7/31/07

शिव महिमा

आज गुरुपोर्णिमा, त्या प्रित्यर्थ माझ्या अराध्य दैवताबद्दल थोडं लिहावस वाटलं. खर तर शिवाजींबद्दल जेष्ठ-श्रेष्ठांनी अगणित गौरवास्पद शब्द उधळले आहेत. पण आजच्या समाजात या स्तुती-सुमनांच निर्माल्य व्हायला मुळीच वेळ लागत नाही. खरतर या व्यक्तीची केवळ गाथा गाउन आपण तीचा अपमानच करतोय. शिवाजी हे मुर्तीमंत कर्मयोगी होते पण त्यांच्या कार्यापासुन शिकण्या ऐवजी आपण त्यांना देवघरात बसवुन मोकळे झालेलो आहोत. आणि एकदा का कोणाला देवघरात बसवल कि आपण वाट्टेल ते करायला आपण मोकळं.

पण शिवाजी थोर का होते? मराठी घरा-घरात तरी प्रत्येक पोरं त्यांच्या गोष्टी ऐकत मोठ होतं. अफझलखान वध, शाइस्तेखानाच पराभव, आग्र्यातुन सुटका या शिव-लीला प्रत्येक मराठी माणसाला कंठस्थ आहेत. पण केवळ या त्यांच्या शौर्यामुळे त्यांचा थोरपणा सिध्द होत नाही. अत्यंत धाडसी होते अस म्हणु शकतो. मग काय शिवाजींनी इस्लामी सत्तेच्या ऐन मध्यरात्री हिंदवी स्वराज्याच्या सुर्यास आमंत्रण दिले म्हणुन का ते थोर आहेत? एखाद वेळेस यात थोडं तथ्य आहे पण त्यांची थोरवी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यापूर्तीच मर्यादित नाही. 'हा परिसर माझा आहे आणि येथे आता मुसलमानी सत्ता चालणार नाही' असे त्यांनी म्हटले नाही तर सामान्य नागरिकाला - जो मुसलमानी सत्ते अंतर्गत भरडला जात होता - त्यांनी स्वराज्याचे महत्त्व पटवुन दिले. समाजाला त्यांनी जो आत्मविश्वास दिला त्यामुळेच ते खरे युग-पुरुष आहेत.

ते जरी स्वराज्याचे शिल्पकार असले तरी त्यांनी या लढ्यास केवळ स्वत:वर केंद्रित केला नाही. स्वराज्य निर्मिती हे श्रींचे कार्य आहे असे म्हणुन स्वराज्य निर्मिती ही केवळ आवश्यकता नसुन कर्तव्य आहे हे सामान्य नागरिकाच्या मनात बिंबविले. याचा परिणाम असा झाला कि शिवाजींच्या अकाली व अनपेक्षित मृत्यु नंतरही लढा केवळ चालू न रहाता अजुन फोफावत गेला.


त्यांनी स्वातंत्र-मंत्राचा जणु खो समाजाला दिला. त्यामुळे शिवाजींच्या मृत्यु नंतर औरंगझेब जरी २७ वर्ष दख्खनात तळ ठोकुन बसला होता तरी तो हिंदुपातशाही नष्ट करण्यात यशस्वी झाला नाही. शेवटी मराठ्यांनीच त्याची कबर खोदली आणि त्याच्या मृत्युनंतर २० वर्षातच थोरले बाजीराव दिल्लीत दाखल झालेत.

शिवाजींनी जेंव्हा स्वराज्याचा लढा पुकारला तेंव्हा खर सांगायच तर फारसा कोणाला तो ऐकु आला नाही. त्याचे प्रतिसाद उमटण्यास अजुन काही वर्षे जायची होती. ज्यांना त्यांच्या लक्षाची कल्पना होती त्या पैकी बहुतांश लोकांनी त्यांना वेड्यात काढले असणार. कारण मुघली सत्ता तेंव्हा जवळपास ३ ते ४ लाख सैन्य उभे करु शकत होते. दख्खनी सत्ता - आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही- १ ते २ लाख सैन्य उभे करु शकत होते. मुख्य म्हणजे या सर्व मुसलमानी सत्तांना हिंदु पातशाहीची कल्पना बिल्कुल सहन होणारी नव्हती. या सर्व मुसलमानी सत्तांनी पूर्ण हिंदुस्थानाला दार्-उल्-इस्लाम करण्याचा चंग बांधला होता. अश्या परिस्थितीत मुठभर मावळ्यांना पाठीशी घेउन शिवाजींनी बंड करण्याची धाडस केलच कस?

त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आढावा घेतला तर लक्षात येइल कि अवाजवी धाडस दाखवण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. प्रत्येक युध्द, प्रत्येक चढाई दिर्घ व विस्तृत विचार करुनच त्यांनी आरंभिले. अश्या परिस्थितीत स्वराज्याचा नारळ नासका न निघण्यासाठी त्यांनी काय काळजी घेतली असेल?

सर्व प्रथम म्हणजे त्यांनी शत्रुची संपूर्ण ओळख होती. त्यांनी इतिहासाचा चांगलाच अभ्यास केला असणार. इतिहासात हिंदु लोकांनी मुसलमानी सत्तांशी लढतांना ज्या चूका केल्यात त्या पुन्हा न करण्याची त्यांनी आरंभापासुन काळजी घेतली. त्यांनी सगळ्यांशी भांडण एकाच वेळेस घेतले नाही. जो पर्यंत शक्य होते तो पर्यंत एका वेळेस एकाच शत्रुशी त्यांनी झुंज केली. सन १६५० पर्यंत निजामशाही बरीच खिळखिळी झाली होती. त्यामुळे त्यांनी आधी फक्त आदिलशाहीशी भांडण सुरु केले. या दरम्यान त्यांनी मुघली सत्तेशी गोडी-गुलाबीचे संबध ठेवले. आता हा पोरगा काय करण्याचा प्रयत्न करतोय हे न कळायला मुघल मूर्ख नव्हते पण शिवाजींनी या मुसलमानी सत्तांच्या आपापसातील भांडणांचा पूरेपुर फायदा घेतला. या दरम्यान बारा मावळ व कोंकण परिसरातील सरदार व देशमुखांना त्यांनी आपलस करण्याची मोहिम जोरात चालू ठेवली. जे ऐकत नव्हते त्यांना जावळीच्या मोहिमेद्वारे स्पष्ट संदेश दिला. पण जावळीच्या मोहिमेमुळे आदिलशाही खवळली आणि शिवाजींची कारगिर्द सुरु झाली.

