कर्तृत्वासाठी तिसरा हात कुठला आणायचा? हा केवळ दुबळेपणा झाला." यावर प्रतिवाद नाहीं.     

मनाला आधार म्हणून बहुतांश जन देवावर विश्वास ठेवतात. आणि जीवनातील अगम्य प्रकार बघून स्तंभित होऊन माणूस अखेर दैवाचे पाय धरतो असे मला वाटते. पण कधी कधी असेही वाटते कि असुदे बापुड्यांना दैववादी. सगळेच हुशार, इंजिनीअर, वैज्ञानिक नसतात. सामान्य आणि अती-सामान्य या कक्षेत बहुतांश जन जीवन कंठितात. या लोकांनी दैववादी होऊन समाजाचे तेवढे नुकसान होत नाहीं. आणि त्यांचा आयुष्य सुसह्य होतो. पण हा असला विचार थोडा निराशावादी आहे यात वाद नाहीं.  

हे पुस्तक म्हणजे पु. ल यांच्या लेख आणि भाषण संकलनाचा हा पहिला भाग आहे. दुसरा भाग मला बहुधा लौकरच वाचायला मिळेल. पहिल्या भागाच्या सुरुवातीला म्हंटले तसे कि त्यांचे काही विषयांवरचे विचार आणि लेखन आजच्या परिस्थितीला चपखल बसते. त्यांचे भाषेवरचे प्रभुत्व, वाचकांशी संवाद सांधण्याची कला हि सर्वज्ञात आहेच. त्यांचा प्रज्ञावाद, विचारांची निर्भीडता, कुठल्याही युक्तिवादाशी असलेला अ-पक्षपात, समाजाचा बद्दलची तळमळ आणि जिव्हाळा पण तरीही सत्याच्या सतत शोध प्रकर्षाने जाणवतो. 

या लेखांमधून  पु ल. यांचे जेवढे महात्म्य आहे तेवढेच आपल्या सद्य समाजाची कमतरता आहे. शिक्षण वाढले कि अंधश्रद्धा कमी होतील, जात-जातींवरून कलह, वैषम्य दूर होईल, नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण देणे आणि घेणे सोपे होईल, समाजाचे सामंजस्य वाढेल इत्यादी कल्पना भ्रामक आहे हे प्रकर्षाने जाणवते. दंभ आणि दांभिकता दोन्ही झपाट्याने वाढते आहे, जणू ते भाऊ-भाऊच! श्रद्धेत अगतिकता आणि पूजेत अनिर्बंधता वाढते आहे. समृद्धी वाढते आहे पण त्यासोबत मानसिक अबलताहि वाढते आहे. अबलतेची नेमकी कारणे कळत नाहीत म्हणून दोषींच्या शोधात सगळे जणू असतात. सगळ्यांना हक्क हवेत पण जवाबदाऱ्या मुळीच नकोत. स्वातंत्र्योत्तर समाजाचे वय वाढते आहे पण हवी तितकी परिपक्वता दिसून येतं नाहीं या. समाज शिक्षित होतोय पण सुशिक्षित होत नाहींया. यात काही कमी असेल तर भविष्यात येणाऱ्या आर्टीफिशियल इंटेलिजन्स (A . I .) च्या जमान्यात तर खऱ्या-खोट्यातील सीमारेषा इतक्या अस्पष्ट आणि संदिग्ध होणार आहेत कि अगदी भले भले हि भाम्बावातील. सुशिक्षित होण्यासाठी शाळा-कॉलेजेस लागत नाहीं. त्यासाठी अक्षर ओळख लागत नाहीं. त्यासाठी मनाचे चक्षु उघडावे लागतात आणि तेंव्हाच सत-असत, चांगले-वाईट, श्रद्धा-अंधश्रद्धा, उचित-अनुचित, खरेपणा-बेरकेपणा यातील भेद कळेल. नाहीं तर पु. ल यांचे हे लेख अजून शंभर वर्षांनीही लागू होतच असतील. 

असो. 

पु.ल. हा लेख वाचून म्हणतील कि माझ्या लेखनाचे परीक्षण करतांना आपलेच शब्द वाचकांवर लादणे छान चाललंय! 

या पुस्तकाची प्रत मिळाली तर अवश्य वाचा हे विनंती. 

10/22/24

पु. ल. - एक ठेवा ( भाग १ )

पु. ल. देशपांडे हे एक थोर विनोदी लेखक होतेच पण त्याहून अधिक ते एक थोर विचारवंत होते. त्यांच्या विनोदी लेखनातून पण त्यांच्या विचारवंत व्यक्तिमत्वाची सावली सतत भासतेच पण तो विनासायस विनोद वाचण्यात त्यामागील त्यांचे संवेदनशील मन, जगण्यावर उत्कट प्रेम, मानवतेवरचा अढळ विश्वास, मनुष्याकडे सदैव सकारात्मक दृष्टीने बघण्याचा अट्टाहास आणि समाजाच्या दृष्टीने असलेली कर्तव्य दक्षतेकडे कानाडोळा होतो. थोर मोठ्यांच्या बाबतीत नेहमीच असे होते. त्यांच्या असामान्यत्वात आणि आपल्या अती-सामान्यत्वात इतकी तफावत असते कि त्या थोर माणसाच्या सगळ्या पैलूंकडे बघणे किंव्हा त्यांच्या सगळी पैलूंची कल्पना येणे अशक्य असते. पु. ल. यांचे लेखन, चित्रपटातील कामगिरी, अभिनय, त्यांची संगीताची ओढ, अश्या अनेक अंगांकडे बघण्यात धांदल उडते. 

कुठल्याही लेखकाची किंव्हा लेखनाची महती कशी ठरवायची? जे लेखन जेंव्हा प्रकाशित झाले तेंव्हा प्रसिद्ध झालेले असतेच पण कालानुरूप त्यातील ताजेपणा तसूभरही कमी होत नाहीं. काही दशके असो कि काही शतके असो पण नव-नवीन वाचकवृंद जणू काही नुकतेच प्रकाशित झाले आहे असल्या रसिकतेने किंव्हा प्रसन्नतेने त्या लेखनाचे स्वागत करतो तेंव्हा त्या लेखकाची किंव्हा लेखाचे महात्म्य निश्चित होते. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हजार वर्षांनी पण तेवढ्याच भक्तिभावाने वाचल्या जाते आहे आणि वाचणाऱ्यांचे जीवन मधुर करिते आहे. अर्थात अशी उदाहरणे कमी आढळतात. काळ आणि वेळ बदलला तरी वाचकाला लिहिलेल्या शब्दांशी आपुलकी वाटणे, त्यातील कल्पनेचा गोडवा किंव्हा विचारांची उत्तुंगता जाणवणे किंव्हा मांडलेल्या विचारांना काळाचे बंधन न जाणवता सध्या परिस्थितीतही ते लागू होण्याची प्रचिती येणे हे लेखकाचे खरे यश. जणू लेखकाला चिरंतन सत्य गवसले आहे आणि निव्वळ आपल्या साठी त्याने सोप्या भाषेत शब्दांकित केले आहे. 

पु. लं. चे लेखन या सगळ्या कसोटींवर यशस्वी ठरते. नुकतेच त्यांचे लेख, स्फुट लेखन, भाषणे इत्यादींचे संकलित पुस्तक वाचनात आले. नवीन काळात या तऱ्हेच्या लेखनाला ब्लॉग्स म्हटल्या गेले असते. त्यांनी अनेक विषयांना हाताळले आहे. यात काही विनोदी लेख पण आहेत पण त्यातील विनोद आत्ताच्या काळाच्या चवींना रुचणारा नाहीं असे मला वाटते. पण त्यांचे वैचारिक लेख मात्र अजूनहि पटतात आणि वाचणाऱ्यास विचान्मुख करितात. 

पुस्तकातील पहिला लेख गांधीजींवर आहे - "जेंव्हा माझं नातं एका सूर्याशी जडलं होतं...". आता गांधी हे व्यक्तिमत्व किंव्हा विचारधारा मराठी माणसाला पटल्याजोगी नाहीं. सन १६४६ चा तोरण्याची मुहूर्तमेढ असो कि सन १८५७ चा स्वातंत्र्यलढा असो, मराठी माणूस गेले तीनशे वर्षे आधी मुसलमान मग इंग्रजांशी अखंड झुंजत आला आहे. अश्या परिस्थिती मुस्लिम धार्जिणे धोरणे किंव्हा इंग्रजांशी प्रेमाचे संबंध, दोन्ही पचायला जड आहे. पण गांधींजींमध्ये काही तरी होते कि सन १९३० नंतर भारत त्यांच्या मागे उभा राहिला. पु. ल. या लेखात गांधी-माहात्म्य गात नाहीत, पण एका त्रयस्थ दृष्टिकोनातून गांधी आणि गांधी विचारांची मीमांसा करितात. 

"आपल्याला न पटलेल्या गोष्टींविषयी विरोध नोंदविणे हे वास्तविक गांधींच्याच विचारसरणीला धरून आहे. फक्त विरोधात विनयची कास सोडू नये हा गांधींच्या विचाराचा धागा असल्या विरोधकांना रुचला नसावा" या पुढे पु.ल म्हणतात:

"मतभेद नोंदवणं आणि असहिष्णुता बाळगणं यातला मुख्य फरक कुठला असावा याचा मी विचार करायला लागलो. मतभेद व्यक्त करणारा माणूस एका विचाराच्या जागी दुसरा विचार आणू इच्छितो, आणि असहिष्णू माणूस विचार नष्ट करता येत नाहीं हे दिसल्यावर विचार मांडणाऱ्या व्यक्तीला नष्ट करू इच्छितो" 

तुम्हाला गांधी पटो वा न पटो पण लेख वाचून त्यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात नक्कीच बदल होईल. गांधींच्या विचारधारेला विरोध करणारे त्यांच्या काळातही कमी नव्हते पण तरी १९३० च्या दशका नंतर त्यांचे वलय वाढत गेले, ते का? 

"गांधींना ज्या काळात खादीच सूत्र सापडलं त्या काळात, त्या सूट काढण्याच्या क्रियेला अगदी तपाचरणाचं सामर्थ्य आलं होत' कारण या क्रियेमाग व्रताची भावना होती. व्रती माणसाला अनेक पथ्य पाळावी लागतात. धैर्यानं अनेक गोष्टींना नकार द्यावा लागतो. किंबहुना, सामर्थ्याची उपासना स्वीकारण्यापेक्षा मन:पूत नकारातून होत असते. अशा जीवासाधनेला काही तंत्राचरणही करावं लागत. तास पहिला तर पंचपात्रीभर पाणी काय गतकं पिऊन टाकता येत नाहीं? मग "केशवाय नमः, नारायणाय नमः" असं म्हणत आचमन कशाला घ्यायला हवीत? गिरणीत धडाधड कापड विणलं जात असतांना हि सावकाश सावकाश विणली जाणारी खादी कशाला? पण आचमन म्हणजे तहान भागवण्यासाठी पाणी पिणं नव्हे; आपण व्रतबद्ध आहोत याची नित्य जाणीव करून देणार हे एक तंत्र असतं. पण ह्या मंत्र-तंत्रमागची ध्येयनिष्ठा, सात्विक व्रताची प्रेरणा नष्ट झाली, कि ढोंगाचा जन्म होतो, टिळेमाळे उरतात, अंतरीचा उमाळा नाहीसा होतो" 

एकाच परिच्छेदात पु. ल. यांनी गांधींच्या यशामागचे कारण आणि त्यांच्या जीवनकाळातच सुरु झालेल्या त्यांच्या गांधीवादाचा सपशेल पराभावाचे कारण, हे दोन्ही सुरेख मांडले आहे. पु. ल. गांधीवाद पटवून द्यायला निघाले नाहीत. तो उद्देश्य तरी मला या निबंधात जाणवला नाहीं पण नावडलेल्या किंव्हा न पटलेलेल्या धुत्कारणे सोपे आहे म्हणून कवटाळायाला हवे असे नाहीं. अपेक्षित आहे तो तत्वशुद्ध विचार करण्याचे धाडस. 

विचार करण्याची एक प्रक्रिया असते, विषय कुठलाही असो. धसक-फरक करीत, बेताल शब्दांना  हाताशी घेऊन उद्दाम आणि प्रक्षोभक वाक्यांच्या क्षेपणास्त्र चालवीत कुठल्या विषयावर लिहिणे सोपे आहे. पण स्वतःला त्रयस्थ आसनावर बसून समोर घडत असलेल्या किंव्हा घडलेल्या घटनांचा स्पष्ट विचार करणे सोपे नाहीं. पु. ल. यांना नेमके हे जमले आहे. 

या पुस्तकातील सगळेच लेख किंव्हा विनोदी कथा-निबंध कालानुरूप पक्व झालेत असे नाहीं. पण त्यातला खुसखुशीत पण अजून ताजा आहे. तसेच विनोदी लिहीत, वातावरण हलके करीत असतांना पु. ल अचानक एखादा धीर-गंभीर मुद्दा साळसूदपणे भिरकावतात. हसता-हसता एकदम वाचक स्तब्ध होतो. त्यांच्या "विनोदी लेखकाची दुःखं" या निबंधाचा शेवट अचानक गंभीर होतो. 

