12/10/25

स्वप्नातली पातळ भाजी, उडणारा सोफा आणि मी

मला बसल्या बसल्या झोप लागू शकते. खुर्चीवर, बाकावर, कुठेही. आणि बरं खूप वेळ झोपतो असेहि नाहीं. १० मिनिटे पुरतात. पण मी अगदी गाढ 'घोडे बेच के' झोपतो. या डुलक्या पॉवर नॅप्स वगैरे भानगडी पण नाहीत. पण गंमत अशी कि मला तेवढ्यातल्या तेवढ्यात स्वप्न हि पडतात. काही स्वप्न विचित्र असतात, काही गमतीदार. काही आठवतात, काही नाहीं. दोन-तीन दिवसापूर्वी एका लग्नात दुपारी जेवल्यानंतर मी खुर्चीवरून स्वप्न नगरीत आरोहण केले. स्वप्ने (स्वप्ना नाहीं!) जणू वाटच बघत असावीत. मी स्वप्नात पालकाची पातळ भाजी-भात खात होतो. मला पातळ भाजी खूप आवडते. खास करून नागपूर भागात कोरड्या खोबऱ्याचे तुकडे आणि लाल मिरच्यांची फोडणी घातलेली. पण मला भाजीत सारखी कचकच लागत होती. मी अस्वस्थ होत होतो. पातळ भाजी भात, किंव्हा वांग्याचे भरीत आणि फुलके अशी काही कॉम्बिनेशन्स आहेत ज्याची मी वाट बघतो. (अशी अजून बरीच कॉम्बिनेनशन आहेत. त्याचा एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. आदल्या दिवशीची मुगाची खिचडी आणि त्यावर दूध, अगदी सायी सकट, कधी न्याहारीस खाल्ले आहे का? नसेल तर जरूर खा. हे वाचून नाक मुरडणाऱ्यांना गा. गु. च. का.!) पण अगदी स्वप्नात का होईना, ती कचकच मला त्रास देत होती. मी विचारले कि "कोणी केलीय पातळ भाजी? मेथी नीट धुतली नाहीं का?" "मेथी नाहीं, पालक आहे ( मलाच गा. गु. च. का.!). पण कोणी उत्तर दिले ते समजेना. स्वप्ने आपली असतात पण हवी ती लोक त्यात येत नाहीं. आणि जी येतात ती आपण बोलावलेली हि नसतात. उगाच एक वात्रट विचार - आपल्याला हव्या त्या व्यक्तीला स्वप्नात बोलावता आले असते तर मी ऐश्वर्या राय ला पातळ भाजी वाढायला नसते का बोलावले? असो  मी स्वप्नात करीत होतो कि स्वयंपाकघरातून हे कोण बोलतय. तेवढ्यात पुन्हा दाढेखालती कच झालं. मी अगदी फ्रस्ट (" frustrated ') झालो. "अरे यार पातळ भाजीत कचकच म्हणजे लाईफ ला अर्थच नाहीं". पण पातळ भाजीचा माझ्या लाईफ वरचा प्रभाव नेमका काय इत्यादी विचार यायच्या आधीच जाग आली. बाजूला सौ. (आमच्या)  बसल्या होत्या. त्यांना माझी अशी डुलक्या मारण्याची सवय आहे. "अरे, केवढे दात कचकच करत होतास" म्हणजे मी झोपेत दात घासत होतो म्हणून माझ्या मेंदूने एवढ्या धक्कादायक घटनेचे चित्र रंगविले? 

मग मी विचार करू लागलो कि नेमकी कुठल्या प्रकारची स्वप्ने मला पडतात. स्वप्ने सगळ्यांनाच पडतात. आणि माझी स्वप्ने सर्वसाधारणच असणार पण माझ्या साठी ती वैशिष्ट्यपूर्ण नक्कीच आहेत. यातून मला जीवनाचे कोडे (किंव्हा कोडी!) उमगते इत्यादी ठोंबेपणा माझ्यात नाही. उठल्यावर जर कधी कुठली स्वप्ने आठवलीत तर मला बहुतांश वेळा हसू येते कि काय वेडगळ आहे माझा मेंदू असे वाटते. (माझ्या काही मित्रांची मीच वेडगळ असल्याची ठाम समजूत आहे. त्यांनी तसे निसंकोच पणे मला बोलून दाखविले आहे.) 

अगदी लहानपणाची आठवण आहे. मला स्वप्नात दुधाचे धबधबे दिसायचे. मी दुधात पोहोतोय आणि धबधब्यात खेळतो आहे असे दिसायचं. तान्हा असतांना मला दुधाची ऍलर्जी होती. अर्थात ते मला आठवत नाहीं. पण चांगलं ५-७ वर्षांचा असतांना पर्यंत मला हे स्वप्न पडत असे. मी सकाळी एकदम आनंदात उठायचो आणि मग उठल्या-उठल्या ताबडतोब, अगदी अंथरुणातच,  दूध न मिळाल्याने ठणाणा करायचो. माझे आई-वडील नक्कीच confuse होत असतील कि या पोट्ट्याचा नेमका प्रॉब्लेम काय आहे ते! त्या दरम्यान मला झोपेत वाघ हि दिसत असे. (दुधाचे धबदबे आणि वाघ, वाह ..कमाल आहे!) आमचे घर खरं नागपूरला नाग नदीच्या काही अंतरावरच होत. स्वप्नात नाग दिसायला हवे. बरं, लहानपणी वाघ पण कधी बघितला नव्हता. लहानपणीच काय, आजगयत ताडोबा, नागझिरा, कान्हा, पेंच....कुठे म्हणजे कुठे मला वाघोबा दिसला नाहीं. (प्रत्येक वेळेस 'कांदे-पोहे' खायला जाणाऱ्या होतकरू तरुणासारखा मी सफारी ला जातो आणि ग़ज़ब बेइज्जती होऊन परत येतो. एकदा गाईड ने आम्हाला एका भल्यामोठ्या झाडाच्या बुंध्यावर वाघाच्या नखांचे ओरखडे दाखविले. मी उत्साहात विचारलं कि आज सकाळचे ओरखडे आहेत का, थोडक्यात 'ताजे' ओरखडे आहेत का? तो म्हणाला नाहीं...खूप वर्ष जुने आहेत. चायला...ओरखडे पण शिळे-पाळे बघायला मिळालेत.) पण स्वप्नात मात्र वाघोबा दिसायचा. पूर्व जन्मी मी वाघ असेंन  किंव्हा शेळी, वाघाने खाल्लेली! म्हणूनच असा वाघ दिसायचा मला स्वप्नांत. 

अजून एक स्वप्न जे मला सातत्याने पडते, ते म्हणजे माझे आकाशात उडणे. विमानात नाहीं. पक्षासारखा आकाशात भराऱ्या मारतो. मला पंख पण नसतात. एकदा तर मी सोफ्यावर बसून उडत होतो. सोफ्याला गिअर्स पण होते. आता हवेत उडायला गिअर्स का हवेत पण मी आपला खटखट करून गिअर्स बदलवित होतो आणि वर-खाली, मागे-पुढे होत होतो. हे सोफ़्याचे स्वप्न मला खूप म्हणजे खूप वर्षांपूर्वी पडले होते. पण स्वप्नात मी जेवढा हुरूळलो होतो तशीच भावना मला त्या बद्दल इतक्या वर्षांनी लिहितांना येते आहे. माझ्या घराजवळ एक मोट्ठे मैदान होते. त्यावर घारी घिरट्या मारीत असत. आकाशात गोल-गोल त्या फिरत असत. निळ्याशार आकाशात त्यांच्या कथ्या प्रतिकृती बघायला मला फार आवडायचे. जमिनीवरच्या रस्त्यांच्या, पाऊलवाटांच्या जाळ्यात ते फसलेले नसतात. स्वच्छंदपणे ते भूमीला आपल्या पंखात बांधतात. 

स्वप्नांत माझ्या उषा तेवते अन 

निशा गात हाकारिते तेथुनि, 

क्षणाधी सुटे पाय निडांतूनि अन, 

वीज खेळती मत्त पंखातुनि ||२|| 

अशी झेप घ्यावी, असे सूर गावे, 

घुसावे ढगामाजी बाणापरी, 

ढगांचे अबोली भुरे केशरी रंग, 

माखून घ्यावेत पंखापरी ||३||

- आकाशवेडी, पद्मा गोळे

"पक्षांना काय माहिती जमिनीवर धावण्याची मजा?" असा प्रश्न जमिनीवर वजनाचा भार टाकीत जाणाऱ्या मनुष्याला कधी पडणार नाहीं. उडण्यात काही वेगळीच मजा असणार. पंख पसरविले कि उडण्याची स्वप्ने मला नेहमी लक्षात रहातात. मी एकदा काही तरी जेट-पॅक सारखे पाठीला बांधून उडत होतो. त्या स्वप्नात खूप वेगाने मला उडता येत होते. मी आकाशात, ढगात, जमिनीलगत अश्या भराऱ्या मारीत होतो. काय मजा येत होती! अवर्णनीय! 

सगळीच स्वप्ने दुधाचे धबदबे आणि सोफ्यावरून उड्डाणाची नसतात. काही गडद आणि खोल असतात. मी ज्या घरात वाढलो ते घर सोडून दोन तप उलटून गेलीत पण स्वप्नात मी बहुतांश वेळा त्याच घरात असतो. मी मागे माझ्या एका गडद स्वप्नावर आधारित "घर"  गोष्ट लिहिली होती. हि गोष्ट स्वप्नातील सत्य-घटनेवर आधारित होती. आता स्वप्नावर आधारित गोष्ट सत्य घटना कशी काय? कारण स्वप्नात असतांना मला माहिती नव्हते कि हे स्वप्न आहे. आणि घाबरून घामघूम होऊन मी उठलो. देवाच्या दयेने असली स्वप्ने मला कमी पडतात. किंव्हा पडली तरी दुसऱ्या दिवशी आठवत नाहीत. 

सुप्रसिद्ध गणितकार श्री रामानुजन यांना स्वप्नात त्यांची कुलदेवी गणित सोडवायला मदत करायची असे ते म्हणत. इथे मला गणिताचा पेपर बघून घेरी येऊन स्वप्न पडायची. मला स्वप्नात कधी मी IIT पास झालो आहे किंव्हा मोठा निष्णात डॉक्टर झालोय असे कधीच दिसले नाहीं. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार! सगळीच स्वप्ने यशाची किंव्हा प्रेरणादायी असावी असे मुळीच नाही. प्रेरणा उघड्या डोळ्यांनीच आत्मसात करावी आणि उघड्या डोळ्यांनीच यशाच्या पायऱ्या चढाव्यात. स्वप्ने, स्वप्नेच राहू द्यावीत. ठरवून स्वप्ने पडत नाहीं  हे एकादृष्टीने वरदानच आहे. नाही तर मला कुठून दुधाच्या धबदब्यात न्हायला मिळणार? पक्ष्यासारखे उडायला मिळणार आणि कुठे खऱ्यात वाघाची साथ मिळणार? 

देवाची कृपा. आणि अशीच मला झोप लागत राहो हीच प्रार्थना. 

---

**वाघाचे चित्र - Image rights : Rose Corcoran - https://sladmore.com/artworks/tiger-in-my-dreams/ ) 

11/23/25

छत्रपती शिवाजी महाराज आणि आजची परराष्ट्रनीती - संक्षिप्त आढावा

छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती आणि परराष्ट्रनीती यावर आपण थोडेसेच बोललो आहोत. इतक्यातच माझ्या वाचनात गोवा पोर्तुगीज आणि महाराजांचे संबंध आणि संघर्षावर श्री महेश तेंडुलकर यांनी लिहिलेले एक पुस्तक आले. पुस्तकातील काही घटना आणि त्या अनुषंगाने महाराजांच्या परराष्ट्रनीती आणि स्वातंत्र्योत्तर भारताची परराष्ट्रनीती याचा थोडक्यात आढावा आपल्यासमोर मांडीन.

