10/30/07

आद्य शंकराचार्य - भाग १

गीतेतील एक श्लोकात कृष्ण अर्जुनास म्हणतो की धर्म संस्थापनेसाठी मी प्रत्येक युगात जन्म घेइन. याचा अर्थ बरीच लोकं असा घेतात की विष्णुचे ९ अवतार झाले असुन १० अवतार अपेक्षित आहे. मग गौतम बुध्दाला जरी ९ वा अवतार मानले तर याचा अर्थ असा होतो की गेल्या तीन हजार वर्षात धर्माला कधी ग्लानी आलीच नाही? अर्थात आली. बरेचदा तो मृतवत झाला व प्रत्येक वेळेस थोर-मोठ्यांनी धर्मोत्थापनेस जन्म घेतला. कोणी मुत्सद्दीपणाने तर कोणी शौर्याच्या बळावर धर्माचे रक्षण केले. हे थोर-महात्मे अवतार होते की नाही हा विवाद बाजुला ठेउनच त्यांच्या थोरवीची कल्पना येउ शकते.

ईसवी सन पूर्व पाचव्या शतकात वैदिक धर्माचा र्‍हास झालेला होता व सनातन धर्म अक्षरश: आचके देत होता. अश्या परिस्थितीत केवळ प्रगल्भ बुध्दीच्या बळावर आद्य शंकराचार्यांनी भारतवर्ष अक्षरशः पादाक्रांत करुन सनातन धर्माचे पुनरुत्थान केले. त्यांनी केलेल्या कार्याचे प्रतिसाद आजही सनातन धर्माच्या प्रत्येक कार्यात उमटतात. त्यामुळे भारताच्या मृत्युंजयांच्या मालिकेत आद्य शंकराचार्यांचे नाव अग्रगण्य घ्यावे लागेल.

आद्य शंकराचार्यांनी धर्म संस्थापना केली म्हणजे नेमके काय केले याचा विचार करण्याआधी धर्म म्हणजे काय याचा थोडा आढावा घेणे आवश्यक आहे. सांप्रत परिस्थितीत 'आपला धर्म कुठला?' अशी पृच्छा केली असता हिंदु-मुसलमान असल्या पैकी कुठले उत्तर द्यावे लागेल. पण भारतीय सनातन जीवनपध्दतीत धर्माची व्याख्या याहुन अधिक व्यापक आहे. धृ धातु पासुन धर्म शब्दाची उत्पत्ती होते. धृ धारयती इति धर्मः। धृ म्हणजे स्थिर. कालामानानेही जे बदलत नाही ते धृ. आणि जी जवाबदारी, जी कर्तव्य कधीही बदलत नाही व ती नेहमीच निभवावी लागते तो धर्म. मनुष्याकडुन अपेक्षित असलेले आचरण, त्याची कर्तव्य, वैयक्तिक नियम व विविध आश्रमांद्वारे अपेक्षित सामजिक नियम इत्यादी सर्व कार्यभार धर्मांतर्गत मोडते. या व्यतिरिक्त त्याचे परमार्थाविषयीच्या तत्त्वज्ञानास धर्मच म्हणतात.

यात लक्षात घेण्यायोग्य अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नियमावलीपैकी एकही नियम कोणावर लादलेला नाही. प्रत्येक मनुष्याकडुन विशिष्ट आचरणांची अपेक्षा आहे पण जोरा नाही. असे असताही समाजात या नियमांचे बर्‍यापैकी आपणहुन पालन होतांना दिसते. माझ्या मते यामागचे कारण भारतीय मनावर परमार्थाविषयीचा पगडा होय. कळत- नकळत समाजाचे विविध स्तर परमार्थाविषयीचे तत्त्वज्ञान आत्मसात करित असतात व त्यांचे प्रतिसाद भौतिक आयुष्यात सतत उमटतात.