"तरीही "लोकांना मला हसवावस का वाटतं?" ह्या प्रश्नच उत्तर, "रडवावंसं वाटत नाहीं म्हणून" एवढच आहे. रडण्यासारखं खूप असलेल्या जगात ते रड थोडा कमी करता आला तर पाहावं एवढाच उद्देश. मात्र हे सार करतांना हसवणारा लेखक अनेकदा आतून उमटणारं कसलस ते रडू आवरत हसवत असतो, हे मात्र लोक विसरतात. विनोदी लेखकाचं सर्वात मोठं दुःखं आहे ते हे"  

"रसिक मंडळी - एक उच्छाद" हा लेख मला फार आवडला. खरं सांगायचं तर हा लेख आपल्या सारख्यांना लागू होत नाहीं. आपल्या १०० पैकी ९९ लोकांना रसिक नाहीं. पु. ल. केवळ साहित्यिक नव्हते ते आपण ज्यांना आता सेलिब्रिटी म्हणतो तसे ५०, ६० च्या दशकातील ते सेइब्रिटी होते. त्यांचा लेख हा कलेचा आस्वाद घेण्याचे आव्हान होते. पण त्यांचा लेख आजच्या काळात वेगळ्या कारणासाठी साठी लागू होतो कारण 'उचलली जीभ लावली टाळ्याला' याचा ऊत आत्ताच्या काळात आलेला आहे. सोशल मीडिया मुळे प्रत्येक गणू- गंपू  आपल्या मतांच्या पिंक टाकीत हिंडत असतो. पात्रता काय तर फोन विकत घेऊ शकतो. मत प्रत्येकाला हवे पण मत प्रदर्शन करणे हा हक्क नाहीं तो मिळविलेला मान आहे. चर्चा चालेल पण ठाम पणे मत मांडायला अधिकार प्राप्त करावा लागतो. आणि सतत प्रत्येक घटनेवर, वस्तूवर, कलेवर, माणसावर मत प्रदर्शन करणे धोकादायक आहे. कारण त्यामुळे मनात नेहमी विचारांऐवजी शब्दांची धांदल असते कि यावर मी काय मत देऊ. मनाची तृप्ती कमी होते, मिळणारे सुख अंगाला लागत नाहीं. 

"साहित्य-संगीत-कलाविहीन माणूस हा शेपूट किंव्हा वशिंड नसलेला साक्षात पशू आहे असा कोण्या सुभाषितकारांनी म्हणून घोसाळी करून ठेवला आहे. समाज, असा पशू तर काय बिघडलं? पशू दुःखी असतात म्हणून कोणी सांगितलं? चिखलात पडलेलं डुक्कर उलट माणसाकडे "लेको, तुम्हाला नाही कळणार ह्या चिखलात लोळण्याचा मजा!" अश्या ऐटीत पाहत असतं.आपण उगीच त्यांना बिचार्याला चिखलात लोळावं लागत म्हणून हळहळतो. डुकरांची भाषा आपल्याला कुठं कळते? त्यांच्यातसुद्धा वयोवृद्ध डुक्कर तरुण डुकरांना "अरे, आमच्या वेळचा चिखल आता ह्या तुमच्या सिमेंट-काँक्रीटच्या दिवसात पाहायला मिळणार नाहीं. एकदा त्या चिखलात शिरलं कि आठ-आठ दिवस बाहेर यावंसं वाटायचं नाहीं." वगैरे बोलत असतील."

हे वाचून हसून हसून माझ्या डोळ्यात पाणी आलं. डुकर समोर आलीत. 

(क्रमश:) 

(या लेखाचे दोन भाग होतील असे मला अपेक्षित नव्हते. पण अजून पुस्तकातील पु.ल. च्या निदान अजून दोन लेखांवर लिहणे आवश्यक आहे असे वाटते. एकाच रुंदीत लांब लांब लिहीत गेले तर वाचायला या माध्यमात कठीण जाते म्हणून मी पुढील लेख दुसऱ्या भागात प्रकाशित करेन.) 

9/18/24

स्वरगंधर्व सुधीर फडके - चित्रपट परीक्षण आणि निरीक्षण

"श्रीराम.....श्रीराम....श्रीराम"

या गीत-रामायणाच्या पहिल्या काव्याच्या सुरुवातीला असलेल्या राम-आव्हान ऐकलं कि अजूनही अंगावर काटा येतो. धन्य ते ग.दि.मा. ज्यांच्या लेखणीतून बहुधा स्वतः सरस्वतीने हि काव्ये लिहिलीत. आणि धन्य ते सुधीर फडके ज्यांनी हि काव्ये गेय स्वरूपात लोकांसमोर ठेवून अजरामर केलीत. जेंव्हा गीत रामायण ऑल इंडिया रेडिओ वर प्रक्षेपित झाले तेंव्हा सुधीर फडके आणि ग.दि.मा. फक्त ३७ वर्षाचे होते. त्याआधीही सुधीर फडके प्रसिद्धीस आले होते पण इतक्या लहान वयात गीत रामायणाला सुरबद्ध करण्याची प्रतिभा असलेले श्री फडके मराठी आणि हिंदी संगीत दुनियेतील झळकता तारा होता. अर्थात गीत रामायण हा सुधीर फडके यांच्या कारगीर्दीतील एक टप्पा होता. पुढे त्यांनी त्या काळातील बहुतांश प्रसिद्ध मराठी चित्रपटांना संगीत दिले. आणि हिंदी चित्रपटांनाही संगीत दिले. मला माहिती नव्हते कि 'खुश है जमाना आज पहिली तारीख है' या किशोर कुमारच्या प्रसिद्ध गाण्याची चाल श्री फडक्यांनी दिली आहे. याव्यतिरिक्त त्यांची अनेक भावगीते ("स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला") आणि भक्तिगीते ("विठ्ठला तू वेडा कुंभार") अजरामर आणि अविस्मरणीय आहेत. श्री फडके यांची कारागिर्द, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांच्या स्वरांच्या पाऊलखुणा प्रत्येक मराठी मनावर उमटलेल्या आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची सगळेच वाट बघत होते.

मागल्या आठवड्यात 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपट बघितला. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बघण्याचे मनात होतेच. पण मला हा चित्रपट बघून मनात संमिश्र भावना निर्माण झाल्यात. या थोर माणसाचे आयुष्य नवीन पिढी समोर ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे हा चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचे कौतुक करायला हवे आणि त्यांचे आभार मानायला हवेत. पण चित्रपट बघून प्रेक्षक जर का गोंधळणार असतील किंव्हा चित्रपट बघूनही त्या थोर व्यक्तीच्या कलेचे, कष्टांचे मोल नेमके कळणार नसेल तर चित्रपट न बनवलेला बरा!  दिग्दर्शक किंव्हा लेखकाने नेमके ठरवले नाहीं कि त्यांना चित्रपट करायचंय कि माहितीपट. चित्रपटातून लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्याचे श्री. फडके त्यांच्यावरची श्रद्धा स्पष्ट होते. वातावरण निर्मिती, सेट्स, मुख्यतः जुन्या काळाचे चित्रण, वेशभूषा हे सगळे उत्तम दर्जाचे आहे. पण भानगड कथा आणि पटकथेत आहे. 

आपण काही मुख्य मुद्द्यांचा सविस्तर विचार करू. 

चित्रपटाची कथा-पटकथा - चित्रपटाची पटकथा फार तुटक वाटली. सुरुवात श्री फडक्यांच्या बालपणी होते. पण सुरुवातीच्या पाच-दहा मिनिटानंतर आपण फारसे बालपणात डोकावतच नाहीं. त्यांचे बालपण फार आनंदात आणि सुखवस्तू गेले. त्यांच्यावर संगीत संस्कार तेंव्हाच झाले. त्यामुळे या काळात चित्रपट अजून रेंगाळला असता तर चालले असते. पुढे त्यांनी तरुणपणात फार हाल-अपेष्टा भोगल्यात. अक्षरशः कफल्लक अवस्था झाली होती. पण त्यांनी संगीताचा पदर सोडला नाहीं. पेटी घेऊन वण-वण भटकलेत. त्यांच्यातील प्रतिभा त्यांनी जपली. त्यामुळे जशी संधी मिळाली तशी त्यांची कला फोफावली. हा प्रवास फार तुटक दाखविला आहे. त्यांच्या वडिलांकडे पैसे असतांना, त्यांनी त्यांच्या मामांकडून पैसे का घेतला. पुढे मामांसोबत पैश्यांवरून गैरसमज झाला तर ते अचानक असे रस्त्यावर कसे आलेत. संघातील काही लोकांनी लुबाडले पण डॉ. हेडगेवारांनी स्वतः जातीने लक्ष घालून त्या लबाड लोकांना बाहेर केले आणि श्री फडक्यांचे पैसे परत केले. मग तरी पैश्यांची एवढी चणचण का? असे अनेक प्रश्न मला पडलेत आणि त्याची उत्तरे मिळाली नाहीत. (त्यांचा जीवश्च-कंठश्च मित्र बगिच्यात त्यांच्यासोबत बेंच वर झोपलेला, तो अचानक गायब काय होतो आणि मग थेट आर्मीत कसा दाखल होतो? थोडा अजब प्रकार वाटला.) 

पटकथेला अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे चित्रपट श्री सुधीर फडक्यांच्या जीवनप्रवासावर आहे कि त्यांच्या संगीत जीवन प्रवासावर? दोन्ही गोष्टीत फार महत्वाचा फरक आहे. कारण वाढत्या वयात झालेले संगीत संस्कारांनी त्यांचे संगीत जीवनकाल सुरु झाला आणि पुढे आलेल्या असंख्य आव्हानांनी पण त्यांचे संगीत तावून-सुलाखून निघाले. पण हा संगीताचा प्रवास चित्रपटात दिसत नाहीं. गीत रामायणाच्या चाली त्यांनी काय ठरवून दिल्यात? त्यातील वाद्ये, सोबतचे गायक कसे निवडलेत? त्या सीन्स मध्ये अचानक माणिक वर्मा अवतरतात. आता एवढ्या प्रसिद्ध गायिका त्या एकदम गीत रामायणाच्या पहिल्या रेकॉर्डिंग ला कश्या उगवल्यात? श्री फडके व ग.दि.मा. यांची घनिष्ट मैत्री दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण या जोडीने दिलेल्या असंख्य सुरेख गाण्यांचा एक श्रोता म्हणून या दोघांनी बसून गाणी कशी बसवलीत हे बघायला आवडले असते. 

श्री फडके यांच्या पत्नी त्यांच्या तारुण्यात प्रथितयश नटी आणि गायिका होत्या. लग्नानंतर त्या श्री फडके यांच्या आयुष्यातील जणू कणा होत्या. पण त्यांची भेट कशी झाली? त्यांनी का लग्न केले? चित्रपटात याबद्दल फक्त एकाच ओळ आहे. चित्रपटाच्या शेवटी सुद्धा श्री फडके यांनी संगीत देण्यातून संन्यास का घेतला? काही तरी विचार केला असणार. अश्या कितीतरी गोष्टी उलगडल्या नाहीत आणि कितीतरी पैलूंवर प्रकाश पडला नाहीं.  

अभिनय - प्रमुख भूमिकेत सुनील बर्वे यांनी श्री फडके यांची भूमिका केली आहे तर मृण्मयी देशपांडे यांनी ललिताबाई फडके यांची भूमिका केली आहे. मृण्मयी देशपांडे या वयानी भूमिका करायला लहान आहेत. कारण प्रामुख्याने ललिताबाईंना ६०च्या घरात दाखविले आहे. पण मृण्मयी देशपांडे यांनी अभिनय उत्तम केला आहे. सुनील बर्वे हे उत्तम नट आहेत. आणि त्यांनी भूमिका वठवण्याचा प्रयत्न केला आहे. पण छोटीशी गोष्ट- श्री फडके यांच्या तरुणवयाची भूमिका करणाऱ्या नटाच्या हालचाली आणि लकबी आणि वयाच्या श्री फडके यांची भूमिका करणारे सुनील बर्वे यांच्या हालचाली आणि लकबी यात काही हि साम्य नाहीं. जणू आपण दोन संपूर्ण वेगळ्याच व्यक्तींना बघतो आहोत. यात सुनील बर्वे यांची चूक नाहीं. दिग्दर्शकाची आहे. 


तरुण फडके यांची भूमिका आदिश वैद्य यांनी केली आहे. त्यांचा अभिनय आणि हालचाली स्लो-मोशन का होत्या मला कळले नाहीं.  यात पुन्हा दिग्दर्शकाची चूक आहे म्हणू शकतो. अभिनय करायला पटकथा आणि संवाद पुरेसे नसतील  तर हवेत हात-वारे करून नट त्या सीन मध्ये जीव ओतण्याचा प्रयत्न करतो. 

श्री फडके हे स्वतः एक अतिप्रसिद्ध व्यक्तिमत्व होतेच पण त्यांच्या आयुष्यात त्यांनी त्यांच्या एवढ्याच किंव्हा त्यांच्याहून मोठ्या आणि प्रसिद्ध व्यक्तींसोबत कामे केलीत किंव्हा त्या थोर मोठ्यांच्या सानिध्यात वेळ घालविला होता. या चित्रपटात आपल्याला अशी अनेक पत्रे दिसतात. किशोर कुमार असो कि मोहम्मद रफी. डॉ हेडगेवार ते गुरुजी. आणि पंडित नेहरू ते अटल बिहारी वाजपाई. पण यातील कुठलेही पात्र नीट फुलले नाहीं असे मला जाणवले. मोहम्मद रफी ला एक मंगलाष्टकांची ओळ गातांना दाखविले आहे तर किशोर कुमारला अक्खा सीन आहे. प्रेक्षकांना आणि तसेच कलाकारांना कळत नव्हते कि नक्कल करायची कि नुसत्या पोशाखात कॅमेरा समोर उभे राहायचे. जसे आदरणीय श्री हेडगेवार यांचे व्यक्तिमत्व श्री पोंक्षे यांनाही उत्तम वठवलीय. पण त्याला भूमिका म्हणता येणार नाहीं. पुढे तर आदरणीय श्री गुरुजी गोळवलकरांच्या भूमिका करणाऱ्या कलाकाराला तर एकही संवाद नाहीं. श्री वाजपाई यांचे भाषण दाखविले आहे तर पु. ल. देशपांडे यांचा परिचय हि दिला गेलेला नाहीं. आशाताई भोसले यांना संवाद नाहीत पण स्क्रीन वर बऱ्याचवेळा आहेत तर लताबाईंना पाठमोरेंचं दाखविले आहे. माझ्या मते स्वातंत्रवीर सावरकरांना थोडी अधिक भूमिका द्यायला हवी होती. श्री फडके हे सावरकर भक्त होते आणि सावरकरांचा श्री फडके यांच्या व्यक्तिमत्वावर विलक्षण प्रभाव होता. ग.दि.मा यांची भूमिका छान वठवल्या गेली आहे. त्यांची आणि श्री फडके यांची मैत्री चांगली दाखविली आहे. पण पुन्हा काही तरी कमी वाटते. मला वाटतं श्री फडके यांची कारगिर्द बघता, "भाई' चित्रपटासारखाच, हा चित्रपट हि दोन भागात केला असता तर श्री फडके यांच्या आयुष्यातील महत्वाचे क्षण आणि त्यांच्या सोबत गाजलेली इतर व्यक्तिमत्वे अजून रंगवता आली असती. 

