8/20/12

निवडक सुबोध ज्ञानेश्वरी - भाग १

कालच श्रावण संपला. यंदा श्रावणात सकाळी उठुन ज्ञानेश्वरी वाचण्याचा संकल्प केला होता. एका महिन्यात अख्खा ग्रंथ वाचणे, वेळ आणि बुद्धी दोहोंना झेपणार नव्हत. सकाळी उठुन कामाला जाण्याआधी अर्धा तास वाचायची अस ठरवल. मागे आमच्या आईने "सुबोध ज्ञानेश्वरी" हा श्रीधर भास्कर वर्णेकरांनी लिहिलेला ग्रंथ दिला होता. माझ्या सारख्या अनभिज्ञ जनांसाठी 'प्रज्ञाभारती'  वर्णेकरांनी ज्ञानेश्वरी आजच्या मराठीत रचली. 

महिन्याभरात मी चौथ्या अध्यायावर पोचलो. अर्थात हि कुठली शर्यत नव्हती पण माझ्या आवडीच्या काही निवडक ओव्या मी इथे प्रस्तुत करु इच्छितो.
---
अर्जुनाची विमनस्क मनस्थिती (२.७)

जैसे होता तिमिरग्रस्त। दृष्टीचे तेज होते लुप्त।
जवळचे ही वस्तुजात। मुळी न दिसे॥

तैसेच देवा मज झाले। हे मन भ्रान्तीने ग्रासले।
आता काय आहे हित आपले। तेही न कळे॥

तरी कृष्णा तू करी विचार। योग्य तेच आम्हा सांग सत्वर।
तूच सर्वस्व आणि इष्ट-मित्र। आम्हास आता॥

तू गुरुबंधु पिता।तूच आमची इष्टदेवता।
तूच संकटी रक्षणकर्ता। सर्वदा आमचा॥

जैसा शिष्याचा गुरुवर। सर्वथा न करी अव्हेर।
सरितांचा त्याग सागर। करील कैसा?॥

किंवा अपत्यास सोडून माता। जरी जाईल अच्युता।
तरी सांग ते सर्वथा। जगेल कैसे॥

तैसा सर्वतोपरी आम्हास। देवा तूच एक आहेस।
पूर्वी बोललो जे तुम्हास। ते न रुचेल जरी॥

तरी आम्हास काय उचित। आणि जे नाही धर्मविपरीत।
तेच आता सांग त्वरित। पुरुषोत्तमा॥
---

आत्म्याचे अमरत्व - (२.२१)

किंवा पूर्ण कुंभ उलंडला। तेथे विंवाकार दिसतो लोपला।
परी तो सूर्य नाही गेला। त्याच्यासह॥

किंवा मठामध्ये आकाश जैसे। मठाकार मात्र असे।
मठ भंगताही अभंग असे मठाकाश॥

तैसे शरीराचा होता लोप। नाश न पावे स्वरूप।
म्हणून हे भ्रांतीचे पाप। सोड बापा॥

(२.२२)
जुने वस्त्र टाकून। नवे करावे धारण।
तैसा एक देह सोडून। आत्मा दुसरा स्वीकारी॥

(२.२३, २.२४)

हा अनादि नित्यसिध्द। निरुपाधि विशुद्ध।
म्हणून श्स्त्रादींनी याचा विच्छेद। होत नाही॥

हा प्रलयजळात नाही बुडत। अग्नीनेही नाही जळत।
वायुसुद्दा नाही शक्त। शोष याचा करण्यास॥

अर्जुना हा नित्य। अचल आणि शाश्वत।
सर्वत्र असे सदोदित। परिपूर्ण हा॥

---


पापातून सुटण्याचा उपाय- (२.३७)

दुधाने तेव्हाच येईल मरण। जेव्हा विषासह होईल सेवन।
तैसे सहेतुकपणे धर्माचरण। करिता दोष लागती॥

म्हणून हे पार्था। हेतु सोडून सर्वथा।
तुज क्षात्रवृत्तीने झुंजता। पाप नाही॥

(२.३८)
सुखात संतोष मानू नये। दु:खात खेद मानू नये।
इच्छा मनी धरू नये। लाभालाभाची॥

येथे आपणास विजय मिळेल। किंवा सर्वथा देह जाईल।
हे आधीच काही पुढील। चिंतू नये॥

आपला स्वधर्म जो उचित। तदनुसार असता वर्तत।
जे लाभेल ते निश्चिंत। सहन करावे॥

ऐस सुदृढ असता मन। न लागे दोषबंधन।
म्हणून आता निभ्रांत होऊन। युध्द तू करावे॥

--
(क्रमशः)