त्यांना लढाईतुन पळुन जाण्यात मुळीच हशील नव्हते. कारण उगाच 'जोहार' करुन काही साध्य होणार नव्हते हे राजपूतांच्या इतिहासातुन स्पष्ट होते. पण याचा अर्थ ते पळपुटे होते असा नाही. जेंव्हा अफझलखानाशी झुंज घेण्याचा प्रसंग आला तेंव्हा त्यांनी अफझलखानास छातीवर घेतला पण परत उगाच मर्दुमुकी दाखवण्याच्या भानगडीत पडले नाहीत. दिलेल्या शब्दास मुसलमान मुकतात व दगाबाजी करतात हे लक्षात घेउन त्यांच्याशी वागतांना शिवाजींनी हेच धोरण पत्कारले. अफझलखानास मुळीच धोका नाही असे वचन देउन त्यांनी त्या राक्षसाला जावळीत दाखल केला व त्याचा निकाल लावला.

त्या काळात हिंदु लोकच एक-मेकास दगा करण्यास मागेपुढे बघत नसत. शिवाजींचे गुप्तहेर खाते शक्तिशाली व प्रभावी होते। या गुप्तहेर खात्यामुळेच शिवाजींना कधीही दगा-फटका झाला नाही. अगदी आग्र्याहुन सुध्दा ते सुखरुप परतु शकले. तसेच केवळ शत्रु सैन्याच्या हालचालीच नव्हे तर सुल्तानी दरबारात काय चालल आहे याची बित्त-बातमी त्यांना लगेच कळे.

त्यांनी सैन्याच्या बांधणीत सुल्तानी सैन्याच्या तुलनेत आमुलाग्र बदल आणला.शिवाजींनी सैन्यातुन हत्ती व तोफांचे वजन कमी करुन टाकले. त्यामुळे त्यांचे सैन्य कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अंतर पार करु शकत. शिवाजींच्या सैन्याच्या चपळतेचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ते सुरतेची लुट पाठीवर घेउन सुध्दा ते स्वराज्याच्या हद्दीत सुल्तानी सैन्याचा सामना न करता सुखरुप परत आले. वतन व जमिनी वाटण्याच्या प्रथेस त्यांनी बराच आळा घातला. सैन्यातील शिपायांना पगार मिळत असे. तसेच तलवार व घोडे पुरविले जात. यामुळे चढाईच्या वेळेस लुट-पाट करण्याची आवश्यकता पडत नसे आणि शिपाई-गडी स्वराज्यास निष्ठावंत राही.


सध्य परिस्थितीत भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणांतर्गत जो सावळा गोंधळ चालतो तो बघता शिवाजींनी खेळलेल्या राजकीय तसेच सैनिकी चालींचे महत्त्व अजुन पटते. पण दु:खाची गोष्ट ही आहे की शिवाजींनी आसेतु-हिमाचल आपला मानला व हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचले पण सध्याच्या हिंदुस्थानात शिवाजी हे व्यक्तीमत्व केवळ प्रांतीय बनुन राहिले आहे. मराठा साम्राज्याच्या सन १७६० ची सीमा-रेषाच आजच्या हिंदुस्थानाची सीमा-रेषा आहे. यावरुन शिवाजींनी आरंभिलेल्या कार्याचे महात्म्य लक्षात येते. पण राजकीय पक्षांनी प्रत्येक तत्त्व जणु बाजारात विकायला काढले आहे. त्यामुळे शिवाजींपासुन काही शिकण्या ऐवजी ते सांप्रत राजकारणाचे केवळ प्यादे बनले आहेत. १९४७ सालच्या फाळणीचा नर-संहार काय किंवा चीन युध्दात सपशेल पराभव काय किंवा कारगिल युध्द काय, प्रत्येक वेळेस आपले नेते मूर्ख बनलेत.

दूरदृष्टीचा संपूर्ण अभाव, धडाडी नेतृत्वाचा दुष्काळ, इतिहासातुन काहीही शिकण्यास नकार, सत्तांधळी व कुपमंडुक प्रवृत्ती असलेल्या आजच्या नेत्यांनी शिवाजींना गुरु मानले तरच भारताचे भविष्य उज्वल ठरेल नाही तर परिस्थिती कठीण आहे.

7/16/07

सन १६४६

वाड्यासमोर एकदम पंचवीस घोडी उभी राहिल्यावर वाड्यात धावपळ सुरु झाली. अचानक आज हा पाच-हजारी सरदार कसा काय उगावला याचं सगळ्यांनाच कोडं पडल होत. पण इतका विचार करायला कोणाला फुरसतं नव्हती. तबेलेदार घोड्यांच्या निगराणीची सोय करु लागला तर घोडेस्वारांच्या खाण्या-पिण्याच्या सोयी साठी वाड्यातील माणसांची धांदल उडाली. वाड्याचा मालक स्वतः घाई-घाईने तयार होउन पाहुण्यांच्या स्वागतास उंबरठ्यापर्यंत गेला.

"या या राजे. अलभ्य लाभ कि आपले पाय या गरीबाच्या ओसरीस लागलेत" घर मालकाने स्वागत केले.

"या परिसरातुन गुजरत होतो म्हटल की चौकशी करावी थोडी. त्रास तर देत नाहीया ना जास्त?"

"असं बोलुन शरमिंदे करताय राजे तुम्ही. त्रास कसला आला त्यातं. आधी निरोप पाठवला असता तर वेशी पर्यंत आलो असतो की." घर मालक स्वतः बुचकळ्यात पडला होता.

पाच-हजारी सरदार असा दोन-हजारी सरदाराकडे 'डोकावत' नाही. प्रकरण बहुधा गंभीर असणार. पावसाळा नुकताच आटपलाय आणि पेरणी पण व्यवस्थित झाली होती. घोडी फुरफुरायला लागली होती. कुठल्यातरी स्वारीचा बेतं असेल असे घर मालकास वाटले. पण सध्या सगळ्या बादशाह्या शांत होत्या. औरंगझेब दख्खनी बसला होता खरा. बहुधा त्याच्या संबधीतच काही तरी असेल.

सरदारासोबत एक १५-१६ वर्षाचा पोरगा होता. त्याच्या हालचाली कुलीन होत्या व नजरेत भलतीच धार होती. सरदारासोबतीची शिपाई त्या पोरासमोर अदबीने वागत होती. हा पोरगा कोण हा प्रश्न घरमालकाला पडला पण त्या बद्दल तो काही बोलला नाही.

सरदाराला तो आतल्या खोलीत घेउन गेला. "कान्होजींचा निरोप घेउन आलोय" सरदार खोलीत जाता जाताच म्हणाला.

"कान्होजींचा निरोप? राजे, कान्होजींनी हुकुम केला असता तरी त्यांच्या पायाशी दाखल झालो असतो आम्ही. मला ते तीर्थरुपी आहेत. आपण तुकडा मोडा, थोडा आराम करा मग आपण बोलुया"

घरमालक सोबत आलेल्या मुलाकडे बघुन म्हणाला " शिपाई-गड्यांची सोय परसात केलीय."

"त्यांना राहुद्या आमच्यासोबतच" सरदार म्हणाला.