महाराजांची राजनीती आणि परराष्ट्रनीती:

१) स्वराज्य हेच एक परम कर्तव्य आणि त्याच्या उत्कर्षासाठी, त्याच्या सुरक्षिततेसाठी जे आवश्यक आहे ते सगळे करणे हि विचारधारा. - सन १६६० पर्यंत जागतिक पटलावर पोर्तुगीज सत्तेला मागे सारून स्पॅनिश सत्ता झपाट्याने उदयाला येत होती. पण जरी पोर्तुगीज साम्राज्याचा सूर्य कलता असेल तरी एक सागरी सत्ता म्हणून ते बलाढ्य होते. आणि भारतीय समुद्री सत्तेच्या तुलनेत तर पोर्तुगीज अतिशय प्रबळ होते. त्यांच्याकडील सागरी युद्धशैली आणि जहाजे बांधण्याचे तंत्रज्ञान त्या काळाच्या तुलनेत प्रगत होते. छत्रपतींना याची जाणीव होती म्हणून त्यांनी स्वराज्याचे आरमार बांधण्याचे ठरवले तेंव्हा त्यांनी पोर्तुगीजांना कारागीर मागविले. पोर्तुगीजांनी (मुंबई) ते सुरुवातीला पुरविले सुद्धा. पण नंतर गोव्याच्या गव्हर्नर ने मुंबई च्या कॅप्टन ला पत्र लिहून सांगितले कि शिवाजीचे आरमार उभे राहिले तर आपल्यालाच धोका उत्पन्न होईल. हे कारागीर बहुतांश ख्रिश्चन किंव्हा बाटलेले ख्रिश्चन होते. मुंबई च्या कॅप्टन च्या सल्ल्यावरून हे कारागीर रातो-रात पळून गेले. एवढेच नाहीं तर खाडीच्या तोंडाशी पोर्तुगीजांनी युद्धाची गलबते उभी केलीत जेणेकरून स्वराज्याची जहाजे बाहेर पडू शकणार नाहीं. अर्थात, आरमार तर नक्कीच तयार झाले आणि कोकणपट्टीवर झपाट्याने पसरले. त्यामुळे पोर्तुगीजांच्या या प्रति-हालचाली मुळीच यशस्वी ठरल्या नाहीत. पण हे सगळे माहिती असूनही महाराजांनी शक्यतोवर सलोख्याचे संबंध ठेवण्याचा वरवर तरी प्रयत्न चालू ठेवला. कारण महाराजांना जे हवे होते ते पोर्तुगीजांकडे उपलब्ध होते. थोडक्यात, परराष्ट्रनीती हि व्यावहारिक होती आणि त्यासाठी जे पडेल ते करायचे. भावनिक जाळ्यात न फसता.



(Indian Naval Museum, Kochin.  ब्लॉग लेखकाचा स्वतः काढलेला फोटो.) 

२) शत्रू हा कुठल्यातरी कारणासाठी शत्रू असतो. आणि ती कारणे जो पर्यंत बदलत नाहींत किंव्हा ती कारणंच नाहीशी होत नाहीं तो पर्यंत शत्रूस शत्रूच समजावे - पोर्तुगीज हि एक आक्रमक परराष्ट्रीय सत्ता होती. तिचा नायनाट करणे ध्येय होते पण तेवढे बळ नसल्यामुळे एक, पोर्तुगीजांना हात-पाय पसरविण्यापासून थांबवणे आणि दुसरा, थोडं- थोडं करून पोर्तुगीज प्रदेश घेत रहाणे हे महाराजांचे धोरण होते. छत्रपतींनी शत्रुत्व मोठ्या मानाने पत्कारले. त्यांची राजनीती आणि परराष्ट्रनीती हि जाणती होती. आत्तापर्यंत आपण पोर्तुगिजांबद्दल बोललो पण पोर्तुगीजांच्या तुलनेत इंग्रज त्या काळात तरी किरकोळ होते. पण त्यांच्याकडे तोफा प्रगत होत्या. शिवाजी महाराजांच्या काळात तोफांचे तंत्रज्ञान मोघलांकडे होते. किंबहुना मोघली तोफा आणि बंदूक पथकामुळे बाबर सन १५२६ च पानिपत चे पहिले युद्ध जिंकला होता. महाराजांना प्रगत तोफा हव्या होत्या. त्यांनी इंग्रजांकडे तशी मागणी केली. अर्थात इंग्रज ते द्यायला तयार नव्हते. पन्हाळ्याच्या वेढ्यात इंग्रजांनी सिद्दी जौहर ला तोफा दिल्या, पन्हाळ्यावर डागायला. काही काळाने महाराजांनी याची शिक्षा म्हणून चार इंग्रज कैद केले. मुंबईच्या इंग्रजांनी कैदी सोडायची मागणी केली तर महाराजांनी प्रगत तोफा द्या हि मागणी केली. इंग्रज ते देईनात, महाराज काही कैद्यांना सोडेना. त्यातले दोन कैदी पुढे कैदेतच मरण पावलेत. परकीय सत्ता धूर्त होत्या आणि त्यांच्याशी धूर्तपणे वागणेच महाराजांनी समंजस ठरविले. महाराजांच्या या नीतीचा, या वागण्याचा वारंवार उल्लेख इंग्रजी आणि पोर्तुगीज पत्र-व्यवहारात होतो.   इंग्रज असो कि पोर्तुगीज. मोघल असो कि आदिलशाह, यातील कोणीही त्यांची वागण्याची पद्धती बदलवली नाहीं. त्यांनी हिंदू राजा म्हणून महाराजांचा द्वेषच केला. थोडक्यात, शत्रू किंव्हा शत्रुत्वाची कारणे, या दोन्ही गोष्टी कधीच न बदलल्यामुळे महाराजांनी सगळ्याशी शत्रुत्वाचं निभावले. पण पुढे जाऊन त्यांनी कुतुबशाहीशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. 

३) शत्रुत्व करणे सोपे नाहीं. शत्रुत्व निभवायला बळ आणि शक्ती शिवाय दुसरा मार्ग नाहीं. आणि नुसतीच शक्ती नाहीं तर शक्ती प्रदर्शन आणि समोरच्यावर शक्तीचे परिणाम हे दोन्ही साध्य करणे आवश्यक आहे - महाराजांनी टप्प्या-टप्प्याने शक्ती संपादित केली. आधी सैनिक जमविले, मग किल्ले बांधले, मग आरमार बांधले मग समुद्री किल्ले बांधले. गोव्यावर सरळ जाणे शक्य नव्हते. गोव्याच्या सरहद्दीला आदिलशाही राज्य होते. महाराजांनी आरमार, समुद्री किल्ले वगैरे तयारी करतांना आदिलशाही कोकण आणि तळ-कोकण घेण्याचे सतत प्रयत्न केले. पण एकदा घेतलेले पुन्हा हातचे गेले (महाराज मुघल आणि आग्र्याशी झुंझत होते) मग महाराजांनी पुन्हा घेतले आणि शेवटी सन १६७५ ला त्यांनी फोंडा जिंकला. त्या दरम्यान त्यांनी कोकणपट्टीवर समुद्री व्यापारावर जम बसविला. जंजिरा सिद्दीशी झुंजले आणि त्याच्या आस पास किल्ले बांधले. या काळात स्वराज्य आणि गोवा पोर्तुगीजांचे 'मैत्रीपूर्ण' संबंध होते. पण पोर्तुगीज नाठाळ होते. त्यांनी आदिलशहाला महाराजांच्या युद्धांमध्ये मदत केली. जंजिऱ्याच्या सिद्द्यांना ते मुंबई भागातून रसद पुरवीत. आणि तळ-कोकणातील अनेक देसाई, जे आदिलशहा किंव्हा पोर्तुगीजांचे मांडलिक होते त्यांनाहि महाराजांविरुद्ध बंड करण्यास उद्युक्त करीत आणि वेळ पडेल तर गोव्यात आश्रय देत. पोर्तुगीजांनी ओळखले होते कि आदिलशाही मोडकळीत येते आहे आणि मुघल फार दूर आहे. शिवाजी महाराजांचा शेजार त्यांना नको होता. शेवटी महाराज जेंव्हा फोंड्याला पोचले तेंव्हा पोर्तुगीजांचे धाबे दणाणले. महाराज पुढे गोव्यावर आक्रमण करू शकले नाहीं पण त्यांच्या आक्रमणाच्या भीतीने उत्तर कर्नाटकात पोर्तुगीजांनी हात-पाय आखडते घेतले. फोंडा घेतल्यावर तिथल्या नदीवर महाराजांनी बांधकाम सुरु केले तर पोर्तुगीज गव्हर्नर ने महाराजांना पत्र लिहून तहाची आठवण दिली. त्या तहातील एक कलम असे होते कि महाराज गोवा सीमेपाशी स्वराज्याच्या भूमीत काही बांधकाम करणार नाहीं. थोडक्यात महाराजांनी सैनीकि तयारी कशी करावी किंव्हा करू नये हे पोर्तुगीजांना वाटले की तहाद्वारे ते ठरवतील. अर्थात महाराजांनी या पत्राची दखलही घेतली नाहीं. स्वराज्याच्या शक्ती संपादनाचे, शक्ती प्रदर्शनाचा अचूक आणि अपेक्षित परिणाम पोर्तुगीजांवर झाला होता. आणि इतक्या वर्षांच्या मेहेनतीनंतर जमवलेली आणि जिंकलेली बाजू महाराज उगाच कुठल्या तहाच्या कलामासाठी सोडणार नव्हते. 

                                                  
(Indian Naval Museum, Kochin.  ब्लॉग लेखकाचा स्वतः काढलेला फोटो.) 

आता आपण जर का स्वातंत्र्योत्तर भारताची परराष्ट्रनीती बघितली तर आपल्याला वरील बहुतांश बाबींचा अभाव प्रकर्षाने आढळतो. आपल्या देशाच्या परराष्ट्रनीतीचा पायाच विचित्र विचारसरणीवर आधारित आहे. पुढचा विचार मांडायच्या आधी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, माझी टीका सकारात्मक आहे. आपला देश ज्या आकाराचा आहे आणि आपल्याला आपल्या दुर्भाग्याने जे शेजारी मिळाले आहेत त्याला बघता परराष्ट्रनीतीचा कुठलाही निर्णय घेणे सोपे नाहीं. आणि जे निर्णय घेतले, जे मागे बघता चुकीचे वाटतात ते चुकीचे निर्णय म्हणून घेतले नसणार. काही विचारांती घेतलेले निर्णय चुकीचे निघालेत. यातील काही निर्णयांचा आपण संक्षिप्तात आढावा घेऊया. 

१) भारताचं धोरण हे भारतासाठी असावं. भारतीयांसाठी असावे आणि भारताच्या भविष्यासाठी असावे. थोडक्यात आपल्या देशाला जे सोयीचे, आपल्या देशवासियांना जे फायद्याचे ते निर्णय घेणे हि उत्तम नीती. १९५० च्या दशकात आपल्याला युनाइटेड नेशन च्या सेक्युरिटी कौन्सिल मध्ये समाविष्ट करण्याची शक्यता होती. आपण ती ठामपणे नाकारली. आपण नॉन-अलाइन हि नीती ठरवली. म्हणजे ना आपण अमेरिकेच्या कह्यात येणार ना रशियाच्या. पण सत्य परिस्थितीत आपण रशियाचेच मित्र झालो आणि आहोत. पण या नॉन- अलाइन च्या भानगडीत सेक्युरिटी कौन्सिल ची जागा सोडणे म्हणजे चूक नव्हे का? काश्मीर चा प्रश्न उगाच युनाटेड नेशन मध्ये घेऊन जाऊन जिंकत असलेले युद्ध थांबवणे? आर्थिक बाबीत कोणीही सांगितले नव्हते तरी उगाच सोशालीसम अवलंबिणे. आपला गाझा शी काहीही संबंध नसतांना उगाच त्यांना पाठिंबा देणे जेंव्हा कि ते सदैव काश्मीर मध्ये पाकिस्तान ला पाठिंबा देतात. आधी आपण तामिळ वाघांना (लिट्टे आणि प्रभाकरन) भारतात प्रशिक्षण दिले आणि मग त्यांच्या विरुद्ध श्री लंका सरकारला मदतीला म्हणून आपलेच सैनिक लंकेला पाठविले. त्यात आपले १५०० सैनिक हकनाक बळी पडले. असल्या असंख्य फालतू गोष्टी करून आणि निर्णय घेऊन आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. मूळ नेहरूंची चूक आहे पण पुढल्या पंतप्रधानांनी पण त्या चूक चालू ठेवल्यात. शिवाजी महाराजांनी सगळ्याशी जमेल तेंव्हा युत्या केल्या, आणि आवश्यक असेल तेंव्हा युद्ध सुरु करायला मागेपुढे बघितले नाहीं. अंतिम लक्ष सार्वभौम हिंदू स्वराज्य हे होते.  नव-भारताचे अंतिम लक्ष काय आहे? तेच ठाम नसल्यामुळे 'ऐरा-गैरा नत्थू खैरा' वाटेल ते बरळून त्याला किंव्हा त्याच्या पक्षाला सोयीचे ते करतो. आणि देश त्याची किंमत चुकवतो. 