चित्रपटाची वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे चित्रपटाचे सेट्स आणि वातावरण निर्मिती. यावर निर्मात्यांनी बराच खर्च केलेला आहे. मुख्यतः ३० किंव्हा ४० च्या दशकातील देश, समाज फार छान उभा केला आहे. घरे, पोशाख, लोकांच्या पगड्या, गाड्या, ट्रेन स्टेशन अशी विविध अंगे दिग्दर्शकाने कौशल्याने दाखविली आहेत. चित्रपटात जुनी गाणी कोणाकडून नवीन गाऊन घेण्यापेक्षा, मूळ गाणी तशीच ठेवली आहे. गाणी आणि गाण्यांची कथानकातील जागा चपखल बसली आहे. तशीच जुनी गाणी नवीन चित्रपटात ऐकतांना प्रेक्षक श्रोता होतो. 

कुठल्याही थोर मनुष्याचे जीवनचित्रं पुस्तकात किंव्हा चित्रपटात रेखाटने फार कठीण काम आहे. त्या थोर माणसाचे किती आणि कुठले पैलू दर्शवायचे, कुठल्या घटना आणि व्यक्ती दाखवयाच्यात आणि कुठल्या घटना गाळायच्या? तो व्यक्ती होता तसा दाखवायचा कि भासला तसा दाखवायचा? त्या व्यक्तीचे अंतरंगावर चित्रपट केंद्रित करायचा कि त्याच्या कामगिरी आणि कारगीर्दीवर? बरं, या व्यक्तीबद्दल सगळी माहिती उपलब्ध असतेच असे नाहीं. आणि जी माहिती उपलब्ध असते ती विश्वसनीय असते असेहि नाहीं. एक उदाहरण घ्या - आचार्य अत्र्यांवर चित्रपट बनवायचा तर काय काय त्यात दाखवाल? त्यांचे स्वतःचे लेखन, कि त्यांचे राजकारणातील उठाठेवी? कि त्यांचे चित्रपट जगतातील पराक्रम? कि त्यांचे वृत्तपत्र आणि त्यातील लेखन? थोडक्यात हे प्रश्न सोपे नाहीं आणि साहजिकच आहे इंग्रजीत ज्याला 'बायोपिक (' Biopic ) असे म्हणतात तसा चित्रपट काढणे फार कठीण काम आहे. 

मागल्या शतकात महाराष्ट्रात आणि मराठी समाजात एका पेक्षा एक  दिग्गज व्यक्तिमत्वे होऊन गेलीत. लेखन, गायन, चित्रपट, अभिनय, राजनीती, तुम्ही म्हणाल त्या क्षेत्रात मराठी माणसाच्या ठसठशीत पाऊलखुणा आहेत. त्यातील एक म्हणजे श्री सुधीर फडके. त्यांच्यावर चित्रपट काढून त्यांची नव्याने ओळख नवीन पिढीला करण्याचे काम हा चित्रपट नक्कीच करतो. आणि त्यासाठी आपण चित्रपटाचे आभार मानायला हवेत. 

8/30/24

राजमान्य राजर्षी श्री बाबासाहेब पुरंदरे

काही दिवसांपूर्वी श्री बाबासाहेब पुरंदऱ्यांचा जुना विडिओ मला यु-ट्यूब वर दिसला. इतिहासाची एक गोष्ट रंगवून ते सांगित होते. तो विडिओ बघून माझ्या श्री पुरंदऱ्यांच्या काही आठवणी जाग्या झाल्यात.  माझ्या लहानपणी म्हणजे ९०च्या दशकाच्या पूर्वार्धात बाबासाहेबांचे 'जाणता राजा' हे नाटक नागपूरला आले होते. यशवंत स्टेडियम वर ते नाटक होणार होते. माझे घर यशवंत स्टेडियमहुन हाकेच्या अंतरावर होते. शो च्या जवळपास एक महिना आधी पासूनच नाटकाची धामधूम सुरु झाली होती. स्टेज चे विविध भाग एक एक करून येऊ लागले होते. एक भव्य किल्ला आणि त्याचे द्वार आणि प्रचंड मोठे स्टेज उभे राहिले. स्टेज च्या समोर पटांगणाएवढी जागा सोडून मग प्रेक्षकांच्या ओळी सुरु होत होत्या. आठवडाभर आधी घोडे आणि मुख्य म्हणजे हत्ती येऊन दाखल झाला. दररोज शाळेत जायच्या आधी आम्ही स्टेडियम च्या लोखंडी दारातून आम्ही आत डोकावून बघत असू. हत्ती आल्यापासून तर माझी उत्सुकता कंठाशी आली होती. पण नाटक हा माझा शिवाजींच्या इतिहासाचा किंव्हा जीवनाचा परिचय नव्हता. नाटक यायच्या कालावधीतच माझ्या आत्याने मला राजा शिवछत्रपती पुस्तक भेट दिले होते. मी ते हपापल्यासारखे ते पुस्तक वाचले आणि तेंव्हापासून त्या पुस्तकाची अनेक पारायणे पण केलीत. आमच्या चौथीच्या पाठ्यक्रमात त्या संपूर्ण वर्षाचा इतिहास फक्त शिवाजी महाराजांचाच इतिहास होता. आमच्या प्रार्थमिक शाळेतील प्रत्येक वर्गाच्या भिंतीवर शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एखादा प्रसंग रेखाटलेला होता. फार सुंदर चित्र काढली होती. जेंव्हा शिवछत्रपती वाचले तेंव्हा लक्षात आले कि त्या पुस्तकातील श्री दलाल यांनी रेखाटलेली चित्रेच शाळेच्या भिंतीवर होती. पण सगळं इतिहास जरी माहिती असला आणि सगळ्या गोष्टी जरी ऐकल्या असतील तरी श्री पुरंदऱ्यांनी एक भव्य-दिव्य दृष्टी जाणता राजा द्वारे प्रेक्षकांसमोर ठेवला ते शब्दात पकडणे कठीण आहे. यशवंत स्टेडियम च्या पायारांवर, अगदी मागे, बसून मी जणू तीनशे वर्ष मागे गेलो आणि संपूर्ण इतिहास घडतांना बघितला. नाटकाचे कथानक, त्यातील संवाद, त्यातील पात्रे, मावळे आणि त्यांचे पोशाख, हत्ती, घोडे, उंट, मागे आई भवानीची प्रचंड आकृती, आणि काय ते छत्रपतींचे सिंहासन! डोळ्याचे, आणि मनाचे पारणे फिटले. हा अनुभव घेतल्याशिवाय नाटकाची भव्यता जाणवायची नाहीं. 

                                            

नाटकाचे किती शो होते मला आठवत नाहीं. पण कुठून तरी ओळखी निघून मला नाटकाच्या प्रॅक्टिस च्या वेळेस श्री पुरंदरे यांना भेटण्याची संधी मिळाली. मी माझी शिव-छत्रपती ची प्रत घेऊन गेलो. ते खुर्चीवर बसलेले होते. स्वच्छ पांढरा झब्बा आणि पायजमा आणि वर अर्ध्या बाह्यांचा जाकीट. बटण न लावलेला. लांब पांढरी दाढी आणि पांढरे केस. एकदम भारदस्त व्यक्तिमत्व. तेंव्हा ते साठीच्या घरात असावेत पण त्यांचा त्या भल्यामोठ्या स्टेज वर पण 'प्रेझेन्स' जाणवत होता. मी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांनी प्रेमाने आशीर्वाद दिला. काय बोलणे झाले मला आठवत नाहीं. पण पुस्तकात त्यांनी "राजमान्य राजश्री चिन्मय राव, यांना अनेक शुभाशीर्वाद" असे लिहून दिले. मला अगदीच लाजल्यासारखे झाले. हाफ चड्डीत मी ९-१० वर्षाचा त्यांच्या समोर उभा होतो आणि आता अचानक 'राजमान्य राजर्षी '? पण छत्रपतींचे पुस्तक मी वाचले होते. म्हणजे मी एक मावळा झालेलो होतो. आणि छत्रपतींचा मावळा, त्यांचा पाईक म्हणजे 'राजमान्य' नाहीं का? 

इतिहासाकडे बघण्याचे दोन दृष्टिकोन प्रामुख्याने दिसतात. काही लोकांना इतिहास नकोसा असतो. 

जुने जाऊ द्या मरणालागुनी

जाळुनी किंवा पुरुनी टाका

सडत न एक्या ठायी ठाका| (तुतारी, केशवसुत ) 

अर्थात केशवसूत इतिहास च जाळून टाका असे म्हणत नव्हते. पण पायाला जखडलेले दोरखंड तोडा हा त्यांचा संदेश होता. इतिहास जाळून टाकणारे पुढे आलेत, कम्युनिस्ट रूपाने. हि कम्युनिस्ट अत्यंत शंख, रक्तपिपासू आणि वाह्यात लोक. 

काही लोकांना इतिहासाचं जिव्हाळ्याचा वाटतो. इतिहासच सुवर्ण आणि सद्य परिस्थिती हि केवळ अधोगती! अर्थात, असे तेंव्हाच वाटते जेंव्हा भविष्य काळोखात असते. म्हणून साहजिकच आहे कि समाज पुढे बघायला काहीच नसल्यामुळे मागे बघण्यातच रमतो. हे पण धोकेदायकच आहे. 

बाबासाहेब पुरंदऱ्यांचा इतिहास या दोन्ही पठडीत मोडणारा नाहीं. कारण हा इतिहास जिवंत आहे, रोमांचक आहे, आणि रोचक आहे. त्यांचा इतिहास हि लेखणी आहे ज्याद्वारे ते राष्ट्रजागृती आणि समाजजागृती अखंड करीत होते. छत्रपती शिवाजी हे गतकालीन नाहीत. छत्रपती शिवाजी हे एक धुमसत अग्निकुंड आहे आणि त्याला धगधगते करून समाजाची चेतना आणि समाजाचे आत्म-बळ त्यांना वाढवायचे होते. आणि त्या साठी ते जन्मभर अखंड कष्ट करीत होते. 

मी दहावी-अकरावीत असतांना दोन-चार दिवस पुण्याला गेलो होतो. माझ्या मोठ्या मामे भावाची बाईक मला फिरायला त्याने दिली. मग काय मी कानात वारं गेलेल्या खोंडासारखा पुणं भर हिंडत होतो. तेंव्हा मी श्री शिवाजी सावंत यांना भेटण्याचा प्रयत्न केला. (ती गोष्ट पुन्हा कधी सांगेन. पण माझ्या सारख्या पोरा-टोराला एवढं आपुलकीने त्यांने वागवले!) आणि मराठी पुस्तकाच्या दुकानातून चौकशी करून करून श्री पुरंदऱ्यांच्या घरी सुद्धा पोचलो. दोन-तीनदा चक्कर मारली पण भेट झाली नाहीं. आणि होणे कठीण होते. त्यांचे काम इतक्या मोठ्या प्रमाणावर होते कि ते सतत फिरतीवर असणार. मी राजा शिवछत्रपती ची नवीन प्रत घेतली होती, पुन्हा त्यांची स्वाक्षरी घ्यायला. ती तशीच बॅगेत राहिली. थोर-मोठ्यांना भेटायला नशीब लागत. आणि पुण्यात त्यांच्या वाड्याच्या खेपा मारतांना मला हे माहिती नव्हते कि माझ्या नशिबी त्यांची भेट पुन्हा आहे. 

पुढे अमेरिकेत शिक्षण आणि नोकरी साठी बरीच वर्षे होतो. तेंव्हा हि मराठा इतिहास, शिवाजी महाराजांचे चिंतन, मनन आणि जमेल (आणि झेपेल) तेवढे लेखन चालूच होते. कॉलेज च्या ग्रंथालयात मी इतिहासाची पुस्तके वाचीत खूप वेळ घालावीत असे. नेमके वर्ष आठवत नाहीं पण सन २००७-०८ असावे. श्री पुरंदरे अमेरिकेला भेट देत होते. त्यांचे वेग-वेगळ्या शहरांमध्ये कार्यक्रम होते. माझ्या एका वाहिनीचे वडील त्यांचे जुने स्नेही होते. त्यांनी विचारले कि भेटायचे आहे का? अर्थात, भेटायचे आहे. बाबासाहेबांशी पुन्हा भेटायची संधीला नाहीं कसे म्हणणार? मी आणि माझा वडिल भाऊ त्यांना भेटायला गेलो. माझे मामा-मामी, मामे भाऊ पण होते. यावेळेसच्या भेटीला थोड्या गप्पा झाल्यात. इतिहासाबद्दलही बोलणे झाले. मी जरी खूप इतिहास वाचीत असलो तरी इतिहासाचार्यांसमोर माझी बोलती बंद झाली. उगाच काही तरी बोलून आपल्या बाळ-बुद्धीचा परिचय का करून द्यायचा? महाराष्ट्रातील शिवाजी महाराज, किंव्हा छत्रपती संभाजी किंव्हा दादाजी कोंडदेव यांच्या नावाने चाललेल्या गालीच्च राजकारणाचा ऊत तेंव्हा आला होता. जातीभेद दूर करून महाराजांनी समस्त समाजाला एकत्र केले आणि स्वराज्य स्थापन केले. आणि आता आपला देश आणि समाज खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे तर जाती-पातीचे राजकारण करून पुन्हा समाजात दुफळी निर्माण करण्याचा हा प्रयत्न म्हणजे शोकांतिका आहे. बाबासाहेब या विषयावर बोलले नाहीं. त्यांना उचित वाटले नसणार. किंव्हा बोलून काही उपयोग नाही असे वाटले असेल. त्यांच्या शब्दांमधून, वर्तनातून कधीच कटुता जाणवली नाहीं. तळमळ होती पण नैराश्य नव्हती. आगतिकता होती पण इजा करणारी धार नव्हती. 