हा पोरगा कोण आहे हे घरमालक विचारणारच होता तेवढ्यात सरदार म्हणाला "राजे. निरोप महत्त्वाचा आणि तातडीचा आहे. किल्ले तोरण्याबद्दल ऐकलच असेल तुम्ही?" सरदारने प्रश्न विचारला.

आता घरमालकाच्या डोक्यात लख्खा प्रकाश पडला. तो एकदम गहन विचारात पडला. त्याच्या चेहर्‍यावर आठ्यांचे जाळे पसरले. त्याला काय बोलावे सुचेना. तोरण्यावर झालेले प्रकरण बुध्दीच्या पलिकडे होते. कोकण पट्टीपासुन ते खानदेशा पर्यंतचे सगळे देशमुख आणि सावंत बुचकळ्यात पडले होते. आणि काही कमी असेल तर चक्क कान्होजी यात सामिल होते.

"एवढा काय झालं विचार करायला? मला वाटलं कि तुम्ही एका पायावर तयार व्हाल." सरदार बोलला.

"म्हणजे? निरोप काय आहे ते तर सांगा" घर मालकाने विचारले. खरतर निरोप काय आहे हे घरमालकाला कळले होते.

सरदार उभा राहिला. खोलीत येर-झारा घालु लागला. कान्होजींची सक्त ताकीद होती कि गोडे-गुलाबीनेच माणसं आपली करायची म्हणुन. त्यामुळे विषयासं कसं तोंड फोडावे याचा विचार करु लागला. गोष्ट कठीण होती. सोपी नव्हती. पण या कार्यातील यशावर पुढल्या बर्‍याच गोष्टी निर्भर होत्या. म्हणुनच कान्होजींनी खास या सरदारास गाठी-भेटींच्या मोहीमेस पाठवले होते. त्याने त्या पोराकडे नज़र टाकली. पोरगा शांतपणे सरदार व घरमालकास न्याहाळित होता.

"निरोप? राजे, न कळायला खुळे का तुम्ही. सह्यांद्रीच्या दर्‍या-खोर्‍यात काय वारं वहातय हे का कळतं नाहीया तुम्हाला? एवढ्या लढाया तुम्ही झेलल्यात छातीवर. आता या छातीची आणि समशेरीची गरज श्रींच्या कामासं आहे. बोला, कधी दाखल होताय या कार्यात?" सरदाराने विषयात हात घातला.

"राजे, तुम्ही वयाने व मानाने मोठे आहात तरी थोडं स्पष्ट बोललेल चालेल का? घरमालकाने विचारले.

"तुम्हांस आमचे भाऊ मानतो. मन-मोकळेपणाने बोला. तुमचं ऐकायलाच आलोय अस समजा." सरदार उत्तरला.

"अहो, सोळा वर्षाचं पोरगं ते. काय कळतंय त्याला. उनाड मुलांसोबत फिरुन वारं गेलय त्याच्या कानात. या पुंडाईस स्वराज्य म्हणतोय तो. बादशाहची नज़र पडली की कोणात उभी रहायची छाती आहे ते सांगा मला. पण तुम्ही या पोर-खेळात का सामिल होताय? बादशाही वरंवटा काय असतो नेमकं ठाउक आहे तुम्हांस. शेवटी तो वरंवटा आपल्या घरावरुनच फिरणार. त्याचा बा जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत त्यांस कोणी हात लावित नाही. पण आमच्या सारख्यांचा कोण वाली?" घर मालकाने आपली बाजु मांडली.

"तुम्हांस वाटत तसा काही बच्चा नाहीया तो. छावा आहे तो. वय शौर्याचे माप-दंड नसते. या पोरात चांगलाच दम आहे. चांगल्या-वाईटाची जाण आहे आणि आपल्या माणसांसाठी वाट्टेल ते करण्याची हिंमत आहे. ज्या उनाड मुलांची गोष्ट करताय ती पोरे त्याच्यासाठी प्राण द्यायला मागे-पुढे बघणार नाहीत. वरंवटा फिरला तर सगळ्यांच्या घरावर एकत्रच फिरेल. शेवटी कान्होजी राजे पाठीशी आहेत की त्या पोराच्या. आता कान्होजीस रुचलय तर आपली काय बिशाद नाही म्हणायची. आणि असं बघा शहाजी राजांचा फायदाच आहे आपल्याला. जो पर्यंत शहाजी राजांची ढाल आहे तो पर्यंत स्वराज्याच्या बाजु बळकट करायच्या आणि मग हरं हरं महादेव. तुम्ही लढलात की शहाजींच्या पदरी. त्यांच्या मुत्सद्दीपणाची पहेचान तुम्हास करुन द्यायची काही गरज नाही. " सरदाराने प्रत्यक्ष न बोलता मीठाची जाणीव करुन दिली.

"कान्होजींचे तर अनंत उपकार आहेत आमच्यावर. त्यांच्यामुळे शहाजी राजांच्या पदरी नोकरी लागली. त्यांच्याच पदरी राहुन ही पाच गांवे आणि जमिन देण्याची बादशाहने मेहेरबानी केली. पण नाही म्हटल तरी त्यांचा संसाराची संध्याकाळ होतेय आणि माझा ऐन मध्यात आहे. त्यांच्या म्हातारचळीसाठी मी का सर्वस्वाचे बेल-पात्र चढवु?" घरमालक बोलुन गेला.

खोलीत शांतता पसरली. कान्होजींच्या बाबतीत इतरवेळी असले उदगार कोणी काढले असते तर समशेरी आत्तापर्यंत म्यानात नसत्या राहिल्या. पण आज परिस्थिती वेगळी होती. सरदाराने आपला राग काबुत ठेवला.

"राजे, तुमच्याकडुन ही अपेक्षा नव्हती आम्हास. अहो, किती वर्ष बादशाची चाकरी करायची? काय मिळवायचं यातुन? आज कृपा आहे तर उद्या नाही. तुम्ही आमची साथ द्या किंवा नका देउ पण तुमच्या घरावरुन वरंवट फिरायचा असेल तर फिरेलच. आणि कृपा करणारा बादशहा कोण? हे यवहुन-तुरकी लोक, आपल्या भूमीवर राज्य करता आहेत आणि आपण त्यांच्या मीठाची आण आपण कुत्र्यासारखी खातोय. आधी गांधार गेला, मग सिंधु गेली. आता तीर्थक्षेत्रेही सुरक्षित नाहीत यांच्यापासुन. सोमनाथाच काय झाल? अयोध्येचं काय झाल? दूर कशाला जायचं, पुण्याच्या जमिनीवरुन गाढवाच नांगर फिरल तेंव्हा कुठे होता तुम्ही? किती वर्ष या नाही तर त्या नाहीतर अजुन कुठल्या बादशाहची सेवा करत जगायच? सत्कार्यी ठेविली ती निष्ठा नाही तर ती नुसती चाकरी होते" सरदार म्हणाला