भारतीय पुरातन इतिहासाचा आढावा घेतल्यास लक्षात येते की विविध विचारप्रणालींनी भारतीय संस्कृतीला नटविले आहे. यातील बौध्द व जैन या नास्तिक विचारधारा वगळता इतर सर्व विचारधारा वेदांशी आपले नाते दृढ करण्याचा प्रयत्न करतात. (चार्वक संहितेचा मी या विचार-प्रणालींमधे समावेश केलेला नाही.) यात सर्वात शेवटची संस्था म्हणजे वेदांत होय. आचार्यांच्या बरेच आधी वेदांत विचारप्रणालीचा उगम झालेला होता. आचार्य बद्रायण यांनी 'वेदांत सुत्र' ग्रंथात ५५० सुत्रांद्वारे वेदांतावर भाष्य केले असे मानल्या जाते. या ग्रंथातच ब्रह्मैक्यत्वाचा मुद्दा आढळुन येतो. या तत्त्वावरच पुढे आद्य शंकराचार्यांनी अद्वैत सिध्दांताची मांडणी केली. भारत वर्षात जन्मलेल्या अनेक तत्त्वज्ञानांपैकी आजच्या घटकेला अद्वैत वेदांतच जिवंत आहे यावरुन त्याचे महात्म्य सिध्द होते. याचा अर्थ असा नव्हे की आधीच्या विचारप्रणाली चूक होत्या. पण भारतीय तत्त्वज्ञानाच्या प्रगतीपथावर अद्वैत शेवटचा मुक्काम मानता येइल.
(क्रमशः)

10/19/07

गोड-लिंब

"या ताई. बसा आरामात. झालाच माझा स्वयंपाक" जोशी बाईंनी सुधा ताईंच स्वागत केलं.

"होऊ दे तुझ आरामात. मला कसली घाई नाहीया"

"यंदाच्या १०वीच्या वर्गातील विद्यार्थी कसे आहेत? किती मेरीट येणार?" जोशी बाईंनी विचारलं. सुधा ताईंनी लगेच उत्तर दिल नाही. काय उत्तर द्यावे याचा जणु त्या विचार करत होत्या.

"किती मेरीट येणार?" जोशी बाईंनी परत विचारले.

" अगं, शिकवण्या सुरु झाल्या नाहीयात. मुलांना उन्हाळ्याची सुट्टी दिली. आजकाल तर ९वी च्या परीक्षे आधीच १०वीचे वर्ग सुरु होतात. मुर्खांचा बाजार भरत चाललाय. मी मुलांना सांगितले की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधे मजा करा, जुन महिन्यात १०वीचा नारळ फोडुया."

थोडं खिन्न हसुन पुढे म्हणाल्यात "तशीही यंदा फारशी मुलं नाही आलीत." सुधा ताईंच चित्त काही थार्‍यावर दिसत नव्हत.

"तुला काही मदत हवी आहे का? मी पण अगदी वेळेवर आले. लौकर येणार होते पण शेजारच्या मारवाड्याने उच्छाद घातलाय."

"मारवाडी?" जोशी बाईंनी प्रश्नार्थक मुद्रेने विचारले.

"शेजारच्या केळकरांचा प्लॉट विकला गेल्याच कळल नाही का तुला? प्लॉट रिकामा होता तर मी तिथेही बरीच झाड लावली होती. पण नवीन मालकाने एकाच दिवसात सगळ साफ केलं." मग खिडकी बाहेर शुन्यात नज़र टाकुन त्या पुढे म्हणाल्यात " एवढच नाही तर त्याच्या प्लॉटवर डोकवणार्‍या माझ्या पेरुच्या आणि आंब्याच्या फांद्याही छाटल्या त्याने"

जोशी बाईंना काय बोलाव सुचेना. उगाचच काहीतरी बोलायच म्हणुन जोशी बाई सुधा ताईंना झाडांबद्दल माहिती विचारु लागल्यात.

तेवढ्यात अनिरुध्द जोरात दार आपटुन घरात आला. "आई....भुकेनी मरतोय मी, जेवायचं झाल का?" असं ओरडत तो दाण-दाण उड्या मारत न्हाणीघरात रवाना झाला.

" अरे, हळु. तु घरात आल्याच सगळ्या गावाला कळायला नकोय" जोशी बाई ओरडल्या.

सुधा ताई आज सवाष्ण म्हणुन जेवायला आल्या होत्या. म्हणुन जोशी बाईंची स्वयंपाकाची थोडी घाई होत होती. अनिरुध्दला आज आईला मदत करायची होती पण आज सकाळी बाहेर गेलेला तो आत्ता उगवला होता.