२) शत्रू कोण आणि का? - सन १९४७-४८ चा काळ धामधुमीचा होता. भारताचे विभाजन आणि मग उरलेल्या भारताची संधी सगळे एक साथच होत होते. अश्या परिस्थितीत काश्मीर संपूर्ण न घेणे म्हणजे स्वतःच्याच सार्वभौमत्वाला प्रश्नांकित करणे झाले. पाकिस्तान आपला मित्र देश कधीच होणार नव्हता. अशी आशा करणे आणि अपॆक्षा ठेवणे निव्वळ मूर्खपणा होता. पाकिस्तान आपला शत्रुदेशच बनणार होता. त्यासाठीच तो देश एवढे रक्त सांडून बनवला होता. असे असतांना संपूर्ण काश्मीर घेणे टाळणे म्हणजे अविचार, भ्रांत मनस्थिती आणि भारतीय इतिहासाच्या अज्ञानाचे फळरूप होते. काश्मीर देण्याचा प्रश्नच येत नाहीं हे जरी खरे तरी आम्हाला बलुचिस्तान हवे किंव्हा अफगाणिस्तान ला जोडणारी भूमी हवी असा कांगावा आणि मग तसा प्रयत्न करायला हरकत नाहीं? आपली सार्वभौमत्व पाकिस्तान ला मान्य नसेल तर आपल्यालाही त्यांचे मानायला किंव्हा त्याचा आदर करायची आवश्यकता नाहीं. किंबहुना, आपल्या परराष्ट्रनीतीचा तो भाग असायला हवा. पण ते सोडून आपण इतकी वर्षे पाकिस्तान ला 'मोस्ट फेवरड नेशन' चा दर्जा दिलेला होता. कलियुगात आपण हरिश्चंद्र बनतोय. संत तुकाराम महाराज म्हणाले ते "भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।।" हीच योग्य नीती आहे.  चीन सोबत सुद्धा हेच वर्तन सोयीचे आहे. दादागिरी करण्याची त्यांची परराष्ट्रनीती आहे. ती एकदा का जुमानली कि मग काही खरे नाहीं. सन १९६२ ला ते हल्ला करणार याची संपूर्ण कल्पना नेहरूंना होती तरी 'हिंदी चिनी भाई भाई' चा जप करीत नेहरूंनी स्वातंत्र्याच्या अवघ्या १५ वर्षात देश गमावला होता. चीन आणि पाकिस्तान ने आपले वर्तन आणि परराष्ट्रनीती कधीच बदलवली नाहीं. आक्रमक आणि भारत विरोधी. मग आपण कधी आक्रमक आणि चीन आणि पाकिस्तान विरोधी नीती अवलंबिणार?

३) स्वातंत्र्योत्तर भारत शत्रुत्व निभवायला किती सक्षम आहे? पाकिस्तान असो कि चीन, आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा फार कमी अंश सैन्याला देतो. का? नवीन जगात दोन गोष्टींनी सामर्थ्य दर्शविता येते. एक म्हणजे आर्थिक बळ आणि दुसरे म्हणजे सैनिकी बळ, ते पण तंत्रज्ञांचे बळ. सन १९९१ ला आपली अर्थव्यवस्था तर दिवाळीची तयारी करीत होती. सगळ्याच बाबतीत मागेच पाय टाकायची सवय झाली होती. देश बलाढ्य जणू नकोच.  गेल्या वीस वर्षात पहिल्यांदा जागतिक पटलावर भारत एक आर्थिक बळ म्हणून उदयास आली आहे. आणि आपले सैनिकी बळ बलाढ्य म्हणून मानल्या जाते. पण पुन्हा येरे माझ्या मागल्या सारखे आपण युद्ध करून, जिंकून, टोचणारी सुई तशीच ठेवतो. १९७१ असो कि २००१ किंव्हा अगदी आत्ताचे ऑपेरेशन सिंदूर असो, आपण पाकिस्तानचा भूभाग कधीच घेतला नाहीं. १९७१ ला पाकिस्तान फोडले खरे पण पाकिस्तानात जे पंजाबी मुसलमान सैन्याद्वारे आपल्याला त्रास देतात त्यांना आपण काय धडा शिकविला? सन २०२० च्या गलवान भांडणात आपण चीन ला धडा शिकविला खरा, त्यांचे शेकडो सैनिक मारले पण पुन्हा त्यांना टोचायला काहीच ठेवले नाहीं म्हणून आता त्याच भागात पुन्हा ते युद्धाची सामग्री जोडतायत. शक्ती प्रदर्शन उत्तम पण त्याचा परिणाम दिसायला हवा. आणि चांगला चटका बसेल किंव्हा होरपळून निघेल असे व्हायला हवे. पाकिस्तान सातत्याने आपल्या नागरिकांना मारतोय पण ऑपेरेशन सिंदूर मध्ये आपण फुशारक्या मारतोय कि त्यांच्या नागरिकांना आम्ही धक्का लावला नाहीं. का? उद्या परिस्थिती उलटी झाली तर ते आपल्या नागरिकांना लाखोंनी मारायला मागे पुढे बघणार नाहीं.  नैतिकता वगैरे धोरण मान्य पण मग आपण त्यांच्या सैनिकांना पण सुरक्षित ठेवले? १९७१ ला आपण ९०,००० पाकिस्तान सैनिकांना बंदी करून, मजेत पुन्हा सोडून दिले. काय गंमत आहे? म्हणूनच पाकिस्तान असो कि चीन, आपल्याशी शत्रुत्व निभवायला त्यांना मजा येते. 

आपण इतिहास वाचत नाहीं, आणि त्यामुळे त्यातून काही शिकत नाहीं. शेवटी सरकार म्हणजे समाजाचेच प्रतिबिंब असते. समाजातीलच घटक पुढे जाऊन मंत्री-संत्री आणि IAS /IPS  बनतात. इंग्रज का जिंकले आणि का टिकले याचा अभ्यास केला तर सध्याच्या किळसवाण्या राजकारणाचे आकलन लगेच होईल. शिवाजी महाराज किंव्हा पुढल्या मराठ्यांची धोरणे बघितलीत तर आपल्या सध्याच्या चुकांची कल्पना येईल. चुका होणार नाहीत असे नाहीं पण निदान नवीन चुका करणे होईल. 


लेख संपवायच्या आधी एक महत्वाचा विचार - २०१४ नंतर म्हणजे मोदी सरकार च्या काळात भारतीय परराष्ट्रनीती झपाट्याने बदलली आहे. "इंडिया फर्स्ट' हे धोरण प्रामुख्याने जाणवते. आणि पाकिस्तान आणि चीन यांच्याशी अनेक खटके उडूनही आपण आज जगातील सगळ्या सत्तांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध आहे. चीनशी उघडपणे भांडण घेणारा सध्याच्या जागत आपण एकमेव देश आहोत. तसेच बालाकोट, ऑपेरेशन सिंदूर इत्यादी द्वारे आपण पाकिस्तानला वेळोवेळी ठिकाण्यावर आणले आहे. आणि माझ्या मते मोदीजींच्या अनेक धोरणांमध्ये महाराजांच्या राजनीतीच्या छटा प्रकर्षाने जाणवतात. 

महेश तेंडुलकर यांचे "शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज' या पुस्तक प्रकाशनाची माहिती खालील प्रमाणे. 



10/24/25

छत्रपतींच्या उदयाच्या वेळेसच्या जागतिक सत्तांचा संक्षिप्तात आढावा

छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनकाल आणि त्यांच्या पराक्रमाचे स्मरण हे नित्य कार्य आहे. इतिहास या गत-काळातील घटना असल्यात तरी त्याच्या सावलीतच वर्तमान जगतो.  स्वराज्य स्थापना, परकीय इस्लामी धर्म व सत्तांचा नाश करणे, हिंदू छत्रपती बनणे, नवीन युद्धशैलीची स्थापना, परराज्य नीती, त्यातील मुत्सद्दीपणा आणि शैली आणि तसेच त्यांची दूरदृष्टी इत्यादी कामगिरी अतुलनीय तर आहेच पण त्या काळातील त्यांच्या शत्रू शाह्यांचा बलाढ्यापणा लक्षात घेतला तर त्यांची कारगिर्दी अदभूत ठरते. आपण त्यांच्या काळातील जागतिक पातळीवरील सत्तांचा थोडक्यात आढावा घेऊ. जागतिक सत्ता म्हटले कि आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही इत्यादी छोट्या मुसलमानी शाह्यांना आपण या लेखापुरते तरी वगळूया. याचा अर्थ या शाह्या शक्तिशाली नव्हत्या असे नाहीं. पण मुघल, पोर्तुगीज किंव्हा तुर्की आटोमान पुढे या दक्षिण भारतातल्या शाह्या फारच लहान होत्या.   

छत्रपतींचा जन्म सन १६३० ला झाला. त्या काळात उत्तर भारत - म्हणजे अफगाणिस्तान पासून ते बंगाल पर्यंत आणि कश्मीर पासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत मुघली सत्ता घट्ट झाली होती. शहाजहान मुघली बादशाह होता आणि तो मुघली सत्ताधाऱ्यांच्या वंशावळीत पाचवा बादशाह होता. मुघली राज्य तो पर्यंत जवळपास ९० वर्ष जुने होते. मोघली सैन्य महाकाय होते. शहाजहानच्या काळात मोघली पायदळ व घोडदळ एकूण २० ते ४० लाखाच्या घरात होते. "आई-ने-अकबर" हे अकबराच्या कारगीर्दीचा लेखाजोखा, जो अकबराच्या जीवनकाळात त्याच्या दरबारात लिहिल्या गेला होता. त्याप्रमाणे मुघली सैन्य सन १५९९ ला ४४ लाख होते. यात घोडदळ, पायदळ बंदूक-तोफा दळ आणि अनियमित किंव्हा भाडोत्री सैनिक होते. दरबारात लिहिल्या जात असल्यामुळे या आकड्यामध्ये अतिशयोक्ती नक्कीच असणार. तरी मुघली सैन्य २० लाखावर नक्कीच होते. 

औरंग्या जेंव्हा सन १६८२ ला दक्खनी उतरला तेंव्हा तो लाख-दोन लाख सैन्य घेऊन आला होता. औरंगाबाद शहर, जेथे त्याने मुक्काम केला त्यात चार लाखाची भर त्याच्या येण्याने झाली असे नमूद केल्या गेले आहे. सैन्य व्यतिरिक्त जगाच्या अर्थव्यवस्थेचा २०% भाग मुघली अंकुशाखाली होता. तरीही १०० वर्षात मुघलांनी एकही शाळा-विद्यालय किंव्हा कुठल्याही तऱ्हेची उपलब्धी केली नाहीं. नुसते शोषण आणि उपभोग घेतला आणि शेवटी सत्यानाश करून नाहीसे झालेत. असो. थोडक्यात, मुघली सत्ता अनन्यसाधारण बलाढ्य आणि शक्तिशाली होती. मुघलांच्या आधी जवळपास ४०० वर्षे वेग-वेगळे मुसलमान सत्ताधारी दिल्लीत होते. त्यातील कोणाचे हि सैन्य किंवा कोणाचाही खजिना मुघलांएवढा नव्हता. शिवाजी महाराजांच्या उदयाच्या काळात मुघलांचा दबदबा प्रचंड होता. महाराजांच्या तीर्थरुपांना, श्री शहाजी महाराजांना, जेंव्हा आदिशहाने बंदी केले तेंव्हा आदिलशहाला घाबरावयाला शिवाजी महाराजांनी मुघलांशी तह केल्याचा आव आणला. त्याचा परिणाम आदिलशहावर लगेच झाला. त्याने शिवाजी महाराजांनी देऊ केलेले किल्ले आणि जमीन घेऊन, शहाजी महाराजांना लगेच मोकळे केले. 