"कसलं स्वराज्य? कसला बंड, कोण बादशहा आणि कोणाची भूमी. हे प्रश्न निरर्थक होउन आज ५०० वर्ष झालीत. स्वतःला 'सिंह' म्हणवून घेणारे राजपुत जातीचे भ्याड, आपल्या पोरी-बाळी निसंकोच पणे मुसलमानी घरात पाठवतायत. त्यांनासुध्दा हे मुसनमान नाही झेपले. या राजपुतांची पेंढा भरलेली ही मढी दिल्लीच्या दरबारात भिंतीला खिळे लाउन ठोकली आहेत आणि तुम्ही मला सांगताय की हे सोळ वर्षाचं पोरग हिंदवी राज्य स्थापन करेल म्हणुन. अख्या हिंदुस्थानात आपणच देव-धर्माबद्दल विचार करण्याची गरज का आहे? " घरमालक उभा राहुन खिडकीजवळ गेला.

"तीर्थक्षेत्रे वाचवुन काय उपयोग आता? हि खालच्या रक्ताची मुसलमानी लोकांनी जेंव्हा सिंधु ओलांडली आलीत तेंव्हाच भ्रष्ट झाल सगळ तीर्थ. आता ही स्थाने सोवळी करण्याची ना कोणाची छाती आहे ना कोणाच्या समशेरीत दम आहे. आणि ज्याने ज्याने बंड केला तो हर एक जण, राजा हरपाल देवासारखा कातडं सोलुन वेशीवर टांगल्या गेला. एवढ इतिहासात कशाला जाताय, इथे आपल्या जवळ दक्षिणेला तालीकोटाच्या युध्दात काय झाल विसरलात का? एक माणुस जिवंत ठेवला नाही या सुल्तानांनी. एक-एक इमारत, एक एक मंदिर जमिनदोस्त केली आणि हर एक बाई बाजारात विकली." घर मालक जणु स्वगत बोलत होता.

"होतो ना मी तिथेचजेंव्हा पुण्यावरुन गाढवाच नांगर फिरल तेंव्हा. शहाजी राजांच्या पाठीशी पाठ लाउन मी सुध्दा लढलोय की. त्यांनी बरीच स्वप्ने दावली आम्हास. त्या बादशाही पोरास गादीवर बसवुन आपणच राज्य करु म्हणालेत ते. सगळे उपाय शेवटी थकल्यावर, शहाजी राजे गुमान आदिलशहाच्या पायाशी दाखल झालेत आणि दक्षिणेस निघुन गेलेत. पण जी शेकडो लोक त्यांच्या स्वप्नांसाठी मेलीत त्यांच काय? कोण विचारतय आता त्यांच्या मढ्यांना?" घरमालकाने आपली व्यथा प्रकट केली.

या बोलण्याचा त्या पोरावर परिणाम झाला होता. त्याच्या करारी नज़रेत आश्चर्य व दयेच्या काहिश्या विचित्र छटा दिसत होत्या. एवढा इतिहास माहिती असुन हा इसम आपली तलवार बादशाहीसाठी कसा लढवतो हे त्याला कळेना. तो काही तरी बोलणार होता पण त्याने स्वतःला रोकले. आज फक्त सरदारच बोलणार असे ठरले होते.

"ज्या अपमानांची गोष्ट करताय ना त्यानी गांगारुन जायच कि स्फुरण चढुन परत लढायला तयार व्हायच? राजपुतांचा कशाला विचार करता, तुमच्या आईच दुध तुम्ही प्यायला आहात का नाही? काही देणं आहे का त्या दुधाच कि बादशाहीची पाय चाटायला दुध पाजलं तुमच्या मायनी? अवघ सोळा वर्षाचा पोरा-टोरांनी स्वराज्याची आणं वाहिली आणि तुम्हा-आम्हा सारखे अनुभवी लढवय्ये सरदार भ्याडासारखे हातात बांगड्या घालुन ५ गावांच्या तुकड्यावर जगत राहिलो तर तुळजापुरची माय हसणार नाही का? इतिहास काय म्हणेल आपल्याला?" सरदार उत्तरला

"फार प्रभावित केलेल दिसतय त्या पोरानी. मी ऐकलय की माणसांना आपलसं करण्यात पटाईत आहे. पण इतिहासाच्या मोठ्या-मोठ्या बाता करण्यात काही हशील नाही. तराईच्या युध्दानंतर गेल्या ५०० वर्षात इतिहासाकडे रडण्या पलिकडे काहीही उरलेल नाही. या ५०० वर्षांच्या जखमांवर मलम्-पट्टी करणे आता शक्य नाही. त्याचा बदला घेणे शक्य नाही आणि फारसा अर्थही नाही. सगळ विसरुन मुकाटपणे जगण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य संपूर्ण कंठण्याची थोडी शक्यता आहे. आजच्या जमान्यात ज्यानी-त्यानी आपली काळजी घ्यायची असते. तसेही या स्वराज्य वगैरे प्रकरणात जरी आम्ही शामिल झालो तर आम्हास काय फायदा आहे? विचारा त्यांस आणि कळवा आम्हाला" घर मालकाने हे बोलुन या विषयावर जणु पाणी सोडले.

पाहुण्या सरदाराने हताशपणे त्या पोरा़कडे बघितले. तो काहीतरी बोलेल अशी सरदाराची इच्छा होती पण तसली काही चिन्हे दिसत नव्हती.

"राजे, फार अपेक्षा होत्या आपल्याकडुन कारण तुमच्या संगे आम्ही सुध्दा शहाजी राजांसोबत लढलो होतो. आम्हास वाटले कि या कार्यात तुम्ही एका पायावर तयार व्हाल म्हणुन कान्होजींनी सोपवलेल्या कामाचा नारळ तुमच्या उंबरठ्यावर फोडायच ठरवल. पण नारळ नेमका नासका निघाला. राजे, मरण शेवटी सगळ्यांच्याच नशिबी असत. पण तुम्ही कशासाठी मरता यावर जगण्याच यश अवलंबुन असत. अपयशाची असंख्य कारणे असतात पण यशस्वी होण्यास फक्त एकच गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे आत्मविश्वास. शिवबा आम्हास तो आत्मविश्वास देतो. इतिहासातील पराजयाचे मुडदे खांद्यावर घेउन कधीच भविष्य बनवु शकत नाही. हे मुडदे खाली टाका आणि आजु-बाजुला काय चालल आहे हे डोळे उघडुन बघा. ही तीर्थक्षेत्रे आपली आहेत आणि ती आपल्यालाच सोवळी करायची आहेत. ही भुमी आपली आहे आणि यवनां पासुन आपणच तीला मुक्त करायचे आहे. हे आपल कर्तव्य आहे. हे कार्य शिवबाच नव्हे, हे कार्य श्रींच आहे. या कार्यातील यश-अपयश आपल्या हाती नाही, ती तुळजाभवानीची इच्छा. पण या कार्यात सहभागी होण न होण तुमच्या हातात आहे"

या बोलण्याचा थोडा परिणाम घरमालकावर झाला. तो गहन विचारात गढुन गेला. सरदारांस आशेचे किरण दिसु लागले.