मी त्यांना विचारले कि सद्य परिस्थिती बघता भारत कधी सशक्त, संपन्न आणि समृद्ध होणार? ते हसून म्हणाले "अजून २०० वर्षे तरी नाहीं" मी खरे विचारायला हवे होते कि २०० वर्षे का? १९४७ नंतर भारताची प्रगती बघता त्यांनी दिलेला वर्षांचा आकडा थोडा विस्मित करणारा आहे. मी विचारले नाहीं. त्यांनी त्यावर पुढे काही विश्लेषण दिले नाहीं. एखाद विचारायला हवे होते. एखाद वेळेस त्यांनी उत्तर दिले असते आणि मला ते कळले नसते. एकाद वेळेस उत्तर दिली हि नसते. आता वीस वर्षांनी मला वाटते कि खरोखरच २०० वर्षे लागतील. एखादवेळेस आपला देश समृद्ध पुढल्या काही दशकातच होईल. पण समृद्धी म्हणजेच प्रगती नव्हे. पैसे म्हणजेच श्रीमंती नव्हे. आधुनिक आणि प्रगत सैन्यच म्हणजे सशक्तता नव्हे. पैसे, आधुनिक शस्त्र आणि संपन्नता हवीच. त्यात वाद नाहीं. पण तो अंतिम टप्पा नव्हे. उद्या रस्त्यावरून एका गावाहून दुसऱ्या गावी जात असतांना रस्त्याला आपण गाव म्हणत नाहीं, ते एक साधन झाले. पैसे एक साधन झाले, शस्त्र हे साधन आहे. मग आपल्या समाजाचे, देशाचे, संस्कृतीचे अंतिम लक्ष्य कुठले? माझ्या स्वतःकडे याचे उत्तर नाहीं. आणि बाजारात विचारायला गेलात तर हजारो उत्तर मिळतील. लक्ष्य हे अनेकार्थी असू शकत नाहीं. अर्जुनाला पोपटाचा एकच डोळा दिसला. तेच त्याचे लक्ष्य होते. अक्खा पोपट, झाड-पाने, मागील आकाश हे त्याचे लक्ष्य नव्हते. गोची इथेच आहे. 

बाबासाहेबांच्या त्या दौऱ्यात मला अजून काही भाषणे ऐकायला मिळाली. त्यानंतर त्यांची भेट व्हायचा योग मला मिळाला नाहीं. त्यांना जवळून बघण्याचा, त्यांच्याशी गप्पा मारण्याची अपूर्व संधी मिळणे हे माझ्यासारख्याच अहोभाग्य. त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ जिवंत ठेवला एवढेच नाहीं. त्यांनी तो प्रत्येक मराठी मनात रुजवला. केवळ पुस्तक लिहून प्रकाशित करून आणि मिळेल तशी भाषणे करून त्यांना प्रचार करता आला असता. पण केवळ व्यासपीठावर न थांबता रंगमंचाचा पण आधार घेतला. जाणता राजा नाटक हि एक भव्य लोककथाच होती. लोककथेचे आयुष्यमान अखंड असते हे बाबासाहेब जाणून होते. ते इतिहासाचार्य होते पण तेवढेच निपुण शाहीर होते. त्यांनी केलेलं कार्य काळाच्या पटलावर या कारणांनीच टिकणार. आज आपल्याला कोणाला लक्ष्य माहिती नाहीं पण या इतिहासाचार्य शाहिरांमुळे पुढल्या पिढी पर्यंत शिवाजी महाराजांच्या इतिहासाची वाट तेवत राहणार. आणि दोनशे वर्षांनी का होईना पुन्हा एक महाराजांच्या नावानी सूर्यजाळ देशाला आणि संस्कृतीला झपाटून घेईल? 

7/21/24

गोंड कोण होते आणि इतर विचार. (चंद्रप्रकाशी लेखन)

**या लेख मालिकेला मी चंद्रप्रकाशी अश्यासाठी म्हणले आहे कारण हे माझे मूळ संशोधन नाहीं. सेतू माधवराव पगडी लिखित इतिहासाचे पुनर्मुद्रण सध्या वाचतो आहे. त्यातील संशोधनाचा मागोवा आणि काही प्रमुख घटना  संक्षिप्तात मी येथे सादर करण्याचा हा प्रयत्न.  

या लेख-मालिकेचा पहिलादुसरा लेख इथे उपलब्ध आहे. 

--

मी मूळ नागपूरचा आहे त्यामुळे गोंड आदिवासी आणि गोंडांचे राज्य सध्याच्या पूर्व विदर्भ भागात होते याबद्दल मला नेहमीच कल्पना होती. पण शाळेत कधी गोंड इतिहास शिकविला नाहीं. भारतात साधारण जो इतिहास शिकवितात तो भारताचा किंव्हा भारतीयांचा इतिहास नसतो. परदेशी आक्रमकांचा इतिहास आपल्यावर थोपवल्या जातो. स्वातंत्र्योत्तर काळात कम्युनिस्ट लोकांनी केंद्र सरकार मधील शैक्षणिक आणि अभ्यासक्रमाची दालने व्यापलीत आणि त्यातून भ्याड मनोवृत्ती आणि बुरसट, बुळबुळीत विचारसरणी आपल्यावर लादल्या गेली. असो. तो एक वेगळा विषय ठरेल. मागच्या दोन लेखात म्हणाल्या प्रमाणे श्री सेतू माधवराव पगडी यांनी लिहिलेला इतिहास संक्षिप्तात प्रकाशित केल्या गेला आहे आणि त्यातील 'इतिहासाचा मागोवा' या पुस्तकातील हि माहिती आहे. मूळ विचार आणि अभ्यास माझे नाहीं. हे पुस्तक आणि त्यातील अनमोल माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचावी हे या लेखाचे उद्देश्य. 

गोंड आदिवासी समाज पूर्व विदर्भ, छत्तीसगढ, उत्तर तेलंगण आणि मध्य प्रदेश या प्रांतात पसरलेला आहे. त्या त्या भागातील गोंड तिथली भाषा मातृभाषा म्हणूनच वापरतात. म्हणजे विदर्भातील गोंड हे मराठी बोलतात किंव्हा उत्तर तेलंगण मधील गोंड तेलगू बोलतात. गोंड समाज, त्यांचा इतिहास, त्यांचे साहित्यात किंव्हा चाली-रीती सनातन धर्माशीच ठाम पणे बांधल्या आहेत. रामायण आणि महाभारताचे दाखले त्यांच्या पुरातन साहित्यातही दिसतात (इथे साहित्य म्हणजे लेखीच नव्हे तर लोककथा किंव्हा सामाजिक स्मृती या दृष्टीने मी वापरला आहे.) महादेव किंव्हा शंकर प्रामुख्याने आढळतो. शंकर-पार्वतीच्या कृपेने पुढे गोंड समाजाची निर्मिती झाली अशी समाज उत्पत्तीची आख्यायिका आहे. इंग्रजीत याला ओरिजिन स्टोरी असे म्हणतात. गोंड समाजात वेग वेगळी मूळ घराणी आहेत आणि त्यांची गोत्रे पण आहे. झिगुबाईची कथा, माणकोची कथा, तूरपालसिंघेची कथा इत्यादी प्रसिद्ध आहेत. या भागात राम-कृष्ण किंव्हा लक्ष्मी इत्यादी देव कमी आढळतात. गोंडांच्या देवळांना पेनगड म्हणतात. पेन म्हणजे देव. आणि श्री पगडी लिहितात कि देवळात मुर्त्या नसून भाल्याचा फाळ आणि चवरी असते. 

पुस्तकात गोंड समाजातील आणावे आडनावे दिली आहेत त्यात मेश्राम, आत्राम, टेकाम, गेडाम हि आडनावे आपल्याला नागपूर भागात नक्कीच दिसतात. आता तुम्हाला कधी श्री मेश्राम किंव्हा श्री आत्राम आडनावाचे भेटलेत तर ते गोंड समाजातीलच असतील असे नाहीं, म्हणजे त्याची खात्री देणे कठीण आहे. आजकाल हा विषय थोडा नाजूक आहे. पण ओळखीची आडनावे बघून आपुलकी वाटली.

विदर्भातील पूर्व भाग (नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा) व मध्य प्रदेश भाग असे गोंड राज्य सोळाव्या व सतराव्या शतकात उदयाला आले. त्यातील जबलपूरजवळ गढमंडली - राणी दुर्गावती हि गढमंडळीची. हिने अकबराविरुद्ध लढा दिला होता. पुढे औरंगझेब दक्खनी उतरला तेंव्हा त्याच्या विरुद्ध नागपूरच्या गोंड राजाने आणि सैन्याने प्रखर लढा दिला. पुढे भाऊबंदकी होऊन त्यातील एका भावाने औरंग्याच्या पदर धरला आणि मुसलमान झाला. मुघली मदतीने हा बख्त बुलंद शाह पुढे गादीवर आला. छत्रपती शाहूंच्या काळात आणि पेशवाईत भोसले परिवारातील श्री रघुजीराजे भोसले नागपुरात स्थिर झालेत आणि गोंडांचे राज्य मावळले.  

श्री पगडी यांनी पुस्तकात गोंड समाजात जातीभेद नाहीं असा उल्लेख केला आहे. साधी विवाहपद्धती आणि अगदी विधवा विवाह सुद्धा निषिब्ध नाहीं असेही ते म्हणतात. या दोन्ही बाबी फार स्पृहणीय आहेत आणि या साठी गोंड समाजाचे कौतुकच करायला हवे. या विषयावर श्री पगडी यांनी अक्षरशः एकाच परिच्छेद लिहिला आहे. या विषयावर अजून वाचन करायला हवे. श्री पगडी यांचे 'अमंग दि गोंड्स ऑफ आदिलाबाद' आणि "गोंडी भाषेचे व्याकरण' हि दोन अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रकाशित आहेत. आणि श्री पगडी स्वतः सन १९४५ ते १९४८ सध्याच्या तेलंगण राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात मामलेदार आणि डेप्युटी कलेक्टर म्हणून होते. या व्यतिरिक्त त्यांना आदिवासी विशेष अधिकारी म्हणूनही दायित्व त्यांच्या कडे होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या अभ्यासाला आणि या विषयावर त्यांच्या लेखनाला अनुभवाचे वजन आहे. 

पुढले चंद्रप्रकाशी लेख 'छत्रपती नि त्यांची प्रभावळ' या पुस्तकातील असतील. आशा करूया कि काही तरी नवीन शिकायला मिळेल. 




7/15/24

'The Greatest Indian Stories Ever Told' - एक परीक्षण

हा पुस्तक परिचय 'पंचधारा' या त्रैमासिकाच्या जून महिन्याच्या अंकात प्रकाशित झालेला आहे. हे साहित्यिक मासिक मराठी साहित्य परिषद, हैद्राबाद द्वारे प्रकाशित होते. या मासिकाचे फेसबुक वरील पत्ता येथे आहे 


पार्श्वभूमी:

भारतीय भाषा प्रगल्भ आहेतच पण त्या सोबत प्रत्येक भाषेचे साहित्य हे त्या भौगोलिक प्रदेशाची, त्या प्रदेशाच्या इतिहासाची आणि बोलणाऱ्यांची ओळख आहे. कुठल्याही भाषेचा प्रवास हा सामाजिक व वैयक्तिक अनुभव ते बोली शब्द ते साहित्य असतो. आणि पुढे हीच भाषा साहित्य संस्कृतीला जन्म देण्याचे महत्वाचे काम करिते. नुसतेच जन्म नव्हे तर साहित्य संस्कृतीचे पालन-पोषण सुद्धा करते. म्हणूनच साहित्याला अनन्यसाधारण महत्व असते. भाषेच्या साहित्यात कथा आणि गोष्टी हा एक महत्वाचा अंग असतो. कारण  जीवनातील कधी सामान्य किंव्हा कधी मार्मिक अनुभव हे गोष्टींद्वारे पटकन टिपल्या जातात. ग्रंथ-कादंबऱ्या लिहायला आणि वाचायला वेळ लागतो. पण कथा म्हटले कि योग्य तो संदेश किंव्हा झालेले घटना पटकन पोचवता येते. हे काम सोपे आहे असे मुळीच नाहीं. प्रभावी गोष्ट लिहिणे फार कठीण आहे. काही पानांच्या कक्षेत प्रभावी कथानक आणि योग्य पात्रे फुलवावी लागतात. बहुधा म्हणूनच बहुतेक प्रसिद्ध साहित्यिक हे उत्तम कथाकार सुद्धा आहेत. 

आपण ज्या पुस्तकाचा आढावा घेणार आहोत त्यात भारतभराच्या भाषांमधील लिहिलेल्या गोष्टींचे भाषांतर इंग्रजीत केलेले आहे. हा कथा संग्रह म्हणजे एक काळ, वेळ, विविध सामाजिक स्तर, विविध भौगोलिक प्रदेश या सगळ्यांचा प्रवास आहे.

'केल्याने देशाटन,पंडित मैत्री,सभेत संचार|

शास्त्र ग्रंथ विलोकन,मनुजा येतसे चातुर्य फार||

या पुस्तकातील गोष्टी वाचतांना असा काहीसा अनुभव मला आला. या गोष्टी भारतातील भिन्न भाषा आणि प्रदेशांमध्ये जरी लिहिल्या असल्यात तरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तरी गेल्या शंभर वर्षातील भारतीयांचे अनुभव साधारणत: एकाच पटलावरचे आहेत. आणि हे ऐक्य या गोष्टींमधून जाणवते. आता एकच पटल म्हणजे काय? तर खऱ्या अर्थाने गेल्या शंभर वर्षात भारत एक राष्ट्र आणि एकसंध राष्ट्र म्हणून उदयास आले. त्यामुळे गेल्या शतकातील घडलेल्या ऐतिहासिक, सामाजिक आणि आर्थिक घटनांची चादर सगळ्यांसाठी एकच आच्छादली आहे. पण चादर एकाच आच्छादली असली तरी सुरकुत्या सारख्या नाहीत. आणि घटनांचे उमटलेले विविध पडसाद गोष्टीद्वारे आपल्या समोर येतात.  उदाहरणार्थ, बंगाल, बिहार मधले दारिद्र्याचे अनुभव मुंबई किंव्हा तामिळनाडूतील अनुभवांपेक्षा वेगळे बोलतात पण त्यामागचे मुख्य कारण म्हणजे, भारत सरकारचे स्वातंत्र्योत्तर आखलेल्या तोकडे आर्थिक धोरण. याच्या उलट, भारताच्या काना-कोपऱ्यात पसरलेली जातीय विषमता. आणि त्याच्या विरोधात भारत सरकारने स्वातंत्र्योत्तर आखलेले आक्रमक धोरण. अजून एक उदाहरण म्हणजे भारतावरचे इंग्रजांचे राज्य. जवळपास ९० वर्षे भारतावर इंग्रजांची अनभिषिक्त सत्ता होती आणि त्याचे दुष्परिणाम समाजाच्या प्रत्येक घटकावर झालेत. पण बंगालच्या उच्चवर्णीयांची अनुभव, बिहार मधील शेतकऱ्याच्या तुलनेत फार वेगळे आहेत. 