"अनिरुध्द, तुला येतांना गोड-लिंबाची पानं घेउन यायला सांगितली होती ना"

"मला वाटल की सुधा काकुच घेउन येणार आहे तिच्या बगिच्यातुन" अनिरुध्द उत्तरला.

आधीच घाई होत होती त्यातुन अनिरुध्द गोड-लिंब आणायचा विसरला बघुन जोशी बाईंचा पारा चढला. "एक काम सांगितल तर ते सुध्दा ढंगानी करता येत नाही. दिवसभर नुसत्या चकाट्या पिटायला हव्यात गावभर"

"अरे, एवढीशी पानं आणायची विसरलो तर एवढ रागवायला काय झाल? अनिरुध्द उगाच काहीतरी बोलायच म्हणुन बोलला.

"हे बघ, उलट उत्तर देउ नकोस. एक साध काम करता येत नाही तुला. कुठे होतास सकाळ पासुन, काय करत होतास? "

"राहु दे गं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालु आहेत ना त्याच्या"

" अहो, रागवु नाही तर काय करु. सकाळ-संध्याकाळ नुस्ता हुंडारत असतो. सकाळी उशीर उठायच मग नास्ता करुन मागल्या गल्लीतल्या मुलांसोबत चकाट्या पिटायच्या. दुपारचं जेवण झाल्यावर मस्त कुलर मधे ३ तास झोप कि संध्याकाळी परत वायफळ बडबड करायला मागल्या गल्लीत आमचे महाराज हजर" जोशी बाई फणकारल्या.

"बाप रे आई, इतकही काही चुकल नाहीया माझ" अनिरुध्द ने उलट उत्तर दिले.

" अरे, अनी अस आईला उलट उत्तर देउ नये. बरं तुझ्या मुंबई च्या शिबिराच काय झाल?" सुधा ताईंनी विषय बदलवायला म्हणुन विचारलं

" माहीती नाही. बाबांना विचारा." अनिरुद्धने गाल फुगवुन उत्तर दिले. मग हळु आवाजात स्वतःशीच पुटपुटला "एक तर इथे आई डोकं खाते सकाळ-संध्याकाळ" अनिरुध्दचे वाक्य पुर्ण केल नसेलच तेवढ्यातच जोशी बाईंनी त्याला फाडकन झापड मारली.

" लाज नाही वाटत तुला अस बोलायला. कुठुन शिकला असं बोलायला? बाबांची चूक आहे हां, का रे? त्यांना शंभर काम असतात. तुला एवढं जायच होता शिबिरात तर स्वत: नव्हता का अर्ज करता येतं. लिहिता येतं ना तुला, फॉर्म भरायला. आणि मी तुझं डोकं खाते ? अस बोलायची एवढी हिम्मत झाली तुझी?" सुधा ताई कडाडल्या. रागात त्यानी जोरात टप्पल मारली.

" लागतय ना मला" अनिरुध्द कळवळुन म्हणाला.

" अहो, जाउ द्या. लहान आहे अजुन. सुधा ताईंनी अनिरुध्द ची बाजु सांभाळायचा प्रयत्न करायला लागल्या.

"अनि, आईला सॉरी म्हण"

" काहीही सांगितल कि एकच उत्तर येतं. १०वीची परिक्षा आत्ताच संपली आहे. मला मजा करु दे. बघते आता कि काय दिवे लावतो १०वीत." जोशी बाईंचा राग काही आवरत नव्हता. त्यांनी अनिरुध्दचा कान ओढला.

"अहो, काय करताय. इतक रागवायला काय झाल" असं म्हणत सुधा ताईंनी जोशी बाईंचा हात धरला.

जोशी बाईंनी सुधा ताईंचा हात झटकला. "हे बघा सुधा ताई, तुम्ही याच्या मधे पडु नका. तुम्हाला काही माहिती नाही."

" का, मला स्वतःच मुल-बाळं नाही, म्हणुन अस म्हणताय का?" सुधा ताई फटकन उत्तरल्या.