" एवढा नकोय विचार करायला. राजे, स्वप्न भंगली म्हणुन काय स्वप्न बघायची थांबतो का आपण? आज तर ही स्वप्ने सत्यात आणायची सुवर्ण संधी मिळतेय. एक होउन शिवबाच्या पाठी उभे राहिलो तर आपला सामना करण्याची अख्ख्या दख्खनात कोणाची हिंमत आहे सांगा बरे? सरदाराने शेवटचा खडा टाकला.

"राजे, या कार्यात सामिल व्हायला काही हरकत नाही मल पण पुर्वजांच्या अनुभवांवरुन शिकण हे सुध्दा आपलच कर्तव्य आहे व त्यातच शहाणपणा आहे" घरमालक लगेच उत्तरला. वतनाची आस, सत्कार्याच्या निष्ठेपेक्षा वरचढ ठरली.

काहिसा विचार करत त्याने विचारले, "अजुन किती लोक सामिल झाले आहेत?"

सरदाराने नावे सांगितली आणि म्हणाला" बारा मावळातील बरेचसे सरदार सामिल झाले आहेत. काही सरदार आपणहुन सामोरे आले. काहींना कान्होजींचा निरोपच पुरेसा होता." सरदाराने घसा खाकरला आणि शेवटचे विचारले " मग कान्होजींस तुमचं काय उत्तर सांगायचे?"

घरमालकाला काय उत्तर द्यावे ते सुचेना. "आपण केलेली चर्चा खास़गीच राहिल अशी अपेक्षा करतो" एवढच तो म्हणाला.

कान्होजींबाबत काहीतरी पायरी सोडुन बोललो याची त्याला आठवण झाली. "तुम्ही ती चिंता करु नका" अस म्हणत सरदार उभा राहुन निघण्याची तयारी करु लागला.

"राजे, निघालात? जेवणाची पानं वाढली आहेत. न जेवता गेलात तर आम्हास बरे नाही वाटणार. " घर मालक म्हणाला.

"सवड नाही राजे. स्वराज्यप्राप्तीची आणं भवानीच्या पायाशी वाहिली आहे. दिवस वैर्‍याचे आहेत. जिंकलेला प्रदेश टिकवण्यसाठी बरीच कष्ट आहेत."

सगळी लोक घोड्यांवर स्वार झालीत. सरदार व घरमालकाने मिठ्या मारल्या.

" हा पोरगा कोण?" न राहवुन घर मालकाने विचारले.

"कान्होजींच्या पदरीचा आहे. हुशार आहे." एवढेच सरदार म्हणाला व घोड्यावर स्वार झाला. मग काहीसा विचार करुन म्हणाला " याची तुमच्याशी ओळख करुन देण्याची फार इच्छा होती पण तसे होणे नव्हते." व त्याने घोड्याला लगाम दिला. धुराळा उडाला व घोडी वेगाने दिसेनाशी झाली.

सरदाराचे शेवटचे वाक्य घरमालकाच्या डोक्यात घोळत होते. त्या बद्दल विचार करत तो घरात येत होता तेवढ्यात तो मुलगा कोण हे त्यांस उमगले. "म्हणजे चक्क ...?" त्याचा जीव घाबरा झाला. " नुसते कान्होजीच नाही तर शहाजी राजांच्या बाबतीत काय काय बोललो" असे काहीतरी पुटपुटत त्याने नोकरांना घोडी तयार ठेवण्याचा हुकुम केला. घाई-घाईने घोड्यांवर स्वार होउन सरदाराला गाठण्यासाठी त्याने घोडी पिटाळली.
००००००
(हि कथा काल्पनिक असली तरी शिव-कालीन इतिहासाशी निगडित आहे. )

टीप -:
सन १६४६ ला शिवजींनी स्वराज्याची स्थापना केली.

तराईचे युध्द, सन ११९२ - या युध्दात पृथ्वीराज चौहाणचा पराभव झाला व भारतात सुल्तानी अंमलाची सुरुवात झाली.

तालिकोटचे युध्द, सन १५६५ - या युध्दात पाच सुल्तानांनी एकत्र येउन विजयनगर साम्राज्य धुळीस मिळविले.

राजा हरपालदेव हा देवगिरीच्या राजा रामदेवाचा जावई. अल्लाउद्दीन खिलजी देवगिरी जिंकुन परत दिल्लीला गेल्यावर हरपालदेवाने बंड पुकारला. तेंव्हा राजा रामदेवरायाने खिलजीला बंड शमवायला आमंत्रण दिले. खिलजीने तातडीने येउन बंड शमविला व राजा हरपालदेवाला जिवंत सोलुन देवगिरी (म्हणजे औरंगाबादेजवळ) च्या वेशीवर टांगले.

कान्होजी जेधे हे शहाजी राजांचे अत्यंत विश्वासु पाईक. त्यांचे बारा मावळात बरेच वजन होते. ते वयाने शिवाजींपेक्षा बरेच मोठे होते. पण स्वराज्याच्या आरंभापासुन ते शिवाजींच्या पाठीशी ठामपणे उभे होते.

7/8/07

मोमिनपुरा

माझा एक चांगला मित्र मोमिनपुर्‍यात रहात असे. त्याच्या घरी पहिल्यांदा गेलो तेंव्हा संपुर्णतः मुस्लिम भागात जायचा माझा हा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे मी थोडा मनातुन घाबरलेलो होतो. इतका गजबजलेला परिसर मी आधी कधी बघितला नव्हता. पोद्दारेश्वर राम मंदिरच्या थोड पुढे गेल्यावर सेंट्रल ऍव्युनु वर डाव वळण घेतल्यावर मोमिनपुर्‍याची हद्द सुरु होते. त्या रस्त्याचे नाव बहुदा मोहम्मद अली रोड आहे. रस्त्याच्या डाव्या बाजुला भली मोठ्ठी मशीद आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला बाजार भरतो. रस्त्यावर वेग-वेगळ्या आकाराच्या गाड्या हॉर्न वाजवित वेगाने जायचा वायफळ प्रयत्न करत होते. दुकानांमधील सामान दुकानाबाहेर अधिक होतं. माझा मैतर मला उजवीकडच्या बोळीत घेउन गेला. हा परिसर गरिब, झोपडपट्टी अश्यातला वाटत नव्हता कारण तरुण मुले व पुरुष बर्‍याच चांगल्या दर्जाचे अफगाणी पध्दतीचे झब्बे-पायजमे घालुन हिंडत होते. लहान मुले रस्त्यावर खेळत होती. बायका मात्र जास्त दिसत नव्हत्या. बहुधा संध्याकाळची वेळ असेल म्हणुन दिसत नसाव्यात. पण ज्या थोड्या फार बायका दिसत होत्या त्या बुरख्यातच दिसत होत्या. अगदी लहानश्या गल्लीतुन आम्ही सायकलने दोघे जात होतो. मी हिंदु आहे म्हणुन माझ्या कडे लोकं बघतायत असं मला उगीच वाटतं होतं. पण गल्लीत ये-जा करणारे सगळेच लोक एका-मेकाला असंच बघत असावेत.