पोर्तुगीज सत्ता भारतात वास्को-द -गामा सोबत स्थापित झाली असली तरी अल्फान्सो-डी-अल्बुकर्की याने गोवा आदिलशाही कडून सन १५१० ला जिंकले. ते जिंकण्यात त्याला तीमण्णा नावाच्या भारतीय सरदाराने मदत केली. म्हणजे छत्रपतींच्या जन्माच्या वेळी, भारतात पोर्तुगीज सत्ता शंभर वर्षांहून अधिक घट्ट झाली होती. गोवा जिंकल्याच्या काही वर्ष आधी पोर्तुगीजांना (पेद्रो काब्राल) सध्या ज्याला आपण ब्राझील म्हणतो तो प्रदेश सापडला होता आणि त्यांनी तो प्रदेश लगेच गिळायला सुरु केले. पण या कामात त्यांना बरीच वर्षे लागली. या दरम्यान पोर्तुगीजांनी, म्हणजे सन १५२० च्या दशकात इंडोनेशिया चा भाग पादाक्रांत केला. एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी - मुघली साम्राज्यासारखे लाखोंच्या संख्येने पोर्तुगीज कधीच नव्हते पण त्यांच्याकडे परकीय प्रदेश पादाक्रांत करून राज्य करण्याचे ज्ञान आणि अनुभव भरपूर होता. इबेरिया द्वीपकल्पातील हा छोटासा देश पण एकाच वेळेस पूर्वेला गोवा आणि मग इंडोनेशिया तर पश्चिमेला ब्राझील आणि इतर प्रदेश यांनी ढापले. केवढी दुर्दम्य इच्छाशक्ती, बळ, सागरी वाहतुकीचे ज्ञान आणि जिथे पोचू तिथे लोकांना मारून तिथली जमीन गिळायची क्रूर वृत्ती! त्यांनी भारताचा पूर्वी किनारा चांगलाच ताब्यात घेतला होता आणि कोकणातून आणि पूर्वी कर्नाटकातून बळजबरीने लोकांना ते घेऊन अरब देशात गुलामगिरीत विकत असत. तसेच सध्याचा ज्याला आपण अरेबियन समुद्र म्हणतो त्यातील भारतीय मसाल्यांचा व्यापारावर त्यांनी वर्चस्व स्थापन केले होते. छत्रपतींच्या काळात पोर्तुगीज राज्याला उतरती कळा होती. स्पॅनिश साम्राज्याने त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित केले होते. पण छत्रपतींच्या उदयाच्या वेळी पोर्तुगीज उभरत्या मराठा शक्तीपुढे तरी नक्कीच बलाढ्य होते. 

जागतिक सत्ताधाऱ्यांचे सन १६३० चे चित्र बघितले तर स्पॅनिश, डच आणि फ्रेंच साम्राज्य भारतात फारसे पाय रोवू शकले नाहीं. स्पेन आणि पोर्तुगीजांमधे सन १४९४ ला तेंव्हाच्या पोप ने एक करार घडवून आणला. त्या कराराला "तोरदेसीलास चा करार" म्हणतात. त्यानुसार अटलांटिक समुद्राचा पश्चिम भाग स्पेनचा (जिंकलेला आणि न जिंकलेला) तर पूर्वेचा भाग पोर्तुगिजांचा. विचार करा, या दोन देशांनीआपापसात जग वाटून घेतले होते! पण या करारामुळे स्पेन कधी भारताकडे भटकले नाहीं. डच लोकांनी प्रयत्न केला होता पण केरळ मधील त्रावणकोर राज्याचे श्री मार्तंड वर्मा या राजाने त्यांचा इतका मोठा पराभव केला आणि डचांनी पाय काढता घेतला. पुढे मराठा साम्राज्याचे श्री कान्होजी आंग्रे यांनी सुद्धा डचांना हरवले. फ्रेंच साम्राज्याची चुरशीची लढाई इंग्रजांशी जगाच्या काना-कोपऱ्यात होती. ते सध्याच्या उत्तर अमेरिकेत लढले, युरोप मध्ये काढलेत आणि मग प्लासीच्या लढाईत, भारतात लढले. युरोप सोडून, सगळी कडे फ्रेंच इंग्रजांशी हारलेत. प्लासीच्या लढाई जिंकून इंग्रजांनी भारत जिंकले असे दर्शविल्या जाते. माझ्या मते ते बरोबर नाहीं. १७५९ साली कोणीहि वर्तवू शकले नसते कि इंग्रज भारतावर राज्य करतील. कारण मराठ्यांना हरवून बहुतांश भारत पादाक्रांत करायला त्यांना सन १८१८ उजाडला आणि त्यानंतर पंजाब जिंकायला १८३९ उजाडला. असो, तो विषय वेगळा. पण इंग्रजांशी भारतात हारल्यावर पॉण्डेचेरी सोडून फ्रेंच पुन्हा भारताकडे आले नाहीत. 

त्या काळातील अजून एक साम्राज्य म्हणजे ऑटोमन तुर्की मुसलमानी साम्राज्य पण त्यांना युरोप जिंकण्याची इतकी तहान होती कि त्यांना भारताकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. तुर्की आरमार बलाढ्य होते पण सन १५७१ च्या लपांटोच्या लढाईत त्यांचा युरोपिअन सामूहिक सत्तांकडून सपाटून पराभव झाला आणि त्यानंतर तुर्की आरमाराने फारशी कधी मान वरती काढली नाहीं. 

आता राहिले इंग्रज. हेन्री ओक्सेंडेन हा सन १६७४ ला मुंबईच्या इंग्रजी वखारीत अधिकारी होतं. तो पुढे १६७७ ते १६८१ मुंबई वखारीचा मुख्याधिकारी पण झाला. (इंग्रजांनी नेहमीप्रमाणे त्या पदाला गव्हर्नर ऑफ बॉम्बे अशी पोकळ गर्जनास्पद नाव दिले होते!) हा ओक्सेंडेन शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला रायगडी उपस्थित होता आणि त्याने ईस्ट इंडिया कंपनी तरफे महाराजांना नजराणा दिला होतं. श्री बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'राजा शिवछत्रपती' शिवाजी महाराजांच्या चरित्रात राज्याभिषेकात या क्षणाचे फार सुंदर चित्र रेखाटले आहे. पण महाराजांच्या दृष्टीने इंग्रज किंव्हा ईस्ट इंडिया कंपनी किती महत्वाची होती? राज्याभिषेकाला नंतर  तब्बल दीडशे वर्षांनी इंग्रज भारतावर राज्य करू लागले. म्हणून आजच्या काळात या ओक्सेंडेनच्या राज्याभिषेक भेटीला आपण महत्व देतो. महाराज स्वतः इंग्रजांना नेमके जाणून होते पण त्यांच्या दृष्टीने इंग्रजांना फारसे महत्व नसणार. व्यापारी आणि धूर्त असे इंग्रज हि कल्पना महाराजांची असणार म्हणूनच त्यांनी त्यांच्याकडून फायदा आणि व्यापार करून घेण्याचा सदैव प्रयत्न केला. इंग्रजांची महत्वाकांक्षा जरी फार मोठी असली तरी त्यांची परिस्थिती १७ व्या शतकाच्या भारतात फारशी ताकदीची नव्हती. येथे इंग्रज म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. इंग्रज म्हणजे इंग्रजी राजसत्ता नव्हे. सन १६१३ ला मुघली जहांगीर ने ईस्ट इंडिया कंपनी ला सुरत बंदरावर 'फॅक्ट्री' टाकण्याची अनुमती दिली. पण व्यापारी धंद्याव्यतिरिक्त इंग्रजांच्या काही पाऊलखुणा भारतात पुढली दीडशे वर्ष नव्हत्या. पोर्तुगीज आणि स्पॅनिश सत्तांपुढे ब्रिटिश फारच चिल्लर होते. सन १७व्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांनी सध्याच्या उत्तर अमेरिकेत - मॅसॅचूसेट्स राज्यात आपली 'कॉलोनी' स्थापन केली होती. आणि सध्याच्या वेस्ट इंडिज बेटांवर पण कॉलोनी स्थापन केली होती. पण तेवढेच. छत्रपतींच्या काळात किंव्हा शंभर वर्षे पुढे, अगदी सन १७७० ला सुद्धा कोणी वर्तविले असते कि इंग्रज भारतावर राज्य करतील तर त्याला वेड्यात काढले असते. इंग्रजांचे भारतावर राज्य जिंकले हे खरे पण तेवढेच आपण राज्य त्यांना दिले, हे पण तेवढेच खरे आहे. त्यांची महत्वाकांक्षा, त्यांची हुशारी आणि एका-मेकात लढायला लावून देण्याचा मुत्सद्दीपणा कौतुकास्पद आहे. आणि त्यांचे राज्य स्थापन होण्याची हि महत्वाची कारणे आहेत. पण तो विषय वेगळा आणि त्यावर नंतर नक्की लिहीन. 

या लेखा मागचा उद्देश म्हणजे छत्रपतींच्या काळातील इतर बलाढ्य साम्राज्यांचा थोडक्यात आढावा देणे होतं. मोघल काय किंव्हा पोर्तुगीज काय किंव्हा आदिलशाही काय, सगळ्यांकडे छत्रपती आणि मराठी स्वराज्याच्या तुलनेत अमाप पैसे, सैनिक आणि शस्त्रात्रं होती. तरी एक एक करून शिवाजी महाराजांनी धैर्याने, शौर्याने, मुत्सद्दीपणाने, दूरदृष्टीने, चपळाईने आणि लागेल तिथे संयमाने, या सगळ्यांवर मात केली. त्यांचा इतक्या बलाढ्य आणि क्रूर साम्राज्यांना लढा लक्षात घेतला तर त्यांचे कर्तृत्व अजूनच झळाळते, लखलखते. 

हा लेख लिहितांना छत्रपती आणि इतर परराज्य सत्तां मधील एक महत्वाची भिन्नता लक्षात आली. आजकाल पुरोगामी किंव्हा सेकुलर जमातीत एक नवीन विचारप्रणाली दिसते. छत्रपतींचे हि लोक आता कौतुक करतात पण या जमातीचे म्हणणे असे कि मराठी स्वराज्य किंव्हा छत्रपती किंव्हा पुढे पेशवे हे भारतातील इतर राज्यकर्त्यासारखेच होते. थोडक्यात मुघल किंवा आदिलशाही आणि मराठ्यांमध्ये फारसे अंतर नाहीं. यासारखे थोतांड ऐकले कि कानशिले तापतात. 


महाराजांनी 'हे राज्य श्रींचे' म्हणून स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या राज्यस्थापनेमागे परराष्ट्रांची, परकीय किंव्हा परधर्मीयांची कत्तल करणे, लूट करणे, विध्वंस करणे हे कधीच नव्हते. भारतात हिंदूंवरचे अत्याचार थांबावे, त्यासाठी रक्तपिपासू परकीय मुसलमानी सत्तांना हरविणे आणि हिंदूंचे राज्य स्थापन करावे हि त्यांची मनीषा होती. हे वैयक्तिक भरभराटीची स्वप्न नव्हते तर देश, समाज आणि धर्म यांचे संरक्षण, संगोपन आणि उत्कर्षाचा लढा होता.

"In art books and history books, people write of the Muslims "arriving"in India, as though the Muslims came on a tourist bus and went away again. The Muslim view of their conquest of India is a truer one. They speak of the triumph of the faith, the destruction of idols and temples, the loot, the carting away of the local people as slaves, so cheap and numerous that they were being sold for a few rupees. The architectural evidence-the absence of Hindu monuments in the north-is convincing enough. This conquest was unlike any other that had gone before. There are no Hindu records of this period. Defeated people never write their history. The victors write the history. The victors were Muslims. For people on the other side it is a period of darkness. "  - V.S. Naipual


 

छत्रपती जर का दिल्लीधीश झाले असते तर त्यांनी मशिदी किंव्हा चर्चेस तोडल्या नसत्या. मुसलमानांवर इस्लाम अनुयायी म्हणून कर लादला नसता, मुसलमानी बायका किंव्हा ख्रिश्चन ब्याक  पळविल्या नसत्या आणि त्यांची पोरे गुलामगिरीत विकली नसती. मुसलमानांची किंव्हा ख्रिश्चनांची लाखोंनी हत्या केली नसती. किंबहुना, दिल्लीधीश नसूनही त्यांनी किंव्हा मराठ्यांनी हि असली कामे केले नाहीत. मुघल असो, ब्रिटिश असो, पोर्तुगीज असो, डच असो किंव्हा फ्रेंच असो, हि सगळी राज्य आणि राज्यकर्ते  रक्तपिपासू, स्वार्थांधळी, आत्यंतिक उपभोगी, क्रूर आणि विध्वंसक होती. भारत देश त्यांच्यासाठी परका होता, भारत देश जिंकून लुटायला होता. भारतीय, आणि हिंदू, त्यांच्यासाठी लुटायला, मारायला आणि गुलाम करायला होते. आपली धर्मस्थळे विध्वंस करायला होती. आणि याचे व्रण अजूनही आपल्याला सगळीकडे दिसतात. 