जोशी बाईंना काय उत्तर द्यावे कळेना. त्या नुसत्या अचंबित नजरेनी बघत राहिल्या.

"कळत मला. तुमचा संसार भरलेल आणि मला मेलं एक सुध्दा पोरं नाही. म्हणुन तुम्हाला वाटत कि मला पोरं कशी मोठी करायची हे माहिती नाही. पण पोरांकडे लक्ष द्यायच सोडुन तुम्हे दिवसभर नोकरी करता आणि मग अपेक्षा करता कि मुलं शिस्तित रहावी म्हणुन. कस शक्य आहे ते?" खोलीत विचित्र शांतता पसरली. अनिरुध्दला कळेना मधुनच हे काय सुरु झालं म्हणुन.

जोशी बाईंना जणु अजुन शब्दांचा संदर्भ लागत नव्हता.

" आई, सॉरी. मी कधी परत अस बोलणार नाही" अनिरुध्द म्हणाला.

पण सुधा ताई काही थांबण्याच्या नादात नव्हत्या. खुर्चीत बसत त्या म्हणाल्या " इतकी वर्ष बघतेय मी, सोन्यासारखी मुलं आहेत. पण तुम्ही सतत त्यांची काळजी करता आणि त्यांना रागवत असता. तुम्ही त्यांच संगोपन करण्यात कमी पडत असाल तर त्याचा राग मुलांवर कशाला काढायचा" " अहो, काय बोलताय तुम्ही" जोशी बाई सुधा ताईंचा हा नवीन अवतार बघुन चकित झाल्या. सवाष्ण म्हणुन सुधा ताई जेवायला आल्य होत्या. पण आज अनिरुध्दला रागवण्याच निमित्तमात्र झालं व इतकी वर्ष साचत असलेल्या व्यथा खपली निघुन जखमेतुन रक्त वहाव्यात तश्या वाहु लागल्या.

" मी किती तरी वेळा आडुन-आडुन सांगण्याचा प्रयत्न केला की थोड मुलांच्या कलेनी घ्या म्हणुन पण मी काय बोलतेय याकडे तुमच लक्ष असेल तर शप्पत. माझ्याशी नेहमी सहानभूती वागण्याच नाटक करता. जणु काही मला पोरं नाही हे सतत दर्शवायच असत तुम्हाला. दोन पोरं आहेत हे मिरवता माझ्या समोर. तुम्हाला बागे बद्दल मुळीच आकर्षण नसत पण तरी तुम्ही मला खोटे प्रश्न विचारत असता." सुधा ताई स्वगत बोलत असल्या सारख्या बरळत होत्या.

"माझ पण नशीब किती फुटक असाव. केळकरांचा प्लॉट ज्यांनी विकत घेतला त्यांनी मी लावलेली सगळी बाग उध्वस्त केली. एवढच नव्हे तर माझ्या अंगणातल्या आंब्याच्या झाडाच्या, त्यांच्या प्लॉट मधे येणार्‍या फांद्या ही तोडुन टाकल्या. तुम्ही मुलां मधे जितका जीव लावत नसाल तितका जीव मी झाडांमधे लावते त्याच मला हे फळ मिळत. आणि तुम्ही एवढी सोन्या सारखी मुलं आहेत तर त्यांना एवढ रागवता." एवढ बोलुन सुधा ताई रडायला लागल्यात. मग एकदम आवेशात येउन त्या म्हणाल्या की 'देव पण ज्यांची लायकी नसते त्यांना भर-भरुन देतो" व तरा-तरा चालत निघुन गेल्या.

जोशी बाई आघात झाल्या सारख्या मट्कन जमिनी वर बसल्यात. त्यांचा विश्वासच होईना कि इतकी वर्ष हि बाई आपली शेजारीण आहे. मी त्यांना नेहमी मोठ्या बहिणीचा मान दिला आणि ती आपल्या बद्दल हा विचार करते. हे सगळ प्रकरण रागाच्या पलिकडे गेल होत. त्यांना धड रडु ही येइना. अनिरुध्द आईचा हात हातात घेउन तीच सांत्वन करण्याचा प्रयत्न करु लागला.