त्याचे घर ज्या गल्लीत होते ती बोळ अजुन लहान होती. दोन स्कुटर एकाच वेळेस त्या गल्लीत मावणे अशक्य होत. त्याचं घर चार मजली होतं. ब्रेड च्या पाकीटासारख एकावर एक मजले बांधले होते. समोर वर्‍हांडा मग एक लहानशी खोली, त्यामागे स्वयंपाक घर आणि तिथेच न्हाणीघर. एवढ्या भागावर तीन मजले आणि त्यावर गच्ची. अश्या या अंधार्‍या घरात माझा मित्र त्याची एकुण नऊ भावंडे, त्याचे आई-वडिल, त्याचे काका-काकु व त्या काकाची चार मुले असे सगळे रहात होते. माझा मित्र वयाने भांवडांमधे दुसर्‍या क्रमांकाचा होता. सगळ्यात मोठा भाऊ याच्याहुन ३-४ वर्षांनी मोठा तर सगळ्यात लहान बहीण याच्यापेक्षा १०-१२ वर्षांनी लहान असावी.
" अब, क्या है की मेरा घर तेरे घर समान बडा नही है । छोटा है और काफी लोग़ रहते है।"
माझं घर मोठं होत अश्यातील प्रकार मुळीच नव्हता पण आमच्या घरात फक्त चारच लोकं होते.
" ऐसी कोई बात़ नही है यार। घर आखिर घर होता है। जैसा हो पर अपना तो होता है।"
" हां, ये बात तो सही है। चल सबसे उपरवाली मंजील़ पर जाते है। वहाँसे काफी़ अच्छा नज़ारा है।"

आम्ही गच्चीवर गेलो. गच्चीवरुन सगळं मोमिनपुरा दिसत होत. अस्ताव्यस्त पसरलेल. ज्याला हव तस आणि हवं तेवढ्या उंचीची घरे, जिथे जागा मिळेल तीथे इमारती बांधलेल्या होत्या. घराच्या नैॠत्येला मशीद दिसत होती. सगळ्या घरांवर हिरवे झेंडे लावले होते. बर्‍याच घरांवर काळे झेंडे लावले होते. काळे झेंडे काय दर्शवितात हे मला त्याला विचारायच होतं.
तेवढ्यात तो म्हणाला " चलं, हमारी छोटी फॅक्टरी दिखाता हुं।"
"कहां है? यहीं पास़ मे ही है?"
"हां" गच्चीवरुन खालती कुठल्यातरी इमारती कडे बोट दाखवित तो म्हणाला. "वो है।"
खालती पसरलेल्या बोळींच्या व लहान लहान घरांच्या अगम्य जंजाळात नेमकी कुठली इमारत तो मला दाखवत होता याचा मुळीच गंध लागला नाही.

त्याच्या वडिलांचा हातमागावर लुंग्या बनविण्याचा लहानसा धंदा आहे. ज्या रंगाच्या लुंग्या मी तिथे बनतांना बघितल्या त्यावरुन त्यांची विक्री फक्त मोमिनापुरा किंवा तत्सम परिसरातच होत असावी. ही हातमागाची जागा दोन घर सोडुन लगेच होती. गरम, दमट आणि अंधार्‍या जागेत हा उद्योग चालू होता. या व्यतिरिक्त या कुटुंबाच्या दोन ट्रक भाड्यानी देण्याचाही उद्योग होता. " हमारी एक जमाने मे दसं-दसं ट्रके रस्ते पर दौडती थी। पर दो गाडीयोंका एकसाथ ऍक्सिडेंट हो गया। वो चक्कर मे पुरा का पुरा धंदा बैठ गया। अभी धीरे-धीरे धंदा फिरसे रस्ते पर आ रहा है।"
गेली काही वर्षे या कुटुंबानी बर्‍याच खस्ता खाल्या असाव्यात.

घरी आईने जेवणाची तयारी केली आहे अस कुठल्यातरी भावंडाने निरोप आणला. पण रात्रीचे आठ वाजायला आले होते. त्यामुळे मला घरी जाण भाग होत.

नाही म्हटल तरी हा सगळा प्रकार थोडा अंगावर येण्याजोगाच होता. इतकी भावंडे, इतक लहान घर व पैसा कमविण्याची एक तळहातावर खाउन जगण्यासारखा सिमित उद्योग हे सगळं थोडं भीतीदायक होत. तसं घर खाउन-पिउन सुखी होत. पण एकुण मोमिनपुर्‍यात सगळीकडे हीच परिस्थिती आहे असं माझ्या मित्राच्या बोलण्यावरुन वाटले. याचा अर्थ असा नव्हे की हिंदु समाज अप्रगत नाही. तसेच एका उदाहरणावरुन कुठलं मत ठामपणे मांडणेही उचित नव्हे. (पुढे मी मुंबईच्या भेंडी बाजार भागात गेलो तिथेही असलीच परिस्थिती होती.) पण सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे भारत आज एवढी प्रगती करत असतांना या भागात भविष्याबद्दल फारशी उत्सुकता कोणाला नाही. कारण एकंदर शिक्षणाबद्दल उदासिनता, त्याअन्वये, तंत्रज्ञानाशी संबधीत असलेल्या उपलब्ध संधींचा फायदा उठविण्याची असमर्थता तसेच स्त्री-शिक्षण व कुटुंब नियोजनाच्या नावानी शंख. या कारणांमुळे १९९० नंतर उदयास आलेल्या अर्थशास्त्राच्या नविन गणितात या समाजाला जागा मिळण कठिण जातय.

अश्या परिस्थितीत धर्मांधता वाढणे सहाजिकच आहे. आणि जर का कोणी तरुण या परिस्थितुन बाहेर पडु इच्छित असेल तर राजकीय पक्ष प्रगतीची दारं अडवितात. हे सगळं प्रकरण कसं आणि कधी बदलणार, माहिती नाही. पण लौकरात लौकर काहीतरी करणं आवश्यक आहे नाही तर फक्त त्यांचेच नव्हे तर इतरांचे भविष्यही धोक्यात आहे.