अलीकडेच मुघल आपलेच आहेत अशी वदंता उठविली जाते आहे. कारण म्हणे ते भारत सोडून निघून नाहीं गेलेत. इथेच राहिलेत. आणि राहून काय केले? एक उदाहरण देतो. सेतू माधवराव पगडी यांच्या मराठा इतिहास पुस्तकातील आहे. बहुधा सन १६९० चे दशक असेल. औरंग्याच्या कुटुंबातील काही कुटुंबीय महाराष्ट्रात प्रवास करतांना मराठ्यांनी हल्ला केला. निकाराचे युद्ध सुरु झाले. मराठे वरचढ ठरत होते. मुघली तुकडीला पळायला हि वाट मिळेना. तेंव्हा त्या कुटुंबियांमधली एक बेगम प्रोत्साहनार्थ ओरडू लागली कि "आपण चंगेझ चे वंशज आहोत आणि काफ़िरांशी हारु शकत नाहीं" त्याचा काय परिणाम झाला त्यांचा चंगेझच जाणे पण त्यांना पळायला वाट मिळाली. सगळी सामुग्री मराठयांच्या हाती लागली. यातला चंगेझ म्हणजे चेंगीझ खान. पहिला मुघल हुमायून स्वतःला चंगेझ खानचा वंशज म्हणवीत. या मुघलांना स्वतः कधी आपण भारतीय आहोत वाटले नाहीं पण आत्ताच्या पुरोगामी थोतांडवाडी मात्र त्यांना आपले बनवायला तयार आहेत. 

आपले राजे असे नव्हते, आपले मराठे असे नव्हते, आपले पेशवे असे नव्हते, आपले होळकर, शिंदे, भोसले असे नव्हते. याचा आपण सार्थ अभिमान बाळगायलाच हवा. 

10/8/25

झाकली मूठ सव्वा लाखाची

 


खाडकन केतनच्या थोबाडीत पडली. त्याचे कान सुन्न झालेत. खरंतर केतनने कोचने शिकविल्या प्रमाणे बॉक्सिंग ची नीट पोज घेतली होती. डावा पाय थोडा पुढे आणि उजवा पाय थोडा मागे. आणि डावी मूठ वळून पुढे आणि उजव्या हाताने मूठ वळून कान-गाल-डोळा झाकला होता. निदान त्याला वाटले कि त्याने चेहेऱ्याचा उजवा भाग नीट झाकला होता. उजवा खांदा थोडा वर करून त्याने चेहरा खालती केला होता. पूर्ण लक्ष देऊन तो समोरच्या कडे बघत होता. 

केतन बॉक्सिंग चे क्लासेस नुकतेच घ्यायला लागला होता पण त्याने प्रगती झपाटयाने केली होती. मुळात त्याची उंची चांगली होती आणि नियमित व्यायाम केल्या मुळे त्याच्यात ताकद चांगली होती. 

निदान त्याला असे वाटत होते. 

"सर, आप को मारना कैसे है, ये मैं सिखा सकता हुं. पर, मार खाना एक अलग बात है. ये तो सिखाया नहीं जा सकता." कलीम सर, केतन चे बॉक्सिंग कोच जणू त्याच्या कानात बोलत होते. 

"आय-टी कंपनी मी काम करने वाला आदमी हुं, लडाई-झगडे का मौका कभी नही मिलेगा" 

"तय्यारी होना सहाब" 

केतनला वाटलं तेवढा त्याचा उजवा चेहरा झाकल्या गेला नव्हता. त्याला कानाजवळ गरम काही तरी ओघळतंय असे वाटले.

" हा बघ, चॊमु, बॉक्सिंग करणार आहे माझ्याशी. बांडगुळा सारखा काही तरी पोज घेऊन उभा आहे." समोरचा खिदळत त्याच्या मित्राला म्हणाला. 

'मी बांडगुळासारखा उभा आहे?' केतनला प्रश्न पडला. बांडगुळ म्हणजे परजीवी वनस्पती. बांडगुळासारखा कसा कोणी उभं राहू शकत?" केतन विचार करू लागला. पण विचार करणें जरी चांगली सवय असली तरी नको त्या ठिकाणी विचार करणे तोट्याचे ठरू शकते. 

या भानगडीतच तो समोरचा अचानक पुढे आला आणि त्याच्या डाव्या हाताच्या सणसणीत झापडेने केतनच्या गालाची हिंसक पापी घेतली. केतन जागचा हलला. पण त्याच्यात तेवढीही कमी ताकद नव्हती. त्याने तोल सांभाळला आणि तो दोन-तीन पावला मागे गेला. 

"अगर मारने का मौका ना भी मिले तो भी चलेगा पर. पर आपने  मार खाना नहीं है. डिफेन्स फर्स्ट!" केतनच्या डोक्यात कलीम सर पुन्हा बोलू लागले. जणू ते तिथे त्याच्या बाजूलाच उभे आहेत. त्याने विचार केला डोक्यात असण्यापेक्षा कलीम सर प्रत्येक्षात तिथे उभे असते तर जास्त फायद्याचा असत. 

" मैं आप को बॉक्सिंग रिंग का बॉक्सिंग सिखा रहा हूँ. पर रास्ते पे झगडा होता है तो डिफेन्स फर्स्ट के भी पाहिले आप भागने का सोचो. रास्तो पे झगडा करने में किसी का भला नहीं होता. और झगड के क्या हि मिलेगा?" 

"सर, आप भी मजाक करते हो. मुसीबत बता के थोडी ना आती है. और गलत जगह फस गया फिर हात-पैर तो घुमाने हि होंगे." कलीम सर पुढे काही बोलले नाहीं. 

चुकीच्या जागी केतन नक्कीच फसला होता. डोंगर चढायला म्हणून तो बायको पोरा सोबत निघाला. त्या साठी मुद्दाम प्रवास करून त्या गावात आदल्या रात्री पोचला. सकाळचे अवरोहण छान झाले. उतरतांना निमुळत्या वाटेबाजूला दोन लोक दारू पीत बसले होते. त्यांनी काही ओंगळवाण्या टिप्पण्या केल्यात. केतन त्यावर त्यांना काहीतरी म्हणाला आणि आता तो बॉक्सिंग ची डिफेन्सिव्ह पोज घेऊन उभा ठाकला होता. त्याच्या उजव्या कानातून रक्त येत होते. 

समोरचा पुन्हा सरसावला आणि त्याने या वेळेस त्याचा उजवा हात सपाट्याने फिरवला. पण केतन ने त्याचा पंच बरोबर ओळखला आणि घुडघे थोडे वाकून, डोकं बरोबरअसे मागे केले कि त्या माणसाचा हात वेगाने त्याच्या धरधरीत नाकापासून काही इंचावरून निघून गेला. 




पण या संधीचा फायदा घेत केतन ने डिफेन्सिव्ह पोसिशन, ऑफेन्सिव्ह मधे बदलली. आणि डाव्या हाताने वळलेली मूठ समोरच्याच्या हनुवटीवर खाडकन बसवली. 

'अप्पर-कट!' कलीम सरांचा आवाज पुन्हा कानात फिरला. 

समोरचा पुन्हा केतन च्या अंगावर आला. केतन ने त्याला हुलकावणी दिली आणि विरुद्ध बाजूने पुन्हा त्याच्यासमोर उभा झाला. 

केतन ने मगाशी मारलेला उप्पर-कट आता त्याला बोटांना आणि बोटांच्या सांध्यांना जाणवायला लागला होता. आत्ता पर्यंत बॉक्सिंगच्या क्लासला त्याने बँडेज आणि ग्लोव्हस घालूनच पंचिंग केले होते. इथे आयुष्यात पहिल्यांदा त्याने कोणाला पंच मारला आणि ते पण उघड्या मुठीने! त्याने पंच अगदी पुस्तकी मारला होता. कारण समोरच्याच्या तोंडातून रक्त यायला लागले होते आणि केतनची मूठ दुखत असली तरी तो अजून मूठ वळू शकत होता. केतनचा आत्मविश्वास थोडा वाढला. 
या मारा-पिटीत एक चांगली गोष्ट म्हणजे, दुसरा दारुडा फारच हलका-फुलका होता. बहुधा तो एका पायाने अधू होता. खिदळण्या पलीकडे तो फारसा काही लायक नव्हता. केतनच्या समोरच्याच्या तोंडातून रक्त येतांना बघून दुसऱ्याचे खिदळणे मात्र आता बंद झाले होते. 
"तू पोराला घेऊन पळ इथून. मी बघतो काय करायचं ते." केतन बायकोला म्हणाला.
"तुला एकटं सोडून मी इथून निघत नाहीं या. जे काही आहे मिळूनच करू या" केतनची बायको त्याला म्हणाली. ती घाबरली होती पण तिने हिम्मत हारली नव्हती. तिनी जवळचा एक गरगरीत गोटा उचलून त्या अधू-दुसऱ्याला फेकून मारला. त्याच्या मांडीला का कमरेला तो सपाटून बसला. 
"आई ग...लागलं रे" असा काहीस म्हणत तो मागे सरकला. 
" बायकोला समोर कर तू. कारण तू मारलेला पंच मला पापी दिल्या सारखा वाटला" तोंडातून येणारे रक्त थुंकून केतनच्या समोरचा बरळला. 
" साब, सामने वाला कुछ भी बोले आपने ऊसपे ध्यान नही देना है. बोलने दो सामने वाले को. बॉक्सिंग में ताकद  बचा के रखना है. और जब जरुरत पडे तभी इस्तेमाल करना है.   
केतनच्या कानात पुन्हा कोचिंग सुरु झाले. 
तेवढ्यात केतनच्या बायकोने अजून एक गरगरीत गोटा केतनच्या समोरच्यावर पूर्ण ताकदीने फेकला. त्याला तो खांदा आणि मानेच्या सांध्यावर सपाटून बसला. 
"आई ग....." तो केकाटाला. आता त्याला कळेना नेमके काय करायचे. तो खांदा दाबून मागे झाला आणि त्याने केतनच्या बायकोवर नजर रोखली. 
" आता तरी पळतेस का?" पण केतनच्या बायकोच लक्ष नव्हते. ती आणि आणि केतनच्या १० वर्षाचा पोरगा दगड शोधत होते.
"अरे टोण्या, काही कर! काही नाहीं तर त्या बाई ला आवर" केतनच्या समोरचा अधू-दुसऱ्यावर खेकसला. 
"दगड मारते कि हि बया! सगळी उतरून गेली. पैसे वाया!" असे म्हणत लंगडत तो दुसरा तिथून खसकला.
केतनच्या समोरच्याचा खांदा-मान चांगलीच ठणकत असणार. त्याने केतनच्या बायकोच्या दिशेने मुसंडी मारली. केतन त्याच्या समोर आला आणि त्याच्या छातीला मिठी मारली आणि त्याची कंबर पकडून त्याला मागे रेटू लागला. समोरचा केतन ला पुढे रेटत होता. 

"बॉक्सिंग में साब, सामने वाले का ताकद जलना है. आदमी को मार के कमजोर कर सकते है या थकवा के. जैसे हि आदमी थका, उसका बॅलन्स गया"

केतन पाय रेटून पूर्ण ताकद लावून त्याला ढकलले आणि मग त्याला मारलेली मिठी सोडून एकदम बाजूला झाला. केतनच्या समोरचा तोल जाऊन भेलकांडत दाणकन जमिनीवर आदळला. 
केतन त्याच्या अंगावर बसला आणि दनादन त्याच्या डोक्यावर कानावर, जिथे मिळेल तिथे पंचेस मारू लागला. केतनची बायको जवळ आली आणि ती तिच्या ट्रेकिंगच्या बूटाने केतनच्या समोरच्याची बोटे चेंदु लागली. आता समोरच्याची पूर्ण वाट होती. पण तरी त्याने उजव्या हाताने अंगावर बसलेल्या केतनच्या उजव्या कानशिलावर सपाटून झापड मारली. 

केतन पुन्हा सुन्न झाला. आता त्याच्या उजव्या कानातून रक्त येऊ लागले. तेवढ्यात केतनच्या बायको केतनच्या समोरच्याच्या उजव्या हाताची बोटे चेंदु लागली. केतनच्या समोरचा आता वेदनेने जोरात ओरडू लागला.          
केतन त्याच्या अंगावरून उठला आणि काही पावले मागे गेला. समोरचा लगेच उठला. केतनला ते अपेक्षित नव्हते. केतनची बायको काही फूट त्याच्या मागे उभी होती. 

"तू तुझ्या मार्गाने जा आणि आम्हाला आमच्याने जाऊ दे" केतन त्याला म्हणाला. 

हळूच केतनच्या बायकोने एक चपटा दगड केतनला दिला आणि ती अजून थोडा अंतर मागे गेली. केतन आणि ती दोघे बघत होते कि समोरचा आता काय करतो. त्याच्या शर्टावर रक्त सांडत होते. तो कातावला होता. अश्या मनस्थिती एकतर दारू उतरून माणूस ताळ्यावर येतो किंव्हा डोक्यात राख घालून टोकाला जातो. समोरच्याने टोकाला जायचे ठरवले होते. काही कमी असेल तर त्याने आज बाई कडून मार खाल्ला होता. 