हे अनुभव देशाच्या आणि समाजाच्या साहित्य द्वारे प्रतिबिंबित झाली आहेत. प्रत्येक भाषा आपापल्या परीने वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यातील शब्द, वाक्यप्रचार, म्हणी जणू त्या मातीतल्या असतात. पण वर म्हंटल्या प्रमाणे भाषा अनेक असल्यात तरी सूर एकच आहे. 

अजून एक लक्षात घेण्याजोगा महत्वाचा मुद्दा म्हणजे साहित्य आणि इतिहासाची गाठ-भेट. इतिहास म्हणाल तर घटना आणि तारखा. पण याला साहित्याची बहार जेंव्हा येते तेंव्हा त्या तारखा आणि घटनांना एक व्यक्तिमत्व प्राप्त होते. रुक्ष इतिहास साहित्याच्या संगतीत जणू जिवंत होतो.असा जिवंत साक्षी कथा आणि गोष्टींद्वारे मिळतो. शिवाजी महाराजांचा इतिहास अनेकांनी लिहिला आहे. तो काळ खंड बखरीं मध्ये हि नोंदला गेला आहे. आणि महाराजांचा इतिहास साधारण सगळ्यांना माहिती सुद्धा होता पण श्री बाबासाहेब पुरंदऱ्यांनी जेंव्हा गोष्टीरूपी इतिहास जनमानसा समोर ठेवला तेंव्हा महाराज आणि मराठ्यांचा इतिहास जणू पुन्हा जागृत झाला, उल्हसित झाला. जर का श्री पुरंदऱ्यांचा हा ऐतिहासिक गोष्टी रुपी ग्रंथ तामिळ किंव्हा असामी भाषेत उपलब्ध झाला तर मराठ्यांचा हा थोर इतिहास त्या भागांमध्ये हि नक्कीच रुजेल.   

पण चेष्टा अशी हा भारताचा हा साहित्यिक ठेवा डोळ्यासमोर असूनही त्याचा उपभोग आपल्याला घेता येत नाहीं. तामिळ साहित्य वाचायला तामिळ शिकायला किती आणि कसा वेळ द्यायचा? बरं तामिळ काही नवीन भाषा नाहीं, ती हजारो वर्ष जुनी संस्कृती आहे. पण 'नवीन' भाषा म्हणून बंगाली भाषे कडे बघितले तरी परिस्थिती तशीच आहे, बंगाली साहित्याचा आनंद बंगाली वाचणाऱ्याव्यतिरिक्त कोणाला उपलब्ध नाहीं. असे वाटते कि एका घरात राहून, भावंडे असूनही एका-मेकांशी परिचय नाहीं, जवळीक नाहीं, स्नेह नाहीं. 

पुस्तकाचा परिचय:

अश्या विचित्र परिस्थितीत इंग्रजी भाषा उपयोगास येते. इंग्रजी सत्तेच्या अस्तानंतर भारतात इंग्रजीचे प्राबल्य वाढले. स्वातंत्र्योत्तर भारत सरकारने इंग्रजीला सरकारी भाषा म्हणून प्राधान्य दिले. तसेच दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या वाढत्या बळामुळे इंग्रजी भाषेला जागतिक भाषेचा दर्जा प्राप्त झाला. हळूहळू भारतीयांनी हि इंग्रजीला 'आपलेसे' केले आणि आज भारतीय एका-मेकांशी बोलायला इंग्रजीचा आधार घेऊ लागली आहेत. पण या परिस्थितीचा, म्हणजे इंग्रजीच्या वाढत्या प्राबल्याचा, एक चांगला परिणाम म्हणजे भारतातील विविध भाषिक  साहित्य इंग्रजीत भाषांतरे करून आज सर्व साहित्यप्रेमींना उपलब्ध होते आहे. या उपक्रमा अंतर्गत काही होतकरू भाषाप्रेमी, साहित्यिक आणि भाषेच्या प्राध्यापकांनी एकत्र येऊन भारतातील विविध भाषेंमंधील पन्नास लघु कथांचे भाषांतर करून एक पुस्तक छापले आहे. पुस्तकाचे नाव आहे "थे ग्रेटेस्ट इंडियन स्टोरीएस एव्हर टोल्ड" (The Greatest Indian Stories Ever Told  ). याचे मुख्य संपादक श्री अरूणव सिन्हा आहेत. अश्या अनुवादित साहित्य संबंधी पुस्तके प्रकाशन करण्याची खासियत या प्रकाशनगृहाची आहे. या संबंधित अनेक पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहे. उदाहरणार्थ 'The Greatest Marathi Stories Ever Told "  

अश्या प्रकारच्या पुस्तकाचे संपादन कार्य सोपे नाहीं. कुठल्या गोष्टी निवडायच्या आधी महत्वाचा प्रश्न म्हणजे कुठले लेखक निवडायचेत? इथे संपादक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करायला हवे. निवडलेल्या भाषेंमधील प्रसिद्ध लेखक त्यांनी चांगले निवडले आहेत. लेखक यादीतील काही लेखक भारतभर प्रसिद्ध आहेत. जसे महेश्वर देवी (बंगाली) , सरतचंद्र चट्टोपाध्याय (बंगाली), इस्मत चुगताई (उर्दू) , के. एस. दुग्गल (पंजाबी), के. आर. नारायण (मूळ कथाच इंग्रजी आहे) तसेच मुन्शी प्रेमचंद (हिंदी) आणि अमृता प्रीतम (पंजाबी). पण या व्यतिरिक्त लेखक किंव्हा कथा ज्या फक्त मूळ भाषेतच प्रसिद्ध आहेत, त्यांची हि निवड छान केली आहे. उदाहरणार्थ, व्हायकों मुहम्मद बशीर हे मल्याळम भाषेतील सुप्रसिद्ध कथाकार आणि साहित्यिक आहेत. त्यांचे साहित्य शाळेच्या मल्याळम पाठ्यपुस्तकांमधे असतात. प्रसिद्ध मराठी दलित साहित्यिकअण्णाभाऊ साठे हे असेच अजून एक उदाहरण आहे. त्यांची प्रसिद्ध आणि हृदयद्रावक कथा 'स्मशानातील सोने' आम्हाला इयत्ता १०वीच्या वर्गात होती. 

विषय प्रवेश:

या कथांचा कालखंड स्वातंत्र्योत्तर काळापासून १९९० च्या दशकापर्यंत आहे असे जाणवते. त्यांच्या पृष्ठ यादीत कथा प्रकाशनाच्या दिनांक दिलेली नाहीत पण कथांमधून दिसणारे समाज दर्शन म्हणजे स्वातंत्र्योत्तर तीन-चार दशकातील ढासळती अर्थव्यवस्था, सर्व क्षेत्रात कमी होत गेलेले संधी मार्ग, लोकांच्या खिशातील पैशांचे कमी होत चाललेले दाम आणि खिशात पडायला कमी होत गेलेला पैसे आणि सगळ्यात मुख्य, या सगळ्याचा समाज प्रणाली आणि सामाजिक संस्कृतीवर होणार विपरीत परिणामांचा लेखा-जोखा. मुन्शी प्रेमचंद यांच्या कथा उत्तरेतील आणि मुख्यतः बिहार-उत्तर प्रदेशातील दारिद्र्य आणि कारुण्य दर्शवितात. त्यांची एक 'कफन' कथा याच प्राश्वभूमीवर असली तरी गोष्टीतील परिस्थितीला दोषी स्वतः कथानायकच आहेत. कथेतील दारिद्र्य जरी अंगावर येत असले तरी मनुष्याचे कुठल्या थराला पतन होऊ शकते हे बघून मन विषण्ण होते. पण मला त्या कथेतील प्रासंगिक विनोद जाणवून हसू पण आले.  

इस्मत चुगताई यांची कथा ७० किंव्हा ८० च्या मुंबईचे दर्शन घडविते. हि कथा स्वानुभवावर आधारित आहे असे वाटते. पण यातील दारिद्र्य टोचत नाहीं कारण यातील पात्रे जरी गरीब असलीत तरी लाचार नाहीत. हि पात्रे त्यांना हवे तसे जीवन हे पत्रे जगतांना दाखविली आहेत. दारिद्रय आणि लाचारीतील मुख्य अंतर म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य. मुंबईतील हि कामसू पण गरीब पात्रे कोणालाही दोष देतांना दिसत नाहीत. 'आलीय भोगासी असावे सादर' या म्हणीप्रमाणे ते मिळतील ते क्षण भोगत जीवन कंठीत आहेत. 

महेश्वता देवी यांची कथा फार भन्नाट आहे. त्यांचे साहित्य वाचण्याचे भाग्य मला आधी लाभले नव्हते. गोष्ट चित्रपटासारखी समोर घडते आहे असा भास होतो. कोलकाता येथे बेतलेली हि कथा जेंव्हा शेवटल्या परिच्छेदात उलगडते तेंव्हा एखादे वेलबुट्टी केलेले कापड एकदम उलगडल्या वर जसे पिसारा फुलल्यासारखे झगमगावे तास भास होतो. कथेतील आधी विस्मित करणाऱ्या घटनांचे आकलन होते. मला स्वतःला हि कथा फार आवडली. 

अजून एक कथा म्हणजे शहनाझ बशीर यांची काश्मिरी कथा. हे कथा मूळ इंग्रजीतच लिहिली आहे.  शहनाझ बशीर हे पुस्तकातील इतर कथाकारांच्या तुलनेत तरुण आहेत. त्यांचा जन्म सन १९८० चा आहे. त्यांच्या जन्माचे वर्ष मी यासाठी सांगितले कारण त्यांच्या वाढत्या वयात त्यांनी काश्मीर मध्ये इस्लामी दहशतवाद जवळून बघितला असणार आणि अनुभवाला असणार. कारण त्या अमानुष आणि हिंसक दशकाचे प्रतिसाद त्यांच्या लघुकथेत प्रकर्षाने जाणवतात. गोष्टीतील पात्रे दारिद्र्याच्याच पाळण्यातच  जीवन कंठीत आहेत पण येथे जीवाची भीती आणि लाचारीचा संघर्ष चालू आहे. एका बाजूला धर्मांध हिंसेचे घरातच सांडलेले रक्त तर दुसरीकडे त्याचा धर्मांधतेमुळे खालावलेली पोटे. एका बाजूला भीतीपोटी त्याच धर्माशी दाखवावी लागणारी निष्ठा तर दुसरीकडे निष्ठुर वास्तवात. गोष्टीतील 'नायक' त्याच्या  सामान्य बुद्धिमत्तेस जे कळेल आणि वळेल तसे पुढे उभ्या ठाकलेल्या अक्राळ-विक्राळ परिस्थितीशी सामना करण्याचा प्रयत्न करीत असतो. पण सत्तांतरे असो, युद्ध असोत, धर्मांधता असो कि लहान-मोठ्या क्रान्ति असोत, त्यात काष्ठा सामान्य बापुड्याच्याच पडतात. जगाची हीच रीत आहे. आपला कथानायक याला अपवाद नाहीं. आमच्या शाळेच्या बालभारतीच्या 'लाल चिखल' म्हणून एक धडा होता. त्याची आठवण मला बशीर यांची हि कथा वाचतांना झाली. 

सगळ्या कथा दारिद्र्याशी किंव्हा संघर्षाच्या नाहींत. 'नादर सर' हि कथा जरी काही दशकांपूर्वीच्या चेन्नई शहराजवळ रेखाटली असली तरी हा सकारात्मक प्रसंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घडलेला आहे. गोष्टीचे लेखक सुंदर रामास्वामी यांनी शालेय जीवन आणि खासकरून भारतीय शाळेतील खेळाचे महत्व अचूक टिपले आहे. तामिळ भाषेतीलच या पुस्तकातील अजून एक गंमतीदार गोष्ट म्हणजे 'कल्की' उर्फ आर. कृष्णमूर्ती यांची इंग्रजांच्या काळात बेतलेली कथा - 'गव्हर्नर'स व्हिसिट'. एक उच्च इंग्रज अधिकारी गावात येणार आहे हे कळल्यावर, त्या गावातील दोन धनाढ्य शेठांची धावपळ होते याचे वर्णन आहे. आर. कृष्णमूर्ती स्वतः एक स्वांतत्र्य सेनानी होते त्यामुळे स्वातंत्र्य लढ्याच्या काळात श्रीमंत आणि सुशिक्षित शेठ लोक इंग्रजांची बाजू घेत असत किंव्हा इंग्रज अधिकाऱ्या समोर वर-वर करायला चढाओढी कसे करीत याचे जवळून निरीक्षण केले असणार. त्याच धाग्याला घेऊन त्यांनी हि गंमतीदार कथा विणली आहे.