7/3/07

प्रतिभाताईंनी उठवलेले राष्ट्र-वादळ

प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती होणार माझ्या मनात पहिला प्रश्न हा आला कि ही व्यक्ती कोण? आता, मी उत्तर प्रदेशी असतो किंवा तामिळ असतो तर हा प्रश्न पडणे सहाजिक आहे पण मी मराठी असुन सुध्दा ही व्यक्ती कोण याचा गंध मला नव्हता. अजुनही नाहीया. भारतीय राष्ट्रपती पद हे नामधारी मानाचे स्थान आहे. आपल्य देशातील लोकतांत्रिक व्यवस्थेत या पदाला गणतंत्रदिनी भाषण देण्या पलिकडे फारसे महत्त्व आत्ता पर्यंत नव्हते. फाशीच्या शिक्षेचा अंतिम निर्णय राष्ट्रपतींच्या हाती असतो खरा पण हा निर्णय घेण्याची परिस्थिती दुर्मिळ येते. अश्या परिस्थितीत प्रतिभाताईंच्या राष्ट्रपती होणार या मुद्द्याने एवढे वादळ का निर्माण केले?

राष्ट्रपतीपदाची निवडणुक पंतप्रधान पदाच्या निवडणुकी पेक्षा निराळी असते व या पध्दतीचे विश्लेषण येथे करण्याचा माझा विचार नाही. थोडक्यात, जो राजकीय पक्ष सत्तेवर असतो त्याच्या आवडीचा व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी निवडुन येतो. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस पक्षाची अनिभिषिक्त सत्ता बरीच वर्षे चालल्यामुळे कॉंग्रेसी व्यक्तीच राष्ट्रपती म्हणुन निवडुण येतं असे. आणि काँग्रेस पक्ष म्हणजे गांधी-नेहरु घरण्याचा पाणपोई असल्यामुळे सन १९७० नंतरच्या काळात या 'राज-घराण्याचे' जो निष्ठावंत पाईक असेल तो राष्ट्रपती म्हणुन नेमल्या जाईल. याचा अर्थ असा नव्हे कि या काळातील राष्ट्रपती कर्तबगार किंव्हा हुशार नव्हते पण गांधी-नेहरु घराण्याशी निष्ठा असणे याचा बुध्दी असण्याशी काहीसुध्द्दा संबध नाही.

नरसिंम्हाराव सरकार नंतर जो गठ-बंधनाचा काळ आला त्यात राष्ट्रपतीपदाचे महत्त्व वाढले. कारण जेंव्हा लोकसभेत त्रिशंकु परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस राष्ट्रपतीस जो पक्ष बहुमत सिध्द करु शकेल अशी आशा असते त्या पक्षास सत्ता स्थापन करण्यास आमंत्रित करण्यात येते. उदाहरणार्थ, १९९७ सालच्या त्रिशंकु निवडणुकीत तेंव्हाच्या राष्ट्रपतींनी सत्ता स्थापन करण्यास सोनिया गांधी यांना आमंत्रण देण्यास राजी होते. पण त्याआधीच समाजवादी पक्षाने काँग्रेसला पाठिंबा देण्यास नकार दिल्यामुळे गाडं फारस पुढे गेल नाही. पण सत्ता स्थापन करण्यास आवश्यक आकडे सुरुवाती पासुनच नसतांना के.आर. नारायण सोनिया गांधींना निमंत्रण देण्यास एवढे उतावळे का होते? कारण एकतर ते पूर्वी काँग्रेसचे सदस्य होते व दुसरं म्हणजे जवाहरलाल नेहरुंच्या काळापासुन ते गांधी घराण्याचे निष्ठावंत पाईक होते.

जवळच्या भविष्यात तरी त्रिशंकु लोकसभचे चित्र त्रिशंकुच असण्याची शकत्या अधिक असल्यामुळे राष्ट्रपतीपदावर 'आपला' माणुस असणे आता आवश्यक झाले.

भा.ज.प. ने मात्र सत्तेत आल्यावर या परंपरेस तडा दिला. श्री अब्दुल कलाम या एका अत्यंत हुशार, कर्तबगार, राजकारणी नसलेल्या व तरुण पिढीच्या आवडत्या व्यक्तीला राष्ट्रपती बनवुन, श्री राजेंद्रप्रसाद किंवा श्री राधाकृष्णन या सारख्या मेधावी पुरुषांना राष्ट्रपती नेमण्याच्या परंपरेचे पुनरुत्थान केले. तसेच हिंदुत्ववादी पक्ष ही ख्याती असलेल्या भा.ज.प. ने एक मुस्लीम व्यक्तीला राष्ट्रपती बनवुन, हे पद राजकारणापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे हे पण सिध्द केले.

पण आता परत काँग्रेस सत्तेवर आहे. लांगुललाचन परत जोरात सुरु असतांना एका अज्ञात व्यक्तीला- जीची आत्तापर्यंतची कामगिरी म्हणजे एक सहकारी पतपेढी बुडीत काढणे ही आहे, जी व्यक्ती आपल्या स्वर्गवासी गुरुला अजुनहे 'भेटते' आणि जीचे आयुष्याचे व्रत म्हणजे गांधी घराण्याची सेवा करणे हे होय - राष्ट्रपती पदासाठी नियुक्त करणे म्हणजे सुशिक्षित व कष्टीक भारतीय नागरिकाचा अपमान नव्हे का? तसेच ज्या तर्‍हेने कम्युनिस्ट पक्ष आपल्या ४० लोकसभा सदस्यांच्या 'बळावर' श्री अब्दुल कलाम यांना दुसर्‍यांदा राष्ट्रपती पदावर येउ न देण्याची देशावर जी जबरदस्ती करतोय, तो प्रकार संतापजनक नव्हे का?

अगदी काँग्रेसी व्यक्तीच राष्ट्रपती करायचा असला तरी काँग्रेस मधे काय कर्तबगार व्यक्तींचा दुष्काळ पडलाय का? राजा करणसिंग अधिक उत्तम उमेदवार नाही का? पण अर्जुन सिंग सारखा व्यक्ती ज्याची सत्तापिपासुता पुढल्या पिढीचा बळी घेणार आहे किंवा शिवराज पाटील ज्यांची आत्ता पर्यंतची कामगिरी म्हणजे पाय चाटणे हीच आहे, त्या पेक्षा प्रतिभाताई बर्‍या. कर्तबगार नसल्या तरी निदान सत्तापिपासु किंवा फारश्या भ्रष्ट नाहीत.

आपण भारतीयांना दुय्यम दर्जाच्या वस्तु स्विकारायची सवय आहे. जे मिळेल ते गोड मानुन आपण टाळ्या वाजवायला तयार असतो. आपणच काँग्रेस पक्षाला निवडुण दिले आहे. शेवटी जसा राजा तशी प्रजा. किंवा प्रजातंत्रात, जशी प्रजा तसा राजा !