"साब, बॉक्सिंग रिंग मी ठीक है. रूल्स है, रेफ़री है.   बाहर मारा-पिटी करनी है तो बचाव और फिर बचना सबसे मेन है. अगर खुदा-ना-खास्ता ऐसी नौबत आती है तो जो हात लगे वो सोना. पीटो और फिर भागो" 

समोरच्याने तोंडाचे रक्त पुसले आणि हेलकावे घेत पुन्हा केतन वर धाव घेतली. केतन ने चपटा दगड घट्ट मुठीत दाबला. समोरचा जवळ येताच, केतन पुन्हा गुढघ्यात वाकला आणि पूर्ण ताकदीने हुक पंच मारला. पंचच्या शेवटच्या क्षणाला त्याने मूठ उघडली आणि त्या दगडाने अक्षरश: गालाचे हाड फोडले. समोरचा पुन्हा कोलमडून पडला. दुःखाने त्याला नीटसं रडता पण येईना. पण रडू येऊन त्याचा जबडा अजून दुखत होता. स्वतःला रेटत तो केतन पासून अजून दूर गेला. केतनच्या बायकोच्या हातातला दगड त्याला दिसला असावा. 


"चल, चल, निघ." केतन बायकोला म्हणाला. तिने पोराची बकोट धरली आणि सगळे तिथून पळाले. 
"चांगले पंचेस मारलेस आणि ते पण दोनदा मार खाऊन. ट्रैनिंग कामात येतंय." केतनची बायको धावता धावता केतन ला म्हणाली. 
"तुला तर ट्रैनिंग ची पण गरज नाहीं. वाघीण आहेस तू आतून" केतन म्हणाला. 
ते ऐकून बायकोच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित-हास्य होते. 
--

9/30/25

लिहिल्याने होत आहे रे...आधी लिहिले पाहिजे!

 

तीन वर्षांपूर्वी मी ठरवले कि दर महिन्याला मी एक मराठी आणि एक इंग्रजी लेख माझ्या ब्लॉग वर लिहून प्रकाशित टाकणार. सन २०२३ पासून ऑगस्ट २०२५ पर्यंत मी हे नियमाने केले. बहुधा या महिन्यात व्यत्यय येणार. हा लेख मी सप्टेंबर ३० ला लिहायला चालू करतोय. आज रात्री पर्यंत झाला तर ठीक आहे नाहीं तर मग? फारस काही नाहीं, ऑक्टोबर महिन्याचा म्हणून टाकीन. लेख लिहायला घेतला कि या वेळात संपवायचाच हे मला करणे साधारणपणे फार कठीण जाते. याचा संबंध वेळेशी नसतो. लेख किंव्हा गोष्ट कुठला रंग पकडेल, कुठल्या रस्त्यावर निघून जाईल मलाच माहिती नसते. खूपदा अर्ध्यातच लेख किंव्हा गोष्ट सोडावी लागते कारण मीच भ्रमित झालो तर वाचकाला तर नक्कीच काय चाललंय कळणार नाहीं. कधी कधी मात्र एक नवीन सूर मिळतो. नवीन विचार अचानक डोकावतो, नवीन भावना जाणवते आणि मग शब्द आपोआपच सुचतात. ज्यांना ज्यांना मी माझे लेख पाठवितो त्यांच्या कडून कौतुकाचे शब्द परतात. "प्रासादशिखरस्थोऽपि काको न गरुडायते ॥" यातला मी काक (म्हणजे कावळा!) बनून मी मनातच प्रासाद बनवून त्याच्या शिखरावर बसतो! 

खरेतर बरेच लेख आणि गोष्टी लिखाणात आहे. एक 'लिमलेटची गोष्ट' म्हणून कथा कधी पासून लिहितोय. मग 'वाडा चिरेबंदी' म्हणून खूप पूर्वी ऐकलेली लोककथा लेखनात आहे. मग शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित नागपूरच्या भोसल्यांबद्दल एक लेख अर्धवट आहे. त्या घराण्याचे थोर श्री रघुजीराजे भोसल्यांची ओरिसा आणि बंगाल स्वारी, त्यातले बारकावे आणि त्या अर्धवट राहिलेल्या कार्यामुळे ब्रिटिशांना कसे पावले आणि काही दशकात पूर्ण बंगाल त्यांना विनासायास गिळता आले. मध्ये ऑर्बिटल नावाच्या पुस्तकावर आढावा लिहून झालाय. तो नोव्हेंबर साठी आहे. काही महिन्यांपूर्वी मित्रांसोबतच्या एका ट्रिप मध्ये पंढरपुरी श्री विठ्ठल-रुख्मिणी आणि मग पुढल्या ट्रिप मध्ये अयोध्येस श्रीरामाचे दर्शन झाले. त्या अनुषंगाने प्रवास वर्णन आणि श्रीराम मंदिरासंबंधित प्रख्यात इतिहासकार मीनाक्षी जैन यांच्या पुस्तकातील माहिती द्यायची आहे. त्या लेखासाठी पुस्तकातील माहिती काढलेली आहे फक्त लिहिणे बाकी आहे. कधी वेळ नसतो तर कधी सुचत नाहीं. माझ्यासारख्या क्षुल्लूक ब्लॉगर ची हि गत, मोठं-मोठाले लेखक कसे एवढे आणि ते पण दर्जेदार लिहू शकतात? 

मोठं-मोठाल्या लेखकांवरून आठवले, उद्या ऑक्टोबर १ ला स्व. श्री ग.दि. माडगूळकरांच्या जन्म दिवस. त्यांची आत्म-चरित्रपर दोन पुस्तके, 'मंतरलेले दिवस' आणि 'वाटेवरच्या सावल्या' वाचनात आलीत. त्या व्यतिरिक्त 'बांधावरच्या भाबळी' पण वाचले. त्यांची कला आणि लेखन अजरामर होतेच त्यांचे आयुष्य अद्भुत होते. नुकताच वासोट्याच्या किल्ल्याला जातांना गदिमांच्या माणदेशातून जाणे झाले. त्यांच्यावर एक लेख सुरु केला होता. पण जर तो लेख पूर्ण झालाच तर अजून तो संपायला बराच वेळ आहे. गदिमांकडे  शब्दांचे वरदान होते, डोक्यावर सरस्वतीचा हात होता, म्हणून त्यांच्याबद्दल जरी लिहायचे असले तर लेखक आम्ही आहोत...नो वरदान, नो हात डोक्यावर! 

दरवर्षी विचार करतो कि वाढदिवसाला काहीतरी लिहीन. चाळिशीला लिहिला पण होता काही तरी...४१ चा झाल्यावर. पण निदान लिहले तरी होते. आता हळू हळू नवीन भावना मनात प्रश्न येतो कि वय वाढले म्हणून लिहिण्यात अर्थ आहे का? वयानुरूप किंव्हा वयासोबत असा कायच अनुभव आहे कि जो वाचून वाचक म्हणेल कि वाह ...असा कधी विचारच केला नव्हता! चार-चौघांसारखे आयुष्य. प्रत्येकाचे आयुष्य वैयक्तिक दृष्टिकोनातून स्पेशल असतेच किंव्हा असावे. पण प्रत्येक आयुष्यातून शिकण्यासारखेच असते असे नाहीं. प्रत्येक घटना धडा असेलच असे नाहीं. आणि असला तरी तो धडा दुसऱ्यांसाठी असेलच याची शक्यता तर अजून कमी. असलेला आनंद घेत, येणाऱ्या सामन्यांना समर्थपणे सामोरे जात आले आणि हे करतांना तब्येत चांगली असले म्हणजे पावले. उगाच मी काय शिकलो याचे ज्ञान लोकांसमोर पाजळायचे आणि मग विचार करायचा कि त्या ज्ञान-दिव्याच्या प्रकाश लोकांच्या डोक्यात पडतो आहे का? या वायफळ उलाढाली करायला उगाच लिहा-लिही नको. लोकांनी आपले दिवे शोधून स्वतःच्या डोक्यात हवा तसा आणि हवे तेंव्हा लक्ख प्रकाश पाडाव. बेस्ट ऑफ लक! 

असो. बघता बघता पाचशे शब्द खरडले पण. काय लिहितोय, काय लिहिणार आणि काय लिहायला नको इत्यादी उहा-पोह करण्यात एखादी गोष्ट किंव्हा लेख पूर्ण झाला असता. आता ९ वाजतायत रात्रीचे. हा लेख प्रकाशित करून महिन्यातून एक मराठी ब्लॉग लिहिणार हा हेतू पूर्ण झाला. सध्या यातच मी आनंदी आहे. 

आता इंग्रजी ब्लॉग राहिलाच आहे. त्याचे काय होणार देव जाणे. 

8/12/25

आक्रोश - भाग २ (आक्रोश म्हणजे नेमके काय करायचे?)

भारतात पहिला मुसलमानी हल्ला इस्लाम धर्माच्या स्थापने नंतर काही दशकातच झाला. एक तर दक्षिणेत केरळ मध्ये अरब मुसलमान व्यापारी पोचले होते. म्हणजे, जे अरब व्यापारी केरळ मध्ये येतच होते, ते आता मुसलमान झाले होते. पण त्यांनी काही केरळ पादाक्रांत केले नाहीं. भारतीय उपखंडात इस्लामने घातलेल्या विध्वंसाची सुरुवात  मोहम्मद बिन कासीम नावाच्या अरब आक्रमकाने केली. कासीम ने सिंध प्रांतावर हल्ला केला आणि लूट-पाट केली. त्या नंतर सिंध, पंजाब, सध्याचे अफगाण येथील हिंदू राजांनी सातत्याने होणाऱ्या अरब इस्लामी आक्रमणांचा यशस्वी प्रतिकार तब्बल पाचशे वर्षे केला. अरब आणि इस्लाम भारतात येऊ शकला नाहीं. पण थोडा थोडा भूभाग हिंदू राजांच्या हातातून जाऊ लागला. घुर प्रदेश, जो मध्य अफगाणिस्तानात आहे, तो मुसलमानी होत गेला. पुढे मोहम्मद घोरी हा याच प्रदेशातून दिल्ली वर चालून आला होता. खोकर हे हिंदू राज्य सिंध-पंजाब-अफगाणिस्तान भागात पसरले होते आणि खोकर हे अगदी पुरातन काळापासून या प्रदेशाचे आहेत. खोकर हिंदू राजाने आक्रमक मुसलमानांचा अत्यंत प्रखर प्रतिकार केला आणि अनेक शतके भारत सुरक्षित ठेवला. अगदी मोहम्मद गझनी ने सुद्धा नमूद केले आहे कि हिंदुस्थान जिंकायला खोकर जाट यांना हरवणे आवश्यक आहे पण अति कठीण आहे. खोकर जाट योद्धे हे एक उदाहरण झाले पण पृथ्वीराज चौहानच्या पराजयापर्यंतच्या पाच शतकात अनेक राजे, राज्य आणि अगणित हिंदू योद्ध्यांनी हिंदू धर्म आणि भारत सुरक्षित ठेवला. 

पण तरीही शेवटी  इस्लामी राज्य दिल्लीत मुसलमानी शासक कसे स्थापन झाले? बरं, एकच सत्ता नव्हती. अनेक आक्रमक सत्ताधारी झालेत. कुतुबुद्दीन ऐबक, लोधी, खिलजी, घोरी, गझनी, बख्तियार, इल्तुमिश, काफूर, तैमूर आणि शेवटी खालच्या रक्ताची मोघल, अशी असंख्य मुसलमानी सुलतान आलेत. त्यांनी आपापसात युद्ध केलीत, गळे कापलेत, पण जेंव्हा विक्रमादित्य हेमू दोन वर्षासाठी दिल्ली चा राजा झाला तेंव्हा सगळे मुसलमान एकत्रित आलीत आणि हेमूला मारले. आपापसातली भांडणे बाजूला ठेऊन दक्षिणेतील सगळी मुसलमान एकत्रित आलीत, विजयनगरचा सर्वनाश करायला. विजयानगरच्या शेवटच्या रामराजाने एका मुसलमानाला सेनापती म्हणून पण नेमला होता. त्या मुसलमान सेनापतीनेच ऐन युद्धात रामराजाचा गळा कापला आणि मुसलमानी सत्तांना विजय मिळवून दिला. अशी असंख्य उदाहरणे आहेत. पण नेमके असे का होत आले आणि अजूनही का होते आहे? 