काही कथा, सुंदर कल्पना रम्य आहेत. त्या सूचक किंव्हा समाज किंव्हा परिस्थिती दर्शनपर नाहीं. सुब्रमणिया भारती यांची तामिळ भाषेतील कथा या श्रेणीत मोडेल. कल्पना विलासित हि कथा दोन कावळ्यांवर आहे. हे दोन कावळे नवरा-बायको दाखविले आहेत. जरी मानवी विश्वातून झेप घेतली असली तरी आपले पाय, म्हणजे कल्पनाशक्ती, मानवी अनुभवांच्या साखळ्यांमध्ये जखडले असतात. कावळ्यांचा अनुभव आपल्याला कधीच कळायचे नाहीं. पण मानवी अनुभवांच्या ब्रशने भारती यांनी या कावळ्या दाम्पत्यावर फार सुरेख कथा रेखाटली आहे. अजून एक अशी कथा म्हणजे लक्ष्मणराव सरदेसाई यांची कोकणी कथा गोव्यातील हिरवळीसारखी सुंदर आहे. यात नकारात्मकता मुळीच नाहीं. गोव्यातील ओढे, ओहोळ जसे समुद्राकडे वाट काढीत जातात तशी हि कथा वळणे घेत जाते.  एम. टी. वासुदेवन नायर यांची मल्याळम कथा सरकारी नोकरी करणाऱ्या पण घटस्फोटित स्त्री जीवनावर आहे. लग्न, पोरंबाळं हि ओझी घेऊन स्त्रीने आपले जीवन लग्न आणि पोराबाळांपुरतीच सीमित ठेवावे हि आपल्या समाजाची अपेक्षा आहे आणि ते एक बंधन सुद्धा आहे. पण लग्न जर अपेक्षित असेल अनपेक्षित असले तरी घटस्फोट हि समाजाने स्वीकारायला हवा. अर्थात तसे होत नसते. आणि खासकरून सुशिक्षित, पांढरपेशा शहरातील समाजाला हे पचवायला नक्कीच कठीण जाते. अश्या परिस्थिती कथानायिकेला अनपेक्षित व्यक्तीकडून सहानभूती मिळते. आणि तेवढेच नव्हे तर ती व्यक्ती नवीन मार्ग दाखवीत प्रोत्साहन पण देते. 

परिचित-अपरिचित कथांव्यतिरिक्त पुस्तकात काही अति-प्रसिद्ध कथा पण आहे. जसे रस्किन बॉण्ड यांची 'ब्लू अम्ब्रेला' (मूळ इंग्रजी),  श्री रबिन्द्रनाथ टागोर यांची 'काबुलीवाला' (मूळ बंगाली) , श्री मुन्शी प्रेमचंद यांची 'कफन' (मूळ हिंदी) किंव्हा अमृता प्रीतम यांची स्टेंच ऑफ केरोसिन  या कथा पण वाचायला मिळतात. अमृता प्रीतम यांची हि गाजलेली कथा मूळ पंजाबी भाषेत आहे आणि याचे भाषांतर प्रसिद्ध लेखक खुशवंत सिंग यांनी केले आहे. 


या पुस्तकाच्या लेख मालिकेत थोड्या त्रुटी आहेत. मराठी भाषेतील कथा बघितल्यात तर वि.स. खांडेकर, किंव्हा ग.दि.माडगूळकर यांच्या कथांची कमतरता जाणविते. खांडेकरांच्या रूपक कथा येथे उचित झाल्या असत्या. तसेच ग.दि.मा यांच्या लघु कथा इथे चांगल्या गुंफल्या गेल्या असत्या. हिंदी भाषिक महादेवी वर्मा, जयशंकर प्रसाद, सूर्यकांत त्रिपाठी 'निराला' किंव्हा मैथिली शरण गुप्त या दिग्गज लेखकांपैकी एकाची तरी कथा घेतली असती तर हा कथा संच अजून झळकला असता. 

पुस्तकाची परिशिष्ट विस्तृत आहे. त्यात लेखांचा परिचय आणि ज्या पुस्तकातून हि कथा घेतली त्याची माहिती दिली आहे. पण इंग्रजीतच का होईना पण कथेचे मूळ भाषेतील नावाची नोंद परिशिष्टेत करायला हवी होती. अण्णाभाऊ साठे यांच्या कथेचे नाव स्मशानातील सोने असे आहे. पण पुस्तकात कथेच्या नावाचे भाषांतर 'Gold  from  the Graves ' असे आहे. आता स्मशानाचे भाषांतर Grave थोडे त्रोटक जरी वाटत असले तरी वाचकाला परिशिष्टेत नोंदलेला पण इंग्रजीत लिहिलेला 'smashaan हा शब्द कळला असता. 

शेवट:

हे पुस्तक आणि लेख मालिका एका दमात वाचून संपवायला नाहीं. काही गोष्टी, त्यातील पत्रे आणि कथानक  प्रभावी आहेत आणि त्याचे पडसाद मनात बरेच दिवस रेंगाळतात. अमृता प्रीतम यांची कथा हृदयात घर करून बसते. आणि पुढली गोष्ट वाचण्याच्या ऐवजी आपण अंतर्मुख होतो. जरी या कथेतील काळ आणि जागा वेगळी असली तर प्रसंग चटका लावून जातो कारण आपल्या देशातला हा अनुभव, देशातील स्त्रियांची झालेली अवहेलना आपण सगळ्यांना ठाऊक आहे. पण गोष्ट वाचल्यावर हि दैन्यावस्था बदलायला हवी, त्याला समर्थन कुठल्याही मार्गाने व्हायला नको हा सूर प्रत्येक वाचकाच्या मनात नक्कीच उमटत असणार आणि हेच या कथेचे  यश. 

इतर ४९ कथा सुद्धा म्हणूनच ४९ रूपाने प्रभावी ठरतात. प्रत्येक कथेचे एक वैशिष्ट्य आहे. कथा जन्मायला यायचे एक कारण आहे. आणि कथेने जन्म घेण्याची आवश्यकता आहे. लेखकाने टिपलेले समाजाचे, त्याच्या सांप्रत काळाचे हे स्पंदन आहे. आणि इंग्रजी माध्यम का होईना पण या कथा वाचल्यावर आपल्या देशाची, समाजाची, संस्कृतीची आणि मानवी अस्तित्वाची ओळख नव्याने होते. जुन्या पैलूंची नव्याने ओळख होते आणि काही नवीन पैलूंची पहिल्यांदा ओळख होते. 

आणि निखळ आनंद तर नक्कीच मिळतो. 

आमच्या आजोबांना रबिन्द्रनाथ टागोरांचे साहित्य वाचायचे होते. त्यांनी अनुवादित इंग्रजी वाचायला सुरुवात केली पण त्यात त्यांना तेवढा आनंद मिळेना. म्हणून त्यांनी बंगाली शिकायला घेतले. आणि बंगाली वाचण्यात नैपुण्य मिळाल्यावर त्यांनी रबिन्द्रनाथ वाचले. कारण नाहीं म्हंटले तरी भाषांतर किंवा अनुवादनात मूळ भाषेत लिहिल्याचा मूळ आत्मा थोडा क्षीण नक्कीच होतो. पण जर का बंगाली किंव्हा मल्याळम हिंदी किंव्हा मराठीत भाषांतरित केले तर भाषेचा पाया भक्कम राहतो कारण बहुतांश भारतीय भाषा संस्कृतोद्भव आहेत. सरकारी उपक्रमाद्वारे किंव्हा प्रकाशन गृहांद्वारे पण आशा करू या कि भारतीय भाषा ते भारतीय भाषा असे भाषांतरित साहित्य आपल्याला उपलब्ध होईल. सध्या तरी सत्य परिस्थिती अशी आहे कि आज भारतीयांना एका धाग्यात बांधणारी भाषा इंग्रजी होत चालली आहे. अश्या परिस्थिती पुस्तकाच्या भाषांतरकरांचे आणि संपादकाचे हे पुस्तक लोकांसमोर ठेवल्या बद्दल त्यांचे कौतुक करायला हवे. 

पुस्तकाबद्दलची माहिती:

'The Greatest Indian Stories Ever Told'

संपादक - श्री अरुणव सिन्हा

प्रकाशक -  अलेप बुक कंपनी ( Aleph Book  Company ) 

पृष्ठ संख्या - ५१२

प्रकाशन वर्ष - सन २०२३ 

मूल्य - रुपये ७७० (अमेझोन वरची किंमत)  

6/13/24

राग 'मंत्रमुग्ध'

आमच्या घरी माझी आई पंडित जसराज नेहमी ऐकत असे. मला लहानपणी शास्त्रीय संगीत प्रकार फारसे आवडत नसे. कोणी तरी काही तरी आळवीत बसलय आणि आपण ऐकत बसायचं? ९० च्या दशकात सिनेमाच्या गाण्यांचा ताल बदलत होता. धांगड-धिंगा, मोठं-मोठाले ड्रमस आणि नाचता येईल असे गाण्याचे सूर प्रसिद्ध होत होते. मला हि गाणी साहजिकच आवडायचीत. काही वर्षात माझ्या मोठ्या भावाने इंग्रजी गाणी घरी आणलीत. त्यामुळे घरी अजूनच धमाल. हि गाणी काही बेसुरी नव्हती. छानच होती आणि हिंदी चित्रपटात शास्त्रीय रागांवर आधारित अनेक गाणी आहेत. पण हे शास्त्रीय संगीत नव्हे. माझा मामा घरी आला कि पंडित भीमसेन जोशी लावीत असे. त्याचे ते फार आवडते आहेत. आजीने कधी कधी टेप लावली कि गीत रामायण हमखास लागे. ८० च्या दशकात दूरदर्शन वर 'मिले सूर मेरा तुम्हारा' हे भारतीय सांस्कृतिक पैलूंचे दर्शन घडवून राष्ट्रीय एकात्मीकरण साधण्याची भारत सरकारची कल्पना अतिशय प्रसिद्ध झाली. राग देश वर आधारित हे गान मलाही फार आवडत असे. हा एक राग माझा बहुधा त्यामुळेच आवडता आहे. तसेच सकाळी ८ ते ८:१५ च्या दरम्यान विविध भारतीवर मराठी नाट्यसंगीत लागे. 'वाद जाऊ कुणाला शरण' हे आशाबाई खाडिलकर यांचे गाणे किंव्हा 'घेई छंद मकरंद' हे वसंतराव देशपांडे यांचे नाट्यगीत मला खूप आवडत असे. प्रामुख्याने अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेला आशालता वाबगावकर यांचे 'राजस राजकुमारा' या गाण्याची मी सदैव वाट बघीत असे.

लहान वयात विलंबित आळवलेले राग आवडणे कठीण आहे. निदान माझ्या अल्प बुद्धीला आणि स्वल्प कानांना तरी. पण पंडित जसराज यांचे राग भीमपलासी मध्ये गायलेले 'जा जा रे अपने मंदिरवा' मला फार आवडायला लागले होते. तसेच पंडित भीमसेन जोशींचे 'माझे माहेर पंढरी' पण आवडत असे. पण बाकी माझे लक्ष हिंदी चित्रपटाची गाणी आणि थोडी बहुत इंग्रजी गाण्यांकडेच होते. गंमत म्हणजे मला इंग्रजी गाण्यातील ओ का ठो समजत नसे. पण घरात चाललेल्या शास्त्रीय संगीताचे संस्कार कळत-नकळत माझ्यावर होत होते.  

शाळेत इयत्ता ५वी ते ७वी च्या वर्गांमध्ये आम्हाला संगीत म्हणून एक विषय असे. आमच्या बाई आम्हाला गाणी शिकवण्याचा प्रयत्न करीत आणि मी आणि माझे मित्र अथक कष्ट करीत न-शिकण्याचा प्रयत्न करीत असू. आमचे आवाज तेंव्हा फुटत होते. कंठात गुठळी दिसू लागली होती. त्यात आम्हाला आमच्या बाई  'गुनी गावत काफी राग' या पंक्तीने राग काफी शिकवीत असत. त्यांची काय चूक म्हणा, आमचे शंखा सारखे पोकळ आणि घोगरे गळे, त्यातून शिट्ट्याच वाजणार! 

शिक्षणासाठी परदेशात असतांना आमच्या कॉलेज च्या सांस्कृतिक भवनात पंडित जसराज यांचा कार्यक्रम होता. माझ्या मोठ्या भावाने माझ्या वाढदिवसा निमित्त मला या कार्यक्रमाची तिकिटे भेट म्हणून दिलीत. सोबत आई पण असणार होती. मला सुरुवातीला वाटले कि मला कळत नाहीं फारस त्यामुळे कंटाळा आला तर निघून येईन. लहानपणापासूनचे कानावर पडलेले सगळे सूर आणि ताल येथे एकत्रित माझ्यासोबत जणू बसले होते. सभागृहातील वातावरण वेगळेच होते. निदान मला तरी तसे भासले. त्यादिवशी पंडितजी सुद्धा भलत्याच फॉर्म मध्ये होते. इतके सुरेख गायलेत कि त्या आठवणीने अजूनही अंगावर काटा येतो. श्रीकृष्णाची भजन तर इतकी अप्रतिम होती. मध्यंतराच्या आधी त्यांनी कृष्ण-नामाचा जप केला. ८-१० मिनिटे फक्त कृष्णा-कृष्णा-कृष्णा चा गजरात संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले होते. जप सुरु करायच्या आधी पंडितजी म्हणालेत कि "कृष्ण-जाप करते है. देखते है भगवान आते है कि नहीं" कृष्ण कधी येतो आणि कुठे येतो त्यालाच ठाऊक. पंडितजींची हाक श्रीकृष्णाने ओ देण्यायोग्य नक्कीच होती. माझ्या कानात आणि मनात त्या जपाचे नाद अजूनही आहे. या कार्यक्रमाच्या अनुभूतीने माझा भारतीय संगीताचा प्रवास अश्या प्रकारे सुरु झाला.

त्या नंतर मी पंडित जसराज यांची सगळी प्रसिद्ध भजने अक्षरशः दररोज ऐकू लागलो. त्यांचे 'गोविंद दामोदर माधवेती' हि बिल्वमंगल ठाकूर यांनी रचलेले भजन फार सुरेख आहे. त्याचे सभेत आळवलेली प्रत सगळीकडे उपलब्ध आहे. त्यांच्या साथीला पंडित संजीव अभ्यंकर आहेत. या व्यतिरिक्त पंडित जसराज यांनी आद्य शंकराचार्यांच्या अनेक रचना गायल्या आहेत. त्यांचे गंगा स्तोत्रम मला फार आवडते. स्तोत्र तर अर्थपूर्ण आणि रसाळ आहेच पण पंडित जसराज भक्तिपूर्ण गायले आहेत. जगन्नाथ पंडित लिखित गंगा लहरी हि अजून एक सुरेख रचना पंडित जसराज यांनी गायली आहे. 