10/4/07

वामकुक्षी

आजच्या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती बघता व टाळ्यांचा गजर ऐकुन या आंदोलनास एकुण बरेच महत्त्व प्राप्त झाल्याचे स्पष्ट होते. सुरुवातीस आळशी आंदोलन (आ.आ.) ईत्यादी विशेषणं जरी 'उद्योगी' लोकांनी दिली असली तरी दुपारच्या झोपेचे आवश्यकता हळु-हळु लोकांस कळु लागली आहे असे म्हणण्यास हरकत नाही. शहरातील प्रतिष्ठित वर्तमानाचे पत्रकार चक्क आज उपस्थित आहेत. असो.
आज मी माझ्या वैयक्तिक उदाहरणाद्वारे या आंदोलनाचा आरंभ कसा झाला हे आपल्या पुढे मांडु इच्छीतो.

मला लहानपणापासुनच वामकुक्षीची फार आवड होती. वामकुक्षी म्हणजे डावा हात डोक्याखाली ठेउन उपभोगलेली दुपारची झोप. डावा हात दुखु लागला की उठायच. साधारतः २० ते २५ मिनिटांनी हात भरुन येतो. मजबुत हात असतील तर जास्त वेळ झोपता येत. बरेच लोक याच कारणासाठी व्यायाम करतात. मी मात्र व्यायामाच्या भानगडीत फारसा पडलो नाही. मला तशीच बिना-उशीची झोपायची सवय आहे. अगदी रात्रीसुध्दा मी उ(र्व)शी घेत नाही. त्यामुळे झालं काय की माझी दुपारची झोप अर्धा-पाउण तासाहुन अधिक होऊ लागली. थोडक्यात, दुपारी झोपण्याचा सराव मी बालपणापासुन करतोय.

लहानपणी कोणी काही म्हणायचे नाही. शाळेत जाउ लागल्यावर मात्र पंचाईत होऊ लागली. अहो, रात्रीची झोप परवडली पण दुपारचं जागरण नको. मागल्या बाकावर बसुन झोपणे किंवा पुस्तक वाचण्याचे नाटक करत कपाळवर हात ठेउन झोपणे इत्यादी युक्त्या मीच शाळेत रुढ केल्यात. तसाही मी फारसा हुशार नव्हतोच त्यामुले माझ्या वामकुक्षीचा प्रगतीपुस्तकावर परिणाम जाणवला नाही. शेवटी, एक तर सकाळी साडे सातला उठायचे मग आई सांगेल ती कामे करायची, थोडा अभ्यास करायचा, मग शाळेत सायकल मारत जा, संध्याकाळी परत तोच प्रकार, इतकी कष्ट करुन दिवस रेटायचा तरी कसा? दुपारी थोडी झोप मिळाली की दहा वाजे पर्यंत दिवस कसा छान जातो. पुढे माझा झोपेचा अभ्यास वाढत गेला. रात्री ११ वाजता झोपायचे असल्यास किती वामकुक्षी लागते, १२ वाजता तर किती, १ पर्यंत जागयचे तर किती वेळ, असे माझे आराखडे मी पक्के केलेत. अर्थात, एक वाजे पर्यंत जागाण्याची कोणावर नौबत येउ नये. शेवटी, दुपारची झोप परवडली, रात्रीचे जागरण नको हे सुध्दा तितकेच खरे.

माझ्या शाळेत डुलक्या काढण्याच्या युक्त्या नेहमीच यशस्वी होत नसतं त्यामुळे शिक्षकांनी बरंच छळले. पण घरचेही काही कमी नव्हते. शिस्त लावण्याच्या नावाखाली त्यांनी माझ्या वामकुक्षीवरच बंदी आणली. मला झोपण्याचा रोग झालाय असले नाना आरोप सुध्दा लावलेत. शेवटी मी तिथे जाउन निवांतपणे बसायचो. पण उकिडवे-कुक्षी फारशी कधी अंगी लागली नाही. कॉलेज मधे प्रवेश घेतल्यावर मात्र हुश्श झाल. घरच्यांचा त्रास नव्हता व कॉलेजला त्रास द्यायचा नव्हता म्हणुन कॉलेज मागच्या वनराईचे मी बरेच 'परीक्षण' केले. कॉलेज मधला मुक्काम थोडा वाढला कारण माझ्या वामकुक्षीच्या वेळेसच नेमका गणिताचा पिरेड असे. असो.