मुसलमानांची हि कार्यपद्धती फार सूचक आहे कारण त्यांचे अंतिम लक्ष, निदान त्यांच्या साठी तरी, अत्यंत स्वच्छ  आहे. इस्लाम धर्माचा विजय, म्हणजे इस्लामेतर धर्माचा संपूर्ण, अगदी मुळापासून, सर्वनाश. आणि इतर धर्मियांनी एकतर इस्लाम स्वीकारायचा आणि नाहीं तर एक तर त्यांना मारायचे किंव्हा गुलाम म्हणून विकायचे. आणि जर का कुठे मुस्लिम समाज संख्येने कमी असेल तर बहुसंख्य होईपर्यंत वाट्टेल त्या मार्गाने खट-पट करायची आणि ज्या क्षणी बहुसंख्य झालेत, इतर धर्मियांची दुर्दशा सुरु. याची संपूर्ण कल्पना आपल्या पूर्वजांना होती. म्हणूनच त्यांचा लढा स्वच्छ होता. शिवाजी महाराजांच्या (पत्र-व्यवहाराच्या) भाषेत 'यवन-तुर्क' यांना हाकलाणे होते. धर्म संस्थापन होते. विजयानगर असो किंव्हा चोला असो किंव्हा वूडीयार असो कि केरळ चे मार्तंड वर्मा, हि सगळी राज्ये आणि राजे गर्वाने हिंदू होते. ज्या काळात, मुसलमानी सत्ता मोरक्को ते मलेशियापर्यंत पसरली होती. हिंदू जनता जिझिया देत होती. आणि मुसलमानी राजे हिंदूंना तुच्छ, निम्न मानीत, त्या काळात हे राजे हिंदू धर्माचे सरंक्षण आणि संवर्धनास तत्पर होते. मग १९४७ नंतर उर्वरित भारतात हिंदू बहुसंख्य असून आपण आपल्या धर्माची एकतर लाज बाळगतो किंव्हा केवळ मंदिरांच्या वाऱ्या करून वेळ घालवितो. यातून स्वाभिमान, सशक्तीकरण, किंव्हा ज्ञान यातील काहीच निर्माण होत नाहीं. म्हणूनच आपल्या डोळ्यासमोर काश्मीर प्रदेशातून हिंदू निर्वंश झालेत पण त्याची प्रतिक्रिया फारशी उमटली नाहीं. 

हा सगळं इतिहास पुन्हा इथे मांडून काय साधायचा आहे? हा सगळं इतिहास गूगल वर उपलब्ध आहे. लाइब्ररीत शेकडो पुस्तके या विषयावर मिळतील. आणि खूप साऱ्या लोकांना थोडा बहुत का होईना हा इतिहास माहिती पण आहे. पण लोक मानसात हा इतिहास लुप्त आहे. उर्दूत जेहेन शब्द आहे. जेहेन चा अर्थ मन. हिंदू जनतेच्या जेहेन मध्ये हा इतिहास नाहीं. कारण हा इतिहास मनी रुजला असेल तर कृतीतून तो विचार प्रस्तुत होईल. तसे होतांना दिसत नाहीं. 

इस्लाम धर्मियांच्या अगदी विरुद्ध आपली - हिंदूंची कार्यप्रणाली आहे. आणि मुख्यतः, भारतीय स्वातंत्र्य नंतर तर हिंदू लोक जणू गुंगीचे औषध घेऊन लोळतायत. मला वाटतं कि खोकर लढवय्यांपासून तर मराठा साम्राज्यापर्यंत हिंदू समाज आणि राज्यकर्ते या आक्रमकांना ओळखून होते. म्हणूनच इतक्या अमानुष आक्रमणानंतर आणि अनन्वित धार्मिक अत्याचारांनंतरहि भारतीय उपखंड हिंदू बहुसंख्यच होता. पण १९३० नंतरच्या राजकीय नेत्यांनी भारताची फाळणी करून पहिल्यांदा भारतीय उपखंडात असे प्रदेश निर्माण केले जिथे हिंदू अल्पसंख्य झालेत. पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान, म्हणजे पुढचा बांग्लादेश, येथे लगेच जणू हिंदू-द्वेष्टे मध्य युगीन इस्लामी सुलतान पुन्हा उदयास आलेत. पाकिस्तानमध्ये सन १९४८ ला २०% हिंदू होते. आज १% उरले आहेत. पळवून लावलेत, उरलेल्यांना मुसलमान केले आणि बाकीच्यांना मारून टाकले. पण हिंदूंना ठेवले नाहीं. सिंधू नदीच्या पात्रात गेल्या पाच हजार वर्षात पहिल्यांदा कोणी हिंदू स्नान करायला उरला नाहीं. बांग्लादेश मध्ये हिंदू संख्या अशीच झपाट्याने कमी होत गेली आहे. थोडक्यात, आपल्या डोळ्यासमोर भारतीय उपखंडातील एक तृतीयांश भागात हिंदू नाहीस झालेत. तरी भारतीय हिंदू इस्लामला सर्वधर्म समभाव सारख्या अत्यंत वाह्यात विचारसरणीचा आधार घेऊन खो देतात. 

हिंदू जनतेने धर्म वाचवायला काय करावे? मंदिरे, आरत्या, सण-वार, मंत्र-श्लोक यांच्यात काही अर्थ नाहीं. जर का इतिहास माहिती नसेल तर. धर्माची लॉकेट, टॅटू यांच्यात काही अर्थ नाहीं जर का इतिहास माहिती नसेल तर. आपला धर्म वाचवायचा असेल तर इस्लामचा नीट अभ्यास करायला हवा. मग त्यामुळे आपल्या धर्माचा अभ्यास काही काळ नाहीं केला तरी चालेल.  इतिहास नुसता वाचायचा नाहीं तर आत्मसात करायला हवा. कृतीतून काही सिद्ध व्हायला इतिहासाचे चिंतन, मनन आणि ध्यान करायला हवे. एकत्रित होणे आणि घोळका करण्यातला हा महत्वाचा फरक आहे. पाठ्यपुस्तकात इतिहास शिकविला जात नाहीं इत्यादी वायफळ बकवास बाजूला ठेवा. शिवाजी महाराजांना किंव्हा त्यांच्या मावळ्यांना काही CBSE अभ्यासक्रम नव्हता इतिहास शिकायला. हरिहर-बुक्का यांना दिल्ली ला नेऊन मुसलमान केले होते. ते तिथून पळून पुन्हा दक्षिणेत आले आणि विजयानगरची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी इतिहासाची डिग्री घेतली नव्हती. स्वाभिमान, स्वधर्माभिमान आणि आत्मविश्वास शिकायला पाठ्यपुस्तके किंव्हा कोर्सेस ची आवश्यकता नाहीं. 

भारताला स्वातंत्र्य राजकीय दृष्टीने मिळाले आहे पण ऐतिहासिक स्वातंत्र्य लाभले नाहीं. तैमूर, घोरी, गझनी, खिलजी आणि अकबर-औरंग्या आता नव्या रूपाने पाकिस्तान-बांग्लादेश मध्ये पैदा झाले आहेत आणि आपल्या सीमेवर पुन्हा आक्रमणे करायला तयार आहेत. आपले अस्तित्व, आपली संस्कृती, आपली विचारसरणी, आपले कौशल्य, आपले तत्वज्ञान, आपला इतिहास, आपल्या वास्तू, आपले शिल्प, आपले देव, आपला धर्म नामशेष करायला ते अजूनही सरसावले आहेत. त्यांनी लढा चालू ठेवला आहे. आपला interval च संपत नाहीं या! 

घरा-घरातून हा इतिहास जिवंत ठेवायला हवा तरच पुढल्या पिढीला तो नमूद होईल. या पिढीने छोटीशी का होईना पावले उचललीत तर पुढली पिढी अजून पुढे जाईल. आणि मग ऑप सिंदूर सारखे जिंकलेली बाजी पुन्हा हरणार नाहीं. 

---

संदर्भ:

मोहम्मद बिन कासीम चे सिंधवर आक्रमण:

https://en.wikipedia.org/wiki/Arab_conquest_of_Sindh

केरळमध्ये इस्लाम:

https://www.newindianexpress.com/cities/kochi/2024/Jul/11/unravelling-keralas-islamic-history 

खोकर जाट आणि त्यांचा प्रखर लढा

1) https://rootshunt.com/aryans/aryankingsandcountriesinkurukshetra/kukkur.htm

2) https://historyfinder.in/sultanate-of-delhi/

3) https://www.clearias.com/muhammad-ghori/

4) https://jatchiefs.com/history/

         5) https://www.amazon.in/Heroic-Hindu-Resistance-Muslim-Invaders/dp/8185990182

विक्रमादित्य हेमू आणि पानिपतचे दुसरे युद्ध

https://en.wikipedia.org/wiki/Second_Battle_of_Panipat

हरिहर राय आणि बुक्का राय, विजयनगरचे साम्राज्य, तालिकोटची लढाई आणि राज रामरायाचा त्याच्या मुस्लिम सैन्याकडून झालेला शिरच्छेद

1) https://satyashodh.com/britishhistoriansandtragedyofindia.htm

2) https://goa.pscnotes.com/history-booster/kingdom-of-vijaynagar-2/

3) https://ijcrt.org/papers/IJCRT1033073.pdf

4) https://serialsjournals.com/abstract/75050_ch_6_-_ashwin_srinath.pdf

केरळ चे राजा मार्तंड वर्मा, आणि  त्रावणकोर राज्य 

1) https://unacademy.com/content/railway-exam/study-material/ancient-history-of-india/a-short-note-on-the-state-of-travancore/

2) https://testbook.com/ias-preparation/battle-of-colachel

पाकिस्तान आणि बांगलादेश मधील हिंदू लोकसंख्या

1) https://www.nytimes.com/2020/08/04/world/asia/pakistan-hindu-conversion.html

2) https://www.newslaundry.com/2015/01/09/the-vanishing-hindus-of-pakistan-a-demographic-study-2

--

ता.क. - इतिहास केवळ तारखा, युद्ध आणि करार नसतात. किंव्हा इतिहास म्हणजे केवळ घटनांचा कालक्रम म्हणूनही वाचायचा नसतो. इतिहास एकमार्गी आणि एक दिशेने वाचला तर माहिती मिळेल पण आकलन होणार नाहीं. इतिहास चौफेर वाचून तो प्रतिसाद आणि पडसादांच्या दृष्टिकोनातून समजायला हवा. उदाहरणार्थ. औरंग्याने महाराजांचा अवमान केला हि घटना झाली. आणि ती सन १६६६ ला झाली हा कालक्रम झाला. पण त्याचे परिणाम काय झालेत? हा इतिहास झाला. सन १७३९ ला नादीरशहाने दिल्लीवर हल्ला केला आणि तीस हजार कवट्यांचा ढीग रचला हि घटना झाली. पण पुन्हा असा संहार होऊ नये म्हणून अहमदशहा दुर्रानी किंव्हा अब्दाली ने पुन्हा दिल्लीवर स्वारी केली तेंव्हा मराठे धावून दिल्लीच्या रक्षणास गेले हा इतिहास झाला. इतिहास असा समाजाला कि वर्तमान कळण्यास मदत होतेच पण त्यासोबत भविष्याबद्दल माहितीबंध आराखडा मांडल्या जाऊ शकतो. उदाहरणार्थ,  १९४७ची फाळणी हि एक घटना झाली. धर्माच्या जोरावर पाकिस्तान बनविले. बहुतांश हिंदूंना (पश्चिम पाकिस्तानातून) हद्दपार केले पण त्या तुलनेत भारतातील मुसलमान फारसे भारत सोडून गेले नाहीत. त्यामुळे आज एक तृतीयांश भारतीय उपखंडात हिंदू नगण्य आहेत पण संपूर्ण भारतीय उपखंडात मुसलमान सगळीकडे आहेत, हे भविष्य निश्चित झाले. 

7/26/25

The Desciple - चित्रपट परीक्षण आणि निरीक्षण

या मराठी चित्रपटाबद्दल मी चार वर्षांपूर्वीच ऐकले होते.  'New Yorker ' या अमेरिकेतील सुप्रसिद्ध मासिकात या चित्रपटाचा आढावा प्रकाशित झाला होता. या मासिकात एखाद्या भारतीय चित्रपटाची दखल घेतल्या जाणे दुर्मिळ आहे. आणि या मासिकाने नुसती दखल घेतली नाहीं तर चित्रपटाचा आढावा पण घेतला हे प्रशंसनीय तर आहेच पण हि एक उपलब्धी म्हणावी लागेल. मी 'New Yorker 'मधील लेख तेंव्हा मुद्दाम वाचला नाहीं. मला चित्रपट आधी बघायचा होता. कारण कधी कधी आढावा वाचून चित्रपटाबद्दल आपण एक विशिष्ट धारणा घेऊनच चित्रपट बघतो. मला तसे करायचे नव्हते. चित्रपट हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताशी निगडित होता, त्यामुळे मी चित्रपट बघूनच त्याबद्दल पुढे वाचणार (किंव्हा लिहिणार) होतो. 