अश्यातच मला कर्नटिक शास्त्रीय संगीताची ओळख अचानक झाली. स्वामी दयानंद सरस्वती यांचे अमेरिकेत पेनसिल्व्हेनिया राज्यात आर्ष गुरुकुल आहे. गुरुकुलाची एक दिवसभराचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. त्यात हॉटमेल चा शोधक - सबीर भाटिया याला बोलावले होते. सबीर भाटियाला बघायला मिळेल किंव्हा भेटायला मिळेल म्हणून मी त्या कार्यक्रमाला गेलो. त्याला भेटायला मिळाले पण तिथे तास-दोन तासाचा कर्नाटिक संगीताचा कार्यक्रम होता. ते वातावरण धार्मिक असेल म्हणून किंव्हा माझी मनस्थिती ते संगीत ऐकण्याच्या लहरीत असेल म्हणा पण मला ती गायकी फार भावली. दक्षिण भारतात अजूनही रूढ आणि दृढ असलेली हि प्राचीन गायकी पद्धती, उत्तर भारतीय शास्त्रीय किंव्हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतापेक्षा वेगळी नक्कीच आहे. पण कर्नटिक असो कि हिंदुस्तानी, मूळ भारतीय कला, नृत्य, शिल्पकारी, अभिनय आणि गायकीतच आहे. सामवेदांवर आधारित कर्नाटिक राग आहेत. यात गायकीला अधिक महत्व असते. यावर आधारित पुढे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आहे. पण हिंदुस्थानी मध्ये गायकीला जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व वाद्यांना (तबला, सितार, वीणा इत्यादी) सुद्धा आहे. राग आळविण्याचे अभिजात स्वातंत्र्य हिंदुस्तानी मध्ये अधिक आहे. त्यामुळे भीमसेन म्हणा किंव्हा किशोरी आमोणकर म्हणा, यांना हवा तसा तो राग सजविण्याचे स्वातंत्र्य आहे. अर्थात, हा राग सजविणे सोपे नाहीं. भीमसेन जोशींचे हे आळविणे फक्त त्यांनाच जमेल. पण कर्नटिक मध्ये शिस्तबद्ध गावे लागते.

हिंदुस्तानी शास्त्रीय मध्ये मुस्लिम गायक पण बरेच आहेत. पण आपल्या नशिबाने इस्लाम धर्म इथे लुडबुड करीत नाही. आणि या मुस्लिम गायकांनी आणि गायकी घराण्यांनी हिंदुस्थानी गायकी पद्धत समृद्ध केली आहे. अगदी गुरु-शिष्य परंपरेतहि हिंदू गुरु आणि मुसलमान शिष्य किंव्हा मुस्लिम गुरु आणि हिंदू शिष्य हे दिसते. बहुधा याचे कारण कि यांचा सगळ्यांचा खरा धर्म शास्त्रीय संगीत आहे आणि सरस्वती, गणपती आणि श्रीकृष्ण हीच आराध्य दैवत आहेत. 

या दरम्यात कर्नाटिक संगीत ऐकण्याची माझी गाडी हळू हळू पुढे सरकत होती. त्यागराज स्वामी हे कर्नाटिक संगीताचे थोर संकल्पक, कीर्तनकार, भजनकार होते. (मराठी तंजोर राज्यकाळात यांनी आपले जीवन कंठिले) त्यांची 'गिरीराज सुधा' ही 'कीर्ती' फार प्रसिद्ध आहे. याची कीर्तीची नवीन काळातील वाद्यांना घेऊन एक नवीन संकल्पना 'रिमेम्बइरिंग शक्ती' नावाच्या एका वाद्यवृदांने (बँड) केलेली आहे. या वाद्यवृंदात संगीत क्षेत्रातील एक से एक धुरंधर आहेत. गायकीला शंकर महादेवन, तबल्यावर झाकीर हुसेन, मंडोलीन वर यु. श्रीनिवास, गिटार वर जॉन मॅकलौघालीं आणि घटकं व मृदंगम वर वी. सेल्वराज आहेत. या सगळ्यांचा 'गिरीराज सुधा' चा नवीन आविष्कार म्हणजे पंचपक्वांनाची मेजवानीच. कर्नाटिक संगीताचा वारसा जपत, तरी नवीन काळाच्या 'कानांना' रुचेल अश्या संगीतात एखाद्या दोनशे-तीनशे वर्ष जुन्या कीर्तीला गुंफणे हे सोपे नाहीं. पण संगीत क्षेत्रातील दिग्गज एकत्र येतात तेंव्हा काहीच कठीण नाहीं! 

कॉलेज च्या शेवटल्या वर्षी मला उस्ताद झाकीर हुसेन आणि श्री अनुप जलोटा यांच्या बैठकीचा अनुभव मिळाला. पहिल्या अर्ध्यात केवळ झाकीर हुसेन आणि मग दुसऱ्या अर्ध्यात अनुप जलोटा यांची भजने, आणि झाकीर हुसेन यांची साथ असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. झाकीर हुसेन यांनी केवळ तबला वादनच केले असे नाहीं. त्यांनी भारतीय संगीत, भारतीय वाद्ये आणि तबला या विषयांवर एक 'मास्टर क्लास' घेतला. भारतीय संगीत परंपरा किती जुनी आहे, आपल्या प्रत्येक देवाचे आणि देवीचे एक विशिष्ट वाद्य असते, तबल्याचा इतिहास कुठून सुरु होतो अश्या तऱ्हेची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रम तर उत्तम होताच पण कार्यक्रमानंतर मी त्यांच्या खोलीशी ताटकळत उभा होतो. तर त्यांनी आत बोलावले. मी रीतसर 'कार्यक्रम बहोत अच्छा हुआ' असं काहीसा म्हणालो आणि नमस्कार करायला खाली वाकलो तर त्यांनी एकदम हात धरलेत आणि "जवान हो, पैर नाहीं, दिल से मिलो" असा म्हणत मिठी मारली. इतका थोर माणूस पण त्यांच्यात विलक्षण नम्रता होती. संगीताचे आणि संगीत परंपरेचे ते खरे साधक आहेत.

या सगळ्या घडामोडीत वर्षे जात होती आणि मला शास्त्रीय संगीताचे नव-नवीन हिरे मिळत होते. मला कुठला राग आहे हे कधीच कळत नाहीं. माझ्या मामा ला राग कुठला आणि कुठला राग कधी गायला हवा हे माहिती आहे. मला अजूनही कळत नाहीं. पण चांगला पदार्थ, चांगलं चित्र, चांगलं वस्त्र यांच्यातील बारकावे कधी नाहीं कळले तरी ते उत्तम प्रतीचे आहे हे नक्कीच लक्षात येते. तसेच माझे शास्त्रीय संगीताच्या बाबतीत होत होते. परदेशी असतांना मी तेथील मंदिरांमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना जात असे. दक्षिण भारतीय देऊळ असेल (तेलगू समाजाने अमेरिकेत अनेक मंदिरे बांधली आहेत) तर एकतर भरतनाट्यम किंव्हा कुचिपुडी नृत्यूचं कार्यक्रम असे किंव्हा कर्नटिक संगीत ऐकायला मिळे. कुठलीही नवीन रचना ऐकली किंव्हा नवीन राग ऐकलं कि मी त्यावर उगाच संशोधन करायला लागलो. गायक, घराणे, गान-पद्धती, त्या गायकाचे इतर आविष्कार, आणि गायलेले आवडले तर ते पाठ करायचे. पंडित जसराज यांच्यामुळे आदी शंकराचार्याच्या बऱ्याच रचनांची ओळख झाली. गंगा स्तोत्रम हे गंगा महिमा आहे. त्यातील ११ वे कडवे - "वरमिह नीरे कमठो मीनः किं वा तीरे शरटः क्षीणः ।" हे पंडितजी इतके काकुळतेने गातात कि त्यांनी गायलेले गंगा स्तोत्र ऐकून गंगा माई माझ्यासारख्या ऐकणाऱ्यावरही प्रसन्न होईल. 

नुकतीच मला कर्नाटिक पद्धतीत प्रस्तुत केलेली एक जुनी पण प्रसिद्ध रचना - 'कलिंगा नर्तन तिल्लन' ऐकण्यात आले. अरुण साईराम किंव्हा कुलदीप पै या सारख्या प्रसिद्ध गायकांनी  हि 'तिल्लना' प्रस्तुत केली आहे. तिल्लना म्हणजे तालबद्ध रचना. बैठकीच्या शेवटी या पद्धतीत रचना गायली जाते. साधारण या रचनेवर नृत्य केल्या जाते. माझी आवडती 'कलिंगा नर्तन तिल्लन' प्रस्तुती निदमंगलम कृष्णामूर्थी भागवतार यांची आहे. हि तिल्लना चे रचेते श्री उथकुडू व्यंकट कवी म्हणून आहेत. हे मूळचे तामिळनाडूचे कवी आहेत आणि यांचा कार्यकाळ अठराव्या शतकात होता. श्री व्यंकट कवींच्या प्रतिभेचे ठसे अजूनही तामिळ संगीत जगतावर दिसतात. या रचनेचा कल्पनाविलास म्हणजे श्रीकृष्णाने कालियामर्दनाच्या वेळेस कालिया नागाच्या डोक्यावर नृत्य या तालावर केले असणार.  भागवत कीर्तन किंव्हा हरीकथेत, भागवतकार या रचनेला गात असत. नीट लक्ष देऊन ऐकलंत तर मधेच गायक 'हिस्स' असं स्वर काढतात. हा स्वर म्हणजे कालिया थकून आणि पराजित होऊन तलावातून निघून जातो आहे. 

काही महिन्यांपूर्वी उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना गातांना ऐकले. सोबत उस्ताद विलायत खान होते. आणि बिस्मिल्लाह खान स्वतः शहनाई पण वाजवीत होते पण मध्ये त्यांनी शहनाई बाजूला ठेऊन गाणे सुरु केले. खर्जातील त्यांचा आवाज वेगळा होता पण गाणे सुरेल आहे. मी त्यांच्या बद्दल वाचायला लागलो तर मागे त्यांनी एका मुलाखतीत त्यांना बाळकृष्ण  ट्रेन मध्ये अचानक कसा भेटला हा अनुभव सांगितला आहे. आणि बाळकृष्ण त्यांना एकदाच भेटला असे नाहीं. तर त्यांच्या लहानपणी त्यांच्या काकांसोबत ते घराजवळच्या बालाजी मंदिरात रियाज करीत असत. एकदा ते तल्लीन होऊन काही तास शहनाई वाजवीत होते. डोळे उघडले तर समोर गाभाऱ्यातील बालाजी बसललेला! अद्भुत प्रसंग आहेत. त्यांचा गुगल वर एक फोटो आहे. बिस्मिल्लाह खान त्यांच्या अंथरुणावर बसून आहेत. त्यात फोटोत समोर भिंतीवर बाळकृष्णाची फोटो आहे. म्हणजे सकाळी डोळे उघडून बसलेत कि त्यांना पहिले समोर बाळकृष्ण दिसत असणार. 

मधे राग देश वर आधारित रचना शोधतांना मला विदुषी शुभा मुदगल यांनी गायलेली  'बाजत नगारे' हि रचना सापडली. या कवितेला ब्रिज भाषेतील 'कवित्त' असे म्हणतात. हे कवित्त मुबारक अली 'बिलग्रामी' यांनी लिहिलेली आहे. मला कवित्त हा प्रकार नव्याने कळला. शुभाबाईंनी हे कवित्त अत्यंत प्रसन्न गायले आहे आणि कवित्तेचे शब्द साधे असले तरी रसाळ आहे. कवित्त वाचतांनाऐकतांना पाऊस होतो आहे असा भास होतो. सगळे शब्द मला समजले नाहीं पण एक ओळ मला भावली - 'नीलग्रीव नाच कारी कोकिल आलाप चारी,'. यातील नीलग्रीव म्हणजे शंकर अपेक्षित आहे कि निळ्या मानेचा मोर? 

विविध तऱ्हेच्या कलांमध्ये संगीत कलेला वेगळ्या पंक्तीत बसवायला हवे. मनुष्य जेंव्हा झाडावरून उतरून वानराचा नर झाला तेंव्हा पासून तो शिट्टी वाजवून गुणगुणायला लागला असणार. आणि तेंव्हापासून कोणी तरी गाणं गातो आणि कोणी तरी गाणं ऐकतो. आनंद देण्याचा आणि आनंद घेण्याचा याहून सोपा मार्ग बहुधा नसावा. भारतीय शास्त्रीय संगीताने या आनंदाला संस्कृतीची कोनशिला बनविली. पिढ्यानपिढ्या पुढे देता येईल असा ठेवा बनविला. सोळाव्या शतकातील मुबारक अली या मुसलमानाने ब्रिज भाषेत इतकी सुंदर कविता लिहिली आणि पाचशे वर्षांनी राग देश मध्ये शुभा बाई मृगाच्या पहिल्या सरी  सारख्या गायल्यात. या संगीताच्या भक्तीत बिस्मिल्लाह खान यांना बाळकृष्ण भेटून नवीन राग शिकवतो तर भारतापासून हजारो मैल दूर पंडित जसराज कृष्णाचा जप करून प्रेक्षकांना देवत्वाचा भास करून देतात. या हजारो वर्ष अखंड चालू असलेल्या संगीत परंपरेचा, संस्कृतीचा आणि संगीत मार्तंडांचा अनुभव घेता येतो, आनंद घेता येतो हे माझ्या सारख्या पामराचे भाग्य.  

5/22/24

मराठी साम्राज्याचा ऱ्हास - मराठा सैन्यातील मराठेतर सैनिक

मराठी इतिहास वाचायला लागलो कि मनात विचारांची झुंबड उडते. हा लेख खरं मला पुढल्या महिन्यासाठी लिहायचा होता. पण डोक्यात आलेला विचार पानांवर उतरविणे आवश्यक आहे. मागचे काही लेख वाचले असतील तर वाचकांना माहिती असेल कि सध्या श्रेष्ठ आणि जेष्ठ इतिहासकार श्री सेतू माधवराव पगडी यांची पुस्तके वाचणे चालू आहे. आणि त्या निमित्ताने 'चंद्रप्रकाशी' लेख मालिका पण चालू केली आहे. पण कुठलाही इतिहास वाचतांना नवीन प्रश्न मनात निर्माण होतात. त्याचा हा मागोवा. (हा लेख 'चंद्रप्रकाशी' नव्हे.) 

मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ तोरणा किल्ल्यावर भगवा फडकवल्यापासून झाली. राज्याची सुरुवात केवळ जमीन किंव्हा किल्ले जिंकून होत नाहीं. पण राज्यस्थापनेची आवश्यकता काय? आणि आत्ताच का? आणि तसेच हा राजाच का आणि त्याच्यासाठीच का लढायचे या प्रश्नांची सुद्धा उत्तरे स्पष्ट हवीत. छत्रपती शिवाजींची किमया इथेसुद्धा प्रकर्षाने जाणविते. त्यांनी जोडलेली माणसे, त्यांनी प्रेरणा दिलेले सैन्य त्यांच्या निधना नंतरही शंभरहून अधिक वर्षे लढत राहिला. प्रत्येक साम्राज्य उदयास येते तसेच अस्तास पण जाते. साधारण कुठल्याही साम्राज्याचे शिखर ९० ते १०० वर्षे मानायला हरकत नाहीं. काही साम्राज्ये या कालावधीत इतकी शक्तिशाली होतात कि त्यांचा अस्त झाला तरी त्यांचा पगडा अजून अनेक दशके टिकून रहतो. मराठी साम्राज्याचा सुवर्ण काळ आपण साधारण सन १७१२ (जेंव्हा बाळाजी विश्वनाथ यांनी मोगालंना चौथाई देण्यास भाग पाडले) ते सन १८१० ( जेंव्हा यशवंतराव होळकर यांचा मृत्यू झाला) मानू शकतो. त्याच्या आधीच काळ चढतीचा आणि त्याच्या पुढला उतरणीचा. पण जेंव्हा राज्य उतरणीला लागले तेंव्हा एकदम कोलमडलेच. काही सरदार घराणी शाबूत राहिलीत पण भारतावरचा मराठी राज्याचा पगडा एकदम उठला असे वाटते. ते का? 

याची अनेक कारणे आहेत. उदाहरणार्थ सन १७९५ ते सन १७९८ च्या कालावधीत अहिल्याबाई होळकर, नाना फडणवीस आणि महादजी शिंदे या सगळ्यांचे मृत्यू होऊन मराठी राज्यात पुढाऱ्यांची एक मोठी फळी अचानक नाहीशी झाली. माधवराव पेशव्यानंतरचे राघोबादाद यांना पेशवा करायला हवे होते. पण त्यांना न करून पुढे झालेल्या भानगडींमुळे पेशवाई कोलमडली. भट घराण्याचा पेशवाई चा हक्क काढून दुसऱ्या सरदार घराण्यांमधून कोणाला तरी पेशवा केले असते तर?  या व्यतिरिक्त एक अजून कारण माझ्या अल्प-बुद्धीला जाणवते ते म्हणजे मराठ्यांनी भारतावर राज्य केले पण भारतीय कधी फारसे मराठी सैनिक झाले नाहीत. या मुद्दयाचा आपण थोडा विचार करूया. 

(मराठी घोडेस्वार)

मागल्या लेखात निझामाबाद्दल लिहितांना, निझामाचा थोडा अभ्यास झाला. पगडीकृत निझामावरचे पुस्तक उपलब्ध आहे आणि पुढे त्या अनुषंगाने अजून लिहिणे होईलच. पण एक मुद्दा मला प्रकर्षाने जाणवला तो म्हणजे निझामाने मोठ्या कुशलतेने वापरलेली हिंदू प्यादी. निझाम मूळ औरंगझेबासारखा धर्मांध नव्हता. त्याचा प्रमुख अधिकारी वर्ग जरी मुसलमान असला तरी त्याला सत्ता प्रस्थापित करणे आणि सत्ता उपभोगणे अधिक महत्वाचे होते. आणि सत्ता क्षेत्र आणि सत्तांकीत बहुतांश हिंदू असल्यामुळे त्याने अनेक हिंदू आपल्या सैन्यात आणि प्रशासनात आणिले. त्याने मराठ्यांचे अनेक सरदार आपल्याकडे वळविले आणि तसेच प्रशासनात महसूल खात्यात किंव्हा जमीन संबंधित क्षेत्रात मराठी अधिकार वर्ग आणला. या अधिकारी आणि सरदारांना मानाच्या पदव्या दिल्यात आणि जमीनी-जहागिरी पण दिल्यात. त्यामुळे दोन गोष्टी झाल्यात, एक म्हणजे बहुसंख्य असलेला हिंदू वर्ग निझाम विरोधी राहिला नाहीं आणि दुसरा म्हणजे सैन्यात त्याला मध्य आशिया किंव्हा तत्सम प्रदेशातून मुसलमानी सैनिक आणायची आवश्यकता पडली नाहीं. अर्थात, असे धोरण करणारा निझाम पहिला नाहीं. या आधी आदिलशाही आणि निझामशाहीनेही हेच धोरण पत्करले होते. पण आदिलशाही किंव्हा निझामशाही हे परदेशी मुसलमान नव्हते. धर्मान्तरित भारतीय मुसलमान होते. या तुलनेत चिलकीच खान किंव्हा त्याचा बाप हे थेट परदेशी मुसलमान होते. 

निझामाचे हे धोरण त्याने बहुधा अकबराचे उचलले असणार. अकबर हा मोघली सत्तेचा तिसरा बादशाह. आणि सगळ्यात प्रसिद्ध पण. त्याने आपली पाळ-मूळ पक्की करायला एक नवीन धोरण आखले. जे त्याच्या आधीच्या कोणी मुसलमानी क्रूरकर्म्या हिंदू-द्वेष्ट्यांनी अंगिकारले नव्हते. अकबराने राजपुतांमध्ये फूट पाडली आणि जयपूरच्या अंबर घराण्याशी एकांगी रोटी-बेटी चे संबंध प्रस्थापित केले. (अंबर घराण्यातील पोरीबाळी मोघल बादशहाच्या हारेम मध्ये दाखल होऊ लागल्यात. जेंव्हा औरंगझेब मेला तेंव्हा १७०७ च्या अंबर घराण्याच्या राजाने ताबडतोब घोडे दिल्ली ला दौडविलेत आणि राजपूत स्त्रियांना मोघली घरातून सोडवून परत जयपूर ला घेऊन आला. त्यानंतर जयपूर घराण्याची कोणीही स्त्री पुन्हा कधी मोघलांकडे गेली नाहीं.) आणि हिंदूंना त्याच्या दरबारात मानाची स्थाने दिलीत. त्यामुळे त्याला राजपुतांचे आयते सैन्य लढाया करायला मिळाले आणि उत्तरेतील त्याच्या विरोधातील उठाव नाहीसे झाले. हेच धोरण औरंगझेबापर्यंत कायम राहिले. अर्थात, औरंगझेबाने मोगलाई बुडवण्यामागे बरीच कारणे होती. धर्मांधता, मूर्ख राजकीय चाली, आत्यंतिक द्वेष,आत्यंतिक अहंकार पण सगळ्यात मुख्य म्हणजे त्याच्या हिंदुविरोधी धोरणांनी त्याने स्वतःच्या पायावरच धोंडा पाडून घेतला. 

(जयपूरच्या कछवा घराण्याचे राजचिन्ह)

वरील उदाहरणात एक गोष्टी स्पष्ट होतात. अल्पसंख्याक जर का सत्ताधारी झालेत तर बहुसंख्यांना सैन्यात आणि प्रशासनात घेणे हे आवश्यक धोरण आहे. म्हणजे मोगलाई फक्त मोघली रक्ताच्या सैन्यावर उभी नव्हती तर त्यात असंख्य राजपूत सामील होते. त्या व्यतिरिक्त शिपाई-गडी स्तरावरही अनेक उत्तर भारतीय हिंदू होते. पण हिंदू सरदारांना मान असला तरी त्यांच्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे, कुठल्याही मोघलांच्या स्वारीत हिंदू सरदारासोबत एक त्याच्या पदाचा किंव्हा त्याच्याहून उंच पदावर असलेला एक मुसलमान, आणि बहुधा परदेशी मुसलमान, सरदार नेहमी असे. उदाहरणार्थ, मिरझा राजे जयसिंग सोबत दिलेरखान आला होता. मोगलांसारखेच इंग्रजांनीहि भारतावर राज्य करायला भारतीयांचाच पुरेपूर फायदा घेतला. बाकी जगात इंग्रजांनी जिथे जिथे राज्य केले तिथल्या स्थानिक लोकांना त्यांनी कधीच सैन्यात घेतले नाहीं कि त्यांना कधीच प्रशासनात घेतले नाहीं. उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात तर त्यांनी स्थानिक लोकांना नामशेष केले. पण भारतात मात्र अगदी सन १७५८ च्या इंग्रजी-फ्रान्स च्या युद्धातही इंग्रजांकडून भारतीयच लढत होते.  

मराठ्यांकडून कुठले मराठेतर समाज लढत होते? संपूर्ण भारतावर जेंव्हा राज्य पसरले तेंव्हा मराठे हे अल्पसंख्यांकच होते. मराठेतर हे भारतीय आणि हिंदूच होते पण छत्रपतींपासून मराठी समाजाने दाखवलेले धाडस, पराक्रम आणि जागृती हि मराठेतर समाजात नव्हती. त्यामुळे मराठ्यांना अल्पसंख्यांक मानायला हवे.  दोन उदाहरणे माझ्या पटकन ध्यानात आलीत, ती म्हणजे इब्राहिम गारदी जो पानिपतच्या युद्धात मराठ्यांकडून, भाऊसाहेबांच्या हुकुमानुसार लढला आणि जीव हि दिला. दुसरे म्हणजे, महादजी शिंदे यांनी फ्रेंच युद्धसैनिक विशेषज्ञ 'डी बोईन' याच्या प्रशिक्षण खाली अत्याधुनिक अशी एक तुकडी तयार केली होती. पण या तुकडीत शिपाई मराठीच होते. पण दिल्ली ते तंजावर आणि मुंबई ते कलकत्ता पर्यंत मराठी साम्राज्य जे पसरले होते त्यात सैन्याधिपती आणि सैन्य मराठीच होते. ओरिसा ला जाऊन नागपूरच्या रघुजीराजे भोसल्यांनी ओडिया समाजातून सैन्य उभे नाहीं केले. किंव्हा हैदर अली ला नामोहरम करून सवाई माधवरावांनी पुढे तामिळ किंव्हा कन्नड समाजातून सैन्य उभे नाहीं केले. थोरल्या बाजीरावांनी अख्खे  उत्तर हिंदुस्थान पादाक्रांत केले आणि दिल्ली सुद्धा लुटले पण तेथील पंजाबी किंव्हा जाट समाजाचे सैन्य किंव्हा सरदार मराठी दरबारात सामील झाले नाहीत.  

(विषयांतर होते आहे पण एक छोटी गोष्ट इथे सांगावीशी वाटते. थोरले बाजीरावांनी दिल्ली पर्यंत मजल मारली होती. मोघली सैन्य त्यांच्यापुढे तग धरू शकत नव्हते. त्यांनी दिल्लीच्या पालिका बाजार ला मुक्काम केला होता आणि बादशहा ला आपण आल्याचा निरोप पाठवला होता. या दरम्यान त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना त्यांनी निरोप पाठवला कि त्यांनी हुकूम केला तर बादशहाला सिंहासनावरून खाली आणू आणि छत्रपतींना दिल्ली चा बादशहा म्हणून स्थापन करू. पण कोण जाणे पण छत्रपतींनी याला नकार दिला. पण जर तसे घडले असते तर मराठे दिल्लीपती झाले असते. दिल्ली तेंव्हा वाचले. आणि मोघली सिंहासन हि वाचले. त्या नंतर ३०-४० वर्षांनी महादजी शिंद्यांनी दिल्ली लुटले, आणि मोगली दरबार जाळला. असो.) 

(तुर्की जानिसारी सैनिक)

अजून एक उदाहरण येथे तुर्की साम्राज्याचे द्यायवेसे वाटते. या साम्राज्यात 'जानिसारी' म्हणून एक खास लष्करी तुकडी होती. हि तुकडी फक्त आणि फक्त सुलतानाला मानायची आणि त्याच्या थेट हुकूमाखाली येत असत. त्यावेळेस तुर्की साम्राज्य सध्याच्या पूर्व युरोप भागात पसरत होते. त्या भागातील ख्रिश्चन जनतेमधील हट्टीकट्टी, उमदी मुले सुलतान निवडीत असे आणि त्यांचे जानिसारी चे विशिष्ट प्रशिक्षण दिले जात असत. हि लष्करी तुकडी तुर्की रक्ताची नसत आणि मुसलमान पण नसत पण त्यांना तुर्की सैन्यात अत्यंत उच्च दर्जा होता. मराठी साम्राज्यात अशी राजपूत किंव्हा तंजोरची तामिळ तुकडी असल्याची नोंद नाहीं. (थोरल्या बाजीरावांचा हुजुरी पागा हे खास लष्करी तुकडी होती) 

मराठी सैन्यात पिंडारी आणि बारगी लोक काही काही लढयात असत. खासकरून इंग्रजां विरुद्धच्या लढयात पिंडारी लोक खूप होते. पण इतर समाज सैन्यात सामील झालेल्याची नोंद कुठे नाहीं. 

दुसऱ्या हिंदू समाजातून सैन्य उभे केले असते तर मराठ्यांना भारतीय हिंदूंचा विरोध कमी झाला असता. नवीन प्रदेश आणि नवीन समाजातून आलेले सैन्य नवीन कल्पना घेऊन येतात त्याचा उपयोग एकूण राज्याला होतो. आणि मुख्य म्हणजे हिंदू धर्मियांची एकी झाली असती आणि मुसलमानी सत्ता खिळखिळ्या झाल्या असत्या आणि पुढे इंग्रजांना पाय रोवायला जागा मिळाली नसती. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे सगळ्या भारतभर महाराष्ट्र धर्म पसरला असता.