7/1/07

इतिहासाची तासिका

'ब' वर्गाला इतिहासाचा विषय शाळेच्या मुख्याध्यापिका स्वतः शिकवित असत. त्या सेवा निवृत्तीच्या अगदी जवळ आल्या होत्या. ठेंगण्या व आजी सारख्या दिसणार्‍या बाईंचा विद्यार्थ्यांवर मुळीच म्हणजे मुळीच वचक नव्हता. त्यातुन 'ब' वर्ग शिक्षकांना त्रास देण्याचा बराच अनुभवी होता. मराठीच्या व इंग्रजीच्या शिक्षिकां व्यतिरिक्त 'ब' वर्ग कोणालाच जुमानत नसे. त्यातुन मुख्याध्यापिका बाईंना त्रास देण्याची काही औरच न्यारी होती. शेवटी मुख्याध्यापिकेला सळो की पळो करुन सोडलं म्हणजे विशेष शौर्याची गोष्ट होती.

बाई पहिल्या बाकावर पुस्तक ठेउन शिकवत असत. त्यांना थोड कमी ऐकु येत असे. त्यामुळे मुले मागल्या बाकावर बसुन सारख्या 'कॉमेंट्स' करत असतं. "शांत रहा. आजकालच्या मुलांना काहीच लाज वाटत नाही" बाई म्हणाल्या. त्यांची जबडा समांतर हलवित बोलण्याची थोडी विचित्र पध्दती होती. त्यामुळे त्यांचे उच्चार अधिक ठळक होत असत. "पुस्तकं बंद करा" या वाक्यात 'क', 'द' या शब्दांवर जास्त भार त्या देत असत. मुलांना हसायला एवढ कारण पुरेसे होते. बाईंनी शिकवायल सुरुवात केली व मुलांनी मस्ती करायला. जी अभ्यासु मुलं होती त्यांची मात्र पंचाईत होत असे. त्यांना बाई काय शिकवतायत हे ऐकायच असे पण वर्गातील मस्तीखोर मुलांपुढे ते शरण होते.

पहिल्या बाकावर बसलेला मंदार आज विशेष 'फॉर्म' मधे होता. बाई जे काही बोलतील त्यातील एखादा शब्द तो त्याच्या घोगर्‍या आवाजात परत जोरात उच्चारत असे. त्याचा आवाज म्हणजे माईक अगदी तोंडाशी घेउन बोलल की जसा आवाज येइल तसा होता. त्यामुळे अगदी मागल्या बाकावर सुध्दा तो काय बोलतोय ते ऐकु येत असे. एकतर बाईंना मंदारचा वात्रट पणा ऐकु येत नव्हता किंव्हा त्या थकल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करीत होत्या.

"चिन्मय, हसायला काय झाल तुला? हसणं बंद कर" बाई चिन्मय वर ओरडल्या.
"मस्तीखोर चिन्मय" मंदारने आपले मत स्पष्ट केले.
"हो मॅडम सॉरी" चिन्मय.

"पुस्तक बंद करा व मी काय बोलतेय त्या कडे लक्ष द्या" बाई म्हणाल्यात.
"आता कुठे कुठे लक्ष देउ. मॅडम कडे कि पुस्तका कडे" मंदार उवाच.
पहिल्या बाकावर बसुन असलं काही बोलण म्हणजे मंदारच्या धीटाईची सीमा होती. इतर मुलांवर आता हसुन हसुन पोट दुखण्याची पाळी आली होती.

"चिन्मय, तुला हसायचं असेल तर मागल्या बाकावर जा"
"हो मॅडम, सॉरी मॅडम" अस म्हणत चिन्मय धावत धावत सरळ मागल्या बाकावर दाखल झाला.
"काही लाजच नाही या मुलाला. अगदी लगबगीने मागल्या बाकावर गेला"
"निर्लज्ज चिन्मय" मंदार.

पण मंदार आज एवढ्यावर थांबणार नव्हता. बाईंनी वर बघितलं की तो कागदाचे लहान्-लहान तुकडे पुस्तकावर टाकायचा. शिकविण्याच्या तंद्रीत बाई ते तुकडे बाजुला करायच्या. काही वेळा हे करुन झाल्यावर मंदारने पुस्तकाची पानं बदलवायला सुरुवात केली. पण बाईंच्या काहीच लक्षात कसं येतं नव्हत ही थोडी नवलाईची गोष्ट होती. तेवढ्यात मागल्या बाकावरुन पाय जोर-जोरात जमिनीवर घासण्याचा आवाज येउ लागलेत. बाई तरातरा मागल्या बाकांकडे चालत गेल्या. "कोण मस्ती करतय" म्हणत जो दिसेल त्याला चापट्या मारु लागल्यात. वर्गात 'हॉ..हॉ...' चा गजर झाला. पाय घासण्याचे आवाज मात्र थांबलेत. (तेजसनेच बहुतांश चापट्या खाल्ल्यात.)

या दरम्यात मंदारने कहर केला. त्याने इतिहासाचे पुस्तक बदलवुन त्या जागी गणिताचे पुस्तक ठेवले. बाई शिकवायला परत सुरुवात करणार तेच त्यांच्या हा वाह्यातपणा लक्षात आला. "नालायक" म्हणत त्यांनी मंदारला चापट्या मारायला सुरुवात केली. "आई ग..." मंदार खोटा कळवळला.
पूर्ण वर्ग आता हसुन हसुन लोळायला लागला होता. "तू, तू आणि तू आणि तुझ नाव काय आहे? तू पण वर्गाबाहेर जा" जी मुलं दृष्टीक्षेपात असतील त्यांना बाईंनी वर्गाबाहेर हाकलले.

" मी काय केलं. मी तर काहीच नाही केलं. मार खाउनही वर्गाबाहेरचं जावं लागतं" असली काही वाक्य ऐकु येउ लागलीत. मग उगाच खोटा-नाटा चेहरा पाडुन, फार वाईट वाटतय आणि चुकुन असला गोंधळ झाला इत्यादी भाव तोंडावर दाखवण्याचा प्रयत्न करत वर्गातील मधली ओळ वर्गाबाहेर गेली.

बाईंना शिकवायला जेमतेम १० मिनीटे मिळालीत. तासिकेची घंटा झाल्यावर त्या वर्गाबाहेर आल्यावर त्यांची अपेक्षा होती कि मुले कान धरुन वर्गाबाहेर उभी असतील म्हणुन पण वर्गाबाहेर सामसुम होतं. मुख्याध्यापिका असल्यामुळे त्यांच्याकडे फार काम असे. वर्गाबाहेर चपराशी कोणीतरी आलय हा निरोप घेउन हजर होताच. त्यामुळे त्या घाई-घाईत कार्यालया कडे निघुन गेल्यात. बाहेर काढलेली मुले थोड्याच वेळात जणु काही झालच नाहीया अश्या भावात साळसुद पणे परत वर्गात दाखल झाली.