या सगळ्यात चार वर्षे निघून गेलीत आणि मला आत्ता हा चित्रपट बघण्याची संधी मिळाली. "विलम्बेन इति शुभम्" असे म्हणून आपण विषयप्रवेश करू या. 

चित्रपटाच्या नावाचा अर्थ 'शिष्य' असा होतो. चित्रपटाचे नाव इंग्रजीत असले तरी चित्रपट मराठीतच आहे. एका शिष्याची - शरद नेरुळकर ची, गोष्ट आहे. शरद हा भारतीय शास्त्रीय संगीताचा शिष्य आहे. केवळ भारतीय शास्त्रीय संगीताचाच नव्हे तर शरद हा शास्त्रीय संगीत इतिहास, संस्कृतीचा व गुरु-शिष्य परंपरेचा भक्त आहे. आता शिष्य किंव्हा भक्त असून चालत नाहीं. शिष्य होऊन तुम्ही अविरत कष्ट घेऊ शकता. किंव्हा भक्त बनून तुम्ही आयुष्य वाहू शकता पण कष्ट आणि निष्ठा या पायावर  तुम्हाला कलेत नैपुण्य मिळेल च असे नाहीं. कधी कधी मुळातच प्रतिभा कमी असते. आणि जमीन-आस्मान एक केलं तरी सामान्यतेच्या चौकडीतून बाहेर येणे शक्य होत नाहीं. चित्रपटाचा हा प्रवास उत्कंठावर्धक यासाठी आहे कि प्रेक्षकांना शरद ची हि तळमळ जाणवते आणि शरदला त्याच्या मनातले यश प्राप्त व्हावे यासाठी प्रेक्षकही आस लावून बसतो. 

साधारण चित्रपटाला सुरुवात असते, त्यात गोष्टीची उभारणी होते. मग मध्य असतो जिथे अडचणी सामोऱ्या येतात, एखादा खलनायक किंव्हा खलनायक वृत्तीची परिस्थिती उभारल्या जाते. शेवटी अडचणींवर मात होऊन सांगता होते. काही चित्रपटाच्या शेवटी अडचणींवर मात होत नाहीं आणि दुःखी शेवट असतो. The Desciple चित्रपट या कुठल्याच सांगाड्यात बसत नाहीं. याला सुरुवात नक्कीच आहे पण मग शरदचे अविरत कष्ट जणू चित्रपटाचा नायक बनतो. मग शरदच्या डोळ्याने आपण आशेचा, कष्टाचा, पीडेचा, त्यागाचा व अगतिकतेचा  प्रवास करतो. शरदला त्याला अपेक्षित नैपुण्य मिळेल का? 

शरदला संगीताचा नाद त्याच्या वडिलांनी लावलेला असतो. प्रेमाने, गोडी-गुलाबीने ते त्याला लहान वयापासून शास्त्रीय संगीताचा ध्यास लावतात. शरदचे वडील स्वतः गायक असतात पण त्यांना फारसे गातांना दाखविले नाहीत. त्या ऐवजी संगीताचा आणि शास्त्रीय संगीत घराण्यांचा इतिहास किंव्हा गायकांच्या आठवणीं मधेच त्यांना रमतांना दाखविले आहे. आणि कळत-नकळत हेच संस्कार शरदवर होतात. पण शरदला मात्र एक प्रसिद्ध गायक व्हायचे असते. म्हणून तो स्वतःला वाहून घेतो. शरदचे गुरु हे शरदच्या वडिलांचे गुरुबंधू असतात. शरदच्या वडिलांच्या गुरु म्हणजे माई. या माईंची शास्त्रीय संगीतावरची भाषणे शरद सतत ऐकत असतो. हि भाषणे जणू त्याच्या असाध्य साध्यासाठीचे दीपस्तंभ असतात. चित्रपटाच्या कथेच्या मुळावर प्रकाश टाकायला या भाषणांचा वापर करण्यासाठी  दिग्दर्शक आणि लेखकाच्या अलौकिक प्रतिभेचे कौतुक करावे तेवढे कमी! शरदच्या वडिलांना नेहमी भूतकाळातच दाखविले आहे त्यामुळे सध्याच्या काळात ते नसावेत. संगीताला वाहून घेतलेला शरद आपल्या विधवा आईकडेसुद्धा फारसे लक्ष देत नाहीं. पण आपल्या संगीत गुरुची अगदी पुत्रवत काळजी मात्र घेतो. सगळीकडे विरोधाभास प्रकर्षाने जाणवतो. पण या कथेत कोणी खलनायक नाहीं. कोणी कोणाचे वाईट करायला निघालेला नाहीं. विचित्र ध्येय, असाध्य लक्ष्याची हि कथा दिग्दर्शकाने फार नाजूकपणे आणि हळुवारपणे प्रदर्शित केले आहे. 


                                                         

चित्रपटात शरद आणि त्याच्या आव्हानांव्यतिरिक्त, एकूण शास्त्रीय संगीताची सध्याची परिस्थिती, गुरु-शिष्य परंपरेतील त्रुटी, परंपरेच्या बोर्डाखाली संगीताचे होणारे नुकसान अश्या विवादित मुद्द्यांवर थोडक्यात भाष्य केले आहे. शास्त्रीय संगीताशी संबंधित आपण बऱ्याच विचित्र किंव्हा तर्कट गोष्टी नेहमी ऐकत आलो आहोत. पण ऐकायला मजेदार वाटत असल्या तरी त्यामागची सत्य परिस्थिती बिकट असते. यावर चित्रपटाने मार्मिक टिप्पणी केली आहे. 

चित्रपटाच्या नायकाची भूमिका श्री आदित्य मोडक यांनी केलेली असून, ते स्वतः खऱ्या आयुष्यात शास्त्रीय संगीताचे उपासक आणि गायक आहेत. चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत शरदच्या गुरूंची भूमिका श्री अरुण द्रविड, माईंच्या भाषणांच्या आवाजात सुमित्रा भावे, शरद ची मैत्रीण म्हणून दीपिका भिडे-भागवत आणि शरदच्या वडिल्यांच्या भूमिकेत श्री किरण यज्ञोपवीत आहेत. पंडित अरुण द्रविड हे स्वतः शास्त्रीय संगीताचे गायक आहेत. आणि दीपिका भिडे-भागवत या जयपूर घराण्याच्या उभरत्या तारा आहेत. उत्तम नटांना घेऊन त्यांच्याकडून गायकाची भूमिका करून घेण्याऐवजी दिग्दर्शकाने उत्तम गायकांना घेऊन त्यांच्याकडून नटांची भूमिका वठविली आहे. हा प्रयोग थोडा धाडसी म्हणावा लागेल पण या सगळ्यांनी त्यांच्या भूमिका उत्तम वठविल्या आहेत. कुठे म्हणजे कुठेच उणीव नाहीं. 


चित्रपटाचे दिगर्शक आणि लेखक श्री चैतन्य ताम्हणे आहेत. श्री ताम्हणे यांचा  'Court ' (कोर्ट) नावाचा चित्रपट भारताकडून ऑस्कर साठी नामांकित झाला होता. कोर्ट सारखा विषय हाताळल्यावर श्री ताम्हणे यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासारख्या विषयाला धरून चित्रपट लिहिणे यात त्यांच्या प्रतिभेच्या झेपेची कल्पना येते. चित्रपटाच्या छायांकनाबद्दल (Cinematography ) विशेष कौतुक करायला हवे. अश्या तऱ्हेचे छायांकन मी भारतीय चित्रपटात फारसे बघितले नाहीं. वीस वर्षांपूर्वी आलेल्या श्वास चित्रपटाची शैली थोडीबहुत अशी होती. चित्रपटात दाखविलेले मुंबई, छोटे-छोटे संगीत हॉल्स, ट्यूब लाईट चे दिवे, ऐकायला येणार श्रोते हे अचूक टिपले आहेत. कुठल्याही तऱ्हेची कला म्हंटले कि आधी उपासना, तपश्चर्या आणि मग नशिबी असेल तर पैसा. शरदची अजून तपश्चर्याच चालू असते त्यामुळे सामान्य उपजीविकेची साधने आणि बेताची आणि टंचाईचे राहणीमान प्रकर्षाने जाणवावी म्हणून शरदच्या सगळ्या सीन मध्ये कॅमेरा नेहमी दुरून हळू हळू जवळ जातो. जणू, आपणच त्या खोलीत प्रवेश घेतो आहे. अश्या वैशिष्ट्यपूर्ण छायांकनाने फार सुरेख वातावरण निर्मिती होते. छायांकन Michał Sobociński यांचे आहे.

संगीतावर आणि शास्त्रीय संगीताशी संबंधित अनेक चित्रपट आहेत. कृष्ण-धवल चित्रपटांच्या काळात 'बसंत बहार' किंव्हा 'बैजू-बावरा' अतिशय प्रसिद्ध झाले होते. 'बसंत बहार' चित्रपटात पंडित भीमसेन जोशी आणि मन्ना डे यांची जुगलबंदी दर्शविली आहे. (आणि जुगलबंडीत मन्ना डे चा आवाज असलेला नायक, भीमसेन जोशी चा आवाज असलेल्या पात्राला हरवतो) पुढे अनेक चित्रपटांमध्ये नट किंव्हा नटी गायक दाखविल्या गेले आहेत. ९० च्या दशकात 'साझ' नावाचा सई परांजपे यांचा चित्रपट आला होता. त्यात झाकीर हुसेन यांनी अभिनय केला होता. पुढे सलमान खान आणि मनीषा कोईराला यांचा 'खामोशी' म्हणून चित्रपट प्रसिद्ध झाला होता. त्या आधी 'आशिकी' नावाचा चित्रपटहि फार चालला होता.  पण या चित्रपटात संगीत हे मुख्य पात्र नव्हते. आशिकी चित्रपटात मुख्य पात्रे उभारते गायक दाखविले आहेत आणि एकाला यश मिळाल्यावर त्यांच्यातील गैरसमज/संघर्षावर चित्रपट आहे. अमिताभ-जया भादुरी यांचा 'अभिमान' चित्रपटही असाच होता. गोष्ट हे नायक-नायिकेचीच असते. फक्त फरक एवढाच कि हि पात्रे संगीताशी निगडित असतात. या चित्रपटांच्या यशामागे चित्रपटातील गाणी चांगली होती एवढेच. 

The Desciple चित्रपटात शास्त्रीय संगीत हे मुख्य किरदार आहे. रियाझ करून संगीतातील राग प्रसन्न होतील हि आशा, त्यासाठी चाललेली तळमळ आणि शास्त्रीय संगीतावरची अढळ निष्ठा आणि त्यासाठी भौतिक जगातील यशाला सुद्धा तर्पण देण्याची तयारी या सगळ्याचा अनुभव चित्रपट आपल्याला देतो. पंडित भीमसेन जोशी वयाच्या ११व्या वर्षी संगीत शिकायला म्हणून गुरूच्या शोधात घरून पळून गेले. आणि पुढील १२-१५ वर्षे शिकत राहिलेत. देवाच्या दयेने आपल्यापैकी बहुतांश साधे सुरात गुणगुणु पण शकत नाहीं. आणि आपल्या पैकी भीमसेन जोशींसारखी साधना करण्याची ऐपत नाहीं. पण हजारो वर्षे असंख्य गायक शास्त्रीय संगीताने का झपाटले जातात आणि स्वतःला का झोकून देतात याचा संक्षिप्तात अनुभव हा चित्रपट अनोख्या शैलीत आपल्याला देतो. 

शंभर-दीडशे वर्षांपूर्वी पंडित पळूस्कर आणि पंडित भातखंडे यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा प्रसार, प्रचार आणि सुधारणेसाठी फार महत्वपूर्ण योगदान केले होते. त्यांच्या भूमीतील श्री चैतन्य ताम्हणे यांनी हा चित्रपट काढून पळूस्कर-भातखंडे यांच्या तुलनेत अल्पसा का होईना पण हातभार लावला आहे. म्हणूनच The Desciple  मराठी चित्रपटसृष्टीत अजून एक उच्चांक मानायला हवा.