मला माहिती आहे की येन-तेन प्रकाराने आपण सर्वांनी हा त्रास भोगलाच असेल पण झाल-गेलं गंगेला मिळाल. आता मात्र अजुन त्रास सहन करायचा नाही. अहो, नाही म्हटलं तरी सकाळी दहा ते दुपारी चार पर्यंत बरच काम असत. थोडी झपकी घेतली त्या दरम्यान तर त्या साहेबाचं काय जातय? व्यक्ती-स्वातंत्र्य म्हणुन काही असतं की नाही? थोडी पुढे-मागे का होईना पण कामं तर होतायत ना. आपणास माहिती नसेल पण इटली व फ्रांस सारख्या प्रगत राष्ट्रांमधे सुद्धा दुपारच्या झोपेची खास सुट्टी असते. त्यांस 'सिएस्टा टाईम' असे म्हणतात. आता, आपण जर का इतर बाबतीत पश्चिमी राष्ट्रांची नक्कल करु पहातो तर वामकुक्षीबद्दल इतकी उदासिनता का?


अंतरीच्या या दु:खाला वाट मात्र कुठे मिळत नव्हती. बालपणी घरच्यांचा त्रास आणि आता साहेबाचा. या दरम्यान आई-वडिलांनी अलगदपणे मला बायकोच्या हवाली केल. रविवारच्या झोपेचाही बर्‍याचदा काथ्याकुट होतो. आताशा एक तर कुटुंब काम सांगत किंवा पोट्टी उच्छाद मांडतात. ऑफिसमधे माझ्या सारखी अजुन बरीच समदु:खी भेटलीत. मनं मोकळ करायला अजुन जोडीदार मिळालेत. मग आम्ही आळी-पाळीने झोपु लागलोत. पण साहेबांचा चांगलाच दरारा होता. जागरणांनी व साहेबाच्या भीतीने माझी फार तारांबळ उडु लागली. मला झोपेत जागरणाची आणि जागेपणी झोपेची स्वप्ने पडु लागलीत. एकदा तर गाडी चालवतांना मागच्याने हॉर्न वाजविला तर मी हिला विचारले की घड्याळाचा गजर असा का वाजतोय ते!

शेवटी अघटित घडलंच. आमचा हाकाट्याच नेमका झोपी गेला आणि जोशी, साहेबाच्या तावडीत सापडलेत. ऑफिसमधे दहशतीचे वातावरण पसरले. साहेबांनी, जोशींना चक्क काढुन टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणा नंतर आम्ही संघटित होण्यास सुरुवात केली व या आंदोलनाचा जन्म झाला. बिन-सरकारी कार्यालयांमधील मंडळीसुद्दा हळु-हळु या आंदोलनात सामिल होऊ लागलित. त्यांची परिस्थिती आमच्याहुन केविलवाणी आहे.

आमचं म्हणणे सरळ सोट आहे. सगळ्यांनी वामकुक्षी घ्यावी असा आमचा आग्रह नाही. पण आम्ही घेतो तर आम्हांस विरोध करणेही बरोबर नाही. आमच्या मागण्या फार कमी आहेत. निदान ३३ मिनिटांची वामकुक्षीसाठी सुट्टी व वामकुक्षी घेण्यास आरामखुर्च्या एवढेच आम्ही मागतो आहोत.

आपण सगळ्यांनी मिळुन आवाज लावला तर आपल्या मागण्या मान्य कराव्याच लागतील असा माझा विश्वास आहे. एवढे बोलुन मी माझी गाथा संपवितो. धन्यवाद.
वामकुक्षी आंदोलनाचा विजय असो.......विजय असो......


ऑ...ऑ......
"अहो, उठा. मनाची नाहीच तरी जनाची लाज बाळगा. ऑफिसात बरी झोप लागते तुम्हाला. कोण दिसतय स्वप्नात? रंभा उर्वशी का?"

"माफ करा साहेब. काल थोडं जागरण झाल म्हणुन......"